मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १९ ओव्या ४०१ ते ५००

    भजनाची अतिआवडी । कां धर्माची अधिक गोडी ।

    या नांव 'श्रद्धा' रोकडी । जाण धडफुडी उद्धवा ॥ १ ॥
    उद्धवा ! माझ्या भजनाची अत्यंत आवड असणे किंवा धर्माची  अतिशय गोडी असणें , याचेंच नांव मूर्तिमंत 'श्रद्धा' होय १.


    नसतांही अन्नधनें । आतिथ्यें दे समाधानें ।
    मस्तकीं वंदूनियां दीनें । निववी वचनें सुखरूपें ॥ २ ॥
    वेळेला अन्न  किंवा धन नसले तरी सत्काराने समाधान करतो, दीनदुबळ्यांचे चरण शिरसावंद्य करून मधुर भाषणाने त्यांना तृप्त करून सोडतो २.


    दीन देखोनि तत्त्वतां । अतिनम्र विनीतता ।
    यथाशक्ति अर्पणें अर्था । 'आतिथ्य' तत्त्वतां या नांव ॥ ३ ॥
    खरोखर दीन पाहिला म्हणजे त्याला अत्यंत लीन व नम्र  होऊन यथाशक्ति द्रव्य अर्पण करणे, ह्याचंच नांव खरें 'आतिथ्य' होय ३.


    पोटींच्या कळवळेंनि वोजा । अत्यादरें गरुडध्वजा ।
    सांङ्ग साजिरी करणें पूजा । श्रद्धा समाजासंभारीं ॥ ४ ॥
    अंत:करणाच्या खऱ्या कळवळ्याने, आवड धरून लोकसमाज मिळवून मोठ्या समारंभाने मज भगवंताची यथासांग पूजा करणे किंवा ब्राह्मणांचा समुदाय मिळवून ४, 


    मेळवूनि ब्राह्मणसंभार । श्रद्धायुक्त षोडशोपचार ।
    पूजितां संतोषें मी श्रीधर । 'पूजा' पवित्र ब्राह्मणांची ॥ ५ ॥
    त्यांची श्रद्धेने षोडशोपचार पूजा करणे, यांच्या योगाने मला श्रीहरीला संतोष होतो. कारण, ब्राह्मणांची 'पूजा' ही फार पवित्र आहे ५.


    शुद्ध व्हावया अंतःकरण । करावें गा तीर्थगमन ।
    तीर्थयात्रीं श्रद्धा गहन । 'तीर्थाटन' या नांव ॥ ६ ॥
    तसेंच अंतःकरण शुद्ध होण्याकरितां तीर्थाला जात असावें. तीर्थयात्रेच्या ठिकाणी श्रद्धा धरणे याचंच नांव ' तीर्थाटन' होय ६.


    पदोपदीं माझें नाम । गर्जतां स्मरती माझें कर्म ।
    यात्रा करणें निजनिष्काम । 'तीर्थयात्रा' परम या नांव ॥ ७ ॥
    पावलोपावली माझ्या नामाची गर्जना करून माझे गुणलीलानुवाद करीत निरिच्छपणाने यात्रा करणे ह्याचेच नांव श्रेष्ठ 'तीर्थयात्रा' होय ७.


    परोपकारार्थ पर्वत । जेंवी कां सामग्री वाहत ।
    तेवीं क्रियामात्रें उपकारार्थ । सदा वर्तत उपकारीं ॥ ८ ॥
    पर्वत ज्याप्रमाणे केवळ परोपकाराकरितांच खनिज पदार्थ व वनस्पतींचा भार वाहतात, त्याप्रमाणे केवळ परोपकारार्थ निरंतर कर्मे करून सर्वकाळ उपकारच करीत राहावयाचे ८.


    जेवीं का चंद्राचे किरण । लागतांचि निवविती जाण ।
    तेवीं जयाचें आचरण । 'उपकारें' जन सुखी करी ॥ ९ ॥
    चंद्राचे किरण लागतांच ज्याप्रमाणे शांत करून सोडतात ; त्याप्रमाणे ज्याचे आचरण उपकारानेच जनाला सुखी करून सोडते ९.


    जें प्राप्त जाहलें अदृष्टीं । तेणें काळ यथासुखें लोटी ।
    कदा समासम नाहीं पोटीं । 'यथालाभसंतुष्टी' या नांव ॥ ४१० ॥
    दैवाने जें  काय प्राप्त  होईल, तेवढ्यावरच मोठ्या संतोषाने काळ कंठतो. पोटामध्ये समविषमभावच उठत नाही. याचंच नांव 'यदृच्छालाभ  संतुष्ट' म्हणजे मिळेळ त्यांत संतुष्ट राहाणे ४१०.


    कायावाचामनें धनें । जो विनटला गुरूकारणें ।
    त्याचें उठे संसारधरणें । 'गुरुसेवा' म्हणणें या नांव ॥ ११ ॥
    काया, वाचा, मन व धन गुरुला अर्पण करून गुरुला जो शरण जातो, त्याच्या संसाराचे धरणे उठतें. याचंच नाव 'गुरुसेवा' ११.


    उभय शौचाचे दोनी गुण । जपादि येर दशलक्षण ।
    हे बारा 'नेम' जाण । देवो आपण बोलिला ॥ १२ ॥
    शौचाचे दोन गुण आणि जप आदिकरून दुसरी  दशलक्षणे मिळून हे बारा ' नेम' होत. ह्याप्रमाणे स्वतः श्रीकृष्णांनी सांगितले १२.


    एते यमाः सनियमा उभयोर्द्वादश स्मृताः ।
    पुंसामुपासितास्तात यथाकामं दुहन्ति हि ॥ ३५ ॥
    [श्लोक ३५] अशा प्रकारे यम आणि नियम या दोन्हींची संख्या प्रत्येकी बारा आहे हे उद्धवा ! जे लोक यांचे पालन करतात, त्यांना हे त्यांच्या इच्छेनुसार फळे देतात. (३५)


    दोंही श्लोकीं यम नियम । निरूपिले उत्तमोत्तम ।
    बारा बारा यांचें वर्म । गुह्य परम शास्त्रार्थी ॥ १३ ॥
    ह्याप्रमाणे दोन श्लोकांमध्ये यमनियमांचे उत्तोमोत्तम निरूपण केले. प्रत्येकाची बारा बारा लक्षणे सांगितली. ह्यालाच शास्त्रार्थात 'परमगुह्य' असे म्हणतात १३.


    पुरुष यांचें उपासन । जरी करी सकामन ।
    तैं कामधेनूच्या ऐसें जाण । करिती पूर्ण सकळ काम ॥ १४ ॥
    ह्यांची उपासना कोणी पुरुष कामना धरून करील, तर हेच(यम व नियम) कामधेनूप्रमाणे त्याच्या सर्व कामना पूर्ण करतील १४.


    हेचि पैं गा यम नेम । पुरुष उपासी निष्काम ।
    तैं त्यासी माझें निजधाम । अतिसुगम निजप्राप्ती ॥ १५ ॥
    किंवा ह्याच यम-नियमांची निष्कामपणे उपासना केली, तर त्या पुरुषाला माझ्या निजधामाची म्ह. स्वरूपाची सहज प्राप्ति होईल १५.


    आतां शमदमादिक तुझे प्रश्न । जेणें हाता पावे ब्रह्मज्ञान ।
    तें सांगेन गुह्य निरूपण । सावधान उद्धवा ॥ १६ ॥
    आतां उद्धवा ! शमदमादिक तुझे जे प्रश्न आहेत, ज्यांच्यायोगानें ब्रह्मज्ञानाची प्राप्ति होते, तें गुह्य निरूपणही तुला सांगतो त्याकडे लक्ष दे १६.


    प्रश्नोत्तर सांगेल श्रीकृष्ण । तें अवधारितां सावधान ।
    तत्काळ होय ब्रह्मज्ञान । हें परम प्रमाण अतिगुह्य ॥ १७ ॥
    त्या प्रश्नांचे उत्तर श्रीकृष्ण सांगतील, ते लक्षपूर्वक श्रवण केले असतां तात्काळ ब्रह्मज्ञानाची प्राप्ति होते. हेच त्यांतील अत्यंत गुह्य व श्रेष्ठ  प्रमाण आहे १७.


    तृप्त व्हावया बालकासी । निजकरें माता ग्रास दे त्यासी ।
    तेवीं श्रीकृष्ण उद्धवासी । ब्रह्मज्ञानासी देतसे ॥ १८ ॥
    बालकाची भूक भागविण्याकरितां त्याला आई आपल्या हाताने घास देत असते, त्याप्रमाणेच श्रीकृष्णही उद्धवाला ब्रह्मज्ञान देत आहेत १८.


    जो रसु गोड लागे पित्यासी । तो बळेंचि पाजी बालकासी ।
    तेवीं श्रीकृष्ण उद्धवासी । ब्रह्मरसासी देतसे ॥ १९ ॥
    जो रस बापाला गोड लागतो, तो तो बळेच आपल्या मुलालाही पाजतो. त्याप्रमाणे श्रीकृष्ण उद्धवाला ब्रह्मरस देत आहेत १९.


    आधींचि तानयाचें प्रेम मोठें । वरी लागतां त्याचें मुखवटें ।
    मग स्वानंदाचेनि नेटें । पान्हा लोटे अनिवार ॥ ४२० ॥
    आधीच आईला तान्ह्या मुलाचे प्रेम मोठे असते; त्यावर त्याचे तोंडच स्तनाला लागले, तर मग काय विचारावें? त्या आनंदाच्या भरानें जो पान्हा फुटतो, तो अनिवारच असतो ४२०.


    तेवीं स्वयें श्रीकृष्ण । दाटूनि देतसे ब्रह्मज्ञान ।
    तेथें उद्धवें पुशिलें प्रश्न । तेणें अधिक जाण तुष्टला ॥ २१ ॥
    त्याप्रमाणे स्वतः श्रीकृष्ण आपण होऊन बळेच ब्रह्माज्ञान देण्यास तयार. त्यांत उद्धवाने  प्रश्न विचारले, त्यामुळे तर त्यांना अधिकच संतोष झाला २१.


    आधींच पर्जन्य खरा । वरी मीनलासे वीजवारा ।
    मग अनिवार वर्षे धारा । खणोनि धरा वाहतसे ॥ २२ ॥
    आधींच पर्जन्य खरोखर पडू  लागावा, त्यांत त्याला वारा आणि वीज ही मिळाली तर मग काय विचारावें ? त्याची वृष्टि अनिवार होऊन तो पाण्याचा पूर पृथ्वी अगदी खणून काढून वाहात असतो २२.


    तेवीं द्यावया ब्रह्मज्ञान । मिष उद्धवाचे प्रश्न ।
    स्वानंदें तुष्टला श्रीकृष्ण । ब्रह्म पूर्ण देतसे ॥ २३ ॥
    त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान देण्याला उद्धृवाच्या प्रश्नाचे निमित्त झाले, त्यामुळे श्रीकृष्ण स्वानंदाने प्रसन्न झाले व ते आतां पूर्ण ब्रह्मच त्याच्या स्वाधीन करीत आहेत २३.


    निमोले देतां मिठाचे खडे । चिंतामणी हातीं चढे ।
    कां विटेसाठीं परीस जोडे । न घे तो नाडे निजस्वार्था ॥ २४ ॥
    फुकट मिळणारे मिठाचे खडे देऊन जर चिंतामणि हाती येऊ लागला, किंवा वीट  देऊन जर परिस मिळाला, तर त्याचा जो स्वीकार करणार नाही. तो आपल्याच लाभाला मुकेल २४.


    तेवीं उद्धवाचे थोडे प्रश्न । तेणें आतुडे ब्रह्म पूर्ण ।
    एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥ २५ ॥
    तद्वत उद्धवाच्या थोड्या प्रश्नांनी पूर्ण ब्रह्म हातास चढत आहे. याकरितां एकाजनार्दन विनंती करितो की, श्रोत्यांनी आता माझ्याकडे लक्ष द्यावें २५.


    उद्धवाचे चौतीस प्रश्न । त्यांत यम नियम जाहले जाण ।
    उरले बत्तीस गुण । तेंही विवंचन अवधारा ॥ २६ ॥
    उद्धवाचे चौतीस प्रश्न होते. त्यांत यम व नियम हे सांगितले. बाकी बत्तीस गुण उरले, त्यांचाही विचार ऐकावा २६.


    प्रश्नीं दयेचें प्रतिउत्तर । न सांगेचि शारंगधर ।
    त्या अर्थीं भावगर्भ सार । षड्‍गुणैश्वर्य बोलिलें ॥ २७ ॥
    प्रश्नांमध्ये दयेसंबंधाचे उत्तर श्रीकृष्णांनी सांगितले नाही. पण त्याच्या अर्थाकरितां भगवंतांनी षड्गुणैश्वर्य ध्वनितार्थाने सूचित केलें आहे २७.


    एही विखींचें व्याख्यान । पुढें सांगेल श्रीकृष्ण ।
    दयेच्या ठायीं भाग्य संपूर्ण । कोण कारण सांगावया ॥ २८ ॥
    दयेच्या ठिकाणी संपूर्ण भाग्य सांगण्याचे कारण काय, ह्याविषयीही श्रीकृष्ण पुढे सांगतील २८.


    एवं उरले एकतीस प्रश्न । अधिक एक सांगेल श्रीकृष्ण ।
    'कर्मस्वसंगम शौच' जाण । कार्यकारणसंबंधा ॥ २९ ॥
    तात्पर्य, आतां एकतीस प्रश्नच उरले. त्यांत श्रीकृष्ण एक अधिक सांगतील तो 'कर्मस्वसंगम' म्ह. शौच हा होय ("कर्मसु असंगमः शौचं" श्लोक ३८). कार्यकारणसंबंध आल्यामुळेच ते सांगावे लागले २९.


    ऐसे हे तेहतीस प्रश्न । व्याख्यान सांगेल श्रीकृष्ण ।
    तें करतळीं ब्रह्मज्ञान । उद्धवासी जाण देतसे ॥ ४३० ॥
    असे हे सारे तेहतीस प्रश्न, त्यांचे व्याख्यान श्रीकृष्ण सांगतील. त्यायोगें उद्धवाला अगदी तळहातावरच ब्रह्मज्ञान देतील ४३०.


    शमो मन्निष्ठता बुद्धेर्दम इन्द्रियसंयमः ।
    तितिक्षा दुःखसंमर्षो जिह्वोपस्थजयो धृतिः ॥ ३६ ॥
    [श्लोक ३६] बुद्धी माझ्या ठायी स्थिर करणे म्हणजेच 'शम' होय इंद्रियांच्या संयमाचे नाव 'दम' आहे दुःख सहन करण्याला 'तितिक्षा' म्हणतात जीभ आणि जननेंद्रिय यांच्यावर विजय मिळवणे हेच 'धैर्य' होय. (३६)


    बुद्धि जे कां विवेकवंती । असार सांडूनि सार धरिती ।
    तिणें मनाच्या सकळ वृत्ती । विवेकस्थिती आवरोनि ॥ ३१ ॥
    विवेकशील अशी जी बुद्धि असते ती असार सोडून सारच ग्रहण करते. अशी बुद्धि मनाच्या निरनिराळ्या वृत्ति विवेकस्थितीने आवरून ३१, 


    त्या वृत्तीसमवेत आपण । बुद्धि परमात्मीं मिळे जाण ।
    जेवीं सागरासी लवण । दे आलिंगन भावार्थें ॥ ३२ ॥
    मीठ ज्याप्रमाणे समुद्राला आलिंगन देते, त्याप्रमाणे ती बुद्धिही साऱ्या वृत्तींसहवर्तमान परमात्म्याशी मिळून जाते ३२.


    समुद्रीं मिळतां लवण । समुद्रचि होय आपण ।
    तेवीं आत्मनिश्चयें बुद्धि पूर्ण । चैतन्यघन स्वयें होय ॥ ३३ ॥
    समुद्रात मीठ जाऊन मिळाले की ते समुद्रस्वरूपच होऊन राहते, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या निश्चयाने बुद्धिही स्वतः चैतन्यघन होऊन जाते ३३.


    ऐसा बुद्धीचा उपरम । त्यातें म्हणिजे गा 'शम' ।
    यापूर्वी करावया दम । तोही अनुक्रम अवधारीं ॥ ३४ ॥
    अशा प्रकारे बुद्धीला शांतस्वरूप प्राप्त होणे यालाच 'शम' म्हणावे. पण ह्यापूर्वीच दम करावा लागतो. त्याचाही प्रकार ऐक ३४.


    शत्रूचें जें दुर्दमन । तो दमु येथें नव्हे जाण ।
    करावें इंद्रियदमन । तेंही लक्षण अवधारीं ॥ ३५ ॥
    शत्रूचे दमन करणे हा येथे दम नव्हे; तर इंद्रियांचेंच दमन करणे अवश्य आहे. त्याचेही लक्षण सांगतो ऐक ३५.


    जेणें सहाय होती शमासी । त्या युक्तीं राखणें इंद्रियांसी ।
    विधीवेगळें नेदी भोगासी । आवरी अहर्निशीं वैराग्यें ॥ ३६ ॥
    शमाला साहाय्यकारक होतील अशा युक्तीने इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवणे, शास्त्रोक्तविधीशिवाय कोणताही भोग त्यांना द्यावयाचा नाही. रात्रंदिवस वैराग्याने त्यांना आवरून धरावयाचे ३६.


    ऐसें इंद्रियांचें निग्रहण । त्या नांव गा 'दम' गुण ।
    आतां तितिक्षेचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ ३७ ॥
    अशा प्रकारे इंद्रियांचा निग्रह करणे ह्याचंच नांव 'दम' गुण होय. आतां तितिक्षेचेही संपूर्ण लक्षण सांगतों ऐक ३७.


    महासुख आलें होये । तें जेणें उल्हासें अंगीं वाहे ।
    तेणेंचि उल्हासे पाहे । दुःखही साहे निजांगीं ॥ ३८ ॥
    मोठे सुख प्राप्त झाले असता ते ज्या उल्हासाने उपभोगितो, त्या उल्हासानेच दुःखही सहन करतो ३८.


    तेज आणि महा आंधारी । नभ समत्वें अंगीं धरी ।
    तेवीं जो अविकारी । सुखदुःखपरी साहता ॥ ३९ ॥
    प्रकाश येवो, किंवा मोठा अंधार येवो, त्यांना आकाश जसे समसमानभावानें आंगावर धरतें त्याप्रमाणे सुखदुःखाचे प्रकारही जो अविकृतपणानें सहन करतो ३९.


    गोफणेचा सुवर्णपाषाण । लागे तो दुःखी होय पूर्ण ।
    तेचि वोळखिलिया सुवर्ण । दुःख जाऊन सुख वाटे ॥ ४४० ॥
    गोफणीतून बसलेला सोन्याचा गुंडा लागला असतां दुःख होते, पण तोच गुंडा सोन्याचा म्हणून ओळखले म्हणजे दुःख विसरून जाऊन सुख वाटू लागते ४४०.


    तैसें द्वंद्वांचें निजस्वरूप । वोळखिलिया सद्‌रूप ।
    तेव्हा द्वंद्वें होती चिद्‌रूप । हें मुख्य स्वरूप तितिक्षेचें ॥ ४१ ॥
    त्याप्रमाणे द्वंद्वांचे खरे स्वरूप सदृप आहे असे ओळखले म्हणजे द्वंद्वे असतात ती चिद्रूप होऊन जातात. हेच तितिक्षेचे मुख्य स्वरूप होय ४१.


    सांडूनियां देह‍अहंते । सुखदुःखांहीपरतें ।
    देखणें जें आपणातें । तेचि येथें 'तितिक्षा' ॥ ४२ ॥
    देहाची अहंता सोडून सुखदुःखाच्या पलीकडे आपणाला पाहाणे, हीच येथे ' तितिक्षा' होय ४२.


    स्वप्नींचे दरिद्र आणि सधनता । जागृतीसी दोन्ही मिथ्या ।
    तेवीं सुखदुःखापरता । देखणें तत्त्वतां ते 'तितिक्षा' ॥ ४३ ॥
    स्वप्नांतील दारिद्र्य  आणि वैभव ही दोन्ही जागृतीमध्ये मिथ्या वाटतात, त्याप्रमाणे सुखदुःखाहून आपण निराळे आहोत असे पाहाणे याचंच नांव खरी तितिक्षा' होय ४३.


    जिव्हा आणि दुसरें शिश्न । यांचा जयो करावा आपण ।
    या नांव 'धृति' संपूर्ण । विद्याधारण धृती नव्हे ॥ ४४ ॥
    जिव्हा आणि दुसरे जननेंद्रिय ह्यांनाच संपूर्णपणे ताब्यात ठेवावीत, हीच खरी 'धृति' होय. विद्येची धारणा ही धृति नव्हे ४४.


    जेवीं कृष्णसर्प धरिजे हातीं । हे दोनी धरिजे तैशिया रीतीं ।
    अळुमाळ ढिलावतां धृती । परतोनि खाती धरित्यासी ॥ ४५ ॥
    कृष्णसर्प जसा हातांत धरावा, तशी ही दोन्ही इंद्रिये नेहमी ताब्यांत ठेवावीत. यत्किंचित ढिलीं सोडली तर ती उलटून धरणाऱ्यालाच खाऊन टाकतात ४५.


    ज्यासी द्रव्यदारासक्ती । तेथ कदा न रिगे हे धृती ।
    द्रव्यदाराअनासक्ती । त्याचे घरीं धृती पोषणी सदा ॥ ४६ ॥
    जे कनककांतेवर आसक्त असतात, त्यांच्यापाशी ही धृति कधी रिघावयाची नाही. परंतु द्रव्य व दारा म्ह. स्त्रियांच्या ठिकाणी जो अनासक्त असतो त्याच्या घरी ही धृति पोसणी होऊन पडलेली असते ४६.


    दण्डन्यासः परं दानं कामत्यागस्तपः स्मृतम् ।
    स्वभावविजयः शौर्यं सत्यं च समदर्शनम् ॥ ३७ ॥
    [श्लोक ३७] सर्वांना अभय देणे हेच परम 'दान' आहे कामनांचा त्याग म्हणजेच 'तप' आपल्या वासनांवर विजय मिळवणे म्हणजेच 'शूरता' समदर्शन हे 'सत्य' होय. (३७)


    सर्व भूतांसी न द्यावें दुःख । याचे पोटीं आलें सुख ।
    'महादान' तें हेंचि देख । द्यावें सुख सर्वांसी ॥ ४७ ॥
    कोणत्याही प्राण्याला दुःख देऊ नये, म्हटले म्हणजे त्यांना सुख द्यावें हे सहजच आले. सर्वाना सुख देणे हेच 'महादान' होय ४७.


    दुःख निरसूनि भूतांसी । सुख देणें गा सर्वांसी ।
    हेंचि उत्तम दान पृथ्वीसी । आन यासी तुकेना ॥ ४८ ॥
    प्राणिमात्रांचे दुःख निवारण करून सर्वांना सुख देणे हेच उत्तमांतील उत्तम दान होय. ह्याच्याशी पृथ्वीत दुसरें दान तुकणार नाही ४८.


    जन्ममरणाचें दुःख । निरसूनि द्यावें निजसुख ।
    याचि नांवें 'दान' देख । अलौकिक उद्धवा ॥ ४९ ॥
    उद्धवा ! जन्ममरणाचे दुःख निवारण करून आत्मसुखाचा लाभ करून देणे ह्याचेच नांव 'अलौकिक दान' होय, हे लक्षात ठेव ४९.


    या नांव गा 'परमदान' । उद्धवा निश्चयेंसीं जाण ।
    ऐक तपाचें लक्षण । तुज संपूर्ण सांगेन ॥ ४५० ॥
    उद्धवा ! ह्याचेच नाव खरोखर 'परम दान' असें तूं निश्चित समज. आता तपाचे लक्षण ऐक, तेही तुला सारे सांगतो ४५०.


    करूनियां कामाचा त्याग । तप करणें तें अतिचांग ।
    हृदयीं असतां कामदाघ । तपाचें लिंग शोभेना ॥ ५१ ॥
    सर्व कामनांचा त्याग करून जें तप करणे, तेंच अत्युत्कृष्ट तप होय. अंत:करणांत कामरूप अग्नि असला तर ते तपाचे लक्षण शोभत नाही ५१.


    सकाम वना जाय तपासी । तो वनींही चिंती वनितेसी ।
    तें तपचि बाधक होय त्यासी । काम आंगेंसीं वर्ततां ॥ ५२ ॥
    पोटीं वासना ठेवून जो अरण्यांत तपाला जातो, तो तेथेही स्त्रीचंच ध्यान करूं लागतो. मनांत कामवासना असल्यामुळे ते तपच त्याला बाधक होतें ५२.


    त्यागोनि कामाची कामस्थिती । तैं तपाची उत्तम गती ।
    अखंड लागे माझी स्मृती । 'शुद्धतप' प्राप्ती या नांव ॥ ५३ ॥
    कामाची वासना निखालस टाकून दिली, तरच उत्तम तप हातून घडते. अखंड माझेच स्मरण लागून राहाते. ह्याचेच नांव शुद्ध तपस्सिद्धि ५३.


    माझ्या ठायीं अनुताप । त्या नांव गा 'शुद्ध' तप ।
    कां हृदयीं चिंतितां चित्स्वरूप । हें 'परमतप' तपांमाजीं ॥ ५४ ॥
    अनुतापपूर्वक मत्स्वरूपी चित्त लागणे ह्याचंच नाव 'शुद्धतप' होय. किंवा माझें चित्स्वरूप हृदयामध्ये चिंतन करणे हेच सर्व तपांमध्ये ' श्रेष्ठतप' होय ५४.


    ऐक शौर्याचा विचार । रणीं मर्दूनि अरिवीर ।
    जिंतिला शत्रूंचा संभार । तो एथ शूर मानेना ॥ ५५ ॥
    आतां शौर्याचा विचार ऐक, समरांगणामध्ये बलाढ्य शत्रूला मारून शत्रूची सेना जिंकून टाकतो, तसला शूर येथे उपयोगाचा नाहीं ५५, 


    प्रवाहरूपें अनिवार । जीवभाव लागला थोर ।
    त्यातें जिंके जो महावीर । तो 'परम शूर' बोलिजे ॥ ५६ ॥
    तर प्रवाहरूपाने जो जीवभाव आपल्यामागे अनिवारपणे लागलेला आहे, त्याला जो महावीर जिंकून टाकतो, त्यालाच खरा 'शूर' असें म्हणावयाचे ५६.


    ''माझा सदाचार निर्वाहो । मी सज्ञान निःसंदेहो ।
    माझा पवित्र ब्राह्मणदेहो'' । हा 'जीवभावो' जीवाचा ॥ ५७ ॥
    " मी नेहमी सदाचरणानेच चालत असतो, मी निःसंदेह ज्ञानी आहे, माझा पवित्र ब्राह्मणदेह आहे" हाच जीवाचा 'जीवभाव' होय ५७.


    देहाचे माथां वर्णाश्रम । आश्रमाचे माथां कर्म ।
    तो कर्माभिमान ज्यां परम । त्यांसी देहभ्रम अनिवार ॥ ५८ ॥
    देहाच्या माथ्यावर वर्णाश्रम, आश्रमाच्या माथ्यावर कर्म, त्या कर्माचा ज्याला अतिशय अभिमान, त्याला अनिवार देहभ्रम असतो ५८.


    जिणोनि जीवाचे स्वभाव । चिदानंदाची राणीव ।
    भोगिजे स्वराज्यवैभव । हें परम गौरव शौर्याचें ॥ ५९ ॥
     ह्याकरितां जीवस्वभावाला जिंकून चिदानंदाच्या राज्यावर बसून, आपल्या आत्मरूप स्वराज्यवैभवाचे सुख भोगणे, हेंच शौर्याचे गौरव म्ह. मोठेपण होय ५९.


    ज्या नांव बोलिजे निजसत्य । तें मी सांगेन निश्चित ।
    सम ब्रह्म देखणें संतत । तें 'परम सत्य' उद्धवा ॥ ४६० ॥
    आता ज्याला 'सत्य' म्हणून म्हणतात, तेही निश्चयेंकरून मी तुला सांगतो. उद्धवा ! सदासर्वदा सर्वत्र समब्रह्म पाहाणे तेच 'परम सत्य ' होय ४६०.


    वस्तु न देखतां सर्वसम । जें जें देखणें गा विषम ।
    तेंचि असत्य अतिदुर्गम । 'सत्य' तें ब्रह्म समसाम्य ॥ ६१ ॥
    परब्रह्म सर्वत्र समान भरलेलें न पाहातां जिकडे तिकडे विषम म्हणजे भिन्न भिन्न पाहाणें तेंच अत्यंत दुर्गम असें 'असत्य ' होय. आणि ब्रह्म हें सर्वव्यापक असून सर्वत्र सम आहे असे समजणे हेच 'सत्य' होय ६१.


    केवळ जें सत्य भाषण । तें निजसत्य नव्हे जाण ।
    तेचिविखींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ६२ ॥
    सारांश, नुसते सत्यभाषण हे काहीं निज सत्य नव्हे. याविषयींचेच आणखी निरूपण श्रीकृष्ण सांगताहेत ६२.


    ऋतं च सूनृता वाणी कविभिः परिकीर्तिता ।
    कर्मस्वसङ्गमः शौचं त्यागः संन्यास उच्यते ॥ ३८ ॥
    [श्लोक ३८] मधुर भाषणाला महात्म्यांनी 'ऋत' म्हटले आहे कर्मांमध्ये आसक्त न होणे म्हणजेच 'पावित्र्य' कामनांचा त्याग हाच 'संन्यास'. (३८)


    इतर कवींची वदंती । 'ऋत' या नांव सत्य म्हणती ।
    हें सत्य मानावें प्रवृत्तीं । सम ब्रह्म निवृत्तीमाजीं सत्य ॥ ६३ ॥
    कित्येक ज्ञाते लोक 'ऋत' ह्यालाच सत्य असें म्हणतात. ते प्रवृत्तीच्या दृष्टीने पाहातां खरें आहे. परंतु निवृत्तीच्या दृष्टीने पाहतां सम ब्रह्मालाच 'सत्य' म्हणणे योग्य आहे ६३.


    ऋत म्हणिजे तें ऐसें येथ । सत्य वाचा जें श्रोत्यांचें हित ।
    तेंही दुःखसंबंधरहित । 'ऋत' निश्चित या नांव ॥ ६४ ॥
    येथें 'ऋत' म्हणजे असें की, श्रोत्याचे दुःखसंबंधरहित हित करणारी अशी जी सत्यवाणी तिलाच खरोखर 'ऋत' असे म्हणावें ६४.


    चित्रीं पाहतां दिसे विषम । त्यामाजीं भिंती सदा सम ।
    तेवीं जग देखतां विषम । ज्यां ब्रह्म सम निजबोधें ॥ ६५ ॥
    चित्रांत पाहू  गेले असता विषम म्ह० भिन्नता दिसते, पण त्यामध्ये असणारी जी भिंत, ती सदासर्वदा समच असते; त्याप्रमाणे जग हे भिन्न भिन्न म्ह. विषम दिसत असतांही ज्ञात्यांना निजबोधामुळे सर्वत्र समब्रह्मच दिसत असते ६५.


    या नांव गा 'सत्य' जाण । उद्धवें केला नाहीं जो प्रश्न ।
    त्या शौचाचें निरूपण । देवो आपण सांगत ॥ ६६ ॥
    ह्याचेच नांव 'सत्य' हे लक्षात ठेव. आता उद्धवाने जे प्रश्न केले, त्यांत शौचाबद्दल प्रश्न केलेला नसतां भगवान् त्या शौचाचे निरूपण आपण होऊन सांगत आहेत ६६.


    नव्हतां शुद्ध अंतःकरण । त्याग संन्यास न घडे जाण ।
    अंतरशुद्ध्यर्थ शौच पूर्ण । स्वधर्माचरण हरि सांगे ॥ ६७ ॥
    अंत:करणाची शुद्धि न होईल तर त्याग किंवा संन्यास घडत नाही. याकरितां अंत:करणशुद्धीसाठी पूर्ण शौच म्ह. अत्यंत निर्मळ स्वरूप जें स्वधर्माचरण तेच श्रीकृष्ण सांगतात ६७.


    अंतरीं कर्ममळाचें बंधन । त्याचें स्वधर्में करावें क्षालन ।
    कर्मे कर्माचें निर्दळण । करूनि आपण निष्कर्म व्हावें ॥ ६८ ॥
    अंत:करणामध्ये कर्ममळाचे बंधन असते, त्याचे स्वधर्मान क्षालन करून टाकले पाहिजे. कर्मानेंच कर्माचे निर्दलन करून आपण निष्कर्म व्हावें ६८.


    ते स्वधर्मीं फळाशा सुटता । कर्मबंधनें तुटती सर्वथा ।
    यालागीं फळनिराशता । अंतरशौचता अतिशीघ्र ॥ ६९ ॥
    स्वधर्मातील फलाशा सुटली असतां कर्मबंधनें तुटून जातात. याकरितां फलाची निराशता धरून अंत:करणशुद्धि लौकर साधावी ६९.


    नैराश्यें स्वधर्माचरण । तेणें अंतरमळाचें क्षालन ।
    या नांव गा शौच जाण । 'शौच' संपूर्ण नैराश्यें ॥ ७० ॥
    नैराश्यवृत्तीने स्वधर्माचरण केले म्हणजे अंत:करणांतील मलांचे क्षालन होऊन जाते. ह्याचेच नांव 'शौच'; सर्व आशा सोडून देण्यानेच खरें शौच साधतें ४७०.


    ऐसे 'शौच' शुद्ध‍अंतःकरणीं । ते भूमिका संन्यासग्रहणीं ।
    यालागीं शौच अप्रश्नीं । सारंगपाणी बोलिला ॥ ७१ ॥
    अंतःकरणांतील अशी जी शुद्धता तीच संन्यासग्रहणाची भूमिका म्हणजे पाया होय. म्हणूनच शौचाविषयी प्रश्न न करिताही श्रीकृष्णांनी त्याचा उलगडा केला ७१.


    सकळ संकल्पांचा त्याग । हाचि पैं 'संन्यास' चांग ।
    ऐसें बोलिला तो श्रीरंग । 'त्याग' तो चांग या नांव ॥ ७२ ॥
    सर्व संकल्पांचा त्याग करणे, हाच उत्तम 'संन्यास 'होय. असेंच त्या श्रीकृष्णांनी सांगितले. आणि उत्कृष्ट 'त्याग' तोही हाच असे ते म्हणतात ७२.


    मी देह हे दृढता जीवीं । संकल्पें तगमग नित्य नवी ।
    बाह्य दंड कमंडलु भगवीं । हें संन्यासपदवी लौकिक ॥ ७३ ॥
    देह तो मी, ही मनामध्ये दृढ कल्पना, त्यामुळे संकल्पविकल्पाने जीवाला नित्य नवी तगमग लागलेली असते. आणि बाहेरून मात्र दंड, कमंडलु, भगवीं वस्त्रें  यांचा थाट, असली संन्यासदीक्षा केवळ लौकिकी होय! ७३.


    धर्म इष्टं धनं नॄणां यज्ञोऽहं भगवत्तमः ।
    दक्षीणा ज्ञानसंदेशः प्राणायामः परं बलम् ॥ ३९ ॥
    [श्लोक ३९] धर्म हेच माणसांचे कल्याणकारी 'धन' आहे मी परमेश्वर 'यज्ञ' आहे ज्ञानाचा उपदेश करणे म्हणजेच 'दक्षिणा' होय प्राणायाम हेच श्रेष्ठ 'बळ' होय. (३९)


    धन धान्य पशु रत्न । हें प्राण्यासी नव्हे इष्ट धन ।
    मोक्षामार्गीं सबळ जाण । इष्ट धन तो धर्म ॥ ७४ ॥
    धनधान्य, गाईम्हशी, रत्ने इत्यादि हे काही प्राण्यांचे ' इष्ट' म्ह. हितकर धन नव्हे, तर मोक्षमार्गामध्ये सबळ असा धर्मच इष्ट धन होय ७४.


    घरीं जें पुरिलें धन । तें घरींच राहे जाण ।
    धर्म तो सवें चालतें धन । अंगा बंधन येवो नेदी ॥ ७५ ॥
    घरांत जे पुरलेले द्रव्य असतें तें घरच्या घरीच राहते. परंतु धर्म हा आपल्याबरोबर येणारे धन आहे. ते आपल्या अंगी बंधन लागू देत नाही ७५.


    धर्मिष्ठायेवढा कृपण । न देखें मी आणिक जाण ।
    मरतांही स्त्रीपुत्रां वंचून । अवघेंचि धन सवें ने ॥ ७६ ॥
    धार्मिक मनुष्याएवढा कृपण मी दुसरा कोणी पाहिलाच नाही. कारण, तो मेला तरीसुद्धा स्त्रीपुत्रांना ठकवून सारें धन आपणच बरोबर घेऊन जातो ७६.


    धार्मिकीं धर्मार्थ वेंचूनि धन । मी भांडारी केला नारायण ।
    जे समयीं जें जें लागे जाण । तें मी आपण स्वयें पुरवीं ॥ ७७ ॥
    धार्मिक 'लोकांनी आपलें धन धर्मार्थ खर्च करून मला नारायणाला त्यांनी भांडारी करून ठेविले आहे. म्हणून त्यांना ज्यावेळी जें  काय लागेल, तें मी स्वत:च पुरवीत राहातों ७७.


    यालागीं धर्म तो इष्ट धन । हें सत्य सत्य माझें वचन ।
    ऐक यज्ञाचें व्याख्यान । यथार्थ जाण सांगतों ॥ ७८ ॥
    म्हणून धर्म हेच 'इष्टधन' होय, हेच माझें खरेखुरे वचन  आहे. आता यज्ञाचा अर्थ ऐक. तोही स्पष्ट करून तुला सांगतों ७८.


    अग्नि तो माझें मुख जाण । यज्ञभोक्ता मी नारायण ।
    अवघा यज्ञचि मी श्रीकृष्ण । परम प्रमाण वेदोक्त ॥ ७९ ॥
    अग्नि हे माझे मुख आहे, आणि यज्ञाचा भोक्ता मी नारायण आहे असें जाण. फार काय सांगावें, सारा यज्ञच मी श्रीकृष्ण आहे. ह्याला वेदाचेही उत्तम प्रमाण आहे ७९.


    तेथें माझें स्वरूप ब्राह्मण । मद्दीक्षादीक्षित जाण ।
    सद्‍भावें करूनियां यजन । माझें सुख संपूर्ण पावले ॥ ४८० ॥
    त्यांत ब्राह्मण म्हणजे माझे स्वरूप होय. यज्ञदीक्षा घेतलेले असे ते दीक्षित ब्राह्मण, त्यांनी भक्तिभावाने माझे यजन करून माझे पूर्ण सुख प्राप्त करून घेतले आहे ४८०.


    तेथ अधर्मद्रव्याचेनि कोडें । अविधी दांभिक याग घडे ।
    तोही मज मुखींच पडे । परी ते कोरडे खडखडीत ॥ ८१ ॥
    पण त्यांत जे अधर्माने द्रव्यसंपादन करून अविधीनें केवळ ढोंगासाठी यज्ञ करितात ते लोक, तो याग माझ्याच मुखांत पडत असतांही खडखडीत कोरेच्या कोरेच राहातात ८१.


    अविधी जाहले पशुघातकी । तेणें अवदानें मी नव्हें सुखी ।
    दंभे पडले कुंभिपाकीं । महानरकीं रौरवीं ॥ ८२ ॥
    विधीने ते पशूचा घात मात्र करतात; त्या अवदानाने मी संतुष्ट होत नाहीं; दंभामुळे ते कुंभीपाक-महारौरव  नरकांत मात्र पडतात ! ८२.


    सर्व भूतांच्या भूतमुखीं । अर्पी तें पावे यज्ञपुरुखीं ।
    हे दीक्षा नेणोनि याज्ञिकीं । जाहले नारकी हिंसादोषें ॥ ८३ ॥
    सर्व प्राणिमात्रांच्या मुखामध्ये जें जें कांहीं अर्पण करावें, तें तें मज यज्ञपुरुषालाच पोंचतें; पण हे दीक्षारहस्य यज्ञकर्त्यांना माहीत नसल्यामुळे हिंसादोष करून नरकांत मात्र पडतात !८३ 


    जो मद्‍भावें दीक्षित जाण । विश्वतोमुखीं ज्यांचे यजन ।
    तयांचा 'यज्ञ' तो मी नारायण । दक्षीणा कोण ते ऐका ॥ ८४ ॥
    जे माझ्या भक्तिभावाची दीक्षा घेऊन, सारे विश्व हेंच माझें मुख असे समजून प्राणिमात्रांच्या मुखांत अवदान देतात, त्यांचा यज्ञ म्ह. मी नारायणच आहे. आता 'दक्षिणा' कोणती ती ऐकावी ८४.


    यज्ञासी मोल नाहीं देख । त्यासी ज्ञानदक्षिणा अमोलिक ।
    हातां येतांचि याज्ञिक । महासुख पावले ॥ ८५ ॥
    यज्ञाला कांहीं मोल नाही. त्यांत ज्ञान हीच अमोलिक दक्षिणा होय. ती हाती आली की, याज्ञिकाला 'महासुख' प्राप्त होते ८५.


    दक्षिणा आल्या ज्ञानघन । याज्ञिक होती अतिसंपन्न ।
    कल्पांतीं वेंचेना तें धन । निजीं समाधान जीवशिवां ॥ ८६ ॥
    ज्ञानधनरूप दक्षिणा मिळाली की, याज्ञिक लोक अत्यंत संपन्न होऊन राहतात. तें धन कल्पांतीसुद्धा खर्च होत नाही. त्यामुळे जीवाला व शिवाला दोघांनाही समाधान होते ८६.


    सर्वांमाजीं प्राण सबळ । प्राणबळें बळी सकळ ।
    प्राणयोगें मन चपळ । अतिचंचळ प्राणस्पंदे ॥ ८७ ॥
    सर्वांमध्ये प्राण हा फार प्रबळ आहे. प्राणाच्या योगानेच सर्वांना बल प्राप्त होते. प्राणाच्याच योगाने मन चपल बनते. प्राणस्पंदनानेंच ते अत्यंत चंचळ झाले आहे८७. 


    यापरी गा बळिष्ठ प्राण । प्राणाअधीन सदा मन ।
    तो प्राण जिंकावा आपण । 'बळवंतपण' या नांव ॥ ८८ ॥
    इतका प्राण हा बलाढ्य आहे. आणि मन हे सतत प्राणाच्याच अधीन असते. अशा प्राणालाच जिंकणे, यालाच 'बळवंतपणा' म्हणतात ८८.


    गज उपडिजे पायीं धरून । घायीं चूर कीजे पंचानन ।
    प्राण न जिंकतां जाण । शूरांचें प्रमाण नव्हे बळ ॥ ८९ ॥
    प्राणाला न जिंकतां, पायाला धरून हत्ती फेंफून देणे किंवा एका घावासरशी सिंहाचा चक्काचूर करणे. हे काही शूराच्या बळाचे प्रमाण नव्हे ८९.


    प्राणाअधीन जीव मन । त्या प्राणाचें करूनि दमन ।
    तो स्वयें कीजे गा स्वाधीन । 'अतिबळ' जाण या नांव ॥ ४९० ॥
    कारण जीव आणि मन ही प्राणाच्याच अधीन असतात. त्या प्राणाचे दमन करून तो स्वत: आपल्या स्वाधीन करून घ्यावा याचेच नांव 'अतिबळ ' म्ह• अगाध सामर्थ्य होय ४९०.


    दृढ प्राणायाम साधिल्यापाठीं । थोरला देवो धांवे भेटी ।
    भेटलिया न सुटे मिठी । ऐसा 'बळी' सृष्टीं प्राणायामी ॥ ९१ ॥
    प्राणायाम नीटपणे साधला, म्हणजे थोरला देव धावतच भेट घ्यावयाला येतो. आणि तो एकदा भेटला म्हणजे त्याची मिठी सुटतच नाही. प्राणायाम करणारा जगांत इतका बलिष्ठ होतो ९१.


    भगो म ऐश्वरो भावो लाभो मद्‍भक्तिरुत्तमः ।
    विद्याऽऽत्मनि भिदाबाधो जुगुप्सा ह्रीरकर्मसु ॥ ४० ॥
    [श्लोक ४०] माझे ऐश्वर्यच 'भग' आहे माझी भक्ती हाच उत्तम 'लाभ' आहे, जिच्यामुळे ब्रह्म आणि आत्मा यांमधील भेद नाहीसा होतो, तीच खरी 'विद्या' समजावी पाप करण्याची घृणा वाटणे, याचेच नाव 'लज्जा' असे आहे. (४०)


    उद्धवें पुशिला दयेचा प्रश्न । तें न सांगोनि श्रीकृष्ण ।
    परम भाग्याचें निरूपण । स्वयें आपण सांगत ॥ ९२ ॥
    उद्धवाने 'दया' कशाला म्हणतात असा प्रश्न विचारला होता, त्याचे उत्तर न सांगतां श्रीकृष्ण महद्भाग्याचंच निरूपण सांगू लागले ९२.


    केवळ भाग्येंवीण । दया तितुकी वांझ जाण ।
    यालागीं भाग्यनिरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ९३ ॥
    ह्याचे कारण, केवळ भाग्याशिवाय दया कितीही असली तरी ती वांझ म्ह. फोल आहे. ह्याकरितां स्वत: श्रीकृष्ण भाग्याचंच लक्षण सांगतात ९३.


    म्हणसी कृपणाचें भाग्य । तो असतेनि धनें अभाग्य ।
    परम भाग्य त्याचें चांग । जो दयेतें साङ्ग प्रतिपाळी ॥ ९४ ॥
    तूं म्हणशील की, एखादा कृपणही भाग्यवंत असतो; पण तो भाग्य असून अभागीच होय. याकरितां जो दयेचाच यथासांग प्रतिपाळ करतो, त्याचेच भाग्य उत्तम होय ९४.


    त्या परम भाग्याचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण ।
    ऐक तेथींची उणखूण । उदारपण भाग्याचें ॥ ९५ ॥
    त्या उत्तम भाग्याचे संपूर्ण लक्षण तुला सांगतो. त्या भाग्याचे उदारत्व म्ह• उत्कृष्टत्व रहस्यपूर्वक सांगतों ऐक ९५.


    'ज्ञान' आणि 'वैराग्य' पूर्ण । 'लक्ष्मी' आणि 'औदार्य' गुण ।
    'ऐश्वर्य' आणि 'यश' गहन । हे षड्‍गुण जाण महाभाग्य ॥ ९६ ॥
    'ज्ञान' आणि पूर्ण 'वैराग्य', 'लक्ष्मी' आणि 'औदार्य', 'ऐश्वर्य' आणि 'यश' हे सहा गुण म्हणजेच 'महाभाग्य' होय ९६.


    हे षड्‍गुण माझें भाग्य । भाग्यें पावे जो सभाग्य ।
    तोचि दयेतें पाळी साङ्ग । अतिअव्यंग पूर्णत्वें ॥ ९७ ॥
    हे षड्गुणच माझं भाग्य आहे. असें भाग्य सुदैवाने ज्याला लाभते, तोच यथासांग दयेचा प्रतिपाळ करूं शकतो ९७.


    जो षड्‍गुणेंशीं संपन्न । तोचि दीनदयाळू जाण ।
    देऊं जाणे दान सन्मान । दरिद्रविच्छिन्न करूं शके ॥ ९८ ॥
    या सहा गुणांनी जो परिपूर्ण असतो, तोच 'दीनदयाळू' होय. तोच दानसन्मान देऊं जाणतो, व दारिद्रही  दूर करूं शकतो ९८.


    ऐशिया सभाग्याची भेटी । होय तें भाग्य पाहिजे ललाटीं ।
    माझ्या भाग्यास सृष्टीं । आणिक दृष्टीं दिसेना ॥ ९९ ॥
    अशा भाग्यवंताची भेट होण्याला आपल्यालाही तसेंच भाग्य लागते. सारांश, माझ्या भाग्यासारखे भाग्य जगांत दुसरें पहावयास मिळणार नाही ९९.


    ऐसेनि ऐश्वर्यें संपन्न । तो दयेचें माहेर जाण ।
    तिसी सोहळे करिती आपण । दया संपन्न त्याचेनि ॥ ५०० ॥
    अशा ऐश्वर्याने जो संपन्न असतो, तोच दयेचे माहेरघर होय. तोच तिचे लाड पुरवितो. आणि त्याच्यामुळेच दया ही समर्थ होऊन राहते ५००. 

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...