मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० ओव्या ७०१ ते ७६५

    तो आत्मा मी त्याचें देह । मी ध्याता तो माझें ध्येय ।

    मी ज्ञाता तो शुद्ध ज्ञेय । ऐसा पढिये तो आम्हां ॥१॥
    तो आत्मा आणि मी त्याचा देह ; मी ध्याता आणि तो माझे ध्येय; मी ज्ञाता आणि तो शुद्ध ज्ञेय; इतका तो आम्हांला आवडता असतो १.


    उद्धवा हे एकात्मताभक्ती । सज्ञान ज्ञातें येणें भजती ।
    तयां मज अभेदप्रीती । तुवांही या रीती भजावें ॥२॥
    उद्धवा ! 'एकात्मभक्ति' ती हीच. ज्ञानसंपन्न ज्ञाते ह्याच भक्तीने माझें भजन करतात. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अभेद प्रीति असते. ह्याकरितां तूंही ह्याच रीतीने भजन कर २.


    परमात्मा एक नित्य शुद्ध । त्यासी मायामय संसारबंध ।
    मिथ्या जाण देहसंबंध । हा 'निजात्मबोध' पैं माझा ॥३॥
    परमात्मा एक, नित्य व शुद्ध आहे; त्याला मायामय संसारबंध नाही; आणि देहसंबंधही मिथ्या आहे हे लक्षात ठेव. हाच माझा खरा 'आत्मबोध' होय ३.


    हा मिथ्यासंबंध पडे जीवासी । आत्मज्ञानें मुक्ति त्यासी ।
    हें मागें बोलिलों तुजपाशीं । तेंचि मतनिरासीं दृढ केलें ॥४॥
    मिथ्यासंबंधच जीवाला पडतो व नडतो; तेव्हां आत्मज्ञानाने त्याची मुक्ति होते. हे तुझ्याजवळ पूर्वी बोललोंच आहे. तीच गोष्ट अन्यमताचा निरास करून दृढ केली ४.


    धरोनि श्लोक चौदावा । अंतीं श्लोक चौतिसावा ।
    मीमांसकमताचा आघवा । निरासु बरवा येणें केला ॥५॥
    चौदावा श्लोक धरून चौतिसाच्या श्लोकापर्यंत मीमांसकांच्या मताचे सविस्तर खंडण केलें ५.


    एवं निरसोनि मतांतर । अद्वैत स्थापिलें दृढतर ।
    हेंचि निजज्ञान साचार । चराचरवरिष्ठ ॥६॥
    ह्याप्रमाणे विरुद्ध मताचें निरसन करून अद्वैताची दृढतर स्थापना केली. हेच चराचरांत श्रेष्ठ असें खरें आत्मज्ञान होय ६.


    अद्वैतज्ञान शुद्ध चोख । ऐकोनि उद्धवा जाहलें सुख ।
    हृदयीं दाटला जी हरिख । पाहे श्रीमुख कृष्णाचें ॥७॥
    असें हें शुद्ध व पवित्र अद्वैत ज्ञान श्रवण करून उद्धवाला मोठा आनंद झाला. आणि अंतःकरणांत हर्ष दाटून येऊन, त्याने श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहिले ७.


    चालिलें सात्त्विकाचें भरितें । चित्त विसरलें चिंतनातें ।
    अश्रु लोटले जी तेथें । आप‍आपणियातें विसरला ॥८॥
    त्याच्या प्रेमाला भरते आले; त्याचे चित्त चिंतनालाच विसरलें ; त्या वेळी त्याच्या नेत्रांतून प्रेमाच वाहू लागले. त्यामुळे आपण आपल्याला तो विसरून गेला ! ८.


    उद्धवासी नावेक । पडोनि ठेलें जी टक ।
    सावध होऊनियां देख । कृष्णसंमुख तो झाला ॥९॥
    उद्धवाला क्षणभर बेभान अवस्था प्राप्त झाली. तितक्यांत सावध होऊन तो श्रीकृष्णाच्या समोर स्थित झाला ९.


    अद्वैतभजनें जे भजते । ते भक्त कृष्णासी आवडते ।
    तें केवीं प्राप्त होय मातें । यालागीं हरितें पुसतु ॥७१०॥
    अद्वैतभजनाने जे भजतात, तेच भक्त कृष्णाला आवडतात, तेव्हां असें अद्वैतभजन मला कसें प्राप्त होईल ? म्हणून तो श्रीकृष्णाला विचारूं लागला ७१०.


    श्रीउद्धव उवाच - गुणेषु वर्तमानोऽपि देहजेष्वनपावृतः ।
    गुणैर्न बध्यते देही बध्यते वा कथं विभो ॥ ३५ ॥
    [श्लोक ३५] उद्धव म्हणाला भगवन ! हा अलिप्त आत्मा देह, इंद्रिय इत्यादी गुणांमध्ये, तसेच देहाने केलेली कर्मे व त्यांची फळे यांमध्ये राहात असूनही त्यांपासून मुक्त कसा राहातो ? किंवा वरील गुणांनी बद्ध कसा होतो ? (३५)


    उद्धव म्हणे कृष्णनाथा । आत्मा देहामाजीं असतां ।
    बंधन पावे जी तत्त्वतां । कीं सर्वथा पावेना ॥११॥
    उद्धव म्हणाला, हे कृष्णनाथा ! आत्मा हा देहामध्ये असतांना खरोखर बंधन पावतो, का मुळींच पावत नाही ? ११.


    गुण असतां मुक्ति घडे । कीं गुण गेलिया मुक्ति जोडे ।
    हेंचि सांगावें मज पुढें । अतिनिवाडें निश्चित ॥१२॥
    गुण असतांना मुक्ति मिळते, कां गुण गेल्यावर मुक्ति मिळते ? हेच मला निश्चित आणि मोकळ्या मनाने सांगावें १२.


    गुण असतां मुक्ति घडे । हें सर्वथा बोलणें कुडें ।
    ज्वर असतां आरोग्य न घडे । वृक्ष न वाढे भिरुंडेंसीं ॥१३॥
    गुण असतांनाच मुक्ति घडेल हे बोलणे अगदींच असंबद्ध आहे. कारण ज्वर असतांना काही कधी आरोग्य घडणे शक्य नाही, किंवा कीड लागल्यावर काहीं झाड वाढावयाचें नाहीं १३.


    बाहीं बांधोनि पाषाण । समुद्रामाजीं तरे कोण ।
    तैसें देहीं असतां त्रिगुण । मुक्तपण कैसेनि ॥१४॥
    दंडाला दगड बांधून समुद्रात पोहणार कोण ? त्याप्रमाणे देहांत तीन गुण नांदत असतांना मुक्तपणा कसा येणार ? १४.


    गुण जे रजतमादिक । त्यांचें कार्य देह देख ।
    गुणासारिखीं आवश्यक । कर्मे अनेक आचरे ॥१५॥
    रजतमादिक जे गुण आहेत, त्याचे कार्य देह आहे. म्हणून तो हटकून गुणासारखींच अनेक कर्मे करतो १५.


    कर्माचें फळ सुखदुःख । भोगणें पडे गा अचुक ।
    गुणांसी मुक्ति न घडे देख । हें ज्ञाते लोक म्हणताति ॥१६॥
    म्हणून त्या कर्माचे फळ सुखदुःख तें अचुक भोगणें भाग पडते. आणि गुणांना तर मुक्ति प्राप्त व्हावयाची नाहीं असें ज्ञाते लोक म्हणतात १६.


    गुण गेलिया मुक्ती । हेंही न घडे गा श्रीपती ।
    येहीविषयीं विनंती । कृपामूर्ती अवधारीं ॥१७॥
    श्रीकृष्णा ! गुण गेल्यावर मुक्ति मिळेल म्हणावे तर तसेंही घडणे शक्य नाही. हे करुणानिधे ! त्याविषयीही विनंती करतो ती ऐकावी १७.


    गुणांचें कार्य देहेंद्रियें । ते गुण जाऊनि देह राहे ।
    भूमीविण वृक्ष होये । हें अबद्ध पाहें बोलणें ॥१८॥
    देहाची इंद्रिये हें गुणांचे कार्य आहे; ते गुण गेल्यावर देह राहतो म्हणणे म्हणजे भूमीशिवायच वृक्ष होतो, असे म्हणण्यासारखे ते बोलणे अगदी विसंगत आहे १८.


    कारण जाऊनि कार्य राहे । हें बोलणें घडे काये ।
    गुण जातां देहोचि जाये । मुक्त वर्तताहे कैसेनि ॥१९॥
    कारण जाऊन कार्य मात्र राहिले, असें कधीं म्हणता येईल काय ? गुण गेले, की त्यांच्याबरोबर देहच जाणार. मग मुक्त वागणार तरी कसा ? १९.


    एवं गुण असतां नसतां । मुक्ति न घडे गा सर्वथा ।
    येचिविषयीं कृष्णनाथा । तुज मी तत्त्वतां पुसतु ॥७२०॥
    तात्पर्य, गुण हे असले तरी किंवा नसले तरी मुक्ति म्हणून कधीच घडावयाची नाही, असे मला वाटते. म्हणून हे कृष्णनाथा ! ह्याचाच खरा विचार मी तुला विचारतों ७२०.


    आणिक एक जगन्नाथा । तुज मी विनंती करीन आतां ।
    गुण आत्म्यासी एकत्रता । न घडे सर्वथा निश्चित ॥२१॥
    हे जगन्नाथा ! पुन्हा मी आपल्याला अशी एक विनंती करतों की, गुण आणि आत्मा हे खरोखर कधी एकत्र रहावयाचे नाहींत २१.


    भरलें मृगजळाचें तळें । चंद्रमा बिंबेना तेणें जळें ।
    तेवीं आत्मा गुणांसी नाकळे । स्वभावें नातळे गुणांतें ॥२२॥
    मृगजळाचे तळे भरलेले असले तरी त्या जळांत कांहीं चंद्रबिंब प्रतिबिंबित होणार नाही, त्याप्रमाणे आत्मा कधीं गुणांनी बद्ध होणार नाही. कारण, गुणांना स्पर्शही न करणे हा त्याचा स्वभावधर्मच आहे २२.


    गुण ते अज्ञानाची राती । आत्मा स्वप्रकाश गभस्ती ।
    त्यासमोर ते कैंचे येती । मग बाधिती आत्म्यातें ॥२३॥
    गुण म्हणजे अज्ञानाची रात्र आणि आत्मा हा स्वयंप्रकाश असा सूर्य आहे. त्याच्या समोर ते येणार तरी कसे ? आणि त्याला बाधणार तरी कसे ? २३.


    अंधार सूर्यातें गिळी । काउळा कैलास आतळी ।
    बागुल हनुमंतातें सळी । मशक गिळी गजातें ॥२४॥
    अंधार जर सूर्याला गिळील, कावळा जर कैलासाला जाईल, बागुलबावा जर मारुतीला जर्जर करील, किंवा मुरकूट जर हत्तीला खाऊन टाकील २४,


    माशी-पांखें गगन उडे । सगळा मेरु थिल्लरीं बुडे ।
    मृगजळीं जैं तारूं पडे । तैं आत्मा सांपडे गुणांत ॥२५॥
    माशीच्या पंखांनी जर आकाश उडून जाईल, मेरु जर सगळा डबक्यांत बुडून जाईल, किंवा मृगजळांत जर तारूं बुडेल, तरच आत्मा गुणांत बद्ध होईल २५.


    जेवीं आकाश नातुडे जाळीं । तेवीं आत्मा नाकळे गुणमेळीं ।
    मा सुखदुःखांची नवाळी । गुणकल्लोळीं कां भोगी ॥२६॥
    आकाश ज्याप्रमाणे जाळ्यांत सांपडत नाही, त्याप्रमाणे आत्माही गुणसमुदायांत सांपडत नाही. मग सुखदुःखाचा अनुभव गुणांच्या धामधुमीत कसा भोगील ? २६.


    यापरी न घडे गा बद्धता । मा मुक्ताची कायसी कथा ।
    कैसेनि बद्धमुक्तव्यवस्था । घडे कृष्णनाथा तें सांग ॥२७॥
    अशा प्रकारे विचार केला असतां, आत्म्याला मुळी बंधन घडतच नाही. मग मुक्तीची गोष्ट उगीच कशाला बोलावी ? तेव्हा हे श्रीकृष्णनाथा बद्ध-मुक्त-अवस्था कोणास असते ते सांगावें २७.


    येथ बद्धासी काय कारण । आणि मुक्ताची कोण खूण ।
    एवं बद्धमुक्तलक्षण । मज संपूर्ण सांगावें ॥२८॥
    सारांश, येथे बंधन घडण्याला कारण काय ? आणि मुक्ताचे लक्षण तरी कोणते ? मिळून बद्धाचे आणि मुक्ताचे सविस्तर लक्षण मला निवेदन करावें २८.


    कथं वर्तेत विहरेत् कैर्वा ज्ञायेत लक्षणैः ।
    किं भुञ्जीतोत विसृजेच्छयीतासीत याति वा ॥ ३६ ॥
    [श्लोक ३६] बद्ध किंवा मुक्त पुरूष कसा असतो ? कसा वागतो ? तो कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो ? काय खातो ? मलत्याग इत्यादी कसे करतो ? झोपतो कसा, बसतो कसा आणि चालतो कसा ? (३६)


    आतां बद्धमुक्तांची स्थिती । मज सांगावी श्रीपती ।
    कोणें लक्षणें जाणिजेती । दोघे कळती कैसेनि ॥२९॥
    हे श्रीपति ! आतां मला बद्धाची आणि मुक्ताची स्थिति सांगावी. ते दोघे कोणत्या लक्षणांनी आणि कसे ओळखता येतील ? २९.


    पावोनियां विदेहावस्था । देहीं कैसेनि वर्तता ।
    वश करूनि गुणातीतता । गुणीं क्रीडता कैसेनि ॥७३०॥
    तसेंच विदेहस्थिति प्राप्त झाल्यानंतर ते देहामध्ये कसे वागतात ? गुणातीतता आपल्या अंगी घेऊन ते गुणामध्ये कसें वर्तन करतात ? ७३०.


    पावोनियां मुक्तदशा । देहीं भोग भोगी कैसा ।
    त्यासी त्यागाचा कोण ठसा । हृषीकेशा सांगिजे ॥३१॥
    मुक्तदशा प्राप्त झाल्यानंतर देहाने भोग तरी भोगतात कसे ? त्यांच्या त्यागाचा ठसा तरी काय असतो ? श्रीकृष्णा ! तोही सांगावा ३१.


    त्याचे निद्रेचें कोण लक्षण । कोण बैसका कोण आसन ।
    वस्तु जाणोनि संपूर्ण । गमनागमन त्या कैसें ॥३२॥
    त्यांच्या निद्रेचे लक्षण काय ? बैठक कशी ? आसन कसे ? पूर्ण परब्रह्म जाणल्यानंतर त्यांचे जाणे येणें तरी कसे काय असते ? ३२.


    ऐशीं मुक्तांची लक्षणें । त्याहोनि बद्धांची विलक्षणें ।
    कृपा करोनि नारायणें । मजकारणें सांगिजे ॥३३॥
    अशी जी काय मुक्तांची लक्षणे असतील ती, आणि बद्धांची त्याहून विचित्र असणारी, कृपा करून देवांनी मला सांगावीत ३३.


    एतदच्युत मे ब्रूहि प्रश्नं प्रश्नविदां वर ।
    नित्यबद्धो नित्यमुक्त एक एवेति मे भ्रमः ॥ ३७ ॥
    इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
    एकादशस्कन्धे भगवद्-उद्धवसंवादे दशमोऽध्यायः ॥ १० ॥
    [श्लोक ३७] हे अच्युता ! प्रश्नाचे मर्म जाणणार्‍यांमध्ये आपण श्रेष्ठ आहात एकच आत्मा अनादी गुणांच्या संबंधामुळे नित्यमुक्तही आहे या गोष्टीमुळे मला संशय उत्पन्न झाला आहे तरी आपण माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्यावे. (३७)


    या प्रश्नोत्तरांची उत्कंठा । थोर वर्ततसे वैकुंठा ।
    प्रश्नवेत्त्यांमाजीं श्रेष्ठा । अतिवरिष्ठा गोविंदा ॥३४॥
    हे सर्वश्रेष्ठा वैकुंठाधिपते गोविंदा ! ह्या प्रश्नांच्या उत्तरांची मला अतिशय उत्कंठा लागून राहिलेली आहे. आपण प्रश्नाचे समर्पक उत्तर देण्यामध्ये श्रेष्ठ आहां ३४.


    अनादि असे गुणसंबंधु । तेणें आत्मा झाला नित्यबद्धु ।
    नित्यमुक्त हा शब्दु । असंबद्धु सर्वथा ॥३५॥
    हा गुणांचा संबंध अनादि कालापासून चालत आलेला आहे. आणि त्यामुळे आत्मा हा 'नित्यबद्ध' झालेला आहे. म्हणून 'नित्यमुक्त' हा शब्दच मुळी असंबद्ध दिसतो ३५,


    जरी आत्म्यासी नित्यमुक्तता । तरी बोलोंचि नये बद्धता ।
    एकुचि बद्धमुक्त म्हणतां । भ्रम अच्युता वाटत ॥३६॥
    आत्म्याला जर नित्यमुक्तता असेल तर बंधनाचें नांवही काढावयाला नको. बद्ध आणि मुक्त एकालाच म्हणावें, तर श्रीकृष्णा ! मला भ्रम वाटतो ३६.


    आत्मा एकचि तत्त्वतां । त्यासी बद्धता आणि मुक्तता ।
    एकासीच दोनी अवस्था । कृष्णनाथा कैसेनि ॥३७॥
    श्रीकृष्णा ! आत्मा तर खरोखर एकच आहे. त्या एकालाच बंधन आणि मुक्ति ह्या दोन्ही अवस्था कशा बरे असतील ? ३७.


    तो धाला तोचि भुकेला । जागता तोचि निजेला ।
    जो जिता तोचि मेला । सत्यत्व या बोला कैसेनि ॥३८॥
    जो तृप्त झाला तोच भुकेला; जो जागा तोच निजलेला; जो जिवंत तोच मेलेला; हे बोलणे खरे कसें मानावें ? ३८.


    काळें तेंचि धवळें । देखणें तेंचि आंधळें ।
    अर्धें तेंचि सगळें । कुहिर्‍या केळें केवीं होती ॥३९॥
    काळें तेंच पांढरें; डोळस तेच आंधळे; अर्धे तेच सगळे; कसे म्हणता येईल ? कुहिरीच्या वेलीला केळी कशी होतील ? ३९.


    लोण तेंचि अलवणी । कोरडें तें पाणी ।
    अतिशीतळ तो दारुण अग्नि । मुकें पुराणीं बोलिगडें ॥७४०॥
    खारट तेच आळणी; कोरडें तेच पाणी; थंडगार तोच भयंकर अग्नि, मुके तेच बोलघेवढे असें कसें म्हणता येईल ? ७४०.


    लुगडें नागीवपणें लाजाळु । अन्न भुकेलेपणें भुकाळू ।
    मुक्तीसी मुक्तीचा दुकाळू । कापूरा परिमळू मिळेना ॥४१॥
    लुगडेंच नग्न म्हणून लाजाळू; अन्नच भूक लागल्याने भुकालू; मुक्तीलाच मुक्तीचा दुकाळ; कापराला सुगंधच मिळेना (असें कसें म्हणता येईल ?) ४१.


    तैसे संत तेचि असंत । अद्वैत तेंचि होय द्वैत ।
    तेव्हां हित तेंचि अनहित । दिसे प्रस्तुत आम्हांसी ॥४२॥
    त्याप्रमाणे संत तेच असंत; अद्वैत तेंच द्वैत; त्याचप्रमाणे हित तेंच अनहित, असें आतां आम्हांस वाटू लागले आहे ४२.


    आत्मा नित्यमुक्त-शुद्ध-बुद्ध । ऐसा तुवांचि मज केला बोध ।
    तो गुणसंगें म्हणसी बद्ध । भ्रमु अगाध येणें मज ॥४३॥
    आत्मा हा नित्यमुक्त असून तो शुद्ध व बुद्ध म्ह. ज्ञानस्वरूप आहे, असा आपणच मला बोध केला ; आणि तोच गुणांच्या संगतीने बद्ध होतो असे म्हणता. ह्यामुळे मी तर मोठ्या बुचकळ्यात पडलों आहे ४३.


    एकासचि बद्धमुक्तता । कैसेनि घडे कृष्णनाथा ।
    कृपाळुवा जी अनंता । हें मज तत्त्वतां सांगावें ॥४४॥
    देवा ! एकालाच बंधन आणि मुक्ति एकाच वेळी घडेल तरी कशी ? हे अनंता ! आपण कृपाळू आहां. तेव्हां ह्यांतील खरे काय ते मला सांगावं ४४.


    म्हणीसी मुक्तीसी आगंतुकता । तेणें मोक्षासि आली अनित्यता ।
    बद्ध आगंतुक म्हणतां । त्यासी सादिता येऊं पाहे ॥४५॥
    आपण मुक्ति ही आगांतुक आहे असे म्हणाल, तर मोक्षाला अनित्यत्व आले; तसेंच बंधनाला आगांतुक म्हटले तर त्याला आदि आहे असें होतें ४५.


    पूर्वी बद्धचि नव्हता । येथूनि उपजला आतां ।
    ऐशी सादिता बोलतां । होइल शास्त्रार्था विरुद्ध ॥४६॥
    पूर्वी बंध हा नव्हताच तो आजपासून उत्पन्न झाला; असा त्याला आदिपणा सांगितला, तर ते शास्त्रार्थाच्या विरुद्ध होईल ४६.


    श्रुतिस्मृतिशास्त्रसिद्ध । अनादि मुक्ती अनादि बद्ध ।
    आत्मा एक अवस्था द्विविध । त्याही विरुद्ध परस्परें ॥४७॥
    मुक्ति ही अनादि बंधही अनादिच असल्याबद्दल श्रुतीवरून, स्मृतीवरून व शास्त्रावरूनही सिद्ध आहे. आणि आत्मा तर एकच असून त्याला या दोन अवस्था ! आणि त्याही परस्पर विरुद्ध ! हे बोलणे किती विलक्षण आहे ? ४७.


    उठिली बद्धता मुक्तीतें छळी । खवळली मुक्ती बद्धता गिळी ।
    ऐशी विरुद्धता आत्म्याजवळीं । केवीं वनमाळी राहताति ॥४८॥
    बद्धता बळावली तर ती मुक्तीला छळील, आणि मुक्ति खवळली तर ती बंधनाला गिळून टाकील. अशा या परस्पर विरोधी स्थिति हे देवा ! आत्म्याजवळ राहतात तरी कशा ? ४८.


    जैं सांजवेळे भेटे पाहांट । तै विद्या अविद्या होय एकवट ।
    सूर्य अंधाराची बांधे मोट । तैं आत्म्यानिकट अवस्था ॥४९॥
    जर संध्याकाळी पहाट होईल, तरच विद्या आणि अविद्या एक होईल, सूर्य जर अंधाराची मोट बांधील तर ह्या अवस्था आत्म्याजवळ राहतील ! ४९.


    हिंगासी कापुराचा वासु जोडे । तैं अविद्या विद्येमाजीं पडे ।
    ससा सिंहावरी जैं चढे । तैं आत्म्यापुढें अवस्था ॥७५०॥
    हिंगाला जर कापराचा वास येईल, तर अविद्या विद्येमध्ये पडेल; ससा जर सिंहावर चाल करून जाईल, तरच या अवस्था आत्म्यापुढे येतील ७५०.


    उद्धव म्हणे कृष्णनाथा । या जैं कळल्या दोनी अवस्था ।
    तैंचि मुक्ति आली हाता । मज सर्वथा मानलें ॥५१॥
    उद्धव म्हणाला, हे कृष्णनाथा ! ह्या दोन अवस्था कसल्या, हे समजले की त्याच वेळी मुक्तिही हाताला आली, असें मी निःसंशय समजतों ५१.


    मग म्हणे श्रीअनंता । विशद सांगाव्या अवस्था ।
    म्हणोनि चरणीं ठेविला माथा । मोक्षदाता तूं मज ॥५२॥
    पुन्हा तो म्हणाला, हे देवा, तूंच मोक्षाचा दाता आहेस, ह्याकरितां त्या अवस्था मला स्पष्ट करून सांगाव्या. असें म्हणून त्याने चरणावर मस्तक ठेवले ५२.


    सखोल उद्धवाचा प्रश्न । ऐकोनि सुखावला नारायण ।
    माझा उद्धवु जाहला सज्ञान । हरिखें जगज्जीवन डोलतु ॥५३॥
    उद्धवाचा हा मार्मिक प्रश्न ऐकून नारायणाला फार संतोष झाला. आता माझा उद्धव ज्ञानी झाला, असे त्यांच्या मनांत येऊन ते जगज्जीवन आनंदाने डोलू लागले. ५३.


    परमार्थी अवस्था गाढी । देखोनि प्रश्नाची अतिगोडी ।
    उद्धवासी ओंवाळावया आवडीं । जीव कुरवंडी करूं पाहे ॥५४॥
    परमार्थाबद्दल त्याची अत्यंत तळमळ पाहून आणि प्रश्नाचे महत्त्व लक्षात आणून प्रेमाने उद्धवावरून ते काया कुरवंडी करण्याच्या बेतांत आले ५४.


    नुल्लंघी भक्ताचें उत्तर । फोडिलें गुह्य ज्ञानभांडार ।
    भक्तकृपा जी अपार । हरि साचार तुष्टला ॥५५॥
    भगवान् भक्तांचे वचन कधी उल्लंघन करीत नाही. त्यासाठी त्यांनी आपल्या गुह्य ज्ञानाचे भांडार खुलें केलें. खरोखर परमेश्वर प्रसन्न झाला, की तो भक्तावर अपरंपार कृपाच करतो ५५.


    उद्धवाचा प्रश्न गहन । कृपा द्रवला जगज्जीवन ।
    एका विनवी जनार्दन । आनंदघन वोळला ॥५६॥
    उद्धवाचा प्रश्न खोल असल्यामुळे जगजीवन कृष्ण कृपेनें द्रवला, एका जनार्दन विनयाने कळवितो की, तो आनंदाचा मेघच भरून आला ५६.


    त्या आनंदाचा महापूरु । शिष्यसरितेसी येईल थोरु ।
    तेणें चिद्‍गंगासागरु । शिष्य सत्वरु ठाकील ॥५७॥
    त्याच्या दृष्टीने आतां शिष्यरूप नदीला आनंदाचा मोठा पूर येईल. तेणेकरून शिष्य ज्ञानगंगेच्या समुद्राला जाऊन मिळेल ५७.


    टाकोनियां संसारआस्था । जो लागला भक्तिपंथा ।
    तोचि अधिकारी भागवता । परमार्था ग्राहकु ॥५८॥
    संसाराची आस्था सोडून देऊन जो भक्तिमार्गाला लागला, तोच या भागवताचा अधिकारी होय. आणि तोच परमार्थाचा खरा ग्राहक ५८.


    ज्याचे पोटीं संसारचिंता । तो कथा ऐकतांचि दुश्चिता ।
    चित्त चिंती ज्या ज्या अर्था । तो सर्वथा तेथें असे ॥५९॥
    आणि ज्याच्या पोटांत संसाराचीच चिंता आहे, त्याच्या मनांत ही कथा ऐकतांच विपरीत भावना उत्पन्न होईल. कारण, चित्त ज्या वस्तूचे चिंतन करते, तद्‌रूपच ते होत असते ५९.


    चित्त जंव नाहीं सुचित । तंव न कळे श्रीभागवत ।
    गुरुवांचूनि श्रीभागवतार्थ । नव्हे प्राप्त प्राण्यासी ॥७६०॥
    चित्त जोपर्यंत सावध व स्थिर नाही, तोपर्यंत भागवत समजावयाचे नाही. तसेंच श्रीगुरूवांचून भागवताचा अर्थ प्राण्यांना मुळीच कळावयाचा नाही ७६०.


    जो संसारापासोनि विरक्त । गुरुचरणीं अतिअनुरक्त ।
    त्यासी फावला एक परमार्थ । फळे भागवत तयासी ॥६१॥
    संसारापासून जो विरक्त होईल, गुरुचरणीं जो अत्यंत अनुरक्त असेल, त्यालाच फक्त परमार्थ प्राप्त होईल; आणि त्यालाच भागवत फलद्रूप होईल ६१.


    देखतां कृष्णाचें श्रीमुख । उद्धवा नीच नवें समाधिसुख ।
    तरी श्रवणाची श्रद्धा अधिक । आवडी देख अनिवार ॥६२॥
    श्रीकृष्णाचे मुख पाहूनच उद्धवाला नित्यनवें समाधिसुख प्राप्त होत असे, तरी आणखी श्रवणाची त्याला श्रद्धा होतीच, इतकी त्याची आवड थोर ६२.


    जो श्रुतिप्रतिपाद्य चिद्घन । त्या श्रीकृष्णाचें गुह्य ज्ञान ।
    पुढतपुढतीं होआवया श्रवण । करी प्रश्न अतियोग्य ॥६३॥
    वेदांनी प्रतिपादन केलेला ज्ञानस्वरूप परमात्मा जो श्रीकृष्ण, त्याचे गुह्यज्ञान पुनःपुन्हा ऐकावयाला मिळावे म्हणून त्याने अत्यंत योग्य असा प्रश्न केला ६३.


    विद्याअविद्येचा निरासु । श्रीकृष्ण सांगेल परेशु ।
    पुढील अध्याय अतिसुरसु । श्रोतां अवकाशु मज द्यावा ॥६४॥
    म्हणून श्रीकृष्ण परमात्मा आतां विद्येचा व अविद्येचा निरास सांगेल. तो पुढचा अध्याय अत्यंत सुरस आहे. याकरितां श्रोत्यांनीही माझ्याकडे लक्ष द्यावें. ६४.


    तो कृष्ण‍उद्धवसंवादु । पुढिले कथेचा अतिविनोदु ।
    एका जनार्दनीं महाबोधु । परमानंदु प्रकटेल ॥७६५॥
    त्या श्रीकृष्णाच्या आणि उद्धवाच्या संवादांतील पुढील कथा फार मनोल्हादक आहे. यास्तव एका जनादर्नामध्येही महाज्ञान व परमानंद प्रगट होईल ६५.


    इति श्रीमद्‍भागवते महापुराणे एकादशस्कन्धे श्रीकृष्णोद्धसंवादे
    एकाकारटीकायां परमहंससंहितायां दशमोऽध्यायः ॥१०॥
    याप्रमाणे श्रीमद्‌भागवत एकादश स्कंधांतील एकनाथकृत टीकेचा दहावा अध्याय समाप्त झाला॥१०॥


    श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ॥३७॥ ओव्या ॥७६५॥
    ॐ तत्सत्-श्रीकृष्णार्पणमस्तु.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...