मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २४ ओव्या २०१ ते ३००
सूर्यसर्वग्रासाचिया गोठी । जगीं एक बोंब उठी ।
शेखीं रवि-राहूंसी नाहीं भेटी । स्पर्शही शेवटीं असेना ॥ १ ॥
सूर्याचे खग्रास ग्रहण म्हटले की, जगांत एकच हाहाकार उठतो. परंतु वास्तविक सूर्य व राहु यांची भेटही होत नाही, आणि अखेरपर्यंत त्यांचा एकमेकांना स्पर्शही होत नाही १.
ग्रहचक्र वेगें चळतां पाहीं । रविचंद्रादिकां चालणें नाहीं ।
ते निश्चळ निजराज्याच्या ठायीं । न चालतां पाहीं चालती ॥ २ ॥
ते निश्चळ निजराज्याच्या ठायीं । न चालतां पाहीं चालती ॥ २ ॥
ग्रहमंडळ वेगानें पूर्वेकडून पश्चिमेकडे जातांना दिसले, तरी सूर्यचंद्रादिकांना कांहीं वास्तविक तशी गति नसते. ते आपापल्या अधिकारांच्या मर्यादेतच निश्चितपणे असतात (नक्षत्रमंडळांतील अनुक्रमाप्रमाणेच पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असतात.) ते पूर्वेकडून पश्चिमेकडे वास्तविक चालत नसताही ते तसेच चालतात असें केवळ भासते २.
रविलोकाहूनि वरी । चंद्रलोक लक्षांतरीं ।
चंद्रलोकाहूनि दूरी । लक्षांतरीं तारालोक ॥ ३ ॥
चंद्रलोकाहूनि दूरी । लक्षांतरीं तारालोक ॥ ३ ॥
सूर्यलोकापासून लक्षावधि योजनें वर चंद्रलोक आहे (तैत्तिरीय संहिता, तैत्तिरीय ब्राह्मण आणि श्रीमद्भागवत ह्यांत अशी कल्पना आहे ). चंद्रलोकापासून वर लक्षावधि योजने अंतरावर तारालोक आहे ३.
तारालोकाहूनि वरी । बुधलोक दों लक्षांतरीं ।
बुधलोकाहूनि वरी । दों लक्षांतरीं शुक्रलोक ॥ ४ ॥
बुधलोकाहूनि वरी । दों लक्षांतरीं शुक्रलोक ॥ ४ ॥
तारालोकाहून वर दोन लक्ष योजने अंतरावर बुधलोक आहे. बुधलोकापासून वर दोन लक्ष योजने अंतरावर शुक्रलोक आहे ४.
मिळोनियां दैत्यगण । ज्याच्या चरणां येती शरण ।
नित्य घालिती लोटांगण । तो शुक्राचार्य जाण दैत्यगुरु ॥ ५ ॥
नित्य घालिती लोटांगण । तो शुक्राचार्य जाण दैत्यगुरु ॥ ५ ॥
सर्व दैत्य एकत्र जमून ज्याच्या चरणीं शरण येतात आणि नित्य लोटांगणे घालतात, तोच दैत्यांचा गुरु हा शुक्राचार्य होय ५.
शुक्रलोकाहूनि दों लक्षांतरीं । भौमलोक वसे अंबरीं ।
भौमलोकाहूनि दों लक्षांतरीं । देवगुरु करी निजवासू ॥ ६ ॥
भौमलोकाहूनि दों लक्षांतरीं । देवगुरु करी निजवासू ॥ ६ ॥
शुक्र लोकांपासून वर दोन लक्ष योजने अंतरावर मंगळलोक आकाशांत आहे. मंगळलोकापासून वर दोन लक्ष योजने अंतरावर देवगुरु वसति करितो ६.
ज्याचे चरण वंदिती देख । इंद्रचंद्रवरुणादि अर्क ।
नित्य येती आवश्यक । तो बृहस्पतिलोक गुरूचा ॥ ७ ॥
नित्य येती आवश्यक । तो बृहस्पतिलोक गुरूचा ॥ ७ ॥
इंद्र, चंद्र, वरुण, सूर्य, इत्यादि देव आदरपूर्वक नित्य येऊन ज्याचे चरण वंदन करितात, त्याच गुरुचा तो बृहस्पतिलोक होय ७.
त्याहिवरी लक्ष दोनी । सूर्यसुत वसे शनी ।
लक्षांतरें तेथूनी । सप्तऋषिजनीं निवासू ॥ ८ ॥
लक्षांतरें तेथूनी । सप्तऋषिजनीं निवासू ॥ ८ ॥
त्याच्याही वर दोन लक्ष योजने अंतरावर सूर्यपुत्र शनि वसति करितो. त्याच्यापासून वर एक लक्ष योजने अंतरावर सप्तऋषींचे निवासस्थान आहे ८.
सप्तऋषींची ऋषिपंक्ती । तेथेंचि वसे अरुंधती ।
यावरी वसे अमरावती । इंद्रसंपत्तीसमवेत ॥ ९ ॥
यावरी वसे अमरावती । इंद्रसंपत्तीसमवेत ॥ ९ ॥
ससऋषींचा समुदाय जेथे राहातो, तेथेच अरुंधती राहाते. आणि त्याच्याही वर इंद्राच्या वैभवाने सुशोभित अशी अमरावती वसलेली आहे ९.
जेथ अंगें वसे इंद्र जाण । ऐरावती आरोहण ।
पार्षदगण मरुद्गण । सुरसेना जाण जयाची ॥ २१० ॥
पार्षदगण मरुद्गण । सुरसेना जाण जयाची ॥ २१० ॥
जेथें इंद्र स्वतः राहातो, ऐरावतावर आरोहण करितो, मरुद्रण हे ज्याचे सभासद आहेत, देवसमुदाय हेच ज्याचे सैन्य आहे २१०,
उच्चैःश्रवा वारू जाण । कल्पतरूंचें उद्यान ।
कामधेनूंचें गोधन । नंदनवन क्रीडेसी ॥ ११ ॥
कामधेनूंचें गोधन । नंदनवन क्रीडेसी ॥ ११ ॥
जेथें उच्चैःश्रवा हा घोडा आहे, कल्पतरूंचीच मनोहर बाग आहे, कामधेनूंचे खिल्लार आहे, आणि क्रीडेसाठी नंदनवन आहे ११,
जेथींच्या पायर्या चिंतामणी । रंभा उर्वशी विलासिनी ।
अष्टनायिका नाचणी । ज्याच्या रंगणीं नांदती ॥ १२ ॥
अष्टनायिका नाचणी । ज्याच्या रंगणीं नांदती ॥ १२ ॥
जेथील पायऱ्या चिंतामणीच्या आहेत, जेथें रंभा-उर्वशीसारख्या विलासिनी स्त्रिया आहेत, अष्टनायिका नृत्यांगना होऊन ज्याच्या रंगसमेंत नृत्य करीत असतात १२,
येणें वैभवें अमरावती । इंद्र तेथील अधिपती ।
येथूनि स्वर्गाचि समाप्ती । त्रैलोक्य निश्चितीं या नांव ॥ १३ ॥
येथूनि स्वर्गाचि समाप्ती । त्रैलोक्य निश्चितीं या नांव ॥ १३ ॥
अशा त्या इंद्राच्या वैभवाने अमरावती सजलेली असून इंद्र हा तेथील अधिपति आहे. येथे स्वर्गाची सीमा संपली. ह्याचंच नांव खरोखर त्रैलोक्य १३.
आतां त्रैलोक्यबाहेरी । एक लक्ष योजनांवरीं ।
भक्तकृपाळू श्रीहरी । ध्रुवमंडळ करी कृपेने ॥ १४ ॥
भक्तकृपाळू श्रीहरी । ध्रुवमंडळ करी कृपेने ॥ १४ ॥
आता ह्या त्रैलोक्याच्या बाहेर एक लक्ष योजने अंतरावर भक्तवत्सल श्रीहरीने आपल्या कृपेनें ध्रुवमंडळ निर्माण केले आहे १४.
त्रिलोकीं होतां प्रलयकाळ । ध्रुवासी कदा नव्हे चळ ।
तो सर्वदा अचळ । यालागीं अढळ ध्रुवपद ॥ १५ ॥
तो सर्वदा अचळ । यालागीं अढळ ध्रुवपद ॥ १५ ॥
त्रैलोक्यांत प्रळयकाळ झाला असतांही ध्रुवाला कधीही आपल्या स्थानापासून ढळावे लागत नाही. तो सदोदित अचलच असतो. म्हणून ध्रुवपद अढळ आहे असे म्हणतात १५,
पृथ्वीपासोनि कोटि योजन । महर्लोक वसे जाण ।
तेथ वसती कल्पायु जन । तें वसतिस्थान तयांचें ॥ १६ ॥
तेथ वसती कल्पायु जन । तें वसतिस्थान तयांचें ॥ १६ ॥
पृथ्वीपासून एक कोटि योजने अंतरावर महर्लोक आहे हे लक्षात ठेव, तेथें कल्पापर्यंत आयुष्य असणारे लोक राहातात. तेच त्यांचे वसतिस्थान होय १६.
तेथूनि कोटि योजनें देख । वरुता असे जनोलोक ।
तेथ वसती सनकादिक । ऊर्ध्वरेते देख महायोगी ॥ १७ ॥
तेथ वसती सनकादिक । ऊर्ध्वरेते देख महायोगी ॥ १७ ॥
आणखी पहा ! तेथून वर एक कोटि योजने अंतरावर जनोलोक आहे. तेथें जितेंद्रिय व महायोगी असे सनकादिक राहातात १७.
तेथूनि दोन कोटि अधिक । वसताहे तपोलोक ।
तेथील निवासी आवश्यक । वैराजदेव देख तपस्वी ॥ १८ ॥
तेथील निवासी आवश्यक । वैराजदेव देख तपस्वी ॥ १८ ॥
तेथून पुढे दोन कोटि योजने अंतरावर तपोलोक तपस्वी वैराजदेव हेच तेथील खरोखर रहिवासी होत १८.
तपोलोकाहूनि देख । चौकोटी उंच अधिक ।
तेथ वसताहे सत्यलोक । तेथील नायक चतुरानन ॥ १९ ॥
तेथ वसताहे सत्यलोक । तेथील नायक चतुरानन ॥ १९ ॥
तपोलोकाहुन वर चार कोटि योजनें प्रदेश आहे, तेथे सत्यलोक आहे. तेथील अधिपति ब्रह्मदेव आहे १९.
तेथ मूर्तिमंत चारी वेद । मूर्तिमंत धर्म प्रसिद्ध ।
मूर्तिमंत ब्रह्मचर्य शुद्ध । तपही विशद मूर्तिमंत ॥ २२० ॥
मूर्तिमंत ब्रह्मचर्य शुद्ध । तपही विशद मूर्तिमंत ॥ २२० ॥
तेथे चारही वेद आणि सर्व धर्म मूर्तिमंत आहेत, शुद्ध ब्रह्मचर्य मूर्तिमंत आहे, आणि प्रत्यक्ष तपही मूर्तिमंत असते, २२०
गायत्री मूर्तिमंत तेथ । वाचा मूर्तिमंत वर्तत ।
दया मूर्तिमंत नांदत । योग मूर्तिमंत ब्रह्मसदनीं ॥ २१ ॥
दया मूर्तिमंत नांदत । योग मूर्तिमंत ब्रह्मसदनीं ॥ २१ ॥
त्या ब्रह्मसदनी प्रत्यक्ष गायत्री मूर्तिमंत असते, वाणी मूर्तिमंत असते, दया मूर्तिमंत नांदते, आणि योगही मूर्तिमंत असतो. २१.
तेथ अग्नि तिनी मूर्तिंमंत । ते एकरूपें त्रिधा भासत ।
सत्य सत्यलोकीं मूर्तिंमंत । असत्य तेथ असेना ॥ २२ ॥
सत्य सत्यलोकीं मूर्तिंमंत । असत्य तेथ असेना ॥ २२ ॥
दक्षिणाग्नि, गार्हपत्य व आहवनीय असे जे तीन अग्नि, वस्तुतः मूर्तिमंत असतात. सत्यलोकामध्ये सत्य मूर्तिमंत असते. तेथे असत्य असतच नाही २२.
ते लोकीं वसते कोण लोक । जे गायत्रीमंत्रजापक ।
जे ब्रह्मणतीर्थप्राशक । जे यागउपासक निष्काम ॥ २३ ॥
जे ब्रह्मणतीर्थप्राशक । जे यागउपासक निष्काम ॥ २३ ॥
तेथे राहाणारे लोक कोण ते सांगतो. जे गायत्रीमंत्राचा जप करणारे, जे ब्राह्मणांचे चरणतीर्थ प्राशन करणारे, आणि जे यज्ञयागांचे निष्काम उपासक असतात, ते तेथे राहातात २३.
जे ब्राह्मणकार्यीं निमाले । जे गोसंरक्षणीं जीवें गेले ।
जे परोपकारार्थ वेंचले । ते पावले सत्यलोक ॥ २४ ॥
जे परोपकारार्थ वेंचले । ते पावले सत्यलोक ॥ २४ ॥
जे ब्राह्मणांच्या कार्याकरिता मृत्यु पावले. ज्यांनी गोरक्षणाकरिता आपले प्राण दिले, जे परोपकार करितां करितां दरिद्री बनले. ते लोकच सत्यलोकाला गेले आहेत २४.
जे निष्काम द्विजां भजले । जिंहीं निष्काम द्विज पूजिले ।
जिंहीं निष्काम द्विज भोजिले । ते पावले सत्यलोक ॥ २५ ॥
जिंहीं निष्काम द्विज भोजिले । ते पावले सत्यलोक ॥ २५ ॥
ज्यांनी निष्काम बुद्धीने ब्राह्मणांची सेवा केली, ज्यांनी निष्काम बुद्धीने ब्राह्मणांची पूजा केली, ज्यांनी निष्कामबुद्धीने ब्राह्मणांना भोजन घातले. ते सत्यलोकाला गेले २५,
जे कृपाळू दीनार्थ देख । कृपाळू बंधमोचक ।
जे सत्यवादी सात्त्विक । ते सत्यलोकनिवासी ॥ २६ ॥
जे सत्यवादी सात्त्विक । ते सत्यलोकनिवासी ॥ २६ ॥
जे दीनजनांवर उपकार करण्यासाठींच कृपाळू बनले, संसारबंधनांनी त्रास पावत असलेल्या लोकांची ती बंधनें तोडण्याकरितांच जे कृपाळू बनले, जे सत्य बोलणारे व सात्त्विक वृत्तीचे असतात, तेच सत्यलोकांतील रहिवासी होत २६.
जे परापवादीं मूक । परदारानपुंसक ।
जे परद्रव्या पराङ्मुख । ते सत्यलोकनिवासी ॥ २७ ॥
जे परद्रव्या पराङ्मुख । ते सत्यलोकनिवासी ॥ २७ ॥
जे परनिंदेविषयी मुके, परस्त्रीविषयीं नपुंसक, जे परद्रव्यापासून पराङ्मुख, ते सत्यलोकांतील रहाणारे होत २७.
ऐसी सत्यलोकींची स्थिती । तेथींचा ब्रह्मा अधिपती ।
ब्रह्मसृष्टि याहीवरती । नाहीं निश्चितीं उद्धवा ॥ २८ ॥
ब्रह्मसृष्टि याहीवरती । नाहीं निश्चितीं उद्धवा ॥ २८ ॥
अशी सत्यलोकांतील स्थिति आहे. तेथला अधिपति ब्रह्मदेव होय. उद्धवा ! ह्याच्याहूनही वर ब्रह्मदेवाची सृष्टि मुळीच नाही हे लक्षात ठेव २८.
ब्रह्मांडाहूनि वेगळा । कैलास निर्माण करी भोळा ।
वैकुंठ रची घनसांवळा । हे लोक स्वलीळा निर्मित ॥ २९ ॥
वैकुंठ रची घनसांवळा । हे लोक स्वलीळा निर्मित ॥ २९ ॥
भोळ्या शंकराने ब्रह्मांडाहून वेगळा असा कैलास निर्माण केला आहे, आणि मेघश्याम विष्णूने वैकुंठ निर्माण केले आहे. हे लोक त्यांनी आपापल्याच लीलांनी तयार केले आहेत २९.
होतां ब्रह्मांडा घडामोडी । वैकुंठ कैलास न लगे वोढी ।
तेथील वस्तीची अभिनव गोडी । हरिहरभक्त फुडी जाणती ॥ २३० ॥
तेथील वस्तीची अभिनव गोडी । हरिहरभक्त फुडी जाणती ॥ २३० ॥
ब्रह्मांडाची घडामोड झाली असतांही वैकुंठ आणि कैलास ह्यांना धक्का लागत नाही. तेथील राहण्याची विलक्षण गोडी विष्णुभक्त आणि शंकरभक्त खरोखर जाणतात २३०.
तेथ नाहीं काळाचें गमन । नाहीं कर्माचें कर्मबंधन ।
तेथ नाहीं जन्ममरण । हें भक्त अनन्य पावती ॥ ३१ ॥
तेथ नाहीं जन्ममरण । हें भक्त अनन्य पावती ॥ ३१ ॥
तेथें काळाचा प्रवेशही होत नाही, कर्माचे कर्मबंधन नाही, तेथे जन्ममरण नाही. अनन्यभक्त असतील त्यांनाच हे स्थळ प्राप्त होते ३१.
वैकुंठकैलासरचना । सांगतां मन मुके मनपणा ।
ते लोकींची लोकलक्षणा । ऐक विचक्षणा सांगेन ॥ ३२ ॥
ते लोकींची लोकलक्षणा । ऐक विचक्षणा सांगेन ॥ ३२ ॥
वैकुंठ आणि कैलास यांची रचना सांगावयास लागले म्हणजे मनाचा मनपणा नाहीसा होतो. हे बुद्धिमान् उद्धवा ! आतां तेथील लोकांची लक्षणे सांगतो ऐक ३२.
सकळ ब्रह्मांडाबाहेरी । मायाआवरणाभीतरीं ।
वैकुंठ कैलास हरहरीं । स्वलीलेकरीं निर्मिजे ॥ ३३ ॥
वैकुंठ कैलास हरहरीं । स्वलीलेकरीं निर्मिजे ॥ ३३ ॥
सर्व ब्रह्मांडाच्या बाहेर आणि माया-आवरणाच्या आंत शिवांनी कैलास आणि विष्णूंनी वैकुंठ ही आपापल्या लीलेनेच निर्माण केली ३३.
सकळ जीवां सुखकरू । कैलासीं वसे शंकरू ।
जो कां पार्वतीपरमेश्वरू । जो योगेश्वरू योगियां ॥ ३४ ॥
जो कां पार्वतीपरमेश्वरू । जो योगेश्वरू योगियां ॥ ३४ ॥
सर्व जीवांना सुखदायक, जो पार्वतीचा परमेश्वर, जो योग्यांचा योगेश्वर, असा तो शंकर कैलासांत राहतो ३४.
जटाजूटी गंगाधर । पिनाकपाणी पंचवक्त्र ।
कर्पूरगौर गोक्षीर । अभयवरदकर निजभक्तां ॥ ३५ ॥
कर्पूरगौर गोक्षीर । अभयवरदकर निजभक्तां ॥ ३५ ॥
तो जटा धारण करणारा, मस्तकावर गंगा वहाणारा, पिनाक नांवाचे धनुष्य हातांत असणारा, पंचमुखी, कापूर किंवा गाईचे दूध ह्यांच्यासारख्या पांढऱ्या शुभ्र वर्णाचा, आपल्या भक्तांना सदोदित अभय देणारा व वरदायक ३५,
त्रिमात्रातीत त्र्यंबक । त्रिपुटीत्रिपुर त्रिपुरांतक ।
त्रिविधताप उच्छेदक । तिनी लोक सुखकारी ॥ ३६ ॥
त्रिविधताप उच्छेदक । तिनी लोक सुखकारी ॥ ३६ ॥
अकार, उकार व मकार या तीन मात्रांच्या पलीकडचा, त्रैलोक्याचा नेत्र, त्रिपुटी हेच त्रिपुर त्यांचा नाश करणारा, त्रिविध तापांचा उच्छेद करणारा, आणि तिन्ही लोकांना सुखी करणारा असा आहे ३६.
नागभूषणीं शोभे लीला । रुद्राक्षयुक्त रुंडमाळा ।
नीळकंठ जाश्वनीळा । भस्मोद्धूलिधूसर ॥ ३७ ॥
नीळकंठ जाश्वनीळा । भस्मोद्धूलिधूसर ॥ ३७ ॥
नागभूषणें धारण केल्यामुळे ज्याची शोभा विशेष खुलते, ज्याने रुद्राक्ष व रुंडमाळा धारण केल्या आहेत, ज्याचा कंठ नीलरत्नासारखा आहे, भस्मलेपनाने ज्याचे अंग धुरासारखे दिसते ३७;
त्रिशूळडमरांकित कर । त्रिनेत्र व्याघ्राजिन अंबर ।
रामनामीं अतितत्पर । करी निरंतर जपमाळा ॥ ३८ ॥
रामनामीं अतितत्पर । करी निरंतर जपमाळा ॥ ३८ ॥
त्रिशूळ आणि डमरू ज्याने हातात घेतले आहेत, ज्याला तीन नेत्र आहेत, व्याघ्रांबर हेंच वस्त्र अंगावर घेतले आहे, रामनामजपामध्येच जो आपल्या हातांतील जपमाळा नेहमी तत्पर ठेवितो ३८,
सहस्रबाहु बळिपुत्र बाण । शृंगी भृंगी चंडी पार्षद पूर्ण ।
साठी सहस्र रुद्रगण । कात्या त्रिशूळ जाण झेलती ॥ ३९ ॥
साठी सहस्र रुद्रगण । कात्या त्रिशूळ जाण झेलती ॥ ३९ ॥
बळीचा पुत्र सहस्रबाहु बाणासुर, शृंगी , भृंगी , चंडी हे ज्याचे सेवक आहेत, यांशिवाय साठ हजार रुद्रगण लखलखीत कोयते व त्रिशूळ नेहमी हातात घेऊन असतात ३९;
गणेश स्वामिकार्तिक । नंदी पंचमुख षण्मुख ।
वीरभद्रसेनानायक । जेणें लाविली सीक दक्षासी ॥ २४० ॥
वीरभद्रसेनानायक । जेणें लाविली सीक दक्षासी ॥ २४० ॥
गणपति, कार्तिकस्वामी, नंदी, पंचमुख, षण्मुख, आणि ज्याने दक्षाला शिक्षा केली होती असा सेनापति वीरभद्र २४०,
भूत प्रेत पिशाचक । महाप्रमत ज्याचें सैन्यक ।
अवघे शिवांकित देख । शिवनामघोष गर्जती ॥ ४१ ॥
अवघे शिवांकित देख । शिवनामघोष गर्जती ॥ ४१ ॥
भूत, प्रेत, पिशाच्च आणि मोठमोठे देव हेच ज्याचे सैन्य, असा तो शंकर असून हे सर्वजण शंकराचे आज्ञाधारक आहेत. ते नेहमी शिवनामाची गर्जना करीत असतात ४१.
शंभु शिव शूली शंकर । उमाकांत कर्पूरगौर ।
भव भर्ग भवानीवर । कपर्दी ईश्वर महादेव ॥ ४२ ॥
भव भर्ग भवानीवर । कपर्दी ईश्वर महादेव ॥ ४२ ॥
शंभु, शिव, शूली, शंकर, उमाकांत, कर्पूरगौर, भव, भर्ग, भवानीपति, कपर्दी, ईश्वर, महादेव ४२;
हरहरशंकरनामोच्चारीं । धाकें कळिकाळ पळे दूरी ।
शिवनामें गर्जे सदा गिरी । गिरीश राज्य करी ते ठायीं ॥ ४३ ॥
शिवनामें गर्जे सदा गिरी । गिरीश राज्य करी ते ठायीं ॥ ४३ ॥
किंवा 'हर हर शंकर' ह्या नामोच्चाराच्या धाकानेच कळिकाळ दूर पळून जातो. कैलास पर्वत नेहमी शिवनामाचीच गर्जना करीत असतो, आणि त्या ठिकाणी शंकर राज्य करतो ४३.
जेथ शिवनामाचा उच्चार । तेथ सुखेंसीं तिष्ठे शंकर ।
भक्तकृपाळू ईश्वर । भोळा निरंतर भावार्थ्यां ॥ ४४ ॥
भक्तकृपाळू ईश्वर । भोळा निरंतर भावार्थ्यां ॥ ४४ ॥
जेथे शिवनामाचा उच्चार होतो, तेथे शंकर आनंदाने राहतो. तो ईश्वर भक्तांचा मोठा कृपाळू असून भाविकांना नेहमी अगदी भोळेपणाने वश होणारा आहे ४४.
निजदासांचे त्रिगुण वैरी । छेदावया सदा त्रिशूळ करीं ।
निजडमरूच्या गजरीं । पापाची उरी उरों नेदी ॥ ४५ ॥
निजडमरूच्या गजरीं । पापाची उरी उरों नेदी ॥ ४५ ॥
तीन गुण हेच आपल्या भक्तांचे शत्रु आहेत, म्हणून त्या त्रिगुणांचा संहार करण्याकरितांच त्याने हातात नेहमी त्रिशूळ धारण केलेला आहे. तो आपल्या डमरूच्या गजराने पातकाला पूर्णपणे नष्ट करितो ४५.
कैलासीं तृण तरु समस्त । पशु पक्षी जे जे तेथ ।
ते अवघेचि शिवांकित । सर्वरूपें समस्त शिवू नांदे ॥ ४६ ॥
ते अवघेचि शिवांकित । सर्वरूपें समस्त शिवू नांदे ॥ ४६ ॥
कैलास पर्वतावरील सर्व गवत, झाडे, पशु, पक्षी, किंवा जे जे कोणी तेथे आहेत, ते ते सर्वजण शंकराचे आज्ञाधारक आहेत. किंबहुना त्या सर्वांच्या रूपाने शंकरच तेथे नांदतात! ४६.
यापरी ब्रह्मांडाबाहेरी । शिवू स्वलीला निर्माण करी ।
नेमूनियां कैलासगिरि । भरू राज्य करी भवानीशीं ॥ ४७ ॥
नेमूनियां कैलासगिरि । भरू राज्य करी भवानीशीं ॥ ४७ ॥
याप्रमाणे ब्रह्मांडाच्या बाहेर शंकरांनी आपल्याच लीलेने कैलास पर्वत निर्माण करून त्याची स्थापना केली, आणि तेथेच भवानीसह शंकर राज्य करतो ४७.
आतां वैकुंठींची स्थिती । ऐक सांगेन तुजप्रती ।
जे ऐकतां चित्तवृत्ती । स्वानंदस्फूर्ती वोसंडे ॥ ४८ ॥
जे ऐकतां चित्तवृत्ती । स्वानंदस्फूर्ती वोसंडे ॥ ४८ ॥
आतां वैकुंठांतली स्थितीही तुला सांगतो, ऐक. जी ऐकतांना चित्तवृत्ति स्वानंदस्फूर्तीने तुडुंब भरून वाहू लागते, अशी ती वैकुंठलोकांतील स्थिति आहे ४८.
उंस गाळूनि काढिजे सार । त्याची आळूनि कीजे साकर ।
तिचेही नाना प्रकार । करिती नानाकर अतिकुशळ ॥ ४९ ॥
तिचेही नाना प्रकार । करिती नानाकर अतिकुशळ ॥ ४९ ॥
ऊस पिळून त्याचा रस काढतात, तो आटवून त्याची साखर करतात, आणि अत्यंत कुशल लोक तिचेही अनेक आकारांचे पदार्थ करतात ४९,
तेवीं चैतन्यचि निश्चितें । मुसावूनि श्रीभगवंतें ।
वैकुंठ रचिलें तेथें । निजसामर्थ्यें नांदावया ॥ २५० ॥
वैकुंठ रचिलें तेथें । निजसामर्थ्यें नांदावया ॥ २५० ॥
त्याप्रमाणेच श्रीभगवंताने स्वत:च्या सामर्थ्याने राहाण्याकरिता खरोखर चैतन्यच मुशीत घालून आटवून त्याचेच तेथें वैकुंठ रचिलें २५०.
स्वलीला सगुण साकार । सुकुमार अतिसुंदर ।
घनश्याम मनोहर । मूर्ति चिन्मात्र चोखडी ॥ ५१ ॥
घनश्याम मनोहर । मूर्ति चिन्मात्र चोखडी ॥ ५१ ॥
आपल्याच लीलेने सगुण, साकार, सुकुमार, अत्यंत सुंदर, घनश्याम, मनोहर, अशी ज्ञानमय बनलेली सुंदर मूर्ति ५१;
शंख चक्र पद्म गदा । चारी भुजा सायुधा ।
डोळे लांचावले आनंदा । सगुण गोविंदा देखोनी ॥ ५२ ॥
डोळे लांचावले आनंदा । सगुण गोविंदा देखोनी ॥ ५२ ॥
शंख, चक्र, पद्म, गदा अशा चार आयुधांनी युक्त असलेल्या चार भुजा, अशा त्या सगुणस्वरूपी गोविंदाला पाहून होणाऱ्या आनंदाला डोळे लुब्धच होऊन जातात ५२.
मुकुट कुंडले मेखळा । कांसे पिंवळा सोनसळा ।
कौस्तुभ झळके गळां । आपाद वनमाळा शोभत ॥ ५३ ॥
कौस्तुभ झळके गळां । आपाद वनमाळा शोभत ॥ ५३ ॥
मुकुट, कुंडले, मेखळा, आणि पिवळा सोनसळा पीतांबर नेसलेला आहे; गळ्यांत कौस्तुभ मणि झळकत आहे; पायापर्यंत लोंबणारी वनमाळा गळ्यांत शोमत आहे ५३;
चरणींची गंगा अतिपुनीत । जे जगातें पवित्र करित ।
ते माथां वाहे उमाकांत । निजस्वार्थ देखोनी ॥ ५४ ॥
ते माथां वाहे उमाकांत । निजस्वार्थ देखोनी ॥ ५४ ॥
चरणांपासून निघालेली गंगा तर अत्यंत पवित्र, ती जगालाच पुनीत करून सोडते. अशी ती गंगा आपला स्वार्थ आहे असे पाहून शंकरांनी आपल्या मस्तकावरच धारण केली ५४.
त्या श्रीहरीचें पदद्वंद्व । वानितां मुका झाला वेद ।
अगम्य हरीचें निजपद । महिमा अगाध श्रीहरिचरणीं ॥ ५५ ॥
अगम्य हरीचें निजपद । महिमा अगाध श्रीहरिचरणीं ॥ ५५ ॥
त्या श्रीहरीच्या दोन्ही पायांचे वर्णन करतांना वेदही मुका होऊन बसला. कारण, तें श्रीहरीचे पद केवळ अगम्य आहे. श्रीहरीच्या चरणांचा महिमा फार मोठा आहे ५५.
पाहतां मुकुंदाचें श्रीमुख । फिकें झालें जी पीयूख ।
डोळ्यां झालें परम सुख । धन्य श्रीमुख हरीचें ॥ ५६ ॥
डोळ्यां झालें परम सुख । धन्य श्रीमुख हरीचें ॥ ५६ ॥
त्या श्रीहरीचे अतिसुंदर मुख पाहिले म्हणजे अमृतही फिकें होऊन जाते, आणि डोळ्यांना अप्रतिम सुख वाटते. श्रीहरीचे तें आल्हादकारक मुख धन्य होय ५६.
ज्याचें निमेषार्ध देखिल्या मुख । हारपे कोटि जन्मांचें दुःख ।
त्रिलोकीं न माय हरिख । धन्य श्रीमुख हरीचें ॥ ५७ ॥
त्रिलोकीं न माय हरिख । धन्य श्रीमुख हरीचें ॥ ५७ ॥
ज्याचे मुख निमिषार्ध अवलोकन केले तरी कोटिजन्मांचे दुःख नाहीसे होते, आणि होणारा आनंद त्रिभुवनांतही मावत नाही, अशा त्या श्रीहरीचे ते आल्हादकारक मुख धन्य होय ५७.
ज्याचा देखिलिया वदनेंदू । बांधू न शके द्वंद्वबाधू ।
चढता वाढता परमानंदू । स्वानंदकंदू जगाचा ॥ ५८ ॥
चढता वाढता परमानंदू । स्वानंदकंदू जगाचा ॥ ५८ ॥
ज्याचा मुखचंद्र पाहिला असतां सुखदुःखादि द्वंद्वांची बाधा मुळीच पीडा देऊ शकत नाहीं, अधिकाधिक परमानंदच प्राप्त होतो; असा तो सर्व जगाचा आत्मा आनंदाचे मूळ आहे ५८.
जयाची विक्षेपभ्रुकुटी । रची ब्रह्मांडें उठाउठी ।
ज्याचे रोमकूपीं ब्रह्मांडे कोटी । तो हरि वैकुंठीं नांदत ॥ ५९ ॥
ज्याचे रोमकूपीं ब्रह्मांडे कोटी । तो हरि वैकुंठीं नांदत ॥ ५९ ॥
ज्याची कमानदार भुंवई दृष्टिक्षेप करतांना किंचित् वांकडी होताक्षणीच तत्काळ कित्येक ब्रह्मांड उत्पन्न होतात; ज्याच्या प्रत्येक रोमरंध्रांत कोट्यवधि ब्रह्मांडे राहतात; असा तो श्रीहरि वैकुंठामध्ये निवास करतो ५९.
ज्याची झालिया कृपादृष्टी । अहंकाराची विरे गांठी ।
दुसरें दिसों नेदी सृष्टीं । तो हरि वैकुंठीं नांदत ॥ २६० ॥
दुसरें दिसों नेदी सृष्टीं । तो हरि वैकुंठीं नांदत ॥ २६० ॥
ज्याची कृपादृष्टि झाली असतां अहंकाराची गांठच तुटून पडते, आणि सृष्टीमध्ये दुसरे म्हणून काही दिसूंच देत नाही, तो श्रीहरि वैकुंठामध्ये नांदत आहे २६०.
जया दादुल्याचें नाम । निर्दाळी गा मरणजन्म ।
समूळ उपडी कर्माकर्म । तो पुरुषोत्तम नांदत ॥ ६१ ॥
समूळ उपडी कर्माकर्म । तो पुरुषोत्तम नांदत ॥ ६१ ॥
अहो ! ज्या प्रभूचे नामस्मरण जन्ममरणालाच नाहींसें करून टाकते, कर्माकर्म मुळासकट उपटून टाकतें, तो पुरुषोत्तम वैकुंठात नांदत आहे ६१.
ते वैकुंठीं पाहतां साचार । अवघे चतुर्भुज नर ।
घनश्याम पीतांबरधर । शंख चक्र अवघ्यांसी ॥ ६२ ॥
घनश्याम पीतांबरधर । शंख चक्र अवघ्यांसी ॥ ६२ ॥
त्या वैकुंठांत खरोखर पाहिलें तर सर्व लोक चतुर्भुज असतात. सर्वच लोक मेघासारख्या श्यामरंगाचे, पीतांबर धारण करणारे, व सर्वांच्याच हातांत शंख-चक्र इत्यादि आयुधे असतात ६२.
अवघ्यांचें एक स्वरूप । अवघे दिसती एकरूप ।
जेथ हरि नांदे स्वयें सद्रूप । तेथ कोणी कुरूप दिसेना ॥ ६३ ॥
जेथ हरि नांदे स्वयें सद्रूप । तेथ कोणी कुरूप दिसेना ॥ ६३ ॥
सर्वाचे स्वरूप सारखें. सर्वजण एकसारखेच दिसतात. जेथे सौंदर्यशाली श्रीहरि स्वत:च राहतो, तेथे कोणीच विद्रूप दिसत नाही ६३.
तेथ नाहीं आधी व्याधी । नाहीं विषयवार्ता उपाधी ।
स्त्रीपुरुषां समान बुद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ ६४ ॥
स्त्रीपुरुषां समान बुद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ ६४ ॥
तेथे आधिदैविक किंवा आधिभौतिक पीडा नाहीत, विषयवार्तेची उपाधि नाही, आणखी उद्धवा ! तेथें खरोखर स्त्रीपुरुषांची बुद्धि सारखीच असते ६४.
तेथ नाहीं तहानभूक । नाहीं कामक्रोध द्वंद्वदुःख ।
नाहीं जन्ममरण निःशेख । ऐसा वैकुंठलोक नांदत ॥ ६५ ॥
नाहीं जन्ममरण निःशेख । ऐसा वैकुंठलोक नांदत ॥ ६५ ॥
तेथें तहानभूक नाही, काम-क्रोध नाहीत, सुखदुःखांच्या द्वंद्वांचे दुःख नाहीं, जन्ममरण तर मुळीच नाही, असा वैकुंठलोक आहे ६५.
लक्ष्मीनें करावें अवलोकन । यालागीं कष्टती सुरगण ।
ते लक्ष्मी अंगें आपण । करी संमार्जन वैकुंठी ॥ ६६ ॥
ते लक्ष्मी अंगें आपण । करी संमार्जन वैकुंठी ॥ ६६ ॥
लक्ष्मीने एकदा आपल्याकडे अवलोकन करावे ह्यासाठी सर्व देवांचे समुदाय धडपड करीत असतात, पण अशी ती लक्ष्मी आपण स्वतः वैकुंठांत सडापोतेरें घालीत असते ६६.
ते वैकुंठीं जगन्नाथ । उद्धरावया निजभक्त ।
स्वलीला असे नांदत । दीनकृपायुक्त दयाळू ॥ ६७ ॥
स्वलीला असे नांदत । दीनकृपायुक्त दयाळू ॥ ६७ ॥
त्या वैकुंठात दीनदयाळ व उदार जगन्नाथ आपल्या भक्तांचा उद्धार करण्याकरिता आपल्याच लीलेने नांदत असतो ६७.
अंतीं नाममात्र घेतल्यासाठीं । उद्धरल्या जीवकोटी ।
तो स्वामी श्रीविष्णु वैकुंठी । दीनकृपादृष्टी नांदत ॥ ६८ ॥
तो स्वामी श्रीविष्णु वैकुंठी । दीनकृपादृष्टी नांदत ॥ ६८ ॥
मृत्युसमयीं त्याचे नामस्मरण केल्यामुळेच कोट्यवधि जीव त्याने उद्धरले आहेत. तो प्रभु श्रीविष्णु दीनजनांवर कृपादृष्टि ठेवून वैकुंठामध्ये नांदत असतो ६८.
जैसा ज्यासी भावार्थ । तैसा पुरवी मनोरथ ।
पढिये पंचम पुरुषार्थ । तो हरी नांदत वैकुंठीं ॥ ६९ ॥
पढिये पंचम पुरुषार्थ । तो हरी नांदत वैकुंठीं ॥ ६९ ॥
ज्याचा जसा भाव असतो, तसा त्याचा मनोरथ तो पूर्ण करितो. आणि पांचव्या पुरुषार्थावर प्रीति करितो. असा तो श्रीहरि वैकुंठामध्ये नांदत असतो ६९.
लोकलोकांतरगणना । ब्रह्मांडसंख्या अवघी जाणा ।
वैकुंठकैलासरचना । समूळ विवंचना सांगितली ॥ २७० ॥
वैकुंठकैलासरचना । समूळ विवंचना सांगितली ॥ २७० ॥
निरनिराळ्या लोकांची गणना, ब्रह्मांडांची सर्व संख्या, वैकुंठ व कैलास यांची रचना हे सविस्तर विवेचन सांगितले २७०.
लोक सांगीतले भिन्न भिन्न । तेथील प्राप्तीचे कोण जन ।
ऐसें कल्पील तुझें मन । ते अर्थीं निरूपण अवधारीं ॥ ७१ ॥
ऐसें कल्पील तुझें मन । ते अर्थीं निरूपण अवधारीं ॥ ७१ ॥
भिन्नभिन्न लोक सांगितले, पण ते लोक प्राप्त करून घेणारे लोक कोणते अशी तुझ्या मनात कल्पना येईल, म्हणून त्या अर्थाचें निरूपण ऐक ७१.
महर्जनतपःसत्यलोक । वैकुंठरचना अलोलिक ।
तेथील प्राप्तीचे कोण लोक । ते यदुनायक सांगत ॥ ७२ ॥
तेथील प्राप्तीचे कोण लोक । ते यदुनायक सांगत ॥ ७२ ॥
महर्लोक, जनोलोक, तपोलोक, सत्यलोक आणि ज्यांची रचना आश्चर्यकारक आहे असें वैकुंठ त्यांची प्राप्ति करून घेणारे लोक कोणते ते यदुनायक श्रीकृष्ण सांगत आहे ७२.
योगस्य तपसश्चैव न्यासस्य गतयोऽमलाः ।
महर्जनस्तपः सत्यं भक्तियोगस्य मद्गतिः ॥ १४ ॥
महर्जनस्तपः सत्यं भक्तियोगस्य मद्गतिः ॥ १४ ॥
[श्लोक १४] योग, तपश्चर्या आणि संन्यास यांचेद्वारा महर्लोक, जनलोक, तपोलोक व सत्यलोकरूप उत्तम गती प्राप्त होते आणि भक्तियोगाने माझे परम धाम प्राप्त होते. (१४)
निश्चळ करावया निजचित्ता । साधिली प्राणापानसमता ।
षट्चक्रें भेदूनि तत्त्वतां । पुढें निजात्मता पावावी ॥ ७३ ॥
षट्चक्रें भेदूनि तत्त्वतां । पुढें निजात्मता पावावी ॥ ७३ ॥
आपल्या चित्ताला स्थिर करण्याकरितां प्राणापान समान करण्याचे कौशल्य साध्य केले आणि खरोखर षट्चक्रांचा भेद करून पुढे आत्मस्वरूपाला पोचावें ७३,
तंव आयुष्या झालें अस्तमान । निजांगीं आदळे मरण ।
ऐसे निमाले जे योगीजन । त्यांसी ऊर्ध्व गमन महर्जनादि लोकीं ॥ ७४ ॥
ऐसे निमाले जे योगीजन । त्यांसी ऊर्ध्व गमन महर्जनादि लोकीं ॥ ७४ ॥
इतक्यांत आयुष्य संपून मृत्यु आला, तर अशा रीतीने मृत्यु पावलेले जे योगी लोक, त्यांना महलोंक, जनोलोक, इत्यादि वर वर असणाऱ्या लोकांमध्ये जाता येतें ७४.
जो गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी । ब्रह्मचर्यनेमें व्रतधारी ।
जो स्वप्नींहीं नातळे नारी । जो भिक्षाहारी सर्वदा ॥ ७५ ॥
जो स्वप्नींहीं नातळे नारी । जो भिक्षाहारी सर्वदा ॥ ७५ ॥
जो गृहस्थाश्रमी असून ब्रह्मचारी असतो, नियमाने ब्रह्मचर्यव्रत पाळतो, जो स्वप्नातही स्त्रीला स्पर्श करीत नाही, जो सदोदित भिक्षा मागून खातो ७५;
जो सदा धडधडीत विरक्ती । एक भिक्षा न धरी हातीं ।
सद्गुरूचिया सेवा करिती । आत्मज्ञानप्राप्ती पावावया ॥ ७६ ॥
सद्गुरूचिया सेवा करिती । आत्मज्ञानप्राप्ती पावावया ॥ ७६ ॥
जो निरंतर कडकडीत वैराग्य धारण करतो, किंवा जो भिक्षेला शिवतही नाही, आणि आत्मज्ञानाची प्राप्ति होण्याकरितां सद्गुरूची सेवा करतो ७६;
जे संधीं व्हावें आत्मज्ञान । ते संधीसी आलें मरण ।
ऐशा ब्रह्मचारियासी जाण । ऊर्ध्व गमन महर्जनादि लोकीं ॥ ७७ ॥
ऐशा ब्रह्मचारियासी जाण । ऊर्ध्व गमन महर्जनादि लोकीं ॥ ७७ ॥
त्याला तशा प्रसंगी जो आत्मज्ञान व्हावयाचे, त्याच वेळेला जर मृत्यु आला, तर असा ब्रह्मचारी वर महर्जनादि लोकांतच जातो ७७.
जे गृहस्थाश्रमीं नेटक । जे अग्निसेवे साग्निक ।
जे स्वधर्में चित्तशोधक । जे सेवक द्विजदेवां ॥ ७८ ॥
जे स्वधर्में चित्तशोधक । जे सेवक द्विजदेवां ॥ ७८ ॥
जे गृहस्थाश्रमात तत्पर, जे अग्निसेवेसाठी अग्निहोत्र घेणारे, जे स्वधर्मानेच चित्त शुद्ध करणारे, आणि जे ब्राह्मणांची व देवाची सेवा करणारे ७८;
जे भूतदयाळू भाविक । जे सत्यवादी सात्त्विक ।
जे निजात्मज्ञानसाधक । जे अवंचक गुरुभजनीं ॥ ७९ ॥
जे निजात्मज्ञानसाधक । जे अवंचक गुरुभजनीं ॥ ७९ ॥
जे भाविक असून प्राणिमात्रावर दया करणारे, जे सत्यभाषणी असून सात्त्विक वृत्तीचे, जे आत्मज्ञान साध्य करणारे, जे गुरुभजनाच्या ठायीं प्रतारणा न करणारे ७९,
गुरुकृपा साधूनि ज्ञान । पावावें ब्रह्म सनातन ।
तंव वेंचलें आयुष्यधन । अंगीं निधन आदळलें ॥ २८० ॥
तंव वेंचलें आयुष्यधन । अंगीं निधन आदळलें ॥ २८० ॥
अशा लोकांनी गुरुकृपेने आत्मज्ञान साध्य केल्यावर त्यांना सनातन ब्रह्माची प्राप्ति होऊ लागावी आणि इतक्यांत त्यांचं आयुष्यरूपी धन संपून त्यांना मरण यावें २८०,
तेणें खोळंबली ब्रह्मप्राप्ती । परी ऊर्ध्वलोकीं होय गती ।
जैसी उपासना विरक्ती । तेणें तारतम्यें जाती महर्जनादि लोकीं ॥ ८१ ॥
जैसी उपासना विरक्ती । तेणें तारतम्यें जाती महर्जनादि लोकीं ॥ ८१ ॥
की त्यामुळे ब्रह्मप्राप्ति होण्याला जरी आडकाठी येते, तरी ते वर जातातच व जशी ज्यांची उपासना व विरक्ति असते, त्या मानाने ते महर्जनादि लोकांमध्ये पोंचतात ८१.
जे वनवासी वानप्रस्थ । जे वैराग्यें अतिविरक्त ।
जे कंदमूळफळीं तृप्त । जे सदा नेमस्त आश्रमधर्मीं ॥ ८२ ॥
जे कंदमूळफळीं तृप्त । जे सदा नेमस्त आश्रमधर्मीं ॥ ८२ ॥
जे वनामध्ये राहून वानप्रस्थाश्रम आचरतात, जे वैराग्याने अत्यंत विरक्त असतात, जे कंदमूलफलांवरच तृप्त असतात, आणि जे सदासर्वदा आश्रमधर्माच्या नियमाने वागतात ८२,
वर्षाकाळीं आसारीं राहे । हेमंतीं जळाशयें ।
उष्णकाळीं पंचाग्नी साहे । तपश्चर्या वाहे अतिनिष्ठा ॥ ८३ ॥
उष्णकाळीं पंचाग्नी साहे । तपश्चर्या वाहे अतिनिष्ठा ॥ ८३ ॥
असा साधक पर्जन्यकाळांत पर्जन्यवृष्टीमध्ये बसतो, हिवाळ्यात पाण्यात बसतो, उन्हाळ्यात पंचाग्निसाधन करतो, अशी जो अत्यंत निष्ठेने तपश्चर्या करतो ८३,
शरीरशोषणाचें पाहे । सर्वथा न धरी भये ।
स्वार्थाचेनि लवलाहें । तपोनिष्ठा साहे दारुण ॥ ८४ ॥
स्वार्थाचेनि लवलाहें । तपोनिष्ठा साहे दारुण ॥ ८४ ॥
शरीर क्षीण होईल याचे भय मुळीच बाळगीत नाही, आत्महितसाधनाच्या उत्कंठेने दारुण तपश्चर्या सहन करतो ८४,
वैराग्य साधूनि पूर्ण । करावें संन्यासग्रहण ।
साधावया ब्रह्मज्ञान । तेचि काळीं मरण वोढवलें ॥ ८५ ॥
साधावया ब्रह्मज्ञान । तेचि काळीं मरण वोढवलें ॥ ८५ ॥
किंवा पूर्ण वैराग्य साधून ब्रह्मज्ञानप्राप्तीकरितां संन्यास घेऊ लागतो, आणि त्याला इतक्यांतच जर मरण येऊन ठेपलें ८५,
ऐसेनि देहान्तस्थिती । त्यासी ऊर्ध्वलोकीं होय गती ।
महर्जनतपोलोकप्राप्ती । तारतम्यस्थिती उपासना ॥ ८६ ॥
महर्जनतपोलोकप्राप्ती । तारतम्यस्थिती उपासना ॥ ८६ ॥
तर त्याला अंतकाळानंतर ऊर्ध्वलोकी गमन होते, आणि त्याच्या उपासनेच्या मानाने महर्जनतपोलोकाची प्राप्ति होते ८६.
जो समूळसंकल्पसंन्यासी । लोकलोकांतर न घडे त्यासी ।
हें न टकेचि गा जयासी । आणि झाले संन्यासी विधियुक्त ॥ ८७ ॥
हें न टकेचि गा जयासी । आणि झाले संन्यासी विधियुक्त ॥ ८७ ॥
जो मुळासह सर्व संकल्पांचाच संन्यास करतो, त्याला लोकांतराला जाणे घडत नाही. तो मुक्तच होतो. हे ज्याला घडत नाही, आणि जे विधियुक्त संन्यासी होतात ८७,
जे कां पोटींहून अतिविरक्त । स्वप्नीं धातूंसी न लाविती हात ।
जे यतिधर्मीं सदा निरत । जे सदा जपत प्रणवातें ॥ ८८ ॥
जे यतिधर्मीं सदा निरत । जे सदा जपत प्रणवातें ॥ ८८ ॥
जे अंत:करणापासून अत्यंत विरक्त असतात, स्वप्नांतसुद्धा सोन्यारुप्याला हात लावीत नाहीत, जे सदासर्वकाळ संन्यासधर्मात निमग्न असतात, आणि जे निरंतर ओंकाराचा जप करतात ८८,
अंगीकारिले आश्रमविधी । उबगू न मानी जो त्रिशुद्धी ।
मरणीं डंडळीना बुद्धी । त्या गमनसिद्धी सत्यलोकीं ॥ ८९ ॥
मरणीं डंडळीना बुद्धी । त्या गमनसिद्धी सत्यलोकीं ॥ ८९ ॥
आश्रमविधि पतकरल्यानंतर जो खरोखर त्याचा कंटाळा मानीत नाहीं, मरणसमयीं ज्याची बुद्धि चंचल होत नाही, त्याला सत्यलोकांत जाणे घडतें ८९.
ऐसे सत्यलोकातें पावती । तेथील्या भोगांची ज्यां विरक्ती ।
ते ब्रह्म्यासवें मुक्त होती । येर ते येती माघारे ॥ २९० ॥
ते ब्रह्म्यासवें मुक्त होती । येर ते येती माघारे ॥ २९० ॥
असले लोक सत्यलोकाला जातात, पण तेथल्या सुखविलासादि भोगांचीही ज्यांना विरक्ति असते, ते ब्रह्मदेवाबरोबरच मुक्त होतात, आणि बाकीचे परत येतात २९०.
ज्यांसी सत्यलोकीं भोगासक्ती । तेही खचोनि माघारे येती ।
इतर लोकांची कोण गती । पुनरावृत्ती सोडीना ॥ ९१ ॥
इतर लोकांची कोण गती । पुनरावृत्ती सोडीना ॥ ९१ ॥
ज्यांना सत्यलोकांतील भोगविलास भोगण्याचीच आवड असते, तेही तेथून ख खेचून माघारे येतात, मग इतर लोकांची गति काय सांगावी ? त्यांना जन्म आणि मरण सोडीतच नाहीं ९१.
जेथवरी भोगासक्ती । तेथवरी पुनरावृत्ती ।
जेथ भोगाची निवृत्ती । तेथ चारी मुक्ती आंदण्या ॥ ९२ ॥
जेथ भोगाची निवृत्ती । तेथ चारी मुक्ती आंदण्या ॥ ९२ ॥
भोगासक्ति म्हणून जेथपर्यत आहे, तेथपर्यंत हा पुनरावृत्तीचा फेरा आहेच. पण जेथें भोगाची इच्छा नाहीशी होते, तेथें चारही मुक्ति दासी होऊन राहतात ९२.
ज्यां लोकीं ज्या भोगविरक्ती । तेथून ते पुढारे जाती ।
जे लोकीं ज्या भोगासक्ती । ते खचोनि पडती भूलोकीं ॥ ९३ ॥
जे लोकीं ज्या भोगासक्ती । ते खचोनि पडती भूलोकीं ॥ ९३ ॥
ज्या लोकांत ज्यांना भोगविरक्ति होते, तेथून ते पुढे जातात. आणि ज्या लोकांत ज्यांना भोगासक्ति उत्पन्न होते, तेथून ते खचून भूलोकावर पडतात ९३.
तैसी नव्हे माझी भक्ती । भक्तां नाहीं इतर प्राप्ती ।
मद्भक्तां माझी गती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ९४ ॥
मद्भक्तां माझी गती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ९४ ॥
परंतु माझी भक्ति कांही तशी नव्हे. भक्तांना दुसऱ्या कशाचीच प्राप्ति होत नाही. उद्धवा ! माझ्या भक्तांना निश्चयेंकरून माझीच गति प्राप्त होते ९४.
जे सकाम माझी सेवा करिती । त्यांसी कामनाफळीं पडे वस्ती ।
ज्यांसी निष्काम माझी भक्ती । त्यांसी माझी प्राप्ती अनन्य ॥ ९५ ॥
ज्यांसी निष्काम माझी भक्ती । त्यांसी माझी प्राप्ती अनन्य ॥ ९५ ॥
जे इच्छा धरून माझी सेवा करतात, त्यांना वासनेच्या फळांतच रहावे लागते. परंतु ज्यांना माझी निष्काम भक्ति असते, त्यांना माझी अनन्य प्राप्ति होते ९५.
सकाम भक्तांचे पुरवूनि काम । त्यांसी मी करीं नित्य निष्काम ।
निजभक्तांसी निजधाम । मी पुरुषोत्तम पाववीं ॥ ९६ ॥
निजभक्तांसी निजधाम । मी पुरुषोत्तम पाववीं ॥ ९६ ॥
सकाम भक्तांच्या वासना पूर्ण करून, त्यांना मी नेहमी निष्काम करीत असतो. मी पुरुषोत्तम माझ्या भक्तांना निजधामाला घेऊन जातों ९६.
यालागीं गोपींची कामासक्ती । म्यांचि आणूनि निष्कामस्थिती ।
त्यांसी दिधली सायुज्यमुक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ९७ ॥
त्यांसी दिधली सायुज्यमुक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ९७ ॥
उद्धवा ! म्हणूनच गोपींची कामासक्ति होती, ती मीच निष्काम स्थितीला आणून त्यांना खरोखर सायुज्यमुक्ति दिली हे लक्षात ठेव ९७.
म्यां गोपिकांसी कामू केला । कीं निःशेष कामू त्यांचा हरिला ।
न विचारितां या बोला । कृष्ण व्यभिचारला मूर्ख म्हणती ॥ ९८ ॥
न विचारितां या बोला । कृष्ण व्यभिचारला मूर्ख म्हणती ॥ ९८ ॥
मी गोपिकांशी कामविलास केले की त्यांचा काम पूर्णपणे नष्ट केला, या म्हणण्याचा विचार न करतांच मूर्ख लोक कृष्णाने व्यभिचार केला असे म्हणतात ९८.
सलोकता आवडे भक्तांसी । तैं मी करीं वैकुंठवासी ।
भक्त मागे समीपतेसी । करीं मी तयासी जिवलग ॥ ९९ ॥
भक्त मागे समीपतेसी । करीं मी तयासी जिवलग ॥ ९९ ॥
भक्तांना सलोकता आवडत असेल तर मी त्यांना वैकुंठांत राहावयास घेऊन जातो. भक्का भक्तांनें समीपता मागितली, तर मी त्याला आपला जिवलग मित्र करितों ९९.
हितगुज अळोंच्यासी । हृदयींचें गोड सांगावयासी ।
उद्धवा तूं जैसा आवडसी । ऐशीच त्यांसीं करीं प्रीति ॥ ३०० ॥
उद्धवा तूं जैसा आवडसी । ऐशीच त्यांसीं करीं प्रीति ॥ ३०० ॥
हितगुज सांगावयाला, मनांतील गोडगोड गोष्टी बोलावयाला, उद्धवा ! तू मला जसा आवडतोस, त्याचप्रमाणे मी त्याच्यावर प्रीति करतों ३००.
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...