मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २३ ओव्या १ ते १००

    श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

    ॐ नमो सद्‌गुरु विश्वरूप । विश्वा साबाह्य तूं चित्स्वरूप ।
    तुझें निर्धारितां रूप । तूं अरूप‌अव्यय ॥ १ ॥
    हे ओंकाररूप विश्वरूपा सद्गुरो ! तुला नमस्कार असो. तूं ज्ञानस्वरूप असून विश्वाच्या आतबाहेर तूंच भरलेला आहेस. तुझ्या स्वरूपाचा विचार केला तर, तूं निर्गुण असून अव्ययच आहेस १.


    चराचर जें सावेव । तें तुज अरूपाचे अवेव ।
    जीवशिव हे तुझी माव । अद्वयवैभव पै तुझें ॥ २ ॥
    हें  जें मूर्तिमंत चराचर आहे; ते तुझ्या निर्गुणस्वरूपाचे अवयव आहेत. जीव आणि शिव ही तुझी माया आहे. अद्वैत हेच तुझे खरे वैभव होय २.


    घृतपुतळी दिसे साकार । घृतपणें ते निराकार ।
    तैसा तूं अव्यय अक्षर । जगदाकार भाससी ॥ ३ ॥
    तुपाची बाहुली साकार दिसते, पण केवळ तूप म्हणूनच तिच्याकडे पाहिले तर ती निराकारच आहे. त्याप्रमाणे तूं अविनाशी व अविकारी असूनही जगाच्या आकाराने भासमान होतोस ३.


    ठसावलें जें दिसे जग । निर्धारितां तुझें अंग ।
    अंग पाहतां तूं अनंग । अनंगाचा माग तुजमाजीं नाहीं ॥ ४ ॥
    हा जो जगाचा ठसा उमटलेला दिसतो, त्याचा विचार केला तर ते तुझेच स्वरूप आहे, आणि तुझे अंग पहावे तर तूं अनंगच आहेस. पण त्या अनंगाचा (म्हणजे कामाचा) तुझ्यामध्ये स्पर्शही नाहीं ४. 


    देखिजे तें तूं नव्हसी । नव्हे तें तूंचि होसी ।
    होणें न होणें नाहीं तुजपाशीं । ऐसा तूं जगासी जगद्‌गुरु ॥ ५ ॥
    जे काही दृष्टीला दिसते, तें तूं नव्हेस. जे दिसत नाही, तें तूं आहेस. होणें न होणे तुझ्यापाशी नाही. असा तूं जगाचा जगद्गुरु आहेस ५.


    शब्द तुजहोनियां दूरी । तूं शब्द सबाह्य अंतरीं ।
    बोलका तूं चराचरीं । वेदशास्त्रीं तूं वक्ता ॥ ६ ॥
    शब्द हा तुझ्याहून दूर आहे. पण शब्दाच्या अंतर्बाह्य  तूंच आहेस. चराचरांमध्ये बोलणारा तूंच, आणि वेदशास्त्रांचा वक्ताही तूंच ६.


    उंसापासून गोडी दिसे । उंसा सबाह्य गोडीचि असे ।
    गोडियेमाजीं ऊंस नसे । वेदांसी तुज तैसें सौजन्य ॥ ७ ॥
    उसापासून गोडी निघालेली दिसते. उसाच्या आंतबाहेर गोडीच असते, पण गोडीमध्ये काही ऊस असत नाही. तुझें आणि वेदांचे नाते तसेंच आहे ७. 


    वेदांचा वक्ता तूंचि होसी । वेदीं प्रतिपादिजे तुम्हांसी ।
    शेखीं वेदांसी नाकळसी । निःशब्दवासी गुरुराया ॥ ८ ॥
    वेदांचा वक्ता तूंच आहेस, आणि वेदांमध्ये तुझेंच प्रतिपादन केलेले आहे. हे गुरुराया ! तूं निःशब्दांतच राहणारा असल्यामुळे शेवटी वेदांनाही तूं आकलन होत नाहींस ८.


    जेवीं कां निःशब्द अनाहतध्वनी । असे ध्वनिमात्रीं मिळूनी ।
    तो अनाहत वाजविजे जनीं । ऐसें नाहीं कोणी वाजंत्र ॥ ९ ॥
    ज्याप्रमाणे अनाहतध्वनि हा निःशब्द असून प्रत्येक ध्वनीशी मिळूनच असतो, पण तोच अनाहत ( वाद्यावर आघात केल्यावांचून उमटणारा ध्वनि) वाजवील असे कोणतेच वाजंत्र जगामध्ये नाही ९.


    तेवीं तूं वेदाचा वक्ता । सकळ शास्त्रां युक्तिदाता ।
    परी वेदशास्त्रार्थसंमता । तुज तत्त्वतां न बोलवे ॥ १० ॥
    त्याप्रमाणे तू  सर्व वेदांचा वक्ता आहेस, सर्व शास्त्रांना युक्ति शिकविणारा आहेस, पण वेदशास्त्रार्थाला संमत अशा तुझें वर्णन खरोखर करवत नाही १०. 


    म्हणों तूं केवळ निःशब्द । तंव निःशब्द आणि सशब्द ।
    हाही मायिक अनुवाद । तूं एवंविध न कळसी ॥ ११ ॥
    म्हणून तूं  निखालस निःशब्द आहेस असें म्हणावें, तर निःशब्द आणि सशब्द असे म्हणणे ही मायीकच आहे. तात्पर्य, तुझे स्वरूप कळतच नाहीं.तुझें स्वरूप खरोखर कळतच नाही ११. 


    तूं न कळसीचि तत्त्वतां । ऐशीया युक्तींचा तूंचि विज्ञाता ।
    ज्ञाताचि हें जंव स्थापूं जातां । तंव अज्ञानता असेना ॥ १२ ॥
    पण या विचारांचाही ज्ञाता तूंच आहेस. पण असा तूं ज्ञाताच आहेस असे सिद्ध करावयास जावें, तर मग अज्ञानपणा उरत  नाही १२.


    जेथ अज्ञानता नाहीं । तेथ ज्ञातेपण कैंचे कायी ।
    हो कां मुख्यत्वें नोवरी नाहीं । तैं नोवरी पाहीं म्हणे कोण ॥ १३ ॥
    मग अज्ञानपणाच जेथे नाही, तेथे ज्ञातेपण कोठे आणि कशाचें ? अहो ! आधी नवरीच नसली, तर नवरा पहा असें तरी म्हणणार कोण ? १३.


    ज्ञाता ना अज्ञाता । तूं बोलता ना नबोलता ।
    तूं बहु ना एकुलता । तुझी अलक्ष्यता लक्षेना ॥ १४ ॥
    तूं ज्ञानी नव्हेस. आणि अज्ञानीही नव्हेस. तूं बोलणाराही नव्हेस आणि न बोलणाराही नव्हेस. तूं अनेकही नव्हेस आणि एकही नव्हेस. तुझ्या अतर्क्य स्वरूपाविषयीं तर्कच चालत नाही १४.


    तूं निःशब्द निर्विकार । तू निर्गुण निरहंकार ।
    हेंही म्हणतां पडे विचार । तूं जगदाकार जगदात्मा ॥ १५ ॥
    तूं शब्दातीत आहेस, विकारातीत आहेस, तूं निर्गुण आहेस, तू  निरहंकार आहेस, असे म्हटले तरीसुद्धा विचारच पडतो. कारण, जगदाकार व जगदात्मा तो तूंच १५.


    जगदाकारें तूं प्रसिद्ध । तेथ कोणाचें कोणा बाधे द्वंद्व ।
    पर नाहीं मा परापराध । अतिविरुद्ध कोणासी ॥ १६ ॥
    साऱ्या जगताच्या आकाराने प्रसिद्ध असणारा तूंच, तेव्हां कोणाचें द्वंद्व कोणाला बाधणार? दुसराच नाहीं असें झालें, मग दुसऱ्याचे अपराध अतिशय विरुद्ध असे वाटणार कोणाला १६? 


    यापरी सद्‌गुरुनाथा । तुझे चरणीं द्वंद्वसमता ।
    तेणें समसाम्यें निजकथा । श्रीभगवता चालविसी ॥ १७ ॥
    हे सद्गुरुनाथा! अशा प्रकारे तुझ्या चरणाच्या ठिकाणी द्वंद्वांची एकवाक्यता झाल्यामुळेच त्या ऐक्यभावनेनें, आपलीच कथा जी श्रीभागवत, ती चालवितोस १७.


    तेंचि श्रीभागवतीं । बाविसावे अध्यायाअंतीं ।
    उद्धवें पुशिलें निजशांती । द्वंद्वसमाप्तिउपावो ॥ १८ ॥
    त्याच श्रीभागवतांतील बाविसाव्या अध्यायाच्या शेवटी, उद्धवाने आपल्याला शांति कशी प्राप्त होईल व ही द्वंद्वे कशी मोडतील ह्याचा उपाय विचारला १८.


    उद्धवें प्रश्न केला वाड । जेणें ब्रह्मज्ञानाची पुरे चाड ।
    तो श्रीशुकासी लागला गोड । तेणें पुरे कोड परीक्षितीचें ॥ १९ ॥
    ज्याच्या योगाने ब्रह्मज्ञानाची इच्छा पूर्ण होईल असा उद्धवाने हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला. श्रीशुकाचार्यांना तर तो प्रश्न फारच आवडला ! आणि तेणेकरून परीक्षिति राजाची इच्छाही पूर्ण झाली १९.


    ऐकोनि उद्धवाची प्रश्नोक्ती । शुक सुखावला आनंदस्फूर्ती ।
    तो म्हणे सावध परीक्षिती । तुष्टला श्रीपती उद्धवासी ॥ २० ॥
    उद्ध्वाचा हा प्रश्न ऐकून शुकाचार्य आनंदाने डुलू लागले, आणि परीक्षितीला म्हणाले, राजा ! सावध हो. उद्धवावर श्रीभगवान् प्रसन्न झाले २०.


    ब्रह्मज्ञानाची निर्वाणस्थिती । ते जाण पां मुख्यत्वें शांती ।
    ते उद्धवें पुशिली अतिप्रीतीं । तेणें श्रीपती संतोषला ॥ २१ ॥
    ब्रह्मज्ञानाची अखेरची स्थिति म्हणजेच मुख्यत्वेकरून शांति होय. तीच अत्यंत प्रेमाने उद्धवाने विचारली, त्यामुळे श्रीकृष्णालाही संतोष झाला २१.


    तो शांति आणि निवृत्ती । सांगेल चौं अध्यायोक्ती ।
    ऐक राया परिक्षीती । ते मी तुजप्रती सांगेन ॥ २२ ॥
    ह्याकरितां शांति आणि निवृत्ति ह्यांचेच निरूपण तो आतां चार अध्यायांत करील. हे राजा परिक्षिति ! तेच तुला मी सांगतों २२.


    ऐकें पांडवकुलदीपका । कौरवकुळीं कुलतिलका ।
    तूं शांतीसी अधिकारी निका । निजात्मसुखा साधकू ॥ २३ ॥
    हे पांडवकुलदीपका! हे कौरवकुलांतील कुलतिलका ! ऐक. तूं आत्मसुखाचा साधक आहेस म्हणून खरोखर शांतीचा अधिकारी तूंच आहेस २३.


    साधावया ब्रह्मप्राप्ती । तूं त्यक्तोदक श्रवणार्थीं ।
    यालागीं शांती आणि निवृत्ती । ऐक नृपती हरि सांगे ॥ २४ ॥
    ब्रह्मप्राप्ति  साध्य करण्याकरितां तूं जलपानही सोडून भगवत्कथाश्रवणाला बसला आहेस. याकरितां हे सज्जना ! श्रीकृष्णांनी सांगितलेली शांति आणि निवृत्ति ऐक २४.


    तेविसावे अध्यायीं निरूपण । दुर्जनीं क्षोभविलें मन ।
    त्या मनासी ये क्षमा पूर्ण । तेंचि श्रीकृष्ण सांगेल ॥ २५ ॥
    तेविसाव्या अध्यायांतील विषय असा आहे की, दुर्जनांनी जर मन क्षुब्ध केले, तर त्या मनाला पूर्णपणे क्षमा प्राप्त होईल असा मार्ग श्रीकृष्ण सांगतील २५.


    भिक्षुगीतसंरक्षण । तें मनोजयाचें लक्षण ।
    प्रकृतिजयाचें निरूपण । सांगेल संपूर्ण चोविसावा ॥ २६ ॥
    भिक्षुमीताचे संरक्षण म्हणजेच मनोजयाचे लक्षण होय. आणि प्रकृतिजय कसा करावा हे सारें निरूपण चोविसाव्या अध्यायांत सांगितले आहे २६.


    सांगोनि त्रिविध त्रिगुण । परी लक्षविलें निजनिर्गुण ।
    हें गुण्जयाचें निरूपण सुलक्षण पंचविसावा ॥ २७ ॥
    तीन प्रकारचे तीन गुण सांगून त्यांत आपण निर्गुण असल्याचे दाखविले आहे, हेच गुणजयाचें उत्तम निरूपण, तोच पंचविसावा अध्याय होय २७.


    सव्विसावा अध्यावो येथ । तो धडधडीत विरक्त ।
    सांगोनियां ऐलगीत । स्त्रियादि सम्स्त विषयत्यागु ॥ २८ ॥
    आता यांत सव्वीसावा अध्याय 'जो आहे, तो धडधडीत विरक्तीचा आहे. त्यांत बुधापासून इलेच्या ठिकाणी झालेला जो ऐल-पुरुरवा, त्यांचे गीत सांगून स्त्रियादिक सर्व विषयांचा त्याग सांगितला आहे २८.


    गुण विषय प्रकृति मन । या चहूंचें समाधान ।
    चहूं अध्यायीं विशद जाण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगेल ॥ २९ ॥
    गुण, विषय, प्रकृति आणि मन या चारांचे समाधान श्रीकृष्ण आपल्या मुखाने चार अध्यायांत सांगतील २९.


    यापरी परीक्षितीस जाण । करोनियां सावधान ।
    श्रीशुकयोगींद्र आपण । कथालक्षण निरूपी ॥ ३० ॥
    याप्रमाणे परीक्षिति राजाला सावध करून श्रीशुकयोगींद्र कथेचे निरूपण करूं लागला ३०.


    बादरायणीरुवाच-
    स एवमाशंसित उद्धवेन भागवतमुख्येन दशार्हमुख्य ।
    सभाजयन् भृत्यवचो मुकुन्दस्तमाबभाषे श्रवणीयवीर्यः ॥ १ ॥
    [श्लोक १] श्रीशुक म्हणतात ज्यांचे पराक्रम श्रवण करण्यायोग्य आहेत, अशा यदुश्रेष्ठ मुकुंदांना परम भगवद्‌भक्त उद्धवाने जेव्हा अशी प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी आपल्या सेवकाच्या प्रश्नाची प्रशंसा करून त्याला म्हटले. (१)


    शुक म्हणे परीक्षिती । ऐकोनि उद्धवाची विनंती ।
    वचनें संतोषला श्रीपती । तो उद्धवाप्रती संबोधी ॥ ३१ ॥
    शुकाचार्य म्हणाले, हे परीक्षिति! ही उद्धवाची विनंती ऐकून त्याच्या भाषणाने श्रीकृष्णाला संतोष झाला आणि तो उद्ध्वाला पुढे उपदेश करूं लागला ३१.


    कोटी जन्मांतीं केवळ । द्विजत्वें पाविजे सत्कुळ ।
    हें माहापुण्याचें निजफळ । तेंचि निष्फळ हरिभक्तीविणें ॥ ३२ ॥
    कोट्यावधि जन्म जावेत, तेव्हांच शेवटी ब्राह्मणांच्या उत्तम कुलांत जन्म होतो. तें महापुण्याचे फळ आहे. परंतु हरिभक्ति नसेल तर तेही निष्फळच होय ३२.


    सदा सफळ आंब्याचा रुख । त्यावरी उपजे कांवरुख ।
    तो सफळींही निष्फळ देख । तैसे उत्तम लोक भजनेंवीण ॥ ३३ ॥
    आंब्याचा एकादा वृक्ष सदासर्वदा फलद्रूप होणाराच असतो, पण त्यावरच जर बांडगूळ उगवले, तर तो फलद्रूप असलेला वृक्षही निष्फळं  होतो. त्याप्रमाणे उत्तम लोकही भजनाशिवाय व्यर्थ होतात ३३.


    ते स्थिति नाहीं उद्धवापासीं । उत्तम जन्म यादववंशीं ।
    सभासदता आल्याही हातासी । श्रीमदासी भुलेचिना ॥ ३४ ॥
    पण उद्धवाची मात्र तशी गोष्ट नव्हती. तो यादवांच्या उत्तम वंशांत जन्मास येऊन श्रेष्ठता हाती येऊनही संपत्तीच्या मदाने भुललाच नाही ३४.


    झालियाही राज्यसंपत्ती । जो विसंबेना भगवद्भक्ती ।
    भागवतमुख्यत्वाची प्राप्ती । त्यासीच निश्चितीं महाराजा ॥ ३५ ॥
    हे महाराजा ! राज्यवैभव प्राप्त झाले असतांही जो भगवद्भक्तीला विसंबत नाही, त्यालाच भगवद्भक्तांमध्ये श्रेष्ठपणाचा लाभ खरोखर होतो ३५.


    सगुण सुंदर पतिव्रता । अनुकूळ मिळालिया कांता ।
    जो विसंबेना भगवत्पथा । भागवतमुख्यता त्या नांव ॥ ३६ ॥
    सद्गुणी, सुंदर व पतिव्रता स्त्री अनुकूल अशी मिळाली असतांही जो भक्तिमार्ग सोडीत नाही, त्याचंच नांव श्रेष्ठभगवत्भक्त  ३६.


    इंहीं गुणीं अतियुक्त । विवेकेंसी अतिविरक्त ।
    श्रीकृष्णचरणीं अनुरक्त । मुख्य भागवत उद्धवू ॥ ३७ ॥
    उद्धव तर हा गुणांनी परिपूर्ण भरलेला होता. विचाराने तर तो अत्यंत विरक्त होता. आणि श्रीकृष्णाच्या चरणी तर तो अत्यंत अनुरत होता. म्हणून उद्धव हाच श्रेष्ठ भगवद्भक्त होय ३७.


    वयें धनें जें श्रेष्ठपण । तें श्रेष्ठत्व अतिगौण ।
    भगवत्प्राप्ती ते श्रेष्ठ जाण । तेणें भाग्यें परिपूर्ण उद्धवू ॥ ३८ ॥
    वयाने व संपत्तीनें जो थोरपणा येतो, तो थोरपणा अत्यंत गौण समजला पाहिजे. कारण भगवत्प्राप्ति हीच सर्वात श्रेष्ठ होय असे समज. त्याच वैभवानें उद्धव हा परिपूर्ण होता ३८.


    जो श्रीकृष्णाचा विश्वासी । श्रीकृष्ण एकांत करी ज्यासी ।
    गुण ज्ञान सांगे ज्यापाशीं । त्याच्या भाग्यासी केवीं वानूं ॥ ३९ ॥
    तो श्रीकृष्णाचा अत्यंत विश्वासू होता. श्रीकृष्ण ज्याच्याशी एकांत करीत असे, ज्याच्याजवळ गुह्मज्ञान सांगत असे, त्याच्या भाग्याचे वर्णन काय करावें ? ३९, 


    परब्रह्म जें कां साक्षात । जें उद्धवासी झालें हस्तगत ।
    त्याच्या बोलामाजीं वर्तत । भाग्यें भाग्यवंत तो एक ॥ ४० ॥
    साक्षात जें परब्रह्म, तेंच मुळी उद्धवाला हस्तगत झाले होते. इतकेच नव्हे, तो परब्रह्मरूपी श्रीकृष्ण त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागत असे. म्हणून भाग्यशालीपणाने खरा भाग्यवंत असा एक तोच होय ४०.


    उद्धवभाग्य वानित वानित । शुक झाला सद्गदित ।
    स्वानंदें वोसंडला तेथ । ठेला तटस्थ महासुखें ॥ ४१ ॥
    अशा प्रकारे उद्धवाच्या भाग्याचे वर्णन करीत करीत शुक्राचार्य सद्गदित झाला. त्याच्या अंत:करणाला आनंदाने इतकें भरते आले की, तो त्या भरांत तटस्थ बसून राहिला ४१.


    उद्धवभाग्याचा उद्रेक । सांगतां वोसंडला श्रीशुक ।
    तें देखोनि कुरुनायक । जाहला आत्यंतिक विस्मित ॥ ४२ ॥
    अशा प्रकारे उद्धवाच्या भाग्याचा उत्कर्ष वर्णन करतांना श्रीशुक गहिवरला हे पाहून परीक्षिति राजालाही फार आश्चर्य वाटले ४२.


    ज्याचें निजभाग्य सांगतां । श्रीशुकासी होतसे अवस्था ।
    उद्धव भाग्याचा तत्त्वतां । मजही सर्वथा मानला ॥ ४३ ॥
    तो मनात म्हणाला, ज्याचे भाग्य सांगतां सांगतां शुकाचार्यांनासुद्धा गहिवर आला, तो उद्धव खरोखरीच भाग्यवान  होय. मलाही तो सर्वतोपरी पूज्यच आहे ४३.


    तंव शुक म्हणे रायासी । परम भाग्य तें उद्धवासीं ।
    तेणें विनवितां हृषीकेशी । वचनमात्रेंसीं तुष्टला ॥ ४४ ॥
    इतक्यांत शुकाचार्य राजास म्हणाले, राजा त्या उद्धवाचे भाग्य अत्यंत अलौकिक खरें. त्याने विनंती करतांच त्या भाषणाने श्रीकृष्ण संतुष्ट झाला ४४.


    उद्धवासी शांतीची चाड । तो प्रश्न श्रीकृष्णांसी झाला गोड ।
    त्यांचे पुरवावया कोड । निरूपण वाड सांगेल ॥ ४५ ॥
    उद्धवाला शांतीचीच इच्छा होती व तोच प्रश्न श्रीकृष्णालाही फार आवडला; म्हणून त्याचा हेतु पूर्ण करण्यासाठीच आतां तो त्याचे विस्तृत निरूपण करील ४५.


    परम शांतीचा अधिकारी । तूंचि एक निजनिर्धारीं ।
    ऐसें उद्धवप्रेमपुरस्करीं । शांति श्रीहरि सांगत ॥ ४६ ॥
    खरोखर विचार केला तर त्या श्रेष्ठ शांतीचा अधिकारी एक तूंच आहेस, असें उद्धवाला प्रेमपुरस्सर म्हणून श्रीकृष्ण सांगू लागले ४६.


    श्रीभगवानुवाच-
    बार्हस्पत्य स वै नात्र साधुर्वै दुर्जनेरितैः ।
    दुरुक्तैर्भिन्नमात्मानं यः समाधातुमीश्वरः ॥ २ ॥
    [श्लोक २] भगवान श्रीकृष्ण म्हणाले - हे बृहस्पतिशिष्या ! दुर्जनांच्या कटुवाणीच्या आघाताने घरे पडलेल्या मनाला सांभाळू शकणारा सत्पुरूष या जगात सहसा सापडत नाही. (२)


    उद्धवा तू जें बोलिलासी । मीही सत्य मानीं त्यासी ।
    दुर्जनीं केल्या अपमानासी । सहावया कोणासी शांति नाहीं ॥ ४७ ॥
    उद्धवा! तूं जे बोललास तें मीही खरेंच समजतो. दुर्जनांनी अपमान केला असतां तो सहन करण्याइतकी शांति कोणालाच नसते ४७.


    देव पादुका वाहती शिरसीं । मुख्य इंद्र लागे ज्याच्या पायांसीं ।
    अष्ट महासिद्धि ज्याच्या दासी । ब्रह्मज्ञान ज्यपाशीं वचनांकित ॥ ४८ ॥
    देवही ज्याच्या पादुका मस्तकावर वाहातात, मुख्य इंद्रही ज्याच्या पायीं लागतो, अष्ट महासिद्धि ज्याच्या दासी होऊन राहिल्या आहेत, आणि ब्रह्मज्ञान ज्याच्या अंकित होऊन राहिले आहे ४८, 


    ऐसा देवगुरु बृहस्पती । त्याचा शिष्य तूं विवेकमूर्ती ।
    यालागीं शांतीच्या साधक युक्तीं । तूंचि निश्चितीं जाणसी ॥ ४९ ॥
    असा जो देवांचा गुरु बृहस्पति, त्याचा तूं शिष्य साक्षात विवेकाची मूर्तीच आहेस. म्हणून शांति साध्य होण्याचे जे उपाय आहेत ते खरोखर तुलाच समजतील ४९.


    शांति आकळावया उद्धवासी । आदरें सत्कारी हृषीकेशी ।
    अनुमोदूनि त्याचे बोलासी । शुद्ध शांतीसी हरि सांगे ॥ ५० ॥
    उद्धवाला शांतीचे रहस्य कळावे म्हणून श्रीकृष्णांनी आदराने त्याचा मोठा गौरव केला, आणि त्याच्याच भाषणाला अनुमोदन देऊन श्रीकृष्ण शुद्ध शांतीचे स्वरूप सांगू लागले ५०.


    निंदा अवज्ञा हेळण । दुर्जनीं केलिया अपमान ।
    हें साहे तो ईश्वर जाण । निजबोधें पूर्ण तो मद्रूप ॥ ५१ ॥
    निंदा, अवज्ञा, उपहास इत्यादि मार्गानी दुर्जनांनी केलेला अपमान जो सहन करील, तो साक्षात् ईश्वरच होय, हे लक्षात ठेव. तो आत्मज्ञानाने पूर्ण मद्रूपच  झालेला असतो ५१.


    ज्यासी सर्वभूतीं निजात्मता । दृढ बाणलीसे तत्त्वतां ।
    तो दुर्जनाचिया आघाता । साहे सर्वथा यथासुखें ॥ ५२ ॥
    प्राणिमात्राच्या ठिकाणी आत्मस्वरूपच पाहणें हें  ज्याला खरोखर पूर्णपणे पटले आहे, तो दुर्जनाच्या आघातालाही मोठ्या आनंदाने सहन करतो ५२.


    जो स्वयें होय अवघें जग । त्यासी लागतां उपद्रव अनेग ।
    उठेना क्रोधाची लगबग । साहे अनुद्वेग यथासुखें ॥ ५३ ॥
    जो स्वत:च सारे जग बनून राहतो, त्याला कितीही उपद्रव लागले तरी क्रोधाची उसळी येतच नाही. तो मुळीच उद्विग्न न होता ते उपद्रव आनंदाने सहन करितो ५३.


    निजांगीं लागतां निजकर । नुठी क्रोधद्वेषांचा उद्गार ।
    निजात्मता जो देखे चराचर । शांति त्याचें घर स्वयें रिघे ॥ ५४ ॥
    आपलाच हात आपल्या अंगाला लागला तर रागाचा किंवा द्वेषाचा शब्द आपल्या तोंडांतून निघत नाही, त्याप्रमाणेच चराचराला जो आत्मस्वरूपानेच पहातो, त्याच्या घरांत शांति ही आपण होऊनच शिरते ५४.


    उद्धवा ऐसा ज्यासी निजबोधू । त्यासी म्हणिजे सत्य साधू ।
    तोचि साहे पराचा अपराधू । शांतिशुद्ध तो एक ॥ ५५ ॥
    उद्धवा ! असे ज्याला आत्मज्ञान झाले असेल, त्यालाच खराखरा साधु म्हणावा. तोच दुसऱ्याचा अपराध सहन करतो. तोच एक शांतीच्या योगाने पवित्र झालेला असतो ५५.


    नेणोनियां निजबोधातें । इतर जे सज्ञान ज्ञाते ।
    ते न साहती द्वंद्वातें । एक तूतें सांगेन ॥ ५६ ॥
    हे आत्मज्ञान ज्यांना समजत नाही, असे जे दुसरे ज्ञानसंपन्न  विद्वान् असतात, ते ही द्वंद्वे सहन करू शकत नाहीत तेही तुला सांगतों ऐक ५६.


    न तथा तप्यते विद्ध पुमान्बाणैः सुमर्मगैः ।
    यथा तुदन्ति मर्मस्था ह्यसतां परुषेषवः ॥ ३ ॥
    [श्लोक  ३] माणसाच्या हृदयाला जेवढी पीडा दुष्टांच्या मर्मभेदी कठोर वाग्बाणांनी होते, तेवढी मर्मभेदी बाणांनीही होत नाही. (३)


    तिख्याचे अतितिख बाण । जेणें घायें होती विकळ प्राण ।
    त्याहूनि दुर्जनाचे वाग्बाण । अधिक जाण रुपती ॥ ५७ ॥
    पोलादाचे अत्यंत तीक्ष्ण बाण असतात, त्यांच्या ज्या घायाने प्राण अगदी विव्हळ होतात त्यांहून दुर्जनांचे वाग्बाण शरीरांत खोल जाऊन रुतून बसतात ५७.


    लोहाचे बाण जेथ लागती । तेचि अंगें व्यथित होती ।
    परी वाग्बाणांची अधिक शक्ती । घायें भेदिती पूर्वज ॥ ५८ ॥
    लोखंडाचे बाण शरीरावर जेथे लागतात तेवढ्याच अवयवाने जखमी मनुष्य विव्हळ होतो. पण वाग्बाणांचें सामर्थ्य त्याहून अधिक आहे. त्यांच्या प्रहाराने पूर्वजही जखमी होतात ५८.


    लोहबाणाचे लागलिया घाये । ते पानपाल्या व्यथा जाये ।
    परी वाग्बाण रुपल्या पाहें । तें शल्य राहे जन्मांत ॥ ५९ ॥
    लोखंडाच्या बाणाची जखम झाली तर ती जखम झाडपाला लावल्याने बरी होते, पण वाग्बाण एकदा रुतून बसले की त्यांचे शल्य जन्मभर टोचत राहते ५९.


    वर्मस्पर्शाचें बासटें जाण । विंधितां निंदेचे वाग्बाण ।
    तेणें भेदितांचि अंतःकरण । सर्वांगीं पूर्ण भडका उठी ॥ ६० ॥
    वर्में बाहेर काढण्याच्या विषारी भावनेने माखलेले निंदेचे वाग्बाण शरीरांत घुसले व त्यांनी अंत:करणाचा भेद केला, की सर्व आंगभर आगीचा भडका उठतो ६०.


    दुर्जनाचिया दुरुक्ती । अपमानाची उद्धती ।
    साहावयालागीं शांती । नव्हे निश्चितीं प्राकृतां ॥ ६१ ॥
    अशी दुर्जनाची दुरुक्ति व अपमानाचा उद्धटपणा सोसण्याला लागणारी शांति सामान्य जनांच्या ठिकाणी मुळीच असत नाहीं ६१.


    ऐशिया रीतीं यथोचित । उद्धवाचें मनोगत ।
    संलक्षूनि श्रीकृष्णनाथ । शांतीचा निश्चितार्थ सांगों पाहे ॥ ६२ ॥
    अशा रीतीने उद्धवाचे मनोगत यथायोग्य ध्यानात घेऊन श्रीकृष्णनाथ शांतीचा निर्णय सांगत आहेत ६२.


    पूर्वीं सांगीतलें निजशांतीसी । वेगीं साधीं म्हणे उद्धवासी ।
    ते अटक वाटेल तयासी । अतिसंकोचासी पावेल ॥ ६३ ॥
    पूर्वी ज्या शांतीचे वर्णन केले होते, तीच लौकर साध्य कर असें श्रीकृष्ण उद्धवास म्हणाला. पण त्याला तो अडथळा वाटेल आणि त्याच्या मनाला अत्यंत संकोच होईल ६३, 


    होतें उद्धवाचे मानासीं । हे शांति असाध्य सर्वांसी ।
    जाणोनियां हृषीकेशी । सांगे इतिहासेंसीं भिक्षुगीत ॥ ६४ ॥
    कारण ही शांति सर्वांना असाध्य आहे असे उद्धवाच्या मनांत होते; हे लक्षात घेऊन श्रीकृष्ण भिक्षुगीत (एका संन्याशाने गाइलेले विचार) संपूर्ण इतिहासासह सांगत आहेत ६४.


    कथयन्ति महत्पुण्यमितिहासमिहोद्धव ।
    तमहं वर्णयिष्याचि निबोध सुसमाहितः ॥ ४ ॥
    [श्लोक ४] उद्धवा ! यासंबंधी एक मोठा पुण्यकारक इतिहास सांगतात, तो मी तुला सविस्तर सांगतो लक्षपूर्वक ऐक. (४)


    अशांतिक्षोभाचे चित्तमळ । क्षाळावया जी तत्काळ ।
    इतिहासगंगा केवळ । अतिनिर्मळ कृष्णोक्ति ॥ ६५ ॥
    शांततेचा भंग होऊन क्षोभाने उत्पन्न होणारे जे चित्तांतील मळ, ते तत्काळ नाहीसे करण्याला योग्य अशी जी इतिहासगंगा, तीच अत्यंत निर्मळ अशी कृष्णोक्ति होय ६५.


    श्रीकृष्णवदनब्रह्माद्रीं । श्रीभागवतऔदुंबरीं ।
    जन्मली शांतिगोदावरी । निजमूळाकारीं निर्मळ ॥ ६६ ॥
    श्रीकृष्णमुखरूपी ब्रह्मगिरि पर्वतावर श्रीभागवतरूप औदुंबराखाली शांतगोदावरी उगम पावली, त्यामुळे ती मुळापासूनच अत्यंत निर्मळ आहे ६६.


    ते गुप्त ओघें नारदगती । उद्धवगंगाद्वारीं व्यासोक्ती ।
    तेचि शुकमुखकुशावर्तीं । प्रकटे अवचितीं पवित्रपणें ॥ ६७ ॥
    तीच गुप्त ओघाने नारदगतीने  उच्चगंगाद्वारी व्यासमुखाने प्रगट झाली; व तीच शुकाचार्याच्या मुखरूपी कुशावर्तात पवित्रपणाने अकस्मात् प्रगटली ६७.


    तया पवित्र ओघाचिये गती । श्रद्धाधृती समरसे भक्ती ।
    त्याचि अरुणा वरुणा सरस्वती । हे संगमप्राप्ती जेथ होय ॥ ६८ ॥
    त्या पवित्र ओघाबरोबर श्रद्धा, शांति  आणि भक्ति ह्याच अनुक्रमें अरुणा, वरुणा आणि सरस्वती या नद्या येऊन त्यांचा येथे जो संगम झाला आहे ६८, 


    तेणें सांतिगंगेची स्थिती । भरूनि उथळे अतिउन्नती ।
    तेथ श्रवणार्थी बुडी देती । ते पवित्र होती निजक्षमा ॥ ६९ ॥
    त्यामुळे शांतिरूप गंगेला पूर येऊन ती दुथडीने वहात चालली आहे. त्यांत जे श्रवणार्थी बुड्या देतात, ते आपल्या आंगच्या क्षमेनेच पवित्र होतात ६९.


    ते शांतिगंगा अतिविख्यात । उद्धव करावया पुनीत ।
    प्रकट करी श्रीकृष्णनाथ । भिक्षुगीतविन्यासें ॥ ७० ॥
    ती शांतिरूप अत्यंत प्रसिद्ध गंगा उद्धवाला  पुनीत करण्यासाठी भिक्षुगीतवर्णनाने श्रीकृष्णांनी प्रकट केली आहे ७०.


    केनचिद्भिक्षुणा गीतं परिभूतेन दुर्जनैः ।
    स्मरता धृतियुक्तेन विपाकं निजकर्मणाम् ॥ ५ ॥
    [श्लोक ५] एका भिक्षूला दुष्टांनी अतिशय त्रास दिला त्यावेळी त्याने आपले धैर्य सोडले नाही आणि हे आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांचे फळ आहे, असे समजून आपल्या मनातील भाव प्रगट केला होता. (५)


    उद्धवा कोणी एक संन्यासी । दुर्जनीं उपद्रवितां त्यासी ।
    म्हणे क्षयो होय दुष्टकर्मासी । येणें संतोषें मानसीं क्षमावंत ॥ ७१ ॥
    उद्धवा ! कोणी एक संन्यासी होता. त्याला दुर्जनांनी अतिशय उपद्रव दिला असता तो म्हणत असे की, त्यांच्या उपद्रवांनी माझ्या दुष्कर्माचा क्षय होईल. याच आनंदानें तो आपल्या मनात दुर्जनांविषयी क्षमाशील झाला ७१.


    आपुलें अंगींचे मळ । पुढिलीं क्षाळितां सकळ ।
    जो क्रोधेंसीं करी तळमळ । तो मूर्ख केवळ आत्मघाती ॥ ७२ ॥
    आपल्या अंगी असलेला मळ दुसऱ्यांनी पूर्णपणे धुवून काढला असतां जो क्रोधाने तळमळ करीत असतो, तो मूर्ख व केवळ आत्मघातकी होय ७२.


    लोक म्हणती ज्यासी दुर्जन । संन्यासी म्हणे ते माझे स्वजन ।
    माझे दोषांचें निर्दळण । यांचोनि धर्में जाण होतसे ॥ ७३ ॥
    लोक ज्यांना दुर्जन असे म्हणतात, त्यांना संन्यासी म्हणतो की, “हे माझे स्वजन आहेत. कारण माझ्या दोषांचा नाश ह्यांच्याच धर्मामुळे होत असतो" ७३.


    संमुख कोणी निंदा करिती । तेणें अत्यंत सुखावे चित्तीं ।
    म्हणे मज तुष्टला श्रीपती । पापाची निष्कृती सहजें होय ॥ ७४ ॥
    कोणी समोर निंदा करूं लागले असता त्यामुळे तर तो मनामध्ये अतिशय आनंदित होतो. तो म्हणतो की, हा श्रीकृष्ण माझ्यावर प्रसन्नच झाला. कारण माझ्या पातकांचा नाश आपोआपच होत आहे ७४.


    ऐसेनि विवेकें तत्त्वतां । शांतीसी ढळो नेदी सर्वथा ।
    चढोनि निजधैर्याचे माथां । गातिली गाथा ते ऐक ॥ ७५ ॥
    खरोखर अशा विचाराने तो शांतीला कधीही मुळीच ढळू देत नाही. आपल्या धैर्याच्या शिखरावर चढून त्याने जी गाथा गाईली  ती ऐक ७५.


    उद्धवासी म्हणे श्रीकृष्णनाथ । ये अर्थीं होईं सावचित्त ।
    अतिलोभी तो अतिविरक्त । झाला तो वृत्तांत सांगेन ॥ ७६ ॥
    श्रीकृष्णनाथ उद्धवाला म्हणाला, उद्धवा ! ह्याकरितां आतां नीट लक्ष दे. अत्यंत लोभी होता तोच अत्यंत विरक्त कसा झाला तो वृत्तांत सांगतों ७६.


    अवन्तिषु द्विजः कश्चिदासीदाढ्यतमः श्रिया ।
    वार्तावृत्तिः कदर्यस्तु कामी लुब्धोऽतिकोपनः ॥ ६ ॥
    [श्लोक ६] अवन्तिनगरात एक ब्राह्मण राहात होता शेती, व्यापार करून त्याने पुष्कळ संपत्ती मिळवली होती तो अतिशय कंजूष, कामी, लोभी आणि रागीट होता. (६)


    मालवदेशीं अवंतिनगरीं । तेथ ब्राह्मण वसे गृहद्वारीं ।
    कृषिवाणिज्यवृत्तिवरी । जीविका करी निरंतर ॥ ७७ ॥
    मालव देशांतील अवंती नगरीमध्ये एक ब्राह्मण होता. तो आपल्या घराच्या ओसरीवर बसत असे. तो शेतकी व व्यापार ह्या उद्योगांवर आपला निर्वाह नेहमी करी ७७.


    गांठीं धनधान्यसमृद्धी । अमर्याद द्रव्यसिद्धी ।
    परी अतिशयें कृपणबुद्धी । पोटाही त्रिशुद्धी न खाय ॥ ७८ ॥
    त्याच्या घरी धनधान्याची समृद्धि असून द्रव्यही  विपुल होते. पण त्याची बुद्धि अतिशय कृपण असल्यामुळे तो पोटालासुद्धा खरोखर पुरतें खात नसे ७८.


    पोटा सदा खाय कदन्न । तेहीं नाहीं उदरपूर्ण ।
    तेथ स्त्रीपुत्रादि दासीजन । जठरतर्पण न पावती ॥ ७९ ॥
    स्वत:च्या पोटाला खावयाचे म्हणजे नेहमी जाडेभरडे अन्न, आणि तेसुद्धा पोटभर खावयाचे नाही. अर्थात् तेथे त्याची बायकामुलें, नोकरचाकर देखील  पोटभर जेवीत नसत ७९.


    न करी नित्यनैमित्य । स्वप्नीं नेणे धर्मकृत्य ।
    देव ब्राह्मण अतिथी तेथ । सदा जात पराङ्मुख ॥ ८० ॥
    तो कधीही नित्य-नैमित्तिक कर्म करीत नसे. धर्मकृत्य करावयाचे तर त्याला स्वप्नांतसुद्धा ठाऊक नव्हते. देव, ब्राह्मण, अतिथि तेथून नेहमी विमुखच परत जावयाचे ८०. 


    कवडी एक लाभू पाहे । तैं मातापित्यांचें श्राद्ध आहे ।
    तें सांडूनि अंत्यजगृहा जाये । न मनी भये स्पर्शाचें ॥ ८१ ॥
    एकादे दिवशी एखाद्या काडीचा लाभ होणार असला, आणि त्याच दिवशी आईबापांचे श्राद्ध असले, तरी ते श्राद्ध सोडून देऊन तो लाभासाठी महाराच्या घरीसुद्धा जाई. शिवाशिवीवें भय मनांतसुद्धा यावयाचे नाही ८१.


    मी उत्तम हा हीनवर्ण । हे धनलोभें गिळी आठवण ।
    हाता येतां देखोनि धन । स्वीकारी अन्न पतिताचें ॥ ८२ ॥
    मी उच्च  जातीचा आहे व हा नीच  जातीचा आहे, ह्याची आठवण तो धनलोभामुळे विसरून जाई. हातांत पैसा पडतो असे पाहिले की, हीन जातीवें अन्नसुद्धा ग्रहण करी ८२.


    धनकामासाठीं देख । न मनी पाप महादोख ।
    कवडीच्या लोभें केला मूर्ख । नाठवे नरकमहापातू ॥ ८३ ॥
    द्रव्यलोभापुढे पातक किंवा महादोष हें  मनांतसुद्धा आणीत नसे. कवडीच्या लोभानेही त्याला इतके मूर्ख बनविले होते की, त्यामुळे त्याला नरक किंवा महापतन यांची आठवणच होत नसे ८३.


    यापरी तो कर्मभ्रष्ट । अकर्म करी क्रियानष्ट ।
    अतिवंचक महाशठ । केवळ नष्ट धनलोभी ॥ ८४ ॥
    अशा प्रकारे तो कर्मभ्रष्ट व क्रियानष्ट ब्राह्मण दुष्कर्मे करीत असे. तो महाठक, मोठा कपटी, मोठा नष्ट व धनलोभी होता ८४.


    त्या धनलाभाचा अवरोधू । होतां देखोनि खवळे क्रोधू ।
    गोहत्यादि ब्रह्मवधू । करावया सिद्धू स्वयें होय ॥ ८५ ॥
    त्याच्या धनलोभांत काही अडथळा आलेला दिसला की तो क्रोधाने खवळे, आणि गोहत्या, ब्रह्महत्या वगैरे करावयालासुद्धा स्वतः तयार होई ८५.


    धनकामीं क्रोधाची वस्ती । धनापाशीं पापें असती ।
    धनलोभीं ज्याची स्थिती । कदर्युवृत्ती त्या नांव ॥ ८६ ॥
    धनलोभाच्या ठिकाणी क्रोधाची वस्ती असते, व द्रव्यापाशीं पातकेंही असतातच. द्रव्यलोभावरच ज्याचें मन नेहमी असते, त्याच्या त्या वृत्तीचें नांव कृपणपणा ८६.


    ऐसें धन सांचिलें फाडोवाडें । त्याचाही व्यय जैं करणें पडे ।
    तैं प्राणांतचि येऊनि घडे । विचार पुढें असेना ॥ ८७ ॥
    अशा द्रव्याचे मोठमोठे ढीग त्याने साठवून  ठेविले होते, आणि त्यांचा जर त्याला खर्च करणे भाग पडले, तर त्याला आता आपला जीवच जातो असें वाटे. दुसरा विचारच राहात नसे ८७.


    वानराचे गालींचे चणे । हाता न येती जितां प्राणें ।
    तैसा द्रव्याचा व्ययो करणें । तेंचि मरणें कदर्या ॥ ८८ ॥
    वानराच्या गालांत असलेले हरभरे त्याच्या जिवांत जीव आहे तोपर्यंत काही हाती लागत नाहीत, त्याप्रमाणेच द्रव्य खर्च करणे तेच कृपणाचे मरण होय ८८.


    ज्ञातयोऽतिथयस्तस्य वाङ्मात्रेणापि नार्चिताः ।
    शून्यावसथ आत्मापि काले कामैरनर्चितः ॥ ७ ॥
    [श्लोक ७] त्याने आपले जातीबांधव किंवा अतिथी यांना कधी गोड शब्दांनीही सुखविले नाही तर मग खाऊपिऊ घालण्याची गोष्ट तर दूरच राहो ! कधीही धर्मेकर्मे न होणार्‍या घरात तो राहात असे आणि योग्यवेळी सुद्धा सुखोपभोगांनी आपल्या शरीराला सुखी करीत नसे. (७)


    घरींचा भात वेंचेल कांहीं । यालागीं वैश्वदेव करणें नाहीं ।
    तेथ अतिथि आलिया पाहीं । कोणे समयीं कोण पूजी ॥ ८९ ॥
    घरांतला थोडा तरी भात खर्च होईल म्हणून वैश्वदेवसुद्धा करावयाचा नाही, मग अतिथि आला तर त्याला केव्हा आणि कोण पूजणार ! ८९.


    अतिथि आलिया जाण । ऐसे बोल बोले आपण ।
    जे वचनमात्रें जाती प्राण । त्यासी मागे कोण अन्नोदक ॥ ९० ॥
    इतकेंही करून अतिथि आलाच तर, त्याच्याशी तो असें भाषण करी की, त्या भाषणाने त्याचा प्राणच जावयाच्या बेतात यावा. मग त्याजकडे अन्नपाणी मागणार कोण? ९०.


    देखोनि त्याचिया घरासी । ब्रह्मचारी नित्य उदासी ।
    आशा त्यजिली संन्यासीं । जेवीं राजहंसीं गोमय ॥ ९१ ॥
    त्याच्या घराकडे पाहिले की ब्रह्मचारी उदास होत. संन्याशांनी तर, राजहंस जशी शेणाची आशा सोडतात, त्याप्रमाणे याच्या घराची आशा सोडली होती ९१.


    भिकारीं सांडिलें त्याचें द्वार । अतिथीं डावलिलें निरंतर ।
    पाहुणा दूरी पाहे बिढार । निराशी पितर सर्वदा ॥ ९२ ॥
    भिकाऱ्यांनी त्याचे दार वर्ज्यच केलेले होते. अतिथि तर त्याच्या घराला नेहमी वगळून जात. पाहुणा आला तर तो आपलें बिऱ्हाड  लांबच ठेवी. आणि पितर तर सदा सर्वदा निराशच झालेले होते. ९२ 


    दारा न ये कोरान्नकर । घर सांडूनि गेले उंदिर ।
    काउळीं वोसंडिलें तें घर । चिडियां साचार न मिळे दाणा ॥ ९३ ॥
    कोरान्न मागणारा कोणी दारांत उभा राहावयाचा नाही. उंदीरसुद्धा घर सोडून चालते झाले. कावळ्यांनी ते घर वर्ज्य  केलेले होते. आणि चिमण्यांनासुद्धा खरोखर तेथें दाणा मिळत नव्हता ९३.


    मुंग्यांसी पडे नित्य लंघन । तिंही धरिलें बिढार आन ।
    पोटा ना खाय जो आपण । तेथ कथा कोण इतरांची ॥ ९४ ॥
    मुंग्यांना रोज लंघनाची पाळी येत असे, म्हणून त्यांनी आपल्याला दुसरें बिऱ्हाड  पाहिलें. जो स्वतःसुद्धा धड पोटाला खात नाही, त्याच्यापुढे इतरांची कथा काय ? ९४.


    अत्यंत भूक लगल्या पोटीं । चणेही न खाय जगजेठी ।
    तेथ कायसी सेवकांची गोठी । कावलीं पोटीं स्त्रीपुत्रें ॥ ९५ ॥
    पोटांत अतिशय भूक लागली तरीसुद्धा स्वतः घरचा मालक असून मूठभर चणेसुद्धा खात नव्हता. मग त्याच्या नोकरांची गोष्ट काय सांगावी ? बायकामुलेसुद्धा पोटाकरितां संतापून जात ९५.


    जैं वमन घडे त्यासी । तैं न करी फळाहारासी ।
    अधिक वेंचू कोण सोशी । यालागीं उपवासी स्वयें पडे ॥ ९६ ॥
    जरी ओकून पडले, तरीसुद्धा फराळ म्हणून करावयाचा नाही. कारण, अधिक खर्च  झाला तर कोण सोशील? म्हणून स्वत:च उपाशी राही ९६.


    तेथ कुळगुरूचा सन्मान । कुळधर्म गोत्रभोजन ।
    व्याही जांवई यांचा मान । धनलोभी जाण कदा न करी ॥ ९७ ॥
    कुलगुरूचा सन्मान करावयाचा, किंवा कुळधर्माला भाऊबंद जेवावयाला सांगावयाचे, किंवा व्याही जावयांचा मान करावयाचा, यांपैकी धनलोभी असतो तो एकही कधीं करीत नाही ९७.


    ऋतुकाळें फळें येती पूर्ण । त्यांसी दृष्टिभेटी हाटीं जाण ।
    परी जिव्हेसी आलिंगन । प्राणांतीं आपण हों नेदी ॥ ९८ ॥
    ऋतुबळांत भरपूर फळफळावळ मळ्यांत पिकली, तर ती त्याला बाजारांत दृष्टीस पडावयाची. पण प्राण गेला तरी त्यांतील  एक फळ जिभेला आपण होऊन काही लावावयाचें नाहीं ९८.


    मातेचें स्तनपान सेविलें । तेंचि क्षीर रसना चाखिलें ।
    पुढें दूधचि वर्जिलें । व्रत धरिलें धनलोभें ॥ ९९ ॥
    आईचे स्तनपान केले तेव्हा जे काय दूध चाखले  असेल तेवढेच, पुढे दूध वर्ज्यच  केलेले. असे द्रव्यलोभाचे जणू काय त्याने व्रतच घेतलेले होते ९९.


    रस रसनेचें माहेर । तेणेंवीण ते गादली थोर ।
    धनलोभ अतिनिष्ठुर । करितां करकर भेटों नेदी ॥ १०० ॥
    खरोखर रस हे रसनेचें माहेर आहे. असे असता त्या रसावांचूनच तिची तो गांजणूक करीत असे. कारण त्याचा द्रव्यलोम अत्यंत निष्ठुर होता. त्यामुळे त्याच्या जिभेने कितीही किरकिर केली तरी तो तिची रसाशी भेट म्हणून होऊ देत नसे १००. 

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...