मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० ओव्या ६०१ ते ७००

    एवं प्रवृत्तीमाजीं असतां । सकाम कर्में आचरतां ।

    सविधि कर्में करितां । दुःख सर्वथा अनिवार ॥१॥
    तात्पर्य, प्रवृत्तीमध्ये असून कामनिक कर्में केली असता, ती कर्में विधिपूर्वक किंवा अविधिपूर्वक करो, त्याला सदासर्वदा अनिवार असें दुःखच भोगावे लागते . १


    सविधि काम्यें स्वर्गपतन । अविधि काम्यें नरक दारुण ।
    एवं प्रवृतीमाजीं जाण । सुख कोण सकामा ॥२॥
    कामनिक कर्में विधिपूर्वक केली तर स्वर्गातून पतन होते; तींच कर्में अविधीनें केली तर भयंकर नरक प्राप्त होतो. मिळून ह्या प्रवृत्तीमध्ये सकाम मनुष्याला सुख ते कोणते ? २.


    म्हणशी लोकपाळांच्या ठायीं । नित्य सुख असेल पाहीं ।
    त्यांसी जन्ममरण नाहीं । अमरत्व आम्हींही साधावें ॥३॥
    आता हूं म्हणशील की, दिक्पालांच्या ठिकाणी नित्य सुख असेल, त्यांना काही जन्म मरण नाही; त्यांच्यासारखे आपणही अमरत्व संपादन करावें म्हणजे झाले ३.


    लोकपाळांचे नित्य लोक । लोकपाळही नित्य देख ।
    तेथें असेल नित्य सुख । ऐसें मूर्ख कल्पिती ॥४॥
    कारण दिक्पाळांचे लोक नित्य म्हणजे शाश्वतचे आहेत ; लोकपाळ आहेत तेही शाश्वतचेच आहेत ; तेव्हां तेथील सुखही शाश्वतचेंच असेल. पण अशी कल्पना करतात ते लोक मूर्ख होत ४.


    लोकानां लोकपालानां मद् भयं कल्पजीविनाम् ।
    ब्रह्मणोऽपि भयं मत्तो द्विपरार्धपरायुषः ॥ ३० ॥
    [श्लोक ३०] एक कल्पपर्यंत आयुष्य असणार्‍या लोक व लोकपाल यांना माझे भय आहे दोन परार्ध आयुष्य असणार्‍या ब्रह्मदेवालासुद्धा माझ्यापासून भय आहे. (३०)


    लोकपाळामाजीं अमरेंद्र । मरुद्‍गणांचा राजा इंद्र ।
    ज्यासी मानिती सूर्यचंद्र । वरुण कुबेर यमादि ॥५॥
    लोकपाळांमध्ये अमरेंद्र म्हणजे इंद्र हाच श्रेष्ठ होय; तोच मरुद्‌गणांचा राजा ; त्याला सूर्य, चंद्र, वरुण, कुबेर, यम आदिकरून सर्व मान देतात ५.


    ज्या अमरावती सिंहासन । ऐरावताचें आरोहण ।
    उच्चैःश्रवा अश्व जाण । पुढें आपण खोलणिये ॥६॥
    त्याला अमरावती नगरींत सिंहासन ; ऐरावतावर बसण्याचा मान ; उच्चैःश्रवा नांवाचा अश्व ज्याच्यापुढे आपण होऊन कोतवाल घोडा झालेला ६.


    ज्यासी उर्वशी भोगपत्‍नी । रंभामुख्य विलासिनी ।
    जेथ तिलोत्तमा नाचणी । चिंतामणी लोळती ॥७॥
    उर्वशीसारखी ज्याला भोगपत्नी ; रंभाप्रमुख विलासिनी; तिलोत्तमा नृत्य करणारी; आणि चिंतामणि पायाकडे लोळणारे ७.


    अष्टमासिद्धींचीं भांडारें । रत्‍नजडित धवळारें ।
    मर्गजाचे डोल्हारे । सुवर्णसूत्रें लाविले ॥८॥
    अष्टसिद्धींची भांडारे जेथे भरलेली; रत्नखचित जेथील वाडे; मर्गजाचे झोंपाळे करून ते सुवर्णाच्या साखळदंडाने बांधलेले ८ ;


    वैदूर्याचे शाहाडे । कामधेनूंचे वाडे ।
    कल्पद्रुमांचे मांदोडे । चहूंकडे शोभती ॥९॥
    वैडूर्याचे मोठे वृक्ष ; कामधेनूंचीं खिल्लारें ; आणि कल्पवृक्षांचे जेथें जुंबाडे अथवा मंडप चहूंकडे शोभतात ९ ;


    लोकपाळ आज्ञेचे । सुरसेना सैन्य ज्याचें ।
    एवढें ऐश्वर्य जयाचें । राज्य स्वर्गीचें भोगित ॥६१०॥
    लोकपाळ ज्याच्यापुढे हात जोडून उभे असतात ; देवांची सेना हेच ज्याचे चतुरंग सैन्य; एवढे ज्याचे ऐश्वर्य ; आणि जो स्वर्गाच्या राज्याचा उपभोग घेतो ६१०.


    त्यासी माझी काळशक्ती । ब्रह्मयाचे दिनांतीं ।
    चौदा इंद्र क्षया जाती । येरांची गति कायशी ॥१॥
    त्यालासुद्धा ब्रह्मदेवाचा दिवस पुरा झाला की, माझ्या काळाची शक्ति ग्रासून टाकते. असे एक दोन नव्हेत, तर चौदा इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसांत क्षयाला जातात ! मग इतरांची काय कथा ? ११.


    ब्रह्मायु म्हणती समता । जो द्विपरार्ध आयुष्यवंता ।
    जंव न पवे माझी काळसत्ता । तंव श्लाघ्यता आयुष्याची ॥१२॥
    ब्रह्मदेवाचे आयुष्य सर्वात मोठे म्हणतात. त्याला दोन पराध वर्षे आयुष्य आहे. पण माझ्या काळाची नजर पोंचली नाही, तोपर्यंत त्याच्या आयुष्याचा बडेजाव १२.


    ज्यासी अग्रपूजेची मान्यता । जो लोकलोकपाळांचा कर्ता ।
    त्या ब्रह्मयासी माझी काळसत्ता । ग्रासी सर्वथा सलोकें ॥१३॥
    अग्रपूजेच्या मानाची ज्याची योग्यता, जो लोकांच्या लोकपाळांचाही कर्ता, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा माझ्या काळाची सत्ता त्याच्या लोकासहवर्तमान ग्रासून टाकते १३.


    मी काळात्मा दंडधरु । शास्ता नियंता ईश्वरु ।
    अंतर्यामी सर्वेश्वरु । अतिदुर्धरु व्यापकु ॥१४॥
    मी दंड धारण करणारा काळाचाही आत्मा; शास्ता, नियंता, ईश्वर; अंतर्यामी राहणारा सर्वेश्वर , अत्यंत दुर्धर व सर्वव्यापक आहे १४.


    माझा काळक्षोभ दारुण । त्यातें आवरूं शके कोण ।
    धर्म‍अर्थकामें जाण । निवारण त्या नव्हे ॥१५॥
    माझा काळक्षोभ मोठा भयंकर आहे. त्याला कोण आवरू शकणार ? धर्मानें अर्थानें, किंवा कामानें त्याचे निवारण होणे शक्य नाही १५.


    प्रळयकर्त्या महाकाळासी । माझी काळसत्ता ग्रासी ।
    माझें महाभय सर्वांसी । लोकपाळांसी सुख कैंचें ॥१६॥
    त्या प्रळयकर्त्या महाकाळालाही माझी काळसत्ता ग्रासून टाकते. माझें महाभय सर्वांनाच लागलेले आहे. मग लोकपाळांना सुख कोठचें ? १६.


    लवनिमेष-पळपळें । माझेनि भयें सूर्य चळे ।
    माझेनि भयें प्राण खेळे । वायु चळे माझेनि भेणें ॥१७॥
    माझ्याच भयाने सूर्य हा लव-निमेष-पळ-विपळाला पुढे पुढे सरत असतो. माझ्याच भयाने प्राण खेळत असतो; माझ्याच भयाने वारा वाहतो १७.


    माझे आज्ञेवरी अग्नि जाण । वसवीतसे जठरस्थान ।
    मद्‍भयें नव्हे अधिक न्यून । पचवी अन्न चतुर्विध ॥१८॥
    माझ्याच भयानें अग्नि हा पोटामध्ये जठराग्नीच्या रूपानें राहून माझ्याच भयानें कमजास्ती न होतां चतुर्विध अन्नें पचवून टाकतो १८.


    यथाकाळीं पर्जन्यधारीं । इंद्र वर्षे मद्‍भयेंकरीं ।
    मृत्यु स्वकाळें प्रळय करी । भय भारी त्या माझें ॥१९॥
    माझ्याच भयाने इंद्र हा वेळच्या वेळी पर्जन्यधारांची वृष्टि करतो. मृत्युही आपल्या वेळेला प्रळय करून सोडतो. कारण त्यालाही माझें भय फार आहे १९.


    माझेनि भयेंकरीं देखा । समुद्र नोलांडी निजरेखा ।
    माझिया भयाची थोर शंका । तिंही लोकां कांपवी ॥६२०॥
    माझ्याच भयानें समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करीत नाही. माझ्या भयाच्या मोठ्या शंकेने तिन्ही लोक थरथर कांपत असतात ६२०.


    तिंही लोकांचा शास्ता । ईश्वर तो मी नियंता ।
    येणें कर्मजडाची वार्ता । अनीश्वरता छेदिली ॥२१॥
    तिन्ही लोकांचा शास्ता व नियंता ईश्वर तो मी. इतकें सांगून जडबुद्धि कर्मठांचे कर्मठपण आणि अनीश्वरवादीत्व भगवंतानें छेदून टाकलें २१.


    प्रवृत्तीसी अनर्थता । मागां दाविली तत्त्वतां ।
    वैराग्य स्थापिलें सदृढता । निवृत्ति सर्वथा अतिश्रेष्ठ ॥२२॥
    प्रवृत्तीमध्ये किती अनर्थ आहे, हे मागें दाखविले आहे. तसेंच वैराग्य स्थापन करून निवृत्ति हीच सर्वात श्रेष्ठ आहे असे सांगितले २२.


    आपुल्या ऐश्वर्याच्या आविष्कारें । साधूनि ईश्वरत्व केलें खरें ।
    मीमांसकमत-निराकारें । निरूपण पुढारें चालवी ॥२३॥
    ऐश्वर्याचा आविष्कार करून आपलें ईश्वरत्व खरे करून दाखविलें. आता मीमांसकांच्या मताचा निरास करण्यासाठी तेंच निरूपण पुढें चालवीत आहे २३.


    मीमांसकमतवार्ता । बोलिले जीवासी अनेकता ।
    तोचि कर्ता आणि भोक्ता । हेचि सर्वथा निराकारी ॥२४॥
    मीमांसकांचे मत असे कीं, ते जीवांना अनेकता आहे, जीवच कर्ता असून भोक्ताही तोच आहे, इत्यादि. ह्याचेच आतां पूर्णपणे निरसन करतात २४.


    गुणाः सृजन्ति कर्माणि गुणोऽनुसृजते गुणान् ।
    जीवस्तु गुणसंयुक्तो भुङ्‍क्ते कर्मफलान्यसौ ॥ ३१ ॥
    [श्लोक ३१] सत्व, रज आणि तम हे तीन गुण इंद्रियांना त्यांचे कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतात आणि इंद्रिय कर्मे करतात. जीव अज्ञानाने इंद्रियांनी केलेल्या कर्मांशी संबंध जोडून कर्मांची फळे भोगू लागतो; (३१)


    कृष्ण म्हणे उद्धवातें । एकादश इंद्रियें समस्तें ।
    करिती नानाविध कर्मांतें । आत्मा तो येथें सर्वसाक्षी ॥२५॥
    श्रीकृष्ण उद्ध्वाला म्हणाले. ही सारी अकरा इंद्रियें अनेक प्रकारची भिन्न भिन्न कर्में करतात. आणि आत्मा आहे तो सर्वसाक्षित्वानेंच असतो २५.


    दीपु उजळलिया घरीं । लोक वर्तती व्यापारीं ।
    तो नेमी ना निवारी । तैशापरी जीवु येथें ॥२६॥
    घरांत दिवा लावला म्हणजे लोक आपआपल्या कामाला लागतात. तो कोणाला लागाही म्हणत नाही आणि लागूं नकाही म्हणत नाही. त्याचप्रमाणें येथे जीव आहे २६.


    जीवु प्रेरोनि इंद्रियांतें । म्हणाल करवितसे कर्मांतें ।
    जेवीं कुर्‍हाडी घेऊनि हातें । छेदी वृक्षातें कृषीवळु ॥२७॥
    आता तुम्ही म्हणाल शेतकरी हातांत कुर्‍हाड घेऊन झाड तोडतो, त्याप्रमाणे जीव हा इंद्रियांना प्रेरणा करून कर्मे करवितो २७.


    ऐशी इंद्रियांची प्रेरकता । जीवासी न घडे सर्वथा ।
    ते न घडायाची ऐक कथा । तुज तत्त्वतं सांगेन ॥२८॥
    तर त्याला इंद्रियांची प्रेरकता मुळींच संभवत नाही. त्याचे खरे कारण आतां तुला सांगतों ऐक २८.


    इंद्रियां कर्मीं प्रेरण । करिते सत्त्वादिक गुण ।
    जीवु उभयसाक्षी जाण । कर्मकारण त्या नाहीं ॥२९॥
    सत्त्वादिक गुण हेच इंद्रियांना प्रेरणा करणारे आहेत. जीव हा उभयतांचा (गुण व इंद्रिये यांचा) साक्षी आहे. त्याला कर्माचें प्रेरकत्व नाही २९.


    अंगें नातळतां आपण । चुंबक संनिधिमात्रें कारण ।
    अचेतन लोहा करी चळण । तैसा जाण जीव येथें ॥६३०॥
    आपण स्वतः स्पर्शही न करतां केवळ जवळ राहूनच लोहचुंबक हा अचेतन लोखंडाला हालवितो, त्याप्रमाणेच जीव हा येथे आहे ६३०.


    कां उगवल्या दिवाकर । सुष्टुदुष्टु लोकव्यापार ।
    तो सूर्यासी नातळे कर्मभार । साक्षी साचार कर्मांचा ॥३१॥
    किंवा सूर्य उगवला की लोक बरेवाईट उद्योग करूं लागतात, पण त्या उद्योगाचें प्रेरकत्व सूर्याकडे नसते. तो कर्माचा साक्षी मात्र असतो ३१.


    तैसी जीवासी कर्तव्यता । सत्य नाहीं गा सर्वथा ।
    दिसे जें कांहीं आपाततां । ते आध्यासिकता मिथ्यात्वें ॥३२॥
    त्याप्रमाणेच जीवाला खरोखर कर्तव्यता नसते. वरवर झालेले जें कांही दिसतें ते केवळ मिथ्या म्ह. भ्रामक होय ३२.


    कवळें अध्यासिला डोळा । तो चंद्रमा देखे पिंवळा ।
    तेवीं आत्मा कर्ता भासे स्थूळा । केवळ निश्चळा नेणती ॥३३॥
    काविळीने ज्याचा डोळा व्यापलेला असतो. त्याला चद्रही पिवळाच दिसतो; त्याप्रमाणे जे मंदबुद्धि आहेत त्यांनाच आत्मा हा कर्ता असा भास होतो. तो अगदी निश्चळ असल्याचे त्यांना कळत नाही ३३.


    सवेग चालतां आभाळें । बाळें म्हणती चंद्रमा पळे ।
    तेवीं आत्मा कर्ता मानिती स्थूळें । उपाधिमेळें अध्यासु ॥३४॥
    सपाट्याने ढग चाललेले पाहिले म्हणजे मुलें म्हणतात की, 'चंद्रच पळतो आहे.' त्याप्रमाणे मंदबुद्धि असतात तेच आत्मा हा कर्ता असें मानतात. हा उपाधीच्या योगाने त्यांना भ्रम होतो. ३४.


    देह मी कर्म माझें । हें आत्मेनि स्वप्नीं नेणिजे ।
    मृगजळीं बुडाले राजे । सत्य मानिजे तैसें हें ॥३५॥
    देह हा मी, आणि कर्म हें माझें, हें आत्म्याला स्वप्नांतसुद्धा माहीत नसते. मृगजळांत राजे बुडाले हे सत्य मानण्यापैकींच हेंही आहे ३५.


    एवं आत्म्यासी कर्तव्यता । सत्य नाहीं गा सर्वथा ।
    त्यासी म्हणताती फळभोक्ता । तेही वार्ता मिथ्यात्वें ॥३६॥
    तात्पर्य, आत्म्याला कोणतीही 'कर्तव्यता' नाही, हीच गोष्ट खरी आहे. आतां तो फळाचा 'भोक्ता' आहे असे म्हणतात तीही गोष्ट मिथ्याच समज ३६.


    स्वप्नीं जोडिल्या सहस्र गायी । जागृतीं त्यांचें दुभतें नाहीं ।
    आत्मा भोक्ता तैसा पाहीं । उपाधीच्या ठायीं मिथ्यारूपें ॥३७॥
    स्वप्नात हजार गाई पैदा केल्या तर जागे झाल्यावर काही त्यांचे दुभते मिळत नाही, त्याप्रमाणेच उपाधीच्या ठिकाणी आत्मा हाही तसाच मिथ्या भोक्ता आहे ३७.


    डबकीं प्रतिबिंबला रवी । तो जै तेथील कर्दम सेवी ।
    तैं भोक्ता आत्मा देहगांवी । सत्य मानवीं मानावा ॥३८॥
    डबक्यांत प्रतिबिंबलेला सूर्य जर त्यांतील चिखल सेवन करील तरच आत्मा हाही देहरूप गांवांतील भोक्ता आहे, असें मनुष्यांनी सत्य मानावे ३८.


    मृगजळामाजिलेनि मत्स्यें । बिंबला चंद्र गिळिजे आवेशें ।
    तैसा आत्मा देहाभिनिवेशें । भोगविशेषें भोगिता ॥३९॥
    प्रतिबिंबित झालेला चंद्र झपाट्याने मृगजळांतील माशांनी गिळू लागावा, त्याप्रमाणेच आत्मा हाही देहाच्या अभिनिवेशाने भोग भोगणारा आहे असें हवें तर समजावें ३९.


    एवं आत्मा जो भोक्ता । ते सोपाधिक वार्ता ।
    उपाधि मिथ्या गा तत्त्वतां । आत्मा भोक्ता कैसेनि ॥६४०॥
    तात्पर्य, आत्मा जो भोक्ता म्हणतात ती गोष्ट उपाधीची होय. आणि उपाधि ही तर मिथ्या आहे, मग आत्मा हा भोक्ता कसा होणार ? ६४०.


    आत्मा अकर्ता अभोक्ता । सदृढ साधिलें तत्त्वतां ।
    जीवासी बोलिली अनेकता । ते मिथ्या आतां साधितु ॥४१॥
    यावरून खरोखर आत्मा हा भोक्ताही नव्हे आणि कर्ताही नव्हे, ही गोष्ट उत्तम रीतीने सिद्ध झाली. आता जीवाला जी अनेकता आहे असे म्हणतात, तीही मिथ्याच आहे असें आता सिद्ध करतात ४१ .


    यावत् स्याद् गुणवैषम्यं तावन्नानात्वमात्मनः ।
    नानात्वमात्मनो यावत् पारतंत्र्यं तदैव हि ॥ ३२ ॥
    [श्लोक ३२] जोपर्यंत शरीर इत्यादींमध्ये 'मी माझे' पणाचा अभिमान आहे, तोपर्यंत आत्म्याच्या अनेकत्त्वाचा भ्रम नाहीसा होत नाही जोपर्यंत हा अज्ञानमूलक भ्रम नाहीसा होत नाही, तोपर्यंत तो जीव परतंत्रच राहाणार. (३२)


    सत्व-रज-तमांचा । अंतरीं धुमाडू गुणकर्मांचा ।
    तंव जीवासी अनेकत्वाचा । आभासु साचा मानला ॥४२॥
    अंतःकरणामध्ये जोपर्यंत सत्त्वरजतमाचा व त्यांच्या गुणकर्मांचा धुमाकूळ माजलेला आहे, तोपर्यंत जीवाला अनेकत्वाचा भ्रमही खराच वाटतो ४२.


    अहंकारादि देहपर्यंत । जंव जीवासी मीपण भासत ।
    तंव नानात्व मानी सत्य । तें मिथ्या निश्चित उद्धवा ॥४३॥
    अहंकारापासून तो देहापर्यंत, जीवाला जोपर्यंत 'मीपणा' भासतो आहे, तोपर्यंत जीव अनेकत्वच खरे मानतो. पण उद्धवा, ते खरोखर मिथ्याच आहे ४३.


    जैसें आपुलेंचि मुख । आरिसा करी आपणासन्मुख ।
    तैसें अविद्यायोगें मायिक । द्वैत देख दाखवी ॥४४॥
    ज्याप्रमाणे आपलेंच तोंड भआरसा हा आपल्यापुढे आणून दाखवितो, (व दोन व्यक्ति भासवितो,) त्याप्रमाणेच माया क्ही अविद्येच्या योगाने द्वैत दाखवून देते ४४.


    आरिशामाजीं आपुला । जो द्वैतप्रभावो स्वयें देखिला ।
    तेणें आपण नाहीं द्विधा झाला । मिथ्या भासला आभासु ॥४५॥
    आरशामध्ये आपल्याला जो दुसरेपणा दिसतो त्यायोगें आपण काही द्विधा होत नाहीं; तो भास मिथ्याच भासतो ४५.


    तो आभास झालिया समोर । त्रिगुण गुणांचे विकार ।
    एकचि दावी नानाकार । दिसे साचार गुणक्षोभें ॥४६॥
    तोच भास समोर उभा राहिला म्हणजे त्रिगुणांचे विकार एक असतांनाच अनेक दिसू लागतात. आणि ते गुणांच्या क्षोभानें खरे असे भासतात ४६.


    जैसें आपुलेंचि मुख केवळ । शस्त्र आदर्श आणि जळ ।
    लांब निश्चळ चंचळ । करी प्रबळ विकारी ॥४७॥
    ज्याप्रमाणे आपले एकच तोंड लखलखीत तरतरीत, तसेंच आरशांत व पाण्यांत पाहिले असतां, ते लांबट, निश्चळ व चंचल असें त्या उपाधीमुळे भासते ४७.


    एवं त्रिप्रकार कार्यविशेखें । मुखचि देखिजे निजमुखें ।
    तैसें तें नानात्व लटिकें । गुणक्षोभकें भासतु ॥४८॥
    तात्पर्य, तीन प्रकारच्या कार्यविशेषत्वामुळें आपलेंच तोंड आपल्याला तीन प्रकारांनी दृष्टिगोचर होते (पण ते खोटें आहे); त्याप्रमाणे गुणक्षोभामुळे भासणारे नानात्व खोटें आहे ४८.


    सूत्रचि विणिलें पटाकारीं । पटावरी तंतूंच्या हारी ।
    दिसती तेवीं चराचरीं । नानाकारीं एकुचि ॥४९॥
    वस्त्राकारामध्ये सारें सूतच विणलेलें असतें, आणि वस्त्रावर त्या सुताच्या आडव्या-उभ्या ओळी दिसत असतात, त्याप्रमाणे चराचरांतही अनेकाकारानें एकच वस्तु भरलेली आहे ४९.


    साकरेचा केला ऊंसु । परी कठिण आंत बाकसु ।
    मधील पिळून घ्यावा रसु । हा त्रिगुण दोषु त्या नाहीं ॥६५०॥
    साखरेचा ऊंस केला, तर वरील कठीण साल व आंतील चिपाडे टाकून मधील रस पिळून घ्यावा अशा प्रकारचा त्रिगुण दोष त्यांत नसतो ६५०;


    तैसा परमात्मा श्रीहरी । अद्वितीय एकु चराचरीं ।
    त्यासी अनेकत्वाची परी । सत्त्वादि करी गुणक्षोभु ॥५१॥
    त्याप्रमाणे परमात्मा श्रीहरि हा चराचरामध्ये एक अद्वितीय भरून राहिलेला आहे; सत्त्वादिगुणांच्या क्षोभामुळेच त्याच्यामध्ये अनेकत्व असल्याचे भासते ५१.


    जैसा बहुरूपी आपुल्या ठायीं । नाना सोंगें धरी देहीं ।
    तितुकीं रूपें त्यासी नाहीं । एकला पाही अद्वैत ॥५२॥
    ज्याप्रमाणे बहुरूपी आपल्या एकाच देहाने अनेक सोंगे घेतो, पण तितके काही त्याचे देह नसतात, तो एकीएक अद्वैतच असतो ५२,


    तैसा सच्चिदानंद श्रीहरी । आत्मा एक चराचरीं ।
    नांदताहे नानाकारीं । द्वैतामाझारीं अद्वैत ॥५३॥
    त्याप्रमाणे सञ्चिदानंद श्रीहरि हा आत्मरूपाने चराचरामध्ये एकच असून अनेक रूपांनी भासतो. हेच द्वैतामध्ये अद्वैत होय ५३.


    'अद्वैत' साधिलें जीवासी । सत्य मानिलें आम्हांसी ।
    परी एक आशंका ऐसी । निजमानसीं वर्तत ॥५४॥
    [यावर आशंका ] "जीव हा अद्वैतरूपी आहे, हे आमच्या मनाला पटले, पण तेथे एक शंका मनांत उत्पन्न होते ५४.


    तूंचि म्हणसी 'जीव परतंत्र' । आतां अद्वैतपणें 'स्वतंत्र' ।
    बोलसी बोलणें विचित्र । केवीं साचार मानावें ॥५५॥
    तूंच म्हणतोस की जीव हा 'परतंत्र' आहे, आणि आतां म्हणतोस की, अद्वैत असल्यामुळे 'स्वतंत्र' आहे, हे बोलणे परस्परांशी विरुद्ध आहे; ते खरें कसें मानावें ? ५५.


    अद्वैतपण संपादिसी । माझें भय लोकपाळां म्हणसी ।
    हें न मने गा आम्हांसी । अद्वैतासी भय कैंचें' ॥५६॥
    अद्वैतपण प्रतिपादन करतोस आणि माझें लोकपाळांनाही भय आहे असे म्हणतोस, हे काही आम्हांला पटत नाहीं; कारण, अद्वैताला भय कशाचे ?" ५६.


    ऐशिया रीतीं उद्धवा । झाल्या संदेहासी रिघावा ।
    तो तूं आतळों नेदीं जीवा । ऐक बरवा निर्धारु ॥५७॥
    उद्धवा ! अशा रीतीचा संशय जर तुझ्या मनांत आला असेल तर तो मात्र तुझ्या मनाला शिवू देऊ नकोस. त्यांतील खरे मर्म आता ऐक ५७.


    जीवासी उपाधीसी तादात्म्यता । तंव तंव आभासे नानात्मता ।
    नानात्वीं परतंत्रता । ईश्वरसत्ता नियामक ॥५८॥
    जीव हा उपाधीशी जो जो तादात्म्य पावतो, तो तों अनेकत्वाचा भास होऊ लागतो; आणि अनेकत्वाचा भास होऊ लागला की, तेथे परतंत्रता आलीच. तेथे मग ईश्वरसत्ता नियामक होते ५८.


    अमित मीनलिया दळ । सेनापतीवीण विकळ ।
    आंबा पिकलिया रसाळ । राखण सबळ त्यापासीं ॥५९॥
    असंख्य सेना जमा झाली तरी एका सेनापतीशिवाय व्यर्थ होते; रसाळ आंबा पिकला तरी त्याच्यापाशी राखण ही चांगलीच पाहिजे ५९,


    तैसी जीवासी जंव अनेकता । तंव सृष्टीसी कर्ता हर्ता नियंता ।
    जाण ईश्वरचि सर्वथा । परतंत्रता ते जीवासी ॥६६०॥
    त्याप्रमाणे जीवाला जोपर्यंत अनेकता भासते, तोपर्यंत सृष्टीला उत्पत्तिकर्ता, संहारकर्ता व नियंता सर्वथैव ईश्वर असतोच आणि जीवाला परतंत्रता असतेच ६६०.


    अनेकत्वें परतंत्रता । यालागीं ईश्वर नियंता ।
    ऐसी देखोनि ईश्वरसत्ता । भय समस्तां जीवांसी ॥६१॥
    अनेकपणामुळे परतंत्रता प्राप्त होते; म्हणूनच ईश्वर हा नियंता असतो. अशी ईश्वराची सत्ता पाहिली की साऱ्या जीवांना भय वाटतें. ६१.


    माझे ईश्वरी सत्तेचे भयें । देखोनि अंतकुही भीताहे ।
    इंद्रादिकांचा पाडु काये । भय वाहे विधाता ॥६२॥
    माझ्या ईश्वरी सत्तेच्या भीतीने यमसुद्धा थरथरा कांपतो. मग इंद्रादिकांची कथा काय ? ब्रह्मदेवसुद्धा माझा धाक वाहतो ६२.


    माझी अत्यंत प्रळयींची सत्ता । वाजे हरिहरांचे माथां ।
    अनेकत्वाचा संहर्ता । मीचि सर्वथा निजकाळु ॥६३॥
    माझी आत्यंतिक प्रळयाची सत्ता हरिहरांच्या मस्तकावरही आदळते ! अनेकत्वाचा संहार करणारा खरोखर महाकाळ तो मीच आहे ६३,


    यालागीं अनेकत्व जंव आहे । तंववरी दुस्तर काळभये ।
    जेव्हां अनेकत्व नाहीं होये । तेव्हां काळू काये नाशील ॥६४॥
    म्हणून अनेकत्व जोपर्यंत आहे, तोपर्यंत काळाचे भयही दुस्तर आहे. आणि हें अनेकत्व जेव्हां नाहीसे होते, तेव्हां मग काळ तरी नाश कशाचा करणार ? ६४.


    एवं अनेकत्वाचे माथां । ईश्वरभयाची काळसत्ता ।
    अनेकत्वें परतंत्रता । जाण सर्वथा उद्धवा ॥६५॥
    तात्पर्य, अनेकत्वाच्या माथ्यावरच ईश्वरभयाची काळसत्ता आहे. उद्धवा, त्या अनेकत्वानेच सर्वथैव जीवाला परतंत्रता आहे, समजलास ? ६५.


    तें अनेकत्व जैं जाये । तैं काळ नाहीं मा कैंचें भये ।
    पर नसतां परतंत्र न होये । एकत्वीं आहे स्वानंद ॥६६॥
    अनेकत्व जेव्हां नाहीसे होते, तेव्हां काळच नाहीसा होतो. मग भय ते कशाचें ? परच नसला म्हणजे परतंत्रही होत नाही. एकत्वामध्येच स्वानंद असतो ६६.


    जेथ द्वैताचा मळु नुठी । ऐक्य देखे सकळ सृष्टीं ।
    तेव्हां स्वानंदाचिया कोटी । भोगी उठाउठी निजबोधें ॥६७॥
    द्वैताचा मळच जेव्हां उठत नाही, तेव्हां सारी सृष्टि ऐक्यरूपानेच त्याला दिसू लागते; तेव्हां आत्मज्ञानेकरून हां हां म्हणतां स्वानंदाच्या कोटीच्या कोटी उपभोगावयास मिळतात ६७.


    ज्या सुखाची मर्यादा । देशें काळें न करवे कदा ।
    त्या सुखाची सुखसंपदा । भोगिती सदा अद्वैतें ॥६८॥
    ज्या सुखाची मर्यादा देशानें किंवा कालानें कधीच करता येत नाही, त्या सुखाची संपत्ति निरंतर अद्वैतानें भोगावयास सांपडते ६८.


    निजात्मेज्ञानें अलोलिक । दुजेनवीण अद्वैतसुख ।
    तें सांडूनि कर्मवादी परम मूर्ख । नाना लोक वांछिती ॥६९॥
    निजात्मज्ञानाने अलौकिक आणि दुजेपणा नसलेलें अद्वैत सुख सोडून देऊन परममूर्ख कर्मवादी अनेक प्रकारच्या लोकांची इच्छा करतात ६९.


    मागां कर्मवादी कर्मठ । बोलिले प्रवृत्ति अतिश्रेष्ठ ।
    कर्में करूनियां उद्‍भट । भोग वरिष्ठ भोगावे ॥६७०॥
    मागें कर्मवादी किंवा कर्मठ हे लोकप्रवृत्तिच अत्यंत श्रेष्ठ आहे, ह्याकरितां कर्में करूनच उत्तमोत्तम भोग भोगावेत, असे म्हणाले होते ६७०.


    तेंचि निरसोनि आतां । पुढारीं चालविली कथा ।
    उद्धवासी अद्वैतता । दृढ सर्वथा सांगत ॥७१॥
    त्याचेंच ह्यांत खंडण करून उद्धवाच्या मनांत अद्वैत भावना दृढतर ठसण्याकरितां भगवान् तेंच निरूपण पुढे सांगत आहेत ७१.


    यावदस्यास्वतंत्रत्वं तावदीश्वरतो भयम् ।
    य एतत् समुपासीरंस्ते मुह्यन्ति शुचार्पिताः ॥ ३३ ॥
    [श्लोक ३३ ] जोपर्यंत जीवाला पारतंत्र्य जाणवते, तोपर्यंत ईश्वराचे वाटणारे भय कायमच असते जो अशा प्रकारे गुणांच्या विळख्यात सापडून राहातो, त्याला शोक आणि मोह होतच राहातात. (३३)


    गुणवैषम्य ज्याचे ठायीं । ते नर भोगासक्त पाहीं ।
    यागादि कर्में करूनि देहीं । भोगस्थान तिहीं ठाकिलें ॥७२॥
    ज्यांच्या ठिकाणी गुणवैषम्य असते, तेच लोक भोगांविषयी आसक्त असतात असे समज. तेच देहानें यागादिक कर्में करून भोगाचे स्थानही मिळवितात ७२.


    जे जे ठाकूनि गेले लोक । तेथूनि याज्ञिकां पतनधाक ।
    तंव दुःखी देखे लोकनायक । अनित्य लोक देखोनि ॥७३॥
    परंतु ज्या ज्या लोकाला ते जाऊन पोचतात, तिकडून तिकडून त्या याज्ञिकांना पतन होण्याचा धाक असतोच. तेव्हां तो लोकही अशाश्वतच आहे हे मनांत येऊन त्या लोकाचा अधिपतिही दुःखांतच असलेला दृष्टीस पडतो ७३.


    पदच्युती लोकच्युती । भोगकर्मे भोगच्युती ।
    केले कष्ट वृथा जाती । दुःखी होती निजपतनें ॥७४॥
    तें पदही जाते; तो लोकही जातो; भोगकर्मानें भोगही नाहीसे होतात. आणि केलेले कष्ट व्यर्थ जाऊन अधःपतनानें दुःखी होतात ७४.


    घायाळा कीजे तरटमार । तैसें ओतप्रोत दुःख फार ।
    भंवे जन्ममरणव्यवहार । भोगी अघोर गर्भवास ॥७५॥
    जखमी झालेल्या मनुष्याला चाबकाने मारले असता जसें असह्य दुःख होते, त्याप्रमाणे त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यांत गिरक्या खातांना अतिशय दुःख होते व तो अघोर गर्भवास भोगतो ७५.


    राहाटमाळेचे करे । पुढती रिता पुढतीं भरे ।
    तैसा अविश्रम फिरे । गर्भद्वारें मरणांतीं ॥७६॥
    रहाटगाडग्याचे पोहरे एकदा रिकामे होतात, एकदा भरतात. त्याप्रमाणे हाही जन्मापासून मरणापर्यंत अविश्रम फिरतच राहतो ७६.


    विंचें खादिल्या दुःखितासी । दाढीसी आग लागे त्यासी ।
    तेवीं भोगक्षयें पतितासीं । गर्भवासीं पीडा होय ॥७७॥
    विंचू चावून तळमळत असलेल्याच्या दाढीला आणखी आग लागावी, त्याप्रमाणे भोगक्षयाने पतन पावलेल्याला आणखी गर्भाचीही पीडा होते ७७.


    लोकांची अनित्यता नेणती । यालागीं परमदुःखी होती ।
    कष्टांचें फळ दुःखप्राप्ती । संसारावर्ती अडकले ॥७८॥
    स्वर्गादि लोकांची अनित्यता कळत नाही, म्हणूनच त्यांना अतिशय दुःख भोगावें लागते. संसाराच्या भोवऱ्यांत अडकल्यामुळे दुःखप्राप्ति हेच त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळते ७८.


    केवळ लोक भोग अनित्य । हेंही न घडे गा येथ ।
    भोगलोक होत सत्य । तरी अनित्य म्हणावे ॥७९॥
    ज्या लोकांत भोग भोगावयास मिळतात, ते लोक व भोग अनित्य म्हणावे तर तसे म्हणणेही योग्य नाहीं; कारण भोगलोक जर खरे असते, तर त्यांना 'अनित्य' असे म्हटले असते ७९.


    जेवीं दोरीं सर्पाभास । तेवीं लोक चतुर्दश ।
    केवळ मायामय विलास । सुखलेश तेथ कैंचा ॥६८०॥
    दोरामध्ये जसा सर्पाचा भास होतो, त्याप्रमाणेच हे चौदा लोक आहेत. तो सारा मायेचाच विलास असल्यामुळे, सुखाचा लेश तरी तेथे कशाचा ? ६८०.


    केवळ जें कां मायिक । सत्यामाजीं कैंचें भोगसुख ।
    कर्मठ ते केवळ मूर्ख । विषय मायिक वांछिती ॥८१॥
    केवळ जे मायिक, तेथें भोगसुख कोठचें ? कर्मठ लोक शुद्ध मूर्ख असतात, म्हणूनच मायिक विषयांची ते इच्छा करतात ८१.


    भरलें मृगजळाचें तळें । तेणें जैं पिकती साळीकेळें ।
    तैं विषयभोगीं सुख फळें । हें न कळे भ्रांतासी ॥८२॥
    मृगजळाचे तळे भरल्याने जर भात आणि केळी पिकतीं, तर विषयभोगापासून सुख प्राप्त झाले असते. पण हे भ्रांतांना कळत नाही ८२.


    जग दुमदुमित भरलें दिसे । तें तूं मायिक म्हणसी कैसें ।
    हेंचि कळे अनायासें । तुज मी तैसें सांगेन ॥८३॥
    जग तर सारें गजबजलेलें दिसत आहे, त्याला मायिक कसें म्हणावें ? असें तूं म्हणशील, तर तेच तुला सहज रीतीने कळेल असें आतां सांगतों ऐक ८३.


    काल आत्माऽऽगमो लोकः स्वभावो धर्म एव च ।
    इति मां बहुधा प्राहुर्गुणव्यतिकरे सति ॥ ३४ ॥
    [श्लोक ३४ ] प्रिय उद्ववा ! जेव्हा मायेच्या गुणांमध्ये क्षोभ होतो तेव्हा काल, आत्मा, वेद, लोक, स्वभाव आणि धर्म अशा अनेक रूपांनी व नावांनी मीच एकटा ओळखला जातो. (३४)


    केवळ मायामय कल्पित । संसार तो अज्ञानजनित ।
    एकातें अनेक म्हणत । चित्तें दुश्चित्त हो‍उनी ॥८४॥
    संसार हा निखालस मायामय असून काल्पनिक आहे. कारण, तो अज्ञानापासूनच उत्पन्न झालेला आहे. चित्तांत विकल्प आल्यामुळेच तो एकाला अनेक असे म्हणतो ८४.


    कनकबीजसेवनें जैसें । शहाणें माणूस होय पिसें ।
    मग त्यासी नसतेंचि आभासे । ससे मासे गो सर्प ॥८५॥
    धोतऱ्याचे बीं खाल्ले म्हणजे शहाणे मनुष्यही जसें वेडे बनून जाते, आणि मग त्याला नसलेले ससे, मासे, गाई व सर्प इत्यादिकांचा भास होऊ लागतो ८५,


    तैसें मायावशें अतिभ्रांता । नसतें अनेकत्व भासे चित्ता ।
    नभीं गंधर्वनगर पाहतां । दिसे शोभिता पुरदुर्गु ॥८६॥
    त्याप्रमाणे मायेच्या पाशांत गुंतून अत्यंत भ्रम झाला, म्हणजे नसलेले अनेकत्वच चित्ताला भासू लागते. आकाशांतील ढगांकडे पाहिले म्हणजे शोभिवंत नगरे आणि किल्ले दिसू लागतात ८६.


    कां अंधारीं दोरु दिसे डोळां । म्हणे सर्प दंड कीं सुमनमाळा ।
    नाना एकावळी मुक्ताफळां । कोणी अबळा विसरली ॥८७॥
    किंवा अंधारांत डोळ्यांना दोर दिसला तर तो म्हणतो की, हा काय सर्प आहे ? का काठी पडली आहे ? का फुलाची माळ आहे ? किंवा कोणी स्त्री मोत्यांचा हार विसरून गेली आहे ? ८७.


    तेवीं निजात्मा मी पुरुषोत्तम । त्या मज नानारूपें नानाकर्म ।
    काळु आत्मा आगम । स्वभावधर्म मज म्हणती ॥८८॥
    त्याप्रमाणे मी निजात्मा पुरुषोत्तम सर्वत्र असता, त्या मला नाना प्रकारची रूपें, नामें व कर्में कल्पून, मला काळ, आत्मा, वेद, स्वभाव, धर्म, इत्यादि म्हणतात ८८.


    'काळु' म्हणती प्रकृतिक्षोभकु । 'आत्मा' म्हणती प्रकृतिनियामकु ।
    'वेद' म्हणती कर्मबोधकु । अदृष्टद्योतकु 'धर्म' म्हणती ॥८९॥
    प्रकृतीला क्षोभ करणारा म्हणून मला 'काळ' म्हणतात. प्रकृतीचा नियामक म्हणून मला 'आत्मा' असे म्हणतात. कर्माचा बोधक म्हणून 'वेद' असें म्हणतात, आणि अदृष्टाचा द्योतक म्हणून 'धर्म' असे म्हणतात ८९.


    अदृष्ट दृष्ट करूनि भोगविजे । यालागीं 'धर्म तो म्हणिजे ।
    आतां 'स्वभावो' जेणें बोलिजे । तेंही सहजें परियेसीं ॥६९०॥
    अदृष्टाला दृष्ट करून त्याचा भोग देतो म्हणून त्याला 'धर्म' असे म्हणतात. आतां 'स्वभाव' ज्यावरून म्हणतात त्याचे कारणही सहजी ऐकून ठेव ६९०.


    आत्मा भोक्ता हा 'स्वभावो' । जेणें परिणामें देवाधिदेवो ।
    इत्यादिका हेतु पहा हो । मजचि 'स्वभावो' म्हणताति ॥९१॥
    आत्मा भोक्ता हाच 'स्वभाव' होय. ज्या परिणामाने देवाधिदेव आत्मा, भोक्ता, स्वभाव, इत्यादिकांचे कारण होतो, त्या परिणामाला स्वभाव असें म्हणतात ९९.


    अदृष्टाचें फळ नाना लोक । 'लोक' म्हणावया हेतु हे देख ।
    एवं मज एकातें अनेक । मिथ्या मूर्ख मानिती ॥९२॥
    अनेक प्रकारचे लोक प्राप्त होणे हे अदृष्टाचे फळ आहे. मला 'लोक' म्हणण्याचे कारणही हेच आहे. तात्पर्य, मला एकालाच मूर्ख लोक अनेक असें व्यर्थ मानतात ९२.


    नानारंगांचिया वृत्ती । चित्र लिहिलें यथानिगुती ।
    तेंही नानाकारें दिसे भिंतीं । सर्वव्यक्तिद्योतक ॥९३॥
    अनेक रंगांच्या झांकीने भिंतीवर यथातथ्य चित्र काढलेले असते, त्यामुळे भिंत नानारूपात्मक दिसते, पण ती एकरूपच असते ९३,


    तैसे नानाकार नाना धर्म । नाना नामें नाना कर्म ।
    तें मी अवघा आत्माराम । सर्वोत्तम सर्वथा ॥९४॥
    त्याप्रमाणे नानाप्रकारची रूपें व नाना प्रकारचे धर्म, नाना प्रकारची नामें व नाना प्रकारचे कर्म, ही सारी सर्वदा मी सर्वोत्तम आत्मारामच आहे ९४.


    मजवेगळा रिता कांहीं । अणुभरी ठाव उरला नाहीं ।
    मी सर्वात्मा सर्व देहीं । सर्वगत पाहीं सर्वदा ॥९५॥
    माझ्याशिवाय रिकामी अशी अणुभरसुद्धा जागा नाही. साऱ्या देहांमध्ये सदासर्वदा मी सर्वांतरात्मा व्यापून राहिलेला आहे ९५.


    जैसे सागरामाजीं तरंग । तैसें मजमाजीं दिसे जग ।
    जग नव्हे तें मीचि चांग । सुख अव्यंग मजमाजीं ॥९६॥
    समुद्रामध्ये जशा लाटा दिसतात, त्याप्रमाणे माझ्यामध्ये हे सारे जग दिसते; पण हे जग नव्हे, तर मीच स्वतः आहे; आणि अव्यंग सुख माझ्याच ठिकाणी आहे ९६.


    मी शुद्ध-बुद्ध-मुक्तस्वभाव । त्या मज नानात्वें ठेविती नांव ।
    उद्धवा ज्यासी जैसा भाव । तैसा मी देव तयासी ॥९७॥
    मी 'शुद्ध-बुद्धामुक्त-स्वभाव' आहे. त्या मला नानाप्रकारची नांवे ठेवतात. उद्‌धवा ! ज्याचा जसा भाव असतो, तसाच त्याला मी देव होतों ९७.


    नास्तिक्य वसे ज्याचे ठायीं । त्यासी मी सर्वथा कोठें नाहीं ।
    आस्तिक्यवंतालागीं पाहीं । मी सर्वांठायीं तिष्ठतु ॥९८॥
    ज्याच्यामध्ये नास्तिकपणा असतो, त्याला मी कधीच कोठेही नसतों ; आणि ज्याच्या मनांत आस्तिक्यबुद्धि असते, त्याच्यासाठी मी सर्व ठिकाणी उभा असतों ९८.


    भावार्थे जो मज जेथें पाहे । त्यासी मी तेव्हांचि तेथें आहें ।
    मज पावावया उपाये । बहुत पाहें न लगती ॥९९॥
    भक्तिभावाने जो मला जेथे पाहतो, त्याला मी तेथेच असतो. हें पहा ! माझी प्राप्ति होण्याला फारसे प्रयास नको आहेत ९९.


    मी सर्वात्मा सर्वमत एकु । ऐसा जयाचा भाव निष्टंकु ।
    तोचि पढियंता मज एकु । ज्ञानतिलकु तो माझा ॥७००॥
    मी सर्वात्मा, सर्वव्यापक असा एकच आहे, असा ज्याचा निश्चयात्मक भाव असतो, तोच एक माझा आवडता भक्त आणि तोच माझा ज्ञानाचा तिलक होय ७००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...