मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० ओव्या ४०१ ते ५००

    तेथें चैतन्य जें प्रतिबिंबले । तेंचि 'जीव' पणें वाच्य झालें ।

    जेवीं थिल्लरीं चंद्रबिंब बुडालें । दिसे नाथिलें मूर्खासी ॥१॥
    त्या मायेमध्ये जे चैतन्य प्रतिबिंबित झाले आहे, त्यालाच 'जीव' असे म्हणतात. मूर्खाला ज्याप्रमाणे डबक्यांत चंद्रबिंब बुडालें असें खोटेंच दिसते, (तसेंच हे आहे) १.


    त्या थिल्लरासी नातळत । चंद्रमा असे गगनीं अलिप्त ।
    तैसा आत्मा अविद्यातीत । अविद्या नातळत प्रतिबिंबाला ॥२॥
    पण चंद्र हा त्या डबक्याला न शिवतां आकाशामध्ये अलिप्तच असतो. त्याप्रमाणे आत्माही अविद्येपासून निराळाच आहे. प्रतिबिंबाला सुद्धा अविद्या शिवत नाही, मग बिंबाला कुठली ? २.


    'अहमिति' प्रथमाध्यासें । सूक्ष्म लिंगदेह मायावशें ।
    नाना अनर्थकारी कैसें । वासनासौरसें उपजलें ॥३॥
    'अहं' ह्या प्रथमाध्यासाने वासनेच्या आसक्तीने उत्पन्न झालेले सूक्ष्म असे जे लिंगशरीर, ते मायेला वश होऊन अनेक अनर्थ उत्पन्न करतें ! ३.


    जरी लिंगदेह झालें सबळ । विषयभोगा दृढ मूळ ।
    तरी भोगु नव्हे स्थूळ । सूक्ष्म भूतगोळ स्थूळावला ॥४॥
    लिंगदेह बलवान् झाला म्हणजे तोच विषयभोगाचे दृढ मूळ होतो. पण लिंगदेह काही स्थूल भोग घेऊ शकत नाही. सूक्ष्मभूतसमूहच स्थूल भूताकार होतो ४.


    स्थूळापासोनि स्थूळ देहो । पांचभौतिक घडला पहा हो ।
    एवं उभयदेह अभिप्रावो । झाला निर्वाहो या रीतीं ॥५॥
    त्यानंतर पंचमहाभूतांपासून स्थूलदेह उत्पन्न होतो. अशा प्रकारे दोन्ही देह नावारूपाला येतात ५.


    ऐसा उभय देहीं वर्ततां । दृढ लागली देहात्मता ।
    तेणें वाढली अहंममता । मी कोण हें तत्त्वतां विसरला ॥६॥
    अशा या दोन्ही देहांत वागतांना जीवाला देहबुद्धि दृढतर होऊन राहते. त्यामुळे अहंममता वाढते, आणि खरोखर मी कोण हें तो विसरूनच जातो ६.


    न कळे निजसुखाची गोडी । पडला विषयांचिये वोढी ।
    पापपुण्यांचिया जोडी कोडी । पडिली बेडी सुबुद्धा ॥७॥
    आत्मसुखाची गोडी कळत नाही, त्यामुळे विषयांची चटक लागून राहते. पापपुण्याच्या राशी जोडतो; सुबुद्ध असताही अशा रीतीनें पायांत बेडी पडते ७.


    देहाध्यासें देहधर्म । सत्य मानी वर्णाश्रम ।
    मग आचरों लागे कर्म । फळसंभ्रम वांछूनि ॥८॥
    देह हाच मी अशी भावना दृढ झाल्याने देहाचे धर्म म्हणजे स्थूल, कृश इत्यादि व त्यास लागून असणारे वर्णाश्रमाचे धर्म खरे मानूं लागतो. आणि मग फळाच्या वैभवाची इच्छा धरून कर्माचरण करूं लागतो ८.


    राजा चक्रवर्ती निजमंदिरीं । निजेला सुमनशेजेवरी ।
    तो स्वप्नीं होऊनि भिकारी । अंत्यजाघरीं अन्न मागे ॥९॥
    एखादा सार्वभौम राजा आपल्या मंदिरांत पुष्पशय्येवर निजलेला असतो, तोच स्वप्नामध्ये भिकारी होऊन एखाद्या अंत्यजाच्या घरी अन्न मागावयाला जातो ९.


    तेथ कुटका एकु यावया हाता । नीचासी म्हणे राजा रे तूं तत्त्वतां ।
    परी मी राजा हें नाठवे चित्ता । स्वप्नीं भिक्षुकता दृढ झाली ॥३१०॥
    तेथे एखादा तुकडा हातावर पडावा म्हणून तो त्या नीचाला म्हणतो, 'अरे ! तूं खरोखर राजा आहेस, पण आपण स्वतः राजा आहे ह्याची त्याच्या मनाला आठवणही होत नाही. स्वप्नामध्ये आपण भिकारी आहों, हेच त्याच्या मनांत बिंबलेले असते ३१०.


    तैसी विसरोनि निजात्मता । फळें मागे देवां देवतां ।
    मी देवांचा देवो तत्त्वतां । हें त्यासी सर्वथा नाठवे ॥११॥
    त्याप्रमाणेच आपली निजात्मता विसरून जाऊन तो देवांना आणि देवतांना फळे मागू लागतो. पण खरोखर देवांचाही देव आपण आहे हे त्याला मुळीच आठवत नाही ! ११.


    त्या स्वप्नाचेनि अतिअध्यासें । राजा वोसणावे 'मी भिकारी' ऐसें ।
    ऐकोनि सेवकां येत हांसें । राजा स्वप्नवशें जल्पतु ॥१२॥
    त्या स्वप्नाच्या अध्यासामुळे तो राजा 'मी भिकारी' असे ओरडत असतो. ते ऐकून जवळच्या सेवकांना हंसें येते; आणि ते म्हणतात राजेसाहेब स्वप्नांत बडबडत आहेत ! १२.


    येथ गाढ मूळ अवस्थाघोरें । सर्वांग गडबडी निदसुरें ।
    नागवें उघडें न स्मरे । निद्राभरें घोरत ॥१३॥
    त्याला गाढ व बेशुद्ध अवस्थेनें घेरलेले असते. झोपेच्या भरांत सारे अंग गडबडा लोळत असते. ते नागवें आहे का उघडे आहे, याचीही त्याला शुद्धि नसते. झोपेमध्ये तो घोरत असतो १३.


    त्यासी थापटी पुरोहितु । जागा होतां होय विस्मितु ।
    मग नागवेपणा आच्छादितु । सांगों लाजतु भिक्षुकता ॥१४॥
    त्याला पुरोहित येऊन थापटतो, तेव्हां विस्मय पावून जागा होतो, व नागवेपणा झाकण्याकरितां अंगावर वस्त्र घेतो; आपण स्वप्नांत भिकारी झालो होतो, हे सांगावयाची त्याला लाज वाटू लागते १४.


    तेवीं अविद्या निद्रा उद्‍भटा । जल्पे मी देही मी करंटा ।
    मी संपन्नु मी ज्ञाता मोठा । देहात्मनिष्ठा बडबडी ॥१५॥
    त्याप्रमाणे अविद्यारूप निद्रेच्या तंद्रीने घेरलें म्हणजे मी देहधारी, मी कपाळकरंटा, मी श्रीमंत, मी ज्ञाता, मी मोठा असें तो देहात्मभावानें बडबडत असतो १५.


    तेणें निदसुरपणाचे लाहें । कर्माकर्मांचे पसरी पाये ।
    हिताहित कोण पाहे । देहमोहें मोहितु ॥१६॥
    त्या झोपाळूपणांत तो कर्माकर्मरूप पाय पसरतो. देहाच्या मोहाने भूल पडली असल्यामुळे हिताहित तरी पहाणार कोण ? १६.


    तो गाढमूढ अवस्थेआंतु । होता दीर्घसंकल्पें लोळतु ।
    लोभें अतिजल्पें जल्पतु । वोसणतु 'मी माझें' ॥१७॥
    तो तसाच गाढ मूढ अवस्थेमध्ये दीर्घसंकल्पाने लोळत असतो. आणि लोभाने पाहिजे ती बडबड करतो, व 'मी आणि माझे' असे ओरडत असतो १७.


    तेथें दैवयोगें गडबडितु । अवचटें गुरुचरणीं आदळतु ।
    निकटता देखोनि कृपावंतु । थापटितु निजबोधें ॥१८॥
    अशा रीतीने गडबड लोळत असतां अकस्मात दैवयोगानें गुरूच्या पायांवर जाऊन आदळतो. तेव्हां जवळ आलेला पाहून श्रीगुरु कृपावंत होऊन त्याला निजबोधाने थापटतात १८.


    'ब्रह्माहमस्मि' ऐसी वाणी । एक वेळ पडली कानीं ।
    अविद्या निद्रा गेली पळोनी । तो तत्क्षणीं जागिन्नला ॥१९॥
    'ब्रह्माहमस्मि' (मी ब्रह्म आहे) अशी वाणी एक वेळ कानावर पडली की, तत्काळ अविद्यारूप निद्रा पळून जाऊन तो लागलाच जागा होतो १९.


    जागतांचि होय विस्मित । 'मी देह' म्हणतां लाजत ।
    देहकर्म देखे निंदित । कर्मातीत ब्रह्म मी ॥३२०॥
    जागा होतांच तो विस्मित होतो आणि 'मी देह' म्हणतांना लाजू लागतो, व देहकर्माची निंदा करतो. आणि कर्मातीत जें ब्रह्म तें मीच असें म्हणतो ३२०.


    होआवया संसारबंधन । यासी अविद्याचि गा कारण ।
    तिसी छेदावया जाण । खड्‍ग तीक्ष्ण ब्रह्मविद्या ॥२१॥
    संसारबंधन पाठीस लागावयाला अविद्या हीच एक कारण आहे. तिला छेदावयाला ब्रह्मविद्या हेच तीक्ष्ण खड्ग आहे, असें तूं समज २१.


    अविद्या निरसी ब्रह्मज्ञान । ते अवश्य ब्रह्माहोनि भिन्न ।
    मोडलें म्हणसी अद्वैतपण । तें नव्हे जाण सिद्धांतीं ॥२२॥
    ब्रह्मज्ञान में अविद्येचे निरसन करते, त्याअर्थी ती ब्रह्माहून अवश्य भिन्न असली पाहिजे; आणि ती भिन्न म्हटली की, अद्वैतपण मोडले असें म्हणशील तर सिद्धांतामध्ये हे टिकणारे नाही २२.


    प्रपंचु अज्ञानें लाठा । ज्ञान‍अज्ञानाच्या सत्त्ववाटा ।
    फेडिजे कांटेन कांटा । मग खटपटा निमाल्या ॥२३॥
    अज्ञानामुळेंच प्रपंच वाढला आहे. त्यांत ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या सूक्ष्म वाटा आहेत; काट्याने काटा काढून टाकला म्हणजे सारी यातायात संपली २३.


    अविद्या जीवबंधनी । ब्रह्मविद्या बंधच्छेदनी ।
    या समूळ तुजलागुनी । सांगितल्या दोनी सविस्तर ॥२४॥
    अविद्या ही जीवाला बंधन घालणारी आणि महाविद्या ही बंधाचे छेदन करणारी आहे. त्या दोन्ही तुला सविस्तर सांगून दिल्या २४.


    तेचि ब्रह्मविद्या जाणा । कैसेनि प्राप्त होय आपणा ।
    ते पूर्वपीठ विवंचना । सावधमना परियेसीं ॥२५॥
    आता तीच ब्रह्मविद्या आपल्याला कशी प्राप्त होईल, याबद्दलची पूर्वपीठ विवंचना सांगतों ती लक्ष देऊन ऐक २५.


    तस्माज्जिज्ञासयाऽऽत्मानं आत्मस्थं केवलं परम् ।
    सङ्गम्य निरसेदेतद् वस्तुबुद्धिं यथाक्रमम् ॥ ११ ॥
    [श्लोक ११] म्हणूण विवेकाने देहामध्ये असणार्‍या केवलस्वरूप परमात्म्याला नीट जाणून, स्थूलसूक्ष्म देहांविषयीची सत्यबुद्धी सोडून द्यावी. (११)


    उद्धवा याचिलागीं नित्य । जिज्ञासें बैसवावें चित्त ।
    तिसी विवेक उपजवित । सत्यासत्यविभागें ॥२६॥
    उद्धवा ! याचकरितां जिज्ञासूनें चित्ताला नेहमी स्थिर ठेवावे, म्हणजे सत्यासत्यविभागाने विवेक उत्पन्न होतो २६.


    तेथ असत्य तितकी 'अविद्या' । जिचेनि जीवासी परम बाधा ।
    तिच्या समूळ करावया छेदा । 'सद्विद्या' साधावी ॥२७॥
    त्यांत असत्य असेल तितकी 'अविद्या' होय. तिच्या योगेंकरून जीवाला अतिशय पीडा होते. तिला समूळ खणून काढण्यासाठी 'सद्विद्या' संपादन करावी २७.


    सद्विद्या साधिलिया पाहीं । केवळ वस्तु ते दूरी नाहीं ।
    असे आपुल्याचि ठायीं । येचि देहीं कूटस्थ ॥२८॥
    सद्विद्या साध्य केली की, सद्वस्तु (परब्रह्म) दूर नाही. आपल्याच ठिकाणी, याच देहांत कूटस्थ होऊन आहे २८.


    कार्यकारणसंघात । यामाजीं वस्तु असे व्याप्त ।
    व्यापूनियां अलिप्त । नित्यमुक्त स्वभावें ॥२९॥
    शरीर-इंद्रियांच्या समुदायांत ब्रह्म हें व्यापलेले असते ; पण तें व्यापलेलें असूनही अलिप्त आणि स्वभावधर्माप्रमाणे नित्यमुक्तच राहातें २९.


    करूनि सद्विद्यासाधन । धरूनि आत्मानुसंधान ।
    देहद्वयाचें निरसन । साधकें जाण साधावें ॥३३०॥
    सद्विद्येचे साधन करून, आत्मानुसंधान धरून साधकानें दोन्ही देहांचे निरसन साध्य करून घ्यावें ३३०.


    स्थूल नश्वरत्वे मिथ्या झालें । सूक्ष्म वासनामय कल्पिलें ।
    ते कल्पनेसी मिथ्यात्व आलें । ब्रह्म उरलें निर्विकल्प ॥३१॥
    स्थूल देह हा नश्वर असल्यामुळे मिथ्याच झाला; आणि सूक्ष्म देह वासनामय कल्पित आहे ; त्या कल्पनेलाही मिथ्यात्व येते. त्यामुळे बाकी राहातें तें निर्विकल्प ब्रह्मच राहते ३१.


    जैशा गगनीं नाना मेघपंक्ती । निजबळें त्या वर्षती ।
    त्याचि शारदियेचे अंतीं । हरपोनि जाती आकाशीं ॥३२॥
    ज्याप्रमाणें आकाशात प्रचंड मेघपंक्ति भरून येऊन आपल्याच सामर्थ्याने पर्जन्यवृष्टि करतात; पण त्याच शरद्‌ऋतूच्या अखेरीस आकाशांतच लुप्त होतात ३२.


    तैसी देहीं देहात्मबुद्धी । दृढ केली होती त्रिशुद्धी ।
    तेचि विवेकाचिया प्रबोधीं । नास्तिकसिद्धी पावली ॥३३॥
    त्याप्रमाणे देहामध्येच जी आत्मबुद्धि दृढ केलेली होती, तीच विवेकाचा उदय होतांच नाहीशी होऊन जाते ३३.


    देह-असद्‍भावाची पदवी । ब्रह्मविद्येच्या सद्‍भावीं ।
    खद्योततेजाची दिवी । सूर्ये देखावी कैसेनि ॥३४॥
    काजव्याच्या उजेडाची ज्योत सूर्याला पहावयाला कशी मिळणार ? त्याप्रमाणे ब्रह्मविद्येचा उदय झाल्यावर देहाचे सत्यस्व कसे टिकणार ? ३४.


    दोर भासला होता विखार । त्याचा करितां निजनिर्धार ।
    हारपोनियां सर्पाकार । उरे दोर निजरूपें ॥३५॥
    दोराच्या ठिकाणी सापाचा भास झाला होता, त्याची जेव्हा शहानिशा झाली, तेव्हां सापाचा आकार जाऊन दोर तो दोराच्या स्वरूपानेच शिल्लक राहिला ३५.


    पाहतां विवेकाचेनि निवाडें । दोराचें सर्पत्व जेवीं उडे ।
    तेवीं ब्रह्मसद्‍भावीं रोकडें । देह नातुडे सत्यत्वें ॥३६॥
    विवेकानें ठरविले असता ज्याप्रमाणे दोराचे सर्पपण उडून जाते, त्याप्रमाणे ब्रह्माच्या सत्यत्वापुढे देहाचे सत्यत्व उरत नाही ३६.


    'नरदेह आश्रयून । ब्रह्मविद्या वाढली जाण ।
    तें आपुलें जन्मस्थान । देहनिर्दळण केवीं करी' ॥३७॥
    नरदेहाचा आश्रय करून ब्रह्मविद्या वाढलेली असते. तेव्हा तिचे जन्मस्थान जो देह, त्याचेच निर्मूलन ती कशी करील ? ३७.


    उद्धवा तूं ऐस‍ऐसी । आशंका झणीं धरिसी ।
    ते अग्निउत्पत्तिदृष्टांतेंसीं । तुजपाशीं सांगेन ॥३८॥
    उद्धवा, अशा प्रकारची शंकाही कदाचित घेशील; तर अग्नीच्या उत्पत्तीच्या दृष्टांताने तिचे समाधान तुला सांगतों, ऐक ३८.


    आचार्योऽरणिराद्यः स्यादन्तेवास्युत्तरारणिः ।
    तत्संधानं प्रवचनं विद्यासंधिः सुखावहः ॥ १२ ॥
    [श्लोक १२] (यज्ञासाठी अग्नी उंबराच्या लाकडांपासून घुसळून काढतात त्यात खाली लाकूड असते त्याला 'अधरअरणी' म्हणतात वरच्याला 'उत्तरअरणी' म्हणतात आणि मधल्या उभ्या रवीसारख्या लाकडाला 'मंथनकाष्ठ' म्हणतात हे घुसळले असता अग्नी उत्पन्न होतो येथे हे रूपक केले आहे) ज्ञानरूप अग्नी उत्पन्न होणार्‍या क्रियेत आचार्य खालचे लाकूड आहेत, आणि शिष्य वरचे आचार्यांचे प्रवचन हे मंथनकाष्ठ होय त्यापसून आत्मज्ञानरूपी अग्नी निर्माण होतो तो परमानंद देणारा आहे. (१२)


    दों काष्ठांचिया घसणीं । अग्नि काढिला मंथोनि ।
    तो काष्ठें काष्ठ जाळूनी । अग्नि अग्निपणीं प्रज्वळला ॥३९॥
    दोन लाकडे एकमेकांवर घासून त्या घर्षणाने अग्नि उत्पन्न केला, तर तो त्या लाकडांनाच जाळून अग्नीच्या रूपाने प्रज्वलित होतो ३९;


    तैसी ब्रह्मविद्या जाण । गुरुशिष्यसंवादमंथन ।
    त्या मंथनाचें निरूपण । सावधान परियेसीं ॥३४०॥
    त्याप्रमाणे ब्रह्मविद्या ही गुरुशिष्याच्या संवादरूप मंथनाने (घर्षणानें ) उत्पन्न होते. त्या मंथनाचे निरूपण लक्ष देऊन ऐक ३४०.


    येथ आचार्य आद्य अरणी । शिष्य तो झाला उत्तरारणी ।
    उपदेश तो मंथास्थानीं । संवादमंथनीं मंथावे ॥४१॥
    त्यांत गुरु हा 'आद्य अरणि' म्हणजे अग्नि उत्पन्न करण्याचे खालचे काष्ठ ; आणि शिष्य हा 'उत्तरारणि' म्हणजे वरचे काष्ठ होय; उपदेश हा 'मंथा ' म्हणजे घुसळण्याची रवी होय. आणि गुरुशिष्यांचा संवाद ही मंथनक्रिया होय. ह्याप्रमाणे मंथन करावें ४१.


    ये मंथनी जरी आळसु केला । तरी ज्ञानाग्नीचा आविर्भाव गेला ।
    आपणिया आपण वंचला । थित्या मुकला साधना ॥४२॥
    ह्या मंथनांत म्हणजे संवादांत जर आळस केला, तर ज्ञानाग्नि काही उत्पन्न होणार नाही. आपणच आपल्याला फसविल्यासारखे होऊन असलेल्या साधनावर पाणी पडते ४२.


    धरितां आळसाची मागी । येव्हडा अनर्थु वाजे अंगीं ।
    आठही प्रहर शिणताति योगी । या योगालागीं साधावया ॥४३॥
    आळसाचा मार्ग पत्करला की, एवढा अनर्थ अंगावर कोसळतो. या योगाला साध्य करण्याकरितां आठही प्रहर योगी कष्ट करीत असतात ४३.


    निजस्वार्थालागीं सावधान । गुरुवचनाचें अनुसंधान ।
    अविश्रम करितां मंथन । ब्रह्मज्ञान तैं प्रकटे ॥४४॥
    आपल्या हितासाठी जागृति ठेवून गुरुवचनावर विश्वास धरून एकसारखें मंथन (मनन) करीत रहावे, तेव्हांच ब्रह्मज्ञान प्रगट होते ४४.


    प्रकटलें ब्रह्मज्ञान । उरों नेदी देहाचें भान ।
    दृश्य द्रष्टा दर्शन । करी प्राशन तात्काळ ॥४५॥
    तें ब्रह्मज्ञान एकदां प्रगट झाले की, देहाचे भान उरूंच देत नाही. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन में सारें तत्काळ ग्रासूनच टाकतें ४५.


    कार्य कर्म आणि कर्ता । ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता ।
    हें उरों नेदी सर्वथा । निजात्मता निजबोधें ॥४६॥
    आत्मज्ञानाने आत्मस्वरूप लाधलें कीं, कार्य-कर्म-कर्ता किंवा ज्ञान-ज्ञेय-ज्ञाता ही मुळीच राहत नाहीत ४६.


    निजबोधें संसार-दुःख । निरसूनि दिधलें निजसुख ।
    निजात्मसुखीं निःशेख । मायागुण देख नासिले ॥४७॥
    आत्मज्ञानाने संसारदुःख लयास जाऊन आत्मसुखाचा लाभ होतो; आणि आत्मसुखामध्ये मायेच्या गुणदोषांचा चट सारा नाश होऊन जातो ४७.


    वैशारदी सातिविशुद्धबुद्धिः  nbsp; धुनोति मायां गुणसंप्रसूताम् ।
    गुणांश्च सन्दह्य यदात्ममेतत्  nbsp; स्वयं च शाम्यत्यसमिद् यथाग्निः ॥ १३ ॥
    [श्लोक १३] बुद्धीमान शिष्यांची ती अत्यंत शुद्ध झालेली बुद्धी गुणांपासून उत्पन्न झालेल्या विषयरूप मायेचे भस्म करून टाकते जेव्हा जग उत्पन्न करणारे गुण भस्म होतात, तेव्हा इंधनाला जाळून स्वतः शांत होणार्‍या अग्नीप्रमाणे ती बुद्धीसुद्धा नाहीशी होते. (१३)


    नाशावया निजमायागुण । शिष्य विशारद बुद्धिनिपुण ।
    दैवी संपदेचें अधिष्ठान । सद्‍गुणीं संपन्न सर्वदा ॥४८॥
    आत्ममायेचे गुण निरसन करण्याकरितां शिष्य चतुर आणि बुद्धिमान् व दैवी संपत्तीचा आश्रय करून निरंतर सद्गुणसंपन्न असावा लागतो ४८.


    ऐसा मुमुक्षु अधिकारवंतु । त्यासी शाब्दपरनिष्णातु ।
    गुरूंनीं माथां ठेविला हातु । निजबोधु प्राप्तु तत्काळें ॥४९॥
    अशा प्रकारच्या अधिकारी मुमुक्षुच्या मस्तकावर शास्त्रपारंगत व स्वानुभवसंपन्न अशा गुरूंनी वरदहस्त ठेवला असता त्याला तत्काळ निजबोध प्राप्त होतो ४९.


    निजबोधीं बैसतां दृष्टी । गुणकार्य रिघे गुणांच्या पोटीं ।
    तेव्हां गुणुचि गुणातें आटी । तमातें घोंटी मध्यमु ॥३५०॥
    त्या निजबोधांत दृष्टि स्थिर झाली म्हणजे गुणांचे कार्य गुणांच्याच पोटांत शिरतें. तेव्हां गुणच गुणाला गिळून टाकतात. तमाला रजोगुण प्राशन करतो ३५०.


    तम खाऊन रजोगुण । अत्यंत उन्मत्त झाला जाण ।
    त्याचें देखोनि उन्मत्तपण । सत्त्वें सत्त्वगुण खवळला ॥५१॥
    सम खाउन रजोगुण अत्यंत उन्मत्त झाला की, त्याचा तो उन्मत्तपणा पाहून सत्त्वपणाने सत्त्वगुणही खवळतो ५१.


    जेव्हां खवळला सत्त्वगुण । त्यासी न साहे दुजेपण ।
    रजोगुणांचें प्राशन । केलें जाण तत्काळ ॥५२॥
    सत्त्वगुण खवळला, की त्याला दुजेंपण सहन होत नाही. म्हणून तो तत्काळ रजोगुणाला गिळून टाकतो ५२.


    केवळ सत्त्वाचा स्वभावो । तेणें निजसुखाचा अनुभवो ।
    क्षणक्षणां नीच नवा पहावो । अतिनवलावो अनुभवीं ॥५३॥
    शुद्धसत्त्वाचा स्वभावच असा आहे की, त्याने आत्मसुखाचा अनुभव येतो. त्या अनुभवाचे कसे आश्चर्य पहा ! की तो निरंतर नित्य नवाच वाटतो ५३.


    तेणें सुखानुभवें देखा । रजतमाच्या बीजकणिका ।
    ज्या सृष्टिसृजनीं उन्मुखा । त्याही निःशेखा जाळिल्या ॥५४॥
    आणखी असे पहा की, त्या सुखानुभवाने सृष्टि उत्पन्न करण्यास साहाय्यभूत असणाऱ्या ज्या रजतमाच्या बीजाच्या कण्या शिल्लक राहिलेल्या असतात, त्यांचीही राखरांगोळी होऊन जाते ५४.


    तेव्हां गुण प्रसवती माया । शोधित सत्त्वें आणिली लया ।
    ते सत्त्ववृत्ति एकलिया । अद्वैततया उरलीसे ॥५५॥
    तेव्हां गुणांना उत्पन्न करणारी मायाही त्या शुद्ध सत्वांत लय पावते. आणि ती सत्त्ववृत्ति एकटेपणाने अद्वैतरूपानेच शिल्लक राहाते ५५.


    तेव्हां 'ब्रह्माहमस्मि' लक्षण । तेंही हों लागलें क्षीण ।
    सोहंहंसाची बोळवण । ते संधी जाण होतसे ॥५६॥
    तेव्हा 'ब्रह्माहमस्मि' - म्हणजे ब्रह्म तें मीच-ही भावनाही हळूहळू क्षीण होऊ लागते. आणि त्याच वेळी 'सोहंहंसा' चीही बोळवण होते ५६.


    तेथ देहींचें गेलें देहपण । जन्ममरणा आलें मरण ।
    विश्वाचें न दिसे भान । आनंदघन कोंदला ॥५७॥
    त्यावेळी देहाचा देहपणाच नाहींसा होतो आणि जन्ममरणालाच मरण येते. विश्वाचे भान नाहीसे होते व जिकडे तिकडे घनानंद भरून राहतो ५७.


    तेणें सुखस्वरूप झाली दृष्टी । आनंदमय झाली सृष्टी ।
    परमानंदें चढली पुष्टी । स्वानंदे मिठी घातली ॥५८॥
    तेव्हां सारी दृष्टि सुखमयच होऊन जाते, आणि सारी सृष्टिही आनंदमय होते. आत्मानंदाने मिठी घातल्यामुळे परमानंदच माजून राहतो ५८.


    त्या सुखाची मर्यादा । काइसेनिही नव्हे कदा ।
    जेथ मौन पडिलें वेदां । वृत्ति तत्पदा पावली ॥५९॥
    त्या सुखाची बरोबरी कधी कशानेंच व्हावयाची नाही. वेदांनाही जेथे मौन पडते, अशा तत्पदाला वृत्ति पोंचते ५९.


    द्वैत सर्वथा नाहीं पुढें । यालागीं वृत्तीची वाढी मोडे ।
    तेव्हा तेही सुखस्वरूपीं बुडे । पुढें वाढे तें नाहीं ॥३६०॥
    पुढे द्वैत म्हणून उरतच नाहीं; त्यामुळे वृत्तीची वाढ खुंटते. ती सुखस्वरूपांत बुडून गेल्यामुळे पुढे तिची वाढीमोडी राहात नाही ३६०.


    जैसा निरिंधन अग्नी । जाय निजतेजीं मिळूनी ।
    तैशी वृत्ति अद्वैतपणीं । मिळे मिळणीं सुखरूपीं ॥६१॥
    लाकडांवांचून अग्नि जसा आपल्या मूळच्या तेजांत मिळून जातो, त्याप्रमाणे वृत्तिही अद्वैतपणाने सुखस्वरूपांतच मिळून एकरूप होते ६१.


    गंगा सागर मीनली । ते समुद्रचि होऊनि ठेली ।
    कां लवणजळां भेटी झाली । मिठी पडली जळत्वें ॥६२॥
    गंगा समुद्राला मिळाली म्हणजे समुद्रच होऊन राहते, किंवा पाण्याची आणि मिठाची भेट झाली म्हणजे ते सारे पाणीस्वरूपच होते ६२.


    दीपीं दीपु एकवटला । मिळणीं एकुचि होऊनि ठेला ।
    तैसा वृत्तीचा लयो झाला । निर्व्यंग पावला निजसुख ॥६३॥
    एक दिवा दुसऱ्या दिव्यांत मिळतांच दोन्ही एकरूप होतात, त्याप्रमाणे वृत्तीचा लय झाला म्हणजे निर्व्यंग अशा आत्मसुखाची प्राप्ति होते ६३.


    तेव्हां आत्मा एक अद्वैत । तेंही म्हणणें नाहीं तेथ ।
    एवं द्वैताद्वैतातीत । नित्य निश्चित निजात्मा ॥६४॥
    तेव्हां आत्मा हा एक अद्वैत आहे, हेही म्हणणे त्या वेळी शिल्लक राहात नाही. अर्थात् आत्मा हा द्वैताद्वैताहून भिन्न, नित्य आणि सत्यस्वरूप असा आहे ६४.


    तो ज्ञानस्वरूप स्वप्रकाश । अविकारी अविनाश ।
    अकर्ता अभोक्ता उदास । निर्विशेष निजरूप ॥६५॥
    तो ज्ञानस्वरूप, स्वयंप्रकाश, अविकारी, अविनाशी, अकर्ता, अभोक्ता, उदास आणि निर्विशेष असा निजात्मरूप आहे ६५.


    तो अदेही अगोत्र । अचक्षु अश्रोत्र ।
    अमनस्क अमंत्र । सर्व मंत्र-मंत्रार्थ जो ॥६६॥
    त्याला देह नाही, त्याला कुल नाही, त्याला डोळे नाहींत, त्याला कान नाहींत, त्याला मन नाहीं, तो सर्व मंत्र व मंत्रार्थस्वरूप आहे ६६.


    जो अज आद्य अप्रमेय । अतर्क्य अलक्ष्य अव्यय ।
    नामरूपादि अभाव्य । भावना भाव ते शून्य ॥६७॥
    तो अजन्मा, आद्य, अप्रमेय, अतर्क्य, अलक्ष्य, अव्यय, नामरूपादिकांनी आकलन न होणारा भावाभावशून्य असा आहे ६७.


    जो भोग्य भोग नव्हे भोक्ता । जो कार्य कर्म नव्हे कर्ता ।
    कर्ता अकर्ता या वार्ता । जेथ सर्वथा निमाल्या ॥६८॥
    जो भोग्य, भोक्ता व भोगही नव्हे; जो कार्य, कर्ता व कर्मही नव्हे; कर्ता आणि अकर्ता ह्या गोष्टीच जेथे नाहीशा झाल्या ६८;


    जो अविनाशी अभंग । जो शुद्ध बुद्ध असंग ।
    देहद्वयाचा संग । ज्याचें अंग स्पर्शेना ॥६९॥
    तो अविनाशी, अभंग, शुद्ध, बुद्ध, असंग, देहद्व्ययाचा स्पर्शसुद्धा त्याला नाही ६९,


    आत्म्यावेगळें तें अनित्य । हा पूर्वनिश्चय होतां सत्य ।
    आतां बुडाले नित्यानित्य । सबराभरित निजात्मा ॥३७०॥
    आत्म्याशिवाय सारे अनित्य होय, हा पूर्वीचा निश्चय घट्ट झाला असतां, नित्य आणि अनित्य दोन्ही बुडून जाऊन अंतर्बाह्य आत्मस्वरूपच शिल्लक राहातें ३७०.


    नेणपण निमालें सर्वथा । बुडाली जाणपणाची अवस्था ।
    गुणगुणीगुणातीतता । हेही तत्त्वतां तेथ नाहीं ॥७१॥
    अजाणपण सर्व नाहीसें झालें आणि जाणतेपणाची स्थितिहि राहात नाही. गुण, गुणी आणि गुणातीतपणा हेही खरोखर त्या अवस्थेत नाहींसे होतें ७१.


    उद्धवा परमात्मा तो तत्त्वतां । हा माझा निश्चयो सर्वथा ।
    तोचि उपनिषदर्थे अर्थितां । निजात्मता प्रतिपाद्य ॥७२॥
    उद्धवा ! खरोखर परमात्मा तो तोच, असा माझा सर्वतोपरी निश्चय आहे. उपनिषदर्थानें व्यक्त केलेला व आत्मत्वाने प्रतिपादन केलेला तोच ७२.


    येथ पावलियाहि वृत्ति । होय संसारनिवृत्ति ।
    हाचि वेदांतीं सिद्धांतीं । निश्चयो निश्चितीं केला असे ॥७३॥
    अशा स्थितीला वृत्ति जाऊन पोंचली की, संसाराची निवृत्ति होते. वेदांतानें व सिद्धांताने हाच शेवटचा निश्चय केलेला आहे ७३.


    येथूनि कार्य-कर्मकर्तव्यता । निःशेष खुंटली सर्वथा ।
    निजीं निजरूप निजात्मता । जाण तत्त्वतां पावल्या ॥७४॥
    निजात्मरूपाची खरोखर प्राप्ति झाल्यानंतर कार्य, कर्म, कर्तव्य हे सारें निखालस खुंटून जाते ७४.


    हे अद्वैतश्रुतिसुरवाडें । सद्‍गुरुकृपा-उजियेडें ।
    वृत्ति निजात्मपदा चढे । भाग्य केव्हडें पाहें पां ॥७५॥
    अद्वैतप्रतिपादक श्रुतिवाक्याच्या मननाने आणि गुरुकृपेच्या प्रकाशाने वृत्ति निजात्मपदाला पोचते. हे केवढे भाग्य पहा बरें ७५.


    मी वंद्य देवादिदेवां । त्या माझाही निजज्ञानठेवा ।
    परम कृपेनें उद्धवा । तुज म्यां आघवा दीधला ॥७६॥
    उद्धवा ! मी देवादिदेवांनासुद्धा वंद्य आहे. त्या माझ्या ज्ञानाचा सारा ठेवा तुला मी परमकृपेने दिला आहे ७६.


    तुज होआवया निवृत्ती । हाचि अर्थु नानासंमतीं ।
    सांगितला परम प्रीतीं । जाण निश्चितीं उद्धवा ॥७७॥
    उद्धवा ! तुला खरोखर निवृत्ति प्राप्त व्हावी म्हणून तोच विषय तुला अनेक श्रुतींचे आधार घेऊन परमप्रीतीने सांगितला ७७.


    आतां देहादिक जे असंत । अतिनिंद्यत्वें कुत्सित ।
    तेथ आतळों नेदीं चित्त । होई अलिप्त परमार्थीं ॥७८॥
    आतां देह आदिकरून जें जें मिथ्या, अत्यंत निंद्य, तिरस्कार्य, त्या ठिकाणी तूं आपलें चित्त शिवूं देऊं नकोस. तूं त्यापासून अलिप्त होत्साता परमार्थी हो ७८.


    हे तुज झाली अलभ्य प्राप्ती । परी यत्‍न करावा अतिनिगुतीं ।
    येथ मतांतरें छळूं येती । तेही उपपत्ती परियेसीं ॥७९॥
    हा तुला अलभ्य लाभ प्राप्त झालेला आहे ; पण त्याच्याविषयीं तूं झटून यत्न केला पाहिजेस. द्यांत मत-मतांतरें तुला छळावयास येतील, त्यांचाही विचार ऐक ७९.


    अथैषां कर्मकर्तॄणां भोक्तॄणां सुखदुःखयोः ।
    नानात्वमथ नित्यत्वं लोककालागमात्मनाम् ॥ १४ ॥
    [श्लोक १४] जर तुला असे वाटते की, कर्म करणारे व त्या कर्मांची सुखदुःखादी फळे भोगणारे जीव अनेक आहेत, तसेच कर्मांचे फलस्वरूप लोक, कर्मांच्या उपभोगाची वेळ, ती कर्मे सांगणारी शास्त्रे, कर्मांपासून मिळणारे शरीर, हे सर्व नित्य आहे, (१४)


    नाना फळें अभिलाषिते । कर्माचे जे कर्मकर्ते ।
    सुखदुःखांचे जे भोक्ते । अनेकत्वें येथें अनंत ॥३८०॥
    अनेकप्रकारची फळांची इच्छा करून अनेक कर्मे करणारे आणि त्यास अनुसरून सुखदुःख भोगणारे जीव अनंत आहेत ३८०.


    म्हणती जे मानिती एकात्मता । तरी एकाचेनि सुखें सुख समस्तां ।
    कां एकाचेनि पापें पापता । न घडे सर्वथा सकळांसी ॥८१॥
    ते असे म्हणतात कीं, कोणी सारे जीव एकरूपच आहेत असे मानतात ते खरे नव्हे; कारण, तसे असते तर एकाच्या सुखाने साऱ्यांनाच सुख झालें असतें किंवा एकाच्या पापानें सारेच पातकी झाले असते. पण तसें कांहीं सर्वांना घडत नाहीं ८१.


    ऐसें कर्मवादियांचें मत । जीव नित्य आणि अनंत ।
    मुख्य ईश्वरचि नाहीं म्हणत । कर्तें येथ निजकर्म ॥८२॥
    कर्मवाद्यांचे मत असें आहे की, जीव नित्य आणि अनंत आहेत ; मुख्य ईश्वर म्हणून नाहींच ; आपले कर्म हेंच कर्ते होय ८२.


    मीपणें जें स्फुरे स्फुरण । ते प्रतिशरीरीं जीव भिन्न ।
    त्यांच्या स्वरूपाचें प्रमाण । कर्ता भोक्ता जाण म्हणताति ॥८३॥
    मीपणानें मनांत जी अहंभावना उत्पन्न होते, ती प्रत्येक शरीरांत भिन्न असते ; म्हणून जीवही भिन्न भिन्न आहेत, कर्तेपण आणि भोक्तेपण हे त्यांच्या स्वरूपाचे प्रमाण आहे ८३,


    ऐकें विवंचना सावचित्त । लोक काळ श्रुति जीवित ।
    अनेकत्वें अनित्य । हें वेदांतमत पैं माझें ॥८४॥
    ह्यावरचा विचार लक्ष देऊन ऐक, लोक, काळ, श्रुति आणि जीवित ही अनेक असल्यामुळे अनित्य होत, हेच माझे वेदांतिक मत आहे ८४.


    उद्धवा कर्मवाद्यांचे ऐसें मत । सत्य मानील तुझें चित्त ।
    तरी बुडवील निजस्वार्थ । अंगीं अनर्थ वाजेल ॥८५॥
    उद्धवा ! कर्मवाद्यांचे मत तुझे मन कदाचित् खरें मानील, तर स्वार्थावर पाणी पडून अंगावर मोठा अनर्थ येऊन गुदरेल ८५.


    तोचि अनर्थ म्हणसी कैसा । तरी कर्मवाद्यांचा भावो ऐसा ।
    हा पूर्वपक्षाचा ठसा । अभिप्रावो ऐसा परियेसीं ॥८६॥
    तो अनर्थ कोणता असें म्हणशील तर ऐक. कर्मवाद्यांचा हा भाव म्हणजे पूर्वपक्षच आहे ८६.


    परमात्मा निर्विकाररूप । एक न मानिती सर्वस्वरूप ।
    संन्यासु ऐकतां म्हणती पाप । मतजल्प मतवाद्यां ॥८७॥
    परमात्मा निर्विकारस्वरूप असून सर्वस्वरूप एक आहे हें त्यांना मान्य नाही. 'संन्यास' हा शब्द ऐकतांच तें मोठें पातक आहे, असें ते म्हणतात ! अशी मताभिमान्यांच्या मतांची बडबड चालू असते ! ८७.


    त्यागसंन्यास जे करिती । त्यांतें अनधिकारी म्हणती ।
    कर्म मुख्यत्वें मानिती । वैराग्य निंदिती निजमतें ॥८८॥
    त्याग किंवा संन्यास करणारास ते अनधिकारी म्हणतात. ते कर्मालाच मुख्य समजतात, आणि आपल्या मते वैराग्याची निंदा करतात ८८.


    कर्म करोनि भोगिजे सुख । तें कर्म त्यजिती निःशेख ।
    निष्कर्मासी कैंचें सुख । परम दुःख तो त्यागु ॥८९॥
    त्यांचे म्हणणे कर्म करावें आणि सुख भोगावें; तें कर्मच चट सारे जे टाकून देतात, त्या निष्कर्म्यांना सुख ते कशाचें ? त्याग हा साऱ्या दुःखाचे मूळ आहे ८९.


    वैराग्य न घडावया कारण । चौं प्रकारीं बोलती जाण ।
    तेंही सांगेन मी लक्षण । सावधान परियेसीं ॥३९०॥
    वैराग्य हें मुळीं घडतच नाही. ह्याला ते चार कारणे पुढे करतात. त्याचेही स्वरूप मी सांगतो. लक्ष देऊन ऐक ३९०.


    म्हणती अनित्य असते कांहीं । तरी वैराग्य घडतें ते ठायीं ।
    येथ अनित्यचि नाहीं । वैराग्यें कायीं त्यजावें ॥९१॥
    ते म्हणतात की, अनित्य म्हणजे अशाश्वत असे जर कांही असते, तर त्यांत वैराग्य करतां आलें असतें; पण येथे मुळीं अनित्य असें कांहीं नाहींच ; तेव्हां वैराग्याने सोडावयाचे ते काय ? ९१.


    वैराग्य होये चौं प्रकारीं । मीमांसक नित्य मानिती चारी ।
    निजमताचा गर्व भारी । चार्‍ही खरीं नित्यत्वें ॥९२॥
    मीमांसकांचे असें मत आहे की, वैराग्य हे चार प्रकारांनी होते. ते चार गोष्टी नित्य मानतात. नित्यत्वामुळे चार्‍ही गोष्टी खऱ्या आहेत, असा त्यांना आपल्या मताचा मोठा गर्व आहे ९२.


    कर्मप्रकाशक वेद मूळ । तो आगम नित्य मानी अढळ ।
    जीव नित्यचि म्हणे सकळ । भोगकाळ तोही नित्य ॥९३॥
    कर्मप्रकाशक वेद ; तो वेद नित्य आणि अढळ आहे असे ते मानतात ; जीव सारे नित्यच आहेत; तसेंच भोग व कालही नित्यच असे त्यांचे म्हणणें ९३.


    स्वर्गादि लोक भोगस्थान । वेदु बोलिला आपण ।
    मिथ्या नव्हे वेदवचन । चार्‍ही प्रमाण नित्यत्वें ॥९४॥
    स्वर्गादि लोक हे भोग भोगण्याचे स्थान असलेलें वेदाने स्वतःच सांगितले आहे, तेव्हां तें वेदवाक्य काही खोटे नव्हे. ह्यावरून ही चारीहीं नित्य आहेत हे सिद्ध आहे (इत्यादि ) ९४.


    उद्धवा यापरी पाहीं । म्हणती अनित्य येथ नाही ।
    वैराग्यें करावें कायी । मिथ्या पाहीं वैरागी ॥९५॥
    उद्धवा ! पहा ; ह्याप्रमाणे येथे अनित्य असे कांहीच नाही, तेव्हां वैराग्याचे येथे काय काम ? तात्पर्य, वैरागी लोक मिथ्या होत ९५,


    हो कां भोग्य जरी नश्वर होतें । अथवा मायिक कांहीं असतें ।
    तरी वैराग्य संभवतें । तें तंव येथें असेना ॥९६॥
    अहो ! भोगण्याच्या वस्तु जर नश्वर असत्या, किंवा मायिक असे जर कांही असते तर वैराग्य संभवले असते; तसे तर येथे कांहीच नाहीं (असें त्यांचे मत ) ९६. तसेंच


    मन्यसे सर्वभावानां संस्था ह्यौत्पत्तिकी यथा ।
    तत्तदाकृतिभेदेन जायते भिद्यते च धीः ॥ १५ ॥
    [ श्लोक १५] त्याचप्रमाणे सर्व पदार्थ प्रवाहरूपाने नित्य असून सत्य आहे, व त्या त्या आकारानुसार ज्ञान उत्पन्न होऊन नष्ट होते, (१५)


    जीवाच्या भोग्यपदार्था । स्रक-चंदनादि-वनिता ।
    त्यांसी प्रवाहरूपें नित्यता । म्हणती तत्त्वतां स्वमतें ॥९७॥
    जीवाचे भोग्य पदार्थ म्हणजे गंध, पुष्प, स्त्री इत्यादि, ही प्रवाहरूपाने नित्य आहेत, असें आपल्या मतानुसार ते म्हणत असतात ९७.


    आत्मा आहे जग नाहीं । हें घडलेंचि नाहीं कांहीं ।
    जळेंवीण समुद्र पाहीं । उरला नाहीं सर्वथा ॥९८॥
    आत्मा आहे आणि जग नाही, असें तर कधीच घडणें नाहीं; कारण जळाशिवाय समुद्र म्हणून राहणेंच शक्य नाही ९८.


    सृष्टि प्रवाहरूपें नित्य । पितृपुत्रत्वें अखंड वाहत ।
    कर्मास्तव यातायात । सृष्टि अनित्य हें न घडे ॥९९॥
    सृष्टि ही सारखी सुरूच असल्यामुळें तीही नित्यच आहे. पितापुत्राच्या रूपाने ती अखंड चालूच आहे; कर्मामुळेंच ही सारी यातायात आहे; सृष्टि अनित्य हे कधींच व्हावयाचें नाहीं ९९;


    नित्यासी ईश्वर कर्ता । हेंही न घडे गा तत्त्वतां ।
    नित्याचा कोण नव्हे कर्ता । ईश्वरु सर्वथा येथ नाहीं ॥४००॥
    मग ॐ नित्यच आहे त्याला ईश्वर म्हणून एक कर्ता असणें शक्यच नाहीं; नित्याचा कर्ता कोणीच नाहीं, म्हणूनच येथे ईश्वर म्हणून कोणी नाहींच ४००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...