मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ३०१ ते ४००
'आत्मा वै पुत्रनामासी' । जो साचार धणी सर्वस्वासी ।
त्या पातेजेना निजपुत्रासी । अतिअविश्वासी धनलोभ ॥ १ ॥
'आत्मा वै पुत्रनामासि' पुत्र हा प्रत्यक्ष आपला आत्माच होय अशी श्रुति आहे. असा जो पुत्र खरोखर आपल्या सर्वस्वाचा धनी, त्या आपल्या मुलावरसुद्धा विश्वास ठेवीत नाही, असा द्रव्यलोभ अत्यंत अविश्वासी आहे १.
धर्म अर्थ काम संपूर्ण । त्रिसत्य सत्य हें वचन ।
पूर्वजांची भाक निर्वाण । देऊनि आपण जे परणी ॥ २ ॥
पूर्वजांची भाक निर्वाण । देऊनि आपण जे परणी ॥ २ ॥
धर्म, अर्थ व काम पूर्णपणे साधीन अशी विवाहसमयीं त्रिवार सत्य म्हणून शपथ घेतली आणि त्याचा विश्वास पटविण्यासाठी पूर्वजांच्या थोर लौकिकाची खात्री देऊन आपण जिच्याशी लग्न केलें २,
जिणें जीवू प्राण सर्वस्वेंसीं । साचार अर्पिला भ्रतारासी ।
ऐशियेही धर्मपत्नीसी । अविश्वासी धनलोभ ॥ ३ ॥
ऐशियेही धर्मपत्नीसी । अविश्वासी धनलोभ ॥ ३ ॥
जिने सर्वस्वी आपला जीवप्राण खरोखर भ्रतारालाच अर्पण केलेला असतो, अशा धर्मपत्नीशीही हा द्रव्यलोभ अविश्वासीपणा करतो ३.
जे उदरीं वाहे नवमासीं । जे सर्वदा विष्ठामूत्र सोशी ।
धनलोभाची जाती कैशी । तेही मातेसी न विश्वासे ॥ ४ ॥
धनलोभाची जाती कैशी । तेही मातेसी न विश्वासे ॥ ४ ॥
या द्रव्यलोभाची जात कशी आहे पहा! जी नऊ महिने उदरांत बाळगते, सदासर्वदा विष्ठामूत्र काढण्याचे कष्ट सोसते, त्या आईवरही तो विश्वासत नाही ४.
धनाभिमान ये जयापाशीं । तो विश्वासेना सद्गुरूसी ।
इतरांची कथा कायसी । पूर्ण अविश्वासी धनमानी ॥ ५ ॥
इतरांची कथा कायसी । पूर्ण अविश्वासी धनमानी ॥ ५ ॥
ज्याला द्रव्याचा अभिमान चढतो, तो सद्गुरूवरसुद्धा विश्वास ठेवीत नाही. मग इतरांची कथा काय ? द्रव्याला मान देणारा मनुष्य पूर्ण अविश्वासी असतो ५.
अविश्वासाचें मुख्य कारण । धन आणि दुसरी स्त्री जाण ।
तेथ मोहावलें ज्याचें मन । तो अतिसंपन्न अविश्वासें ॥ ६ ॥
तेथ मोहावलें ज्याचें मन । तो अतिसंपन्न अविश्वासें ॥ ६ ॥
अविश्वासाचे मुख्य कारण म्हटले म्हणजे एक द्रव्य आणि दुसरी स्त्री हे लक्षात ठेव. त्यांत ज्याचें मन मोहून पडलें तो अविश्वासाने पूर्णपणे भरलेला असतो ६.
जो धनमानी आणि स्त्रीजित । त्यासी विमुख होय हृदयस्थ ।
त्यातें सद्गुरूही उपेक्षित । परम अनर्थ अविश्वासें ॥ ७ ॥
त्यातें सद्गुरूही उपेक्षित । परम अनर्थ अविश्वासें ॥ ७ ॥
जो द्रव्यालाच मान देणारा आणि बाइलवेडा असतो, त्याला हृदयस्थ आत्माराम विन्मुख होतो. सद्गुरुही त्याची उपेक्षा करतात अविश्वासाने असा अत्यंत अनर्थ होतो ७.
सकळ दोषां मुकुटमणी । अविश्वास बोलिला पुराणीं ।
जो प्रकटतां अर्धक्षणीं । करी धुळदाणी वृत्तीची ॥ ८ ॥
जो प्रकटतां अर्धक्षणीं । करी धुळदाणी वृत्तीची ॥ ८ ॥
पुराणांतरीसुद्धा अविश्वास हा सर्व दोषांचा मुकुटमणि होय असेंच म्हटले आहे. तो अविश्वास प्रगट झाला की, क्षणार्धामध्ये वृत्तीची धूळधाण करितो ८.
अविश्वासा अभिमान भेटे । तैं मुक्ताची मुक्तता तुटे ।
मग विकल्पाचेनि नेटें । घाली उफराटें देहबंदीं ॥ ९ ॥
मग विकल्पाचेनि नेटें । घाली उफराटें देहबंदीं ॥ ९ ॥
अविश्वासाला अभिमान भेटतो तेव्हां मुक्ताची मुक्तता संपते. मग तो अविश्वास विकल्पाच्या प्रेरणेने त्याला उलट देहाच्या बंधनांत घालितो ९.
अविश्वासें कवळिल्या चित्ता । अभिमानें म्हणे मी ज्ञाता ।
तेव्हां उभउभ्यां पळे आस्तिकता । देखे नास्तिकता सर्वत्र ॥ ३१० ॥
तेव्हां उभउभ्यां पळे आस्तिकता । देखे नास्तिकता सर्वत्र ॥ ३१० ॥
अविश्वासाने चित्त व्यापून टाकले असता 'मी ज्ञाता' असें तो मोठ्या अभिमानाने म्हणतो, तेव्हा आस्तिक वृत्ति उभ्याउभ्याच पळून जाते, आणि सर्वत्र नास्तिकताच दिसू लागते ३१०.
अविश्वास येतां पहा हो । सकुटुंब पळे सद्भावो ।
मग लोकत्रयीं अभावो । नांदवी निर्वाहो विकल्पेंकरूनी ॥ ११ ॥
मग लोकत्रयीं अभावो । नांदवी निर्वाहो विकल्पेंकरूनी ॥ ११ ॥
अहो! असे पहा की, अविश्वास आला की सद्भाव सहकुटुंब पळून जातो आणि सान्या त्रिभुवनांत त्या सद्भावाचा अभाव होतो. मग अविश्वास हा विकल्पाच्या योगानेच सर्व व्यवहार चालवितो ११.
वाडेंकोडें अविश्वासी । विकल्पू नांदे अहर्निशी ।
जेथ रिगाव अविश्वासासी । विकल्प त्यासी नागवी ॥ १२ ॥
जेथ रिगाव अविश्वासासी । विकल्प त्यासी नागवी ॥ १२ ॥
अविश्वासाच्या ठिकाणी विकल्प हा मोठ्या आनंदानं रात्रंदिवस राहात असतो, आणि जेथे अविश्वासाला शिरकाव मिळतो तेथें विकल्पच त्याला लुटून फस्त करतो १२.
अंगोवांगीं अविश्वास । परमार्थराष्ट्र पाडी वोस ।
सद्गुरूचेही दावी दोष । न मनी विश्वास ब्रह्मयाचा ॥ १३ ॥
सद्गुरूचेही दावी दोष । न मनी विश्वास ब्रह्मयाचा ॥ १३ ॥
हा अविश्वास एकदा आंगी खिळला तर परमार्थाचे राज्यच ओसाड करून टाकतो, आणि सद्गुरूचेही दोष दाखवितो. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचासुद्धा विश्वास धरीत नाही १३.
यालागीं सकळ दोषांचा राजा । अविश्वासाहूनि नाहीं दुजा ।
तो रिगोनियां निजपैजा । विभांडी वोजा महासिद्धि ॥ १४ ॥
तो रिगोनियां निजपैजा । विभांडी वोजा महासिद्धि ॥ १४ ॥
म्हणून सर्व दोषांचा राजा अविश्वासाहून दुसरा कोणी नाही. तो स्वतः पैजेपुढे होऊन महासिद्धींची पूर्णपणे वाताहत करून टाकतो १४.
जिकडे अविश्वासें चाली केली । तिकडे परमार्था पळणी झाली ।
विकल्पाची धाडी आली । ते संधी नागवली बहुतेकें ॥ १५ ॥
विकल्पाची धाडी आली । ते संधी नागवली बहुतेकें ॥ १५ ॥
आणखी अविश्वासाने जिकडे हल्ला केला, तिकडून परमार्थ पळून गेला असे समजावे. विकल्पाची धाड पडली, की बहुधा ती वेळ व्यर्थच गेली असें होते १५.
सिद्धाचें गेलें सिद्धिभूषण । साधकें सपाई नागवलीं जाण ।
रानभरी झाले साधारण । श्रद्धेचें उद्यान छेदिलें ॥ १६ ॥
रानभरी झाले साधारण । श्रद्धेचें उद्यान छेदिलें ॥ १६ ॥
सिद्धाच्या सिद्धीचे भूषण नाहीसे झालें, साधक लोक तर बिचारे सफाई ठार झाले, व साधारण सावध होते ते तर रानोमाळ पळत सुटले. कारण अविश्वासाने श्रद्धेची बाग सर्व तोडून टाकली १६.
यमनियमांचीं नगरें जाळी । क्रोधू तापसा करी होळी ।
मोक्षफळें सफळिता केळी । समूळ उन्मळी मोहगजू ॥ १७ ॥
मोक्षफळें सफळिता केळी । समूळ उन्मळी मोहगजू ॥ १७ ॥
क्रोध हा यमनियमांची शहरें जाळून फस्त करतो आणि तपस्वी लोकांची होळी करून टाकतो. मोहरूपी हत्ती असतो तो मोक्षरूपी फळांनी सुफळ झालेल्या वेळी समूळ उपटून टाकतो १७,
शमदमाचें घरटें । खाणोनि सांडिलें आव्हाटे ।
वोस विवेकाचे चोहटे । कोणी ते वाटे वागेना ॥ १८ ॥
वोस विवेकाचे चोहटे । कोणी ते वाटे वागेना ॥ १८ ॥
व शम-दमांचे झोपडे अस्ते खणून काढून चवाठ्यावर फेकून देतो, विचाराचे चवाठे ओस पडून त्या मार्गानें कोणी पाऊलही टाकीत नाहीं १८.
व्रतोपवास यांचीं साजिरीं । निष्काम उपवनें चौफेरीं ।
तीं जाळिलीं उपराउपरी । नानापरी विकल्पें ॥ १९ ॥
तीं जाळिलीं उपराउपरी । नानापरी विकल्पें ॥ १९ ॥
व्रत, उपवास, ह्यांची चौफेर जी गोजिरवाणी निष्काम उपवनें होती, ती विकल्पाने हां हां म्हणतां नाना प्रकारांनी जाळून फस्त केली १९.
ऐशिया अविश्वासासी । ज्ञानाभिमानी आले भेटीसी ।
विकल्पें अभय देऊनि त्यांसी । आपणियापाशीं राहविलें ॥ ३२० ॥
विकल्पें अभय देऊनि त्यांसी । आपणियापाशीं राहविलें ॥ ३२० ॥
ज्ञानाचे अभिमानी लोक अशा अविश्वासाला भेटायला आले असतां विकल्पाने त्यांना अभय देऊन आपल्यापाशी ठेवून घेतले ३२०.
ऐशिया अविश्वासापुढें । परमार्थ काइसें बापुडें ।
विकल्पाचें बळ गाढें । तो करी कुडें तत्काळ ॥ २१ ॥
विकल्पाचें बळ गाढें । तो करी कुडें तत्काळ ॥ २१ ॥
अशा अविश्वासापुढे परमार्थ तो बिचारा काय? विकल्पाचे बळ मोठे असते. तो तत्काळ अनर्थ करून सोडतो २१.
पोटांतून जो अविश्वासी । तो सदा देखे गुणदोषांसी ।
अखंड द्वेषी परमार्थासी । हा त्यापाशीं स्वभावो ॥ २२ ॥
अखंड द्वेषी परमार्थासी । हा त्यापाशीं स्वभावो ॥ २२ ॥
पोटांतूनच जो अविश्वासी असतो, तो नेहमी गुणदोषांचाच विचार करीत असतो, आणि परमार्थाचा सतत द्वेषच करितो. त्याचा हा स्वभावच आहे २२.
यापरी अविश्वासी । बद्धवैर पडे परमार्थासी ।
यालागीं जो पोटींचा अविश्वासी । हांसल्याही त्यापाशीं न वचावें दीनीं ॥ २३ ॥
यालागीं जो पोटींचा अविश्वासी । हांसल्याही त्यापाशीं न वचावें दीनीं ॥ २३ ॥
अशा प्रकारे अविश्वासी मनुष्य परमार्थाशी दृढ वैर धरून राहातो. म्हणून जो अंत:करणापासून अविश्वासीच आहे, तो हासत आला तरी त्याच्यापाशी गरिबाने जाऊं नये २३.
सकळ दोषांमाजीं समर्थ । सकळ दोषंचें राजत्व प्राप्त ।
तो हा अकरावा अनर्थ । असे नांदत धनामाजीं ॥ २४ ॥
तो हा अकरावा अनर्थ । असे नांदत धनामाजीं ॥ २४ ॥
सर्व दोषांत प्रबळ, सर्व दोषांचे राज्य ज्याला प्राप्त झाले आहे, तो हा 'अविश्वास' नावाचा अकरावा अनर्थ द्रव्यांत राहिलेला असतो २४.
अकराहीं इंद्रियांसी । पूर्ण करी अविश्वासेंसी ।
यालागीं अकरावें स्थान यासी । वस्ति अविश्वासासी मनामाजीं ॥ २५ ॥
यालागीं अकरावें स्थान यासी । वस्ति अविश्वासासी मनामाजीं ॥ २५ ॥
हा अविश्वास अकराही इंद्रियांना पूर्णपणे अविश्वासी करितो, म्हणून ह्याला अकरावें स्थान दिले आहे. ह्या अविश्वासाला मनामध्ये स्थान असतें २५.
मुख्यत्वें स्पर्धेचें आयतन । बहुविद्या का बहुधन ।
हेंचि स्पर्धेचें जन्मस्थान । येथूनि जाण तें वाढे ॥ २६ ॥
हेंचि स्पर्धेचें जन्मस्थान । येथूनि जाण तें वाढे ॥ २६ ॥
मुख्यत्वेकरून स्पर्धेचे स्थान म्हणजे पुष्कळ विद्या किंवा पुष्कळ धन हेंच होय. स्पर्धेचे जन्मस्थान हेंच आहे. येथूनच ती पुढे वाढते २६.
विद्या झालिया संपन्न । पंडित पंडितां हेळण ।
मुख्य गुरूशीं स्पर्धा करी जाण । हें स्पर्धालक्षण विद्येचें ॥ २७ ॥
मुख्य गुरूशीं स्पर्धा करी जाण । हें स्पर्धालक्षण विद्येचें ॥ २७ ॥
विद्या प्राप्त झाली असतां पंडितांपंडितांमध्ये एकमेकांची हेळणा सुरू होते. तो मुख्य गुरुशीच स्पर्धा करतो, हेच विद्येचें स्पर्धालक्षण होय २७.
गांठीं झालिया धन । स्पर्धा खवळे दारुण ।
कुबेर परधनें संपन्न । मी स्वसत्ता जाण धनाढ्य ॥ २८ ॥
कुबेर परधनें संपन्न । मी स्वसत्ता जाण धनाढ्य ॥ २८ ॥
द्रव्य संग्रही असले म्हणजे स्पर्धा भयंकर खवळते. तो म्हणतो की, “ कुबेर दुसऱ्याच्या द्रव्यावर श्रीमंत झाला आहे, परंतु मी आपल्या सत्तेच्याच बळावर धनाढ्य झालों आहे २८.
माझिया निजधनापुढें । गणितां अल्प गंगेचे खडे ।
माझिये धनाचेनि पडिपाडें । कोण बापुडें उभे राहे ॥ २९ ॥
माझिये धनाचेनि पडिपाडें । कोण बापुडें उभे राहे ॥ २९ ॥
माझ्या स्वतांच्या द्रव्यापुढे गंगा नदीतील खडे मोजले असताही ते थोडेच होतील. माझ्या संपत्तीच्या बरोबरीला दुसरे कोण बरे उभे राहणार?" २९.
मग जे जे देखे धनवंत । ते ते हेळूनि सांडी तेथ ।
यापरी स्पर्धा अद्भुत । धरूनि अर्थ उल्हासे ॥ ३३० ॥
यापरी स्पर्धा अद्भुत । धरूनि अर्थ उल्हासे ॥ ३३० ॥
मग जे जे श्रीमंत पहातो, त्या त्या सर्वांची तेथल्यातेथेच विटंबना करून टाकतो. ह्याप्रमाणे द्रव्याचा आश्रय धरून स्पर्धा ही विलक्षण उसळत असते ३३०.
एवं धरूनियां अर्थ । स्पर्धा बारावा अनर्थ ।
सदा नांदे धनाआंत । तो हा वृत्तांत सांगीतला ॥ ३१ ॥
सदा नांदे धनाआंत । तो हा वृत्तांत सांगीतला ॥ ३१ ॥
अशा रीतीने द्रव्य धरून राहिले असतां स्पर्धा हा बारावा अनर्थ त्या द्रव्यामध्ये नेहमी राहतो. त्याचा हा वृत्तांत सांगितला ३१.
आतां तीन अर्थांचा मेळा । एके पदीं झाला गोळा ।
तोही नांदे धनाजवळा । ऐक वेगळा विभाग ॥ ३२ ॥
तोही नांदे धनाजवळा । ऐक वेगळा विभाग ॥ ३२ ॥
आता एका शब्दांत ('व्यसनानि' या पदांत) तीन अर्थाचा मेळा एकत्र झालेला आहे, तोही द्रव्यापाशींच रहात असतो. त्याचेही निरनिराळे विभाग आता ऐक ३२.
स्त्री द्यूत आणि मद्यपान । या तिहींतें वाढवी धन ।
हे तीन अनर्थ दारुण । धनवंता पूर्ण आदळती ॥ ३३ ॥
हे तीन अनर्थ दारुण । धनवंता पूर्ण आदळती ॥ ३३ ॥
स्त्री, द्यूत आणि मद्यपान त्या तिहींना द्रव्य वाढविते. हे तीन भयंकर अनर्थ श्रीमंतावर पूर्णपणे कोसळतात ३३.
जो कां पुरुष निर्धन । तो स्त्रियेस जडिसासमान ।
देखोनि निर्धनाचें वदन । प्रत्यक्ष जाण स्त्री थुंकी ॥ ३४ ॥
देखोनि निर्धनाचें वदन । प्रत्यक्ष जाण स्त्री थुंकी ॥ ३४ ॥
निर्धन पुरुष असतो तो बायकोलाही दगडासारखा वाटतो. निर्धन पुरुषाचे तोंड पाहून प्रत्यक्ष त्याची स्त्रीही त्याच्यावर थुंकते ३४.
धनहीन पुरुषाचे घरीं । कलहो स्त्री-पुरुषांमाझारीं ।
निर्भर्त्सूनि नानापरी । दवडी घराबाहेरी पुरुषातें ॥ ३५ ॥
निर्भर्त्सूनि नानापरी । दवडी घराबाहेरी पुरुषातें ॥ ३५ ॥
निर्धन पुरुषाच्या घरांत स्त्रीपुरुषांमध्ये नेहमी कलह असतो. त्याची स्त्री नानाप्रकारें निर्भर्त्सना करून त्या पुरुषाला घराबाहेर घालवून देते ३५.
धनवंता पुरुषासी स्त्री लवोटवो करी कैसी ।
कुटका देखोनि शुनी जैसी । हालवी पुच्छासी कुंकात ॥ ३६ ॥
कुटका देखोनि शुनी जैसी । हालवी पुच्छासी कुंकात ॥ ३६ ॥
धनवान् पुरुषापाशी त्याची स्त्री कशी लुडबुड करते ? तर ज्याप्रमाणे कुत्री भाकरीचा तुकडा पाहून 'कुंकू' करीत शेपूट हालविते ३६.
त्या धनाची झालिया तुटी । स्त्री वसवसोनि लागे पाठी ।
आतां नावडती तुमच्या गोठी । रागें उठी फडफडोनी ॥ ३७ ॥
आतां नावडती तुमच्या गोठी । रागें उठी फडफडोनी ॥ ३७ ॥
पण त्या द्रव्याचा नाश झाला असता तीच स्त्री वसवसून नवऱ्याच्या पाठीला लागते. " मला नाहीं आता हे तुमचे बोलणे आवडत " असे म्हणून रागाने फणकारून उठते ३७.
दिवसा पोरांची तडातोडी । रात्रीं न सोसे तुमची वोढी ।
हातीं नाहीं फुटकी कवडी । जळो गोडी जिण्याची ॥ ३८ ॥
हातीं नाहीं फुटकी कवडी । जळो गोडी जिण्याची ॥ ३८ ॥
ती म्हणते-"दिवसा पोरांची तडातोडी चालू असते, आणि रात्री तुम्ही ओढता. ते सहन होत नाही. हातात फुटकी कवडीसुद्धा नाही. जळो ते जगण्यांतलें सुख !" ३८.
ऐशापरी कडोविकडी । निर्भर्त्सूनि दूरी दवडी ।
निर्धन पुरुषाची आवडी । न धरी गोडी स्वदारा ॥ ३९ ॥
निर्धन पुरुषाची आवडी । न धरी गोडी स्वदारा ॥ ३९ ॥
अशा प्रकारे मोठमोठ्याने निर्भर्त्सना करून नवऱ्याला दूर लोटून देते. निर्धन पुरुषाची आवड व गोडी त्याची स्त्रीसुद्धा धरीत नाही ३९.
यापरी निर्धन पुरुषासीं । स्वस्त्री वश्य नव्हे त्यासी ।
स्त्रीबाधा धनवंतासी । अहर्निशीं अनिवार ॥ ३४० ॥
स्त्रीबाधा धनवंतासी । अहर्निशीं अनिवार ॥ ३४० ॥
अशा रीतीनें निर्धन पुरुषाला त्याची स्वत:ची स्त्रीसुद्धा अनुकूल होत नाही, परंतु श्रीमंताला मात्र स्त्रीची पीडा रात्रंदिवस मनस्वी होत असते ३४०.
लक्षूनि धनवंत नर । वेश्या मिरवी श्रृंगार ।
हावभाव चमत्कार । त्यासी धनाढ्य थोर भाळले ॥ ४१ ॥
हावभाव चमत्कार । त्यासी धनाढ्य थोर भाळले ॥ ४१ ॥
श्रीमान् गृहस्थ पाहून वेश्या त्याच्यापुढे थाटमाट मिरविते. तिचे ते हावभाव व मोहक वर्तन यांना थोर धनाढ्य लोक भाळलेले असतात ४१.
वेश्याकामसंगें जाण । अखंड लांचावलें मन ।
तद्योगें मद्यपान । करिती सधन धनमदें ॥ ४२ ॥
तद्योगें मद्यपान । करिती सधन धनमदें ॥ ४२ ॥
एकदा वेश्येचा कामसंग घडला की, त्याचे मन त्यालाच निरंतर उंचावते, आणि त्याच्या योगाने द्रव्याच्या धुंदीत शेटसावकार मद्यपान करूं लागतात ४२.
मद्यापानें जो उन्मत्त । तो स्वेच्छा खेळे द्यूत ।
एवं हेही तिन्ही अनर्थ । जाण निश्चित अर्थासी ॥ ४३ ॥
एवं हेही तिन्ही अनर्थ । जाण निश्चित अर्थासी ॥ ४३ ॥
मद्यपानानें जो उन्मत्त झाला, तो स्वेच्छेनेच जुगार खेळू लागतो. असे हे तिन्ही अनर्थ द्रव्यापाशीच खात्रीने असतात असे समज ४३.
अर्थापाशीं पंधरा अनर्थ । ते सांगीतले इत्थंभूत ।
सुखाचा लेशु येथ । नाहीं निश्चित धनवंता ॥ ४४ ॥
सुखाचा लेशु येथ । नाहीं निश्चित धनवंता ॥ ४४ ॥
याप्रमाणे द्रव्यापाशी पंधरा अनर्थ असतात ते इत्थंभूत सांगितले. यावरून श्रीमंताला धनाजवळ सुखाचा एक लेशही मिळत नाही ४४.
एवं हे पंधराही अनर्थ । मूर्ख अथवा पंडित ।
जे अर्थसंग्रह करित । अवश्य हे तेथ उठती ॥ ४५ ॥
जे अर्थसंग्रह करित । अवश्य हे तेथ उठती ॥ ४५ ॥
तात्पर्य, मूर्ख असो की पंडित असो, जे कोणी द्रव्यसंचय करतात त्यांच्याठिकाणी हे पंधराही अनर्थ अवश्य उत्पन्न होतात ४५.
त्यासी नाम मात्र हा अर्थ । येर्हवीं मूर्तिमंत अनर्थ ।
यालागीं श्रेयार्थी जे हरिभक्त । तिंही निश्चित त्यागावा ॥ ४६ ॥
यालागीं श्रेयार्थी जे हरिभक्त । तिंही निश्चित त्यागावा ॥ ४६ ॥
पैसा किंवा द्रव्य यांचे केवळ नांव मात्र 'अर्थ' आहे, परंतु एरवी पाहिले तर तो मूर्तिमंत 'अनर्थ' आहे. याकरितां जे स्वहितेच्छु हरिभक्त असतील, त्यांनी निश्चयेंकरून अर्थाचा त्याग करावा ४६.
जेवीं कां बोळ हुंगेना माशी । ढेंकुण न ये तेलापाशीं ।
वोळंबा न लगे अग्नीसी । तेवीं जो अर्थासी नातळे ॥ ४७ ॥
वोळंबा न लगे अग्नीसी । तेवीं जो अर्थासी नातळे ॥ ४७ ॥
ज्याप्रमाणे माशी कधी बोळ हुंगीत नाही, किंवा ढेकूण जसा तेलापाशी येत नाही, किंवा वाळवी जशी अग्निला लागत नाही, त्याप्रमाणे जो द्रव्याला शिवत नाही ४७;
जेवीं कां अग्नीमाजीं लवण पडे । तें तडफडोनि बाहेर उडे ।
तेवीं मोक्षाचिये चाडे । जो त्यागी रोकडें निजधन ॥ ४८ ॥
तेवीं मोक्षाचिये चाडे । जो त्यागी रोकडें निजधन ॥ ४८ ॥
किंवा ज्याप्रमाणे अग्नीमध्ये मीठ पडलें असतां तें फडफडून बाहेर पडते, त्याप्रमाणे मोक्षाच्या इच्छेनें जो आपले द्रव्य तत्काल टाकून देतो, तोच स्वहितेच्छु हरिभक्त होय ४८.
बचनाग मुखीं घालितां आपण । क्षणार्ध दावी गोडपण ।
तोचि परिपाकीं आणी मरण । तैसा अर्थ जाण अनर्थीं ॥ ४९ ॥
तोचि परिपाकीं आणी मरण । तैसा अर्थ जाण अनर्थीं ॥ ४९ ॥
आपण बचनाग तोंडात घातला असता तो क्षणभर गोडपणा दाखवितो, पण परिणामी मृत्यु आणतो. त्याप्रमाणे अर्थ हा अनर्थास कारण होतो ४९.
यालागीं जो मोक्षार्थी । तेणें अर्थ न धरावा हातीं ।
काया वाचा चित्तवृत्ती । अर्थ निश्चितीं त्यागावा ॥ ३५० ॥
काया वाचा चित्तवृत्ती । अर्थ निश्चितीं त्यागावा ॥ ३५० ॥
ह्याकरिता ज्याला मोक्ष पाहिजे असेल त्याने हातामध्ये द्रव्य घेऊ नये. कायावाचामनेंकरून खरोखरच द्रव्याचा त्याग करावा ३५०.
अर्थमूळ सकळ भेद । पूर्वीं बोलिला एवंविध ।
तोचि पुनःपुनः गोविंद । करूनि विशद सांगत ॥ ५१ ॥
तोचि पुनःपुनः गोविंद । करूनि विशद सांगत ॥ ५१ ॥
सर्व प्रकारचे भेद अर्थापासून उत्पन्न होत असतात असें पूर्वी सांगितलेलेंच आहे. परंतु श्रीकृष्ण तेच पुनः पुन्हाः स्पष्ट करून सांगतात ५१.
भिद्यन्ते भ्रातरो दाराः पितरः सुहृदस्तथा ।
एकास्निग्धाः काकिणिना सद्यः सर्वेऽरयः कृताः ॥ २० ॥
एकास्निग्धाः काकिणिना सद्यः सर्वेऽरयः कृताः ॥ २० ॥
[श्लोक २०] बांधव, स्त्रिया, वडील, मित्र असे जे जे स्नेहबंधनाने एकरूप होऊन राहातात, ते सर्वजण धनामुळे इतके दुरावले जातात की, ताबडतोप ते एकमेकांचे शत्रू होतात. (२०)
इष्टमित्रांचें मित्रत्व मोडी । बंधुबंधूंचा स्न्नेह बिघडी ।
सुहृदांचें सौजन्य तोडी । फुटकी कवडी अर्थाची ॥ ५२ ॥
सुहृदांचें सौजन्य तोडी । फुटकी कवडी अर्थाची ॥ ५२ ॥
द्रव्याची एक फुटकी कवडी असली तरी ती इष्टमित्रांचे मित्रत्व मोडून टाकते, बंधूबंधूंचा स्नेह बिघडविते, आणि सुहृदांचे सौजन्य नष्ट करिते ५२.
पित्यापुत्रांमाजीं विरोध । स्त्रीपुत्रांमाजीं द्वंद्व ।
तो हा जाण अर्थसंबंध । विभांडी हार्द सुहृदांचें ॥ ५३ ॥
तो हा जाण अर्थसंबंध । विभांडी हार्द सुहृदांचें ॥ ५३ ॥
पितापुत्रांमध्ये जो विरोध, स्त्रीपुत्रांमध्ये जो कलह, तोच हा अर्थाचा संबंध आहे असे समज. तो आप्तइष्टांचे प्रेमच नष्ट करितो ५३.
काकिणी म्हणजे वीसकवडी । ते आप्तांचा स्न्नेह तोडी ।
त्यांतील एक फुटकी कवडी । भेदू पाडी सुहृदांसी ॥ ५४ ॥
त्यांतील एक फुटकी कवडी । भेदू पाडी सुहृदांसी ॥ ५४ ॥
'काकिणी' म्हणजे वीस कवड्या ; पण तेवढ्यासुद्धा आप्तांचा संबंध तोडून टाकतात. हे तर काय, पण त्यातील एक फुटकी कवडीसुद्धा इष्टमित्रांत भेद पाडिते ५४.
अर्थेनाल्पीयसा ह्येते संरब्धा दीप्तमन्यवः ।
त्यजन्त्याशु स्पृधो घ्रन्ति सहसोत्सृज्य सौहृदम् ॥ २१ ॥
त्यजन्त्याशु स्पृधो घ्रन्ति सहसोत्सृज्य सौहृदम् ॥ २१ ॥
[श्लोक २१] हे लोक थोडयाशा धनासाठी सुद्धा प्रक्षुब्ध आणि क्रुद्ध होतात एकमेकांशी स्पर्धा करू लागतात आणि एकदम मैत्री तोडून एकमेकांच्या जिवावर उठतात. (२१)
अतिअल्प अर्थासाठीं । सुहृदता सांडोनि पोटीं ।
कोपें खवळला उठी । शस्त्रमुठी उद्यत ॥ ५५ ॥
कोपें खवळला उठी । शस्त्रमुठी उद्यत ॥ ५५ ॥
द्रव्यार्थी मनुष्य अत्यंत अल्प द्रव्याकरितां अंत:करणांतील मित्रत्व सोडून रागाने संतप्त होऊन उठतो, आणि मुठीत शस्त्र धरून घाव घालावयालाही तयार होतो ५५.
तेथें आप्त होऊनि अनाप्त । परस्परें करिती घात ।
अर्थ अनर्थी प्राणांत । निजस्वार्थघातकू ॥ ५६ ॥
अर्थ अनर्थी प्राणांत । निजस्वार्थघातकू ॥ ५६ ॥
अशा वेळी आप्त असतात तेच शत्रु होऊन एकमेकांचा घात करतात. अर्थ हा माणसाला अनर्थामध्ये पाडून त्याचा प्राणान्तही घडवितो. अशा प्रकारें अर्थ हा आपल्या स्वार्थाचाही घात करणारा आहे ५६.
जितां अर्थ अनर्थ करी । मेल्या ने नरकद्वारीं ।
उत्तम देहाची बोहरी । अर्थ करी ते ऐक ॥ ५७ ॥
उत्तम देहाची बोहरी । अर्थ करी ते ऐक ॥ ५७ ॥
जिवंत असेपर्यंत हे द्रव्य अनर्थ करते, आणि मेल्यावर नरकाच्या द्वारी नेते. आता हेच द्रव्य उत्तम देहाची कशी राखरांगोळी करून टाकतें तेंही ऐक ५७.
लब्ध्वा जन्मामरप्रार्थ्यं मानुष्यं तद्द्विजाग्र्यताम् ।
तदानादृत्य ये स्वार्थं घ्रन्ति यान्त्यशुभां गतिम् ॥ २२ ॥
तदानादृत्य ये स्वार्थं घ्रन्ति यान्त्यशुभां गतिम् ॥ २२ ॥
[श्लोक २२] देवतांनीही इच्छा करावी, असा मनुष्यजन्म आणि त्यातही श्रेष्ठ असे ब्राह्मणत्व होऊनही जे त्याचा अनादर करून आपल्या खर्या स्वार्थाला तिलांजली देतात, ते अशुभ गतीला जातात. (२२)
कोटि जन्माचें शुद्ध सुकृत । तेणें कर्मभूमीं नरदेह प्राप्त ।
तेथेंही वर्णाग्र्य समर्थ । सत्कुळप्रसूत ब्राह्मणत्वें ॥ ५८ ॥
तेथेंही वर्णाग्र्य समर्थ । सत्कुळप्रसूत ब्राह्मणत्वें ॥ ५८ ॥
कोट्यवधि जन्मांचे निर्मळ पुण्य असावे, तेव्हांच या कर्मभूमीत (भरतखंडात) मनुष्यदेह प्राप्त होतो. त्यांतही सर्व वर्णात अग्रगण्य अशा सामर्थ्यवान् ब्राह्मणवांमध्ये जन्म, आणि त्या ब्राह्मणवर्णात उत्तम कुळामध्ये जन्म ५८.
ऐसे जन्म पावावया येथ । अमरही मरण मागत ।
इंद्रादि देव जे स्वर्गस्थ । तेही वांछित हें जन्म ॥ ५९ ॥
इंद्रादि देव जे स्वर्गस्थ । तेही वांछित हें जन्म ॥ ५९ ॥
असा जन्म या मृत्युलोकी प्राप्त होण्यासाठी देवही मरणाची इच्छा करतात. स्वर्गातील इंद्रादिक जे देव आहेत तेही असल्या जन्माची इच्छा करतात ५९.
जे सत्यलोकपर्यंत । ऐश्वर्य पावले अद्भुत ।
तेही हें जन्म वांछित । उत्कंठित अहर्निशीं ॥ ३६० ॥
तेही हें जन्म वांछित । उत्कंठित अहर्निशीं ॥ ३६० ॥
सत्यलोकापर्यंत अद्भुत ऐश्वर्य ज्यांना प्राप्त झालें आहे, तेसुद्धा या जन्माची इच्छा करतात. इतकेच नव्हे तर रात्रंदिवस त्यासाठी उत्कंठित असतात ३६०.
येथ करितां भगवद्भक्ती । पायां लागती चारी मुक्ती ।
यालागीं हे जन्मप्राप्ती । अमर मागती अहर्निशीं ॥ ६१ ॥
यालागीं हे जन्मप्राप्ती । अमर मागती अहर्निशीं ॥ ६१ ॥
अशा ह्या जन्मांत भगवद्भक्ति केली, तर चारही मुक्ति पायीं लागतात, म्हणून या जन्माची प्राप्ति व्हावी असे देव रात्रंदिवस मागत असतात ६१.
ऐसें उत्तम जन्म पावोनी । अतिअभाग्य मी त्रिभुवनीं ।
निजस्वार्थातें उपेक्षूनी । भुललों धनीं धनलोभें ॥ ६२ ॥
निजस्वार्थातें उपेक्षूनी । भुललों धनीं धनलोभें ॥ ६२ ॥
असा उत्तम जन्म प्राप्त झाला असूनही त्रिभुवनांत मी अत्यंत अभागी झालों आणि आपल्या स्वार्थाची उपेक्षा करून द्रव्यलोभाने द्रव्याच्याच ठिकाणी भुलून पडलों ६२.
धनलोभाचिया भ्रांती । कां लोकेषणा लौकिकस्थिती ।
जो उपेक्षी भगवद्भक्ती । अशुभ गती तयासी ॥ ६३ ॥
जो उपेक्षी भगवद्भक्ती । अशुभ गती तयासी ॥ ६३ ॥
द्रव्यलोभाच्या भ्रांतीने किंवा लोकांत प्रतिष्ठा व्हावी अशा लौकिकाच्या बुद्धीनें जो भगवद्भक्तीची उपेक्षा करतो, त्याला दुर्गति प्राप्त होते ६३.
तेचि कैशी अशुभ गती । धनलोभ्यां नरकप्राप्ती ।
चौर्यांशीं लक्ष योनींप्रती । गर्भ भोगिती अतिदुःखें ॥ ६४ ॥
चौर्यांशीं लक्ष योनींप्रती । गर्भ भोगिती अतिदुःखें ॥ ६४ ॥
ती दुर्गति कसली? तर द्रव्यलोभ्यांना नरकवास प्राप्त होतो आणि ते चौऱ्यायशी लक्ष योनीमध्ये अत्यंत दुःखाने गर्भवास भोगीत राहातात ६४.
जया ब्राह्मणजन्माआंत । स्वर्गमोक्ष सहजें प्राप्त ।
तेचि अर्थींचा इत्यर्थ । स्वयें सांगत धनलोभी ॥ ६५ ॥
तेचि अर्थींचा इत्यर्थ । स्वयें सांगत धनलोभी ॥ ६५ ॥
ज्या ब्राह्मणजन्मामध्ये स्वर्ग आणि मोक्ष सहजी प्राप्त होतात, त्याच अर्थाचे रहस्य तो द्रव्यलोभी स्वतः सांगत आहे ६५.
स्वर्गापवर्गयोर्द्वारं प्राप्य लोकमिमं पुमान् ।
द्रविणे कोऽनुषज्जेत मर्त्योऽनर्थस्य धामनि ॥ २३ ॥
द्रविणे कोऽनुषज्जेत मर्त्योऽनर्थस्य धामनि ॥ २३ ॥
[श्लोक २३] मोक्ष आणि स्वर्गाचे द्वारे असे मनुष्यशरीर मिळूनही अनर्थाचे घर असलेल्या धनाच्या कचाट्यात कोणता शहाणा मनुष्य सापडेल ? (२३)
ब्राह्मणें करितां स्वधर्म । वासना झळंबे स्वर्गकाम ।
तैं इंद्रचंद्रादिकांचें धाम । पावे द्विजोत्तम सहजचि ॥ ६६ ॥
तैं इंद्रचंद्रादिकांचें धाम । पावे द्विजोत्तम सहजचि ॥ ६६ ॥
ब्राह्मणाने आपल्या धर्माप्रमाणे वर्तन केले असता त्याला स्वर्गप्राप्तीची इच्छा उत्पन्न होते. त्या वेळी तो ब्राह्मणश्रेष्ठ इंदचंद्रादिकांचे स्थानही सहज मिळवू शकतो ६६.
ज्याचिया याजनस्थिती । इतरांसी होय स्वर्गप्राप्ती ।
एवं स्वर्ग तो ब्राह्मणांच्या हातीं । त्यांसी ते गती सहजचि ॥ ६७ ॥
एवं स्वर्ग तो ब्राह्मणांच्या हातीं । त्यांसी ते गती सहजचि ॥ ६७ ॥
ज्याच्या यज्ञकर्मामुळे इतरांनासुद्धा स्वर्गप्राप्ति होते. अशा रीतीनें स्वर्ग हा ब्राह्मणांच्या हातांतीलच असल्यामुळे त्यांना ही स्वर्गगति साहजिकच प्राप्त होते ६७.
सांडूनि ईषणात्रयासी । निष्काम स्वधर्म ज्या द्विजासी ।
मोक्ष लागे त्याच्या पायांसी । तिष्ठे अहर्निशीं आज्ञाधारी ॥ ६८ ॥
मोक्ष लागे त्याच्या पायांसी । तिष्ठे अहर्निशीं आज्ञाधारी ॥ ६८ ॥
लोकेषणा, पुत्रेषणा व दारेषणा ह्या तीन ईषणांना सोडून ज्या ब्राह्मणाला निष्काम स्वधर्माचरण घडते, त्याच्या चरणाला मोक्षही लागतो, आणि रात्रंदिवस त्याचा आज्ञाधारक होऊन राहातो ६८.
तो अनुग्रही जयांसी । ते पावती निजमोक्षासी ।
एवढें सामर्थ्य ब्राह्मणापाशीं । अनायासीं सहजचि ॥ ६९ ॥
एवढें सामर्थ्य ब्राह्मणापाशीं । अनायासीं सहजचि ॥ ६९ ॥
तो ज्यांच्यावर कृपा करील, तेही मोक्षपदाला पावतील, एवढे सामर्थ्य ब्राह्मणापाशी अगदी अनायासें सहज असते ६९.
स्वर्ग जयाची पायरी । मोक्ष ज्याचा आज्ञधारी ।
एवढी ब्राह्मणत्वाची थोरी । धनलोभावारी नाशिती ॥ ३७० ॥
एवढी ब्राह्मणत्वाची थोरी । धनलोभावारी नाशिती ॥ ३७० ॥
स्वर्ग हा ज्याच्या पायाखालची पायरी आहे, मोक्ष ज्याचा आज्ञाधारक आहे, एवढी ब्राह्मणपणाची थोरवी असून अशा ब्राह्मणजन्माचा द्रव्यलोभावारी नाश करून टाकतात ३७०.
ब्राह्मणजन्म पावल्या जाण । निःशेष खुंटे जन्ममरण ।
तेथ मी नाडलों जाण । जोडूनि धन धनलोभें ॥ ७१ ॥
तेथ मी नाडलों जाण । जोडूनि धन धनलोभें ॥ ७१ ॥
ब्राह्मणजन्म प्राप्त झाला असतां जन्ममरण पूर्णपणे नाहीसे होते असे असतां मी मात्र द्रव्यलोभाने द्रव्य मिळवून फशी पडलों ७१.
दुर्लभ येथें माणुसपण । त्यामाजीं अतिदुर्लभ ब्राह्मण्य ।
तेंही पावोनि मे आपण । धनलोभें पूर्ण नागवलों ॥ ७२ ॥
तेंही पावोनि मे आपण । धनलोभें पूर्ण नागवलों ॥ ७२ ॥
या जगामध्ये आधीं मनुष्यपणा दुर्मिळ आहे. त्यांत ब्राह्मणपणा तर फारच दुर्लभ. पण ते ब्राह्मणपण प्राप्त होऊनही मी स्वतः द्रव्यलोभाने पूर्णपणे फसलों ७२.
पावोनि ब्राह्मणशरीर । धनें नाडले थोरथोर ।
अर्थ अनर्थाचें मुख्य घर । दुःख दुर्धर वाढवी ॥ ७३ ॥
अर्थ अनर्थाचें मुख्य घर । दुःख दुर्धर वाढवी ॥ ७३ ॥
ब्राह्मणाचा देह प्राप्त होऊन द्रव्यामुळे मोठमोठे लोकही नागवले आहेत. अर्थ हा खरोखर अनर्थाचेंच मुख्य घर असून तो दुर्धर दुःख मात्र वाढवितो ७३.
अर्थ अनर्थाचें भाजन । तें निःशेष त्यागावें धन ।
वैराग्यें तापला पूर्ण । स्वयें ब्राह्मण बोलत ॥ ७४ ॥
वैराग्यें तापला पूर्ण । स्वयें ब्राह्मण बोलत ॥ ७४ ॥
द्रव्य हें अनर्थाचेंच स्थान आहे, म्हणून ते द्रव्य पूर्णपणे टाकून द्यावे. याप्रमाणे वैराग्याने पूर्णपणे संतप्त झालेला तो ब्राह्मण स्वत: बोलू लागला ७४.
आशंका ॥ दैवें जोडिलें संपत्तीसी । नेऊनि सांडावे बिदीसी ।
कां घालावें जळप्रवाहेंसीं । त्याग अर्थासी तो कैसा ॥ ७५ ॥
कां घालावें जळप्रवाहेंसीं । त्याग अर्थासी तो कैसा ॥ ७५ ॥
[आशंका] दैवयोगाने संपत्ति प्राप्त करून दिली, तर ती काय उकिरड्यावर टाकून द्यावी ? किंवा पाण्यात नेऊन टाकावी? द्रव्याचा त्याग तो कसा करावयाचा ? ७५.
तें अर्थत्यागनिरूपण । स्वयें सांगताहे ब्राह्मण ।
जे असतील सधन । तिंहीं सावधान परिसावें ॥ ७६ ॥
जे असतील सधन । तिंहीं सावधान परिसावें ॥ ७६ ॥
तें द्रव्यत्यागाचे वर्णन तो कदर्यु ब्राह्मण स्वतः सांगत आहे. जे धनसंपन्न असतील त्यांनी नीट लक्ष देऊन ऐकावे ७६.
देवर्षिपितृभूतानि ज्ञातीन्बन्धूंश्च भागिनः ।
असंविभज्य चात्मानं यक्षवित्तः पतत्यधः ॥ २४ ॥
असंविभज्य चात्मानं यक्षवित्तः पतत्यधः ॥ २४ ॥
[श्लोक २४] जो मनुष्य देव, ऋषी, पितर, प्राणी, बांधव, कुटुंबीय आणि धनाचे दुसरे भागीदार यांना त्यांचा हिस्सा देत नाही किंवा स्वतःही त्याचा उपभोग घेत नाही, धनाचे रक्षण करणार्या यक्षाप्रमाणे असणारा तो कंजूष अधोगतीला जातो. (२४)
दैवें जोडिलिया धन । आचरावे पंचमहायज्ञ ।
करावें भगवत्पूजन । उल्हासें जाण महोत्साहें ॥ ७७ ॥
करावें भगवत्पूजन । उल्हासें जाण महोत्साहें ॥ ७७ ॥
दैवयोगाने द्रव्य मिळाले असतां पंचमहायज्ञ (भूतयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ व मनुष्ययज्ञ) करावे. उत्साहाने मोठा उत्सव करून भगवंताचे पूजन करावें ७७.
स्वयें करावें पितृतर्पण । षण्णवति श्राद्धें जाण ।
पितर उद्धरावे आपण । गयावर्जन करोनियां ॥ ७८ ॥
पितर उद्धरावे आपण । गयावर्जन करोनियां ॥ ७८ ॥
स्वतः पितृतर्पण करावें. दरवर्षी शाण्णव श्राद्धे (१२ अमावास्या, ४ युगादितिथि, १४ मन्वादितिथि, १२ सूर्यसंक्रांति, १२ वैधति, १२ व्यतिपात, १५ महालय, ५ अष्टका, ५ अन्वष्टका, व ५ पुर्वेयुः मिळून एकंदर ९६) करावी. स्वतः गयावर्जन करून पितरांचा उद्धार करावा ७८.
जित्यां पितरां त्रिकाळीं नमन । कदा न करावें हेळण ।
त्यांची अवज्ञा आपण । प्राणांतीं जाण न करावी ॥ ७९ ॥
त्यांची अवज्ञा आपण । प्राणांतीं जाण न करावी ॥ ७९ ॥
जिवंत असलेल्या वडील माणसांना त्रिकाळ नमस्कार करीत जावें. त्यांचा कधीही अवमान करूं नये. आपण प्राणांतीसुद्धा त्यांची अवज्ञा करूं नये ७९.
त्यांसी गौरवूनि आपण । यथारुचि द्यावें अन्न ।
यथाशक्ति द्यावें धन । सेवेनें संपूर्ण सुखी करावीं ॥ ३८० ॥
यथाशक्ति द्यावें धन । सेवेनें संपूर्ण सुखी करावीं ॥ ३८० ॥
आपण त्यांचा गौरव करून त्यांना पाहिजे तसे अन्न द्यावें, यथाशक्ति द्रव्य द्यावे, आणि त्यांची सेवा करून वडील माणसें सुखी करावी ३८०.
पिता स्वयमेव नारायण । माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण ।
ऐसें भावें ज्याचें भजन । सुपुत्र जाण तो एक ॥ ८१ ॥
ऐसें भावें ज्याचें भजन । सुपुत्र जाण तो एक ॥ ८१ ॥
पिता हा प्रत्यक्ष नारायणस्वरूप आहे, व आई ही प्रत्यक्ष लक्ष्मीस्वरूप आहे, अशा भावनेने ज्याच्याकडून पितृ-मातृसेवा घडते, तोच एक सत्पुत्र होय ८१.
ज्याचे सेवेनें सुखी पितर । तेंचि पितृतर्पण साचार ।
जितां अवज्ञा तो अनाचार । मेल्या श्राद्धविचार तो लौकिक ॥ ८२ ॥
जितां अवज्ञा तो अनाचार । मेल्या श्राद्धविचार तो लौकिक ॥ ८२ ॥
ज्याच्या सेवेनें पितर संतोषित होतात, तेंच खरोखर पितृतर्पण होय. आणि जिवंतपणी त्यांची अवज्ञा करणे तोच अनाचार होय. मेल्यावर श्राद्ध करणे तो केवळ लोकाचार आहे ८२.
जो पितृवचन अविश्वासी । तेणें केल्या पापराशी ।
जो पितृवचन विश्वासी । मोक्ष त्यापाशीं वोळंगणा ॥ ८३ ॥
जो पितृवचन विश्वासी । मोक्ष त्यापाशीं वोळंगणा ॥ ८३ ॥
वडिलांच्या वचनावर जो विश्वास ठेवीत नाही, त्याने पापाच्या राशींच्या राशी जोडल्या म्हणून समजावें, आणि जो वडिलांच्या वचनावर विश्वास ठेवतो, त्याच्याजवळ मोक्षही सेवक होऊन राहातो ८३.
जितमृतपितृतर्पण । ते सांगीतली उणखूण ।
या नांव गा पितृभजन । ऋषिपूजन तें ऐक ॥ ८४ ॥
या नांव गा पितृभजन । ऋषिपूजन तें ऐक ॥ ८४ ॥
जिवंत पितरांना आणि मृत पितरांना कसे तृप्त करावे, याचे रहस्य सांगितले. ह्याचंच नांव पितृभजन. आता ऋषिपूजन कसे करावें तें ऐक ८४.
सन्मानें आणूनि ब्राह्मण । श्रद्धा कीजे चरणक्षाळण ।
चरणतीर्था अभिवंदन । सबाह्य जाण स्वयें कीजे ॥ ८५ ॥
चरणतीर्था अभिवंदन । सबाह्य जाण स्वयें कीजे ॥ ८५ ॥
सन्मानपूर्वक ब्राह्मणाला आणून श्रद्धेनें त्याचे पाय धुवावे. त्याच्या चरणांच्या तीर्थाला स्वतः अभिवादन करून त्यांतील काही प्राशन करावे व काही शरीरावर सिंचन करावें ८५.
धूपें दीपें यथोक्त पूजन । यथारुचि तृप्ति सदन्न ।
यथाशक्ति द्यावें धन । ऋषिपूजन या नांव ॥ ८६ ॥
यथाशक्ति द्यावें धन । ऋषिपूजन या नांव ॥ ८६ ॥
धूप, दीप इत्यादिकांनी यथासांग पूजा करावी व त्यास आवडेल तसेंच उत्तम अस तृप्ति होईपर्यंत करावे. तसेच यथाशक्ति द्रव्य द्यावे. ह्याचे नांव ऋषिपूजन ८६.
ब्राह्मण तेचि ऋषीश्वर । ब्राह्मणें तृप्त सनत्कुमार ।
ब्राह्मणमुखें शार्ङ्गधर । धाला ढेंकर देतसे ॥ ८७ ॥
ब्राह्मणमुखें शार्ङ्गधर । धाला ढेंकर देतसे ॥ ८७ ॥
ब्राह्मण हाच महर्षि होय. ब्राह्मणाच्या योगाने सनत्कुमार तृप्त होतात. ब्राह्मणाच्या मुखानेंच श्रीकृष्ण तृप्त होऊन ढेकर देतो ८७.
बंधु स्वगोत्र स्वजन । त्यांची दरिद्रपीडा दारुण ।
निरसावी देऊनि धन । हा मुख्य धर्म जाण श्रेष्ठत्वें ॥ ८८ ॥
निरसावी देऊनि धन । हा मुख्य धर्म जाण श्रेष्ठत्वें ॥ ८८ ॥
भाऊ, सोयरेधायरे, इष्टमित्र, यांची अत्यंत भयंकर दरिद्रपीडा त्यांना द्रव्य देऊन नाहींशी करावी, हाच मुख्यतः श्रेष्ठ धर्म होय ८८.
कुटुंब पीडूनि आपण । अन्यत्रां द्यावें अन्नधन ।
तोचि अधर्म परिपूर्ण । शुद्ध पुण्य तें नव्हे ॥ ८९ ॥
तोचि अधर्म परिपूर्ण । शुद्ध पुण्य तें नव्हे ॥ ८९ ॥
आपण आपल्या कुटुंबाला पीडा देऊन दुसऱ्याला अन्नधन द्यावयाचे तोच पूर्णपणे अधर्म होय. ते पुण्य शुद्ध नव्हे ८९.
कुटुंबासी यथोचित । सुखी करूनि समस्त ।
याहूनि उरला जो अर्थ । तो श्रेयार्थ वेंचावा ॥ ३९० ॥
याहूनि उरला जो अर्थ । तो श्रेयार्थ वेंचावा ॥ ३९० ॥
आपल्या कुटुंबांतील सर्व मनुष्यांना पूर्णपणे सुखी करून त्यानंतर जे द्रव्य उरेल तेंच परोपकारार्थ खर्च करावें ३९०.
अतिथि आलिया देख । अन्न द्यावें आवश्यक ।
तो झालिया पराङ्मुख । पुण्य निःशेष हरासे ॥ ९१ ॥
तो झालिया पराङ्मुख । पुण्य निःशेष हरासे ॥ ९१ ॥
कोणी अतिथि आला असता त्याला अवश्य अन्न द्यावें. तो जर विन्मुख जाईल तर आपले सर्व पुण्य लयास जातें ९१.
सकळ दानांमाजीं जाण । अतिश्रेष्ठ अन्नदान ।
दीनास देऊनि सन्मान । द्यावें सदन्न अतिश्रद्धा ॥ ९२ ॥
दीनास देऊनि सन्मान । द्यावें सदन्न अतिश्रद्धा ॥ ९२ ॥
सर्व दानांमध्ये अन्नदान हे अत्यंत श्रेष्ठ आहे. गोरगरिबाचा सन्मान करून त्याला अत्यंत भक्तिभावानें सुग्रास अन्न द्यावें ९२.
कुटुंब सुखी करी आपण । स्वेच्छा दे दीनभोजन ।
परी कदर्थवी जो निजप्राण । तोही दारुण अधर्म ॥ ९३ ॥
परी कदर्थवी जो निजप्राण । तोही दारुण अधर्म ॥ ९३ ॥
जो स्वतः कुटुंबाला सुखी करितो, गोरगरिबाला यथेच्छ जेवावयाला घालतो, पण स्वतःचे प्राण मात्र उपाशी मारतो, त्याचें तें वर्तनही मोठा अधर्मच होय ९३.
जैसें कीजे दीनतर्पण । त्यांत आपणही एक दीन ।
तेथ न करूनि अधिकन्यून । करावें भोजन समभागें ॥ ९४ ॥
तेथ न करूनि अधिकन्यून । करावें भोजन समभागें ॥ ९४ ॥
जसें गोरगरिबाला आपण देतो, त्यांत आपणही एक गरीबच आहो असे समजून, त्यामध्ये काहीएक कमीजास्त न करता सर्वांच्या बरोबरीने भोजन करावें ९४.
पंक्तीमाजीं प्रपंचपण । तें अन्नदानीं अतिविघ्न ।
यालागीं करावें भोजन । समभागीं आपण सकळांसीं ॥ ९५ ॥
यालागीं करावें भोजन । समभागीं आपण सकळांसीं ॥ ९५ ॥
पंक्तिप्रपंच करणे (पंक्तीमध्ये एकाला चांगला पदार्थ तर दुसऱ्याला वाईट पदार्थ वाढणे, किंवा एकाला पोटभर तर दुसऱ्याला अर्धपोटी वाढणे ) हेही अन्नदानांतील एक मोठे विघ्न आहे. ह्याकरितां सर्वांशी बरोबरीने आपण स्वतः भोजन करावें ९५.
धनाचा सद्व्ययो खरा । द्यावें अनाथप्रेतसंस्कारा ।
अर्पावें दीनांच्या उद्धारा । धाडावें घरा अयाचितांच्या ॥ ९६ ॥
अर्पावें दीनांच्या उद्धारा । धाडावें घरा अयाचितांच्या ॥ ९६ ॥
द्रव्याचा खरा सद्वय म्हणजे ते अनाथांच्या प्रेतसंस्काराला द्यावें, गोरगरिबांचा उद्धार करण्यासाठी द्यावे, किंवा अयाचिताच्या घरी पाठवून द्यावे ९६.
अंध पंगु मुके दीन । यांसी संरक्षी जो आपण ।
त्याचेंचि सार्थक धन । शुद्ध पुण्य तयाचें ॥ ९७ ॥
त्याचेंचि सार्थक धन । शुद्ध पुण्य तयाचें ॥ ९७ ॥
आंधळे, पांगळे, मुके, दीनदुबळे, यांचे जो आपण होऊन संरक्षण करतो. त्याचेच धन सार्थकी लागले व त्याचेच पुण्य शुद्ध होय असे समजावें ९७.
साधुसज्जनां विचंबू अडी । तो विचंबू जो सधन तोडी ।
त्याच्या निजधर्माची गुडी । उभारे रोकडी वैकुंठीं ॥ ९८ ॥
त्याच्या निजधर्माची गुडी । उभारे रोकडी वैकुंठीं ॥ ९८ ॥
साधु व सज्जन यांना जें संकट अडचणीत आणते, तें संकट जो धनवान् मनुष्य नाहींसें करितो, त्याच्या धर्मशीलतेची गुढी साक्षात् वैकुंठांत उभी राहाते ९८.
दुर्बळ जो कां भगवद्भक्त । त्यासी संरक्षी जो धनवंत ।
तेणें तुष्टला भगवंत । त्यातें उद्धरीत भक्ताआधीं ॥ ९९ ॥
तेणें तुष्टला भगवंत । त्यातें उद्धरीत भक्ताआधीं ॥ ९९ ॥
जो भगद्भक्त दुर्बळ असेल, त्याचें जो श्रीमंत संरक्षण करतो, त्याच्यावर भगवान् संतुष्ट होतो, आणि त्या भक्ताच्या आधीच त्याला उद्धरतो ९९.
सकळमंगळां मंगळ पूर्ण । सकळ कल्याणाचें कल्याण ।
ते हे सद्गुरुश्रीचरण । तेथ निजधन जयांचें अर्पे ॥ ४०० ॥
ते हे सद्गुरुश्रीचरण । तेथ निजधन जयांचें अर्पे ॥ ४०० ॥
सर्व मंगलांनी परिपूर्ण, सर्व कल्याणांचे कल्याण, ते हे सद्गुरूचे पवित्र चरण होत. तेथे ज्याचे स्वतःचे द्रव्य अर्पण होईल ४००,
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या १ ते १००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या १0१ ते २००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या २०१ ते ३००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ३०१ ते ४००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ४०१ ते ५००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ५०१ ते ६००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ६०१ ते ७००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ७०१ ते ८००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ८०१ ते ९००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ९०१ ते १००४
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...