मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १००१ ते ११००
तेथ स्वानंदाचा ग्राहकु । तत्काळ भेटला नेटकु ।
त्यासी जीवेंसहित विवेकु । घालूनि आंखू संवसाटी केली ॥१॥
तेथें त्याला लागलाच स्वानंदरूपी उत्तम ग्राहक भेटला, तेव्हां त्याने जीवासह मन, बुद्धि, प्राण, इत्यादि विवेक त्याच्या पदरांत घालून त्याच्या मोबदल्यांत स्वानंद घेतला १.
या नांव धृतीचें लक्षण । हा एकविसावा साधूचा गुण ।
आतां जिंतले जे षड्गुण । तेंही लक्षण अवधारीं ॥२॥
आतां जिंतले जे षड्गुण । तेंही लक्षण अवधारीं ॥२॥
ह्याचंच नांव धैर्य. हा साधूचा एकविसावा गुण होय. आतां षड्विकार कसे जिंकले जातात तेंही लक्षण ऐक २.
स्वानंदें तृप्त जाला । यालागीं क्षुधेसी मुकला ।
जगाचे जीवनीं निवाला । तृषा विसरला निःशेष ॥३॥
जगाचे जीवनीं निवाला । तृषा विसरला निःशेष ॥३॥
तो साधु स्वानंदाने तृप्त झालेला असतो, म्हणून त्याला भूक लागत नाही. जगाच्या जीवनाने तो संतुष्ट झालेला असतो, म्हणून तो तहानही निखालस विसरून गेला असें होतें ३.
भोगितां निजात्मसुख । विसरला शोकदुःख ।
चिन्मात्रज्ञानें निष्टंक । त्यासंमुख मोहो न ये ॥४॥
चिन्मात्रज्ञानें निष्टंक । त्यासंमुख मोहो न ये ॥४॥
आत्मसुखाचा उपभोग घेतां घेतां शोक आणि दुःख विसरूनच गेला, चित्स्वरूपाच्या ज्ञानाने संशयरहित झालेला असल्यामुळे मोहही त्याच्यासमोर येत नाही ४.
तिहीं अवस्थांबाहिरा । वसिन्नला निजबोधवोंवरा ।
तेथें जरा जाली अतिजर्जरा । कांपत थरथरां पळाली ॥५॥
तेथें जरा जाली अतिजर्जरा । कांपत थरथरां पळाली ॥५॥
तो जागृति, स्वप्न आणि सुपुप्ति ह्या तिन्ही अवस्थांच्या बाहेर आत्मज्ञानाच्या ओंवरीत राहात असतो. तेथे जरी म्हातारी जख्खड झालेली जरा आली, तरी तीच थरथरां कांपत पळून जाते ५.
मिथ्या जाहलें कार्यकारण । देहाचें देहपणें न देखे भान ।
तंव मरणासीचि आलें मरण । काळाचें प्राशन तेणें केलें ॥६॥
तंव मरणासीचि आलें मरण । काळाचें प्राशन तेणें केलें ॥६॥
त्याचे कार्य व कारण ही दोन्ही मिथ्या झालेली असतात. देहपणाने देहाचे भानही त्याला राहात नाही. त्यामुळे मरणालाच मरण येते. कारण त्याने काळालाही गिळून टाकलेले असते ६.
यापरी गा हे षड्गुण । अनायासें जिंतोन ।
सुखें वर्तती साधुजन । हें लक्षण बाविसावें ॥७॥
सुखें वर्तती साधुजन । हें लक्षण बाविसावें ॥७॥
अरे ! ह्याप्रमाणे हे षड्विकार अनायासेंच जिंकून टाकून साधु लोक खुशाल ह्या जगांत राहातात. हे त्याचे बाविसावें लक्षण होय ७.
आपुला स्वामी देखे सर्वां भूतीं । तेथें मान इच्छावा कवणाप्रती ।
मानाभिमान सांडिले निश्चितीं । अतिनम्र वृत्तीं वर्तणें ॥८॥
मानाभिमान सांडिले निश्चितीं । अतिनम्र वृत्तीं वर्तणें ॥८॥
आपला स्वामी (ब्रह्मस्वरूप) त्याला सर्व प्राणिमात्रांमध्ये दिसत असतो. तेव्हा मानाची इच्छा कोणापासून करावयाची ? म्हणून खरोखर मानाभिमान सोडून अतिशय नम्रवृत्तीने वागणे चालू असते ८.
आधीं देहीं धरावा अभिमान । मग इच्छावा अतिसन्मान ।
तंव देहाचें खुंटलें भान । मानाभिमान बुडाले ॥९॥
तंव देहाचें खुंटलें भान । मानाभिमान बुडाले ॥९॥
आधी देहामध्ये अभिमान धरावा, तेव्हां मग मोठ्या सन्मानाची इच्छा करता येते असा नियम आहे. पण येथे देहाचे भानच मुळी खुंटलेले असते. तेव्हां अर्थातच मानाभिमानही रसातळालाच जातात ९.
या नांव गा अमानिता । हे तेविसावी लक्षंणता ।
साधु सन्मानाचा दाता । तेही कथा अवधारीं ॥१०१०॥
साधु सन्मानाचा दाता । तेही कथा अवधारीं ॥१०१०॥
ह्याचेच नांव 'अमानिता' (म्हणजे निरभिमानपणा). हे साधूचे तेविसावें लक्षण. आता साधु हा सन्मान देणारा कसा असतो तेंही ऐक १०.
ब्रह्मादि मशकवरी । सर्वांतें वंदी शिरीं ।
एकनिष्ठता चराचरीं । बुद्धी दुसरी जाणेना ॥११॥
एकनिष्ठता चराचरीं । बुद्धी दुसरी जाणेना ॥११॥
तो ब्रह्मदेवापासून तो माशीपर्यंत सर्वांना शिरसावंद्य मानितो. त्याची चराचरामध्ये सर्वत्र एकनिष्ठता असते. ब्रह्मस्वरूपाशिवाय दुसरी बुद्धीच तो जाणत नाही ११.
सर्व भूतीं स्वामी देखे । लोटांगणें घाली हरिखें ।
सुर नर खर हे नोळखे । अतिसंतोखें वंदित ॥१२॥
सुर नर खर हे नोळखे । अतिसंतोखें वंदित ॥१२॥
सर्व प्राणिमात्रांमध्ये तो ब्रह्मरूप पाहातो, आणि म्हणून सर्वांपुढेच तो आनंदानें लोटांगण घालतो. देव, मनुष्य किंवा गाढव हा भेदाभेद मनांत आणीतच नाही. सर्वांनाच तो मोठ्या संतोषाने वंदन करतो १२.
नाना अलंकार घडिले गुणें । सोनें सोनेपणा नव्हेच उणें ।
तेवीं नामरूपांचे विंदाणें । पालटु मनें घेऊं नेणे ॥१३॥
तेवीं नामरूपांचे विंदाणें । पालटु मनें घेऊं नेणे ॥१३॥
मोठ्या कौशल्याने निरनिराळे अलंकार घडविलेले असले, तरी सोन्याच्या सोनेपणांत काही कमतरता येत नाही. त्याप्रमाणे नावाच्या किंवा रूपाच्या निरनिराळ्या प्रकाराने आपल्या मनात बदल करावा हें तो जाणतच नाही १३.
साकरेची निंबोळी केली । परी ते कडूपणा नाहीं आली ।
तेवीं सूकरादि योनी जरी जाली । तरी नाहीं भंगली चित्सत्ता ॥१४॥
तेवीं सूकरादि योनी जरी जाली । तरी नाहीं भंगली चित्सत्ता ॥१४॥
साखरेची निंबोणी (कडूफळ ) केली, तर तींत काही कडूपणा येत नाही. त्याप्रमाणे जरी डुकरासारखी कनिष्ठ जात असली, तरी तिच्यांतील ब्रह्मस्वरूप कांहीं नाहींसें होत नाही १४.
सागरीं नाना परींचे विक्राळ । जरी उठिले अनंत कल्लोळ ।
ते जेवीं गा केवळ जळ । तेवीं वस्तु सकळ भूतमात्रीं ॥१५॥
ते जेवीं गा केवळ जळ । तेवीं वस्तु सकळ भूतमात्रीं ॥१५॥
समुद्रामध्ये जरी नानाप्रकारचे अक्राळविक्राळ अनंत कल्लोळ उसळले तरी त्यांच्यामध्ये शुद्ध पाणीच असते, त्याप्रमाणेच कोणताही प्राणी घेतला तरी त्यांत ब्रह्मस्वरूपच भरलेले आहे १५,
यापरी सकळ भूतां । साधु सन्मानातें देता ।
हे चोविसावी लक्षणता । परबोधकता ते ऐक ॥१६॥
हे चोविसावी लक्षणता । परबोधकता ते ऐक ॥१६॥
अशा समजुतीने साधु हा सर्व प्राणिमात्रांना सन्मानच देणारा असतो. हेच त्याचे चोविसावें लक्षण होय. आता त्यांची 'परबोधकता' म्हणजे दुसऱ्याला बोध करण्याचे सामर्थ्य कसे असतें तें ऐक १६.
जैसा भावो जैशी श्रद्धा । तैसतैशा करूं जाणे बोधा ।
ज्ञान पावोनि नव्हे मेधा । स्वरूपश्रद्धा प्रबोधी ॥१७॥
ज्ञान पावोनि नव्हे मेधा । स्वरूपश्रद्धा प्रबोधी ॥१७॥
ज्याचा जसा भाव आणि जशी श्रद्धा असते, त्याला तसाच उपदेश करण्याचे साधूला माहीत असते. ज्ञानप्राप्ति होऊनही ज्याची बुद्धि तिकडे वळणार नाही, त्याला तो स्वरूपावरील श्रद्धेचा उपदेश करतो १७.
एक ज्ञान पावोनि जाहला पिसा । पडिला अव्यवस्थ ठसा ।
नोळखेचि सच्छिष्याची दशा । योग्य उपदेशा तो नव्हे ॥१८॥
नोळखेचि सच्छिष्याची दशा । योग्य उपदेशा तो नव्हे ॥१८॥
कोणी ज्ञान प्राप्त झाल्यावर वेडाच बनला, आणि त्याच्या अंत:करणांत त्या ज्ञानाचा अव्यवस्थित ठसा उमटला, तर सच्छिष्याची वास्तविक स्थिति त्याला समजत नाहीशी होते. अर्थातच असा गुरु उपदेश करण्याला पात्र नसतो १८.
एक ज्ञानआश्चर्यें कोंदला । विस्मयें तटस्थ होऊनि ठेला ।
काष्ठलोष्टांचेपरी पडला । नाहीं उरला उपदेश ॥१९॥
काष्ठलोष्टांचेपरी पडला । नाहीं उरला उपदेश ॥१९॥
कोणी ज्ञानाच्या आश्चर्यानेच अंतःकरण भरून गेल्यामुळे विस्मयाने तटस्थ होऊन राहिला आणि लाकडासारखा किंवा ढेकळासारखा पडून राहिला, तर अशा गुरुला उपदेशाचे कामच राहात नाहीं १९.
एक ज्ञान पावोनि अतिकृपण । जीव गेलिया न बोले जाण ।
भेणेंभेणें धरोनि मौन । न बोले वचन सर्वथा ॥१०२०॥
भेणेंभेणें धरोनि मौन । न बोले वचन सर्वथा ॥१०२०॥
कोणाला ज्ञानप्राप्ति झाल्यावर अतिशय कृपणच होतो. तो जीव गेला तरी बोलतच नाही. भीतीभीतीने मौनच धरतो. एकही शब्द कधीं बोलत नाही १०२०.
ज्यासी धनकोडी जोडी जाहली । ते पुरूनि वरी दगड घाली ।
दान न देतां वृथा गेली । संपत्ति केली भूमिसवती ॥२१॥
दान न देतां वृथा गेली । संपत्ति केली भूमिसवती ॥२१॥
एकादा मनुष्य लाखों रुपये द्रव्य मिळाले असतां ते जमिनीत पुरून त्याच्यावर दगड ठेवतो, दान दिले तर संपत्ति फुकट जाईल असे समजून तो त्या संपत्तीला जमिनीचीच सोबतीण करून ठेवतो २१.
तैसें कष्टीं जोडूनि निजज्ञान । सत्पात्रीं न करीच दान ।
हें ज्ञात्याचें कृपणलक्षण । वंचकपण स्वभावें ॥२२॥
हें ज्ञात्याचें कृपणलक्षण । वंचकपण स्वभावें ॥२२॥
त्याप्रमाणे मोठ्या कष्टाने आत्मज्ञान संपादन वरून ते सत्पात्री दानच करीत नाहीं; हेंच ज्ञात्याच्या कृपणपणाचे लक्षण आहे. अर्थात् फसवेगिरी ती हीच २२.
एक ज्ञान पावोनि सांगों जाये । उपदेशीं शिष्या बोधू नोहे ।
तें ज्ञान अबीज जाहलें पाहें । अंकुरां न लाहे सत्क्षेत्रीं ॥२३॥
तें ज्ञान अबीज जाहलें पाहें । अंकुरां न लाहे सत्क्षेत्रीं ॥२३॥
कोणी ज्ञान प्राप्त करून ते सांगावयालाही जातो, पण त्या उपदेशाने शिष्याला काहीच समजत नाही. तर ते त्या गुरूचे ज्ञान निःसत्व झाले असें समजावे. चांगल्य शेतांतसुद्धा त्याला मोड यावयाचे नाहीत २३.
सधन शिष्य करावया जाण । स्वयें प्रयत्न करी पूर्ण ।
आमुची दीक्षा अनुभव गहन । यापरी ज्ञान विकरां घाली ॥२४॥
आमुची दीक्षा अनुभव गहन । यापरी ज्ञान विकरां घाली ॥२४॥
कोणी कोणी आमची दीक्षा व अनुभव फार गहन आहेत असें म्हणून मोठमोठे श्रीमान् लोकच शिष्य करण्याची स्वतः परिपूर्ण खटपट करीत असतात. अशा रीतीने ते ज्ञानाचा विक्राच मांडतात २४.
जैसेनि प्रलोभे त्याचें मन । तैसें निरूपी निरूपण ।
अर्थस्वार्थें उपदेश पूर्ण । धनलोभें ज्ञान निर्वीर्य होये ॥२५॥
अर्थस्वार्थें उपदेश पूर्ण । धनलोभें ज्ञान निर्वीर्य होये ॥२५॥
शिष्याचे मन जिकडून आपल्याकडे ओढेल तसेंच त्याला निरूपण सांगावयाचे, अशा द्रव्यलोभानेच सर्व उपदेश केला, म्हणजे त्या धनलोभानेच ज्ञान निःसत्त्व होऊन जातें २५.
पेंवीं रिघालिया पाणी । त्या धान्याची नव्हे पेरणी ।
तेवीं धनलोभ रिघालिया ज्ञानीं । उपदेशें कोणी सुखी नव्हे ॥२६॥
तेवीं धनलोभ रिघालिया ज्ञानीं । उपदेशें कोणी सुखी नव्हे ॥२६॥
धान्याने भरलेल्या पंवांत पाणी शिरले, म्हणजे मग त्यांतील धान्य काही पेरावयाला उपयोगी पडत नाही. त्याप्रमाणे ज्ञानांत धनलोभ शिरला, की त्या उपदेशानें कोणालाच सुख होत नाही २६.
शिष्य बोधेंवीण झुरे अंतरीं । गुरु गुरुपणें गुरगुरी ।
ते बोधकता नव्हे खरी । घरच्या घरीं चुकामुकी ॥२७॥
ते बोधकता नव्हे खरी । घरच्या घरीं चुकामुकी ॥२७॥
ज्ञान न मिळाल्यामुळे शिष्य मनांत झुरत असतो, आणि गुरु गुरुपणाने गुरगुरत असतो ! तो काही खरा उपदेशकपणा नव्हे. घरांतल्या घरांतलीच ती चुकामूक होय २७.
शब्दज्ञानें पारंगत । जो ब्रह्मानंदें सदा डुल्लत ।
शिष्यप्रबोधनीं समर्थ । तो मूर्तिमंत स्वरूप माझें ॥२८॥
शिष्यप्रबोधनीं समर्थ । तो मूर्तिमंत स्वरूप माझें ॥२८॥
जो शब्दज्ञानांत पारंगत असून ब्रह्मानंदांत निरंतर डुलत असतो, आणि शिष्याला उपदेश करण्याला समर्थ असतो, तोच माझे मूर्तिमंत स्वरूप होय २८.
हो कां मी जैसा अवतारधारी । तैसाचि तोही अवतारी ।
चिद्रत्नाच्या अलंकारी । अलंकारी कुसरीं सच्छिष्यां ॥२९॥
चिद्रत्नाच्या अलंकारी । अलंकारी कुसरीं सच्छिष्यां ॥२९॥
मी जसा अवतार धारण केला आहे, तसाच तोही अवतारी असतो. म्हणूनच तो चित्स्वरूपाच्या अलंकाराने सच्छिष्याला मोठ्या चातुर्याने अलंकृत करतो २९.
तो मी या शब्दकुसरीं । नांवाचीं अंतरें बाहेरीं ।
आंतुवटें निजनिर्धारीं । एके घरीं नांदत ॥१०३०॥
आंतुवटें निजनिर्धारीं । एके घरीं नांदत ॥१०३०॥
'तो' आणि 'मी' असे निरनिराळे शब्द चातुर्याने उच्चारीत असता त्यांत केवळ बाह्यदृष्टीने फरक दिसतो, पण त्या दोन्ही शब्दांचा अंतर्गत विचार केला असतां दोघेही एकाच घरांत नांदत असतात १०३०.
एकचि बहुतांतें उपदेशी । एकाची प्राप्ती सुटंक कैशी ।
एकें अज्ञानें जैशीं तैशीं । हा बोलू कोणासी म्हणाल ॥३१॥
एकें अज्ञानें जैशीं तैशीं । हा बोलू कोणासी म्हणाल ॥३१॥
एकच असून तो अनेकांना उपदेश करतो. एकाची ज्ञानप्राप्ति किती सुलक्षण असते ? पण कोणी कोणी जशाचे तसेच अज्ञानांत राहातात, तेव्हा हा दोष कोणावर ठेवावा ? ३१.
कृषीवल पेरणी करी । भूमिपाडें पिकती घुमरी ।
अंकुरेना क्षितितळीं उखरीं । तें बीज निर्धारीं अतिशुद्ध ॥३२॥
अंकुरेना क्षितितळीं उखरीं । तें बीज निर्धारीं अतिशुद्ध ॥३२॥
शेतकरी पेरणी करतो, तेव्हां भूमि उत्तम असल्यास त्याचे पीक अगदी गजबजून येतें व निखालस माळ जमीन असली तर तेथे एक मोडसुद्धा फुटत नाही. पण बीं खरोखर उत्तमच असते ३२.
भूमिचि सखर-निखर । बीज पावन गा साचार ।
भाविकीं उपदेशा विस्तर । विकल्पी नर सुनाट ॥३३॥
भाविकीं उपदेशा विस्तर । विकल्पी नर सुनाट ॥३३॥
ह्या उदाहरणांत भूमीच सरसनिरस असते, बीज खरोखर पवित्रच असते. त्याप्रमाणे भाविक लोकांच्याच ठिकाणी उपदेशाचा विस्तार चांगला होतो. तर्कटी लोक हे शुद्ध माळरान ! ३३.
जो जैसा देखे अर्थ । तोचि बोधूनि करी परमार्थ ।
ऐसा परबोधनीं समर्थ । गुण विख्यात पंचविसावा ॥३४॥
ऐसा परबोधनीं समर्थ । गुण विख्यात पंचविसावा ॥३४॥
जो शिष्य ज्या प्रकारे अर्थ समजू शकेल, त्याच रीतीनें उपदेश करून त्याला परमार्थाकडे लावावयाचे, असा दुसज्याला उपदेश करण्यामध्ये जो प्रभावी गुण असतो, तोच 'परबोधकता' नांवाचा पंचविसावा प्रख्यात गुण होय ३४.
साधुची मैत्री चोखट । वोळखी सर्वांसी जुनाट ।
सर्वांचा सखा श्रेष्ठ । सर्वांसी सकट सारिखा ॥३५॥
सर्वांचा सखा श्रेष्ठ । सर्वांसी सकट सारिखा ॥३५॥
साधूची मैत्री ही तशीच उत्तम असते. सर्वांशी त्याची ओळख जुनीच. तो सर्वांचाच थोर मित्र असल्यामुळे सर्वांना सरसकट सारखाच असतो ३५.
सुहृद सर्वांचा सोयरा । सर्वांचा जिवलगु खरा ।
होऊनि सर्वांहीबाहिरा । मित्राचारा चालवी ॥३६॥
होऊनि सर्वांहीबाहिरा । मित्राचारा चालवी ॥३६॥
तोच सर्वांचा आत व सोयरा; तोच सर्वांचा खरा खरा जिवलग होय. तो सर्वांहून निराळा राहून मित्रत्व चालवितो ३६.
सांगतां आपुली गुह्य गोष्टी । अळोंचावया वेगळा नुठी ।
आप्तभावें देखे सृष्टी । अवंचक पोटीं सर्वांसी ॥३७॥
आप्तभावें देखे सृष्टी । अवंचक पोटीं सर्वांसी ॥३७॥
आपली अगदी गुप्त गोष्ट असली तरी ती हळूच कानांत सांगावयाला तो काही परकेपणा मानीत नाही. सर्व जगाकडे तो आप्तभावनेने पाहतो. तो अंत:करणात सर्वाविषयीं निष्कपटच असतो ३७.
क्षीरनीरांची मैत्री जैशी । भेद नाहीं मिळणीपाशीं ।
साधू सर्व जीव समरसी । अभेदभावेंसीं मित्रत्वें ॥३८॥
साधू सर्व जीव समरसी । अभेदभावेंसीं मित्रत्वें ॥३८॥
दुधाचा आणि पाण्याचा जसा एकजीव होतो, ती एकत्र झाली असता त्या दोहोंत जसा भेद दिसत नाही; त्याप्रमाणे साधूही सर्वांशी ऐक्यभावाने व मित्रत्वाने वागून सर्व जीव आपल्या ठिकाणी समरस करून घेतो ३८.
परम मैत्रीचा भावो देख । दुःख हिरोनि द्यावें सुख ।
साधू जीवांचें निरसोनि दुःख । परम सुख देतसे ॥३९॥
साधू जीवांचें निरसोनि दुःख । परम सुख देतसे ॥३९॥
अत्यंत मैत्रीचे लक्षण हे की, दुसऱ्याचे दुःख हरण करून त्याला सुख द्यावयाचे. त्याप्रमाणे साधूही जीवांचे दुःख निवारण करून त्यांना अत्यंत सुखच देत असतो ३९.
नवल मैत्रींचें महिमान । सखा सर्वांचा पुरातन ।
सर्वांसी नीच नवें सौजन्य । अवंचकपण सर्वदा ॥१०४०॥
सर्वांसी नीच नवें सौजन्य । अवंचकपण सर्वदा ॥१०४०॥
साधूच्या मैत्रीचा महिमा फार अगाध आहे. तो सर्वांचा जुनाच मित्र आहे. यामुळे सगळ्यांशी त्याचे सौजन्य नित्य नवेच असते. तो सदासर्वदा निष्कपट असतो १०४०.
बंधूहूनि मित्र अधिकु । पुत्राहूनि विश्वासिकु ।
तो मित्र जैं जाहला वंचकु । तैं केवळ ठकु तो जाणावां ॥४१॥
तो मित्र जैं जाहला वंचकु । तैं केवळ ठकु तो जाणावां ॥४१॥
बंधूहूनही मित्र हा अधिक आहे. पुत्रांहूनही मित्र अधिक विश्वासू आहे. त्याच मित्राने जर विश्वासघात केला, तर तो ठक आहे असें समजावें ४१.
मनें धनें कर्तव्यता । ज्याची अनन्य अवंचकता ।
त्या नांव परम मित्रता । हे खूण तत्त्वतां जाणावी ॥४२॥
त्या नांव परम मित्रता । हे खूण तत्त्वतां जाणावी ॥४२॥
मनाने, धनानें व कर्तव्यकर्माने ज्याची निष्कपट वृत्ति असते, त्या वृत्तीचंच नांव खरी मैत्री. हीच खूण खरोखर ध्यानात ठेवावी ४२.
समूळ मैत्रीचें निरूपण । विशद सांगितलें जाण ।
हें सव्विसावें साधुलक्षण । कारुण्यपण तें ऐका ॥४३॥
हें सव्विसावें साधुलक्षण । कारुण्यपण तें ऐका ॥४३॥
अशा प्रकारे मैत्रीचे सारे लक्षण विचारपूर्वक सांगितले. हें साधूचे सविसावे लक्षण. आतां कारुण्यपण ऐक ४३.
प्रत्युपकार न वांछितां । मी कारुणिक हे नाहीं अहंता ।
ऐसेनि दीनदुःख निवारितां । कारुण्य सर्वथा त्या नांव ॥४४॥
ऐसेनि दीनदुःख निवारितां । कारुण्य सर्वथा त्या नांव ॥४४॥
प्रत्युपकाराची इच्छा न ठेवतां व मी मोठा दया करणारा आहे ही अहंता देखील मनांत न बाळगतां दीनजनांचे दुःख निवारण करणे ह्याचंच नांव खरोखर कारुण्य ४४.
रसपूजा धरोनि पोटीं । वैद्य वोखदांच्या सोडी गांठी ।
कां संभावना सूनि दिठी । सांगे गोठी पुराणिक ॥४५॥
कां संभावना सूनि दिठी । सांगे गोठी पुराणिक ॥४५॥
मनामध्ये द्रव्याची आशा ठेवून त्याप्रमाणे वैद्य औषधाच्या गांठी सोडूं लागतो, किंवा संभावनेवर दृष्टि ठेवून पुराणिक जशा गोष्टी सांगू लागतो ४५,
ऐसी वर्तणूक सर्वथा । ते लागली विषयस्वार्था ।
साधूची नव्हे तैशी कथा । नैराश्यता दयाळू ॥४६॥
साधूची नव्हे तैशी कथा । नैराश्यता दयाळू ॥४६॥
त्या प्रकारची वागणूक केवळ विषयाच्या स्वार्थासाठींच चाललेली असते. पण साधूची गोष्ट तशी नाही. तो निरिच्छ असून दयाळू असतो ४६.
दयार्णवें द्रवली दृष्टी । तनु मन धन वेंचूनि गांठी ।
अनाथावरी करुणा मोठी । उद्धरी संकटीं दीनातें ॥४७॥
अनाथावरी करुणा मोठी । उद्धरी संकटीं दीनातें ॥४७॥
दयेच्या समुद्रानेच त्याची दृष्टि भरून गेल्यामुळे तो आपलें तनु-मन-धन खर्च करूनही अनाथावर अत्यंत दया करतो आणि दीनदुबळ्यांना संकटांतून मुक्त करतो ४७.
जैसा कळवळा निजस्वार्था । त्याहून अधिक अनाथभूतां ।
तिये नांव परम कारुणिकता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥४८॥
तिये नांव परम कारुणिकता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥४८॥
त्याला आपल्या स्वार्थाचा जितका कळवळा असतो, त्याहूनही अधिक कळवळा त्याला अनाथ प्राण्यांच्या ठायी असतो. उद्धवा ! खरोखर त्याचंच नांव पूर्ण दया ४८.
हें सत्ताविसावें लक्षण । साधूचें जाण संपूर्ण ।
कविपदाचें व्याख्यान । सावधान अवधारीं ॥४९॥
कविपदाचें व्याख्यान । सावधान अवधारीं ॥४९॥
हे साधूचें सत्ताविसावें संपूर्ण लक्षण होय हें लक्षात ठेव. आतां 'कवि' ह्या शब्दाचे प्रतिपादन नीट लक्ष देऊन ऐक ४९.
वेदशास्त्रांचा मथितार्थ । जाला करतळामळकवत ।
तैसाच ब्रह्मानंदें डुल्लत । कवि निश्चित या नांव ॥१०५०॥
तैसाच ब्रह्मानंदें डुल्लत । कवि निश्चित या नांव ॥१०५०॥
वेदांतील आणि शास्त्रांतील रहस्य ज्याला केवळ करतलामलकवत् झालेले, आणि तसाच जो ब्रह्मानंदांत डुलत राहणारा, त्याचेच नांव खरोखर 'कवि' १०५०.
उपनिषदांचा मथितार्थ । ज्याच्या मुखाची वास पहात ।
परोक्षापरोक्ष ज्याचेनि सत्य । कवि विख्यात त्या नांव ॥५१॥
परोक्षापरोक्ष ज्याचेनि सत्य । कवि विख्यात त्या नांव ॥५१॥
उपनिषदांतील मथितार्थ ज्याच्या मुखाची वाट पहात राहतो, शब्दज्ञान व अनुभवज्ञान हे ज्यामुळे सत्य होते, त्याचंच प्रसिद्ध नांव 'कवि' होय ५१.
कवि या पदाचे व्याख्यानें । झालीं अठ्ठावीस लक्षणें ।
उरलीं दोनी अतिगहनें । तें दों श्लोकीं श्रीकृष्णें आदरिलें सांगों ॥५२॥
उरलीं दोनी अतिगहनें । तें दों श्लोकीं श्रीकृष्णें आदरिलें सांगों ॥५२॥
कवि या शब्दाच्या वर्णनाने अठ्ठावीस लक्षणे पूर्ण झाली. आतां अत्यंत गहन अशी दोन लक्षणे राहिली आहेत, ती पुढील दोन श्लोकांत सांगावी असा श्रीकृष्णांनी विचार केला ५२.
आज्ञायैवं गुणान् दोषान् मयादिष्टानपि स्वकान् ।
धर्मान् सन्त्यज्य यः सर्वान् मां भजेत स तु सत्तमः ॥ ३२ ॥
धर्मान् सन्त्यज्य यः सर्वान् मां भजेत स तु सत्तमः ॥ ३२ ॥
[श्लोक ३२] मी शास्त्रांत सांगितलेल्या धर्मांच्या आचरणातील गुण व उल्लंघनातील दोष जाणूनही भक्तीमध्ये जर ते बाधक असतील, तर त्या सर्व धर्माधर्मांचा त्याग करून जो नेहमी माझ्या भक्तीतच मग्न असतो, तो भक्त श्रेष्ठ होय. (३२)
प्रपंचनगरासभोंवतीं । कर्मनदीची महाख्याती ।
तिचेनि जळें जीव वर्तती । उत्पत्तिस्थिति अरतीरीं ॥५३॥
तिचेनि जळें जीव वर्तती । उत्पत्तिस्थिति अरतीरीं ॥५३॥
प्रपंचनगराच्या सभोंवार कर्माची दुस्तर नदी असल्याचे प्रसिद्धच आहे. तिच्याच पाण्यावर जीव वागत असतात. उत्पत्ति आणि स्थिति ही तिच्या अलीकडच्या तीरावरच होतात ५३.
ते नदीचेनि जीवनमेळें । कर्मासी येती कर्मफळें ।
स्वर्गनरकादि सोहळे । तेणें जळबळें भोगिती ॥५४॥
स्वर्गनरकादि सोहळे । तेणें जळबळें भोगिती ॥५४॥
त्या नदीच्या पाण्यानेच कर्माला कर्मफळे येतात आणि त्या पाण्याच्या जोरानेच स्वर्गनरकादि सोहळे भोगावे लागतात ५४.
प्रपंचनगरींहूनि निघतां । वेगें परमार्थासी येतां ।
जो तो कर्मनदीआंतौता । बुडे सर्वथा निर्बुजला ॥५५॥
जो तो कर्मनदीआंतौता । बुडे सर्वथा निर्बुजला ॥५५॥
प्रपंचाच्या नगरीतून निघून परमार्थाकडे धावत धावत जो जो येऊ लागतो, तो तो कर्मनदीमध्येच गटकळ्या खाऊन बुडून जातो ५५.
एक तरलों ऐसें ज्ञाते म्हणती । तेही कर्मीं कर्मगुचकिया खाती ।
स्वयें बुडोनि आणिकां बुडविती । तरलों म्हणती तोंडाळ ॥५६॥
स्वयें बुडोनि आणिकां बुडविती । तरलों म्हणती तोंडाळ ॥५६॥
कोणी ज्ञाते आपण तरलों असें म्हणतात, पण तेच कर्मामध्ये गटकळ्या खाऊन स्वतः बुडतात, आणि दुसन्यांनाही त्यांत बुडवितात. ते 'तरलों तरलों' अशी रिकामी बडबड मात्र करतात ५६.
ऐसे बुडाले नेणों किती । बुडतां शिकवण तेचि देती ।
कर्मचि उपावो तरणोपायप्राप्ती । म्हणोनि बुडविती सर्वांतें ॥५७॥
कर्मचि उपावो तरणोपायप्राप्ती । म्हणोनि बुडविती सर्वांतें ॥५७॥
असे किती बुडाले त्यांचा पत्ता नाही. पण तेच बुडतांना लोकांना शिकवतात की, तरण्याला उपाय एक कर्मच आहे. असे सांगून सर्वानाच बुडवितात ५७.
'न कर्मणा' हें वेदवचन । कर्मे नव्हे ब्रह्मज्ञान ।
तें न मानिती कर्मठ जन । त्यांसी कर्माभिमान कर्माचा ॥५८॥
तें न मानिती कर्मठ जन । त्यांसी कर्माभिमान कर्माचा ॥५८॥
'न कर्मणा' हें वेदांतील वचन आहे. ह्याचा अर्थ 'कर्माने कांहीं ब्रह्मज्ञान होत नाही' असा आहे. पण कर्मठ लोक ते मान्य करीत नाहीत. कारण, त्यांना कर्माचा अभिमान असतो ५८.
कर्म देहाचे माथां पूर्ण । तो न सांडितां देहाभिमान ।
कर्माचा त्याग नव्हे जाण । कर्मबंधन देहबुद्धी ॥५९॥
कर्माचा त्याग नव्हे जाण । कर्मबंधन देहबुद्धी ॥५९॥
कर्म हे पूर्णपणे देहाच्याच माथ्यावर आहे. तो देहाभिमानच जर सोडला नाही, तर कर्माचा त्याग असा कधीच होणार नाही. पण उलट देहबुद्धीनें कर्मबंधन मात्र प्राप्त होईल ! ५९.
एक अरतीरीं असती नष्ट । तरलों म्हणती अकर्मनिष्ठ ।
स्वकर्मत्यागी कर्मभ्रष्ट । जाण पापिष्ठ पाषांडी ॥१०६०॥
स्वकर्मत्यागी कर्मभ्रष्ट । जाण पापिष्ठ पाषांडी ॥१०६०॥
कित्येक असे नष्ट असतात की, ते कर्मच करीत नाहीत, आणि कर्मनदीच्या अलीकडच्याच तीरावर उभे राहून आपण तरलों असें म्हणतात. असे जे वर्णाश्रमकर्म टाकणारे आहेत, ते कर्मभ्रष्ट होत. ते अत्यंत पाखांडी व पातकी म्हणून समजावें १०६०.
ये कर्मनदीतें तरला । ऐसा न देखों दादुला ।
बुडाल्या धुराचि मुदला । पाडु केतुला इतरांचा ॥६१॥
बुडाल्या धुराचि मुदला । पाडु केतुला इतरांचा ॥६१॥
ह्या कर्मनदीतून तरून गेला असा बहाद्दर एकही कोणी दिसत नाही. मोठे मोठे मी मी म्हणविणारे पुढारीसुद्धा हीत बुडून ठार झाले, मग इतरांचा पाड काय ? ६१.
ये कर्मनदीची उत्पत्ती । मजचिपासोनि निश्चितीं ।
तेही सांगेन तुजप्रती । यथानिगुती निजबोधें ॥६२॥
तेही सांगेन तुजप्रती । यथानिगुती निजबोधें ॥६२॥
ह्या कर्मनदीची उत्पत्ति खरोखर माझ्यापासूनच आहे. तीही आत्मज्ञानाने तुला यथार्थ सांगून देतों ६२.
'आज्ञायैवं' हें मूळींचें मूळ । श्लोकींचें प्रथम पद केवळ ।
येणेंचि कर्मनदी झाली स्थूळ । करूनि विवळ सांगत ॥६३॥
येणेंचि कर्मनदी झाली स्थूळ । करूनि विवळ सांगत ॥६३॥
'आज्ञायैवं' हें मूळ श्लोकांतील मूळचे केवळ पहिले पद आहे. त्यामुळेच ही कर्मनदी फोफावली आहे, ते स्पष्ट करून सांगतों ६३.
मदाज्ञा मेघगंभीरा । निःश्वसितपवनद्वारा ।
चतुर्वेदविधीच्या धारा । अतिअनिवारा वर्षले ॥६४॥
चतुर्वेदविधीच्या धारा । अतिअनिवारा वर्षले ॥६४॥
माझ्या आज्ञारूपी गंभीर मेघांनी माझ्या श्वासोच्छासाच्या वायूच्या योगानें चतुर्वेदविधीच्या धारांचा अत्यंत अनिवार वर्षाव केला ६४.
तेणें कर्मनदीआंतौतें । अनिवार उलथलें भरतें ।
पूर दाटला जेथींचा तेथें । उतार कोणातें कळेना ॥६५॥
पूर दाटला जेथींचा तेथें । उतार कोणातें कळेना ॥६५॥
त्यामुळे कर्मनदीच्या आंत अनिवार भरती उसळली आणि जेथल्या तेथे पूर दाटून राहिला. उतार कोठून आहे हे कोणासच कळेना ६५.
तेथ गुणदोषांचा वळसा । विधिनिषेधांचा धारसा ।
कर्माकर्मांचा आवर्तं कैसा । सबाह्य सरिसा भंवतसे ॥६६॥
कर्माकर्मांचा आवर्तं कैसा । सबाह्य सरिसा भंवतसे ॥६६॥
तेथें गुणदोषांचा वेढा पडून विधिनिषेधांच्या धारेमध्ये कर्माकर्माचा भोंवरा आंत बाहेर सारखा कसा फिरत राहिला आहे पहा ! ६६.
संकल्पविकल्पांचे हुडे । नदी दाटली चहूंकडे ।
तरों जाय तो गुंतोनि बुडे । पाऊल पुढें न घालवे ॥६७॥
तरों जाय तो गुंतोनि बुडे । पाऊल पुढें न घालवे ॥६७॥
संकल्पविकल्पांचे बुरुज मध्ये आड आल्यामुळे ती नदी चहूंकडे अफाट पसरली आहे. तिला जो तरून जावयास पहातो, तो त्या बुरुजांना अडकून बुडून जातो. एक पाऊलही पुढे घालवत नाहीं ६७.
प्रत्यवायाची मगरमिठी । पडल्या सगळेंचि घाली पोटीं ।
उगळोनि न सोडी संकटी । ने उठाउठीं अधोगती ॥६८॥
उगळोनि न सोडी संकटी । ने उठाउठीं अधोगती ॥६८॥
प्रत्यवायाची मगरमिठी पडली म्हणजे मग तर बोलावयासच नको. तो सगळेच गिळून पोटांत घालतो. संकटांतसुद्धा बाहेर सोडीत नाही. हां हां म्हणतां अधोगतीला नेतो ६८.
अंगविकळतेचे मासे । तळपताती घ्यावया आविसें ।
कर्मठतेचे कमठ कैसे । खडक तैसे निबर ॥६९॥
कर्मठतेचे कमठ कैसे । खडक तैसे निबर ॥६९॥
अंगविकळतेचे मासे मांस घेण्याकरितां फिरत असतात. कर्मठपणाचे कासव तर दगडासारखे कठीण ! ६९.
काळविक्षेपसर्पासी । एक सांपडले विलासआळशीं ।
विकल उच्चार चोंढियेसी । एक व्यग्रतेसीं बुडाले ॥१०७०॥
विकल उच्चार चोंढियेसी । एक व्यग्रतेसीं बुडाले ॥१०७०॥
कोणी विलास भोगून आळशी बनलेले असतात, ते काळविक्षेपसांच्या सपाट्यांत सांपडतात. त्यांच्या नाकातोंडांत पाणी गेल्यामुळे तोंडांतून शब्दसुद्धा काढवत नाही. कोणी व्यग्रतेनेच बुडून गेले १०७०.
एक तरावयाच्या आशा । पडिले कर्माच्या धारसां ।
ते विधिनिषेधवळसां । पडिले सहसा नुगंडती ॥७१॥
ते विधिनिषेधवळसां । पडिले सहसा नुगंडती ॥७१॥
कोणी तरून जाण्याच्या आशेनें कर्माच्या धारेतच सांपडतात. ते विधिनिषेधाच्या वळणांत गुंतून बहुधा बाहेरच पडत नाहीत ७१.
एक स्वकर्मधारीं । पडोनि वाहावले दूरी ।
ते सत्यलोकमगरीं । आपुल्या विवरीं सूदले ॥७२॥
ते सत्यलोकमगरीं । आपुल्या विवरीं सूदले ॥७२॥
कोणी स्वकर्माच्या प्रवाहांत सांपडून लांब वहावत जातात. त्यांना सत्यलोकमगरांनी नेऊन आपल्या खबदाडांत टाकले ७२. मगरांनी नेऊन आपल्या खबदाडांत टाकले ७२.
एकां न वचवेचि परतटीं । माझारींचि फळें गोमटीं ।
देखोनि धांविन्नले अव्हाटीं । ते स्वर्गसंकटीं गुंतले ॥७३॥
देखोनि धांविन्नले अव्हाटीं । ते स्वर्गसंकटीं गुंतले ॥७३॥
कोणाला तर पलीकडे जाववतच नाही. ते मध्येच सुंदर फळं पाहून आडमार्गाला धावतात आणि स्वर्गाच्या संकटांत अडकून पडतात ७३.
आम्ही तरों युक्तीबळें । म्हणोनि रिघाले एके वेळे ।
ते अहंकारखळाळें । महातिमिंगिळें गिळिले ॥७४॥
ते अहंकारखळाळें । महातिमिंगिळें गिळिले ॥७४॥
आपण युक्तीच्या बळाने तरून जाणार असें म्हणून जे एकदम निघतात, ते अहंकाररूप खळाळांत पडले म्हणजे देवमासे त्यांना गिळून टाकतात ७४.
एकीं वेदत्रयाची पेटी । दीक्षेची दोरी बांधली पोटीं ।
ते स्वर्गांगनाकुचकपाटीं । गुंतोनि शेवटीं बुडाले ॥७५॥
ते स्वर्गांगनाकुचकपाटीं । गुंतोनि शेवटीं बुडाले ॥७५॥
कोणी तिन्ही वेदांची पेटी दीक्षारूप दोरीने बांधून पोटाखाली घेतात, ते अप्सरांच्या कुचरूपी गुहेमध्ये गुंतून पडून शेवटी बुडतात ७५.
मंत्रतंत्रादिदीक्षितें । गुंतोनि बुडालीं जेथींच्या तेथें ।
कर्मनदीच्या परपारातें । कोणी पावतें दिसेना ॥७६॥
कर्मनदीच्या परपारातें । कोणी पावतें दिसेना ॥७६॥
मंत्रतंत्रांचा खटाटोप करणारे बिचारे दीक्षित तर गुंतून जाऊन जेथल्या तेथेच बुढाले. तात्पर्य कर्मनदीच्या पलीकडच्या तीराला पोचणारे कोणीच दिसत नाहीत ७६.
विरळा कोणीएक सभाग्य येथें । हे सकळ उपाय सांडूनि परते ।
जो अनन्य प्रीतीं भजे मातें । कर्मनदी त्यातें कोरडी ॥७७॥
जो अनन्य प्रीतीं भजे मातें । कर्मनदी त्यातें कोरडी ॥७७॥
येथे असा भाग्यशाली विरळाच. जो कोणी एकादा हे सर्व उपाय एका बाजूस ठेवून अनन्य भक्तीने माझें भजन करतो, त्याला मात्र ही कर्मनदी कोरडी ठणठणीतच होते ७७.
माझे भक्तीचें तारूं नातुडे । जंव सप्रेमाचें शीड न चढे ।
तंव तरणोपाय बापुडे । वृथा कां वेडे शिणताती ॥७८॥
तंव तरणोपाय बापुडे । वृथा कां वेडे शिणताती ॥७८॥
जोपर्यंत माझे भक्तिरूप तारूं सांपडत नाही, व जोपर्यंत प्रेमाचे शीड चढत नाही, तोपर्यंत सर्व प्रकारचे तरणोपाय दुर्बळ होत. मग वेडे लोक व्यर्थ यातायात का करतात ? ७८.
धरूनि अनन्यभक्तीचा मार्गु । करूनि सर्वधर्मकर्मत्यागु ।
हा तरणोपाय चांगु । येरु तो व्यंगु अधःपाती ॥७९॥
हा तरणोपाय चांगु । येरु तो व्यंगु अधःपाती ॥७९॥
अनन्य भक्तीचा मार्ग धरून सर्व धर्मकर्माचा त्याग करणे हाच उत्तम तरणोपाय आहे. इतर कोणताही उपाय दुर्बळ व अधःपातास नेणारा होय ७९.
नेणोनि स्वधर्मकर्मांतें । कां नास्तिक्य मानूनि चित्तें ।
किंवा धरोनियां आळसातें । त्यागी कर्मातें तैसा नव्हे ॥१०८०॥
किंवा धरोनियां आळसातें । त्यागी कर्मातें तैसा नव्हे ॥१०८०॥
आपला धर्म कोणता व कर्म कोणते हे जाणून न घेऊन, किंवा मनानेच नास्तिकपणाचा स्वीकार करून, किंवा आळसाला बळी पडून, कर्मच सोडून देतात, तसा मात्र हा प्रकार नव्हे १०८०.
अथवा शरीरक्लेशाभेण । किंवा सर्वथा उबगोन ।
कां धरोनि ज्ञानाभिमान । स्वकर्म जाण सांडीना ॥८१॥
कां धरोनि ज्ञानाभिमान । स्वकर्म जाण सांडीना ॥८१॥
किंवा शरीराला कैश होतील ह्या भयाने, किंवा केवळ कंटाळाच करून, किंवा ज्ञानाचा अभिमान धरून तो कर्म सोडीत नाही, हे लक्षात ठेव ८१.
माझी वेदरूप आज्ञा शुद्ध । ते वेदविवंचना विशद ।
स्वधर्मकर्मांचे कर्मवाद । अतिअविरुद्ध जाणता ॥८२॥
स्वधर्मकर्मांचे कर्मवाद । अतिअविरुद्ध जाणता ॥८२॥
माझी वेदरूप आज्ञा अत्यंत पवित्र आहे. त्या वेदांचा सविस्तर विचार करून स्वधर्मकर्माचे जे अत्यंत अविरुद्ध कर्मवाद आहेत, ते जाणणारा ८२,
स्वधर्माचा उत्तम गुण । प्रत्यवायें अधःपतन ।
या दोहींतें जाणोन । मद्भक्तीसी प्राण विकिला ॥८३॥
या दोहींतें जाणोन । मद्भक्तीसी प्राण विकिला ॥८३॥
आणि स्वधर्माचा गुण अत्यंत उत्तम आहे व याच्यांत बिघाड झाल्याने अधःपतन घडते ही दोन्ही लक्षात आणून माझ्या भक्तीला प्राण विकलेला ८३;
विसरोनि आन आठवण । अखंडता हरिस्मरण ।
त्या नांव भक्तीसी विकिला प्राण । इतर भजन आनुमानिक ॥८४॥
त्या नांव भक्तीसी विकिला प्राण । इतर भजन आनुमानिक ॥८४॥
असा भक्त दुसरी कोणतीच आठवण न ठेवता अखंड हरीचेंच स्मरण करतो. त्याचेच नांव भक्तीला प्राण विकणे होय. इतर जे भजन ते केवळ आनुमानिक ८४.
माझेनि भजनप्रेमेंजाण । विसरला कर्माची आठवण ।
कर्म बापुडें रंक कोण । बाधक जाण नव्हे भक्तां ॥८५॥
कर्म बापुडें रंक कोण । बाधक जाण नव्हे भक्तां ॥८५॥
माझ्या भजनाच्या प्रेमापुढे कर्माची आठवणसुद्धा तो विसरून जातो. दरिद्री कर्म तें विचारें कोण ? ते भक्तांना बाधक होत नाही ८५.
सप्रेम करितां भजनविधी । सर्व कर्मांतें विसरली बुद्धी ।
ते जाणावी भजनसमाधी । तेथ कर्म त्रिशुद्धी बाधेना ॥८६॥
ते जाणावी भजनसमाधी । तेथ कर्म त्रिशुद्धी बाधेना ॥८६॥
माझ्या प्रेमळ भजनामध्ये रंगून गेले असतां तो सान्या कर्माना विसरून जातो. तीच भजनाची समाधि आहे असे समजावे. तेथें खरोखर कर्म बाधत नाही ८६.
ज्याची श्रद्धा कर्मावरी । तोचि कर्माचा अधिकारी ।
ज्याची श्रद्धा श्रीधरीं । तो नव्हे अधिकारी कर्माचा ॥८७॥
ज्याची श्रद्धा श्रीधरीं । तो नव्हे अधिकारी कर्माचा ॥८७॥
ज्याची कर्मावर श्रद्धा असते, तोच कर्माचा अधिकारी असतो. आणि ज्याची श्रद्धा श्रीकृष्णावरच असते, तो कर्माचा अधिकारी होत नाही ८७.
जो जीवेंप्राणें भक्तीसी विकिला । तो तेव्हांचि कर्मावेगळा जाला ।
त्याच्या भावार्था मी विकिला । तो कर्मीं बांधला केवीं जाये ॥८८॥
त्याच्या भावार्था मी विकिला । तो कर्मीं बांधला केवीं जाये ॥८८॥
जो जिवाभावाने भक्तीलाच विकलेला असतो, तो त्याच वेळी कर्मापासून वेगळा झाला असे समजावे. त्याच्या भावार्थाला मी विकला जातों, मग तो कर्माने कसा बद्ध होणार ? ८८.
गुणदोषांची जननी । ते निःशेष अविद्या निरसूनी ।
जो प्रवर्तला माझे भजनीं । तो साधु मी मानीं मस्तकीं ॥८९॥
जो प्रवर्तला माझे भजनीं । तो साधु मी मानीं मस्तकीं ॥८९॥
गुणदोषांची केवळ माताच अशी जी अविद्या, तीच ज्याने निखालस निरसून टाकली, आणि जो माझ्या भजनांतच निमग्न झाला, तो साधु मी शिरसावंद्य करतों ८९.
निजकल्पना जे देहीं । तेचि मुख्यत्वें अविद्या पाहीं ।
ते कल्पना निमालिया ठायीं । जगीं अविद्या नाहीं निश्चित ॥१०९०॥
ते कल्पना निमालिया ठायीं । जगीं अविद्या नाहीं निश्चित ॥१०९०॥
देहामध्ये आत्मभावनेची जी कल्पना, तीच मुख्यत्वेकरून अविद्या म्हणून समजावें. ती कल्पनाच जागच्या जागी जिरून गेली, की मग खरोखर जगामध्ये अविद्या नाहींशीच होते १०९०.
अविद्येच्या त्यागासवें । धर्माधर्मादि आघवें ।
न त्यजितांचि स्वभावें । त्याग फावे अनायासें ॥९१॥
न त्यजितांचि स्वभावें । त्याग फावे अनायासें ॥९१॥
अविद्येचा त्याग झाला, की त्याच्याबरोबर धर्म-अधर्मादिक सर्व जरी टाकली नाहीत, तरी त्यांचाही आपोआपच त्याग होत असतो ९१.
शिर तुटलियापाठीं । शरीर निजकर्मासी नुठी ।
तेवीं अविद्या त्यागितां शेवटीं । त्यजिले उठाउठीं सर्व धर्म ॥९२॥
तेवीं अविद्या त्यागितां शेवटीं । त्यजिले उठाउठीं सर्व धर्म ॥९२॥
मस्तक तुटून गेले म्हणजे मग शरीर कांहीं आपलें कर्म करावयाला उठत नाही. त्याप्रमाणे अविद्येचा त्याग केला म्हणजे शेवटी हां हां म्हणतां सर्व धर्माचा त्याग झालाच ९२.
दिवसा चंद्रउदयो पाहे । तो झाला तैसा नाहीं होये ।
तेवीं अविद्येचेनि विलयें । सर्व धर्म लाहे ते दशा ॥९३॥
तेवीं अविद्येचेनि विलयें । सर्व धर्म लाहे ते दशा ॥९३॥
हे पहा ! दिवसा चंद्रोदय झालेला पाहिला, तरी तो प्रत्यक्ष झालेला असून न झाल्यासारखाच असतो. त्याप्रमाणे अविद्या लयास गेली म्हणजे धर्माच्या सर्व प्रकारांना तीच दशा प्राप्त होते ९३.
खद्योत सूर्योदयापाठीं । शोधूनि पाहतां न ये दिठीं ।
तेवीं अविद्येच्या शेवटीं । धर्माधर्मकोटी मावळल्या ॥९४॥
तेवीं अविद्येच्या शेवटीं । धर्माधर्मकोटी मावळल्या ॥९४॥
सूर्योदय झाल्यानंतर काजव्याला शोधून पाहिले तरी तो दृष्टीस पडत नाही. त्याप्रमाणे अविद्येचा नाश झाल्यावर धर्माधर्माच्या झुंडीही मावळून जातात ९४.
ग्रहगण नक्षत्रमाळा । खद्योततेजउमाळा ।
रात्रीसकट बोळवण सकळां । तेवीं धर्माधर्मकळा अविद्येसवें ॥९५॥
रात्रीसकट बोळवण सकळां । तेवीं धर्माधर्मकळा अविद्येसवें ॥९५॥
नवग्रहांचा समुदाय, नक्षत्रांच्या पंक्ति, काजव्याच्या तेजाची चमक, या सर्वांची रात्रीबरोबरच बोळवण होते. त्याप्रमाणे अविद्येबरोबरच धर्माधर्मांच्या कळाही नाहीशा होतात ९५.
सर्व धर्मत्यागाची खूण । उद्धवा मुख्यत्वें हेचि जाण ।
याहीवरी माझें भजन । मुख्य भागवतपण या नांव ॥९६॥
याहीवरी माझें भजन । मुख्य भागवतपण या नांव ॥९६॥
उद्धवा ! सर्व धर्मत्यागाची मुख्य खूण हीच आहे हे लक्षात ठेव. ह्याशिवाय आणखी वर माझे भजन. ह्याचंच नांव मुख्य भागवतपणा ९६.
म्हणसी अविद्याचि केवीं नासे । मा अधर्म नासती तीसरिसे ।
ते अविद्या नाशे अनायासें । भक्तिउल्हासें माझेनि ॥९७॥
ते अविद्या नाशे अनायासें । भक्तिउल्हासें माझेनि ॥९७॥
परंतु तूं म्हणशील की, अविद्याच कशी नाश पावणार ? मग तिच्याबरोबर अधर्म नाश पावतील. पण बाबा ! ती अविद्या माझ्या भक्तीच्या वृद्धीने अनायासेंच नाश पावते ९७.
सूर्योदय देखतां दृष्टीं । सचंद्र नक्षत्रांची मावळे सृष्टी ।
तेवीं माझ्या भक्तिउल्हासापाठीं । अविद्या उठाउठीं निमाली ॥९८॥
तेवीं माझ्या भक्तिउल्हासापाठीं । अविद्या उठाउठीं निमाली ॥९८॥
सूर्योदय झालेला दृष्टीस पडला, की चंद्रासहवर्तमान नक्षत्रांची सर्व शोभा लुप्त होऊन जाते, त्याप्रमाणे माझ्या भक्तीचा विकास झाला की अविद्या हां हां म्हणतां नाहीशी होऊन जाते ९८.
अविद्येच्या नाशासवें । नासती धर्माधर्म आघवे ।
जेवीं गरोदर मारितां जीवें । गर्भही तीसवें निमाला ॥९९॥
जेवीं गरोदर मारितां जीवें । गर्भही तीसवें निमाला ॥९९॥
अविद्येचा नाश झाला की सर्व धर्माधर्माचाही नाश होतो. ज्याप्रमाणे गर्भिणीला ठार मारली असता तिच्याबरोबर तो गर्भही ठार होतो ९९.
जेव्हां माझे भक्तीचा उल्हासू । तेव्हांचि अविद्येचा निरासू ।
अविद्ये सवें होय नाशू । अनायासू सर्व धर्मां ॥११००॥
अविद्ये सवें होय नाशू । अनायासू सर्व धर्मां ॥११००॥
माझ्या भक्तीचा विकास झाला की तत्काल अविद्येचा नाश झाला म्हणून समजावें. अविद्येचा नाश झाला की सर्व धर्माचाही अनायासेंच नाश होतो ११००.
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १ ते १००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १0१ ते २००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या २०१ ते ३००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ३०१ ते ४००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ४०१ ते ५००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ५०१ ते ६००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ६०१ ते ७००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ७०१ ते ८००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ८०१ ते ९००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ९०१ ते १०००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १००१ ते ११००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ११०१ ते १२००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १२०१ ते १३००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १३०१ ते १४००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १४०१ ते १५००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १५०१ ते १५८१
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...