मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० ओव्या १ ते १००

    श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥


    ॐ नमो सद्‍गुरु धन्वंतरी । ज्याची दृष्टीचि निरुज करी ।
    त्यावांचोनि संसारीं । भवरोगु दुरी न करवे ॥१॥
    आतां सद्गुरुरूप धन्वंतर्‍याला नमस्कार करतो. कारण त्याच्या दृष्टीनेंच मनुष्य रोगमुक्त होतो. या संसारामध्ये त्याच्याशिवाय भवरोगाची बाधा दूर करणारा दुसरा कोणीही समर्थ नाही १.


    ज्या भवरोगाचेनि दर्पें । फुंफात तापलीं त्रिविधतापें ।
    'मी माझे' येणें संकल्पें । वाग्जल्पें जल्पती ॥२॥
    ज्या भवरोगाच्या उन्मादाने मनुष्यें आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक ह्या त्रिविध तापांनी होरपळत आहेत; 'मी' आणि 'माझे' ह्या संकल्पानें ती बडबडत असतात २.


    पडिलीं द्वैताचिया दुखणा । तोंडींची चवी गेली जाणा ।
    मुखा आला कडवटपणा । कटु वचना बोलतु ॥३॥
    द्वैतभावनेचा विकार उद्‌भवल्यामुळे त्यांच्या तोंडाची चवच जाते आणि त्यामुळे सारे तोंड कडू कडू होते, म्हणूनच ती कडू कडू विषासारखे बोलत असतात ३.


    जेथें व्याधीचेनि सन्निपातें । विवेक हाणोनियां लातें ।
    उमरुडूनि धैर्य हातें । वासनावनातें हिंडती ॥४॥
    व्याधीच्या सन्निपातामध्ये विवेकाला ती लाथेनें झुगारून देतात; आणि वायूच्या झटक्यांत हाताने धैर्याला ढकलून देऊन वासनारूप अरण्यामध्ये भटकत फिरूं लागतात ४.


    मनोरथकर्दमीं चरफडित । संकल्पमृगजळीं बुडत ।
    वेगीं निसरोनियां पडत । टेंक चढतां स्वर्गाचें ॥५॥
    मनोरथरूपी चिखलात गोते खातात ; चरफडतात; संकल्पाच्या मृगजळांत बुडतात; आणि स्वर्गाच्या टेकडीवर लौकर चढावयाला लागतात, तो पाय निसरून खाली पडतात ५.


    वोरबडत स्नेहाची आराटी । गोंवीत लोभाची बोरांटी ।
    खिळिला प्रपंचाचिया कंठीं । मारितां नुठी तेथूनि ॥६॥
    मायेची काटेरी झुडपें त्यांस ओरबडतात; लोभरूपी बोरीचे कांटे बोचतात, आणि प्रपंचाच्या गळ्याला घट्ट मिठी मारून बसतात. मग त्यांना झोडपलें तरी तेथून हालत नाहींत ६.


    भवरोगभ्रमें भ्रमले कैसे । खावों नये तें खावों बैसे ।
    करूं नये तें करितां दिसे । योषितांसरिसें धांवत ॥७॥
    भवरोगाच्या भ्रमाने ते किती वेडे वेडे विचार करतात पहा. जें खाऊं नये ते खावयाला लागतात ; जे करूं नये ते करताना दिसतात, आणि स्त्रियांबरोबर वेड्यासारखे धावत असतात ७.


    तेथ धनभयाचे शारे येत । तेणें थरथरां कांपत ।
    धाकें धाकें घामेजत । दडी देत गुप्तत्वें ॥८॥
    तेथें द्रव्याच्या भीतीनें अंगांत हुडहुडी भरते व ते थरथर कांपू लागतात; मनाला दचका बसून सारे अंग घामाने डबडबून जाते; अशा स्थितीत मग ते कोठे तरी गुप्त ठिकाणी तोंड चुकवून दडी देतात ८.


    भोगाभिमानु चढे देहीं । तेव्हां न राहे खाटे भुईं ।
    विधीचें पांघरूण टाकी पाहीं । डोळा ठायीं लागेना ॥९॥
    अंगांत विलासाचा मद चढतो; तेव्हा जमिनीवर किंवा खाटेवरही त्यांना पडवत नाही; विधीचे पांघरूण फेंकून देतात. आणि कोणत्याच ठिकाणी त्यांची पापणीला पापणी लागत नाही अशी दशा होते ९.


    उभें न राहवे ऐक्यवृत्ती । क्षीण झाली ज्ञानशक्ती ।
    पडलीं जडत्वें लोळती । पाणी मागती विषयांचे ॥१०॥
    एकाग्रवृत्तीनें क्षणभरही उभे राहवत नाही. ज्ञानशक्ति क्षीण होऊन जाते. असे लोळागोळा होऊन ते तळमळत पडतात आणि विषयरूपी पाणी मागत असतात १०.


    अल्प‍अल्प देतां तें जळ । कडकडूनि झोंबती प्रबळ ।
    'आम्हांसी फार द्या गा जळ । तृषा केवळ वोळेना' ॥११॥
    बरे, हे पाणी थोडे घोंट घोंट दिले तर ते त्यांना पुरत नाही; 'आम्हांला पोटभर पाणी द्या हो, एवढ्याने तहान भागत नाही' ही त्यांची हाकाटी चाललेलीच असते ! ११.


    कुपथ्य करितां निरंतर । तंव तो झाला जीर्णज्वर ।
    क्षयो लागला जी थोर । क्षीण शरीर पडियेलें ॥१२॥
    अशा प्रकारें निरंतर कुपथ्यच करीत असल्यामुळे जीर्णज्वर उत्पन्न होतो. आणि मागाहून क्षयाची भावना होऊन शरीर अगदी क्षीण होऊन जाते १२.


    क्षणाक्षणां अतिक्षीणता । विकार संचरले जीविता ।
    तेणें प्रबळ वाढली चिंता । सुख सर्वथा बुडालें ॥१३॥
    क्षणोक्षणी भयंकर क्षीणता वाढत जाते आणि जिवाला झालेल्या विकारांमुळे मोठी काळजी उत्पन्न होऊन, सुख अगदी नाहींसें होतें १३.


    नवल रोगाचा पडिपाडु । गोड परमार्थ तो जाला कडू ।
    केवळ विषप्राय विषय कडू । तोचि गोडु पैं झाला ॥१४॥
    रोगाचा जोर असा विलक्षण की, गोड परमार्थ तो कडू लागतो आणि विषासारखा कडू जो विषय तो गोड लागतो ! १४.


    ते व्याधीचिया उफाडा । देतां सत्कथाकाढा ।
    श्रवणमुखींच्या भावार्थदाढा । पाडी पुढां दांतखिळी ॥१५॥
    ह्या रोगाचे निर्मुलन करण्यासाठी सत्कथेचा काढा दिला, तर श्रवणरूप तोंडांतल्या भावार्थरूप दाढा मिटून दांतखिळीच बसते (सत्कथा रुचतच नाहीत) १५.


    देतां तुलसीमकरंद नसू । वरता जावों नेदी श्वासु ।
    मस्तक झाडी मानी त्रासु । रोगें बहुवसु व्यापिला ॥१६॥
    तुळशीचा रस आणि मध यांचे नस्य नाकांत घातले तर तो नाकानें ओढून घेत नाहीं; उलट त्याचा त्रास मानून डोके फिरवितो. अशा रीतीनें तो पूर्ण रोगग्रस्त होऊन राहातो १६.


    ऐसा रोग देखोनियां गाढा । वैद्य आचार्य धडफुडा ।
    कृपा पाहे जयाकडा । तो रोकडा वांचवी ॥१७॥
    असा हा जबरदस्त रोग पाहून, सद्‌गुरूरूपी हुशार वै‍द्य पुढे सरसावतो आणि कृपादृष्टीने पाहूनच त्याला तत्काळ बरा करतो १७.


    निधडा वैद्य तो सुबुद्धि । जीवु गेलिया मरों नेदी ।
    जीवेंवीण वांचवी त्रिशुद्धि । अगाध सिद्धि तयाची ॥१८॥
    तो वैद्य ( सद्गुरु ) मोठा बुद्धिमान् असल्यामुळे, रोग्याचा जीव गेला तरी त्याला मरू देत नाही; तो जिवावांचूनच त्याला जिवंत ठेवतो; अशी विलक्षण सिद्धि सद्गुरूची असते १८.


    शुद्धभाग्येंकरूनि जाण । तो करी कृपाकूर्मावलोकन ।
    तेंचि रोगिया अमृतपान । होय सावधान तत्काळ ॥१९॥
    रोग्याचे भाग्य मोठे, म्हणून तो (गुरु) कृपाकूर्मावलोकन (कृपारूप कांसवीचे पाहणे) करतो व तेंच रोग्याला अमृतपानाप्रमाणे होऊन तो तत्काळ सावध (भ्रमरहित ) होतो १९.


    एवं झालिया सावधान । रोगी आपणिया आपण ।
    नित्यानित्याचें पाचन । करी सेवन साक्षेपें ॥२०॥
    अशा रीतीने सावध झाल्यावर, तो रोगी नित्यानित्यविवेकरूपी पाचन अत्यंत सावधगिरीने घेऊ लागतो २०.


    तेणें न फिटेचि जीर्णज्वरु । न तुटे क्षयाचा महामारु ।
    हें देखोनियां वैद्यसद्‍गुरु । रसोपचारु मांडिला ॥२१॥
    परंतु तेवढ्याने त्याचा जीर्णज्वर नाहीसा होत नाही किंवा क्षयांची लक्षणेही कमी होत नाहीत. म्हणून सद्‌गुरु वैद्य त्याला रसोपचार (रसायन ) सुरू करतो २१.


    तेणें अक्षररस-अर्धमात्रा । देतां क्षयाचा थारा ।
    मोडूनियां शरीरा । पूर्वपरंपरा अक्षय केलें ॥२२॥
    त्याने रोग्याला 'अर्धमात्रारूपी अक्षररस' (प्रणवाची अर्धमात्रा) देतांच त्याचा क्षयरोग नाहीसा होऊन तो पूर्वीप्रमाणे 'अक्षय' (अविनाशी) होतो २२.


    दारुण चुकवावया कुपथ्य । वैराग्य राखण ठेविलें नित्य ।
    लावूनि अनुसंधानाचें पथ्य । निर्दाळिला तेथ भवरोगु ॥२३॥
    रोग्याने भयंकर अपथ्य करूं नये म्हणून त्याजवर वैराग्याची राखण ठेवतो आणि अव्याहत आत्मानुसंधानाचे पथ्य लावून, त्याच्या संसाररूपी रोगाचे निर्मूलन करतो २३.


    रोगी उपचारिल्यावरी । प्रबळ क्षुधा खवळे भारी ।
    चित्तचिंतेच्या लाह्या करी । क्षणामाझारीं खादल्या ॥२४॥
    रोगी साफ बरा झाल्यावर त्याला फार भूक लागते, म्हणून तो मानसिक चिंतेच्या लाह्या करून त्या अधाशीपणाने एका क्षणांत खाऊन टाकतो २४.


    काळे गोरे चतुर्वर्णचणे । आश्रमेंसीं भाजिले फुटाणे ।
    'अहं-सोहं' गुळेंसीं तेणें । निःशेष खाणें तत्काळ ॥२५॥
    चार वर्णरूपी काळे पांढरे हरभरे चार आश्रमरूपी अग्नींत भाजून त्याचे फुटाणे करून, ते 'अहं-सोहं' रूपी गुळाबरोबर खाऊन फस्त करतो २५,


    फळाभिलाषेंसीं आशा- । बोंडें भरलीं होतीं खसखसा ।
    तींही खादलीं घसघसां । न लगतां घांसा गिळियेलीं ॥२६॥
    फलाभिलाषासह आशेची खसखशीची बोंडे भरलेली होती तीही त्याने खाऊन सोडली २६.


    गूळ साखरेचा पडिपाडु । खादले कर्माकर्माचे लाडू ।
    खातां न म्हणे गोड कडू । लागला झोडूं स्व‍इच्छा ॥२७॥
    गूळसाखरेच्या पाकाप्रमाणे कर्माकर्माचे लाडू, गोड किंवा कडू न म्हणतां, आपल्या इच्छेप्रमाणे तो झोडूं लागला २७.


    'ब्रह्माहमस्मी' चीं गोमटीं । पक्वान्नें देखिलीं दिठीं ।
    तींही खाऊनि उठाउठी । मायेपाठीं लागला ॥२८॥
    'ब्रह्माहमस्मि' (मी ब्रह्म आहे) या चरमावृत्तीची सुंदर पक्वान्नें त्याच्या दृष्टीस पडली; ती तत्काळ खाऊन तो मायेच्या पाठी लागला २८.


    ते धाकें धाकेंचि निमाली । मिथ्यात्वें नासोनि गेली ।
    स्वानंदें पुष्टि आली । झाडी केली भवरोगा ॥२९॥
    तेव्हा ती धाकाधाकानेंच पळून गेली आणि मिथ्यात्वानेंच नाहीशी झाली. तेव्हा स्वानंदाची पुष्टि आली व संसाररोग अगदी झडून गेला २९.


    ऐसा सद्‍गुरु वैद्य गाढा । जेणें उपचारोनि केलों निधडा ।
    शरण रिघावें तुजपुढां । तंव चहूंकडां तूंचि तूं ॥३०॥
    अशा ज्या तूं कुशल सद्गुरु वैद्याने मला उपचार करून निरोगी केले, त्या तुला मी शरण रिघावे तर चोहीकडे मला तूंच एकटा दिसतोस ३०.


    तुजवेगळें आपणियातें । देखोनि शरण यावें तूतें ।
    तंव मीतूंपण हारपलें थितें । कैसेनि तूतें भजावें ॥३१॥
    तुझ्याशिवाय स्वतःला वेगळे पाहून तुला शरण यावें, तर असलेले मीतूंपणच नाहीसे झाले; तेव्हां आतां तुला भजावें तरी कसे ? ३१.


    ज्यांच्या सुटल्या जीवग्रंथी । झाले आत्माराम निश्चितीं ।
    तेही अहेतुक भक्ति करिती । प्राप्तांची स्थिति हे जाणा ॥३२॥
    ज्यांच्या जीवग्रंथी सुटून जे प्रत्यक्ष आत्माराम झाले, ते देखील तुझी निष्काम भक्ति करतात. पूर्णावस्थेस गेलेल्यांची ही स्थिति होय ३२.


    गुरुभजनापरतें सुख । मोक्ष मानिती तेही मूर्ख ।
    मोक्ष गुरुचरणींचा रंक । विरळा लोक हें जाणती ॥३३॥
    मोक्ष हे गुरुभजनाहून मोठे सुख आहे असे मानतात तेही मूर्ख होत. कारण मोक्ष हा गुरूच्या पायांचा सेवक आहे, हे फारच थोडे लोक जाणतात ३३.


    आम्हां सद्‍गुरुदृष्टीं परमारोग्य । आम्ही सद्‍गुरुकृपा सदा श्लाघ्य ।
    गुरुसेवें आम्ही सभाग्य । परम योग्य गुरुस्तवनें ॥३४॥
    आम्हांला सद्गुरुदृष्टीनेंच परम आरोग्य लाभते. आम्ही सद्गुरुस्तुतीनेंच जगांत नेहमीं पूज्य होतो. गुरुसेवेनेंच आम्ही भाग्यवान् आहों, आणि आमच्या अंगींची योग्यता आम्हांला गुरुस्तुतीनेच प्राप्त झालेली आहे ३४.


    सद्‍गुरूचें नाममात्र । तेंचि आम्हां वेदशास्त्र ।
    सकळ मंत्रांवरिष्ठ मंत्र । नाम सर्वत्र गुरूचें ॥३५॥
    सद्गुरूचें केवळ नाम तेंच आम्हांला वेदशास्त्राप्रमाणे असून, सर्व ठिकाणी, सर्व मंत्रांपेक्षा सद्‌गुरूचें नामच आम्हांला श्रेष्ठ वाटते ३५.


    सद्‍गुरूचें तीर्थमात्र । सकळ तीर्थां करी पवित्र ।
    गुरुचरण तें आमचें क्षेत्र । वृत्ति स्वतंत्र ते आम्हां ॥३६॥
    सद्गुरूचे नुसतें तीर्थ सर्व तीर्थांना पवित्र करते आणि गुरूचे पाय हे आमचे क्षेत्र (शेत ) असून, त्याची स्वतंत्र मालकी आमच्याकडे आहे ३६.


    तूं पुरे पुरे म्हणसी स्तवन । परी वर्णितां तुझे उदार गुण ।
    अतृप्त सर्वथा नुठी मन । तुझी आण वाहातसें ॥३७॥
    'ही स्तुति आतां पुरे झाली' असें तूं (सद्गुरो) म्हणशील, पण खरोखर तुझी शपथ घेऊन सांगतों की, तुझे उदार गुण वर्णीत असतां माझ्या मनाची मुळी तृप्तिच होत नाही ३७.


    तुझे गुण वर्णावया तत्त्वतां । मी प्रवर्तलों श्रीभागवता ।
    त्वां मज लाविलें भक्तिपंथा । निजकथाकीर्तनीं ॥३८॥
    खरोखर तुझे गुण वर्णन करावे म्हणूनच मी श्रीभागवतावर टीका करण्यास प्रवृत्त झालों; भक्तिपंथाला आणि आपल्या कथाकीर्तनाला तूंच मला लावलेंस ३८.


    जय जय सद्‍गुरु जनार्दना । भवगजपंचानना ।
    एकाकी शरण आलों जाणा । तुझ्या श्रीचरणा पावलों ॥३९॥
    हे संसाररूप हत्तीचे विदारण करणाऱ्या सिंहा, सद्‌गुरु जनार्दना ! तुझा जयजयकार असो. मी तुला एकीएक शरण आलों व तुझ्या श्रीचरणांप्रत पावलों ३९.


    पावलों शास्त्र श्रीभागवत । अवधारा तेथींचा मथितार्थ ।
    उद्धवासी श्रीकृष्णनाथ । परम परमार्थ सांगेल ॥४०॥
    श्रीभागवतशास्त्र मला गुरुकृपेनें मिळाले, त्यांतला मथितार्थ श्रवण करा. श्रीकृष्ण उद्धवाला परमार्थाचा उपदेश करील ४०.


    यदुअवधूतसंवादेंसीं । लक्षणोक्त चोविसां गुरूंसी ।
    परिसोनियां उद्धवासी । भावना ब्रह्मेंसीं लिगटली ॥४१॥
    यदु आणि अवधूत यांच्या संवादांत आलेली चोवीस गुरूंची लक्षणे ऐकून उद्धवाची भावना ब्रह्ममय झाली ४१.


    ब्रह्म सर्वगत सत्य होये । मज सबाह्य कोंदलें आहे ।
    तेंचि माझें मज ठाउकें नोहे । कोण उपाये करावा ॥४२॥
    ब्रह्म हे सर्व ठिकाणी व्यापक आहे, माझ्या स्वत:च्या ठायींही ते अंतर्बाह्य व्यापून आहे, परंतु हे माझे मलाच अद्याप समजत नाही. तेव्हां ह्याला आता काय उपाय करावें बरें ? ४२.


    ऐसी उद्धवाची चिंता । कळों सरली कृष्णनाथा ।
    तोचि उपावो सर्वथा । होय सांगता अविरोधें ॥४३॥
    ही उद्धवाच्या मनांतली चिंता श्रीकृष्णाला समजली, आणि तोच उपाय अविरोधेकरून, त्याने सांगण्यास आरंभ केला ४३.


    श्रीभगवानुवाच - मयोदितेष्ववहितः स्वधर्मेषु मदाश्रयः ।
    वर्णाश्रमकुलाचारं अकामात्मा समाचरेत् ॥ १ ॥
    [श्लोक १-] श्रीकृष्ण म्हणातात साधकाने सर्व प्रकारे मला शरण येऊन मी सांगितलेल्या आपल्या धर्मांचे सावधपणे पालन करावे निष्काम भावाने आपला वर्ण, आश्रम आणि कूळ यांचेही आचार पाळावेत. (१)


    पूर्वीं वेदरूपें वर्णाश्रम । मीचि बोलिलों स्वधर्म ।
    पंचरात्रादि वैष्णवधर्म । हें उपासनावर्म गुह्य माझें ॥४४॥
    पूर्वी वेदरूपानें वर्णाश्रमादि स्वधर्म मीच सांगितला. नारदपंचरात्रादि ग्रंथांत सांगितलेला वैष्णव धर्म हे माझ्या उपासनेचें गुह्य वर्मही सांगितले ४४.


    जो वर्ण जो आश्रम । तेणेंचि ते करावे स्वधर्म ।
    आचरतां परधर्म । दुःख परम पाविजे ॥४५॥
    ज्यांचा जो वर्ण आणि जो आश्रम असेल त्याने त्या वर्णाश्रमधर्माप्रमाणे वागावे. दुसऱ्याचा धर्म आचरिला असतां मोठे दुःख भोगावे लागते ४५.


    उद्धवा येथ जाण । कर्ता पाहिजे सावधान ।
    ते सावधानतेचें लक्षण । अतिविचक्षण जाणती ॥४६॥
    उद्धवा, येथे ही गोष्ट लक्षात ठेव की, कर्ता जो आहे त्याने सावधपणाने वागले पाहिजे. या सावधानतेची लक्षणे ज्ञाते पुरुष जाणतात ४६.


    कर्म चतुर्विध येथ । 'नित्य' आणि 'नैमित्त' ।
    'काम्य' आणि 'प्रायश्चित्त' । जाण निश्चित विभाग ॥४७॥
    येथे कर्म हे चार प्रकारचे आहे:-नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त, हे कर्माचे चार विभाग आहेत ४७.


    येथ कर्म आचरती स्थिती । सावधान राखावी वृत्ती ।
    आचरावयाची व्युत्पत्ती । विचित्र स्थिती सांगेन ॥४८॥
    या कर्माचरणाची स्थिति म्हणजे कर्म करीत असतां वृत्ति सावध राखली पाहिजे. कर्म आचरावयाचें वर्म मी तुला अभिनव प्रकाराने सांगेन ४८.


    नित्य आणि नैमित्तिक । हें कर्म जाण आवश्यक ।
    सांडोनियां फलाभिलाख । विधिप्रमुख आचरावें ॥४९॥
    नित्य आणि नैमित्तिक कर्म अगदी आवश्यक आहे, ते प्रत्येकाला केलेच पाहिजे. तें कर्म, फलाची अपेक्षा न धरितां, यथाविधि आचरावें ४९.


    नित्यकर्म अधिक वाढे । तैं नैमित्तिकाचे अंगा चढे ।
    काम्य उचंबळलें विषयचाडें । तैंचि पडे 'निषिद्धी' ॥५०॥
    नित्यकर्म जसजसे वाढत जाते तसतसें नैमित्तिक कर्मही वाढू लागते. मग विषयप्राप्तीच्या इच्छेनें काम्य कर्म उचंबळते तेव्हां तें निषिद्धांत जाऊन पडतें ५०.


    फलाभिलाषेंविण । नित्य नैमत्तिक जाण ।
    करावें गा कृष्णार्पण । अर्पिती खूण जाणोनि ॥५१॥
    ह्याकरितां फलाचा अभिलाष न धरितां नित्य नैमित्तिक कर्म अर्पणाची खूण जाणून कृष्णार्पण करावें ५१.


    काम्य कर्म आवश्यक । त्यजावें गा निःशेख ।
    जेवीं कां वमिलें वमक । परतोनि लोक न पाहती ॥५२॥
    काम्य म्हणजे सकाम कर्माचा निःशेष त्याग केला पाहिजे. ज्याप्रमाणे ओकून टाकलेल्या ओकाकडे लोक ढुंकूनही पहात नाहींत ५२.


    समूळीं कामनेतें दंडावें । तैंचि काम्य कर्म सांडावें ।
    येर्‍हवीं काम्यत्यागु न संभवे । कामना जीवें राखतां ॥५३॥
    कामनाच जेव्हां अजिबात सोडावी, तेव्हांच काम्य कर्माचा त्याग करावा. एरव्ही, मनांत कामना असतांना काम्य कर्माचा त्याग संभवत नाही ५३.


    अंतरीं अनिवार कामना । बाह्य विरक्ती दावी जना ।
    ते सविया विटंबना । त्यागु विचक्षणा तो नव्हे ॥५४॥
    मनांत नानाप्रकारच्या कामनांचा धिंगाणा, आणि बाहेरून मात्र लोकांना विरक्ति दाखवितो, ती सर्वथैव विटंबना होय. हे चतुरा ! त्याला त्याग म्हणता येणार नाहीं ५४.


    कामनेचेनि अधिक मदें । कर्में निपजती निषिद्धें ।
    समूळ कामनेचेनि छेदें । सर्व निषिद्धें मावळती ॥५५॥
    कामना पुष्कळ वाढल्या म्हजे निषिद्ध कर्में घडू लागतात. म्हणून कामनाच समूळ नाहींशी केली, म्हणजे निषिद्ध कर्मे घडण्याचा बिलकुल संभव नाहीं ५५.


    अथवा देखतांचि निषिद्ध दिठीं । जो हरिनामें गर्जत उठी ।
    निषिद्ध पळे बारा वाटीं । प्रायश्चित्तकोटी हरिनामें ॥५६॥
    अथवा, डोळ्यांनी निषिद्ध कर्म पाहतांच जर हरिनामाची गर्जना करीत उठले, तर निषिद्ध कर्मे बारा वाटांनी पळून जातात. हरिनामाच्या योगानें कोटि प्रायश्चित्तांचे श्रेय मिळते ५६.


    जेथ हरिनामाचे उमाळे । तेथ निषिद्ध तत्काळ जळे ।
    निषिद्ध अभक्तां आदळे । भक्तांजवळें तें न ये ॥५७॥
    जेथे हरिनामाचा प्रेमकल्लोळ सुरू असतो, तेथे निषिद्ध तत्काळ जळून जाते. निषिद्ध है अभक्तांच्या अंगाला येऊन आदळतें; भक्तांजवळ ते कधीच येत नाही ५७.


    काम्यनिषिद्धाची कथा । भक्तांसी नातळे सर्वथा ।
    भगवंतु रक्षी निजभक्तां । दोषु तत्त्वतां त्यां नाहीं ॥५८॥
    काम्य-निषिद्धाचा वारा भक्तांना लागत नाही. भगवंत आपल्या भक्तांचे रक्षण करतो, तेथे त्यांना दोषाचा संपर्क कसा लागणार ? ५८.


    नामें प्रायश्चित्तांच्या कोटी । हे म्यां सांगितली गुह्य गोठी ।
    प्रकट न करावी सृष्टीं । गुप्त पोटीं राखावी ॥५९॥
    कोटि प्रायश्चित्तें एका नामोच्चाराने घडतात, ही जी गुप्त गोष्ट मी तुला सांगितली, ती जगांत तूं कोठेही प्रगट करूं नकोस ; पोटांत ठेव ५९.


    काम्यनिषिद्धाचे त्याग । तुज म्यां सांगीतले साङ्ग ।
    नित्यनैमित्तविभाग । तोही विनियोग परियेसीं ॥६०॥
    काम्य व निषिद्ध कर्मांचा त्याग करावा, हे मी तुला खुलासेवार रीतीने सांगितले. आता, नित्य आणि नैमित्तिकांचा कर्मविभाग, त्याचाही प्रकार ऐक ६.


    मदर्पणें आवश्यक । करावें नित्यनैमित्तिक ।
    तेंचि चित्ताचें शोधक । साधन मुख्य परमार्थी ॥६१॥
    ईश्वरार्पणबुद्धीने नित्यनैमित्तिक कर्म अवश्य करावें. तेंच मनाला निर्मळ करणारे असून, परमार्थांचे मुख्य साधन आहे ६१.


    एक म्हणती स्वधर्म निर्फळ । वर्म नेणतीच ते बरळ ।
    स्वधर्में होय जन्म सफळ । परमार्थफळ स्वधर्मीं ॥६२॥
    काही लोक म्हणतात. की, स्वधर्म हा निष्फळ आहे, पण त्या मूर्खांना त्याचे वर्म समजत नाही. स्वधर्माचरणाने जन्माचें साफल्य होते आणि स्वधर्माच्या योगाने परमार्थाचें फळ मिळते ६२.


    किडाळ झाडावया दृष्टीं । रज देऊनि पाठींपोटीं ।
    सुवर्ण घालितां पुटीं । झळकत उठी निजतेजें ॥६३॥
    सोन्यांतील हिणकसपणा नाहींसा करण्यासाठी त्याच्या पत्र्यांना मागे पुढे लेप लावून आगीचे पूट दिले म्हणजे ते शुद्ध होऊन आपल्या तेजानें झळकू लागते ६३.


    तैसा मज अर्पितां स्वधर्म । त्याचें सफळ होय निजकर्म ।
    ऐसें नेणोनियां निजवर्म । कर्मभ्रम कर्मठां ॥६४॥
    त्याप्रमाणे स्वधर्म मला अर्पण केला म्हणजे त्याचे कर्म सफळ होते. हे गुह्य वर्म कर्मठांना माहीत नसल्यामुळे, त्यांना कर्माचा भ्रम मोठा असतो ६४.


    मज अर्पिती हातवटी । अवघड वाटेल जगजेठी ।
    ज्यासी आवडी माझी मोठी । त्याची दृष्टी मदर्पण ॥६५॥
    कर्में मदर्पण करण्याचा प्रकार अवघड वाटेल, पण ज्याला माझी मोठी आवड, त्याची दृष्टीच मदर्पण झालेली असते ६५.


    कृष्णीं निश्चळ ज्याचें मन । त्याचें कर्म तितुकें कृष्णार्पण ।
    त्यासी न अर्पितांही जाण । सहजें मदर्पण होतसे ॥६६॥
    ज्याचे मन कृष्णाच्या ठायीं निश्चल झाले, त्याचे सर्व कर्म कृष्णार्पणच होते. त्याने जरी ते मला अर्पण केले नाही, तरी ते सहजच मला अर्पण होते ६६.


    जो रथीं निश्चळ होऊनियां बैसे । तो न चळतांही चालतु दिसे ।
    जाण स्वकर्म त्याचें तैसें । अनायासें मज अर्पे ॥६७॥
    जो रथांत निश्चल होऊन बसलेला असतो, तो जाग्यावरून न हालताही चालल्यासारखा दिसतोच. त्याचप्रमाणे त्याचे (भक्ताचें) स्वकर्म अनायासाने मला अर्पण होते ६७.


    यापरी होऊनि अकामात्मा । सुखें आचरावें स्वधर्मा ।
    तेणें सांडूनि रजतमा । सत्त्वें पुरुषोत्तमा पावती ॥६८॥
    ह्याप्रमाणे निष्काम होऊन सुखाने स्वधर्माचरण करावे. त्याच्या योगाने रजतमाला सांडून, सत्त्वाच्या योगानें पुरुषोत्तमाला पावतात ६८.


    वर्णाश्रमसमुद्‍भवा । मूळ आश्रयो मी वोळखावा ।
    कुळकर्मनिजस्वभावा । उपासावा मी एकु ॥६९॥
    वर्ण आणि आश्रम यांच्या उत्पत्तीला मूळ आधार जो मी त्या मला ओळखावे. आपल्या स्वभावानुसार कुलधर्माने माझी एकट्याचीच उपासना करावी ६९.


    वर्णासी आश्रयो मी प्रसिद्ध । जे जन्मले मुखबाहूरुपाद ।
    आश्रमा आश्रयो मी विशद । गर्जती वेद ये अर्थीं ॥७०॥
    वर्णाला मीच आश्रयभूत आहे. 'ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्‌बाहू०' हे वचन प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे आश्रमांची उत्पत्तिही मजपासूनच असल्याचे वेद गर्जना करून सांगत आहेत ७०.


    देवो देवी कुळाचार । यांचें वस्तीचें मी घर ।
    एवं मी सर्वाधार । हा कर्मी विचार देखावा ॥७१॥
    देव, देवी आणि कुळाचार यांच्या वस्तीचे घर मी आहे. ह्याप्रमाणे मी सर्वांचा आधार आहे, हा विचार कर्मांत पहावा ७१.


    गुज परियेसीं उद्धवा । कर्माकर्माध्यक्षु मी जाणावा ।
    कर्मी मीचि अभिलाषावा । क्रियेनें धरावा मी एकु ॥७२॥
    उद्धवा, तुला मी गुह्य सांगतों तें ऐक, सर्व कर्मांचा अध्यक्ष मी आहे असे समजावें, व कर्म करतांना माझाच अभिलाष धरावा, आणि क्रियेनेंही माझी एकट्याचीच धारणा धरावी ७२.


    एवं आदि-मध्य-अंतीं । मी अविनाशु धरितां चित्तीं ।
    तीं कर्मेंचि निष्कर्में होतीं । जाण निश्चितीं उद्धवा ॥७३॥
    याप्रमाणे कर्माच्या आदीं, अंती आणि मध्यभागी, अविनाश जो मी, त्या मला चित्तांत ठेविलें असतां, ती कर्मेंच निष्कर्में होतात, हे तूं उद्धवा ! अगदी निश्चित समज ७३.


    अन्वीक्षेत विशुद्धात्मा देहिनां विषयात्मनाम् ।
    गुणेषु तत्त्वध्यानेन सर्वारंभविपर्ययम् ॥ २ ॥
    [श्लोक २] स्वधर्माचरणाने ज्याचे चित्त शुद्ध झाले आहे, त्याने विषयांमध्ये आसक्त झालेले लोक विषयांना सत्य मानून सुखासाठी जी कर्मे करतात, त्या कर्मांचा परिणाम दुःखदायक होतो, ही गोष्ट नीट ध्यानात घ्यावी. (२)


    यापरी स्वधर्में जाण । ज्यांचें विशुद्ध अंतःकरण ।
    ते विषयीं उदासीन । हें वोळखण तयांचे ॥७४॥
    ह्याप्रमाणे, स्वधर्माच्या योगाने ज्यांचे अंतःकरण अगदी शुद्ध झालेले असते, त्यांना ओळखण्याची खूण ही की, विषयासंबंधाने ते उदासीन असतात ७४.


    तयांसी विषयाची आस्था । नाहीं नाहीं गा सर्वथा ।
    परी सर्वार्थविपरीतता । विषयासक्तता देखती ॥७५॥
    त्यांना विषयाची आस्था बिलकुल नसते; परंतु विषयासक्त लोकांना आपल्या विषयासक्ततेमुळे सगळीच कर्में विपरीत दिसू लागतात ७५.


    भरलीं मृगजळाचीं तळीं । तेणें न पिकती साळी केळी ।
    तैसी विषयबुद्धी जवळी । स्वसुखफळीं फळेना ॥७६॥
    मृगजळाची तळीं भरलेली असली तरी त्यांनी कांही भात व केळी पिकणार नाहीत. त्याप्रमाणे विषयलंपट बुद्धिच ज्यांच्याजवळ आहे, त्यांना आत्मसुखाची फळें कधीही मिळावयाची नाहींत ७६.


    पाहें पां विषयासक्त । कर्मारंभीं संकल्प करित ।
    आयुःकामार्थ क्षेमार्थ । धनधान्यार्थसमृद्धी ॥७७॥
    हे पहा ! विषयासक्त असतात ते 'आयुःकामार्थ'-आयुष्याची वृद्धि व्हावी, व मनोरथांची सिद्धि व्हावी- 'क्षेमार्थ'-माझें निरंतर कल्याण व्हावें- 'धनधान्यार्थ-समृद्धि'- धनधान्याची समृद्धि व्हावी- असा कर्मांच्या आरंभालाच संकल्प करीत असतात ७७.


    या हेतू कर्म आरंभित । तें स्वकर्म नव्हे निश्चित ।
    स्वधर्ममिषें मनोरथ । उपासित सर्वदा ॥७८॥
    ह्याच हेतूनें कर्माला आरंभ करीत असल्यामुळे ते कांहीं खरें स्वकर्म होत नाही. तर स्वधर्माच्या निमित्ताने ते सदासर्वदा मनोरथाचीच उपासना करीत असतात ७८.


    बैलाची कांस दुहितां । शिंपीभरी दूध न ये हाता ।
    तेवीं मनोरथ उपासितां । न लभे सर्वथा 'निजसुख' ॥७९॥
    बैलाची कास पिळू लागले तर शिंपलीभरसुद्धा दूध हाताला येत नसते; त्याप्रमाणे मनोरथाची उपासना केल्याने आत्मसुख मुळीच प्राप्त होत नाहीं ७९.


    एवं कर्मचि तें कर्म नव्हे । केल्याही सिद्धी न पवे ।
    तें विघ्नबाहुल्यें नाश पावे । विघ्न संभवे देवांचें ॥८०॥
    अशा प्रकारचे कर्म तें कर्मच नव्हे ; व ते केल्यानें सिद्धीही होत नाही. त्यात अनेक विघ्ने येऊन ते नाश पावते. शिवाय देवांचे विघ्न येण्याचाही संभव असतो ८०.


    विषयसेवनीं आहे सुख । या बुद्धीं शिणशिणोनि मूर्ख ।
    पावले परम दुःखें दुःख । मुख्य याज्ञिक घालूनि ॥८१॥
    विषयसेवनामध्ये सुख आहे अशा बुद्धीनें, ते मिळवून देणारे यज्ञकर्मच श्रेष्ठ आहे असे मानून मूर्ख लोक कष्ट कर करून अतोनात दुःख पावतात ८१.


    वेदत्रयी जाणूनि सकळ । यज्ञकर्मी अतिकुशळ ।
    वांछितां स्वर्गादिक फळ । पतन केवळ अधोमुखें ॥८२॥
    सगळे तीन वेद जाणून यज्ञकर्मात अत्यंत कुशल झालेले लोक स्वर्गादि फलांची इच्छा करून खाली तोंड करून पतन पावतात ८२.


    ऐसेनि विवेकें निपुणदृष्टी । जो स्वर्गु नेघे तृणासाठीं ।
    वैराग्य लागे त्यापाठीं । उठाउठी घर रिघे ॥८३॥
    अशा विवेकानें दृष्टि प्रगल्भ होउन जो स्वर्गाला तृणवत् मानून त्याचा स्वीकार करीत नाही, त्याच्या पाठीस वैराग्य लागते, ते त्याच्या घरांत लगबगीनें घुसतेच ८३.


    तो वैराग्याचें माहेर । विश्रांतीचें विसावतें घर ।
    तो नररूपें साचार । 'विवेकु' साकार पैं झाला ॥८४॥
    तो वैराग्याचे केवळ माहेर ; विश्रांतीच्याही विसाव्याचें घर ; इतकेच नव्हे, तर विवेकच त्या पुरुषाच्या रूपाने साकार झाला म्हणून समजावें ८४.


    ऐसेनि विवेकें विवेकदृष्टी । स्वर्गादि विषय मिथ्या सृष्टी ।
    ते मिथ्यात्वाची गोठी । ऐक जगजेठी उद्धवा ॥८५॥
    अशा विवेकाने बनलेल्या विवेकदृष्टीने पाहिले म्हणजे स्वर्गादि विषयही मिथ्यासृष्टि असल्याचे कळून येते. हे जगच्छ्रेष्ठ उद्धवा ! त्या मिथ्यात्वाचे निरूपण आतां ऐक ८५.


    सुप्तस्य विषयालोको ध्यायतो वा मनोरथः ।
    नानात्मकत्वाद् विफलः तथा भेदात्मधीर्गुणैः ॥ ३ ॥
    [श्लोक ३] जसे झोपलेला माणूस स्वप्नामध्ये अनेक विषय पाहातो किंवा जागेपणी मनाने ज्या विषयांचे चिंतन करतो, ते सर्व इंद्रियांनी दिसणारे व अनेक असल्यामुळे खोटेच आहेत, हे समजते, तसेच इंद्रियांच्याद्वारे बाहेरील विषयांत जाणवणारी भेदबुद्धीसुद्धा खोटीच आहे. (३)


    स्वप्न आणि मनोरथ । मनोमात्र-विलासित ।
    ते निद्रितासी सत्य पदार्थ । मिथ्या होत जागृतीं ॥८६॥
    स्वप्न आणि मनोरथ हे दोन्ही मनाचेच खेळ आहेत. निद्रिताला ते खरेच असे वाटतात; पण जागृतींत आल्यावर तेच खोटे वाटू लागतात ८६.


    तैसें कामनेचेनि उल्हासें । इंद्रियांचेनि सौरसें ।
    उभय भोगपिसें । नाथिलें वसे बुद्धीसी ॥८७॥
    त्याप्रमाणे कामनेच्या उल्हासाने आणि इंद्रियांच्या आसक्तीने इहलोकच्या आणि परलोकच्या भोगाचे खोटेंच वेड बुद्धीने घेतलेले असते ८७


    शिंपी शिंपपणें असे । धनलोभ्या रुपें भासे ।
    तेवीं विषयाचेनि अभिलाषें । भेदपिसें नसतेंचि ॥८८॥
    शिंपी ही शिंपीपणानेंच असते, तरी द्रव्यलोभ्याला तेंच रुपे आहे असा भास होतो; त्याप्रमाणे विषयाच्या अभिलाषानेंही नसलेलेच भेदाचें पिसें ह्याला लागते ८८.


    स्वप्नीं देखिलें आत्ममरण । जागृतीं मिथ्या म्हणे आपण ।
    तैसा स्वरूपीं जागा झाल्या जाण । जन्ममरण त्या नाहीं ॥८९॥
    स्वनामध्ये आपणच मेल्याचे पाहातों, आणि जागे झाल्यावर ते खोटे असे आपणच म्हणतो; त्याप्रमाणे आत्मस्वरूपामध्ये जागृति झाली म्हणजे त्याला जन्ममरण दिसतच नाही ८९.


    जंववरी भेदाची भेदसिद्धी । तंववरी जन्ममरण बाधी ।
    भेदु मिथ्या झालिया त्रिशुद्धी । अभेदीं बाधी तें नाहीं ॥९०॥
    जीव आणि शिव भेद जोपर्यंत कायम असतो, तोपर्यंत जन्ममरणाची बाधा असते. तो भेदच निश्चितपणे मिथ्या ठरला म्हणजे अद्वैतामध्ये ती बाधा नाहीं ९०.


    तो भेदु कैसेनि तुटे । निजस्वरूप कैसेनि भेटे ।
    ते अर्थी साधन गोमटें । ऐक चोखटें विभागें ॥९१॥
    तो भेद कशाने नाहीसा होतो, स्वस्वरूपाची भेट कशानें होते, त्याला एक उत्तम साधन सांगतो ते चांगल्या प्रकारें ऐक ९१.


    निवृत्तं कर्म सेवेत प्रवृत्तं मत्परस्त्यजेत् ।
    जिज्ञासायां संप्रवृत्तो नाद्रियेत् कर्मचोदनाम् ॥ ४ ॥
    [श्लोक ४] ईश्वरपरायण मनुष्याने नित्यनैमित्तिक कर्मांचेच आचरण करावे सकाम कर्मे कधीही करू नयेत जेव्हा तो आत्मज्ञानासाठी प्रयत्‍नशील होईल, तेव्हा तर नित्य कर्माचीही फिकीर करू नये. (४)


    चित्तीं वासनांचे मळ । तेणें भेदु भासे सबळ ।
    तो नाशावया चित्तमळ । कर्म निर्मळ सेवावें ॥९२॥
    चित्तामध्ये वासनांचे मळ असतात, त्यामुळे हा भेद सबळ वाटतो. ते चित्तांतील मळ काढून टाकण्याकरितां निर्मळ कर्म करीत रहावें ९२.


    मागां सांगीतलें निश्चित । जें कां नित्यनैमित्य ।
    तेंचि कर्म गा 'निवृत्त' । साधकीं प्रस्तुत सेवावें ॥९३॥
    पूर्वी जे नित्यनैमित्तिक कर्म म्हणून निश्चितपणे सांगितले आहे, त्यालाच 'निवृत्त' कर्म असे म्हणतात. तसले कर्म साधकांनी करावें ९३.


    जो प्रवर्तला माझ्या भजनीं । तेणें 'काम्य' सांडावें निपटूनी ।
    हें मागां सांगितलें विवंचूनि । कामना मनीं न धरावी ॥९४॥
    जो माझ्या भजनी लागला, त्याने काम्यकर्म निखालस सोडून द्यावे. मनांत कोणतीही कामना बाळगूं नये. हे पूर्वीही विवरण करून सांगितलेच आहे ९४.


    धरोनि मदर्पणाचें बळ । 'नित्य' आचरतां निर्मळ ।
    चित्ताचे चैत्य-मळ । जाती तत्काळ नासोनि ॥९५॥
    प्रत्येक कर्म मला अर्पण करण्याचे पाठबळ घेऊन निरंतर निर्मळ कर्माचे आचरण केले असतां चित्ताचे मळ तत्काळ नाश पावतात ९५.


    कृषीवळु करी शेतासी । यथार्थ द्रव्य दे राजयासी ।
    तो न भी ग्रामकंटकांसी । तेवीं कृष्णार्पणेंसीं होतसे ॥९६॥
    शेतकरी शेत पेरतो, आणि सरकारचा योग्य धारा सरकाराला देऊन टाकतो. गांवकुटाळांना तो मुळीच भीत नाही. कृष्णार्पणानेंही तसेंच होते ९६.


    जाहल्या चित्तमळक्षाळणें । नित्यविवेकु उपजे तेणें ।
    इहामुत्रां लाता हाणे । अनित्य त्यजणें वैराग्यें ॥९७॥
    चित्तांतील सारे मळ धुऊन गेले म्हणजे 'नित्य' वस्तूचा विचार मनांत उद्‌भवतो आणि इहपरलोकच्या सुखावर लाथ मारून वैराग्याने 'अनित्याचा' त्याग करतो ९७.


    एवं वैराग्य झालिया अढळ । तेणें सत्त्व होय प्रबळ ।
    तेव्हां मज जाणावया केवळ । वृत्ति निर्मळ ते काळीं ॥९८॥
    अशा प्रकारे वैराग्य अढळ झाले म्हणजे त्याच्या योगाने सत्वगुण वाढतो. तेव्हांच मला जाणण्याइतकी वृत्ति निर्मळ होते ९८.


    करितां माझीं चिंता । कामक्रोध नाठवती चित्ता ।
    थोर लागली माझी अवस्था । न राहे सर्वथा अणुभरी ॥९९॥
    माझे चिंतन करूं लागले असतां चित्ताला कामक्रोधाची आठवणही होत नाही. त्याला माझा अतिशय ध्यास लागून राहिलेला असतो. तो क्षणभरही माझ्या चिंतनावांचून राहात नाही ९९.


    हो कां ऐशिये अवस्थेसी । कर्मक्रिया नावडे ज्यासी ।
    तेणें संन्यासूनि सर्व कर्मांसी । ब्रह्मज्ञानासी रिघावें ॥१००॥
    अशा चित्ताच्या अवस्थेत ज्याला कर्मक्रिया आवडत नाहीशी होते, त्याने सर्व कर्मांचा संन्यास करून ब्रह्मज्ञानांत शिरावें १००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...