मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० ओव्या ३०१ ते ४००

    वेदांती स्वरूपभूत । आत्मा ज्ञानस्वरूप म्हणत ।

    हेंही न घडे गा येथ । ऐसें स्वमत बोलती ॥१॥
    वेदांती लोक स्वरूपभूत आत्मा ज्ञानस्वरूप आहे असे म्हणतात, हेही येथे घडत नाही, असे आपलें मत ते प्रतिपादन करीत असतात ! १.


    घटपटाकार पाहातां । ज्ञानासी त्रिक्षणावस्था ।
    आत्मा ज्ञानस्वरूप म्हणतां । लाज सर्वथा त्यां न ये ॥२॥
    घटपट इत्यादि आकार पाहात असतां ज्ञानाला त्रिक्षणावस्था म्ह. क्षणभंगुरत्व असल्याचे दिसून येते असे असतां आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे असे म्हणतांना त्यांना लाजही कशी वाटत नाही ? २.


    एवं वेदांत्याच्या ठायीं । आत्मनिश्चयो दृढ नाहीं ।
    'मोक्ष' म्हणती जो कांहीं । तोही पाहीं मिथ्याचि ॥३॥
    मिळून काय की, वेदांत्यांमध्ये सुद्धा आत्मस्वरूपाचा ठाम असा निश्चय एकही नाहीं; मोक्ष म्हणून जो काय म्हणतात तोही मिथ्याच ! ३.


    इंद्रियसुखेंवीण सुख । मोक्ष म्हणती ते अविवेक ।
    इंद्रियद्वारा जीवांसी हरिख । भोगितांही मूर्ख न मानिती ॥४॥
    इंद्रियजन्य सुखाशिवाय मोक्षसुख म्हणून निराळे आहे असे म्हणतात, तोही अविचारच ; कारण इंद्रियांच्या द्वारें जीवांना प्रत्यक्ष सुख मिळत असून हे मूर्ख लोक ते मानीत नाहीत ! ४ ;


    देहेंवीण विदेही । सुख भोगिजे कोणें कांहीं ।
    अद्वैतवादी जल्पती कांहीं । तें सत्य नाहीं सर्वथा ॥५॥
    देहाशिवाय, विदेहपणानें कोण कधीं सुख भोगते ? अद्वैतवादी काही तरी बडबड करतात, ती खरी नव्हे ५;


    जीवासी जेणें सुखप्राप्ती । ते इंद्रियेंचि नाहीं म्हणती ।
    डोळे फोडूनि देखणे होती । तैसी वदंती वेदांत्यां ॥६॥
    जीवाला ज्याने सुखाची प्राप्ति व्हावयाची, ती इंद्रियेच ते मिथ्या म्हणतात ! डोळे फोडून डोळस व्हावें, तशांतील ही वेदांत्यांची बडबड आहे ! ६;


    येथ ईश्वरुचि नाहीं फुडा । मा तो फळ देईल हा बोल कुडा ।
    अद्वैतवादी मूर्ख गाढा । नागवी मूढां वैराग्यें ॥७॥
    येथे मुळी ईश्वरच जर नाही, तर तो फळ देईल हे म्हणणे खोटे ठरलेच, अद्वैतवादी हे महामूर्ख असतात, ते वैराग्याच्या निमित्ताने मूर्खाना खड्यांत घालतात ! ७.


    गांव ठावो ना पदवी । तो मिथ्या ईश्वरु धरोनि जीवीं ।
    कर्मफळीं नैराश्य करवी । अथवा सांडवी कर्मातें ॥८॥
    ज्याला गांव नाही, ठाव नाही आणि सत्ताही नाही, अशा खोट्याच ईश्वराची मनांत कल्पना बाळगून कर्मफळाचा किंवा कर्माचा त्याग करवितात ! ८.


    नरदेहीं ज्ञान उपजलें । तेणें देहचि नाशिलें ।
    फळें वृक्षमूल छेदिलें । कोणीं देखिलें कोठेंही ॥९॥
    नरदेहांत ज्ञान उत्पन्न झाले, आणि त्याने देहाचाच नाश करून टाकला ! फळाने वृक्षाचे मूळच तोडून टाकलेले कोणी कोठे पाहिले आहे ? ९.


    ज्ञानाचे परिपाकदशें । म्हणती अवघा संसारुचि नाशे ।
    सृष्टि प्रवाहरूपें नित्य असे । नित्य नासे कैसेनि ॥४१०॥
    ज्ञानाची परिपक्कता झाली म्हणजे सारा संसारच नाश पावतो असें (वेदांती) म्हणतात; पण सृष्टि ही प्रवाहाच्या रूपाने नित्यच आहे; तेव्हां नित्याचा नाश तो कसा काय होतो ? ४१०.


    मनुष्याचे हृदयींचें ज्ञान । तेणें संसाराचें निर्दळण ।
    तरी खद्योततेजें जाळिले जाण । ग्रहगण शशी सूर्य ॥११॥
    मनुष्याच्या हृदयातील ज्ञानाने जर संसाराचा नाश होत असेल, तर काजव्याच्या तेजानेंही चंद्र, सूर्य आणि नवग्रह जळून जातील ! ११.


    एवं करूं जातां निवृत्ति । केले कष्ट ते मिथ्या होती ।
    इंद्रियेंवीण सुखप्राप्ति । नव्हे निश्चितीं जीवासी ॥१२॥
    तात्पर्य, निवृत्तीचा स्वीकार करावयास गेलें तर केलेले कष्ट फुकट जातात; कारण, इंद्रियांशिवाय जीवाला कधीच सुखप्राप्ति व्हावयाची नाही १२;


    यालागीं निवृत्ति ते वृथा कष्ट । सर्वांसी प्रवृत्तिच अतिश्रेष्ठ ।
    कर्में करोनियां उद्‍भट । फळें वरिष्ठ भोगावीं ॥१३॥
    म्हणून निवृत्ति म्हणजे व्यर्थ कष्ट मात्र आहेत; सर्वांना प्रवृत्ति हीच अत्यंत श्रेष्ठ आहे; सपाटून कर्मे करावी आणि त्याची उत्तमोत्तम फळे खुशाल भोगावीत १३;


    संसार म्हणती मायिक । ते जाणावे केवळ मूर्ख ।
    संसारवेगळें सुख । नाहीं देख जीवासी ॥१४॥
    संसार हा केवळ मायिक आहे, असे म्हणतात ते शुद्ध मूर्ख होत; जीवाला संसारावांचून दुसरे सुखच नाही १४;


    मनुष्याधिकारें सुखप्राप्ति । यालागीं देव मनुष्यत्व वांछिती ।
    वेदांती मनुष्यत्व निंदिती । केवीं ते युक्ती मानावी ॥१५॥
    म्हणूनच देवही मनुष्य होण्याची इच्छा करतात; आणि वेदांती मनुष्य देहाची निंदा करतात; तेव्हां त्यांची युक्ति कशी मान्य करावी ? १५.


    वेदें अधिकारु बोलिला । तो वेदुचि इंहीं वेडा केला ।
    यांचे लागला जो बोला । तो नागवला सर्वस्वें ॥१६॥
    वेदाने अधिकार सांगितलेला आहे, तो वेदच यांनी वेडा करून सोडला. तात्पर्य, यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवील त्याचा सर्वस्वी नाश मात्र व्हावयाचा ! १६.


    वेदाचें वेदवचन । सर्वार्थीं तें प्रमाण ।
    मिथ्या म्हणतो तें वेदवचन । थोर सज्ञान हे झाले ॥१७॥
    वेदवचन म्हणतात तें सर्वोपरी प्रमाण असते, त्या वेदवचनालाच हे मिथ्या म्हणतात ! तेव्हां हेच मोठे ज्ञाते झाले की नाही ? ७.


    ऐशी मीमांसकांची वदंती । नानापरींच्या चाळिती युक्ती ।
    आपुलें मत स्थापिती । तें मिथ्या निश्चितीं उद्धवा ॥१८॥
    (भगवान् म्हणतात) मीमांसकांचे भाषण असें असतें. ते नानाप्रकारच्या कोट्यांवर कोट्या लढवून आपले मत स्थापन करतात, पण उद्धवा ! तें निखालस खोटें आहे १८.


    लापनिका ऐसें मिथ्या त्यांचें मत । अंगीकरूनि प्रस्तुत ।
    प्रपंच‍अनर्थता दावित । दृढ स्थापित वैराग्य ॥१९॥
    पूर्वमीमांसावाद्यांचे शब्दपांडित्यच गृहीत धरून प्रपंचांत कसे अनर्थ आहेत हे दाखवीत (भगवान् ) वैराग्याची सप्रमाण सिद्धता करीत आहेत १९.


    एवमप्यङ्ग सर्वेषां देहिनां देहयोगतः ।
    कालावयवतः संति भावा जन्मादयोऽसकृत् ॥ १६ ॥
    [श्लोक १६] तर हे उद्धवा ! सर्वच मनुष्यांना देह व काळाचे विभाग यांच्यामुळे प्राप्त होणार्‍या जन्मादिक अवस्था नित्य मानाव्या लागतील व त्यांना मोक्ष कधीच मिळणार नाही. (१६)


    म्हणें आइकें बापा उद्धवा । हा मिथ्या मतवादु आघवा ।
    म्हणसी कैसेनि जाणावा । विवेक करावा मतांचा ॥४२०॥
    श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा ! बाबा ऐक. हा सारा मतवाद मिथ्या आहे. पण तो कळावा कसा असे म्हणशील, तर त्या मतांचा विचार करावा म्हणजे झाले ४२०.


    निवृत्ति ते केवळ कष्ट । म्हणती प्रवृत्ति अतिश्रेष्ठ ।
    प्रवृत्तीमाजीं परम कष्ट । मरण अरिष्ट अनिवार ॥२१॥
    निवृत्ति हे निवळ कष्ट आहेत म्हणून प्रवृत्ति हीच अत्यंत श्रेष्ठ असे म्हणतात. परंतु प्रवृत्तिमध्येही अतिशय कष्ट असून मरणाचे अरिष्ट तर अनिवार्यच आहे २१.


    धरोनियां जन्ममूळ । अखंड लागलासे काळ ।
    लवनिमिष पळपळ । काळ वेळ साधित ॥२२॥
    जन्ममूळास धरून काळ हा अखंड पाठीस लागलेला असतो. लव, निमिष, पळपळ धरून काळ हा वेळ साधीत असतो २२.


    जैसें संवचोराचें साजणें । तैसें काळाचें जोगवणें ।
    वेळ आल्या जीवेंप्राणें । नाहीं राखणें सर्वस्वें ॥२३॥
    बरोबर असणाऱ्या चोराची मैत्री, त्याप्रमाणे काळाची पोसणूक आहे. वेळ आली की जीवप्राण सारे लुटून घेतो; काहीएक शिल्लक ठेवीत नाहीं २३.


    काळु न म्हणे हाट घाट । न म्हणे अवसी पहांट ।
    न म्हणे देश विदेश वाट । नाशी उद्‍भट निजतेजें ॥२४॥
    काळ हा बाजार म्हणत नाही किंवा नदीचा घाट म्हणत नाही. अवशी किंवा पहाटे याचा विचार मनात आणीत नाही; देश किंवा परदेश म्हणत नाही. आपल्या प्रभावाने सर्वांना सरसकट स्वाहा करून सोडतो २४.


    करितां प्रवृत्तीचे कष्ट । अवचितां मृत्यूचा चपेट ।
    अंगीं वाजे जी उद्‍भट । अहा कटकट ते काळीं ॥२५॥
    प्रवृत्तीचे कष्ट काढता काढतां एकदम मृत्यूचा असा तडाका येऊन बसतो की, हायहाय ! नको तो प्रसंग ! २५.


    जीवीं वासनेच्या थोर हांवा । म्हणे गेलों मेलों धांवा पावा ।
    कोण निवारी मृत्युप्रभावा । उपावो तेव्हां चालेना ॥२६॥
    जीवामध्ये वासनेची हांव दांडगी असते म्हणून 'गेलों ! मेलों ! धावा ! धावा ! या ! या !' असे तो म्हणतो. पण मृत्यूच्या तडाक्याचे निवारण कोण करणार ? त्या वेळी कोणाचाच उपाय चालत नाही २६.


    काळु मारोनि नोसंडी । यातना भोगवी गाढी ।
    सवेंचि गर्भवासीं पाडी । जेथ दुःखकोडी अनिवार ॥२७॥
    काळ नुसते मारूनच सोडीत नाही, तर आणखी नानाप्रकारच्या यातना भोगावयास लावतो, आणि ज्यांत अनिवार दुःखें असतात अशा गर्भवासांत तो घालतो २७.


    मातेच्या जठरकुहरीं । विष्ठामूत्रांच्या दाथरीं ।
    अधोमुख नवमासवरी । उकडी भारी जठराग्नी ॥२८॥
    मातेच्या उदररूपी गुहेत, मलमूत्राच्या कोथळीत, खाली तोंड करून नऊ महिनेपर्यंत जठराग्नि त्याला अगदी शिजवीत असतो, २८.


    विष्ठालेपु चहूंकडे । नाकी तोंडीं कृमी किडे ।
    गर्भवासींचे कष्ट गाढे । कोणापुढें सांगेल ॥२९॥
    त्या वेळी चारही बाजूंनी मलमूत्राचा लेप लागलेला असतो. नाकातोंडांत किडे शिरत असतात. याप्रमाणे गर्भवासांतील अत्यंत कष्ट कोणापाशी सांगणार ? २९.


    कट्वम्ललवणमेळें । गर्भवतीचे पुरती डोहळे ।
    त्वचेवीण गर्भांग पोळे । तेणें दुःखें लोळे अतिदुःखी ॥४३०॥
    नंतर गरोदर स्त्रियेला डोहळे लागतात; तेव्हां ती कडू, आंबट, खारट पदार्थ खाते; त्या वेळी गर्भाच्या अंगावर पुरती कातडीही नसल्यामुळे, त्याने त्याचे सारे अंग भाजून त्या दुःखाने अतिशय विव्हळ होऊन लोळत असतो ४३.


    ते गर्भोदरींची व्यथा । नेणती माता आणि पिता ।
    तेथ नाहीं कोणी सोडविता । जीवींची व्यथा जीव जाणे ॥३१॥
    त्या गर्भाला पोटात काय काय यातना भोगाव्या लागतात हे आईबापांना कळत नाही. त्यांतून सोडविणारा तेथे कोणीच नसतो. त्या जीवाची व्यथा जीवालाच माहीत ! ३१.


    ज्या ठायाची करूं नये गोठी । प्रकट दावूं नये दिठी ।
    ते योनिद्वारें अतिसंकटीं । जन्म शेवटीं जीवासी ॥३२॥
    ज्या ठिकाणची गोष्ट सुद्धा कोणी तोंडातून काढीत नाही, जें ठिकाण प्रत्यक्ष कोणी डोळ्यांना दाखवीत सुद्धा नाही, तशा त्या योनिद्वारांतून मोठ्या संकटाने शेवटी जीवाचा जन्म होतो ! ३२.


    जे नित्य मूत्राची न्हाणी । कीं नविया नरकाची खाणी ।
    जे रजस्वलारुधिराची श्रेणी । जन्म तेथोनी पावती ॥३३॥
    जी नित्य मूत्राची मोरी; किंवा नव्या नरकाची खाण ; आणि रजस्वलेच्या रुधिराची डोणी; तेथून प्राणी जन्मास येतो ३३.


    अपवित्र विटाळशीचें रुधिर । तें गोठोनि झालें जी शरीर ।
    निंद्यद्वारें जन्मोनि नर । आम्ही पवित्र म्हणविती ॥३४॥
    विटाळशीचे घाणेरें रक्त गोठून जाऊन हे शरीर बनलेले असते; आणि निंद्य द्वारांतून पुरुषाचे जन्म होते; असे असून ते आपणाला 'पवित्र' म्हणवितात ! ३४.


    गर्भवासाहूनि गाढें । दुःख कोण आहे पुढें ।
    मतवादी बोले तें कुडें । सुख नातुडे प्रवृत्तीं ॥३५॥
    गर्भवासाहून अधिक दुःख दुसरे कोणते आहे ? मताभिमानी बोलतात ते खोटें आहे. प्रवृत्तींत मुळीच सुख नाही ३५.


    एके जन्में जन्म न सरे । एकें मरणें मरण नोसरे ।
    कोटि कोटि जन्मांचे फेरे । काळ योनिद्वारें करवितु ॥३६॥
    एका जन्माने जन्मही सरत नाही, आणि एका मरणाने मरणही नाहीसे होत नाही. काळ हा योनीच्या द्वारानें कोटि कोटि जन्माचे फेरे करवितो ३६.


    पुढतीं जन्म पुढतीं मरण । अनिवार लागलें जाण ।
    प्रवृत्तीमाजीं सुख कोण । दुःख दारुण भोगवी ॥३७॥
    पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यु, हे सारखें लागलेलंच आहे. अशा प्रवृत्तीमध्ये सुख ते काय असणार ? भयंकर दुःख मात्र भोगावे लागते ३७.


    जन्ममरणांमाजिले संधी । आणिकही थोर दुःख बाधी ।
    त्या दुःखाची दुःखसिद्धी । ऐक त्रिशुद्धी सांगेन ॥३८॥
    जन्ममरणाच्या मधल्या संधीत तर मोठमोठी दुःखें पीडा देतात. त्या दुःखांचा दुःख देण्याचा प्रकारही आता सांगतों ३८.


    धाडीभेणें पळतां थोर । आडवे नागवती चोर ।
    तैसें जन्ममरणांचें अंतर । षड्‌विकार राखती ॥३९॥
    चोरांचा हल्ला येईल या भीतीने त्वरेने पळू लागावें, तो मध्येच चोर येऊन लुटून नेतात; त्याप्रमाणे जन्ममरणाचे अंतर षड्विकार भरून काढतात ३९.


    षड्‌विकारांच्या पतिव्रता । षडूर्मी लागल्या जीविता ।
    एवं प्रवृत्तीमाजीं परम व्यथा । सुख सर्वथा असेना ॥४४०॥
    षड्विकारांच्या पतिव्रता स्त्रिया म्हणजे षडूर्मी जीवाला जळूप्रमाणे चिकटतात. मिळून प्रवृत्तीमध्ये अतिशय दुःखच आहे, सुख मुळीच नाही ४४०.


    कर्मवादियांच्या मतां । जीवु स्वतंत्र कर्मकर्ता ।
    म्हणती ते मिथ्या वार्ता । परतंत्रता प्रत्यक्ष ॥४१॥
    आतां कर्मवाद्यांच्या मताने जीव हा स्वतंत्र कर्मकर्ता आहे; पण हे त्यांचे म्हणणे मिथ्या आहे. कारण त्याला परतंत्रता असलेली प्रत्यक्ष दृष्टीस पडते ४१.


    तत्रापि कर्मणां कर्तुरस्वातन्त्र्यं च लक्ष्यते ।
    भोक्तुश्च दुःखसुखयोः कोन्वर्थो विवशं भजेत् ॥ १७ ॥
    [श्लोक १७] शिवाय या जगात कर्म करणारा व त्यांची सुखदुःखे भोगणारा मनुष्यप्राणी संपूर्णपणे परतंत्र आहे अशा पराधीन प्राण्याला कोणता विषय सुख देऊ शकेल ? (१७)


    जीवासी असती स्वतंत्रता । तरी तो दुःखभोग न भोगिता ।
    सदा सुखीचि असता । पापें न करिता अळुमाळु ॥४२॥
    जीवाला स्वतंत्रता असती, तर तो दुःखभोग कधींच भोगता ना. सदासर्वकाल सुखीच असता. दुःखाचें मूळ असें जें पाप, तें तो करता ना ४२.


    जीवु बापुडें सदा दीन । कर्में करूनि कर्माधीन ।
    कर्मफळदाता तो भिन्न । सुखदुःखें जाण तो भोगवी ॥४३॥
    जीव विचारा नेहमींच दीन, बापुडवाणा; कर्मे करून कर्माधीन असणारा, त्याला कर्माचे फळ देणारा निराळाच असतो, तोच त्याला सुखदुःखें भोगवितो, हे लक्षात ठेव ४३.


    यालागीं ईश्वराची सत्ता । तो करमफळाचा दाता ।
    जीवु सुखदुःखांचा भोक्ता । स्वतंत्रता त्या नाहीं ॥४४॥
    याकरितां ईश्वराची सत्ता हीच श्रेष्ठ आहे. तोच कर्मफळाचा दाता आहे, आणि जीव हा सुखदुःखाचा भोक्ता आहे. त्याला स्वतंत्रता नाही ४४.


    ऐसें लक्षितां लक्षण । जीवु तितका पराधीन ।
    पराधीनपणें जाण । भोगी दारुण सुखदुःख ॥४५॥
    हें लक्षण पाहिले म्हणजे जीव तितका पराधीन आहे, ही गोष्ट लक्षात येते, आणि त्या पराधीनपणामुळेच तो भयंकर सुखदुःख भोगतो ४५.


    मजलागीं दुःख होआवें । ऐसें कोणी भावीना जीवें ।
    न वांछितां दुःख पावे । येणें न संभवे स्वतंत्रता ॥४६॥
    मला दुःख व्हावे अशी मनापासून कोणीच इच्छा करीत नाही; पण दुःख हें इच्छा न करताही प्राप्त होते. यावरूनही त्याला स्वतंत्रता संभवत नाही ४६.


    श्रुतिस्मृतींतें विचारितां । जीवासी नाहीं स्वतंत्रता ।
    पराधीनपणें वर्ततां । भोगी अप्रार्थितां सुखदुःख ॥४७॥
    श्रुतिस्मृतींचा विचार केला तरी सुद्धा जीवाला स्वतंत्रता नाही असेंच सिद्ध होते. तो पराधीनपणे वागत असल्यामुळे त्याला न मागतां सुखदुःख भोगावे लागतें ! ४७.


    वादी परिहार करिती । साङ्ग कर्म जे नेणती ।
    ते ते जीव दुःखी होती । सुख पावती कर्मज्ञ ॥४८॥
    यावर प्रतिवादी असे उत्तर देतील की, ज्यांना ज्यांना यथासांग कर्म करणे कळत नाही, ते ते जीव दुःखी होतात. आणि जे कर्म जाणणारे असतात ते सुख पावतात ४८.


    जे सदाचार श्रोत्री । जे याज्ञिक अग्निहोत्री ।
    जे उभयलोकव्यापारी । साङ्ग करी कर्मातें ॥४९॥
    जे सदाचारसंपन्न श्रोत्रिय असतात, किंवा जे याज्ञिक व अग्निहोत्री असतात, ते इहपरलोकासाठी यथासांग कर्म करतात ४९.


    जे अविकळ अव्यंग । कर्में करूनियां साङ्ग ।
    उभय लोकीं सुखभोग । कर्मयोग भोगिती ॥४५०॥
    ज्यांची इंद्रिये तरतरीत आहेत, कोठे काही न्यून नाही, ते यथासांग कर्मे करून दोन्ही लोकांतील सुखांचा कर्मयोगाच्या द्वारे उपभोग घेतात ४५०.


    कर्मीं ज्याची योग्यता । तो सुखभोगाचा भोक्ता ।
    हेंहि न घडे गा सर्वथा । ऐक आतां सांगेन ॥५१॥
    परंतु (भगवान् म्हणतात) कर्मातही ज्याची योग्यता उत्तम असते, त्याला सुखाचा उपभोग नेहमी घ्यावयाला मिळतोच असेंही होत नाही. त्याचाही प्रकार आता सांगतों, ऐक ५१.


    न देहिनां सुखं किञ्चिद् विद्यते विदुषामपि ।
    तथा च दुःखं मूढानां वृथाहङ्करणं परम् ॥ १८ ॥
    [श्लोक १८] या जगात असे दिसते की, उत्तम कर्म करू जाणणार्‍यांनाही सुख मिळत नाही आणि कर्म न जाणणार्‍या मूर्खांनाही दुःख भोगावे लागत नाही अशा स्थितीत कर्मामुळे सुख मिळवण्याचा अहंकार व्यर्थ आहे. (१८)


    कर्माचे जे तत्त्वतां ज्ञाते । तेही दुःखी देखों येथें ।
    सुखी देखिजे मूर्खातें । जे कर्मातें नातळती ॥५२॥
    जे कर्माचे खरोखर ज्ञाते असतात तेही येथे दुःखी असलेले दृष्टीस पडतात; आणि जे कर्माला शिवतसुद्धा नाहीत, ते मूर्ख लोकही सुखी असल्याचे दिसतात ५२.


    चुकोनि यज्ञपुरुषा अच्युतातें । अग्निहोत्री करिती यागातें ।
    तें स्वकर्मचि त्यांचें त्यांतें । विपरीतार्थें फळतसे ॥५३॥
    यज्ञपुरुष जो अच्युत, त्याला सोडून अग्निहोत्री यज्ञ करतात; ते त्यांचे स्वकर्मच त्यांना विपरीतार्थाने फळतें ५३.


    अग्नि तो तंव स्वरूप माझें । श्रुतिमंत्र ते तंव माझीं बीजें ।
    आणि होमद्रव्य जें जें । तेंही माझें स्वरूप ॥५४॥
    अग्नि तर माझेच स्वरूप आहे; आणि श्रुतिमंत्र तर सारी माझींच बीजे आहेत. होमद्रव्य म्हणून जे आहे तेही माझेच स्वरूप होय ५४.


    ऐशिया मज सर्वगतातें । नास्तिक्य देवोनि निजचित्तें ।
    अनीश्वरवादी करिती यागातें । तोचि त्यांतें बद्धक ॥५५॥
    अशा मला सर्वव्यापकाला आपल्या मनाने नास्तिकपणा देऊन अनीश्वरवादी लोक यज्ञ करतात. तोच त्यांना बद्धक होतो ५५.


    स्रुक स्रुवा आणि प्रणीतापात्र । मांडूं शिकले कर्मतंत्र ।
    मज निजात्मयाचें चुकलें सूत्र । तेणेंचि अपवित्र तो यागु ॥५६॥
    स्रुक्, स्रुवा, प्रणीतापात्र इत्यादि सामग्रीने कर्मतंत्र उत्तम मांडायला शिकलेले असतात; परंतु माझे आत्मारामाचे खरे सूत्र चुकल्यामुळेच तो याग अपवित्र होतो ५६.


    सकळ हें सर्वमुखीं । मज अर्पितसे यज्ञपुरुखीं ।
    हें न मनिजे याज्ञिकीं । बुद्धी अल्प कीं सकाम ॥५७॥
    वस्तुतः हे सारे विश्वतोमुखी जो मी, त्या मज यज्ञपुरुषालाच अर्पण होत असते. पण याज्ञिक लोक ते मान्य करीत नाहीत. कारण त्यांची बुद्धि कोती असून ते सकाम असतात ५७.


    मज न अर्पितां जें सुकृत । तेंचि जाण दुःख दुरित ।
    विषा नांव अमृत म्हणत । तैसें सुकृत सकाम ॥५८॥
    मला अर्पण न करतां जें पुण्य संपादन करणे तेंच पातक व तेंच दुःख होय. विषाला अमृत म्हणावे त्याप्रमाणेच सकामाचे पुण्य असते ५८.


    मातें न पवतां जो स्वर्ग । तो जाणावा उपसर्ग ।
    तेथींचा भोग तो महारोग । मूढ उद्योग याज्ञिकां ॥५९॥
    मला न पोचता स्वर्ग मिळविणे तो शुद्ध उपसर्गच जाणावा. आणि त्यापासून मिळणारा जो भोग तो मोठा रोग समजावा. असा याज्ञिकांचा उद्योग केवळ मूढपणाचा असतो ५९


    कर्मीं कर्म विगुण होत । तेथ स्मरावा मी अच्युत ।
    नामें न्यून तें संपूर्ण होत । हें सामर्थ्य नामाचें ॥४६०॥
    कर्म करतांना जर त्यांत कांहीं न्यून पडले, तर तेथें माझें श्रीकृष्णाचे स्मरण करावें ; म्हणजे त्या नामानेच त्यांतील न्यून ते पूर्ण होते. इतके माझ्या नामाचे सामर्थ्य आहे ४६०.


    तो मी अंगें आपण । याज्ञिकां मागों गेलों अन्न ।
    मज नेदितीच ते ब्राह्मण । कर्मठपण तें कर्माचें ॥६१॥
    तो मी स्वतः जातिनिशी याज्ञिकांकडे अन्न मागावयाला गेलों, तर त्या ब्राह्मणांनी मला ते दिले नाही. हेच ते कर्माचें कर्मठपण होय ६१.


    मज यज्ञपुरुषातें सांडून । करिती इंद्रादिकांचे भजन ।
    ते इंद्रादिक मज‍अधीन । कर्मवैगुण्य हें त्यांसी ॥६२॥
    ते मला यज्ञपुरुषाला सोडून इंद्रादि देवांचे भजन करतात ! पण ते इंद्रादि देव माझ्याच आधीन असतात, हे त्यांना कळत नाही. हेच त्या कर्मांतील वैगुण्य होय ६२.


    जे कर्म न करिती कृष्णार्पण । त्यांचें मळिण प्राक्तन ।
    तेणें इहलोकीं दरिद्रता जाण । पडे विघ्न परलोकीं ॥६३॥
    जे कोणी आपले कर्म कृष्णार्पण करीत नाहीत, त्यांचे दैवच फुटके म्हणून समजावे. तशा करण्याने इहलोकी दारिद्यांत कुचमावें लागते, आणि परलोकालाही विघ्न येते ६३.


    चुकवूनियां निजमुख । सर्वांगीं खिरीसाकरेचा देख ।
    लेपु देतां न वचे भूक । अधिक दुःख तेणें होय ॥६४॥
    आपले तोंड सोडून साऱ्या अंगाला खिरीचा आणि साखरेचा लेप दिला, तर त्याने भूक तर निवत नाहींच, पण उलट अतिशय दुःख मात्र होते ६४.


    तैसें मज चुकवूनि यज्ञपति । जे यागातें आचरती ।
    बाळविधवे गर्भप्राप्ती । तैशीं फळें येती त्या यागा ॥६५॥
    तद्वत मला यज्ञपतीला चुकवून जे यज्ञयाग करतात, त्या यज्ञाला, बालविधवेला गर्भप्राप्ति झाल्याप्रमाणे फळे येतात ! ६५.


    कर्मउद्देशें द्रव्य मागतां । यज्ञफळ ने द्रव्यदाता ।
    याज्ञिक तो राहे रिता । मी कर्ता हा अभिमानु ॥६६॥
    मी यज्ञ करणार आहे म्हणून दुसऱ्यापाशी द्रव्य मागितले, तर त्या यज्ञाचे फळ तो द्रव्य देणारा घेऊन जातो; आणि यज्ञ करणारा कोरडाच्या कोरडाच राहातो. मी कर्ता हा अभिमान मात्र उरावर बसतो ६६.


    जैसा चाटू खिरीआंतु । चाटुवेंचि खिरी वाढिजेतु ।
    चाटू खरकटल्या सांडितु । भोक्ते भोगितु परमान्न ॥६७॥
    खिरीमधील पळीने लोकांना खीर वाढीत असतात. ती खिरीनें खरकटली तर तिला ठेवून देतात. पण खीर खाणारे लोक ती खाऊन पार होतात ६७.


    सरस ऊंस घालिजे घाणा । रस पिळूनि भरे भाणा ।
    रिता चोपटीं करकरी घाणा । ते गती जाणा याज्ञिकां ॥६८॥
    उत्तम ऊंस घाण्यांत घातला, तर तो घाणा त्या उसांतील रस पिळून मांदण भरतो, आणि आपण रिकामी चिपाडें चघळून करकरत असतो. तीच दशा याज्ञिकांची होते ६८.


    तैसे याज्ञिक यज्ञ आचरत । द्रव्यदात्यासी तें फल होत ।
    पशुहिंसा याज्ञिकां प्राप्त । दोषी होत अभिमानें ॥६९॥
    याज्ञिकही तसेच यज्ञ करतात, त्याचे फळ द्रव्य देणाराला मिळते. यज्ञात पशुहिंसा करावी लागते तो दोष मात्र कर्तृत्वाभिमानामुळे याज्ञिकांच्या पदरी पडतो ! ६९.


    एवं कर्मकुशळ याज्ञिक । यापरी ते भोगिती दुःख ।
    कर्म नेणती जे मूर्ख । ते परम सुख भोगिती ॥४७०॥
    तात्पर्य कर्मामध्ये निष्णात असलेले याज्ञिक अशा प्रकारचे दुःख भोगतात ; पण ज्या मूर्खांना कर्मच माहीत नसते, ते परमसुखाचा उपभोग घेतात ४७०.


    नेणती कर्माच्या घडामोडी । परी माझी श्रद्धा पोटीं गाढी ।
    तेणें उल्लंघोनि दुःखकोडी । निजात्मगोडी भोगिती ॥७१॥
    कर्माचा खटाटोप माहीत नसतो, पण त्यांच्या मनात माझ्याविषयीं श्रद्धा मात्र निस्सीम असते. त्यामुळे ते कोट्यवधि दुःखांतून पार पडून आत्मसुखाच्या गोडीचा उपभोग घेतात ७१.


    कर्मीं कर्मादरु नेणत । माझ्या ठायीं श्रद्धायुक्त ।
    भाळे भोळे माझे भक्त । सुख अनंत पावले ॥७२॥
    त्यांना कर्मामध्ये कसा आदर ठेवावा हे कळत नाही, परंतु माझ्या ठिकाणी श्रद्धा मात्र असते; असे माझे साळेभोळे भक्त अत्यंत सुख पावतात ७२.


    काय कर्म केलें गोपाळीं । जे अखंड मजसवें गोकुळीं ।
    भोगिली निजसुखनव्हाळी । करोनि होळी कर्मांची ॥७३॥
    जे निरंतर गोकुळामध्ये माझ्याबरोबर होते, त्या गोपाळांनी कोणते कर्म केले होते ? पण त्यांनी कर्माची होळी करून नित्य नव्या आत्मसुखाचा उपभोग घेतला ना ! ७३.


    पाहतां गोपिकांचें कर्म । कर्ममार्गीं निंद्य धर्म ।
    पावल्या माझें परम धाम । जीवीं पुरुषोत्तम आवडला ॥७४॥
    कर्ममार्गानुसार गोपींच्या कर्माचा विचार केला तर, त्यांचा धर्म निंद्यच होता; पण त्यांच्या जीवाला पुरुषोत्तमाची आवड लागल्यामुळे त्याही माझ्या परमधामाला पोचल्या ७४.


    खग-मृग-गो-सर्पादि समस्त । माझे निजपदीं झाले प्राप्त ।
    याज्ञिकां कर्माभिमान बहुत । दुःख भोगित निजकर्में ॥७५॥
    इतकेच नव्हे, तर गोकुळांतील पशु, पक्षी, गाई व सर्प वगैरे सुद्धा सारे माझ्या पदाला येऊन पोचले. पण याज्ञिक लोकांना कर्माभिमानाचा अतिशय ताठा असल्यामुळे ते आपल्याच कर्माने दुःख भोगीत राहिले ७५.


    केवळ कर्मठ कर्मजड । आम्ही सर्वज्ञ ज्ञाते दृढ ।
    हा अभिमान धरिती मूढ । दुःख वाड तयांसी ॥७६॥
    जे केवळ कर्मठ असतात ते, कर्माच्या योगानेच जडबुद्धि होऊन, सर्वज्ञ काय ते आम्हीच असा मूर्खपणाचाच दृढ अभिमान धरून बसतात, म्हणूनच त्यांना असह्य दुःख भोगावे लागते ७६.


    दीपीं पतंगा मरण देख । तो उडी घालितां मानी सुख ।
    तैसें कर्मठां कर्म केवळ दुःख । मानिती सुख अभिमानें ॥७७॥
    दीपासून पतंगाला खरोखर मरण येते, पण त्याच्यावर झेप घालतांना त्याला सुख वाटते. त्याप्रमाणे कर्मठांना कर्म हें केवळ दुःखाला कारण होते, पण ते केवळ अभिमानानेंच त्यांत सुख आहे असे मानतात ! ७७.


    अभिमानेंचि सर्वथा । नसती जीवासी म्हणे स्वतंत्रता ।
    तेंही न घडे विचारितां । ऐक आतां सांगेन ॥७८॥
    खरोखर अभिमानानेच ते लोक जीवाला नसती स्वतंत्रता मानतात; विचार केला असता ती त्यांना खरोखर नसते. त्याचेंच विवरण आतां सांगतों, ऐक ७८.


    यदि प्राप्तिं विघातं च जानन्ति सुखदुःखयोः ।
    तेऽप्यद्धा न विदुर्योगं मृत्युर्न प्रभवेद् यथा ॥ १९ ॥
    [श्लोक १९] जरी सुखदुःखांची प्राप्ती आणि नाश कसा होतो, हे एखाद्याने जाणले, तरीसुद्धा मृत्यू केव्हा येईल व तो कसा टाळावा, हे तर खात्रीने कोणालाही माहीत नाही. (१९)


    दुःख निरसूनि सुखप्राप्ती । यालागीं कर्मे आचरती ।
    कर्मवादी ज्ञाते म्हणविती । तेही नेणती दुःखनाशु ॥७९॥
    दुःखाचे निरसन होऊन सुखाची प्राप्ति व्हावी, म्हणून कर्माचे आचरण करतात. कर्मवादी आपल्याला मोठे ज्ञाते म्हणवितात, पण दुःखाचा नाश खरोखर कसा करावा हे त्यांना कळत नाही ७९.


    कर्में करितां नाशु नोहे । ऐसें दुःख कोण आहे ।
    पुसशील तरी पाहें । यथान्वयें सांगेन ॥४८०॥
    कर्में करूनही ज्या दुःखाचा नाश होत नाही, असें दुःख तरी कोणते ? असे विचारशील तर तेंही यथानुक्रमाने सांगतों ऐक ४८०.


    मरणांवरतें दुःख चढे । ऐसें दुःख तंव नाहीं पुढें ।
    तें निवारूं नेणती बापुडे । अति बळ गाढें मृत्युचें ॥८१॥
    मरणापरतें अधिक असे कोणतेच दुःख नाहीं; तेंच कसे निवारण करावे हे त्या बिचाऱ्यांना कळत नाही ! एवढा मृत्यूचा तडाखा जबरदस्त आहे ८१.


    आंतु घालितां हातु पोळे । तेणें उन्हवणेंन घर न जळे ।
    तैसा कर्में मृत्यु न टळे । प्रबळबळें अनिवार ॥८२॥
    आंत हात घातला तर तो पोळतो, अशा कढत पाण्याने काही घर जळत नाही; तद्वत् मृत्यु हा प्रबळ बळानेही अनिवार्य असल्यामुळे तो काही कर्मानें टळत नाही ८२.


    मारिता मृत्यु जेणें मारिजे । तो उपावो कर्मठीं नेणिजे ।
    कर्मांमाजी जेणें असिजे । अचुक पाविजे तेणें मृत्यु ॥८३॥
    सर्वास मारक असा जो मृत्यु तो ज्याने मरून जाईल असा उपाय कर्मठांना कळत नाही. जे कर्मामध्ये राहतात त्यांना अचूक मृत्यु येतोच ८३.


    अंतीं येईल मरणदुःख । जंव जीजे तंव भोगिजेल सुख ।
    हें बोलेणे बोलती मूर्ख । जितां सुख त्यां कैंचें ॥८४॥
    मरणाचे दुःख हे शेवटी यावयाचे आहे, याकरितां जिवंत आहों तेथपर्यंत सुख भोगून घ्यावे, असे बोलणे मूर्ख लोक बोलतात; पण त्यांना जिवंतपणांत तरी सुख कशाचें ? ८४.


    कोऽन्वर्थः सुखयत्येनं कामो वा मृत्युरन्तिके ।
    आघातं नीयमानस्य वध्यस्येव न तुष्टिदः ॥ २० ॥
    [श्लोक २०] वधस्थानाकडे नेल्या जाणार्‍या माणसाला ज्याप्रमाणे कोणतीही भोगसामग्री संतुष्ट करू शकत नाही, त्याचप्रमाणे मृत्यू जवळ असणार्‍या माणसाला कोणता पदार्थ किंवा कामना सुखी करू शकेल ? (२०)


    जितांही सुखाची वार्ता । कर्मठां नाहीं सर्वथा ।
    तेही सांगेन मी कथा । ऐक आतां उद्धवा ॥८५॥
    उद्धवा ! कर्मठ लोकांना जिवंतपणीही सुखाचा लेश मिळत नाही; हीच गोष्ट आतां तुला मी सांगतों, ऐक ८५.


    विखे रांधिलें मिष्टान्न । तें गोड न म्हणती सज्ञान ।
    पुढें देखोनियां मरण । निःशेष तें अन्न सांडिती ॥८६॥
    विष घालून मिष्टान्न तयार केले, तर सज्ञान लोक तें गोड आहे असे म्हणणार नाहीत. त्यांत पुढे आपले मरण आहे हे लक्षात आणून ते सर्व अन्न फेंकून देतील ८६.


    आगी लागलिये घरीं । क्षण न राहिजे चतुरीं ।
    मरण नादळतां उरी । सांडूनि दूरी पळताति ॥८७॥
    आग लागलेल्या घरामध्ये शहाणा मनुष्य एक क्षणभर सुद्धा राहाणार नाही. मरण येऊन छातीवर आदळले नाही, तोंच तें घर सोडून लांब पळून जातील ८७.


    धाडी आल्या निजद्वारीं । गोड न लगे साखरखिरी ।
    तैसा मृत्यु जाणितलिया शरीरीं । विषयाकारीं सुख कैंचें ॥८८॥
    आपल्या दरवाजावर दरवडा आला असतां साखरेची खीर खातांना गोड लागणार नाही. त्याप्रमाणे शरीराला मृत्यु आहे हे समजल्यानंतर विषयामध्ये सुख कसे वाटणार ? ८८.


    दाढीसी लागलिया आगी । तो शृंगारु न मनी मुखालागीं ।
    तैसा नीच नवा मृत्यु अंगीं । विषयसंगीं सुख कैंचें ॥८९॥
    एखाद्याच्या दाढीला आग लागली, तर तो आपल्या तोंडाला मोठी शोभा चढली असे जसें मानीत नाही, तसे आपल्या शरीरांत नित्य नवा मृत्यु दिसत असतां विषयाच्या संगतीत सुख कसें वाटेल ! ८९.


    उठिल्या मरणान्त व्यथा । जन धन अन्न आणि कांता ।
    सुख नेदितीच सर्वथा । झालीं वृथा समूळ ॥४९०॥
    मरणकाळची व्यथा सुरू झाली, की जन, धन, अन्न आणि स्त्री सुख देऊ शकत नाहीत. ती सारी व्यर्थ होऊन जातात ४९०.


    अंतकाळीं स्त्री धन । झालीं दुःखासीच कारण ।
    त्यांसी सांडूनि न निघती प्राण । तळमळी जाण प्राणांतीं ॥९१॥
    अंतकाळी कनक आणि कांता ही दुःखाला मात्र कारणभूत होतात. कारण वासनेमुळे त्यांना सोडून प्राण जाता जात नाही. त्यामुळे तो फार तळमळत असतो ९१.


    जैसा सुळीं द्यावया जो नेइजे । त्यासी नाना समारंभु कीजे ।
    मुखीं घालिती पंचखाजें । तेणें तो नव्हिजे सुखिया कीं ॥९२॥
    ज्याप्रमाणे एखाद्याला सुळी द्यावयाला घेऊन जातांना नानाप्रकारचे समारंभ करतात, त्याच्या तोंडांत पंचपक्वान्नें घालतात, पण त्यामुळे त्याला काही सुख वाटत नाहीं ९२.


    तैसें संमुख असतां मरण । विषयसुखें सुखावे कोण ।
    विषय त्यागिती सज्ञान । मूर्खासी जाण आसक्ती ॥९३॥
    तद्वत् डोळ्यांसमोर मरण दिसत असतां, विषयसुखांत आनंद कोणाला वाटेल ? म्हणून सुज्ञ असतात ते विषयांचा त्याग करतात, आणि मूर्ख लोकच त्यांवर आसक्त होऊन राहतात हे लक्षात ठेव ९३.


    देहदुःखाची अर्धघडी । नाशी विषयसुखाची कोडी ।
    विषयालागीं शिणती वेडीं । अविनाश गोडी निर्विषयीं ॥९४॥
    देहाला अर्ध घटकाही दुःख झाले, तर कोव्यवधि विषयसुखें असली तरी ती व्यर्थ होतात. म्हणून विषयसुखाकरितां जे धडपडतात ते वेडे होत. अविनाश गोडी निर्विषयांतच आहे ९४.


    एवं या लोकांच्या ठायीं । सुख सर्वथैव नाहीं ।
    लोकांतरीं म्हणती कांही । न घडे तेंही उद्धवा ॥९५॥
    तात्पर्य, या लोकांमध्ये सुख असें मुळीच नाही. आता कोणी परलोकांत सुख आहे असे म्हणतात, पण उद्धवा ! तेथे सुद्धा सुख मिळत नाही. कसें तें ऐक ९५.


    श्रुतं च दृष्टवद् दुष्टं स्पर्धासूयात्ययव्ययैः ।
    बह्वन्तरायकामत्वात् कृषिवच्चापि निष्फलम् ॥ २१ ॥
    [श्लोक २१] या लोकाप्रमाणेच परलोकसुद्धा सदोषच आहे तेथे सुद्धा स्पर्धा, असूया, पुण्य क्षीण होणे आणि नाश पावणे, हे सर्व आहेच जशी पुष्कळ कष्टांनी केलेली शेती अतिवृष्टी, अनावृष्टी, यांसारख्या संकटांनी नष्ट होते, त्याचप्रमाणे परलोकासाठी केलेल्या प्रयत्‍नांना विघ्ने येतात व ते प्रयत्‍नही विफल होतात. (२१)


    जैसा देखिला हा लोक । तैसाचि श्रुत स्वर्गादिक ।
    अनादि दोषयुक्त देख । सदोष मूर्ख वांछिती ॥९६॥
    इहलोक जसा प्रत्यक्ष दृष्टीस पडतो, तसेच स्वर्गादि लोकही असल्याचे आपण ऐकतों ; पण तेही पहिल्यापासून दोषयुक्तच आहेत. मूर्ख लोक तसल्या दोषयुक्त लोकांचीही इच्छा करतात. ९६.


    स्वर्गीं म्हणसी दोष कोण । ऐक तयांचें लक्षण ।
    स्पर्धा असूया नाश जाण । तप क्षीण दिविभोगें ॥९७॥
    आतां स्वर्गात दोष कोणता, असें तूं म्हणशील. तर त्याचेही लक्षण ऐक. तेथेही स्पर्धा, मत्सर व नाश असतात. शिवाय तेथें भोगाच्या योगानें तपही क्षीण होत असते ९७.


    तपसंपत्ति समान पाही । स्पर्धा मांडी त्याच्या ठायीं ।
    मज समान भोगु पाही । तैं सुख नाहीं मानसीं ॥९८॥
    आपल्याच बरोबरीचे दुसऱ्याचे तप असलेले पाहिले, की त्याच्याबरोबर तो स्पर्धा करूं लागतो. आपल्यासारखेच सुख दुसरा भोगू लागलेला दिसतांच मनाला सुख वाटत नाही ९८.


    आपणाहोनि अधिक पदीं । त्यासी दोष आरोपोनि निंदी ।
    तेथही ऐसी विषमबुद्धी । सुख त्रिशुद्धी तेथें कैंचें ॥९९॥
    आपल्यापेक्षा उच्च पदावर कोणी आलेला पाहिला, की त्याच्यावर काहीतरी दोषारोप करून त्याची निंदा करतात ! तेथेही जर असा विषम भाव उत्पन्न होतो तर तेथें तरी खरोखर सुख कसे होणार ? ९९.


    यालागीं स्वर्गभोगें जें सुख । सकळां सारिखें नाहीं देख ।
    तपानुसारें न्यूनाधिक । भोगिती लोक निजकर्में ॥५००॥
    म्हणून स्वर्ग प्राप्त होऊनही जे सुख होते, तेही सर्वांना सारखे नसते. लोक आपापल्या कर्माप्रमाणे आणि तपाप्रमाणे कमीजास्त सुख भोगीत असतात ५००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...