मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ७०१ ते ८००
तेथ कैंचा शास्त्र कैंचा वेद । कैंची बुद्धी कैंचा बोध ।
निःशेष निमाला भेद । परमानंद कोंदला ॥ १ ॥
तेथे कसले शास्त्र आणि कसला वेद ? कसली बुद्धि आणि कसला बोध ? भेदच निखालस नाहीसा होतो, आणि आनंदस्वरूप परब्रह्मच भरून राहाते १.
यापरी मनोविजयें पहा हो । ऐशिया स्थिती पावला भावो ।
तेंचि स्वयें वदे देवो । ये अर्थीं संदेहो असेना ॥ २ ॥
तेंचि स्वयें वदे देवो । ये अर्थीं संदेहो असेना ॥ २ ॥
अहो ! पहा. याप्रमाणे मनोविजयाने इतक्या स्थितीला भाव पोचतो. तेच स्वतः देवांनी सांगितले म्हणून ह्याविषयी संशय नाही २.
मनोजयाचा सद्भावो । ब्रह्मादिकां अगम्य पहा हो ।
जो स्वांगें करी स्वयमेवो । तो देवाधिदेवो निजबोधें ॥ ३ ॥
जो स्वांगें करी स्वयमेवो । तो देवाधिदेवो निजबोधें ॥ ३ ॥
अहो ! पहा. मनोजयाची स्थिति ब्रह्मदेवादिकांनाही अगम्य आहे. असे असतां ती स्वत:च जो आपोआप प्राप्त करून घेतो, तो आत्मज्ञानाने देवाधिदेवच झाला असें समजावें ३.
जो निजमनातें जिंकोनी । जनीं पावला जनार्दनीं ।
तो धन्य धन्य त्रिभुवनीं । त्याचोनि अवनी पवित्र ॥ ४ ॥
तो धन्य धन्य त्रिभुवनीं । त्याचोनि अवनी पवित्र ॥ ४ ॥
ह्याप्रमाणे जो आपल्या मनाला जिंकून इहलोकांतच जनार्दनाशी ऐक्यरूप झाला, तो त्रिभुवनांत अत्यंत धन्य होय. त्याच्या योगाने पृथ्वी पावन होते ४.
तेणेंचि पूर्वज तारिले । तेणें सकळ कुळ उद्धरिलें ।
तेणेंचि परब्रह्म आंगविलें । जेणें जिंकिलें मनातें ॥ ५ ॥
तेणेंचि परब्रह्म आंगविलें । जेणें जिंकिलें मनातें ॥ ५ ॥
त्यानेच पूर्वजांना तारले, त्यानेच सर्व कुळाचा उद्धार केला. ज्याने मनाला जिंकलें, त्यानेच परब्रह्माला आपलेसे करून घेतले ५.
मनोजयें जे अतिसमर्थ । शांति सर्वस्वें विकिली तेथ ।
त्यांसी सुखदुःखांचे आवर्त । गेले न लगत निजात्मता ॥ ६ ॥
त्यांसी सुखदुःखांचे आवर्त । गेले न लगत निजात्मता ॥ ६ ॥
मनोजयाने जे अत्यंत समर्थ झालेले असतात, तेथेच सर्वस्वी शांति ही विकलेली असते. त्यांना आत्मबोधाच्या योगाने सुखदुःखांचे भोंवरे न लागतांच निघून जातात ६.
ऐशी भिक्षूची निजवाणी । उल्हासें सांगे शार्ङ्गपाणी ।
उद्धवास म्हणे संतोषोनी । धन्य त्रिभुवनीं मनोजय ॥ ७ ॥
उद्धवास म्हणे संतोषोनी । धन्य त्रिभुवनीं मनोजय ॥ ७ ॥
असें त्या भिक्षूने स्वतः केलेले भाषण मोठ्या उल्हासाने श्रीकृष्णाने सांगितले, आणि आनंदाने उद्धवास म्हणाला, मनोजय हा त्रिभुवनांत धन्य होय ७.
जेणें निजमनातें जिंकिलें । त्यासी मी किती वानूं बोलें ।
तेणें मज आपुलें पोसणें केलें । कीं विकत घेतलें उखितेंचि ॥ ८ ॥
तेणें मज आपुलें पोसणें केलें । कीं विकत घेतलें उखितेंचि ॥ ८ ॥
ज्याने आपल्या मनाला जिंकलें, त्याचे शब्दांनी मी किती वर्णन करूं? त्याने मला आपला दास बनविलें, किंवा मला एकाएकी विकतच घेतले ८.
मज सुखरूपा त्याचेनि सुखप्राप्ती । मज नित्यतृप्ता त्याचेनि तृप्ती ।
मज अनंता त्यामाजीं वस्ती । मी दाटुगा त्रिजगतीं त्याचेनि ॥ ९ ॥
मज अनंता त्यामाजीं वस्ती । मी दाटुगा त्रिजगतीं त्याचेनि ॥ ९ ॥
मला आनंदस्वरूपाला आनंद होतो. मला नित्यतृप्ताला त्याच्यामुळेच तृप्ति होते. मला अनंताला त्याच्या ठिकाणींच वस्ती असते. त्याच्यामुळेच मी त्रिभुवनांत बलवान् झालों ९.
'मी तो' या शब्दकुसरी । त्याही जाण आम्हांबाहेरी ।
आंतुवटे निजविचारीं । तोचि मी निर्धारीं निजऐक्यता ॥ ७१० ॥
आंतुवटे निजविचारीं । तोचि मी निर्धारीं निजऐक्यता ॥ ७१० ॥
'मी' आणि 'तो' हे बोलण्याचे जे कौशल्य आहे, ते सुद्धा आमच्या पलीकडे आहे. आपल्या अंत:करणांत आपण विचार केला तर आत्मैक्याने खरोखर तोच मी आहे ७१०.
मनोजयें हे पदवी प्राप्त । तो मनोजय न करूनि तेथ ।
प्राकृत रिपुजयें जे गर्वित । त्यातें निर्भर्त्सित स्वयें भिक्षुं ॥ ११ ॥
प्राकृत रिपुजयें जे गर्वित । त्यातें निर्भर्त्सित स्वयें भिक्षुं ॥ ११ ॥
मनोजयाने एवढा अधिकार प्राप्त होतो. तो मनोजय न करितां इहलोकींच्या सामान्य शत्रूवर जय मिळविल्यामुळे जे गर्वाने फुगतात, त्यांची भिक्षु स्वतःच निर्भर्त्सना करीत आहे ११.
तं दुर्जयं शत्रुमसह्यवेगं अरुन्तुदं तं न विजित्य केचित् ।
कुर्वन्त्यसद्विग्रहमत्र मर्त्यैः मित्रण्युदासीनरिपून्विमूढाः ॥ ४९ ॥
कुर्वन्त्यसद्विग्रहमत्र मर्त्यैः मित्रण्युदासीनरिपून्विमूढाः ॥ ४९ ॥
[श्लोक ४९] मन जिंकण्यास कठीण असा शत्रू आहे त्याचे रागादिक वेग असह्य आहेत ते मर्मस्थानेच घायाळ करते त्याला जिंकल्याशिवायच मूर्ख लोक दुसर्यांशी व्यर्थ भांडणे करून त्यांना शत्रू, मित्र किंवा उदासीन ठरवितात. (४९)
पार्थिव शत्रु सबळ येती । तेथ सामदानादिकां स्थिती ।
कारणीं लावोनियां ख्याती । जिंकिले जाती निजांगें ॥ १२ ॥
कारणीं लावोनियां ख्याती । जिंकिले जाती निजांगें ॥ १२ ॥
मोठमोठे बलाढ्य राजे शत्रु होऊन येतात, तेव्हां सामदामादिक उपाय योजण्यास वाव असतो, किंवा अखेर त्यांना पराक्रमाने स्वतः जिंकितां येते १२.
हे प्रकार मनाच्या ठायीं । करितां न चलती पाहीं ।
मनासी करावी शिष्टाई । तें कोणाचें कांहीं ऐकेना ॥ १३ ॥
मनासी करावी शिष्टाई । तें कोणाचें कांहीं ऐकेना ॥ १३ ॥
पण हे प्रकार मनाच्या ठिकाणी योजिले असतां चालत नाहीत. मनापाशी मध्यस्थी करावी, तर ते कोणाचे काही ऐकतच नाही १३.
मनासी द्यावें विषयदान । परी विषयीं तृप्त नव्हे मन ।
तेणें अधिकचि होय दारुण । आवरी कोण तयासी ॥ १४ ॥
तेणें अधिकचि होय दारुण । आवरी कोण तयासी ॥ १४ ॥
मनाला विषयांचे दान द्यावे, तर विषयांतही मन तृप्त होत नाही. उलट त्यामुळे ते अधिकच भयप्रद होते. त्याला आवरणार कोण? १४.
न चले शमदमादि प्रकारू । तरी मनासी करावा मारू ।
तेथ न चले हातियेरू । मारणीं विचारू स्फुरेना ॥ १५ ॥
तेथ न चले हातियेरू । मारणीं विचारू स्फुरेना ॥ १५ ॥
शमदमादिक प्रकार त्याच्याजवळ चालत नाहीत, तेव्हां अशा त्या मनाला मारूनच टाकावें, तर त्याच्यावर हत्यार चालत नाही, आणि मारावयाचा विचार मनात येत नाही १५.
यापरी हा मनोवैरी । दुर्जयत्वें कठिण भारी ।
तो सुखदुःखांच्या भरोवरी । सर्वदा मारी जन्ममरणें ॥ १६ ॥
तो सुखदुःखांच्या भरोवरी । सर्वदा मारी जन्ममरणें ॥ १६ ॥
याप्रमाणे हा मनोरूप शत्रु अजिंक्यपणाने फार कठीण झाला आहे. तोच सुखदुःखाच्या सामग्रीने सदोदित जन्ममरणानेच मारतो १६.
इतर शत्रु नावरती । तरी पळों ये हातोहातीं ।
रिघोनियां गडदुर्गाप्रती । वांचती गती देखिजे ॥ १७ ॥
रिघोनियां गडदुर्गाप्रती । वांचती गती देखिजे ॥ १७ ॥
इतर शत्रु आवरतनासे झाले तर तत्काळ पळून जाता येते. डोंगरांतील किल्ल्यावर जाऊन आपला बचाव करण्याचा प्रयत्न करून पाहातां येतो १७.
परी पळावया मनापुढें । पळतां त्रैलोक्य होय थोडें ।
जेथ लपावें अवघडें । तेथही रोकडें मन पावे ॥ १८ ॥
जेथ लपावें अवघडें । तेथही रोकडें मन पावे ॥ १८ ॥
पण मनाच्या पुढे पळावयास लागले तर पळता पळतां त्रिभुवनही पुरत नाही. ज्या अवघड ठिकाणी लपून बसावें, तेथेही मन साक्षात उभे राहतें १८.
मनाचे सेनापति शूर । कामक्रोधादि महावीर ।
त्यांचा मार अतिदुर्धर । घायीं थोरथोर लोळविती ॥ १९ ॥
त्यांचा मार अतिदुर्धर । घायीं थोरथोर लोळविती ॥ १९ ॥
कामक्रोधादि महान् महान् वीर मनाचे शूर सेनापति असून त्यांचा मारा फार असह्य आहे. ते तडाक्यासरसे मोठमोठ्यांना लोळवून सोडतात १९.
बाह्य शत्रु ते दूरदेशीं । येतां बहु दिन लागती त्यांसी ।
मनःशत्रु तो अंगेंसीं । अहर्निशीं जडलासे ॥ ७२० ॥
मनःशत्रु तो अंगेंसीं । अहर्निशीं जडलासे ॥ ७२० ॥
बाहेरचे शत्रू असतात ते दूर देशावर असतात. त्यांना आपल्याजवळ यावयाला बरेच दिवस लागतात. परंतु मनोरूप शत्रु अगदी आंगाशींच रात्रंदिवस भिडलेला असतो ७२०.
आसनीं भोजनीं एकांतीं । जपीं अथवा ध्यानस्थितीं ।
मनाची उडी पडे अवचितीं । विभांडी सर्वार्थीं वैराकरें ॥ २१ ॥
मनाची उडी पडे अवचितीं । विभांडी सर्वार्थीं वैराकरें ॥ २१ ॥
आसनावर, जेवतांना, एकांतांत, जप करतांना अथवा ध्यान करतांना मनाची अकस्मात् उडी येऊन पडते, आणि तें शत्रुत्वाने सर्वस्वी पराभव करितें २१.
बाह्य शत्रूचें अल्प दुःख । मनाची पीडा विशेख ।
जन्ममरणांचे आवर्त देख । मन आवश्यक भोगवी ॥ २२ ॥
जन्ममरणांचे आवर्त देख । मन आवश्यक भोगवी ॥ २२ ॥
बाहेरच्या शत्रूचे दुःख फार थोडे असते, पण मनाची पीडा मोठी असते. ते मन जन्ममरणांचे भोंवरे हटकून भोगावयाला लावते २२.
बाह्य शत्रु मरणात्मक । मन मरणासी अटक ।
हा वैरी न जिंकितां देख । जीवाचें अतिदुःख टळेना ॥ २३ ॥
हा वैरी न जिंकितां देख । जीवाचें अतिदुःख टळेना ॥ २३ ॥
बाह्य शत्रु मरणाधीन असतात, परंतु मन हे मरणालाही विद्या करिते. या मनरूपी शत्रूला जर जिंकलें नाही, तर जिवाचे मोठे दुःख टळावयाचे नाही २३.
मनाचे सवेग वेगासी । न साहवे सुरनरांसी ।
कष्टीं न जिंकवे कोणासी । यालागीं मनासी दुर्जयत्व ॥ २४ ॥
कष्टीं न जिंकवे कोणासी । यालागीं मनासी दुर्जयत्व ॥ २४ ॥
मनाच्या वेगवान् गतीला देवांना किंवा मनुष्यांनाही सहन करितां येत नाही. कोणी कितीही श्रम केले तरी त्या मनाला जिंकता येत नाही. म्हणूनच मनाला अजिंक्यपणा प्राप्त झाला आहे २४.
ऐशिया मनातें न जिंकित । बाह्य शत्रु जिणोनि येथ ।
जे होती अतिगर्वित । ते निश्चित जाण महामूर्ख ॥ २५ ॥
जे होती अतिगर्वित । ते निश्चित जाण महामूर्ख ॥ २५ ॥
अशा मनाला न जिंकता केवळ जगामध्ये बाहेरचे शत्रु जिंकून जे अत्यंत गर्वाने फुगतात, ते खरोखरच महामूर्ख होत असे समज २५.
मनेंचि जिंकावें मनासी । हें गतश्लोकीं तुजपाशीं ।
सांगीतलें यथार्थेंसीं । मनोजयासी उपावो ॥ २६ ॥
सांगीतलें यथार्थेंसीं । मनोजयासी उपावो ॥ २६ ॥
मनानेच मनाला जिंकावें हें मागच्या श्लोकांत तुझ्याजवळ यथार्थ रीतीने सांगितलेच आहे. तोच मनोजयाचा उपाय होय २६.
एवं मनातें ऐशियापरी । न साधवेचि करूनि वैरी ।
तरी मनासी करोनि मैत्री । मन सुखी करी मित्रत्वें ॥ २७ ॥
तरी मनासी करोनि मैत्री । मन सुखी करी मित्रत्वें ॥ २७ ॥
तात्पर्य, अशा रीतीने मनाला शत्रु बनवून मन जिंकणे साधत नसेल, तर मनाशी मैत्री करून मित्रभावानेच मनाला सुखी करावें २७.
प्राकृत मित्रांची मैत्री । उपकारीं प्रत्युपकारी ।
तेही विषयसुखावरी । येरयेर घरीं उचितानुकाळें ॥ २८ ॥
तेही विषयसुखावरी । येरयेर घरीं उचितानुकाळें ॥ २८ ॥
सामान्यतः मित्रांची मैत्री म्हटली म्हणजे एकाने उपकार केला तर उलट दुसऱ्याने उपकार करावयाचा, पण ती सारी मैत्री विषयसुखाची असते, आणि योग्य प्रसंगी ते एकमेकांच्या घरीही जातात २८.
तैशी नव्हे मनाची मैत्री । उपकारेंवीण प्रत्युपकारी ।
सकळ दुःखातें निवारी । सुखसागरीं नांदवी ॥ २९ ॥
सकळ दुःखातें निवारी । सुखसागरीं नांदवी ॥ २९ ॥
तशी मनाची मैत्री नव्हे. ते कोणी उपकार न करतांच त्याच्यावर उपकार करते, आणि सर्व दुःखांचे निवारण करून सुखसागरामध्ये नांदविते २९.
प्राकृतीं अतिमित्रत्व ज्यासी । निजदुःख सांगतां त्यापाशीं ।
सर्वथा निवारेना त्यासी । म्हणे हें आम्हांसी असाध्य ॥ ७३० ॥
सर्वथा निवारेना त्यासी । म्हणे हें आम्हांसी असाध्य ॥ ७३० ॥
साधारणपणे ज्याच्याशी आपली अत्यंत मैत्री असते, त्याच्यापाशी आपले दुःख सांगितले असता तें काही त्याच्याने सर्वस्वी दूर करवत नाही. तो म्हणतो की, "हे आपल्याला असाध्य आहे" ७३०.
तैसें मित्रत्वा नव्हे मन । मना बैसवूनि सावधान ।
करितां निजदुःख निवेदन । हरी जन्ममरणमहाबाधा ॥ ३१ ॥
करितां निजदुःख निवेदन । हरी जन्ममरणमहाबाधा ॥ ३१ ॥
तशी कांहीं मनाची मैत्री नव्हे. मनाला नीट बसवून त्याला जर आपले दुःख सांगितले तर तें जन्ममरणाची मोठी पीडाही दूर करते ३१.
मरणभय असतां चित्तीं । कनककामिनींची आसक्ती ।
स्त्रिया अतिशयें निर्भर्त्सिती । तरी निर्लज्जवृत्ती लाजेना ॥ ३२ ॥
स्त्रिया अतिशयें निर्भर्त्सिती । तरी निर्लज्जवृत्ती लाजेना ॥ ३२ ॥
मरणाचे भय मनामध्ये असतांही कनक आणि कांता ह्यांची आसक्ति असते; ' स्त्रिया अतिशय निर्भर्त्सना करतात तरी निर्लज्ज वृत्तीला लाज वाटत नाही ३२;
परदारा परधन । परद्रोहो परनिंदा जाण ।
लागल्या न सांडितां क्षण । नरक दारुण भोगावया ॥ ३३ ॥
लागल्या न सांडितां क्षण । नरक दारुण भोगावया ॥ ३३ ॥
परस्त्री, परद्रव्य, परद्रोह व परनिंदा यांची एकदां संवय लागली असतां ती व्यसने एक क्षणभरही रिकामें बसू देत नाहीत, आणि भयंकर नरकवास भोगावयाला लावतात ३३.
उसंत नाहीं क्षुधेहातीं । द्वंद्वदुःखांची अतिप्राप्ती ।
नावरे इंद्रियवृत्ती । ऐसें मनाप्रती सांगतां ॥ ३४ ॥
नावरे इंद्रियवृत्ती । ऐसें मनाप्रती सांगतां ॥ ३४ ॥
क्षुधेपुढे तर मुळीच उशीर खपत नाही. द्वंद्वाची दुःखें तर काय एकावर एक येऊन कोसळतात. इंद्रियांची वृत्ति तर काहीं आवरत नाही, असे मनाला सांगितलें असतां ३४,
ऐसें ऐकतां स्वयें मन । वैराग्यें खवळे पूर्ण ।
वेंचूनि विवेकाचें धन । दुःखनिर्दळण करूं पावे ॥ ३५ ॥
वेंचूनि विवेकाचें धन । दुःखनिर्दळण करूं पावे ॥ ३५ ॥
तें ऐकतांना मन स्वतः वैराग्याने पूर्णपणे खवळते, आणि विवेकाचे द्रव्य खर्च करून दुःखाचा नाश करण्यास तयार होते ३५.
चोर भांडारी करित पूर्ण । चोर चोरातें निवारी जाण ।
तेवीं मनासीं करितां मित्रपण । मनाचे अवगुण मनचि नाशी ॥ ३६ ॥
तेवीं मनासीं करितां मित्रपण । मनाचे अवगुण मनचि नाशी ॥ ३६ ॥
चोर असेल त्यालाच जामदारखान्याचा संरक्षक नेमिलें असतां तो चोरच इतर चोरांचे निवारण करतो. त्याप्रमाणे मनाशीच मैत्री केली असता मनात असलेले दुर्गुण मनच नाहीसे करून टाकतें ३६.
अधर्मीं प्रवर्ततां आपण । मनचि मनासी निवारी जाण ।
असत्याची वाचेसी आण । आपण्या आपण मन घाली ॥ ३७ ॥
असत्याची वाचेसी आण । आपण्या आपण मन घाली ॥ ३७ ॥
आपण अधर्मकृत्ये करण्यास प्रवृत्त झालों असतां मनच मनाला निवारण करते, आणि मन हे आपल्या आपणच वाणीला ' असत्य बोलू नकोस ' अशी शपथ घालते ३७.
कैशी मनाची मैत्री परम । निःशेष जाळावया कर्माकर्म ।
जोडावया चित्तशुद्धिचें वर्म । स्मरे हरिनाम अहर्निशीं ॥ ३८ ॥
जोडावया चित्तशुद्धिचें वर्म । स्मरे हरिनाम अहर्निशीं ॥ ३८ ॥
मनाची मैत्री कशी श्रेष्ठ आहे ! कर्माकर्म निःशेष जाळण्याकरितां व चित्तशुद्धीचे वर्म समजून घेण्याकरिता ते रात्रंदिवस हरिनाम स्मरूं लागते ३८.
श्रीराम जयराम दों अक्षरीं । महापातका होय बोहरी ।
नाम न विसंबे क्षणभरी । अखंडाकारीं हरी स्मरे ॥ ३९ ॥
नाम न विसंबे क्षणभरी । अखंडाकारीं हरी स्मरे ॥ ३९ ॥
' श्रीराम जयराम' यांतील 'राम' ह्या दोन अक्षरांनीच महापातकाचा नाश होतो. ते मन त्या नामाला सोडून क्षणभरही विश्रांति घेत नाही. अखंड हरीचेंच स्मरण करतें ३९.
तेव्हां असत्याचें शीस तोडी । अधर्माची साली काढी ।
कल्पनेचे पाय मोडी । तटका तोडी आशेचा ॥ ७४० ॥
कल्पनेचे पाय मोडी । तटका तोडी आशेचा ॥ ७४० ॥
त्या वेळी ते असत्याचा शिरच्छेद करते; अधर्माची साल काढते; कल्पनेचे पाय मोडते; आणि आशेचा तटका तोडून टाकतें ७४०.
विकल्पाचा घरठाव मोडी । प्रपंचाचे दांत पाडी ।
अविश्वासू तीं ठायीं तोडी । विश्वासाची गुढी उभवी मन ॥ ४१ ॥
अविश्वासू तीं ठायीं तोडी । विश्वासाची गुढी उभवी मन ॥ ४१ ॥
विकल्पाच्या घराचा नाश करते; प्रपंचाचे दांत पाडते; अविश्वासाचे तीन तुकडे करून टाकते आणि अखेरीस ते मन विश्वासाची गुढी उभारतें ४१.
ऐसेनि परिपक विश्वासीं । येऊनि सद्गुरुचरणांपाशीं ।
तनु मन धन सर्वस्वेंसीं । गुरुवचनासी विश्वासे ॥ ४२ ॥
तनु मन धन सर्वस्वेंसीं । गुरुवचनासी विश्वासे ॥ ४२ ॥
अशा परि पक्व विश्वासाने सद्गुरूच्या पायांपाशी येऊन त्यांना शरीर, मन, धन इत्यादि सर्वस्व अर्पून गुरुवचनावर विश्वास ठेवितें ४२.
पूर्ण विश्वासाचें लक्षण । होतां गुरुवाक्यश्रवण ।
परीसीं लोह पालटे जाण । तैसें अंतकःरण पालटे ॥ ४३ ॥
परीसीं लोह पालटे जाण । तैसें अंतकःरण पालटे ॥ ४३ ॥
पूर्ण विश्वासाचे लक्षण हेंच की, गुरूच्या उपदेशाचे श्रवण होतांच, ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शान लोखंडाचे स्वरूप बदलून त्याचे सोने होते, त्याप्रमाणे त्याचेंही अंतःकरण पालटते ४३.
गुरुवचन सांगोन राहे । परी मनींचें मनन न राहे ।
कीटकी भ्रमरी ऐसा पाहे । तद्रूप होये निदिध्यासें ॥ ४४ ॥
कीटकी भ्रमरी ऐसा पाहे । तद्रूप होये निदिध्यासें ॥ ४४ ॥
गुरूचा उपदेश सांगून झाला की तो संपतो, परंतु मनांतले मनन काही संपत नाही. कुंभारणीच्या ध्यासानें रूप बदलणाऱ्या अळीप्रमाणेच निदिध्यासाने तें मन तद्रूप होते ४४.
तेव्हां कमनीय कामिनी धन । तें देखे विष्ठेसमान ।
निंदा द्वेष मानाभिमान । हे मनाचे अवगुण मनचि नाशीं ॥ ४५ ॥
निंदा द्वेष मानाभिमान । हे मनाचे अवगुण मनचि नाशीं ॥ ४५ ॥
त्यावेळी ते मन सौंदर्यसंपन्न स्त्री किंवा द्रव्य ही विष्ठेप्रमाणेच मानते. निंदा, द्वेष, मान, अभिमान, हे मनाचे दुर्गुण मनच नाहीसे करून टाकतें ४५.
धन्य धन्य मनाची मैत्री । विश्वास धरोनि निर्धारीं ।
जन्ममरण जीवें मारी । जीवातें करी अजरामर ॥ ४६ ॥
जन्ममरण जीवें मारी । जीवातें करी अजरामर ॥ ४६ ॥
मनाची मैत्री फार धन्य ! पूर्णपणे विश्वास धरून ते जन्ममरणांना ठार मारिते व जीवाला तरुण व अमर करून सोडते ४६.
ऐशी मनाशीं करितां मैत्री । मन परम उपकारी ।
जीवातें धरूनि निजकरीं । स्वानंदसागरीं बुडी दे ॥ ४७ ॥
जीवातें धरूनि निजकरीं । स्वानंदसागरीं बुडी दे ॥ ४७ ॥
अशा प्रकारे मनाशी मैत्री केली असतां मन हे फार उपकार करते, व जीवाला आपल्या हातात धरून आत्मानंदसमुद्रात बुडी देते ४७.
तेथ मनाचें मनपण सरे । जीवाचें जीवपण विरे ।
बंधमोक्षांची धांव पुरे । समूळ ओसरे भवभय ॥ ४८ ॥
बंधमोक्षांची धांव पुरे । समूळ ओसरे भवभय ॥ ४८ ॥
त्या वेळी मनाचे मनपणच नाहींसें होते, जीवाचे जीवपणच विरून जाते, बंध-मोक्षांची धांव संपते, आणि संसारभय पूर्णपणे नाहीसे होते ४८.
मनाचें मित्रत्व यापरी । आपुलें कुळ स्वयें संहारी ।
आपणही मरे मित्रोपकारीं । मन मित्राचारीं अवंचक ॥ ४९ ॥
आपणही मरे मित्रोपकारीं । मन मित्राचारीं अवंचक ॥ ४९ ॥
याप्रमाणे मनाची मैत्री आहे. ते मन आपला वंश आपण स्वत:च मारून टाकतें, आणि आपणही मित्रावर उपकार करण्यासाठी मरून जाते. असें मन हें मैत्रीमध्ये लबाडी न करणारे आहे ४९.
ऐसें मैत्रीसी मन सादर । जवळी असतां निरंतर ।
त्यातें वोसंडूनि पामर । प्राकृत नर मित्र करिती ॥ ७५० ॥
त्यातें वोसंडूनि पामर । प्राकृत नर मित्र करिती ॥ ७५० ॥
असें मैत्रीला आदरपूर्वक वश होणारे मन सदोदित जवळ असतां क्षुद्र लोक त्याला सोडून यःकश्चित् मनुष्याला मित्र करीत असतात ७५०.
वैर करोनि मनचि मारावें । मित्रत्वें मनें मन साधावें ।
इयें दोनीं जैं न संभवे । तैं उपेक्षावें मनातें ॥ ५१ ॥
इयें दोनीं जैं न संभवे । तैं उपेक्षावें मनातें ॥ ५१ ॥
मनाशी शत्रुत्व करून मन मारून टाकावें , किंवा मैत्री जोडून मनानेच मन वळवावें. आणि ही दोन्ही न घडतील तर मनाला मुळी सोडूनच द्यावें ५१.
मन म्हणेल तें न करावें । मनातें हातीं न धरावे ।
मनातें कांहीं नातळावें । जीवेंभावें निःशेष ॥ ५२ ॥
मनातें कांहीं नातळावें । जीवेंभावें निःशेष ॥ ५२ ॥
मन म्हणेल ते करू नये, मनाला हाताशी धरूं नये, आणि जिवाभावाने मनाला मुळीच स्पर्शही करू नये ५२.
मन म्हणेल जें सुख । तें सांडावें आवश्यक ।
मन म्हणेल जें दुःख । तेंही निःशेख त्यजावें ॥ ५३ ॥
मन म्हणेल जें दुःख । तेंही निःशेख त्यजावें ॥ ५३ ॥
जे सुख आहे असें मन म्हणेल ते अवश्य सोडून द्यावे; आणि जें दुःख आहे असे मन म्हणेल तेंही निखालस टाकून द्यावें ५३.
ऐसें उदास मन देख । जो करी आवश्यक ।
तरी तो झाला अमनस्क । शांती अलोलिक ते ठायीं ॥ ५४ ॥
तरी तो झाला अमनस्क । शांती अलोलिक ते ठायीं ॥ ५४ ॥
याप्रमाणे जो आपले मन अवश्य उदासवाणे करील; तो मनरहित झाला असे समजावे. त्या ठिकाणी अलौकिक शांति प्राप्त होते ५४.
शत्रु मित्र उदासीन । करूनि वश्य न करी मन ।
जो धरी देहाभिमान । त्याचें भवभ्रमण सरेना ॥ ५५ ॥
जो धरी देहाभिमान । त्याचें भवभ्रमण सरेना ॥ ५५ ॥
शत्रुत्वाने, मित्रत्वाने किंवा उदासीनपणाने वागून जो मनाला वश करणार नाही, आणि जो देहाभिमान धरून बसेल, त्याचे संसारचक्रांतील भ्रमण चुकावयाचें नाहीं ५५.
देहं मनोमात्रमिमं गृहीत्वा ममाहमित्यन्धधियो मनुष्याः ।
एषोऽहमन्योऽयमिति भ्रमेण दुरन्तपारे तमसि भ्रमन्ति ॥ ५० ॥
एषोऽहमन्योऽयमिति भ्रमेण दुरन्तपारे तमसि भ्रमन्ति ॥ ५० ॥
[श्लोक ५०] अविवेकी माणसे या केवळ मनःकल्पित शरीराला 'मीमाझे' मानून हा मी आणि हा दुसरा या भ्रमाने या शेवट नसलेल्या संसारात भटकत राहातात. (५०)
आत्मा विदेहो चिद्घन । तेथ मी देही हें मानी मन ।
त्या देहासवें मी-माझेपण । जन्ममरण सुखदुःखें ॥ ५६ ॥
त्या देहासवें मी-माझेपण । जन्ममरण सुखदुःखें ॥ ५६ ॥
आत्मा हा विदेही असून ज्ञानस्वरूप आहे. असे असतां मन हे मी देहधारी आहे असे मानते. त्या देहाबरोबरच मीपणा व माझेपणा उत्पन्न होऊन जन्ममरण व सुखदुःखें भोगावी लागतात ५६.
आत्मा नित्यमुक्त विदेही । तो मनाच्या एकात्मता पाहीं ।
विदेही तो म्हणवी देही । शेखीं देहाच्या ठायीं आत्मत्व मानी ॥ ५७ ॥
विदेही तो म्हणवी देही । शेखीं देहाच्या ठायीं आत्मत्व मानी ॥ ५७ ॥
आत्मा हा नित्यमुक्त असून विदेही आहे. तो मनाशी एकरूप झाल्यामुळे, मूळचा विदेही असतांही मी देही आहे असे म्हणतो, आणि शेवटी देहाच्या ठिकाणींच आपलेपणा मानतो ५७.
मी देह हें मानी मन । तेणें दृढ होय देहाभिमान ।
तेव्हां देहचि होय आपण । मी-माझेपण ते ठायीं ॥ ५८ ॥
तेव्हां देहचि होय आपण । मी-माझेपण ते ठायीं ॥ ५८ ॥
मी देह असें मन मानते, त्यामुळे देहाभिमान बळावतो, आणि तो आत्मा आपणच देहस्वरूप होऊन त्या देहाच्या ठिकाणी मीपणा व माझेपणा मानू लागतो ५८.
मी सच्चिदानंद परिपूर्ण । हें आपलें विसरे आपण ।
मी वैश्य शूद्र क्षत्रिय ब्राह्मण । मूर्ख सज्ञान मी एक ॥ ५९ ॥
मी वैश्य शूद्र क्षत्रिय ब्राह्मण । मूर्ख सज्ञान मी एक ॥ ५९ ॥
मी सच्चिदानंद व परिपूर्ण आहे हे आपले लक्षण तो आत्मा स्वत:च विसरतो आणि मी वैश्य, शूद, क्षत्रिय, ब्राह्मण आहे; किंवा मीच काय तो एक मूर्ख किंवा ज्ञाता आहे असे मानतो ५९.
मी रोडका बोडका कुब्ज काण । मी धाटामोठा विचक्षण ।
हे नाथिले घेऊनि देहगुण । माणुसपण स्वयें मिरवी ॥ ७६० ॥
हे नाथिले घेऊनि देहगुण । माणुसपण स्वयें मिरवी ॥ ७६० ॥
मी रोडका, बोडका, कुबडा, तिरवा आहे; मी मोठा धीट आणि चाणाक्ष आहे; असे मिथ्या असलेले देहाचे गुण आंगी लावून घेऊन स्वत:च मनुष्यपणा मिरवतो ७६०.
स्वप्नामाजीं संन्यासी । आपण देखे अंत्यजवंशीं ।
तो आतळों मी ब्राह्मणासी । जीवास तैसी दशा झाली ॥ ६१ ॥
तो आतळों मी ब्राह्मणासी । जीवास तैसी दशा झाली ॥ ६१ ॥
एकादा संन्यासी स्वप्नामध्ये आपण अंत्यजवंशांत जन्माला आलो आहों असें पहातो व त्यामुळे तो ब्राह्मणाला शिवावयाला भितो; तशीच दशा जीवाला झालेली आहे ६१.
स्वयें परमात्मा भेदशून्य । तेथ मी माझे स्त्री पुत्र धन ।
स्वजन दुर्जन उदासीन । त्रिविध भेद पूर्ण सत्यत्वें मानी ॥ ६२ ॥
स्वजन दुर्जन उदासीन । त्रिविध भेद पूर्ण सत्यत्वें मानी ॥ ६२ ॥
परमात्मा स्वतः भेदरहित असा असून तो स्वत:च्या ठिकाणी मी, माझी स्त्री, माझा पुत्र, माझें द्रव्य इत्यादि मानितो; व आपले इष्टमित्र, दुर्जन, उदासीन इत्यादि जे त्रिविध भेद आहेत ते पूर्णपणे खरेच आहेत असे मानितो ६२.
ऐसी देहात्मभावसिद्धी । सत्य मानितां भेदविधी ।
जीवाची निजात्मबुद्धी । झाली त्रिशुद्धी आंधळी ॥ ६३ ॥
जीवाची निजात्मबुद्धी । झाली त्रिशुद्धी आंधळी ॥ ६३ ॥
अशा प्रकारें देहात्मभाव सिद्ध झाला आणि भेदभाव खरेच आहेत असे वाटू लागले, म्हणजे जीवाची स्वतःची आत्मबुद्धि खरोखरच आंधळी झाली असे समजावें ६३.
जैसा स्वप्नींचा मिथ्या वेव्हार । तैसा मनःकल्पित संसार ।
तो मानितांचि साचार । देहअहंकार द्रुढ झाला ॥ ६४ ॥
तो मानितांचि साचार । देहअहंकार द्रुढ झाला ॥ ६४ ॥
ज्याप्रमाणे स्वप्नांतील व्यवहार खोटा; त्याप्रमाणेच मनाने कल्पिलेला संसार हाही खोटा आहे. तो खरा मानला, की देहाचा अहंकार बळावतो ६४.
दृढ होतां देहाभिमान । पुढती जन्म पुढती मरण ।
भवचक्रीं परिभ्रमण । निजभ्रमें जाण जीवासी ॥ ६५ ॥
भवचक्रीं परिभ्रमण । निजभ्रमें जाण जीवासी ॥ ६५ ॥
देहाभिमान बळावला की पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण अशा प्रकारे संसारचक्रांतील परिभ्रमण जीवाला त्याच्याच भ्रमाने भोगावें लागते ६५.
जेवीं केवळ अग्नीप्रती । घणघाय कदा न लागती ।
तेचि लोहाचिया संगतीं । घण वरी घेत सुबद्ध ॥ ६६ ॥
तेचि लोहाचिया संगतीं । घण वरी घेत सुबद्ध ॥ ६६ ॥
ज्याप्रमाणे नुसत्या अग्नीला घणाचे घाव कधींच लागत नाहीत, पण तोच अग्नि लोखंडाच्या संगतीला लागला की आपल्या आंगावर अवजड घणाचे घाव मारून घेतो ६६,
तेवीं नित्यमुक्त परिपूर्ण । तेणें धरितां देहाभिमान ।
अंगीं लागलें जीवपण । जन्ममरण तेथें सोशी ॥ ६७ ॥
अंगीं लागलें जीवपण । जन्ममरण तेथें सोशी ॥ ६७ ॥
त्याप्रमाणेच नित्यमुक्त व परिपूर्ण जो आत्मा, त्याने देहाभिमान धरिला असता, त्याच्या आंगी जीवपणा लागतो, आणि त्यामुळे तो जन्ममरण सोशीत बसतो ६७.
जेवीं डोळे बांधोनि व्यापारू । मंवे तेलियाचा ढोरू ।
तेवीं अहंकारें अंध नरू । परिभ्रमे थोरू भवचक्रीं ॥ ६८ ॥
तेवीं अहंकारें अंध नरू । परिभ्रमे थोरू भवचक्रीं ॥ ६८ ॥
ज्याप्रमाणे तेल्याच्या पाण्याचा बैल डोळे बांधलेले असल्यामुळे आंधळेपणानेच वाटोळा फिरत राहतो, त्याप्रमाणे मनुष्यही अहंकाराने आंधळा होऊन अफाट संसारचक्रांत फिरत राहतो ६८.
तेथ सोशितां जन्ममरण । अतिदुःखी होय आपण ।
तरी न सांडी देहाभिमान । अंधतमीं जाण तो घाली ॥ ६९ ॥
तरी न सांडी देहाभिमान । अंधतमीं जाण तो घाली ॥ ६९ ॥
तेथे जन्ममरण सोशीत असता आपण अत्यंत दुःखी होतो, तरी देहाभिमान सोडीत नाही. आणि शेवटीं तो अभिमान त्याला अंधतम नरकांत नेऊन घालतो ६९.
ज्याचे दुःखें न पविजे पार । जो तरवेना अतिदुस्तर ।
जो भोग भोगवी अघोर । तो संसार मनोजन्य ॥ ७७० ॥
जो भोग भोगवी अघोर । तो संसार मनोजन्य ॥ ७७० ॥
ज्याचे दुःख अपार आहे, तो दुस्तर असल्यामुळे तरूनही जाता येत नाही, जो अघोर भोग भोगावयास लावतो, तो संसार मन:कल्पितच होय ७७०.
मनचि सुखदुःखांसी कारण । हें आठवे श्लोकीं निरूपण ।
भिक्षु बोलोनि आपण । जनादि दुःखकारण मिथ्यात्वें दावी ॥ ७१ ॥
भिक्षु बोलोनि आपण । जनादि दुःखकारण मिथ्यात्वें दावी ॥ ७१ ॥
मन हेंच सुखदुःखांना कारण होय असें वर्णन आठव्या श्लोकांत भिक्षूनें स्वतः सांगितलेच आहे. आता दुःखांना कारण लोक वगैरे होत असें जें म्हणतात, तेही खोटे असे दाखवितो ७१.
जनस्तु हेतुः सुखदुःखयोश्चेत् किमात्मनश्चात्र हि भौमयोस्तत् ।
जिह्वां क्वचित्संदशति स्वदद्भिः ततद्वेदनायां कतमाय कुप्येत् ॥ ५१ ॥
जिह्वां क्वचित्संदशति स्वदद्भिः ततद्वेदनायां कतमाय कुप्येत् ॥ ५१ ॥
[श्लोक ५१] मनुष्यच सुखदुःखाला कारणीभूत आहे असे मानले, तर त्याचा आत्म्याशी काय संबंध ? कारण सुखदुःख देणारेही भौतिक शरीर आणि भोगणारेसुद्धा भौतिक शरीरच ! एखादे वेळी आपल्या दातांनीच आपली जीभ चावली गेली आणि वेदना होऊ लागल्या तर त्या मनुष्याने कोणावर रागवावे ? (५१)
जननीजठरीं ज्यासी जनन । त्या नांव बोलिजेती जन ।
ते सुखदुःखांसी कारण । सर्वथा जाण मज नव्हती ॥ ७२ ॥
ते सुखदुःखांसी कारण । सर्वथा जाण मज नव्हती ॥ ७२ ॥
ज्याला जननीच्या उदरामध्ये जन्म घ्यावा लागतो, त्याला 'जन' हे नांव देतात. ते जन माझ्या सुखदुःखांना मुळीच कारण होत नाहीत ७२.
जन जनासी दे दुःखबाधू । तेथ आत्म्यासी काय संबंधू ।
आत्मा देहातीत शुद्धू । सुखदुःखबाधू त्या न लगे ॥ ७३ ॥
आत्मा देहातीत शुद्धू । सुखदुःखबाधू त्या न लगे ॥ ७३ ॥
लोक लोकांनाच दुःख-पीडा देतात, त्याचा आत्म्याशी संबंध काय ? आत्मा देहाहून निराळा असून शुद्ध आहे. त्याला सुखदुःखांची बाधा लागत नाहीं ७३.
देहें देहासे होईल दुःख । देहो तितुका पांचभौतिक ।
त्यांसी परस्परें असे ऐक्य । सर्वथा सुखःदुख घडेना ॥ ७४ ॥
त्यांसी परस्परें असे ऐक्य । सर्वथा सुखःदुख घडेना ॥ ७४ ॥
देहानें देहाला दुःख होईल म्हणावें, तर देह तितके पंचभूतात्मक आहेत. तेव्हा त्यांचे परस्पर ऐक्यच आहे. अर्थात त्यांनाही सुखदुःख मुळीच घडावयाचें नाहीं ७४.
जळामाजीं जळ सूतां । जेवीं जळासी नव्हे व्यथा ।
कां दीपू दीपें एकवटतां । दीपासी सर्वथा दुःख न बाधी ॥ ७५ ॥
कां दीपू दीपें एकवटतां । दीपासी सर्वथा दुःख न बाधी ॥ ७५ ॥
पाण्यामध्येच पाणी ओतले असतां ज्याप्रमाणे पाण्याला काही दुःख होत नाहीं; किंवा दिव्याशी दिवा एकत्र मिळाला असतां दिव्यालाही मुळीच पीडा होत नाहीं ७५,
तेवीं पार्थिवें पार्थिवासी । सुखदुःखबाधा न घडे त्यासी ।
आत्मा नातळे सुखदुःखांसी । तो देहासी स्पर्शेना ॥ ७६ ॥
आत्मा नातळे सुखदुःखांसी । तो देहासी स्पर्शेना ॥ ७६ ॥
त्याप्रमाणे देहाने देहाला (पार्थिव = पृथ्वीपासून झालेला देह) स्पर्श केला असता त्याला सुखदुःखांची पीडा होत नाही, आणि आत्मा हा देहाला शिवतही नसल्यामुळे सुखदुःखांनाही शिवत नाही ७६.
म्हणाल जीव जो देहाचा अभिमानी । सुखदुःखें होती त्यालागोनी ।
दुःखभोक्ता दुजेपणीं । पाहतां कोणी दिसेना ॥ ७७ ॥
दुःखभोक्ता दुजेपणीं । पाहतां कोणी दिसेना ॥ ७७ ॥
आता तुम्ही म्हणाल की, जो जीव देहाचा अभिमानी आहे, त्यालाच सुखदुःखें होतात. कारण दुःखाचा भोक्ता निराळा असा पाहूं लागले असतां कोणीच दिसत नाहीं ७७.
आपुली जिव्हा आपुले दांतीं । रगडिली होय अवचितीं ।
तया कोपाची अतिप्राप्ती । कोणाप्रती करावी ॥ ७८ ॥
तया कोपाची अतिप्राप्ती । कोणाप्रती करावी ॥ ७८ ॥
आपली जीभ अकस्मात आपल्या दांतांखाली चावली गेली, तर त्यामुळे आलेला मोठा संताप काढावा कोणावर? ७८.
तेथील कोपाच्या कडाडीं । दांत पाडी कीं जीभ तोडी ।
तैशी जगीं एकात्मता धडफुडी । कोप यावया सवडी असेना ॥ ७९ ॥
तैशी जगीं एकात्मता धडफुडी । कोप यावया सवडी असेना ॥ ७९ ॥
त्या वेळच्या संतापाच्या भरात तो दांत पाडतो की जीभ तोडतो? काही नाही. त्याप्रमाणे जगामध्ये सर्वच ऐक्य जर स्पष्ट दिसते आहे, तर राग यावयास काही कारणच नाहीं ७९.
जो पुढिलाचे ढक्यांनीं पडे । तो त्यावरी कोपें वावडे ।
स्वयें निसरोनि गडबडे । तो लाजिला मागेंपुढें न कोपतां निघे ॥ ७८० ॥
स्वयें निसरोनि गडबडे । तो लाजिला मागेंपुढें न कोपतां निघे ॥ ७८० ॥
दुसऱ्याच्या धक्क्याने जो पडतो, तो त्या धक्का देणारावर रागाने हात उगारतो. पण जो स्वतःच निसरून गडबडा लोळू लागतो, तो लाजून मागेपुढे कोणावर न रागावतां चालता होतो ७८०.
तेवीं मीचि भूतें मीचि भोक्ता । माझ्या दुःखाचा मी दाता ।
जगीं मीच मी एकात्मता । कोणावरीं आतां कोपावें ॥ ८१ ॥
जगीं मीच मी एकात्मता । कोणावरीं आतां कोपावें ॥ ८१ ॥
त्याप्रमाणे प्राणिमात्र मीच आणि भोग भोगणाराही मीच; माझे दुःख देणाराही मीच; जगामध्ये ऐक्यरूपाने मीच सर्वत्र भरलेलों आहे. आतां रागवावयाचें कोणावर? ८१.
माझ्या सुखदुःखांसी कारण । यापरी नव्हतीच जन ।
म्हणाल जरी देवतागण । तेंही प्रमाण घडेना ॥ ८२ ॥
म्हणाल जरी देवतागण । तेंही प्रमाण घडेना ॥ ८२ ॥
ह्याप्रमाणे माझ्या सुखदुःखांना लोक कारण नाहीतच. आता त्याला देवांचा समुदाय कारण असेल असें म्हणाल तर तेही प्रमाण खरें नाहीं ८२.
दुःखस्य हेतुर्यदि देवतास्तु किमात्मनस्तत्र विकारयोस्तत् ।
यदङ्गमङ्गेन निहन्यते क्वचित् क्रुध्येत कस्मै पुरुषः स्वदेहे ॥ ५२ ॥
यदङ्गमङ्गेन निहन्यते क्वचित् क्रुध्येत कस्मै पुरुषः स्वदेहे ॥ ५२ ॥
[श्लोक ५२] दुःख देण्याला देवता कारण आहे असे मानले, तरी आत्म्याचा त्या दुःखाशी काय संबंध आहे ? कारण सर्वांच्या शरीरांमध्ये इंद्रियांच्या देवता एकच आहेत म्हणून जी दुःख देणारी तीच दुःख भोगणारीही ठरते जसे आपल्याच एका अवयवाने दुसर्या अवयवाला इजा केली, तर माणसाने कोणावर रागवावे ? (५२)
आतां दुसरें कारण मतीं । देवांपासोनि दुःखप्राप्ती ।
देवांची देहामाजीं वस्ती । आत्मा निजस्थितीं विदेही ॥ ८३ ॥
देवांची देहामाजीं वस्ती । आत्मा निजस्थितीं विदेही ॥ ८३ ॥
आता ज्या काही जणांच्या मताने दुसरेंच कारण आहे, ते म्हणतात-देवांपासून दुःखप्राप्ति होते. परंतु देवांची वस्ती देहामध्ये आहे, व आत्मा हा आत्मस्वरूपांत असून विदेहीच आहे ८३.
देहींच्या इंद्रियविकारीं । देव झाले अधिष्ठात्री ।
आत्मा अखंड अविकारी । सुखदुःखांमाझारी अलिप्त ॥ ८४ ॥
आत्मा अखंड अविकारी । सुखदुःखांमाझारी अलिप्त ॥ ८४ ॥
देहांतील इंद्रियांच्या विकारांना देवच नियामक होतात. आत्मा हा अखंड अविकारीच असतो. तो सुखदुःखांपासून अलिप्त असतो ८४.
भूमी सहजें निर्विकार । तिची भिंती तीवरी सविकार ।
तेवीं वस्तु नित्य निर्विकार । तेथ भासती सविकार अधिष्ठात्रीं देव ॥ ८५ ॥
तेवीं वस्तु नित्य निर्विकार । तेथ भासती सविकार अधिष्ठात्रीं देव ॥ ८५ ॥
भूमि ही स्वभावत: निर्विकारच आहे. तिचीच तिच्यावर घातलेली भिंत सविकार होय. त्याप्रमाणे ब्रह्म हे नित्य व निर्विकारच आहे. त्यांत नियामक देव असतात ते सविकार भासतात ८५.
भिंती पडल्या भूमिवरी । ते मेळवी आपण्यामाझारी ।
तेवीं निर्गुणनिर्विकारी । इंद्रियें अधिष्ठात्री येती ऐक्या ॥ ८६ ॥
तेवीं निर्गुणनिर्विकारी । इंद्रियें अधिष्ठात्री येती ऐक्या ॥ ८६ ॥
भिंत जमिनीवर पडली, म्हणजे तिला जमीन आपल्यामध्ये एकरूप करते, त्याप्रमाणे निर्गुण व निर्विकार ब्रह्मामध्ये इंद्रियांच्या नियामक देवता एक होतात ८६.
स्वदेहीं परदेहीं जाण । इंद्रियें अधिष्ठात्रीं समान ।
इंद्रियांचें सुखदुःख दारुण । आपुलें आपण भोगिती देव ॥ ८७ ॥
इंद्रियांचें सुखदुःख दारुण । आपुलें आपण भोगिती देव ॥ ८७ ॥
आपल्या देहांत किंवा दुसऱ्याच्या देहांत इंद्रियांचे नियमन करणाऱ्या देवता सारख्याच आहेत. त्यामुळे इंद्रियांचे भयंकर सुखदुःख देव आपले आपणच भोगतात ८७.
हातें हाणतां तोंडावरी । तेथ इंद्र अग्नि अधिष्ठात्री ।
तेव्हा इंद्रचि अग्नीतें मारी । आत्मा अविकारी दुःखातीत ॥ ८८ ॥
तेव्हा इंद्रचि अग्नीतें मारी । आत्मा अविकारी दुःखातीत ॥ ८८ ॥
हाताने तोंडावर मारले असता, तेथे अनुक्रमें इंद्र आणि अग्नि या नियामक देवता आहेत, म्हणून इंद्रच अग्नीला मारतो असे झाले. आत्मा अविकारी असल्यामुळे तो दु:खापासून अलिप्तच आहे ८८.
हो कां मुखें डसल्या हातासी । अग्नीनें घाय केलें इंद्रासी ।
आत्मा अलिप्त इंद्रादिदेवांसी । सुखदुःख त्यासी स्पर्शेना ॥ ८९ ॥
आत्मा अलिप्त इंद्रादिदेवांसी । सुखदुःख त्यासी स्पर्शेना ॥ ८९ ॥
किंवा तोंडाने हाताचा चावा घेतला, तर अग्नीने इंद्राला घायाळ केले असे होईल. आत्मा हा इंद्रादि देवांपासून भिन्न असल्यामुळे त्याला सुखदुःख शिवतच नाही ८९.
परमुखें स्वमुखावरी थुंकिजे । दोहीं मुखी अग्नीनें नांदिजे ।
तेथ कोणें कोणावरी कोपिजे । आत्मस्वरूपी दुजें असेना ॥ ७९० ॥
तेथ कोणें कोणावरी कोपिजे । आत्मस्वरूपी दुजें असेना ॥ ७९० ॥
दुसऱ्याच्या तोंडाने आपल्या तोंडावर थुकी थुंकली, तर दोन्ही मुखांमध्ये अग्नीनेच आपले वास्तव्य केलेले असल्यामुळे अशा वेळी कोणी कोणावर रागवावें ? आत्मस्वरूपांत दुसरे कोणीच नाहीं ७९०.
थुंक आणि जें कां मूत । देहीं उपजे तें देहाचें अपत्य ।
तें देहींचें देहावरी लोळत । कोपे तेथ कोण कोणा ॥ ९१ ॥
तें देहींचें देहावरी लोळत । कोपे तेथ कोण कोणा ॥ ९१ ॥
थुका झाला काय, आणि मूत झाले काय, दोन्ही देहापासूनच झालेली असल्यामुळे देहाचीच अपत्ये होत. ती देहाची देहावर लोळतात, तेथे कोणी कोणावर रागवावें? ९१.
स्वमुखें परमुखा चुंबन दीजे । तेथ अग्नीनें अग्नीसी चुंबिजे ।
तेणें सुखें कोण फुंजे । आत्मत्वीं दुजें असेना ॥ ९२ ॥
तेणें सुखें कोण फुंजे । आत्मत्वीं दुजें असेना ॥ ९२ ॥
आपल्या मुखाने दुसऱ्याच्या मुखाला चुंबन द्यावे, तर अनीनेच अग्नीचे चुंबन घेतले. त्या आनंदानें कोण फुगणार! कारण आत्मस्वरूपांत दुसरे कोणीच नाहीं ९२.
स्वदेहें परदेहा आलिंगन । उभयस्पर्शीं वायूचि जाण ।
तेणें सुखें सुखावे कोण । दुजेपण असेना ॥ ९३ ॥
तेणें सुखें सुखावे कोण । दुजेपण असेना ॥ ९३ ॥
किंवा आपल्या देहाने दुसऱ्याच्या देहाला आलिंगन दिले, तर त्या दोघांच्या स्पर्शामध्ये एकटा वायूच असतो. त्या आनंदाने आनंदित कोण होणार? कारण तेथे दुसरेपणाच मुळी असत नाहीं ९३.
यापरी देवतागण । नव्हे सुखदुःखांसी कारण ।
आत्म्याचे ठायीं दैवतें जाण । हारपती पूर्ण अभेदत्वें ॥ ९४ ॥
आत्म्याचे ठायीं दैवतें जाण । हारपती पूर्ण अभेदत्वें ॥ ९४ ॥
बावरून देवांचा समुदाय हा काही सुखदुःखांना कारण नाही. कारण, आत्म्यामध्येच सर्व देवतें अभेदपणाने लयास जातात ९४.
देवीं देहो पीडितां निःशेख । देहाभिमान्या होईल दुःख ।
हें मानिती ते अतिमूर्ख । तेंही देख घडेना ॥ ९५ ॥
हें मानिती ते अतिमूर्ख । तेंही देख घडेना ॥ ९५ ॥
देवांनी देह पूर्णपणे पीडित केला असतां देहाभिमान्याला दुःख होईल असे जे मानतात, ते अत्यंत मूर्ख होत. कारण, तसेंही कधी घडत नाही ९५.
पुर म्हणिजे देहो देख । ते पुरी जा पुरनिवासक ।
तो सकळ देहीं पुरुष एक । तेथ कोणाचें दुःख कोण मानी ॥ ९६ ॥
तो सकळ देहीं पुरुष एक । तेथ कोणाचें दुःख कोण मानी ॥ ९६ ॥
पुर म्हणजे देह, त्या देहांत जो देहनिवासी असतो, तो सर्वांच्या देहांमध्ये एकच पुरुष आहे. असे असल्यामुळे कोणाचे दुःख कोण मानणार ? ९६.
जेवीं संभ्रम आवेशवेगीं । निजकर हाणतां निजांगीं ।
तेथील व्यथेचा भागी । कोपावयालागीं आप आपण्या ॥ ९७ ॥
तेथील व्यथेचा भागी । कोपावयालागीं आप आपण्या ॥ ९७ ॥
ज्याप्रमाणे आवेशाच्या पाळ्यांत आपलाच हात आपल्या अंगावर जोराने मारिला असता तेथे होणाऱ्या दुःखाचे भागीदारही आपणच, किंवा रागावण्याचे भागीदारही आपले आपणच ९७.
देखतां आपलें एकपण । कोणाची व्यथा मानी कोण ।
कोण कोणावरी कोपे जाण । आपण्या आपण एकला ॥ ९८ ॥
कोण कोणावरी कोपे जाण । आपण्या आपण एकला ॥ ९८ ॥
सर्वत्र आपलेच ऐक्यपण दिसून आले असतां कोणाचे दुःख कोण मानणार ? कोण कोणावर रागावणार ? कारण सर्व काय तो एकीएक आपला आपणच ९८.
तेवीं विश्वात्मा मीचि एक । मीचि दैवतें मीचि लोक ।
तेथ कोण कोणा दुःखदायक । म्यां कोणावरी देख कोपावें ॥ ९९ ॥
तेथ कोण कोणा दुःखदायक । म्यां कोणावरी देख कोपावें ॥ ९९ ॥
त्याप्रमाणे मीच एक विश्वात्मा आहे, मीच दैवते आणि मीच लोक, तेव्हा कोण कोणाला दुःख देतो। आणि मी रागवावे तरी कोणावर? ९९.
यापरी स्वयें विचारितां । देवांपासाव सुखदुःखता ।
समूळ न घडे सर्वथा । दैविकी व्यथा असेना ॥ ८०० ॥
समूळ न घडे सर्वथा । दैविकी व्यथा असेना ॥ ८०० ॥
याप्रमाणे आपल्याशी विचार केला असता देवांपासून सुखदुःख सर्वस्वी मुळीच होत नाही, म्हणून दैविक दुःख असत नाही अशी खात्री होते ८००.
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या १ ते १००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या १0१ ते २००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या २०१ ते ३००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ३०१ ते ४००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ४०१ ते ५००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ५०१ ते ६००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ६०१ ते ७००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ७०१ ते ८००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ८०१ ते ९००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ९०१ ते १००४
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...