मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ ओव्या १ ते १००


    ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
    ॐ नमो जी अनादि हंसा । हंसरूपा जी जगदीशा ।
    तूं सद्‍गुरु परमहंसा । परमपरेशा परिपूर्णा ॥१॥
    ॐकारस्वरूप अनादि हंसा ! हे सरूप जगदीशा ! तुला नमस्कार असो. हे श्रेष्ठ परमेश्वरा ! हे परिपूर्णा ! तूं परमहंसाचाही सद्गुरु आहेस १.


    उभयपक्षेंवीण देख । तुझे शोभती दोनी पांख ।
    शुद्धसत्त्वाहोनि चोख । स्वरूप सुरेख सोज्वळ ॥२॥
    विद्या-अविद्या, ज्ञान-अज्ञान, प्रकृति-पुरुष इत्यादि द्वैतभावनेशिवायच (दोन पक्षांशिवायच) तुझे दोन पंख शोभत आहेत, आणि शुद्ध सत्त्वाहूनही उत्तम असें तुझें सुरेख आणि सोज्वळ स्वरूप आहे २.


    हंस बोलिजे शुभ्रवर्ण । तुझी हंसता विलक्षण ।
    सांडोनियां सकळ वर्ण । हंसपण तुज शोभे ॥३॥
    हंस हा पांढऱ्या शुभ्रवर्णाचा आहे असे म्हणतात, पण तुझा हंसपणा विलक्षणच आहे. सर्व वर्ण सोडून देउन हंसपणा तुला शोभत आहे ३.


    विकासल्या सुवर्णपंकजें । इतर हंसीं तेथें क्रीडिजे ।
    प्रेमें उत्फुल्लित कमळ जें । तुवां क्रीडिजे ते ठायीं ॥४॥
    सुवर्णाचीं कमळें विकसित झालीं असता तेथे इतर हंस क्रीडा करतात. पण प्रेमानें उत्फुल्ल झालेले जे हृदयकमळ, त्या कमळांत तूं क्रीडा करतोस ४.


    मानससरोवरीं वस्ती हंसासी । तूं मानसातीत रहिवासी ।
    हंसा उत्पतन आकाशीं । तुझें चिदाकाशीं उड्डाण ॥५॥
    हंसाचें राहण्याचें ठिकाण मानससरोवरांत आहे, पण तूं मानसाविरहितच (मनाशिवाय) राहणारा आहेस. हंसाचें उड्डाण आकाशांत असते, आणि तुझें उड्डाण चिदाकाशांत असतें. ५.


    विवेकचंचूचिया मुद्रा । स्वभावें निवडिसी क्षीरनीरां ।
    मग सांडोनियां असारा । शुद्ध सारा सेविसी ॥६॥
    विवेकरूप चोंचीनें तूं दूध व पाणी सहज निरनिराळे करतोस, आणि मग असार टाकून देऊन शुद्ध सार ग्रहण करतोस ६.


    ऐसिया हंसा जी सुकुमारा । मुक्तमोतियांचा तुज चारा ।
    जीं कां वैराग्यशुक्तिद्वारा । चित्सागरामाजीं झालीं ॥७॥
    अशा तुला सुकुमार हंसाला, जी चित्समुद्रामध्यें वैराग्यरूप शिंपींत तयार झालीं, त्या मुक्तरूप मोत्यांचा चारा असतो ७.


    सर्वथा नातळोनि क्षिती । निरालंब मार्गाप्रती ।
    चालणें चालसी हंसगती । हे गमनशक्ती अभिनव ॥८॥
    पृथ्वीला मुळींच स्पर्श न करता केवळ निराधार मार्गानें तूं हंसाच्या गतीनें प्रवास करतोस, ही तुझी प्रवासाची कला मोठी अद्‌भुत आहे ८.


    अभिन्न स्वभावतां निज‍अंशीं । चिन्मात्रवागीश्वरी तूं वाहसी ।
    हंसवाहिनी आख्या ऐशी । तुझेनि अंशेंसीं तीस झाली ॥९॥
    स्वभावतःच तुझ्या अंशाहून भिन्न नाही, अशा चिन्मय वाग्देवतेला तूं वागवितोस. तुझ्या अंशामुळेच तिला हंसवाहिनी असें नांव प्राप्त झाले आहे ९.


    तुझेनि चालविल्या सरस्वती चाले । तुवां बोलविल्या वेदू बोले ।
    तुवां चेतविल्या प्राण हाले । तुझेनि वाचाळें वाग्देवी वदे ॥१०॥
    तूं चालविलेंस तरच सरस्वती चालते, तूं बोलविलेंस तरच वेद बोलतो, तूं जागृत केलास तरच प्राण हालतो, आणि तुझ्या वक्तृत्वशक्तीनेंच सरस्वती बोलते १०.


    झाली वागीश्वरी वाग्देवता । तियेसी तुझेनि वाचाळता ।
    जेवीं कां वेणु वाजे मधुरता । परी वाजविता तो भिन्न ॥११॥
    सरस्वती ही वाणीची देवता झाली, तरी तिला तुझ्यामुळेंच बोलण्याचें सामर्थ्य प्राप्त झालें आहे-ज्याप्रमाणें मुरली ही मंजुळपणानें वाजते, पण वाजविणारा असतो तो वेगळाच असतो ११.


    एवं वाच्य वचन वक्ता । तूंचि वागीश्वरी तूंचि वदता ।
    आपुल्या हंसरूपाची कथा । स्वभावतां बोलविसी ॥१२॥
    ह्याप्रमाणें वाचा, वचन आणि वक्ता तूंच, सरस्वती तूंच आणि बोलणाराही तूंच. म्हणून आपल्या हंसरूपाची कथाही तूंच सहज बोलवितोस १२.


    बोलावया महाकवीच्या ठायीं । तुवां वागीश्वरी द्योतिली पाहीं ।
    ते हंसरूपाची नवाई । अभिनव कांहीं बोलवी ॥१३॥
    मोठमोठ्या कवींच्या ठिकाणीं बोलण्यासाठीं तूं सरस्वती प्रकट केलीस पहा. त्या हंसरूपाची अपूर्वता काही अभिनव गोष्टीच बोलविते १३.


    तो तूं सर्वभूतीं समान । हंसस्वरूपी श्रीजनार्दन ।
    त्याचे वंदितां निजचरण । जन्ममरण पळालें ॥१४॥
    तो तं हंसस्वरूपी श्रीजनार्दन सर्वभूतीं समानच आहेस. त्याचे श्रीचरण मस्तकी धारण केल्यामुळें जन्ममरण पळून गेलें १४.


    आपभयें पळतां त्यासी । लपणी मिळाली भ्रमापाशीं ।
    जन्मामागे मरणासी । ठावू वसतीसी दीधला ॥१५॥
    ते आपल्या आपणच भिऊन पळूं लागलें असतां श्रमापाशीं त्याला लपावयाला जागा सांपडली, आणि त्यानें जन्मापाठीमागून मरणाला राहावयाला ठिकाण नेमून दिलें १५.


    यालागीं भ्रमामाजीं जो पडला । तो जन्ममरणांसी आतुडला ।
    मग न सुटे कांहीं केल्या । यंत्रीं पडला भ्रमचक्रीं ॥१६॥
    म्हणून जो भ्रमात पडतो तो जन्ममरणांत सांपडतो, आणि एकदा भ्रमाच्या चक्रांत गुंतला की मग काहीं केलें तरी सुटत नाहीं १६.


    तेथ राहाटमाळेच्या परी । जन्ममरणांचे पडे यंत्रीं ।
    एकाची सोसी भरोवरी । तंव दुसरें शिरीं आदळे ॥१७॥
    तेथे तो रहाटमाळेसारखा जन्ममरणाच्या यंत्रांत सांपडतो. एकाचा तडाका सोसतो तोंच दुसरा तडाका डोक्यावर येऊन आदळतो १७.


    तें निस्तरावया जन्ममरण । तुज सोहंहंसाचें स्मरण ।
    जैं कां करी सावधान । भ्रममोचन तैं होय ॥१८॥
    तें जन्ममरण निस्तरण्याकरितां तुझे ' सोहहंसाचे ' स्मरण करावें लागतें. जेव्हां कोणी तें स्मरण सावधपणानें करतो, तेव्हांच त्याचा भ्रम नष्ट होतो १८.


    तो तूं परमात्मा परमहंसू । परब्रह्मैक पूर्ण परेशू ।
    ब्रह्मपुत्रांसी उपदेशू । करावया हंसू झालासी ॥१९॥
    तो तूं परमात्मा परमहंस आहेस. परब्रह्मस्वरूपी पूर्ण परमेश्वर आहेस. ब्रह्मदेवाच्या पुत्राला उपदेश करण्यासाठी तूं हंस झाला होतास १९.


    तें हंसमुखींचें निरूपण । बोलावया बोलका श्रीशुक जाण ।
    त्या वचनार्थातें लेवून । परम पावन परीक्षिती ॥२०॥
    त्या हंसमुखांतील निरूपणच सांगण्यासाठी श्रीशुकाचार्य वक्ते झाले, आणि त्या भाषणांतील अर्थ ग्रहण करूनच परीक्षिति परम पावन झाला २०.


    त्या हंसाचें हंसगीत । कृष्ण उद्धवासी सांगत ।
    श्रोतां व्हावें दत्तचित्त । अचुंबित निजबोधू ॥२१॥
    त्या हंसाचें हंसगीत श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहेत. ह्याकरितां श्रोत्यांनीही इकडे लक्ष द्यावे, म्हणजे सहज आत्मबोध प्राप्त होईल २१.


    तो हा तेरावा अध्यावो । अत्यादरें सांगे देवो ।
    तें ऐकतां उद्धवो । विषयविलयो देखेल ॥२२॥
    तोहा तेरावा अध्याय देव मोठ्या कळकळीनें सांगत आहे. तो ऐकतांच उद्धव विषयांचा नाश पाहूं शकेल २२.


    तेरावे अध्यायीं निरूपण । सत्त्ववृद्धीचें कारण ।
    विद्याउद्‍भवक्रमू जाण । अतिसुलक्षण सोपारा ॥२३॥
    तेराव्या अध्यायामध्यें सत्त्वबुद्धीचें कारण निरूपण केलें असून सद्विद्येच्या उद्‌भवाचा अनुक्रम अत्यंत सुलभ अशा रीतीनें वर्णिला आहे २३.


    हंस‍इतिहासाचा योगू । स्वयें सांगेल श्रीरंगू ।
    तेणें चित्तासी विषयवियोगू । सुगम साङ्ग सांगेल ॥२४॥
    त्या हंसाच्या इतिहासाचा योग देव स्वतः सांगेल, व त्यांतच चित्ताला विषयांचा वियोग कसा होतो तेंही सुलभ रीतीनें सांगण्यात येईल २४.


    द्वादशाध्यायाचे अंतीं । करूनि सद्‍गुरूचीं भक्ती ।
    पावोनि विद्याकुठारप्राप्ती । छेदावा निश्चितीं जीवाशयो ॥२५॥
    बाराव्या अध्यायाच्या शेवटी सद्‌गुरूची भक्ति करून विद्यारूपी कुठार प्राप्त करून घेऊन जीवांतील वासनाच छेदून टाकावी असें सांगितलें २५.


    छेदिल्या जीवाचें जीवपण । सकळ सांडावें साधन ।
    हें उद्धवें ऐकूनि जाण । प्रतिवचन नेदीच ॥२६॥
    जीवाचें जीवपणच छेदून टाकिलें म्हणजे सर्वच साधनें सोडून द्यावीत, हे उद्धवानें ऐकून त्यावर काहीच उत्तर दिलें नाहीं २६.


    उद्धवाचे जीवींचा भावो । सखोल हृदयींचा अभिप्रावो ।
    सकळ आकळोनियां सद्‍भावो । स्वयें श्रीकृष्णदेवो बोलत ॥२७॥
    तेव्हां उद्धवाच्या मनांतील हेतु, त्याच्या अंत:करणांत चाललेला गूढ विचार, हे सर्व नीटपणें ओळखून देव श्रीकृष्ण आपण होऊनच बोलूं लागला २७.


    म्हणसी लागोनि सूत्र त्रिगुण । जीवासी आलें जीवपण ।
    ते अंगीं असतां तिनी गुण । सद्विद्या जाण उपजेना ॥२८॥
    तूं म्हणशील की, त्रिगुणाचे सूत्र लागून जीवाला जीवपण आलेलें असते. ते तीन गुण आंगांत आहेत तोंपर्यंत सद्विद्या उत्पन्नच होणार नाही २८.


    तोंडींचा खिळू नव्हता दूरी । नारेळजळ न चढे करीं ।
    तेवीं गुण न वचतां निर्धारीं । विद्या कैशापरी उपजेल ॥२९॥
    नारळाच्या तोंडावरची खीळ काढली नाहीं तर नारळांतील पाणी काहीं हातांत यावयाचें नाही. त्याप्रमाणें गुणच जर खरोखर गेले नाहींत, तर विद्या कशी उत्पन्न होणार ? २९.


    ऐसा आशंकेचा भावो । जाणोनियां श्रीवासुदेवो ।
    तिहीं श्लोकीं तो पहा हो । गूढाभिप्रावो निरसितू ॥३०॥
    हाच उद्धवाच्या शंकेचा तात्पर्यार्थ जाणून, हें पहा ! श्रीकृष्ण तीन श्लोकांनीं त्याच्या त्या गहन शंकेचा निरास करतो ३०.


    श्रीभगवानुवाच -
    सत्त्वं रजस्तम इति गुणा बुद्धेर्न चात्मनः ।
    सत्त्वेनान्यतमौ हन्यात् सत्त्वं सत्त्वेन चैव हि ॥ १ ॥
    [श्लोक १] भगवान श्रीकृष्ण म्हणाले - सत्त्व, रज आणि तम हे तीन बुद्धीचे गुण आहेत, आत्म्याचे नव्हेत, सत्त्वगुणाने रज आणि तमाचा नाश करावा नंतर शुद्धसत्त्वाने वृत्तिरूप सत्त्वगुणाचाही त्याग करावा. (१)


    सत्त्वरजतमादि गुण । निश्चयेंसी मायेचे जाण ।
    हें द्वादशाध्यायीं निरूपण । तुज म्यां संपूर्ण सांगीतलें ॥३१॥
    सत्त्व, रज, तम, इत्यादि जे गुण आहेत, ते खरोखर मायेचे आहेत हें लक्षात ठेव. हें सर्व निरूपण बाराव्या अध्यायांत मी तुला सांगितलेंच आहे ३१.


    सच्चिदानंदू जो येथ । आत्म्यासीं अभिन्न नित्य ।
    तैसे गुण नव्हती समस्त । ते प्राकृत प्रकृतिकार्यें ॥३२॥
    आतां सच्चिदानंद म्हणून जो आहे, तो कांही आम्याहून भिन्न नाही. पण सारे गुण कांहीं तसे नव्हेत. ते प्रकृतीचींच कार्ये असल्यामुळें प्राकृत होत ३२.


    जें सद तेंचि चिद । जें चिद तोचि आनंद ।
    स्वरूपीं नाहीं त्रिविध भेद । तें एकवद सच्चिदानंद ॥३३॥
    जें सत् तेंच चित्. आणि जें चित् तोच आनंद. आत्मस्वरूपामध्यें काहीं तीन प्रकारचे भेद नाहींत. ते एकीएक सच्चिदानंदस्वरूपच आहे ३३.


    जेवीं श्वेतता मृदु मधुर । त्रिविध भेदें एक साखर ।
    तेवीं सच्चिदानंद अविकार । वस्तु साकार एकवद ॥३४॥
    ज्याप्रमाणे पांढरी, मऊ आणि गोड ह्या तिन्ही प्रकारांनी साखर ही एकच; त्याप्रमाणे सच्चिदानंद ही अविकृत वस्तु असून आकारानेंही एकरूपच आहे ३४.


    प्रकृति गुणांतें उपजविती । गुणांस्तव सबळ प्रकृती ।
    गुणांसी आत्म्यासी संगती । न घडे कल्पांतीं उद्धवा ॥३५॥
    प्रकृति हीच गुणांना उत्पन्न करणारी आहे, आणि त्या गुणांमुळेच प्रकृति बलिष्ठ झाली आहे. याकरिता उद्धवा ! गुणांची आणि आत्म्याची संगति कधी कल्पांतींसुद्धा घडत नाही ३५.


    येथ विद्याउत्पत्तिलक्षण । स्वयें सांगे नारायण ।
    करूनि गुणें गुणांचें मर्दन । सद्विद्या जाण साधावी ॥३६॥
    आतां विद्या साध्य करण्याचें लक्षण श्रीकृष्ण स्वतःच सांगतात. गुणानेंच गुणांचा नाश करून सद्विद्या संपादन करावी हें लक्षात ठेव ३६.


    सत्त्व वाढवून सुरवाडें । जैं रज तम निःशेष झडे ।
    तैं सद्विद्या हाता चढे । सत्त्वाची वाढी मोडे निजसत्त्वेकरूनी ॥३७॥
    ज्यावेळी प्रेमानें सत्त्वच वाढवून रज आणि तम ही पूर्णपणे झडून जातात, तेव्हां सद्विद्या हातीं लागते, आणि आत्मस्वरूपाचा बोध झाला म्हणजे सत्वाची झालेली वाढही मोडून जाते ३७.


    सर्पु लागला होय ज्यासी । विष खादल्या उतार त्यासी ।
    तें विष खातां येरे दिशीं । आत्मघातासी वाढवी ॥३८॥
    सर्प ज्याला चावतो, त्याला विष खाल्लें असतां उतार पडतो. पण तेच विष जर भलत्याच दिवशी खाल्लें तर आत्मघाताला वाढवितें ३८.


    तैसें रजतमलोपें सत्त्व वाढे । वाढलें सत्त्व बाधकत्वें कुडें ।
    तेही बाधा मी तुज पुढें । अतिनिवाडें सांगेन ॥३९॥
    त्याचप्रमाणें रजाचा आणि तमाचा लोप होऊन सत्त्व वाढतें, पण तेच वाढलेलें सत्त्व बाधकपणानें मोठे वाईट आहे. ती त्याची बाधा मी तुला पुढे अगदी स्पष्ट करून सांगेन ३९.


    मी अलिप्त कर्मकार्या । मी ज्ञाता मी महासुखिया ।
    ऐशा वाढवूनि अभिप्राया । गुणें गुणकार्या गोंविजे सत्त्वे ॥४०॥
    सर्व कर्मापासून व कार्यापासून मी अगदी अलिप्त आहे. ज्ञाता तो मी, अत्यंत सुखी काय तो मी, अशा कल्पना वाढवून सत्वानेंच गुणानें गुणांच्या कार्यामध्यें गुंतवून टाकलें आहे ४०.


    ऐसा वाढला जो सत्त्वगुण । त्यासी उपशमात्मक निजसत्त्वे जाण ।
    समूळ करावें निर्दळण । तैं समाधान पाविजे ॥४१॥
    असा जो सत्त्वगुण वाढतो, त्याचा आत्मतत्त्वानेंच उपशम केला पाहिजे. त्याचें जेव्हां समूळ निर्दाळण करावें, तेव्हांच समाधान प्राप्त होते ४१.


    उद्धवा तूं ऐसें म्हणसी । समानता तिहीं गुणांसी ।
    केवीं वाढी होईल सत्त्वासी । गुण गुणांसी राखण ॥४२॥
    उद्धवा ! तूं म्हणशील कीं, तिन्ही गुण जर सारखेच आहेत, तर सत्त्वाचीच वाढ कशी होईल ? त्याचे उत्तर असें की, गुण हेच गुणांना राखणदार असतात ४२.


    वाढल्या तमोगुण । नावडे तेव्हां ज्ञानध्यान ।
    नावडे त्याग भोग चंदन । निद्रा दारुण कां कलहो ॥४३॥
    तमोगुण वाढला असता त्याला ज्ञान-ध्यान आवडत नाही, त्याग आवडत नाही व चंदनादि सुखविलास आवडत नाहीत. झोप किंवा दांडगा कलह हीं आवडतात ४३.


    वाढल्या रजोगुण । ऐकतां ज्ञाननिरूपण ।
    त्याचें भोगासक्त मन । सदा ध्यान विषयांचे ॥४४॥
    रजोगुण वाढला तर ज्ञानाचे निरूपण ऐकत असतांही त्याचे मन भोगाविषयीं आसक्त असते. त्याला सदासर्वदा विषयाचेच ध्यान लागलेले असतें ४४.


    धनलोभ सुदल्या दिठी । पांपरा घेतल्या क्रोध नुठी ।
    हे रजोगुणाची कोटी । लोभिष्ट पोटीं स्त्रीपुत्रां ॥४५॥
    धनलोभ दृष्टीत भरला असतां मग कोणीं पायपोस काढला तरी त्याला राग येत नाही. ही रजोगुणाची जात आहे. तो रजोगुणी मनुष्य मनांत स्त्रीपुत्रांविषयी फार लोभी असतो ४५.


    वाढलिया सत्त्वगुण । स्त्रियादिभोगीं उदासीन ।
    सदा करी भगवच्चिंतन । कां करी कीर्तन हरीभक्ती ॥४६॥
    सत्वगुण वाढला असतां स्त्रियादि भोगाविषयीं उदासीन होतो. तो निरंतर भगवच्चिंतन करितो, किंवा कीर्तन अथवा हरीची भक्ति करितो ४६.


    क्रोधलोभमोहलक्षण । सत्त्वकाळीं नुठे जाण ।
    परी एकला केवीं वाढे सत्त्वगुण । गुणांसी राखण गुण होती ॥४७॥
    क्रोध, लोभ किंवा मोह ह्यांचें लक्षण सत्त्वाच्या कालांत उत्पन्न होत नाही. परंतु एकटाच सत्त्वगुण तरी वाढणार कसा ? कारण गुणांना गुणच रक्षण करीत असतात ४७.


    मागें तम पुढें रज पूर्ण । मध्यें अडकला सत्त्वगुण ।
    तो कैसेनि वाढेल जाण । अडकलेपण सुबद्ध ॥४८॥
    सत्त्वगुणाच्या मागें तमोगुण असतो, पुढे परिपूर्ण रजोगुण भरलेला असतो, आणि त्या दोहोंमध्यें सत्त्वगुण अडकलेला असतो. तेव्हां तो कसा वाढेल ? तो तर पक्का अडकलेला असतो ! १८.


    ऐसी आशंका धरूनि जाण । म्हणसी वाढेना सत्त्वगुण ।
    तें सत्त्ववृद्धीचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥४९॥
    अशी शंका मनांत आणून सत्त्वगुण वाढावयाचा नाहीं असें म्हणशील, तर त्याच सत्त्ववृद्धीचें संपूर्ण लक्षण सांगतों ऐक ४९.


    सत्त्वाद् धर्मो भवेद् वृद्धात् पुंसो मद्‍भक्तिलक्षणः ।
    सात्त्विकोपासया सत्त्वं ततो धर्मः प्रवर्तते ॥ २ ॥
    [श्लोक २] माणसाचा सत्वगुण वाढला असता माझ्या भक्ति रूप धर्माची वाढ होते सात्त्विक पदार्थांचे सेवन केले असता सत्त्व गुण वाढतो आणि त्यामुळे धर्माकडे प्रवृत्ती होते. (२)


    ये श्लोकींचें निरूपण । पहिलें उत्तरार्धव्याख्यान ।
    तेथें सत्त्ववृद्धीचें कारण । सात्त्विक सेवन करावें ॥५०॥
    या श्लोकांचे निरूपण करतांना प्रथम उत्तरार्धाचें व्याख्यान सांगतो. त्यांत सत्त्ववृद्धीचें कारण सात्त्विक वस्तूंचेच सेवन करणें हें सांगितलें आहे ५०.


    सात्त्विक पदार्थ सेवितां । सत्त्वबुद्धि होय सर्वथा ।
    सत्त्वविजयें वर्ततां । पवित्रता करावें जीवाची ॥५१॥
    सात्त्विक पदार्थच सेवन केले असतां सर्वस्वीं सत्त्वाचीच वृद्धि होते, आणि सत्त्ववृद्धीनेंच वागले असतां जीवांचीही पवित्रता होते ५१.


    सत्त्व‍उत्कर्षाचें लक्षण । धर्मनिष्ठा स्वधर्माचरण ।
    तैसें तेथील वासनाबंधन । इहामुत्र जाण वांछीना ॥५२॥
    सत्त्वाच्या उत्कर्षाचें लक्षण म्हणजे धर्मनिष्ठा व स्वधर्माचें आचरण हें होय. त्याचप्रमाणें तेथील वासनांचें बंधन तो इहलोकांत व परलोकांतही इच्छीत नाही हें लक्षात ठेव ५२.


    झालिया शुद्ध अंतःकरण । तेव्हां निःसीम वाढे सत्त्वगुण ।
    पुरुषासी मद्‍भक्तिलक्षण । धर्म जाण उपतिष्ठे ॥५३॥
    अंतःकरण शुद्ध झालें असतां सत्त्वगुण अमर्याद वाढतो, आणि पुरुषाच्या ठिकाणी माझ्या भक्तीचें लक्षण जो धर्म, तो उत्पन्न होतो ५३.


    सत्त्वें वाढल्या धर्मप्रवृत्ती । तैं गुरुभजनीं अतिप्रीती ।
    कां सत्त्वविग्रही माझी मूर्ती । ते ठायीं भक्ती उल्हासे ॥५४॥
    सत्त्वानें धर्माची प्रवृत्ति वाढली असतां गुरुभजनावर अत्यंत प्रेम जडतें, किंवा सत्त्वशील अशी माझी मूर्ति जेथें असते, त्या ठिकाणी भक्ति उल्हास पावते ५४.


    कायिक वाचिक मानसिक । मदर्पण करी स्वाभाविक ।
    मजवेगळा आणिक । भावार्थ देख स्फुरेना ॥५५॥
    कायिक, वाचिक आणि मानसिक कर्म, तो साहजिक मलाच अर्पण करतो, माझ्याशिवाय इतरांची भक्ति त्याच्या ठिकाणी उत्पनच होत नाही ५५.


    गुरु भगवंत अभिन्न । हें ते काळीं प्रकटे चिन्ह ।
    ते अतिसत्त्वाची वोळखण । हे धर्म पूर्ण सात्त्विक ॥५६॥
    गुरु आणि भगवंत हे भिन्न नव्हेत, असें लक्षण त्या वेळी स्पष्ट दिसं लागतें. तेंच अत्यंत थोर सत्त्वाचें लक्षण होय. हे धर्म पूर्ण सात्त्विकच होत ५६.


    धर्मो रजस्तमो हन्यात् सत्त्ववृद्धिरनुत्तमः ।
    आशु नश्यति तन्मूलो ह्यधर्म उभये हते ॥ ३ ॥
    [श्लोक ३] सत्त्वगुणाची वाढ हाच श्रेष्ठ धर्म होय कारण तो रज आणि तम यांचा नाश करतो रज आणि तम नष्ट झाले असता त्यांच्यामुळे उत्पन्न होणारा अधर्मसुद्धा ताबडतोप नष्ट होतो. (३)


    ऐसा वाढलिया सात्त्विक धर्म । तैं सत्त्ववृद्धि सर्वोत्तम ।
    जे सत्त्वीं प्रकटे पुरुषोत्तम । विश्रामधाम मुमुक्षां ॥५७॥
    असे सात्त्विक धर्म वाढले असतां, ज्या सत्त्वामध्येंच मुमुक्षूंचें विश्रांतिस्थान असा पुरुषोत्तम प्रगट होतो, त्या सर्वोत्तम सत्त्वाची वृद्धि होते ५७.


    एवं सत्त्ववृत्तीं वाढला धर्म । तो तत्काळ नाशी अधर्म ।
    अधर्माचें मूळ रजतम । त्यांचें रूपनाम उरों नेदी ॥५८॥
    अशा प्रकारे सत्त्ववृत्तींत जो धर्म वाढतो, तोच अधर्माचा तत्काळ नाश करतो. कारण अधर्माचें मूळ रजोगुण आणि तमोगुण हे असतात. त्यांचे तो रूपनामसुद्धा उरूं देत नाहीं ५८.


    सात्त्विकसेवने सत्त्ववृद्धी । तेणें सद्विद्येची उपलब्धी ।
    हे उपायाची विधानविधी । कृष्ण कृपानिधी बोलिला ॥५९॥
    सात्त्विक पदार्थाच्या सेवनानें सत्त्वाची वृद्धी होते. त्या सत्त्ववृद्धीमुळें सद्विद्या प्राप्त होते. कृपानिधि श्रीकृष्णानें हे सद्विद्याप्राप्तीच्या उपायाचें साधन सांगितलें ५९.


    करावें सात्त्विकसेवन । ते सात्त्विक पदार्थ कोण कोण ।
    ऐक त्यांचेंही निरूपण । दशलक्षण सांगेन ॥६०॥
    आतां सात्त्विक पदार्थाचे सेवन करावे असें जें सांगितले, ते सात्त्विक पदार्थ कोणकोणते ? त्यांचेही दहा लक्षणांनीं निरूपण सांगतों ऐक ६०.


    आगमोऽपः प्रजा देशः कालः कर्म च जन्म च ।
    ध्यानं मन्त्रोऽथ संस्कारो दशैते गुणहेतवः ॥ ४ ॥
    [श्लोक ४] शास्त्र, पाणी, प्रजा, देश, काळ, कर्म, जन्म, ध्यान, मंत्र आणि संस्कार ही दहा गुणांच्या वाढीची कारणे आहेत. (४)


    गुणवृद्धीचें कारण । आगम म्हणिजे शास्त्र जाण ।
    आप म्हणिजे तें जीवन । आवडतें स्थान तो देशू ॥६१॥
    गुणवृद्धीचे कारण आगम म्हणजे शास्त्र, हे लक्षात ठेव. आप म्हणजे पाणी, आणि आवडतें स्थान तो देश होय ६१.


    ऐक प्रजांचें विंदान । प्रजा म्हणिजे त्रिविध जन ।
    जैसी ज्याची संगती जाण । तैसें लक्षण तो पावे ॥६२॥
    आता प्रजांचे लक्षण ऐक. प्रजा म्हणजे तीन प्रकारचे लोक. जशी ज्याची संगति, तसे लक्षण त्याला प्राप्त होते ६२.


    काळ म्हणिजे दिवसभाग । कर्म म्हणिजे जें जें करी अंग ।
    जन्म म्हणिजे दीक्षा सांग । मंत्राचें लिंग यथारुचि ॥६३॥
    काळ म्हणजे दिवसाचे विभाग, कर्म म्हणजे शरीर जी जी क्रिया करतें तें. जन्म म्हणजे चांगल्या प्रकारची दीक्षा. [ दीक्षेप्रमाणे इष्टदेवतेचे ध्यान ]. मंत्राचे लक्षण आपल्या आवडीप्रमाणे ६३.


    कर्त्याचा जेथ अत्यादरू । त्या नांव बोलिजे संस्कारू ।
    हा दशलक्षणप्रकारू । गुणवृद्धिविचारू तो ऐक ॥६४॥
    कर्त्याचा ज्यांत अत्यंत आदर दिसतो, त्याला संस्कार म्हणतात. हा दहा लक्षणांचा प्रकार आहे. आतां जो गुणवृद्धीचा विचार, तो ऐक ६४.


    येथ सत्त्ववृद्धीसी प्रस्तुत । साधकांसी शास्त्र निवृत्त ।
    उपनिषद्‍भागेंसीं वेदांत । त्याचा मथितार्थ सेवावा ॥६५॥
    प्रस्तुत येथें सत्त्ववृद्धीला साधकांना निवृत्तिशास्त्र (वेदांतशास्त्र) हें मुख्य आहे. उपनिषद्‌भागांसह जो वेदान्त, त्याचा मथितार्थ ग्रहण करावा ६५.


    आप म्हणिजे जळपवित्रता । गौतमीभागीरथ्यादि पुण्यसरिता ।
    ज्यांचा अवचटें शिंतोडा लागतां । पाप सर्वथा उरेना ॥६६॥
    आप म्हणजे जलाची पवित्रता. गोदावरी, भागीरथी आदिकरून पवित्र नद्या-ज्यांचा अकस्मात एक शिंतोडा अंगावर उडाला तरी पाप मुळींच शिल्लक उरत नाहीं ६६;


    कां माझ्या प्रतिमांचें चरणामृत । ज्यालागीं ब्रह्मादिक आर्तभूत ।
    किंवा शालिग्रामशिळेचें तीर्थ । सकळ दुरित निवारी ॥६७॥
    किंवा ज्याकरिता ब्रह्मादिक देवसुद्धा लाळ घोंटीत असतात असे माझ्या प्रतिमेचें चरणामृत; किंवा शाळिग्राम शिळेचें तीर्थ हेंही सर्व पातकांचा नाश करतें ६७.


    जेणें सकळ तीर्थें होती पावन । तें ब्राह्मणाचें चरणतीर्थ जाण ।
    स्वयें वंदी श्रीनारायण । निजहृदयीं चरण वाहतसे ॥६८॥
    ज्यानें सर्व तीर्थें पावन होतात, तें ब्राह्मणांचे चरणतीर्थ श्रीनारायण स्वतः शिरसावंद्य करतो आणि ब्राह्मणाचे पाय आपल्या वक्षःस्थळावर धारण करतो ६८.


    भलतैसें हो कां पाणी । जें लागलें सद्‍गुरुचरणीं ।
    तें सकळ तीर्थां शिरोमणी । सेवितां तत्क्षणीं उद्धरी ॥६९॥
    पाणी कसलेही का असेना ? जे पाणी सद्गुरूच्या चरणाला लागलेले असेल तें सकळ तीर्थापेक्षांही श्रेष्ठ होय. तें सेवन केलें असतां तत्काळ उद्धार करितें ६९.


    सत्त्ववृद्धीचें कारण आप । तें इये तीर्थीं जाण पुण्यरूप ।
    सेविता सत्त्ववृद्धीचे स्वरूप । आपेआप प्रकाशे ॥७०॥
    सत्त्ववृद्धीचें कारण उदक आहे. तें ह्या तीर्थानें पुण्यपावन होतें आणि तें सेवन केलें असतां सत्त्ववृद्धीचें स्वरूप आपोआप प्रकट होतें ७०.


    प्रजा म्हणिजे महाजन । सेवावे साधु सज्जन ।
    ज्यांचे संगतीस्तव जाण । उद्धरण जडजीवां ॥७१॥
    प्रजा म्हणजे श्रेष्ठ लोक. साधु व वैराग्यशील पुरुषांची सेवा करावी. कारण त्यांच्या संगतीनें जड जीवांचा उद्धार होतो ७१.


    सत्त्ववृद्धीसी कारण । मुख्यत्वें सत्संगतीचि जाण ।
    त्या सत्संगाचें महिमान । केलें निरूपण द्वादशीं ॥७२॥
    सत्त्ववृद्धीला कारण मुख्यत्वेंकरून सत्संगतीच आहे असे समज. त्या सत्संगतीचे महत्त्व बाराव्या अध्यायांत वर्णन केलें आहे ७२.


    देशू पूण्यभूमिका सिद्धिस्थळ । विजनवासू एकांतशीळ ।
    जेथ बैसतांचि तत्काळ । सत्त्वासी बळ चढोवढीं ॥७३॥
    आतां देश म्हणजे नैमिषारण्यादि पुण्यभूमि किंवा सत्पुरुषांनी सिद्धि प्राप्त करून घेण्याकरितां स्थापन केलेलें सिद्धिस्थान. तें स्थान निर्जन, एकान्त, आणि जेथें बसलें असतां तत्काळ सत्त्वाला अधिकाधिक बळ प्राप्त होतें असें असावें ७३.


    एकांतीं स्थिरावल्या आसन । सहजें वाढे सत्त्वगुण ।
    मनीं हव्यासू चढता जाण । वस्तु चिद्‍घन साधावया ॥७४॥
    एकांतांत आसन घालण्याचा अभ्यास पूर्ण झाला आणि चिद्धन असें परब्रह्म प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत आवड उत्पन्न झाली, की सत्त्वगुण आपोआप वाढतो ७४.


    साधकांसी काळ यथोचित । अवश्य ब्राह्ममुहूर्त ।
    कां जे काळीं उद्वेगरहित । हर्षयुक्त मन होय ॥७५॥
    त्याचप्रमाणे साधकांना योग्य काळ म्हटला म्हणजे ब्राह्म मुहूर्त (रात्रीच्या चवदाव्या मुहूर्ताचा वेळ)-पहाट. हाच काळ पूर्णपणे योग्य व अवश्य आहे. किंवा ज्या वेळी मन उद्वेगरहित असून हर्षयुक्त असेल तोही काळ योग्य होय ७५.


    प्रेमयुक्त अंतःकरणें । जो काळ जाय कथाश्रवणें ।
    कां जयंत्यादि महापूजा करणें । जागरणें हरिदिनीं ॥७६॥
    प्रेमपूर्ण अंत:करणानें कीर्तन श्रवण करण्यामध्यें जो काळ जातो; किंवा जयंत्यादि महापूजा करणे, एकादशीला जागरण करणे ह्यांत जो काळ जातो ७६;


    थोर काळाची सार्थकता । हरिकीर्तनीं गातां नाचतां ।
    त्या काळाचा महिमा तत्त्वतां । माझेन सर्वथा न बोलवे ॥७७॥
    तीच काळाची उत्कृष्ट सार्थकता होय. हरिकीर्तनांत गातांना आणि नाचतांना जो काल जातो, त्या काळाचा महिमा खरोखर मला पूर्णपणे सांगतांसुद्धा येणार नाहीं ७७.


    निरभिमान कीर्तन करणें । निर्लोभ गाणें नाचणें ।
    तो काळू वंदिजे म्यां श्रीकृष्णें । महिमा कोणें बोलावा ॥७८॥
    निरभिमानपणानें कीर्तन करणें, निर्लोभानें गाणें व नाचणें, ह्यांत जो काळ जातो त्या काळाला मी प्रत्यक्ष श्रीकुष्णसुद्धा शिरसावंद्य करतो. त्याचें माहाम्य कोणीं वर्णन करावें ? ७८.


    कर्म म्हणिजे तें निवृत्त । जें आशापाशफळरहित ।
    कां क्रिया जे उपकारार्थ । सात्त्विक निश्चित तें कर्म ॥७९॥
    जे आशापाशाच्या फळाविरहित किंवा निष्काम कर्म असेल, त्यालाच कर्म असें म्हणावें. किंवा उपकारासाठीच जी क्रिया करावयाची, तेंच खरोखर सात्त्विक कर्म होय ७९.


    गुरूपासोनि दीक्षाग्रहण । तें पुरुषासी नवें जन्म जाण ।
    गुरु मायबाप संपूर्ण । तें ऐक लक्षण उद्धवा ॥८०॥
    गुरूपासून दीक्षा ग्रहण करणे तो पुरुषाचा एक नवा जन्मच होय, हें लक्षांत ठेव. उद्धवा ! गुरु हाच सर्वस्वी मायबाप आहे. त्याचेंही लक्षण ऐक ८०.


    उपजलिया बाळकासी तत्त्वतां । पंचविध जाण पिता ।
    जनिता आणि उपनेता । तिजा प्रतिपाळिता अन्नदानें ॥८१॥
    खरोखर जन्मलेल्या बालकालासुद्धा पांच प्रकारचे बाप असतात. एक जन्म देणारा, दुसरा उपनयन करणारा, आणि तिसरा अन्न घालून सांभाळ करणारा ८१.


    जो भयापासूनि सोडविता । जे बंधविमोचन करविता ।
    जो देहाचें मरण चुकविता । तोही पिता शास्त्रार्थें ॥८२॥
    जो भयापासून सोडविणारा, जो बंधापासून मुक्त करणारा, आणि जो देहाचें मरण चुकविणारा, तोही शास्त्राप्रमाणे पिताच होतो ८२.


    यांवेगळा पांचवा पिता । जो झाडणी करी पंचभूतां ।
    मृत्यूपासून सोडविता । जो गर्भव्यथा निवारी ॥८३॥
    ह्याशिवाय एक पांचवा पिता आहे. तो पंचमहाभूतांचा निरास करतो, तो मृत्यूपासून सोडविणारा असतो व गर्भवासाचें दुःख निवारण करतो ८३.


    ज्याचे देखिलिया चरण । बाधूं न शके भवबंधन ।
    तो सद्‍गुरु पिता जाण । भाग्येंवीण न पाविजे ॥८४॥
    ज्याचें चरण दृष्टीस पडलें असतां संसारबंधन पीडा देऊं शकत नाहीं, तो सद्गुरु म्हणजे पिता होय. तो भाग्याशिवाय मिळत नाहीं ८४.


    उपजल्या बाळकासी सर्वथा । वेगळालीं माता पिता ।
    एक वीर्यातें निक्षेपिता । धारणपोषणता जननीची ॥८५॥
    जन्मलेल्या मुलाला जिकडे तिकडे आई आणि बाप हीं वेगवेगळीं असतात. बाप वीर्य घालणारा असतो, आणि त्या वीर्याचें धारण व त्यापासून होणाऱ्या गर्भाचें पोषण करण्याचें कार्य आईचें असतें ८५.


    तैसा सद्‍गुरु नव्हे पिता । निजवीर्य न वेंचितां ।
    योनिद्वारें नुपजवितां । जननी जनिता स्वयें झाला ॥८६॥
    सद्गुरु हा कांही तसा पिता नाही. तो आपलें वीर्य न खर्च करतां व योनीच्या द्वारानें जन्म न देतांच स्वतः आई आणि बाप होतो ८६.


    उदराबाहेरी घातल्यापाठीं । माता पुत्रस्नेहें कळवळा उठी ।
    बाहेरिलें सूनि आपुले पोटीं । निजस्नेहें गोमटी गुरुमाता ॥८७॥
    उदरांतून बाहेर आल्यानंतर आईला पुत्रस्नेंहानें कळवळा उत्पन्न होतो. पण बाहेर असेल तें पोटांत घालून गुरुमाता ही खऱ्या कळवळ्यानें थोरपणा पावली आहे ८७.


    यालागीं शिष्यासी तत्त्वतां । सद्‍गुरुचि माता पिता ।
    निजस्नेहें वाढविता । तदात्मता अभेदें ॥८८॥
    म्हणून शिष्याला खरोखर सद्गुरुच माता-पिता होय. तोच आपल्या ममतेनें त्याला वाढविणारा असतो, आणि अभिन्नभावनेंच्या योगानें गुरुशिष्यांचें तादात्म्य होतें ८८.


    मागील पिते जे चौघेजण । ते याचे सावत्र बाप जाण ।
    माता पिता भिन्न भिन्न । सखेपण त्यां कैंचें ॥८९॥
    पूर्वी जें चार पिते सांगितले, ते ह्याचे सावत्र बाप होत असें समज, माता आणि पिता ही दोघेंही भिन्नभिन्न असल्यामुळें त्यांना सख्खेपण तें कशाचें ? ८९.


    यालागीं सद्‍गुरु जो सकृपू । तो सच्छिष्यासी सखा बापू ।
    पित्यापुत्रांमाजीं अल्पू । कांहीं विकल्पू उपजेना ॥९०॥
    म्हणून दयाळू सद्गुरु असेल तोच सच्छिष्याचा सख्खा बाप होय. त्यामुळेच त्या पितापुत्रांमध्यें थोडा देखील विकल्प उत्पन्न होत नाही ९०.


    त्या सद्‍गुरूपासून जाण । शैवीवैष्णवीदीक्षाग्रहण ।
    अथवा उपदेशी निर्गुण । चैतन्यघन निजबोधें ॥९१॥
    त्या सद्गुरुपासून शैवी किंवा वैष्णवी दीक्षा प्राप्त होते; अथवा तो गुरु आत्मज्ञानानें चैतन्यधन अशा निर्गुणाचा उपदेश देतो ९१.


    ऐक दीक्षानामाची युक्ती । दे चारी पुरुषार्थ चारी मुक्ती ।
    निःशेष अविद्येची नाशी स्थिती । दीक्षाव्युत्पत्ती त्या नांव ॥९२॥
    आतां दीक्षा हा नांवाचें लक्षण ऐक. जी चारही पुरुषार्थ व चारही मुक्ति देते, आणि अविद्येची स्थिति पूर्णपणे लयास नेंते, तिचेंच नांव खरोखर दीक्षा होय ९२.


    एवं दीक्षाजन्माची जे कथा । उद्धवा सांगीतली म्यां तत्त्वतां ।
    ध्याननिष्ठ जे सात्त्विकता । ऐक आतां सांगेन ॥९३॥
    अशा प्रकारे हे उद्धवा ! दीक्षारूप जन्माची जी कथा, ती मीं तुला यथातथ्य सांगितली. आता ध्याननिष्ठ म्हणून जी सात्विकता असतें, ती सांगतो ऐक ९३.


    सत्त्वोपाधि शरीर साचें । चैतन्यघन स्वरूप ज्याचें ।
    तो श्रीविष्णु ध्येय सात्त्विकांचे । ध्यान त्याचें करावें ॥९४॥
    खरोखर ज्याचे शरीर सत्त्वोपाधिक आणि ज्याचें स्वरूप केवळ ज्ञानमय असतें, तो श्रीविष्णु हेंच सात्त्विकांचें ध्येय होय. त्याचें ध्यान करावें ९४.


    अथवा धवळधाम गोक्षीर । कर्पूरगौर पंचवक्त्र ।
    ध्यानीं आणावा शंकर । संसारपार तरावया ॥९५॥
    अथवा गाईच्या दुधासारखा शुभ्र किंवा कापुरासारखा गौर वर्ण ज्याचा आहे, तो पंचमुखी श्रीशंकर, संसारांतून तरून पलीकडे जाण्यासाठी ध्यानात आणावा ९५.


    या मूर्तींचें ध्यान करितां । हारपे ध्येय ध्यान ध्याता ।
    ठसावे चैतन्यघनता । सात्त्विकता हें ध्यान ॥९६॥
    ह्या मूर्तीचें ध्यान करूं लागले असतां ध्येय, ध्यान आणि ध्याता हें सर्वच नाहींसें होतें, आणि अंत:करणामध्यें ज्ञानस्वरूप ठसून राहतें. सात्विकतेचे ध्यान हेंच होय ९६.


    जैसी दीक्षा तैसें ध्यान । हें आगमशास्त्रींचे प्रमाण ।
    त्या ध्यानाचें पर्यवसान । चैतन्यघन पावावें ॥९७॥
    जशी दीक्षा तसेंच ध्यान, हाच आगमशास्त्रांतील सिद्धांत आहे. आणि ज्ञानस्वरूपाला पोचणें हेंच त्या ध्यानाचें पर्यवसान आहे ९७.


    केवळ जें चैतन्यघन । तें सद्‍गुरुस्वरूप जाण ।
    त्याचें करावें नित्य ध्यान । अनुसंधान निजनिष्ठा ॥९८॥
    केवळ ज्ञानाचें जें भांडार तेंच सद्गुरूचें स्वरूप होय. त्याचेंच निरंतर आत्मनिष्ठेनें अनुसंधान ठेवून ध्यान करावें ९८.


    पंचभूतदेहाची मूस । तेथ वोतिला ब्रह्मरस ।
    गुरुस्वरूप तें सविलास । ध्यान रात्रंदिवस करावें त्याचें ॥९९॥
    पंचभूतात्मक देहाची मूस करून त्यांत ब्रह्मरूपी रस ओतला की शोभिवंत गुरुस्वरूप तयार होते. ह्याकरितां त्याचेंच रात्रंदिवस ध्यान करावें ९९.


    सात्त्विकांचें जें कां ध्यान । तें हें तूं उद्धवा जाण ।
    आतां मंत्रांचें मंत्रग्रहण । तेंही निरूपण अवधारीं ॥१००॥
    उद्धवा ! सात्त्विकांचें जें ध्यान आहे तें हें आहे, हें लक्षांत ठेव. आता मंत्राचे ग्रहण कसें असतें तेंही निरूपण ऐक १००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...