मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या १0१ ते २००

    वस्त्रें मळकीं अतिजीर्ण । मस्तक सदा मलिन ।

    मुखीं वास निघती जाण । स्वप्नींही पान न खाय ॥ १ ॥
    आंगावर वस्त्रें  घ्यावयाची ती अतिशय मळकी, जुनाट आणि फाटकींतुटकी घ्यावयाची, आणि मस्तक तर सदासर्वदा मळकेंच असावयाचे. तोंडाला घाण येत असावयाची, तरी स्वप्नांतसुद्धा विडा खावयाचा नाही १. 


    सण वार दिवाळी दसरा । तैं जुने जोंधळे धाडी घरा ।
    अन्नेंविण पीडी लेंकुरां । कदर्यु खरा या नांव ॥ २ ॥
    दिवाळी, दसरा असा काही सणवार आला तर घराकडे  जुने जोंधळे  पाठवून  द्यावयाचे. अन्नाशिवाय पोराबाळांनासुद्धा चरफडत ठेवी.  ह्याचेंच नांव खरा कृपण २. 


    धनलोभी धर्महीन । देखोनि कदर्युवर्तन ।
    विमुख झाले स्वजन । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ३ ॥
    अशा प्रकारें तो द्रव्यलोभी धर्महीन झालेला पाहुन व त्याचे ते कृपणपणाचे वर्तन पाहून त्याचे आप्तजनही त्याला सोडून गेले. तेच वर्णन श्रीकृष्ण सांगतो ३.


    दुःशीलस्य कदर्यस्य द्रुह्यन्ते पुत्रबान्धवाः ।
    दारा दुहितरो भृत्या विषण्णा नाचरन् प्रियम् ॥ ८ ॥
    [श्लोक  ८] त्याचा कंजूषपणा आणि वाईट स्वभाव यांमुळे त्याचे पुत्रकन्या, बंधूबांधव, नोकरचाकर, पत्‍नी इत्यादी सर्वजण दुःखी असत त्यामुळे ते त्याच्या मनाला बरे वाटेल असे काहीही करीत नसत. (८)


    नाहीं स्वधर्मीं निजशीळ । दानधर्म खुडी सकळ ।
    अत्यंत धनलोभी केवळ । त्यासी दुःशीळ बोलिजे ॥ ४ ॥
    स्वधर्माचरणांत ज्याचें मन मुळीच नाही, सर्व दानधर्म जो बंद करून थकतो, ज्याला केवळ अतोनात द्रव्यलोभ असतो, त्याला 'दुःशील' असें म्हणतात ४.


    अन्नआच्छादनेंवीण । कुटुंबेंसहित आपण ।
    जो कदर्थवी निजप्राण । कदर्यु पूर्ण त्या नांव ॥ ५ ॥
    अन्नवस्त्रावांचून साऱ्या कुटुंबासह आपला जीवसुद्धा त्रासवितो, त्यालाच खरोखर कृपण असें नांव आहे ५.


    कदर्यु नरासी तंव देख । मुख्य स्त्री होय विमुख ।
    स्वजन आणि सेवक ।पुत्रही पराङ्मुख होती त्यासी ॥ ६ ॥
    अशा कृपण मनुष्याला आधी त्याची स्त्रीच  अंतरते, आणि मग आप्त, इष्ट, चाकरनोकर व पुत्रसुद्धा त्याच्या विरुद्ध होतात ६.


    आपले जे कां सखे बंधू । तेही करूं लागती विरोधू ।
    द्रव्यविभागाचा संबंधू । कलह सुबद्धू आरंभे ॥ ७ ॥
    आपले जे आप्त इष्ट असतात तेसुद्धा विरोध करु  लागतात, आणि द्रव्याच्या वाटणीचा संबंध येऊन गृहकलहाला आरंभ होतो ७.


    गांठीं असोनि अमित धन । न करी माहेरसणबोळवण ।
    कन्या क्षोभोनियां जाण । शाप दारुण त्या देती ॥ ८ ॥
    पदरी अतोनात द्रव्य  असूनही माहेरपण, सणवार किंवा बोळवण करीत नाही, म्हणून मुली रागावून त्याला भयंकर शाप देतात ८. 


    गोत्रज सदा चिंतित । हा मरे तैं जेवूं दूधभात ।
    आप्त ते झाले अनाप्त । अवघे अनहित वांछिती ॥ ९ ॥
    भाऊबंद  तर नेहमी असेंच चिंतन करीत असतात की, हा एकदां मेला म्हणजे आम्ही यथेच्छ दूधभात खाऊं. मित्र असतात तेच शत्रु होऊन राहतात. सर्वजण त्याच्या वाइटाचीच इच्छा करतात ९.


    जयाचिया द्रव्यासी जाण । नाहीं धर्माचें संरक्षण ।
    तें काळेंचि होय क्षीण । तेंचि लक्षण हरि सांगे ॥ ११० ॥
    ज्याच्या द्रव्याला धर्माचे संरक्षण नसते, त्याचे द्रव्य थोड्याच  काळानें क्षयाला जाते. तोच प्रकार श्रीकृष्ण सांगतो ११०. 


    तस्यैव यक्षवित्तस्य च्युतस्योभयलोकतः ।
    धर्मकामविहीनस्य चुक्रुधुः पञ्चभागिनः ॥ ९ ॥
    [ श्लोक ९] इहलोक आणि परलोक अशा दोहोंनाही मुकलेल्या व यक्षासारखी धनाची केवळ राखण करणार्‍या त्याच्यावर धर्मकर्मांच्या अभावी पंचमहायज्ञांच्या देवता रागावल्या. (९)


    खाय ना जेवी ना लावी हात । ठेव्यापाशीं जैसें भूत ।
    तैंसे याचें यक्षवित्त । असे राखत ग्रहो जैसा ॥ ११ ॥
    खात नाही, जेवीत नाही, आणि द्रव्याला हातही पण लावीत नाही, अशा रीतीने ठेव्याजवळ जसा समंध बसतो, त्याप्रमाणे हाही आपलें यक्षवित्त एकाद्या ग्रहासारखे राखीत बसे ११.  


    केवळ धर्मकामरहित । धनलोभी जैसें भूत ।
    त्या नांव बोलिजे यक्षवित्त । जीवाहून आप्त अर्थ मानी ॥ १२ ॥
    असा धर्मेच्छाविरहित केवळ समंधाप्रमाणे असणारा जो द्रव्यलोभी, त्यालाच ' यक्षवित्त' असे म्हणतात. त्याला द्रव्य म्हणजे प्राणाहुनही प्रिय वाटत असते १२.


    स्वशरीरीं भोग नाहीं जाण । तेणें इहलोक झाला शून्य ।
    नाहीं स्वधर्मकर्म पंचयज्ञ । परलोक शून्य तेणें झाला ॥ १३ ॥
    आपल्या शरीराला सुखोपभोग घेत नाही त्यामुळे इहलोक शून्य होतो, आणि स्वधर्मकर्म, पंचमहायज्ञ करीत नाही त्यामुळे परलोकही शून्य होतो १३.


    यज्ञाचे पंच विभागी । यज्ञभाग न पवे त्यांलागीं ।
    ते कोपोनियां पंचविभागीं । वित्तनाशालागीं उद्यत ॥ १४ ॥
    यज्ञाचे हविर्भाग घेणारे पांचजण असतात, त्यांना त्यांचे भाग पोचत नाहीत, त्यामुळे ते पांचहीजण क्षुब्ध होउन त्याच्या द्रव्यनाशाला उद्यक्त होतात १४.


    पावोनि ब्राह्मणजन्म वरिष्ठ । धनलोभें स्वधर्मनष्ट ।
    तो होय उभय लोकीं भ्रष्ट । पावे कष्ट कृपणत्वें ॥ १५ ॥
    श्रेष्ठ अशा ब्राह्मणजन्माला येउन जो द्रव्यलोभाने स्वधर्मापासून भ्रष्ट होतो, तो दोन्ही लोकांपासून च्युत होतो व कृपणपणाने कष्ट मात्र भोगतो १५.


    करितां अतिआयास । जोडला अर्थ बहुवस ।
    त्यासी अधर्में आला नाश । तोही विलास हरि सांगे ॥ १६ ॥
    अत्यंत कष्ट करून पुष्कळ पैसा मिळविला तरी त्याचा अधर्मानं नाश होतो. त्याचाही प्रकार श्रीकृष्ण सांगतो १६.


    तदवध्यानविस्त्रस्तपुण्यस्कन्धस्य भूरिद ।
    अर्थोऽप्यगच्छन्निधनं बह्वायासपरिश्रमः ॥ १० ॥
    [श्लोक १०] हे उदार उद्धवा ! पंचमहायज्ञाच्या देवतांच्या कोपामुळे त्याचा पूर्वपुण्याचा आधार नाहीसा झाला आणि अतिशय उद्योग व परिश्रम करून मिळवलेले धनही नष्ट झाले. (१०)


    पंचयज्ञदेवता सकळ । येणें उपेक्षिल्या केवळ ।
    तिंहीं द्रव्यलाभाचें मूळ । पुण्यक्षयें तत्त्काळ छेदिलें ॥ १७ ॥
    पंचमहायज्ञाच्या ज्या सर्व देवता असतात, त्यांची तो पूर्ण उपेक्षा करतो. त्यामुळे द्रव्यलाभाचे मूळ जे पुण्य, त्या पुण्याचाच देवतांनी क्षय करून टाकिला असे समजावें १७.


    द्रव्यप्राप्तिपुण्यदिवाकर । अस्तमाना गेला तो भास्कर ।
    मग द्रव्यलाभाचा अंधकार । अधर्में थोर दाटला ॥ १८ ॥
    द्रव्यप्राप्तीचा जो पुण्यरूप सूर्य, तो सूर्यच अस्तमानाला गेला, म्हणजे मग अधर्मानें द्रव्यलाभाच्या ऐवजी द्रव्यक्षयाचाच अंधार दाटून राहतो १८.


    प्रयासें संचिली संपत्ती । तिसी अधर्म‌अंधाराची ये राती ।
    क्षोभल्या पंचधा यज्ञमूर्ती । पंचधा पावती महानाश ॥ १९ ॥
    प्रयासाने संपत्ति सांठविलेली असते, तेथें अधर्मरूप अंधाराची रात्र येते, आणि त्या पांचही यज्ञमूर्ति क्षुब्ध झाल्या म्हणजे पांच प्रकारचे महानाश होतात १९.


    जो सुखी न करी कुटुंबालागीं । जो निजात्मा निववीना नाना भोगीं ।
    जो द्रव्य न वेंची धर्मालागीं । त्यसी पंचविभागी ऊठती ॥ १२० ॥
    जो कुटुंबालाही सुख देत नाही, किंवा आपल्या जीवालाही अनेक प्रकारचे सुखोपभोग भोगीत नाहीं, जो धर्माप्रीत्यर्थ द्रव्य खर्चीत नाही, त्याच्यावर हे यज्ञाचे पांच भागीदार रागावून उठतात १२०.


    दायाद चोर राजा आगी । अधर्में रोग संचरे अंगीं ।
    हे पांचजण विभागी । द्रव्यनाशालागीं पावती ॥ २१ ॥
    भाऊबंद, चोर, राजा, आग आणि अधर्माने आंगांत रोग होणे या पांच रूपांनी ते पांच भागीदार द्रव्याचा नाश करण्याला तयार होतात २१.


    नाहीं द्विजपूजा श्रद्धायुक्त । नाहीं लौकिकक्रिया उचित ।
    नाहीं दानादि धर्म वेदोक्त । द्रव्यक्षयो तेथ आवश्यक ॥ २२ ॥
    जेथे श्रद्धेने ब्राह्मणाची पूजा नाही, जेथें उचित असें लौकिक कर्म होत नाही, जेथे वेदांत सांगितल्याप्रमाणे दानादि धर्म होत नाही, त्या ठिकाणी हटकून द्रव्याचा  नाश होतो २२.


    जेथ नाहीं वडिलांसी सन्मान । जेथ नाहीं पंचमहायज्ञ ।
    जेथ गुरूसीं करी अभिमान । तेथ क्षयो जाण उद्धवा ॥ २३ ॥
    जेथे वडिलांचा मान रहात नाही, जेथे पंचमहायज्ञ होत नाहीत, जेथे गुरूजवळच अभिमान धरला जातो, उद्धवा ! तेथे द्रव्याचा  नाश हा व्हावयाचाच, हे लक्षात ठेव २३.


    ज्यांसी परांचा द्वेष सदा । जे बोलती परापवादा ।
    जे चढती धनगर्वमदा । तेथ क्षयो सदा उद्धवा ॥ २४ ॥
    ज्यांना निरंतर दुसऱ्याचा द्वेष वाटतो, जे दुसऱ्याची निंदा करतात, संपत्तीच्या गर्वाने मदोन्मत्त होतात, तेथें उद्धवा ! नेहमी द्रव्याचा क्षय हा ठेवलेलाच २४.


    त्याच द्रव्यक्षयाचें लक्षण । ग्रंथाधारीं निरूपण ।
    स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । दयाळू पूर्ण निजभक्तां ॥ २५ ॥
    श्रीकृष्ण हे भक्तांविषयी पूर्ण दयाळू असल्यामुळे त्याच द्रव्यक्षयाचे लक्षण ते ग्रंथाधाराने स्वतः सांगत आहेत २५.


    ज्ञातयो जगृहुः किञ्चित् किञ्चिद्दस्यव उद्धव ।
    दैवतः कालतः किञ्चिद्‌ब्रह्मबन्धोर्नृपार्थिवात् ॥ ११ ॥
    [श्लोक ११ ] उद्धवा ! त्या अधम ब्राह्मणाचे काही धन त्याच्या कुटुंबियांनी घेतले, काही चोरांनी चोरून नेले काही दैवी कोपाने नष्ट झाले, काही काळाच्या प्रभावाने नाहीसे झाले, काही इतर माणसांनी घेतले आणि उरलेसुरलेले धन राजाने काढून घेतले. (११)


    स्त्री पुत्र होऊनि एक । तिंही ठेवा नेला कित्येक ।
    गोत्रज मिळोनि सकळिक । बलात्कारें देख वांटा नेला ॥ २६ ॥
    बायको आणि मुले एक होऊन त्यांनी बराच ठेवा लांबविला. भाऊबंद होते ते सारे एक होऊन त्यांनी बळजबरीने आपला वाटा नेला २६.


    चोरीं फोडोनियां घर । काढूनि नेलें भांडार ।
    आगी लागोनियां घर । वस्तु अपार जळाल्या ॥ २७ ॥
    चोरांनी घर फोडून भांडार काढून नेले. घराला आग लागून असंख्य वस्तु जळून गेल्या २७.


    हिंसाळ्यानें गेलें शेत । प्रवर्त बुडाला जेथींचा तेथ ।
    विश्वासू ठेवा घेऊनि जात । खतखूत हारपलें ॥ २८ ॥
    शेतावर रोग पडून त्याचा सत्यानाश झाला. व्यापार जेथल्यातेथें बुडाला. विश्वासू होते त्यांनीच सर्व ठेवा दडपून टाकला, आणि खतापत्रांचे पुडकें हरवले २८.


    भांडीं ठेविला कापूर उडे । समुद्रामाजीं तारूं बुडे ।
    पातिकरावरी घाला पडे । चहूंकडे अपावो ॥ २९ ॥
    भांड्यात ठेवलेला कापूर उडून जातो; समुद्रात गेलेलें गलबत फुटते; त्याप्रमाणे भागीदारावर काही तरी घाला पडून चहूंकडून नाश झाला २९.


    ठक येऊनि एकांतीं । मुलाम्याचीं नाणीं देती ।
    धनलोभाचे काकुळती । हातींची संपत्ती त्यांसी दे ॥ १३० ॥
    फसवे लोक येऊन त्यांनी एकांतामध्ये खोटे मुलामा दिलेले रुपये पदरांत घातले, आणि नफ्याच्या किंवा व्याजाच्या आशेने त्याने आपली हातात असलेली संपत्ति त्यांना देऊन टाकली १३०.


    स्वचक्रपरचक्रविरोधधाडी । खणती लावूनि घर फोडी ।
    तळघरींचे ठेवे काढी । भरोनि कावडी धन नेती ॥ ३१ ॥
    लढाईची धामधूम उडून कुदळीने सारें घर खणून काढण्यात आले; आणि तळघरांत ठेवलेले ठेवेसुद्धा उपसून काढून कावडी भरून घेऊन गेले ३१.


    पाणी रिघे पेंवाआंत । तेणें धान्य नासे समस्त ।
    धटू झोंबोनि हरी शेत । दैवहत तो झाला ॥ ३२ ॥
     पेंवांत पाणी शिरून त्यामुळे सारा दाणागोटा कुजून गेला, आणि कोणीतरी धटिंगण उठून त्याने शेतही हिसकावून घेतले. अशा प्रकारे हा कफल्लक होउन बसला ३२.


    गोठणीं सेणयां रोगू पडे । निमाले गायीम्हशींचे वाडे ।
    उधारें नेले ठाणबंदी घोडे । तो रणीं महायुद्धीं ॥ ३३ ॥
    गायवाड्यांत रोगाची साथ येऊन गाईम्हशींची खिल्लारें पार नाहीशी झाली ठाणबंदांत असलेले घोडे ज्याने नेले होते ; तो तिकडेच युद्धामध्ये ठार झाला ३३.


    भूमिनिक्षेप जे करूं जाती । ते आपणियाकडे धूळी ओढिती ।
    तेथ घालूनि निजसंपत्ती । तोंडीं माती स्वयें घाली ॥ ३४ ॥
    जे कोणी आपले द्रव्य जमिनीत पुरून ठेवतात ते आपल्याकडे धूळच खरोखरी ओढवून घेतात. कारण आपली संपत्ति मातीत घातली म्हणजे अखेर त्यांच्या तोंडांतही मातीच पडते ३४.


    बुद्धि सांगती वाड वाड । येथूनि तोंडीं घाला दगड ।
    ऐसे ठेवे बुजिले दृढ । त्याची चाड धरूं गेला ॥ ३५ ॥
    त्या वेळी मोठमोठ्या गोष्टी सांगत असतात. अमुक ठिकाणी खड्याच्या तोंडावर दगड ठेवा म्हणतात. अशा रीतीने बंदोबस्ताने बुजवून ठेवलेले ठेवे आपले म्हणून इच्छा धरतो ३५.


    ठेवे ठेविले जे अनेक । ते पृथ्वीनें गिळिले निःशेख ।
    भाग्य झालें जैं विमुख । झाले अनोळख ते ठाय ॥ ३६ ॥
    पण अशा ज्या अनेक ठेवी ठेवलेल्या असतात; त्या साऱ्या पृथ्वी जेथल्या तेथेंच गिळून टाकते. कारण दैव फिरलें म्हणजे त्या ठेवलेल्या ठिकाणाचीच ओळख रहात नाही आणि जागाच चुकते ३६.


    अधर्में अदृष्ट झालें क्षीण । विपरीत भासे देहींचें चिन्ह ।
    पालटला निजवर्ण । ब्राह्मणपण लक्षेना ॥ ३७ ॥
    अधर्मानें  प्रारब्धाचा क्षय झाला आणि देहावरही अवकळा आली. तो निस्तेज होऊन ब्राह्मण आहे असेंसुद्धा वाटेना ३७.


    देखे तो पुसे ज्ञाति कोण । तो सांगे जरी मी ब्राह्मण ।
    ऐक त्याचें न मनी मन । वर्णाग्रपण मावळलें ॥ ३८ ॥
    जो कोणी भेटे, तो तुमची जात कोणती म्हणून विचारू लागे भाणि मी ब्राह्मण आहे असे जरी त्याने सांगितले, तरी ते ऐकणाऱ्याच्या मनाला खरे वाटत नसे. कारण त्याचे ब्रह्मतेजच अस्ताला गेलेलें होतें ३८.


    एवं निःशेष नासलें धन । ब्रह्मवर्चस्व गेलें जाण ।
    म्लानवदन हीनदीन । खेदखिन्न अतिदुःखी ॥ ३९ ॥
    अशा प्रकारे द्रव्यही पूर्णपणे नष्ट झाले, आणि ब्राह्मणपणाची कळाही नाहीशी झाली. तेव्हां तो निस्तेज चेहऱ्याचा व दीन दुबळा होऊन दुःखानें खिन्न  होऊन हाय हाय करीत बसला ३९.


    स एवं द्रविणे नष्टे धर्मकामविवर्जित ।
    उपेक्षितश्च स्वजनैश्चिन्तामाप दुरत्ययाम् ॥ १२ ॥
    [श्लोक १२] अशा प्रकारे त्याची सर्व संपत्ती निघून गेली त्याने धर्म जोडला नाही की सुखोपभोग घेतले नाहीत इकडे त्याच्या सोयर्‍याधायर्‍यांनी सुद्धा त्याच्याकडे पाठ फिरवली, आता त्याला भयानक चिंतेने घेरले. (१२)


    गेलें शेत निमाली कुळवाडी । घर पाडिलें परचक्रधाडीं ।
    धन नासलें नाहीं कवडी । अधर्माचें जोडी हे दशा ॥ १४० ॥
    शेत गेल्यामुळे शेतकी बुडाली, परचक्राचा घाला येऊन घर पडलें, सारे द्रव्य जाऊन कवडीसुद्धा जवळ राहिली नाही, इतकी दशा एक अधर्म केल्याने पदरीं आली १४०.


    नाहीं स्वधर्मकर्म ना दान । विहित भोग न करी आपण ।
    त्या धनलोभ्याचें नासलें धन । जेवीं कां स्वप्न रंकाचें ॥ ४१ ॥
    स्वधर्मकर्म केले नाही, दान केले नाही, योग्य तेवढे सुखही आपण घेतले नाही, म्हणून त्या द्रव्यलोभ्याचे द्रव्य स्वप्नांमध्यें भिकारी व्हावें त्याप्रमाणे धुळीस मिळालें ४१.


    दैव झालें पराङ्मुख । त्या हतभाग्याची दशा देख ।
    स्त्रीपुत्रें झालीं विमुख । तिंहीं निःशेख दवडिला ॥ ४२ ॥
    दैव फिरल्यामुळे त्या दुर्दैवी पुरुषाची काय दशा झाली पहा. बायकामुलें अंतरली आणि त्यांनी त्याला मुळीच बाहेर घालवून दिले ४२.


    ऐक धनलोभाच्या ठायीं । इष्ट मित्र पूर्वींचि नाहीं ।
    गोत्रजांसी त्याचें सुख कायी । दवडिला पाहीं उपेक्षितू ॥ ४३ ॥
    आणखी ऐक. द्रव्यलोभाच्या ठिकाणी इष्टमित्र हे पहिल्यापासून कधीच नसतात. आणखी भाऊबंदांना तरी त्याच्यापासून सुख तें काय? म्हणून त्यांनीही त्याला उपेक्षा करून सोडून दिले ४३.


    निंदा प्रत्यक्ष करिती लोक । रांडा पोरें थुंकती देख ।
    खावया नाहीं निःशेख । मागतां भीक मिळेना ॥ ४४ ॥
    लोक धडधडीत त्याच्या तोंडावरच त्याची निंदा करूं लागले. रांडापोरें तोंडावर थुंकू  लागली आणि खावयाला तर जवळ काही नाही. भीक मागावयाला गेले तर भीकसुद्धा कोणी घालीना ४४.


    भिकेलागीं जेथ जेथ गेला । म्हणती काळमुखा येथें कां आला ।
    होता धनलोभें भुलला । भला नागविला ईश्वरें ॥ ४५ ॥
    तो जेथे जेथें भिक्षा मागायला जाई, तेथे तेथे हा काळतोंडा इकडे कशाला आला ? असें म्हणत. द्रव्यलोभासाठी काय पण तो भुलला होता ! ईश्वरानें खासा कफल्लक  बनविला' ४५, 


    यापरी धिक्कारिती लोक । धन जाऊनि झाला रंक ।
    चिंतावर्तीं पडला देख । दुःखें महादुःख पावला ॥ ४६ ॥
    अशा रीतीने लोक त्याची निर्भर्त्सना करूं लागले, आणि तो तर द्रव्य जाऊन शुद्ध भिकारी  बनला व चिंतासमुद्रात पडून मोठ्या दुःखानें विलाप करू लागला ४६. 


    तस्यैवं ध्यायतो दीर्घं नष्टरायस्तपस्विनः ।
    खिद्यतो बाष्पकण्ठस्य निर्वेदः सुमहानभूत् ॥ १३ ॥
    [श्लोक १३ ] धन नाहीसे झाल्यामुळे सतत त्याच काळजीने त्या बिचार्‍याला मनात खेद उत्पन्न झाला अश्रूमुळे त्याचा गळा दाटून येऊ लागला परंतु यामुळेच त्याच्या मनात संसाराबद्दल उत्कट वैराग्य उत्पन्न झाले. (१३)


    धनलोभ्याचें गेलें धन । धनासवें न वचेचि आठवण ।
    तें आठवतां फुटताहे मन । तळमळी जाण अतिदुःखें ॥ ४७ ॥
     द्रव्यलोभी मनुष्याचे द्रव्य गेले तरी  त्या द्रव्याबरोबर त्याची आठवण काही जात नाही. ती आठवण झाली की मन अगदी द्विधा  होते आणि त्या असह्य  दुःखाने तो अगदी तळमळत असतो ४७.


    कांटा रुतल्या भुजंगकपाळीं । पुच्छ तुटल्या सापसुरळी ।
    हो कां जळावेगळी मासोळी । तैसा तळमळी अतिदुःखें ॥ ४८ ॥
    सर्पाच्या  मस्तकांत काटा  रुतला , किंवा सापसुरळीचे शेपूट तुटलें, किंवा मासा पाण्यातून बाहेर काढला, तर ती जशी असह्य  दुःखाने चरफडतात ४८, 


    मनें आठवितांचि धन । हृदयीं चालिलें स्फुंदन ।
    अश्रुधारा स्रवती नयन । मूर्च्छापन्न क्षणक्षणां ॥ ४९ ॥
    त्याप्रमाणेच पूर्वीच्या धनाची मनांत आठवण झाली की तोही मनामध्ये हुंदके देऊ लागतो. डोळ्यांतून घळघळ अश्रूधारा वाहतात आणि घटकेघटकेला मुर्छा येऊन पडतो ४९.


    पोटीं दुःखें अति चरफडे । धाय मोकलूनियां रडे ।
    उठे बैसे पाहे पडे । लोळे गडबडे आरडत ॥ १५० ॥
    मनांतील दुःखाने तो अतिशय तळमळतो, धाय मोकलून रडू  लागतो, उठतो, बसतो, पाहतो आणि पुन्हा वेड्याप्रमाणे पडतो. जमिनीवर गडबडा लोळून ओरडत  बसतो १५०, 


    मग म्हणे रे कटकटा । झालों एक वेळ करंटा ।
    अहा विधातया दुष्टा । काय अदृष्टा लिहिलेंसी ॥ ५१ ॥
    आणि म्हणतो , 'हाय रे देवा ! शेवटी मी भिकारी झालों ! हाय हाय! ! “हाय रे दैवा ! शेवटी मी भिकारी झालों अं! हाय हाय ! हे दुष्टा ब्रह्मदेवा ! काय रे हे माझ्या कपाळी लिहून ठेवलेस? ५१.


    मज ठावो नाही कोणीकडे । विचार संभवेना पुढें ।
    अतिदुःख आलें जी रोकडें । तेणें विचारें रडे महादुःखी ॥ ५२ ॥
    मला कोठेच ठाव नाही, व पुढे काही योग्य विचारही सुचत नाही." असें जें अत्यंत मोठे दुःख त्याच्यापुढे येऊन उभे राहिले, त्याच्या विचाराने तो महादुःखी होऊन रडत बसतो ५२.


    हें अल्पदुःख पावलों येथें । पुढें थोर दुःख आहे मातें ।
    यम दंडील निष्ठुर घातें । कोण तेथें सोडवी ॥ ५३ ॥
    " येथे हे थोडेसेंच दुःख झाले आहे, पण मला पुढे मोठे दुःख भोगावयाचे आहे ! यम जेव्हां निर्दयपणाने घावांनी ताडण करील, त्या वेळी मला तेथे कोण सोडविणार ? ५३.


    म्यां नाहीं दीधलें दान । मी नाहीं स्मरलों नारायण ।
    मज येती नरक दारुण । तेथ कोण सोडवी ॥ ५४ ॥
    मी दानधर्म केला नाही, किंवा मी नारायणाचे स्मरणही केले नाही, तेव्हां भयंकर नरकच माझ्या कपाळी येणार. तेथे मला कोण सोडवील? ५४.


    म्यां नाहीं केले पंचमहायज्ञ । नाहीं दीधलें अतिथींसी अन्न ।
    नाहीं केलें पितृतर्पण । माझे दुःख कोण निवारी ॥ ५५ ॥
    मी पंचमहायज्ञ केले नाहीत, मी अतिथींना अन्न दिलें नाहीं; मी पितृतर्पण केलें नाही, तेव्हा माझे दुःख कोण निवारण करणार ? ५५.


    म्यां नाहीं केली द्विजपूजा । नाहीं भजलों अधोक्षजा ।
    नाहीं वंदिले वैष्णवरजा । माझे दुःखसमाजा कोण नाशी ॥ ५६ ॥
    मी ब्राह्मणाची पूजा केली नाही, मी परमेश्वराचे भजन केलें नाही, भगवद्भक्तांच्या पायधुळीला वंदन केलें नाहीं; तेव्हा माझ्या दुःखसमुदायाचा नाश कोण करणार ? ५६.


    मी सर्वथा अकर्मकाती । बुडालों बुडालों अघोरीं ।
    धांव पाव गा श्रीहरी । मज उद्धरीं दीनातें ॥ ५७ ॥
    मी सर्वस्वी अकर्मच करणारा असल्यामुळे अघोर नरकामध्ये बुडालों हो बुडालों! हे श्रीहरे ! धावत येऊन मला पाव आणि माझा गरिबाचा उद्धार कर ५७.


    कृष्णा माधवा मुरारी । अच्युता अनंता श्रीहरी ।
    गरुडध्वजा गोवर्धनधारी । मज उद्धरीं दीनातें ॥ ५८ ॥
    हे कृष्णा ! हे माधवा ! हे मुरारे ! हे अच्युता ! हे अनंता ! हे श्रीहरे ! हे गरुडध्वजा ! हे गोवर्धनधारी! माझा गरिबाचा उद्धार कर ५८.


    तुवां रक्षिलें प्रल्हादासी । अंबरीषासी गर्भवासीं ।
    उदरीं राखिलें परीक्षितीसी । तैसें मज दीनासी उद्धरीं ॥ ५९ ॥
    तूं प्रल्हादाचे रक्षण केलेंस, गर्भवासापासून अंबरीषाला मुक्त केलेंस, उदरामध्ये परीक्षितीचे संरक्षण केलेंस, त्याप्रमाणेच माझा गरिबाचा उद्धार कर ५९.


    तुवां तारिलें अहल्येसी । उद्धरिलें नष्टा अजामिळासी ।
    उडी घातली गजेंद्रासी । तेणें वेगेंसी मज तारीं ॥ १६० ॥
    तू  अहल्येला तारलेंस, पातकी अजामिळाला उद्धरलेंस, आणि गजेंद्राच्या संकटांत उडी घातलीस, तितक्याच त्वरेने माझेही तारण कर १६०


    महादोषांची श्रेणी । नामें तारिली कुंटिणी ।
    तेणें लाघवें चक्रपाणी । मज दुष्टालागोनी उद्धरीं ॥ ६१ ॥
    सर्व पातकांची केवळ खाणच अशी कुंटीणही नामस्मरणाने मुक्त केलीस. हे चक्रपाणी ! तितक्याच चातुर्याने माझा दुष्टाचाही उद्धार कर ६१.


    जळो जळो हा धनकाम । गेलें वृथा माझें जन्म ।
    फुकाचें जें रामनाम । तें मी अधम न म्हणेंचि ॥ ६२ ॥
    आग लागो ह्या धनेच्छेला, तिच्यामुळे माझा जन्म फुकट गेला. फुकटचे जे रामाचे नाव ते सुद्धा मी अधमानें उच्चारलें नाहीं ! ६२.


    रामनामाच्या प्रतापासाठीं । जळती म्हापापांच्या कोटी ।
    थोर अधम मी एक सृष्टीं । नाम वाक्पुटीं न म्हणेंचि ॥ ६३ ॥
    रामनामाच्या प्रभावाने महान् पातकांच्या राशीच्या राशी जळून जातात. असे असतां मुखाने मी रामनाम उच्चारीत नाही, त्याअर्थी जगामध्ये अत्यंत अधम असा एक मीच होय" ६३.


    ऐसा मानोनि अपराध । अनुतापें करितां खेद ।
    उपजला अतिनिर्वेद । तेंचि गोविंद स्वयें सांगे ॥ ६४ ॥
    अशा रीतीनें तो आपले अपराध मनांत आणून पश्चात्तापाने दुःख करूं लागला असता त्याला तीव्र  वैराग्य उत्पन्न झाले. तेंच श्रीकृष्ण स्वतः सांगतों ६४.


    स चाहेदमहो कष्टं वृथाऽऽत्मा मेऽनुतापितः ।
    न धर्माय न कामाय यस्यार्थायास ईदृशः ॥ १४ ॥
    [श्लोक १४] आता तो ब्राह्मण मनात म्हणू लागला की, "अरेरे ! मी आजपर्यंत स्वतःला व्यर्थच कष्ट दिले ! जे धन मिळविण्यासाठी मी कठीण परिश्रम केले, त्याने ना धर्म साधला, ना सुखोपभोग ! (१४)


    हात चुरूनि म्हणे कटकटा । ब्राह्मणदेहो मोक्षाचा वांटा ।
    तो लाहोनि मी अतिकरंटा । धनलोभचेष्टा नाडलों ॥ ६५ ॥
    तो ब्राह्मण हात चोळून म्हणतो, "अरेरे ! ब्राह्मणदेह हा मोक्षप्राप्तीचाच एक विभाग होय. तो प्राप्त होऊनही मी कसा अत्यंत करंटा राहिलो आणि द्रव्यलोभाच्या उलाढालीने व्यर्थ गेलों! ६५. 


    जेणें देहें लाभे मोक्षसुख । त्या देहासी म्यां दीधलें दुःख ।
    धनलोभी मी परम मूर्ख । मजऐसा आणिक असेना ॥ ६६ ॥
    ज्या देहाच्या योगाने मोक्षाचे सुख मिळते, त्याच देहाला मी दुःख  दिलें. मी द्रव्याचा लोभ करणारा असा अत्यंत मूर्खच. माझ्यासारखा मूर्ख दुसरा कोणीच असणार नाही ६६.


    न वेंचितां धर्मकामासी । अर्थ जोडिला सायासीं ।
    त्या अर्थाची दशा ऐसी । अतिदुःखेंसीं मज फळला ॥ ६७ ॥
    धर्माच्या कामी द्रव्याचा व्यय न करता मी मोठ्या प्रयासाने पैसा जमवून ठेवला, आणि त्या पैशाची तर अशी दशा झाली की, त्याने मला अत्यंत दुःखाची फळे दिली ६७.


    बाप धनलोभाचें कवतिक । नाही इहलोक ना परलोक ।
    थितें अंतरले मोक्षसुख । भोगवी नरक अनिवार ॥ ६८ ॥
    द्रव्यलोभाचे आश्चर्य फार मोठे आहे. त्याच्यामुळे इहलोक नाही आणि परलोक नाही. सुलभ असलेले मोक्षसुख त्याच्यामुळे अंतरले. तो लोभ अनिवार नरक भोगावयास लावतो ६८.


    देखें ज्या नरकाचे ठायीं । आकल्प बुडतां ठावो नाहीं ।
    धनलोभ घाली तैसें ठायीं । तें म्यां नरदेहीं जोडिलें ॥ ६९ ॥
    अहो पहा ! ज्या नरकामध्ये कल्पपर्यंत बुडून राहिले असतांही ठाव म्हणून लागत नाही, तशा ठिकाणी हा धनलोभ जीवाला नेऊन घालतो. तेच मी नरदेहांत मिळविले ६९.


    जो जन्मला ब्राह्मणदेहीं । तो पूज्य होय लोकीं तिहीं ।
    मोक्ष लागे त्याच्या पायीं । म्यां अभाग्यें तोही नाशिला ॥ १७० ॥
    जो ब्राह्मणदेहांत जन्माला आला, तो तिन्ही लोकांत पूज्य होतो. मोक्ष त्याच्या पायांजवळ असतो. अशा ब्राह्मणदेहाचा मी दुर्दैवाने नाश करून टाकला १७०.


    लोभें जें धन संचिलें । तें निःशेष नासोनि गेलें ।
    परी मजलागीं अतिदुःखी केलें । बांधोनि दीधलें महानरका ॥ ७१ ॥
    लोभाने ज्या द्रव्याचा संग्रह केला, ते तर सर्वच नाश पावलें, पण मला मात्र त्याने अत्यंत दुःखी केले व मला बांधून घोर नरकाच्या स्वाधीन केले ७१.


    उत्तम देहो झाला प्राप्त । तो धनलोभें केला व्यर्थ ।
    आयुष्य गेलें हातोहात । अतिसंतप्त अनुतापें ॥ ७२ ॥
    मला उत्तम देह प्राप्त झालेला असता मी तो द्रव्याच्या लोभाने फुकट घालविला. हां हां म्हणतां आयुष्य निघून गेले आणि पश्चात्तापाने मात्र अतिशय संतप्त झालों ७२.


    धनलोभींचे अचाट । वृथा गेले माझे कष्ट ।
    वैराग्य उपजलें उद्भट । अतिचोखट सविवेक ॥ ७३ ॥
    धनलोभामध्ये माझे फार मोठमोठे कष्ट व्यर्थ गेले, पण विवेकासहवर्तमान पवित्र असें अत्यंत वैराग्य मात्र सुदैवाने उत्पन्न झाले ७३.


    धनलोभी जो कां नर । तो सकल दुःखांचें भांडार ।
    धनबद्धक तो पामर । स्वमुखें साचार निंदीत ॥ ७४ ॥
    जो द्रव्यलोभी मनुष्य असतो तो सर्व दुःखांचे भांडारच होय. जो धनाने बद्ध झालेला असतो तो पामर होय." अशा प्रकारें तो आपल्या तोंडानेच आपली निंदा करूं लागला ७४.


    प्रायेणार्थाः कदर्याणां न सुखाय कदाचन ।
    इह चात्मोपतापाय मृतस्य नरकाय च ॥ १५ ॥
    [श्लोक  १५] कंजूष माणसाला धनापासून बहुधा कधीच सुख मिळत नाही या लोकी तो धन मिळविणे आणि त्याच्या रक्षणाच्या चिंतेने कष्टी होतो आणि मेल्यानंतर धर्म न केल्याकारणाने नरकात जातो. (१५)


    प्रायशा जे धनबद्धक । त्यांसी इहलोकीं नाहीं सुख ।
    धनरक्षणीं अतिदुःख । तें जातां देख प्राणान्त ॥ ७५ ॥
    बहुधा जे द्रव्यलोभी असतात, त्यांना इहलोकीं सुख नसतेच. कारण, त्या द्रव्याचे रक्षण करण्यामध्येच त्यांना अतिशय दुःख होते, आणि तें धन गेलें असतां प्राणांतसमयच ओढवल्यासारखे होते ७५.


    धनागमनीं अतिकष्ट । धनरक्षणीं कलह श्रेष्ठ ।
    धननाशें होय हृदयस्फोट । इहलोकीं कष्ट धनलोभ्या ॥ ७६ ॥
    द्रव्य मिळवितांना अतिशय कष्ट सोसावे लागतात, ते द्रव्य सांभाळतांना अतिशय कलह माजतात, आणि त्याच द्रव्याचा नाश झाला असतां छाती फुटून जाते. अशा प्रकारे द्रव्यलोभ्याला या जगांत कष्ट होतात ७६.


    यापरीं इहलोकीं दुःख । अधर्में खुंटला परलोक ।
    मरतां उरी आदळे नरक । आवश्यक धनलोभ्या ॥ ७७ ॥
    इहलोकांत अशा प्रकारचे दुःख असते. आणि त्यात अधर्म होत असल्याने परलोकही अंतरतो. म्हणून द्रव्यलोभी मरतांना त्याच्या उरावर नरक हटकून येऊन आदळतो ७७.


    जो धर्म करीना स्वयें न खाये । जो मजसारिखा कदर्यु होये ।
    त्यासी चढतें वाढतें दुःख पाहें । नाहीं सुखसोये कदर्या ॥ ७८ ॥
    जो धर्म करीत नाही व स्वतःही खात नाहीं, जो माझ्यासारखा कृपण होऊन राहतो, त्याला अधिकाधिक दुःखच होते पहा. कृपणाला सुखाची सोय मिळतच नाही ७८.


    लोभाची वस्ती जिये ठायीं । तेथ स्वप्नींही सुख नाहीं ।
    लोभ अतिशयें निंद्य पाहीं । तें आपण स्वमुखेंही सांगत ॥ ७९ ॥
    ज्या ठिकाणीं लोभाची वस्ती असते, तेथे स्वप्नांत  सुद्धा सुख राहात नाही. हें  पहा! लोभ हा अतिशय निंद्य आहे. ते तो ब्राह्मण  स्वत: आपल्याच मुखाने सांगत आहे ७९.


    यशो यशस्विनां शुद्धं श्लाघ्या ये गुणिनां गुणाः ।
    लोभः स्वल्पोऽपि तान् हन्ति श्वित्रो रूपमिवेप्सितम् ॥ १६ ॥
    [श्लोक  १६] जसे अंगावरील थोडेसेही कोड सुंदर स्वरूप बिघडवून टाकते, त्याचप्रमाणे थोडासासुद्धा लोभ यशस्वी लोकांचे शुद्ध यश आणि गुणी लोकांचे प्रशंसनीय गुण नष्ट करतो. (१६)


    रणीं पडतां मुख्य धुरेसी । जो अंगें विभांडी त्या रणासी ।
    खांदीं वाऊनि आणी रायासी । येवढी कीर्ति ज्यासी जोडली ॥ १८० ॥
    समरांगणामध्ये पुढे असलेला मुख्य योद्धा पडला असतां जो स्वतः पुढे घुसून शत्रूसैन्याचा पराभव करितो व शत्रूच्या तडाक्यांत सांपडलेल्या राजाला खांद्यावर बसवून आणतो, इतकी कीर्ति ज्याला मिळाली १८०, 


    लोभ संचरोनि त्यापाशीं । एक शेत मागवी रायासी ।
    तेचि अपकीर्ति होय त्यासी । जग उपहासी मूर्खत्वा ॥ ८१ ॥
    त्याच्या अंत:करणांत त्या शौर्याच्या मोबदल्याचा लोभ शिरून जर तो राजापाशी एक शेत मागू लागला, तर तीच त्याची अपकीर्ति होते, आणि सर्व जग त्याच्या मूर्खपणाचा उपहास करिते ८१.


    त्यासी न मागतां राजा जाण । करूं पाहे आपणासमान ।
    त्यासी लोभें आणोनि नागवण । मूर्खपण स्थापिलें ॥ ८२ ॥
    कारण, त्याने काही न मागतांच राजा त्याला आपल्या बरोबरीचा करण्याच्या विचारांत असतो. त्या राजाच्या विचाराला या लोभाने अडथळा आणला. आणि त्या लोभामुळे मूर्खपणा मात्र प्रस्थापित झाला ८२.


    स्वयें करितां कन्यादान । सकळ कुळ होय पावन ।
    तेथेंही लोभें घेतां धन । अधःपतन धनलोभिया ॥ ८३ ॥
    स्वतः कन्यादान केले तर सारे कुळ पावन होते, पण त्यातही जर लोभाने कन्येबद्दल द्रव्य घेतले, तर त्या द्रव्यलोभ्याला अधःपतन घडते ८३.


    दाता देऊनियां दान । दानप्रसंगें उपार्जी धन ।
    तेंचि दात्यासी दूषण । लोभ लांछन दानासी ॥ ८४ ॥
    दाता दान देउनही त्या दानाच्या प्रसंगाने काही मोबदला मिळवील, तर तेंच दात्याला दूषणास्पद होते. अशा प्रकारें लोभ हा दानालाही लांच्छनास्पद होतो ८४.


    वेदशास्त्रें करूनि पठण । पंडित झाले अतिसज्ञान ।
    तेही धनलोभें छळिले जाण । ज्ञानाभिमान प्रतिष्ठे ॥ ८५ ॥
    वेदशास्त्रांचे  पठण करून मोठे ज्ञानसंपन्न पंडित झाले, तरी त्यांचीसुद्धा द्रव्याच्या लोभाने छळणूक होते असे समज. कारण त्यांच्या ठिकाणी ज्ञानाचा अभिमान दृढपणे रहातो ८५.


    देहप्रतिष्ठेचिये सिद्धी । पंडित-पंडितां वादविधी ।
    नाना छळणोक्ती विरोधीं । ठकिले त्रिशुद्धी ज्ञातें लोभें ॥ ८६ ॥
    देहाचे सत्यस्व सिद्ध करण्यासाठी पंडितपिडितांमध्ये वादविवाद सुरू होतात, आणि त्यांत विरोध आला असता ते अनेक प्रकारची छळाची भाषणे करतात. अशा प्रकारे ज्ञातेही खरोखर लोभाने फशीं पडतात ८६.


    सविवेक सज्ञान ज्ञात्यासी । लोभ आणी निंदास्पदासी ।
    इतरांची गति काइसी । ते लोभाची दासी होऊनि ठाती ॥ ८७ ॥
    विचारसंपन्न व ज्ञानसंपन्न अशा पंडितालाही  लोभ  हा निंदेला  पात्र करतो, मग इतरांची कथा काय ? ते तर लोभाची बटिकच होऊन बसतात ८७.


    लोभ शुद्धीसी करी अशुद्ध । लोभ तेथ निंदास्पद ।
    तोचि दृष्टांत विशद । ऐक प्रसिद्ध सांगत ॥ ८८ ॥
    लोभ हा पवित्र मनुष्यालाही अपवित्र करून सोडतो. लोभ असतो तेथें निंदेला स्थळ असते. तोच प्रसिद्ध दृष्टांत त्या ब्राह्मणाने स्पष्ट करून सांगितला, तो  ऐक ८८.


    कुलशील अतिसुकुमार । रूपें सर्वांगमनोहर ।
    नाकीं श्वेतता अणुमात्र । निंद्य सुंदर तेणें होय ॥ ८९ ॥
    कन्या कुलवान् असली, सुशील असली, अत्यंत सुकुमार असली, ती स्वरूपाने सर्वांगमनोहर असली, आणि इतके असूनही जर तिच्या नाकावर लहानसाच पांढच्या कोडाचा ठिपका असला, तर त्यामुळे, ती सुंदर असूनही निंद्यच  होते ८९.


    तेवीं अल्पही लोभाची जे वस्ती । नाशी गुणौदार्ययशः कीर्ती ।
    लोभाऐसा त्रिजगतीं । कर्ता अपकीर्ती आन नाहीं ॥ १९० ॥
    त्याप्रमाणे थोड्याही  लोभाची वस्ती मनामध्ये असली, तरी तो लोभ सर्व गुण, औदार्य, यश, कीर्ति या सर्वांचा नाश करतो. म्हणून लोभासारखा अपकीर्ति करणारा त्रिभुवनांत दुसरा कोणी नाही १९०.


    धनलोभीं सदा विरोधू । धनलोभ तोडी सखे बंधू ।
    धनलोभाऐसा नाहीं बाधू । अतिअशुद्धू आणिक असेना ॥ ९१ ॥
    द्रव्यलोभामुळे सर्वांशी  सदासर्वदा विरोध राहतो. द्रव्यलोभ हा इष्टमित्रांची ताटातूट कस्तो. द्रव्यलोभासारखा बाधक व अत्यंत अमंगळ असा दुसरा आणखी कोणीच नाही ९१.


    अर्थस्य साधने सिद्धे उत्कर्षे रक्षणे व्यये ।
    नाशोपभोग आयासस्त्रासश्चिन्ता भ्रमो नृणाम् ॥ १७ ॥
    [श्लोक  १७] माणसांना धन मिळविणे, त्यात वाढ करणे, ते जपून ठेवणे, ते खर्च होणे, त्याचा नाश होणे किंवा उपभोग घेणे, अशा सर्वच बाबतीत परिश्रम, भय, चिंता आणि भ्रम यांच्याशीच सामना करावा लागतो. (१७)


    प्रथम शिणावें द्रव्य जोडितां । दुसरें शिणावें तें वाढवितां ।
    द्रव्य जरी झालें उत्कर्षतां । तरी लोभ सर्वथा पुरे न म्हणे ॥ ९२ ॥
    पहिल्याप्रथम द्रव्य संपादन करण्याकरितां खपावे , नंतर ते वाढविण्याकरितां श्रम करावे. आणि इतकेंही करून ते द्रव्य कितीही उत्कर्षाला चढले, तरी लोभ कधीही 'आतां पुरे ' असे मुळींच म्हणत नाही. ९२.


    द्रव्यालागीं भावार्थतां । जैसे कष्टती सर्वथा ।
    तैसा जरी कष्टे परमार्था । तैं ब्रह्म तत्त्वतां खेळणें होय ॥ ९३ ॥
    द्रव्यासाठी लोक जसे मनोभावाने सर्व प्रकारे कष्ट करितात, तसाच जर कोणी परमार्थासाठी झटेल , तर खरोखर ब्रह्म हे त्याचे खेळणे होऊन राहील ९३.


    एवं कष्टीं जोडल्या द्रव्यासी । रक्षणीं अतिचिंता मानसीं ।
    अतिशय लागली जीवासी । अहर्निशीं धुकधुकी ॥ ९४ ॥
    इतक्या कष्टाने द्रव्य संपादिले, तरी ते सांभाळतांना मनात अत्यंत चिंता लागते, आणि यामुळे जिवाला रात्रंदिवस धुकधुक लागलेली असते ९४.


    स्त्री पुत्र हो माता पिता । त्यांसी पातिजेना सर्वथा ।
    आपणाहूनि परता । विश्वासू अर्था मानेना ॥ ९५ ॥
    स्त्री असो, पुत्र असो, की आईबाप असोत, त्यांच्यावर विश्वार म्हणून कधीच ठेवीत नाही. द्रव्याच्या संबंधांत आपल्याहून दुसरा कोणी विश्वासू आहे असें त्याला वाटत नाहीं ९५.


    विसरोनियां निजघाता । चोरापासोनि राखे वित्ता ।
    वित्तरक्षणीं निजचिंता । तिन्ही अवस्था एकाग्र ॥ ९६ ॥
    आपल्या जिवाचा घात होईल हें  विसरून चोरापासून द्रव्याचे रक्षण करतो. द्रव्यरक्षणामध्ये एकदा त्याला चिंता वाटू लागली, म्हणजे जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति या तिन्ही अवस्थामध्ये त्या चिंतेच्या ठिकाणींच तो एकाग्र  ध्यान धरून बसतो ९६.


    ऐसी एकाग्रता करूनी । जरी लागता भगवद्भजनीं ।
    तरी वश्य होता चक्रपाणी । अर्धक्षणीं साधका ॥ ९७ ॥
    अशी एकाग्रता करून जर तो भगवद्भजनीं लागला असता, तर अशा त्या साधकाला एका निमिषमात्रांतही देव वश झाला असता ९७.


    उचिचानुचित विवाहासी । द्रव्य वेंचितां उदरासी ।
    अतिशय होय कासाविसी । धनव्ययो त्रासासी उपजवी ॥ ९८ ॥
    धर्माला  योग्य किंवा अयोग्य असा काही खर्च झाला, किंवा पोटाला खाण्याकरितां द्रव्य खर्च झाला , तर तो अत्यंत घाबराघुबरा होऊन जातो. अशा रीतीने द्रव्याचा खर्च त्याला त्रास उत्पन्न करितो ९८.


    एवं जोडूनि रक्षितां द्रव्यासी । अवचटें नाश होय जैं त्यासी ।
    तै अतिभ्रम चढे मानसीं । होती धनपिशीं बद्धक ॥ ९९ ॥
    अशा प्रकारे द्रव्य मिळवून त्या द्रव्याचे रक्षण केले असता अकस्मात् जर त्याचा नाश झाला, तर मनाला अधिकच भ्रम उत्पन होतो. द्रव्यलोभी लोक द्रव्यासाठी वेडेपणांत असे बद्ध होतात ९९.


    द्रव्यार्जनीं वसे प्रयास । द्रव्यरक्षणीं चिंतेचा वास ।
    द्रव्यव्ययीं वळसा त्रास । भ्रमाचा रहिवास धननाशीं ॥ २०० ॥
    द्रव्य  मिळवावयाला प्रयास पडतात.तें द्रव्य रक्षण करण्यामध्ये चिंता असते, आणि त्या द्रव्याचा  खर्च झाला म्हणजे त्रास उत्पन्न होतोच. अशा प्रकारे द्रव्यनाशामध्येही भ्रमच असतो २००. 

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...