मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ६०१ ते ७००
तेवीं निर्विकल्पपुरुखा । उठी संकल्पाची आशंका ।
ते काळीं काळू देखा । बांधे आवांका निर्दळणीं ॥ १ ॥
त्याप्रमाणे निर्विकल्प पुरुषाला संकल्पाची शंका येते, त्याच वेळी त्याच्या नाशाविषयी काळ तयार होतो पहा! १.
निःशंकपणे साचार । ज्याचें मन म्हणे मी अमर ।
त्यांचे काळ वर्जी घर । काळ दुर्धर मनःशंका ॥ २ ॥
त्यांचे काळ वर्जी घर । काळ दुर्धर मनःशंका ॥ २ ॥
पण खरोखर निःशंकपणाने ज्याचे मन “ मी अमर आहे" असें म्हणते, त्याचे घर काळ वर्ज्य करितो. मनःशंकेनेच काळ असह्य होतो २.
जो निर्विकल्प निजनिवाडें । काळ सर्वथा न ये त्याकडे ।
नश्वर नाहीं मा तयापुढें । काळ कोणीकडे रिघेल ॥ ३ ॥
नश्वर नाहीं मा तयापुढें । काळ कोणीकडे रिघेल ॥ ३ ॥
जो स्वत:च निर्विकल्प आहे, त्याच्याकडे काळ कधीच येत नाही, कारण त्याच्याजवळ कांहींच नश्वर नसते, तेव्हां काळ कोठे शिरणार? ३.
यापरी गा काळ देख । नव्हे सुखदुःखदायक ।
सुखदुःखांचें जनक । मनचि एक निश्चित ॥ ४ ॥
सुखदुःखांचें जनक । मनचि एक निश्चित ॥ ४ ॥
पहा ! याप्रमाणे काळ हा काही सुखदुःख देणारा नव्हे हे लक्षात आण. सुखदुःख उत्पन्न करणारे काय तें एक मनच हे निश्चित ४.
मनःकल्पित संसार जाण । मनें कल्पिलें जन्ममरण ।
संसारचक्रीं आवर्तन । मनास्तव जाण पुनः पुनः ॥ ५ ॥
संसारचक्रीं आवर्तन । मनास्तव जाण पुनः पुनः ॥ ५ ॥
संसार हाही मनःकल्पित होय असे समज. मनानेच जन्ममरणांची कल्पना केली आहे. संसारचक्रांत पुनः पुन्हा गिरक्या खात रहावयाचें तेंही मनामुळेच ५.
हे साही प्रकार जाण । म्हणती सुखदुःखांसी कारण ।
विचारितां हे अप्रमाण । मनोजन्य सुखदुःखें ॥ ६ ॥
विचारितां हे अप्रमाण । मनोजन्य सुखदुःखें ॥ ६ ॥
हे सहा प्रकार हेच सुखदुःखांना कारण आहेत असे कोणी म्हणतात. विचार केला तर हेही म्हणणे खोटेंच. कारण, सुखदुःखें ही मनापासूनच उत्पन्न होत असतात ६.
नवल लाघवी कैसें मन । शुद्धि उपजवी मीपण ।
चिद्रूपा लावूनि जीवपण । सुखदुःखें जाण भोगवी ॥ ७ ॥
चिद्रूपा लावूनि जीवपण । सुखदुःखें जाण भोगवी ॥ ७ ॥
हें मन किती आश्चर्यकारक लाघवी आहे पहा की, ते मीपणाचे भान उत्पन्न करून व शुद्ध ब्रह्मस्वरूप अशा आत्म्याकडे जीवपणा लावून त्याला सुखदुःख भोगावयास लावतें ७.
डोळींचा कणू अल्प एक । तो शरीरासी दे अतिदुःख ।
तेवीं वासनामात्रें मन देख । दारुण सुखदुःख भोगवी ॥ ८ ॥
तेवीं वासनामात्रें मन देख । दारुण सुखदुःख भोगवी ॥ ८ ॥
डोळ्यांत गेलेला अत्यंत लहान कण असला, तरी तो अतिशय दुःख देतो. त्याप्रमाणेच पहा ! मन हेही वासनेच्या निमित्ताने भयंकर सुखदुःख भोगावयाला लावते ८.
म्हणाल येथ अविद्या एक । ते होय सुखदुःखदायक ।
अविद्या ब्रह्म असतां देख । मनेंवीण सुखदुःख कदा नुपजे ॥ ९ ॥
अविद्या ब्रह्म असतां देख । मनेंवीण सुखदुःख कदा नुपजे ॥ ९ ॥
आता कदाचित तुम्ही म्हणाल की, अविद्या आहे तीच सुखदुःख देणारी आहे. पण अविद्या ही ब्रह्मस्वरूप असल्याने मनाशिवाय सुखदुःख कधीही होणार नाही ९.
अविद्या ब्रह्म असतां पाहीं । मन लीन सुषुप्तीच्या ठायीं ।
तेव्हां सुखदुःखचि नाहीं । भोग कोणेंही कंहीं देखिजेना ॥ ६१० ॥
तेव्हां सुखदुःखचि नाहीं । भोग कोणेंही कंहीं देखिजेना ॥ ६१० ॥
अविद्या ब्रह्मस्वरूप असतांना मन हे सुषुप्तीमध्ये लीन होते. तेव्हां मुळी सुखदुःखच नसते. म्हणून भोग कोणी कधी तेथे पहातच नाहीत ६१०.
मन दुश्चित जेव्हां पाहीं । तेव्हां जो भोग भोगिजे देहीं ।
तें सुखदुःख न पडे ठायीं । स्वयें स्वदेहीं देखिजे ॥ ११ ॥
तें सुखदुःख न पडे ठायीं । स्वयें स्वदेहीं देखिजे ॥ ११ ॥
मन जेव्हां दुश्चित असते तेव्हां जो भोग देहाने भोगावा, त्याचे सुखदुःखच आपल्याला कळत नाही. हा अनुभव आपल्या देहांतच आपण पाहून घ्यावा ११.
यालागीं सुखदुःखांचें कारण । मनचि आपण्या आपण ।
तेणें लावूनि जन्ममरण । भोवंडी दारुण भवचक्रीं ॥ १२ ॥
तेणें लावूनि जन्ममरण । भोवंडी दारुण भवचक्रीं ॥ १२ ॥
म्हणून आपल्या सुखदुःखाचे कारण आपलें मनच स्वतः आहे. त्यानेच जन्ममरण पाठीमागे लावून ते भयंकर संसारचक्रांत भोंवंडीत राहातें १२.
भवचक्रीं प्रत्यावर्तन । कोणे रीती करवी मन ।
तेचि अर्थींचें निरूपण । भिक्षु आपण्या आपण निरूपी ॥ १३ ॥
तेचि अर्थींचें निरूपण । भिक्षु आपण्या आपण निरूपी ॥ १३ ॥
मन हे संसारचक्रामध्ये कसें फिरविते ? त्याच अर्थाचे निरूपण भिक्षु आपण स्वतःच सांगत आहे १३.
मनो गुणान्वै सृजते बलीयः ततश्च कर्माणि विलक्षणानि ।
शुक्लानि कृष्णान्यथ लोहितानि तेभ्यः सवर्णाः सृतयो भवन्ति ॥ ४४ ॥
शुक्लानि कृष्णान्यथ लोहितानि तेभ्यः सवर्णाः सृतयो भवन्ति ॥ ४४ ॥
[श्लोक ४४ ] हे अतिशय बलवान मनच कामक्रोधादी विकार निर्माण करते त्यामुळे सात्त्विक, राजस आणि तामस अशी अनेक प्रकारची कर्मे होतात आणि त्या कर्मानुसारच जीवाला विविध गती प्राप्त होतात. (४४)
मनो कल्पोनि निजसत्तें । उपजवी नाना वृत्तींतें ।
त्याचि त्रिगुणा होती येथें । गुणविभागातें गुणावृत्ती ॥ १४ ॥
त्याचि त्रिगुणा होती येथें । गुणविभागातें गुणावृत्ती ॥ १४ ॥
मन हेच आपल्या सत्तेने कल्पना करून अनेक प्रकारच्या वृत्ति उत्पन्न करते. त्याच वृत्ति पुढे त्रिगुणात्मक होतात व गुणांच्या विभागाप्रमाणे गुणांच्या वृत्ति बनतात १४.
सत्त्वरजतमादि गुणीं । सुरनरतिर्यगादि योनी ।
मनें त्रिभुवन उभवूनी । संसारभुवनीं स्वयें नांदे ॥ १५ ॥
मनें त्रिभुवन उभवूनी । संसारभुवनीं स्वयें नांदे ॥ १५ ॥
त्याच सत्त्वरजतमादि गुणांनी देव, मनुष्य व पशुपक्षी इत्यादि योनि मनानेच त्रिभुवन उत्पन्न करून संसारसदनामध्ये खुशाल नांदत असतात १५.
त्या मनाची प्रौढी गाढी । क्षणें रची क्षणें मोडी ।
मन ब्रह्मादिकां भुली पाडी । इतर बापुडीं तीं कायी ॥ १६ ॥
मन ब्रह्मादिकां भुली पाडी । इतर बापुडीं तीं कायी ॥ १६ ॥
त्या मनाचे सामर्थ्य काही विलक्षण आहे. ते क्षणांत पाहिजे तो व्यूह उभा करतें व ढासळून टाकते. मन हे ब्रह्मादिकांनासुद्धा भुरळ पाडते, मग इतर बिचाऱ्यांची कथा काय ? १६.
मनाचा बलात्कार कैसा । निर्गुणीं पाडी गुणाच्या फांसा ।
लावूनि जीवपणाचा झांसा । संसारवळसा आवर्तीं ॥ १७ ॥
लावूनि जीवपणाचा झांसा । संसारवळसा आवर्तीं ॥ १७ ॥
मनाचा प्रभाव किती विचित्र आहे पहा, की ते निर्गुणाला गुणांच्या फांसांत अडकवितें. त्याला जीवंतपणाची तंद्री लावून संसाराच्या भोवऱ्यांत गिरक्या खावयास लाविते १७.
केवळ विचारितां मन । तें जड मूढ अचेतन ।
त्याचें केवीं घडे स्रजन । तेंचि निरूपण सांगत ॥ १८ ॥
त्याचें केवीं घडे स्रजन । तेंचि निरूपण सांगत ॥ १८ ॥
केवळ विचार केला असतां मन हे जड, मूढ व अचेतन आहे. त्याची उत्पत्ति तरी कशी होणार ? तेंच वर्णन श्रीकृष्ण सांगतो १८.
अनीह आत्मा मनसा समीहता हिरण्यमयो मत्सख उद्विचष्टे ।
मनः स्वलिङ्गं परिगृह्य कामान् जुषन्निबद्धो गुणसङ्गतोऽसौ ॥ ४५ ॥
मनः स्वलिङ्गं परिगृह्य कामान् जुषन्निबद्धो गुणसङ्गतोऽसौ ॥ ४५ ॥
[श्लोक ४५] क्रियाशील मनाबरोबर राहूनही ज्ञानशक्तिप्रधान जीवाचा सखा आत्मा निष्क्रिय असून जीवाला साक्षीरूपाने पाहातो परंतु जीवा आत्म्याच्या ठिकाणी संसार भासविणार्या मनाला बरोबर घेऊन कर्मात आसक्त होऊन सुखांचा उपभोग घेत संसारात बांधला जातो. (४५)
आत्मा चित्स्वरूप परिपूर्ण । निःसंग निर्विकार निर्गुण ।
त्यासी संसारबंधन । सर्वथा जाण घडेना ॥ १९ ॥
त्यासी संसारबंधन । सर्वथा जाण घडेना ॥ १९ ॥
आत्मा हा ज्ञानस्वरूप असल्याने परिपूर्ण आहे. तो नि:संग, निर्विकार व निर्गुण आहे. त्याला संसारबंधन मुळीच घडत नाही १९.
जो स्वप्रकाशें प्रकाशघन निजतेजें विराजमान ।
जो परमात्मा परिपूर्ण । त्यासी क्रियाचरण कदा न घडे ॥ ६२० ॥
जो परमात्मा परिपूर्ण । त्यासी क्रियाचरण कदा न घडे ॥ ६२० ॥
जो आत्मा स्वयंप्रकाशा प्रकाशमय आहे, स्वतेजानेंच शोभत आहे, आणि जो परमात्मा परिपूर्ण आहे, त्याला क्रियाचरण कधीही घडत नाहीं ६२०.
विचारितां निजनिवाडें । मनाचे जडत्वचि जोडे ।
त्यासीही संसार न घडे । भवबंध घडे तो ऐका ॥ २१ ॥
त्यासीही संसार न घडे । भवबंध घडे तो ऐका ॥ २१ ॥
आपल्याच कल्पनेने विचार केला असतां मन जड असल्याचे दिसून येते, तेव्हा त्यालाही संसार घडणे शक्य नाही. आतां हें संसाराचे बंधन कोणाला असतें तें ऐका २१.
नवल मनाचें विंदान । शुद्धीं उपजवी मीपण ।
तेचि वस्तूसी जीवपण । सगुणत्वा जाण स्वयें आणी ॥ २२ ॥
तेचि वस्तूसी जीवपण । सगुणत्वा जाण स्वयें आणी ॥ २२ ॥
मनाचे कौशल्य आश्चर्यकारक आहे. तें शुद्ध अशा आत्म्याच्या ठिकाणी मीपणा उत्पन्न करते, आणि त्याच ब्रह्माला जीवभाव लावून स्वतःच त्याला सगुणस्वरूपाला आणते २२.
मनःसंकल्पाचें बळ । शुद्धासी करी शबळ ।
लावूनि त्रिगुणांची माळ । भवबंधजाळ स्वयें बांधे ॥ २३ ॥
लावूनि त्रिगुणांची माळ । भवबंधजाळ स्वयें बांधे ॥ २३ ॥
मनाच्या संकल्पाचें सामर्थ्य इतके आहे की, तें शुद्ध ब्रह्माला अविद्यात्मक करून सोडते, आणि त्रिगुणांची माळ लावून संसाररूप जाळें स्वत:च तयार करते २३.
जेवीं घटामाजील घटजळ । आकळी अलिप्त चंद्रमंडळ ।
तेवीं मनःसंकल्पें केवळ । कीजे शबळ चिदात्मा ॥ २४ ॥
तेवीं मनःसंकल्पें केवळ । कीजे शबळ चिदात्मा ॥ २४ ॥
ज्याप्रमाणे घटांतील पाणी अलिप्त असलेल्या चंद्रबिंबाला आपल्यामध्ये आकलन करते, . त्याप्रमाणे केवळ मनाच्या संकल्पाने ज्ञानस्वरूप आत्मा अविद्यात्मक केला आहे २४.
घटींचें हालतां जीवन । चंद्रमा करी कंपायमान ।
तेवीं शुद्धासी जन्ममरण । मनोजन्य सुखदुःखें ॥ २५ ॥
तेवीं शुद्धासी जन्ममरण । मनोजन्य सुखदुःखें ॥ २५ ॥
घटांतील पाणी हालले असता ते चंद्रबिंबालाही कंपित करते, त्याप्रमाणे मनामुळे शुद्ध ब्रह्माला जन्ममरण व सुखदुःखें उत्पन्न झालेली आहेत २५.
आत्मा स्वप्रकाश चित्स्वरूप । मन जड कल्पनारूप ।
तें मानूनि आपुलें स्वरूप । त्याचें पुण्यपाप स्वयें भोगी ॥ २६ ॥
तें मानूनि आपुलें स्वरूप । त्याचें पुण्यपाप स्वयें भोगी ॥ २६ ॥
आत्मा हा स्वयंप्रकाश आणि ज्ञानस्वरूप आहे. मन हे जड असून कल्पनारूप आहे. तरी तेच आपलें स्वरूप असे मानून त्याचे पुण्य-पाप असतें तें हा जीवात्माच स्वतः भोगतो २६.
जीवाचा आप्त आवश्यक । सुहृद सखा परमात्मा एक ।
तो मनाजीवाचा नियामक । द्रष्टा देख साक्षित्वें ॥ २७ ॥
तो मनाजीवाचा नियामक । द्रष्टा देख साक्षित्वें ॥ २७ ॥
जीवाचा खराखरा आत, सुहृद व मित्र म्हटला म्हणजे एक परमात्मा होय. तोच मनाचा आणि जीवाचाही नियामक असून साक्षीदाराप्रमाणे एक प्रेक्षक होय २७.
अविद्या प्रतिबिंबे नेटका । जीव जो कां माझा सखा ।
तो मनोभ्रमें भ्रमोनि देखा । भोगी सुखदुःखां मनोजन्य ॥ २८ ॥
तो मनोभ्रमें भ्रमोनि देखा । भोगी सुखदुःखां मनोजन्य ॥ २८ ॥
जो जीव अविद्येच्या योगानें स्पष्टपणाने प्रतिबिंबित होतो, तोच माझा मित्र होय. तोच मनाच्या भ्रमानें भ्रमण - पावून मनापासून उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखांना भोगीत आहे २८.
मनाची एकात्मता परम । जीवासी पडला थोर भ्रम ।
आपण असतांही निष्कर्म । कर्माकर्म स्वयें भोगी ॥ २९ ॥
आपण असतांही निष्कर्म । कर्माकर्म स्वयें भोगी ॥ २९ ॥
मनाची एकात्मता मोठी विलक्षण आहे. त्यामुळे जीवाला अत्यंत भ्रम पडतो, आणि तो जीव आपण स्वतः निष्कर्म असतांही स्वत:च कर्माकर्म भोगतो २९.
सूळीं जीव मनाचा नियंता । तोचि मनाच्या एकात्मता ।
मनाचिया सुखदुःखव्यथा । आपुले माथां नाथिल्या सोशी ॥ ६३० ॥
मनाचिया सुखदुःखव्यथा । आपुले माथां नाथिल्या सोशी ॥ ६३० ॥
वस्तुतः पाहिले तर जीव हा मनाचा नियंता आहे, पण तोच मनाशी एकरूप होऊन मनाच्या नसत्याच सुखदुःखांच्या व्याधि आपल्या माथीं घेऊन सहन करितो ६३०.
जेवीं अतिआप्तता प्रधान । रायासी लावी दृढबंधन ।
मग राजा तो होय दीन । तो भोगवी तें आपण सुखदुःख भोगी ॥ ३१ ॥
मग राजा तो होय दीन । तो भोगवी तें आपण सुखदुःख भोगी ॥ ३१ ॥
ज्याप्रमाणे अत्यंत जवळचा नातेवाईक प्रधान असला, म्हणजे तो राजालाच आपल्या कैचीत ठेवतो; आणि मग तो राजा अगदी गरीब होऊन जातो, व प्रधान जें जें काय सुख-दुःख भोगावयास लावील तें तें आपण भोगीत असतो ३१,
ते दशा झाली जीवासी । मनें संसारी केलें तयासी ।
मग नाना जन्ममरणें सोशी । अहर्निशीं सुखदुःखें ॥ ३२ ॥
मग नाना जन्ममरणें सोशी । अहर्निशीं सुखदुःखें ॥ ३२ ॥
तीच दशा जीवाला प्राप्त झालेली आहे. मनाने त्याला संसारी करून ठेविले आहे, त्यामुळे तो अनेक जन्ममरणे व रात्रंदिवस अनेक सुखदुःखें सोशीत असतो ३२.
त्या मनासी निग्रहो न करितां । जीवाची न चुके व्यथा ।
मनाचेनि छंदें नाचतां । साधनें सर्वथा व्यर्थ होती ॥ ३३ ॥
मनाचेनि छंदें नाचतां । साधनें सर्वथा व्यर्थ होती ॥ ३३ ॥
त्या मनाचा निग्रह केला नाही, तर जीवाचें दुःखही टळावयाचे नाही. मनाच्याच नादाने नाचत राहिले तर सर्व साधनें फुकट जातात ३३.
दानं स्वधर्मो नियमो यमश्च श्रुतं च कर्माणि च सद्व्रतानि ।
सर्वे मनोनिग्रहलक्षणान्ताः परो हि योगो मनसः समाधिः ॥ ४६ ॥
सर्वे मनोनिग्रहलक्षणान्ताः परो हि योगो मनसः समाधिः ॥ ४६ ॥
[ श्लोक ४६] दान, स्वधर्माचे पालन, यमनियम,वेदाध्ययन, सत्कर्मे आणि व्रतांचे पालन ही सर्व कर्मे मनाचा निग्रह करण्यासाठी असतात कारण मनाची एकाग्रता हाच परम योग आहे. (४६)
न लक्षितां मनोनियमन । सर्वस्वही दिधल्या दान ।
एक मी दाता होय अभिमान । तेणें दानें मन दाटुगें होय ॥ ३४ ॥
एक मी दाता होय अभिमान । तेणें दानें मन दाटुगें होय ॥ ३४ ॥
मनोनिग्रहाकडे लक्ष न देतां सर्वस्वही दान दिले, तर दाता काय तो एक मीच असा अभिमान होतो व त्या दानाच्या योगाने मन गर्वाने उन्मत्त होतें ३४.
चुकोनि मनोनिग्रहाचें वर्म । आचरतां वर्णाश्रमधर्म ।
तेणें उल्हासे मनोधर्म । माझें स्वकर्म अतिश्रेष्ठ ॥ ३५ ॥
तेणें उल्हासे मनोधर्म । माझें स्वकर्म अतिश्रेष्ठ ॥ ३५ ॥
किंवा मनोनिग्रहाचे वर्म चुकून वर्णाश्रमधर्म आचरण केला असतां त्याच्या योगाने मनोधर्म आनंदभराने बळावतो, आणि ' माझे स्वकर्म हेच अत्यंत श्रेष्ठ' असें वाटू लागते ३५.
मीचि एक तिहीं लोकीं । स्वचार निष्ठ स्वंयपाकी ।
यापरी स्वधर्मादिकीं । मन होय अधिकीं चाविरें ॥ ३६ ॥
यापरी स्वधर्मादिकीं । मन होय अधिकीं चाविरें ॥ ३६ ॥
त्रिभुवनांत मीच काय तो एक आचारसंपन्न, मीच काय तो एक स्वतः स्वयंपाक करणारा, ह्याप्रमाणे स्वधर्मादि आचरणाने मन अधिकच चवताळून जाते ३६.
मनोनियमनीं नाहीं बुद्धी । तैं यमनियम ते उपाधी ।
मी एक साधक त्रिशुद्धी । हेंचि प्रतिपादी मनोधर्म ॥ ३७ ॥
मी एक साधक त्रिशुद्धी । हेंचि प्रतिपादी मनोधर्म ॥ ३७ ॥
मनाचे नियमन करण्याची बुद्धि नसेल तर यम-नियम हीसुद्धा एक उपाधीच आहे. कारण त्यामुळे, 'खरोखर साधक काय तो मीच' हेच मनोधर्म नेहमी सांगत असतो ३७.
करितां वेदशास्त्रश्रवण । गर्वाचें भरतें गहन ।
पांडित्यीं अतिअभिमान । मनोनियमन तेथें कैंचें ॥ ३८ ॥
पांडित्यीं अतिअभिमान । मनोनियमन तेथें कैंचें ॥ ३८ ॥
वेदशास्त्र श्रवण केले असतां गर्वाची भयंकरच भरती येते. पांडित्यामध्ये अतिशय अभिमान उत्पन्न होतो. तेथे मनाचे नियमन कसे होणार ? ३८.
करूं जातां निजकर्म । कर्मक्रिया अतिदुर्गम ।
कर्मठतेचा चढे भ्रम । मनोनियमन घडे केवीं ॥ ३९ ॥
कर्मठतेचा चढे भ्रम । मनोनियमन घडे केवीं ॥ ३९ ॥
आपलेंच कर्म करावयास जावें, तर कर्मक्रिया अत्यंत कठीण आहे. त्या कर्मठपणाचाच मोठा भ्रम वाढतो, तेथे मनाचे नियमन कसे घडणार ? ३९.
कर्म केवळ देहाचे माथां । आत्मा देहीं असोनि विदेहता ।
त्यासी कर्मीं कर्मबद्धता । कर्मठ मूर्खतां मानिती ॥ ६४० ॥
त्यासी कर्मीं कर्मबद्धता । कर्मठ मूर्खतां मानिती ॥ ६४० ॥
कर्म हे केवळ देहाच्या ठिकाणी आहे. आत्मा देहांत असूनही तो विदेहस्थितीत आहे. त्याला कर्माने कर्मबद्धता प्राप्त होते, असें कर्मठ लोक मूर्खपणाने मानितात ६४०.
अनंतव्रतें झाले व्रती । तेणें धनधान्य वांछिती ।
मनोनिग्रहो नाहीं चित्तीं । सद्व्रते जाती सुनाट ॥ ४१ ॥
मनोनिग्रहो नाहीं चित्तीं । सद्व्रते जाती सुनाट ॥ ४१ ॥
असंख्य व्रतें करून व्रतस्थ झाले असताही ते त्याबद्दल धनधान्य मिळावे अशी इच्छा करतात. कारण त्यांच्या मनांत मनोनिग्रह नसतो.' चांगली चांगली केलेली व्रतेंही अशा रीतीने व्यर्थ जातात ४१.
व्रत दान स्वधर्म सकळ । यांसी मनोनिग्रहो मुख्य फळ ।
तेणेंवीण अवघीं विकळ । साधनें निष्फळ साधकां ॥ ४२ ॥
तेणेंवीण अवघीं विकळ । साधनें निष्फळ साधकां ॥ ४२ ॥
व्रत, दान, स्वधर्म, इत्यादि जी सर्व आहेत, त्यांना मनोनिग्रह हेच मुख्य फळ आहे. त्याच्याशिवाय सर्व साधनें दुर्बल व साधकांना निष्फळ होत ४२.
दानादिक सप्त पदार्थ । हे ज्ञानाचे अंगभूत ।
तीं साधनें समस्त । निष्फळ येथ केवीं म्हणा ॥ ४३ ॥
तीं साधनें समस्त । निष्फळ येथ केवीं म्हणा ॥ ४३ ॥
दानादिक सात साधनें ही ज्ञानाचींच अंगभूत आहेत, ती सर्वच साधनें निष्फळ आहेत असे येथे कसे म्हणावें ? ४३.
दानादिकें जीं जीं येथें । इहामुत्र फळ ये त्यांतें ।
तें फळचि निष्फळ येथें । जन्ममरणांतें वाढवी ॥ ४४ ॥
तें फळचि निष्फळ येथें । जन्ममरणांतें वाढवी ॥ ४४ ॥
(ह्याचे उत्तर असें की,) येथे दानादिक जी जी साधने आहेत, त्यांना इहपरलोकीं फळ येते, पण ते फळच येथे निष्फळ होते आणि जन्ममरणांना वाढविते ४४.
येथ साधक होय सज्ञान । फळाशा निःशेष त्यागून ।
दानादि स्वधर्माचरण । चित्तशुद्धीसी जाण उपयोगी ॥ ४५ ॥
दानादि स्वधर्माचरण । चित्तशुद्धीसी जाण उपयोगी ॥ ४५ ॥
ह्यांत साधक ज्ञानसंपन्न असला, तर तो फळाची आशा निखालस सोडून देऊन दानादिक स्वधर्माचरण करील, आणि ते मात्र त्याच्या चित्तशुद्धीला उपयोगी होईल ४५.
माझी व्हावी चित्तशुद्धी । ऐशी उपजावया बुद्धी ।
भगवत्कृपा पाहिजे आधीं । तैं साधनें सिद्धी पावती ॥ ४६ ॥
भगवत्कृपा पाहिजे आधीं । तैं साधनें सिद्धी पावती ॥ ४६ ॥
परंतु 'माझी चित्तशुद्धि व्हावी' अशी बुद्धि उत्पन्न होण्याला आधी भगवंताची कृपा पाहिजे. तरच साधनें सिद्धीला जातात ४६.
साधनीं माझी मुख्य भक्ती । त्यांत विशेषें नामकीर्ती ।
नामें चित्तशुद्धि चित्तीं । स्वरूपस्थिती साधकां ॥ ४७ ॥
नामें चित्तशुद्धि चित्तीं । स्वरूपस्थिती साधकां ॥ ४७ ॥
सर्व साधनांत माझी भक्ति हीच मुख्य होय. त्यांतही नामाची कीर्ती विशेष आहे. नामाने चित्ताची शुद्धि होते आणि साधकांना स्वस्वरूपस्थिति प्राप्त होते ४७.
नामापरतें साधन । सर्वथा नाहीं आन ।
नामें भवबंधच्छेदन । सत्य जाण उद्धवा ॥ ४८ ॥
नामें भवबंधच्छेदन । सत्य जाण उद्धवा ॥ ४८ ॥
नामाहून श्रेष्ठ असे साधन दुसरें मुळीच नाही. उद्धवा ! नामाने खरोखरच संसारबंधाचे छेदन होते हें लक्षात ठेव ४८.
स्वरूपस्थित निश्चळ मन । जेथ लाजोनि जाय साधन ।
तेथ दानादिकांचें प्रयोजन । सहजचि जाण खुंटले ॥ ४९ ॥
तेथ दानादिकांचें प्रयोजन । सहजचि जाण खुंटले ॥ ४९ ॥
स्वस्वरूपाच्या ठिकाणी राहून मन निश्चळ झाले, की अशा वेळी जेथे साधन निघून जाते; तेथे दानादिकांचे कारण आपोआपच खुंटले असे समज ४९.
समाहितं यस्य मनः प्रशान्तं दानादिभिः किं वद तस्य कृत्यम् ।
असंयतं यस्य मनो विनश्यद् दानादिभिश्चेदपरं किमेभिः ॥ ४७ ॥
असंयतं यस्य मनो विनश्यद् दानादिभिश्चेदपरं किमेभिः ॥ ४७ ॥
[श्लोक ४७] ज्याचे मन एकाग्र होऊन एकदम शांत झाले, त्याला दान इत्यादींची काय आवश्यकता आहे, सांग ना ! परंतु ज्याचे मन चंचल असून आळस इत्यादी दोषांनी भरलेले आहे, त्याने दानादी कर्मे केली, तरी त्यांचा काय उपयोग ? (४७)
येथ ज्या पुरुषाचें मन । ठाकी आपुलें जन्मस्थान ।
त्यासी दानादिकांचें कोण । प्रयोजन साधनीं ॥ ६५० ॥
त्यासी दानादिकांचें कोण । प्रयोजन साधनीं ॥ ६५० ॥
येथे ज्या पुरुषाचे मन आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रविष्ट होते, त्याला दानादि साधनांचे कारण काय ? ६५०.
पूर्णतृप्तापाशीं जाण । ओगरलिया सदन्न ।
तो जेवीं न पाहे हुंगोन । तेवीं साधन अमनस्का ॥ ५१ ॥
तो जेवीं न पाहे हुंगोन । तेवीं साधन अमनस्का ॥ ५१ ॥
पूर्णपणे तृप्त झालेल्या माणसापुढे पक्वान्न वाढले असतां तो जसा त्याचा वासही घेऊन पहात नाही, त्याप्रमाणेच मनोविकार नष्ट झालेल्याच्यापुढे साधन व्यर्थ होय ५१.
गंगा उतरावया महापूरीं । अतिप्रयासीं ताफा करी ।
तोचि पूर वोहटल्यावरी । ताफा अव्हेरी निःशेष ॥ ५२ ॥
तोचि पूर वोहटल्यावरी । ताफा अव्हेरी निःशेष ॥ ५२ ॥
महापुरांतून गंगा नदीच्या पलीकडे जाण्यासाठी एकादा मनुष्य मोठ्या कष्टानें तराफा तयार करितो; पण तोच पूर उतरल्यावर तो तराफा पूर्णपणे दूर झुगारून देतो ५२.
तेवीं कामक्रोधादिवेगशून्य । ज्याचें निर्विकल्पीं निश्चळ मन ।
त्यासी दानादिकीं प्रयोजन । नाहीं जाण निश्चित ॥ ५३ ॥
त्यासी दानादिकीं प्रयोजन । नाहीं जाण निश्चित ॥ ५३ ॥
त्याप्रमाणे कामक्रोधादि ऊर्मींनी रहित असें ज्याचे मन निर्विकल्पामध्ये स्थिर झाले, त्याला खरोखर दानादिकांचे काही कारणच नाही ५३.
जेवीं सूर्योदय झाल्यापाठीं । उपेगा न ये लक्ष दिवटी ।
तेवीं निर्विकल्पता मनीं उठी । तैं साधनें कोटी सुनाट ॥ ५४ ॥
तेवीं निर्विकल्पता मनीं उठी । तैं साधनें कोटी सुनाट ॥ ५४ ॥
ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर लक्षावधि दिवट्याही उपयोगी पडत नाहीत, त्याप्रमाणे निर्विकल्पता मनामध्ये उत्पन्न झाली की, कोट्यवधि साधने निष्फळ होत ५४.
एवं समाहित ज्याचें मन । त्यासी दानादि नाना साधन ।
करावया नाहीं प्रयोजन । कल्पनां पूर्ण निमाल्या ॥ ५५ ॥
करावया नाहीं प्रयोजन । कल्पनां पूर्ण निमाल्या ॥ ५५ ॥
अशा प्रकारे ज्याचे मन शांत झाले, त्याला दानादि नाना प्रकारची साधनें करण्याचे कारणच नाही. त्याच्या कल्पनाच पूर्णपणे लयास गेलेल्या असतात ५५.
ज्याचें नेम न मनी चित्त । जें सदा विवेकरहित ।
जें अनिवार विषयासक्त । त्यासीही अनुपयुक्त साधनें ॥ ५६ ॥
जें अनिवार विषयासक्त । त्यासीही अनुपयुक्त साधनें ॥ ५६ ॥
ज्याचे मन कोणतेच नियमन पाळीत नाही, जे मन सदोदित विचारशून्य असते, जे विषयांच्या ठिकाणी अनिवार आसक्त असते, त्यालाही साधनें निरुपयोगी होत ५६.
जेवीं मदगजांच्या लोटीं । सैन्य पळे बारा वाटीं ।
तेवीं विषयासक्तापाठीं । साधनें हिंपुटी होऊनि ठाती ॥ ५७ ॥
तेवीं विषयासक्तापाठीं । साधनें हिंपुटी होऊनि ठाती ॥ ५७ ॥
ज्याप्रमाणे मदोन्मत्त हत्तींच्या झुंडींमुळे सैन्य अनेक वाटांनी पळत सुटते, त्याप्रमाणे विषयासक्ताजवळ साधने हिरमुसली होऊन जातात ५७.
जो विषयासक्तमना । तो सर्वथा नातळे साधना ।
करी तैं तेथेंही जाणा । विषयकल्पना संकल्पीं ॥ ५८ ॥
करी तैं तेथेंही जाणा । विषयकल्पना संकल्पीं ॥ ५८ ॥
जो मनाने विषयासक्त आहे, तो साधनाचे आचरण मुळीच करीत नाही. कारण, त्याने साधनें केलीच तर तेथेही त्याच्या मनःसंकल्पांत विषयांच्याच कल्पना असतात ५८.
स्वयें करितां पै साधना । जें जें फळ वांछी वासना ।
तें तेंचि फळे जाणा । करी उगाणा दानादिकांचा ॥ ५९ ।
तें तेंचि फळे जाणा । करी उगाणा दानादिकांचा ॥ ५९ ।
स्वतः साधन करीत असतांना वासना ज्या ज्या फळाची इच्छा करिते, ते तेंच फळ प्राप्त होते, आणि दानादिकांचा नाश करिते ५९.
जेवीं कां पूर्णबळाचा वारू । त्यावरी बैसला निर्बळ नरू ।
तो त्यासी सर्वथा अनावरू । नव्हे स्थिरू अणुमात्र ॥ ६६० ॥
तो त्यासी सर्वथा अनावरू । नव्हे स्थिरू अणुमात्र ॥ ६६० ॥
ज्याप्रमाणे एकादा पूर्णपणे बलवान् असा घोडा असला आणि त्यावर दुबळा पुरुष बसला, तर तो घोडा त्याला सर्वस्वी अनावर होतो, एक क्षणभरही स्थिर रहात नाही ६६०.
तैसें ज्याचें अतिदुर्मन । सदा कामक्रोधीं परिपूर्ण ।
जो स्वयें झाला मनाचे आधीन । ज्याचा विवेक निमग्न महामोहीं ॥ ६१ ॥
जो स्वयें झाला मनाचे आधीन । ज्याचा विवेक निमग्न महामोहीं ॥ ६१ ॥
त्याप्रमाणेच ज्याचे मन अतिशय दुर्बळ असते, सदोदित कामक्रोधांनीच पूर्ण भरलेले असतें, जो स्वत:च मनाचा गुलाम झालेला असतो, ज्याचा विचार महामोहांतच नेहमी गटंगळ्या खात असतो ६१,
तेथ साधनचि करी कोण । करी तें मोहास्तव जाण ।
तेणें वाढे तमोगुण । मनोनियमन घडेना ॥ ६२ ॥
तेणें वाढे तमोगुण । मनोनियमन घडेना ॥ ६२ ॥
तशा स्थितीत साधन कोण करणार? त्याने एकादेवेळी साधने केली तर ती मोहामुळेच करितो. त्यामुळे तमोगुण वाढतो, पण मनाचे नियमन होत नाहीं ६२.
श्रवणादि इंद्रियबंधन । करूनि करितां साधन ।
तेणें वश्य नव्हे मन । मनाअधीन इंद्रियें ॥ ६३ ॥
तेणें वश्य नव्हे मन । मनाअधीन इंद्रियें ॥ ६३ ॥
बरें, श्रवणादि इंद्रियांचे नियमन करून साधन केले असता त्याने मन आकलन होत नाही. कारण इंद्रिये ही मनाच्या आधीन असतात ६३.
मनोवशेऽन्ये ह्यभवंस्म देवा मनश्च नान्यस्य वशं समेति ।
भीष्मो हि देवः सहसः सहीयान् युञ्ज्याद्वशे तं स हि देवदेवः ॥ ४८ ॥
भीष्मो हि देवः सहसः सहीयान् युञ्ज्याद्वशे तं स हि देवदेवः ॥ ४८ ॥
[श्लोक ४८] मन ताब्यात आल्यानंतर इतर इंद्रिये वश होतात इंद्रिये मनाला वश करू शकत नाहीत कारण मन हा बलवानांपेक्षाही बलवान भयंकर आहे जो या मनावर नियंत्रण मिळवतो, तो देवांचाही देव होतो. (४८)
मनें आकळिलें सर्वांसी । परी मन नाकळे कोणासी ।
मनें छळिलें देवांसी । तें केवीं इंद्रियांसी आटोपे ॥ ६४ ॥
मनें छळिलें देवांसी । तें केवीं इंद्रियांसी आटोपे ॥ ६४ ॥
मनाने सर्वांना आपल्या आधीन केलेले आहे; परंतु मन मात्र कोणालाच आवरत नाही. मनाने देवांनाही छळिलें, तें इंद्रियांना कसें आवरणार ? ६४.
चंद्र अधिष्ठाता मनासी । मनें छळिलें चंद्रम्यासी ।
व्यभिचारोनि गुरुपत्नीसी । क्षयरोगी त्यासी मनें केलें ॥ ६५ ॥
व्यभिचारोनि गुरुपत्नीसी । क्षयरोगी त्यासी मनें केलें ॥ ६५ ॥
मनाचे नियमन करणारा चंद्र आहे. पण मनाने त्या चंद्राला छळिले. त्या चंद्राला मनानेच गुरुपत्नीशी व्यभिचार करावयास लावून त्याला क्षयरोगी बनविले ६५.
ब्रह्मा अधिष्ठाता बुद्धीसी । मन ब्रह्मयाची बुद्धि भ्रंशी ।
निजपुत्री वारितां त्यासी । स्वकन्येसी अभिलाषी ॥ ६६ ॥
निजपुत्री वारितां त्यासी । स्वकन्येसी अभिलाषी ॥ ६६ ॥
ब्रह्मदेव हा बुद्धीचा नियामक आहे. पण त्या ब्रह्मदेवाची बुद्धीही मनानेच भ्रष्ट केली, म्हणून त्याची कन्या त्याचे निवारण करीत असतांही ब्रह्मदेवाने त्या आपल्या कन्येचा अभिलाष केलाच ६६.
चित्तीं वासुदेवाचें अधिष्ठान । त्यातेंही हळूच ठकी मन ।
लावूनि वृंदेचें ध्यान । श्मशानीं जाण पाडिला ॥ ६७ ॥
लावूनि वृंदेचें ध्यान । श्मशानीं जाण पाडिला ॥ ६७ ॥
चित्तामध्ये वासुदेवाचे अधिष्ठान आहे. पण त्या वासुदेवालाही मनाने हळूच फसविले. त्याला वृंदेचें ध्यान लावून स्मशानांत पाडले ६७.
रुद्र अधिष्ठाता अहंकारीं । त्यातेंही मन सिंतरी ।
अभिलाषितां ऋषिनारी । शापिला ऋषीश्वरीं लिंगपातें ॥ ६८ ॥
अभिलाषितां ऋषिनारी । शापिला ऋषीश्वरीं लिंगपातें ॥ ६८ ॥
रुद्र (महादेव ) हा अहंकाराचा नियामक आहे. पण त्यालासुद्धा मनाने फसविले. त्याने ऋषिपत्नीचा अभिलाष केला असता त्या महर्षीने शाप देऊन त्याचा लिंगपात केला! ६८.
ऐसें देवां दुर्जय जें मन । त्यासी आवरी इतर कोण ।
म्हणाल इंद्रियें नियमितील मन । तरी मनाधीन इंद्रियें ॥ ६९ ॥
म्हणाल इंद्रियें नियमितील मन । तरी मनाधीन इंद्रियें ॥ ६९ ॥
असें देवांनासुद्धा जिंकण्याला कठीण जें मन, त्याला इतर कोण आवरणार ? आता तुम्ही म्हणाल की, इंद्रिये मनाचे नियमन करतील. पण ती इंद्रियेच मुळी मनाच्या आधीन असतात ६९.
जैं इंद्रियें धरोनि हातीं । मन एकाग्र होइजे अर्थीं ।
तेव्हा इतर इंद्रियाची स्थिती । राहे निश्चितीं सुनाट ॥ ६७० ॥
तेव्हा इतर इंद्रियाची स्थिती । राहे निश्चितीं सुनाट ॥ ६७० ॥
जेव्हां इंद्रियें स्वाधीन ठेवून मनच एकाद्या विषयांत एकाग्र होते, तेव्हा त्या ठिकाणी इतर इंद्रियांचे सामर्थ्य खरोखर निष्फळ होऊन राहाते ६७०.
इंद्रियविषयां होय संगती । ते काळीं जैं दुश्चिती मनोवृत्ती ।
तेव्हां न घडे विषयप्राप्ती । इंद्रियां स्फूर्ति स्फुरेना ॥ ७१ ॥
तेव्हां न घडे विषयप्राप्ती । इंद्रियां स्फूर्ति स्फुरेना ॥ ७१ ॥
इंद्रिये आणि विषय ह्यांचे ऐक्य झाले, आणि त्या वेळी जर मनाची वृत्ति बदलली, तर ते विषय भोगावयास मिळत नाहीत. कारण इंद्रियांना उपभोगाची स्फूर्तीच स्फुरत नाही ७१.
जेव्हा अनासक्त मनोधर्म । तेव्हां इंद्रियांचें न चले काम ।
मनाअधीन । इंद्रियग्राम । इंद्रियां मनोनेम कदा न घडे ॥ ७२ ॥
मनाअधीन । इंद्रियग्राम । इंद्रियां मनोनेम कदा न घडे ॥ ७२ ॥
मनाचे धर्मच जेव्हां आसक्तिरहित होऊन जातात, तेव्हां इंद्रियांची इच्छा कांहींच चालत नाही. कारण इंद्रियांचा सर्व समुदाय मनाच्या स्वाधीन असतो. म्हणून इंद्रियांकडून मनाचे नियमन कधीही घडत नाहीं ७२.
इंद्रियांचा राजा मन । इंद्रियें न चालती मनेंवीण ।
पुरुषातेंही मन आपण । वश्य जाण स्वयें करी ॥ ७३ ॥
पुरुषातेंही मन आपण । वश्य जाण स्वयें करी ॥ ७३ ॥
मन हे इंद्रियांचा राजा आहे. इंद्रियें मनाशिवाय चालत नाहीत. पुरुषालासुद्धा मन हे आपण स्वतः वश करिते ७३.
अतिबळियां बळी मन । तेथ इंद्रियें बापुडिं कोण ।
मनाचें करावया दमन । नव्हे आंगवण वरिष्ठां ॥ ७४ ॥
मनाचें करावया दमन । नव्हे आंगवण वरिष्ठां ॥ ७४ ॥
मन हें महान् बलाढ्यांतील बलाढ्य आहे. त्याच्यापुढे विचारी इंद्रिये ती काय ? मनाचे दमन करावयाला मोठमोठ्यांना सुद्धा धैर्य होत नाहीं ७४.
काळ निजसत्ता सर्व ग्रासी । परी मनाची लोंव नुपडे त्यासी ।
करितां उत्पत्तिस्थितिप्रळयांसी । मन काळासी नाटोपे ॥ ७५ ॥
करितां उत्पत्तिस्थितिप्रळयांसी । मन काळासी नाटोपे ॥ ७५ ॥
काळ हा आपल्या सामर्थ्याने सर्व भक्षण करितो, परंतु मनाचे एक रोमसुद्धा त्याच्यानें उपटवत नाही. उत्पत्ति, स्थिति व प्रळय करण्यांतही मन काळाला देखील आटपत नाहीं ७५.
शस्त्रें न तुटे सर्वथा मन । त्यासी विरवूं न शकेचि जीवन ।
मन जाळूं न शके दहन । मनातें गगन शून्य करूं न शके ॥ ७६ ॥
मन जाळूं न शके दहन । मनातें गगन शून्य करूं न शके ॥ ७६ ॥
मन हे शस्त्राने मुळीच तुटावयाचे नाही; पाणी देखील मनाला विरघळवू शकत नाहीं; अग्नीही मनाला जाळू शकत नाही; किंवा आकाश मनाला शून्यरूप करू शकत नाहीं ७६.
मनासी लागों न शके व्याधी । मन रोडेजे ऐशी नाहीं आधी ।
मन आकळावया सिद्धी । पाहतां त्रिशुद्धी दिसेना ॥ ७७ ॥
मन आकळावया सिद्धी । पाहतां त्रिशुद्धी दिसेना ॥ ७७ ॥
मनाला दुखणे लागू शकत नाहीं; मन रोडावेल असा कोणताही रोग नाही; मन ताब्यात ठेवता येण्यासारखी एकादी सिद्धि पाहूं गेलें असताही खरोखर कोठे दिसत नाहीं ७७.
मन ब्रह्मादिकांच्या रची कोडी । मन ब्रह्मांडें घडी मोडी ।
मन निजकल्पनाकडाडीं । नाचवी धांदडी त्रैलोक्या ॥ ७८ ॥
मन निजकल्पनाकडाडीं । नाचवी धांदडी त्रैलोक्या ॥ ७८ ॥
मन कोट्यवधि ब्रह्मदेव उत्पन्न करतें, मन ब्रह्मांडें उत्पन्न करते व ती नाहीशी करते; आणि मन आपल्या कल्पनेच्या कडकडाटाने सर्व त्रैलोक्याला जबरदस्तीने नाचविते ७८.
मन कळिकाळातें छळी । मन प्रळयानळातें गिळी ।
मन बळियांमाजीं अतिबळी । मनातें आकळी ऐसा नाहीं ॥ ७९ ॥
मन बळियांमाजीं अतिबळी । मनातें आकळी ऐसा नाहीं ॥ ७९ ॥
मन हें कळिकाळालासुद्धा छळते. मन हे प्रळयानळालाही गिळून टाकते. मन हे बलाढ्यांतील महाबलाढ्य आहे. मनाला ताब्यात ठेवील असा कोणी नाहीं ७९.
मन देवांसी दुर्धर । मन भयंकरां भयंकर ।
मनें आकळिले हरिहर । मनासमोर कोण राहे ॥ ६८० ॥
मनें आकळिले हरिहर । मनासमोर कोण राहे ॥ ६८० ॥
मन हे देवांनाही असह्य आहे. मन हे भयंकरांनाही भयंकर आहे. मनानें हरिहरांनासुद्धा ताब्यात ठेविले आहे. असल्या ह्या मनासमोर कोण टिकून राहील? ६८०.
मनाचा अनिवार मार । कोण राहे मनासमोर ।
मनास पर्जी ऐसा थोर । सुर नर असुर दिसेना ॥ ८१ ॥
मनास पर्जी ऐसा थोर । सुर नर असुर दिसेना ॥ ८१ ॥
मनाचा तडाखा निवारण करणे कठीण आहे. मनाच्या समोर 'कोण उभे राहणार ? मनाला जिंकील असा पराक्रमी देव, मानव, राक्षस, कोणी दिसत नाही ८१.
मनासी मेळवी हातोफळी । ऐसा त्रिलोकीं नाहीं बळी ।
मन कळिकाळातें आकळी । प्रळयरुद्रातें गिळी न माखतां दाढ ॥ ८२ ॥
मन कळिकाळातें आकळी । प्रळयरुद्रातें गिळी न माखतां दाढ ॥ ८२ ॥
मनाबरोबर दोन हात करील असा बलवान् त्रिभुवनांत नाही. मन हें कळिकाळालासुद्धा ताब्यात ठेवितें. प्रळयरुद्राला दाढेला न लावतांच गिळून टाकतें ८२.
ऐसा मनाचा अगाध भावो । यालागीं यातें म्हणिजे देवो ।
मनाचा भयानकां भेवो । यालागीं भीष्मदेवो मनातें म्हणती ॥ ८३ ॥
मनाचा भयानकां भेवो । यालागीं भीष्मदेवो मनातें म्हणती ॥ ८३ ॥
मनाचा महिमा असा अगाध आहे, म्हणूनच ह्याला 'देव' असे म्हणतात. भयंकरांनाही मनाचे भय वाटने, म्हणूनच मनाला 'भीष्मदेव' असें म्हणतात ८३.
ऐशी मनाची अनावर स्थिती । यासी आकळावयाची सवर्म युक्ती ।
साचार सांगेन तुम्हांप्रती । सावधानस्थिती अवधारा ॥ ८४ ॥
साचार सांगेन तुम्हांप्रती । सावधानस्थिती अवधारा ॥ ८४ ॥
अशी मनाची स्थिति मोठी अनावर आहे. ह्याला आटोक्यात आणण्याची युक्ति व तिचे धर्म तुम्हांला खरोखर सांगेन, सावधपणाने लक्ष देऊन श्रवण करा ८४.
जेवीं हिरेनि हिरा चिरिजे । तेंवी मनेंचि मन धरिजे ।
हेंही तैंचि गा लाहिजे । जैं गुरुकृपा पाविजे संपूर्ण स्वयें ॥ ८५ ॥
हेंही तैंचि गा लाहिजे । जैं गुरुकृपा पाविजे संपूर्ण स्वयें ॥ ८५ ॥
ज्याप्रमाणे हिऱ्यानेच हिरा कापतात, त्याप्रमाणे मनानेच मन आवरून धरावें. परंतु जेव्हां स्वतः पूर्णपणे गुरूची कृपा प्राप्त होते, तेव्हांच हेही प्राप्त होते ८५.
मन गुरुकृपेची आंदणी दासी । मन सदा भीतसे सद्गुरूसी ।
तें ठेवितां गुरुचरणापाशीं । दे साधकांसी संतोष ॥ ८६ ॥
तें ठेवितां गुरुचरणापाशीं । दे साधकांसी संतोष ॥ ८६ ॥
मन हे गुरुकृपेपाशी आंदण दिलेली दासी आहे. मन हे सद्गुरूला नेहमी भीत असते. ते गुरूच्या पायांपाशीच ठेवले असता साधकांना संतोष देतें ८६.
या मनाची एक उत्तम गती । जरी स्वयें लागलें परमार्थीं ।
तरी दासी करी चारी मुक्ती । दे बांधोनि हातीं परब्रह्म ॥ ८७ ॥
तरी दासी करी चारी मुक्ती । दे बांधोनि हातीं परब्रह्म ॥ ८७ ॥
ह्या मनाचा एक उत्तम गुण आहे. तो हा की, जर ते स्वतः परमार्थाकडे लागले, तर चारही मुक्तींना आपल्या दासी करून ठेविते, आणि परब्रह्मच बांधून हातांत देते ८७.
मनचि मनाचें द्योतक । मनचि मनाचें साधक ।
मनचि मनाचें बाधक । मनचि घातक मनासी ॥ ८८ ॥
मनचि मनाचें बाधक । मनचि घातक मनासी ॥ ८८ ॥
मन हेच मनाचे प्रकाशक आहे, मन हेच मनाचे साधक आहे, मन हेच मनाला बाधक आहे, आणि मन हेच मनाला घातक आहे ८८.
जेवीं वेळु वाढवी वेळुजाळी । वेळुवेळुवां कांचणीमेळीं ।
स्वयें पाडूनि इंगळी । समूळ जाळी आपण्यातें ॥ ८९ ॥
स्वयें पाडूनि इंगळी । समूळ जाळी आपण्यातें ॥ ८९ ॥
ज्याप्रमाणे वेळू आपले वेळवांचे बेट वाढवितो, आणि एक वेळू दुसऱ्या वेळूवर घांसला जात असतां आपणच विस्तवाची ठिणगी पाडून आपल्यालाच समूळ जाळून टाकतो ८९,
तेवीं मन मनासी चिंती मरण । तैं सद्गुरूसी रिघवी शरण ।
त्याचे वचनीं विश्वासोन । करवी गुरुभजन निरभिमानें ॥ ६९० ॥
त्याचे वचनीं विश्वासोन । करवी गुरुभजन निरभिमानें ॥ ६९० ॥
त्याप्रमाणेच मन हेंच मनाला मरण यावें असें चिंतील तेव्हांच ते सद्गुरूला शरण जावयास लाविते. आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवून निरभिमानपणाने गुरुभजन करविते ६९०.
सद्गुरुकृपा झालियां संपूर्ण । हें मनचि मनासी दावी खूण ।
तेणें निजसुखें सुखावोन । मनचि प्रसन्न मनासी होय ॥ ९१ ॥
तेणें निजसुखें सुखावोन । मनचि प्रसन्न मनासी होय ॥ ९१ ॥
पूर्ण सदुरुकृपा झाल्यावर हे मनच मनाला खूण दाखवून देते, आणि आपल्या सुखाने सुखी होऊन मनच मनावर प्रसन्न होते ९१.
मन मनासी झालिया प्रसन्न । तेव्हां वृत्ति होय निरभिमान ।
ऐसें साधकां निजसमाधान । मनें आपण साधिजे ॥ ९२ ॥
ऐसें साधकां निजसमाधान । मनें आपण साधिजे ॥ ९२ ॥
मनच मनावर प्रसन्न झाले असतां वृत्ति निरभिमान होते. याप्रमाणे मनाने आपणच साधकांना निजसमाधान साधून दिलें असें होतें ९२.
पावोनि गुरुकृपेची गोडी । मनोविजयाची निजगुढी ।
मनें उभवूनि लवडसवडी । दीजे रोकडी साधकांहातीं ॥ ९३ ॥
मनें उभवूनि लवडसवडी । दीजे रोकडी साधकांहातीं ॥ ९३ ॥
गुरुकृपेची गोडी लागल्यावर आपल्या मनोजयाची गुढी त्वरित उभी करून मनच ती प्रत्यक्ष साधकाच्या हातात देते ९३.
यापरी साधकांसी संपूर्ण । मन आपला विजयो दे आपण ।
शेखीं सद्गुरुनिजबोधीं पूर्ण । मन होय लीन निजात्मता ॥ ९४ ॥
शेखीं सद्गुरुनिजबोधीं पूर्ण । मन होय लीन निजात्मता ॥ ९४ ॥
याप्रमाणे साधकाला मन हेच आपला आपण पूर्णपणे जय करून देते, आणि शेवटी सद्गुरूच्या आत्मज्ञानांत मन हेच आत्मस्वरूपाने पूर्णपणे लीन होते ९४.
जेवीं कां सैंधवाचा खडा । रिघोनि सिंधूमाजिवडा ।
स्वयें विरोनियां रोकडा । सिंधूएवढा तो होय ॥ ९५ ॥
स्वयें विरोनियां रोकडा । सिंधूएवढा तो होय ॥ ९५ ॥
ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्राच्या पाण्यात शिरून स्वतः प्रत्यक्ष विरून जाऊन समुद्राएवढाच होतो ९५,
यापरी साधक जाण । होतांच निरभिमान ।
स्वयें होती ब्रह्म पूर्ण । मीतूंपण गिळोनी ॥ ९६ ॥
स्वयें होती ब्रह्म पूर्ण । मीतूंपण गिळोनी ॥ ९६ ॥
त्याप्रमाणे साधकही निरभिमानी होतांच मीतूंपण नष्ट करून स्वतः पूर्णब्रह्म होतात हे लक्षात ठेव ९६.
मग त्याचिया निजदृष्टी । मीचि एक अवघे सृष्टीं ।
मावळली द्वंद्वत्रिपुटी । सुखदुःख पाठीं लागेना ॥ ९७ ॥
मावळली द्वंद्वत्रिपुटी । सुखदुःख पाठीं लागेना ॥ ९७ ॥
मग त्याच्या आत्मदृष्टीला सर्व सृष्टीत मीच काय तो एक भरलेला आहे असे दिसू लागते, द्वंद्वाची त्रिपुटी नाहीशी होते, आणि सुखदुःख पाठीला लागत नाहीं ९७.
तेथे कैंचें सुख कैंचें दुःख । कैंचा बंध कैंचा मोक्ष ।
कोण पंडित कोण मूर्ख । ब्रह्म एक एकलें ॥ ९८ ॥
कोण पंडित कोण मूर्ख । ब्रह्म एक एकलें ॥ ९८ ॥
तेथे कसले सुख आणि कसले दुःख ? कसला बंध आणि कसला मोक्ष ? पंडित कोण आणि मूर्ख कोण ? सर्वत्र एकटें एक ब्रह्मच ९८.
तेथ कोण देव कोण भक्त । कोण शांत कोण अशांत ।
मावळलें द्वैताद्वैत । वस्तु सदोदित स्वानंदें ॥ ९९ ॥
मावळलें द्वैताद्वैत । वस्तु सदोदित स्वानंदें ॥ ९९ ॥
तेथें देव कोण आणि भक्त कोण? शांत कोण आणि अशांत कोण ? द्वैत-अद्वैत लयास जाते, आणि एक परब्रह्मच सदोदित स्वानंदरूपाने राहते ९९.
तेथ उगाणलें क्रियाकर्म । लाजा विराले धर्माधर्म ।
कैंचें अधम उत्तम मध्यम । परिपूर्ण ब्रह्म कोंदलें ॥ ७०० ॥
कैंचें अधम उत्तम मध्यम । परिपूर्ण ब्रह्म कोंदलें ॥ ७०० ॥
तेथें क्रिया आणि कर्म नाहीशी होतान ; धर्म आणि अधर्म लज्जेनेच नष्ट होतात ; तेथे कनिष्ठ, उत्तम, मध्यम तरी कसले ? परिपूर्ण ब्रह्मच सर्वत्र भरून राहाते ७००.
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या १ ते १००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या १0१ ते २००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या २०१ ते ३००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ३०१ ते ४००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ४०१ ते ५००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ५०१ ते ६००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ६०१ ते ७००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ७०१ ते ८००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ८०१ ते ९००
एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या ९०१ ते १००४
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...