मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १ ते १००

    श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

    ॥श्रीः॥ ॥ॐ तत्सत्-श्रीकृष्ण प्रसन्न ॥


    ॐ नमो सद्‍गुरु सच्चिद्‍घन । वर्षताहे स्वानंदजीवन ।
    मुमुक्षुमयूरकूळें जाण । हरिखें उड्डाण करिताति ॥१॥
    हे ओंकाररूप श्रीगुरो ! तुला नमस्कार असो. तूं सत् आणि चित् ह्यांचा मेघ आहेस. स्वानंदजीवनाची तूं वृष्टि करतोस. तेणेंकरून मुमुक्षुरूपी मयुरांना आनंद होऊन ते मोठ्या हर्षाने नाचूं उडू लागतात १.


    तो सजल देखोनि मेहो । 'सोहंभावें' फोडिती टाहो ।
    रोमांचपिसीं पसरूनि पहा हो । सत्त्वें लवलाहो नृत्याचा ॥२॥
    तो भरून आलेला मेघ पाहून ते 'सोऽहं' म्ह० 'मी ब्रह्म आहे' ह्या भावनेचा टाहो फोडतात. आणि रोमांचरूपी पिसारा उभारून, सत्त्वाचा मोठ्या झपाट्याने नाच करूं लागतात २.


    नाचती स्वानंदाचेनि मेळें । तेणें सर्वांगीं निघाले डोळे ।
    पिसें देखणीं जाहलीं सकळें । तें शिरीं गोपाळें वाहिलीं ॥३॥
    ते स्वानंदाच्या भराने नाचत असल्यामुळे त्यांच्या साऱ्या अंगालाच डोळे फुटून ती सारी पिच्छेच देखणी होऊन जातात; म्हणूनच ती पिसें श्रीकृष्ण आपल्या मस्तकावर धारण करतो ३.


    तो मेघ देखोनि संमुख । आर्त चातक पसरिती मुख ।
    बिंदुमात्रें पावले सुख । नित्य निर्दोख ते जाहले ॥४॥
    तो मेघ समोर पाहून आत (भक्त सुमुक्षु) रूपी चातक तोंडे पसरतात. तेव्हां तोंडांत एक बिंदु पडला की पुरे, ते सुखी आणि नित्य निर्दोष होऊन राहतात ४.


    आर्ततृषा तत्काळ वोळे । निवाले तेणें स्वानंदजळें ।
    मग हरिखाचेनि कल्लोळें । सुखसोहळे भोगिती ॥५॥
    आर्ताची तृषा तत्काळ नाहीशी होते. ते स्वानंदजलानें तृप्त होऊन हर्षकल्लोळाचे सुखसोहळे भोगतात ५.


    सुभूमि देखोनि निर्मळ । जाणोनि वर्षती काळवेळ ।
    वर्षों लागले जी प्रबळ । जळकल्लोळ अनिवार ॥६॥
    उत्तम आणि निर्मळ भूमी पाहून व काळवेळ लक्षात आणून ते मेघ वृष्टि करतात. त्यांची ती सारखी व जोराची वृष्टि सुरू झाली म्हणजे पाण्याच्या अनिवार लाटा उसळतात ६.


    तेणें वोळलेनि कृपाभरें । शिष्यसरितेसी पूरु भरे ।
    विकल्पवोसणें एकसुरें । महापूरें वाहविलीं ॥७॥
    त्या कृपेचा वर्षाव सुरू झाला म्हणजे शिष्यरूप नदीला पूर येतो. आणि विकल्परूप केरकचरा तो महापूर सरसकट वाहून नेतो ७.


    तेणें प्रवाहनिर्मळजळें । चिदैक्यसागरीं सरिता मिळे ।
    मग समरसोनि तेणें जळें । राहे निश्चळें निजरूपें ॥८॥
    नंतर ती निर्मळ प्रवाहाच्या जलाची नदी चिदैक्यसागराला जाऊन मिळते. आणि त्याच्याशी समरस होऊन आत्मस्वरूपामध्ये स्थिर होते ८.


    वैराग्यराबें शुद्ध केली । पृथ्वी निजवोला वोळली ।
    कठिणत्वेंवीण मार्दवा आली । नाही अंकुरली बहुबीजें ॥९॥
    नंतर वैराग्याच्या राबाने शुद्ध केलेली जमीन आपल्या अंगच्या ओलाव्याने आपोआपच भिजते व कठिणत्वाला टाकून मृदु होते. पण तींत बी उगवून रान माजलेले नसते ९.


    अखंड वर्षतां जळमेळीं । वासनेचीं ढेपें विरालीं ।
    सद्‍भावाची वोल जाहली । वाफ लागली बोधाची ॥१०॥
    अशा त्या भूमीवर पाण्याचा सतत वर्षाव होऊ लागला म्हणजे वासनेची डिखळें विरून जातात. आणि सद्‌भावाची ओल चढून ज्ञानाची वाफ निर्धू लागते १०.


    तेथें न पेरतांचि जाण । सहज निजबीजें परिपूर्ण ।
    अंकुरली आपणिया आपण । सिद्ध संपूर्ण स्वभावें ॥११॥
    तेव्हां तेथें आत्मबीज न परतांच आपोआप परिपूर्ण अंकुर फुटून शेत स्वभावत:च जोमाने पिकते. त्यांतील दाणा जात्याच भरीव असतो ११.


    ते परम कृपेचिये पुष्टीं । स्वानंदें पिकली समदृष्टी ।
    परमानंदें कोंदली सृष्टी । ऐक्यें संवसाटी जीवशिवां ॥१२॥
    परमकृपेच्या पोषणाने समदृष्टीची कणसें पिकतात. परमानंदाने सृष्टि भरून जाते. आणि ऐक्याने जिवाशिवाची देवघेव होते (दोघे एकरूप होतात) १२.


    फिटला दुःखदुष्काळु । पाहला सुखाचा सुकाळु ।
    वोळळा सद्‍गुरु कृपाळु । आनंदकल्लोळु सच्छिष्यां ॥१३॥
    दुःखरूप दुष्काळ नाहीसा होऊन सुखाचा सुकाळ उदयास येतो. कृपाघन सद्गुरु कृपेचा वर्षाव करूं लागला म्हणजे सच्छिष्यांमध्ये आनंदाचा कलोळ उत्पन्न होतो १३.


    वर्षतां निजपर्जन्यधारा । वर्षला नाना अवतार-गारा ।
    कार्यानुरूपें तदाकारा । विरोनि निराकारा त्या होती ॥१४॥
    आत्मज्ञानरूप पर्जन्याच्या धारांचा वर्षाव होऊ लागला, की त्याबरोबर अनेक अवताररूपी गारांचीही वृष्टि होते. त्या गारा कार्यानुरूप त्या त्या आकाराच्या होऊन शेवटी विरून निराकाराला पोंचतात १४.


    त्या पर्जन्याचा वोसडा । दैवें लागल्या जडामूढां ।
    तो सरता होय संतांपुढां । अवचटें शिंतोडा जैं लागे ॥१५॥
    त्या पर्जन्याचे तुषार दैवयोगाने जडमूढाला लागले, व त्यांचा शिंतोडा जरी अकस्मात् त्यांच्या तोंडांत पडला, तरी तो संतांच्या सभेत मान्य होऊन बसतो १५.


    तो महामेघ श्रीहरी । सद्‍गुरुकृपा वोळे जयावरी ।
    तोचि धन्य चराचरीं । पूज्य सुरनरीं तो कीजे ॥१६॥
    श्रीहरिस्पी सद्गुरुमहामेघाची कृपा ज्यावर वळेल, तोच चराचरामध्ये धन्य होऊन देवांत व मानवांतही पूज्य होतो १६.


    गुरुनामें अति घनवटु । शिष्य तारूनि अति हळुवटु ।
    ज्याचा आदि-मध्य-शेवटु । न कळे स्पष्टु वेदांसी ॥१७॥
    'गुरु' शब्दाचा अर्थ अत्यंत जड (वजनशीर) होय. पण (भवसागरांत) तो स्वतः तरून शिष्यालाही तारतो इतका तो हलका आहे. त्याचा आदि, मध्य आणि अंत वेदांना सुद्धा स्पष्ट कळत नाही १७.


    तो सद्‍गुरु श्रीजनार्दनु । वोळलासे आनंदघनु ।
    तेणें एका एकु केला पावनु । सांडवोनु एकपण ॥१८॥
    तो आनंदघन सद्गुरु श्रीजनार्दन मला वळला, आणि त्याने एकपणा नाहीसा करून या एका एकाला [एकनाथाला] पावन करून मोबळे १८.


    एक तेंचि अनेक । अनेक तेंचि एक ।
    हेंही केलें निष्टंक । स्वबोधें देख बोधोनि ॥१९॥
    आणखी पहा ! आत्मज्ञानाचा बोध करून एक तेंच अनेक व अनेक तेंच एक हेही निश्चित करून दिले १९.


    बोधोनियां निज‍ऐक्यता । ऐक्यें लाविलें भक्तिपंथा ।
    मज प्रवर्तविलें श्रीभागवता । निज कथा गावया ॥२०॥
    निजामक्याचे ज्ञान करून देऊन त्या ऐक्यानेच भक्ति मार्गाला लावून दिलें, आणि आपलीच कथा वर्णन करण्याकरिता मला श्रीभागवत सांगण्याला पुढे केलें २०.


    तेचि श्रीभागवतींची कथा । दशमाध्यावो संपतां ।
    ते बद्धमुक्तांची व्यवस्था । उद्धवें कृष्णनाथा पूशिली ॥२१॥
    त्या भागवतांतील कथा हीच की, दहाच्या अध्यायाच्या शेवटी उद्धवाने श्रीकृष्णाला बद्धांची आणि मुक्तांची व्यवस्था विचारली २१.


    सखोल उद्धवाचा प्रश्न । ऐकोनियां श्रीकृष्ण ।
    निजहृदयींचें गुह्यज्ञान । उद्धवासी जाण सांगेल ॥२२॥
    उद्ध्वाचा प्रश्न फार गहन. तो श्रीकृष्णांनी ऐकल्यावरून ते आता आपल्या अंतःकरणांतील गुह्य ज्ञान उद्धवाला सांगणार आहेत २२.


    येणें प्रश्नोत्तरश्रवणें । उठे जन्ममरणांचे धरणें ।
    संसाराचें खत फाडणें । फिटलें लाहणें विषयांचें ॥२३॥
    ती प्रश्नोत्तरे श्रवण केली असता जन्ममरणाचे धरणें उठेल, संसाराचे खत फाडले जाईल व विषयांचे घेणेदेणेही चुकेल २३.


    मोक्षमार्गींचे कापडी । साधनीं शिणती बापुडीं ।
    तिहीं शीघ्र यावें तांतडी । जिणावया वोढी बंधमोक्षांच्या ॥२४॥
    मोक्षमार्गातील यात्रेकरू जे विचारे अनेक साधने करून बेजार झाले असतील, त्यांनीही बंधमोक्षाच्या ओढी जिंकण्याकरितां झटपट इकडे येण्याची त्वरा करावी २५.


    जे कष्टती जपतपसाधनें । शिणती ध्येय-ध्यान-अनुष्ठानें ।
    ते ते शीघ्र या विंदानें । ज्ञानाज्ञानें जिणावया ॥२५॥
    आणखीही जे जे कोणी जपतपादि साधने करून किंवा ध्येयध्यानादि अनुष्ठाने करून हैराण झाले असतील, त्यांनी त्यांनीही लौकर येऊन या साधनाने ज्ञानाज्ञाने जिंकून टाकावीत २५.


    ऐशी कथा आहे गहन । श्रोतीं व्हावें सावधान ।
    एका विनवी जनार्दन । स्वानंदघन तुष्टला ॥२६॥
    अशी ही कथा मोठी गहन आहे. याकरितां श्रोत्यांनी सावध व्हावें. एकनाथ विनति करतो की, आज स्वानंदधन असा जो जनार्दन तो प्रसन्न झाला आहे २६.


    अकरावे अध्यायीं जाण । इतुकें सांगेल श्रीकृष्ण ।
    बद्धमुक्तांचें वैलक्षण्य । आणिक लक्षण साधूचें ॥२७॥
    या अकराव्या अध्यायामध्ये बद्ध आणि मुक्त ह्यांतील भेद आणि साधूचे लक्षण इतकें श्रीकृष्ण सांगेल २७.


    तेणेंच प्रसंगें जाण । सांगेल भक्तीचें लक्षण ।
    अकराही पूजेसी अधिष्ठान । इतुकें निरूपण हरि बोले ॥२८॥
    त्यांतच प्रसंगानुसार भक्तीचे लक्षण व अकराही पूजेची अधिष्ठाने सांगण्यात येतील. इतकें निरूपण श्रीहरि आता करणार आहेत २८.


    श्रीभगवानुवाच
    बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मे न वस्तुतः ।
    गुणस्य मायामूलत्वात् न मे मोक्षो न बन्धनम् ॥ १ ॥
    भगवान श्रीकृष्ण म्हणाले - आत्म्याला बद्ध किंवा मुक्त म्हणणेसुद्धा माझ्या अधीन असणार्‍या गुणांच्या उपाधीमुळे आहे हे खरे नव्हे गुण मायेमुळे आहेत आणि आत्मस्वरूपाला मोक्ष नाही की बंधन नाही. (१)




    उद्धवा बद्ध-मुक्त-अवस्था । जरी सत्य म्हणसी वस्तुतां ।
    तरी न घडे गा सर्वथा । ऐक आतां सांगेन ॥२९॥
    उद्धवा ! बद्ध आणि मुक्त ह्या अवस्था तूं खऱ्या आहेत असें म्हणशील तर त्या मुळीच खऱ्या नाहीत त्या कशा ? ते आता सांगतों ऐक २९.


    बद्ध-मुक्त-अवस्था । माझे स्वरूपीं नाहीं तत्त्वतां ।
    हे गुणकार्याची वार्ता । संबंधु तत्त्वतां मज नाहीं ॥३०॥
    खरे म्हणशील तर माझ्या स्वरूपामध्ये बद आणि मुक्त ह्या अवस्थाच मुळी नाहीत. तो सारा गुणांच्या कार्याचा परिणाम आहे. त्यांचा संबंध खरोखर माझ्याकडे काहीच नाही ३०.


    माझ्या निजस्वरूपाच्या ठायीं । बद्धमुक्तता दोनी नाहीं ।
    बद्धता मुक्तता गुणांच्या ठायीं । आभासे पाहीं गुणकार्यें ॥३१॥
    माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बद्धपणाही नाही, आणि मुक्तपणाही नाही. हे पहा ! गुणांच्या कार्यानींच गुणांमध्ये बद्धतेचा आणि मुक्ततेचा भास होतो ३१.


    गुण ते समूळ मायिक । मी गुणातीत अमायिक ।
    सत्यासी जैं बाधे लटिक । तैं मृगजळीं लोक बुडाले ॥३२॥
    गुण ते समूळ मायिक आहेत. मी मायेपासून वेगळा असून गुणातीत आहे. सत्याला जर असत्य बाध आणील, तर सारे लोक मृगजळांतही बुडतील ! ३२.


    चित्रींचेनि हुताशनें । जैं जाळिजती पुरें पट्टणें ।
    कां स्वप्नींचेनि महाधनें । वेव्हारा होणें जागृतीं ॥३३॥
    चित्रांतील वणव्याने जेव्हां गांवचे गांव जळून फस्त होतील, किंवा स्वमांतील द्रव्याच्या ढिगाने जेव्हां देवघेव चालेल ३३;


    सूर्यासी प्रतिबिंब गिळी । छाया पुरुषातें आकळी ।
    समुद्र बुडे मृगजळीं । तैं मज गुणमेळीं बद्धता ॥३४॥
    किंवा सूर्याला जेव्हां प्रतिबिंब गिळून टाकील, पुरुषाला छाया बांधून घालील, समुद्र हा मृगजळांत बुडून जाईल, तेव्हांच गुणांच्या त्रिकुटीने मी बांधला जाईन ३४.


    जैं जिभेसी केंसु निघे । जैं तळहातीं वृक्ष लागे ।
    डोळ्यांमाजीं पर्वत रिगे । तैं मी गुणसंगें अतिबद्धु ॥३५॥
    जिभेला जर केस फुटतील, तळहातावर जर झाडे उगवतील, डोळ्यांत जर पर्वत शिरेल, तरच मी गुणांच्या संगतीने जखडला जाईन ३५.


    आकाश खोंचे सांबळीं । काजळ लागे वारया निडळीं ।
    कां विजूचे कपाळीं । बाशिंग सबळी बांधावें ॥३६॥
    आकाश जर सांबळींत अडकून राहील किंवा वाऱ्याच्या कपाळावर जर काजळ चढेल, किंवा विजेच्या मस्तकावर जर लोक बाशिंग बांधतील ३६,


    गगन तुटोनि समुद्रीं बुडे । सपर्वत धरा वारेनि उडे ।
    सूर्य अडखळोनि अंधारीं पडे । तरी मी सांपडे गुणांत ॥३७॥
    किंवा आकाश तुटून समुद्रात पडेल; पर्वतांसहवर्तमान सारी पृथ्वी वाऱ्याने उडून जाईल; सूर्य अंधारामध्ये अडखळून पडेल; तरच मी गुणामध्ये सांपडेन ३७.


    अंतरिक्षगगनीं सरोवर । त्यामाजीं कमळें मनोहर ।
    तो आमोद सेविती भ्रमर । ऐसें साचार जैं घडे ॥३८॥
    केवळ अधांतरी आकाशांत सरोवर असावे, त्यांत अनेक प्रकारची मनोहर कमळे उगवावी व त्यांतील मकरंद भ्रमरांनी सेवन करावा, असे जेव्हां खरोखरच घडेल ३८,


    तैं मी आत्मा गुणसंगे । नाना विषयभोग संभोगें ।
    मग त्या विषयांचेनि पांगे । होईन अंगें गुणबद्धु ॥३९॥
    तेव्हांच मी आत्मा गुणांच्या संगतीने नानाप्रकारचे विषयभोग भोगून मग त्या विषयांच्या लालचीने स्वतः गुणांनी बांधला जाईन ३९.


    त्रिगुण-अंगीकारें वर्ततां । गुणकार्य-तदात्मता ।
    तेणें बद्ध-मुक्त-अवस्था । भासे वृथा भ्रांतासी ॥४०॥
    तीन गुणांच्या अधीन होऊन वागू लागले म्हणजे गुणकार्याशी तादात्म्य होते. आणि त्यामुळे भ्रमिष्टाला बद्ध व मुक्त ह्या अवस्थांचा व्यर्थ भास मात्र होतो ४०.


    गुणा आत्म्यासी भिन्नता । म्हणसी मानली तत्त्वतां ।
    परी गुणसंगें आत्मा असतां । अवश्य विकारिता येईल ॥४१॥
    आतां तूं म्हणशील की, गुण आणि आत्मा हे भिन्नभिन्न आहेत हे जरी खरे मानले, तरी गुणांच्या संगतीत आत्मा असला म्हणजे तो अवश्य विकारी होईल ४१.


    अग्निसंगें पात्र तप्त । पात्रतापें जळ संतप्त ।
    जळतापें धान्यपाकु होत । तेवीं विकारवंत नव्हे आत्मा ॥४२॥
    पण बाबा ! अप्रीच्या संगतीने भांडे तापते; भांड्याच्या संगतीने पाणी तापते; पाणी तापले म्हणजे धान्य शिजतें; त्याप्रमाणे आत्मा काही विकार पावणारा नव्हे बरें ! ४२


    अग्नितापाआंत । आकाश नव्हे संतप्त ।
    तेवीं गुणसंगा आंत । विकारवंत नव्हे आत्मा ॥४३॥
    अग्नीच्या तापाने आकाश कांही तापत नाही, त्याप्रमाणे आत्मा हा गुणांच्या संगतींत असला तरी विकार पावत नाही ४३.


    नट अंधत्वें अवगला । परी तो आंधळा नाहीं जाहला ।
    तैसा आत्मा गुणसंगें क्रीडला । तरी असे संचला निर्गुणत्वें ॥४४॥
    नट आंधळा झालेला दिसला, तरी तो कांहीं आंधळा झालेला नसतो, त्याप्रमाणे आत्मा हा गुणांच्या संगतीने वावरत असलेला दिसला तरी तो निर्गुणपणानेच स्थित असतो ४४.


    नटु अंधत्वें नव्हे अंधु । आत्मा गुणसंगें नव्हे बद्धु ।
    गुण मायिक आत्मा शुद्धु । या त्या संबंधु असेना ॥४५॥
    सोंगाड्या आंधळेपणाच्या कृतीने काही खरोखर आंधळा होत नाहीं; त्याप्रमाणे आत्माही गुणांच्या संगतीने बद्ध होत नाही. कारण गुण हे मायिक आहेत, आणि आत्मा हा शुद्ध आहे. त्यांचा आणि ह्याचा अर्थाअर्थी कांहींच संबंध नाही ४५.


    आत्मा व्यापक गुण परिच्छिन्न । याही हेतु न घडे बंधन ।
    सकळ समुद्राचे प्राशन । केवीं रांजण करूं शके ॥४६॥
    आत्मा हा व्यापक आहे ; आणि गुण हे एकदेशीय आहेत. ह्या दृष्टीने पाहिले तरी सुद्धा त्याला बंधन शक्य नाही. कारण, रांजण समुद्राचा घोंट कसा घेऊ शकणार ? ४६.


    मोहरीमाजीं मेरु राहे । पशामाजीं पृथ्वी समाये ।
    मुंगी गज गिळोनि जाये । खद्योत खाये सूर्यातें ॥४७॥
    मोहरीमध्ये जर मेरु पर्वत राहील; पशामध्ये जर पृथ्वीचा समावेश होईल ; मुंगी जर हत्तीला गिळून टाकील; काजवा जर सूर्याचा घास करील ४७;


    मशकु ब्रह्मांडातें आकळी । पतंगु प्रळयानळ गिळी ।
    तरी आत्मा गुणाचे मेळीं । गुणकल्लोळीं बांधवे ॥४८॥
    माशी जर ब्रह्मांड बगलेत मारील ; पतंग जर प्रलयानलाचा स्वाहा करील; तर आत्म्याला, गुणांना एकत्र होऊन गुणांच्या पाशांत बांधता येईल ४८.


    यापरी न संभवे बद्धता । बद्धतेसवें गेली मुक्तता ।
    बद्धमुक्त‍अवस्थांपरता । जाण तत्त्वतां आत्मा मी ॥४९॥
    ह्याप्रमाणे बद्धता प्राप्त होणे हेच मुळी असंभवनीय आहे. बद्धता गेली की तिच्या बरोबर मुक्तताही गेलीच. म्हणून मी आत्मा म्हणून जो आहे, तो खरोखर बद्ध मुक्त अवस्थांच्याही पलीकडचा आहे ४९.


    स्वप्नींचा अत्यंत सुकृती । अथवा महापापी दुष्कृती ।
    दोन्ही मिथ्या जेवीं जागृतीं । तेवीं बद्धमुक्ती आत्मत्वीं ॥५०॥
    स्वप्नांतला मोठा पुण्यवान् किंवा महापातकी दुष्ट, हे दोन्ही जागृत झाल्यावर ज्याप्रमाणे मिथ्या; त्याप्रमाणे आत्म्यामध्येही बद्धपणा आणि मुक्तपणा हे दोन्ही मिथ्या होत ५०.


    हो कां जीवात्म्यासीची बद्धता । सत्य नाहीं गा तत्त्वतां ।
    मा मज परमात्म्यासी अवस्था । बद्धमुक्तता ते कैंची ॥५१॥
    म्हणून जीवात्म्याला बद्धता आहे म्हणतात तें खरे नव्हे. मग मला परमात्म्याला बद्धमुक्त-अवस्था कशाची ? ५१.


    बिंबीं प्रतिबिंब नाहीं । मध्यें आरिशाचे ठायीं ।
    मळ बैसले ते पाहीं । प्रतिबिंबाचे देहीं लागले दिसती ॥५२॥
    बिंबांत किंवा प्रतिबिंबांत मळ नाहीं; तो आरशाच्या काचेत असल्यामुळे प्रतिबिंबाच्या देहावरच मळ लागला आहे असं वाटते ५२.


    तो मळु जैं पडे फेडावा । तैं आरिसाची साहणें तोडावा ।
    परी प्रतिबिंब त्या साहणे धरावा । हें सद्‍भावा मिळेना ॥५३॥
    तो मळ जर काढावयाचा असेल, तर तो आरसाच चरकावर धरून घांसला पाहिजे. ते सोडून, प्रतिबिंबच सहाणेवर घांसावें हें सयुक्तिक नव्हे ५३.


    तेवीं जीवीं शिवीं दोष नाहीं । दोष अंतःकरणाच्या ठायीं ।
    तें चित्त शुद्ध केल्या पाहीं । बंधमोक्षां दोंही बोळवण ॥५४॥
    त्याप्रमाणे जीवामध्ये आणि शिवामध्ये दोष नसतो, तो अंत:करणामध्ये असतो. ते चित्तच शुद्ध केले म्हणजे बंधाची आणि मोक्षाची दोघांचीही बोळवण झाली ५४.


    तैसें आविद्यक हें सकळ । गुणकार्य नानामळ ।
    जीवा अंगीं प्रबळ । मूढमती स्थूल स्थापिती ॥५५॥
    त्याप्रमाणे गुणांच्या कार्यापासून उद्‌भवणारे जे नानाप्रकारचे दोष आहेत ते सारे अविद्यात्मक आहेत. ते मूर्ख लोक स्थूल बुद्धीने जीवाच्याच अंगाला लावतात ५५.


    जैं सत्त्वें गुण निरसे सबळ । तैं आविद्यक फिटती मळ ।
    तेचि सद्विद्या होय निर्मळ । जीवचि केवळ शिव होये ॥५६॥
    प्रबळ झालेले गुण जेव्हां सत्त्वबुद्धीने झडून जातात, तेव्हांच अविद्येपासून लागलेले दोष नाहीसे होतात. आणि अविद्याच निर्मळ सद्विद्या होते; व जीवच शिव होऊन राहतो ५६.


    तेव्हां जीवशिव हीं नामें दोनी । जातीं मजमाजीं समरसोनी ।
    तैं मीच एकवांचूनी । आन जनीं वनीं असेना ॥५७॥
    जीव आणि शिव ही दोन्ही नावेही जेव्हा माझ्यामध्ये एकरूप होऊन जातात, तेव्हा माझ्याच एकाशिवाय दुसरे ह्या जनांत किंवा वनांत कांहींच रहात नाही ५७.


    जीवभावनें मीचि जीवु । शिवभावनें मीचि शिवु ।
    मी एकला ना नव्हे बहु । माझा अनुभवु मीचि जाणें ॥५८॥
    जीवभावने। पाहिले तर मीच जीव आहे, आणि शिवभावनेने पाहिले तर मीच शिव आहे. मी एकही नव्हें आणि अनेकही नव्हें, माझा अनुभव मलाच माहीत ५८.


    झणीं आशंका धरिशी येथ । 'जरी जीव शिव तूंचि समस्त ।
    तरी ते शुकवामदेवचि कां मुक्त । येरां म्हणत जड जीव ॥५९॥
    आतां येथे कदाचित तूं अशी शंका घेशील की, "जीव शिव सारेच जर तूं आहेस, तर शुकवामदेव हेच कां मुक्त ? आणि इतरांना जड जीव कां म्हणतात ? ५९.


    जरी तूंचि जीवरूपें तत्त्वतां । तरी हे ऐशि कां विषमता ।
    शुकवामदेवांची अवस्था । वेदशास्त्रार्था सम्मत ॥६०॥
    जीवाच्या रूपानेही खरोखर जर तूंच आहेस, तर हा असा भेदाभेद का ? ही शुकवामदेवांची अवस्था वेदशास्त्रसंमत आहे ६०;


    तींही लोकांमाजीं जाण । वेदवचन तंव प्रमाण ।
    हें बोलणें विलक्षण । अप्रमाण जैं मानिशी' ॥६१॥
    वेदवाक्य तर तिन्ही लोकांत प्रमाण धरतात, त्यामुळे हे बोलणे विलक्षणच दिसते, म्हणून खोटें आहे असे जर म्हणशील ६१;


    हो कां वेद म्हणे जें निश्चित । तें बोलणें माझें निःश्वसित ।
    तो मी स्वमुखीं जे बोलत । तें तूं अयुक्त म्हणतोसी ॥६२॥
    तर तसेंच का होईना ! वेद म्हणतो ते खरेच आहे. तें वेदाचे बोलणे म्हणजे माझे श्वासोच्छवास आहेत; पण तोच मी स्वतः आपल्या तोंडाने जे सांगतो, त्याला तूं खोटें कां म्हणतोस ? ६२.


    जो मी वेदांचा वेदवक्ता । सकळ शास्त्रांचा मूळकर्ता ।
    त्या माझें वचन म्हणसी वृथा । अतियोग्यता तुज आली ॥६३॥
    जो मी वेदांनाही बोलविणारा सर्व शास्त्रांचा मूळकर्ता, त्या माझें भाषण तूं खोटें म्हणतोस, तेव्हां तूं मोठाच शहाणा झालास ! ६०.


    वेदांचें जाण त्रिविध बंड । त्रिकांडीं केला तो त्रिखंड ।
    वेदबळें बा पाखंड । वाजवी तोंड अव्हासव्हा ॥६४॥
    वेदांचे बंड तीन प्रकारचे आहे. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड अशी त्याची तीन कांडे म्हणजे तीन विभाग केलेले आहेत. पाखाडी मनुष्य त्या वेदवाक्यांवरूनच अवाच्यासवा तोंड सोडतो ६४.


    भासले बहुसाल मतभेद । वेदबळें नाना वाद ।
    तो वेद माझा परोक्षवाद । तेणें तत्त्वावबोध केवीं होय ॥६५॥
    वेदाच्या अनुषंगानेच नाना मतभेद व नाना प्रकारचे वाद मात्र उपस्थित होतात. पण तो वेद माझा परोक्षवाद म्हणजे केवळ शब्दज्ञान आहे. त्यापासून तत्त्वज्ञानाचा बोध कसा होईल ? ६५.


    शब्दज्ञान ब्रह्मज्ञान । बाह्यदृष्टीं समसमान ।
    जेवीं वाल आणि वालभर सुवर्ण । तुकितां पूर्ण समता आली ॥६६॥
    शब्दज्ञान आणि ब्रह्मज्ञान ही दोन्ही बाह्य दृष्टीने सारखी दिसतात. ज्याप्रमाणे वाल आणि वालभर सोने ही दोन्ही वजनांत सारखी होतात ६६;


    परी वाला सुवर्णा समता । मोलें कदा नव्हे तत्त्वतां ।
    तेवीं वेदवादयोग्यता । ब्रह्मानुभविता सम नव्हे ॥६७॥
    परंतु वालाची आणि सोन्याची मोलामध्ये मात्र कधी बरोबरी व्हावयाची नाहीं; त्याप्रमाणे वेदवाद आणि ब्रह्मस्वरूपाचा अनुभव ही दोन्ही सारखी नव्हत ६७.


    जो मी हरिहरां प्रमाण । त्या माझें वचन अप्रमाण ।
    तूं म्हणसी हा ज्ञानाभिमान । हेंही जाणपण सांडावें ॥६८॥
    जो मी हरिहरालासुद्धा मान्य आहे, त्या माझे बोलणें तूं अप्रमाण समजतोस ; हा केवळ तुझा ज्ञानाभिमान आहे. हाही ज्ञानाभिमान सोडून दे ६८.


    माझें वचन सत्याचें सत्य । सत्य मानूनि निश्चित ।
    येणें भावें साधे परमार्थ । हें ब्रह्मलिखित मद्वाक्य ॥६९॥
    माझे भाषण म्हणजे सत्यांतील सत्य आहे असें खात्रीने समज. तरच परमार्थ साधेल. हे माझें वचन ब्रह्मलिखित समज ६९.


    उद्धवा मज पाहतां । वसिष्ठवामदेवादि समस्तां ।
    न देखे बद्ध आणि मुक्तता । हा माझा तत्त्वतां निजबोधु ॥७०॥
    उद्धवा ! माझ्या दृष्टीने वसिष्ठ-वामदेवादि सर्व लोकांत मला बद्ध किंवा मुक्त असा भेदच दिसत नाही. हाच माझा खरा आत्मानुभव आहे ७.


    मुक्तांचिये दृष्टीं । मुक्तच दिसे सकल सृष्टी ।
    तेथें शुकवामदेवांची गोष्टी । वेगळी पाठीं केवीं राहे ॥७१॥
    मुक्तांच्या दृष्टीने पाहिले तर सारी सृष्टि मुक्तच दिसते, तेव्हां शुकाची आणि वामदेवाची गोष्ट तेथें वेगळी कशी राहील ? ७१.


    बद्धमुक्तांहूनि भिन्न । परमात्मा मी चिद्‍घन ।
    जरी म्हणसी जीवासी बंधन । तेहीं सत्यत्वें जाण घडेना ॥७२॥
    बद्धमुक्ताहून भिन्न असा मी चिद्धन परमात्मा आहे. आतां तूं जीवाला बंधन आहे असें म्हणशील तर तेही खरेपणाने घडत नाही ७२.


    शोकमोहौ सुखं दुःखं देहापत्तिश्च मायया ।
    स्वप्नो यथात्मनः ख्यातिः संसृतिर्न तु वास्तवी ॥ २ ॥
    [श्लोक २] शोक, मोह, सुख, दुःख आणि देहाची प्राप्ती या सर्वांना मायाच कारणीभूत आहे स्वप्न हा जसा बुद्धीचा भास आहे; तसाच आत्म्यासाठी संसार भास आहे, खरा नव्हे. (२)




    दोन मुहूर्त स्वप्नवृत्ती । त्यामाजीं देखे जन्मपंक्ती ।
    तेथें पावला नाना याती । तेवीं मिथ्या प्रतीती भवभावा ॥७३॥
    स्वप्नाची स्थिति दोन घटकाच असते; पण तेवढ्या वेळांत अनेक जन्म अनेक जातींत झालेले दृष्टीस पडतात ! त्याप्रमाणेच संसार व त्यांतील अनुभव मिथ्या आहे ७३.


    नसता आभासु मावळे ठायीं । त्यालागीं हाहाकारु उठे देहीं ।
    गेले मेले नाहीं नाहीं । 'शोक' पाहीं त्या नांव ॥७४॥
    नसता भास जेथल्यातेथें मावळतो, त्यामुळे देहामध्ये मोठा हाहा:कार उडून जातो ! गेलें गेलें, मेलें मेलें, नाही नाही असे म्हणतात. त्याचे नाव 'शोक' ! ७४.


    भग्नपात्रीं भरिलें जळ । तेथें बिंबलें चंद्रमंडळ ।
    तें पात्र पोटेंशीं धरी बाळ । रत्‍न प्रबळ हें माझें ॥७५॥
    फुटक्या भांड्यात पाणी भरले, आणि त्यांत चंद्राचे प्रतिबिंब दिसू लागले म्हणजे माझे सुंदर रत्न म्हणून मूल ते भांडे पोटाशी आवळून धरतें ७५.


    जळ गळोनि जाय सकळ । चंद्रमा हरपे तत्काळ ।
    त्यालागी तळमळी तें बाळ । 'शोकु' केवळ या नांव ॥७६॥
    पण पाणी सारे लवकरच गळून जाते आणि लागलाच चंद्रही नाहीसा होतो. त्यामुळे ते मूल तळमळत बसते. ह्याचंच नांव 'शोक' ७६.


    अथवा घटचंद्र धरूं जातां । तो न ये बालकाचे हाता ।
    यालागीं करी जे जे व्यथा । 'शोक' सर्वथा या नांव ॥७७॥
    अथवा घागरीतील चंद्र धरावयाला गेले तर तो मुलाच्या हातांत येत नाही, म्हणून ते जें जें दुःख करिते त्याचेंच नांव 'शोक' ७७.


    काढावया आरशांतील धन । करी दर्पणामाजीं खनन ।
    फुटल्या नागवलों म्हणे जाण । 'शोक' दारुण या नांव ॥७८॥
    आरशांतील द्रव्य काढण्याकरिता आरशांतच खोदूं लागतो, आणि तो फुटला म्हणजे बुडालों म्हणतो, ह्याचंच नांव भयंकर 'शोक' ७८.


    नसते वस्तूच्या ठायीं जाण । मी माझें हा अभिमान ।
    तेंचि 'मोहाचें' लक्षण । ममता दारुण ते संधी ॥७९॥
    नसलेल्याच वस्तूच्या ठिकाणी मी आणि माझे हा अभिमान बाळगतो, तेंच 'मोहाचे' लक्षण होय. त्याच संधीला भयंकर 'ममता' उत्पन्न होते ७९.


    देखोनि मृगजळाचें तळें । येणें पिकती रायकेळें ।
    यालागीं मृगतृष्णेचीं जळें । आठै काळें राखतु ॥८०॥
    मृगजळाचे तळे पाहून त्याने रायकेळी पिकतील म्हणून मृगतृष्णेचे पाणी अष्टौप्रहर राखीत बसतो ८०.


    मृगजळाकडे कोणी भंवे । त्यासी सक्रोधें भांडू धांवे ।
    अतिमोहित मोहस्वभावें । विवेकु न करवे सत्याचा ॥८१॥
    त्या मृगजळाकडे कोणी फिरकू लागला की, चवताळून त्याच्याशी तंटा करावयाला धावतो. असा भ्रांतीने मोहांध झाल्यामुळे सत्याचा विवेक करवत नाही ८१.


    तेवीं पुत्रापासोन सुखप्राप्ती । माता पिता होईल म्हणती ।
    शेखीं पुत्र अंगोठा दाविती । केवळ भ्रांति पुत्रमोहो ॥८२॥
    त्याप्रमाणे पुत्रापासून मोठी सुखप्राप्ति होईल असें आईबाप म्हणत असतात; हा भ्रांतीने केवळ त्यांस मोह पडलेला असतो. कारण, शेवटीं पुत्र त्यांना आंगठाच दाखवितात ! ८२.


    गंधर्वनगरींची रचना । देखोनि अभिलाष होय मना ।
    ते घ्यावया मेळवी सेना । नानासूचनाउपायें ॥८३॥
    गंधर्वनगरांतील रचना पाहुन मनाला अभिलाष उत्पन्न व्हावा, आणि ते घेण्यासाठी ज्याप्रमाणे मोठ्या खटपटीनें सैन्य तयार करावें ८३,


    तैसा मिथ्या देहीं अभिमान । देहसंबंधाची ममता गहन ।
    हेंचि मोहाचें मूळ लक्षण । ममताभिमान प्राणियां ॥८४॥
    त्याप्रमाणे देहांतील अभिमान हा मिथ्या होय. देहसंबंधी ममता फार कठिण असते. प्राण्यांना ममतेचा अभिमान लागून राहतो. हेच मोहाचें मूळ लक्षण आहे. ८४.


    एवं अहं आणि ममता । हेचि मोहाची मातापिता ।
    त्याचेनि उत्तरोत्तर वाढतां । जनमोहिता व्यामोह ॥८५॥
    तात्पर्य, 'अहं' आणि 'ममता' हीच मोहाची मातापितरे आहेत. त्यांच्याच योगाने उत्तरोत्तर बळावून 'मोह' हा जनांना भूल घालून सोडतो ८५.


    प्रियविषयीं आसक्ति देख । त्याची नित्यप्राप्ती अनेक ।
    त्याचि नांव म्हणती 'सुख' । जेवीं चाखितां विख अति मधुर ॥८६॥
    एखादे विष चाखायला गेले असतां मधुर लागते; त्याप्रमाणे आपल्याला प्रिय असलेल्या विषयांची आसक्ति धरतात; आणि त्यांची अनेक प्रकारे सतत प्राप्ति झाली, म्हणजे त्यालाच 'सुख' असें नांव देतात ८६.


    विषयप्राप्तीं जो हरिख । तया नांव म्हणती 'सुख' ।
    विषयविनाश तेंचि 'दुःख' । परम असुख त्या नांव ॥८७॥
    विषयलाभामध्ये जो हर्ष होतो, त्यालाच 'सुख' असें म्हणतात आणि विषयाचा नाश झाला की तेच 'दुःख', त्यालाच 'असुख' असें नांव देतात ८७.


    शोक-मोह-सुख-दुःख । येणेंचि 'देहाची प्राप्ती' देख ।
    देहाभिमानें देह अनेक । दुःखदायक भोगवी ॥८८॥
    शोक; मोह; सुख, दुःख ह्यानेच 'देहाची प्राप्ति' होते. देहाभिमानामुळेच अनेक दुःखदायक देह ध्यावे लागतात ८८.


    जे जेणें तीव्रध्यानें मरे । तो तेंचि होऊनि अवतरे ।
    कां जो निमे अतिद्वेषाकारें । तो द्वेषानुसारें जन्मतु ॥८९॥
    जो ज्या तीव्र ध्यासाने मरण पावतो, त्याच रूपाने जन्म घेऊन येतो. किंवा जो अतिशय द्वेषरूपानेच मरण पावतो, तो द्वेषरूपानेच जन्मास येतो ८९.


    सर्प मुंगुस पूर्ववृत्ती । वैराकारें जन्म पावती ।
    जे जे वासना उरे अंतीं । ते ते गती प्राण्यासी ॥९०॥
    सर्प आणि मुंगूस ह्यांची पूर्वजन्मींची वृत्ति वैराचीच असते. म्हणून वैराच्याच स्वरूपाने जन्मास येतात. मरणकाली जी जी वासना शिल्लक राहते. ती ती गतिच प्राण्याला प्राप्त होते ९०.


    यालागीं हृदयामाजीं निश्चितीं । जे सबळ वासना उठे अंतीं ।
    तो तो प्राणी पावे तिये गती । श्रुति बोलतीं पुराणें ॥९१॥
    म्हणून अंत:करणामध्ये अंतकाली खरोखर जी प्रबळ वासना उत्पन्न होते, त्या गतीला तो तो प्राणी जातो. असें वेद आणि पुराणेही सांगतात ९१.


    पुरुषासवें वृथा छाया । तैशी ब्रह्मीं मिथ्या माया ।
    ते उपजवी गुणकार्या । देह भासावया मूळ ते ॥९२॥
    पुरुषाबरोबर छाया जशी मिथ्या, तशी ब्रह्मामध्ये माया ही मिथ्या आहे. तीच गुणाच्या कार्याला उत्पन्न करते. आणि देहाचा भास करून देण्यालाही मूळ तीच ९२.


    जेवीं का स्वप्नीं एकलें मन । नानाकार होय आपण ।
    तेवीं चैतन्याचें अन्यथाभान । तें हें जाण चराचर ॥९३॥
    ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये मन एकटेंच असते तरी तें अनेक प्रकारची स्वरूपें धारण करते, त्याप्रमाणे चैतन्याचें जें अन्यथाभान तेच हे चराचर होय ९३.


    एवं वस्तुतां संसार नाहीं । तेथें सुखदुःख कैंचें कायी ।
    देहेंवीण छाया पाहीं । कोणें ठायीं उपजेल ॥९४॥
    तात्पर्य, संसाराला खरोखर अस्तित्वच नाही. तेथे सुखदुःख कोठचे आणि काय ? हे पहा ! देहाशिवाय छाया ही पडणार कोठे ? ९४.


    जें उपजलेंच नाहीं । तें काळें गोरें सांगों कायी ।
    अवघें स्वप्नप्राय पाहीं । वस्तुतां नाहीं संसारु ॥९५॥
    जे जन्मालाच आले नाही ते काळे आहे का गोरे आहे, हे काय सांगावें ? सारेच मुळी स्वप्नासारखे आहे. वास्तविक संसार नाहींच नाहीं ९५.


    इहीं दोहीं श्लोकीं अगाधु । परिहरिला वस्तुविरोधु ।
    आतां प्रतीतीनें जो अनुरोधु । तो सत्यासी बाधु करूं न शके ॥९६॥
    त्याप्रमाणे ह्या दोन श्लोकांमध्ये वस्तुविरोधाचा उत्कृष्ट रीतीने परिहार केला. आता अनुभवाने जी खूण पटते, तीही सत्याला कधी बाध आणीत नाही (ह्याविषयी सांगतात ) ९६.


    डोळां अंगुळी लाविती । तेणें दोन चंद्र आभासती ।
    गगनीं दों चंद्रा नाहीं वस्ती । मिथ्या प्रतीती निराकारीं ॥९७॥
    डोळ्याला बोट लावले म्हणजे दोन चंद्र दिसू लागतात ; पण आकाशांत काही दोन चंद्र असत नाहीत; त्याप्रमाणेच निराकारामध्ये मिथ्या भास होतो ९७.


    विद्याविद्ये मम तनू विद्ध्युद्धव शरीरिणाम् ।
    मोक्षबंधकरी आद्ये मायया मे विनिर्मिते ॥ ३ ॥
    [श्लोक ३] हे उद्ववा ! विद्या आणि अविद्या या दोन्ही माझ्याच शक्ती आहेत त्या मनुष्यांना अनुक्रमे मोक्ष आणि बंधन प्राप्त करून देणार्‍या आहेत या दोन्ही अनादी असून माझ्या मायेने रचलेल्या आहेत. (३)




    निजबोधें येत बोधा । 'ब्रह्माहमस्मि' स्फुरे सदा ।
    ते जाण शुद्ध 'विद्या' । जें अविद्याछेदक ॥९८॥
    जिचा आत्मज्ञानानेच प्रत्यय येतो; 'अहंब्रह्मास्मि' अशी निरंतर भावना राहते ; तीच 'शुद्ध विद्या' होय आणि तीच अविद्येचा नाश करणारी आहे असे समज ९८.


    मी पापी मी सदा निर्दैवो । ऐसा नित्य स्फुरे भावो ।
    तेचि सबळ 'अविद्या' पहा हो । जे नाना संदेहो उपजवी ॥९९॥
    मी पापी; मी कपाळकरंटा, अशीच जेथें निरंतर भावना स्फुरत असते, तीच सारी 'अविद्या' होय आणि तीच अनेक प्रकारचे संशय उत्पन्न करते ९९.


    एकी जीवातें घाली बंदी । एकी जीवाचें बंधन छेदी ।
    या दोनी माझ्या शक्ति अनादी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥१००॥
    एक जीवाला बंदीत घालते ; आणि एक जीवाचे बंधन तोडून टाकते. हे उद्धवा ! या दोन्ही माझ्याच अनादि शक्ति होत १००.

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १ ते १००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १0१ ते २००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या २०१ ते ३००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ३०१ ते ४००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ४०१ ते ५००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ५०१ ते ६००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ६०१ ते ७००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ७०१ ते ८००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ८०१ ते ९००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ९०१ ते १०००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १००१ ते ११००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ११०१ ते १२००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १२०१ ते १३००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १३०१ ते १४००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १४०१ ते १५००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १५०१ ते १५८१

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...