मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २४ ओव्या ४०१ ते ५००
तंव श्रीकृष्ण म्हणे उद्धवा । हा माझा निजगुह्य गोप्य ठेवा ।
तुज म्यां सांगीतला कणवा । पुरुषार्थ पांचवा या नांव ॥ १ ॥
तेव्हां श्रीकृष्ण म्हणाले, “ उद्धवा ! हा माझा गुह्य ज्ञानाचा गुप्त ठेवा आहे. तो मी तुला प्रेमानें सांगितला. ह्यालाच 'पांचवा पुरुषार्थ' असें नांव आहे १.
हें वेदशास्त्रां अगम्य । सकळ देवांसी अतिदुर्गम ।
जेणें लुब्धें मी पुरुषोत्तम । तें हें भक्त प्रेमरहस्य ॥ २ ॥
जेणें लुब्धें मी पुरुषोत्तम । तें हें भक्त प्रेमरहस्य ॥ २ ॥
हे वेदशास्त्रांना अगम्य व सर्व देवांना अत्यंत दुर्गम आहे. ज्याच्या योगाने मी पुरुषोत्तम लुब्ध होऊन जातो, तें हें भक्तप्रेमाचे रहस्य आहे २.
मज वश्य करावयाचें वर्म । पोटीं धरावें भक्तिप्रेम ।
चहूं मुक्तींचा पडे भ्रम । पुरुषार्थकाम वोसरे ॥ ३ ॥
चहूं मुक्तींचा पडे भ्रम । पुरुषार्थकाम वोसरे ॥ ३ ॥
मला वश करून घेण्याचे वर्म हेच की, अंत:करणांत भक्तिप्रेम धरावें ; म्हणजे चारही मुक्तींचा भ्रम नष्ट होतो व पुरुषार्थकामही कमी होतो ३.
ज्यासी माझी सप्रेम भक्ती । त्याचेनि नांवें विघ्नें पळती ।
मजवेगळी अन्यथा गती । करावया प्राप्ती कोणाची ॥ ४ ॥
मजवेगळी अन्यथा गती । करावया प्राप्ती कोणाची ॥ ४ ॥
ज्याला माझी सप्रेम भक्ति आहे, त्याचे नांव ऐकतांच सर्व विघ्ने पळून जातात. त्याला माझ्या प्राप्तीशिवाय दुसरी गति प्राप्त करून देण्यास कोण समर्थ आहे?" ४.
जयासी माझी अनन्य भक्ती । तेथ माझी पूर्ण कृपास्थिती ।
मद्भक्तां मजवेगळी गती । कदा कल्पांतीं असेना ॥ ५ ॥
मद्भक्तां मजवेगळी गती । कदा कल्पांतीं असेना ॥ ५ ॥
ज्याला माझी अनन्यभक्ति असते, त्याच्यावर माझी पूर्ण कृपा असते. माझ्या भक्तांना माझ्याशिवाय दुसरी गति कधीच कल्पांतीही प्राप्त व्हावयाची नाही ५.
वेदविधीं करावा बाधू । तो निःश्वसित माझा वेदू ।
जेथ माझा पूर्ण कृपाबोधू । तेथ विधिवादू बाधीना ॥ ६ ॥
जेथ माझा पूर्ण कृपाबोधू । तेथ विधिवादू बाधीना ॥ ६ ॥
भक्तांना वेदविधींनी अडचण उत्पन करावी, तर तो वेद माझ्याच उच्छ्वासापासून उत्पन्न झालेला आहे. तेव्हां जेथें माझ्या कृपेचाच पूर्ण प्रसाद झाला, तेथें वेदविधि बाधक होत नाही ६.
जे कां माझे भक्त सकाम । ते फळभोगांतीं होऊनि निष्काम ।
तेही ठाकिती माझें निजधाम । भक्तां अन्यगमन असेना ॥ ७ ॥
तेही ठाकिती माझें निजधाम । भक्तां अन्यगमन असेना ॥ ७ ॥
जे माझे सकाम भक्त असतात, तेही फळे भोगल्यानंतर निष्कामच होतात, आणि तेही माझ्याच निजधामाला येतात. कारण भक्तांना दुसरी जागाच नाही ७.
ज्यासी माझें अनन्य भजन । स्वकर्म त्याचे सेवी चरण ।
विधिवेदू वोळंगे अंगण । त्यासी अन्यथागमन असेना ॥ ८ ॥
विधिवेदू वोळंगे अंगण । त्यासी अन्यथागमन असेना ॥ ८ ॥
ज्याच्याजवळ माझें एकनिष्ठ भजन आहे, त्याच्या चरणाची सेवा स्वकर्म करते. विधिनिदर्शक वेद त्याच्या आंगणांत उभे असतात. माझ्या भक्ताला माझ्यावांचून दुसरी जागा असत नाही ८.
जेथ सप्रेम नाहीं माझी भक्ती । तेथ कर्में अवश्य बाधती ।
कर्मास्तव अन्यथागती । अभक्त पावती उद्धवा ॥ ९ ॥
कर्मास्तव अन्यथागती । अभक्त पावती उद्धवा ॥ ९ ॥
ज्याच्या ठिकाणी माझी सप्रेम भक्ति नाही, त्याला कर्में हटकून बाधक होतात. उद्धवा ! अभक्त असतात ते कर्मामुळेच दुसरी गति पावतात ९.
जेथ माझी साचार भक्ती । तेथ कर्माची न चले गती ।
मद्भक्तां माझी प्राप्ती । सत्य निश्चितीं या हेतू ॥ ४१० ॥
मद्भक्तां माझी प्राप्ती । सत्य निश्चितीं या हेतू ॥ ४१० ॥
जेथे माझी खरी भक्ति असते, तेथें कर्माची गति चालत नाही. माझ्या मक्तांना जी माझी प्राप्ति होते, ती खरोखर ह्याच कारणाने होय ४१०.
भक्तांसी सर्वांभूतीं मद्भावो । तेथ कर्मबंधा कैंचा ठावो ।
कर्मानुगती खुंटली पहा हो । मत्प्राप्ति स्वयमेवो मद्भक्तां ॥ ११ ॥
कर्मानुगती खुंटली पहा हो । मत्प्राप्ति स्वयमेवो मद्भक्तां ॥ ११ ॥
भक्तांना सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी माझाच भाव असतो, तेव्हा त्यांच्या ठिकाणी कर्मबंधनाला जागा कोठली मिळणार ? अहो पहा ! कर्माची गतीच त्यांच्यापाशी खुंटून जाते. माझ्या भक्तांना आपोआप माझी प्राप्ति होते ११.
भक्त पाऊल ठेवी अवनीं । परी म्यां ठेविलें न धरी मनीं ।
कर्ता भगवंत सत्य मानी । यालागीं कर्मबंधनीं बांधवेना ॥ १२ ॥
कर्ता भगवंत सत्य मानी । यालागीं कर्मबंधनीं बांधवेना ॥ १२ ॥
भक्त जमिनीवर पाऊल ठेवतो, परंतु तें मी ठेवलें असें मनांत धरीत नाही. सर्वकर्ता भगवंत आहे हेच सत्य मानतो, म्हणून तो कर्माच्या बंधनाकडूनही बांधला जात नाही १२.
भक्तांस नाहीं अन्यथा गती । मद्भक्तां माझी अनन्य प्रीती ।
त्या भक्तभावार्थाच्या युक्ती । विशद श्रीपती स्वयें केल्या ॥ १३ ॥
त्या भक्तभावार्थाच्या युक्ती । विशद श्रीपती स्वयें केल्या ॥ १३ ॥
भक्तांना माझ्यावांचून दुसरी गति नाही, कारण माझ्या भक्तांना माझीच एकनिष्ठ प्रीति असते. त्या भक्तांच्या भावार्थाच्या गोष्टी श्रीकृष्णांनी स्वतःच स्पष्ट करून सांगितल्या १३.
‘न मे भक्तः प्रणश्यति’ । हें बोलिला अर्जुनाप्रती ।
तें साचार बिरुद श्रीपती । तो भक्तां अन्यगती घडोंचि नेदी ॥ १४ ॥
तें साचार बिरुद श्रीपती । तो भक्तां अन्यगती घडोंचि नेदी ॥ १४ ॥
'न मे भक्तः प्रणश्यति' (गीता ९.३१) असें कृष्णाने अर्जुनाला सांगितले, तेंच श्रीकृष्णाचे खरें ब्रीद होय. तो भक्तांना दुसरी गति धडूंच देत नाही १४.
भक्तशापाची ऐकतां गोठी । देवो कैवारें सवेग उठी ।
सुदर्शन लावूनि पाठी । केला हिंपुटी दुर्वासा ॥ १५ ॥
सुदर्शन लावूनि पाठी । केला हिंपुटी दुर्वासा ॥ १५ ॥
भक्तांला शाप दिल्याची गोष्ट ऐकतांच देव त्या भक्ताचा कैवार घेऊन लागलाच उठला, आणि सुदर्शन पाठीमागे लावून दुर्वासाला ग्रस्त करून सोडले १५.
एका अंबरीषाकारणें । दहा गर्भवास सोशिले जेणें ।
तो अनन्य भक्तांसी उणें । कोण्याही गुणें येवों नेदी ॥ १६ ॥
तो अनन्य भक्तांसी उणें । कोण्याही गुणें येवों नेदी ॥ १६ ॥
एका अंबरीषाकरितां ज्याने दहा गर्भवास सोसले, तो एकनिष्ठ भक्तांना कोणत्याही प्रकारे कमी पडू देत नाही १६.
भक्तकैवारी श्रीकृष्ण । हे भावार्थाची निजखूण ।
एका जनार्दना शरण । भावो प्रमाण भक्तीसी ॥ १७ ॥
एका जनार्दना शरण । भावो प्रमाण भक्तीसी ॥ १७ ॥
भक्ताचा कैवारी श्रीकृष्ण आहे, हीच भक्तिरहस्यांतील मुख्य गोष्ट आहे. एकनाथ जनार्दनाला शरण आहे. कारण, भक्तीला भाव हेच साधन आहे १७.
शुद्धभावेंवीण जे भक्ती । तेचि दांभिक जाण निश्चितीं ।
ते अपक्वचि राहे प्राप्ती । जेवीं कांकड जाती मुगांची ॥ १८ ॥
ते अपक्वचि राहे प्राप्ती । जेवीं कांकड जाती मुगांची ॥ १८ ॥
शुद्ध भावाशिवाय जी भक्ति, तीच खरोखर दांभिक भक्ति होय असे समज. ज्याप्रमाणे मुगांतले कुचर दाणे अपक्व राहातात, तशी ती दांभिक भक्ति अ पक्वच रहावयाची १८.
‘भक्तियोगस्य मद्गतिः’ । हे मूळपदींची पदस्थिती ।
तेंचि वाढविलें किती । ऐसें श्रोतीं न म्हणावें ॥ १९ ॥
तेंचि वाढविलें किती । ऐसें श्रोतीं न म्हणावें ॥ १९ ॥
'भक्तियोगस्य मद्गति: ' असें मूळ श्लोकांतील पद आहे. तेंच किती वाढविले ? असे श्रोत्यांनी म्हणूं नये १९.
‘मद्गती’ या पदाची व्युत्पत्ती । कोण आहे जाणे किती ।
हें रहस्य जाणे विरळा क्षितीं । यालागीं क्षमा श्रोतीं करावी ॥ ४२० ॥
हें रहस्य जाणे विरळा क्षितीं । यालागीं क्षमा श्रोतीं करावी ॥ ४२० ॥
'मद्गति ' या पदाचा अर्थ किती आहे कोण जाणे ! त्यांतील रहस्य जाणणारा मनुष्य पृथ्वीवर विरळा. याकरिता श्रोत्यांनी क्षमा करावी ४२०,
हो कां भक्ती माझी निजजननी । ज्यां प्रेमपान्हां ये वाढवूनी ।
सरता केलों भगवद्भजनीं । ते म्यां गौण महिमेनीं वानिली ॥ २१ ॥
सरता केलों भगवद्भजनीं । ते म्यां गौण महिमेनीं वानिली ॥ २१ ॥
अहो ! भक्ति ही माझी माता आहे. जिनें प्रेमपान्हा पाजून मला वाढविले, आणि भगवद्भजनांत थोरपणा मिळवून दिला, ती भक्ति वास्तविक येथे फारच कमी महत्त्व देऊन वर्णिली २१.
भगवद्भक्तीचें महिमान । मी केवीं जाणें अज्ञान ।
जें बोलिलों तें सर्वथा गौण । क्षमा पूर्ण करावी ॥ २२ ॥
जें बोलिलों तें सर्वथा गौण । क्षमा पूर्ण करावी ॥ २२ ॥
कारण भगवद्भक्तीचा थोर महिमा मी अज्ञानी कसा जाणणार? मी येथें जें वर्णन केलें, तें खरोखर फारच कमी आहे. म्हणून श्रोत्यांनी क्षमा करावी २२.
भक्ति माझी निजमाउली । ते मी आपुल्या बोबडे बोलीं ।
ग्रंथाधारें गौरविली । सप्रेम भुली भुलोनी ॥ २३ ॥
ग्रंथाधारें गौरविली । सप्रेम भुली भुलोनी ॥ २३ ॥
भक्ति ही माझी सख्खी आई आहे, ती मी आपल्या बोबड्या बोलांनी प्रेमाच्या योगाने भुरळ पडून केवळ ग्रंथाधाराने गौरविली आहे २३.
प्रेमाची निजजाति कैशी । आठवों नेदी आठवणेसी ।
एवं विसरवूनि हेतूसी । भक्तिरहस्यासी बोलविलें ॥ २४ ॥
एवं विसरवूनि हेतूसी । भक्तिरहस्यासी बोलविलें ॥ २४ ॥
प्रेमाची जात कशी आहे ? तर ती आठवणीची आठवण होऊ देत नाही. ह्यामुळे त्या प्रेमाने मूळ हेतूचा विसर पडून भक्तिरहस्य बोलविले २४.
जेवीं कां निजबाळकातें । माउली बोल बोलवी त्यातें ।
तेवीं भक्तीनें मज केलें येथें । म्यां चुकी कोणातें ठेवावी ॥ २५ ॥
तेवीं भक्तीनें मज केलें येथें । म्यां चुकी कोणातें ठेवावी ॥ २५ ॥
ज्याप्रमाणे आपल्या मुलाला आई बोलविते, त्याप्रमाणे येथे भक्तीने मला बोलके केले आहे. तेव्हा मी ह्यांत दोष कोणावर ठेवावा ? २५.
माउलीचें लोभाळूपण । प्रकट करी तो मूर्ख जाण ।
याहीपरी मी अज्ञान । चुकलेपण दिसताहे ॥ २६ ॥
याहीपरी मी अज्ञान । चुकलेपण दिसताहे ॥ २६ ॥
आईचा वात्सल्यलोभ प्रगट करील तो मूर्ख होय. यापेक्षा मी अज्ञानपणाने चुकलों हेच खरें वाटतें २६.
उडिदीं काळें जेथींच्या तेथें । तेवीं चुकलेपण माझें येथें ।
चुकीचि मानावी निश्चितें । हेंही गुरुनाथें वारिलें ॥ २७ ॥
चुकीचि मानावी निश्चितें । हेंही गुरुनाथें वारिलें ॥ २७ ॥
उडदाचा काळेपणा जसा जेथल्या तेथेच असतो, त्याप्रमाणे माझी येथे जी चुकी झाली असेल, ती खरोखर चुकीच मानावी, पण हेही गुरुनाथांनी ठेवलेले नाही २७.
चुकलेपणचि मानितां । मी हों पाहें कवि कर्ता ।
मीपण नावडे गुरुनाथा । तेणें तें तत्त्वतां सांडविलें ॥ २८ ॥
मीपण नावडे गुरुनाथा । तेणें तें तत्त्वतां सांडविलें ॥ २८ ॥
कारण चुकी झालेली मानली असतां मी कवि किंवा कर्ता होऊ पहातों असें झाले. परंतु गुरुनाथांना मीपणा मुळीच आवडत नाही. त्यांनी तो खरोखरच सोडावयास लावला आहे २८.
साङ्ग झालिया कथाकथन । तेणें श्लाघें न घ्यावें मीपण ।
तंव गुरूंनीं दावूनि निजखूण । मीतूंपण उडविलें ॥ २९ ॥
तंव गुरूंनीं दावूनि निजखूण । मीतूंपण उडविलें ॥ २९ ॥
कथेचे वर्णन परिपूर्ण झाले असताही त्या अभिमानाने आत्मस्तुति करून मीपणा घेऊ नये. गुरूंनी हीच आत्मखूण दाखवून देऊन मीतूंपणा नष्ट केला २९.
हेही बोल बोलता । मी नव्हें नव्हें गा सर्वथा ।
मी नव्हें कवि कर्ता । हें गुरूंचे तत्त्वतां गुरु जाणे ॥ ४३० ॥
मी नव्हें कवि कर्ता । हें गुरूंचे तत्त्वतां गुरु जाणे ॥ ४३० ॥
पण हे भाषण बोलणारासुद्धा मी मुळीच नव्हें हो नव्हें. मी कवीही नव्हें, आणि ग्रंथकर्ताही नव्हे. हे खरोखर गुरुचे गुरुच जाणतो ४३०.
तंव श्रोते म्हणती चमत्कार । भक्तिसुखाचें सुखसार ।
भक्तिपरमामृतसागर । उघड साचार तुवां केला ॥ ३१ ॥
भक्तिपरमामृतसागर । उघड साचार तुवां केला ॥ ३१ ॥
तेव्हां श्रोते म्हणाले, काय चमत्कार आहे ! भक्तिसुखाचे सुखदायक रहस्य-भक्तिपरमामृतसमुद्र-तूं खरोखर अगदी उघडा केलास ३१.
भागवत मुख्य भक्तिप्रधान । जें भक्तीचें सुख सनातन ।
तें करतळामळ करूनि जाण । तुवां परिपूर्ण दाविलें ॥ ३२ ॥
तें करतळामळ करूनि जाण । तुवां परिपूर्ण दाविलें ॥ ३२ ॥
भागवत हे मुख्यतः भक्तिप्रधान आहे. भक्तीचे जें सनातन सुख, तें पूर्ण रीतीने करतलामलकवत् उघडे करून दाखविलेंस ३२.
तुवां हा थोर केला उपकार । तरावया स्त्रियादि शूद्र ।
जग व्हावया भजनतत्पर । भागवत निजसार काढिलें ॥ ३३ ॥
जग व्हावया भजनतत्पर । भागवत निजसार काढिलें ॥ ३३ ॥
तूं हा फार मोठा उपकार केलास. स्त्रियादिक व शूद्र वगैरे उद्धरण्याकरिता, आणि जग भजनतत्पर होण्याकरितां तूं भागवताचे सार काढलेस ३३.
भागवतींचें गुप्त पीयूख । तें त्वां प्रकटिलें भक्तिसुख ।
तेणें संत सुखावले देख । श्रोते सकळिक निवाले ॥ ३४ ॥
तेणें संत सुखावले देख । श्रोते सकळिक निवाले ॥ ३४ ॥
भागवतांतील जें गुप्त अमृत तेच भक्तिसुख तूं स्पष्ट करून दाखविलेंस, त्यामुळे सर्व संत आनंदित झाले आणि सर्व श्रोते तृप्त झाले ३४.
तुज संतोषोनि श्रीपती । दीधली आपली निजभक्ती ।
यालागीं तुवां भक्तीची कीर्ती । यथार्थस्थितीं वर्णिली ॥ ३५ ॥
यालागीं तुवां भक्तीची कीर्ती । यथार्थस्थितीं वर्णिली ॥ ३५ ॥
तुला श्रीकृष्णांनीच प्रसन्न होऊन आपली भक्ति दिली. म्हणूनच तूं भक्तीची कीर्ति यथार्थ रीतीने वर्णन केलीस ३५.
तुझे भक्त्तीचा एकेक बोल । ब्रह्मसुखेंसीं सखोल ।
त्याहीमाजीं प्रेमाची वोल । येताति डोल चित्सुखें ॥ ३६ ॥
त्याहीमाजीं प्रेमाची वोल । येताति डोल चित्सुखें ॥ ३६ ॥
तुझा भक्तीचा एकेक शब्द ब्रह्मानंदाहूनही अत्यंत गंभीर असा आहे. आणि त्यांतही प्रेमाचा ओलावा असल्यामुळे ज्ञानानंदाला अगदी भरतें येते ३६.
तुज वाखाणितां निजभक्ती । प्रेमें वोसंडे चित्तवृत्ती ।
विसरोनियां ग्रंथस्फूर्ती । भक्तीची कीर्ती वानिशी ॥ ३७ ॥
विसरोनियां ग्रंथस्फूर्ती । भक्तीची कीर्ती वानिशी ॥ ३७ ॥
तूं ही आत्मभक्ति वर्णन करतांना तुझी चित्तवृत्ति प्रेमाने परिपूर्ण भरून वाहू लागते. ग्रंथाचे भान विसरून तूं भक्तीचे माहात्म्यच वर्णन करीत आहेस ३७.
निजाआवडी वाडेंकोडें । वानितां भक्तीचे पवाडे ।
तुज नाठवे मागेंपुढें । प्रेम गाढें जाणवलें ॥ ३८ ॥
तुज नाठवे मागेंपुढें । प्रेम गाढें जाणवलें ॥ ३८ ॥
आपल्याच आवडीने व उत्कंठेने भक्तीचे माहात्म्य वर्णन करतांना तुला मागची पुढची काही आठवण राहत नाही, इतकें तुझे अवर्णनीय प्रेम आम्हांला कळून चुकले ३८.
जंव जंव भक्तीचें निरूपण । अधिकाधिक वाढतां जाण ।
तंव तंव येतसे स्फुरण । तेथ कोण पुरे म्हणेल ॥ ३९ ॥
तंव तंव येतसे स्फुरण । तेथ कोण पुरे म्हणेल ॥ ३९ ॥
जो जो भक्तीचे निरूपण अधिक अधिक वाढू लागते, तो तों तुला स्फुरणच चढते. तेथे पुरे म्हणणार कोण? ३९.
जंव जंव निरूपणा वाढी । तंव तंव भक्तीची अधिक गोडी ।
तेणें श्रोत्यांचीही आवडी । चढोवढी वाढली ॥ ४४० ॥
तेणें श्रोत्यांचीही आवडी । चढोवढी वाढली ॥ ४४० ॥
जो जो निरूपण वाढते, तों तो भक्तीला अधिकच गोडी चढते. त्यामुळे श्रोत्यांचीही आवड पुढेपुढे वाढतच जाते ४४०.
करितां भक्तिसुखनिरूपण । श्रोते वक्ते लांचावले जाण ।
होतां अमृतांचे आरोगण । पुरे कोण म्हणों शके ॥ ४१ ॥
होतां अमृतांचे आरोगण । पुरे कोण म्हणों शके ॥ ४१ ॥
भक्तिसुखाचे निरूपण करतांना श्रोते आणि वक्ते दोघेही त्यांत लोलुप झाले आहेत. अमृताचें भोजन करतांना पुरे असें कोण म्हणू शकेल ? ४१.
यापरी गा अतिप्रीतीं । वाढली निरूपणीं भक्ती ।
ते आवरूनियां स्फूर्ती । पुढील ग्रंथार्थीं प्रवर्तें ॥ ४२ ॥
ते आवरूनियां स्फूर्ती । पुढील ग्रंथार्थीं प्रवर्तें ॥ ४२ ॥
अशा प्रकारे अत्यंत प्रेमाने निरूपणामध्ये भक्ति वाढली. पण ती स्फूर्ति आतां आवरून धरून पुढील ग्रंथार्थ सुरू करावा" ४२.
हें ऐकोनि संतवचन । केलें साष्टांग नमन ।
भली दीधली आठवण । येरवीं निरूपण नावरतें ॥ ४३ ॥
भली दीधली आठवण । येरवीं निरूपण नावरतें ॥ ४३ ॥
हे संतांचे वचन ऐकून एकनाथांनी त्यांना साष्टांग नमन केले आणि म्हटले, “बरी आठवण केलीत, नाही तर हे निरूपण आवरले नसतें ४३.
‘भक्तियोगस्य मद्गतिः’ । ये पदाची पदव्युत्पत्ती ।
निरूपिली भगद्भक्ती । जेणें भगवत्प्राप्ती अतिसुलभ ॥ ४४ ॥
निरूपिली भगद्भक्ती । जेणें भगवत्प्राप्ती अतिसुलभ ॥ ४४ ॥
'भक्तियोगस्य मद्गति: ' ह्या पदाचा अर्थ सांगतांना, ज्या भक्तीने भगवत्प्राप्ति अत्यंत सुलभ होते, त्या भगवद्भक्तीचें निरूपण केले ४४.
हे न करितां भगवद्भक्ती । त्रिगुणगुणीं जीवपंक्ती ।
बांधिल्या संसारीं उन्मज्जती । तेही स्थिती हरि सांगे ॥ ४५ ॥
बांधिल्या संसारीं उन्मज्जती । तेही स्थिती हरि सांगे ॥ ४५ ॥
ही भगवद्भक्ति केली नाही तर त्रिगुणरूपी दोरांनी जीवांच्या पंक्तीच्या पंक्ति बांधल्या जाऊन त्या संसारांत जन्मास येतात. तीही स्थिति श्रीकृष्ण सांगतो ४५.
मया कालात्मना धात्रा कर्मयुक्तं इदं जगत् ।
गुणप्रवाह एतस्मिन् उन्मज्जति निमज्जति ॥ १५ ॥
गुणप्रवाह एतस्मिन् उन्मज्जति निमज्जति ॥ १५ ॥
[श्लोक १५] हे कर्मयुक्त जग कर्मफल देणार्या कालरूप माझ्यामुळे या गुणप्रवाहात कधी वर तर कधी अधोगतीला जाते. (१५)
मुख्य मूळीं मी जगाचा धरिता । स्त्रष्टृरूपें मीचि स्त्रजिता ।
विष्णुरूपें मी प्रतिपाळिता । मीचि संहर्ता रुद्ररूपें ॥ ४६ ॥
विष्णुरूपें मी प्रतिपाळिता । मीचि संहर्ता रुद्ररूपें ॥ ४६ ॥
जगाला मुख्यतः मूळ धारण करणारा मी आहे; ब्रह्मादेवाच्या रूपाने उत्पत्ति करणारा मीच आहे; विष्णूच्या रूपाने प्रतिपाळ करणारा मीच आहे आणि रुद्ररूपाने संहार करणाराही मीच आहे ४६.
हे त्रिगुण काळाची काळसत्ता । तो मी निजकाळ तत्त्वतां ।
स्रजिता पाळिता संहर्ता । गुणावस्थाविभागें ॥ ४७ ॥
स्रजिता पाळिता संहर्ता । गुणावस्थाविभागें ॥ ४७ ॥
हे तीन गुण हीच काळाची सत्ता आहे, तोच मी खरोखर निजकाळ असून गुणावस्थेच्या स्वरूपाप्रमाणे उत्पन्न करणारा, पालन करणारा व संहार करणारा आहे ४७.
जनांचें वासनाकर्म विचित्र । तेचि काळसत्ता निजसूत्र ।
तेणें रचिला संसार । चराचर गुणबद्ध ॥ ४८ ॥
तेणें रचिला संसार । चराचर गुणबद्ध ॥ ४८ ॥
लोकांचे वासनाकर्म विचित्र आहे. तेच काळसत्तेचे आत्मसूत्र होय. त्यानेच हा गुणांनी बद्ध असलेला चराचर संसार उभारला आहे ४८.
गुणकर्में स्वर्गा चढे । गुणकर्में नरकीं पडे ।
नाना योनींचें सांकडें । भोगणें घडे गुणकर्में ॥ ४९ ॥
नाना योनींचें सांकडें । भोगणें घडे गुणकर्में ॥ ४९ ॥
जीव गुणकर्माच्या योगानें स्वर्गास चढतो, आणि गुणकर्मामुळेच नरकांत पडतो. अनेक प्रकारच्या योनींची संकटे गुणकर्मामुळेच त्याला भोगावी लागतात ४९.
स्वर्ग भोगूनि वाडेंकोडें । महर्जनतपोलोकांपुढें ।
सत्यलोकवरी वरता चढे । उन्मज्जन घडे या नांव ॥ ४५० ॥
सत्यलोकवरी वरता चढे । उन्मज्जन घडे या नांव ॥ ४५० ॥
तो मोठ्या आनंदाने स्वर्गातील सुखोपभोग भोगून व महर्जनतपोलोक भोगून पुढे सत्यलोकापर्यंत वर चढतो. ह्यालाच 'उन्मजन' असें म्हणतात ४५०.
पशुपक्षिस्थावरांत । वृक्षपाषाणकृमित्व प्राप्त ।
महानरकीं अधःपात । निमज्जन एथ त्या नांव ॥ ५१ ॥
महानरकीं अधःपात । निमज्जन एथ त्या नांव ॥ ५१ ॥
पशु, पक्षी, स्थावर, वृक्ष, पाषाण, किडे वगैरेमध्ये जन्म येत येत अखेरीस महानरकामध्ये अधःपतन होणे यालाच ' निमज्जन ' असे नाव आहे ५१.
उंचीं चढोनि नीचीं पडणे । भोगवी नाना जन्ममरणें ।
तें प्रकृतिपुरुषांचें साजणें । जीवबंधनें भोगवी ॥ ५२ ॥
तें प्रकृतिपुरुषांचें साजणें । जीवबंधनें भोगवी ॥ ५२ ॥
उंचावर चढून खाली पडणे, या उलाढालीत जें नानाप्रकारची जन्ममरणे भोगविते, तें प्रकृतिपुरुषांचे कार्य आहे. तेच जीवबंधने भोगावयास लावतें ५२.
अणुर्बृहत् कृशः स्थूलो यो यो भावः प्रसिध्यति ।
सर्वोऽपि उभयसंयुक्तः प्रकृत्या पुरुषेण च ॥ १६ ॥
सर्वोऽपि उभयसंयुक्तः प्रकृत्या पुरुषेण च ॥ १६ ॥
[श्लोक १६] लहानमोठे, कृशस्थूल असे जे जे पदार्थ उत्पन्न होतात, ते सर्व प्रकृती आणि पुरूष या दोघांच्या संयोगानेच. (१६)
अणु म्हणिजे अतिसूक्ष्म सान । बृहत् म्हणिजे विशाळ जाण ।
कृश म्हणिजे किरकोळपण । स्थूळ तें पूर्ण जडावयवीं ॥ ५३ ॥
कृश म्हणिजे किरकोळपण । स्थूळ तें पूर्ण जडावयवीं ॥ ५३ ॥
अणु म्हणजे अत्यंत सूक्ष्म लहान; बृहत् म्हणजे अत्यंत मोठे; कृश म्हणजे किरकोळपणा असलेले; आणि स्थूल म्हणजे पूर्णपणे जड अवयवांनी युक्त ५३,
जें जें दृष्टिगोचर झालें । जें जें नांवरूपा आलें ।
तें तें उभययोगें केलें । जाण घडलें प्रकृतिपुरुषीं ॥ ५४ ॥
तें तें उभययोगें केलें । जाण घडलें प्रकृतिपुरुषीं ॥ ५४ ॥
असें जे जे दृष्टीला दिसू लागते, जें जें नावारूपाला येते, तें तें प्रकृति आणि पुरुष ह्या उभयतांच्या संयोगानेच झालेले आहे ५४.
जें उभययोगसंभव । जग ऐसें ज्याचें नांव ।
तें प्रकृतिपुरुष सावेव । तिसरा भाव असेना ॥ ५५ ॥
तें प्रकृतिपुरुष सावेव । तिसरा भाव असेना ॥ ५५ ॥
जें दोन पदार्थाच्या संयोगापासून होते, जग असें नांव ज्याला आहे, ते मूर्तिमंत प्रकृतिपुरुषमयच होय. तिसरें स्वरूपच असत नाही ५५.
या दोहींवेगळें निरवयव । जेथूनि या दोहींचा उद्भव ।
तेचि सद्वस्तु सर्वीं सर्व । देवाधिदेव सांगत ॥ ५६ ॥
तेचि सद्वस्तु सर्वीं सर्व । देवाधिदेव सांगत ॥ ५६ ॥
आता ह्या दोहीवेगळे जें निरवयव आहे, जेथून या दोघांचाही उद्भव होतो, तेच सर्वत्र सर्वस्वी व्यापून असलेलें परब्रह्म देवाधिदेव आतां सांगत आहे ५६.
यस्तु यस्यादिरन्तश्च स वै मध्यं च तस्य सन् ।
विकारो व्यवहारार्थो यथा तैजसपार्थिवाः ॥ १७ ॥
यदुपादाय पूर्वस्तु भावो विकुरुतेऽपरम् ।
आदिरन्तो यदा यस्य तत्सत्यमभिधीयते ॥ १८ ॥
विकारो व्यवहारार्थो यथा तैजसपार्थिवाः ॥ १७ ॥
यदुपादाय पूर्वस्तु भावो विकुरुतेऽपरम् ।
आदिरन्तो यदा यस्य तत्सत्यमभिधीयते ॥ १८ ॥
[श्लोक १७-१८] ज्याच्या सुरूवातीला आणि शेवटी जे असते, तेच मध्ये असते आणि तेच सत्य आहे कार्य ही फक्त व्यवहारासाठी केलेली कल्पना आहे जशी बांगड्याकुंडले इत्यादी सोन्याची कार्ये किंवा घडागाडगे इत्यादी; मातीची कार्ये पहिला कारण पदार्थ ज्या परम कारणाच्या आधाराने पुढील कार्यपदार्थाला उत्पन्न करतो, तेच परमकारण केवळ सत्य असते कारण तेच कार्याच्या आधी आणि शेवटीही असते. (जसा भिजलेला मातीचा गोळा घड्याचे कारण असतो पण तो मूळ माती या परमकारणाच्या आधाराने घडारूप कार्याचे कारण बनतो भिजलेल्या गोळ्याच्या आधी माती, गोळ्यात माती, घड्यात माती आणि घडा फुटल्यावरही मातीच असते म्हणून मातीच सत्य होय). (१७-१८)
प्रकृतिपुरुषेंसीं साकार । जें दिसताहे चराचर ।
त्यासी आद्यंतें जें अनश्वर । तेंचि साचार मध्येंही ॥ ५७ ॥
त्यासी आद्यंतें जें अनश्वर । तेंचि साचार मध्येंही ॥ ५७ ॥
प्रकृतिपुरुषासह हे जे साकार चराचर दिसते, ते आदी व अंती जसें नश्वर आहे, तसेच तें खरोखर मध्येही नश्वर आहे ५७.
लेण्याआधीं कनक एक । लेण्याअंतीं तेंचि आवश्यक ।
मध्येंही लेणेंरूपें देख । भासे कनक अद्वितीय ॥ ५८ ॥
मध्येंही लेणेंरूपें देख । भासे कनक अद्वितीय ॥ ५८ ॥
दागिना करावयाच्या आधी जे सोने असते तेच दागिना मोडला तरीही कायम राहातें, आणि मध्यंतरीही तेंच शुद्ध सोनें दागिन्याच्या रूपाने भासत असते ५८.
न करितां मातीचें गोकुळ । पूर्वी मृत्तिकाचि केवळ ।
गोकुळ मोडल्या सकळ । उरे अविकळ मृत्तिका ॥ ५९ ॥
गोकुळ मोडल्या सकळ । उरे अविकळ मृत्तिका ॥ ५९ ॥
मातीचे गोकुळ करावयाच्या आधी केवळ मातीच असते, आणि गोकुळ पूर्णपणे मोडले म्हणजेही निखालस मातीच शिल्लक राहते ५९.
तेचि गोकुळरूपें असतां । भासे मृत्तिकाचि तत्त्वतां ।
तेंवी आदिमध्यअवसानतां । भासे चित्सत्ता अनश्वर ॥ ४६० ॥
तेंवी आदिमध्यअवसानतां । भासे चित्सत्ता अनश्वर ॥ ४६० ॥
तीच माती, गोकुळाच्या रूपाने असली, तरी ती खरोखर मातीच भासते. त्याप्रमाणे आदीं, मध्ये व अंतीही अविनाशी ब्रह्मतत्वच भासत असते ४६०.
त्रिगुणगुणें सविकार । जें जग दिसताहे साकार ।
तें मायिक गा चराचर । जेवीं व्यवहार स्वप्नींचा ॥ ६१ ॥
तें मायिक गा चराचर । जेवीं व्यवहार स्वप्नींचा ॥ ६१ ॥
तीन गुणांच्या प्रभावाने विकृत झालेलें जें हें जग साकार दिसते, ते सर्व चराचर, ज्याप्रमाणे स्वप्नांतील व्यवहार केवळ मायिक असतो त्याप्रमाणे मायिक होय ६१.
सकळ विकारांचें कारण । अंगें अविद्या आपण ।
ते विकारीं सत्यता स्थापितां जाण । आलें सत्यपण अविद्येसी ॥ ६२ ॥
ते विकारीं सत्यता स्थापितां जाण । आलें सत्यपण अविद्येसी ॥ ६२ ॥
सर्व विकारांचे कारण स्वतः अविद्या हीच आहे. त्या विकारांत सत्यता स्थापित करूं लागले असतां अविद्येलाच खरेपणा येऊ लागेल ६२.
अविद्या आपुलेनि नांवें जाण । आपुलें नास्तिक्य सांगे आपण ।
हें वर्म जाणती सज्ञान । नेणोनि अज्ञान मानिती सत्य ॥ ६३ ॥
हें वर्म जाणती सज्ञान । नेणोनि अज्ञान मानिती सत्य ॥ ६३ ॥
अविद्या ही आपल्याच नावाने आपला अस्तित्वरहितपणा आपणच सांगते. हे वर्म, ज्ञाते लोक जाणतात, परंतु अज्ञानी लोक तें समजून न घेऊन अविद्येलाच सत्य मानतात ६३.
अविद्या अविद्यकत्वें मिथ्या जाण । वस्तु वस्तुत्वें सदा संपन्न ।
येचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ६४ ॥
येचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ६४ ॥
अविद्या ही अविद्यकत्वामुळे मिथ्या आहे, आणि ब्रह्म हे ब्रह्मत्वामुळेच सर्वदा संपन्न आहे. याच अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगतो ६४.
प्रकृतिअंगीकारें देख । वस्तूपासाव होती लोक ।
जेवीं निद्रायोगें एक । होय अनेक निजस्वप्नीं ॥ ६५ ॥
जेवीं निद्रायोगें एक । होय अनेक निजस्वप्नीं ॥ ६५ ॥
ज्याप्रमाणे निद्रेच्या योगाने आपण स्वप्नांमध्ये वस्तुत: एकच असतां अनेक होतो, त्याप्रमाणे प्रकृतीचा अंगीकार केल्यामुळेच ब्रह्मापासून अनेक लोक होतात ६५.
जेवीं तंतूपासाव कोटि पट । कोटि पटीं तंतु एकवट ।
पाहतां आदि मध्य शेवट । द्वैताचें बोट रिघेना ॥ ६६ ॥
पाहतां आदि मध्य शेवट । द्वैताचें बोट रिघेना ॥ ६६ ॥
ज्याप्रमाणे तंतूपासून कोट्यवधि वस्त्रें होतात, तरी त्या कोट्यवधि वस्त्रांमध्ये तंतु एकसारखा एकच एक असतो; वस्त्राचा आदि, मध्य किंवा शेवट पाहिला तरी तंतूखेरीज दुसऱ्या पदार्थाचें दुजेपणाचे बोटही शिरकलेले दिसत नाही ६६;
तेवीं वस्तूपासोनियां लोक । प्रकृतिपुरुषादि सकळिक ।
आदि-मध्य-अवसानीं एक । द्वैतवार्ता देख असेना ॥ ६७ ॥
आदि-मध्य-अवसानीं एक । द्वैतवार्ता देख असेना ॥ ६७ ॥
त्याप्रमाणे प्रकृतिपुरुषादि सर्व लोक परमात्म्यापासूनच उत्पन्न झाले आहेत. त्यामुळे ते आदीं, मध्ये व अंती एका परब्रह्म स्वरूपाचेच आहेत. त्यांत द्वैताची गोष्टसुद्धा असत नाही ६७.
तंतु सत्य पट मायिक । वस्तु सत्य अविद्या लटिक ।
जें आदि-मध्य-अवसानीं एक । तें सत्य निष्टंक उद्धवा ॥ ६८ ॥
जें आदि-मध्य-अवसानीं एक । तें सत्य निष्टंक उद्धवा ॥ ६८ ॥
तंतु खरा असून वस्त्र हे मायिक असते, त्याप्रमाणे परब्रह्म खरे असून माया ही लटकी आहे. उद्धवा ! जें आदीं, मध्य व अंती एकच असते तेंच शुद्ध सत्य होय ६८.
जेवीं कां काष्ठाची बाहुली । काष्ठावयवें शोभे आली ।
तेवीं वस्तु वस्तुत्वें एकली । शोभा पावली जगत्वें ॥ ६९ ॥
तेवीं वस्तु वस्तुत्वें एकली । शोभा पावली जगत्वें ॥ ६९ ॥
ज्याप्रमाणे लाकडाची बाहुली लाकडाच्याच अवयवांनी शोभते, त्याप्रमाणे ब्रह्म हें ब्रह्मस्वरूपाने एकच असून जगाच्या रूपाने शोभा पावलें आहे ६९.
जेवीं कां एकलें देह देख । दिसे अवयवरूपीं अनेक ।
तेवीं वस्तु एकली एक । आभासे अनेकस्वरूपीं ॥ ४७० ॥
तेवीं वस्तु एकली एक । आभासे अनेकस्वरूपीं ॥ ४७० ॥
ज्याप्रमाणे देह हा एकटा एक असून तो निरनिराळ्या अवयवरूपांनी अनेक प्रकारचा दिसतो, त्याप्रमाणे ब्रह्मही एकटें एकच असून तें अनेक स्वरूपांनी भासते ४७०.
जेवीं कां जळीं क्रीडतां जळा । उपजवी तरंगांच्या माळा ।
तेवीं वस्तूचिया स्वलीळा । जगदादि मेळा प्रकाशे ॥ ७१ ॥
तेवीं वस्तूचिया स्वलीळा । जगदादि मेळा प्रकाशे ॥ ७१ ॥
ज्याप्रमाणे पाण्यामध्ये पाणीच खेळत असतां तें तरंगांच्या अनेक मालिका उत्पन्न करिते, त्याप्रमाणे परब्रह्माच्या लीलेनेच जगत् इत्यादि सर्व वस्तुसमुदाय प्रगट होतो ७१.
तरंगा आदि-मध्य-अवसानीं । जेवीं पाणीपणें असे पाणी ।
तेवीं उत्पत्ति स्थिति-निदानीं । वस्तु वस्तूपणीं अनश्वर ॥ ७२ ॥
तेवीं उत्पत्ति स्थिति-निदानीं । वस्तु वस्तूपणीं अनश्वर ॥ ७२ ॥
तरंगांच्या आदी, मध्ये व अंती जसे पाण्याच्या रूपाने पाणीच असते, त्याप्रमाणे उत्पत्ति, स्थिति व लय ह्यांमध्ये ब्रह्म हें ब्रह्मरूपानेच अविनाशी असते ७२.
ब्रह्म सत्य प्रपंच वावो । हा साधकां साधावया निर्वाहो ।
कार्यकारणअभिन्नभावो । देवाधिदेवो बोलिला ॥ ७३ ॥
कार्यकारणअभिन्नभावो । देवाधिदेवो बोलिला ॥ ७३ ॥
म्हणून ब्रह्म हे सत्य आहे आणि प्रपंच हा मिथ्या आहे, हा विचार साधकांना समजण्यासाठी कार्यकारणामध्ये अभिन्नभावच आहे, असे देवाधिदेव बोलला ७३.
कार्य कारणीं अभिन्न । तैं ब्रह्मीं माया कैंची भिन्न ।
जगद्रूपें ब्रह्म परिपूर्ण अन्योपदेशें जाण दाविलें ॥ ७४ ॥
जगद्रूपें ब्रह्म परिपूर्ण अन्योपदेशें जाण दाविलें ॥ ७४ ॥
कार्य जर कारणाशी अभिन्न ( एकरूप) आहे, तर ब्रह्मामध्ये माया ही भिन्न कशी ? अशी शंका येईल, यासाठीच ब्रह्म हेंच जगदूरूपाने परिपूर्ण नटलेलें आहे, असे पर्यायाने दाखवून दिले ७४.
ब्रह्म माया काळगती । यें तिन्हीं अनादि म्हणती ।
तेही न घडे उपपत्ती । येचि अर्थीं हरि बोले ॥ ७५ ॥
तेही न घडे उपपत्ती । येचि अर्थीं हरि बोले ॥ ७५ ॥
ब्रह्म, माया आणि काळाची गति ही तिन्ही अनादि आहेत असे म्हणतात, परंतु तेही म्हणणे युक्तीला धरून नाही. याच हेतूनें श्रीकृष्ण सांगतो ७५.
प्रकृतिर्ह्यस्य उपादानं आधारः पुरुषः परः ।
सतोऽभिव्यञ्जकः कालो ब्रह्म तत् त्रितयं त्वहम् ॥ १९ ॥
सतोऽभिव्यञ्जकः कालो ब्रह्म तत् त्रितयं त्वहम् ॥ १९ ॥
[श्लोक १९] या प्रपंचाचे उपादनकारण प्रकृती आहे, आधार परमात्मा आहे आणि यांना प्रगट करणारा काल आहे प्रकृती, परमपुरूष आणि काल ही तिन्ही रूपे खरे पाहता ब्रह्मस्वरूपच आहेत आणि तेच शुद्ध ब्रह्म मी आहे. (१९)
ब्रह्मावेगळी माया । सर्वथा न ये आया ।
ते ब्रह्माधारें वाढोनियां । गुणकार्या वाढवी ॥ ७६ ॥
ते ब्रह्माधारें वाढोनियां । गुणकार्या वाढवी ॥ ७६ ॥
ब्रह्माशिवाय वेगळी अशी माया कधीच दृष्टोत्पत्तीस येत नाही. ती ब्रह्माच्याच आश्रयाने वाढून गुणांचे कार्य वाढविते ७६.
मायानियंतें ब्रह्म आपण । यालागीं यासी पुरुषपण ।
पुरुषाची प्रिया माया पूर्ण । प्रकृति अभिधान या हेतू ॥ ७७ ॥
पुरुषाची प्रिया माया पूर्ण । प्रकृति अभिधान या हेतू ॥ ७७ ॥
मायेचे नियंते स्वतः परब्रह्मच असते, म्हणूनच त्याच्याकडे पुरुषस्व आहे. माया ही त्या पुरुषाची अत्यंत प्रिय आहे, ह्यामुळेच तिला प्रकृति असें नांव आहे ७७.
ब्रह्माहून पुरुष भिन्न । हें सर्वथा मिथ्या वचन ।
ब्रह्म पुरुष नामाभिधान । एकासीचि जाण आलें असे ॥ ७८ ॥
ब्रह्म पुरुष नामाभिधान । एकासीचि जाण आलें असे ॥ ७८ ॥
ब्रह्माहून पुरुष भिन्न आहे असे म्हणणे सर्वस्वी खोटे आहे. ब्रह्म आणि पुरुष ही नावे एकालाच आलेली आहेत असे समज ७८.
माया प्रकृति अभिधान । दोहीं नांवीं मायाचि पूर्ण ।
आविद्यक दावी कार्य भिन्न । अविद्या जाण या हेतू ॥ ७९ ॥
आविद्यक दावी कार्य भिन्न । अविद्या जाण या हेतू ॥ ७९ ॥
माया आणि प्रकृति ही जी दोन नावे आहेत. त्या दोन्ही नावांनी 'माया' असाच अर्थ पूर्णपणे समजावयाचा. ती माया निराळेच अविद्यात्मक कार्य दाखविते, यामुळे तिला ' अविद्या' असे म्हणतात ७९.
माया ब्रह्मींची शक्ति जाण । तेही ब्रह्मेंसीं असे अभिन्न ।
वेगळी नव्हे अर्धक्षण । सदा सुलीन ब्रह्मेंसीं ॥ ४८० ॥
वेगळी नव्हे अर्धक्षण । सदा सुलीन ब्रह्मेंसीं ॥ ४८० ॥
माया ही ब्रह्मांतली शक्ति आहे हे लक्षात ठेव. पण तीसुद्धा ब्रह्माशी एकरूप झालेली आहे. ती त्याच्यापासून अर्धंक्षणही वेगळी होत नाही. ती सदोदित ब्रह्मामध्येच लीन झालेली असते ४८०.
जेवीं शूरांची शौर्यशक्ति पूर्ण । शूरांहोनि नव्हे भिन्न ।
तेवीं ब्रह्मीं मायाशक्ति जाण । असे सुलीन सर्वदा ॥ ८१ ॥
तेवीं ब्रह्मीं मायाशक्ति जाण । असे सुलीन सर्वदा ॥ ८१ ॥
शूरांची शौर्य ही शक्ति ज्याप्रमाणे शूरांहून काही निराळी नव्हे, त्याप्रमाणेच ब्रह्मामध्ये ही मायाशक्ति सदासर्वदा एकरूपच असते ८१.
माया ब्रह्मीं असतां जाण । क्षोभेंवीण नव्हे सर्जन ।
मायाक्षोभकू काळ पूर्ण । काळास्तव जन जन्मती ॥ ८२ ॥
मायाक्षोभकू काळ पूर्ण । काळास्तव जन जन्मती ॥ ८२ ॥
माया ही ब्राह्ममध्येच असते तरीही ती क्षोभल्याशिवाय दृष्टीची उत्पत्ति होत नाही. मायेला क्षोभविणारा काळ होय. ह्या काळापासूनच लोक जन्मास येतात ८२.
ब्रह्मींची सत्ता तो काळ जाण । प्रकृति क्षोभवूनि आपण ।
दावी उत्पत्ति स्थिति निदान । तो काळही अभिन्न ब्रह्मेंसीं ॥ ८३ ॥
दावी उत्पत्ति स्थिति निदान । तो काळही अभिन्न ब्रह्मेंसीं ॥ ८३ ॥
ब्रह्मांतील जी सत्ता, तो काळ होय. तो काळच आपण होऊन प्रकृतीला क्षुब्ध करतो, आणि उत्पत्ति, स्थिति व लय ही दाखवितो. तो काळसुद्धां ब्रह्माशी एकरूपच आहे ८३.
जेवीं रायाच्या राजपुत्रासी । राजाचि दमूं शके त्यासी ।
तेवीं झालें जें प्रकृतीचे कुशीं । तें निजसत्तेसी निर्दळी ॥ ८४ ॥
तेवीं झालें जें प्रकृतीचे कुशीं । तें निजसत्तेसी निर्दळी ॥ ८४ ॥
ज्याप्रमाणे राजाच्या मुलाला राजाच आळा घालू शकतो , त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटी जो काळ जन्मास येतो, त्याला ती आपल्या सत्तेने नष्ट करते ८४.
विवेकदृष्टीं पाहतां जाण । काळ परमात्मा दोन्ही अभिन्न ।
प्रकृति पुरुष काळ जाण । तिहींसी एकपण या हेतू ॥ ८५ ॥
प्रकृति पुरुष काळ जाण । तिहींसी एकपण या हेतू ॥ ८५ ॥
विचारदृष्टीने पाहिले असतां काळ आणि परमात्मा ही दोन्ही एकरूपच आहेत. तात्पर्य प्रकृति, पुरुष आणि काळ या तिघांमध्ये यामुळेच एकरूपता असते ८५.
ब्रह्ममाया-काळसंबंध । हे तिनी मूळींचि अभेद ।
दिसे जो व्यावहारिक भेद । तोही अबद्ध मिथ्यात्वें ॥ ८६ ॥
दिसे जो व्यावहारिक भेद । तोही अबद्ध मिथ्यात्वें ॥ ८६ ॥
ब्रह्म, माया आणि काळ यांचा संबंध असा आहे की, ही तिन्ही मूळचींच एकरूप आहेत. त्यांत जो व्यावहारिक भेद दिसतो, तोही मिथ्यात्वाच्या योगाने असंबद्धच आहे ८६.
वस्तु एकलीचि आपण । प्रकृति-पुरुष काळरूपें जाण ।
अखंडत्वें दावितां पूर्ण । तो मी श्रीकृष्ण परमात्मा ॥ ८७ ॥
अखंडत्वें दावितां पूर्ण । तो मी श्रीकृष्ण परमात्मा ॥ ८७ ॥
ब्रह्म आहे ते एकटें एकच आहे. प्रकृति व पुरुष यांची स्वरूप काळरूपाने वेगळी भासतात. ती अखंडत्वाने पाहिली असता तोच मी श्रीकृष्ण परमात्मा होय ८७.
उत्पत्तीपूर्वी मी ब्रह्म पूर्ण । उत्पत्तीचें मी ब्रह्म आदिकारण ।
स्थितिकाळीं मी ब्रह्मरूपें जाण । एकीं अनेकपण स्वयें दावीं ॥ ८८ ॥
स्थितिकाळीं मी ब्रह्मरूपें जाण । एकीं अनेकपण स्वयें दावीं ॥ ८८ ॥
उत्पत्तीच्या पूर्वी पूर्ण ब्रह्म तो मी; उत्पत्तीचें आदिकारण जें ब्रह्म तें मी; आणि स्थितिकाळी ब्रह्मरूपाने अरुणारा मीच, अशी मी स्वतः एकांतच अनंत रूपं दाखवितों ८८.
स्वलीला सृष्टीचे प्रांतीं जाण । प्रळयीं उरें मी ब्रह्म परिपूर्ण ।
तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ८९ ॥
तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ८९ ॥
आपल्याच लीलेने सृष्टीच्या अखेरीस प्रळय झाल्यानंतर मी परिपूर्ण ब्रह्मस्वरूपच शिल्लक उरतों. या अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगतो ८९.
स्वर्गः प्रवर्तते तावत् पौर्वापर्येण नित्यशः ।
महान् गुणविसर्गार्थः स्थित्यन्तो यावदीक्षणम् ॥ २० ॥
महान् गुणविसर्गार्थः स्थित्यन्तो यावदीक्षणम् ॥ २० ॥
[श्लोक २०] जोपर्यंत परमात्म्याची ईक्षणशक्ती आपले काम करीत राहाते, तोपर्यंत जीवांच्या कर्मभोगासाठी कारणकार्यरूपाने हे विविध सृष्टिचक्र अखंड चालू राहाते. (२०)
महान् म्हणिजे अतिथोरू । पितृपुत्रप्रवाहें संसारू ।
अनवच्छिन्न निरंतरू । अतिदुर्धरू वाढला ॥ ४९० ॥
अनवच्छिन्न निरंतरू । अतिदुर्धरू वाढला ॥ ४९० ॥
पिता, पुत्र, अशा परंपरेनें संसार हा महान् म्हणजे अत्यंत मोठा झालेला आहे. हा अगदी अखंड, निरंतर असणारा आणि अत्यंत दुर्धर असा वाढलेला आहे ४९०.
अतिशयेंसीं दुर्धरू । कैसेनि वाढला संसारू ।
तेही अर्थींचा विचारू । शार्ङ्गधरू सांगत ॥ ९१ ॥
तेही अर्थींचा विचारू । शार्ङ्गधरू सांगत ॥ ९१ ॥
हा संसार अतिशय दुर्धर असा कशाने वाढला ? त्याबद्दलचाही विचार श्रीकृष्ण सांगतो ९१.
विषयांचिये आसक्ती । वासनानिष्ठ झाली वृत्ती ।
ते देहात्मता अतिप्रीतीं । संसारस्थिती वाढवी ॥ ९२ ॥
ते देहात्मता अतिप्रीतीं । संसारस्थिती वाढवी ॥ ९२ ॥
विषयांच्या आसक्तीने वृत्ति ही वासनानिष्ठ होते, आणि ती देहभावनेने अत्यंत प्रेमाने संसाराचे स्वरूप वाढविते ९२.
खवळला जो देहाभिमान । तो शुद्धासी लावी जीवपण ।
नाना योनीं जन्ममरण । विशेषें जाण वाढवी ॥ ९३ ॥
नाना योनीं जन्ममरण । विशेषें जाण वाढवी ॥ ९३ ॥
जो देहाभिमान खवळलेला असतो, तो त्या शुद्ध परब्रह्माला जीवपणा लावतो, आणि नाना प्रकारच्या योनीत जन्ममरण हे मुख्यत्वेकरून वाढवीत असतो ९३.
ऐसेन अतिदुर्धरू । स्रष्टेन सृजिला संसारू ।
तो ब्रह्मायूपर्यंत स्थिरू । ब्रह्मप्रळयीं संहारू सृष्टीचा ॥ ९४ ॥
तो ब्रह्मायूपर्यंत स्थिरू । ब्रह्मप्रळयीं संहारू सृष्टीचा ॥ ९४ ॥
अशा रीतीनें ब्रह्मदेवाने अत्यंत दुर्धर असा संसार उत्पन्न केला आहे. तो ब्रह्मदेवाचे आयुष्य असेपर्यंत असाच कायम राहावयाचा, आणि ब्रह्मप्रळय होईल तेव्हां सृष्टीचा संहार व्हावयाचा ९४.
एक नित्यप्रळयो लागला आहे । एक दैनंदिन प्रळयो पाहें ।
कर्मजन्य प्रळयो लाहे । एक तो होये अवांतर प्रळयो ॥ ९५ ॥
कर्मजन्य प्रळयो लाहे । एक तो होये अवांतर प्रळयो ॥ ९५ ॥
एक नित्यप्रळय लागलेला आहे, आणि एक दैनंदिन प्रळय आहे. तसाच एक कर्मजन्य प्रळय होत असतो आणि एक अवांतर प्रळय होतो ९५.
सकळ प्रळयांच्या शिरीं । ब्रह्मप्रळयाची थोरी ।
तो सकळ सृष्टीतें संहारी । कांहीं संसारीं उरों नेदी ॥ ९६ ॥
तो सकळ सृष्टीतें संहारी । कांहीं संसारीं उरों नेदी ॥ ९६ ॥
पण या सर्व प्रळयांहून श्रेष्ठ अशी ब्रह्मप्रळयाची थोरवी आहे. कारण तो सर्व सृष्टीचा संहार करितो व संसारांत कांहींच शिल्लक उरू देत नाहीं ९६.
ब्रह्मप्रळयीं नाश सृष्टीसी । पुढती रचावया कल्पादीसी ।
उंच नीच नाना योनींसी । नव्या करावयासी कारण काय ॥ ९७ ॥
उंच नीच नाना योनींसी । नव्या करावयासी कारण काय ॥ ९७ ॥
ब्रह्मप्रळयांत सृष्टीचा नाश करावयाचा आणि नंतर नव्या कल्पाच्या आरंभी सृष्टि रचण्याकरिता उंच-नीच अशा नानाप्रकारच्या योनींना नवीन तयार करावयाचे, ह्याला कारण काय ? ९७.
ब्रह्मप्रळयीं सृष्टीचा र्हासू । परी निःशेष नव्हेचि नाशू ।
उरे वासनाबीजविलासू । सुलीन रहिवासू अविद्येअंगीं ॥ ९८ ॥
उरे वासनाबीजविलासू । सुलीन रहिवासू अविद्येअंगीं ॥ ९८ ॥
ब्रह्मप्रळयांतही सृष्टीचा लय होतो खरा, पण निखालस नाश होत नाही. तर वासनारूप बीजविभाग शिल्लक उरतो, आणि तो अविद्येच्या अंगामध्ये पूर्णपणें लीन होऊन राहिलेला असतो ९८.
तेचि बीजें कल्पादि जाण । मीचि स्त्रष्टृरूपें आपण ।
मज म्यां अनुग्रहूनि पूर्ण । सूक्ष्म कारण लक्षविलें ॥ ९९ ॥
मज म्यां अनुग्रहूनि पूर्ण । सूक्ष्म कारण लक्षविलें ॥ ९९ ॥
त्याच वासनारूप बीजाने कल्पाचा आरंभ होतो. ब्रह्मदेवाच्या रूपाने मीच स्वतः मलाच पूर्णपणे अनुग्रह करून ते सूक्ष्म कारण पहावयास लाविले ९९.
जेवीं वर्षाकाळीं नाना तृणें । वाढूनि शरत्काळीं होती पूर्णें ।
तींच उष्ण काळीं बीजकणें । होती सुलीनें पृथ्वीसी ॥ ५०० ॥
तींच उष्ण काळीं बीजकणें । होती सुलीनें पृथ्वीसी ॥ ५०० ॥
ज्याप्रमाणे पावसाळ्यांत नानाप्रकारची गवते वाढून ती शरदृतूंत पूर्ण दशेला येतात, आणि त्याचीच बीजकणे उन्हाळ्यांत पृथ्वीशी मिळून जातात ५००,
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...