मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ६०१ ते ७००

    सोलींव दुःखाचें अतिदुःख । त्या नराची वाचा देख ।

    केवळ निरय तें त्याचें मुख । नामीं विन्मुख जे वाणी ॥१॥
    त्या पुरुषाची वाणी म्हणजे गाळीव दु:खांतले मोठे दुःखच होय असे समज. जी वाणी नामाला विन्मुख होते, ती त्याची वाणी म्हणजे शुद्ध नरक होय १.


    हो कां वेदशास्त्रसंपन्न वाणी । करूनि निंदकू नामकीर्तनीं ।
    तो पापी महापाप्याहूनी । त्याचेनि अवनी अतिदुःखी ॥२॥
    मग ती वाणी वेदशास्त्र पढलेली का असेना ? नामकीर्तनाची जो निंदा करतो, तो महापातक्याहूनही मोठा पातकी होय. त्याच्यामुळे पृथ्वीला सुद्धा अतिशय पीडा होते २.


    नामकीर्तनें धन्य वाणी । येचि अर्थी सारंगपाणी ।
    प्रवर्तला निरूपणीं । विशद करूनी सांगावया ॥३॥
    नामकीर्तनानेच वाणी धन्य होते, ह्याच अर्थाचे निरूपण स्पष्ट करून सांगण्याला श्रीकृष्ण तयार झाला ३.


    यस्यां न मे पावनमङ्ग कर्म स्थित्युद्‍भवप्राणनिरोधमस्य ।
    लीलावतारेप्सितजन्म वा स्याद् वन्ध्यां गिरं तां बिभृयान्न धीरः ॥ २० ॥
    [श्लोक २०] हे उद्धवा ! जी वाणी या जगाच्या उत्पतिस्थितीसंहारात्मक माझ्या पवित्र कर्मांचे किंवा अन्य लोकप्रिय लीलावतारांचे वर्णन करीत नाही, ती वाणी वांझ होय ज्ञानी पुरूषाची वाणी अशी असू नये. (२०)




    जगातें पवित्र करिती । महादोषांतें हरिती ।
    माझीं नामकर्में गुणकीर्ती । जड उद्धरती हरिनामें ॥४॥
    माझी नामें, कर्मे आणि गुणांची कीर्ति ही जगाला पवित्र करतात, व महान् दोषांना नष्ट करतात. हरिनामस्मरणाने जड जीवांचा उद्धार होतो ४.


    म्हणसी तूं बोलिलासी निजवर्म । मी विद्याविद्यातीत ब्रह्म ।
    त्या तुज कैंचे गुण नाम कर्म । कीर्तनधर्म केवीं घडे ॥५॥
    तूं म्हणशील की, "तूं आपलें वर्म सांगितले आहेस की, 'मी विधेच्या व अविद्येच्या. अतीत असा ब्रह्मस्वरूप आहे. ' मग त्या तुला गुण, नाम आणि कर्म तरी कशाचे ? आणि कीर्तनधर्म तरी घडणार कसा ?" ५.


    उद्धवा हें मनीं न धरीं । मी स्वलीला स्वमायें करीं ।
    नाना अवतारांतें धरीं । न करूनि करीं स्थित्यंतू ॥६॥
    पण उद्धवा ! असें तूं मनांत आणूं नकोस. मी आपल्याच मायेच्या आश्रयाने आपल्या लीला करतों, अनेक अवतार धारण करतों आणि काही न करतांच सर्वांचे पालन व संहार करतों ६.


    त्रिगुणगुणी गुणावतार । ब्रह्मा आणि हरिहर ।
    तिहीं रूपीं मीच साचार । चराचर करीं हरीं ॥७॥
    ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर हे त्रिगुणात्मक तीन गुणावतार आहेत, पण त्या तिघांच्याही रूपांमध्ये खरोखर मीच असून मीच चराचरांना निर्माण करतो व त्यांचा संहारही करतों ७.


    स्रष्टारूपें मी स्रजिता । विष्णुरूपें मी प्रतिपाळिता ।
    रुद्ररूपें मी संहर्ता । जाण तत्त्वतां मी एकू ॥८॥
    ब्रह्मदेवाच्या रूपाने सृष्टीला उत्पन्न करणारा मीच; विष्णूच्या रूपाने तिचा प्रतिपाळ करणारा मीच; आणि रुद्ररूपाने तिचा संहार करणाराही खरोखर एक मीच आहे असे समज ८.


    बाल्यतारुण्यवार्धक्यांसी । एक पुरुष तिहीं अवस्थांसी ।
    तेवीं उत्पत्तिस्थितिप्रळयांसी । गुणकर्मांसी मी कर्ता ॥९॥
    बाल्य, तारुण्य व वार्धक्य या तिन्ही अवस्थांचा कर्ता जसा एकच पुरुष असतो, त्याप्रमाणे उत्पत्ति, स्थिति व प्रळय ह्यांचा श्राणि गुणकर्माचा कर्ता मीच आहे ९.


    मी कर्ताचि अकर्ता । अकर्तेपणे कर्ता ।
    हें माझें मीचि जाणें तत्त्वतां । आणिकासी सर्वथा कळेना ॥६१०॥
    मी कर्ता असूनच अकर्ता आहे, आणि अकर्तेपणाने कर्ता आहे. हे खरोखर माझें मीच जाणतों. दुसऱ्याला मुळीच कळत नाही ६१०.


    हींचि माझीं नामकर्में गातां । माझी पदवी लाभे वक्ता ।
    माझे लीलावतार कीर्तितां । कीर्तिमंतां निजलाभू ॥११॥
    माझी नामें आणि हीच माझी कमैं वर्णन केली, तर त्या वक्त्याला माझीच पदवी प्राप्त होते, आणि माझ्या लीलावतारांचे कीर्तन केले तर कीर्तन करणारांना आत्मप्राप्ति होते ११.


    अवतारांमाजीं उत्तमोत्तम । श्रीरामकृष्णादि जन्मकर्म ।
    नाना चरित्रें संभ्रम । अविश्रम जे गाती ॥१२॥
    सर्व अवतारांमध्येही उत्तमोत्तम अशी श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादिकांची जन्मकर्म, त्यांची नाना प्रकारची चरित्रे व लीला जे अखंड गायन करतात त्यांना आत्मप्राप्ति होते १२.


    सेतु बांधिला अवलीळा । सागरीं तारिल्या शिळा ।
    गोवर्धनु उचलिला हेळा । दावानळा प्राशिलें ॥१३॥
    श्रीरामाने सहज लीलेने सेतु बांधिला व समुद्रामध्ये दगड तरावयास लावले, श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत खेळता खेळतां उचलला व दावाग्नि गिळून टाकला १३.


    ताटिका वधिली एके बाणीं । पूतना शोखिली तानेपणीं ।
    अहल्या तारिली चरणीं । यमलार्जुन दोन्ही उद्धरिले ॥१४॥
    श्रीरामाने एका बाणानेंच ताटिका मारली, श्रीकृष्णाने तान्हेपणांतच पूतनेला शोधून मारिली. श्रीरामाने पायाने अहल्येचा उद्धार केला, श्रीकृष्णानें यमलार्जुन दोघेही उद्धरिले १४.


    रावणू आदळला धनुष्य वाहतां । तें भंगोनि पर्णिली सीता ।
    मथूनि चैद्यादि समस्तां । भीमकदुहिता आणिली ॥१५॥
    जे धनुष्य उचलताना रावणही आदळून पडला, तेंच धनुष्य मोडून श्रीरामानें सीतेला वरिले, श्रीकृष्णाने शिशुपालादि सर्वांना जिंकून भीमकराजाची कन्या (रुक्मिणी) आणली १५.


    मारिला सुबाहु खर दूषणू । अघ बक केशिया मारी श्रीकृष्णू ।
    सुग्रीवू स्थापिला राज्य देऊनू । येरें उग्रसेनू स्थापिला ॥१६॥
    श्रीरामाने सुबाहु, खर, दूषण यांना मारले, श्रीकृष्णाने अघासुर, बकासुर, केशी, यांना मारलें. श्रीरामाने सुग्रीवाला राज्य देऊन त्याची सिंहासनावर स्थापना केली, त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने उपसेनाला सिंहासनावर बसविले १६.


    मेळवूनि वानरांचा पाळा । वधू केला राक्षसकुळा ।
    मेळवून बाळां गोपाळां । मल्लां सकळां मर्दिलें ॥१७॥
    श्रीरामानें वानरांचा समुदाय जमवून राक्षसकुळाचा वध केला, श्रीकृष्णाने बाळगोपाळ जमवून सर्व मल्लांना मारून टाकले १७.


    रावणकुंभकर्णां केला मारू । मारिला कंस चाणूरू ।
    रामें ठकिला वाली वानरू । ठकिला महावीरू काळयवनू ॥१८॥
    श्रीरामाने रावण व कुंभकर्ण मारले, श्रीकृष्णानें कंस व चाणूर यांचा वध केला. श्रीरामाने वाली वानराला फसविलें, श्रीकृष्णानें महाघोर अशा कालयवनाला फसविलें १८.


    रामें बिभीषण स्थापिला । कृष्णें धर्म संस्थापिला ।
    एक पितृवचनें वना गेला । एक घेऊनि आला गतपुत्र ॥१९॥
    श्रीरामाने बिभीषणाची राज्यावर स्थापना केली, श्रीकृष्णाने धर्माची राज्यावर स्थापना केली. एक बापाच्या आज्ञेकरितां वनवासाला गोला, तर दुसरा मातेच्या मृतपुत्रांना घेऊन आला १९.


    हीं अवतारचरित्रें वर्णितां । चोरटा वाल्मीकि झाला तत्त्वतां ।
    व्यास जारपुत्र सर्वथा । केला सरता तिहीं लोकीं ॥६२०॥
    ही अवतारचरित्रे वर्णन करूनच, खरोखर पूर्वी चोरटा असलेला कोळी थोर वाल्मीकि ऋषि झाला; आणि व्यास हा खरोखर जारिणीचा पुत्र, पण या अवतारचरित्रगायनानेच त्याला त्रिभुवनांत श्रेष्ठ करून सोडले ६२०.


    या दोहीं अवतारांची पदवी । वर्णितां दोन्ही झाले महाकवी ।
    व्यास वाल्मीकि वंदिजे देवीं । कीर्तिगौरवीं गौरविले ॥२१॥
    या दोन्ही अवतारांची महती वर्णन करता करतांच दोघेही महाकवि झाले. व्यास-वाल्मीकांना देवांनीही वंदन करून स्तुतिस्तोत्रांनी त्यांना गौरविले आहे २१.


    त्या महाकवींची कवित्वकथा । शेष नेत्रद्वारें श्रवण करितां ।
    दोन सहस्र नयनीं आइकतां । धणी सर्वथा बाणेना ॥२२॥
    त्या महाकवींची काव्यकथा शेष हा नेत्रद्वाराने श्रवण करता करतां व दोन सहस्र नेत्रांनी ऐकता ऐकतांसुद्धा त्याची तृप्ति होत नाही २२.


    हेचि कथा स्वर्गाच्या ठायीं । श्रवण करावया पाहीं ।
    इंद्र लागे बृहस्पतीचे पायीं । कीर्ति लोकत्रयीं वर्णिती ॥२३॥
    हीच कथा स्वर्गामध्ये श्रवण करण्यासाठी इंद्र बृहस्पतीच्या चरणी लागला. अशी ही अवतारचरित्रांची कीर्ति त्रिभुवनांत वर्णन करीत असतात २३.


    असो कथेचें महिमान । माझेनि नाममात्रें जाण ।
    तारिला अजामिळ ब्राह्मण । गजेंद्र‍उद्धरण हरिनामें ॥२४॥
    कथेचा महिमा वर्णन करणे एवढ्यावरच थांबवितों. पण माझ्या नांवाचे केवळ स्मरण करण्यानेही मी अजामिळ ब्राह्मणाचा उद्धार केला. हरिनामस्मरणानेंच गजेंदाचा उद्धार झाला २४.


    पक्ष्याचे मिषेंकरूनी । रामु या दों अक्षरस्मरणीं ।
    महादोषांची श्रेणी । तत्काळ कुंटिणी तारिली ॥२५॥
    पक्ष्याच्या निमित्ताने राम ह्या दोन अक्षरांचे स्मरण केले, पण तेवढ्यावरून महापातकांची रांगच अशी जी कुंटीण तीही तत्काल उद्धरिली २५.


    माझिया नामासमान । नव्हे वेदशास्त्रशब्दज्ञान ।
    वेदशास्त्रांचा बोधु कठिण । तैसें जाण नाम नव्हे ॥२६॥
    वेदशास्त्रांतील शब्दज्ञानसुद्धा माझ्या नामासमान व्हावयाचें नाही. कारण, वेदशास्त्रांचा अर्थ समजणे कठीण आहे, तसें माझें नाम कठीण नाही हे लक्षात ठेव २६.


    पठणमात्रें वेदशास्त्रवक्ता । नव्हे मजमाजीं येणेंचि सरता ।
    स्वभावें माझें नाम घेतां । अतिपढियंता मज होये ॥२७॥
    पठण केलें तर वेदशास्त्र बोलता येते, तरी तेवढ्यानेच काही मजमध्ये प्रवेश होत नाही. पण सहजगत्या माझें नाम घेतले तरी तो माझा आवडता होतो २७.


    वेदशास्त्रीं अधिकारी ब्राह्मण । नामासी अधिकारी चार्‍ही वर्ण ।
    जग उद्धरावया कारण । नाम जाण पैं माझें ॥२८॥
    वेदशास्त्रांमध्ये अधिकारी फक्त ब्राह्मणच आहेत. परंतु नामाचे अधिकारी चारही वर्ण आहेत; आणि जगाचा उद्धार करावयास कारण, माझें नामच आहे हे लक्षात ठेव २८.


    जेथ नित्य नामाचा उच्चार । तेथ मी असें साचार ।
    येथ करणें न लगे विचार । नाम सधर तारावया ॥२९॥
    जेथे नित्य नामाचा उच्चार होत असतो, तेथे खरोखर मीच असतो. यांत विचार करण्याचे कारण नाही. नाम हे तारावयाला समर्थ आहे २९.


    ते माझे जन्म नाम कीर्ति गुण । जे वाचेसी नाहीं पठण ।
    ते वाचा पिशाचिका जाण । वृथालापन वटवटी ॥६३०॥
    ते माझे जन्म, नाम, कीर्ति, किंवा गुणानुवाद ज्या वाणीला पठण होत नाहीत, ती वाणी व्यर्थ बडवर करणारी हडळ आहे म्हणून समजावें ६३०.


    माझे कीर्तीवीण जें वदन । तें केवळ मद्याचें भाजन ।
    त्या उन्मादविटाळाभेण । नाम जाण तेथ न ये ॥३१॥
    माझी कीर्ति वर्णन केल्याशिवाय जे तोंड असेल, ते केवळ मच भरलेलें महापातकांची लाखांचा अर्थ समजणे कठीण आ होत नाही. पण सहजगत्या मा भांड होय. त्या मद्यामुळे येणाऱ्या नशेचा विटाळ होईल या भयाने नाम तेथे येतच नाही ३१.


    जेथ उच्चारु नाहीं नामाचा । ते जाणावी वांझ वाचा ।
    गर्भ न धरि हरिकथेचा । निष्फळ तिचा उद्योगू ॥३२॥
    ज्या वाणीमधून नामाचा उच्चार होत नाहीं, ती वाणी वांझ समजावी. कारण ती हरिकथेचा गर्भ धारण करीत नाही. त्या वाणीचा इतर सर्व उद्योग निष्फळ होय ३२.


    उद्धवासी म्हणे श्रीरंगू । आइकें बापा उपावो चांगू ।
    माझा नाममार्ग सुगमू सांगू । न पडे पांगू आणिकांचा ॥३३॥
    श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, बाबा ! एक चांगला उपाय ऐक. माझा नाममार्ग अत्यंत सुगम असून परिपूर्ण आहे. तेथे इतर मार्गाचे कारणच नाही ३३.


    हरिनामेंवीण वाणी । कदा न राखावी सज्जनीं ।
    हाचि अभिप्रावो चक्रपाणीं । प्रीतिकरोनि सांगीतला ॥३४॥
    ह्याकरितां सजनांनी हरीच्या नामाशिवाय वाणी ठेवूच नये. हाच हेतु श्रीकृष्णांनी मोठ्या प्रेमानें प्रदर्शित केला ३४.


    करूनियां शब्दज्ञान । अतियोग्यतां पंडितपण ।
    तेणें माझी प्राप्ति नव्हे जाण । वैराग्येंवीण सर्वथा ॥३५॥
    शब्दव्युत्पत्तीचे ज्ञान करून घेतले तर त्याची योग्यता मोठी होईल, त्याला पंडितपणा प्राप्त होईल, पण त्यामुळे वैराग्य प्राप्त होणार नाही व वैराग्याशिवाय माझी प्राप्ति मुळीच व्हावयाची नाही ३५.


    अथवा वैराग्यही जालें । परी तें विवेकहीन उपजलें ।
    जैसें धृतराष्ट्रा ज्येष्ठत्व आलें । नेत्रेंवीण गेलें स्वराज्य ॥३६॥
    एखादे वेळी वैराग्यही उत्पन्न झाले, पण ते जर विवेकाशिवायच उत्पन्न झाले असेल, तर जसें धृतराष्ट्राला ज्येष्टपणा आला असूनही डोळ्यांवांचून त्याचे राज्य गेलें असें झाले ३६,


    तैसें वैराग्य विवेकेंवीण । केवळ आंधळें अनधिकारी जाण ।
    नाहीं सन्मार्गदेखणेपण । वृथा परिभ्रमण तयाचें ॥३७॥
    त्याप्रमाणे विवेकाशिवाय वैराग्य हे केवळ आंधळे व अनधिकारी आहे हे लक्षात ठेव. त्याला सन्मार्ग दिसण्याचे सामर्थ्य नाही. त्याचे परिभ्रमण व्यर्थ होय ३७.


    जो विवेकें पूर्ण भरित । त्यावरी वैराग्य वोसंडत ।
    माझी जिज्ञासा अद्‍भुत । तेंचि निश्चित सांगतू ॥३८॥
    विवेकाने जो परिपूर्ण भरलेला असतो, त्याच्या ठिकाणी वैराग्य आपण होऊन उतूं येत असते. त्याला माझी जिज्ञासा काही विलक्षण असते. तेच खरोखर श्रीकृष्ण सांगतो ३८.


    एवं जिज्ञासयापोह्य नानात्वभ्रममात्मनि ।
    उपारमेत विरजं मनो मय्यर्प्य सर्वगे ॥ २१ ॥
    [श्लोक २१] अशा प्रकारे तत्त्वजिज्ञासेने आत्म्यामध्ये अनेकत्त्वाचा होणारा भास दूर करावा आणि अशा प्रकारे शुद्ध झालेले मन सर्वव्यापी असलेल्या माझ्या ठिकाणी लावावे आणि इतर सर्व गोष्टी सोडून शांत बसावे. (२१)




    नित्यमुक्त अव्ययो । स्वरूप जाणावया पहा हो ।
    ज्याचा लागला दृढ भावो । आन आठवो नाठवे ॥३९॥
    अहो ! हे पहा ! नित्यमुक्त व नाशरहित असें माझें स्वरूप जाणण्याविषयी ज्याची अगदी उत्कट इच्छा लागून राहिलेली असते, त्याला तिच्यापुढे दुसरे कांहींच आठवत नाही ३९.


    ऐशी मज जाणावयाची अवस्था । त्या नांव बोलिजे जिज्ञासता ।
    माझे प्राप्तीलागीं सर्वथा । पांडित्य मान्यता ते नेघे ॥६४०॥
    अशी मला जाणण्याची जी उत्कंठा तिलाच जिज्ञासा असें म्हणतात. माझ्या प्राप्तीसाठी तो विद्वत्ता व मानमरातब कधीच स्वीकारीत नाहीं ६४०.


    देहादि अध्यासू आपुल्या ठायीं । श्रवणें मननें मिथ्या केला पाहीं ।
    दृढ विश्वास गुरूच्या पायीं । पूर्णब्रह्माच्या ठायीं निर्धारू ॥४१॥
    आपल्याच ठिकाणी विचार करून देहादिक संसारचिंतन मिथ्या आहे असेंच श्रवणाने आणि मननाने त्याने निश्चित केलेले असते. त्यामुळे गुरूच्या पायांवर त्याचा पूर्ण विश्वास असतो, आणि पूर्ण ब्रह्माच्या ठायीं दृढ निश्चय असतो ४१.


    तेथ पुढारीं चालावया वाट । भगवद्‍भजनीं अतिउद्‍भट ।
    कां सांडोनि कर्मकचाट । ध्याननिष्ठ तो होय ॥४२॥
    तेव्हां पुढील मार्ग चालण्यासाठी तो भगवद्‌भजनामध्ये अत्यंत तत्पर होतो, किंवा कर्माचा खटाटोप सोडून देऊन तो ध्याननिष्ठ होतो ४२.


    तेथ ध्येय ध्याता ध्यान । न दिसे त्रिपुटीचें भान ।
    कोंदलें चैतन्यघन । वस्तु सनातन तो पावे ॥४३॥
    तेव्हां ध्येय, ध्याता आणि ध्यान ह्या त्रिपुटीचे भान त्याला राहात नाहीं, जिकडे तिकडे सर्व चैतन्यच भरून राहिल्यामुळे तोही सनातन परब्रह्मच बनून राहातो ४३.


    तेथ कैंचा कर्ता क्रिया कर्म । फिटला नानात्वाचा भ्रम ।
    सबाह्य कोंदलें परब्रह्म । जाला उपरम गुरुकृपा ॥४४॥
    तेथें कर्ता, कर्म आणि क्रिया कशाची ? भेदभावाचा सर्व भ्रम फिटून जातो, आंत-बाहेर परब्रह्मच भरून राहते, आणि गुरुकृपेनें मन निश्चळ होऊन राहतें ४४.


    सर्वगत सर्वकाळ । सर्वदेशीं सर्वीं सकळ ।
    वस्तु असे जें केवळ । तेथ निश्चळ निजबोधू ॥४५॥
    सर्वत्र, सर्वकाळ, सर्वदेशी आणि सर्वांमध्ये केवळ जें परब्रह्म व्यापून असते, तेथेंच आत्मज्ञान स्थिर होते ४५.


    ऐशिये वस्तूची धारणा । ज्याचेनि न करवे जाणा ।
    तरी सुगम उपाया आना । एक विचक्षणा सांगेन ॥४६॥
    अशा परब्रह्माचें ध्यान ज्याच्याने करवत नाही, त्याच्याकरितांही हे चतुरा ! दुसरा एक सोपा उपाय सांगतो, ऐक ४६.


    यद्यनीशो धारयितुं मनो ब्रह्मणि निश्चलम् ।
    मयि सर्वाणि कर्माणि निरपेक्षः समाचर ॥ २२ ॥
    [श्लोक २२ ] जर माझ्या ठिकाणी मन स्थिर करण्यास असमर्थ असशील, तर सर्व कर्मे निरपेक्षपणे माझ्यासाठीच कर. (२२)




    स्वभावतां मन चंचळ । विषयवासना अतिचपळ ।
    निर्गुण ब्रह्मीं केवळ । नाहीं बळ प्रवेशावया ॥४७॥
    मन हे स्वभावत:च चंचळ आहे, आणि विषयवासना त्याहून अत्यंत चपल आहे. यामुळे निर्गुण अशा ब्रह्मामध्ये प्रवेश करावयाचे सामर्थ्य त्या मनाला येत नाही ४७.


    तरी सांख्य योग संन्यासू । हा न करावया आयासू ।
    माझिया भक्तीचा विलासू । अतिउल्हासू करावा ॥४८॥
    ते सामर्थ्य आणण्याकरितां सांख्य, योग किंवा संन्यास यांचा जो मार्ग आहे, त्या मार्गातील परिश्रम चुकवावयाचे असल्यास अत्यंत उल्हासाने माझी भक्तीच वाढवावी म्हणजे झालें ४८.


    मागें बद्धमुक्तांचें निरूपण । सांगीतलें मुक्तांचें लक्षण ।
    वृथा शाब्दिकांचें शब्दज्ञान । तेंही व्याख्यान दाविलें ॥४९॥
    मागें बदमुक्तांची लक्षणे सांगतांना मुक्ताचे लक्षणही सांगितले होते, आणि शब्दपांडित्य करणारांच्या पोकळ शब्दज्ञानाचेही विवेचन केले होतें ४९.


    आतां आपुली निजभक्ती । सांगावया उद्धवाप्रती ।
    अतिआदरें श्रीपती । भक्तीची स्थिति सांगतु ॥६५०॥
    आता आपली आत्मभक्तीही उद्धवाला सांगावी म्हणून अत्यंत आदराने श्रीकृष्ण भक्तीचे स्वरूप सांगत आहेत ६५०.


    उद्धवा चढत्या आवडीं मत्कर्म । जे भक्तीसी विकावा मनोधर्म ।
    माझें स्मरावें गुणकीर्तिनाम । नाना संभ्रमविनोदें ॥५१॥
    उद्धवा ! अत्यंत आवडीने माझे कार्य करणे असेल, तर भक्तीलाच मनोधर्म विकून टाकावा, आणि अनेक प्रकारच्या आनंददायक पद्धतींनी माझे गुण, कीर्ति व नाम यांचे स्मरण करावें ५.


    माझेनि भजनें कृतकृत्यता । दृढ विश्वास धरोनि चित्ता ।
    भजनीं प्रवर्तावें सर्वथा । अविश्रमता अहर्निशीं ॥५२॥
    माझ्या भजनानेच कृतकृत्यता होते असा मनामध्ये खतर विश्वास बाळगून रात्रंदिवस न थकता भजनामध्येच सर्वस्वी प्रवृत्त व्हावें ५२.


    माझ्या भजनाच्या आवडीं । नुरेचि आराणुकेसी वाडी ।
    वायां जावो नेदी अर्धघडी । भजनपरवडी या नांव ॥५३॥
    माझ्या भजनाच्या आवडीनें मनांत समाधानाला सुद्धा जागा रहात नाही, (म्हणजे भजन पूर्ण झाले असें समाधान मानून थांबावे असे वाटत नाही) एक अर्धघडी सुद्धा वायां जाऊ देत नाही, याचंच नांव भजनाचा सुकाळ ५३.


    माझ्या भजनीं प्रेम अधिक । न सांडावें नित्यनैमित्तिक ।
    वैदिक-लौकिक-दैहिक । भक्तांसी बाधक नव्हे कर्म ॥५४॥
    माझ्या भजनामध्ये जरी विशेष प्रेम असले, तरी वैदिक, लौकिक किंवा दैहिक असे नित्य-नैमित्तिक कर्म सोडूं नये. कारण भक्तांना ते कर्म कहीं बाधक होत नाही ५४.


    आचरतां सकळ कर्म । न कल्पावा फळसंभ्रम ।
    हेंचि भक्तीचें गुह्य वर्म । उत्तमोत्तम अधिकारू ॥५५॥
    मात्र सर्व कर्म आचरण करतांना फलाच्या आशेची कल्पना करूं नये, हेच भक्ताचे गुह्य वर्म असून ते जाणणे हाच अत्युत्तम अधिकार आहे ५५.


    उबगू न मनूनि अंतरीं । माझ्या प्रीतीं सर्व कर्मांतें करी ।
    जो फळाशेतें कंहीं न धरी । भक्तीचा अधिकारी तो जाणा ॥५६॥
    जो अंत:करणांत कंटाळा न करितां माझ्यावर भक्ति ठेवून सर्व कम करतो, आणि जो फळाची आशा कधीही धरीत नाही, तोच भक्तीचा अधिकारी होतो हे लक्षात ठेव ५६.


    पिंपुरें खावयाचे चाडें । न लाविती पिंपळाचीं झाडें ।
    तेंवीं कर्में करितां वाडेंकोडें । फळाशा पुढें उठेना ॥५७॥
    पिंपळाची झाडें ही काही पिंपुरें खाण्याच्या आशेने लावीत नाहीत. त्याप्रमाणे आवडीने कमै केली असतां पुढे फलाशाही उत्पन्न होत नाही ५७.


    माझें भजन करितां । न पडे ज्ञानाची पंगिस्तता ।
    माझे भजनें नित्यमुक्तता । जाण मद्‍भक्तां मद्‍भावें ॥५८॥
    माझें भजन करूं लागले असतां ज्ञानाचीही काही कमतरता पडत नाही. माझ्या भक्तांना माझ्यावर भक्ति ठेवून माझे भजन केल्यानेच नित्यमुक्तता प्राप्त होते ५८.


    ज्ञानेंवीण भक्ति न घडे । म्हणती तें शब्दज्ञान धडफुडें ।
    भक्तीस्तव जाण रोकडें । ज्ञान जोडे अपरोक्ष ॥५९॥
    ज्ञानाशिवाय भक्ति घडत नाही असें जें म्हणतात, ते केवळ शब्दज्ञान होय. भक्तीनेच प्रत्यक्ष अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ति होते असे समज ५९.


    यालागीं माझें भजन करितां । ज्ञानाचा पांग न पडे भक्तां ।
    देहगेहांमाजीं वर्ततां । बंधन मद्‍भक्तां लागेना ॥६६०॥
    महणून माझे भजन करितांना भक्तांना ज्ञानाची उणीव पडत नाही. घरादारांत वागले तरी माझ्या भक्तांना बंधन घडत नाही ६६०.


    ज्याच्या मुखीं माझें नाम । ज्यासी माझा भजनसंभ्रम ।
    ज्याच्या मनीं मी आत्माराम । त्याचें दासीकाम मुक्ति करी ॥६१॥
    ज्याच्या तोंडांत माझें नाम असते, ज्याला माझ्या भजनाचा नाद असतो, मी आत्माराम ज्याच्या मनामध्ये असतो, त्याच्या घरी मुक्तीच दासीचें काम करीत असते ६१.


    मुक्तीमाजीं विशेष कायी । वृत्ति निर्विषय असे पाहीं ।
    भक्तांसी सर्व कर्मांच्या ठायीं । स्फुरण नाहीं विषयांचें ॥६२॥
    पण ज्याची वृत्तीच निर्विषय झालेली असते, त्याला मुक्तीमध्ये विशेष ते काय ? भक्तांना कोणत्याही कर्मामध्ये विषयाचे स्फुरण नसते ६२.


    भक्तांचे विषयीं नाहीं चित्त । त्यांचा विषय तो मी भगवंत ।
    ते सदा मजमाजीं लोलुप्त । नित्यमुक्त यालागीं ॥६३॥
    भक्तांचे चित्त विषयामध्ये नसते. मी भगवंत हाच त्यांचा विषय. ते नेहमी माझ्यामध्येच लोलुप असतात, म्हणून ते नित्यमुक्तच असतात ६३.


    भक्त विषयो सेविती । ते ग्रासोग्रासीं मज अर्पिती ।
    तेणेंचि त्यांसी वंदी मुक्ती । सर्व भूतीं मद्‍भावो ॥६४॥
    भक्तांनी विषयाचे सेवन केले, तरी ते तो विषय घांसाघांसाला मलाच अपीत असतात, आणि सर्व प्राणिमात्रांमध्ये त्यांना माझीच:भावना भासते, म्हणूनच त्यांना मुक्ति वंदन करते ६४.


    यालागीं कर्मबंधन । मद्‍भक्तांसी न लगे जाण ।
    करितां माझें स्मरण कीर्तन । जगाचें बंधन छेदिती ॥६५॥
    म्हणून माझ्या भक्तांना कर्मबंधन तर लागत नाहींच, पण माझें स्मरण आणि कीर्तन करीत असतांनाच साऱ्या जगाचेही बंधन तोडून टाकतात ६५.


    माझ्या भक्तांचें वसतें घर । तें जाण माझें निजमंदिर ।
    मुक्ति तेथें आठौ प्रहर । वोळगे द्वार तयांचे ॥६६॥
    माझ्या भक्तांचे जें राहते घर असते, तेंच माझे स्वतःचे घर हें लक्षात ठेव, स्याच्या दाराशी अष्टौप्रहर मुक्ति हात जोडून उभी असते ६६.


    माझें भजन करितां । कोण्या अर्थाची नाहीं दुर्लभता ।
    चहूं पुरुषार्थांचे माथां । भक्ति सर्वथा मज पढियंती ॥६७॥
    माझें भजन करूं लागले असतां कोणत्याच गोष्टीची दुर्लभता राहात नाही. चारही पुरुषार्थांपेक्षां भक्ति ही मला फार आवडती आहे ६७.


    ज्ञान नित्यानित्यविवेक । भक्तीमाजीं माझें प्रेम अधिक ।
    तैसें प्रेमळाचे मजलागीं सुख । चढतें देख अहर्निशीं ॥६८॥
    ज्ञान, नित्यानित्यविवेक आणि भक्ति यांमध्ये माझें अत्यंत प्रेम असते. त्याचप्रमाणे प्रेमळ भक्तांचेही मला रात्रंदिवस अधिकाधिकच सुख वाटते ६८.


    जेवीं एकुलतें बाळक । जननीसी आवडे अधिक ।
    तैसें प्रेमळाचें कौतुक । चढतें सुख मजलागीं ॥६९॥
    ज्याप्रमाणे एकुलते एकच मूल असले म्हणजे तें आईला अधिक आवडते, त्याप्रमाणे प्रेमळ भक्तांचे कौतुक करणे ह्यांतच मला अत्यंत सुख वाटते ६९.


    यालागीं आपुलिये संवसाटीं । मी प्रेमळ घें उठाउठी ।
    वरी निजसुख दें सदेंठीं । न घे तैं शेवटीं सेवकू होयें ॥६७०॥
    ह्याकरितां प्रेमळ भक्त मी तत्काळ आपल्या आश्रयाखाली घेतों, आणखी वर त्याला आत्मसुख देतो. ते त्याने न घेतल्यास शेवटी मी त्याचा चाकर होतों ६७०.


    प्रेमाचिया परम प्रीतीं । जेणें मज अर्पिली चित्तवृत्ती ।
    तेव्हांचि त्याचे सेवेची सुती । जाण निश्चितीं म्यां घेतली ॥७१॥
    प्रेमाच्या अतिशय आवडीने ज्याने आपली चित्तवृत्ति मला अर्पण केली, त्याची सेवा करण्याचा निश्चित विचार मी खरोखर त्याच वेळी केला म्हणून समज ७१.


    प्रेमळाचें शेष खातां । मज लाज नाहीं घोडीं धुतां ।
    शेखीं उच्छिष्ट काढितां । लाज सर्वथा मज नाहीं ॥७२॥
    प्रेमळ भक्तांचे उच्छिष्ट खातांना किंवा त्यांची घोडी धुताना मला काही लाज वाटत नाही. फार काय सांगावें ? पण अखेरीस त्याच्या घरची उष्टी काढतांना सुद्धा मला मुळीच लजा वाटत नाहीं ७२.


    मज सप्रेमाची आस्था । त्याचे मोचे मी वाहें माथां ।
    ऐशी प्रेमळाची सांगतां कथा । प्रेम कृष्णनाथा चालिलें ॥७३॥
    प्रेमळ भक्तांची मला इतकी आवड आहे की, त्यांचे जोडे सुद्धा मी मस्तकावर घेतों. अशी प्रेमळांची गोष्ट सांगतां सांगतां श्रीकृष्णालाही प्रेमाचे भरतें आले ७३.


    कंठ जाला सद्‍गदित । अंग झालें रोमांचित ।
    धांवोनि उद्धवासी खेंव देत । प्रेम अद्‍भुत हरीचें ॥७४॥
    त्याचा कंठ सद्गदित झाला, अंगावर रोमांच उभे राहिले. त्याने धावून उद्धवास आलिंगन दिले. श्रीकृष्णाचे प्रेमच कांहीं अद्‌भुत होते ! ७४.


    सजल जाहले लोचन । वरुषताती स्वानंदजीवन ।
    भक्तिसाम्राज्यपट्टाभिषिंचन । उद्धवासी जाण हरि करी ॥७५॥
    डोळे अश्रृंनी भरून आले आणि ते स्वानंदजीवनाचा वर्षाव करूं लागले. जणू काय श्रीकृष्ण त्या अश्रृंनी उद्धवाला भक्तीच्या साम्राज्याचा पट्टाभिषेकच करीत होता ७५.


    सहजें प्रेमळाची करितां गोठी । संमुख उद्धव देखिला दृष्टीं ।
    धांवोनियां घातली मिठी । आवडी मोठी भक्तांची ॥७६॥
    ओघानुसार प्रेमळ भक्ताची गोष्ट सांगतां सांगतां डोळ्यांसमोर उद्धव पाहिला, तेव्हां श्रीकृष्णाने एकदम धावून जाऊन त्याला मिठी घातली; श्रीकृष्णाला भक्तांची आवड फारच मोठी होती ७६.


    आवडीं पडिलें आलिंगन । विसरला कार्यकारण ।
    विसरला स्वधामगमन । मीतूंपण नाठवे ॥७७॥
    आवडीने आलिंगन दिले तेव्हां श्रीकृष्ण कार्यकारणसुद्धा विसरला, निजधामाला जाण्याचे विस्मरण झाले. आणि मीतूंपणाही आठवला नाहीं ७७.


    नाठवे देवभक्तपण । नाठवे कथानिरूपण ।
    नाठवे उद्धवा उद्धवपण । कृष्णा कृष्णपण नाठवे ॥७८॥
    आपण देव व उद्धव हा भक्त आहे अशी भेदभावाची आठवणच नाहींशी झाली. कथानिरूपण करावयाचीही आठवण राहिली नाही. उद्धवाला उद्धवपण आठवेनासे झाले आणि कृष्णाला कृष्णपणही आठवलें नाही अशी स्थिति झाली ७८.


    प्रेमळाचे गोठीसाठीं । परात्पर परतटीं ।
    दोघां ऐक्यें पडली मिठी । आवडी मोठी प्रेमाची ॥७९॥
    प्रेमळाची गोष्ट सांगतांना परात्पराच्या पलीकडे दोघांची ऐक्यामुळे मिठी पडली. प्रेमाची आवड फार मोठी आहे ! ७९.


    आजि भक्तीचें निजसुख । उद्धवासी फावलें देख ।
    भक्तीचें प्रेम अलोलिक । उद्धवें सम्यक विस्तारिलें ॥६८०॥
    भक्तीचें खरें खरे सुख काय तें उद्धवाला आज प्राप्त झाले. भक्तीचे जें अलौकिक प्रेम म्हणून असते, तेच उद्धवाने या वेळी व्यक्त करून दाखविले ६८०.


    श्रीकृष्ण निजधामासी जातां । उद्धव जरी हें न पुसता ।
    तरी ज्ञानवैराग्यभक्तिकथा । कां सांगता श्रीकृष्ण ॥८१॥
    श्रीकृष्ण निजधामाला जातांना उद्धवाने जर हे विचारले नसते, तर श्रीकृष्णांनी ज्ञान, वैराग्य व भक्ति यांची कथा कशाला सांगितली असती ? ८१.


    विशेष भक्तिप्रेम अचुंबित । उद्धवें काढिलें निश्चित ।
    उद्धवप्रश्नें श्रीभागवत । झालें सनाथ तिहीं लोकीं ॥८२॥
    उद्धवाने खरोखर भक्तिप्रेम विशेष असतें हें सहज उघड केले. उद्धवाच्या त्या प्रश्नानेच श्रीमद्‌भागवत त्रिभुवनांत पूज्य होऊन राहिले आहे ८२.


    यालागीं तनुमनप्राणें । उद्धवू जीवें ओंवाळणें ।
    याहून अधिक वानणें । तें बोलणें न साहे ॥८३॥
    म्हणून खरोखर तनु, मन व प्राण यांनी उद्धवाला मोख्या जिव्हाळ्याने ओंवाळणी करावी. ह्याहून त्याची स्तुति करावयाला बोलणेच समर्थ नाहीं ८३.


    जे बोला बुद्धी न ये सहज । तें भक्तिप्रेम निजगुज ।
    उद्धवा द्यावया गरुडध्वज । केलें व्याज खेंवाचें ॥८४॥
    जे शब्दालाही सहज सांगता येण्यासारखे नाही, बुद्धीलाही जे आकलन होण्यासारखे नाही, ते भक्तीच्या प्रेमांतील आत्मगुह्य उद्धवाला देण्याकरितां श्रीकृष्णांनी आलिंगनाचे केवळ निमित्त केले ८४.


    भक्तीचें शोधित प्रेम । उद्धवासी अतिउत्तम ।
    देता झाला पुरुषोत्तम । मेघश्याम तुष्टला ॥८५॥
    तो पुरुषोत्तम भक्तीचे शुद्ध व अतिउत्तम प्रेम उद्धवाला देता झाला, व त्यामुळे तो मेघश्याम श्रीकृष्ण आनंदित झाला ८५.


    प्रेमळाची गोठी सांगतां । विसरलों मी श्लोकार्था ।
    कृष्णासी आवडली प्रेमकथा । ते आवरितां नावरे ॥८६॥
    प्रेमळांची गोष्ट सांगता सांगतां, महाराज ! श्लोकाच्या अर्थाचाही मला विसर पडला. कृष्णालाही प्रेमाची कथा आवडली, म्हणून ती आवरतां आवरेना ८६.


    प्रेमाची तंव जाती ऐशी । आठवू येऊं नेदी आठवणेशीं ।
    हा भावो जाणवे सज्जनांसी । ते भक्तिप्रेमासी जाणते ॥८७॥
    प्रेमाचा स्वभाव असाच आहे की, तो आठवणीची आठवण होऊ देत नाही. ही गोष्ट सज्जनांना माहीतच आहे. कारण ते भक्तिप्रेमाला जाणतात ८७.


    हो कां ऐसेंही असतां । माझा अपराधू जी सर्वथा ।
    चुकोनि फांकलों श्लोकार्था । क्षमा श्रोतां करावी ॥८८॥
    पण असे असले तरीही माझा सर्वतोपरी अपराध हा आहेच. कारण श्लोकाच्या अर्थाला चुकून भलतीकडेच वहावत गेलों. याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी ८८.


    तंव श्रोते म्हणती राहें । जेथें निरूपणीं सुख आहे ।
    त्यावरी बोलणें हें न साहे । ऐसें रहस्य आहे अतिगोड ॥८९॥
    तेव्हां श्रोते म्हणाले की, "थांब. ज्या निरूपणामध्ये आनंद होतो, त्याविषयी असें बोलणे सहन होत नाही. इतकें तें रहस्य अत्यंत गोड आहे ८९.


    आधींच भागवत उत्तम । तेथें हें वाखाणिले भक्तिप्रेम ।
    तेणें उल्हासलें परब्रह्म । आमुचे मनोधर्म निवाले ॥६९०॥
    भागवत हेच आधी उत्तम, त्यांत आणखी भक्तिप्रेम वर्णन केलेले, त्यामुळे परब्रह्मच जणू काय प्रगट झाले व आमचे मनोरथ तृप्त झाले ६९०.


    श्लोकसंगतीची भंगी । दूर ठेली कथेची मागी ।
    हे प्रार्थना न लगे आम्हांलागीं । आम्ही हरिरंगीं रंगलों ॥९१॥
    श्लोकांचा संबंध सुटला व कथेचा भाग दूर राहिला. अशी आमची प्रार्थना करावयाला नको. कारण आम्ही श्रीकृष्णगुणानुवादांत तन्मय होऊन गेलो आहोत ९१.


    ऐकतां भक्तिप्रेमाचा जिव्हाळा । श्रवणसुखाचा पूरू आला ।
    झाडा न सूची उगला । निरूपण वहिला चालवीं ॥९२॥
    हें तुझे भक्तिप्रेमाच्या जिव्हाळ्याचे निरूपण ऐकत असतां श्रवणसुखाचा पूर आला आहे, तो ओसरेल असे वाटत नाही. तेव्हां मुकाट्याने आधीं निरूपण पुढे चालू कर" ९२.


    सांगतां प्रेमळांची गोठी । कृष्ण‍उद्धवां एक गांठी ।
    प्रेमें पडली होती मिठी । ते कृष्ण जगजेठी सोडवी ॥९३॥
    प्रेमळ भक्तांची कथा सांगतांना कृष्ण आणि उद्धव यांची एकरूपता होऊन प्रेमाने परस्परांची मिठी पडली होती, ती जगजेठी श्रीकृष्णाने सोडविली ९३.


    म्हणे हें अनुचित सर्वथा । आतांचि उद्धवू ऐक्या येता ।
    तरी कथेचा निजभोक्ता । ऐसा श्रोता कैंचा मग ॥९४॥
    आणि मनांत म्हणाले, हे अगदी अयोग्य आहे. कारण उद्धव जर आतांच ऐक्यरूपाला पोचला असता, तर मग माझ्या कथेचा भोक्ता ह्याच्यासारखा दुसरा कोण ? ९४.


    माझिया भक्तिज्ञानविस्तारा । उद्धवूचि निजांचा सोयरा ।
    यालागीं ब्रह्मशापाबाहिरा । काढितू खरा निजबोधें ॥९५॥
    माझ्या भक्तिज्ञानाचा विस्तार करावयाला माझ्या भक्तांचा सखा असा एक उद्धवच आहे, म्हणूनच खरा आत्मज्ञानाचा बोध करून त्याला ब्रह्मशापापासून विभक्त काढले ९५.


    जितुकी गुह्यज्ञानगोडी । भक्तिप्रेमाची आवडी ।
    ते उद्धवाचिकडे रोकडी । दिसते गाढी कृष्णाची ॥९६॥
    गुह्यज्ञानाची जितकी म्हणून सर्व गोडी, आणि भक्तिप्रेमाची आवड, तितकी श्रीकृष्णाची दृढ गोडी व आवड खरोखर उद्धवाकडेच होती ९६.


    भक्तिप्रेमाचा कृष्णचि भोक्ता । कृष्णकृपा कळलीसे भक्तां ।
    हे अनिर्वचनीय कथा । न ये बोलतां बोलासी ॥९७॥
    भक्तिप्रेमाचा भोक्ता एक श्रीकृष्णच आणि कृष्णाची कृपा भक्तांनाच कळलेली असते. ही गोष्ट केवळ अनिर्वचनीय आहे. ती शब्दांनी सांगता येत नाहीं ९७.


    कृष्ण उद्धवासी म्हणे आतां । सावधू होईं गा सर्वथा ।
    पुढारीं परियेसीं कथा । जे भक्तिपथा उपयोगी ॥९८॥
    कृष्ण उद्धवाला म्हणाले की, है ! आतां अगदीं सावध हो, आणि भक्तिमालाला उपयोगी अशी पुढची कथा ऐक ९८.


    सर्व कर्में मदर्पण । फळत्यागें न करवे जाण ।
    तरी अतिसोपें निरूपण । प्रेमलक्षण सांगेन ॥९९॥
    फलाचा त्याग करून सर्व कर्म मला अर्पण करवत नसेल तर, प्रेमलक्षणाचें अतिशय सोपें असें निरूपण सांगतो ते लक्षात घे ९९.


    श्रद्धालुर्मे कथाः श्रृण्वन् सुभद्रा लोकपावनीः ।
    गायन्ननुस्मरन् कर्म जन्म चाभिनयन् मुहुः ॥ २३ ॥
    [श्लोक २३] माणसाने श्रद्धापूर्वक लोकांना पवित्र करणार्‍या माझ्या कल्याणकारी कथा श्रवण कराव्यात, त्यांचे गायन करावे, वारंवार स्मरण करावे, तसेच माझ्या अवतारांचा व लीलांचा अभिनय करावा. (२३)




    करितां माझी कथा श्रवण । काळासी रिगमू नाहीं जाण ।
    इतरांचा पाडू कोण । कर्मबंधन तेथें कैंचें ॥७००॥
    माझी कथा श्रवण करूं लागले असता तेथे काळाचा सुद्धा शिरकाव व्हावयाचा नाही. मग इतरांची कथा काय ? आणि कर्मबंधन तरी तेथे कशाचें ? ७००.

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १ ते १००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १0१ ते २००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या २०१ ते ३००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ३०१ ते ४००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ४०१ ते ५००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ५०१ ते ६००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ६०१ ते ७००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ७०१ ते ८००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ८०१ ते ९००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ९०१ ते १०००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १००१ ते ११००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ११०१ ते १२००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १२०१ ते १३००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १३०१ ते १४००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १४०१ ते १५००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १५०१ ते १५८१

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...