मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ४०१ ते ५००

    तयांच्या निजधर्माचें निशाण । सत्यलोकीं लागलें जाण ।

    वैकुंठी कैलासी संपूर्ण । भेरीनिशाण त्राहाटिलें ॥ १ ॥
    त्याच्या औदार्यधर्माचा ' ध्वज  सत्यलोकी फडकत राहातो, आणि वैकुंठात व कैलासांत सर्वत्र त्याचा यशोदुंदुभि दुमदुमत राहतो १.


    स्वधर्में जोडलें निजधन । जो करी सद्गुरूसी अर्पण ।
    तोचि कर्मीं निष्कर्म जाण । परम पावन तो एक ॥ २ ॥
    स्वधर्माने  मिळविलेले द्रव्य जो सदुरूला अर्पण करतो, तोच कर्म करूनही निष्कर्मी होय असे समज. परमपवित्र असा एक तोच २.


    जो चढत्यावाढत्या भगवद्भक्ती । गुरूसी अर्पी निजसंपत्ती ।
    त्यातें अंगीकारूनि लक्ष्मीपती । आपुली निजभक्ती त्यासी दे ॥ ३ ॥
    जो अधिकाधिक भगवद्भक्तीने गुरुला आपली संपत्ति अर्पण करतो, त्याचा अंगीकार करून लक्ष्मीपति तर आपली भक्ति त्याला देतो ३.


    ज्यासी अनन्य गुरुभक्ती । त्याच्या द्वारीं चारी मुक्ती ।
    दासीत्वें उभ्या असती । त्यापासोनि श्रीपती परता नव्हे ॥ ४ ॥
    ज्याला एकनिष्ठ गुरुभक्ति असते, त्याच्या दारांत चारीही मुक्ति बटकीसारख्या उभ्या असतात. लक्ष्मीपति तर त्याच्यापासून दूर होतच नाहीं ४.


    ज्याचें तनु मन धन । गुरुचरणीं अर्पे पूर्ण ।
    त्यासी भवभयाचें भान । कल्पांतीं जाण दिसेना ॥ ५ ॥
    ज्याचे शरीर, मन व धन ही पूर्णपणे गुरुचरणींच अर्पण होतात, त्याला संसारभयाचे स्मरण कल्पांतीसुद्धा होणार नाही ५.


    दैवें जोडली जे संपत्ती । ते वेंचोनि ऐशा निगुतीं । अर्थें
    परमार्थप्राप्ती । सभाग्य लाहती निजनिष्ठा ॥ ६ ॥
    दैवाने जी संपत्ति मिळाली असेल, ती अशा रीतीनें खर्च करून भाग्यवान् मनुष्य त्या द्रव्याने निष्ठापूर्वक परमार्थाची प्राप्ति करून घेतात ६.


    ऐसें न वेंचोनि धन । स्वयाति कुटुंब पीडी पूर्ण ।
    जो पोटा न खाय आपण । तें यक्षधन संचित ॥ ७ ॥
    अशा रीतीने द्रव्य खर्च न करतां स्वजाति व कुटुंब यांना पूर्णपणे पीडा देतो व तो आपण स्वतः पोटाला खात नाही, त्याचें तें संग्रहित केलेलें धन हेंच ‘यक्षधन' होय ७. 


    एवं कदर्थूनि निजप्राण । जें संचिलें यक्षधन ।
    तें अधःपातासी कारण । दुःख दारुण धनलोभ्या ॥ ८ ॥
    अशा रीतीने आपल्या जीवाला क्लेश देऊन जें यक्षधन सांठविलेले असते, तें अधःपाताला कारण होते, आणि त्या द्रव्यलोभ्याला भयंकर दुःख प्राप्त होते ८.


    म्हणे मीही याच निष्ठा । यक्षवित्तें झालों करंटा ।
    हातींचा स्वार्थ गेला मोटा । वंचलों कटकटा निजमोक्षा ॥ ९ ॥
    तो ब्राह्मण म्हणाला, मीही त्याच रीतीनें यक्षवित्तानें करंटा झालो. हाती असलेला स्वत:चा मोठा लाभ व्यर्थ गेला, आणि हाय हाय! मी मोक्षाला अंतरलों! ९.


    सांचोनियां यक्षवित्त । म्यां माझें केलें अनहित ।
    ऐसा तो खेदयुक्त । कष्टें बोलत निजदुःख ॥ ४१० ॥
    यक्षवित्त सांठवून मी माझे अकल्याण केलें. असा तो खेदयुक्त होऊन मोठ्या कष्टाने आपले दुःख सांगतो ४१०.


    व्यर्थयार्थेहया वित्तं प्रमत्तस्य वयो बलम् ।
    कुशला येन सिध्यन्ति जरठः किं नु साधये ॥ २५ ॥
    [श्लोक २५] ज्यांनी विवेकी लोक मोक्षसुद्धा प्राप्त करून घेतात, तीच आयुष्य, धन आणि बळ ही साधने मी मूर्खाने धन मिळविण्याच्या प्रयत्‍नात व्यर्थ खर्च केली आता वृद्धापकाळी मी काय करणार ? (२५)


    निजभोगविवर्जित । शिणोनि काया वाचा चित्त ।
    कष्टें मिळवावया वित्त । झालों उन्मत्त अविवेकी ॥ ११ ॥
    स्वतः विलास न भोगतां शरीर, वाणी व मन यांना त्रास देऊन कष्टाने द्रव्य मिळविण्याकरिता मी उन्मत्त व अविचारी बनलों " ११.  


    करितां वित्ताचे आयास । गेलें तारुण्य बळ आयुष्य ।
    शरीर क्षीण झालें निःशेष । तरी वित्ताचा शोष शमेना ॥ १२ ॥
    द्वन्यप्राप्तीची खटपट करता करता तारुण्य, बळ व आयुष्य ही निघून गेली. शरीर पूर्णपणे क्षीण झाले. तरी द्रव्याचा हव्यास कमी होत नाही १२.


    अर्थें अर्थ वाढवितां । अनिवार वाढली चिंता ।
    तेथें विसरलों निजस्वार्था । अर्थलोभता कदर्यू ॥ १३ ॥
    पैशाने पैसा वाढवितांना चिंता अनिवार वाढली. त्यामुळे मी आपला स्वार्थ विसरलों, आणि द्रव्यलोभाने कृपण बनलों १३.


    जेणें वित्तें जीवितें साचार । भूतदया परोपकार ।
    करूनियां विवेकी नर । भवाब्धिपरपार पावले ॥ १४ ॥
    ज्या द्रव्याने आणि ज्या जन्माने खरोखर विचारी लोक भूतदया व परोपकार करून संसारसमुद्राच्या परतीराला पोंचले १४, 


    मज निर्दैवाचें येथ । वृथा वित्त वृथा जीवित ।
    आयुष्यही गेलें व्यर्थ । निजस्वार्थ बुडाला ॥ १५ ॥
    आणि अशा स्थितीत माझे कपाळकरंट्याचे द्रव्य व्यर्थ गेले, जीवित व्यर्थ गेलें, आयुष्यही फुकट गेले, आणि माझा स्वार्थ बुडाला १५.


    म्हणाल असतां जीवें जीत । साधूनि घेऊं निजस्वार्थ ।
    तें आतां न चले येथ । अर्थ सामर्थ्य दोनी गेलीं ॥ १६ ॥
    आता कदाचित् असें म्हणाल की, जिवांत जीव असतां यापुढे तरी आपला स्वार्थ साधून घेऊ! पण तेही आता अशा स्थितींत चालावयाचे नाही. कारण आतां द्रव्य आणि सामर्थ्य ही दोन्ही नाहीशी झाली १६.


    अधर्मास्तव गेलें वित्त । जरेनें गिळिलें सामर्थ्य ।
    केवळ मी जरठ येथ । दैवहत उरलों असें ॥ १७ ॥
    अधर्मामुळे सर्व पैसा संपला, आणि वृद्धावस्थेने सर्व सामर्थ्य गिळून टाकले. आता मी केवळ जीर्ण म्हातारा व कपाळकरंटा मात्र उरलों आहे १७.


    कटकटा जोडितां अर्थ । लोक नाडले समस्त ।
    ऐसें जाणोनि प्रस्तुत । स्वयें सांगत कदर्यु ॥ १८ ॥
    हाय हाय ! पैसा मिळवितांना सर्व लोक नागविले, हे लक्षात आणून आतां कदयु स्वतः सांगत आहे १८.


    कस्मात्संक्लिश्यते विद्वान् व्यर्थयार्थेहयासकृत् ।
    कस्यचिन्मायया नूनं लोकोऽयं सुविमोहितः ॥ २६ ॥
    [श्लोक २६] विद्वानसुद्धा धनाच्या व्यर्थ हव्यासाने नेहमी दुःखी का होतात बरे ! हा संसार निश्चितच कोणाच्या तरी मायेने अतिशय मोहित होत आहे. (२६)


    येथ अज्ञानाची कोण गती । जे अर्थ अनर्थी म्हणती ।
    तेही अर्थार्थी होती । ज्ञाते भ्रमती अर्थासी ॥ १९ ॥
    अशा द्रव्यलोभाच्या बाबतीत अज्ञानी लोकांची दशा काय वर्णन करावी! जे अर्थ हा अनर्थकारक आहे असे म्हणतात, तेही द्रव्यलोभी होतात. ज्ञाते लोकसुद्धा द्रव्याला भुलतात १९.


    ऐसे भ्रमले से सज्ञान । तेही अर्जावया धन ।
    युक्तायुक्त प्रयत्न । अनुदिनीं जाण स्वयें करिती ॥ ४२० ॥
    असे जे ज्ञाते भ्रमात पडले, तेही द्रव्य संपादन करण्याकरितां बरे-वाईट प्रयत्न  दररोज स्वत: करतात हे लक्षात ठेव ४२०.


    सज्ञान भ्रमावया कारण । ईश्वराची माया पूर्ण ।
    अघटघटी जीचें लक्षण । त्या धनी सज्ञान मोहिले ॥ २१ ॥
    ज्ञाते लोकांना भ्रम व्हावयाला कारण सर्वस्वी ईश्वराची माया होय. अघटित घटना करणारी असें जिचे लक्षण आहे. त्या मायेला सज्ञान धनिक मोहित झाले २१.


    कृष्णमाया मोहिले पंडित । नव्हे म्हणाल हा इत्यर्थ ।
    जे जोडिताति अर्थ । निजसुखार्थ भोगेच्छा ॥ २२ ॥
    विद्वान लोक हे कृष्णाच्या मायेने भुलले असें म्हणाल, पण हा काही या वर्णनांतला हेतु नव्हे, तर ते आपल्या सुखाकरितां व विलासाकरिता पैसा मिळवीत असतात २२.


    भोगांमाजीं जे म्हणती सुख । ते जाणावे केवळ मूर्ख ।
    येथ अर्थींचा विवेक । कदर्यु देख बोलत ॥ २३ ॥
    परंतु विषयोपभोगामध्ये सुख आहे असे जे म्हणतात, ते निखालस मूर्ख होत असे समजावे.  ह्याविषयींचाच विचार आतां कदर्यु  सांगत आहे पहा २३.


    किं धनैर्धनदैर्वा किं कामैर्वा कामदैरूत ।
    मृत्युना ग्रस्यमानस्य कर्मभिर्वोत जन्मदैः ॥ २७ ॥
    [श्लोक २७] काळाच्या विक्राळ दाढेत सापडलेल्या माणसाला धन किंवा धन देणारे, सुखभोग किंवा ते पूर्ण करणारे, तसेच पुन्हा पुन्हा जन्म देणारी कर्मे यांपासून काय लाभ आहे ? (२७)


    कटकटा वर्णाग्र्यें पूज्य पहा हो । त्या द्विजासी भुलवी मायामोहो ।
    भोगीं वाढवीजे जो देहो । तोचि पहा हो नश्वर ॥ २४ ॥
    हाय हाय ! अहो पहा ! सर्व वर्णामध्ये अग्रगण्यत्वानें पूज्य अशा त्या ब्राह्मणालासुद्धा मायेचा मोह भुलवितो! पण जो देह नानाप्रकारच्या उपभोगांनी वाढवावयाचा, तोच आधी नश्वर आहे! २४.


    त्या देहासी जे नाना भोग । तोच त्यासी क्षयरोग ।
    धन जोडणें अनेग । तोचि मार्ग निर्धनत्वा ॥ २५ ॥
    त्या देहाला जे नानाप्रकारचे भोग द्यावयाचे, तोच त्याला क्षयरोग होतो. आणि पुष्कळ द्रव्य संपादन करणे हाच दारिद्र्याचा मार्ग होय २५.


    तें धन मिळे अनायासीं । यालागीं धनवंत उपासी ।
    अर्थ जोडोनियां प्रयासीं । भोगितां कामासी सुख काय ॥ २६ ॥
    ते द्रव्य अनायासे मिळते; म्हणून श्रीमान् गृहस्थ त्याची उपासना करितो. पण अत्यंत कष्टाने द्रव्य मिळवून कामवासनेचा उपभोग घेत असता त्यांत सुख आहे काय? २६.


    कामसुख कामिनीमेळीं । सुखार्थ स्त्रियेतें प्रतिपाळी ।
    तेचि नानापरी सळी । देतां किंकळी सुटेना ॥ २७ ॥
    कामसुख स्त्रीच्या संगतीमध्ये घेता येते, म्हणून त्या सुखाकरितांच तो स्त्रीचा  प्रतिपाळ करतो. पण तीच नानाप्रकारांनी त्याला छळू लागते, आणि मग मोठ्याने रडत बसलें तरी ती सुटत नाही २७.


    स्त्रीपुत्रकामभोगादिक । तेणें देहासी द्यावें सुख ।
    तो देहोचि मरणोन्मुख । नित्य अंतक लागला ॥ २८ ॥
    स्त्री, पुत्र, कामभोग इत्यादिकांनी देहाला सुख द्यावें, तर तो देहच मुळी मृत्यूकडे चाललेला ! त्याच्या पाठीमागे काळ नेहमी लागलेलाच आहे २८.


    जे जे अतिक्रमे घडी । ते ते काळ वयसा तोडी ।
    येथ कोण भोगाची गोडी । धनकामें वेडीं सज्ञानें केलीं ॥ २९ ॥
    जी जी घटिका जाते, त्या त्या घटिकेनें काळ आयुष्य कमी करीत असतो. अशा स्थितींत सुखाची गोडी ती काय? परंतु द्रव्येच्छेनें ज्ञाते लोकही वेडे बनविले २९.


    सर्पमुखीं दर्दुर जातां । तो दर्दुर होय माशा खाता ।
    तेणें न सुटे सर्पग्रासता । जाण तत्त्वतां जयापरी ॥ ४३० ॥
    सर्पाच्या  तोडांत बेडूक जात असतांना तो बेडूक माशा खातच असतो, पण त्यामुळे त्याचे सर्पाच्या  तोंडांत जाणे खरोखर ज्याप्रमाणे नाहीसे होत नाही ४३०, 


    तेवीं नानाभोगमेळें । देहींचा मृत्यु मागें न टळे ।
    हें जाणॊनि आंधळे । धनकामें झाले सज्ञान ॥ ३१ ॥
    त्याप्रमाणे नानाप्रकारचे भोग भोगण्याने देहाचा मृत्यु काही मागे हटत नाही. सर्व जाणूनही ज्ञाते लोक द्रव्येच्छेने आंधळे होतात ३१.


    स्वयें कर्ता तोचि मरणधर्म । त्यासी कोण निववी भोगकाम ।
    हा केवळ मायेचा भ्रम । भ्रमले परम महासिद्ध ॥ ३२ ॥
    स्वतः जो कर्ता, त्याच्याच मागें मरणधर्म लागलेला. त्याला कोणत्या भोगाने समाधान होणार? हा केवळ मायेचा भ्रम होय. त्या भ्रमाने मोठमोठे सिद्धही भ्रमात पडले आहेत ३२.


    धनें होईल परलोक । तोही भोगू दुःखदायक ।
    भोगक्षयें कर्ममूर्ख । येती देख अधःपाता ॥ ३३ ॥
    द्रव्याच्या योगाने यज्ञयाग करून स्वर्गलोक प्राप्त होईल, पण तो स्वर्गभोगही दुःखदायकच होय. कर्मानें अज्ञानी बनलेले लोक त्या भोगाचा क्षय झाला म्हणजे अधोगतीला येतात पहा! ३३.


    करितां भोग्य काम्य कर्म । पुढती मरण पुढती जन्म ।
    भोगणें पडे अविश्रम । हें दुःख परम धनकामा ॥ ३४ ॥
    किंवा भोग भोगण्यासाठी सकाम कर्म केले. तर पुन्हा मरण व पुन्हा जन्म हेंच  अखंड भोगावे लागते. द्रव्यलोभ्याला हे फार मोठे दुःख आहे ३४.


    धनकामासी निजसुख । सर्वात्मना नाहीं देख ।
    मीही ऐसाचि होतों मूर्ख । निजभाग्यें देख धन गेलें ॥ ३५ ॥
    द्रव्यलोभ्याला खरें सुख सर्वस्वी नाहींच पहा. मीसुद्धा असाच मूर्ख होतो. परंतु सुदैवाने माझे सारे द्रव्य गेले पहा! ३५.


    नूनं में भगवांस्तुष्टः सर्वदेवमयो हरिः ।
    येन नीतो दशामेतां निर्वेदश्चात्मनः प्लवः ॥ २८ ॥
    [श्लोक  २८] सर्वदेवस्वरूप भगवान श्रीहरी माझ्यावर प्रसन्न झाले, यात काहीच शंका नाही म्हणून तर त्यांनी मला या दशेला आणून वैराग्य दिले वैराग्यच आत्म्याला संसारसागरातून पार करणारी नाव आहे. (२८)


    मी पूर्वी होतों अतिअभाग्य । आतां झालों अतिसभाग्य ।
    मज तुष्टला श्रीरंग । विवेकवैराग्य पावलों ॥ ३६ ॥
    मी पूर्वी अत्यंत अभागी होतों, पण आता मोठा भाग्यवान् झालों. मला श्रीकृष्णच प्रसन्न झाला, मला विवेक आणि वैराग्य प्राप्त झाले ३६.


    माझें संचित जें कां धन । तेंचि माझें मुख्य अज्ञान ।
    तें हरीने आपण । कृपा पूर्ण मज केली ॥ ३७ ॥
    माझे सांठविलेले जे द्रव्य तेच माझे मुख्य अज्ञान होते. ते श्रीहरीने स्वतः नष्ट करून माझ्यावर पूर्ण कृपा केली आहे ३७.


    भक्तांचें अज्ञान हरी । याचिलागीं नांवें तो 'हरी' ।
    तेणें कृपा करून पुरी । विवेक अंतरीं उपजविला ॥ ३८ ॥
    भक्तांचे अज्ञान हरण करतो, म्हणूनच नांवानें तो 'हरि' आहे. त्यानेच पूर्ण कृपा करून माझ्या अंत:करणामध्ये विवेक उत्पन्न केला ३८.


    वैराग्य विवेकविण आंधळे । विवेक वैराग्यवीण पांगळें ।
    ते माझे हृदयीं जावळीं फळें । एक वेळे उपजविलीं ॥ ३९ ॥
    वैराग्य है विवेकाशिवाय आंधळे असते; आणि विवेक वैराग्यावांचून पांगळा असतो. माझ्या हृदयांत ती दोन्ही एकाच वेळी उत्पन्न  केली ३९.


    ऐशी हरीनें कृपा करूनी । माझें धनेंसीं अज्ञान हरूनी ।
    विवेक वैराग्य यें दोनी । माझे हृदयभुवनीं प्रकाशिलीं ॥ ४४० ॥
    श्रीहरीने अशी कृपा करून  द्रव्यासहवर्तमान माझे अज्ञान हरण केलें व विवेक आणि वैराग्य ही दोन्ही माझ्या हृदयमंदिरात प्रकाशित केली ४०.


    परी कोणे काळें कोणे देशीं । कोण समयविशेषीं ।
    हरी कृपा करितो कैशी । हें कोणासी कळेना ॥ ४१ ॥
     पण कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी, आणि कोणत्या प्रसंगी श्रीहरि कशी कृपा करतो हे कोणाला कळत नाही ४१


    भक्तांचें हरावया चित्त । हरि हरितो त्यांचें वित्त ।
    वित्तत्यागें करूनि सुचित्त । दे विवेकयुक्त वैराग्य ॥ ४२ ॥
     भक्तांचे चित्त हरण करण्याकरितां श्रीहरि आधी त्यांचे द्रव्य हरण करतो, आणि  द्रव्यनाशाने त्यांचे चित्त शुद्ध करून त्यांना विवेकयुक्त वैराग्य देतो ४२.


    ऐसें घेतेंदेतें विंदान । ब्रह्मादिकां अतर्क्य जाण ।
    यालागीं तो भगवंत पूर्ण । त्यासी साही गुण वशवर्ती ॥ ४३ ॥
    अशा प्रकारचे घेण्यादेण्याचे लाघव ब्रह्मादिकांनाही अतर्क्य  होय  असे समज. म्हणून तो भगवंत-पूर्ण  भाग्यवान्-होय. त्याला सहा गुण वश झालेले असतात ४३.


    त्याचें अचिंत्यानंतरूप । परी मजलागीं झाला सकृप ।
    माझें धनेंसी निरसूनि पाप । ज्ञानदीप उजळला ॥ ४४ ॥
    त्याचे अचिंत्य  आणि  अनंत असे स्वरूप आहे. परंतु माझ्यासाठी तो कृपाळु झाला व माझें पातक  द्रव्यासह नाहींसें करून ज्ञानदीप लावला ४४.


    हो कां कृपा उपजली भगवंता । परी म्यां वंचिल्या यज्ञदेवता ।
    त्या क्षोभल्या करिती घाता । हेंही सर्वथा घडेना ॥ ४५ ॥
    भगवंताला कृपा उत्पन्न झाली हे खरे; पण मी यशदेवतांना फसविले आहे, त्या रागावल्या तर माझा घात करतील, असे म्हणावें, तर तसे कधी घडावयाचें नाहीं ४५.


    करीं चक्र धगधगित । ज्याचा पाठिराखा हरि समर्थ ।
    विघ्नाचा वारा न रिघे तेथ । देव वंदीत तयासी ॥ ४६ ॥
    हातांत देदीप्यमान चक्र असलेला समर्थ श्रीहरि ज्याचा पाठिराखा होईल, त्याच्याजवळ विघ्नांचा  वारासुद्धा यावयाचा नाही. देव त्याला वंदन करतील ४६.


    देवीं वंदूनि प्रल्हादासी । शांत करविलें नृसिंहासी ।
    तो पाठिराखा नरहरी ज्यासी । विघ्न त्यापाशीं रिघे केवीं ॥ ४७ ॥
    देवांनीच प्रल्हादाला वंदन करून नृसिंहाला शांत करविलें. तो नरहरीच ज्याला पाठिराखा झाला, त्याच्यापाशीं विघ्न कसें येईल? ४७.


    जेणें देवांचिया कोडी । क्षणें सोडविल्या बांदवडी ।
    त्याचे भक्तांची लोंव वांकडी । देवें बापुडीं केवीं करिती ॥ ४८ ॥
    ज्याने कोटींच्या कोटि देवांचे समुदाय एका क्षणांत बंदिवासातून सोडविले, त्याच्या भक्ताचा केस तरी बिचाऱ्या त्या यज्ञादि देवता कसा वांकडा करणार? ४८.


    जो सकळ देवांचा नियंता । ज्याचे चरण देव वंदिती माथां ।
    तो भगवंत साह्य असतां । विघ्न सर्वथा बाधीना ॥ ४९ ॥
    जो सर्व देवांचे नियम करणारा, ज्याचे पाय देवही शिरसा वंद्य करतात, तो भगवंतच साहाय्यक असल्यावर विघ्नं मुळींच  पीडा करणार नाही ४९.


    ज्याचेनि बळें वाढले देव । देव जयाचे अवयव ।
    तो हरि तुष्टला स्वयमेव । तेथ विघ्नसंभव कोणाचा ॥ ४५० ॥
    ज्याच्या बळाने देव एवढे थोर झाले आहेत, देव हेच ज्याचे अवयव आहेत, तो श्रीहरि स्वत:च प्रसन्न झाला असता तेथे कोणत्या विघ्नांचा  संभव आहे ? ४५०.


    सर्वदेवमय श्रीहरी । इंद्रचंद्ररूपें माझा हरी ।
    ऐशिया मज दीनावरी । विघ्न संसारीं असेना ॥ ५१ ॥
    श्रीहरि हा सर्वदेवस्वरूपच आहे. इंद्र व चंद्र यांची स्वरूपें म्हणजे माझा श्रीहरीच होय. अशा मज दीनावर संसारामध्ये विघ्न येणार नाही ५१.


    ऐशिये कृपेचे कारण । ये जन्मीं नाहीं साधन ।
    हें माझें पूर्वील जुनें ऋण । देवापाशीं जाण ठेविलें होतें ॥ ५२ ॥
    भगवंताची अशी कृपा होण्याचे कारण पाहूं लागले तर ह्या जन्मांत माझ्याकडून कांहींच साधन घडलेले दिसत नाही. हे माझे पूर्वजन्मार्जित ऋण देवापाशी ठेवलेले होते असे समज ५२.


    पूर्वीं कोण जन्मीं कोण देशीं । तीर्थक्षेत्रीं कोण वंशी ।
    कोण आचरलों सत्कर्मासी । तेणें हृषीकेशी तुष्टला ॥ ५३ ॥
    पूर्वी कोणत्या जन्मी, कोणत्या देशांत, कोणत्या तीर्थक्षेत्रांत, कोणत्या वंशामध्ये, कोणते सत्कर्म आचरण केले होते की, त्याच्या योगाने परमेश्वर मला प्रसन्न झाला! ५३.


    मातें अतिदुःखी देखोन । हरि तुष्टला कृपापूर्ण ।
    त्याचे कृपेस्तव जाण । विवेकसंपन्न मी झालों ॥ ५४ ॥
    की मला अत्यंत दुःखी झालेला पाहून कृपासागर श्रीहरि संतुष्ट झाला आणि त्याने कृपा केली म्हणून मी विवेकसंपन्न  झालों! ५४.


    हो कां धनक्षयें झालें दुःख । तेणें दुःखें पावलों निजसुख ।
    भवाब्धि तरावया देख । वैराग्यविवेक दृढ तारूं ॥ ५५ ॥
    अहो ! द्रव्य गेल्यामुळे मला दुःख झाले, आणि त्या दुःखाने मी  आत्मसुखाचा लाभ पावलों. हा संसारसमुद्र तरावयाला वैराग्ययुक्त विवेक हेंच बळकट तारूं आहे पहा ५५.


    हरिखें वोसंडूनि ब्राह्मण । म्हणे उरले आयुष्येनि जाण ।
    वृथा जावों नेदीं अर्ध क्षण । करीन निर्दळण सुखदुःखां ॥ ५६ ॥
    याप्रमाणे तो ब्राह्मण हर्षभरित होऊन म्हणाला-आतां उरलेल्या आयुष्यात मात्र अर्धक्षणसुद्धा फुकट जाऊ देणार नाही. सुखदुःखांचे निर्दाळण करून टाकीन ५६.


    सोऽहं कालावशेषेण शोषयिष्येऽङ्गमात्मनः ।
    अप्रमत्तोऽखिलस्वार्थे यदि स्यात्सिद्ध आत्मनि ॥ २९ ॥
    [श्लोक २९] जर माझे आयुष्य शिल्लक असेल, तर मी आत्मलाभातच संतुष्ट राहून आपल्या परमार्थाबद्दल सावध होईन आणि उरलेल्या कालावधीत माझे शरीर तपश्चर्येने सुकवून टाकवीन किंवा ज्ञानाने लयाला नेईन. (२९)


    काइसा भवभयाचा पाड । घेईन कोटि जन्मंचा सूड ।
    नासल्या आयुष्याचा कैवाड । करीन निवाड येणें देहें ॥ ५७ ॥
    संसाराच्या भयाची पर्वा कसली ? कोट्यवधि जन्मांचा सूड घेईन. जे आयुष्य फुकट गेलें त्याचा याच देहानें  वचपा काढीन ५७.


    देहासी आली वार्धक्यता । परी वृद्धत्व नव्हे माझिया चित्ता ।
    तेणें चित्तें चिंतूनि भगवंता । भवबंध आतां छेदीन ॥ ५८ ॥
    देहाला म्हातारपण आले आहे, परंतु माझ्या चित्ताला काही म्हातारपण आलेलें नाही. याकरिता त्याच चित्ताने भगवंताचे चिंतन करून आता संसारबंध तोडून टाकीन ५८.


    उरले आयुष्यें येथ । कळिकाळाचे पाडीन दांत ।
    गर्भदुःखाचें खणोनि खत । मरणाचा घात मी करीन ॥ ५९ ॥
    आतां उरलेल्या आयुष्यात कळिकाळाचे दांत पाडून टाकीन. गर्भवासदुःखाचे खत फाडून मी मरणाला ठार करीन ५९.


    जेणें देहें सत्यानृत । कर्में आचरलों समस्त ।
    तें देह मी शोषीन येथ । विदेहस्थ निजभावें ॥ ४६० ॥
    ज्या देहाने खरी खोटी सर्व कर्मे आचरण केली, तो देहच मी आता येथे विदेहस्थितीतील आत्मभावनेने सुकवून टाकीन ४६०.


    घालूनि निजबोधाची धाडी । फोडीन देहाची बांदवडी ।
    तोडूनि सुखदुःखांची बेडी । उभवीन गुढी सायुज्याची ॥ ६१ ॥
     आत्मज्ञानाची धाड घालून देहाचे कुंपणच तोडून टाकीन, आणि सुखदुःखाची बेडी तोडून सायुज्याची गुढी उभारीन ६१.


    आजी वैराग्यविवेकयुक्त । मी निजस्वार्थीं सावचित्त ।
    जो जो साधीन परमार्थ । तो तो हस्तगत मज होय ॥ ६२ ॥
    आज वैराग्य आणि विवेक यांनी युक्त असा मी आपल्या स्वार्थामध्ये सावधचित्त झालो आहे. मी आता जो जो परमार्थ साधण्याचा प्रयत्न करीन, तो तो मला हस्तगत होईल ६२.


    मजचि साधे निजस्वार्थ । हाचि नेम नाहीं येथ ।
    जो जो वैराग्यविवेकयुक्त । त्यासी परमार्थ आंदणा ॥ ६३ ॥
    मलाच माझा स्वार्थ साधेल हाच येथे काहीं विशेष नियम नाही. तर जो जो कोणी वैराग्यविवेकयुक्त होईल, त्याला परमार्थ आपोआप मिळणारा आहे ६३.


    वैराग्यविवेकाचें लक्षण देहगेहस्त्रियदि धन ।
    असतां आसक्त नव्हे मन । वैराग्य पूर्ण या नांव ॥ ६४ ॥
    वैराग्यविवेकाचे लक्षण हें की, देह, घर, स्त्रिया इत्यादि वैभव असतांना त्यांत मन आसक्त होत नाही. त्याचेच नाव पूर्ण वैराग्य होय ६४.


    म्यां जो आरंभ केला पहा हो । यासी देवोदेवीसमुदावो ।
    येणेंसहित देवाधिदेवो । मज साह्य होवो हें प्रार्थित ॥ ६५ ॥
    अहो! पहा. मी जो आरंभ केला आहे त्याला देव आणि देवी यांच्या सर्व समुदायासह देवाधिदेव मला सहाय होवो असें मो प्रार्थितों ६५.


    तत्र मामनुमोदेरन् देवास्त्रिभुवनेश्वराः ।
    मुहूर्तेन ब्रह्मलोकं खट्वाङ्गः समसाधयत् ॥ ३० ॥
    [श्लोक  ३०] तिन्ही लोकांचे स्वामी देवगण माझ्या या संकल्पाला संमती देवोत राजा खट्‌वांगाने नाही का दोन घटकांमध्येच भगवद्धामाची प्राप्ती करून घेतली !". (३०)


    इंद्रियाधिष्ठात्री देवता । मज साह्य होतू समस्ता ।
    सिद्दि पावावया परमार्था । इंद्रियजयता मज द्यावी ॥ ६६ ॥
    इंद्रियांच्या ठिकाणी अधिष्ठित असणाऱ्या सर्व देवता मला सहाय होवोत. त्यांनी परमार्थ सिद्धीला पोचण्याकरिता मला इंद्रियजय द्यावा  ६६.


    जो त्रिभुवनेश्वर विख्यात । तो साह्य झालिया भगवंत ।
    देवता साह्य होती समस्त । त्या अंतर्भूत हरिरूपीं ॥ ६७ ॥
    जो त्रिभुवनेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे, तो भगवंत सहाय झाल्यावर सर्व देवता मला साध्य होतील, कारण त्या श्रीहरीच्याच स्वरूपात अंतर्भूत आहेत ६७.


    देवतारूपें भावूनि हरी । सकळ देवांची सेवा करीं ।
    साह्य होऊनि दीनोद्धारीं । मज भवसागरीं तारावें ॥ ६८ ॥
    सर्व देवतांची स्वरूप ही श्रीहरीच होत अशी भावना करून मी सर्व देवांची सेवा करितो. त्यांनी मज दीनाचा उद्धार करण्यांत सहाय होऊन मला भवसागरांतून तारावें ६८.


    म्हणाल वयसेचा शेवट । केवळ झालासी तूं जरठ ।
    वार्धकीं हे खटपट । वृथा कष्ट कां करिशी ॥ ६९ ॥
    यावर आपण कदाचित म्हणाल की, " तुझ्या वयाचा आतां शेवटचा काळ आला. तूं  केवळ जरठ झालास. आता म्हातारपणांत ही खटपट करून फुकटची दगदग कां करितोस?" ६९.


    ऐसा न मानावा अर्थ । खट्वांगराजा विख्यात ।
    मुहूर्तें साधिला परमार्थ । निजस्वार्थ फावला ॥ ४७० ॥
    पण असा अर्थ मनांत आणूं नये.  खट्वाग  राजा प्रसिद्धच आहे. त्याने एका मुहूर्तमात्रांत परमार्थ साधिला अणि त्याला त्याचा स्वार्थ मिळाला ४७० . 


    त्याहूनि माझें तंव येथ । आयुष्य असेल बहुत ।
    देव साह्य होत समस्त । निमेषें परमार्थ साधीन ॥ ७१ ॥
    त्याच्यापेक्षा येथे माझं आयुष्य तर अधिकच असेल. सर्व देव मला सहाय होवोत, म्हणजे मी एका निमिषांत परमार्थ साधीन ७१. 


    आजी विवेकवैराग्य जैसें आहे । हें जैं निर्वाहलें राहे ।
    तैं कळिकाळ बापुडें काये । म्यां जितिला होये संसार ॥ ७२ ॥
    आज जसें विवेकवैराग्य प्राप्त झाले आहे, तसेंच हे जोपर्यंत टिकून राहील, तोपर्यंत बिचारा कळिकाळ काय करणार? मी संसार जिंकला असे होईल ७२.


    हा पूर्वी कैसा होता येथ । आतां पालटलें याचें वृत्त ।
    झाला विवेकवैराग्ययुक्त । आश्चर्यें सांगत श्रीकृष्ण ॥ ७३ ॥
    हा पूर्वी कसा होता ? आतां ह्याची वृत्ति पालटली. तो विवेकवैराग्ययुक्त झाला. श्रीकृष्ण हें आश्चर्याने सांगतो ७३.


    श्रीभगवानुवाच-
    इत्यभिप्रेत्य मनसा ह्यावन्त्यो द्विजसत्तमः ।
    उन्मुच्य हृदयग्रन्थीन् शान्तो भिक्षुरभून्मुनिः ॥ ३१ ॥
    [श्लोक ३१] भगवान श्रीकृष्ण म्हणतात - त्या अवंतिनिवासी श्रेष्ठ ब्राह्मणाने अशाप्रकारे मनोमन निश्चय करून मीमाझेपणाची गाठ तोडून टाकली यानंतर तो शांत होऊन, मौन धारण करून संन्यासी झाला. (३१)


    ऐसा तो अवंतीचा ब्राह्मण । अतिकदर्यु होता जाण ।
    त्याच्या हातींचें गेलिया धन । वैराग्यचिन्ह पालटले ॥ ७४ ॥
    असा तो अवंतीचा ब्राह्मण अत्यंत कृपण होता. पण त्याच्या हातांतील द्रव्य जाताच त्याचा स्वभाव पालटला आणि त्याला वैराग्यलक्षण प्राप्त झाले ७४.


    यालागीं वैराग्यविविवेक चित्तीं । झाल्या आंदणी ब्रह्मप्राप्ती ।
    कृष्ण सांगे उद्धवाप्रती । निजात्मस्थिती साधावया ॥ ७५ ॥
    म्हणून मनामध्ये वैराग्यविवेक उत्पन्न झाला असता ब्रह्मप्राप्ति आपोआप होते. आत्मस्वरूपाची स्थिति साध्य करण्याकरितां श्रीकृष्ण उद्धवाला सांगतो ७५.


    पूर्वीं होता ब्राह्मणाधम । धनलोभी निंद्यकर्म ।
    तोचि झाला द्विजोत्तम । विवेकें परम वैरागी ॥ ७६ ॥
    तो पूर्वी अधम ब्राह्मण होता. तो द्रव्यलोभी असून निंद्यकम करणारा होता. पण तोच विवेकानें परमवैराग्यशाली असा उत्तम बाह्मण बनला ७६, 


    पूर्वीं केलिया निश्चितार्था । मी साधीन सर्वथा ।
    ऐशिया अतिउल्हासता । निजपरमार्था साधक ॥ ७७ ॥
    मी पूर्वी केलेला निश्चय पूर्णपणे साधीन अशा अत्यंत उल्हासाने तो आपल्या परमार्थाचा साधक झाला ७७.


    माझिया दुःखाचें कारण । माझा मीचि झालों जाण ।
    धरितां काम लोभ धनाभिमान । दुःख दारुण मज माझें ॥ ७८ ॥
    माझ्या दुःखाला माझा मीच कारण झालो. काम, लोभ आणि द्रव्याचा अभिमान धरल्यामुळे माझे मलाच अतिशय दुःख भोगावे लागले ७८.


    मज दुःख देऊनि गेलें धन । धन तें दुःखाचें भाजन ।
    स्त्रीपुत्रार्थ सलोभी आपण । तिंहीच जाण मज दवडिलें ॥ ७९ ॥
    द्रव्य हेच मला दुःख देऊन गेलें,  ह्यावरून द्रव्य  हे च दुःखाचे घर आहे. बायकामुलांचा लोभ मी स्वतः धरिला होता, पण त्यांनीच मला घराबाहेर घातले पहा ! ७९.


    धरावा ज्ञातीचा अभिमान । तंव स्वयातीं सांडिलों जाण ।
    मजसी विमुख झाले स्वजन । त्यांचा लोभ कोण मज आतां ॥ ४८० ॥
    जातीचा अभिमान धरावा, तर मी माझ्या जातभाईपासूनही दूर झालो. माझे भाऊबंदही मला विमुख झाले, तेव्हा त्यांचा तरी आता मला लोभ कसला? ४८०.


    स्त्री पुत्र स्वजन धन । यांच्या लोभांचें मुख्य कारण ।
    माझा मज देहाभिमान । त्यासी माझें नमन साष्टांग ॥ ८१ ॥
    बायको, मुलें, आप्तेष्ट , द्रव्य, या सर्वांच्या लोभाचे मुख्य कारण माझा मलाच झालेला देहाभिमान होय. ह्या देहाभिमानालाच आतां साष्टांग नमस्कार असो ८१.


    नमन स्त्रीपुत्रादि धनांसी । नमन स्वयातिस्वजनांसी ।
    नमन देहाभिमानासी । संबंध तुम्हांआम्हांसी असेना ॥ ८२ ॥
    बायको, मुलें आणि द्रव्य यांना.नमस्कार असो. जातीयबांधवांना व आप्तेष्टांना नमस्कार असो. देहाभिमानाला नमस्कार असो. आता तुम्हां आम्हांला काही संबंध उरला नाही ८२.


    जेवीं कां जळा आणि चंद्रबिंबासी । एकत्र वास दिसे दोहींसी ।
    परी चंद्र अलिप्त जळेंसीं । तेवीं संबंध तुम्हांसीं मज नाहीं ॥ ८३ ॥
    पाणी आणि त्यांत पडलेले चंदाचे प्रतिबिंब या दोघांचे राहणे एकत्र असते असे दिसून येते, पण चंद्र पाण्यापासून अगदी निराळा असतो. त्याप्रमाणेच तुमच्याशी माझा आतां संबंध नाही ८३.


    जेवीं कां अखंड अहर्निशीं । छाया जडलीसे रूपासी ।
    तैं रूप न बैसे निजच्छायेसी । तेवीं संबंधू तुम्हांसीं मज नाहीं ॥ ८४ ॥
    ज्याप्रमाणे नेहमी रात्रंदिवस छाया ही पदार्थाबरोबर खिळलेली असते, तरी तो पदार्थ काही आपल्या छायेपाशी बसून राहात नाही, त्याप्रमाणे तुमचा मला संबंध नाही ८४.


    जेवीं तारुण्य ये देहापाशीं । तेणें तारुण्यें देहो मुसमुशी । शेखीं
    तारुण्य सांडी देहासी । तेंवी म्यां तुम्हांसी सांडिलें ॥ ८५ ॥
    किंवा ज्याप्रमाणे देहाजवळ तारुण्य येते, आणि त्या तारुण्याने देह मुसमुसू लागतो, पण शेवटीं तारुण्यदेहाला सोडून जाते. त्याप्रमागेच मी तुम्हांला सोडलें आहे ८५.


    वनीं वसंताचें रिगवणें । वनश्री शोभा मिरवी तेणें ।
    तो वस्तूं जेवीं सांडी वनें । तेवीं म्यां सांडणें अहंममता ॥ ८६ ॥
    वनामध्ये वसंतऋतूचा प्रवेश झाला म्हणजे त्याच्या योगाने वनश्री शोभेचा दिमाख दाखवू लागते. पण तो वसंत आपला काल संपताच ज्याप्रमाणे वनाला सोडून जातो, त्याप्रमाणेच मी अहंममता सोडीत आहे ८६.


    बाप सवैराग्य विवेक । त्याग करविला अलोलिक ।
    देहाभिमाना तिळोदक । दीधलें देख ममतेसी ॥ ८७ ॥
    वैराग्यासह विवेकाचे सामर्थ्य मोठे आश्चर्यकारक आहे. त्याने मजकडून केवढा अलौकिक त्याग करविला ! त्यामुळे देहाभिमानाला व ममतेला मी तिळोदकंच दिले ८७.


    जेवीं भ्रष्टलिया पुत्रासी । पिता घडस्फोटें त्यागी त्यासी ।
    तेंवी त्यागूनि देहाभिमानासी । स्वयें संन्यासी तो झाला ॥ ८८ ॥
    ज्याप्रमाणे पिता भ्रष्ट झालेल्या पुत्राचा घटस्फोट करून त्याचा संबंध तोडून टाकतो, त्याप्रमाणेच देहाभिमानला सोडून तो स्वतः संन्यासी झाला ८८.


    जेवीं कां ये फळ परिपाकातें । सांडी जन्मल्या निजदेहातें ।
    देंठ न धरी त्या फळातें । फळ देंठातें धरीना ॥ ८९ ॥
    ज्याप्रमाणे फळ पिकलें म्हणजे आपल्या जन्मकाळच्या देहाचा त्याग करते , देठही त्या फळाला धरीत नाही, व फळ देंठाला धरीत नाहीं ८९, 


    तेवीं हा न धरी अहंतेसी । अहंता लाजिली न ये यापाशीं ।
    हाही देहाभिमानासी । सद्भावेंसीं नातळे ॥ ४९० ॥
    त्याप्रमाणे हा अहंतेला धरीत नाही व अहंता लाजून ह्याच्यापाशी येत नाही. हाही सद्भावनेनें देहाभिमानाला शिवत नाही ४९०.


    जळीं जेवीं पद्मिनीपान । असोनि जळेंसी अलिप्त जाण ।
    तेवीं नातळोनि देहाभिमान । संन्यासग्रहण विध्युक्त ॥ ९१ ॥
    ज्याप्रमाणे पाण्यामध्ये कमलाचे पान असून ते त्या पाण्यापासून अलिप्त असते, त्याप्रमाणे देहाभिमानाला स्पर्श न करिता त्याने विधियुक्त संन्यास घेतला ९१.


    अन्य संन्यासी करोनि होम । जाळिला म्हणती क्रोधकाम ।
    शेखीं तिळतूप होय भस्म । क्रोधकाम संचले ॥ ९२ ॥
    इतर संन्यासी होम करून आम्ही क्रोध व काम जाळला असे म्हणतात, पण अखेरीस तीळ व तूप यांचे मात्र भस्म होते, आणि कामक्रोध जसेच्या तसेच राहातात ९२.


    तैशी नव्हेच याची होमस्थिती । जाळिल्या विकल्पाच्या वृत्ती ।
    कामक्रोधांची पूर्णाहुती । केली अहंकृतीसमवेत ॥ ९३ ॥
    तसा काही याच्या होमाचा प्रकार नव्हता. त्याने विकल्पाच्या वृत्ति जाळून टाकल्या होत्या, आणि अहंकारासह कामक्रोधांची पूर्णाहुति केली होती ९३.


    होमूनि निजस्वभावासी । झाला त्रिदंडी संन्यासी ।
    आज्ञा घेऊनि गुरूपाशीं । सुखें सुखवासी विचरत ॥ ९४ ॥
    आपल्या मूळ स्वभावाचा होम करून तो त्रिदंडी संन्यासी झाला आणि गुरूपाशी आज्ञा मागून सुखाने आनंदात फिरूं लागला ९४.


    स चचार महीमेतां संयतात्मेन्द्रियानिलः ।
    भिक्षार्थं नगर ग्रामनसङ्गोऽलक्षितोऽविशत् ॥ ३२ ॥
    [श्लोक ३२] आपले मन, इंद्रिये आणि प्राण वश करून कोणतीही आसक्ती न ठेवता तो पृथ्वीवर स्वच्छंदपणे वागू लागला भिक्षेसाठी तो शहरांत किंवा खेड्यांत कोणालाही कळणार नाही अशा रीतीने जात असे. (३२)


    जिणॊनियां मनपवन । सांडोनिया मानाभिमान ।
    परमानंदें परिपूर्ण । पृथ्वीमाजीं जाण विचरत ॥ ९५ ॥
    मन व प्राण यांना जिंकून मानाभिमान सोडून परमानंदाने परिपूर्ण होऊन तो पृथ्वीवर संचार करूं लागला ९५.


    ज्यासी नावडे देहसंगती । त्यासी कैंचा संगू सांगती ।
    एकला विचरे क्षिती । आत्मस्थिती निजबोधें ॥ ९६ ॥
    देहाची संगति ज्याला आवडत नाही, त्याला बरोबर दुसरा सोबतीला घेणे कसे रुचणार ? तो आत्मज्ञानाने आत्मस्वरूपामध्ये निमग्न होऊन पृथ्वीवर एकटाच फिरत होता ९६.


    अखंड वसे वनांतरीं । भिक्षेलागीं निघे नगरीं ।
    खेट खर्वट ग्रामीं पुरीं । भिक्षा करी यथाप्राप्त ॥ ९७ ॥
    निरंतर अरण्यामध्येच रहात असे. भिक्षेसाठी मात्र गांवांत येई आणि जेथे बाजार भरत असेल अशा शहरांत किंवा गांवांत मिळेल ती भिक्षा आणीत असे ९७.


    मी एक भिक्षेसी येता । हा नेम न करी सर्वथा ।
    अलक्ष्य येवोनि अवचितां जें आलें हाता तेणें सुखी ॥ ९८ ॥
    मी एक भिक्षेला येणारा आहे असा नेम तो मुळीच करीत नसे. कोणाच्या दृष्टीस न पडतां अकस्मात यावयाचे आणि जें हातावर पडेल  तेवढ्यात संतोष मानावयाचा ९८.


    पंचागार सप्तागार । हाही नेम नाहीं निर्धार ।
    कोणोविखींचा अहंकार । अणुमात्र धरीना ॥ ९९ ॥
    पांचच घरें भिक्षा मागावयाची, किंवा सातच घरें भिक्षा मागावयाची, असाही कधी निश्चित नेम त्याने धरिलेला नाही. कोणत्याही गोष्टीविषयींचा अहंकार त्याला लेशमात्रही नव्हता ९९.


    तं वै प्रवयसं भिक्षुमवधूतमसज्जनाः ।
    दृष्ट्वा पर्यभवन् भद्र बह्वीभिः परिभूतिभिः ॥ ३३ ॥
    [श्लोक ३३] उद्धवा ! तो अवधूत भिक्षू आता अतिशय म्हातारा झाला होता त्याला पाहाताच दुष्ट लोक निरनिराळ्या प्रकारे त्याला पीडा देत. (३३)


    न करी देहमळक्षाळण । मुसलवत् करी स्न्नान ।
    यालागीं तो धूसरवर्ण । अवधूतपण या हेतू ॥ ५०० ॥
    अंगावरचा मळही कधीं धुवीत नसे. मुसळासारखें स्नान करीत असे. म्हणून त्याच्या अंगाचा वर्णही राखेसारखा झाला होता, त्यामुळे त्याला 'अवधूत' असे म्हणत असत ५००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...