मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १९ ओव्या ५०१ ते ५९६
यालागीं दयेचे पोटीं । म्यां सांगितली भाग्याची गोठी ।
भूतदया जयाच्या पोटीं । तो अभाग्य सृष्टीं कदा नोहे ॥ १ ॥
म्हणूनच दयेच्या पोटीं मी तुला भाग्याची गोष्ट सांगितली. ज्याच्या अंतःकरणांत भूतदया असते, तो जगांत अभागी कधीच राहावयाचा नाहीं १.
तुवां पुशिला लाभ तो कोण । ऐक त्याचेंही लक्षण ।
माझी उत्तम भक्ति जाण । 'लाभ' संपूर्ण त्या नांव ॥ २ ॥
माझी उत्तम भक्ति जाण । 'लाभ' संपूर्ण त्या नांव ॥ २ ॥
आतां 'लाभ' तो कोणता ? असाही प्रश्न तूं विचारला आहेस. त्याचेही लक्षण ऐक. माझी जी उत्तम भक्ति तोच संपूर्ण लाभ होय २.
माझी करिता उत्तम भक्ती । चारी मुक्ती पायां लागती ।
सुरवर लोटांगणीं येती । लाभ श्रीपति मी लाभें ॥ ३ ॥
सुरवर लोटांगणीं येती । लाभ श्रीपति मी लाभें ॥ ३ ॥
कारण माझी उत्तम भक्ति केली असतां, चारीही मुक्ति पायाला लागतात. आणि मोठमोठे देवही लोटांगणी येतात. भक्तीनें मुख्यतः मज लक्ष्मीपतीचा लाभ होतो ३.
हा लाभ न येतां हातीं । धनादिकांची जे प्राप्ती ।
तो नाडु जाण निश्चितीं । नरकगतिदायक ॥ ४ ॥
तो नाडु जाण निश्चितीं । नरकगतिदायक ॥ ४ ॥
हा लाभ हाती न येतां द्रव्यादिकांचा होणारा लाभ, हा नरकगति देणारा नुकसानरूपच होय ४.
यालागीं परम लाभ माझी भक्ती । जेणें मी लाभें श्रीपती ।
ऐक विद्येची व्युत्पत्ती । यथानिगुतीं सांगेन ॥ ५ ॥
ऐक विद्येची व्युत्पत्ती । यथानिगुतीं सांगेन ॥ ५ ॥
ह्याकरिता सर्वात श्रेष्ठ लाभ म्हणजे माझी भक्तिच होय. कारण तिच्या योगाने माझा श्रीपतीचा लाभ होतो. आतां विद्येचें स्पष्टीकरण ऐक. तें मी यथार्थ रीतीने सांगतों ५.
दृढ वासनेचिया संबंधा । शुद्धास आणी जीवपदा ।
अभेदीं उपजवी भेदा । 'अविद्याबाधा' या नांव ॥ ६ ॥
अभेदीं उपजवी भेदा । 'अविद्याबाधा' या नांव ॥ ६ ॥
वासनेचा दृढ संबंध जोडून शुद्ध अशा आत्म्याला जी जीवरूपाला आणते व अभेदामध्ये भेद उत्पन्न करते, तिलाच 'अविद्याबाधा' असें नांव आहे ६.
देहाचे माथां वर्णाश्रम । आश्रमाचे माथां कर्म ।
त्या कर्माचा अभिमान परम । तो 'जीवधर्म' देहबुद्धी ॥ ७ ॥
त्या कर्माचा अभिमान परम । तो 'जीवधर्म' देहबुद्धी ॥ ७ ॥
देहाच्या माथ्यावर वर्णाश्रम, आणि आश्रमाच्या माथ्यावर कर्म, आणि त्या कर्माचा प्रबळ अभिमान चढल्यामुळे 'देह हाच मी' अशी बुद्धि उत्पन्न होते. हाच 'जीवधर्म' होय ७.
ते छेदोनि जीवाची बाधा । तो मेळविजे चिदानंदा ।
ती नांव शुद्ध 'आत्मविद्या' । येर ते अविद्या सर्वही ॥ ८ ॥
ती नांव शुद्ध 'आत्मविद्या' । येर ते अविद्या सर्वही ॥ ८ ॥
ती जीवाची बाधा नाहींशी करून त्याला चिदानंदस्वरूपाला मिळविते, तिचेच नांव शुद्ध 'आत्मविद्या' होय. बाकीच्या झाडून साऱ्या अविद्याच होत ८.
जे निरसी गा अविद्या । ते बोलिजे शुद्ध विद्या ।
येरी शास्त्रादि चौदा विद्या । ते जाण अविद्या पाल्हेली ॥ ९ ॥
येरी शास्त्रादि चौदा विद्या । ते जाण अविद्या पाल्हेली ॥ ९ ॥
अविद्येचा जी निरास करते, तिलाच 'शुद्धविद्या' असे म्हणतात. इतर शास्त्रादिक ज्या चौदा विद्या आहेत, ती पल्लव फुटलेली अविद्याच होय असे समजावें ९.
जे निरसी जीवाची बाधा । ते बोलिजे शुद्ध आत्मविद्या ।
आइक ह्रीच्या संबंधा । लाजावें सदा निंद्यकर्मी ॥ ५१० ॥
आइक ह्रीच्या संबंधा । लाजावें सदा निंद्यकर्मी ॥ ५१० ॥
जीवाची बाधा जिच्या योगानें नाहींशी होते, तिलाच शुद्ध 'आत्मविद्या' म्हणतात; आतां 'ह्री ' म्ह० लज्जा तिचे स्वरूप ऐक. निंद्यकर्माविषयीं लज्जा वाटणे याचंच नांव खरी लज्जा होय १०.
केवळ अवयव झांकणें । ते लज्जा येथ कोण म्हणे ।
गेलियाही जीवेंप्राणें । अकर्म न करणें ते 'लज्जा' ॥ ११ ॥
गेलियाही जीवेंप्राणें । अकर्म न करणें ते 'लज्जा' ॥ ११ ॥
केवळ अवयव झांकणे हीच लज्जा असे येथे कोण म्हणणार ? तर जीवप्राण गेला तरी अकर्म म्हणून करावयाचे नाही, तीच खरी 'लज्जा' होय ११.
श्रीर्गुणा नैरपेक्ष्याद्याः सुखं दुःखसुखात्ययः ।
दुःखं कामसुखापेक्षा पण्डितो बन्धमोक्षवित् ॥ ४१ ॥
दुःखं कामसुखापेक्षा पण्डितो बन्धमोक्षवित् ॥ ४१ ॥
[श्लोक ४१] निरपेक्षता इत्यादी गुणच 'श्री' होय सुखदुःखाच्या पलीकडे जाणे म्हणजेच 'सुख' विषयांची कामना हेच 'दुःख' समजावे आणि बंधन व मोक्षाचे तत्त्व जाणणे हेच 'पांडित्य' होय. (४१)
सकळ साम्राज्यवैभवेंसीं । चतुर्दशभुवनविलासेंसीं ।
अंगीं लक्ष्मी आलिया जयापाशीं । परी थुंकोनि तिसी पाहेना ॥ १२ ॥
अंगीं लक्ष्मी आलिया जयापाशीं । परी थुंकोनि तिसी पाहेना ॥ १२ ॥
चौदा भुवनांच्या साऱ्या साम्राज्यवैभवासहित लक्ष्मी प्राप्त झाली तरी जो धुंकूनसुद्धा तिच्याकडे पाहात नाही १२;
ऐशी ज्याची निरपेक्षता । ते उत्कृष्ट 'श्री' तत्त्वतां ।
त्यासी मी श्रीकृष्ण वंदीं माथां । इतरांची कथा कायसी ॥ १३ ॥
त्यासी मी श्रीकृष्ण वंदीं माथां । इतरांची कथा कायसी ॥ १३ ॥
इतकी ज्याची निरपेक्षता तीच खरोखर उत्कृष्ट 'श्री' होय. तशा श्री-मंताला मी प्रत्यक्ष श्रीकृष्णसुद्धा शिरसावंद्य करतो, मग इतरांची कथा काय? १३.
ज्यासी लक्ष्मीची निरपेक्षता । त्याची नित्य वस्ती माझे माथां ।
त्याहीहोनि पढियंता । आणिक सर्वथा मज नाहीं ॥ १४ ॥
त्याहीहोनि पढियंता । आणिक सर्वथा मज नाहीं ॥ १४ ॥
ज्याला लक्ष्मीचीसुद्धा इच्छा नाहीं, तो निरंतर माझ्या मस्तकावरच राहात असतो. त्याच्यापेक्षा आवडता मला दुसरा कोणीच नाही १४.
सुख आणि महादुःख । दोनींतें ग्रासोनियां देख ।
प्रकटे स्वानंद स्वाभाविक । या नांव 'सुख' उद्धवा ॥ १५ ॥
प्रकटे स्वानंद स्वाभाविक । या नांव 'सुख' उद्धवा ॥ १५ ॥
उद्धवा! सुख किंवा महादुःख दोन्ही ग्रासून टाकून 'स्वाभाविक' जो आनंद प्रगट होतो त्याचे नांव 'सुख' १५.
जेथ दुजयाची चाड नाहीं । इंद्रियांचा पांग न पडे कांहीं ।
विषयावीण आनंद हृदयीं । 'निजसुख' पाहीं या नांव ॥ १६ ॥
विषयावीण आनंद हृदयीं । 'निजसुख' पाहीं या नांव ॥ १६ ॥
जिकडे दुसऱ्याची गरज लागत नाही, इंद्रियांचा पांग पडत नाही, आणि विषयांचीही आवश्यकता असत नाहीं; अशा स्थितीत हृदयांत जो आनंद उत्पन्न होतो, त्याचे नाव 'निजात्मसुख' १६.
विसरोनि हें निजसुख । कामापेक्षा करणें देख ।
याचि नांव गा परम 'दुःख' । केवळ ते मूर्ख सेविती ॥ १७ ॥
याचि नांव गा परम 'दुःख' । केवळ ते मूर्ख सेविती ॥ १७ ॥
हें आत्मसुख विसरून विषयाची इच्छा करणे ह्याचंच नांव 'महादुःख '; शुद्ध मूर्ख लोकच त्याचे सेवन करतात १७.
नित्य होतां कामप्राप्ती । कदा नव्हे कामतृप्ती ।
कामापेक्षा पाडी दुःखावर्ती । दुःख निश्चितीं कामापेक्षा ॥ १८ ॥
कामापेक्षा पाडी दुःखावर्ती । दुःख निश्चितीं कामापेक्षा ॥ १८ ॥
रोज रोज जरी विषय प्राप्त झाले, तरी इच्छेची तृप्ति म्हणून होतच नाही. विषयाची इच्छा हीच दुःखाच्या भोवऱ्यांत पाडते. विषयाची इच्छा हेच दुःख होय १८.
हा बंध हा मोक्ष चोख । जाणणें जें अलौकिक ।
कदा नव्हे आनुमानिक । 'पंडित' देख या नांव ॥ १९ ॥
कदा नव्हे आनुमानिक । 'पंडित' देख या नांव ॥ १९ ॥
हा बंध आणि हा मोक्ष हें 'स्पष्ट रीतीने जाणतो, अनुमान' करीत नाही, त्याचेच नांव 'पंडित' १९.
ऐशी न जोडतां अवस्था । आम्ही सज्ञान वेदशास्त्रतां ।
ऐशी अभिमानि पंडितता । ते न ये सर्वथा उपेगा ॥ ५२० ॥
ऐशी अभिमानि पंडितता । ते न ये सर्वथा उपेगा ॥ ५२० ॥
अशी अवस्था न मिळविता, आम्ही वेदशास्त्र शिकून सज्ञान झालों अशा अभिमानाचा पंडितपणा येथे काही उपयोगी पडत नाही ५२०.
ज्यासी शांति आणि समाधान । साचार बंधमोक्षाचें ज्ञान ।
तो 'महापंडित' जाण । ऐसें श्रीकृष्ण बोलिला ॥ २१ ॥
तो 'महापंडित' जाण । ऐसें श्रीकृष्ण बोलिला ॥ २१ ॥
तर ज्याला खरी शांति आणि खरे समाधान प्राप्त झाले आहे , बंध कोणता व मोक्ष कोणता याचे ज्ञान आहे, तोच 'महापंडित' होय, असें श्रीकृष्ण म्हणतात २१.
मूर्खो देहाद्यहंबुद्धीः पन्था मन्निगमः स्मृतः ।
उत्पथश्चित्तविक्षेपः स्वर्गः सत्त्वगुणोदयः ॥ ४२ ॥
उत्पथश्चित्तविक्षेपः स्वर्गः सत्त्वगुणोदयः ॥ ४२ ॥
[श्लोक ४२] शरीर इत्यादींना 'मी' मानणारा तो 'मूर्ख' होय माझी प्राप्ती करून देतो, तोच खरा 'मार्ग' होय चित्ताची बहिर्मुखता हाच 'कुमार्ग' होय सत्त्वगुणाची वृद्धी म्हणजेच 'स्वर्ग' (४२)
वेदशास्त्र नेणता एक । त्यासी मूर्ख म्हणती लोक ।
ते मूर्खता येथें न मने देख । केवळ मूर्ख देहाभिमानी ॥ २२ ॥
ते मूर्खता येथें न मने देख । केवळ मूर्ख देहाभिमानी ॥ २२ ॥
एखादा वेदशास्त्र जाणणारा नसला म्हणजे त्याला लोक 'मूर्ख' म्हणतात ; पण तो मूर्खपणा येथे मान्य नाही. तर केवळ देहाभिमानी असतो तोच येथे 'मूर्ख' समजला जातो २२.
केवळ नश्वर देह देख । तो मी म्हणोनि मानी हरीख ।
देहाभिमानें भोगी नरक । यापरता मूर्ख कोण आहे ॥ २३ ॥
देहाभिमानें भोगी नरक । यापरता मूर्ख कोण आहे ॥ २३ ॥
केवळ नाशवंत देह तोच मी असें समजून हर्ष मानतो, आणि त्या देहाच्या अभिमानाने नरक भोगतो, ह्यापेक्षा मूर्ख दुसरा कोण आहे ? २३.
विटाळें देहाचा संभवो । विटाळें देहाचा उद्भवो ।
विटाळेंचि निधन पहा हो । विटाळासी ठावो देहापाशीं ॥ २४ ॥
विटाळेंचि निधन पहा हो । विटाळासी ठावो देहापाशीं ॥ २४ ॥
विटाळापासूनच देहाची उत्पत्ति ; विटाळापासूनच देहाची वाढ ; आणि विटाळांतच देहाचे निधन ! अशी देहापाशींच विटाळाची वस्ती! २४.
देहाचें निजरूप येथ । अस्थि चर्म विष्ठा मूत्र ।
तो मी म्हणवूनि जो श्लाघत । 'मूर्ख' निश्चित तो जाण ॥ २५ ॥
तो मी म्हणवूनि जो श्लाघत । 'मूर्ख' निश्चित तो जाण ॥ २५ ॥
अशा ह्या देहाचे स्वरूप पहावयास गेले, तर अस्थि, चर्म, विष्ठा आणि मूत्र, असा देहच 'मी' म्हणून आढ्यता मिरवितो, तो खराखुरा 'मूर्ख' होय २५.
ऐशी जे कां देहअहंता । ती नांव परममूर्खता ।
चालणें माझ्या वेदपंथा । 'सन्मार्गता' ती नांव ॥ २६ ॥
चालणें माझ्या वेदपंथा । 'सन्मार्गता' ती नांव ॥ २६ ॥
अशी जी देहाची अहंता तिचंच नांव खास 'मूर्खता' होय. माझ्या वेदमार्गाने चालणें तोच 'सन्मार्ग' होय २६.
ज्यासी जाहली चित्तविक्षेपता । तो निंदी गुरुदेवता ।
जो न मानी वेदशास्त्रार्था । तो उत्पथामाजीं पडे ॥ २७ ॥
जो न मानी वेदशास्त्रार्था । तो उत्पथामाजीं पडे ॥ २७ ॥
ज्याला चित्तभ्रंश झाला असेल तोच गुरूची व देवाची निंदा करतो. जो वेदशास्त्रार्थ मानीत नाही, तोच आडमार्गात जाऊन पडतो २७.
जो गुरुदोषदर्शी समत्सरता । जो क्रोध करी सुहृदआप्तां ।
जो धिक्कारी मातापिता । 'चित्तविक्षेपता' त्या नांव ॥ २८ ॥
जो धिक्कारी मातापिता । 'चित्तविक्षेपता' त्या नांव ॥ २८ ॥
जो मत्सरपूर्वक गुरुदोषदर्शी असतो, जो सुहृदआप्तांशी रागाने वागतो, जो मातापित्यांचा धिक्कार करतो त्याचे नांव 'चित्तविक्षेप' होय २८.
जो सन्मानालागीं पाही । साधुसज्जनांतें करी द्रोही ।
जो दोष देखे ठायीं ठायीं । 'चित्तविक्षेप' पाहीं या नांव ॥ २९ ॥
जो दोष देखे ठायीं ठायीं । 'चित्तविक्षेप' पाहीं या नांव ॥ २९ ॥
जो आपल्या सन्मानासाठी साधुसंतांचा द्रोह करतो, जो जागोजागी दोष मात्र पाहातो, त्यालाच 'चित्तविक्षेप' असे म्हणतात २९.
जो वदे परापवादा । जो करूं रिघे परनिंदा ।
जो विश्वासे स्त्रियेचे शब्दा । 'चित्तविक्षेपबाधा' । ती नांव ॥ ५३० ॥
जो विश्वासे स्त्रियेचे शब्दा । 'चित्तविक्षेपबाधा' । ती नांव ॥ ५३० ॥
जो दुसऱ्याचे दोष उच्चारतो, जो दुसऱ्याची निंदा करितो, जो स्त्रीच्या शब्दावर विश्वास ठेवतो, त्याला चित्तभ्रंश विकार झाला म्हणून समजावें ५३०.
जो सन्मार्गापासूनि चेवता । पडे अधर्मअकर्मउत्पथा ।
तेही 'चित्तविक्षेपता' । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ३१ ॥
तेही 'चित्तविक्षेपता' । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ३१ ॥
जो सन्मार्गापासून निघून अधर्मात किंवा अकर्मात पडतो; तोही उद्ध्वा! खरोखर चित्तभ्रंशच होय ३१.
आपण तत्त्वतां परब्रह्म । जाणणें हा 'वेदमार्ग' उत्तम ।
हें नेणोनि वर्तणें सकाम । तोचि परम 'उन्मार्ग' ॥ ३२ ॥
हें नेणोनि वर्तणें सकाम । तोचि परम 'उन्मार्ग' ॥ ३२ ॥
आपण खरोखरीच परब्रह्म आहों, असें जाणणे हाच उत्तम 'वेदमार्ग' होय. हे न जाणतां लोभ धरून वागणे तोच मोठा असन्मार्ग' होय ३२.
स्वर्गशब्दाची व्युत्पत्ती । ते सत्त्वगुणाची उत्पत्ती ।
जेणें निजसुखाची होय प्राप्ती । परी इंद्रलोकगति तो स्वर्ग नोहे ॥ ३३ ॥
जेणें निजसुखाची होय प्राप्ती । परी इंद्रलोकगति तो स्वर्ग नोहे ॥ ३३ ॥
आतां स्वर्ग शब्दाचा अर्थ असा की, ज्याच्या योगाने आत्मसुखाची प्राप्ति होते असा जो 'सत्त्वगुण तो स्वर्ग' इंद्रलोकाला जाणे हा स्वर्ग नव्हे ३३.
अमरभुवना जे जे गेले । ते परतोनि पतना आले ।
शुद्धसत्त्वीं जे मिसळले । ते पावले निजसुख ॥ ३४ ॥
शुद्धसत्त्वीं जे मिसळले । ते पावले निजसुख ॥ ३४ ॥
कारण इंद्रलोकाला जे जातात ते पुन्हा माधारे येतात; पण शुद्धसत्त्वामध्ये जे मिसळतात, ते निजसुखाला पोचतात ३४.
ऐसा जो कां सत्त्वगुण । तोचि येथें 'स्वर्ग' जाण ।
आतां नरकाचें लक्षण । तुज संपूर्ण सांगेन ॥ ३५ ॥
आतां नरकाचें लक्षण । तुज संपूर्ण सांगेन ॥ ३५ ॥
असा जो का सत्वगुण तोच येथे 'स्वर्ग' असे समजावें. आतां नरकाचेही सारे लक्षण तुला सांगतों ३५.
नरकस्तमउन्नाहो बंधुर्गुरुरहं सखे ।
गृहं शरीरं मानुष्यं गुणाढ्यो ह्याढ्य उच्यते ॥ ४३ ॥
गृहं शरीरं मानुष्यं गुणाढ्यो ह्याढ्य उच्यते ॥ ४३ ॥
[श्लोक ४३] तमोगुणाची वृद्धीच 'नरक' होय गुरूच खरा 'बंधू' होय आणि तो गुरू मी आहे हे मनुष्यशरीर हेच खरे 'घर' आहे तसेच जो गुणांनी संपन्न आहे तोच 'धनवान' समजावा. (४३)
कामक्रोधलोभउद्रेक । तेणें खवळे महामोह देख ।
तो बुडवी सज्ञान विवेक । एकलें एक तम वाढे ॥ ३६ ॥
तो बुडवी सज्ञान विवेक । एकलें एक तम वाढे ॥ ३६ ॥
काम, क्रोध आणि लोभ यांच्या ज्या उसळ्या येतात, त्यामुळे महामोह खवळून उठतो; तो ज्ञानासहवर्तमान विवेकाला बुडवून टाकतो; तेव्हां एकटा तमोगुणच वाढत असतो ३६.
अरुणोदयीं दाट कुहर । निबिड पडे अंधकार ।
न कळे दिवसनिशाव्यवहार । सूर्यचंद्र दिसेना ॥ ३७ ॥
न कळे दिवसनिशाव्यवहार । सूर्यचंद्र दिसेना ॥ ३७ ॥
अरुणोदयाच्या वेळी धुकेच धुके माजून राहते, गर्द अंधार होतो, त्या वेळी सूर्यचंद्रही दिसत नसल्यामुळे आता दिवस आहे की रात्र आहे ही स्थिति कळत नाहीं ३७.
यापरी गा निजचित्तीं । अंधतमे वाढे वृत्ती ।
कर्तव्याकर्तव्यस्थिती । एकही स्फूर्ति स्फुरेना ॥ ३८ ॥
कर्तव्याकर्तव्यस्थिती । एकही स्फूर्ति स्फुरेना ॥ ३८ ॥
ह्याप्रमाणे आपल्या चित्तांत अंधतम वृत्ति वाढून राहते. आणि कर्तव्य कोणतें व अकर्तव्य कोणते, यांपैकी एकही स्फूर्ति स्फुरत नाही! ३८,
ऐसा तमाचा उन्नाह उद्रेक । त्या नांव जाण 'महानरक' ।
परी यमयातना जें दुःख । तो नरक म्हणों नये ॥ ३९ ॥
परी यमयातना जें दुःख । तो नरक म्हणों नये ॥ ३९ ॥
असा जो तमोगुणाचा 'उन्नाह' म्ह० उद्रेक होतो. त्याचेच नांव 'महानरक' होय. यमयातनेचे जें दुःख त्याला नरक म्हणूं नये ३९.
यमयातनां पाप झडे । महामोहें पाप वाढे ।
याम्य नरक ते बापुडे । अतिनरक गाढे महामोहीं ॥ ५४० ॥
याम्य नरक ते बापुडे । अतिनरक गाढे महामोहीं ॥ ५४० ॥
कारण यमयातनेने पाप झडून जाते, पण महामोहाने पाप वाढत असते. यमलोकांतले नरक 'यापुढे ' म्हणजे तुच्छ होत; महामोहांतले नरक हेच मोठे नरक समजावे ५४०.
काम क्रोध लोभ देख । हेचि तीनी निरयदायक ।
तेथ महामोहो आवश्यक । जें होय एक अंधतम ॥ ४१ ॥
तेथ महामोहो आवश्यक । जें होय एक अंधतम ॥ ४१ ॥
काम, क्रोध आणि लोभ हे तिघे नरक देणारे आहेतच, त्यांत महामोह एक मिळाला म्हणजे 'अंधतम' बनतो ४१.
इतुका मिळे जेथ समुदावो । त्यांते बोलिजे 'तमउन्नाहो' ।
ऐसा जेथ घडे भावो । तो पुरुष पहा हो नरकरूप ॥ ४२ ॥
ऐसा जेथ घडे भावो । तो पुरुष पहा हो नरकरूप ॥ ४२ ॥
इतका समुदाय जेव्हां एकत्र जमतो, तेव्हां त्याला 'तमउन्नाह ' असे म्हणतात. इतकी ज्याची स्थिति घडून येईल तो पुरुष 'नरकरूपच' समजावा ४२.
जो घोरनरकाप्रती जाये । त्याचा तेथूनि उद्धार होये ।
'तमउन्नाह' ज्या प्राप्त होये । त्याचा निर्गम नोहे महाकल्पांतीं ॥ ४३ ॥
'तमउन्नाह' ज्या प्राप्त होये । त्याचा निर्गम नोहे महाकल्पांतीं ॥ ४३ ॥
जो घोर नरकाला जातो त्याचा येथून उद्धार तरी होतो; पण ज्याला 'तमउन्नाह ' प्राप्त होतो, त्याचा महाकल्पांतींही उद्धार होत नाही ४३.
ऐशी तमउन्नाहाची ख्याती । ऐकोनि उद्धव कंटाळे चित्तीं ।
ऐसे बुडते जीव तमोवृत्तीं । त्यांची उद्धारगति कोण करी ॥ ४४ ॥
ऐसे बुडते जीव तमोवृत्तीं । त्यांची उद्धारगति कोण करी ॥ ४४ ॥
अशी 'तम उन्नाहा' ची ख्याति श्रवण करून उद्धवाच्या मनाला कंटाळा आला आणि तो मनांत म्हणाला की, अशा तमोवृत्तीत बुडणाऱ्या जीवांचा उद्धार तरी कोण करणार? ४४.
ऐसा उद्धवाचा भावो । जाणोनि बोलिला देवाधिदेवो ।
बुडतयातें उद्धरी पहा हो । गुरुरावो निजसखा ॥ ४५ ॥
बुडतयातें उद्धरी पहा हो । गुरुरावो निजसखा ॥ ४५ ॥
हा उद्धवाच्या मनात आलेला अभिप्राय जाणून देवाधिदेव म्हणाले, अहो अशा बुडणाज्या लोकांचा निज सखा जो गुरु तो उद्धार करतो ४५.
ऐसा गुरु तो तूं कोण म्हणशी । मी नित्य लागें ज्याच्या पायांशीं ।
जो दे चिन्मात्र पूर्णब्रह्मासी । 'गुरु' नाम तयासी बोलिजे ॥ ४६ ॥
जो दे चिन्मात्र पूर्णब्रह्मासी । 'गुरु' नाम तयासी बोलिजे ॥ ४६ ॥
आतां असा गुरु कोण? असे म्हणशील, तर मी नित्य ज्याच्या पायाला लागतों, जो चिन्मात्र ब्रह्मरूप प्राप्त करून देतो, त्यालाच 'गुरु' असे म्हणतात ४६.
त्या ब्रह्मापरीस अधिकता । गुरूसी आलिसे तत्त्वतां ।
ब्रह्म ब्रह्मत्वें हा प्रतिपादिता । येर्हवीं ब्रह्माची वार्ता कोण पुसे ॥ ४७ ॥
ब्रह्म ब्रह्मत्वें हा प्रतिपादिता । येर्हवीं ब्रह्माची वार्ता कोण पुसे ॥ ४७ ॥
खरोखर त्या गुरूची योग्यता ब्रह्मापेक्षाही अधिक आहे. कारण ब्रह्माला 'हे ब्रह्म' म्हणून प्रतिपादन करणारा अथवा दाखवून देणारा तो असतो. एरव्ही ब्रह्माची वार्ता विचारलीच असती कोणी? ४७.
अज अव्यय अनंत । अच्छेद्य अभेद्य अपरिमित ।
हे ब्रह्ममहिमा समस्त । सद्गुरूंनीं येथ विस्तारिली ॥ ४८ ॥
हे ब्रह्ममहिमा समस्त । सद्गुरूंनीं येथ विस्तारिली ॥ ४८ ॥
ते अज आहे; अव्यय आहे; तसेंच अनंत, अच्छेद्य, अभेद्य व अपरिमित आहे, अशा प्रकारचा ब्रह्माचा महिमा सारा सद्गुरूंनीच जगांत प्रसृत केला आहे ४८.
ऐशी ऐकतां सद्गुरुकीर्ती । जडजीव उद्धरती ।
'गुरु' नामाची महाख्याती । ऐकोनि कांपती यमकाळ ॥ ४९ ॥
'गुरु' नामाची महाख्याती । ऐकोनि कांपती यमकाळ ॥ ४९ ॥
अशी सद्गुरूची कीर्ति श्रवण केल्याने जडजीवांचा उद्धार होतो. 'गुरु' नामाची ख्याति फार मोठी आहे. ती ऐकून यम व काळसुद्धा कापू लागतात ४९.
त्या सद्गुरूचें महिमान । करी बुडत्याचें उद्धरण ।
निवारी जन्ममरण । शिष्यसमाधान निजदाता ॥ ५५० ॥
निवारी जन्ममरण । शिष्यसमाधान निजदाता ॥ ५५० ॥
त्या सद्गुरूचा महिमाच बुडत्याचा उद्धार करतो, आणि जन्ममरणाचे निवारण करून शिष्याला समाधान देतो ५५०.
सुहृद आप्त सखा बंधु । शिष्याचे सद्गुरु प्रसिद्धु ।
निवारूनि नरकसंबंधु । परमानंदु सुखदाता ॥ ५१ ॥
निवारूनि नरकसंबंधु । परमानंदु सुखदाता ॥ ५१ ॥
शिष्याचा आप्त, सखा, बंधु सर्व सद्गुरुच असल्याचे प्रसिद्ध आहे. तोच नरकाचा संबंध चुकवून परमानंद सुख देणारा आहे ५१.
आतां गृहाचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण ।
माड्या गोपुरें धवलारें जाण । गृहप्रमाण तें नव्हे ॥ ५२ ॥
माड्या गोपुरें धवलारें जाण । गृहप्रमाण तें नव्हे ॥ ५२ ॥
आतां गृहाचे लक्षण तुला मी सांगतो. माड्या, गच्च्या, बंगले हें कांहीं खरोखर घर नव्हे ५२.
मनुष्यदेह तो गृहाश्रम । जेथें नित्य वसें मी पुरुषोत्तम ।
तेथील करितां स्वधर्मकर्म । आत्माराम उल्हासे ॥ ५३ ॥
तेथील करितां स्वधर्मकर्म । आत्माराम उल्हासे ॥ ५३ ॥
तर मनुष्यदेह हाच गृहाश्रम होय. त्यांतच मी पुरुषोत्तम विशेषत्वाने राहात असतो. त्या गृहातील स्वधर्मकर्म केले असतां आत्मारामाला संतोष होतो ५३.
ज्या नरदेहाचिये प्राप्ती । इंद्रादिक देव वांछिती ।
वेद वानी ज्या देहाची कीर्ति । निजमोक्षप्राप्ती नरदेहीं ॥ ५४ ॥
वेद वानी ज्या देहाची कीर्ति । निजमोक्षप्राप्ती नरदेहीं ॥ ५४ ॥
ज्या नरदेहाच्या प्राप्तीची इंद्रादिक देवही इच्छा करतात, आणि वेदही ज्या देहाची कीर्ति वर्णन करतो, त्या नरदेहामध्येच मोक्षप्राप्ति होते ५४.
निज 'गृह' जें साचार । तें जाणावें नरशरीर ।
आतां आढ्यपणाचा विचार । तोही प्रकार अवधारीं ॥ ५५ ॥
आतां आढ्यपणाचा विचार । तोही प्रकार अवधारीं ॥ ५५ ॥
ह्याकरिता आपलें 'घर' म्हणून जें म्हणतात तें नरशरीर म्हणून समजावें. आता ' आढ्यतेचा जो विचार तोही ऐक ५५.
जो ज्ञानगुणीं अतिसंपन्न । जें कल्पांतींही न वेंचे धन ।
तोचि 'आढ्यतम' जाण । येर तें धन नश्वर ॥ ५६ ॥
तोचि 'आढ्यतम' जाण । येर तें धन नश्वर ॥ ५६ ॥
जो ज्ञानगुणाने अत्यंत संपन्न असतो, जे धन कल्पांतीही संपत नाहीं; त्यालाच मोठा 'आढ्य ' म्हणजे श्रीमान् म्हणावें. कारण इतर सारें धन नश्वर आहे ५६.
नश्वर धनाची आढ्यता । अवश्य नेत अधःपाता ।
ज्ञानधने जे आढ्यता । तेणें ये हाता परब्रह्म ॥ ५७ ॥
ज्ञानधने जे आढ्यता । तेणें ये हाता परब्रह्म ॥ ५७ ॥
नश्वर धनाची जी आढ्यता म्ह• श्रीमंती आहे, ती हटकून अधःपाताला मात्र नेते, परंतु ज्ञानधनाची जी श्रीमंती तिनें परब्रह्म हाती लागतें ५७.
दरिद्रो यस्त्वसंतुष्टः कृपणो योऽजितेन्द्रियः ।
गुणेष्वसक्तधीरीशो गुणसङ्गो विपर्ययः ॥ ४४ ॥
गुणेष्वसक्तधीरीशो गुणसङ्गो विपर्ययः ॥ ४४ ॥
[श्लोक ४४] जो असंतुष्ट असतो तो 'दरिद्री' होय इंद्रिये ताब्यात नसलेला तो 'कृपण' होय ज्याची चित्तवृत्ती विषयांमध्ये आसक्त नाही, तोच 'ईश्वर' याच्या उलट जो विषयांमध्ये आसक्त आहे, तोच 'असमर्थ'. (४४)
ऐक दरिद्राचें लक्षण । गांठीं असतां कोटी धन ।
ज्याचें संतुष्ट नाहीं मन । परम 'दरिद्री' जाण या नांव ॥ ५८ ॥
ज्याचें संतुष्ट नाहीं मन । परम 'दरिद्री' जाण या नांव ॥ ५८ ॥
आतां 'दरिद्रा'चे लक्षण ऐक. कोट्यवधी द्रव्य गांठीला असूनही ज्याचे मन संतुष्ट नाही, त्याचेच नांव खरा ' दरिद्री' ५८.
ज्याचे गांठीं नाहीं कांचवटी । परी संतुष्टता नित्य पोटीं ।
तोचि संपन्न सकळ सृष्टीं । सत्य गोष्टी हे उद्धवा ॥ ५९ ॥
तोचि संपन्न सकळ सृष्टीं । सत्य गोष्टी हे उद्धवा ॥ ५९ ॥
परंतु ज्याच्या गांठीला एक कपर्दिकही नाही, पण मनांत जर नित्य संतोष असेल, तर उद्धवा ! तोच सर्व जगामध्ये 'संपन्न' ही गोष्ट खरी समज ५९.
गांठीं असोनियां धन । जो पोटा न खाय आपण ।
सदा लोलिंगत मन । दरिद्रलक्षण या नांव ॥ ५६० ॥
सदा लोलिंगत मन । दरिद्रलक्षण या नांव ॥ ५६० ॥
पदरीं द्रव्य असून जो पोटालाही खात नाहीं, सदासर्वदा मन लोभावलेले, ह्याचंच नाव 'दरिद्रलक्षण' ५६०.
यापरी जें कृपणपण । ऐक त्याचेंही लक्षण ।
जेवीं राजा बांधी सेवकजन । तेवीं इंद्रियांअधीन जो होय ॥ ६१ ॥
जेवीं राजा बांधी सेवकजन । तेवीं इंद्रियांअधीन जो होय ॥ ६१ ॥
ह्यानंतर 'कृपण' कोणाला म्हणतात, त्याचेही लक्षण ऐक. राजाला ज्याप्रमाणे त्याच्या सेवकांनी बांधून ठेवावे, त्याप्रमाणे तो इंद्रियांच्या अधीन असतो ६१.
निर्धारितां निजरूप जाण । सर्वांचा राजा तो आपण ।
तें विसरोनि होय दीन । इंद्रियांअधीन होऊनि ठाके ॥ ६२ ॥
तें विसरोनि होय दीन । इंद्रियांअधीन होऊनि ठाके ॥ ६२ ॥
आपल्या स्वरूपाचा विचार केला, तर सर्वांचा राजा तो आपण होय. हे विसरून दीन होऊन इंद्रियांच्या अधीन होऊन बसतो ६२.
मन तयाचें आज्ञाधार । मनाचीं इंद्रियें किंकर ।
त्यांचाही हा होय डिंगर । अजितेंद्रियें होय थोर 'कृपणत्व' ऐसें ॥ ६३ ॥
त्यांचाही हा होय डिंगर । अजितेंद्रियें होय थोर 'कृपणत्व' ऐसें ॥ ६३ ॥
वास्तविक मन आत्म्याचे आज्ञाधारक म्हणजे चाकर, आणि इंद्रिये ही त्या मनाचे चाकर; परंतु त्यांचाही हा दासानुदास बनतो. याप्रमाणे इंद्रियाधीनतेमुळे हें थोर ‘कृपणत्व' म्ह. दीनत्व येते ६३.
निज किंकराचीं किंकरें । त्या इंद्रियांचीं हा वोळंगे द्वारें ।
अजितेंद्रियत्वें अतिखरें । निजांगीं सुभरे कृपणत्व ॥ ६४ ॥
अजितेंद्रियत्वें अतिखरें । निजांगीं सुभरे कृपणत्व ॥ ६४ ॥
आपल्या चाकरांचे चाकर जी इंद्रिये, त्यांचे हा उंबरठे पूजीत बसतो. अशा प्रकारें इंद्रिये शिरजोर होऊ दिल्यामुळे आपल्या अंगांत खरोखरीचे 'कृपणत्व' येते ६४.
या नांव गा 'कृपणपण' । तुज म्यां सांगितले जाण ।
आतां ईश्वराचें सुलक्षण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥ ६५ ॥
आतां ईश्वराचें सुलक्षण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥ ६५ ॥
याचेच नाव 'कृपणपणा ' म्ह. दीनदुबळेपणा. तो तुला सांगितला. आता उद्धवा ! ईश्वरपणाचे खरे लक्षण सांगतों तें ऐक ६५.
कनक आणि कामिनी । ज्यासी नावडे मनींहुनी ।
तोचि 'ईश्वर' त्रिभुवनीं । सत्य सत्य हे वाणी उद्धवा ॥ ६६ ॥
तोचि 'ईश्वर' त्रिभुवनीं । सत्य सत्य हे वाणी उद्धवा ॥ ६६ ॥
उद्धवा ! कनक आणि कामिनी ज्याला मनापासून आवडत नाहीत, तोच खरोखर त्रिभुवनांतील 'ईश्वर' होय. ही माझी वाणी अगदी त्रिवार सत्य आहे ६६.
तुवां जितुके केले प्रश्न । तितुके ज्यासी वोळंगती गुण ।
त्यांसीही ज्याचें अलिप्तपण । ईश्वरत्व संपूर्ण त्या नांव ॥ ६७ ॥
त्यांसीही ज्याचें अलिप्तपण । ईश्वरत्व संपूर्ण त्या नांव ॥ ६७ ॥
तू जितके प्रश्न केले होतेस तितकेही गुण ज्याच्याकडे असतात, पण जो त्या गुणांपासून अलिप्त असतो, त्यालाच परिपूर्ण 'ईश्वर' असें नांव शोभते ६७.
कनक आणि कामिनी । यांचा पंगिस्त मनींहूनी ।
तोचि 'अनीश्वरु' जनीं । हें सत्य मानीं उद्धवा ॥ ६८ ॥
तोचि 'अनीश्वरु' जनीं । हें सत्य मानीं उद्धवा ॥ ६८ ॥
पण उद्धवा! कनक आणि कामिनी ह्यांची मनापासून ज्याला आसक्ति असते, तो जगांतील 'अनीश्वर' होय हे पक्के लक्षात ठेव ६८.
शमादि सांगितले प्रश्न । त्यांचें जें विपरित लक्षण ।
तेंचि अनीश्वरत्व जाण । अशमादि गुण जे ठायीं ॥ ६९ ॥
तेंचि अनीश्वरत्व जाण । अशमादि गुण जे ठायीं ॥ ६९ ॥
ह्याप्रमाणे शमादि प्रश्नांचे उत्तर मी सांगितले. त्यांच्याविरुद्ध जे लक्षण म्ह. अशमादिक गुण अंगांत असणे, हेच 'अनीश्वरत्व' असें तूं समज ६९.
एत उद्धव ते प्रश्नाः सर्वे साधु निरूपिताः ।
किं वर्णितेन बहुना लक्षणं गुणदोषयोः ॥ ४५ ॥
किं वर्णितेन बहुना लक्षणं गुणदोषयोः ॥ ४५ ॥
[श्लोक ४५] उद्धवा ! तू जितके प्रश्न विचारले होतेस, त्या सर्वांची मी उत्तरे दिली गुण आणि दोषांची वेगवेगळी लक्षणे मी तुला किती म्हणून सांगू ? (४५)
उद्धवा तुझे सकळ प्रश्न । म्यां निरूपिले सुलक्षण ।
जेणें होइजे ब्रह्मसंपन्न । तैसें व्याख्यान सांगितले ॥ ५७० ॥
जेणें होइजे ब्रह्मसंपन्न । तैसें व्याख्यान सांगितले ॥ ५७० ॥
उद्धवा! तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरें मी विशद करून सांगितली. जेणेकरून ब्रह्मस्वरूप होता येईल. असेंच व्याख्यान करून सांगितले ५७०.
संसारीं गुणदोषलक्षण । सांगता अपरिमित जाण ।
यालागीं धरावें गा मौन । परम कठिण गुणदोष ॥ ७१ ॥
यालागीं धरावें गा मौन । परम कठिण गुणदोष ॥ ७१ ॥
संसारांतील गुणदोषांची लक्षणे सांगू लागले तर ती असंख्य आहेत. सांगून संपणार नाहीत. गुणदोषांचे विवेचन करणे फार कठीण आहे. ह्याकरितां मौन धरणेच बरें ७१.
गुणदोष नायकावे कानीं । गुणदोष न देखावे नयनीं ।
गुणदोष न बोलावे वदनीं । गुणदोष मनीं न धरावे ॥ ७२ ॥
गुणदोष न बोलावे वदनीं । गुणदोष मनीं न धरावे ॥ ७२ ॥
कारण, गुणदोष हे कानांनी ऐकू नयेत; गुणदोष डोळ्यांनी पाहूं नयेत; गुणदोष तोंडाने बोलू नयेत; फार काय सांगावें? गुणदोष मनांतही वागवू नयेत ७२.
ब्रह्मज्ञानाचें मुख्य लक्षण । तेंही बहुत नाहीं निरूपण ।
श्लोकार्धें श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगत ॥ ७३ ॥
श्लोकार्धें श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगत ॥ ७३ ॥
आतां ब्रह्मज्ञानाचे मुख्य लक्षण म्हणशील, तर त्याचे निरूपण फारसें नाही. ते अर्ध्याच श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांगून देत आहेत ७३.
गुणदोषदृशिर्दोषो गुणस्तूभयवर्जितः ॥ ४६ ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे एकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे एकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥
[श्लोक ४६] सगळ्यांचा सारांश एवढाच की, गुण आणि दोष पाहात राहाणे हाच सर्वात मोठा दोष आहे आणि गुणदोषांकडे दृष्टी न देणे हाच सर्वात मोठा गुण होय. (४५)
ब्रह्म एक परिपूर्ण । तेथें कैंचे दोष कैंचे गुण ।
अविद्या क्षोभली ते जाण । गुणदोषलक्षण वाढवी ॥ ७४ ॥
अविद्या क्षोभली ते जाण । गुणदोषलक्षण वाढवी ॥ ७४ ॥
सर्वत्र एक परिपूर्ण ब्रह्मच आहे. त्यांत दोष कोणचे व गुण कोणचे ? अविद्या क्षुब्ध होते, तीच गुणदोषांचे लक्षण वाढविते ७४.
जो देखों लागे दोषगुण । त्याची अविद्या क्षोभली जाण ।
जो न देखे गुणदोषभान । तो 'ब्रह्मसंपन्न' उद्धवा ॥ ७५ ॥
जो न देखे गुणदोषभान । तो 'ब्रह्मसंपन्न' उद्धवा ॥ ७५ ॥
ह्याकरितां जो गुणदोष पाहू लागतो, त्याची अविद्या क्षुब्ध झाली म्हणून समजावें. आणि उद्धवा! जो गुणदोषभान मुळीच पाहात नाही, तो ब्रह्मसंपन्न झाला म्हणून समजावें ७५.
पराचा देखावा दोषगुण । हाचि दोषांमाजीं महादोष जाण ।
गुणदोष न देखावा आपण । हा उत्तम गुण सर्वार्थीं ॥ ७६ ॥
गुणदोष न देखावा आपण । हा उत्तम गुण सर्वार्थीं ॥ ७६ ॥
दुसऱ्याचे गुणदोष पाहाणे हाच सर्व दोषांमध्ये मोठा दोष आहे आणि गुणदोष न पाहाणे हाच सर्वांमध्ये उत्तम गुण आहे ७६.
ब्रह्मीं नाहींत दोषगुण । हें सर्वार्थीं सत्य जाण ।
जो देखे गा दोषगुण । ब्रह्मत्व जाण तेथें नाहीं ॥ ७७ ॥
जो देखे गा दोषगुण । ब्रह्मत्व जाण तेथें नाहीं ॥ ७७ ॥
ब्रह्मामध्ये कांहीं गुणदोष नाहीत, हे सर्वथैव सत्य आहे. यास्तव जो गुणदोष पाहातो, त्याच्या ठिकाणी ब्रह्मत्व नाही हे सहज सिद्ध होते ७७.
जे गुणदोष देखों लागले । त्यांचें ब्रह्मत्व कैसेनि गेलें ।
त्यांपाशीं तें वोस जाहलें । कीं रुसूनि गेलें तेथूनी ॥ ७८ ॥
त्यांपाशीं तें वोस जाहलें । कीं रुसूनि गेलें तेथूनी ॥ ७८ ॥
जे गुणदोष पाहू लागतात त्यांचे ब्रह्मत्व कसें लोपते ? त्यांच्यापाशीं तें वोस पडते किंवा त्यांना सोडून तें जातें? ७८.
जेवीं रविबिंबा राहु ग्रासी । तैं दिवसा देखिजे नक्षत्रांसी ।
तेवीं अविद्या ब्रह्मत्व जैं प्राशी । तैं गुणदोषांसी देखिजे ॥ ७९ ॥
तेवीं अविद्या ब्रह्मत्व जैं प्राशी । तैं गुणदोषांसी देखिजे ॥ ७९ ॥
(असें म्हणशील तर सांगतों ऐक) रविबिंबाचा जेव्हां राहु ग्रास करतो, तेव्हां दिवसांही नक्षत्रे दृष्टीस पडतात. त्याप्रमाणे अविद्या ब्रह्मत्वाला जेव्हां प्राशून टाकते, तेव्हांच गुणदोष दृष्टीस पडू लागतात ७९.
आदरें सांगे श्रीकृष्ण । उद्धवा न देखावे दोषगुण ।
हे माझे जीवींची निजखूण । तुज म्यां संपूर्ण सांगितली ॥ ५८० ॥
हे माझे जीवींची निजखूण । तुज म्यां संपूर्ण सांगितली ॥ ५८० ॥
श्रीकृष्ण आदराने सांगतात की, उद्धवा ! कोणाचेही गुणदोष पाहूं नयेत हीच माझ्या जीवींची खूण आहे. ती सगळी मी तुला सांगितली ५८०.
जनीं चौर्यांशीं लक्षयोनी । त्यांत गुणदोष एके स्थानीं ।
न देखावे मनुष्ययोनीं । तूं इतुकेनी नित्यमुक्त ॥ ८१ ॥
न देखावे मनुष्ययोनीं । तूं इतुकेनी नित्यमुक्त ॥ ८१ ॥
जगामध्ये चौऱ्यायशी लक्ष योनी आहेत; त्यांपैकी एका मनुष्ययोनीतील गुणदोष जरी न पाहिले, तरी तेवढ्यानेही तूं नित्यमुक्तच होशील ८१.
म्हणसी स्वाचारपरिपाठीं । गुणदोष देखावे दृष्टीं ।
उद्धवा हे गोष्टी खोटी । स्वधर्मराहाटी ते भिन्न ॥ ८२ ॥
उद्धवा हे गोष्टी खोटी । स्वधर्मराहाटी ते भिन्न ॥ ८२ ॥
आता कदाचित् तू असें म्हणशील की, स्वधर्माचरण करीत असतां गुणदोष हे पाहिलेच पाहिजेत. पण उद्धवा ! हे म्हणणें निखालस खोटें आहे. कारण स्वधर्माची राहाटी ही याहून अगदी भिन्न आहे ८२.
निजदोष निरसावयाकारणें । स्वधर्मकर्म आचरणें ।
तेणें गुणदोष देखणें । तैं नागवी धांवणें तैसें जाहलें ॥ ८३ ॥
तेणें गुणदोष देखणें । तैं नागवी धांवणें तैसें जाहलें ॥ ८३ ॥
आपले दोष नाहीसे करण्याकरितांच मुळी स्वधर्मकर्माचे आचरण करावयाचे असते आणि तोच जर गुणदोष पाहूं लागला, तर मग मदतीस आलेल्यानेच नागविल्यासारखे झाले! ८३.
साळी पिकावया शेतीं । तृण जाळूनि दाढ करिती ।
तेथ पिकली साळी जैं जाळिती । तैं तोंडीं माती पडली कीं ॥ ८४ ॥
तेथ पिकली साळी जैं जाळिती । तैं तोंडीं माती पडली कीं ॥ ८४ ॥
शेतांत भात पिकविण्यासाठी पालापाचोळा जाळून जमीन भाजून तयार करतात. त्याच्याऐवजी पिकाला आलेले भातच जर जाळून टाकलें, तर शेतकऱ्याच्या तोंडांत मातीच नाहीं का पडली १८४.
व्हावया दोषनिवृत्ती । वेदें द्योतिली धर्मप्रवृत्ती ।
तेणें स्वधर्में जैं दोष देखती । तैं निजप्राप्ती नागवले ॥ ८५ ॥
तेणें स्वधर्में जैं दोष देखती । तैं निजप्राप्ती नागवले ॥ ८५ ॥
दोषाचे क्षालन होण्याकरितांच वेदाने धर्माची प्रवृत्ति दाखवून दिली आहे ; त्या स्वधर्माने जर दोषच पाहू लागतील, तर ते आपल्या हिताला मुकलेच म्हणून समजावें ८५.
जेवीं कां सोंगें नटनटी । दाविती हावभाव नाना गोठी ।
परी तो भाव नाहीं त्यांचे पोटीं । स्वधर्म त्या दृष्टीं करावा ॥ ८६ ॥
परी तो भाव नाहीं त्यांचे पोटीं । स्वधर्म त्या दृष्टीं करावा ॥ ८६ ॥
जशी स्त्रीपुरुषांची सोंगे अनेक प्रकारचे हावभाव दाखवितात, अनेक प्रकारच्या श्रृंगाराच्या गोष्टी बोलतात, पण तो भाव कांही त्यांच्या पोटात असत नाही. तशाच दृष्टीने स्वधर्माचे आचरण करावें ८६.
न देखोनि दोषगुण । स्वधर्म-मर्यादा नोसंडून ।
करावें गा स्वधर्माचरण । हें मुख्य लक्षण कर्मांचें ॥ ८७ ॥
करावें गा स्वधर्माचरण । हें मुख्य लक्षण कर्मांचें ॥ ८७ ॥
गुणदोष न पाहाता, स्वधर्ममर्यादा न सोडता, स्वधर्माचरण करावे, हेच स्वधर्मकर्माचे मुख्य लक्षण आहे ८७.
ऐशिया स्वधर्मगती । कर्ममळ निःशेष जाती ।
साधकां निजपदप्राप्ती । गुणदोषस्थिती सांडितां ॥ ८८ ॥
साधकां निजपदप्राप्ती । गुणदोषस्थिती सांडितां ॥ ८८ ॥
अशा स्वधर्माचरणाने कर्माचे मळ निखालस धुऊन जातात. गुणदोषाची गोष्ट सोडून दिली, तरच साधकांना निजात्मपदाची प्राप्ति होते ८८.
गुणदोष देहाचे ठायीं । आत्मा नित्य विदेही ।
गुणदोष त्याच्या ठायीं । सर्वथा नाहीं उद्धवा ॥ ८९ ॥
गुणदोष त्याच्या ठायीं । सर्वथा नाहीं उद्धवा ॥ ८९ ॥
गुणदोष हे देहाच्या ठिकाणी असतात; आत्मा तर नित्य विदेहीच असतो. अर्थात् त्याच्या ठिकाणी गुणदोष कधीच नसतात ८९.
साधकें न देखावे दोषगुण । सिद्धासी सहजचि नाहीं जाण ।
जरी दिसों लागले दोषगुण । तरी आली नागवण दोघांसी ॥ ५९० ॥
जरी दिसों लागले दोषगुण । तरी आली नागवण दोघांसी ॥ ५९० ॥
याकरितां साधकांनीं गुणदोष पाहूंच नयेत. सिद्धाला तर ते दिसतच नसतात. इतक्या उप्पर गुणदोष जर दिसू लागतील, तर दोघांचीही नागवणच झाली म्हणून समजावें ९०'
साधकाची प्राप्ती बुडे । सिद्धाची सिद्धी तत्काल उडे ।
एवं गुणदोषांचें सांकडें । दोंहीकडे उद्धवा ॥ ९१ ॥
एवं गुणदोषांचें सांकडें । दोंहीकडे उद्धवा ॥ ९१ ॥
साधकाच्या लाभावर त्यायोगें पाणी पडते आणि सिद्धाची झालेली सिद्धि तत्काळ नाहीशी होते. याप्रमाणे उद्धवा ! हें गुणदोषांचे संकट उभयपक्षीही सारखेंच आहे ९१.
गुणदोषीं भरली सृष्टी । तेथ न ठेवावी निज-दृष्टी ।
हे कळवळोनियां पोटीं । श्रीकृष्णें गोष्टी सांगितली ॥ ९२ ॥
हे कळवळोनियां पोटीं । श्रीकृष्णें गोष्टी सांगितली ॥ ९२ ॥
सारे जग हे गुणदोषांनी भरलेलेच आहे, पण आपण त्यावर दृष्टिच देतां कामा नये. हीच गोष्ट अंत:करणाच्या कळवळ्याने श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितली ९२.
गुणदोष विविधभेद । ऐसे आहेत निषिद्ध ।
तरी कां पां स्वमुखें श्रीगोविंद । बोलिला प्रसिद्ध वेदानुवादें ॥ ९३ ॥
तरी कां पां स्वमुखें श्रीगोविंद । बोलिला प्रसिद्ध वेदानुवादें ॥ ९३ ॥
गुणदोषांचे प्रकार पाहाणे जर इतकें निषिद्ध आहे, तर श्रीकृष्णाने वेदमुखाने तसे स्पष्ट कां बरें सांगितले आहे ? ९३.
येचि अर्थींचा प्रश्न । पुढें उद्धव करील जाण ।
तेंचि व्यासाचें निरूपण । विसावा जाण जीवशिवां ॥ ९४ ॥
तेंचि व्यासाचें निरूपण । विसावा जाण जीवशिवां ॥ ९४ ॥
अशा अर्थाचा प्रश्न पुढे उद्धव करणार आहे. त्याच्यावरील व्यासाचे निरूपण ऐकून जीवाला व शिवालाही विश्रांति मिळेल ९४.
तेथ सकाम आणि निष्काम भक्त । यांचे अधिकार अभिव्यक्त ।
स्वयें सांगेल भगवंता । कथा अद्भुत ते आहे ॥ ९५ ॥
स्वयें सांगेल भगवंता । कथा अद्भुत ते आहे ॥ ९५ ॥
त्यांत सकाम भक्त आणि निष्काम भक्त ह्यांचे अधिकार श्रीकृष्ण स्वतः स्पष्ट करून सांगतील. ती कथा अति अद्भुत आहे ९५.
संतीं द्यावें अवधान । श्रोतां व्हावें सावधान ।
एका विनवी जनार्दन । रसाळ निरूपण पुढें आहे ॥ ५९६ ॥
एका विनवी जनार्दन । रसाळ निरूपण पुढें आहे ॥ ५९६ ॥
ह्याकरितां संतांनी लक्ष द्यावें व श्रोत्यांनी सावध व्हावे, अशी एकाजनार्दन विनंति करतो. कारण पुढचे निरूपण फारच रसभरित आहे ५९६.
इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे भगवद्उद्धवसंवादे
एकाकारटीकायां एकोनविंशोऽध्यायः ॥१९॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥श्लोक ॥४६॥ ओव्या ॥५९६॥
एकाकारटीकायां एकोनविंशोऽध्यायः ॥१९॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥श्लोक ॥४६॥ ओव्या ॥५९६॥
ह्याप्रमाणे श्रीमद्भागवत महापुराणांतील एकादशस्कंधामधील, श्रीकृष्णोद्धवसंवादांतील एकनाथकृत टीकेचा एकुणिसावा अध्याय संपूर्ण झाला. (श्लोक ४६; ओंव्या ५९६, मिळून संथसंख्या ६४२)
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...