मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ ओव्या २०१ ते ३००

    केवढा नाडू मांडला लोकां । ऐशी जीवींची आशंका ।

    यालागीं यदुनायका । आदरें देखा पुसत ॥१॥
    हा लोकांमध्यें केवढा अनर्थ माजला आहे ! अशी मनात शंका उत्पन्न झाली, म्हणूनच पहा ! मोठ्या जिज्ञासेनें तो श्रीकृष्णाला विचारूं लागला १.


    श्रीउद्धव उवाच ।
    विदन्ति मर्त्याः प्रायेण विषयान् पदमापदाम् ।
    तथापि भुञ्जते कृष्ण तत्कथं श्वखराजवत् ॥ ८ ॥
    [श्लोक ८] उद्धवाने विचारले - भगवान ! साधारणतः सर्वच माणसांना हे माहीत आहे की, विषय हे संकटांचे घर आहे तरीसुद्धा ती माणसे कुत्री, गाढवे किंवा बोकडांप्रमाणे ते विषय का भोगतात ? (८)


    उद्धव म्हणे श्रीमुकुंदा । ऐक सर्वज्ञा गोविंदा ।
    विषयांची पदोपदीं आपदा । सर्वीं सर्वदा कळलीसे ॥२॥
    उद्धव म्हणाला, "हे मुकुंदा ! सर्वज्ञ गोविंदा ! ऐक. विषयांचे संकट पावलोपावली नडतें, हें सदोदित सर्वांना कळून चुकलें आहे २.


    जो झाला विषयाधीन । तो सर्वीं सर्वत्र सदा दीन ।
    ऐसें जाणतजाणतां जन । आसक्ति गहन विषयांची ॥३॥
    जो विषयाधीन होतो तो सर्वत्र सर्वस्वीं नेहमीं दीनच झालेला असतो. हें सर्व लोक धडधडीत पहात असतांही त्यांना विषयांची केवढी भयंकर आसक्ति पहा ! ३.


    जैसें कां श्वान आणि खर अज । तैसे विषयांसी लोक निर्लज्ज ।
    सांडूनि स्वहिताचें काज । का विषयांचे भोज नाचती ॥४॥
    ज्याप्रमाणें कुत्रा, गाढव व बोकड असावेत, त्याप्रमाणेच विषय भोगण्यामध्यें लोक निर्लज्ज झालेले असतात. आपल्या हिताचें कार्य सोडून विषयाच्या आवडीनेंच लोक कां नाचत असतात ? ४.


    शुनी वसवसोनि पाठीं लागे । श्वान सवेंच लागे मागें ।
    पुच्छ हालवूनि हुंगे । लाज नेघे जनाची ॥५॥
    कुत्री खेंकसून पाठीला लागत असते, तरी त्याच वेळीं कुत्रा तिच्या मागें लघळपणा करीत राहून शेंपूट हालवून हुंगीतच असतो. तो लोकांचीसुद्धा लाज बाळगीत नाही ५.


    काणा कुंटा व्याधिव्याप्त । चिंता कांठफरा गळां वाहत ।
    तोही शुनीमागें धांवत । कामासक्त अविचार ॥६॥
    आंधळा, लूत भरलेला, रोगी, चिंतारूप फुटक्या मडक्याचा कांठ गळ्यांत अडकलेला असतो, तरीसुद्धा तो कुत्रीच्या पाठीमागें धावतो. इतका तो कामासक्तीनें विचारशून्य होतो ६.


    शुनी सक्रोधें वसवसी । तें गोड लागे श्वानासी ।
    जीवित बांधलें तिच्या पुंसीं । तीमागमागेंसीं हिंडतू ॥७॥
    कुत्री रागारागानें त्याच्यावर खेंकसत असते, तरी तें कुत्र्याला गोडच वाटतें. त्याचा सर्व जीव तिच्या शेपटींत गुंतलेला असल्यामुळे तिच्या मागोमाग हिंडत असतो ७.


    अंगीं अंगा होतां भेटी । सक्रोध शुनी लागे पाठीं ।
    तरी न सोडी पुसांटी । कुंकांत उठी कामासी ॥८॥
    तिच्या आंगाला त्याचें आंग लागले की ती कुत्री क्रोधानें त्याच्या मागे धावते, तरी तो तिची शेंपटी म्हणून सोडीत नाही. त्याच्या कामेच्छेला जोरच चढत असतो ८.


    ऐशा संकटीं जैं भोग चढे । तैं भोगासवेंचि आडकोनि पडे ।
    हड हड करिती चहूंकडे । जगापुढें फजीती ॥९॥
    इतक्या यातनेंतूनही जर भोग मिळालाच, तर त्या भोगाबरोबरच तो अडकून पडतो. तेव्हां चारही बाजूंनी लोक 'हड हड' करूं लागतात, आणि जगापुढें सर्व फजिती होते ९.


    निंदेचे सैंघ वाजती धोंडे । मूर्ख तेही थुंकिती तोंडें ।
    ऐंसेंचि पुरुषासही घडे । तरीही आवडे अतिकामू ॥२१०॥
    निंदेचे अनेक दगड अंगावर बसत असतात. मूर्ख लोकसुद्धा तोंडावर थुंकतात. पुरुषाची अवस्थाही अशीच होते. तरीही त्याला कामच अतिशय आवडतो २१०.


    श्वानाचें हेंड तत्काळ सुटे । मनुष्याचें आकल्प न सुटे ।
    स्त्रीलोभाळू अतिलोभिष्ठे । तीलागीं संकटें नाना सोशी ॥११॥
    तें कुत्र्याचें जूग लागलेंच सुटतें, आणि मनुष्याचे जूग कल्पान्तींही सुटत नाही. स्त्रीच्या लोभानें अतिशय लंपट झाल्यामुळे तिच्यासाठी तो नाना प्रकारची संकरें सोशीत असतो ११.


    नातरी गाढवाच्या परी । दूरी देखोनियां खरी ।
    भुंकत धांवे तीवरी । लाज न धरी सर्वथा ॥१२॥
    किंवा गाढवाचा प्रकार पहा ! गाढवी लांब पाहिली की गाढव ओरडत तिच्याकडे धावत सुटतो. मुळींच लाज धरीत नाही १२.


    खरी पळे पुढेंपुढें । खरू धांवे वाडेंकोडें ।
    लाता हाणोनि फोडी जाभाडें । तरी पुढेंपुढें धसो लागे ॥१३॥
    गाढवी पुढें पुढें पळत असते, आणि गाढव मोठ्या लालचीनें तिच्या मागे धावत असतो. ती लाथ मारून त्याचें थोबाड फोडते, तरी हा तिच्या पुढें पुढेंच घुसतो १३.


    लाता हाणे उरावरी । तरी तिची प्रीती धरी ।
    ऐशिया स्त्रियांचे घराचारीं । खराच्यापरी नांदती ॥१४॥
    तिनें छातीवर लाथा मारल्या तरी तो तिच्यावर प्रेमच करतो. अशा रीतीनें स्त्रियांचे पति गाढवासारखे वावरत असतात १४.


    नातरी बोकडाची गति जैशी । तैशी दशा दिसे पुरुषासी ।
    मारूं आणिल्या पशुहत्यार्‍यापाशीं । तरी शेळ्यांसी सेवित ॥१५॥
    किंवा बोकडाची जशी गति, तशी दशा पुरुषाची असते. बोकड मारावयासाठी खाटकपाशी जरी आणला, तरी तो शेळ्यांच्या मागे लागतच असतो ! १५.


    स्वयाती मारितां देखे । अनुताप नेघे तेणें दुःखें ।
    मृत्युसमीपही अभिलाखें । कामसुखें वांछिती ॥१६॥
    आपल्याच जातवाल्यांना मारतांना प्रत्यक्ष पहात असतो, पण त्या दुःखानें तो कांहींच पश्चात्ताप पावत नाही. मृत्यूच्या जवळ जाऊन पोहोंचले असतांही ते लोभानें विषयसुखांच्या इच्छा करीतच असतात १६.


    पूर्ण मृत्यूची पायरी । तें वार्धक्य वाजलें उरीं ।
    तरी धांवे विषयावरी । आठवू न धरी मरणाचा ॥१७॥
    मरणाची शेवटची पायरी जें वार्धक्य, तें येऊन उरावर आदळलें, तरी विषयाकडेच तो धावत असतो. मरणाची आठवणसुद्धा करीत नाहीं १७.


    मेष मारूं आणिला घातकें । निजसख्यांतें मारितां देखे ।
    तें न मनूनियां यथासुखें । अजीसीं हरिखें रमों धांवे ॥१८॥
    खाटकांनी बकरा कापावयाला आणलेला असतो, तो आपल्या सोबत्यांना मारतांनाही पहात असतो, पण त्याची पर्वा न बाळगता आनंदानें शेळीजवळ रममाण होण्यासाठी तडफडत असतो ! १८.


    मेष श्वान आणि खर । हे ऋतुकाळींचि विषयतत्पर ।
    त्याहूनि विशेषेंसीं नर । कामी दुर्धर सर्वदा ॥१९॥
    बोकड, कुत्रा आणि गाढव हे विषयी खरे, पण ते शेळी, कुत्री व गाढवी ह्यांच्या ऋतुकाळांतच विषयभोगाला तयार असतात. पुरुषाचा कामाचा प्रकार त्याच्याहूनही जबर ! कारण, तो नेहमी अनिवार कामातुर असतो १९.


    गर्भ संभवल्यापाठीं । श्वानही स्त्रीभोगासी नुठी ।
    पुरुषाची अभिनव गोठी । गरोदर गोमटी भोगिती ॥२२०॥
    कुत्रीला गर्भ राहिला म्हणजे मग कुत्रासुद्धा तिच्या संभोगासाठी तयार होत नाही. पण पुरुषाची गोष्ट मोठी विचित्र आहे ! ते गरोदर असलेल्या स्त्रीचाही उपभोग घेतात ! २२०.


    गाढव गाढवीसी बुंथड । न करी अलंकार मोथड ।
    मनुष्यासी स्त्रियेचें कोड । तिचें वालभ वाड वाढवी ॥२१॥
    गाढव गाढवीला झोंबतो इतकेंच, पण तो काही तिला मोत्याचे अलंकार घालीत नाही पण मनुष्याला स्त्रीची आवड इतकी दांडगी असते की, तिचे तो अनेक प्रकारें कौतुक पुरवितो २१.


    दांडा गोंडा मूद वेणी । टिळकुवरी रत्‍नखेवणी ।
    नाकींचें हालों दे सुपाणी । हें मनुष्यपणीं वालभ ॥२२॥
    तिच्या वेणींत गोंडे फुलें पाहिजेत, तिच्या कुकुंमतिलकावर रत्नजडित बिजवरा पाहिजे, आणि तिच्या नाकांत पाणीदार मोत्यांची नथ हालत राहिली पाहिजे. ही मनुष्यजन्मांतील आवड ! २२.


    जरी प्रसूतिकाळ निकट । गाड्याएवढें वाढलें पोट ।
    तरी कामचारी विवेकनष्ट । रमताती दुष्ट स्त्रियांसीं ॥२३॥
    जरी प्रसूत होण्याचा काल जवळ येऊन ठेपला, आणि पोट जरी गाड्याएवढें वाढलें, तरी कामांध, विवेकहीन व दुष्ट लोक अशा स्त्रियांशी रममाण होतच असतात २३.


    अस्थि मांस विष्ठा मूत । तेणें कामिनी पूर्ण भरित ।
    ते कुश्चळीं जन कामासक्त । जाणोनि होत कां देवा ॥२४॥
    देवा ! हाडे, मांस, विष्ठा, मूत्र, यांनी स्त्री ही पूर्णपणे भरलेली असता अशा घाणीत लोक समजून उमजून को बरे कामासक्त होतात ? २४.


    या प्रश्नाचें प्रत्युत्तर । तीं श्लोकीं सांगे शार्ग्ङधर ।
    कामासक्तीचा विचार । ऐक सादर उद्धवा ॥२५॥
    या प्रश्नाचें उत्तर श्रीकृष्ण तीन श्लोकांनी सांगत आहे. तो म्हणाला, उद्धवा ! नीट लक्ष देऊन कामासक्तीचा विचार ऐक २५.


    श्रीभगवानुवाच ।
    अहमित्यन्यथाबुद्धिः प्रमत्तस्य यथा हृदि ।
    उत्सर्पति रजो घोरं ततो वैकारिकं मनः ॥ ९ ॥
    [श्लोक ९] श्रीकृष्ण म्हणाले - अज्ञानी माणासाच्या मनामध्ये देहाविषयी 'मी' अशी खोटी कल्पना उत्पन्न होते, तेव्हा त्याच्या सत्त्वगुणप्रधान मनात घोर रजोगुण उत्पन्न होतो. (९)


    मोहप्रमत्त विवेकशून्य । त्या पुरुषांच्या ठायीं जाण ।
    देहात्मवादें अभिमानें । रजोगुणें खवळला ॥२६॥
    जे मोहमदानें मत्त झालेले विवेकशुन्य पुरुष असतात, त्या पुरुषांच्या ठिकाणी देहात्मवादाच्या योगानें रजोगुण उत्पन्न होऊन त्यापासून अभिमान खवळतो २६.


    जैसा मदिरापानें उन्मत्तू । विसरूनि आपुला निजस्वार्थू ।
    मग अन्योन्य अनर्थू । आत्मघातू करूं धांवे ॥२७॥
    ज्याप्रमाणें मनुष्य मद्य प्राशन करून उन्मत्त झाला म्हणजे तो आपलें हित विसरून जातो, व मग निरनिराळे अनर्थ उत्पन्न करून आत्मघात करावयालासुद्धा प्रवृत्त होतो २७,


    तेवीं शुद्ध बुद्ध नित्यमुक्तु । हा विसरोनि निजस्वार्थु ।
    रजोगुणें लोलंगतु । कामासक्तु नरू कीजे ॥२८॥
    त्याप्रमाणे आपण शुद्ध, बुद्ध व नित्यमुक्त होणे यांतच आपलें खरें कल्याण आहे ही गोष्ट विसरून जाऊन रजोगुणाशी लंपट झाल्यामुळे तो रजोगुण त्या पुरुषाला कामासक्त बनवितो २८.


    रजीं रंगल्या अभिमान । दुःखरूप तो दारुण ।
    दुर्धर वाढे रजोगुण । विचारी मन तेणें होय ॥२९॥
    अभिमान हा रजोगुणांत रंगून गेला की, तो दुःखरूपी भयंकर रजोगुण अनावर वाढतो आणि त्यामुळें मन विकाराला वश होतें २९.


    रजोयुक्तस्य मनसः सङ्कल्पः सविकल्पकः ।
    ततः कामो गुणध्यानाद् दुःसहः स्याद्धि दुर्मतेः ॥ १० ॥
    [श्लोक १० ] रजोगुणाने घेरलेले मन अनेक प्रकारचे संकल्पविकल्प करू लागते नंतर त्याच त्याच विषयांचे चिंतन केल्यामुळे त्याच्याविषयी असह्य अशी कामना उत्पन्न होते. (१०)


    जैं रजोयुक्त झालें मन । तैं संकल्पविकल्प गहन ।
    एकांतीं घातल्या आसन । ध्यानीं चिंतन स्त्रियेचें ॥२३०॥
    जेव्हां मान रजोगुणसंपन्न होतें, तेव्हां प्रचंड संकल्पविकल्प उत्पन्न होतात, आणि एकांतांत आसन घालून बसलें असतांही ध्यानामध्यें स्त्रियेचेंच चिंतन होत असतें २३०.


    रजोगुणें कामासक्ती । होय दुष्ट वासना दुर्मती ।
    कामावांचूनि चित्तीं । आणिक स्फूर्ती स्फुरेना ॥३१॥
    रजोगुणानेंच कामासक्ति उत्पन्न होते. दुष्ट वासना उत्पन्न होऊन बुद्धीही दुष्टच होते. त्यामुळे चित्तामध्यें कामाशिवाय दुसरी स्फूर्ति उत्पन्नच होत नाही ३१.


    जनीं वनीं आणि विजनीं । जागृतीं सुषुप्तीं स्वप्नीं ।
    ध्यानीं मनीं चिंतनीं । स्त्रीवांचूनी स्मरेना ॥३२॥
    जनांत, वनांत एकांतांत, जागृतींत, सुषुप्तींत, स्वप्नांत, ध्यानांत, मनांत किंवा चिंतनांत स्त्रियेशिवाय दुसरें कांहीं आठवत नाहीं ३२.


    कामिनीकामाचा अध्यास । हावभाव अतिविलास ।
    गुणलावण्य सुरतरस । आसक्त मानस ते ठायीं ॥३३॥
    स्त्रीच्या कामेच्छेचा सर्व ध्यास. तिचे हावभाव, तिचे अत्यंत मनोहर विलास, तिचे सुंदर लावण्य आणि तिचा सुरतरस ह्यामध्येंच मन गढलेलें असतें ३३.


    रतिसुखाचा आराम । कामिनीक्रीडेचा संभ्रम ।
    तेणें दुर्धर झाला जो काम । तयासि नियम चालेना ॥३४॥
    रतिसुखाचें सुख व स्त्रियेच्या क्रीडेचा बडेजाव माजवून त्यामुळें जो काम अनावर झालेला असतो, त्याच्यापुढें नियमन चालतच नाहीं ३४.


    धनधान्यपुत्रसुख । वांछी इहलोकपरलोक ।
    हा रजोगुणाचा देख । अलोलिक अतिकामू ॥३५॥
    धन, धान्य, पुत्र, यांचे सुख असावें, इहलोकचें व परलोकचें सुख असावें, अशी रजोगुणाची आश्चर्यकारक उत्कट इच्छा असतें पहा ! ३५.


    करोति कामवशगः कर्माण्यविजितेन्द्रियः ।
    दुःखोदर्काणि सम्पश्यन् रजोवेगविमोहितः ॥ ११ ॥
    [श्लोक ११ ] त्या कामनांच्या अधीन झालेला व मन ताब्यात नसलेला मनुष्य कळून सवरून परिणामी दुःखदायक अशी कामे करतो कारण तो रजोगुणाच्या आवेगाने अतिशय मोहित झालेला असतो. (११)


    जेथ रजाचा वेग उदित । तेथ कामग्रहो खवळे अद्‍भुत ।
    जो पुरुष झाला कामग्रस्त । तो सदा अंकित कामाचा ॥३६॥
    जेथें रजोगुणाचा आवेश उत्पन्न होतो, तेथे कामरूप ग्रह अद्‌भुत रीतीनें पिसाळतो. आणि जो पुरुष कामानें ग्रस्त होतो तो सदोदित कामाचाच अंकित होऊन राहतो ३६.


    ज्यासी विवेक नाहीं मानसीं । तो जाण पां कामाची आंदणी दासी ।
    काम नाचवी जैसें त्यासी । तेणें विकारेंसीं नाचत ॥३७॥
    ज्याच्या मनात विचार नाही, तो कामाची आंदण दिलेली बटिक होऊन राहतो. त्याला काम जसें जसें नाचवीत असतो, त्या त्या विकारांनी तो नाचतो ३७.


    कामांकित झालिया पुढें । सकाम कर्म करणें पडे ।
    ज्याचें उत्तरोत्तर दुःख वाढे । अतिदुर्वाडें गर्वितु ॥३८॥
    कामाचा अंकित झाला की, पुढें ज्याचें दुःख उत्तरोत्तर वाढतच असतें, असें सकाम कर्मच करणें भाग पडतें आणि तो अतिशय गर्विष्ठ होतो ३८.


    रजोगुणें अतिमोहित । यालागीं अजितेंद्रिय अयुक्त ।
    जन्ममरणांचा अंकित । कर्में करीत तद्‌रूपें ॥३९॥
    तो रजोगुणानें अतिशय मोहात पडलेला असतो, म्हणून तो इंद्रियें न जिंकलेला व अयोग्य असतो. तो जन्ममरणांचा अंकित होऊन तदनुसारच सर्व कर्मे करतो ३९,


    रजोगुणाचा अतिबाध । तेणें जन केले विषयांध ।
    रजरागी महामंद । जाण प्रसिद्ध उद्धवा ॥२४०॥
    रजोगुणाची भयंकर पीडा आहे. त्यानें सर्व लोक विषयांध केले आहेत. उद्धवा ! रजावर लोलुप होणारे लोक अत्यंत निर्बुद्ध असल्याचें प्रसिद्धच आहे हें लक्षांत ठेव २४०.


    रजें बांधल्यापाठीं जाण । होय महामोहाचें संचरण ।
    तेव्हां भ्रमाचें वाउधाण । सैरा तमोगुण उल्हासे ॥४१॥
    रजोगुणानें बद्ध केल्यानंतर महामोहाचा प्रवेश होतो, तेव्हां भ्रमाची वावटळ सुटून तमोगुणही सैरावैरा फैलावतो ४१.


    ऐशी प्राणियांची मती । उद्धवा जाण निश्चितीं ।
    यालागीं काम ते सेविती । नव्हे विरक्ती विषयांची ॥४२॥
    उद्धवा ! प्राण्यांची बुद्धि खरोखर अशी असतें, हें लक्षांत ठेव. म्हणून ते कामाचे सेवन करतात. विषयांची विरक्ति त्यांना होत नाही ४२.


    तुज ऐसें वाटेल चित्तीं । बुडाली तरणोपायस्थिती ।
    खुंटली प्राण्यांची परम गती । विषयासक्ती अनिवार ॥४३॥
    आतां तुझ्या मनांत कदाचित असें येईल की, तर मग तरणोपायच खुंटला, आणि प्राण्यांची सद्गति देखील खुंटली. ही विषयासक्ति अनिवार आहे ४३.


    जीवा अविद्याविषयसंबंधू । याचा बाधू अतिसुबद्धू ।
    अविद्यायोग अनादिसिद्धू । तेणें दृढ भेदू जीवासी ॥४४॥
    जीवाला तर अविद्येशी आणि विषयाशी संबंध. त्यांची पीडा फार मोठी असते. अविद्येचा संबंध अनादिसिद्ध आहे. त्यामुळे नानाप्रकारच्या दृढतर कल्पना उठतात ४४.


    अंतःकरणही अनादी । प्रवाहरूपें त्याची सिद्धी ।
    तेणें दृढ झाली विषयबुद्धी । त्याग त्रिशुद्धी घडेना ॥४५॥
    अंत:करण हेही अनादीच आहे, आणि त्याची परिपूर्णताही ओघानुसारच होत असते. त्यामुळेच विषयबुद्धीही दृढ होते आणि त्याग मुळींच घडत नाही ४५.


    सत्त्वीं उत्पन्न अंतःकरण । परी तें प्रकृतिकार्य जाण ।
    तेथें भोगाध्यासें रजोगुण । खवळला कोण आवरी ॥४६॥
    अंत:करण सत्त्वापासून उत्पन्न होते ही गोष्ट खरी, पण तें कार्य मायेचें आहे हें लक्षांत ठेव. तेथे सुखभोगाच्या सवयीनें रजोगुण खवळला, कीं त्याला आवरणार कोण ? ४६.


    विषयीं बांधिले विवेकी । तो विषयत्याग नव्हे ये लोकीं ।
    उद्धवा तुझी आशंका हेच कीं । ऐक तेविखीं उपावो ॥४७॥
    विचारी असतात तेही विषयानें बद्ध झालेले असतात. म्हणून तो विषयाचा त्याग या लोकांत होत नाही. उद्धवा ! तुझी शंका हीच ना? तर त्याविषयींचा उपाय ऐक ४७.


    विवेकियांच्या ठायीं । विषयबुद्धि नुपजे पाहीं ।
    विक्षेपू झाल्या कहींबहीं । अभ्यासू तिंहीं करावा ॥४८॥
    विचारशील लोकांच्या ठिकाणी विषयवासना उत्पन्नच होत नाही. इतकेंही करून कधी काळी त्यांत विक्षेप आलाच, तर त्यांनी अभ्यास करावा ४८.


    रजस्तमोभ्यां यदपि विद्वान् विक्षिप्तधीः पुनः ।
    अतन्द्रितो मनो युञ्जन् दोषदृष्टिर्न सज्जते ॥ १२ ॥
    [श्लोक १२] रजोगुणतमोगुणांनी ज्ञानी माणसाचीसुद्धा बुद्धी विषयांकडे धाव घेते परंतु तो सावधगिरी बाळगून मन एकाग्र करून विषय दोषयुक्त आहेत, हे जाणून त्यांमध्ये आसक्त होत नाही. (१२)


    हो कां रजतमांचेनि गुणें । जरी बुद्धि विक्षिप्त केली तेणें ।
    तरी आळस सांडूनि सज्ञानें । आवरणें मनातें ॥४९॥
    रज आणि तम या गुणांनी कदाचित् एखादें वेळी त्याच्या बुद्धीला विक्षेप घातलाच, तर ज्ञात्यानें आळस सोडून मनाला आवरून धरावें ४९.


    अस्थिमांसाचा घडिला । विष्ठामूत्रांचा कोथळा ।
    स्त्री विचारितां कांटाळा । नरकजिव्हाळा तो भोगू ॥२५०॥
    स्त्रीचा देह हाडांचा आणि मांसाचा बनविलेला विष्ठामूत्रांचा कोथळा असल्यामुळें तिच्याविषयी विचार केला तर कंटाळा येतो. तिचा भोग तो केवळ नरकाचें साधन होय २५०.


    भोगीं दावूनि दोषदृष्टी । मनासी विषयांची तुटी ।
    करावी गा उठाउठी । नेमूनि निहटीं मनातें ॥५१॥
    याप्रमाणें स्त्रीच्या भोगामध्यें असलेले दोष दाखवून दिले, व मन विषयांपासून तत्काळ दूर करून ते नियमांनी आवरून धरावें असें सांगितलें ५१.


    ऐसेनिही मन अतिदुर्धर । नियमासी नावरे अनावर ।
    साधकांसी अतिदुस्तर । अशक्त नर ये अर्थीं ॥५२॥
    अशा प्रकारेही अत्यंत अनिवार मन अनावर होऊन नियमाच्या बंधनांत सापडत नाही. अभ्यास करणारांना तें मोठें अनावर होते. अर्थात त्याविषयी सामान्य लोक असमर्थच होत ५२.


    तरी ऐक बापा सावधान । मनोनिग्रहाचें लक्षण ।
    तेंही सांगेन साधन । जेणें प्रकारें मन आकळे ॥५३॥
    तर बाबा ! नीट लक्ष देऊन ऐक. त्या मनोनिग्रहाचे जें लक्षण आणि साधन, कीं जेणेंकरून मनाला आळा बसेल, तेंही सांगतों ५३.


    अप्रमत्तोऽनुयुञ्जीत मनो मय्यर्पयञ्छनैः ।
    अनिर्विण्णो यथाकालं जितश्वासो जितासनः ॥ १३ ॥
    [श्लोक १३] म्हणून साधकाने त्रिकाळ सावधपणे उत्साहपूर्वक आसन व प्राण यांवर विजय मिळवून क्रमाक्रमाने मन वारंवार माझ्या ठिकाणी लावावे. (१३)


    आळसनिद्रेसी दवडूनि दूरी । जो सावधान निजवृत्ति धरी ।
    माझें चिद्‌रूप निर्धारीं । शनैः शनैः करी अभ्यासू ॥५४॥
    आळस आणि निद्रा ह्यांना दूर झुगारून देऊन जो सावधचित्तानें ब्रह्मभावना धारण करतो, तोच खरोखर माझ्या चित्स्वरूपाच्या अभ्यासाला हळूहळू लागतो ५४.


    अभ्यासीं प्रथम भूमिका । शिकावी आसनगाढिका ।
    मूळबंध अतिनेटका । आसनजयो देखा शिकावा ॥५५॥
    अभ्यासाला लागले असता त्यांतील पहिले काम म्हणजे आसन स्थिर करावयास शिकावयाचें हें होय. मूळबंधावर आसन नीट घालून आसनजय करावयाला शिकावें ५५.


    आसनजयो आल्या हाता । सहजें चढे योगपंथा ।
    तेथें प्राणापानसमता । अभ्यासितां हों लागे ॥५६॥
    आसनजय साध्य झाला असतां तो सहज योगमार्गाला लागतो, आणि त्या वेळी अधिक अभ्यास केला असतां प्राण आणि अपान ह्यांचीही समान स्थिति होऊं लागतें ५६.


    विषय ते मनाआधीन । मन पवनासी वश्य जाण ।
    अभ्यासें वश केला पवन । सहजें मन स्थिरावे ॥५७॥
    विषय हें मनाच्या आधीन असतात; मन वायूला वश असतें. ह्यामुळें अभ्यासानें वायूलाच वश करून घेतलें, म्हणजे मन आपोआपच स्थिर होतें ५७.


    यापरी जो हळू हळू । अभ्यासें सार्थक करी काळू ।
    अविरक्त परी प्रबळू । होय भुकाळू परमार्थी ॥५८॥
    ह्याप्रमाणें जो हळूहळू अभ्यासानें कालाचें सार्थक करतो, तो विरक्त नसला तरी तो महान् सामर्थ्यवंत असून परमार्थाविषयीं तर फारच भुकाळू होतो ५८.


    हरिचिंतनीं एकाग्र मन । तैं एक होती प्राणापान ।
    हाचि पवनजयो पूर्ण । योगसाधन सहजेंचि ॥५९॥
    हरिचिंतनामध्यें मन एकाग्र करीत गेलें म्हणजे प्राण आणि अपान हे दोन्ही वायु एकरूप होऊन जातात. वायूचा परिपूर्ण जय तो हाच, तो साधला म्हणजे सहजच योगसाधन घडतें ५९.


    तंव प्राणापान सम जोडी । षट्चक्रांचे पदर फोडी ।
    तैं विषयांतें चित्त सांडी । विषयो वोसंडी चित्तातें ॥२६०॥
    त्या वेळी प्राणापानांची समसमान जोडी सहाही चक्रांचे पदर फोडून टाकतें. तेव्हां चित्त विषयांना सोडून देतें, व विषयही चित्ताला सोडून देतात २६०.


    यापरी या अभ्यासवाटे । सकाम कामाचा तटका तुटे ।
    सनकादिक येणें परिपाठें । म्यां आत्मनिष्ठे लाविले ॥६१॥
    ह्याप्रमाणे या अभ्यासाच्या मार्गानें वासनायुक्त इच्छेचा संबंधच तुटून जातो. ह्याच मार्गानें मी सनकादिकांना आत्मज्ञानाकडें वळविलें ६१.


    एतावान् योग आदिष्टो मच्छिष्यैः सनकादिभिः ।
    सर्वतो मन आकृष्य मय्यद्धाऽऽवेश्यते यथा ॥ १४ ॥
    [श्लोक १४] सर्व विषयांपासून मनाला बाजूला करून ते प्रत्यक्ष माझ्यामध्येच स्थिर करावे माझे शिष्य असणार्‍या सनकादिकांनी योगाचे हेच स्वरूप सांगितले आहे. (१४)


    येणेंचि उपदेशें देख । माझे शिष्य सनकादिक ।
    अभ्यासबळें अलोकिक । निजात्मसुख पावले ॥६२॥
    हे पहा ! ह्याच उपदेशानें माझे सनकादिक शिष्य आपल्या अभ्यासाच्या सामर्थ्यानेंच अलौकिक असें आत्मज्ञानाचें सौख्य पावलें ६२.


    तो उपदेश कोण म्हणसी । जो वियोग चित्तविषयांसी ।
    हें म्यां सांगोनियां त्यांसी । आत्माभ्यासीं लाविलें ॥६३॥
    असा तो उपदेश कोणता ? असें म्हणशील, तर जो चित्त आणि विषय ह्यांचा संबंध तोडून टाकावयाचा, तोच. हें मी त्यांना सांगून आत्मज्ञानाच्या अभ्यासाला लावलें ६३.


    मन जेथें जेथें जाये । तेथें तेथें वस्तूचि आहे ।
    येणें अभ्यासें लवलाहें । सनकादिक पाहें सिद्ध झाले ॥६४॥
    मन जिकडे जिकडे जाईल, तिकडे तिकडे परब्रह्मच भरलेलें आहे अशी भावना धरण्याची संवयच लागल्यामुळें, सनकादिक ब्रह्मस्वरूप झालें पहा ! ६४.


    चित्तासी विषयांचा वियोगू । हा सनकादिकीं साधिला योगू ।
    त्यांसी उपदेशावया सांगू । मी स्वयें श्रीरंगू उपदेष्टा ॥६५॥
    चित्ताला विषयांचा वियोग घडविणे हाच योग सनकादिकांनी साधला. त्यांना याचा यथासांग उपदेश करावयास मीच श्रीकृष्ण स्वतः उपदेशक झालों ६५.


    तें ऐकोनि उद्धव पाहीं । विचारी आपुलिया ठायीं ।
    मी श्रीकृष्णावेगळा कंहीं नाहीं । सनकादिक कंहीं उपदेशिले ॥६६॥
    हें उद्धवानें श्रवण करतांच तो आपल्या ठिकाणी विचार करू लागला की, मी तर श्रीकृष्णाला सोडून कधीच राहिलों नाही, असे असतां सनकादिकांना ह्यानें उपदेश केला तरी केव्हां ? ६६.


    सनकादिक ब्रह्मशीळ । पूर्वीं जाहले बहुकाळ ।
    कृष्ण ये काळींचें देवकीबाळ गुरुत्व केवळ घडे कैसें ॥६७॥
    सनकादिक हे फार पूर्वीच्या काळीं ब्रह्मरूप झालेले आहेत. आणि हा कृष्ण तर या काळांतील देवकीचा मुलगा. त्याला हें गुरुत्व घडणार कसें ? ६७.


    श्रीउद्धव उवाच ।
    यदा त्वं सनकादिभ्यो येन रूपेण केशव ।
    योगमादिष्टवानेतद् रूपमिच्छामि वेदितुम् ॥ १५ ॥
    [श्लोक १५] उद्धवाने विचारले - हे केशवा ! हा योग आपण सनकादिकांना ज्यावेळी ज्या रूपाने उपदेशिला होता, ते रूप मी जाणून घेऊ इच्छितो. (१५)


    उद्धव म्हणे गा केशवा । सनकादिकांसी केव्हां ।
    उपदेश केला गा तुवां । जवळी तेव्हां मी कां नव्हतों ॥६८॥
    असें मनांत आणून उद्धव म्हणाला, "हे श्रीकृष्णा ! तूं सनकादिकांना केव्हां उपदेश केलास ? त्या वेळीं मी कां जवळ नव्हतों ? ६८.


    येणेंचि रूपें हृषीकेशी । योग सांगीतला तयांसी ।
    किंवा रूपांतरें म्हणसी । तें जाणावयासी मज इच्छा ॥६९॥
    देवा, ह्याच स्वरूपानें त्यांना योग सांगितलास, की दुसऱ्या कोणत्या रूपानें केला म्हणतोस ? तें समजून घेण्याची मला इच्छा आहे ६९.


    कोण काळ समयो कोण । कोण योग कैसा प्रश्न ।
    तें कृपा करोनि आपण । मज संपूर्ण सांगावें ॥२७०॥
    तो काळ कोणता ? ती वेळ कोणती ? आणि त्याकरितां त्यांनी प्रश्न कसा केला ? आपण मला संपूर्ण सांगावें" २७०.


    ऐकोनि उद्धवाचा प्रश्न । कृपा कळवळला नारायण ।
    हंस‍इतिहासनिरूपण । आपुलें आपण सांगत ॥७१॥
    हा उद्धवाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण कृपनें गहिवरला आणि तो आपली हंसाची कथा आपणच सांगूं लागला २७१.


    श्रीभगवानुवाच ।
    पुत्रा हिरण्यगर्भस्य मानसाः सनकादयः ।
    पप्रच्छुः पितरं सूक्ष्मां योगस्यैकान्तिकीं गतिम् ॥ १६ ॥
    [श्लोक १६] श्री भगवान म्हणाले - ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिकांनी एकदा आपल्या वडिलांना योगाची सूक्ष्म आणि अंतिम मर्यादा विचारली होती. (१६)


    ब्रह्मयाचे मानसपुत्र । महाप्रसिद्ध सनत्कुमार ।
    तिंहीं सत्यलोकीं प्रश्न थोर । अतिदुस्तर पूशिला ॥७२॥
    महाप्रसिद्ध सनकुमार हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. त्यांनी सत्यलोकामध्यें, अत्यंत गहन असा एक प्रश्न विचारला होता. ७२.


    अतिसूक्ष्म योगगती । दुर्ज्ञेय स्वस्वरूपस्थिती ।
    परम कठिण प्रश्नोक्ती । पित्याप्रती पूशिली ॥७३॥
    तो हा कीं, योगाची गति अत्यंत सूक्ष्म आहे, आणि आत्मस्वरूपाची स्थिति समजण्याला परम दुर्घट आहे, ती कशी समजेल ? असा बिकट प्रश्न त्यांनी आपल्या पित्याला विचारला. ७३.


    सनकादय ऊचुः ।
    गुणेष्वाविशते चेतो गुणाश्चेतसि च प्रभो ।
    कथमन्योन्यसंत्यागो मुमुक्षोरतितितीर्षोः ॥ १७ ॥
    [श्लोक १७] सनकादींनी विचारले - तात ! हे चित्त स्वभावतःच विषयांचे ठिकाणी आसक्त राहाते आणि ते विषय वासनारूपाने चित्तात राहातात तर मग या संसारसागरातून तरून जाऊ इच्छिणार्‍या मुमुक्षूने त्यांना एकमेकांपासून दूर कसे ठेवावे ? (१७)


    सनकादिक पुसत । विषयांच्या ठायीं चित्त ।
    स्वभावें असे विषयासक्त । तें विषयीं सतत आवेशलें ॥७४॥
    सनकादिकांनीं विचारलें, "चित्त हें स्वभावधर्माप्रमाणेंच विषयांमध्यें आसक्त असते, म्हणून तें नेहमीं विषयांतच गुंतून राहतें ७४.


    तैसेचि विषय पाहीं । प्रवेशले चित्ताच्या ठायीं ।
    वासनारूपें जडले तेही । निघों कंहीं नेणती ॥७५॥
    त्याचप्रमाणें विषय असतात तेही चित्तामध्यें शिरून वासनेच्या रूपानेंच त्याला चिकटून राहतात. म्हणून तेथून कधींही निघू शकत नाहींत ७५.


    फळ काळ दोनी नाहीं । तरी तैंचे आंबे गोड पाहीं ।
    ऐसे विषय चित्ताचे ठायीं । रिघाले कंहीं न निघती ॥७६॥
    फळ आणि काळ ही दोन्ही नसलीं तरी त्या वेळचे आंबे गोडच असतात. त्याप्रमाणेंच विषय हे एकदा चित्तांत शिरले कीं, तेथून कधी निघत नाहींत ७६.


    पर्णिली कांता माहेरा जाये । चित्तीं रिघाली दूरी न राहे ।
    यापरी विषयो पाहें । जडला ठाये चित्तासी ॥७७॥
    लग्नाची स्त्री माहेरीं गेली, तरी ती मनांतून लांब जात नाहीं, त्याप्रमाणें विषयही चित्ताला जखडून बसलेला असतो ७७.


    चित्त विषयो अन्योन्यत्यागू । मुमुक्षां केवीं घडे चांगू ।
    ये उपायीं उपाययोगू । स्वामीनें साङ्गू सांगावा ॥७८॥
    ह्यास्तव चित्त आणि विषय यांची परस्पर पूर्ण ताटातूट मुमुक्षूंना घडणार कशी ? ह्याच्या निरसनार्थ एखादा उपाययोग स्वामीनें यथासांग सांगावा" २७८.


    श्रीभगवानुवाच ।
    एवं पृष्टो महादेवः स्वयंभूर्भूतभावनः ।
    ध्यायमानः प्रश्नबीजं नाभ्यपद्यत कर्मधीः ॥ १८ ॥
    [श्लोक १८] भगवान श्रीकृष्ण म्हणाले - भूतांना उत्पन्न करणार्‍या श्रेष्ठ स्वयंभू ब्रह्मदेवाला सनक इत्यादींनी असा प्रश्न केला होता परंतु त्याची बुद्धी कर्माच्या ठिकाणी आसक्त असल्याकारणाने पुष्कळ विचार करूनही त्याला प्रश्नाचा आशय कळला नाही. (१८)


    ज्यासी अग्रपूजेचा सन्मान । श्रेष्ठ देवांमाजीं महिमान ।
    महादेव म्हणावया कारण । ब्रह्मयासी जाण या हेतू ॥७९॥
    ज्याला अग्रपूजेचा मोठा मान आहे, सर्व देवांमध्यें ज्याचा महिमा श्रेष्ठ आहे, त्या ब्रह्मदेवाला श्रेष्ठ देव म्हणावयास त्याचा हा मोठेपणाच कारण आहे ७९.


    जो आंगें स्रजी चराचर । जो वेदांचें निजमंदिर ।
    त्या ब्रह्मयाप्रती अतिगंभीर । प्रश्न महाथोर पुत्रीं केला ॥२८०॥
    जो स्वतः चराचरसृष्टि उत्पन्न करतो, जो वेदांचें वसतिस्थान आहे, त्या ब्रह्मदेवाला त्याच्या श्रेष्ठ पुत्रांनीं असा मोठा गहन प्रश्न विचारला २८०.


    त्या प्रश्नाची प्रश्नोत्तरविधी । ब्रह्मयासी न कळे त्रिशुद्धी ।
    कर्मजड झाली बुद्धी । बोधकसिद्धी स्फुरेना ॥८१॥
    पण त्या प्रश्नाचें यथायोग्य उत्तर कसे द्यावें हें ब्रह्मदेवाला खरोखर कळलें नाहीं. कारण कर्माच्या योगानें त्याची बुद्धि मंद झाली होती. त्याला ज्ञानोपदेश करण्याचें सुचेना ८१.


    प्रश्न अत्यंत सखोल पडिला । तेणें ब्रह्मा वेडावला ठेला ।
    कांहीं न बोलवे जी बोला । तो चिंतूं लागला मज तेव्हां ॥८२॥
    प्रश्न तर अत्यंत गहन पडला. त्यामुळें ब्रह्मदेव वेडा होऊन राहिला. त्याला मुळींच शब्द बोलवेना. तेव्हां तो माझें चिंतन करूं लागला ८२.


    सनकादिकांची प्रश्नावस्था । सत्यलोकीं समस्तांदेखतां ।
    न कळे न म्हणवे सर्वथा । सांगों जातां नव्हे बोध ॥८३॥
    सत्यलोकामध्यें सर्वांच्या देखत सनकादिकांनीं प्रश्न केलेले ऐकून ते आपल्याला मुळींच कळत नाहीत असें म्हणवेना आणि उत्तर सांगावयास जावें तर त्याविषयी कांहींच ज्ञान होईना ८३.


    ऐसें ब्रह्मयासी दुर्घट । कांहीं न बोलवे स्पष्ट ।
    परम देखोनि संकट । मी ज्ञानवरिष्ठ चिंतिलों ॥८४॥
    असें ब्रह्मदेवाला मोठें संकट पडलें. स्पष्ट अंसे कांहींच सांगतां येईना. असें परम संकट पाहून त्यानें मज ज्ञानश्रेष्ठाचें चिंतन केलें ८४.


    स मामचिंतयद् देवः प्रश्नपारतितीर्षया ।
    तस्याहं हंसरूपेण सकाशमगमं तदा ॥ १९ ॥
    [श्लोक १९] प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी ब्रह्मदेवाने माझे स्मरण केले तेव्हा मी हंसरूपाने त्याच्यासमोर प्रगट झालो. (१९)


    निरसावया पुत्राचें अज्ञान । आणि तरावया त्यांचा प्रश्न ।
    ब्रह्मा करी माझें चिंतन । तेव्हां माझेंही मन कळवळलें ॥८५॥
    पुत्रांचें अज्ञान नाहींसें करण्याकरितां, आणि त्यांच्या प्रश्नाचें उत्तर मिळावें म्हणून ब्रह्मदेव माझे स्मरण करूं लागला, तेव्हां माझेंही मन कळवळलें. ८५,


    ब्रह्मा माझे पोटींचे बाळ । त्यासी कर्मजाड्यें आलें पडळ ।
    तें निरसावया तत्काळ । हंस केवळ मी जाहलों ॥८६॥
    ब्रह्मदेव माझ्याच पोटचें अपत्य होय. त्याच्या दृष्टीवर कर्माच्या जाड्यतेनें अज्ञानाचा पडदा आला होता, तो तत्काळ काढून टाकण्यासाठी मी केवळ हंस झालों ८६


    प्रश्न केला अपरंपार । जो परमहंसाचें परम सार ।
    त्याचा पावावया परपार । हंसरूपधर मी जाहलों ॥८७॥
    त्यांनी फार गहन प्रश्न केला होता. जो परमहंसाचें परमतत्त्व, अशा त्या प्रश्नांतून पार पडण्यासाठी मी हंसाचें स्वरूप धारण केलें. ८७.


    नातळे वर्णव्यक्तिविलास । तो मी श्वेतवर्ण स्वप्रकाश ।
    स्वयें झालों राजहंस । ब्रह्मपुत्रांस उपदेशावया ॥८८॥
    वर्ण किंवा व्यक्ति यांच्या पसाऱ्याला स्पर्शसुद्धा करीत नाहीं असा तो मी श्वेतवर्ण असून स्वयंप्रकाशच आहें. तो मी ब्रह्मदेवाच्या पुत्रांना उपदेश करण्यासाठीं स्वतः राजहंस झालों ८८.


    सृष्टि स्त्रजावयाचे विधी । विधाता लागला त्रिशुद्धी ।
    तेणें कर्मजड झाली बुद्धी । निजज्ञानसिद्धी विसरला ॥८९॥
    खरोखर ब्रह्मदेव सृष्टि निर्माण करण्याच्या कामांत गुंतला होता, म्हणून त्या कर्मानें त्याची बुद्धि जड झाली, आणि आत्मज्ञानाची सिद्धि तो विसरून गेला ८९.


    जो म्हणे मी कर्माधिकारी । तेव्हांचि तो देहधारी ।
    तो परमार्थाचे नगरीं । न सरे निर्धारीं बाह्यमुद्रा ॥२९०॥
    मी कर्माचा अधिकारी आहें असें जो म्हणतो, तो त्याच वेळी देह धारण करणारा होतो. तो परमार्थाच्या नगरांत केवळ बाह्य स्वरूपानें कधींच शिरावयाचा नाहीं २९०.


    'न कर्मणा न प्रजया' ऐसी वेदोक्ति । कर्म निषेधें त्यागवि श्रुती ।
    तेणें कर्में ब्रह्मप्राप्ती । जे म्हणती ते अज्ञान ज्ञाते ॥९१॥
    'न कर्मणा न प्रजया'-ब्रह्मप्राप्ति ही कधीं कर्मानें होत नाही आणि पुत्राच्या द्वारेंही होत नाही-अशी वेदोक्ति आहे. अशा प्रकारें श्रुति कर्माचा निषेध सांगून त्याचा त्याग करविते. त्याच कर्मानें ब्रह्मप्राप्ति होईल असें जे म्हणतात, ते ज्ञाते असले तरी अज्ञानी होत ९१.


    म्यां उपदेशिलें ब्रह्मयासी । शेखीं कर्मजाड्य आलें त्यासी ।
    केवळ कर्में कर्मठासी । मुक्ति तयासी कैसेनी ॥९२॥
    मी ब्रह्मदेवाला उपदेश केला होताच, पण शेवटी कर्मानें त्याला जाड्य आलें. मग जो कर्मानें केवळ कर्मठच झाला आहे, त्याला मुक्ति कशानें प्राप्त होणार ? ९२.


    ब्रह्मा अदृष्टद्रष्टा लोकीं तिहीं । तो कर्मजाड्यें झाला विषयी ।
    इतरांचा तो पाड कायी । ठकले ये ठायीं सज्ञान ॥९३॥
    ब्रह्मदेव हा त्रिभुवनांत सर्वांच्या अदृष्टाचा जाणता असून तोसुदा कर्मजाड्यानें विषयी साला. मग इतरांची ती कथा काय ? ह्यामध्यें मोठमोठे शातेसुद्धा फसले ! ९३.


    सांगतां पुत्रांचा प्रश्न । उजळेल ब्रह्मयाचें निजज्ञान ।
    ऐसें साधोनियां विंदान । सत्यलोकीं जाण उतरलों ॥९४॥
    पुत्रांच्या प्रश्नाचें उत्तर सांगतांना ब्रह्मदेवाचें ज्ञानही उज्ज्वलित होईल, अशी संधि साधून मीही सत्यलोकांत उतरलों ९५.


    प्रश्नकर्ते सनकादिक । वक्ता सत्यलोकनायक ।
    दोहींसीही पडली अटक । ते काळीं देख मी आलों ॥९५॥
    प्रश्न करणारे सनकादिक, आणि वक्ता ब्रह्मदेव, पण त्या दोघांनाही जेव्हां संकट पडलें, तेव्हां मी तेथें प्रकट झालों ९५.


    नासों नेदितां साचार । हंस निवडी क्षीरनीर ।
    तैसें निवडावया सारासार । ज्ञानचतुर मी राजहंस ॥९६॥
    खरोखर हंस जसा दूध नासूं न देतां त्यांतील दूध आणि पाणी वेगळें वेगळें करतो, त्याप्रमाणें सार कोणतें आणि असार कोणतें हें निवडण्याकरिता मी ज्ञानानें चतुर असा राजहंसच आहें ९६.


    पूर्वपुण्यसंचयेंवीण । विमानेंवीण स्वयें गमन ।
    सत्यलोकीं आगमन । कोणाचेंही जाण कदा नव्हे ॥९७॥
    पूर्वपुण्याईचा सांठा असल्याशिवाय किंवा दिव्य विमानाशिवाय स्वत: प्रवास करून सत्यलोकामध्यें कोणाचाही प्रवेश कधींही घडत नाहीं ९७.


    मी पापपुण्यातीत पाहीं । यालागीं मज पाप पुण्य नाहीं ।
    पाखीं कां चालोनि पायीं । तो मी सर्वां ठायीं सर्वगतू ॥९८॥
    पण मी पापपुण्यांच्या पलीकडचा आहें. त्यामुळें मला पापपुण्य नाहीं. तरी असा मी पंखांनीं किंवा पायांनीं चालून सर्वत्र पाहिजे तेथें पाहिजे तेव्हां जाऊं शकतों ९८.


    त्या सत्यलोका मी अवचितां । हंसस्वरूपें झालों येता ।
    त्या मज देखोनियां समस्तां । परमाश्चर्यता वाटली ॥९९॥
    त्या सत्यलोकाला अकस्मात मी हंसरूपानें आलों. त्या मला पाहून सर्वांना अत्यंत आश्चर्य वाटलें ९९.


    दृष्ट्वा मां त उपव्रज्य कृत्वा पादाभिवंदनम् ।
    ब्रह्माणमग्रतः कृत्वा पप्रच्छुः को भवानिति ॥ २० ॥
    [श्लोक २०] हे उद्ववा ! तत्त्व जाणून घेण्यासाठीच आलेल्या मुनींनी मला असे विचारले, तेव्हा मी त्यांना जे सांगितले, ते ऐक. (२०)


    परब्रह्मैक परम मूर्ती । मज येतां देखोनि हंसस्थितीं ।
    उभे ठाकोनि सामोरे येती । चरण वंदिती साष्टांग ॥३००॥
    केवळ परब्रह्मस्वरूप अशी माझी श्रेष्ठ मूर्ति, त्या मला हंसरूपानें येतांना पाहून सर्व देव उभे राहून मला सामोरे आले, आणि त्यांनी माझ्या चरणाला साष्टांग नमस्कार घातला ३००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...