मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ८०१ ते ९००

    आत्मा सुखदुःखांसी कारण । मूळीं मजचि हें अप्रमाण ।

    आत्म्याच्या ठायीं कार्यकारण । सुखदुःख जाण असेना ॥ १ ॥
    आत्मा हा सुखदुःखांस कारण आहे म्हणावें, तर ते मुळांत मलाच मान्य नाही. कारण, आत्म्याच्या ठिकाणी कार्यकारण व सुखदुःख ही असतच नाहीत १.


    आत्मा यदि स्यात्सुखदुःखहेतुः किमन्यतस्तत्र निजस्वभावः ।
    न ह्यात्मनोऽन्यद्यदि तन्मृषा स्यात् क्रुध्येत कस्मान्न सुखं न दुःखम् ॥ ५३ ॥
    [श्लोक ५३] सुखदुःखाचे कारण आत्मा आहे असे मानले, तर त्याचा इतरांशी काय संबंध ? तो त्याचाच स्वभाव ठरेल कारण आत्म्याव्यतिरिक्त आणखी काहीही नाही काही भासमान होत असेल, तर ते खोटे आहे म्हणून सुखदुःखही नाहीत मग रागाचे कारणच काय ? (५३)


    आत्मा केवळ एकला एक । तेथ कैंचें सुख कैंचें दुःख ।
    आत्मा सुखदुःखदायक । म्हणती ते मूर्ख अविवेकी ॥ २ ॥
    आत्मा हा केवळ एकटा एक आहे; तेथे कसलें सुख आणि कसले दुःख ! आत्मा हाच सुखदुःख देणारा आहे असे जे म्हणतात, ते मूर्ख व अविचारी होत २.


    जेवीं विघुरलें घृत जाण । त्यासी नसे आकार ना वर्ण ।
    तेंचि सहजें थिजोनि जाण । दिसे शुभ्रवर्ण कणिकारूपें ॥ ३ ॥
    ज्याप्रमाणे पातळ झालेले तूप असलें म्हणजे त्याला आकारही नसतो आणि वर्णही नसतो, पण तेंच आपोआप थिजलें म्हणजे कण्याकण्यांच्या आकाराने पांढरें दिसू लागते ३, 


    त्या घृतकणिका मिळतां देख । नाहीं परस्परें सुखदुःख ।
    तेवीं निजात्मा एकला एक । तोचि अनेक स्वरूपें ॥ ४ ॥
    व त्या तुपाच्या कण्या एके ठिकाणी मिळाल्या असता त्यांना परस्परांपासून सुखदुःख होत नाही. त्याप्रमाणे आपला आत्मा हा एकटा एकच असून तोच अनेक स्वरूपें धारण करतो ४.


    जळीं जळाच्या जळलहरी । आदळतांही परस्परीं ।
    सुखदुःख नुमटे त्यांमाझारीं । तेवीं चराचरीं परमात्मा ॥ ५ ॥
    पाण्यामध्ये पाण्याच्या लाटा एकमेकींवर आदळल्या असता त्यांच्यामध्ये सुखदुःख उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणेच चराचरामध्ये परमात्मा असतो ५.


    परमात्मा एकला एक । एकपणेंचि तो अनेक ।
    तेथ विजातीय नाहीं देख । मा सुखदुःख कोणाचें ॥ ६ ॥
    परमात्मा हा एकटा एक असून एकपणानेच तो अनेकविध होतो. म्हणून त्यांत निरनिराळेपणा नाही. मग सुख आणि दुःख कोणाचे? ६.


    आत्मा सुखरूप अवघा एक । तेथ आभासे जें अनेक ।
    तें मायामय काल्पनिक । स्वप्नप्राय देख मिथ्यात्वें ॥ ७ ॥
    आत्मा आनंदस्वरूप असून सर्वत्र एकच आहे. त्यांत ज्या अनेकत्वाचा भास होतो, तें अनेकत्व मायामय असून काल्पनिक आहे. मिथ्या असल्यामुळे स्वप्नवत होय ७.


    मृगजळीं पाहतां दिसे जळ । परी तें कोरडें देख केवळ ।
    तेवीं दिसे जें जगड्वाळ । तें मिथ्या समूळ मायिक ॥ ८ ॥
    मृगजळामध्ये पाहूं लागळे असतां पाणीच दिसते. पण ते निखालस कोरडेच असते. त्याप्रमाणे हे जे जग पसरलेले दिसते, ते मिथ्या व समूळ मायिक होय ८.


    जेथ मिथ्या द्वैत मायिक । तेथ परमात्मा एकला एक ।
    तेव्हांचि हारपलें सुखदुःख । कोपावया निःशेख ठावो नाहीं ॥ ९ ॥
    जेथे मायामय मिथ्या भेदाभेद असतात, तेथे एकटा एक परमात्माच असतो. तेव्हां अर्थातच सुखदुःखें नाहींशी झाली, आणि राग करावयाला मुळीच जागा राहिली नाहीं ९.


    जेथ निजात्मता एकपण । तेथ सुखदुःखें नाहीं जाण ।
    कोणावरी कोपे कोण । आपल्या आपण एकला ॥ ८१० ॥
    जेथे आपल्या आत्म्याच्या योगानेच सर्वत्र एकात्मता आहे, तेथें सुखदुःखें नाहीत हे लक्षात ठेव. सर्वत्र आपला आपण एकटाच असल्यामुळे कोण कोणावर रागावणार ? ८१०.


    जेथ आत्म्याचा निजानुभवो । तेथ द्वैताचा अभावो ।
    सुखदुःखें झाली वावो । कोपासी ठावो असेना ॥ ११ ॥
    जेथें आत्म्याला स्वतःचाच अनुभव आला, तेथें द्वैताचा अभाव होतो; आणि सुखदुःखेही मिथ्या झाली, की त्यामुळे क्रोधालाही जागा राहात नाही ११.


    हे निजात्मता नेणोनि देख । सत्य मानिती जे सुखदुःख ।
    ते होत कां वेदशास्त्रज्ञ लोक । तयां क्रोध देख विभांडी ॥ १२ ॥
    ही आत्मस्वरूपता न जाणतां जे लोक सुखदुःख खरे मानतात, ते लोक जरी वेदशास्त्रवेत्ते असले, तरी क्रोध त्यांची वाताहात करितो १२.


    ज्यासी सर्व भूतीं निजात्मता । तेथ कोण कोणा दुःखदाता ।
    कोण कोणावरी कोपता । निजात्मता एकली ॥ १३ ॥
    सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी ज्याला आत्मभाव दिसतो, तेथे कोण कोणाला दुःख देणार १ आणि कोण कोणावर रागावणार ? कारण सर्वत्र एकटें आत्मस्वरूपच असते १३.


    आत्मा सुखदुःखांचा दाता । यापरी नव्हे गा तत्त्वतां ।
    आपण्या आपण व्यथा । मूर्खही सर्वथा न देती ॥ १४ ॥
    ह्याप्रमाणे खरोखर आत्मा हा सुखदुःख देणारा नव्हे. कारण, अगदी मूर्ख असले तरी तेसुद्धा आपणच आपल्याला दुःख देत नाहीत १४.


    एथिलेनि चौथे मतें । ग्रह मानावे दुःखदाते ।
    तेंही न घडे गा येथें । ऐक निश्चितें सांगेन ॥ १५ ॥
    यांतल्याच चौथ्या मताप्रमाणे ग्रह हे दुःख देणारे आहेत असे मानले, तर येथें तेंही खरोखर घडत नाही. ऐक. तुला निश्चितपणे सांगतों १५.


    ग्रहा निमित्तं सुखदुःखयोश्चेत् किमात्मनोऽजस्य जनस्य ते वै ।
    ग्रहैर्ग्रहस्यैव वदन्ति पीडां क्रुध्येत कस्मै पुरुषस्ततोऽन्यः ॥ ५४ ॥
    [श्लोक ५४] सुखदुःख देणारे ग्रह आहेत असे मानले, तर अजन्मा अशा आत्म्याला सुखदुःख देण्यास कारणीभूत ठरू शकत नाहीत कारण जी शरीरे ज्या लग्नावर जन्मतात, त्यांनाच ग्रह त्रास देऊ शकतात आत्म्याचा त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याने तो क्रोध कोणावर करणार ? (५४)


    जननीजठरीं जन्मे जाण । त्या देहाचें नांव म्हणती जन ।
    ते जन्मकाळीं जें होय लग्न । त्या जन्मापासून पूर्ण ग्रहगति लागे ॥ १६ ॥
    देह जननीच्या उदरामध्ये जन्म घेतो, म्हणून त्या देहाला 'जन' असें नांव देतात. त्या जन्मकाळी जे लग्न असते, त्या जन्मलग्नाला जन्मकालापासून ग्रहांची परिभ्रमणे सुरू होतात १६.


    तेथ द्वादशाष्टमजन्मस्थ । शुभाशुभ ग्रह जे येत ।
    ते सुखदुःखांतें देत । आत्मा अलिप्त ग्रहगतीं ॥ १७ ॥
    त्यांत बारावा आठवा, जन्मस्थ अशा प्रकारें निरनिराळ्या स्थानी जे शुभाशुभ ग्रह असतात, तेच सुखदुःख देतात. परंतु आत्मा हा ग्रहांच्या गतींपासून अलिप्तच असतो १७.


    मुळीं आत्म्यासी जन्म नाहीं । मा ग्रह लागती कवणे ठायीं ।
    जेथ शेतचि पेरिलें नाहीं । तेथ उंदिरीं कायी करांडावें ॥ १८ ॥
    आत्म्याला मुळीं जन्मच नाही, मग त्याला ग्रह लागणार कोठे ? जेथे शेत मुळी पेरलेलेच नाही, तेथे उंदरांनी कुरतडावयाचे काय ? १८.


    मुख्यत्वें घर केलें नाहीं । तेथली माडी जळेल कायी ।
    आत्म्यासी तंव जन्मचि नाहीं । मा ग्रहगती काई लागेल ॥ १९ ॥
    मुख्यतः घरच मुळी बांधलेले नाही, तर त्याची माडी जळणार कशी? त्याप्रमाणे आत्म्याला तर जन्मच नाही; मग त्याला ग्रहांची शुभाशुभ फळे लागणार कशी ? १९.


    ग्रहांची ग्रहगती देहापासीं । आत्मा अलिप्त देहभावासी ।
    जेवीं काउळा न चढे कैलासी । तेवीं ग्रह आत्म्यासी न लागती ॥ ८२० ॥
    ग्रहांची ग्रहदशा असते ती देहापाशी असते; आणि आत्मा हा देहभावापासून अलिप्त असतो. ज्याप्रमाणे कावळा कैलासावर चढत नाही; त्याप्रमाणे ग्रहही आत्म्याला लागत नाहींत ८२०.


    जेवीं कां अग्नीतें न चाखे माशी । घारी झडपीना चंद्रम्यासी ।
    तेवीं लागावया आत्म्यासी। सामर्थ्य ग्रहांसी असेना ॥ २१ ॥
    ज्याप्रमाणे माशी विस्तवाला चाखून पहात नाही; किंवा घार कांहीं चंद्रावर झडप घालीत नाही, त्याप्रमाणे आत्म्याला लागण्याइतकें सामर्थ्य ग्रहांना असत नाही २१.


    आत्मा सर्वाचा अवघा एक । तैं ग्रहांचा आत्मा तोचि देख ।
    तया निजात्म्यासी देतां दुःख । ग्रह पीडी आवश्यक आपआपण्या ॥ २२ ॥
    आत्मा हा सर्वांचा सर्वस्वी एकच आहे. तेव्हा ग्रहांचा आत्माही तोच होय. त्या आपल्याच आत्म्याला दुःख दिले असतां ग्रहांनी मुद्दाम आपल्यालाच आपण पीडा करून घेतली असे होईल २२.


    देह जड मूढ अज्ञान । तें सुखदुःखांचें नेणे ज्ञान ।
    आत्म्यासी सुखदुःख देतां जाण । तैं आपण्या पीडिती ग्रह ॥ २३ ॥
    देह हा जड, मूढ आणि अज्ञानी आहे. तो देह सुखदुःखांचे ज्ञान मुळीच जाणत नाही. आतां आत्म्यालाच सुखदुःख देऊ  लागतील तर, ते ग्रह  आपणच आपल्याला पीडा देतात असे होईल २३.


    आपणाचि आपणाप्रती । कदा न देववे दुःखप्राप्ती ।
    यालागीं आत्म्यासी ग्रहगती । जाण कल्पांतीं बाधीना ॥ २४ ॥
    आपणच आपल्याला कधीच दुख प्राप्त करून देववत नाही. म्हणून आत्म्याला ग्रहांची पीडा कल्पांती सुद्धा बाधावयाची नाही २४.


    ग्रहग्रहांमाजीं वैरस्थिती । ग्रह ग्रहांतें पीडा देती ।
    तेही अर्थींची उपपत्ती । यथानिगुती अवधारा ॥ २५ ॥
     ग्रहाग्रहांमध्ये वैरभावना आहेच. ग्रह  ग्रहांना पीडा देतात. त्यासंबंधीचंही विवेचन नीटपणे ऐका २५.


    ज्योतिषशास्त्रसंमती शनि-भौमसूर्या वैरप्राप्ती ।
    गुरु-शुक्र दोनी वैरी होती । बुध-सोमांप्रती महावैर ॥ २६ ॥
    ज्योतिषशास्त्राच्या मताने शनीचे मंगळ व सूर्य यांच्याशी वैर आहे. गुरु आणि शुक्र हे एकमेकांचे शत्रु आहेत. तसेंच बुध आणि चंद्र यांच्यामध्येही मोठे वैर आहे २६.


    तेथ एकांची ते शीघ्रगती । एक ग्रह मंदगामी होती ।
    अतिचार कां वक्रगती । मंडळभेदें येती एकत्र ॥ २७ ॥
    या ग्रहांमध्ये कांहीं ग्रहांची गति शीघ्र असते, तर कोणी मंदगतीने चालत असतात. कोणी अत्यंत जलद गतीने चालतात, तर कोणी वक्रगतीने मागेंच परत येत असतात. आणि कोणी दुसऱ्या ग्रहाच्या मंडलाचा भेद करून एकत्र येत असतात २७.


    वैरी मीनल्या एके राशी । एके चरणीं एकत्रवासी ।
    तैं राहु गिळी सूर्यासी । सूर्य चंद्रासी कुहू करी ॥ २८ ॥
    परस्पर वैरी असलेले ग्रह एका राशीत जमले, ते एकाच नक्षत्रचरणांत येऊन एकत्र राहू  लागले, तर त्यांत राहु सूर्याचा ग्रास करतो आणि सूर्य चंद्राला लोपवून अमावास्या (काळोखी रात्र) करितो २८.


    ऐसे ग्रहचि ग्रहांसी जाण । परस्परें पीडिती आपण ।
    मी आत्मा त्यांहूनि भिन्न । सुखदुःख कोण मज त्यांचे ॥ २९ ॥
    अशा रीतीने ग्रह हेच ग्रहांना परस्पर स्वतः पीडा देतात. परंतु मी आत्मस्वरूपी असून त्यांच्याहून भिन्न आहे, तेव्हा मला त्यांचे सुखदुःख काय २९.


    अलंकार मोडितां खणाण । सोनें मोडेना आपण ।
    तेवीं ग्रह ग्रहांसी पीडितां जाण । मज आत्म्यासी कोण सुखदुःख ॥ ८३० ॥
    खणाखण सर्व दागिने मोडले तरी सोने असते ते स्वतः काही त्रास पावत नाही. त्याप्रमाणे ग्रह  हेंच प्रहांना पीडा देऊ लागले तर त्यांत मला आत्म्याला सुखदुःख कसले ? ८३०.


    रणभूमीं युद्धझोटधरणी । होतां घायवट नव्हे धरणी ।
    तेवीं ग्रहपीडेपासूनी । मी अलिप्तपणीं निजात्मा ॥ ३१ ॥
     रणांगणामध्ये युद्धाची हातघाई झाली असतां भूमि काहीं घायाळ होत नाही. त्याप्रमाणे मी आत्मस्वरूपी असल्यामुळे  ग्रहपीडेपासून अलिप्त असतों ३१.


    रजस्वला चालतां भूमीसी । तो विटाळ बाधीना पृथ्वीसी ।
    तेवीं ग्रहीं पीडितां ग्रहांसी । मी सुखदुःखांसी अलिप्त ॥ ३२ ॥
    रजस्वला स्त्री जमिनीवरून चालली, म्हणून विटाळ पृथ्वीला बाधक होत नाही. त्याप्रमाणे  ग्रहांनी  ग्रहांना पीडा केली असतांही मी सुख:दुखांपासून अलिप्तच आहे ३२.


    एवं ग्रहांनिमित्त जें कांहीं । सुखदुःख उमटे देहीं ।
    तें मज आत्म्यासी न लगे कंहीं । मग कोणें पाहीं कोणा कोपावें ॥ ३३ ॥
    तात्पर्य, ग्रहांपासून जे काही सुखःदुख देहांमध्ये उत्पन्न होते, ते मला आत्म्याला कधीच लागत नाही. मग असे पहा की, कोणी कोणावर रागवावें ? ३३.


    सुखदुःख नुमटे ज्याच्या ठायीं । त्यासी क्रोधचि न ये कंहीं ।
    एवं ग्रहनिमित्त दुःख कांहीं । सर्वथा नाहीं या हेतू ॥ ३४ ॥
    ज्याच्या ठिकाणी सुख दुख उत्पन होत नाही, त्याला कधीं क्रोधच येत नाही. याच कारणाने ग्रहांमुळे काही मुळीच दु:ख होत होत नाही ३४.' 


    सुखदुःखदातें निजकर्म । म्हणतां जनांसी पडे भ्रम ।
    आत्मा केवळ निष्कर्म । त्यासी जड कर्म केवीं बाधी ॥ ३५ ॥
    सुखदुःख देणारे आपलें कर्मच आहे असे म्हटले असता लोकांना भ्रम पडतो. पण वस्तुतः आत्मा हा केवळ निष्कर्म आहे , त्याला जड कर्म बांधणार कसें ३५.


    कर्मास्तु हेतुः सुखदुःखयोश्चेत् किमात्मनस्तद्धि जडाजडत्वे ।
    देहस्त्वचित्पुरुषोऽयं सुपर्णः क्रुध्येत कस्मै न हि कर्ममूलम् ॥ ५५ ॥
    [श्लोक ५५] जर कर्मांनाच सुखदुःखाचे कारण मानले तर त्यांच्याशी आत्म्याचा काय संबंध ? कारण जी एकच वस्तू चेतन व अचेतन असेत, तेथेच कर्म घडते देह अचेतन आहे आणि त्यात राहणारा आत्मा चेतन असला, तरी केवळ साक्षी आहे म्हणून कर्मच संभवत नाही मग तो कोणावर क्रोध करील. (५५)


    कर्म जडत्वें अतिबद्ध । आत्मा चिद्रूपें परम शुद्ध ।
    त्यासी कर्माचा कर्मबाध । सर्वथा संबंध धरीना ॥ ३६ ॥
    कर्म जड असल्यामुळे अत्यंत बाधक आहे, माणि आत्मा हा ज्ञानस्वरूपी असल्यामुळे अत्यंत  शुद्ध आहे. त्याला कर्माचा कर्मदोष मुळींच लागत नाही ३६.


    रवीसी अंधारीं लपवे । वणवा तृणामाजीं बांधवे ।
    गोचिडाचेनि मुखलाघवें । जरी लागवे दीपासी ॥ ३७ ॥
    सूर्याला जर अंधारांत लपून बसता येईल, वणवा जर गवतामध्ये बांधता येईल, किंवा गोचिडाला जर आपल्या मुखाने दिव्याला स्पर्श करता येईल ३७.


    चंडवातातें तुष राखे । थिल्लरचिखलें चंद्र माखे ।
    तैं कर्मजन्य सुखदुःखें । आत्मा यथासुखें बद्धता भोगी ॥ ३८ ॥
    झंझावाताला जर कोंडा प्रतिबंध करील, डबक्यांतल्या चिखलाने जर चंद्र माखला जाईल, तर कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखाने आत्माही खुशाल बंधन पतकरील ३८.


    आत्मा कर्माकर्म संहारी । सुख-दुःखांची होळी करी ।
    तो कर्मफळांचा फळहारी । मूर्ख गव्हारीं मानिजे ॥ ३९ ॥
    आत्मा हा कर्माकर्मांचा संहार करतो, व सुखदुःखांची होळी करून टाकतो. तो कर्मफळांचा उपभोग घेणारा आहे असें अडाणी मूर्ख असतील त्यांनीच मानावें ३९.


    स्वप्नींची स्वप्नसंतती । जागृतीं कोणा भेटों येती ।
    तरी कर्माची सुखदुःखप्राप्ती । आत्म्याप्रती बाधक ॥ ८४० ॥
    स्वप्नांत झालेली  स्वप्नंसंतति जर जागेपणामध्ये कोणाला भेटावयास येत असेल, तरच कर्मापासून प्राप्त होणारी सुखदुःखें आत्म्यालाही बाधक होतील ८४०.


    जेवीं अग्नीवरी मुंगी न चले । तेवीं आत्मा न माखे कर्ममळें ।
    आकाश न खोंचे शस्त्रबळें । तेवीं आत्मा कर्मफळें स्पर्शेना ॥ ४१ ॥
    ज्याप्रमाणे विस्तवावर मुंगी चालत नाही, त्याप्रमाणे आत्मा कर्माच्या फळाने लिप्त होत नाही. आकाशाला जसे शस्त्राच्या घावाने भोंक पडत नाही, त्याप्रमाणे आत्माही कर्मांच्या फळाला स्पर्श करीत नाही ४१.


    कर्म तितुकें आविद्यक । आत्मा विद्याअविद्यातीत चोख ।
    त्यासी कर्माचें सुखदुःख । मानिती मूर्ख देहमोहें ॥ ४२ ॥
    कर्म म्हणून जितके आहे तितकें अविद्यात्मक आहे, आणि आत्मा हा विधे-अविद्येच्या पलीकडे असून अत्यंत निर्मळ आहे. त्याला कर्माचे सुखदुःख प्राप्त होतें असें मूर्ख लोक देहाच्या मोहामुळे मानतात ४२.


    कर्म अतिजड आत्मा शुद्ध । कर्म परिच्छिन्न आत्मा अगाध ।
    कर्म कर्मठतां नित्यबद्ध । आत्मा चिदानंदस्वरूप ॥ ४३ ॥
    कर्म अत्यंत जड आहे, आणि आत्मा हा शुद्ध आहे. कर्म मर्यादित असून आत्मा अनंत आहे. कर्माला कर्मठता असल्यामुळे ते नित्य बद्ध आहे. आणि आत्मा चिदानंदस्वरूप आहे ४३.


    कर्म मिथ्याभूत मायिक । आत्मा नित्य अमायिक ।
    कर्मासी ब्रह्मअनोळख । ब्रह्म तेथ देख कर्म नाहीं ॥ ४४ ॥
    कर्म मिथ्याभूत असून मायिक आहे, आणि आत्मा नित्य असून अमायिक आहे. कर्माला ब्रह्माची ओळख नाही, म्हणून ब्रह्म असते तेथें कर्म असत नाही ४४.


    दोराचे सर्पी सर्पत्व नाहीं । मा तो डसोनि चढेल कायी ।
    तेवीं स्वरूपीं कर्म मिथ्या पाहीं । तें आत्म्यासी कायी बाधील ॥ ४५ ॥
    दोरीला सर्प मानिले असता त्या सर्वांत मुळीं सर्पपणाच नसतो, मग तो डसून  विष चढणार काय? त्याप्रमाणे स्वस्वरूपामध्ये कर्म हे मिथ्याच आहे. तेव्हां तें आत्म्याला बाघेल काय? ४५.


    वांझ राणीचा लाडका नातू । राजबळें जगा दंडितू ।
    तेवीं कर्माची सुखदुःखमातू । कर्मठांतू दाटुगी ॥ ४६ ॥
    वांझ राणीचा लाडका नातू राजसत्तेने जगाला शासन करीत सुटतो, त्याप्रमाणे कर्माच्या सुखदुःखांच्या गोष्टी कर्मठांमध्येच काय त्या विशेष भरलेल्या असतात ४६.


    एवं कर्माचि मिथ्या एथें । तें केवीं दे सुखदुःखांतें ।
    हें जाणोनियां निश्चितें । कोणें कोणातें कोपावें ॥ ४७ ॥
    तात्पर्य, येथे कर्म हेच मिथ्या होय. तें सुखदुःख कसे देणार ? हें निश्चितपणे जाणून घेतले म्हणजे मग कोणी कोणावर कोप करावा ? ४७.


    कर्म सुखदुःखांचें दातें । यापरी न घडे एथें ।
    म्हणाल काळ दे सुखदुःखांतें । तेंही निश्चितें घडेना ॥ ४८ ॥
    ह्याप्रमाणे कर्म हें सुखदुःख देणारे होत नाहींच, तेव्हां सुखदुःख काळ देतो असें म्हणाल, तर तेही खरोखर घडत नाही ४८.


    कालस्तु हेतुः सुखदुःखयोश्चेत् किमात्मनस्तत्र तदात्मकोऽसौ ।
    नाग्नेर्हि तापो न हिमस्य तत्स्यात् क्रुध्येत कस्मै न परस्य द्वन्द्वम् ॥ ५६ ॥
    [श्लोक ५६ ] काळ हा सुखदुःख देणारा आहे असे मानले, तर काळ आणि आत्मा तर एकच होत अशा प्रकारे आत्म्याला आत्म्याकडून त्रास दिला जाऊ शकत नाही जसा अग्नी आपल्याच ज्वाळेला जाळू शकत नाही किंवा बर्फाचा थंडपणा त्याच्या कणाचा नाश करून शकत नाही काळाहून आत्मा वेगळा मानला तरी आत्म्याला सुखदुःखात्मक द्वंद्व नाही मग तो कोणावर का रागावेल ? (५६)


    काळ शीतकाळीं शीतें पीडी । उष्णकाळीं उबारा सोडी ।
    वर्षाकाळीं पर्जन्य धाडी । त्रिमाळिकें पाडी धवळारें ॥ ४९ ॥
    काळ हा थंडीच्या दिवसांत थंडीने पीडा करतो, उन्हाळ्यात उकाडा करतो, वर्षाकाळांत पाऊस पाडतो, आणि तीन तीन मजली वाडे जमीनदोस्त करून सोडतो ४९.


    बैसवूनि सातवांकडी । अखंडधारा डोळा नुघडी ।
    जीवमात्रा तेणें पीडी । पडे सांकडी अन्नाची ॥ ८५० ॥
    सात सात दिवस पावसांची सारखी अखंड धार लागून डोळासुद्धा उघडू देत नाही. त्यामुळे प्रत्येक प्राणिमात्राला पीडा होते, आणि अन्नाची पंचाईत पडते ८५०.


    अन्नाचिया चिडाणीं । पीडती पशुपक्षिप्राणी ।
    ते काळीं सुखदुःख न मानी कोणी । दुखदाता जनीं निजकाळू ॥ ५१ ॥
    अन्नाच्या दुर्मिळतेमुळे पशु, पक्षी व प्राणी व्याकुळ होतात. त्या वेळी सुखदुःख कोणीच मानीत नाही. कारण त्या वेळी जगामध्ये आपला काळ हाच दुःख देणारा असतो ५१.


    अतिताप अतिशीत । सोडूनियां अतिवात ।
    काळ जगातें खात । जग कांपत काळासी ॥ ५२ ॥
    अतिशय उष्णता, अतिशय थंडी, किंवा अतिशय वारा सोडून काळ जगाला खात असतो. म्हणून जगही काळाला थरथर कांपत असते. ५२.


    ऐकोनि काळाची गोठी । देव कांपती उठाउठी ।
    इतरांची कायसी गोठी । धाके पोटीं विधाता ॥ ५३ ॥
    काळाच्या पराक्रमाची गोष्ट ऐकली  की देवसुद्धा तत्काळ कांपत सुटतात. इतरांची गोष्ट कशाला ? प्रत्यक्ष ब्रह्मदेवसुद्धा अंत:करणांत काळाला भीत असतो ५३.


    अतिवृष्टि अनावृष्टि । जन पीडी नाना संकटीं ।
    शेखीं प्रळयो करी उठाउठी । दुखदाता सृष्टीं महाकाळ ॥ ५४ ॥
    अतिवृष्टि आणि अनावृष्टि करून नाना प्रकारच्या संकटांत काळ लोकांना पीडा देतो, आणि शेवटी तत्काळ प्रळय करून सोडतो. असा हा महाकाळ सृष्टीत दुःख देणारा आहे ५४; 


    ऐसें बोलती ज्ञाते लोक । ते ज्ञातेपणें झाले मूर्ख ।
    काळ तोचि ईश्वरू देख । सुखदायक सर्वांसी ॥ ५५ ॥
    असे मोठमोठाले ज्ञाते लोक म्हणतात, पण ते ज्ञातेपणानेच मूर्ख झालेले असतात. कारण असे पाहा की, काळ तोच ईश्वर होय, आणि तो सर्वांना सुखदायकच आहे ५५.


    ईश्वराहूनि काळ भिन्न म्हणे तो जड मूढ अज्ञान ।
    काळ तोचि ईश्वर जाण । कृपाळू पूर्ण विश्वात्मा ॥ ५६ ॥
    ईश्वराहून काळ निराळा असें जो म्हणतो, तो जड, मूर्ख व अज्ञानी होय. काळ तोच ईश्वर असे समज. तो विश्वात्मा असून पूर्णपणे कृपाळू आहे ५६.


    काळ स्वकाळीं वर्षोनि जीवन । सुखी करी संतप्त जन ।
    पृथ्वी निववूनियां जाण । नव धान्य वाफवी ॥ ५७ ॥
    काळ हा यथाकाळी पाऊस पाडून संतप्त झालेले लोक सुखी करतो, आणि पृथ्वीला भिजवून नवे धान्य पेरण्याजोगी करितो ५७.


    ते काळीं जैं शीत न वाहे । तैं वाफिलें धान्य राख होये ।
    तेव्हां शीतकण वर्षोनि पाहें । करी लवलाहें सफळित धान्यें ॥ ५८ ॥
    त्या वेळी जर शीतळ हवा राहाणार नाही, तर पेरलेले धान्य जळून त्याची राख होईल. म्हणून त्या वेळी दंव पाडून तत्काळ सर्व धान्ये फलद्रूप करतो ५८.


    तीं आर्द्र धान्यें भूतांसी । उपेगा न येती संग्रहासी ।
    यालागीं उष्ण काळेंसीं । काळ शोषी आर्द्रता ॥ ५९ ॥
    ती पिकलेली धान्ये ओली असल्यामुळे लोकांना ती तशीच सांठवून ठेवण्याच्या उपयोगी येत नाहीत, म्हणून उन्हाळा करून काळ हाच त्यांतील ओलावा शोषून घेतो ५९.


    यापरी शीतोष्णपर्जन्यांसी । काळ उत्पादी भूतहितासी ।
    तेंचि कठिण वाटे त्यासी । देहभ्रमासी भुलोनि ॥ ८६० ॥
    ह्याप्रमाणे प्राण्यांच्या हिताकरितांच थंडी, उन्ह, पाऊस ह्यांना काळ उत्पन्न करतो. परंतु देह हाच मी अशा भ्रमाने प्राणी भुलल्यामुळे तेंच त्याला दुःखदायक वाटते ८६०.


    हिरोनि अतिजीर्ण वस्त्रांसी । नवीं नेसवी जो साक्षेपेंसीं ।
    ऐशिया हितकारिया काळासी । वैरी पिशीं म्हणताती ॥ ६१ ॥
    अत्यंत जुनी झालेली वस्त्रे काढून घेऊन जो आस्थेनें नवीं नेसवितो, अशा आपल्या कल्याणकर्त्या काळाला वेडे लोक शत्रु असे म्हणतात ६१.


    तेवीं जराजर्जरित विकळ । तें देह निर्दळी सकाळें काळ ।
    आणिक नवें दे तत्काळ । ऐसा कृपाळू काळ जनासी ॥ ६२ ॥
    त्याचप्रमाणे वृद्धावस्थेनें जर्जर होऊन जो देह विगलित झालेला असतो, तो देह काळ योग्य वेळी नष्ट करतो, आणि तत्काळ नवा देह देतो. अशा प्रकारे काळ हा लोकांवर कृपा करणारा आहे ६२.


    जुनें घेऊनि दे नव्यासी । ऐसा उपकारिया काळासी ।
    अपकारी म्हणती पिशीं । देहमोहेंसीं लोभिटें ॥ ६३ ॥
    जुने घेऊन नवें देतो अशा उपकारकर्त्या काळाला देहाच्या लोभाने लोभिष्ट झालेले वेडे लोक अपकारी असे म्हणतात ! ६३.


    जन जैशिया निजभावना । जे जे धरी दृढ वासना ।
    काळ कृपाळू तत्क्षणा । ते ते देह जाणा त्या देत ॥ ६४ ॥
    मनुष्य जशा आपल्या भावनेने जी जी दृढ वासना धरतो, तसे तसे देह कृपाळू काळ त्याला तत्काळ देतो असें समज ६४.


    महामहोत्साहें पिता पुत्रासी । सांडवूनि जीर्ण वासांसी ।
    नवीं वस्त्रें दे तयासी । तेवीं जगासी प्रळयकाळू ॥ ६५ ॥
    पिता मोठ्या आनंदाने पुत्राची जुनी वस्त्रं  काढून टाकून त्याला नवी वस्त्रे देतो, त्याप्रमाणेच प्रळयकाळ जगालाही नवीं नवीं रूपें देतो ६५.


    तेवीं प्रळयकाळीं जगासी । काळ जीर्ण देह नाशी ।
    मग नूतन देह सर्वांसी । अतिकृपेंसी गौरवी ॥ ६६ ॥
    काळ हा प्रळयकाळी जगातील सर्वांचे जुने देह नाशून टाकून मग त्या सर्वांना अत्यंत कृपेने नवे देह देऊन त्यांचा गौरव करतो ६६.


    यापरी काळ कृपाळू । त्यासी वैरी म्हणे जन बरळू ।
    जगाचा निजात्मा स्वयें काळू । तो दुःखाचा सळू कोणासी नेदी ॥ ६७ ॥
    अशा प्रकारे काळ कृपाळू आहे. मूर्ख लोक त्याला वैरी म्हणतात. काळ हा स्वतःच जगाचा खरा आत्मा आहे. तो कोणाचाच दुःखाने छळ करीत नाहीं ६७.


    जनांचा देहीं दृढ भावो । भावनानुसारें काळ पहा हो ।
    देहापाठीं उपजवी देहो । जन्ममरणनिर्वाहो तेणें वाढे ॥ ६८ ॥
    अहो ! पाहा. लोकांची देहावरच पूर्ण भक्ति असते, तेव्हां काळही त्या लोकांच्या भक्तीप्रमाणेच देहामागून देह उत्पन्न करून ठेवतो, आणि त्यामुळेच हा जन्ममरणांचा उपद्व्याप वाढतो ६८.


    जो साचार वांछी विदेहभावो । त्याचा काळ निर्दळी अहंभावो ।
    निजानंदें निववूनि स्वयमेवो । जन्ममरणांचा ठावो विभांडी ॥ ६९ ॥
    जो खरोखर विदेहभावनेचीच इच्छा धरतो, त्याचा अहंभाव काळ नष्ट करतो, आणि स्वतः आत्मानंदाने तृप्त करून जन्ममरणाचा ठावच मोडून टाकतो ६९.


    जैशी ज्यासी होय बुद्धी । काळ तैशी दे त्यासी सिद्धी ।
    हें नेणिजे देहमोहांधीं । काळ त्रिशुद्धी कृपाळू ॥ ८७० ॥
    ज्याला जशी बुद्धि होते, तशीच त्याला काळ सिद्धि देतो. परंतु काळ हा खरोखर कृपाळू आहे हें  देहाच्या मोहाने आंधळे झालेले लोक मुळीच जाणत नाहीत ८७०.


    काळ तोचि निजात्मा जनीं ऐसें जाणे जो निजज्ञानी ।
    तैं कोणाचें दुःख कोण कां मानी । दुसरें कोणी असेना ॥ ७१ ॥
    जगामध्ये काळ तोच आपला आत्मा होय. हे जो आत्मज्ञानी जाणतो तेथे कोणाचे दुःख कोण का मानणार ? कारण दुसरे असे कोणी असतच नाहीं ७१.


    मी एक एथें दुःखदाता । पैल तो एक दुःखभोक्ता ।
    हेही नाहीं द्वैतकथा । जगासी एकुलता निजात्मा काळ ॥ ७२ ॥
    येथे मी एक दुःख देणारा आहे, आणि पलीकडे आहे तो एक दुःख भोगणारा आहे अशी ही द्वैताची गोष्टच नाही. कारण जगाचा एकुलता एक आत्मा तोच काळ होय ७२.


    काळ निजात्मा दोनी एक । तैं कोणाचें कोणास होय सुख ।
    कोण कोणाचा मानी शोक । द्वंद्वदुःख असेना ॥ ७३ ॥
    काळ आणि आपला आत्मा हे दोन्ही एकच होत. तर मग कोणाचे सुख कोणाला होणार ? आणि कोण कोणाचा शोक मानणार ? कारण येथे द्वंद्वाचे दुःखच रहात नाहीं ७३.


    जेवीं नाममात्र मृगजळ । तेथ नाहीं तिळभरी जळ ।
    तेवीं आत्मत्वीं जगड्व्याळ । तो भ्रम केवळ मनाचा ॥ ७४ ॥
    ज्याप्रमाणे मृगजळ हे फक्त नाव मात्र आहे; त्यांत थेंबभर देखील पाणी नाही, त्याप्रमाणे आत्मस्वरूपामध्ये जगाचा जो पसारा आहे, तो केवळ मनाचा भ्रम होय ७४.


    आत्मा एकत्वें अभेद । काळनामें तोचि प्रसिद्ध ।
    जीव तदंशें चिदत्वें शुद्ध । त्यासी काळादि द्वंद्व बाधिना ॥ ७५ ॥
    आत्मा एकच असल्यामुळे त्यांत भेद नाही. तोच काळ ह्या नावाने प्रसिद्ध आहे. जीव हा त्याचाच अंश असल्यामुळे ज्ञानस्वरूपाने शुद्धच आहे. म्हणून त्याला काळादिक द्वंद्व बाधत नाहीं ७५.


    आगीनें काय आगी जळे । कां उन्हाळेनि सूर्य पोळे ।
    सागरू बुडे लहरीबळें । कीं अंधारातें काळें काजळें कीजे ॥ ७६ ॥
    आगीने काय आग जळते ? उन्हाळ्याने काय सूर्य पोळतो? लाटांच्या पराक्रमाने काय समुद्र बुडून जातो ? की काजळाने अंधाराला काळें केलें आहे ? ७६.


    कीं हिमाचळ हिमकणें कांपे । तुपासी मोडशी होय तुपें ।
    तैं काळसत्ता खटाटोपें । आत्मा अमूपें द्वंद्वें भोगी ॥ ७७ ॥
    की हिमालय पर्वत बर्फाने कापूं लागतो ? तुपाला तुपानेंच मोडशी होते ? हे जर घडेल तरच काळसत्तेच्या खटाटोपाने आत्मा अनेक द्वंद्वे  भोगील ७७.


    आप आपणियां आपदा । कोणा न करवे विरुद्धा ।
    तेवीं आत्म्यासी द्वंद्वबाधा । काळाचेनि कदा करवेना ॥ ७८ ॥
    आपणच आपल्याला विरुद्ध अशी आपत्ति कोणी आपणांवर आणीत नाही, त्याप्रमाणे आत्म्याला द्वंद्वाची बाधा काळाच्यानंही करवत नाही ७८.


    एवं एकात्मता अभेद । तेथ काळाचा न चले बाध ।
    अभेदीं सर्वथा नाहीं द्वंद्व । कोणावरी क्रोध करावा ॥ ७९ ॥
    अशा प्रकारे जेथे एकात्मतेनें अभेद असतो, तेथे काळाचीही पीडा चालत नाही. अभेदामध्ये द्वंद्व मुळीच नाही, मग कोणावर राग करावयाचा ? ७९.


    जीव-शिवत्वें मी केवळ । मीचि आत्मा मीचि काळ ।
    मिथ्या द्वंद्वदुःखागोंधळ । क्रोधाचा कल्लोळ कोणावरी करूं ॥ ८८० ॥
    जीव-शिवरूपाने केवळ मीच आहे. मीच आत्मा, आणि मीच काळ आहे. द्वंद्वदुःखांचा गोंधळ हा मिथ्या आहे. तेव्हां क्रोधाचा भडिमार कोणावर करूं? ८८०.


    काळ सुखदुःखांचा दाता । यापरी नव्हे विचारितां ।
    सुखदुःखांची बाधकता । आत्म्यासी सर्वथा असेना ॥ ८१ ॥
    अशा प्रकारे विचार केला असता काळ हा सुखदुःखे देणारा ठरत नाही. कारण, सुखदुःखांची पीडा आत्म्याला मुळीच असत नाही ८१.


    सुखदुःखादि हेतुषट्क् । 'नायं जनो' इत्यादिक ।
    याचा करितां निजविवेक । नव्हती बाधक आत्म्यासी ॥ ८२ ॥
    'नायं जनः. ' इत्यादि श्लोकांत ( अ. २३ श्लो. ४३) सुखदुःखांची जी सहा कारणे सांगितली आहेत, त्यांचा नीट विचार केला असता ती आत्म्याला बाधक होत नाहीत असे समजून येते ८२.


    यांही वेगळीं बाधकपणें । देशवासें त्रिगुणगुणें ।
    आत्म्यासी बाधावयाकारणें । कोठे कोणी दिसेना ॥ ८३ ॥
    ह्याशिवाय देशवासाने किंवा त्रिगुणांच्या गुणाने बाधकपणाने आत्म्याला पीडा करावयाला कोणीच कोठे दिसत नाही ८३.


    निजात्म्यासी बाधकता । कायसेनि न संभवे सर्वथा ।
    जनासी बाधक देहअहंता । त्याचि निजार्था भिक्षु बोले ॥ ८४ ॥
    आत्म्याला कशानेच कधी पीडा होण्याचा मुळींच संभव नाही. लोकांना देहाची अहंताच बाधक होते. तोच आपला अभिप्राय भिक्षु सांगत आहे ८४.


    न केनचित्क्वापि कथञ्चनास्य द्वन्द्वोपरागः परतः परस्य ।
    यथाहमः संसृतिरूपिणः स्याद् एवं प्रबुद्धो न बिभेति भूतैः ॥ ५७ ॥
    [श्लोक ५७] प्रकृतीच्या पलीकडे आत्म्याला कोणाच्याही द्वारे, कोठेही, कोणत्याही प्रकारे, द्वंद्वाचा स्पर्श होत नाही जशी नसलेला संसार दाखविणार्‍या अहंकाराला सुखदुःखादी द्वंद्वे निर्माण होतात, असे ज्ञान झालेला योगी कोणालाही भीत नाही. (५७)


    आत्मा गुणातीत शुद्ध । परात्परतर स्वानंद ।
    परिपूर्ण सच्चिदानंद । तेथ द्वंद्वबाध रिघेना ॥ ८५ ॥
    आत्मा हा गुणांहून भिन्न असून शुद्ध आहे. तो मायेच्या पलीकडचा असून आनंदस्वरूप आहे. तो परिपूर्ण सच्चिदानंद आहे. त्यांत द्वंद्वाची बाधा शिरत नाही ८५.


    द्वंद्व रिघावया आत्मभुवनीं । कैसेनि कायिसेनि कोणाचेनी ।
    कर्मकार्यक्रियाकरणी । बाधकपणीं असेना ॥ ८६ ॥
    आत्ममंदिरांत द्वंद्व शिरण्याइतकें बाधक होईल अशा प्रकारचे कर्म, कार्य किंवा क्रिया कशीही, कशानेही व कोणाकडूनही होऊ शकत नाही ८६.


    अभेदा नाहीं द्वंद्वबाध । स्वानंदासी दुःखसंबंध ।
    पूर्णासी कैंचे विरुद्ध । परमानंद एकला ॥ ८७ ॥ ॥
    अभेदाला द्वंद्वाची बाधा नाहीं; स्वानंदाला दुःखाचा संबंध नाहीं, परिपूर्णाला विरुद्ध कोण असणार ? परमानंद हा एकटा एकच असतो ८७.


    आशंका ॥ आत्म्यासी न घडे द्वंद्वसंबंध । देहो जडत्वें नेणे द्वंद्वं ।
    तरी सुखदुःखांचा महाबाध । कोणासी प्रसिद्ध होतसे ॥ ८८ ॥
    (आशंका) आत्म्याला द्वंद्वाचा संबंध घडत नाही. आणि देह हा जड असल्यामुळे तो द्वंद्व जाणत नाही; तर मग ही सुखदुःखांची जी मोठी पीडा प्रसिद्ध आहे, ती होते तरी कोणाला ? ८८.


    सुखदुःखभोगासी जाण । सोसावया जन्ममरण ।
    एथ मुख्यत्वें देहाभिमान । तेंही लक्षण अतर्क्य ॥ ८९ ॥
    (उत्तर) सुखदुःखांचे भोग भोगावयाला आणि जन्ममरण सोसावयाला, येथे मुख्यत्वेकरून देहाभिमान कारण आहे. पण त्याचे लक्षणही अतर्क्यच आहे ८९.


    जेवीं असोनि भर्तारापाशीं । व्यभिचार करितां अहेवेसी ।
    पोट वाढल्याही परपुरुषीं । तें कोणासी कळेना ॥ ८९० ॥
    ज्याप्रमाणे नवऱ्यापाशी राहुन सुवासिनी स्त्रीने व्यभिचार केला असतां परपुरुषाकडून गर्भ राहिला, तरीही ते कोणाला समजत नाही ८९०,


    तैसें अभिमानाचें विंदान । चित्स्वरूपीं जडोनि जाण ।
    मिथ्या दावूनि जीवपण । सुखदुःखें आपण स्वेच्छा भोगी ॥ ९१ ॥
     त्याचप्रमाणे या अभिमानाचे आश्चर्य आहे. तो ज्ञानस्वरूपाशी एकरूप होऊन मिथ्या जीवपण दाखवून आपल्या इच्छेनेच आपण सुखदुःखें भोगतो ९१.


    जेवीं रायापाशील कुडा मंत्री । राजबळें अधर्म करी ।
    प्रजेतें छळी नानापरी । तैसा शरीरीं अभिमान ॥ ९२ ॥
    ज्याप्रमाणे राजाच्या पदरी असलेला कपटी प्रधान राज्याधिकाराच्या जोरावर अधर्म करतो, नानाप्रकारांनी प्रजेला छळतो, त्याप्रमाणेच अभिमानही शरीरांत पाहिजे तें करीत असतो ९२.


    कां अग्नीसंगें लोह जाण । अग्निप्राय होय आपण ।
    तया हातीं धरूं शके कोण । पोळी दारुण सर्वांसी ॥ ९३ ॥
    किंवा अग्नीच्या संगतीने लोखंड स्वतः अग्नीप्रमाणेच होते, त्याला कोण हातांत धरूं शकेल ? ते सर्वांना चांगलेच होरपळून टाकतें ९३.


    तेवीं चिद्रूपाचा अभिमान । देहात्मता खवळोनि पूर्ण ।
    सुखदुःखादी जन्ममरण । वाढवितां कोण आवरी ॥ ९४ ॥
    त्याप्रमाणे ज्ञानस्वरूपाचा अभिमान देहात्मतेच्या योगाने पूर्णपणे खवळून सुखदुःखादिक जन्ममरण वाढवू लागला असता त्याला कोण आवरणार ? ९४. 


    स्वप्नींचा देह केवळ मन । त्याही देहासी असे मनपण ।
    तैसा हाही देहो मनचि जाण । अभिमानें कठिण स्थूळ केला ॥ ९५ ॥
     स्वप्नांतील देह म्हणजे केवळ मनाचा खेळ होय. त्या देहालाही मनपणा असतो. तसाच हा देहही मनच होय असे समज. तो अभिमानाने कठीण व स्थूल केला आहे ९५.


    कार्यकारणरूपें जाण । संसारचि मनोभिमान ।
    वाढवूनि सुखदुःख दारुण । जन्ममरण स्वयें भोगी ॥ ९६ ॥
    तूं असे लक्षात घे की, कार्यकारणरूपाने संसार म्हणजेच मनाचा अभिमान होय. तो भयंकर सुखदुःख वाढवून जन्ममरण स्वतःच भोगतो ९६.


    भोगिलेचि भोग भोगितां । नानापरींची पावे व्यथा ।
    तरी न सांडी अहंता । देहात्मता वाढवी ॥ ९७ ॥
    भोगलेलेच भोग भोगतांना नानाप्रकारचे त्रास पावतो तरी अहंता सोडीत नाही, व देहाचा आपलेपणाच वाढवितो ९७.


    ब्रह्मप्रळय होतां जाण । देहअहंता नव्हे क्षीण ।
    प्रळयीं विरेना अभिमान । सुखदुःख जाण तो भोगी ॥ ९८ ॥
    ब्रह्मप्रलय झाला, तरीसुद्धा देहाची अहंता नाहीशी होत नाही, प्रलयामध्येसुद्धा अभिमान नाहीसा होत नाही. तो सुखदुःख भोगतो ९८.


    यामाजीं जीव असे कैसा । जपाकुसुमीं स्फटिक जैसा ।
    दिसोन त्या रंगाऐसा । स्वयें तैसा होयेना ॥ ९९ ॥
    या अभिमानांत जीव कसा असतो ! तर जसा जास्वंदीच्या फुलावर स्फटिक ठेवल्यावर तो स्फटिक , त्या फुलाच्या रंगासारखा दिसत असून स्वतः मात्र तसा होत नाही ९९.


    आत्मत्वीं सुखदुःख नाहीं । तें प्रत्यक्ष दिसताहे देहीं ।
    हें अविचाररमणीय पाहीं । कल्पनेच्या ठायीं आभासे ॥ ९०० ॥
    आत्मस्वरूपांत सुखदुःख नाही. ते देहामध्ये प्रत्यक्ष दिसते. हे सुखदुःख अविचारामुळे रमणीय वाटते व कल्पनेमध्येच भासते ९००. 

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...