मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ९०१ ते १००४

    तें देह माझें म्हणोनि तत्त्वतां । अभिमानें घेऊनि माथां ।

    जन्ममरणादि आवर्तां । सुखदुःखभोक्ता स्वयें होय ॥ १ ॥
    तो देह खरोखर माझा असें म्हणून अभिमानाने मस्तकावर घेऊन जन्ममरणादिक भोवऱ्यात  सुखदुःखांचा स्वत:च भोक्ता होतो १. 


    येणेंचि विवेकें निजज्ञानी । प्राप्ततत्त्व गुरुवचनीं ।
    ते वर्ततांही जनींवनीं । देहाभिमानी कदा नव्हती ॥ २ ॥
    ह्याच विचाराने जे आत्मज्ञानी असतात त्यांना गुरूपदेशाने पूर्णपणे तत्त्वज्ञान ठसलेले असल्यामुळे ते जनांत किंवा वनांत कोठेही राहिले असतां कधीही देहाभिमानी होत नाहींत २.


    ऐसे प्रबुद्ध जे आत्मप्रतीतीं । त्यांसी प्रारब्धाचिये निजगती ।
    नाना सुखदुःखें देतां भूतीं । आत्मस्थिती ढळेना ॥ ३ ॥
    असे जे आत्मस्वरूपाच्या अनुभवाने शहाणे झालेले पुरुष असतात, त्यांना प्रारब्धाच्या गतीने प्राणिमात्रांनी अनेक प्रकारची सुखदुःखें दिली असा त्यांची आत्मस्वरूपस्थिति ढळत नाही ३.


    त्यांसी द्वेष नुपजे भूतीं । कोप सर्वथा न ये चित्तीं ।
    मी एक त्रिजगतीं । जाणोनि निश्चितीं निर्द्वंद्व ॥ ४ ॥
    त्यांना प्राणिमात्राच्या ठिकाणी द्वेष उत्पन्न होत नाही व त्यांच्या मनांत मुळीच राग येत नाही. त्रिभुवनामध्ये मीच एक भरलेला आहे असे समजून ते निश्चितपणे द्वंद्वरहित असतात ४.


    तो देखोनियां विषमासी । भय न धरी मानसीं ।
    पारकें न म्हणे कोणासी । आप्त सर्वांसी निजात्मा ॥ ५ ॥
    असा मनुष्य संकट पाहून मनामध्ये भय धरीत नाही, आणि कोणाला परकी असे समजत नाही.  सर्वच आत्मस्वरूप असल्याने तो सर्वांबरोबर आप्तपणानेच असतो ५.


    समविषमभाव ना भेद । ज्ञाता सर्वरूपें अभेद ।
    तो न मानीं कोणाचा भयखेद । सुखस्वानंद सर्वदा ॥ ६ ॥
    ज्ञाता हा सर्वस्वी भेदरहित असतो. त्याला समविषमभाव व भेद हे असत नाहीत. तो कोणाचें भयही मानीत नाही व कोणाचा खेदही करीत नाही. तो सदोदित सुखांत आणि आत्मानंदांतच निमग्न असतो ६.


    निंदाउपद्रव अनुद्विग्न । साहोनियां सुखसंपन्न ।
    हें सिद्धाचें मुख्य लक्षण । तेंचि साधन साधकां ॥ ७ ॥
    निंदा किंवा उपद्रव झाला तरी उद्विग्न न होतां सर्व सहन करून सुख प्राप्त झाल्याप्रमाणे राहावयाचे, हेच सिद्धाचे मुख्य लक्षण होय, आणि साधकांना साधनही तेच होय ७.


    एतां स आस्थाय परात्मनिष्ठां अध्यासितां पूर्वतमैर्महर्षिभिः ।
    अहं तरिष्यामि दुरन्तपारं तमो मुकुन्दाङ्घ्रिनिषेवयैव ॥ ५८ ॥
    [श्लोक ५८] प्राचीन महर्षींनी यापूर्वी ज्या परमात्मनिष्ठेचा आश्रय घेतला होता, तिचाच आश्रय घेऊन मी भगवंतांच्या चरणकलांच्या सेवेनेच हा अज्ञानरूपी अगाध संसार पार करून जाईन. (५८)


    माझ्या पूर्वापरभाग्योदयें । अद्वैतात्मनिष्ठा उपजलीं पाहें ।
    जे निष्ठेचेनि समवायें । नाना दुःखें साहें निर्द्वंद्व ॥ ८ ॥
    हे पाहा ! माझ्या पूर्वपुण्याच्या भाग्योदयाने अद्वैतस्वरूप आत्मनिष्ठा माझ्या ठिकाणी उत्पन्न झाली. त्या आत्मनिष्ठेच्याच आश्रयाने मी द्वंद्वरहित होऊन अनेक प्रकारची दुःखें सहन करीत आहे ८.


    द्वंद्वसुखदुःखसहिष्णुपण । हें सिद्धाचें सहज लक्षण ।
    माझें मुख्यत्वें हेंचि साधन । मनोजयो जाण येणें होये ॥ ९ ॥
    भेदभावापासून होणारी सुखदुःखें सहन करण्याचा गुण हेच सिद्धांचे स्वाभाविक लक्षण आहे. माझें मुख्यतः हेच साधन आहे. याच्याच योगाने मनोजय होतो ९.


    हेंचि परमार्थसाधन वरिष्ठा । हेचि महाऋषींची निजनिष्ठा ।
    हेंचि निजभजन वैकुंठा । निजात्मनिष्ठा येणें साधे ॥ ९१० ॥
    हेंच परमार्थाचें श्रेष्ठ साधन होय. मोठमोठ्या ऋषींची हीच आत्मनिष्ठा होय. विष्णूचें मुख्य भजन ते हेच होय. याच्या योगानेच आत्मनिष्ठा साध्य होते ९१०.


    येणें न बाधे द्वंद्वदुःख । येणें पाविजे नित्यसुख ।
    दुस्तर संसारतारक । हा निजविवेक आम्हांसी ॥ ११ ॥
    ह्याच्या योगाने द्वद्वांपासून होणारे दुःख बाधत नाही. ह्याच्याच योगाने नित्य सुख प्राप्त होते. हाच आत्मविवेक आम्हांला दुस्तर संसारांतून तारणारा आहे ११.


    दुस्तर तरावया भवसागरू । हा विवेकू सुकल्प तारूं ।
    एथ सद्गुरू कर्णधारू । परात्परपारू पाववी ॥ १२ ॥
    संसारसमुद्र तरून जावयाला फार कठीण आहे, तरी तो तरून जाण्याला आत्मविवेक हे उत्तम तारूं आहे. त्यांतील सद्गुरु हा सुकाणूंवाला मायेच्या पैलतीराला पोचवितो १२.


    हा विवेक कैसेनि ये हाता । हेही करणें न लगे चिंता ।
    निजभावें एकाग्रता । शरण भगवंता रिघावें ॥ १३ ॥
    हा आत्मविवेक हाती कसा येईल ? ही देखील चिंता करावयास नको. आत्मभावनेने एकाग्रता करून भगवंताला शरण जावें १३.


    सांडोनि लौकिकाचे लाजे । सांडोनि अभिमानाचें ओझें ।
    भगवंता शरण रिघिजे । तैं लाहिजे विवेक ॥ १४ ॥
    लौकिकाची लाज सोडून व अभिमानाचे ओझें फेंकून देऊन भगवंताला शरण जावें, तेव्हां आत्मविवेक प्राप्त होतो १४.


    तानें बाळ जेवीं जननीसी । अनन्य शरण सर्वभावेंसीं ।
    ऐशिया अनन्यता अहर्निशीं । शरण हरिसी रिघावें ॥ १५ ॥
    ज्याप्रमाणे तान्हें मूल आईला सर्वतोपरी अनन्यभावाने शरण जाते, तशा अनन्यभावाने रात्रंदिवस श्रीहरीला शरण जावें १५.


    हरीसी रिघालिया शरण । मुख न दाखवी जन्ममरण ।
    तेथ बाधूं शके द्वंद्व कोण । हरि रक्षण निजभक्तां ॥ १६ ॥
    हरीला शरण गेले असतां जन्ममरण तोंडसुद्धा दाखवीत नाही. हरीच आपल्या भक्तांना रक्षण करणारा असल्यामुळे तेथे कोणते द्वंद्व पीडा देऊ शकेल ? १६.


    मोक्षदाता मुकुंद पूर्ण । त्यासी कैसें रिघावें शरण ।
    तो अनंतत्वें निजनिर्गुण । तेथ कोण पावेल ॥ १७ ॥
    श्रीहरि हाच पूर्णपणे मोक्षदाता आहे. त्याला शरण कसे जावें ? तो अनंतस्वरूप असूनही स्वतः निर्गुण आहे. तेथे कोण जाणार ? १७.


    असो हरिरूप अतिनिर्गुण । त्याची मूर्ति चिंतितां सगुण ।
    ध्यानीं स्थिरावल्या संपूर्ण । द्वंद्वदुःखें जाण हारपती ॥ १८ ॥
    परंतु हरीचे स्वरूप अत्यंत निर्गुण असले तरी त्याच्या सगुण मूर्तीचे चिंतन केले असता तीच सर्व मूर्ति जरी ध्यानात ठसली, तरी देखील द्वंद्वापासून होणारी सर्व दुःखें लयास जातात म्हणून समजावें १८.


    ध्यानीं मूर्ति न ये संपूर्ण । तैं दृढ धरावे हरीचे चरण ।
    तेणें उठोनि पळे जन्ममरण । आपभयें आपण पळती द्वंद्वें ॥ १९ ॥
    श्रीहरीची संपूर्ण मूर्ति ध्यानात न भरेल, तर श्रीहरीचे पायच नीट ध्यानांत धरावेत, म्हणजे तेणेकरून जन्ममरण उठून पळून जाते आणि भेदाभेदही आपल्याच भयाने स्वतः पळून जातात १९.


    जैं न धरवती दृढ चरण । तैं करावें नामस्मरण ।
    ज्याचेनि नाममात्रें जाण । यम काळ पूर्ण कांपती ॥ ९२० ॥
    जर ते पायही ध्यानात नीट धरवले नाहीत, तर नास्ममरण करावें. ज्याच्या नामस्मरणाने यम आणि काळ हे पूर्णपणे थरथर कांपतात ९२०.


    जेथ हरिनामाचा नित्य घोख । तेथ मरणा मरण आलें देख ।
    जन्माचें होय काळें मुख । लाजोनि निःशेख तें पळे ॥ २१ ॥
    जेथें हरिनामाचा नित्य घोष चालतो, तेथे मरणालाच मरण आले असे समजा. जन्माचे तोंड काळे  ठिक्कर  होते, आणि तें लाजून पार पळून जातें २१.


    रामनामाच्या गजरापुढें । काइसें द्वंद्वदुःख बापुडें ।
    अवघें भवभयचि उडे । नामपवाडे गर्जतां ॥ २२ ॥
    रामनामाच्या गजरापुढे भेदाभेदाचे दु:ख ते बिचारे किती? नाममाहात्म्याची गर्जना करीत असतां संसाराचे सर्व भयच उडून जातें २२.


    अखंड नामें गर्जे वाणी । त्याचे बोलांमाजीं चक्रपाणी ।
    तेथ ऋद्धिसिद्धि वाहे पाणी । मुक्ती आंदणी तयाची ॥ २३ ॥
    ज्याची वाणी निरंतर नामाची गर्जना करीत असते, त्याच्या शब्दांमध्येच श्रीहरीची वस्ती असते. त्याच्या घरी ऋद्धि सिद्धि पाणी भरतात. मुक्ति त्याची दासी होऊन राहते २३.


    निर्विकल्प भावार्थें आपण । सगुण निर्गुण कां नामस्मरण ।
    भक्त भावार्थें आदरी जाण । तें तें होय पूर्ण सद्भावेंचि ॥ २४ ॥
    स्वतः विकल्परहित अशा शुद्ध भक्तिभावाने सगुण ध्यान, निर्गुण चिंतन किंवा नामस्मरण यांपैकी भक्तीने जे काय भक्त आदरपूर्वक स्वीकारील ते ते सद्भक्तीनेच परिपूर्ण होतें २४.


    भावार्थें जे भगवत्प्रीती । तेचि जाणावी साचार भक्ती ।
    भावें तुष्टला श्रीपती । दे निजशांती साधकां ॥ २५ ॥
    भक्तीनें जी भगवंतावर प्रीति करणे तीच खरी भक्ति समजावी. भक्तीनेच श्रीहरि सुप्रसन्न होऊन साधकांना आत्मशांति देत असतो २५.


    ते निजशांतीच्या पोटीं । हरपती द्वंद्वतुःखकोटी ।
    परमानंदें कोंदे सृष्टी । मी तूं दृष्टीं दिसेना ॥ २६ ॥
    त्या आत्मशांतीच्या पोटांतच कोट्यवधि द्वंद्वांची दुःखे पार नाहीशी होतात. सर्व सृष्टि परमानंदाने भरली जाऊन 'मी' ' तूं ' हे दृष्टीला दिसतच नाही २६.


    ऐसेनि अभेदभावें जाण । सेवितां मुकुंदश्रीचरण ।
    मी आपणिया आपण । तारीन जाण निश्चित ॥ २७ ॥
    अशा अभेदभावाने श्रीहरीच्या चरणांची सेवा केली असता मी स्वतांच मला खरोखर तारीन २७.


    तारीन म्हणतां उधारू । बोलीं दिसताहे उशिरू ।
    जो झाला हरिचा डिंगरू । त्यासी संसारू असेना ॥ २८ ॥
    'तारीन' असा उधारपणाचा भविष्यकालीन शब्द उच्चारला असतां या बोलण्यांत तरावयास उशीर लागेल असा अर्थ दिसतो. पण वस्तुतः जो श्रीहरीचा भक्त झाला, त्याला संसार असतच नाही २८.


    ऐशी भिक्षूनें गाइली गाथा । ते अत्यंत रुचली श्रीकृष्णनाथा ।
    हरिखे ओसंडोनि चित्ता । उद्धवाचा माथा थापटी ॥ २९ ॥
    अशा प्रकारें भिक्षूनें जी गाथा गाइली, ती श्रीकृष्णाला फारच आवडली. तेव्हां अंत:करणांत आनंदाने भरून जाऊन त्याने उद्धवाचे मस्तक थोपटले २९.


    ऐशी जे हे निजशांती । माझ्या उद्धवासी व्हावी प्राप्ती ।
    ऐसा कळवळोनि श्रीपती । काय उद्धवाप्रती बोलिला ॥ ९३० ॥
    अशी जी ही आत्मशांति आहे, ती माझ्या उद्धवाला प्राप्त व्हावी असा मनामध्ये कळवळा उत्पन्न होऊन श्रीकृष्ण उद्धवाला काय म्हणाले ? ९३०.


    श्रीभगवानुवाच-
    निर्विद्य नष्टद्रविणो गतक्लमः प्रव्रज्य गां पर्यटमान इत्थम् ।
    निराकृतोऽसद्भिरपि स्वधर्माद् अकम्पितोऽमुं मुनिराह गाथाम् ॥ ५९ ॥
    [श्लोक ५९] प्राचीन महर्षींनी यापूर्वी ज्या परमात्मनिष्ठेचा आश्रय घेतला होता, तिचाच आश्रय घेऊन मी भगवंतांच्या चरणकलांच्या सेवेनेच हा अज्ञानरूपी अगाध संसार पार करून जाईन. (५८)


    ज्याचे निःश्वासीं जन्मले वेद । ज्याचेनि चरणीं गंगा प्रसिद्ध ।
    ज्याचें नाम छेदी भवबंध । तो उद्धवासी गोविंद स्वमुखें बोले ॥ ३१ ॥
    ज्याच्या निःश्वासाने वेद निर्माण झाले, ज्याच्या चरणांपासून प्रसिद्ध गंगा उत्पन्न झाली, ज्याचें नाम संसाराचा बंध तोडून टाकतें, तो श्रीकृष्ण स्वत:च्या मुखाने उद्धवाला सांगू लागला ३१.


    यालागीं उद्धवाचे भाग्य थोर । ज्यासी तुष्टोनि शार्ङ्गधर ।
    दाखवी निजशांतीचें घर । निरंतर वस्तीसी ॥ ३२ ॥
    म्हणून उद्धवाचें भाग्य फार थोर म्हटले पाहिजे. ज्याच्यावर श्रीकृष्ण संतुष्ट होऊन निरंतर राहण्यासाठी आत्मशांतीचे मंदिर दाखविता झाला ३२.


    उद्धवा ऐक सावधान । धनलोभ्याचें नासोनि धन ।
    तो धननाशु झाला प्रसन्न । केला विवेकसंपन्न वैरागी ॥ ३३ ॥
    उद्धवा! नीट लक्ष देऊन ऐक. धनलोभ्याचें धन नाहीसे होऊन तो धननाशच त्या धनलोभ्यावर प्रसन्न झाला, आणि त्याला विवेकसंपन्न वैरागी केलें ३३.


    जो धनलोभी न खाता । ज्याचें नांव न घेती सर्वथा ।
    तोचि वैराग्यें केला सरता । माझे मुखीं कथा तयाची ॥ ३४ ॥
    जो धनलोभी पोटालाही पुरेसे खात नव्हता, ज्याचे कोणी मुळीच नावसुद्धा घेत नव्हते, तोच वैराग्याने सर्वश्रेष्ठ करून सोडला. त्याची गोष्ट नेहमी माझ्या मुखांत असते ३४.


    त्याचें नाम माझे मुखीं जाण । त्याचें कर्म वर्णी मी आपण ।
    तो मज पढियंता जाण । जो विवेकसंपन्न वैरागी ॥ ३५ ॥
    त्याचे नांव माझ्या तोंडात असते. त्याच्या कृतीचे मी स्वतः वर्णन करतो. जो विवेकसंपन्न वैरागी असतो, तो माझा फार आवडता असतो ३५.


    वैराग्यपरतें भाग्य थोर । जगीं नाहीं आन सधर ।
    विवेकवैराग्यें जो साचार । तो माझें जिव्हार उद्धवा ॥ ३६ ॥
    वैराग्यापेक्षा थोर असें भाग्य जगामध्ये दुसरे काहीच नाही. उद्धवा! जो खरोखर विवेकाने व वैराग्याने युक्त असतो, तो माझा जीव की प्राण आहे ३६.


    जो विवेकवैराग्यें आथिला । तो जाण मजमाजीं आला ।
    मी अधीन त्याचिय बोला । तो मज विकला । सर्वस्वें ॥ ३७ ॥
    विवेकाने आणि वैराग्याने जो संपन्न झाला तो माझ्यामध्येच आला म्हणून समज. मी त्याच्या शब्दांना वश झालेला असतो, आणि तोही मला सर्वस्वी विकलेला असतो ३७.


    लोभ्याचें निःशेष गेलें धन । धनासवें गेले मानाभिमान ।
    अभिमानासवें जाण । गेलें द्वंद्व दारुण सुखदुःख ॥ ३८ ॥
    लोभ्याचे सर्व द्रव्य गेलें, द्रव्याबरोबर मान अभिमान गेले, आणि त्या अभिमानाबरोबरच द्वंद्वापासून होणारें भयंकर सुखदुःख गेले ३८.


    धन जातां झाली विरक्ती । तेणें नेमस्त झाला यती ।
    भिक्षार्थ हिंडता क्षितीं । दुर्जनीं दुरुक्तीं निर्भर्त्सिला ॥ ३९ ॥
    द्रव्य जातांच विरक्ति उत्पन्न झाली, त्यामुळे तो नियमनिष्ट संन्यासी बनला; आणि भिक्षेकरितां पृथ्वीवर हिंडतां हिंडतां दुष्ट लोकांनी दुर्भाषणांनी त्याची निर्भत्सना केली ३९.


    पीडितां नाना विकारीं । उपद्रवितां नानापरी ।
    न डंडळीच निज निर्धारीं । स्वधर्मधैर्य करी निर्द्वंद्व ॥ ९४० ॥
    अनेक प्रकारच्या विकारांनी पीडा दिली असतां, किंवा नानाप्रकारांनी उपद्रव दिला असतां आपल्या दृढनिश्चयापासून तो ढळला नाही. त्याला स्वधर्माच्या धैर्याने पूर्ण अभेदस्वरूप केले होते ९४०.


    संन्याशाचा स्वधर्म पूर्ण । मी देहातीत नारायण ।
    साचार हरविला देहाभिमान । यालागीं जाण न डंडळी ॥ ४१ ॥
    संन्याशाचा पूर्ण स्वधर्म हाच की, मी देहाहुन भिन्न असून नारायणस्वरूप आहे अशा ज्ञानाने त्याने खरोखर देहाभिमान टाकलेला असतो. म्हणूनच तो आत्मस्वरूपापासून ढळत नाही ४१.


    जेवीं छायेसी लागतां घावो । पुरुषासी नाहीं भयसंदेहो ।
    तेवीं दुर्जनीं दंडिता देहो । नाहीं दुःखभेवो निरहंकार ॥ ४२ ॥
    ज्याप्रमाणे छायेवर घाव बसला असता त्या पुरुषाला भयाचा संशयसुद्धा नसतो, त्याप्रमाणे दुर्जनांनी देहाला ताडण केले असतां निरहंकार असणाऱ्याला दुःख आणि भय ही प्राप्त होत नाहीत ४२.


    देहासी होतां नाना व्यथा । आपुली जे देहातीतता ।
    तेचि भिक्षूनें गायिली गाथा । ते तुज म्यां आतां निरूपिली ॥ ४३ ॥
    देहाला नानाप्रकारच्या पीडा झाल्या असतां आपली जी देहातीत स्थिति झाली, तीच गाथा त्या भिक्षुनें गायन केली, आणि ती आता मी तुला सांगितली ४३.


    येथ सुखदुःखांसी कारण । आपला भ्रम आपणा जाण ।
    येचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४४ ॥
    ह्यांत आपल्या सुखदुःखांना कारण आपला भ्रम होय असे समज. ह्याच अर्थाचे निरूपण स्वतः श्रीकृष्ण सांगतो ४४.


    सुखदुःखप्रदो नान्यःपुरुषस्यात्मविभ्रमः ।
    मित्रोदासीनरिपवः संसारस्तमसः कृतः ॥ ६० ॥
    [श्लोक ६०] मनुष्याला या जगात दुसरा कोणीही सुख किंवा दुःख देत नाही दुसरा दुःख देतो, हा त्याच्या चित्ताचा केवळ भ्रम आहे हे सगळे जग आणि यातील मित्र, उदासीन आणि शत्रू हे भेद अज्ञानाने कल्पिलेले आहेत. (६०)


    आविद्यक जें निजअज्ञान । तेथें मनपणें उठी मन ।
    मनें भेद करूनियां पूर्ण । सुखदुःखें जाण भोगावी ॥ ४५ ॥
    अविद्यात्मक जें आपलें अज्ञान, त्यांत मनाच्या स्वरूपाने मनच उत्पन्न होते आणि त्या मनानेच पूर्ण भेद उत्पन्न करून ते सुखदुःखें भोगावयास लाविते ४५.


    आत्मा केवळ भेदशून्य । तेथ शत्रु मित्र उदासीन ।
    मनें कल्पूनियां जाण । मन संपूर्ण स्वयें चाळी ॥ ४६ ॥
    आत्मा केवळ भेदरहित आहे. त्यांत शत्रु, मित्र, उदासीन असे भेद मनानेच कल्पून ते सर्व मनच स्वतः चाळवितें ४६.


    ऐसें भेदीं ठसावलें मन । तेंचि पुरुषाचें अज्ञान ।
    तेणें द्वंद्वदुःखेंसीं जाण । संसार दारुण सभ्रांता ॥ ४७ ॥
    अशा रीतीने भेदामध्ये मन गुंतून राहणें तेंच पुरुषाचे अज्ञान होय. अशा भ्रांत झालेल्या मनुष्याला त्या द्वंद्वदुःखाने संसार भयदायक होतो ४७.


    मन सुखदुःखांसी कारण । मनःकल्पित संसार जाण ।
    त्या मनाचें निग्रहण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४८ ॥
    मन हेच सुखदुःखाला कारण आहे आणि संसार हाही मनःकल्पितच आहे हे लक्षात ठेव. त्या मनाचा निग्रह कसा करावा ते स्वतःच श्रीकृष्ण सांगतो ४८.


    तस्मात्सर्वात्मना तात निगृहाण मनो धिया ।
    मय्यावेशितया युक्त एतवान् योगसंग्रहः ॥ ६१ ॥
    [श्लोक ६१] म्हणून बाबा रे ! माझ्यामध्ये एकरूप केलेल्या बुद्धीने मनाला सर्व प्रकारे ताब्यात ठेव बस्स ! सर्व योगसाधनेचे हेच सार आहे. (६१)


    जो नासूं पाहे संसारदुःख । तेणें मन नेमावें आवश्यक ।
    मनावेगळें दुःखदायक । नाहीं आणिक त्रिलोकीं ॥ ४९ ॥
    ज्याला संसाराचे दु:ख नष्ट करावयाचे असेल, त्याने मनाचे अवश्य नियमन करावें. कारण, मनाशिवाय दुसरे कोणी दुःख देणारे त्रिभुवनांतसुद्धा नाही ४९.


    मन अतिशयें चंचळ । तें सहसा नव्हे निश्चळ ।
    त्यासी विवेक द्यावा मोकळ । अभेदशील अहर्निशीं ॥ ९५० ॥
    मन हे अत्यंत चंचल आहे. ते सहसा स्थिर होत नाही.  ह्याकरितां भेदभाव नाहीसा होईल असा मोकळा विचार त्याला रात्रंदिवस करावयास द्यावा ९५०.


    मन सिंतरील विवेकासी । यालागीं हातकडिया दोहींसी ।
    करूनियां अहर्निशीं । येरयेरांपाशीं राखावीं ॥ ५१ ॥
    मन हे विवेकाला घुलाटणी देईल, याकरितां मन व विचार ह्या दोघांनाही हातबेड्या घालून रात्रंदिवस एकमेकांजवळ ठेवावी ५१.


    मन जेथ विकल्पूं धांवे । तेथ महामारी वीवेकू पावे ।
    मन जेथ अधर्में संभवे । तेथ विवेक धांवे हांकित ॥ ५२ ॥
    म्हणजे मन जिकडे विकल्प उत्पन्न करावयाला धावेल, तेथे त्या विकल्पाचा फडशा पाडणारा विवेक तत्परतेने उभा असतो, आणि मन जेथे अधर्माकडे वळण्याचा संभव दिसतो, तेथें विवेकही त्याला हांकून देण्याला धावत येतो ५२.


    मन जाय कामक्रोधांपाशीं । विवेक ओढी धरोनि केशीं ।
    मन रिघतां निंदेपाशीं । विवेक त्यासी बुकाली ॥ ५३ ॥
    मन कामक्रोधापाशी जाऊन बसलें की, विवेक त्याचे केस धरून त्याला मागें  खेचतो. मन निंदेजवळ गेलें की, विवेक त्याला बुकलीत असतो ५३, 


    मन म्हणे विषय सुटी । विवेक हाणे वैराग्यकाठी ।
    मन धांवतां कल्पनेपाठीं । विवेक उठाउठीं झोंटाळी ॥ ५४ ॥
    मन ' मला विषयाकडे जाऊं द्या ' असे म्हणाले, की विवेक त्याच्या मस्तकांत वैराग्याची काठी हाणतो. मन कल्पनेच्या पाठीमागे धावू लागले तर विवेक त्याला तत्काळ फेंटाळून लावतो ५४.


    परदारपरधन । अभिलाषू धांवे मन ।
    तेथ मन विवेक पावोन । रणकंदन आरंभी ॥ ५५ ॥
    परस्त्री आणि परद्रव्य  ह्यांचा अभिलाष करावयाला मन धावू लागलें तर विवेक तेथे जाऊन भयंकर युद्ध सुरू करतो ५५.


    ऐसा मनां विवेकांचा झगडा । गार्‍हाणें आलें सद्गुरूपुढां ।
    तेणें करावया निवाडा । अद्वैतवाडां कोंडिलीं ॥ ५६ ॥
    अशा रीतीने मन आणि विवेक ह्यांचा झगडा लागून त्यांचे गाऱ्हाणे  सदर पुढें येते. तो त्यांचा न्याय करण्याकरितां अद्वैताच्या वाड्यात त्या दोघांना कोंडून ठेवितो ५६.


    तो दृष्टी देखतांचि ठावो । मनाचा मोडला स्वभावो ।
    देहींचा सांडोनि अहंभावो । विवेकेंसीं पहा हो ऐक्य केलें ॥ ५७ ॥
    ती जागा डोळ्यांनी पाहातांच मनाचा स्वभावच नाहीसा होऊन जातो, आणि देहांतील अभिमान सोडून  मन हें  विवेकाशी ऐक्य करते ५७.


    तेथ मनाचें गेलें मनपण । विवेक विसरला आकळण ।
    जीवाचें विरालें जीवपण । वस्तु संपूर्ण अद्वयें ॥ ५८ ॥
    तेथें मनाचे मनपणच नाहीसे होऊन जाते आणि विवेकही मनाला आकलन करण्याचे विसरतो. जीवाचे जीवपण  नाहीसे होते, आणि अद्वैताच्या योगाने संपूर्ण परब्रह्मच बनते ५८.


    जेवीं सुवर्णाचीं नागभूषणें । फडा पुच्छ मिरवी नागपणें ।
    तें न मोडितां नागत्वाचें लेणें । सोनें सोनेपणें नागत्व विसरे ॥ ५९ ॥
    ज्याप्रमाणे सोन्याचे सर्पाकार अलंकार केले असतां त्यांवर नागाच्याच आकाराची फणी, शेपटी, वगैरे शोभत असतात, पण तो नागाच्या आकाराचा दागिना मोडला नाही तरी सोने हें  सोन्याच्याच रूपाने असल्यामुळे नागाचे त्याला भानही असत नाही ५९, 


    तेवीं जाणोनि वस्तु पूर्ण । न मोडितां जग जाण ।
    जीव विसरला जीवपण । मनत्वा मन मूकलें ॥ ९६० ॥
    त्याप्रमाणे पूर्णब्रह्म जाणून घेऊन जग हें  न मोडताही जीव जीवपणा विसरतो, आणि मन मनस्वरूपाला मुकतें ९६०.


    ऐशिया विवेकयुक्ती जाण । माझे स्वरूपीं प्रवेशे मन ।
    जेथ मनपणें नुठी मन । मनोनिग्रहण या नांव ॥ ६१ ॥
    अशा विवेकाच्या युक्तीने मन माझ्या स्वरूपात प्रवेश करते. जेथे मन मनस्वरूपानें  उठत नाही, त्याचेच नाव मनोनिग्रह होय ६१.


    ऐक चतुरचित्तचिंतामणी । विवेकचक्रवर्तिचूडामणी ।
    उद्धवा भक्तशिरोमणी । मनोनिग्रहणीं प्रवर्त ॥ ६२ ॥
    हे चतुरचित्तचिंतामणे! हे विवेकचक्रवर्तिचूडामणे ! हे भक्तशिरोमणे उद्धवा ! तूं  मनोनिग्रह करण्याचा प्रयत्न  कर ६२.


    आवडीं भुलला कृष्णनाथ । तो उद्धवासी म्हणे तात ।
    मनोनिग्रही तूं एथ । होईं साक्षेपयुक्त सादर ॥ ६३ ॥
    प्रेमाने श्रीकृष्ण अगदी वेडा होऊन गेला. तो उध्दवाला  म्हणाला- "बाबा! तूं येथे आदरपूर्वक मनोनिग्रही हो" ६३.


    साक्षेपें निग्रहूनि मनासी । जो सांडवी मनोजन्य भेदासी ।
    शांती सांडूं नेणे त्यासी । जेवीं तान्हयासी माउली ॥ ६४ ॥
    जो आदरपूर्वक मनाचा निग्रह करून मनापासून उत्पन्न होणाऱ्या भेदाचा त्याग करितो, त्याला ज्याप्रमाणे लेकराला आई सोडीत नाही, त्याप्रमाणे शांति सोडीत नाही ६४.


    निजशांति बाणल्या शुद्ध । त्यासी बाधी न कोण द्वंद्व ।
    हाचि योगसंग्रहो प्रसिद्ध । बोलिले सिद्ध महायोगी ॥ ६५ ॥
    खरी आत्मशांति मनांत बिंबली असता त्याला कोणताच भेदभाव पीडा देत नाही. मोठमोठाले सिद्ध व योगी 'योगसंग्रह' म्हणतात तो हाच ६५.


    सांडूनि संसाररस्फुर्ती । चित्स्वरूपीं जडे वृत्ती ।
    जीव शिव एकत्व येती । योगसंग्रहस्थिती या नांव ॥ ६६ ॥
    संसाराची स्फूर्ति सोडून चित्स्वरूपाकडे वृत्ति जडते आणि जीव-शिव एकत्र येतात, त्याचेच नाव योगसंग्रहस्थिति' होय ६६.


    ऐशिया योगसंग्रहशांती । साधका द्वंद्वें न बाधीती ।
    हें असो जया भिक्षुगीतभक्ती । द्वंद्वनिर्मुक्ति तया लाभे ॥ ६७ ॥
    अशी योगसंग्रहाची शांति प्राप्त झाली असतां साधकांना त्रास देत नाहीत. पण हें  वर्णन इतकंच पुरे. तात्पर्य इतकेंच की, ज्याला या भिक्षुगीताची भक्ति प्राप्त होईल, त्याला द्वंद्वापासून मुक्ति प्राप्त होईल ६७.


    य एतां भिक्षुणा गीतां ब्रह्मनिष्ठां समाहितः ।
    धारयञ्छ्रावयञ्छ्र्ण्वन् द्वन्द्वैर्नैवभिभूयते ॥ ६२ ॥
    इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
    श्रीकृष्णोद्धवसंवादे एकादसस्कन्धे त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥
    [श्लोक ६२] भिक्षूने गाइलेले हे ब्रह्मज्ञान जो कोणी एकाग्रतेने ऐकतो दुसर्‍यांना ऐकवितो आणि यानुसार वागतो, तो कधीही सुखदुःखादी द्वंद्वाने खचून जात नाही. (६२)


    साधावया शांतीची प्राप्ती । कोटिसाधनें न लभे शांती ।
    हा भिक्षुगीतार्थ धरितां चित्तीं । शांति आपैती साधकां ॥ ६८ ॥
    शांति प्राप्त करून घेण्याकरितां कोट्यवधि साधने केली, तरी शांति प्राप्त होत नाही. परंतु ह्या भिक्षुगीतेतील रहस्य मनांत बाळगले असतां साधकांना आपोआपच शांति प्राप्त होते ६८.


    योगनिष्ठां ब्रह्मज्ञान । तें हें भिक्षुगीतनिरूपण ।
    जो हृदयीं धरी सावधान । शांति आंदण तयाची ॥ ६९ ॥
    जी योगनिष्ठा  आणि जें ब्रह्मज्ञान, तेंच हें  भिक्षुगीतांतील निरूपण आहे. जो हे लक्षपूर्वक ध्यानांत धरितो त्याची शांति ही दासी होते ६९.


    ये भिक्षुगीतेचा गीतार्थू । जो जीवीं धरी समाहितू ।
    त्यासी द्वंद्वांचा न बाधी घातू । अतिशांतू निजबोधें ॥ ९७० ॥
    ह्या भिक्षुगीतेतील गुह्यार्थ जो स्वस्थचित्ताने लक्षात धरितो, त्याला द्वंद्वांची पीडा बाधत नाही, आणि आत्मज्ञानाने तो अत्यंत शांत होतो ९७०.


    भिक्षूगीतार्थें समाधान । हें सांगतां नवल कोण ।
    जो सादरें करी श्रवण । त्यासी द्वंद्वें जाण न बाधिती ॥ ७१ ॥
    भिक्षुगीतेच्या रहस्याप्रमाणे वागल्याने समाधान होईल हे सांगण्यांत आश्चर्य काय ? पण जो भक्तिपूर्वक त्याचे श्रवण करील, त्यालासुद्धा द्वंद्वे  पीडा देणार नाहीत ७१.


    परदेशा गेला बहुतकाळ भर्ता । त्याचे पत्र सादर ऐके कांता ।
    तैशिया अतिएकाग्रता । भिक्षुगीता ऐकावी ॥ ७२ ॥
    पति पुष्कळ दिवस परदेशाला गेला असतां  त्याच्याकडून आलेले पत्र त्याची स्त्री जशी उत्कंठेने ऐकत बसते, त्याप्रमाणे अत्यंत एकाग्रतेने भिक्षुगीता ऐकावी ७२.


    निघोनि गेलिया पुत्रासी । त्याची शुद्धि ये मातेपाशीं ।
    ऐकोनियां उणखुणेसी । चरफडी जैसी विव्हळ ॥ ७३ ॥
    मुलगा घरांतून पळून गेला असता, त्याचा सर्व शोध लागल्याचे कोणी आईला सांगितले, म्हणजे तो पळून जाण्याचा हेतु वगैरे ऐकून ती जशी चरफडून विव्हळ होते ७३; 


    तीजवळ ज्या सोयर्‍या असती । त्याही स्नेहें कळवळती
    परी माता जैसी तळमळी चित्तीं । तें आणिकाप्रती असेना ॥ ७४ ॥
    अशा वेळी तिच्याजवळ ज्या नातेवाईक स्त्रिया असतात, त्याही स्नेहाने कळवतात; पण आई जशी मनांत तळमळते, तसे तळमळणे इतरांच्या मनांत असत नाहीं ७४; 


    तैसें भिक्षुगीतश्रवण । करितां द्रवे ज्याचें मन ।
    जो सात्त्विकें वोसंडे पूर्ण । तो द्वंद्वांसी जाण नाटोपे ॥ ७५ ॥
    त्याप्रमाणे भिक्षुगीताचे श्रवण करीत जसता ज्याचे मन द्रवतें, जो सात्त्विक वृत्तीने पूर्णपणे भरून जातो, तो द्वंद्वांच्या सपाट्यात सांपडत नाहीं ७५.


    असो नव्हे सादरें श्रवण । तरी करितां याचें नित्य पठण ।
    भिक्षुगीतप्रतापेंकरून । द्वंद्वें जाण नातळती ॥ ७६ ॥
    असो. असें आदरपूर्वक श्रवण घडत नसेल तर ह्याचे नित्य पठण केले असतांही ह्या भिक्षुगीताच्या प्रभावाने द्वंद्वे त्याला शिवतसुद्धा नाहीत ७६.


    पडतां पंचाननाची घाणी । मदगजां होय महापळणी ।
    तेवीं भिक्षुगीतपठणीं । होय भंगणी द्वंद्वांची ॥ ७७ ॥
    सिंहाच्या अंगाचा दर्प बाहेर पडला की मदोन्मत्त हत्तींनाही पळ सुटतो, त्याप्रमाणे भिक्षुगीताच्या पठणाने द्वंद्वांची पळापळ होते ७७.


    निर्लोभ होऊनि मानसीं । बैसोनि साधुसज्जनांपाशीं ।
    जो निरूपी भिक्षुगीतासी । द्वंद्वें त्यासी नातळती ॥ ७८ ॥
    मनामध्ये निर्लोभ होऊन साधुसंतांपाशी बसून जो भिक्षुगीताचे विवरण करील, त्याला द्वंद्वे शिवणारही नाहींत ७८.


    अर्थे पाठें श्रवण करितां । द्वंद्वें निवारी भिक्षुगीता ।
    हे वर्म कळलेंसे श्रीकृष्णनाथा । तो सांगे हितार्था उद्धवा ॥ ७९ ॥
    ह्या भिक्षुगीतेतील अर्थाचे किंवा या भिक्षुगीतापाठाचे श्रवण केले असतां ही भिक्षुगीता द्वंद्वांचे निवारण करते. हे वर्म श्रीकृष्णाला कळले होते. ते त्याने उद्धवाच्या कल्याणाकरितां त्याला सांगितले ७९.


    ज्या भिक्षुगीताची फळश्रुती । स्वमुखें सांगताहे श्रीपती ।
    त्या भिक्षूचें भाग्य वानूं किती । धन्य त्रिजगतीं तो एक ॥ ९८० ॥
    ज्या भिक्षुच्या गीताची फलश्रुति श्रीकृष्ण आपल्याच मुखाने सांगत आहे, त्या भिक्षूचे भाग्य किती वर्णन करूं? त्रिभुवनांत तोच एक धन्य होय ९८०.


    विवेकवैराग्यसमरसीं । जो साहे अतिद्वंद्वांसी ।
    तोचि पढियंता हृषीकेशीं । हें उद्धवासी दाविलें ॥ ८१ ॥
    विवेक आणि वैराग्य ही अंगामध्ये बिंबवून घेऊन जो मोठमोठ्या द्वंद्वांना सहन करतो, तोच भगवंताचा आवडता होतो, हे उद्धवाला दाखवून दिले ८१,


    जगासी उद्धवाचा उपकार। गुह्य ज्ञान परात्पर ।
    उघडूनि श्रीकृष्णें भांडार । भिक्षुगीतसार प्रकटिलें ॥ ८२ ॥
      उद्धवाचा उपकार सर्व जगावर झाला आहे. कारण त्याच्याकरितां श्रीकृष्णाने आपल्या गुह्य व परात्पर ज्ञानाचे भांडार उघडून भिक्षुगीताचे रहस्य प्रगट केले ८२.


    उद्धव न पुसता जैं शांती । तैं हें कां सांगता श्रीपती ।
    कृष्णासी उद्धवाची प्रीती । त्यासी नाना उपपत्ती उपदेशी ॥ ८३ ॥
    उद्धवाने जर शांतीच विचारली नसती, तर श्रीकृष्णाने हें  वर्णन कां सांगितले असते परंतु श्रीकृष्णाला उद्धवाचे फार प्रेम होते. म्हणून त्याने उद्ध्वाला नानाप्रकारांनी उपदेश केला ८३; 


    हेंचि जडजीवां उद्धरण । येणें उपायें तरती दीन ।
    जग तारावया जगज्जीवन । उद्धवमिषें श्रीकृष्ण बोलिला ॥ ८४ ॥
    आणि हाच जडजीवांना उद्धरण्याचा मार्ग झाला. ह्या उपायाने दीनदुबळे तरून जातात. जगजीवन असा जो श्रीकृष्ण, तो  सर्व जगाचा उद्धार करण्याकरितांच उद्धवाच्या निमित्ताने हे बोलला ८४.


    श्रीकृष्ण बोलिला भिक्षुगीत । जें वेदशास्त्रार्थमथित ।
    उपनिषदांचें सारभूत । वर्तिकांतर्गत रहस्य ॥ ८५ ॥
    श्रीकृष्णाने असें हें भिक्षुगीत सांगितले आहे की, जे वेदशास्त्रांचे तात्पर्य, उपनिषदांचे सार आणि वार्तिकांतील गूढ रहस्य आहे ८५.


    येणें आपआपणीयां आपण । लागताहे निजात्मलग्न ।
    हें ज्ञानाचेंही गुह्य ज्ञान । भक्तकृपें श्रीकृष्ण बोलिला ॥ ८६ ॥
    ह्या भिक्षुगीतानें आपोआपच जीवाचें आत्म्याशी लग्न लागते (ताप्य होते). असें हें  ज्ञानांतीलही गुह्मज्ञान भक्ताच्या कृपेकरितां श्रीकृष्ण बोलला ८६.


    येणें जीवाचें जीवत्व उडे । शिवाचें शिवत्वही बुडे ।
    द्वंद्वाचें बाधकत्व मोडे । स्वानंदाचें उघडे भांडार ॥ ८७ ॥
    ह्याच्या योगानें जीवाचे जीवपण नाहीसे होते, शिवाचे शिवपण बुडून जाते, द्वंद्वांचा पीडा देण्याचा गुण नाहीसा होतो, आणि आत्मानंदाचे भांडार खुले होते ८७.


    वेदें मौन धरिलें जेथ । सशब्द शास्त्रें लाजलीं तेथ ।
    ऐसें अतिरहस्य भिक्षुगीत । तें मी प्राकृत बोलिलों ॥ ८८ ॥
    वेदांनी जेथें मौन धारण केलें, शब्दशास्त्रेही जेथे लाजून गेली, असें उत्कृष्ट रहस्य जें भिक्षुगीत, ते मी सामान्य माणसाने सांगितले ८८.


    जेवीं जळीं बुडते पाषाण । श्रीरामें तारिले आपण ।
    तेवीं मी जड मूढ अज्ञान । बोलवी ब्रह्मज्ञान जनार्दनकृपा ॥ ८९ ॥
    ज्याप्रमाणे जळांत बुडणारे दगड श्रीरामाने स्वत: तरविले, त्याप्रमाणे मी जड, मूढ व अज्ञानी असतांही जनार्दनाची कृपा माझ्याकडून ब्रह्मज्ञान बोलवीत आहे ८९.


    अहल्या जे व्यभिचारिणी । ते लागतां श्रीरामचरणीं ।
    तिचेनि नामें पापा धुणी । प्रातःस्मरणीं पढविली ॥ ९९० ॥
    जी अहल्या व्यभिचारिणी होती, ती श्रीरामाच्या चरणी लागली असल्यामुळे तिच्या नामस्मरणाने पापे नाहीशी होतात. तिचं नाम प्रातःस्मरणांत गोंविले आहे ९९०.


    तेवीं सद्‌गुरुकृपेची करणी । माझी प्राकृत जड मूढ वाणी ।
    मानिजें साधुसज्ञानीं । तैशीं बोलणीं बोलविलीं ॥ ९१ ॥
    त्याप्रमाणे सद्गुरूच्या कृपेची ही करणी आहे. माझी प्राकृत, जड व मूढ वाणी साधु व ज्ञाते ह्यांनी मान्य करावी अशीच भाषणे त्या कृपेने माझ्याकडून वदविली आहेत ९१.


    सरस्वती ज्यासी वोळे । तो मुकाही वेदशास्त्र बोले ।
    तैसें जनार्दनें आम्हां केलें । भिक्षुगीत बोलविलें प्राकृत ॥ ९२ ॥
    सरस्वती ज्याच्यावर प्रसन्न होते, तो मुका असला तरीसुद्धा वेदशास्त्र बोलतो; त्याप्रमाणेच जनार्दन आम्हाला प्रसन्न झाले आणि प्राकृत भाषेत भिक्षुगीत बोलविले ९२.


    राजमुद्रा चढे ज्याचे हातीं । त्यातें समस्त सन्मानिती ।
    तेवीं माझी वाणि सरती । केली निश्चितीं जनार्दनें ॥ ९३ ॥
    राजमुद्रा ज्याच्या हातांत असते, त्याला सर्व लोक सन्मान देतात. त्याप्रमाणे माझी वाणी खरोखर जनार्दनानेच श्रेष्ठ केली ९३.


    बाळकाची बोबडी वाणी । ऐकोनी संतोषे निजजननी ।
    तेवीं माझी आरिख वाणी । संतसज्जनीं प्रियकर ॥ ९४ ॥
    मुलाचे बोबडे बोल ऐकून आई आनंदित होते, त्याप्रमाणे माझी संस्कारहीन वाणीही संतसज्जनांना गोड वाटते ९४.


    मी माझें उंच नीच बोलणें । हेहीं माथां घ्यावें कोणें ।
    मीपण नेऊनि जनार्दनें । ग्रंथकथनें कथवित ॥ ९५ ॥
    मी किंवा माझे चांगले अथवा वाईट बोलणें हें  तरी माथ्यावर घ्यावें कोणी ? कारण माझे मीपण नेऊनच जनार्दनस्वामी ग्रंथ बोलवीत आहे ९५.


    आधींच हें श्रीभागवत । त्यामाजीं गूढ एकादशार्थ ।
    त्याहीमाजीं भिक्षुगीत । अतिगुह्यार्थ निर्द्वंद्व ॥ ९६ ॥
    आधीच हे श्रीभागवत, त्यामध्ये गूढार्थाने भरलेला एकादशस्कंध, आणि त्यामध्ये हें  भिक्षुगीत पूर्णपणे निर्द्वद्व करणाऱ्या अत्यंत गूढ अर्थाने भरलेलें आहे ९६.


    त्या भिक्षुगीताची टीका । एकला कर्ता नव्हे एका ।
    तें एकपण हिरोनि देखा । ग्रंथार्थलेखा जनार्दन वदवी ॥ ९७ ॥
    त्या भिक्षुगीतावर टीका करणारा एका-एकनाथ-काही एकटाच नाही. कारण ते एकपण नष्ट करून ग्रंथाचे निरूपण जनार्दनाने बोलविलें ९७.


    तेथ एक ना अनेक । ऐसें जनार्दनें केलें देख ।
    त्यावरी द्वंद्वसाम्य-कवतिक । ग्रंथ सम्यक वाखाणवी ॥ ९८ ॥
    त्यांत एक नाही आणि अनेकही नाही, असेंच जनार्दनांनी केलें पहा! आणखी त्यांत द्वंद्वांची समता करण्याचे कौशल्य आहे, त्या योगानें ग्रंथाची उत्तम प्रकारे वाखाणणी करवितात ९८.


    एका जनार्दना शरण । जनार्दनू झाला एकपण ।
    ऐसेनिएकत्वें जाण । केलें संपूर्ण भिक्षुगीत ॥ ९९ ॥
    एका जनार्दनाला शरण आहे. जनार्दनाशी त्याचे ऐक्य झाले आहे. अशा ऐक्यरूपाने भिक्षुगीत समाप्त  केले ९९.


    माझे निजगुरूचाही गुरू । श्रीदत्त परमगुरू ।
    तो भिक्षुगीतार्थें साचारू । योग्यां योगेश्वरू तुष्टला ॥ १००० ॥
    माझ्या गुरूचाही गुरु जो परमगुरु श्रीदत्तात्रेय, तोच योग्यांचा योगीश्वर खरोखर भिक्षुगीताच्या अर्थाने संतुष्ट झाला १०००. 


    तेणें तोखलेनि अद्भुतें । आदरें अश्वासूनी मातें ।
    अभय देऊनि निजहस्तें । पूर्ण ग्रंथार्थें डुल्लतू ॥ १ ॥
    त्या अद्भुत  आनंदाच्या भरात त्यांनी अत्यंत आदराने मला आश्वासन देऊन व आपल्या हाताने अभय देऊन ग्रंथाच्या अर्थाने ते आनंदाने बोलू लागले १. 


    एका जनार्दना शरण । श्रोतां व्हावें सावधान ।
    पुढील अध्यायीं श्रीकृष्ण । प्रकृतिपुरुषलक्षण सांगेल ॥ २ ॥
    एका हा जनार्दनाला शरण आहे. श्रोत्यांनी आतां सावध व्हावें. पुढच्या अध्यायांत श्रीकृष्ण प्रकृति-पुरुषांची लक्षणे सांगेल २.


    ते प्रकृति-पुरुषांची कथा । विवंचना हृदयीं धरितां ।
    मी सुखदुःखद्वंद्वांपरता । निजात्मता निजबोधू ॥ ३ ॥
    त्या प्रकृति-पुरुषांच्या कथेचा विचार मी अंत:करणांत वागविल्यामुळे मी सुखदुःखद्वंद्वाहुन भिन्न  झालों आहे. आत्मज्ञानाच्या योगाने माझे आत्म्याशी ऐक्य झाले आहे ३.


    संतसज्जनां साष्टांग नमन । श्रोतेजनांसी लोटांगण ।
    एका विनवी जनार्दन । अतिगोड निरूपण पुढें आहे ॥ ४ ॥
    संतसज्जनांना माझा साष्टांग नमस्कार असो. श्रोतेजनांपुढेही माझें  लोटांगण आहे. आता एकनाथस्वरूपी जनार्दन विनंती करतात की, पुढचे निरूपण अत्यंत रसभरित आहे १००४.


    इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे
    एकाकारटीकायां भिक्षुगीतनिरूपणं नाम त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥
    श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ६२ ॥ ओंव्या ॥ १००४ ॥
    तेविसावा अध्याय समाप्त. 

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...