मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
Kakad Aarti | संपूर्ण काकड आरती
कार्तिक महिना हिंदुधर्मात अत्यंत पवित्र व शुभ मानला जातो. या महिन्यात दसरा, दिवाळी या सारख्या आनंददायक व उत्साहाने भारलेल्या सणांचे आगमन होते. या महिन्यातच पहाटेच्या वेळी अनेक मंदिरातून होणाऱ्या काकड आरतीच्या निनादाने सर्व आसमंत निनादून जातो. टाळमृदुंगांच्या आवाजानेो व भक्तगणांच्या आर्त आळवणीच्या स्वरांनी वातावरण भक्तिमय होऊन जाते व ऐकणाऱ्यांचे मन आनंदाने डोलू लागते.
काकड आरतीच्या प्रथेचा उगम केव्हा व कसा झाला या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. प्रजेला सळो की पळो करून सोडणाऱ्या महाक्रूर तारकासुराचा वध भगवान शंकरांचा महापराक्रमी पुत्र कार्तिकस्वामीनी केला. या कार्यासाठीच त्यांचा या कार्तिक महिन्यांत जन्म झाला. त्यांच्या नावावरूनच या महिन्याला 'कार्तिक' हे नाव पडले. अशा या महापराक्रमी शिवपुत्राचे पुण्यस्मरण म्हणून काकड आरतीची प्रथा रूढ झाली
काकड आरतीस जाण्यापूर्वी भक्तगण स्नान संध्या करतात. स्नान करताना गंगा, सिंधु, त्रिवेणी जलस्नान पुरुषोत्तमा नमः हा मंत्र म्हणतात. सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने शरीर ताजेतवाने होते. मनात भक्तिरसाची निर्मिती होते पापक्षालन होते. स्नानानंतर धूतवस्त्रे परिधान करताना भक्त म्हणतात-
उठा उठा साधुसंत, साधा आपुले हित
वाया जाईल हा नरदेह मगची कैसा भगवंत
उठोनिया वेगेसी, चला जाऊ राऊळाशी
जळती पातकाच्या राशी
मग घरातील तुळशीवृंदावनाजवळ सर्व भक्तगण एकत्र येतात आणि तुळशीपूजा करताना म्हणतात -
तुळशी घालूनिया ओटा विघ्ने पळतील बारा वाटा
तुळशी लावूनिया दिवा उजेड पडेल सर्व देवा
तुळशी सारुनिया पाणी होईल पातकाची धुनी
तुळशी लावुनिया गंध उभा पाठीशी श्रीगोविंद
तुळशी लावुनिया कुंकू उभी पाठीमागे सखू
नंतर भक्त टाळ मृदंगाच्या निनादात गजर म्हणतात -
गोपाला, गोपाला देवकीनंदन गोपाला
देवकी नंदन गोपाला, वासुदेव नंदन गोपाला
विठ्ठल विठ्ठल गजरी हा गजर संपताच भक्तगण गावातून फेरी काढण्यासाठी निघतात. वाटेत अनेक गजर चालूच असतात. या योगे आसमंतात भक्तिरस भरून राहतो. वाटेत दत्तमंदिर येताच सर्वजण तल्लीन होऊन म्हणतात
दत्त शिखरावर राहे वाट भक्तीची पाहे
दत्त शिखरावर गुरू त्याला नमस्कार करू
दत्त शिखराचा राजा त्याला नमस्कार माझा
पुन्हा फेरी चालू होते आणि सर्वजण एकमुखाने गजर पुन्हा सुरू करतात
हरीमुखे म्हणा, हरीमुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी
विठ्ठल मंदिर येताच चालू गजर थांबवून पुढील गजर चालू करतात
विठ्ठल विठ्ठल गजरी
अवघी दुमदुमली पंढरी
हरिनामाचा होता गजर
दिंड्या पताकांचा भार
मग फेरी हळूहळू राम मंदिराकडे मार्गक्रमणा करू लागते आणि भक्तगण एकाच सुरात म्हणू लागतात
राम दर्शनाचीही चाल, लाभ हा भला
जन्म रामनवमी नक्षत्र पुनर्वसू समय मध्यंदिनी घटी देव अवतार जाहला
दशरथी दशरथी पुत्र जन्मला
त्रिभुवनात आनंद थोर जाहला
आता सर्व भक्तगण झपाट्याने मारुती मंदिराजवळ येतात आणि
म्हणतात
हाती शेंदुराची वाटी चल जाऊ मारोतीच्या भेटी
पाठोपाठ मारुतीरायाची स्तुती करतात
ऐसा मारुती उपकारी, तुका लोळे चरणावरी
धन्य अंजनीच्या सुता, त्याचे नाव हनुमंता
त्याने सीता शोध केली, रामसीता भेटविली
भक्तगण आता महादेवाच्या मंदिराकडे मार्गस्थ होतात. त्याच्या
मंदिरासमोर येताच म्हणू लागतात -
महादेव भुयारात राहे, गंगा जटातून वाहे
महादेव भोळा शंकर, डोईवर जटांचा भार
शंकर भोळा महादेव भोळा
जसी गंगा वाहे झुळझुळा
आणि असे एकामागून एकेक मंदिर येतच राहते. ज्ञानेश्वरांच्या मंदिराजवळ येताच आरती म्हणतात
आरती ज्ञानराजा, महाकैवल्य तेजा
सेवती साधुसंत, मनू वेधला माझा
सूर्योदयाला अजून बराच अवकाश असतो. भक्तगण गावातील विविध मंदिरांतील देवतांचे दर्शन घेऊन पुन्हा परत येतात. काकड आरतीचे भक्तगण तुळशीवृंदावनाजवळ गोळा होतात. गजर थांबवून सर्वजण भक्तिभावाने तुळशीची आरती म्हणतात
जय देवी जय देवी जय माये तुळशी
निजपत्राहूनी लघुतर त्रिभुवन हे तुळशी
नंतर मुख्य आरती म्हणजे काकड आरतीला प्रारंभ केला जातो. या आरतीत इतरही भाविक मोठ्या संख्येने सामील होतात.
उठा उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा
संत साधुमुनी अवघे झालेती गोळा
सोडा शेजसुख आता पाहू द्या मुखकमळा
रंगमंडपी महाद्वारी झाली दाटी
मन उतावेळ रूप पहावया दृष्टी
राही रखुमाई तुम्हां येऊ द्या दया
शेजे हालवूनी जागे करा देवराया
झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा
विष्णूदास नामा उभा घेऊन काकडा
आरती संपताच सर्वजण हातात अक्षता घेतात आणि सर्व भाविक भक्तिभावाने म्हणतात -
घालीन लोटांगण वंदीन चरण
डोळ्यांनी पाहीन रूप तुझे
प्रेमे आलिंगन आनंद पूजीन
भावे ओवाळीन म्हणे नामा
पुड्यांजली म्हणताना देवाचा जयजयकार करून त्यांच्यावर अक्षतांचा वर्षाव करतात आणि लगेच कापूर लावून कर्पूरार्ती सुरू होते -
कर्पूरगौरा करुणावतारा संसारसारा भुजगेंद्रहारा
सर्वांना प्रसाद वाटण्यात येतो आणि सर्व देवांचा, संतांचा जयघोष केला जातो. मग सर्व भाबिक आपापल्या घरी जाऊन आपले दैनंदिन व्यवहार सुरू करतात.