मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १९ ओव्या १0१ ते २००

    विवेक वैराग्य दोनी । प्रवेशल्या हृदयभुवनीं ।

    तों विषयावस्था निरसूनी । सोहंपणीं जीव वर्तें ॥ १ ॥
    ह्याकरितां विवेक आणि वैराग्य ही दोन्ही हृदयमंदिरांत शिरतील, तरच विषयावस्था सोडून देऊन जीव हा 'ब्रह्म तें मीच' असे समजून वागू लागतो १.


    जंव ज्ञानासी न भेटे विज्ञान । तंव न निरसे जीवपण ।
    यालागीं सांगावें विज्ञान । जें जीवशिवपण निवारी ॥ २ ॥
    ज्ञानाला जोपर्यंत विज्ञानाची जोड मिळत नाही, तोपर्यंत जीवपणाचा निरास होत नाही. याकरितां जीवपण आणि शिवपण या दोहोंचंही निवारण करील, असें विज्ञान मला सांगावें २.


    असंभावनादोषशून्य । तें बोलिजे 'शुद्ध ज्ञान' ।
    जें विपरीतभावनेवीण । त्यातें सज्ञान 'विपुल' म्हणती ॥ ३ ॥
    'असंभावना' दोष तिळमात्रही राहात नाही, त्यालाच 'शुद्ध ज्ञान' असें म्हणतात. आणि ज्यांत 'विपरीत भावना' मुळीच नसते, त्यालाच ज्ञाते लोक 'विपुल' असे म्हणतात ३.


    ऐसें विशुद्ध-विपुल-ज्ञान । तद्युक्त वैराग्य-विज्ञान ।
    त्यांमाजींही श्रेष्ठ तुझें भजन । कृपा करून सांगिजे ॥ ४ ॥
    असें जें अत्यंत शुद्ध व विपुल ज्ञान, त्याने युक्त असें वैराग्य आणि विज्ञान, त्यांतही श्रेष्ठ असें तुझें भजन, मला कृपा करून सांगावें ४.


    ज्ञान-विज्ञान-वैराग्यस्थितीं । जुनाट तुझी भगवद्‍भक्ती ।
    मज सांगावी सुनिश्चितीं । कृपामूर्ती श्रीकृष्णा ॥ ५ ॥
    हे कृपामूर्ति श्रीकृष्णा! ज्ञान-विज्ञान-वैराग्यसहित तुझी जुनाट अशी भक्तिही निश्चयेंकरून मला सांगावी ५.


    तुझे उत्तमभक्तिकारणें । साधु पडले गवेषणें ।
    धरणें बैसले जीवेंप्राणें । ते भक्ती सांगणें मजलागीं ॥ ६ ॥
    तुझ्या श्रेष्ठ  भक्तीसाठी मोठेमोठे साधुही शोधांत पडले आहेत आणि जीवाभावाने धरणे धरून बसले आहेत. ती भक्ति मला सांगावी ६.


    तुझी करितां उत्तम भक्ती । त्रिविध ताप क्षया जाती ।
    आपुली लाभे निजमुक्ती । उद्धव ते अर्थीं विनवीत ॥ ७ ॥
    तुझी उत्तम भक्ति केली असतां त्रिविध तापही क्षयाला जातात आणि आपली मुक्ति आपल्या हाती लागते. म्हणून त्यासाठी उद्धव विनंती करीत आहे ७.


    तापत्रयेणाभिहतस्य घोरे सन्तप्यमानस्य भवाध्वनीश ।
    पश्यामि नान्यच्छरणं तवाङ्‍घ्रि द्वन्द्वातपत्रादमृताभिवर्षात् ॥ ९ ॥
    [श्लोक ९] हे प्रभो ! या घोर संसारमार्गावर मी तिन्ही तापांनी होरपळून अत्यंत दुःखी झालो आहे अशावेळी आपल्या छत्रासारख्या चरणकमलांना शरण जाण्याखेरीज दुसरा कोणताही उपाय मला दिसत नाही कारण आपले हे चरणकमलच अमृताचा वर्षाव करून शरणागतांना अभय देणारे आहेत. (९)


    जे त्रिविध तापें तापले । जे कामक्रोधीं जर्जर केले ।
    आशातृष्णा विसंचिले । जे निर्बुजले जन्ममरणें ॥ ८ ॥
    त्रिविध तापाने जे तापलेले असतात; कामक्रोधांनी ज्यांना जर्जर करून टाकलेले असते; आशेने आणि तृष्णेने जे डबडबलेले असतात; आणि जन्ममरणाने गुरफटलेले असतात ८.  


    संसारमार्ग अतिघोर । दुःखें नुल्लंघवे दुस्तर ।
    ऐसे श्रमले जे नर । त्यांसी निजछत्र हरिपादपद्म ॥ ९ ॥
    संसाराचा अत्यंत बिकट  मार्ग दुःखानेही ज्यांना आक्रमण करवत नाही; असे जे यातना भोगीत असलेले पुरुष त्यांना हरीचे पदकमल हेच एक छत्र आहे ९.


    तुझ्या चरणारविंदापरतें । शरण्य न देखों आणिकांतें ।
    यालागीं कायावाचाचित्तें । शरण भावार्थें तुज आलों ॥ ११० ॥
    तुझ्या चरणकमलावांचून शरण जाण्याला दुसरें स्थळच दिसत नाही. म्हणून कायावाचामनें करून भक्तिभावाने तुलाच मी शरण आलो आहे ११०.


    छत्र निवारी केवळ ताप । चरणछत्राचें भिन्न रूप ।
    त्रिविध तापेंसीं संताप । निरसोनि निष्पाप करी जन ॥ ११ ॥
    छत्र केवळ एक तापच दूर करते, पण तुझ्या चरणाचे छत्र काही निराळंच आहे. ते त्रिविध तापांसह सर्व संताप दूर करून जनाला निष्पाप करून सोडते ११.


    एक शरण निजचित्तें । एक वैरें मिसळले तूतें ।
    एक ते भजनभावार्थें । एक ते भयार्तें स्मरले तूतें ॥ १२ ॥
    कोणी आपल्या मनानेच तुला शरण आले, कोणी वैर करूनच  तुझ्यामध्ये मिळून गेले. कोणी भावार्थानंच तुझे भजन केलें, आणि कोणी भयभीत होऊनच तुझे स्मरण केले १२, 


    एक ते सुहृदत्वें सगोत्र । एकाचें केवळ स्नेहसूत्र ।
    एका अंगसंग कामतंत्र । एक आज्ञाधारक नेमस्त ॥ १३ ॥
    कोणी तुझ्या कुळांतील असल्यामुळे सुहृद बनले, कोणी स्नेहामुळेच तुला प्रेमबद्ध झाले, कोणी कामतंत्राने अंगसंगच करून उद्धरून गेले, तर कोणी निरंतर आज्ञाधारक सेवकच बनून राहिले १३.


    एवं नानापरी विचित्र । जिंहीं ठाकिलें चरणच्छत्र ।
    भवभय जें महाघोर । तें त्यांसमोर हों न शके ॥ १४ ॥
    तात्पर्य, अनेक प्रकारांनी विचित्र रीतीने ज्यांनी तुझ्या चरणछत्राचा आश्रय केला, त्यांच्यासमोर संसाराचे भय उभे राहू शकत नाही १४.


    भक्त वैरी आणि सुहृद । अवघ्यां देणें निज ऐक्यपद ।
    बाप उदारता अगाध । तूं स्वानंदबोध सर्वांचा ॥ १५ ॥
    भक्त असो, वैरी असो, की आप्त असो, त्या साऱ्यांनाच तूं आपलें निजपद देतोस. अशी तुझी उदारता फार मोठी आहे. तूं सर्वांचा स्वानंदबोध आहेस १५.


    होमें जें दीजे अग्नीवरी । तें अग्नी आपुल्याऐसें करी ।
    मा अवचटें पडिल्यावरी । तेंही करी तैसेंचि ॥ १६ ॥
    होमहवन करून अग्नीला  जे अर्पण केले जाते, तें तो अग्नि आपल्यासारखेच करून टाकतो; तसेंच चुकूनही जरी त्यावर कांहीं पडले, तरीही त्याची गति तशीच होते १६.


    एवं नानायोगें गोविंदा । जे मीनले तुझिया संबंधा ।
    त्यांची निरसोनि संसारबाधा । समत्वें निजपदा तूं नेसी ॥ १७ ॥
    ह्याप्रमाणे श्रीकृष्णा! कोणत्याही प्रकारांनी जे तुझ्यासंबंधांत येतात, त्यांच्या संसाराची पीडा दूर करून समत्वाने तूं त्यांना आपल्या पदाला नेतोस १७.


    त्या तुझें चरणछत्र येथें । निवारी त्रिविध तापांतें ।
    सदा वर्षे परमामृतें । शरण चरणांतें यालागीं ॥ १८ ॥
    ते तुझें  चरणरूप छत्र येथे  त्रिविधतापांचें निवारण करून सदासर्वदा परमामृताचा वर्षाव करीत आहे. म्हणूनच त्या चरणांना मी शरण आहे १८.


    ज्या संसारभयाभेण । तुझ्या चरणा आलों शरण ।
    त्या भवभयाचें निरूपण । उद्धव आपण सांगत ॥ १९ ॥
    ज्या संसाराच्या भयाने तुझ्या चरणाला मी शरण आलो आहे, त्या भवभयाचे स्वरूप उद्धव आपणच सांगत आहे १९.


    दष्टं जनं संपतितं बिलेऽस्मिन् कालाहिना क्षुद्रसुखोरुतर्षम् ।
    समुद्धरैनं कृपयाऽऽपवर्ग्यैर्वचोभिरासिञ्च महानुभाव ॥ १० ॥
    [श्लोक १०] हे महानुभाव ! मी या संसाररूप विहिरीत क्षुद्र विषयरूप पाण्याने सुखोपभोगरूप तहान भागवण्यासाठी आलो व तीत पडलो तेथेच कालरूपी सर्पाने मला दंश केला आता आपणच कृपा करून याला वर काढा आणि याला मुक्त करणार्‍या आपल्या अमृतवाणीने ओलाचिंब करून टाका. (१०)


    संसारकुहरामाजीं जन । गृहदाराकूपीं पडले जाण ।
    त्याहीमाजीं दुःख गहन । काळसर्पें दारुण डंखिलें ॥ १२० ॥
    लोक हे संसाररूप गुहेमध्ये सांपडून गृहदारारूप विहिरीमध्ये पडले आहेत. त्यातही काळरूप सर्पाने  कडकडून चावा घेतला आहे. त्या वेदना तर फारच भयंकर आहेत! १२०.


    त्या काळसर्पाचें विख । क्षणक्षणां चढे देख ।
    अभिमानें भुलले लोक । विषयसुख वांछिती ॥ २१ ॥
    त्या काळरूपसर्पाचे  विष क्षणोक्षणी चढत आहे; तरीही लोक अभिमानाला भुलून विषयसुखाची इच्छा करतातच! २१.


    नवल काळसर्पाचा पडिपाडु । विषप्राय विषय केले गोडु ।
    गोडांचा गोड परमार्थ दृढु । तो केला कडू जीवेंभावें ॥ २२ ॥
    काळसर्पाचा प्रताप काही विलक्षण आहे. त्याने विषासारखे कडू असलेले विषयही गोड करून सोडले आहेत. आणि गोडांतला गोड असा जो परमार्थ तो जीवाभावापासून कडू करून सोडला आहे! २२.


    विखाहूनि विषय अधिक । विख एक वेळां मारक ।
    विषयो पुनः पुनः घातक । काळसर्पें लोक भुलविले ॥ २३ ॥
    विषापेक्षाही विषय भयंकर आहेत. कारण, विष हे एक वेळच मारक असते; परंतु विषय हे पुनःपुन्हा घात करीत असतात. इतकी काळसर्पाने लोकांना भुरळ घातली आहे २३.


    विषय तो केवळ विख । त्यालागीं भुलले मूर्ख ।
    विषयांची तृष्णा देख । अधिकाधिक वाढविती ॥ २४ ॥
    विषय हे शुद्ध विष आहे. त्याला मूर्ख लोकच भुलतात आणि विषयांची तृष्णा अधिकाधिक वाढवितात २४, 


    ऐसे दुःखनिमग्न जे जन । त्यांचें करावें जी उद्धरण ।
    म्हणशील 'हे करितील साधन । तैं उद्धरण करीन मी' ॥ २५ ॥
    असे जे दुःखांत बुडून गेलेले लोक आहेत त्यांचा उद्धार करावा. ह्यावर आपण कदाचित् म्हणाल की, ते लोक साधन करतील, तेव्हा त्यांचा मी उद्धार करीन २५, 


    स्वामी तुझी कृपा न होतां । कोट्यानुकोटी साधन तें वृथा ।
    तुझी कृपा जाहलिया अच्युता । भवव्यथा स्पर्शेना ॥ २६ ॥
    परंतु स्वामिन् ! आपली कृपा झाली नाही, तोपर्यंत कोट्यवधि  साधनंही व्यर्थ होऊन जातात. श्रीकृष्णा! तुझी कृपा झाली की, संसाराची व्यथा स्पर्शसुद्धा करावयाची नाहीं २६.


    ऐकें कृपाळुवा श्रीअनंता । तुझ्या मोक्षफळरूप ज्या कथा ।
    तेणें अमृतें शिंपोनि कृष्णनाथा । जनां समस्तां उद्धरीं ॥ २७ ॥
    हे कृपानिधे ! श्रीअनंता ! कृष्णनाथा ! माझी विनंती ऐकावी. तुझ्या ज्या मोक्षफळरूप कथा आहेत, त्या कथामृताने सिंचन करून सर्वाचा उद्धार करावा २७.


    तुझे मुखींचें कथापीयूख । बिंदुमात्र लाभतां देख ।
    भवसर्पाचें उतरे विख । उपजवी सुख स्वानंदें ॥ २८ ॥
    तुझ्या मुखांतील कथामृताचा एक बिंदु जरी प्राप्त झाला, तरी तो संसारसर्पाचे  विष उतरून स्वानंद-सुख उत्पन्न करितो २८.


    'सकळ जनांच्या विषयीं' । म्हणसी आग्रह कां तुझ्या ठायीं ।
    जन मातें प्रार्थीत नाहीं । देवा ऐसें कांहीं कल्पिसी ॥ २९ ॥
    आता 'साऱ्याच लोकांचा उद्धार करण्याविषयीं तुझा आग्रह का ? लोक काही माझी तशी विनवणी करीत नाहीत' अशी जर देवा! तुमच्या मनात कल्पना येईल २९, 


    अंधळें अंधकूपीं पडतां । देखणेनीं लावावें सत्पथा ।
    तेवीं ज्ञानांध दुःखी बुडतां । उद्धरावया तत्त्वतां मी प्रार्थितसें ॥ १३० ॥
    तर मी म्हणतों, एखादा आंधळा अंधेच्या विहिरीत पडलेला दिसला, तर पाहणाऱ्याने  त्याला वर काढून चांगल्या वाटेला लावावें ; त्याप्रमाणे ज्ञानांध लोक दुःखांत बुडत असतात, त्यांचा उद्धार करावा, म्हणून मी आपली प्रार्थना करीत आहे ३०.  


    जन अंध कां जाहले म्हणसी । संसारसर्पें ग्रासिलें त्यांसी ।
    यालागीं विसरोनि निजसुखासी । विषयसुखासी लोधले ॥ ३१ ॥
    आतां लोक तरी आंधळे कशाने झाले म्हणशील, तर त्यांना संसाररूप सर्पाने  ग्रासलेले आहे, म्हणून ते आत्मसुखाला विसरून विषयसुखाला भुलले आहेत ३१.


    ऐशिया दीनांतें श्रीअनंता । कृपेनें उद्धरावें तत्त्वतां ।
    म्हणोनि चरणीं ठेविला माथा । श्रीकृष्णनाथा प्रार्थिलें ॥ ३२ ॥
    खरोखर श्रीकृष्णा ! अशा दीन जनांचा आपण कृपा करून उद्धार करावा. असें म्हणून त्याने श्रीकृष्णाच्या चरणावर मस्तक ठेविलें आणि त्याची प्रार्थना केली ३२.


    ऐकोनि भक्ताची विनंती । संतोषला भक्तपती ।
    उत्तम सभेची ज्ञानस्थिती । उद्धवाप्रती सांगेल ॥ ३३ ॥
    ही भक्ताची विनंति ऐकून भक्तांचा प्रभु श्रीकृष्ण प्रसन्न झाला. तोच आतां त्याला एका उत्तम सभेतील ज्ञान सांगेल ३३.


    जे सभेसी मुख्यत्वें हृषीकेशी । देवर्षी आणि ब्रह्मर्षी ।
    तेथ मीनले राजर्षी । तपोराशी ज्ञाननिधी ॥ ३४ ॥
    ज्या सभेला मुख्यत्वेकरून श्रीकृष्ण, देवर्षि व ब्रह्मर्षि आणि तपोराशि व ज्ञाननिधि असे राजर्षिही जमले होते ३४, 


    ते सभेचा ज्ञानमथितार्थ । उद्धवासी सांगेल श्रीकृष्णनाथ ।
    श्रोतीं अवधान द्यावें तेथ । एका विनवीत जनार्दनु ॥ ३५ ॥
    त्या सभेत निघालेला ज्ञानाचा विषय उद्धवाला आतां श्रीकृष्णनाथ सांगतील, तर तिकडे श्रोत्यांनी अवधान द्यावे, अशी एकाजनार्दन विनंती करितो ३५.


    ज्ञान आणि पुरातन । वक्ता भगवंत आपण ।
    श्रोता उद्धव सावधान । काय श्रीकृष्ण बोलिला ॥ ३६ ॥
    ज्ञान आणि तेही पुरातन. त्याचा वक्ता कोण? तर स्वतः भगवान् ! यामुळे श्रोता जो उद्धव तोही श्रीकृष्ण काय बोलतात ते लक्ष देऊन श्रवण करूं लागला ३६.


    श्रीभगवानुवाच-
    इत्थमेतत्पुरा राजा भीष्मं धर्मभृतां वरम् ।
    अजातशत्रुः पप्रच्छ सर्वेषां नोऽनुश्रृण्वताम् ॥ ११ ॥
    [श्लोक ११] श्रीकृष्ण म्हणाले - असेच हे पूर्वी अजातशत्रू युधिष्ठिराने धार्मिकशिरोमणी भीष्मांना विचारले होते. त्यावेळी आम्ही सर्वजण तेथे उपस्थित होतो. (११)


    तुवां पुशिलें जैशा रीतीं । तैसियाचि गा उपपत्तीं ।
    धर्में पुशिले भीष्माप्रती । देहांतीं शरपंजरीं ॥ ३७ ॥
    (भगवान् म्हणाले)-तूं जशा रीतीने मला ज्ञान विचारलेंस, तशाच रीतीनें भीष्माचार्य शरपंजरी पडून त्यांचा अंतसमय प्राप्त झाला असता त्यांनाही धर्माने हेंच विचारले होते ३७.


    ऐक त्या धर्माची थोरी । ज्यासी शत्रु नाहीं संसारीं ।
    सत्यवादी निजनिर्धारीं । जो ऋषिमंत्रीं जन्मला ॥ ३८ ॥
    आतां धर्माची थोरवी सांगतो ऐक. स्याला संसारामध्ये शत्रु म्हणून नव्हताच. तो निश्चयात्मक व सत्य बोलणारा होता. ऋषीच्या मंत्राने त्याचा जन्म झालेला होता ३८.


    करावया पांडवनिर्दळण । वज्रदेही व्हावया आपण ।
    वर्म पुसतां दुर्योधन । धर्म असत्य वचन न बोले ॥ ३९ ॥
    पांडवांचा संहार करण्याकरितां आपण वज्रदेही व्हावे, या हेतूनें दुर्योधनानें धर्मराजाला उपाय विचारला असतांही धर्मराज खोटें बोलला नाही ३९.


    ऐसा राजा युधिष्ठिर । निर्मत्सर परम पवित्र ।
    तेणें करूनि अत्यादर । भीष्म महावीर विनविला ॥ १४० ॥
    असा निर्मत्सर आणि परमपवित्र राजा युधिष्ठिर, त्याने अत्यादराने महाशूरवीर भीष्माचार्य यांना विनंति केली १४०.


    जो परम धार्मिक निजनिर्धारीं । जो स्वधर्मनियमें व्रतधारी ।
    जो यावज्जन्म ब्रह्मचारी । जो महाशूरीं वंदिजे ॥ ४१ ॥
    जो दृढनिश्चयाचा असून मोठा धार्मिक; जो स्वधर्माच्या नियमाने व्रतस्थ राहणारा; जो यावज्जन्म ब्रह्मचर्याने राहिलेला आणि मोठमोठ्या योध्यांनाही जो वंद्य १४१ 


    न मोडतां गुरुत्वाची पायरी । जो परशुरामेंसीं युद्ध करी ।
    परी काशीश्वराची कुमरी । जो न करीच नोवरी ब्रह्मचर्यें ॥ ४२ ॥
    गुरुत्वाची मर्यादा भंग न करिता ज्याने परशुरामाशी युद्ध केलें; पण ब्रह्मचर्यव्रतपालन करण्यासाठी काशीराजाच्या मुलीचा त्याने अंगीकार केला नाही ४२


    धनुर्विद्येसी गुरु परशुराम । तो रणीं जिंतिला करूनि नेम ।
    तेणें संतोषोनि परम । आपुलें नाम आंकणां घातलें ॥ ४३ ॥
    धनुर्विद्येमध्ये परशुराम हा त्याचा गुरु होता; त्याला पण करून रणांगणामध्ये जिंकलें; तेव्हा त्याने अत्यंत संतुष्ट होऊन आपल्या नांवाचे बिरुद त्या भीष्माच्या पायांत घातले ४३.


    अधिक संतुष्टे परशुराम । माझ्या ब्रह्मचर्याचा व्रतनेम ।
    भीष्मा तुज कदा बाधिना काम । वर परम दीधला ॥ ४४ ॥
    इतकेच नव्हे, तर परशुराम ह्याहीपेक्षा अधिक प्रसन्न झाले व म्हणाले की, माझ्या ब्रह्मचर्यव्रताचा असा नेमच आहे की, भीष्मा ! तुला कामाची बाधा कधीच व्हावयाची नाही. असा त्यांनी त्याला उत्तम वर दिला ४४, 


    जनकसंतोषाकारणें । आपुलें तारुण्य दीधलें जेणें ।
    वार्धक्य घेऊनि आपणें । सुखी करणें शंतनु ॥ ४५ ॥
    ज्याने आपल्या बापाचा संतोष व्हावा, म्हणून त्याला आपलें तारुण्य दिले, आणि आपण वार्धक्य घेऊन शंतनूला सुखी केले ४५; 


    पित्यानें दीधलें आशीर्वादा । 'ऐक भीष्मा अतिप्रबुद्धा ।
    वार्धकीं क्षीणशक्तीची आपदा । ते तुज कदा बाधेना' ॥ ४६ ॥
    तेव्हां पित्यानेही त्याला आशीर्वाद दिला की, “हे बुद्धिमान् भीष्मा ! ऐक. वार्धक्यामध्ये शक्ति क्षीण होऊन येणारी आपत्ति तुला कधीही बाधावयाची नाहीं" ४६.


    यालागीं जंव जंव म्हातारपण । तंव तंव त्याचा प्रताप गहन ।
    काळाची शक्ति खुंटली जाण । न करवे क्षीण भीष्मासी ॥ ४७ ॥
    ह्यामुळे जो जो अधिक अधिक म्हातारपण येऊ लागळें, तो तो त्याचा प्रताप वाढतच गेला. काळाची शक्तीच खुंटली. त्याच्याने भीष्माला क्षीण करवेना ४७.


    यालागीं तोडरीं काळ काम । आंकणा रिघाला परशुराम ।
    हाचि धर्मिष्ठीं 'वरिष्ठधर्म' । हें साजे नाम भीष्मासी ॥ ४८ ॥
    म्हणून त्याने आपल्या पायामध्ये काळ, काम आणि परशुराम या तिघांचीही बिरुद बांधली होती. 'धर्मनिष्ठांमध्ये श्रेष्ठ' असा तो होता. म्हणून भीष्माला हेंच नांव (धर्मभृतांवर') शोभत होतें ४८.


    ज्याचिये प्रतिज्ञेच्या निर्धारीं । देवासी लावूनियां हारी ।
    निःशस्त्रा करी शस्त्रधारी । एवढी थोरी प्रतिज्ञेची ॥ ४९ ॥
    ज्याच्या प्रतिज्ञेच्या निर्धाराने कृष्णालाही हार खायला लावून निःशस्त्राला शस्त्रधारी केलें. एवढी ज्याच्या प्रतिज्ञेची  योग्यता ! ४९.


    न मोडतां भजनमर्यादा । युद्धीं मिसळोनि गोविंदा ।
    हारी लावूनियां मुकुंदा । चरणारविंदा लागला ॥ १५० ॥
    भजनमर्यादा न मोडतां श्रीकृष्णाला युद्धांत हारीस आणून तो त्याच्या पायीं लागला १५०.


    आण वाहूनि निर्धारीं । शस्त्रास्त्रें सांडिलीं दूरीं ।
    पुढती बाण भेदितां जिव्हारीं । शस्त्र करीं न धरीच ॥ ५१ ॥
    नंतर निर्वाणींची शपथ वाहून त्याने शस्त्रास्त्रे दूर टाकून दिली व मर्माच्या ठिकाणी शत्रूचे बाण लागले तरी हातात शस्त्र म्हणून धरलेच नाही ५१.


    बाणीं खडतरलें जिव्हार । विकळता देखोनि थोर ।
    भीष्में करूनि निजनिर्धार । जाहला तत्पर देहत्यागा ॥ ५२ ॥
    बाणांनी मर्मस्थान फोडल्यामुळे अत्यंत व्याकुळता आली असें पाहून भीष्माने निश्चय केला आणि देहत्यागाला तो सिद्ध झाला ५२.


    हें दक्षिणायन अतिघोर । भीष्में ऐकतां उत्तर ।
    काळासी करूनियां दूर । स्वशरीर राखिलें ॥ ५३ ॥
    परंतु हें अति घोर दक्षिणायन आहे असें ऐकून, काळाला दूर सारून आपल्या शरीराचे रक्षण केले ५३; 


    मग निजात्मनिर्धारीं । भीष्म पहुडे शरपंजरीं ।
    त्यातें युधिष्ठिर प्रश्न करी । महाऋषीश्वरीं परिवारिला ॥ ५४ ॥
    आणि मग आपल्या दृढ निश्चयाप्रमाणे त्याने शरपंजरावर शयन केलें असतां मोठमोठ्या ऋषिसमुदायाच्या परिवारांत धर्मराजाने त्यास प्रश्न केला ५४.


    आम्हां सकळां देखतां । जाहला युधिष्ठिर पुसता ।
    तेचि पुरातन कथा । तुज मी आतां सांगेन ॥ ५५ ॥
    आमच्या सर्वांच्या समक्ष युधिष्ठिराने विचारली, तीच पुरातन कथा मी तुला सांगतों ५५.


    निवृत्ते भारते युद्धे सुहृन्निधनविह्वलः ।
    श्रुत्वा धर्मान् बहून्पश्चान्मोक्षधर्मानपृच्छत ॥ १२ ॥
    [श्लोक १२] भारतीय युद्ध संपल्यावर धर्मराज आपल्या आप्तेष्टांच्या संहाराने शोकविह्वळ झाला होता तेव्हा त्याने भीष्मांकडून पुष्कळ धर्मांचे विवरण ऐकल्यानंतर, मोक्षाच्या साधनांसंबंधी प्रश्न विचारला होता. (१२)


    मी संधि करितां श्रीकृष्ण । तें न मानीच दुर्योधन ।
    व्यासें वर्जितां आपण । तरी दृप्तपण युद्धासी ॥ ५६ ॥
    मी श्रीकृष्ण उभयतांचा संधि करण्यासाठी गेलो होतो, पण दुर्योधनानें तें मानले नाही. व्यासांनीही  त्याचा निषेध केला असता तो गर्वाने युद्धालाच तयार झाला ५६.


    एवं दैवबळें कुरुक्षेत्रीं । कौरवपांडवां झुंजारीं ।
    सापत्‍न दुर्योधनादि वैरी । सपरिवारीं मारिले ॥ ५७ ॥
    तात्पर्य, दैवयोगानें कुरुक्षेत्रामध्ये कौरवपांडवांच्या युद्धांत दुर्योधनादि सापत्न वैरी सहपरिवार मारले गेले ५७.


    युद्ध निवर्तल्यापाठीं । धर्म बैसल्या राज्यपटीं ।
    तेणें अभिमान घेतला पोटीं । महादोषी सृष्टीं मी एक ॥ ५८ ॥
    युद्ध समाप्त झाल्यानंतर धर्मराज राज्यपदारूढ झाला, तेव्हा त्याच्या अंतःकरणांत देहाभिमान उत्पन्न झाला की, 'पृथ्वीमध्ये महापातकी असा काय तो मीच एक होय' ५८.


    मी राज्यीं बैसवितां आपण । म्हणें म्यां मारिला गुरु ब्राह्मण ।
    म्यां मारिला कर्ण दुःशासन । राजा दुर्योधन म्यां मारिला ॥ ५९ ॥
    मी त्याला राज्यावर बसविल्यानंतर तो म्हणाला, मी माझ्या ब्राह्मणगुरूला मारलें ; कर्णदुःशासनाला मी मारलें ; व राजा दुर्योधनही मीच मारला ५९.


    उत्पत्तिस्थितिप्रलयकर्ता । येथ ईश्वरु जाण तत्त्वतां ।
    तें सांडोनियां सर्वथा । 'अहं कर्ता' म्हणे धर्म ॥ १६० ॥
    येथे खरोखर उत्पत्ति, स्थिति व प्रलयकर्ता एक ईश्वरच असतां तें सारे सोडून देऊन धर्मराज ह्या साऱ्याचा 'कर्ता काय तो मीच' असे म्हणू लागला १६०.


    देहाभिमानाचे खटाटोपीं । थोर हो‍ऊनियां अनुतापी ।
    गोत्रहंता मी महापापी । ऐसें आरोपी निजमाथां ॥ ६१ ॥
    देहाभिमानाच्या यातायातीत गुंतून मोठ्या पश्चात्तापानें, आपल्याच कुलगोतांचा घात करणारा असा आपण महापातकी आहे, असा आरोप त्याने आपल्या माथ्यावर घेतला ६१.


    त्यासी द्यावया समाधान । समयो भीष्माचें निर्याण ।
    तेथें म्यां नेउनियां जाण । धर्में केले प्रश्न ते ऐका ॥ ६२ ॥
    तेव्हा त्याचे समाधान करण्यासाठी भीष्मनिर्याणाची संधि साधून मी त्याला त्यांच्याकडे नेऊन त्यांनाच प्रश्न करविले. ते धर्माने केलेले प्रश्न आता ऐक ६२.


    राजधर्म दानधर्म । पुशिला तेणें आपद्धर्म ।
    मुख्यत्वें पुशिला 'मोक्षधर्म' । उत्तमोत्तम परियेसीं ॥ ६३ ॥
    त्यानें  'राजधर्म' विचारला; 'दानधर्म' विचारला; 'आपद्धर्म' विचारला व मुख्यत्वेकरून उत्तमोत्तम असा 'मोक्षधर्म'ही विचारला. तोच आतां ऐक ६३.


    तानहं तेऽभिधास्यामि देवव्रतमुखाच्छ्रुतान् ।
    ज्ञानवैराग्यविज्ञान श्रद्धाभक्त्युपबृंहितान् ॥ १३ ॥
    [श्लोक १३] त्यावेळी भीष्मांच्या तोंडून ऐकलेले धर्म मी तुला सांगतो ते ज्ञान, वैराग्य, विज्ञान, श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण आहेत. (१३)


    ते भीष्ममुखींचे मोक्षधर्म । म्यां परिशिले अतिउत्तम ।
    जे निरसिती भवभ्रम । सकळ कर्मदाहक ॥ ६४ ॥
    ते भीष्माच्या मुखातून निघालेले अतिउत्तम असे मोक्षधर्म मी श्रवण केले. त्यांच्या योगाने संसाराचा भ्रम दूर होतो व सर्व कर्म दग्ध होऊन जातें ६४.


    ज्ञान विज्ञान श्रद्धा भक्ती । अनित्य नासे वैराग्यस्थिती ।
    भीष्में सांगितली धर्माप्रती । ते मी निश्चितीं सांगेन ॥ ६५ ॥
    ज्ञान, विज्ञान, श्रद्धा, भक्ति, अनित्याचा नाशवंतपणा व वैराग्यस्थिति इत्यादींविषयीं भीष्मांनी धर्माला सांगितले. तेच मी तुला यथार्थ रीतीनें सांगतों ६५.


    म्हणणें भीष्मासी 'देवव्रत' । तेणें देवावरी ठेवूनि चित्त ।
    शरपंजरीं सुनिश्चित । निजात्मयुक्त पहुडला ॥ ६६ ॥
    भीष्माला 'देवव्रत' असें म्हणतात. याचे कारण देवावरच चित्त ठेवून, निश्चयपूर्वक आत्मानुसंधान धरून, स्वस्थांत:करणाने शरपंजरावर तो पहुडला होता ६६.


    तेणें सांगितला मोक्षधर्म । त्यांत मुख्यत्वें 'ज्ञान' प्रथम ।
    तें ज्ञान सांगे पुरुषोत्तम । अतिउत्तम अवधारीं ॥ ६७ ॥
    त्याने मोक्षधर्म सांगितला. त्यांत मुख्यत्वेकरून प्रथम 'ज्ञान' सांगितले. तेच अत्युत्तम ज्ञान पुरुषोत्तम सांगत आहेत ते ऐकावें ६७.


    नवैकादश पञ्च त्रीन् भावान् भूतेषु येन वै ।
    ईक्षेताथैकमप्येषु तञ्ज्ञानं मम निश्चितम् ॥ १४ ॥
    [श्लोक १४] उद्धवा ! ज्या ज्ञानाने, प्रकृती, पुरूष, महत्तत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा ही नऊ, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कम]द्रिये आणि एक मन ही अकरा, पाच महाभूते आणि तीन गुण ही आठ, अशी ही एकूण अठ्ठावीस तत्त्वेच सर्व कार्यांमध्ये आहेत, तसेच या सर्वांमध्ये एकच परमात्मतत्त्व व्यापून आहे, असे पाहिले जाते, तेच परोक्ष ज्ञान होय, हे माझे निश्चित मत आहे. (१४)


    प्रकृति पुरुष महत्तत्त्व । पंचतन्मात्रा सूक्षमस्वभाव ।
    अहंकारासकट 'नव' । तत्त्ववैभव हे संख्या ॥ ६८ ॥
    प्रकृति, पुरुष, महत्तत्त्व, पंचतन्मात्रा म्हणजे पांच सूक्ष्म भूते, आणि अहंकार ही सारी मिळून 'नऊ ' तत्वांची संख्या आहे ६८.


    'एकादश' बोलिजेतें । तें अकराही इंद्रियें येथें ।
    'पंच' ते पंचमहाभूतें । 'तिनी' ते निश्चित तीन गुण ॥ ६९ ॥
    'अकरा' असें जें म्हणतात, ती तेथें पांच ज्ञानेंद्रिये, पांच कर्मेंद्रियें व एक मन; आणि 'पांच' म्हणजे पंचमहाभूतें होत; आणि 'तीन' म्हणजे सत्व, रज व तम हे तीन गुण होत ६९.


    हे तत्त्वसंख्या उणखूण । गणितां अठ्ठावीस जाण ।
    इयें सर्व भूतीं समसमान । तत्त्वें जाण वर्तती ॥ १७० ॥
    ही सर्व तत्त्वांची संख्या एकत्र केली  म्हणजे 'अठ्ठावीस' होते. ही सर्व तत्त्वे सर्व प्राणिमात्रांमध्ये समसमान भावाने वागत असतात १७०.


    हिरण्यगर्भादि स्थावरान्त । तत्त्वें समान गा समस्त ।
    अधिक उणें नाहीं येथ । जाण निश्चित उद्धवा ॥ ७१ ॥
    ब्रह्मदेवापासून तों स्थावरापर्यंत ही सर्व तत्त्वें  सर्वामध्ये सारखी भरलेली आहेत. उद्धवा ! यांत खरोखर एकही अधिक किंवा उणे होत नाही, हें  लक्षात ठेव ७१


    तैसेंचि गा जीवचैतन्य । प्रतिबिंबलेंसे समसमान ।
    जें नाम रूप अभिमान । सर्वांसी जाण प्रकाशक ॥ ७२ ॥
     त्याचप्रमाणे 'जीवचैतन्य' हेही समसमानच प्रतिबिंबित झालेले आहे. आणि तेच सर्वाचे नाम, रूप व अमिमान ह्यांस  प्रकाशित करते ७२.


    थिल्लरीं विहिरीं सागरीं । चंद्रमा प्रतिबिंब समचि धरी ।
    तेवीं ब्रह्मादि मशकवरी । जीवत्व शरीरीं समसाम्यें ॥ ७३ ॥
    डबक्यामध्ये, विहिरीमध्ये किंवा समुद्रामध्ये चंद्राचे प्रतिबिंब सारखेच असते; त्याप्रमाणे महादेवापासून तो माशीपर्यंत सर्वांच्या शरीरांत जीवपणा हाही सारखाच असतो ७३.


    भूतें समसमान चैतन्य । एकात्मता देखणें जाण ।
    या नांव गा 'शुद्धज्ञान' । माझाही जाण हा निश्चय ॥ ७४ ॥
    प्राणिमात्रामध्ये चैतन्य हें  समसमानच असल्यामुळे सर्वांचा आत्मा एकच आहे, असे समजणे याचेच नांव 'शुद्ध ज्ञान' आणि माझेही ठाम मत तेंच आहे ७४.


    आतां विज्ञानाचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण ।
    ते श्लोकार्धें निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥ ७५ ॥
    आता विज्ञानाचेही सारे लक्षण तुला सांगतों. तेंच अर्ध्या श्लोकांत श्रीकृष्ण सांगत आहेत ७५.


    एतदेव हि विज्ञानं न तथैकेन येन यत् ॥
    पूर्वीं देखतेनी स्वभावें । व्यापक वस्तूनियें सर्वें ।
    पूर्वी पाहात असल्याप्रमाणे व्यापक अशा परब्रह्मानें देहादिक सारी तत्त्वे व्यापलेली आहेत, असें तो अगदी जीवाभावाने निश्चितपणे पाहातो ७६.


    व्यापिलीं असती देहादि तत्त्वें । हें मानी जीवेंभावें निश्चित ॥ ७६ ॥
    जेवीं कां घटमात्रास । सबाह्य व्यापक आकाश ।
    ज्याप्रमाणे घटादिकांला अंतर्बाह्य आकाशच व्यापलेले असते, त्याप्रमाणे साऱ्या प्रपंचाला चिदाभासच व्यापून राहिलेला आहे ७७.


    तेवीं सकळ प्रपंचास । चिदाभास व्यापक ॥ ७७ ॥
    ऐसें जें कां शुद्ध ज्ञान । तें ज्ञेयप्राप्तीचें कारण ।
    असें जें शुद्ध ज्ञान, तेच ज्ञेयप्राप्तीला कारण असते आणि ज्ञेय प्राप्त झाले की, ते ज्ञान वृत्तीसह लोपून जातें (हेंच विज्ञान होय) ७८.  


    ज्ञेय पावलिया ज्ञान । हारपे जाण वृत्तींसीं ॥ ७८ ॥
    ज्ञानैकगम्य वस्तु जे । यालागीं त्या 'ज्ञेय' म्हणिजे ।
    ते केवळ ज्ञानानेच जाणले जाते, म्हणून त्याला 'ज्ञेय' असे म्हणतात. आणखी ज्ञेय प्राप्त झाले की, सूर्याच्या तेजानें काजवा लाजून जातो, त्याप्रमाणे ते ज्ञानही लज्जायमान होते ७९.


    ज्ञेय पावलिया ज्ञान लाजे । जेवीं कां सूर्यतेजें खद्योत ॥ ७९ ॥
    जळीं रिघाल्या लवण । लवणपणा मुके जाण ।
    मीठ पाण्यात शिरलें असतां मिठाचा मीठपणाच नाहीसा होतो. त्याप्रमाणे ज्ञेय प्राप्त झाल्यानंतर ज्ञानाचा ज्ञातेपणाच नाहीसा होतो १८०.


    तेवीं ज्ञेय पावलिया ज्ञान । ज्ञातेपण हारवी ॥ १८० ॥
    ज्ञेय पावलिया सम्यक । स्वरूपीं चिन्मात्रैक एक ।
    ज्ञेयाची यथार्थ प्राप्ति झाली की, स्वरूपांत केवळ चिन्मात्रताच राहाते तेव्हां व्याप्य-व्यापक व साधकबाधक असें कांहीं राहातच नाही ८१.


    तेथ मिथ्या व्याप्यव्यापक । साधक बाधक असेना ॥ ८१ ॥
    जेवीं उदेलिया गभस्ती । सतारा लोपे रोहिणीपती ।
    सूर्योदय झाला म्हणजे नक्षत्रांसहवर्तमान चंद्र जसा लोपून जातो, त्याप्रमाणे ज्ञेयाच्या प्राप्तीपुढे साऱ्या जगासहवर्तमान ज्ञानसंपत्तीचाही लोप होऊन जातो ८२.


    तेवीं जगेंसीं ज्ञानसंपत्ती । ज्ञेयाचे प्राप्तीपुढें लोपे ॥ ८२ ॥
    ऐसें अपरोक्ष नव्हतां साङ्ग् । देहादि प्रपंचाचें लिंग ।
    अशा प्रकारचें  सांख्य अपरोक्ष ज्ञान जोपर्यंत झालेले नसते, तोपर्यंत देहादिक जें प्रपंचाचे स्वरूप आहे तें व जग हें  आत्म्याहून भित्र असें तो मानतो, आणि कोरड्या शब्दांनी ब्रह्मज्ञानाची वटवट करतो ८३.


    आत्म्यवेगळें देखे जग । शब्दें लगबग ब्रह्मज्ञाना ॥ ८३ ॥
    शुद्ध शाब्दिक जें ब्रह्मज्ञान । तेहीं गुणात्मक जाण ।
    असें जें शुद्ध शाब्दिक महाज्ञान, तेही  त्रिगुणात्मकच असते, आणि परब्रह्म वस्तु तर निराकार व निर्गुण आहे; तिला जन्मही नाही आणि मरणही नाही असें समज ८४.


    वस्तु निराकार निर्गुण । जन्ममरण तिशी नाहीं ॥ ८४ ॥
    त्रिगुण तितुकें नाशवंत । येचि विखीं प्रस्तुत ।
    त्रिगुणात्मक म्हणून जेवढे आहे, तेवढे सारें नाशवंतच आहे. याविषयींच येथें नाशवंत व साकार यांचे निरूपण आतां श्रीकृष्ण सांगत आहेत ८५.


    सांगताहे श्रीकृष्णनाथ । अंतवंत साकार ॥ ८५ ॥
    *(उत्तरार्ध) स्थित्युत्पत्त्यप्ययान्पश्येद्‍भावानां त्रिगुणात्मनाम् ॥ १५ ॥
    [श्लोक १५] ही अठ्ठावीस तत्त्वे न पाहाता त्यांत व्यापून असलेले एक परमात्मतत्त्वच अनुभवणे याला विज्ञान. (साक्षात्कार) म्हणतात तसेच त्याच तत्त्वापासून त्रिगुणात्मक पदार्थांची उत्पत्ती, स्थिती व लय होतात, हे जाणावे. (१५)


    जरी नसतें नाशवंत । तरी सगुण मानूं येतें सत्य ।
    उत्पत्तिस्थितिनिदानवंत । जाण येथ त्रिगुणाचि ॥ ८६ ॥
    जर नाशवंत नसते, तर सगुण सत्यच आहे असे मानले असते. येथे तीन गुण आहेत त्यांनाच उत्पत्ति, स्थिति व लय आहे ८६.


    रजोगुणें होय उत्पत्ति । सत्वगुणें कीजे स्थिती ।
    तमोगुण नाशी अंतीं । हा गुणप्रवृत्ती-स्वभावो ॥ ८७ ॥
    रजोगुणाने उत्पत्ति, सत्त्वगुणाने स्थिति आणि तमोगुणाने शेवटीं नाश होतो. हा गुणांच्या वृत्तीचा स्वभावच आहे ८७.


    या गुणांमाजीं वस्तु असे । जिचेनि गुणकर्म प्रकाशे ।
    परी जन्ममरणादि दोषें । अलिप्त वसे अविनाशी ॥ ८८ ॥
    या गुणांमध्ये परब्रह्म असतेच; त्याच्याच योगाने गुणांचे कार्य प्रकाशित होते; परंतु ती वस्तु जन्ममरणादि दोषांना अलिप्त असते व अविनाशीच राहाते ८८.


    जे तिनी गुणां आश्रयभूत । जिचेनि गुणकर्में वर्तत ।
    ती वस्तु त्रिगुणातीत । तेचि सांगत श्रीकृष्ण ॥ ८९ ॥
    जी वस्तु तिन्ही गुणांना आश्रयभूत असते, जिच्या योगानेच गुणांची कर्में  चालतात, ती तीन गुणांहून अगदी निराळी आहे. तेंच श्रीकृष्ण सांगतात ८९.


    आदावन्ते च मध्ये च सृज्यात्सृज्यं यदन्वियात् ।
    पुनस्तत्प्रतिसंक्रामे यच्छिष्येत तदेव सत् ॥ १६ ॥
    [श्लोक १६] अशा प्रकारे जे परमात्मतत्त्व सुरूवातीला आणि शेवटी असते, तेच एका कार्यातून दुसर्‍या कार्यात अनुस्यूत होत राहाते आणि प्रलयकाळी उत्पन्न झालेले सर्व आपल्यामध्ये विलीन करून घेतल्यावर शेवटी जे शिल्लक राहाते, तेच 'सत्‌' तत्त्व होय. (१६)


    गुणां आदि-मध्य-अवसानीं । सृष्टिउत्पत्ति-स्थिति-निदानीं ।
    जें असे अविनाशपणीं । तें मी मानीं संतत्वें ॥ १९० ॥
    गुणांच्या आधीं, मध्ये व अंतीं, तसेंच सृष्टीच्या उत्पत्ति, स्थिति व लयाच्या वेळी जें अविनाशरूपाने राहाते, तेच 'संत' म्ह. शाश्वत तत्त्व आहे असें मी समजतों १९०.


    तेंचि संतत्व गा ऐसें । ज्याचेनि आधारें जग वसे ।
    जें जगा सबाह्य भरलें असे । जग प्रकाशे ज्याचेनी ॥ ९१ ॥
    ते 'संतत्व' असे की, ज्याच्या आधाराने जग राहात आहे, आणि जें जगाच्या अंतर्बाह्य भरलेलें  आहे आणि ज्याच्या योगेंकरून जग प्रकाशित होते ९१.


    हें जगचि होय जाये । परीं तें संचलेंचि राहे ।
    ऐशी जे निजवस्तु आहे । ते तूं पाहे संतत्वें ॥ ९२ ॥
    हे जगच उत्पन्न होते आणि लयास जातें ; पण तें तत्त्व कायमच असते. अशी जी आत्मवस्तु आहे, तीच सत्य आहे असें तूं समज ९२.


    जैसे घटमठ होती जाती । आकाश राहे सहजगती ।
    तेवीं ब्रह्मांडा लयोत्पत्ती । वस्तूची स्थिती संचली ॥ ९३ ॥
    ज्याप्रमाणे घट आणि मठ होतात आणि जातात, पण आकाश असते तसेंच असते; त्याचप्रमाणे ब्रह्मांडाची उत्पत्ति व लय झाला तरी, परब्रह्म असते तसेच साठलेलें असतें ९३.


    जेवीं अलंकारपूर्वीं सोनें । अलंकारीं सोनें सोनेंपणें ।
    अलंकारनाशीं नासों नेणे । जेवीं कां सोनें निजस्थिती ॥ ९४ ॥
     अलंकार  करण्यापूर्वी असलेले सोनें, अलंकार केले तरी त्यांत सोनेपणानेंच असते; किंवा अलंकार मोडले तरी सोने असते त्याप्रमाणेच असते. त्याचा काही त्या अलंकाराबरोबर जसा नाश होत नाही ९४.  


    तेवीं आकळोनि चराचर । वस्तु असे अखंडाकार ।
    होतां जातां आकारविकार । वस्तु अणुमात्र विकारेना ॥ ९५ ॥
    त्याप्रमाणे चराचराला व्यापून परब्रह्म हें अखंडाकारच असते. कोणताही आकार किंवा विकार उत्पन्न झाला किंवा मोडला तरी त्या परब्रह्माला अणुमात्र विकार होत नाहीं ९५.


    ऐशी जे वस्तु अखंडपणें । तिच्या ठायीं चार प्रमाणें ।
    इहीं प्रमाणीं वस्तु जाणणें । प्रपंच देखणें मिथ्यात्वें ॥ ९६ ॥
    अशा प्रकारची अखंडपणाने राहाणारी जी परब्रह्मरूप वस्तु आहे. तिला चार प्रमाणे आहेत. त्या प्रमाणांवरून ती वस्तु जाणावी आणि प्रपंच हा मिथ्या आहे असे समजावें ९६.


    श्रुतिः प्रत्यक्षमैतिह्यमनुमानं चतुष्टयम् ।
    प्रमाणेष्वनवस्थानाद्विकल्पात्स विरज्यते ॥ १७ ॥
    [श्लोक १७] वेद, प्रत्यक्ष, इतिहास आणि अनुमान या चारही प्रमाणांनी भेदबुद्धीचे अस्तित्व सिद्ध होत नाही म्हणून विवेकी पुरूष भेदबुद्धीचा त्याग करतो. (१७)


    एक अद्वैत ब्रह्म पाहीं । दुसरें आणिक कांहीं नाहीं ।
    प्रपंच मिथ्या वस्तूचे ठायीं । हें प्रमाण पाहीं 'वेदवाक्य' ॥ ९७ ॥
    जिकडे तिकडे सारें एक अद्वैत परब्रह्मच आहे. दुसरें आणखी काही एक नाही. त्या परब्रह्मामध्ये हा प्रपंच मिथ्या भासाचा आहे. याला वेदवाक्य प्रमाण' आहे ९७.


    'प्रत्यक्ष' देखिजे आपण । देहादिकांचें नश्वरपण ।
    हें दुसरें परम प्रमाण । जें क्षणिकत्व जाण प्रपंचा ॥ ९८ ॥
    देहादिकांची क्षणभंगुरता आपण प्रत्यक्ष पाहातोच. प्रपंचाच्या क्षणिकत्वाचे दुसरें 'प्रत्यक्ष प्रमाण' होय ९८.


    मार्कंडेयो आणि भुशुंडी । इंहीं प्रपंचाची राखोंडी ।
    देखिली गा रोकडी । वेळां कोडी कल्पांतीं ॥ ९९ ॥
    मार्कंडेय आणि भृशुंडी यांनी कोट्यवधि कल्पातांच्या वेळी प्रपंचाची राखरांगोळी झालेली डोळ्यांनी पाहिली आहे ९९.


    महाजनप्रसिद्ध हें श्रवण । प्रपंचासी क्षणिकपण ।
    हें तिसरें गा प्रमाण । उद्धवा जाण 'ऐतिह्य' ॥ २०० ॥
    असे मोठमोठ्यांच्या मुखातून आपण अनेक वेळा ऐकलेलें आहे हें  प्रपंचाच्या नश्वरपणाचे तिसरें 'ऐतिहासिक प्रमाण' होय २००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...