मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २४ ओव्या ५०१ ते ६००

    सुलीन बीजें पूर्ण क्षितीं । परी तीं कोणा व्यक्ती न येती ।

    तेवीं वासनाबीजें प्रळयांतीं । उरे अव्यक्तीं संसारू ॥ १ ॥
    तीं बीजे पृथ्वीवर सर्वत्र पसरलेली असतात पण ती कोणाला उघड दिसत नाहीत, त्याप्रमाणे प्रळयाच्या शेवटीं वासनाबीजरूपाने संसार अव्यक्तामध्ये शिल्लक राहतो १.


    जेवीं काळीं वरुषलेनि घनें । बीजें विरुढती सत्राणें ।
    वाढती नाना जातींचीं तृणें । पूर्वलक्षणें यथास्थित ॥ २ ॥
    ज्याप्रमाणे ती उन्हाळ्यात जमिनीवर पडलेली बीजें वर्षाकाळांत पाऊस पडला म्हणजे जोराने उगवतात आणि नाना प्रकारची गवते पूर्वीप्रमाणे अगदी हुबेहूब वाढत असतात २, 


    तेवीं उत्पत्तिकाळावरी । सूक्ष्मवासना बीजांकुरीं ।
    नाना योनी चराचरीं । जंगमस्थावरीं जग वाढे ॥ ३ ॥
    त्याप्रमाणे उत्पत्तिकाळाच्या वेळी सूक्ष्म वासनारूप बीजांकुरांनी अनेक योनीमध्यें चराचर आणि स्थावर-जंगमात्मक जग वाढते ३.


    व्रह्मयाचे प्रळयाआंतू । निःशेष सृष्टीचा नव्हे अंतू ।
    यालागीं संसारीं अनंतू । वेदशास्त्रार्थू प्रतिपादी ॥ ४ ॥
    ब्रह्मदेवाच्या प्रळयांतसुद्धा सृष्टीचा पूर्णपणे नाश होत नाही. म्हणूनच संसार अनंत आहे असें वेद शास्त्रांत  प्रतिपादन केले आहे ४, 


    ऐसा संसार अनंतू । याचा निःशेष होय अंतू ।
    तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथू । श्लोकींचा पदार्थू बोलिला ॥ ५ ॥
    पण अशा प्रकारे संसार अनंत असूनही ह्याचा निःशेष नाश होउं शकतो, याच अर्थान श्रीकृष्णनाथाने लोकांतील शब्दार्थ सांगितला  ५.


    ‘स्थित्यन्तो यावदीक्षणम्’ । येणें पदें श्रीकृष्ण ।
    अत्यंत प्रळयींचें लक्षण । सूत्रप्राय जाण बोलिला ॥ ६ ॥
    'स्थित्यन्तो यावदीक्षणम्' या शब्दांनी श्रीकृष्णाने अत्यंत प्रळयाचे लक्षण थोडक्यांत सांगितले ६.


    ‘ईक्ष्ण’ या पदाचा अर्थ जाण । सद्‌गुरुकृपादृष्टि पूर्ण ।
    तेंचि माझें कृपावलोकन । जेणें ब्रह्मज्ञान प्रकाशे ॥ ७ ॥
    'ईक्षण' ह्या पदाचा अर्थ 'सद्गुरूची पूर्ण कृपादृष्टि' असा आहे. ज्याच्या योगाने ब्रह्मज्ञान प्रगट होते तेच माझें कृपावलोकन होय ७. 


    पूर्ण प्रकाशल्या ब्रह्मज्ञान । संसार झाला नाहींच जाण ।
    वस्तु वस्तुत्वें परिपूर्ण । मीतूंपण असेना ॥ ८ ॥
    ब्रह्मज्ञान पूर्णपणे प्रगट झाले असतां संसार झालाच नाही असे होते. मग ब्रह्म हेंच ब्रह्मरूपाने पूर्ण स्वरूपाने राहते, आणि मीतूंपणा उरत नाही ८.


    तेथ ध्रुवमंडळाची ठेली मात । वैकुंठकैलासा झाला प्रांत ।
    शेषशायीचाही अंत । ब्रह्मज्ञानांत होऊं सरला ॥ ९ ॥
    तेव्हां ध्रुवमंडळाची गोष्टच नाहीशी होते. वैकुंठ आणि कैलास यांचाही अंत होतो. फार काय सांगावें ? पण त्या ब्रह्मज्ञानामध्ये शेषशायीचाही अंत होऊन जातो ९.


    हारपलें मीतूंपण । उडालें देव-भक्त भजन ।
    बुडालें साकारतेचें भान । ब्रह्म सनातन सदोदित ॥ ५१० ॥
    मीतूंपण हरपून जाते; देव, भक्त आणि भजन हा भेद नाहीसा होतो; सगुण मूर्तीचे भान उडून जाते; आणि सदासर्वदा सनातन ब्रह्मच काय तें उरते  १०;


    प्रपंच एक झाला होता । हे समूळ मिथ्या वार्ता ।
    पुढें होईल मागुता । कदा कल्पांता घडेना ॥ ११ ॥
     प्रपंच म्हणून कोणी एक झाला होता, ही गोष्टच मुळी सर्वस्वी खोटी. किंवा तो पुन्हा पुढे होईल असेंही कल्पांती देखील घडावयाचे नाही ११; 


    हें अत्यंत प्रळयाचें लक्षण । भाग्येंवीण न पाविजे जाण ।
    ज्यासी साचार सद्‌गुरुचरण । ते सभाग्य जन पावती ॥ १२ ॥
    हे अत्यंत प्रळयाचे लक्षण होय, ते भाम्या भाग्याशिवाय कधीही कळावयाचे नाही. ज्यांना खरोखर सद्गुरुचरणाचा लाभ घडला, ते भाग्यवान् लोकच ते जाणू शकतात १२.


    अत्यंत प्रळयींची गती । न घडे गा समस्तांप्रती ।
    हे परम निर्वाणगती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १३ ॥
    अत्यंत प्रळयाची गति कांही सर्वांनाच कळत नाही. कारण की, उद्धवा ! ही खरोखर परमनिर्वाणाचीच गति आहे असे खात्रीने समज १३.


    ज्याची अहंममता खुंटे । त्याची निःशेष कल्पना तुटे ।
    अत्यंत प्रळयो त्यासीच भेटे । नेटेंपाटें निजात्मता ॥ १४ ॥
    ज्याची अहंममता खुंटते, त्याची कल्पनाही निःशेष नष्ट होते, आणि त्यालाच आत्मस्वरूपाचा बोध झाल्यामुळे अत्यंत प्रळयाचा लाभ घडतो १४.


    देह पडलिया प्रळयो घडे । हें बोलणे सर्वथा कुडें ।
    जितांचि हा प्रळयो जोडे । वाडेंकोडें निजनिष्ठा ॥ १५ ॥
    देह पडला की प्रळय झाला हे बोलणे सर्वस्वी खोटें आहे. आत्मनिष्ठा असली तर जिवंतपणीच हा प्रळय अवश्य प्राप्त होईल १५.


    जितांचि हा प्रळयो जाण । येणें संसारबीजदहन ।
    आतां ब्रह्मप्रळयलक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ १६ ॥
    जिवंतपणींच हा प्रळय झाला तर याच्या योगाने संसाराचें बीजच दग्ध होऊन जाते. आता ब्रह्मप्रळयाचेही संपूर्ण लक्षण सांगतों ऐक १६.


    ब्रह्मांडप्रळयाचा अनुक्रम । तेथ अंतीं उरे पूर्ण ब्रह्म ।
    हें उद्धवें जाणावया वर्म । पुरुषोत्तम बोलत ॥ १७ ॥
    ब्रह्मांडप्रळयाचा जो अनुक्रम आहे, त्यात शेवटीं पूर्ण ब्रह्म शिल्लक राहतेच. हे वर्म उद्धवाने जाणून घ्यावे यासाठी पुरुषोत्तम सांगतो १७.


    विराण्मयाऽऽसाद्यमानो लोककल्पविकल्पकः ।
    पञ्चत्वाय विशेषाय कल्पते भुवनैः सह ॥ २१ ॥
    [श्लोक २१] मी कालरूपाने हे ब्रह्मांड व्यापलेले असते, तोपर्यंत विविध लोकांची उत्पत्ती व संहार होत असतात जेव्हा मी प्रलय करण्याचा संकल्प करतो, तेव्हा ब्रह्मांड भुवनांसह विनाशाला योग्य होते. (२१)


    चतुर्दशभुवनेंसीं ब्रह्मांड । काळें कल्पिलें प्रचंड ।
    तें स्थितिकाळीं पाळूनि अंड । अंतीं नाशाचें बंड आदरी काळू ॥ १८ ॥
    चौदा लोकांसह हे प्रचंड ब्रह्मांड काळाने कल्पनेने रचलेले आहे. ते अस्तित्वात असतांना त्याचे पालनपोषण करून शेवटी त्याच्या नाशाचा उपद्व्यापही काळच करतो १८.


    तो तूं काळ म्हणशी कोण । तरी काळात्मा मीचि जाण ।
    तेणें काळें म्यां प्रळयईक्षण । केलें जाण सृष्टीसी ॥ १९ ॥
    असा तो काळ तरी कोण? असें तूं म्हणशील, तर त्या काळाचा आत्मा तो मीच होय असे समज. त्याच काळस्वरूपाने मी सृष्टीकडे संहाराच्या दृष्टीने पाहतो १९.


    पंचभूतांचे भिन्न भाग । काळसत्ता राखिले विभाग ।
    ते सत्ता म्यां आवरितां सांग । खवळे लगबग पंचत्वासी ॥ ५२० ॥
    पंचमहाभूतांचं जे भिन्न भिन्न भाग आहेत, ते विभाग काळाच्या सत्तेनेंच रक्षण केले आहेत. ती सर्व सत्ता मी आवरून घेतली असता पंचमहाभूतांचीही गडबड उडून जाते ५२०.


    जैसा उत्पत्तीचा उपक्रमू । तैसाचि प्रळयाचा अनुक्रमू ।
    भूतीं भूतलयो सुगमू । पुरुषोत्तमू सांगत ॥ २१ ॥
    उत्पत्तीचा जसा उपक्रम आहे, तसाच प्रळयाचाही अनुक्रम आहे. भूतांमध्येच भूतांचा सहज लय होऊन जातो, हेंच श्रीकृष्ण सांगतो २१.


    अन्ने प्रलीयते मर्त्यं अन्नं धानासु लीयते ।
    धाना भूमौ प्रलीयन्ते भूमिर्गन्धे प्रलीयते ॥ २२ ॥
    [श्लोक २२] विनाशाच्या वेळी प्राण्यांचे शरीर अन्नामध्ये, अन्न बीजामध्ये, बीज भूमीमध्ये आणि भूमी गंधतन्मात्रेमध्ये लीन होऊन जाते. (२२)


    म्यां पाहिल्या प्रळयदृष्टीं । पडोनि ठाके अनावृष्टी ।
    तेणें अन्न क्षीण होय सृष्टीं । अन्नापाठीं शरीर ॥ २२ ॥
    मी प्रळयाच्या दृष्टीने पाहिले असता अवर्षण पडून राहाते, आणि त्यामुळे सृष्टीत अन्न अत्यंत कमी होते. अन्न क्षीण झाले की मागोमाग शरीरही क्षीण होतें २२.


    येथ असे ‘अन्नमय प्राण’ । हें वचन प्रत्यक्ष प्रमाण ।
    ते अन्न होतांचि क्षीण । अन्नासवें प्राण प्राण्यांचे जाती ॥ २३ ॥
    येथे ' अन्नमय प्राण असतो ' हे वचन प्रत्यक्ष प्रमाण आहेच. तें अन्न कमी होतांच त्या अन्नाबरोबर प्राण्यांचे प्राणही निघून जातात २३.


    अन्नवृद्धि खुंटल्या धान्य । बीजमात्र राहे आपण ।
    तेंही पृथ्वीसी होय लीन । तत्काळ जाण उद्धवा ॥ २४ ॥
    अन्नाची वाढ खुंटली असतां धान्य हें स्वतः बीजरूपाने मात्र राहते. परंतु उद्धवा ! तेंही तत्काल पृथ्वीतच एकरूप होऊन जाते, हे लक्षात ठेव २४.


    तंव द्वादशादित्यमेळा । एकत्र होय रविमंडळा ।
    तो पीठ करी पर्वतशिळा । तेही तृणसाळा उरों नेदी ॥ २५ ॥
    तो इतक्यांत बारा सूर्याचा समुदाय सूर्यमंडळामध्ये एकत्र जमतो. तो पर्वत व दगडधोंडे यांचेही भस्म करून टाकतो आणि गवतकाडीही शिल्लक राहू देत नाही २५.


    तेणें तापलें सप्तपाताळ । पोळलें शेषाचें कपाळ ।
    तो वमी विषाग्निकल्लोळ । महाज्वाळ धडधडीत ॥ २६ ॥
    त्या योगाने सप्त पाताळें तापून जातात, आणि शेषाचे मस्तक होरपळतें. तो विषाग्निच्या ज्वाळा भडाभड ओकू लागतो, आणि त्यांचा मोठा जाळ धडाडू लागतो २६.


    तो संकर्षणमुखानळ । पार्थिव जाळी सकळ ।
    ब्रह्मांड जाळोनि तत्काळ । पृथ्वी केवळ भस्म करी ॥ २७ ॥
    तो शेषाच्या मुखांतून निघालेला अग्नि पृथ्वीवरील सर्व वस्तू जाळून टाकतो, आणि तत्काळ सर्व ब्रह्मांड जाळून पृथ्वी निखालस भस्म करून सोडतो २७.


    तेव्हां पृथ्वीचें पृथ्वीपण सरें । तें गंधमात्रस्वरूपें उरे ।
    तोही गंधू जळीं विरे । तेंचि शार्ङ्गधरें सांगिजे ॥ २८ ॥
    त्या वेळी पृथ्वीचे पृथ्वीपण संपते आणि ती गंधस्वरूपाने मात्र उरते. मग तो गंधही पाण्यामध्ये विरून जातो, तेच श्रीकृष्ण सांगतो २८.


    अप्सु प्रलीयते गन्ध आपश्च स्वगुणे रसे ।
    लीयते ज्तोतिषि रसो ज्योती रूपे प्रलीयते ॥ २३ ॥
    [श्लोक २३] गंध पाण्यामध्ये, पाणी आपला गुण जो रस त्यामध्ये, रस तेजामध्ये आणि तेज रूपामध्ये लीन होऊन जाते. (२३)


    तेव्हां प्रळयमेघांचा मेळा । शुंडादंडधारा प्रबळा ।
    शत वरुषें वर्षतां जळा । सप्तसमुद्रमेळा एकत्र जाहला ॥ २९ ॥
    त्या वेळी प्रळयमेघांचे मोठमोठे समुदाय शुंडादंडाप्रमाणे मोठमोठ्या धारांनी भयंकर वृष्टि करितात. अशा रीतीने शंभर वर्षांपर्यंत पाण्याचा वर्षाव होत असल्यामुळे सात समुद्रांचा समुदाय एकत्र होतो २९.


    तेणें जळ कोंडलें सुबद्ध । ते जळीं पृथ्वीचा विरे गंध ।
    तेव्हां जळचि एकवद । प्रळयीं प्रसिद्ध उधवलें पैं ॥ ५३० ॥
    त्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी तुंबून राहते, आणि त्या पाण्यांत पृथ्वीचा उरलेला गंधही विरून जातो, तेव्हां जिकडे तिकडे सारे एकत्र जमलेले पाणी प्रळयाला पूर्णपणे सिद्ध होते ५३०.


    सांवर्तक मेघांचें लक्षण । सिंधु एकत्र करिती पूर्ण ।
    पृथ्वी विरवूनियां जाण । ते जळीं आपण विरोनि जाती ॥ ३१ ॥
     सांवर्तक मेघांचे लक्षण असे आहे की, प्रळयकाळी ते सर्व समुद्र पूर्णपणे एकत्र करितात आणि पृथ्वीला विरवून त्याच पाण्यामध्ये आपण विरून जातात ३१.


    ते काळीं अतिदुर्धर । सांवर्ताग्नि खवळे थोर ।
    तो जळ शोषी सर्वत्र । उरे रसमात्र अवशेष ॥ ३२ ॥
    त्या वेळी अत्यंत भयंकर सांवर्त अग्नि क्षुब्ध होतो, आणि तो सर्व ठिकाणचे पाणी आटवून टाकून रस मात्र शिल्लक ठेवतो ३२.


    रसमात्र जळ उरे तेंही । लीन होय तेजाचे ठायीं ।
    तेव्हां तेजचि दिशा दाही । कोंदोनि पाहीं वोसंडे ॥ ३३ ॥
    मग रसरूपाने जे पाणी शिल्लक राहिलेले असते; तेंही तेजामध्ये लीन होऊन जातें, व त्या वेळी तें तेजच दाही दिशा भरून सांडूं लागते ३३.


    सांवर्ताग्नीची मातू । जळ शोषूनि राहे निवांतू ।
    जाळिती शक्ति स्वयें जाळितू । या नांव निश्चितू सांवर्तकाग्नी ॥ ३४ ॥
    त्य सांवर्ताग्नीची गोष्ट काय सांगावी ? तो ते जळ शोषण करून स्वस्थ रहातो असें नाही, तर आपली स्वतःची जी दाहकशक्ति ती स्वतः जाळतो, त्यामुळे त्याला खरोखर सांवग्नि असें नांव मिळाले आहे ३४.


    तेणेंचि काळें झंझामारुत । उठी तेजातें शोषित ।
    तें तेज शोषितां समस्त । उरे तेथ रूप मात्र ॥ ३५ ॥
    इतके झाल्यावर त्याच काळाच्या योगाने सोसाट्याचा वारा उत्पन्न होतो आणि तो त्या सर्व तेजाला शोषून टाकतो. ते सर्व तेज शोषले गेले असता तेथें रूप मात्र बाकी राहते ३५.


    रूपं वायौ स च स्पर्शे लीयते सोऽपि चाम्बरे ।
    अम्बरं शब्दतन्मात्र इन्द्रियाणिं स्वयोनिषु ॥ २४ ॥
    [श्लोक २४] इंद्रिये आपापल्या अधिष्ठात्या देवतांमध्ये आणि शेवटी राजस अहंकारामध्ये समाविष्ट होऊन जातात. (२४)


    तेजाचें जें उरे रूप । तें वायु शोषूनि करी अरूप ।
    तेव्हां वायूचि एकरूप । अतिअमूप कोंदाटे ॥ ३६ ॥
    तेजाचें जें रूप शिल्लक राहते, त्याला वायु शोषण करून निराकार करितो, तेव्हां जिकडे तिकडे एक वायूच वायु भरपूर भरून राहतो ३६.


    कोंदाटल्या वायुसी । गगन जेथींचें तेथें ग्रासी ।
    तेव्हा वायु प्रवेशे स्पर्शी । तो उरे अवशेषीं स्पर्शमात्र ॥ ३७ ॥
    मग त्या भरून राहिलेल्या वायूला आकाश जेथल्या तेथेच गिळून टाकतें, तेव्हां वायु स्पर्शाच्या रूपांत शिरून तो स्पर्शाच्या रूपानेच शिल्लक राहतो ३७.


    उरल्या वायूच्या स्पर्शासी । लयो तत्काळ होय आकाशीं ।
    आकाश प्रवेशे शब्दासी । उरे अवशेषीं शब्दतन्मात्र ॥ ३८ ॥
    त्या वायूच्या उरलेल्या स्पर्शस्वरूपाचा लय आकाशांत तत्काळ होऊन जातो. नंतर आकाश शब्दामध्ये प्रवेश करते, आणि तें शब्दतन्मात्र बाकी राहते ३८.


    दशेंद्रियांची मंडळी । राजसापासोनि जन्मली ।
    ते निजगुणीं सामावली । जेवीं पंचांगुळी मुष्टीमाजीं ॥ ३९ ॥
    मूठ वळली म्हणजे पांच बोटें जशी तिच्यांत लीन होतात, त्याप्रमाणे दहा इंद्रियांचा हा समुदाय राजसगुणापासून जन्मलेला असतो, तो त्या आपल्या गुणामध्ये जाऊन लुप्त होतो ३९.


    योनिर्वैकारिके सौम्य लीयते मनसीश्वरे ।
    शब्दो भूतादिमप्येति भूतादिर्महति प्रभुः ॥ २५ ॥
    [श्लोक २५] हे सौम्य ! राजस अहंकार आपला नियंता असलेल्या सात्विक अहंकाररूप मनामध्ये, शब्दतन्मात्रा महाभूतांचे कारण असलेल्या तामस अहंकारामध्ये आणि सर्व जगाला मोहित करण्यास समर्थ असलेला त्रिविध अहंकार, महतत्त्वामध्ये लीन होऊन जातो. (२५)


    वैकारिक जो सत्त्वगुण । व्याला देवता अंतःकरण ।
    प्रळयस्वभावें आपण । मनामाजीं जाण प्रवेशे ॥ ५४० ॥
    विकार पावलेला जो सत्त्वगुण असतो, तो देवता व अंतःकरण ही उत्पन्न करितो. तोही प्रळयाच्या स्वभावधर्माप्रमाणे स्वतः मनामध्ये प्रवेश करतो ५४०.


    सकळ इंद्रियांचा राजा मन । मनःकल्पना जीवशिवपण ।
    श्लोकपदें ‘मनसीश्वर’ पूर्ण । मनाशींच जाण हरि बोले ॥ ४१ ॥
    मन हा सर्व इंद्रियांचा राजा आहे. जीवपण आणि शिवपण ह्याही मनाच्याच कल्पना होत. श्लोकांतील 'मनसीश्वर' ह्या शब्दाने श्रीकृष्ण पूर्णपणे मनाविषयींच बोलत आहेत ४१.


    मनोदेवता अंतःकरण । घेऊनि प्रवेशे सत्त्वगुण ।
    ज्या कार्याचें जें कारण । तेथ तीं जाण प्रवेशती ॥ ४२ ॥
    मनोदेवता ही अंत:करणाला घेऊन सत्वगुणामध्ये प्रविष्ट होते. ज्या कार्याचे जे कारण असते तेथेंच ती जात असतात ४२.


    शब्दतन्मात्र उरलें आधीं । ते मीनलें तामसामधीं ।
    कारणीं कार्यासी अवधी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ ४३ ॥
    मग आधी उरलेले शब्दतन्मात्र असते, ते तामसामध्ये जाऊन एकरूप होतें. उद्धवा! कारणामध्येच कार्याचा खरोखर लय होतो, ही गोष्ट लक्षात ठेव ४३.


    त्रिविधगुणी अहंकारू । एकवटला महाथोरू ।
    ऐक त्याचा बडिवारू । तोचि दुर्धरू संसारीं ॥ ४४ ॥
    तीन गुणांनी युक्त असा अहंकार एकवटून मोठा बलाढ्य झालेला असतो. त्याचीही थोरवी ऐक. तोच संसारामध्ये महाकठिण आहे ४४.


    जो शिवातें महत्त्वा चढवी । जीवातें देहात्मता गोंवी ।
    अहंममता जग भुलवी । प्रभुत्वपदवी महत्त्वें येणें ॥ ४५ ।
    जो शिवाला महत्त्वाला चढवितो. जीवाला देहात्मतेमध्ये गुंतवून ठेवतो आणि अहंममतेने सर्व जगाला भुरळ घालितो, ह्या त्याच्या थोर सामर्थ्यामुळेच त्याची प्रतिष्ठा आहे ४५.


    अहंकारू ऐसा आहे । तो जैं परमार्थी साह्य होये ।
    तैं सोहंभावाचेनि लवलाहें । विभांडी पाहें संसारू ॥ ४६ ॥
    अहंकार हा असा आहे. तो जर परमार्थात साह्यकारी होईल, तर सोहंभावाच्या (ब्रह्म तेच मी ह्या भावनेच्या) योगाने तत्काळ संसाराचा फडशा करील पहा ! ४६.


    चोर जैं विश्वासू मित्र होये । तैं चोर चोरा निवारी पाहें ।
    तेवीं अभिमानू जैं साह्य होये । तैं भवभय बाधीना ॥ ४७ ॥
    चोरच जेव्हां विश्वासू मित्र होतो, तेव्हा तो चोरच इतर चोरांचे निवारण करतो. त्याप्रमाणे अभिमानच जेव्हा सहाय होतो, तेव्हां संसाराचे भयही बाधत नाही ४७.


    याहीपरी अभिमान । सामर्थ्यें अतिगहन ।
    यालागीं प्रभुत्वें जाण । केलें व्याख्यान उद्धवा ॥ ४८ ॥
    उद्धवा ! याप्रमाणे अभिमान हा सामर्थ्याने संपन्न झालेला असल्यामुळेच मी त्याचे वर्णन थोरपणाने सांगितले ४८.


    त्रिगुणगुणीं गुणाभिमान । एकत्र होऊनियां पूर्ण ।
    महत्तत्त्वीं होय लीन । अतिसुलीन तद्‌रूपें ॥ ४९ ॥
    तीन गुणांपासून झालेला जो हा गुणाभिमान, तो पूर्णपणे एकत्र होऊन महत्तत्वामध्ये लीन होतो व त्याच्याशी अगदी एकात्मता पावतो ४९.


    स लीयते महान्स्वेषु गुणेषु गुणवत्तमः ।
    तेऽव्यक्ते संप्रलीयन्ते तत्काले लीयतेऽव्यये ॥ २६ ॥
    [ श्लोक  २६] हे सौम्य ! राजस अहंकार आपला नियंता असलेल्या सात्विक अहंकाररूप मनामध्ये, शब्दतन्मात्रा महाभूतांचे कारण असलेल्या तामस अहंकारामध्ये आणि सर्व जगाला मोहित करण्यास समर्थ असलेला त्रिविध अहंकार, महतत्त्वामध्ये लीन होऊन जातो. (२५)


    तेंही महत्तत्त्व येथें । कारणगुणीं लीन होतें ।
    तेंही गुणसाम्यें निश्चितें । पावे लयाते अव्यक्तीं ॥ ५५० ॥
     ह्या वेळी ते महत्तत्वही कारणगुणांमध्ये लीन होते, आणि गुणसाम्याने खरोखर अव्यक्तामध्ये (मूळ मायेमध्ये ) लीन होतें ५५०.


    आकारविकार समस्त । हारपोनि जाती जेथ ।
    उरे बीजमात्र अवशेषित । त्या नांव अव्यक्त बोलिजे ॥ ५१ ॥
    त्या वेळी सर्व आकार-विकार जेथें नाहीसे होऊन जातात, तेथे बीज मात्र अवशेष बाकी राहते, त्यालाच 'अव्यक्त' असे म्हणतात ५१.


    वटाचा आकारविकार । ना शेंडा मूळ पुष्प पत्र ।
    उरे अवशेष बीजमात्र । तेवीं संसार अव्यक्तीं ॥ ५२ ॥
    वडाचा आकार नाहीं, विकार नाही, शेंडा नाहीं, मूळ नाही, पान नाही, फूल नाहीं, अवशेष बी मात्र शिल्लक रहावें, त्याप्रमाणेच संसार हा अव्यक्तांत राहतो ५२.


    वटबीज उरलें येथ । तें दृष्टीसी तर्केना निश्चित ।
    तेवीं भवबीज जें अव्यक्त । तें नव्हे व्यक्त जीवासी ॥ ५३ ॥
    जे वडाचें बी राहिलेले असते, ते खरोखर डोळ्यांना दिसतसुद्धा नाही. तसेंच जें संसाराचे बीज अव्यक्तच असते, ते जीवाला उघड दिसत नाही ५३.


    नाना तृणजातिबीज गहन । उष्णकाळीं काळ करी लीन ।
    तेवीं भवबीज अव्यक्त जाण । होय सुलीन काळेंसीं ॥ ५४ ॥
    अनेक प्रकारच्या गवतांच्या जातींचे बीज उन्हाळ्यामध्ये काळ अगदीं जमीनदोस्त करून टाकतो त्याप्रमाणे अव्यक्त असणारे संसारबीजही काळाशी एकरूप होऊन जातें ५४.


    पूर्वीं काळें क्षोभोनि अव्यक्त । जगदाकारें केलें व्यक्त ।
    तेचि काळयोगें अव्यक्त । सुलीन होत काळेंसीं ॥ ५५ ॥
    पूर्वी काळानें क्षुब्ध होऊन जें अव्यक्त होते तेच जगाच्या आकाराने व्यक्त केले होते, तेच अव्यक्त काळाच्या योगाने काळाशींच एकरूप होऊन जाते ५५.


    या नांव अव्यक्ताचा पहा हो । काळामाजीं बोलती लयो ।
    काळ बोलिजे महाबाहो । त्याचा होय व्ययो पुरुषेंसीं ॥ ५६ ॥
    अहो पहा ! ह्यालाच अव्यक्ताचा काळामध्ये लय असें म्हणतात. काळालाच महाबाहु असें म्हणतात. त्याचा लय पुरुषामध्ये होतो ५६.


    कालो मायामये जीवे जीव आत्मनि मय्यजे ।
    आत्मा केवल आत्मस्थो विकल्पापायलक्षणः ॥ २७ ॥
    [श्लोक २७] काल मायामय जीवामध्ये आणि जीव माझ्यामध्येअजन्मा परमात्म्यामध्ये लीन होऊन जातो. आत्मा मात्र आपल्या स्वरूपातच स्थित राहातो तो विश्वाची उत्पत्ती आणि लय यांच्या अधिष्ठानामुळे जाणला जातो. (२७)


    पुरुषाची पूर्ण क्षोभकता । तोचि काळ बोलिजे तत्त्वतां ।
    उत्पत्ति-स्थिति-प्रलयांता । तिनी अवस्था काळाच्या ॥ ५७ ॥
    पुरुषाची जी पूर्ण क्षुब्धावस्था तिलाच खरोखर काळ म्हणतात. उत्पत्ति, स्थिति आणि प्रळय या तिन्ही अवस्था काळाच्याच आहेत ५७.


    तिनी अवस्था लोटल्या ठायीं । काळासी कर्तव्यता नाहीं ।
    तो उपजत व्यापारें पाहीं । जीवाचे ठायीं सामावे ॥ ५८ ॥
    या तिन्ही अवस्था संपल्या, म्हणजे त्या ठिकाणी काळाचे काहीच काम नसते. म्हणून तो स्वाभाविक व्यापारानेच जीवामध्ये एकरूप होतो ५८.


    अचेतनीं चेतविता । जडातें जो जीवविता ।
    यालागीं जीवू ऐशी वार्ता । जाण तत्त्वतां पुरुषासी ॥ ५९ ॥
    जो अचेतनाला चेतना देणारा व जडाला सजीव करणारा आहे, त्या पुरुषाला ह्याच गुणांमुळे जीव अशी संज्ञा आहे ५९: 


    प्रकृतीचेनि योगें जाण । शुद्धासी बोलिजे जीवपण ।
    पुरुषू हेंही अभिधान । त्यासीच जाण बोलिजे ॥ ५६० ॥
    प्रकृतीच्या योगाने शुद्धालाच जीव असें म्हणतात, त्यालाच पुरुष हें नांव देतात, हे लक्षात ठेव ५६०.


    करितां प्रकृतिविवंचन । केवळ मृगजळासमान ।
    दिसे परी साचपण । सर्वथा जाण असेना ॥ ६१ ॥
    प्रकृतीचा विचार केला, तर ती केवळ मृगजळासारखी आहे. ती प्रत्यक्ष दिसते, पण तिला खरेपणा मुळीच नाही ६१.


    मृगजळामाजीं जो पडे । तेथ जळ नाहीं मा तो कोठें बुडे ।
    तेवीं प्रकृति नसतां जोडे । वाडेंकोडें जीवत्व कोणा ॥ ६२ ॥
    मृगजळामध्ये जो पडेल, तो तेथे पाणीच नाही, मग बुडणार कोठे ? त्याप्रमाणे प्रकृति नसतांनाच आवडीने जीवपणा कोणाला जोडणार ? ६२.


    जळीं बुडालें दिसे व्योम । सत्य मानणें तो मूर्खधर्म ।
    तैसें रूप नाम गुण कर्म । हा मिथ्या भ्रम मायिक ॥ ६३ ॥
    समुद्राकडे पाहूं लागले असतां पाण्यामध्ये आकाश बुडालेले दिसते, पण तें खरें मानणे हा मूर्खपणा आहे. त्यांप्रमाणे रूप, नाम, गुण, कर्म हा सर्व मायेचा भ्रम आहे ६३.


    प्रकृतिकाळींही जाण । सत्य नाहीं जीवपण ।
    तेही अर्थींची निजखूण । उद्धवा संपूर्ण अवधारीं ॥ ६४ ॥
    उद्धवा ! प्रकृतीच्या अस्तित्वकाळामध्येसुद्धा जीवपणा खरा नाही. त्यासंबंधींचाही खरा प्रकार पूर्णपणे सांगतों, ऐक ६४.


    स्वयें अवलोकितां दर्पण । दर्पणामाजीं दिसे आपण ।
    तरी आपुलें वेगळेपण । स्वयें आपण जाणीजे ॥ ६५ ॥
    आपण आरशांत पाहू लागलों असतां आरशांत आपण स्वतःच दिसतो. तरी आपण ते वेगळे आहोच असे आपण समजतोंच ६५, 


    तेवीं प्रकृतिकर्म करितां । जरी दिसे प्रकृतिआंतौता ।
    तरी मी प्रकृतीपरता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ६६ ॥
    त्याप्रमाणेच उद्धवा ! प्रकृतीच्या अनुरोधाने कर्म करीत असतां मी जरी तिच्या आंत आहे असा दिसतो, तरी मी खरोखर प्रकृतीहून भिन्नच आहे, हे तू लक्षात ठेव ६६.


    दिसे व्योम जळीं बुडालें । परी तें नाहीं वोलें झालें ।
    तेवीं प्रकृतिकर्म म्यां केलें । नाही माखलें ममांग ॥ ६७ ॥
    आकाश पाण्यामध्ये बुडालेले दिसते, परंतु तें कांहीं ओलें होत नाही. त्याप्रमाणे प्रकृतीचे कर्म जरी मी केले, तरी माझे अंग कांही त्या योगाने माखत नाहीं ६७.


    यापरी करितां निर्वाहो । प्रकृतीचा झाला अभावो ।
    तेव्हा जीवशिवनांवें वावो । जीव तोचि पहा हो परमात्मा ॥ ६८ ॥
    याप्रमाणे विचार केला असता प्रकृतीचाच अभाव होऊन जातो व त्यामुळे जीव आणि शिव ही नावेही व्यर्थ होऊन जातात. कारण, अहो ! जो जीव तोच परमात्मा आहे हे लक्षात ठेवा ६८.


    जीवाचें गेलिया जीवपण । सहजेंचि उडे शिवपण ।
    दोघेही आत्मत्वें जाण । होती परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ६९ ॥
    जीवाचे जीवपण गेले असतां सहजच शिवपणही नाहीसे होते. आणि दोघेही पूर्णपणे आत्मस्वरूपाने परिपूर्ण होतात ६९.


    जीवासी निजस्वरूप आठवो । या नांव जीवाचा परब्रह्मीं लयो ।
    परमात्मा अज अव्ययो । अविनाश अद्वयो अनंत ॥ ५७० ॥
    जीवाला आत्मस्वरूपाची आठवण होणे, ह्याचंच नाव जीवाचा परब्रह्मांत लय होणे होय. तो परमात्मा अजन्मा, अव्यय, अविनाशी, अद्वय आणि अनंत असा आहे ५७०.


    ब्रह्मीं स्फुरेना ब्रह्मपण । तेथ ‘मी तूं’ म्हणे कोण ।
    परमानंद परिपूर्ण । उरे जाण उद्धवा ॥ ७१ ॥
    ब्रह्मामध्ये ब्रह्मस्वरूपाचेच जर मुळी स्फुरण होत नाही, तर तेथे 'मी' आणि ' तूं  ' म्हणणार तरी कोण ! उद्धवा ! त्या वेळी परिपूर्ण परमानंदच शिल्लक उरतो ७१. 


    ऐसा परमानंद म्हणसी कोण । तो मी अज अव्यय श्रीकृष्ण ।
    आनंदस्वरूप तो मी जाण । मजवेगळें स्थान असेना ॥ ७२ ॥
    असा परमानंद कोणता? असें म्हणशील, तर अज, अव्यय, आनंदस्वरूप असा जो मी श्रीकृष्ण, तोच मी परमानंदस्वरूप आहे असे समज. त्या परमानंदाला माझ्याशिवाय दुसरी जागाच नाहीं ७२.


    ज्या स्वानंदा नांव श्रीकृष्ण । तें तुझें स्वरूप उद्धवा जाण ।
    तेथ नाहीं गा मीतूंपण । परम कारण उर्वरित ॥ ७३ ॥
    उद्धवा ! आणखी ज्या स्वानंदाला श्रीकृष्ण असें नाव आहे, तेंच तुझेही स्वरूप आहे. त्यामध्ये मीतूंपणा नाही. केवळ परमकारण मात्र उरलेले असते ७३.


    उद्धवा जीवाचा जीव मी श्रीकृष्ण । मज तुज नाहीं वेगळेपण ।
    यालागीं जीवाची हे निजखूण । परम कारण सांगीतले ॥ ७४ ॥
    उद्धवा ! तुझ्या जीवाचा जीव तोच मी श्रीकृष्ण आहे. माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये काही वेगळेपणा नाही. म्हणूनच जीवाचें परम कारण अशी ही माझी खूण तुला सांगितली ७४.


    जगाचा आत्मा श्रीकृष्ण । त्या माझा आत्मा तूं उद्धव पूर्ण ।
    हें ऐकोनि श्रीकृष्णवचन । उद्धव जाण गजबजिला ॥ ७५ ॥
    मी श्रीकृष्ण सर्व जगाचा आत्मा आहे; त्या माझा पूर्ण आत्मा तूं उद्धव आहेस. हें कृष्णाचे भाषण ऐकून उद्धव गोंधळांत पडला ७५.


    कृष्ण मज म्हणे आपुला आत्मा । परी मी नेणें कृष्णमहिमा ।
    अगाध लीला पुरुषोत्तमा । ते केवीं आम्हां आकळे ॥ ७६ ॥
    कृष्ण मला आपला आत्मा असें म्हणतो खरा, परंतु कृष्णाचा महिमासुद्धा मी जाणत नाही. पुरुषोत्तमाची लीला अगाध आहे. ती आम्हांला कळणार कशी ? ७६.


    नाथिलेंचि उद्धवपण । माझ्या अंगीं जडलें जाण ।
    कृष्णविवेकें पाहतां पूर्ण । माझें मीपण दिसेना ॥ ७७ ॥
    नसतेच उद्धवपण माझ्या अंगी जडलेले आहे, पण कृष्णाच्या विचाराने नीट पाहिले असता माझा मीपणा दिसत नाही ७७. 


    मज उद्धवपण सांडितां । कृष्ण निजधामा जाईल तत्त्वतां ।
    ते न साहवे अवस्था । सखेदता सप्रेम ॥ ७८ ॥
    मी आपला उद्धवपणा सोडून दिला. तर कृष्ण खरोखर निजधामाला जाईल. ती खेदयुक्त प्रेमावस्था कांही मला सहन करवणार नाहीं ७८.


    हे उद्धवाची अवस्था । कळों सरली श्रीकृष्णनाथा ।
    तेचि अर्थीची हे कथा । शब्दार्थता निरूपी ॥ ७९ ॥
    ही उद्धवाची अवस्था श्रीकृष्णाला कळून आली म्हणून त्यासंबंधीचीच ही कथा तो शब्दार्थरूपाने सांगू लागला ७९.


    एवं अन्वीक्षमाणस्य कथं वैकल्पिको भ्रमः ।
    मनसो हृदि तिष्ठेत व्योम्नीवार्कोदये तमः ॥ २८ ॥
    [श्लोक २८]
    प्रकृति-पुरुषविवंचन । आदि मध्य अवसान ।
    तुज म्यां दाविलें एकपण । तेथ कां भिन्नपण कल्पिसी वायां ॥ ५८० ॥
    प्रकृतिपुरुषांचे विवेचन करून मी तुला आदि, मध्य आणि अंत या तिन्ही अवस्थांत ऐक्य असल्याचे दाखवून दिले. मग त्यांत व्यर्थ भिन्नपणा कां मानतोस ? ५८०.
    उत्पत्तिआदि ब्रह्म पूर्ण । उत्पत्तीसी तेंचि कारण ।
    जग जन्मलें जे सगुण । तेहीं ब्रह्मरूपें जाण दाविलें तुज ॥ ८१ ॥
    उत्पत्तीच्या आधीही पूर्ण ब्रह्मच असते. उत्पत्तीला तेच कारण होते आणि जें  जग दृश्य आकारानें जन्मास आले आहे. तेही ब्रह्मस्वरूपच होय, हेही मी तुला दाखवून दिले ८१.
    आणी प्रळयाच्या अंतीं । ब्रह्मचि उरे निजस्थिती ।
    तेही विखींची प्रतीती । तुज म्यां निश्चितीं दाविली ॥ ८२ ॥
    आणखी प्रळयाच्या शेवटीं ब्रह्मच जशाचे तसे शिल्लक राहते, त्याविषयींचाही अनुभव तुला निश्चितपणे दाखवून दिला ८२.
    प्रकृतिहूनि पुरुष भिन्न । प्रकृति स्वातंत्र्यें मिथ्या जाण ।
    ऐसें प्रकृतिपुरुष ज्यासी ज्ञान । त्यासी मीतूंपण भासेना ॥ ८३ ॥
    प्रकृतीहून पुरुष हा भिन्न आहे. प्रकृति ही स्वतंत्र रीतीने पाहू लागले तर मिथ्या होय. असें  प्रकृतिपुरुषांचे ज्ञान ज्याला होते, त्याला मीतूंपणा भासतच नाही ८३.
    जेथ नाहीं मीतूंपण । तेथ विकल्प कल्पी कोण ।
    आद्यंती वस्तु पूर्ण । हें विवेकज्ञान जयासी ॥ ८४ ॥
    तेथें मीतूंपणच नाही, तेथें विकल्पाची कल्पना कोण करणार ? सृष्टीच्या आदिअंती परब्रह्मच परिपूर्ण आहे असें ज्ञान ज्याला विचाराने प्राप्त होते ८४,
    जो विवेक पुरुषप्रकृती । सांख्य जागे ज्याचे चित्तीं ।
    त्यासी विकल्पाची प्राप्ती । नव्हे कल्पांतीं उद्धवा ॥ ८५ ॥
    पुरुषप्रकृतीचा जो विचार आणि त्यांचे जे सांख्यतत्त्वज्ञान, ते ज्याच्या मनांत जागृत असते, त्याच्या मनात हे उद्धवा ! कल्पांतीसुद्धा विकल्पाची उत्पत्ति होत नाही ८५.
    सांख्यविवेकगभस्ती । पूर्ण उगवला ज्याचे चित्तीं ।
    तेथ विकल्पाची अंधारीं राती । कैशा रीतीं उरेल ॥ ८६ ॥
    ज्याच्या मनांत हा प्रकृतिपुरुषांचा विचाररुपी सूर्य पूर्णपणे उदय पावला, त्या ठिकाणी विकल्परूप अंधाराची रात्र कोणत्या रीतीने राहील? ८६.
    ज्यासी पटुतर सांख्यज्ञान । विकल्प विसरे त्याचें मन ।
    हृदयीं उगवे चिद्‌भान । अज्ञाननिशा पूर्ण निरसूनी ॥ ८७ ॥
    ज्याला प्रकृतिपुरुषाचे अत्युत्तम ज्ञान आहे, त्याचे मन विकल्पाला विसरूनच जाते. त्याच्या अंत:करणांत ज्ञानरूपी सूर्य अज्ञानरात्र पूर्णपणे नष्ट करून उदय पावतो ८७.
    जेथ निरसलें अज्ञान । तेथ विकल्पाचें कैंचें स्थान ।
    यापरी सांख्यज्ञान । साधकां पूर्ण उपकारी ॥ ८८ ॥
    ज्या ठिकाणचे अज्ञानच नाहीसे होते, तेथें विकल्पाचा ठाव कोठचा? अशा प्रकारे हा सांख्यतत्त्वविचार साधकांवर फार उपकार करणारा आहे ८८.
    जें साराचें निजसार । जें गुह्यज्ञानभांडार ।
    जें कां विवेकरत्ना कर । तें सांख्या साचार उद्धवा ॥ ८९ ॥
    उद्धवा ! जें साराचेही सार, जे गुणज्ञानाचे भांडार, जे विचाररत्नांचा समुद्र, तेच खरोखर सांख्यशास्त्र होय ८९.
    एष सांख्यविधिः प्रोक्तः संशयग्रन्थिभेदनः ।
    प्रतिलोमानुलोमाभ्यां परावरदृशा मया ॥ २९ ॥
    इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
    एकादशस्कन्धे चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥
    [श्लोक २९]
    मी विवेकाचा विवेकू । मी अर्काचा आदिअर्कू ।
    मी ज्ञानियांचा ज्ञानतिलकू । त्या माझा परिपाकू तें हें सांख्य ॥ ५९० ॥
    मी विचाराचा विचार आहे, मी सूर्याचा आदिसूर्य आहे. मी ज्ञान्यांचा ज्ञानरूपी मुगुटमणि आहे त्या माझी जी पूर्णावस्था, ते हे सांख्य मत होय ५९०. 
    मी वेदांचा आदिवेदू । मी बोधाचा आदिबोधू ।
    मी आनंदाचा निजानंदू । त्या माझा प्रबोधू तें हें सांख्य ॥ ९१ ॥
    मी वेदांचा आदिवेद, मी उपदेशाचा आद्य उपदेश माणि मी आनंदाचा आत्मानंद आहे. त्या माझा ज्ञानोपदेश तेच हे सांख्यतत्त्वज्ञान होय ९१.
    तेणें म्यां सर्वज्ञें श्रीकृष्णें । निर्धारोनि निजज्ञानें ।
    सांख्ययोगौपलक्षणें । ब्रह्म अव्ययपणें दाविलें ॥ ९२ ॥
    त्या मी सर्वज्ञ श्रीकृष्णाने आत्मज्ञान स्पष्ट करून सांख्ययोगाच्या साधनाने अव्ययपणाने ब्रह्मही दाखवून दिले ९२.
    जेवीं गरगरीत वाटोळा । करतळीं दिसे आंवळा ।
    तेवीं सांख्ययोगलीळा । ब्रह्म तुज डोळां दाविलें ॥ ९३ ॥
    ज्याप्रमाणे तळहातावर गरगरीत वाटोळा आंवळा दिसतो, त्याप्रमाणेच सांख्ययोगाच्या साधनाने प्रत्यक्ष परब्रह्म तुला तुझ्या डोळ्यांनी दाखवून दिले ९३.
    जो ब्रह्म डोळां देखों जाये । तो सर्वांगें देखणा होये ।
    ऐशी सांख्यज्ञान निजसोये । तुज म्यां पाहें दाविली ॥ ९४ ॥
    जो डोळ्यांनी ब्रह्म पहावयाला जातो, तो सर्वागांनींच पाहणारा (तन्मयच) होतो, अशी सांख्यज्ञानाची गुरुकिल्ली मी तुला दाखवून दिली ९४.
    हा सांख्ययोग अनुक्रम । अन्वयव्यतिरेकें उपक्रम ।
    आलोडितां आकळे वर्म । अखंड ब्रह्म अद्वय ॥ ९५ ॥
    हा सांख्ययोगाचा अनुक्रम अन्वय-व्यतिरेकाने नीट विचार करून पाहिला असतां ब्रह्म हें  अखंड असून अद्वयच आहे, हे रहस्य कळून  येते ९५.
    उत्पत्ति-स्थिति-प्रळयांत । ब्रह्म अखंड निज नित्य ।
    हेंचि सांख्ययोगें प्राप्त । जाण निश्चित साधकां ॥ ९६ ॥
    उत्पत्तींत, स्थितीत किंवा प्रळयांत ब्रह्म हे अखंड आणि स्वतः नित्य आहे, हेंच ज्ञान साधकांना खरोखर सांख्ययोगानें प्राप्त होते ९६.
    ज्यांसी ब्रह्मज्ञानाचें कोड । ते सांख्ययोग पुरवी चाड ।
    लिंगदेहाचें सुदृढ झाड । त्याचें समूळ बूड उन्मळी ॥ ९७ ॥
    ज्यांना ब्रह्मज्ञानाची हौस असते, ती त्यांची हौस सांख्ययोग पुरी करतो. आणि लिंगदेहाचे जे बळकट झाड फोफावलेले असते, त्याचे बूड तो समूळ उन्मळून पाडतो ९७.
    लिंगदेह अत्यंत कठिण । तें सांख्ययोगापुढें जाण ।
    जेवीं अग्नीमाजीं तृण । तेवीं होय संपूर्ण भस्मांत ॥ ९८ ॥
    लिंगदेह अत्यंत कठीण आहे खरा पण ज्याप्रमाणे अग्नीत गवत पडावे , त्याप्रमाणे सांख्ययोगापुढे त्याची पूर्णपणे राखरांगोळी उडून जाते ९८.
    लिंगदेह सैंधवगिरिवर । सांख्या अत्यंत प्रळयसागर ।
    खवळला विरवूनि करी नीर । एकाकार निजात्मता ॥ ९९ ॥
    लिंगदेह हा मिठाचा एक प्रचंड पर्वत आणि सांख्य हा प्रळयकाळाचा तुफान समुद्र आहे. तो समुद्र एकदा खवळला की आपल्या पाण्यांत त्या पर्वताला विरवून आपल्याप्रमाणेच सर्व एकाकार पाणीच पाणी करून सोडतो ९९.
    खवळल्या अत्यंत चित्सागरा । नाना संशयजळगारा ।
    उरावया नाहीं थारा । निजनिर्धारा उद्धवा ॥ ६०० ॥
    उद्धवा ! हा ज्ञानसमुद्र एकदा खवळला, की मग अनेक प्रकारच्या संशयरूप गारा शिल्लक उरावयाला खरोखर जागाच राहात नाही ६००. ​

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...