मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ५०१ ते ६००

    ऐसा विचरतां पृथ्वीसी अवचटें आला अवंतीसी ।

    अतिवृद्ध आणि संन्यासी । अवधूतवेषी देखिला ॥ १ ॥
     याप्रमाणे पृथ्वीवर संचार करता करता अकस्मात तो अवंती नगरांत आला. तेव्हां अत्यंत वृद्ध असून संन्यासी झालेला असा अवधूतवेषाने त्याला येतांना लोकांनी पाहिला १.


    संन्यास घेतलिया जाण । पूर्वभूमिका अवलोकन ।
    एक वेळां करावी आपण । पद्धतिलेखन आचार्याचें ॥ २ ॥
    संन्यास घेतल्यावर एकवार जन्मभूमीचं दर्शन घ्यावे अशी पद्धति मोठमोठ्या आचार्यांनी लिहून ठेवली आहे २.


    ते नगरींचे म्हणती जन । अरे हा कदर्यु ब्राह्मण ।
    याचें हारपल्या धन । संन्यासी जाण हा झाला ॥ ३ ॥
    तो दृष्टीस  पडतांच त्या गांवांतील लोक म्हणू लागले की, " अरे ! हा तर कदर्यु  ब्राह्मण ! त्याच्याजवळचे धन गेलें म्हणून हा संन्यासी झाला आहे " ३.


    हें ऐकोनियां अतिदुर्जन । त्यासभोंवते मीनले जाण ।
    परस्परें दावूनि खूण । विरुद्ध छळण मांडिलें ॥ ४ ॥
    हे ऐकून अत्यंत दुष्ट  मनुष्य त्याच्याभोंवतीं गोळा झाले, आणि त्यांनी एकमेकांना खुणा करून त्याच्या छळाला प्रारंभ केला ४.


    त्यासी बहुसाल उपद्रवितां । क्षणार्ध पालट नव्हे चित्ता ।
    क्रोध न येचि सर्वथा । अतिविवेकता महाधीरू ॥ ५ ॥
    पण त्यांनी त्याला हवा तितका त्रास दिला असताही अर्धा क्षणभर देखील त्याच्या चित्ताला पालट म्हणून झाला नाही. तो मुळींच रागावला नाही. असा तो अत्यंत विवेकी व मोठा धैर्यवान् झाला होता ५.


    त्याच्या उपद्रवाची कथा । आणि त्याचि सहनशीलता ।
    तुज मी सांगेन तत्त्वतां । सावधानता अवधारीं ॥ ६ ॥
    त्याला लोकांनी दिलेल्या त्रासाचे वर्णन व त्याची सहनशीलता ही सर्व तुला मी आता  सांगेन. लक्ष देऊन ऐक ६.


    दृष्टि ठेवूनि येथींच्या अर्था । विवेकें कुशळ होय श्रोता ।
    अर्थ धरी भावार्थता । शांति तत्त्वतां तो लाभे ॥ ७ ॥
    ह्यांतील तात्पर्यावर लक्ष दिलं असता श्रोता विवेकानें  चतुर होईल; आणि अर्थावर जो भक्ति ठेवील, त्याला खरी खरी शांति प्राप्त होईल ७.


    विवेकचित्तचकोरचंद्रा । भागवतभाग्यें शुद्धमुद्रा ।
    शांतिसौभाग्यनरेंद्रा । ऐक सुभद्रा उद्धवा ॥ ८ ॥
    हे विवेकयुक्त चित्तचकोराच्या चंद्रा ! भगवद्भक्ताच्या भाग्याने शुद्धस्वरूपा ! हे शांतिसौभाग्याच्या राजा ! हे भाग्यवंता उद्ध्वा ! ऐक ८.


    आकळावया निजशांतीसी । कृष्ण संबोधी उद्धवासी ।
    ऐसें सावध करोनि त्यासी । म्हणे दशा ते ऐसी शांतीची ॥ ९ ॥
    आत्मशांति प्राप्त करून घेण्यासाठी कृष्ण उद्धवाला हाका मारू लागला, आणि त्याला असें सावध करून म्हणाला, शांतीचे स्वरूप तें असें आहे ९.


    अवरोधितां जीविकेसी । सन्मान देतां अपमानेंसीं ।
    जो सर्वथा न ये क्षोभासी । शांति त्यापाशीं तें ऐक ॥ ५१० ॥
    जीवनक्रमांत व्यत्यय आणला, सन्मानाच्या निमित्ताने अपमान केला, तरी जो मुळीच रागावत नाही, त्याच्याचपाशी शांति असते. ते आतां ऐक ५१०.


    केचित्त्रिवेणुं जगृहुरेके पात्रं कमण्डलुम् ।
    पीठं चैकेऽक्षसूत्रं च कन्थां चीरणि केचन ॥ ३४ ॥
    [श्लोक ३४] कोणी त्याचा त्रिदंड हिसकावून घेई, कोणी भिक्षापात्र, कोणी कमंडलू, कोणी आसन, कोणी रूद्राक्षमाळ, कोणी झोळी कोणी लंगोटी तर कोणी छाटी काढून घेत. (३४)


    दुर्जनीं वेढूनि संन्यासी । छळणार्थ लागती पायांसी ।
    तेणें नमनप्रसंगेंसीं । करिती स्पर्शासी अवघेही ॥ ११ ॥
    त्या दुष्टांनी त्या संन्याशाभोवती गराडा घातला आणि छळण्याकरितां त्याच्या पायांवर मस्तक ठेवू लागले. यांतील हेतु एवढाच की, पायांवर मस्तक ठेवून  नमस्कार करावयाच्या निमित्ताने सर्वहीजण त्याला शिवाशिव करतील " ११. 


    एक म्हणती वृद्ध संन्यासी । एक म्हणती किती चातुर्मासी ।
    एक पुसती संप्रदायासी । कोणे गुरूनें तुम्हांसी मुंडिलें ॥ १२ ॥
    कोणी म्हणाले, “हा म्हातारा संन्यासी आहे." कोणी म्हणाले, " किती पावसाळे लोटले ?" कोणी म्हणाले, "अहो ! तुमचा सांप्रदाय कोणता? कोणत्या गुरूने तुमचे मुंडण केले?" १२.


    एक खुणाविती एकांसी । पूर्वभूमी पुसा यासी ।
    एक म्हणती यापाशीं । धनसंग्रहासी पुसा रे ॥ १३ ॥
    कोणी कोणाला खुणावू लागले की, "त्याचे मूळ गांव कोणतें तें विचारा." कोणी म्हणाले, "अरे ! याच्यापाशी धनसंग्रह किती आहे तें विचारा" १३.


    एक म्हणती अहो स्वामी । तुमची कवण पूर्वभूमी ।
    तुम्ही व्यापारी कीं उदिमी । कोणे ग्रामीं निवासू ॥ १४ ॥
    कोणी म्हणाले, "अहो स्वामी! तुमचे मूळ गांव कोणते ? तुम्ही व्यापारी की उदमी? कोणत्या गांवीं तुम्ही राहतां ?" १४.


    एक म्हणती कांहीं आहे धन । एक म्हणती आतां निर्धन ।
    एक म्हणती न करा छळण । विरक्त पूर्ण संन्यासी ॥ १५ ॥
    कोणी म्हणाले, “ह्याच्याजवळ थोडासा पैसा आहे." कोणी म्हणाले, "छे ! आता हा द्रव्यहीन झाला आहे." कोणी म्हणाले, अरे, “ त्यांना त्रास देऊ नका. तो पूर्ण विरक्त संन्यासी आहे” १५.


    ऐसें करितां छळण । संन्यासी अनुद्वेग जाण ।
    निःशब्दवादें धरिलें मौन । कांहीं वचन न बोले ॥ १६ ॥
    असे नानाप्रकारांनी कुचेष्टेने छळीत असताही त्या संन्याशाला मुळीच त्रास वाटला नाही. तोंडावाटे एक शब्दही न काढतां त्याने मौन धरिलें. काहीं भाषण बोलेचना १६.


    एक म्हणती त्रिदंडा कारण । हा पूर्वीं होता अतिसधन ।
    कोरूनि भरिलें असेल धन । हेंचि लक्षण त्रिदंडा ॥ १७ ॥
    कोणी म्हणाले, " हा त्रिदंडी संन्यासी दिसतो. त्या त्रिदंडाचे कारण असे की, हा पूर्वी मोठा धनसंपन्न होता, त्याने ते सारें द्रव्य हे दंड पोखरून त्यांत भरले असेल. हेच त्रिदंडाचे कारण" १७.


    एक म्हणती सहस्रदोरीं । कंथा केली असे अतिथोरी ।
    एक म्हणती त्यामाझारीं । धन शिरोवेरीं खिळिलेंसे ॥ १८ ॥
    कोणी म्हणाले, " हजारों दोरे घालून ह्याने ही पहा केवढी मोठी गोधडी केली आहे !" कोणी म्हणाले, "अहो ! त्यांत तोंडोतोंड धन भरून ठेविलें आहे" १८.


    एक म्हणती काय पाहतां तोंड । येणें मांडिलेंसे पाखंड ।
    ऐसा निर्भर्त्सिता वितंड । एकें त्रिदंड हरितला ॥ १९ ॥
    कोणी म्हणाले, "अहो ! ह्याचे तोंड काय पाहतां ? ह्याने सारे पाखंड मांडलेले आहे." अशा रीतीने त्याची अद्वातद्वा निंदा चालली असतांना एकाने त्याचा त्रिदंडच हिसकावून घेतला १९.


    एकें हरितलें पाणिपात्र । एकें नेलें पीठ पवित्र ।
    एकें नेलें अक्षसूत्र । काषायवस्त्र तें एकें ॥ ५२० ॥
    एकानें कमंडलू पळविला, एकानें पवित्र आसन पळविलें, एकानें द्राक्षांची माळ पळविली, आणि एकाने काषायवस्त्रच पळविले ५२०.


    एक म्हणे हा माझा ऋणायित । भला सांपडला येथ ।
    म्हणोनि कंथेसी घाली हात । कौपीनयुक्त तेणें नेली ॥ २१ ॥
    एकजण म्हणाला, " हा माझा ऋणको आहे. येथे मला सांपडला " असे म्हणून त्याने गोधडीला हात घातला. आणि त्याने लंगोटीसह ती गोधडी नेली २१.


    ऐसें करितांही दुर्जन । त्याचें गजबजीना मन ।
    कांहीं न बोले वचन । क्षमेनें पूर्ण निजधैर्य ॥ २२ ॥
    ते दुर्जन अशा रीतीने छळ करीत असतांही त्याचे मन डळमळले नाही. तो एकही शब्द बोलला नाही. त्याचे धैर्य क्षमेनें परिपूर्ण भरलेलें होते २२.


    तो म्हणे जाणेंयेणें हीं दोनी । केवळ अदृष्टाअधीनी ।
    यालागीं मागण्याची ग्लानी । न करूनि मुनी निघाला ॥ २३ ॥
    तो मनांत म्हणाला, " जाणे आणि येणे ही दोन्ही केवळ प्रारब्धाधीन आहेत." यास्तव मागण्यासाठी गयावयां न करता तो संन्यासी तेथून पुढे निघाला २३.


    संन्यासी जातां देखोनी । सभ्य सभ्य शठ येऊनी ।
    साष्टांग नमस्कार करूनी । अतिविनीतपणीं विनवित ॥ २४ ॥
    संन्यासी निघून जातांना पाहून लबाडांमधले जे मुख्य मुख्य पुढारी होते, ते त्याला साष्टांग नमस्कार घालून अत्यंत नम्रपणाने विनंती करूं लागले २४.


    मग म्हणती हरहर । अपराध घडला थोर ।
    मातले हे रांडपोर । पात्रापात्र न म्हणती ॥ २५ ॥
    ते म्हणाले, "हर हर! आमच्या हातून मोठा अपराध घडला. हे रांडलेक माजले आहेत. योग्य कोण आणि अयोग्य कोण ह्याचा विचारच करीत नाहीत २५.


    स्वामी कोप न धरावा मनीं । वस्त्रें घ्यावीं कृपा करूनी ।
    परतविला पायां लागूनी । पूर्ण छळणीं छळावया ॥ २६ ॥
    स्वामीमहाराज ! आपण मनामध्ये राग येऊ देऊ नये. कृपा करून आपली वस्त्रें  घ्यावी." ह्याप्रमाणे पायां पडून त्याला कुचेष्टांनी पुरता छळण्याकरितां पुन्हा परत आणिलें २६.


    प्रदाय च पुनस्तानि दर्शितान्याददुर्मुनेः ।
    अन्नं च भैक्ष्यसंपन्नं भुञ्जानस्य सरित्तटे ॥ ३५ ॥
    मूत्रयन्ति च पापिष्ठाः ष्ठीवन्त्यस्य च मूर्धनि ।
    यतवाचं वाचयन्ति ताडयन्ति न वक्ति चेत् ॥ ३६ ॥
    [श्लोक ३५-३६] काहीजण त्याला वस्तू देऊन तर काहीजण फक्त दाखवून पुन्हा त्याच्याकडून हिसकावून घेत तो जेव्हा मधुकरी मागून आणून गावाबाहेर नदीकिनारी जेवावयास बसत असे, तेव्हा काही नीच लोक कधी त्याच्या डोक्यावर मूत्रविसर्जन करीत तर कधी थुंकत ते लोक अशा तर्‍हेने त्या मौनी अवधूताला बोलण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे भाग पाडीत आणि एवढे करूनही जेव्हा तो काहीच बोलत नसे, तेव्हा त्याला मारहाणही करीत. (३५-३६)


    संन्यासी आणूनि साधुवृत्ती । दंडकमंडलू पुढें ठेविती ।
    एक वस्त्रें आणोनि देती । एक ते नेती हिरोनी ॥ २७ ॥
     ह्याप्रमाणे तो संन्यासी परत आणून सभ्यपणाने त्याच्यापुढे दंडकमंडलु आणून ठेवला. कोणी वने आणून देऊ लागले, आणि लगेच काहीजण ती हिसकावून परत नेऊं लागले २७.


    एक ते म्हणती वृद्ध संन्यासी । याचीं वस्त्रें द्यावी यासी ।
    एक म्हणती या शठासी । दंडितां आम्हांसी अतिपुण्य ॥ २८ ॥
    कोणी म्हणाले, “हा संन्यासी म्हातारा आहे. त्याची वस्त्रे त्याला द्या." कोणी म्हणाले, "ह्या लबाडाला मार दिला असतांच आम्हांला मोठे पुण्य लागणार आहे " २८.


    वस्त्रें न देती उपहासीं । संन्यासी निघे सावकाशीं ।
    एक परतवूनि त्यासी । देऊनी वस्त्रांसी जा म्हणती ॥ २९ ॥
    अखेर त्याचा तिरस्कार करून कोणीही वस्त्रे दिली नाहीत. तेव्हां तो संन्यासी स्वस्थ अंत:करणाने तेथून निघाला. तोंच कोणी त्याला पुन्हा परत आणून वस्त्रे दिली व जा म्हणाले २९.


    एक धांवूनि हाणे माथां । वस्त्रें हिरोनि जाय परता ।
    एक म्हणती द्या रे आतां । वृद्ध कां वृथा शिणवाल ॥ ५३० ॥
    इतक्यात एकाने धावत येऊन त्या संन्याशाच्या डोक्यावर एक तडाखा मारला आणि त्याची वस्त्रे हिसकावून घेऊन परत गेला. कोणी म्हणाले, " द्या रे आता. म्हाताऱ्याला उगीच कशाला दमवितां ?" ५३०.


    यावरी संन्यासी आपण । गेला वस्त्रें वोसंडून ।
    करोनिया संध्यास्न्नान । भिक्षार्थ जाण निघाला ॥ ३१ ॥
    नंतर तो संन्यासी आपण स्वत:च ती वस्त्रे टाकून गेला, आणि स्नानसंध्या करून भिक्षेकरितां निघाला ३१.


    भिक्षा मागोनि संपूर्ण । शास्त्रविभागें विभागून ।
    सरितातटीं करितां भोजन । तें देखोनि दुर्जन तेचि आले ॥ ३२ ॥
    संपूर्ण भिक्षा मागून झाल्यानंतर शास्त्रोक्त विभागविधीप्रमाणे त्याचे विभाग करून नदीच्या काठावर तो भोजन करीत असता ते पाहून तेच टवाळ लोक तेथे जमले ३२, 


    अरे हा संन्यासी नव्हे साचा । कदर्यु आमुचे गांवींचा ।
    होय नव्हे न बोले वाचा । हा ठकपणाचा उपावो ॥ ३३ ॥
    आणि म्हणाले, " अरे ! हा खरा संन्यासी नव्हे. आमच्या गावांतील जो कदर्यु  ब्राह्मण तो हा. 'होय' 'नव्हे' असें तोंडाने बोलत नाही," हा फसवेगिरीचा मार्ग आहे" ३३.


    यासी बोलविल्यविण राहे । तो याचाचि दासीपुत्र होये ।
    ऐशी शपथ करूनि पाहें । आले समुदायें तयापाशीं ॥ ३४ ॥
    तेव्हां " ह्याला बोलाविल्यावांचून जो राहील तो ह्याच्याच बटकीचा पुत्र होईल," अशी शपथ घेऊन सर्वजण एकत्र जमून त्याच्यापाशी आले ३४.


    एक म्हणे याचें मौन । उडवीन मी न लागतां क्षण ।
    हा जेणें करी शंखस्फुरण । तो उपावो जाण मी जाणें ॥ ३५ ॥
    एक म्हणाला, “ह्याचे मौन मी एक क्षणभर सुद्धा वेळ न लागतां उडवून टाकीन. ज्या उपायाने हा शंख करूं लागेल तो उपाय मी जाणतों" ३५.


    तो महापापी अतिदुर्मती । जेवितां त्याचे मस्तकीं मुती ।
    तरी क्रोध न ये त्याचे चित्तीं । निजात्मस्थितीं निवाला ॥ ३६ ॥
    असें म्हणून तो महापातकी व अत्यंत दुष्ट बुद्धीचा मनुष्य तो संन्यासी जेवीत असतां त्याच्या मस्तकावर मुतला. तरी त्या संन्याशाच्या मनात राग आला नाही. तो आत्मज्ञानाने शांत राहिला ३६.


    जरी अंतरीं क्रोध आला । तरी तो अशांतचि झाला ।
    बाहेरी न बोलेचि बोला । लोकलाजे भ्याला पोटास्थे ॥ ३७ ॥
    क्रोध जरी मनामध्ये आला, तरी तो मनुष्य शांतिरहित झालाच. तो बाहेर क्रोधाचे शब्द बोलत नाही याचे कारण तो लोकलज्जेकरिता किंवा पोटाकरितां भ्याला इतकंच ३७.


    तैसा नव्हे हा संन्यासी । धूओनि सांडिलें निजलाजेसी ।
    निजशांतीची दशा कैशी । क्रोध मानसीं वोळेना ॥ ३८ ॥
    पण हा संन्यासी तसा नव्हता. आपली लज्जा त्याने धुवून नाहींशी केली होती. आत्मशांतीचे स्वरूप कसें असतें ? क्रोध मनांतसुद्धा येत नाही ३८.


    आंत एक बाह्य एक । या नांव मुख्य दांभिक ।
    तैसा संन्यासी नव्हे देख । सबाह्य चोख निजशांति ॥ ३९ ॥
    आत एक आणि बाहेर एक, याचंच नांव खरोखर दांभिक. पण तसा काही हा संन्यासी नव्हे. हा आत्मशांतीनं अंतर्वास अगदी निर्मळ होता ३९.


    तंव ते दुर्जन म्हणती । अरे हा न बोले निश्चितीं ।
    संमुख मुखावरी थुंकिती । अतिनिंदिती नोकूनी ॥ ५४० ॥
    तेव्हा ते टवाळ लोक म्हणू लागले की, "अरे ! हा खरोखरच बोलत नाही." असे म्हणून ते त्याच्यासमोर उभे राहून त्याच्या तोंडावर थुकले आणि अत्यंत दुःख देऊन खूप निंदा करूं लागले ५४०.


    एक हाणीती लाता । एक टोले देती माथां ।
    एक म्हणती न बोलतां । यासी सर्वथा न सोडा ॥ ४१ ॥
    कोणी लाथा मारू लागले, कोणी मस्तकावर टोले हाणूं लागले, आणि कोणी असें म्हणू लागले की, "हा बोलला नाही तर याला मुळीच सोडूं नका!" ४१.


    तर्जयन्त्यपरे वाग्भिः स्तेनोऽयमिति वादिनः ।
    बध्नन्ति रज्ज्वा तं केचिद्‌बध्यतां बध्यतामिति ॥ ३७ ॥
    [श्लोक ३७] काहीजण त्याला 'चोर' म्हणून धाकदपटशा दाखवीत काही जण त्याला 'बांधा, बांधून टाका,' म्हणत दोरीने बांधीत. (३७)


    आणिक एक दुरूनि जाण । वर्मीं विंधिती वाग्बाण ।
    याच्या वेषाचें लक्षण । आम्हीं संपूर्ण जाणीतलें ॥ ४२ ॥
    आणखी कोणी लांबून आपले वाग्बाण त्याच्या वर्मावरच टोचतील असे मारू लागले. ते म्हणाले, "याच्या या वेषाचे कारण आम्ही पूर्णपणे ओळखलें आहे ४२.


    याचे वेषाचा विचारू । शठ नष्ट दांभिक थोरू ।
    भिक्षामिसें हिंडे हेरू । धरा चोरू निश्चितीं ॥ ४३ ॥
    याच्या सोंगांतलें वर्म हेच की, हा मोठा ठक, नष्ट, आणि मोठा ढोंगी आहे, भिक्षेच्या निमित्ताने हा हेर हिंडत आहे. खरोखर हा चोर पकडा" ४३.


    ऐसे विकल्पवाक्यें गर्जती । एक बांधा बांधा म्हणती ।
    एक दृढदोरीं बांधिती । दोहीं हातीं अधोमुख ॥ ४४ ॥
    अशा निंदास्पद भाषणाने ते सर्वजण मोठमोठ्यांनी ओरडू लागले. कोणी 'बांधा बांधा' म्हणाले. तोच कित्येकजण त्याचे तोंड खाली करून त्याचे दोन्ही हात जाड दोरांनी बांधू लागले ४४.


    क्षिपन्त्येकेऽवजानन्त एष धर्मध्वजः शठः ।
    क्षीणवित्त इमां वृत्तिमग्रहीत्स्वजनोज्झितः ॥ ३८ ॥
    [श्लोक ३८] काहीजण त्याची निर्भर्त्सना करीत म्हणत, "याची संपत्ती निघून गेली म्हणून नातलगांनी याला घराबाहेर काढले तेव्हा या लबाडाने धर्माचे सोंग घेऊन हा धंदा सुरू केला; (३८)


    त्याचें पूर्ववृत्त जे जाणती । ते अपमानूनि निंदिती ।
    पूर्वीं कदर्यू याची ख्याती । हा आम्हांप्रती संन्यास मिरवी ॥ ४५ ॥
     -त्याची पूर्वीची हकीकत जे जाणत होते, ते त्याचा अपमान करून त्याची निंदा करूं लागले. ते मणाले, " पूर्वी कदर्यु या नांवाने हा प्रसिद्ध होता. आणि आता हा आमच्यापुढे आपला संन्यास मिरवीत आहे ४५.


    येणें सूक्तासूक्तीं संचिलें धन । अधर्में वित्त झालें क्षीण ।
    स्वजनीं सांडिला दवडून । पोटासी अन्न मिळेना ॥ ४६ ॥
     ह्यानें शुभाशुभ कर्मानी द्रव्य सांठविले, आणि अधर्मानं तें द्रव्य नाहींसें झालें. म्हणून आप्त माणसांनी ह्याला  घरांतून बाहेर हाकून लावले, तेव्हां ह्याच्या पोटाला अन्नसुद्धा मिळेनासे झाले ४६.


    अन्न मिळावया पोटासी । झाला कपटवेष संन्यासी ।
    लाज नाहीं या निर्लज्जासी । योग्यता आम्हांसी दावितां ॥ ४७ ॥
    पोटाला अन्न मिळविण्यासाठी हा कपटी सोंग घेऊन संन्यासी झाला आहे. आमच्यापुढे असली प्रतिष्ठा मिरवितांना या निर्लज्जाला लाजही वाटत नाही ४७.


    पूर्वींलागूनि हा वंचकू । आतां झाला संन्यासी दांभिकू ।
    याचें मत नेणे हा भोळा लोकू । महाठकू दृढमौनी ॥ ४८ ॥
    पूर्वीपासून हा फसव्या, आणि आतां ढोंगी संन्यासी झाला आहे. त्याचे असें मत झालेले दिसते की, भोळे लोक, यांना काही माहीत नाही, असा हा महाठक पूर्ण मौन धारण केलेला आहे ४८.


    हो कां बहुरुप्याचीं सोंगें जैसीं । तेवीं हा उत्तमवेषें संन्यासी ।
    होऊनि ठकूं आला आम्हांसी । मारितां यासी दोष नाहीं ॥ ४९ ॥
    अहो ! बहुरूप्याची जशी सोंगें असतात, त्याप्रमाणेच हा उत्तम वेषाने संन्यासी होउन आम्हाला फसवावयास आला आहे. ह्याला मारले असतां दोष लागावयाचा नाही ४९.


    अहो एष महासारो धृतिमान् गिरिराडिव ।
    मौनेन साधयत्यर्थं बकवद्दृढनिश्चयः ॥ ३९ ॥
    [श्लोक  ३९] हा मोठा तगडा असून धैर्याच्या बाबतीत एखाद्या पर्वतासारखा आहे असे असून मौन धारण करून हा बकसंन्यासी आपले काम साधून घेत आहे. (३९)


    हा दांभिकांमाजीं महाबळी । धरिल्या वेषातें प्रतिपाळी ।
    आम्हीं पीडितां न डंडळी । जेवीं कां वाहटोळीं महामेरू ॥ ५५० ॥
    हा ढोंग्यांमध्ये मोठा प्रबळ आहे. घेतलेल्या सोंगाला छान सांभाळतो. आम्ही त्रास दिला असता जसा वावटळीने महामेरु हादरत नाही, त्याप्रमाणे तो डगमगत नाही ५५०.


    याच्या धैर्याचें शहाणपण । साधवया अन्नआच्छादन ।
    बकाच्या ऐसें धरिलें मौन । स्वार्थ पूर्ण लक्षूनी ॥ ५१ ॥
    अन्न व वस्त्र मिळविण्याकरितांच ह्याच्या धैर्याचे हे शहाणपण आहे. स्वार्थावर पूर्ण लक्ष ठेवून ह्याने बकाप्रमाणे मौन धरले आहे ५१.


    बक गिळावया मासा । मौन धरोनि राहे जैसा ।
    हाही जाणावा तैसा । भोळ्या माणसां नाडील ॥ ५२ ॥
    बगळा मासा गिळण्यासाठी जसा मौन धरून राहातो, त्याप्रमाणे हाही समजावा. हा भोळ्या माणसांना लुटील ५२.


    आतां हा धनलोभार्थ जाणा पूर्वील उपद्रव नाणी मना ।
    तेचि झालीसे दृढ धारणा । उपद्रवगणना या नाहीं ॥ ५३ ॥
    आता हा द्रव्यलोभाकरिता पूर्वीचा त्रास मनाला आणीत नाही. तीच ह्याला दृढ संवय झाली आहे, म्हणून याला उपद्रवाची खिसगणती नाही" ५३.


    एक म्हणती धैर्यमूर्ती । म्हणोनियां लाता हाणिती ।
    एक ते नाकीं काड्या खुपसिती । याची निजशांती पाहों पां ॥ ५४ ॥
    कोणी म्हणाले, “ केवढी धैर्याची मूर्ति !” असें म्हणून त्याला लाथा मारू लागले. कोणी त्याच्या कानांत काट्याच खुपसू लागले, आणि आता “ ह्याची शांति पाहूं या" असे म्हणाले ५४.


    ऐसऐसे उपद्रवती । नानापरी उपहासिती ।
    तरी द्वेष नुपजे चित्तीं । निजशांती निश्चळू ॥ ५५ ॥
    असा अनेक प्रकारे त्याला ते त्रास देऊ लागले. नानाप्रकारची कुचेष्टा करूं लागले. तरी त्याच्या मनांत द्वेष उत्पन्न झाला नाही. त्याची शांति अढळ होती ५५.


    जंव जंव देखती त्याची शांती । तंव तंव दुर्जन क्षोभा येती ।
    नाना उपद्रव त्यासी देती । तेंचि श्रीपती सांगत ॥ ५६ ॥
    जो जो त्याची शांति ते पाहू लागले, तों तों ते दुष्ट लोक अधिकच संतापले आणि त्याला नानाप्रकारचे त्रास देऊ लागले. तेंच श्रीकृष्ण सांगतो ५६.


    इत्येके विहसन्त्येनमेके दुर्वातयन्ति च ।
    तं बबन्धुर्निरुरुधुर्यथा क्रीडनकं द्विजम् ॥ ४० ॥
    [श्लोक ४०] कोणी त्याचा उपहास करीत, तर कोणी त्याच्यावर अपानवायू सोडीत ज्याप्रमाणे लोक पाळीव पक्ष्यांना बांधतात किंवा पिंजर्‍यामध्ये बंद करतात, त्याचप्रमाणे ते लोक त्याला बांधीत किंवा कोंडून ठेवीत. (४०)


    कदर्या बाणली पूर्ण शांती । ऐसे एक उपहासिती ।
    एक नाकीं चुना लाविती । एक मुख माखिती काजळें ॥ ५७ ॥
    "कदर्यूला पूर्ण शांति प्राप्त झाली बुवा !" अशी कोणी त्याची थट्टा करूं लागले. कोणी त्याच्या नाकाला चुना लावला, कोणी त्याच्या तोंडाला काजळच फांसले ५७.


    एक अतिशठ साचोकारे । पुढं ठाकोनि पाठिमोरे ।
    शर्धा करिती अधोद्वारें । नाकीं तोंडीं भरे दुर्गंध ॥ ५८ ॥
    कित्येक अगदी खरोखर पक्के वात्रट होते. त्यांनी त्याच्यापुढे पाठमोरे उभे राहून अपानवायु सोडला. तेव्हां तो दुर्गध त्याच्या नाकातोंडांत भरला ५८.


    तरी त्याचिया निजस्थिती । अणुमात्र क्षोभ न ये चित्तीं ।
    तोचि संन्यासी त्रिजगतीं । ज्याची ढळॆना शांती क्षोभविल्याही ॥ ५९ ॥
    तरी त्याच्या आत्मरूप स्थितीमुळे त्याच्या चित्ताला लेशभरही क्षोभ आला नाही. राग आणण्याचा प्रयत्न केला तरीही ज्याची शांति ढळत नाही. तोच त्रिभुवनांत संन्यासी होय ५९.


    एवं क्षोभेना त्याचें मन । देखोन खवळले दुर्जन ।
    त्यासी गळां श्रृंखला निरोधून । आणिला बांधून चौबारा ॥ ५६० ॥
    तात्पर्य, त्याचे मन क्षुब्ध होईना. असे पाहून ते दुष्ट लोक अधिकच खवळलें . त्यांनी त्या संन्याशाच्या गळ्यांत साखळदंड अडकवून त्याला बांधून चवाठ्यावर आणले ५६०.


    यासी वोळखा रे कोणी तुम्ही । हा धनलोभी जो अकर्मी ।
    तो आजी सांपडविला आम्हीं । अतिअधर्मी दांभिक ॥ ६१ ॥
    "अरे ! तुम्ही कोणी तरी ह्याला ओळखा. जो निंद्य कर्म करणारा होता तोच हा द्रव्यलोभी. तो आज आम्हीं धरला. हा अत्यंत अधर्मी व दांभिक आहे" ६१.


    जेवीं गारुडी बांधी माकडा । तेवीं संन्यासी बांधिला गाढा ।
    मिळोनियां चहूंकडा । मागांपुढां वोढिती ॥ ६२ ॥
    ज्याप्रमाणे गारुडी माकडाला बांधून ठेवतो त्याप्रमाणे त्यांनी तो संन्यासी घट्ट बांधून ठेवला, आणि मग सर्व मिळून चहूकडून मागे पुढे त्याला ओढू लागले ६२.


    एक ओढिती पूर्वेशी । एक ओढिती पश्चिमेसी ।
    संन्यासी हांसे निजमानसीं । सुख सर्वांसी होये येणें ॥ ६३ ॥
    कोणी पूर्वेला ओढीत होते, कोणी पश्चिमेला ओढीत होते, ह्यामुळेच सर्वांना संतोष होत आहे हे पाहून संन्यासीही आपल्या मनामध्ये हसू लागला ६३.


    देह प्रारब्ध भोगी जाण । याचा मजसी संबंध कोण ।
    येणें विवेकें क्षमापूर्ण । कोणाचें मन् दुखवीना ॥ ६४ ॥
    देह प्रारब्ध भोगीत आहे. ह्याचा माझ्याशी संबंध काय? अशा विवेकानें तो क्षमेनें परिपूर्ण झाला होता. तो कोणाचें मन दुखवीत नव्हता ६४.


    जेथ स्वगोत्र सोइरे स्वजन । जिंहीं दीधला अतिसन्मान ।
    त्यांदेखतां अपमान । अनुद्विग्न जो साहे ॥ ६५ ॥
    ज्या ठिकाणी आपले भाऊबंद, सोयरेधायरे व इष्टमित्र आहेत, ज्यांनी पूर्वी आपला अतिशय सन्मान केलेला होता, त्यांच्यादेखत जो मुळीच त्रास न मानतां अपमान सहन करतो ६५.


    त्यापाशीं शांति संपूर्ण । उद्धवा निश्चयेंसीं जाण ।
    ज्याचें लोकेषणे लाजे मन । अशांति जाण ते ठायीं ॥ ६६ ॥
    उद्धवा ! त्याच्यापाशीच खरोखर परिपूर्ण शांति असते असे समज. आणि लौकिक प्रतिष्ठेमुळे ज्याचे मन लाजतें; त्याच्या ठिकाणी शांति रहात नाही ६६.


    ऐसा क्षोभवितां पहा हो । क्षोभा न चढे त्याचा भावो ।
    त्या सन्याशाचा अभिप्रावो । स्वयें देवादिदेवो सांगत ॥ ६७ ॥
    अहो पहा! त्याला इतका त्रास दिला असता त्याच्या मनाला क्रोध येईना. त्या संन्याशाचे हृदगत देवाधिदेव स्वतः सांगत आहे ६७.


    एवं स भौतिकं दुःखं दैविकं दैहिकं च यत् ।
    भोक्तव्यमात्मनो दिष्टं प्राप्तं प्राप्तमबुध्यत ॥ ४१ ॥
    [श्लोक ४१ ] कधी त्याला ताप इत्यादीमुळे देहाचे दुःख, कधी थंडीऊन इत्यादी दैवी कष्ट, तर कधी दुर्जन लोकांनी केलेल्या अपमान इत्यादीद्वारे भौतिक पीडा सहन कराव्या लागत परंतु तो, "हे सर्व आपल्या पूर्वकर्मांचे फळ असल्याने आपल्याला हे अवश्य भोगले पाहिजे," असे मानत असे. (४१)


    भिक्षु बोले निजविवेक । त्रिविध प्रारब्धें बांधले लोक ।
    तेणें भोगणें पडे आवश्यक । रावो रंक सुटेना ॥ ६८ ॥
    भिक्षूने आपला विचार सांगितला. तो म्हणाला, तीन प्रकारच्या (संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध) प्रारब्धाने सर्व लोक बद्ध झाले आहेत, त्यामुळे ते अवश्य भोगावे लागते. राजा व रंक ह्यांतून सुटत नाही ६८.


    भूतांची पीडा ते भौतिक । देवांची पीडा ते दैविक ।
    देहीं उपजती ज्वरादिक । हे पीडा देख दैहिक ॥ ६९ ॥
    पंचमहाभूतांपासून होणारी पीडा ती 'भौतिक' होय. देवांपासून होणारी पीडा 'दैविक' होय आणि देहामध्येच ज्वरादिक उत्पन्न होतात ती पीडा 'दैहिक' होय ६९.


    यापरी त्रिविध दुःख । प्रारब्ध झालें जनक ।
    तें भोगितां मानी असुख । तो केवळ मूर्ख अतिमंद ॥ ५७० ॥
    याप्रमाणे तीन प्रकारचे दुःख जे आहे, ते प्रारब्धापासून उत्पन्न होते. ते भोगीत असतां जो त्रास मानितो तो केवळ मूर्ख व मंदबुद्धि होय ५७०.


    जे भोग आले प्रारब्धेंसीं । तेथे साह्य केल्या हरिहरांसी ।
    भोग न चुकती प्राण्यासी । हें जाणोनि संन्यासी क्षमावंत ॥ ७१ ॥
    प्रारब्धाने जे भोग आपल्या वाट्याला येतील, त्यांत हरिहराला वश करून घेतले असतांनाही ते भोग प्राण्याला चुकत नाहीत, हे जाणूनच तो संन्यासी क्षमाशील झाला होता ७१.


    कृष्ण साह्य पांडवांसी । ते भोगिती नष्टचर्यासी ।
    तेथें साह्य केल्या हरिहरांसी । प्रारब्ध कोणासी टळेना ॥ ७२ ॥
    श्रीकृष्ण पांडवांना साहय्य करीत होता तरी त्यांनी नष्टचर्य भोगिलेच. त्या वेळी विष्णु व शंकर ह्यांना जरी सहाय करून घेतलें, तरी प्रारब्ध कोणालाच टळत नाहीं ७२.


    परिभूत इमां गाथां अगायत नराधमैः ।
    पात्यद्भिः स्वधर्मस्थो धृतिमास्थाय सात्त्विकीम् ॥ ४२ ॥
    [श्लोक ४२] अशा प्रकारे तिरस्कार करून दुर्जन लोक जरी त्याला धर्मापासून च्युत करण्याचा प्रयत्‍न करीत, तरीसुद्धा तो सात्त्विक धैयाने आपल्या धर्माशी एकनिष्ठ राही तो म्हणू लागला. (४२)


    दुर्जनांच्या उपद्रवाहातीं । निजशांति न सांडीच यती ।
    धरोनियां सात्त्विकी धृती । स्वधर्मस्थिती न ढळेचि ॥ ७३ ॥
    दुष्ट लोकांच्या उपद्रवानेही  तो संन्यासी आपली शांति सोडीना. सात्त्विक धैर्य धरल्यामुळे त्याची धर्मस्थिति ढळलीच नाहीं ७३.


    तेणें भिक्षूनें गायिली गाथा । ते तुज मी सांगेन आतां ।
    उद्धवा अतिसावधानता । तो बोध तत्त्वतां अवधारीं ॥ ७४ ॥
    त्या भिक्षून जी गाथा गायिली, ती मी तुला आतां सांगेन. उद्धवा ! चित्त अत्यंत स्वस्थ करून खरोखर तो बोध श्रवण कर ७४.


    तो बोधू धरितां चित्तीं । द्वंद्वसाम्या पावे स्थिती ।
    सहजें उल्हासे निजशांती । सायुज्यमुक्ती घर रिघे ॥ ७५ ॥
    तो उपदेश मनांत धरिला असतां मनाला द्वंद्वांतील समता दिसूं  लागते, आत्मशांति सहज प्रगट होते, आणि सायुज्यमुक्ति घरांत येते ७५.


    जगीं उद्धवाचें भाग्य पूर्ण । ज्यासी श्रीकृष्ण करी सावधान ।
    काय बोलिला भिक्षु आपण । तें निरूपण अवधारीं ॥ ७६ ॥
    ज्याला श्रीकृष्णाने स्वस्थचित्त केले, त्या उद्धवाचे भाग्य जगामध्ये फार मोठे होते. श्रीकृष्ण म्हणाला-भिक्षु स्वत: काय म्हणाला तें वर्णन ऐक ७६.


    द्विज उवाच-
    नायं जनो मे सुखदुःखहेतुः न देवताऽऽत्माग्रहकर्मकालाः ।
    मनः परं कारणमामनन्ति संसारचक्रं परिवर्तयेद्यत् ॥ ४३ ॥
    [श्लोक ४३] ब्राह्मण म्हणाला - माझ्या सुखदुःखाला कारणीभूत ही माणसे नाहीत, देवता नाहीत, शरीर नाही, ग्रह नाहीत, कर्म नाही की काल नाही मनच त्याला खरे कारणीभूत आहे, असे श्रुती सांगतात तेच जीवाला या संसारचक्रात फिरवीत असते. (४३)


    सुजन दुर्जन साधारण । ऐसे जे त्रिविध जन ।
    माझ्या सुखदुःखांसी कारण । सर्वथा जाण ते नव्हती ॥ ७७ ॥
    तो भिक्षु म्हणाला-सज्जन, दुर्जन, आणि साधारण असे जे तीन प्रकारचे लोक असतात, ते माझ्या सुखाला किंवा दुःखाला मुळीच कारण होत नाहींत. ७७.


    जन तितुके पांचभौतिक । माझाही देहो तोचि देख ।
    जनांसी मज सहजें ऐक्य । उपजे सुखदुःख मनापाशीं ॥ ७८ ॥
    लोक म्हणून जितके आहेत, तितके सर्व पंचमहाभूतांपासून झालेले आहेत. माझाही देह तसाच आहे. तेव्हा लोक आणि मी अशा दोहोंचे ऐक्य आहे. सुखदुःख केवळ मनापाशी उत्पन्न होते ७८.


    देवता सुखदुःखदायक । ऐसें म्हणावें आवश्यक ।
    तीं दैवतें मनःकाल्पनिक । त्याचें सुखदुःख मजसी न लगे ॥ ७९ ॥
    देवता ह्याच अवश्य सुखदुःख देणाऱ्या आहेत असे म्हणावें, तर देवतांचे समुदाय हे मनाने कल्पिलेले आहेत. तेव्हा त्यांचे सुखदुःखही मला लागावयाचें नाहीं ७९.


    देवतारूपें मन आपण । मनें कल्पिले देवतागण ।
    ते जैं सुखदुःखें देती जाण । तैं मुख्य कारण मन झालें ॥ ५८० ॥
    देवतारूपाने आपले मन आहे, आणि त्या मनानेच सर्व देवता कल्पिलेल्या आहेत. अर्थात् देवता जेव्हां सुखदुःख देतात, तेव्हां त्याला मुख्य कारण मनच झाले ५८०.


    जेथ जैसा मनाचा सद्भावो । तेथ तद्रूपें भासे देवी देवो ।
    जेथ मनाचा विकल्प पहा हो । तेथ थिता देवो दिसेना ॥ ८१ ॥
    जेथे जसा मनाचा सद्भाव असेल, तेथे त्याप्रमाणेच त्या स्वरूपाने देवी किंवा देव भासमान होतो. अहो ! असे पहा की, जेथे मनाची अश्रद्धा असते, तेथे असलेला देवही दिसत नाही ८१.


    यालागीं सकळ देवता । त्या जाण मनःकल्पिता ।
    त्यांपासाव सुखदुःखव्यथा । ते मनाचे माथां निश्चित ॥ ८२ ॥
    म्हणून ज्या सर्व देवता आहेत, त्या मनःकल्पितच होत असे समज. तेव्हां त्यांच्यापासून सुखदुःखाची व्यथा झाल्यास ती मनामुळेच आहे हे निश्चित ८२.


    आत्मा सुखदुःखांसी कारण । हें समूळ मिथ्यावचन ।
    आत्म्याचे ठायीं द्वैतभान । त्रिशुद्धी जाण असेना ॥ ८३ ॥
    बरें, आत्मा हाच सुखदुःखांचे कारण आहे असे म्हणावें, तर हे बोलणे मुळी खोटें आहे. आत्म्याच्या ठिकाणी द्वैतभावना मुळींच असत नाही ८३.


    मी एक सुखदुःखांचा दाता । हा एक सुखदुःखांचा भोक्ता ।
    हें आत्म्याचे ठायीं तत्त्वतां । जाण सर्वथा असेना ॥ ८४ ॥
    मी एक सुखदुःख देणारा आहे, आणि हा एक सुखदुःखांचा भोक्ता आहे, ही गोष्ट वास्तविक आत्म्याच्या ठायीं खरोखर मुळीच असत नाही ८४.


    जन्मकाळींचे ग्रह दारुण । म्हणों सुखदुःखांसी कारण ।
    ग्रहांचा ग्रहो मन आपण । जन्ममरण भोगवी ॥ ८५ ॥
    जन्मकाळचे क्रूर ग्रह सुखदुःखांस कारण असतात असे म्हणावें, तर आपले मन हेच स्वतः ग्रहांचाही ग्रह आहे. ते जन्ममरण भोगायला लावतें ८५.


    ग्रहांची ग्रहगती देहान्तवरी । मनाची ग्रहगती त्याहूनि थोरी ।
    दुःख भोगवी नाना प्रकारीं । जन्मजन्मांतरीं सोडीना ॥ ८६ ॥
    ग्रहांची ग्रहदशा देह पडेपर्यंत असते, पण मनाची ग्रहदशा त्याहून अधिक आहे. ते नानातव्हेंने दुःख भोगविते आणि जन्मजन्मांतरीही सोडीत नाही ८६.


    दुष्ट ग्रह चारी दिवस पीडी । मनाची पीडा जन्मकोडी ।
    दुष्ट ग्रहो भोगूनि सोडी । मन न सोडी कल्पांतीं ॥ ८७ ॥
    दुष्ट ग्रह थोडाच काळ पीडा देतो, पण मनाची पीडा कोट्यवधि जन्म असते. दुष्टग्रह असतो तो आपली भोगदशा भोगली की सोडून देतो, परंतु मन कल्पांतीही सोडीत नाहीं ८७.


    जैं मन न धरी देहाभिमान । तैं ग्रहांची पीडा मानी कोण ।
    यालागीं सुखदुःखां कारण मनचि जाण महाग्रहो ॥ ८८ ॥
    मन जर देहाभिमान धरणार नाही, तर ग्रहांची पीडा कोण मानतो म्हणून सुखदुःखाला कारण होणारा मन हाच एक महाग्रह आहे ८८.


    येथ निजकर्म दुःखदायक । हेंही म्हणतां न ये देख ।
    कर्म कर्मबंधमोचक । तें दुःखादायक घडे केवीं ॥ ८९ ॥
    आता येथे आपले कर्मच दुःखदायक आहे असेही म्हणता येत नाही. कारण, कर्म हे कर्मबंधांतून सोडविणारे आहे. तेव्हां तेच दुःखदायक कसे होईल ? ८९.


    स्वकर्म शुद्ध स्वाभाविक । त्यासी मनें करूनि स्कामिक ।
    नानापरी अतिदुःख । योनि अनेक भोगवी ॥ ५९० ॥
    आपले  कर्म स्वाभाविक व अत्यंत पवित्र असतां मनच त्याला सकाम बनविते आणि त्यामुळे अनेक प्रकारचे अत्यंत दुःख देउन अनेक योनि भोगावयाला लावतें ५९०.


    हो कां कर्माचेनि क्रियायोगें ।जैं मनःसंकल्प कर्मी न लगे ।
    तैं सुखदुःखांचीं अनेगें । विभांडी वेगें निजकर्म ॥ ९१ ॥
    अहो ! कर्माच्या क्रियांसंबंधाने जेव्हां मनाचा संकल्प कर्माकडे लागत नाही, तेव्हां कितीही सुखदुःखें असली तरी आपले कर्मच त्यांचा नाश करते ९१.


    देह सुखदुःखांसी काय जाणे । आत्मा सुखदुःख सर्वथा नेणे ।
    येथ सुखदुःखांचे गाडे भरणें । मनें भोगवणें निजसत्ता ॥ ९२ ॥
    देह हा सुखदुःख काय जाणणार ? आत्मा तर सुखदुःख मुळीच जाणत नाही. ह्यावरून सुखदुःखांचे गाडे भरावयाचे आणि ते सुखदुःख भोगावयाला लावावयाचे, हें सर्व मनाच्या सत्तेनेच होतें ९२.


    येथ सुखदुःखदायक । मनचि झालें असे एक ।
    मनाअधीन होऊनि लोक । मिथ्या सुखदुःख भोगिती ॥ ९३ ॥
    येथे सुखदुःख देणारे काय तें एक मनच झालेले आहे, आणि लोक त्या मनाच्या आधीन होऊन व्यर्थ सुखदुःख भोगतात ९३.


    काळ सुखदुःखांचा दाता । हेंही न घडे गा सर्वथा ।
    मनःसंकल्पसंकेता । काळाची सत्ता लागली ॥ ९४ ॥
    सुखदुःख देणारा काळ आहे, असे म्हणणेही सर्वस्वी बरोबर नाही. मनःसंकल्पाचा जसा संकेत होईल तशीच काळाची सत्ता चालते ९४.


    अजरामर असतां आपण । मनें घेतलें मज आहे मरण ।
    तेथचि काळ लागला जाण । क्षणें क्षण निर्दाळित ॥ ९५ ॥
    आपण अजरामर असतां मला मरण आहे अशी मनानेच आपली कल्पना करून घेतली, की त्यामुळेच काळ पाठीमागे लागतो आणि क्षणानें क्षण नाहीसा करतो असे समज ९५.


    आपुलेनि हातें आपण । पठाडे खोंविलें दाभण ।
    रात्रीं रुततांचि तें जाण । सर्पभयें प्राण सांडिला ॥ ९६ ॥
    आपणच आपल्या हातानें अंथरुणांत दाभण खोंचून ठेवले व ते रात्री झोपतांना अंगाला टोचतांच साप चावला या भयाने बिचारा मरून गेला ९६.


    त्यासी सर्प नाहीं लागला । मा विखें केवीं तो घारला ।
    परी निजशंके स्वयें निमाला । तैसा काळ लागला जनासी ॥ ९७ ॥
    वस्तुतः त्याला काही सर्प चावला नव्हता. मग विषाने त्याला कसे घेरलें ? तर तो आपल्या शंकेनेंच स्वतः मरण पावला. त्याप्रमाणेच लोकांना हा काळ लागलेला आहे ९७.


    एकासी सर्प झोंबला पाठीसी । काय रुतलें म्हणे सांगातियासी ।
    तो म्हणे कांटी लागली होती कैसी । ते म्यां अनायासीं उपडिली ॥ ९८ ॥
    एकाच्या पाठीला साप चावला, तेव्हां तो आपल्या सोबत्यास विचारूं लागला की, “माझ्या पाठींत काय रुतलें ?" दुसरा म्हणाला, " एक कशी कांटी लागली होती कोण जाणे ! ती मी उपटून टाकली " ९८.


    तो नव्हे सर्पा साशंक । यालागीं त्यासी न चढेचि विख ।
    निजव्यापारीं देख । यथासुख वर्तत् ॥ ९९ ॥
    त्यामुळे त्याला सापाची शंकासुद्धा आली नाही, म्हणून त्याला विष चढलेच नाही. तो आपल्या उद्योगामध्ये खुशाल गुंतून राहिला ९९.


    त्यासी सांगोनि बहुकाळें खूण । देतां सर्पाची आठवण ।
    तत्काळ विषें आरंबळोन । आशंका प्राण सांडिला ॥ ६०० ॥
    पुष्कळ दिवस गेल्यावर त्याला तो सर्पच चावला होता असे सांगून त्याची पाठीवरील खूणही दाखविली असतां सर्पाची आठवण होतांच तत्काळ विषाने घेरले अशा शंकेनेंच त्याने प्राण सोडला ६००. 

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...