मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ ओव्या १ ते १००

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

    ॐ नमो स्वामी सद्‍गुरू । तूं निजांगें क्षीर सागरू ।
    तुझा उगवल्या प्रबोधचंद्रू । आल्हादकरू जीवासी ॥१॥
    श्रीकृष्णाय नमः
    हे स्वामी ! हे सद्गुरो ! तुला नमस्कार असो.  तू स्वत:च क्षीरसागर आहेस. तुझ्या ज्ञानरूप चंद्राचा उदय झाला असतां तो प्रत्येक जीवाला आल्हादकारक होतो १. 


    ज्या चंद्राचे चंद्रकरीं । निबिड अज्ञान अंधारीं ।
    त्रिविध ताप दूर करी । हृदयचिदंबरीं उगवोनी ॥२॥
    ज्या चंद्राच्या चांदण्याने हृदयाकाशांत प्रकाश पाडून घनदाट अज्ञानरूपी अंधारांतील त्रिविध ताप दूर केले २; 


    ज्या चंद्राचे चंद्रकिरण । आर्तचकोरांलागीं जाण ।
    स्वानंदचंद्रामृतें स्रवोन । स्वभावें पूर्ण करिताती ॥३॥
    ज्या चंद्राचे चंद्रकिरण तृषाक्रांत झालेल्या चकोरांसाठी स्वानंदचंद्रामृताने स्रवून त्यांना सहज तृप्त करतात ३; 


    अविद्याअंधारीं अंधबंधे । संकोचलीं जीवदेहकुमुदें ।
    तीं ज्याचेनि किरणप्रबोधें । अतिस्वानंदें विकासलीं ॥४॥
    अविद्यारूप अंधारांत अंधकाररूप बंधनांनी जीवाची देहरूप कमळे मुकुलित होऊन बसलेली असतात, ती ज्याच्या किरणरूप ज्ञानाने अत्यंत आनंदाने प्रफुलित होतात ४; 


    जो चंद्र देखतांचि दिठीं । सुख होय जीवाच्या पोटीं ।
    अहंसोमकांतखोटी । उठाउठी विरवितू ॥५॥
    जो चंद्र दृष्टीने पाहतांच जीवाच्या अंत:करणांत आनंद होतो, आणि जो अहंकाररूपी चंद्रकांत मण्याचा गोळा तत्काळ विरवून टाकतो ५. 


    पूर्णिमा पूर्णत्वें पूर्ण वाढे । देखोनि क्षीराब्धी भरतें चढे ।
    गुरुआज्ञामर्यादा न मोडे । स्वानंद चढे अद्वयें ॥६॥
    आपला पुत्र (शिष्य) पूर्णिमेच्या काळी पूर्णत्वाने पूर्ण वृद्धि पावला असे पाहून क्षीरसमुद्राला मोठी भरती येते, तरी त्याची गुरुगौरवाची मर्यादा मोडत नाही. अद्वयानुभवानें अंत:करणामध्ये आत्मानंद वाढतच असतो ६. 


    सद्‍गुरु क्षीराब्धी अतिगहन । सादरें करितां निरीक्षण ।
    वेदांतलहरीमाजीं जाण । शब्दचिद्रत्‍नें भासती ॥७॥
    सद्गुरुरूप क्षीरसमुद्र फार खोल आहे. त्याच्याकडे आदरपूर्वक पाहू लागले असतां त्यावर हेलावणाऱ्या वेदांतरूपी लहरीमध्ये शब्दरूपी ज्ञानरत्ने आढळून येतात ७. 


    तेथ विश्वासाचा गिरिवर । वैराग्यवासुकी रविदोर ।
    निजधैर्याचे सुरासुर । मंथनतत्पर समसाम्यें ॥८॥
    त्यांत विश्वास हाच मंदराचल पर्वत, व वैराग्यरूपी वासुकी हाच रवीला बांधावयाचा दोर; त्याच्या साहाय्याने निजधैर्यरूप देव-दानव समसमानपणे त्या क्षीरसमुद्राचे मंथन करण्यांत तत्पर असतात ८. 


    मथनीं प्रथम खळखळाटीं । लयविक्षेप हाळाहळ उठी ।
    तें विवेकनीळकंठें कंठीं । निजात्मदृष्टीं गिळिलें ॥९॥
    त्या मंथनाच्या पहिल्याच खळखळाटांत लय, विक्षेप, इत्यादि काळकूट उत्पन्न झाले, तें विवेकरूपी महादेवाने आत्मदृष्टीने आपल्याच गळ्यामध्ये गिळून टाकले ९. 


    मग अभ्यास प्रत्यगावृत्ती । क्रियेसी झाली विश्रांती ।
    प्रकटली रमा निजशांती । जीस श्रीपती वश्य झाला ॥१०॥
    मग अभ्यासाच्या पुनरावृत्तीने सर्व कर्मांना विश्रांति मिळाली, तेव्हां जिला श्रीकृष्ण वश झाला, ती आत्मशांतिरूपी लक्ष्मी प्रगट झाली १०. 


    तेथ ब्रह्मरस आणि भ्रमरस । इंहीं युक्त अमृतकलश ।
    मथनीं निघाला सावकाश । ज्याचा अभिलाष सुरासुरां ॥११॥
    त्या ठिकाणी ब्रह्मरस आणि भ्रमरस ह्या दोहोंनी भरलेला अमृताचा कलश, ज्याची देव-दानवांना अत्यंत आवड असते, तो त्या मंथनापासून हळूहळू बाहेर निघाला ११. 


    ते विभागावयालागुनी । माधवचि झाला मोहिनी ।
    अहंराहूचें शिर छेदूनी । अमृतपानी निवविले ॥१२॥
    तोच वाटून देण्यासाठी श्रीहरि मोहिनी झाला, आणि अहंकाररूप राहूचा शिरच्छेद करून देवांना तृप्त केलें १२. 


    ते वृत्तिरूप मोहिनी । पालटली तत्क्षणीं ।
    ठेली नारायण हो‍उनी । पहिलेपणीं उठेना ॥१३॥
    ती वृत्तिरूप मोहिनी तत्काल आपले स्वरूप बदलून नारायणस्वरूप होऊन राहिली. पूर्वीची देहबुद्धि तिला राहिली नाहीं १३. 


    ते क्षीरसागरीं नारायण । समाधि शेषशयनीं आपण ।
    सुखें सुखावला जाण । अद्यापि शयन केलें असे ॥१४॥
    त्या क्षीरसागरांतील जो नारायण, तो स्वतः समाधिरूप शेषशयनावर सुखाने अत्यंत संतुष्ट होऊन अद्यापपर्यंत निजलेलाच आहे १४. 


    ऐसा सद्‍गुरु चित्सागरु । ज्याचा वेदांसी न कळे पारू ।
    नारायणादि नानावतारू । ज्याचेन साचारू उपजती ॥१५॥
    अशा प्रकारे सद्‌गुरू हा ज्ञानरूपी समुद्र आहे. नारायण आदिकरून अनेक अवतार खरोखर ज्याच्यामुळे उत्पन्न होतात, अशा त्या सद्‌गुरूचा अंत वेदांनासुद्धा लागत नाही १५. 


    ज्याचीं चिद्रत्‍नें गोमटीं । हरिहरांचें कंठीं मुकुटीं ।
    बाणलीं शोभती वेदपाठीं । कविवरिष्ठीं वानिलीं ॥१६॥
    ज्याची सुंदर ज्ञानरूप रत्ने शंकर आणि विष्णु यांच्या गळ्यांत व मुकुटावर राहून शोभत असतात, आणि त्यांचे वेदपाठांनी व थोर कवींनी वर्णन केले आहे १६, 


    ऐशिया जी अतिगंभीरा । जनार्दना सुखसागरा ।
    अनंतरूपा अपारा । तुझ्या परपारा कोण जाणे ॥१७॥
    अशा अत्यंत गंभीर सुखसागरा ! जनार्दना ! अनंत रूपें धारण करणाऱ्या व ज्याचा अंत लागत नाही अशा देवा ! तुझ्या पलीकडील वस्तूला कोण जाणतो ? १७. 


    विवेकें न देखवे दिठीं । वेदां न बोलवे गोठी ।
    तेथ हे माझी मराठी । कोणे परिपाटी सरेल ॥१८॥
    विचाराच्या दृष्टीनेसुद्धा ते दिसत नाहीं; वेदांनाही त्या स्वरूपाचे वर्णन सांगता येत नाही. तेव्हा ही माझी मराठी भाषा ते सांगावयास कोणत्या रीतीने समर्थ होईल ? १८. 


    हो कां राजचक्रवर्तीचे माथां । कोणासी न बैसवे सर्वथा ।
    तेथ माशी जाऊनि बैसतां । दुर्गमता तंव नाहीं ॥१९॥
    हे पहा ! सार्वभौम राजाच्या मस्तकावर कोणालाही मुळींच बसतां येत नाही. पण माशी तेथे जाऊन बसू लागली असता तिला त्यांत कांही कठीण नाही १९. 


    कां राजपत्‍नीचे स्तन । देखावया शके कोण ।
    परी निजपुत्र तेथें जाण । बळें स्तनपान करीतसे ॥२०॥
    किंवा राणीचे स्तन पहाण्याला कोण समर्थ आहे ? पण तिचा मुलगा तेथें जोरजोराने स्तनपान करीत असतो ! २०. 


    तेवीं माझी हे मराठी । जनार्दनकृपापरिपाटीं ।
    निःशब्दाच्या सांगे गोठी । चिन्मात्रीं मिठी घालूनी ॥२१॥
    त्याप्रमाणे माझी ही मराठीच भाषा जनार्दनकृपेच्या सामर्थ्यानं आत्मज्ञानाला मिठी मारून अनिर्वाच्य असलेल्या ब्रह्माच्याही गोष्टी सांगते २१. 


    असो आकाश घटा सबाह्य आंतू । तेवीं शब्दामाजीं निःशब्दवस्तू ।
    रिता बोल रिघावया प्रांतू । उरला प्रस्तुतू दिसेना ॥२२॥
    असो. आकाश हे घटाच्या आंतून व बाहेरून व्यापलेले असते. त्याप्रमाणे शब्दातीत परब्रह्म हें शब्दामध्येही असतेच. यामुळे वायफळ शब्द आत शिरावयाला प्रस्तुत प्रसंगी जागाच उरलेली दिसत नाही २२. 


    बाळक बोलों नेणे तत्त्वतां । त्यासी बोलिकें बोलवी पिता ।
    तैसीच हेही जाणावी कथा । वाचेचा वक्ता जनार्दन ॥२३॥
    मुलाला बोलावयाचे समजत नाही, म्हणून त्याचा पिताच आपल्या बोलण्याने त्याला बोलवीत असतो. त्याप्रमाणेच हीही गोष्ट आहे असे समजावें. कारण माझ्या वाणीला बोलविणारा जनार्दन आहे २३. 


    त्या जनार्दनाचे कृपादृष्टीं । भागवत सांगों मराठिये गोष्टी ।
    जें कां आलोडितां ग्रंथकोटी । अर्थी दृष्टी पडेना ॥२४॥
    त्या जनार्दनाच्या कृपादृष्टीने भागवत मराठी भाषेमध्ये सांगू.  कोट्यवधि ग्रंथ अवलोकन केले असताही त्या ग्रंथांतील अर्थात भागवताचें ज्ञान दृष्टीला पडत नाही २४. 


    तेंचि श्रीमहाभागवत । जनार्दनकृपें येथ ।
    देशभाषा हंसगीत । ज्ञान सुनिश्चित सांगीतलें ॥२५॥
    तेंच हें श्रीमद्‌भागवत होय. त्यांतील 'हंसगीत' नांवाचे जे ज्ञान, ते जनार्दनाच्या कृपेने येथे मराठी भाषेमध्ये यथार्थ रीतीने सांगितले २५, 


    सद्‍भावें करितां माझी भक्ती । तेणें ज्ञानखड्गाची होय प्राप्ती ।
    छेदोनि संसारआसक्ती । सायुज्यमुक्ती मद्‍भक्तां ॥२६॥
    एकनिष्ठेने माझी भक्ति केली असता तिच्या योगाने ज्ञानरूप खड्गाची प्राप्ति होते, आणि त्याच शस्त्राने संसाराची आसक्ति छेदून माझ्या भक्तांना सायुज्यमुक्ति प्राप्त होते २६. 


    माझेनि भजनें मोक्ष पावे । ऐसें बोलिलें जें देवें ।
    तें आइकोनियां उद्धवें । विचारू जीवें आदरिला ॥२७॥
    माझ्या भजनानेच मोक्ष मिळतो असें जें देवाने पूर्वी सांगितले, तें उद्धवाने ऐकून त्याने मनांत असा विचार केला की २७, 


    देवो सांगे भजनेंचि मुक्ती । आणि ज्ञात्यांची व्युत्पत्ती ।
    आणिकें साधनें मोक्षाप्रती । सांगताती आनआनें ॥२८॥
    भजनानेच मुक्ति मिळते असें देव सांगतात, पण याबद्दल ज्ञात्यांची मते पाहिली तर ते मोक्षप्राप्तीला आणखी भिन्न भिन्न साधनें सांगतात २८. 


    एवं या दोहीं पक्षीं जाण । मोक्षीं श्रेष्ठ साधन कोण ।
    तेचि आशंकेचा प्रश्न । उद्धवें आपण मांडिला ॥२९॥
    तेव्हां या दोन्ही प्रकारांत मोक्षप्राप्तीचे श्रेष्ठ साधन कोणते ? तोच शंकेचा प्रश्न उद्धवाने आपण होऊन श्रीकृष्णासमोर मांडिला २९. 


    श्रीउद्धव उवाच -
    वदंति कृष्ण श्रेयांसि बहूनि ब्रह्मवादिनः ।
    तेषां विकल्पप्राधान्यमुताहो एकमुख्यता ॥ १ ॥
    [श्लोक १]  उद्धवाने विचारले ! श्रीकृष्णा ! ब्रह्मवादी महात्म्यांनी आत्मकल्याणासाठी भक्ती, ध्यान, इत्यादी अनेक साधने सांगितली आहेत हे सर्वच मुख्य आहेत की, यांपैकी कोणते तरी एक मुख्य आहे ? (१)


    उद्धव म्हणे गा श्रीपती । मोक्षमार्गीं साधनें किती ।
    वेदवादियांची व्युत्पत्ती । बहुत सांगती साधनें ॥३०॥
    उद्धव म्हणाला, हे श्रीकृष्णा ! मोक्षमार्गाला साधन किती आहेत ? वेदवाद्यांच्या मताप्रमाणे पाहिले तर ते अनेक साधनें सांगतात ३०. 


    तीं अवघींच समान । कीं एक गौण एक प्रधान ।
    देवें सांगीतलें आपण । भक्तीचि कारण मुक्तीसी ॥३१॥
    ती सर्व साधनें सारख्याच योग्यतेची आहेत काय ? की एक गौण व एक श्रेष्ठ असा प्रकार आहे ? देवाने तर स्वत: मुक्तीला कारण भक्तीच होय असे सांगितले ३१.


    भवतोदाहृतः स्वामिन् भक्तियोगोऽनपेक्षितः ।
    निरस्य सर्वतः सङ्गं येन त्वय्याविशेन्मनः ॥ २ ॥
    [श्लोक २] स्वामी ! आपण भक्तियोग हेच निरपेक्ष साधन आहे, असे सांगितले या भक्तीने सर्व तर्‍हेची आसक्ती नाहीशी होऊन मन आपल्या ठायीच लागून राहाते. (२)


    आणिकां साधनां नापेक्षिती । सर्व संगांतें निरसिती ।
    मोक्षमार्गीं मुख्य भक्ती । जिणें स्वरूपप्राप्ती तत्काळ ॥३२॥
    भक्त इतर साधनांची आशाच करीत नाहीत. सर्व संगांचा त्याग करतात. कारण, जिच्या योगाने तत्काळ आत्मस्वरूपाची प्राप्ति होते, अशी भक्तीच मोक्षमार्गामध्ये मुख्य आहे ३२. 


    माझ्या स्वरूपीं ठेवूनि मन । फळाशेवीण माझें भजन ।
    हेंचि मोक्षाचें मुख्य साधन । देवें आपण बोलिलें ॥३३॥
    माझ्या स्वरूपावर मन ठेवून फलाची आशा सोडून माझे भजन करणे, हेच मोक्षाचे मुख्य साधन आहे, असें देवाने स्वतः सांगितले ३३. 


    स्वामी बोलिले मुख्य भक्ती । इतर जे साधनें सांगती ।
    त्यांसी प्राप्तीची अस्तिनास्ति । देवें मजप्रती सांगावी ॥३४॥
    देव तर "भक्ति हीच मुख्य" असे म्हणाले, तेव्हां इतर जी साधने सांगतात, त्यांनी आत्मस्वरूपाची प्राप्ति होते किंवा नाही, हे देवाने मला सांगावे ३४. 


    याचि प्रश्नाची प्रश्नस्थिती । विवंचीतसे श्रीपती ।
    त्रिगुण ज्ञात्याची प्रकृती । साधनें मानिती यथारुचि ॥३५॥
    ह्याच प्रश्नाचा विचार श्रीकृष्ण विवरण करून सांगू लागले. ते म्हणाले, ज्ञात्याचा स्वभाव त्रिगुणात्मक असल्यामुळे ते आपआपल्या आवडीप्रमाणे साधनें स्वीकारीत असतात ३५. 


    ज्याची आसक्ती जिये गुणीं । तो तेंचि साधन सत्य मानी ।
    यापरी ज्ञानाभिमानी । नाना साधनीं जल्पती ॥३६॥
    ज्या गुणामध्ये ज्याची आवड असते, तो तेच साधन खरे मानितो. ज्ञानाचा अभिमान बाळगणारे असतात ते अशा प्रकारे अनेक साधनांची बडबड करीत असतात ३६. 


    परंपरा बहुकाळें । ज्ञात्याचें ज्ञान झालें मैळें ।
    तें सत्य मानिती तुच्छ फळें । ऐक प्रांजळें उद्धवा ॥३७॥
    उद्धवा ! हीच परंपरा पुष्कळ दिवस चालत असल्यामुळे ज्ञात्याचे ज्ञान मलिन झाले आहे. त्याला क्षुद्र फळे येतात तरी तेच ज्ञान खरे असे मानतात. ते स्पष्टपणाने श्रवण कर ३७. 


    चौदाव्यामाजीं निरूपणस्थिती । इतुकें सांगेल श्रीपती ।
    साधनांमाजीं मुख्य भक्ती । ध्यानयोगस्थिती समाधियुक्त ॥३८॥
    चौदाव्या अध्यायांतील प्रतिपादनामध्ये श्रीकृष्ण इतका विषय सांगेल की, ध्यानयोगस्थिति व समाधि ह्यांनी युक्त अशी जी भक्ति, तीच सर्व साधनांत मुख्य आहे ३८. 


    इतर साधनांचें निराकरण । तुच्छफलत्वें तेंही जाण ।
    सात श्लोकीं श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगतू ॥३९॥
    इतर साधनें फलाची इच्छा धरणारी असल्यामुळे तुच्छ आहेत. तेही श्रीकृष्ण स्वत: सात श्लोकांमध्ये आपल्या मुखाने सांगत आहे ३९. 


    श्रीभगवानुवाच -
    कालेन नष्टा प्रलये वाणीयं वेदसंज्ञिता ।
    मयाऽऽदौ ब्रह्मणे प्रोक्ता धर्मो यस्यां मदात्मकः ॥ ३ ॥
    [श्लोक ३] श्रीभगवान म्हणाले - प्रलयाच्या वेळी काळाच्या प्रभावाने ही वेदवाणी लुप्त झाली होती नंतर जेव्हा सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हा मी ती ब्रह्मदेवांना दिली तिच्यामध्ये माझ्या भागवतधर्माचे निरूपण आहे. (३)


    माझी वेदवाणी प्रांजळी । ज्ञानप्रकाशें अतिसोज्ज्वळी ।
    ते नाशिली प्रळयकाळीं । सत्यलोकहोळी जेव्हां झाली ॥४०॥
    माझी वेदवाणी स्पष्ट आहे. ती ज्ञानरूपी प्रकाशाने अत्यंत उज्वल झालेली आहे. प्रलयकालामध्ये सत्यलोक जेव्हां जळून खाक झाला, तेव्हा ती नाश पावली ४०. 


    ब्रह्मयाचा प्रळयो होतां । वेदवाणीचा वक्ता ।
    कोणी नुरेचि तत्त्वतां । यालागीं सर्वथा बुडाली ॥४१॥
    त्या प्रळयांत ब्रह्मदेवाचा नाश झाला असतां खरोखर वेदवाणी सांगणारा कोणीच शिल्लक राहिला नाही, म्हणून ती सर्वस्वी बुडून गेली ४१. 


    तेचि वेदवाणी कल्पादीसी । म्यांचि प्रकाशिली ब्रह्मयासी ।
    जिच्याठायीं मद्‍भक्तीसी । यथार्थेंसी बोलिलों ॥४२॥
    कल्पाच्या आरंभाला तीच वेदवाणी मी ब्रह्मदेवाजवळ प्रगट केली, -जिच्यामध्ये मी माझ्या भक्तीचे वर्णन यथार्थ रीतीने केलें आहे ४२. 


    जे वाचेचें अनुसंधान । माझे स्वरूपीं समाधान ।
    ऐसें माझें निजज्ञान । ब्रह्मयासी म्यां जाण सांगीतलें ॥४३॥
    जें वाणीचें अनुसंधान असून माझ्या स्वरूपांतच समाधान पावणारे असें माझें आत्मज्ञान, ते मी ब्रह्मदेवाला सांगितले ४३. 


    तेन प्रोक्ता च पुत्राय मनवे पूर्वजाय सा ।
    ततो भृग्वादयोऽगृह्णन् सप्त ब्रह्ममहर्षयः ॥ ४ ॥
    [श्लोक ४] ब्रह्मदेवाने ती आपला ज्येष्ठ पुत्र स्वायंभुव मनू याला सांगितली नंतर त्याच्याकडून भृगू इत्यादी सात ब्राह्मर्षींनीं तिचे ग्रहण केले. (४)


    तो सकळ वेद विवंचूनू । ब्रह्मेनि उपदेशिला मनू ।
    सप्त ब्रह्मर्षी त्यापासूनू । वेद संपूर्णू पावले ॥४४॥
    त्या सर्व वेदाचा विचार करून ब्रह्मदेवाने प्रथम मनूला उपदेश केला, आणि त्या मनपासूनच सात ब्रह्मर्षींना संपूर्ण वेद प्राप्त झाले ४४. 


    ब्रह्मेनि दक्षादि प्रजापती । उपदेशिले त्याचि स्थिती ।
    यापासून नेणों किती । ज्ञानसंपत्ती पावले ॥४५॥
    ब्रह्मदेवाने दक्षादि प्रजापतींनाही त्याच रीतीने उपदेश केला. मग त्यांच्यापासून कितीजणांना ती ज्ञानसंपत्ति प्राप्त झाली, त्यांची संख्याच सांगता येणे शक्य नाही ४५. 


    सप्तऋषींची जे मातू । भृगु मरीचि अत्रि विख्यातू ।
    अंगिरा पुलस्त्य पुलह ऋतू । जाण निश्चितू ऋषिभागू ॥४६॥
    सप्तऋषि कोणते म्हणून विचाराल तर, भृगु, मरीचि, प्रसिद्ध अत्रि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह आणि ऋतु हे खरोखर ऋषि होत ४६. 


    तेभ्यः पितृभ्यस्तत्पुत्रा देवदानवगुह्यकाः ।
    मनुष्याः सिद्धगंधर्वाः सविद्याधरचारणाः ॥ ५ ॥
    किन्देवाः किन्नरा नागा रक्षःकिम्पुरुषादयः ।
    बह्व्यस्तेषां प्रकृतयो रजःसत्त्वतमोभुवः ॥ ६ ॥
    [श्लोक ५/६] त्या सात महषर्कींडून त्यांचे पुत्र देव, दानव, गुह्यक, मनुष्य, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, चारण, किंदेव, किन्नर, नाग, राक्षस, किंपुरूष इत्यादी अनेकजणांनी वेदांचे ज्ञान प्राप्त करून घेतले यांपैकी काही सात्त्विक, काही राजस आणि काही तामस स्वभावाचे होते. (५-६)


    तिंहीं ऋषीश्वरीं पुत्रपौत्र । उपदेशिले नर किन्नर ।
    देव दानव अपार सिद्ध । विद्याधर चारण ॥४७॥
    त्या महान् महान् ऋषीश्वरांनी पुत्र, पौत्र, नर, किंनर, देव, दानव, सिद्ध, विद्याधर, चारण ४७.  


    गुह्यक गंधर्व राक्षस । किंदेव आणि किंपुरुष ।
    नागसर्पादि तामस । परंपरा उपदेश पावले ॥४८॥
    गुह्यक, गंधर्व, राक्षस, किंदेव आणि किंपुरुष इत्यादि अनेकांना उपदेश केला, इतकेच नव्हे, तर नाग-सर्पादी तामस योनींनाही परंपरेनें तो उपदेश मिळाला ४८. 


    मुखाकृती दिसती नर । शरीरें केवळा वनचर ।
    ऐसे जे कां रीस थोर । त्यांसी किन्नर बोलिजे ॥४९॥
    तोंडाच्या आकाराने मनुष्यासारखे दिसतात, परंतु इतर शरीराने पशु दिसतात असे जे मोठमोगले अस्वल असतात, त्यांना किंनर असें म्हणतात ४९. 


    मुखाभासें दिसती पुरुष । शरीर पाहतां श्वापदवेष ।
    ऐसे जे वानर रामदास । त्यांसी किंपुरुष बोलिजे ॥५०॥
    आणखी, तोंडाकडून पाहिले तर पुरुषासारखे, पण शरीर मात्र श्वापदाचे, असे जे रामाचे सेवक झालेले वानर, त्यांना किंपुरुष असे म्हणतात ५०.  


    स्वेददुर्गंधिकल्मषरहित । शरीरें अतिभव्य भासत ।
    मनुष्यदेवांऐसे दिसत । ते बोलिजेत किंदेव ॥५१॥
     घाम, दुर्गंध आणि मळ यांनी रहित अशी ज्यांची मोठी भव्य शरीरें दिसतात, आणि पाहतांना जे मनुष्य व देव यांच्यासारखे दिसतात, त्यांना 'किंदेव' असे म्हणतात ५१. 


    यापरींच्या बहुधा व्यक्ती । रजतमादि सत्त्वप्रकृती ।
    उपदेशपरंपरा प्राप्ति । ज्ञान बोलती यथारुचि ॥५२॥
    अशा नाना प्रकारच्या व्यक्ति रज, तम किंवा सत्त्वप्रकृतीप्रमाणे परंपरेनें उपदेश प्राप्त झाल्यामुळे आपापल्या समजुतीप्रमाणे ज्ञान सांगत असतात ५२. 


    याभिर्भूतानि भिद्यन्ते भूतानां मतयस्तथा ।
    यथाप्रकृति सर्वेषां चित्रा वाचः स्रवन्ति हि ॥ ७ ॥
    [श्लोक ७]  या स्वभाववैचित्र्यामुळे देव, असुर, मनुष्य असे वेगवेगळे प्रकार पडले आणि त्यांच्या स्वभावानुसार त्यांच्या बुद्धी वेगवेगळ्या झाल्या त्या बुद्धीप्रमाणे आणि स्वभावांप्रमाणे वेदांचे अर्थ वेगवेगळे केले गेले. (७)


    जैशी प्रकृति तैशी भावना । जैसा गुण तशी वासना ।
    जे वासनेस्तव जाणा । भूतीं विषमपणा आणी भेदु ॥५३॥
    ज्या गुणाची प्रकृति असते, त्याच गुणाचा स्वभाव असतो. जसा गुण असतो, तीच वासना असते. प्राणिमात्रामध्ये जो कमीजास्तीपणा व भेद उत्पन्न झाला आहे, तो त्या वासनेमुळेच झाला आहे ५३. 


    देवमनुष्यतिर्यगता । हे वासनेची विषमता ।
    येवढा भेद करी भूतां । अनेकता यथारुचि ॥५४॥
    देवपणा, मनुष्यपणा किंवा कीटकयोनी हे सर्व वासनेचेच लहानमोठे प्रकार आहेत. ती वासनाच आपल्या आवडीप्रमाणे अनेक प्रकारे प्राणिमात्रामध्ये एवढा भेद उत्पन्न करिते ५४. 


    ज्यांची जैशी प्रकृती । ते तैसा वेदार्थू मानिती ।
    तेंचि शिष्यांसी सांगती । परंपरास्थिती उपदेशू ॥५५॥
    ज्यांची जशी प्रकृति असते, ते वेदाचा तसाच अर्थ ग्रहण करतात. आणि शिष्यांना परंपरेनें तोच उपदेश सांगत असतात ५५. 


    विचित्र वेदार्थ मानणे । विचित्र संगती साधनें ।
    विचित्र उपदेश करणें । प्रकृतिगुणें मतवाद ॥५६॥
    वेदाचा काही विचित्र अर्थ करणे व तोच खरा धरून बसणे, भलतीच संगति धरणे, भलतीच साधनें जवळ बाळगणे, आणि विचित्र उपदेश करणे, हा सर्व प्रकृतीच्या गुणांचा मतभेद आहे ५६.


    एवं प्रकृतिवैचित्र्याद् भिद्यन्ते मतयो नृणाम् ।
    पारम्पर्येण केषाञ्चित् पाखण्डमतयोऽपरे ॥ ८ ॥
    [श्लोक ८] अशा रीतीने स्वभाववैचित्र्यामुळे आणि परंपरेमुळे माणसांच्या विचारांत फरक पडतो तर काही माणसे वेदविरोधी मते मांडणारी असतात. (८)


    यापरी गा निजप्रकृती । वाढली जाण नाना मतीं ।
    तो मतवाद ठसावला चित्तीं । यथानिगुतीं सत्यत्वें ॥५७॥
    अरे ! याप्रमाणे आपलीच प्रकृति अनेक प्रकारच्या मतांनी वाढलेली आहे हे लक्षात ठेव. तो एकदेशीय मताचा वादच पूर्णपणे खरा आहे असें मनांत भरलें म्हणजे तोच चित्तामध्ये बिंबून जातो ५७. 


    मिथ्या स्वप्न जेवीं निद्रिता । सत्य मानलेंसे सर्वथा ।
    तेवीं नानामतवादकथा । सत्य तत्त्वतां मानिती ॥५८॥
    स्वप्नं हें खोटे असते, तरी ते निजलेल्या मनुष्याला सर्वस्वी खरेच असल्याप्रमाणे भासते, त्याप्रमाणे भिन्न भिन्न मतांच्या गोष्टी ते सर्वस्वी खऱ्याच आहेत असे मानतात ५८. 


    हे वेदपढियंत्यांची कथा । ज्यांसी वेदीं नाहीं अधिकारता ।
    त्यांसी उपदेशपरंपरता । नानामतता सत्य माने ॥५९॥
    ही वेदवेत्यांची गोष्ट झाली. परंतु ज्यांना वेदांचा अधिकार नाही, त्यांना उपदेशपरंपरेने चालत आलेली भिन्नभिन्न मतेच खरी वाटतात ५९. 


    एकाची वेदबाह्य व्युत्पत्ती । ते आपुलालिये स्वमतीं ।
    पाषंडाते प्रतिष्ठिती । तेंच उपदेशिती शिष्यातें ॥६०॥
    एखाद्याची विचारसरणी वेदाच्या विरुद्धच असते. ते आपल्या मताप्रमाणे पाखांडमतच स्थापन करतात, आणि तेच शिष्याच्या मनात भरवून देतात ६०. 


    मन्मायामोहितधियः पुरुषाः पुरुषर्षभ ।
    श्रेयो वदन्त्यनेकान्तं यथाकर्म यथारुचि ॥ ९ ॥
    [लोक ९] हे पुरूषश्रेष्ठा ! लोकांची बुद्धी माझ्या मायेने अविवेकी बनलेली असते त्यामुळे त्यांना ज्या कर्मात जशी गोडी वाटते त्यानुसार तेच कल्याणाचे साधन आहे, असे ते सांगतात त्यामुळे साधनांत वेगळेपणा येतो. (९)


    नाना वासनागुणानुवृत्ती । नाना परींच्या पुरुषप्रकृती ।
    यांसी माझी माया मूळकर्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥६१॥
    उद्धवा ! निरनिराळ्या प्रकारच्या वासना गुणांच्या अनुरोधाने बनलेल्या असतात. त्यामुळे पुरुषांच्या प्रकृतीही भिन्न भिन्न होतात. पण या सर्वांना माझी मायाच मूळ उत्पन्न करणारी आहे असें निश्चित समज ६१. 


    माझिया मायें मोहिले वरिष्ठ । जन केले विवेकनष्ट ।
    भुलवूनियां मोक्षाची वाट । विषयनिष्ठ विवेकू ॥६२॥
    माझ्याच मायेनें श्रेष्ठ लोकही मोहित केले आहेत, सर्व लोक विवेकनष्ट केले आहेत, आणि त्यांना मोक्षमार्गाचा विसर पाडून विषयलंपटपणाचाच विचार करावयास लाविले आहे ६२. 


    ऐक उद्धवा पुरुषश्रेष्ठा । यापरी भ्रंशली जनांची निष्ठा ।
    चुकोनि मोक्षाचा दारवंटा । साधनकचाटा जल्पती ॥६३॥
    हे पुरुषश्रेष्ठा उद्धवा ! ऐक. याप्रमाणे लोकांची निष्ठा भ्रष्ट झाल्यामुळे मोक्षाचे द्वार चुकून ते भलत्याच साधनांच्या खटपटीची बडबड करतात ६३. 


    त्या नाना साधनांच्या युक्ती । ज्या मतवादें प्रतिपादिती ।
    त्याही दीड श्लोकीं श्रीपती । उद्धवाप्रती सांगत ॥६४॥
    त्या अनेक प्रकारच्या साधनांच्या युक्ति, ज्या आपापल्या मतवादाने प्रतिपादन करतात, त्याही श्रीकृष्ण दीड श्लोकामध्ये उद्धवाला सांगतात ६४. 


    धर्ममेके यशश्चान्ये कामं सत्यं दमं शमम् ।
    अन्ये वदन्ति स्वार्थं वा ऐश्वर्यं त्यागभोजनम् ।
    केचिद् यज्ञतपो दानं व्रतानि नियमान्यमान् ॥ १० ॥
    [श्लोक १०] त्यांपैकी मीमांसक कर्माला, साहित्यिक कीर्तीला, कामशास्त्री कामाला, योगशास्त्री सत्य, दम आणि शमाला, राजनीतिज्ञ ऐश्वर्याला, संन्यासी त्यागाला आणि नास्तिक भोगाला कल्याणाचे साधन मानतात. (१०)


    मीमांसकाचे मत येथ । काम्य निषिद्धरहित ।
    कर्मचि साधन मानित । मोक्ष येणें प्राप्त म्हणताती ॥६५॥
    आतां याविषयी मीमांसकांचे मत पाहिले तर ते म्हणतात की, काम्यकर्म हे मात्र निषिद्ध - तेवढे खेरीजकरून बाकीचे कर्म हेच मुख्य साधन होय व तेणेकरूनच मोक्ष प्राप्त होतो ६५. 


    काव्य नाटक अळंकार करिती । ते कवित्वचि साधन मानिती ।
    कविताप्रबंधव्युत्पत्ती । मोक्ष मानिती तेणें यशें ॥६६॥
    काव्य, नाटक व अलंकारशास्त्र करणारे असतात ते कवित्व हेच मुख्य साधन मानतात. निरनिराळ्या कविता, पद्यें आणि त्यांची रचनापद्धति ह्यांत मिळविलेल्या कीर्तीनेंच मोक्ष मिळतो असे ते मानतात ६६. 


    कवीश्वरांचें मत ऐसें । आपुले कवित्वाचेनि यशें ।
    मोक्ष लाहों अनायासें । हें कवितापिसें कवीश्वरां ॥६७॥
    मोठमोठ्या कवींचे मत असे की, आपल्या काव्यकीर्तीच्या योगानेच आपल्याला सहज मोक्ष प्राप्त होईल. कविश्रेष्ठांना असें वेड लागलेले असते ६७. 


    वात्स्यायनकोकशास्त्रमत । त्यांचा अभिप्रायो विपरीत ।
    कामसुखें मोक्ष मानित । काम सतत सेवावा ॥६८॥
    वात्स्यायन इत्यादिकांच्या कामशास्त्राचे मत पाहिले तर त्यांचा अभिप्राय विपरीत दिसतो. कामाच्या सुखोपभोगाने मोक्ष मिळेल असे ते मानतात, म्हणून ते सदोदित कामसेवन करावें असें म्हणतात ६८. 


    सांख्य-योगांची वदंती । सत्य-शम-दमादि संपत्ती ।
    हेंचि साधन मोक्षाप्रती । नेम निश्चितीं तिंहीं केला ॥६९॥
    सांख्य-योगमतवाद्यांचे म्हणणे असे की, सत्य, शम, दम, इत्यादि जी संपत्ति आहे, तेच मोक्षाला साधन आहे. त्यांनी असा निश्चयच केला आहे ६९. 


    नीतिशास्त्रकारांचें मत । सार्वभौम राज्य प्राप्त ।
    त्यातेंचि मोक्ष मानित । सामदानादि तेथ साधन ॥७०॥
    नीतिशास्त्रकारांच्या मते पाहिले असता, सार्वभौम राज्य प्राप्त झाले की त्यालाच ते मोक्ष असें समजतात. त्यांत साम, दान, इत्यादि साधने आहेत ७०. 


    एकांचा मतविभाग । शिखासूत्रमात्रत्याग ।
    त्याचें नांव मोक्षमार्ग । परम श्लाघ्य मानिती ॥७१॥
    कोणाचे मत असे असते की, शेंडी व यज्ञोपवीत यांचा मात्र त्याग केला की त्याचंच नांव मोक्षाचा मार्ग. ते तोच मार्ग अत्यंत उत्तम असे समजतात ७१ 


    देहात्मवाद्यांचा योग । स्वेच्छा भोगावे यथेष्ट भोग ।
    कैंचा नरक कैंचा स्वर्ग । मेल्या मग कोण जन्मे ॥७२॥
    देहात्मवादी (देह हाच आत्मा मानणारे, नास्तिक) असतात, त्यांचा योगमार्ग हाच की, इच्छेप्रमाणे मिळतील ते सर्व भोग खुशाल भोगून घ्यावे. स्वर्ग कसला आणि नरक कसला ! मेल्यानंतर पुन्हा कोण जन्माला येते ? ७२. 


    अश्वमेध राजसूययाग । हाचि एकांचा मोक्षमार्ग ।
    एकां मूर्तिउपासना सांग । पूजाविभाग तें साधन ॥७३॥
    अश्वमेध, राजसूय यज्ञ हाच कोणाचा मोक्षमार्ग असतो. मूर्तीची यथासांग उपासना करणे, तिची यथास्थित पूजा करणे, हेच काही जणांना मोक्षमार्गाचे साधन वाटते ७३. 


    एकाचें मत साक्षेप । कडकडाटेंसी खटाटोप ।
    शरीरशोषणादि जें तप । तो मार्ग समीप मोक्षाचा ॥७४॥
    कोणाचे मत असे असते की, खडतर कष्ट सोसून व अनेक प्रकारच्या यातना सोसून देह झिजवून जें तप करावें, तोच मोक्षाचा अगदी जवळचा मार्ग होय ७४. 


    एक म्हणती श्रेष्ठ साधन । मोक्षमार्गीं केवळ दान ।
    दीक्षित म्हणती व्रतग्रहण । हेंचि साधन मोक्षाचें ॥७५॥
    कोणी म्हणतात की, दान करणे हेच काय ते मोक्षमार्गातील श्रेष्ठ साधन आहे. याज्ञिक म्हणतात की, व्रतस्थपणाने राहणे हेच मोक्षाचे साधन होय ७५. 


    एकांच्या मताचा अनुक्रम । अवश्य करावे व्रत नियम ।
    एवं मतानुसारें उपक्रम । नानासाधनसंभ्रम बोलती ॥७६॥
    काही जणांच्या मतांची पद्धति अशी दिसते की, व्रत, नियम, हे अवश्य पाळावेत. अशा प्रकारे आपआपल्या मताप्रमाणे उपक्रम करून अनेक प्रकाच्या साधनांची थोरवी लोक सांगत असतात ७६. 


    या साधनांची पाहतां स्थिती । आद्यंतवंत निश्चितीं ।
    तेंचि पैं उद्धवाप्रती । कृष्ण कृपामूर्ती सांगत ॥७७॥
    पण ह्या सर्व साधनांच्या स्थितीचा विचार केला, तर ती अथपासून इतिपर्यंत खरोखर नाशवंतच आहेत. कृपामूर्ति श्रीकृष्ण उद्धवाला तेच सांगत आहेत ७७. 


    आद्यन्तवन्त एवैषां लोकाः कर्मविनिर्मिताः ।
    दुःखोदर्कास्तमोनिष्ठाः क्षुद्रानन्दाः शुचार्पिताः ॥ ११ ॥
    [श्लोक ११] त्यांपैकी मीमांसक कर्माला, साहित्यिक कीर्तीला, कामशास्त्री कामाला, योगशास्त्री सत्य, दम आणि शमाला, राजनीतिज्ञ ऐश्वर्याला, संन्यासी त्यागाला आणि नास्तिक भोगाला कल्याणाचे साधन मानतात. (१०)


    सांडूनि फळाशा देहाभिमान । मज नार्पिती जे साधन ।
    त्यांचें फळ दुःखरूप जाण । जन्ममरणदायक ॥७८॥
    फलाची आशा व देहाचा अभिमान सोडून जे आपलें साधन मला अर्पण करीत नाहीत, त्यांच्या साधनांचें फळ दुःखस्वरूप असते असे समज. ते पुनःपुन्हा जन्ममरण देते ७८. 


    तिंहीं साधनीं साधिले लोक । ते अंतवंत नश्वर देख ।
    ते लोकींचें जें सुख । साखरेंसीं विख रांधिलें ॥७९॥
    त्या  साधनांनी जे लोक प्राप्त होतात, ते सारे नाशवंत आणि क्षणिक असेच असतात. त्या लोकांतील जें सुख असतें तें साखरेत पक्व केलेले विषच होय ७९. 


    त्याचे जिव्हाग्रीं गोडपण । परिपाकीं अचूक मरण ।
    तैसा तो क्षुद्रानंद जाण । शोकासी कारण समूळ ॥८०॥
    त्याच्या जिभेवर गोडपणा असतो. पण शेवटी अचूक मरण हें ठेवलेलेच. त्याप्रमाणे त्या लोकांतील आनंदही क्षुद्र असून तो सर्वस्वीं शोकालाच कारण होतो असे समज ८०. 


    निजकर्में मलिन लोक । त्यांच्या ठायीं कैंचें सुख ।
    उत्तरोत्तर वाढते दुःख । अंधतमदायक परिपाकू ॥८१॥
    आपल्या कर्मानेच जे लोक मलिन झाले, त्यांच्या ठिकाणी सुख ते कशाचे असणार ? त्यांत उत्तरोत्तर वाढत जाणारे दुःखच असते, आणि अंधतम नांवाचा नरक प्राप्त करून देणे हाच त्याचा परिणाम असतो ८१. 


    भोगासक्त जें झालें मन । त्यासी अखंड विषयांचें ध्यान ।
    विषयाध्यासें तमोगुण । अधःपतनदायक ॥८२॥
    जे मन भोगांना आसक्त झाले, त्याला विषयांचाच अखंड ध्यास लागलेला असतो. त्या विषयाच्या ध्यासानेच तमोगुण वृद्धि पावून तो अध:पतनांत नेऊन घालतो ८२. 


    इंहींच साधनीं माझी भक्ती । जो कोणी करील परमप्रीतीं ।
    ते भक्तीची मुख्यत्वें स्थिती । स्वयें श्रीपती सांगत ॥८३॥
    पण ह्याच साधनांनी जो कोणी अत्यंत प्रेमाने माझी भक्ति करील, त्याच भक्तीचे स्वरूप मुख्यत्वेकरून श्रीकृष्ण स्वतः सांगतात ८३. 


    मय्यर्पितात्मनः सभ्य निरपेक्षस्य सर्वतः ।
    मयाऽऽत्मना सुखं यत्तत् कुतः स्याद् विषयात्मनाम् ॥ १२ ॥
    [श्लोक १२] हे साधो ! ज्याने स्वतःला संपूर्णपणे मला समर्पित केले आहे आणि त्यामुळे ज्याला कोणत्याही विषयाची इच्छा नाही, त्याला आत्मस्वरूप माझ्यामुळे जे सुख मिळते, ते विषयलोभी जीवांना कसे मिळेल ? (१२)


    भक्ती निजसुखाची मातू । सांगावया उद्धवासी संबोधितू ।
    भक्तिसुखालागीं भाग्यवंतू । तूंचि निश्चितू उद्धवा ॥८४॥
    भक्तीने प्राप्त होणाऱ्या आत्मसुखाची महती सांगण्यासाठींच देवांनी उद्धवाला उद्देशून म्हटले, 'उद्धवा ! भक्तिसुखाला पात्र होणारा भाग्यवान् खरोखर एक तूंच आहेस' ८४. 


    भक्तिसुखाचें भाग्य यासी । म्हणोनि सभ्य म्हणणें त्यासी ।
    ऐसें पुरस्कारोनि उद्धवासी । भक्तिसुखासी देवो सांगे ॥८५॥
    ह्याला भक्तिसुखाचेंच भाग्य प्राप्त झाले आहे म्हणून त्याला 'सभ्य' असेंच म्हणणे योग्य आहे, असें श्रीकृष्णाने मनांत आणिलें आणि 'हे सभ्या !' (मूळ श्लोकांत 'सभ्य' हे संबोधन आहे) असें सन्मानदायक संबोधून देव त्याला भक्तीचे सुख सांगू लागला ८५. 


    पावावया माझी स्वरूपप्राप्ती । इहलोकींची भोगासक्ती ।
    निःशेष नातळे चित्तवृत्ती । जेवीं निजपती रजस्वला ॥८६॥
    माझ्या स्वरूपाची प्राप्ति लाभण्यासाठी, रजस्वला ज्याप्रमाणे आपल्या पतीला स्पर्शही करीत नाही, त्याप्रमाणे इहलोकची भोगासक्ति चित्तवृत्तीला मुळीच शिवणार नाही असे झाले पाहिजे ८६. 


    साधूनि माझिया अनुसंधाना । परलोक नातळे वासना ।
    धिक्कारी पैं ब्रह्मसदना । इतर गणना कोण पुसे ॥८७॥
    माझंच अनुसंधान साध्य करून घेतले म्हणजे त्याची वासना परलोकाला शिवतही नाही. ती ब्रह्मलोकाचासुद्धा धिक्कार करिते. मग इतरांना विचारतो कोण ? ८७. 


    ऐशिया गा निरपेक्षता । माझेनि भजनें सप्रेमता ।
    तेथ मी जाण स्वभावतां । प्रकटें तत्त्वतां निजरूपें ॥८८॥
    अशा निरपेक्षतेने माझें भजन करता करतां अंत:करणांत प्रेम उत्पन्न होऊ लागले की त्यांच्या ठिकाणी खरोखरच मी आपोआपच आत्मस्वरूपाने प्रगट होतों ८८. 


    मी प्रकटलों हें ऐसें । बोलणें तें आहाच दिसे ।
    सदा मी हृदयींचि वसें । प्रकटलों दिसें निर्विकल्पें ॥८९॥
    येथे वास्तविक 'मी प्रगट होतो' असे म्हणणेसुद्धा व्यर्थच आहे. कारण, सदासर्वदा मी हृदयांतच राहत असतो. चित्तवृत्ति निर्विकल्प झाली म्हणजे मी दिसू लागतों, म्हणून मी प्रगट झालों असे वाटते इतकेच ८९. 


    आभाळ गेलिया सविता । सहजेंचि दिसे आंतौता ।
    तेवीं गेलिया विषयावस्था । मी स्वभावतां प्रकटचि ॥९०॥
    आलेलें अभ्र दूर झाले म्हणजे त्याच्या आड असलेला सूर्य आपोआपच दिसू लागतो. त्याप्रमाणे विषयावस्था गेली की, मीही आपोआपच प्रगट होतों ९०. 


    एवं भक्ताचिया भावार्था । भावबळें मज प्रकटतां ।
    तेव्हां भक्ताचिया चित्ता । विषयवार्ता स्फुरेना ॥९१॥
    अशा प्रकारें भक्तांच्या भावार्थाने व भक्तिसामर्थ्याने मला प्रगट केले, म्हणजे त्या काळी भक्ताच्या चित्ताला विषयाची गोष्टच सुचत नाहीशी होते ९१. 


    सांडूनि विषयावस्था । मद्‌रूपीं लागल्या चित्ता ।
    भक्तासी होय मद्‌रूपता । स्वभावतां निजबोधें ॥९२॥
    विषयावस्थेला सोडून चित्त मत्स्वरूपाकडेच लागून राहिलें असता आत्मज्ञानाने भक्तांना आपोआपच मत्स्वरूप होते ९२. 


    लोह एकांगें स्पर्शमणी । लागतां सर्वांग होय सुवर्णी ।
    तेवीं मद्‍भक्त माझ्या ध्यानीं । चिद्‌रूपपणीं सर्वांग ॥९३॥
    लोखंड एका बाजूने जरी परिसाला लागले, तरी ते सर्वांगानेच सुवर्ण होते. त्याप्रमाणे माझे भक्त माझ्याच ध्यानांत निमग्न झाले म्हणजे त्यांचे सर्वांग ज्ञानमयच होते ९३. 


    ते काळीं सहजसुख । भक्तांसी जें होय देख ।
    त्यासी तुकावया तुक । कैंचें आणिक कांटाळें ॥९४॥
    त्या वेळी पहा ! भक्तांना जे सहज सुख प्राप्त होते, त्याच्याशी तुलना करावयाला योग्य असें दुसरे माप कोठचे ? ९४. 


    ज्या निजसुखाकारणें । सदाशिवू सेवी श्मशानें ।
    ब्रह्मा तें सुख काय जाणे । त्याकारणें म्यां उपदेशिलें ॥९५॥
    ज्या आत्मसुखाकरितां शंकरांनीही स्मशानांत राहणे पतकरलें, ते सुख ब्रह्मदेव कसे जाणणार ? म्हणूनच त्याला तें मी सांगितले ९५. 


    भक्तीं भोगितां माझें सुख । विसरले देहादि जन्मदुःख ।
    विसरले ते तहानभूक । निजात्मसुख कोंदलें ॥९६॥
    भक्तांनी माझ्या सुखाचा उपभोग घेतला असता ते देहादि जन्मदुःख विसरून जातात. ते तहान-भूकही विसरतात. इतकें आत्मसुख त्यांच्या ठिकाणी भरून राहातें ९६. 


    ऐशिया निजसुखाची गोडी । विषयी काय जाणती बापुडीं ।
    वेंचितां लक्षालक्षकोडीं । त्या सुखाचा कवडी लाभेना ॥९७॥
    अशा आत्मसुखाची गोडी बिचारी विषयलंपट झालेली माणसे कशी जाणणार ? त्यांनी लाखों रुपये खर्ची घातले तरीसुद्धा त्या सुखाची एक कवडीही प्राप्त होणार नाही ९७. 


    धन धान्य पुत्र स्वजन । सर्वस्व वेंचितांही जाण ।
    त्या सुखाचा रजःकण । विषयी जन न लभती ॥९८॥
    धन, धान्य, पुत्र, आप्तइष्ट, इत्यादि सर्वस्व खर्ची घातले तरी देखील त्या सुखाचा एक रजःकणही विषयी लोकांना प्राप्त होत नाही ९८. 


    हो कां सत्यलोकनिवासी । तेही न पावती त्या सुखासी ।
    इतरांची कथा कायसी । मुख्य प्रजापतीसी हें सुख कैंचें ॥९९॥
    हे तर काय, पण जे सत्यलोकांत राहणारे आहेत, त्यांनाही तें सुख मिळत नाही. इतरांची कथा काय ? मुख्य ब्रह्मदेवालाही ते सुख कुठून मिळणार ? ९९. 


    मज निजात्म्याचे सुखप्राप्ती । सकळ इंद्रियें सुखरूप होती ।
    त्या सुखाची सुखस्थिती । लोकांतरप्राप्ती कोट्यंशें न तुके ॥१००॥
    मज आत्म्याला सुखप्राप्ति झाली म्हणजे त्यामुळे सर्वच इंद्रिये सुखस्वरूप होतात. त्या सुखकारक सुखस्थितीच्या एक कोट्यंशाशीही स्वर्गादि लोकांतरप्राप्ति बरोबर करू शकणार नाहीं १००. 

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...