मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ ओव्या ३०१ ते ४००
सर्वथा उगा अससी । परी तूं अंगें विकळ नव्हसी ।
अंगीं अव्यंगु दिसतोसी । स्वरूपरूपेंसीं शोभितु ॥१॥
आपण सर्वथैव स्वस्थ असलेले दिसतां, परंतु तुमच्या अंगांत कसलीच विकलता नाही. आपण अंगानें अव्यंग असल्यामुळें स्वरूपानेंही फार शोभिवंत दिसतां १.
ज्ञान एकलेपणें ठेलें । दुजेनिवीण परदेशी झालें ।
तें तुजमाजीं सामावलें । यालागीं आलें 'कवि' पद ॥२॥
तें तुजमाजीं सामावलें । यालागीं आलें 'कवि' पद ॥२॥
ज्ञान हे एकटेंच होते; त्याच्या बरोबर दुसरे कोणीच नसल्यामुळें ते परदेशी झालेले होते. ते तुमच्यामध्यें शिरून राहिले. म्हणूनच तुम्हांला 'कवि' म्ह. ज्ञानी हे पद आले. २.
करूनि झालासी अकर्ता । हेचि तुझी थोर 'दक्षता' ।
ब्रह्मरसें 'रसाळ' बोलतां । चवी अमृता ते कैंची ॥३॥
ब्रह्मरसें 'रसाळ' बोलतां । चवी अमृता ते कैंची ॥३॥
तुम्ही करून अकर्ते झाला आहांत, हीच तुमची 'दक्षता' आहे. तुम्ही ब्रह्मरसानें परिपूर्ण असें ' रसाळ' भाषण करतां, तें माधुर्य अमृताला कसचे येणार ? ३.
ब्रह्मरस तू प्यालासी । ब्रह्मानंदें मातलासी ।
जगीं 'उन्मत्त' झालासी । दृष्टीं नाणिसी कोणातें ॥४॥
जगीं 'उन्मत्त' झालासी । दृष्टीं नाणिसी कोणातें ॥४॥
आपण ब्रह्मरस प्राशन करून ब्रह्मानंदानें मत्त झाला आहात. त्यायोगें 'उन्मत्त' होऊन तुम्ही कोणाला नजरेतच आणीत नाहीं ! ४,
सदा सावध निजरूपेंसी । यालागीं 'माझें-तुझें' न म्हणसी ।
तेंचि 'पिसेंपण' तुजपाशीं । दिसे जगासी सर्वथा ॥५॥
तेंचि 'पिसेंपण' तुजपाशीं । दिसे जगासी सर्वथा ॥५॥
आपण सदासर्वदा आत्मस्वरूपामध्यें जागृत असतां, म्हणून हे 'माझें' आणि ते 'तुझें' असें म्हणत नाही. हेच आपणापाशी असलेले 'वेड' मात्र जगाला नेहमी दिसत असते ५.
निजबोधें तृप्त झालासी । परमानंदें निवालासी ।
तीं हीं लक्षणें तुजपासीं । निर्धारेंसीं दिसताती ॥६॥
तीं हीं लक्षणें तुजपासीं । निर्धारेंसीं दिसताती ॥६॥
आपण आत्मज्ञानानें तृप्त झाला असून परमानंदानें निवाला आहां; ती लक्षणेही आपल्यापाशी स्पष्ट दिसून येत आहेत ६.
जनेषु दह्यमानेषु कामलोभदवाग्निना ।
न तप्यसेऽग्निना मुक्तो गङ्गाम्भःस्थ इव द्विपः ॥ २९ ॥
न तप्यसेऽग्निना मुक्तो गङ्गाम्भःस्थ इव द्विपः ॥ २९ ॥
[श्लोक २९]-जगातील अधिकांश लोक काम आणि लोभरूप वणव्यात होरपळत असतात परंतु आपल्याला मात्र त्या आगीची झळ लागलेली दिसन नाही. जशी गंगेमध्ये असलेल्या हत्तीला वणव्याची आच लागत नाही. (२९)
कामलोभदावाग्नी- । माजीं जळतां लोक तीन्ही ।
देखत असों जी नयनीं । वेगळा कोणी दिसेना ॥७॥
देखत असों जी नयनीं । वेगळा कोणी दिसेना ॥७॥
कामलोभरूपी दावाग्नीमध्यें जळत असलेले तिन्ही लोक आमच्या डोळ्यांना दिसत आहेत. त्यांतून सुटलेला कोणीच दिसत नाहीं ७.
ते दावाग्नीमाजीं असतां । तूं न पोळसी गा अवधूता ।
नवल तुझी अक्षोभ्यता । नकळे सर्वथा आम्हांसी ॥८॥
नवल तुझी अक्षोभ्यता । नकळे सर्वथा आम्हांसी ॥८॥
परंतु हे अवधूता ! आपण मात्र त्या दावाग्नीमध्यें असूनही पोळत नाही. ही तुमची अक्षोभ्यता मोठी आश्चर्यकारक आहे. ती आम्हांला कधीही कळणार नाहीं ८.
वणवा जळे दोंही थडीं । गजें गंगाजळीं दिधली बुडी ।
त्यासी न लागती तापाच्या वोढी । तैसें निरवडीं तुज देखों ॥९॥
त्यासी न लागती तापाच्या वोढी । तैसें निरवडीं तुज देखों ॥९॥
दोहों थडीला वणवा लागला असतां, हत्तीनें गंगाजळांत बुडी दिली म्हणजे त्याला जशा अग्नीच्या झळा लागत नाहीत, त्याप्रमाणेच आपणही दुःखमुक्त आहांत असें दिसून येते ९.
ऐशीं द्वंद्वें तुज नातळती । दृढ राहिलासी ब्रह्मस्थितीं ।
कांही एक करीन विनंती । कृपामूर्ति दयाळुवा ॥३१०॥
कांही एक करीन विनंती । कृपामूर्ति दयाळुवा ॥३१०॥
शीतोष्णादि द्वंद्वे आपल्याला शिवत नाहीत; आपण ब्रह्मस्वरूपामध्यें निश्चळ राहिला आहांत. ह्याकरतां हे दयाळा ! हे कृपामूर्ति ! आपणास थोडीशी विनंती करतों ३१०.
त्वं हि नः पृच्छतां ब्रह्मन्नात्मन्यानन्दकारणम् ।
ब्रूहि स्पर्शविहीनस्य भवतः केवलात्मनः ॥ ३० ॥
ब्रूहि स्पर्शविहीनस्य भवतः केवलात्मनः ॥ ३० ॥
[श्लोक ३०]- ब्रह्मन ! संसारातील विषयांचा स्पर्शही नसलेले आपण केवळ एकटेच असता तरीही आपल्याला स्वतःमध्येच आनंद कसा मिळतो ? आपण हे आम्हांला सांगावे. (३०)
तूं ब्रह्मवेत्ता ब्राह्मण । निजानंदें परिपूर्ण ।
त्या आनंदाचें कारण । विशद करून सांगावें ॥११॥
त्या आनंदाचें कारण । विशद करून सांगावें ॥११॥
आपण ब्रह्मवेत्ते ब्राह्मण असून आत्मानंदानें परिपूर्ण आहां. त्या आनंदाचे कारण काय, ते मला स्पष्ट करून सांगावें ११.
तूं देहीं वर्तसी विदेहस्थिती । तुज विषय आतळूं न शकती ।
हे अलिप्तपणाची प्राप्ती । कवण्या रीतीं तुज झाली ॥१२॥
हे अलिप्तपणाची प्राप्ती । कवण्या रीतीं तुज झाली ॥१२॥
आपण देहांत असून विदेहस्थितीनें वागतां, आपल्याला विषय स्पर्शसुद्धा करू शकत नाहीत. इतका अलिप्तपणा आपल्याला कोणत्या रीतीनें प्राप्त झाला ? १२.
तुज नाहीं रायाची भीड । न करिसी धनवंताची चाड ।
दीनवचन मानिसी गोड । पुरविसी कोड निजबोधें ॥१३॥
दीनवचन मानिसी गोड । पुरविसी कोड निजबोधें ॥१३॥
आपल्याला राजाची भीड नाहीं, श्रीमंताची चाड नाहीं; दीनाचें भाषण मात्र गोड मानतां, आणि त्याचे मनोरथ आत्मज्ञान देऊन पूर्ण करतां १३.
ऐसा केवळ तूं कृपाळू । आर्तबंधु दीनदयाळु ।
निजात्मभावें तूं केवळु । भक्तवत्सलु भावार्थे ॥१४॥
निजात्मभावें तूं केवळु । भक्तवत्सलु भावार्थे ॥१४॥
असे आपण अगदी कृपाळू आहां. आपण दुःखार्ताचे बंधु असून दीनांचे दयाळू आहात. तसेंच निजात्मभावानें भावार्थी लोकांचे भक्तवत्सल आहांत १४.
ऐसा यदूचा संवादु । आवडीं सांगे गोविंदु ।
उद्धवासी म्हणे सावधु । हृदयीं बोधु धरावा ॥१५॥
उद्धवासी म्हणे सावधु । हृदयीं बोधु धरावा ॥१५॥
ह्याप्रमाणें श्रीकृष्ण यदूचे भाषण मोठ्या आवडीनें सांगू लागला. तो उद्धवास म्हणाला, "सावधानचित्तानें हा बोध हृदयांत धारण कर" १५.
श्रीभगवानुवाच -
यदुनैवं महाभागो ब्रह्मण्येन सुमेधसा ।
पृष्टः सभाजितः प्राह प्रश्रयावनतं द्विजः ॥ ३१ ॥
यदुनैवं महाभागो ब्रह्मण्येन सुमेधसा ।
पृष्टः सभाजितः प्राह प्रश्रयावनतं द्विजः ॥ ३१ ॥
[श्लोक ३१]- श्रीकृष्ण म्हणाले ब्राह्मणभक्त, शुद्धबुद्धी, यदूने त्या श्रेष्ठ ब्राह्मणाचा सत्कार करून त्यांना हा प्रश्न विचारला आणि मोठ्या नम्रतेने मस्तक लववून तो त्यांच्यासमोर उभा राहिला तेव्हा ब्राह्मण म्हणाले. (३१)
श्रीमुखें श्रीकांत । यदूचें भाग्य वर्णित ।
ब्राह्मणभक्त सत्त्वयुक्त । बुद्धिमंत श्रद्धाळु ॥१६॥
ब्राह्मणभक्त सत्त्वयुक्त । बुद्धिमंत श्रद्धाळु ॥१६॥
तो श्रीपति आपल्या मुखानें यदूच्या भाग्याचे वर्णन करूं लागला. यदुराजा ब्राह्मणांचा मोठा भक्त असून सत्त्वशील होता. तसाच तो अत्यंत बुद्विमान् व श्रद्धाळू होता १६.
भगवद्भाग्यें भाग्यवंतु । यदूसी भेटला तो अवधूतु ।
त्यासी होऊनि अतिविनीतु । असे विनवितु निजहिता ॥१७॥
त्यासी होऊनि अतिविनीतु । असे विनवितु निजहिता ॥१७॥
भगवद्भाग्यानें भाग्यवंत असलेला तो अवधूत यदूला भेटला. तेव्हां आपल्या कल्याणाकरतां अत्यंत नम्र होऊन यदूनें त्यास विनंती केली १७.
मृदु मंजुळ वचनीं प्रार्थिला । मधुपर्कविधानें पूजिला ।
अवधूत अतिसंतोषला । बोलता झाला निजमुखें ॥१८॥
अवधूत अतिसंतोषला । बोलता झाला निजमुखें ॥१८॥
मधुपर्कविधीनें त्याची पूजा करून मृदु-मधुर वाणीनें त्यानें प्रार्थना केली. तेव्हां अवधूताला अत्यंत संतोष होऊन तो प्रेमानें बोलं लागला १८.
श्रीब्राह्मण उवाच -
सन्ति मे गुरवो राजन् बहवो बुद्ध्युपाश्रिताः ।
यतो बुद्धिमुपादाय मुक्तोऽटामीह ताञ्छृणु ॥ ३२ ॥
सन्ति मे गुरवो राजन् बहवो बुद्ध्युपाश्रिताः ।
यतो बुद्धिमुपादाय मुक्तोऽटामीह ताञ्छृणु ॥ ३२ ॥
[ श्लोक ३२]-ब्राह्मण म्हणाले राजन ! मी आपल्या बुद्धीनेच पुष्कळ गुरूंचा आश्रय घेतला आहे. त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करून मी या जगात मुक्तपणे, फिरत असतो तू त्या गुरूंची नावे आणि त्यांच्यापासून घेतलेली शिकवण ऐक. (३२)
क्षीरसागर उचंबळला । कीं कृपेचा मेघ गर्जिन्नला ।
निजसुखाचा वाधावा आला । तैसें बोलिला ब्राह्मणु ॥१९॥
निजसुखाचा वाधावा आला । तैसें बोलिला ब्राह्मणु ॥१९॥
क्षीरसागर उचंबळावा किंवा कृपारूप मेघ गर्जू लागावा, अथवा आत्मसुखाची तुतारी वाजावी, त्याप्रमाणें तो ब्राह्मण बोलू लागला १९.
ऐकें राजया चूडामणी । यदुकुळदीप दिनमणी ।
धन्य धन्य तुझी वाणी । निजगुणीं निवविलें ॥३२०॥
धन्य धन्य तुझी वाणी । निजगुणीं निवविलें ॥३२०॥
हे राजचूडामणी ! ऐक. तूं यदुकुलदीपांतील सूर्यच आहेस. तुझी वाणी मोठी धन्य आहे. तूं आपल्या गुणांनी मला तृप्त केलेंस ३२०.
राजा आणि सात्त्विकु । सिद्धलक्षणें लक्षकु ।
पृथ्वीमाजीं तूचि एकु । न दिसे आणिकु सर्वथा ॥२१॥
पृथ्वीमाजीं तूचि एकु । न दिसे आणिकु सर्वथा ॥२१॥
राजा असून सात्त्विक, सिद्ध लक्षणांनी युक्त अथवा सिद्धलक्षणे ओळखणारा असा पृथ्वीवर तूंच एक आहेस. दुसरा कोणी दिसत नाहीं २१.
सुंदर आणि सगुण । उत्तमोत्तम केला प्रश्न ।
पुसिलें निजानंदकारण । तें यथार्थ जाण सांगेन ॥२२॥
पुसिलें निजानंदकारण । तें यथार्थ जाण सांगेन ॥२२॥
तूं जो प्रश्न केलास, तो सुंदर गुणयुक्त आणि उत्तमांतला उत्तम असा आहे. तूं स्वानंदाचे कारण विचारलेंस, ते मी तुला यथार्थ सांगतो. ऐक २२.
गुरूविण आत्मप्राप्ती । सर्वथा न घडे गा नृपती ।
ते गुरूही मी तुजप्रती । यथानिगुतीं सांगेन ॥२३॥
ते गुरूही मी तुजप्रती । यथानिगुतीं सांगेन ॥२३॥
हे राजा ! गुरूशिवाय आत्मप्राप्ति कधीच घडत नसते. ते गुरुही मी तुला यथार्थ रीतीनें सांगतों २३.
निजबुद्धीच्या विवेकस्थितीं । बहुत गुरु म्यां केले असती ।
जे जे सद्गुयण म्यां देखिले भूतीं । ते ते स्थितीं तो गुरु ॥२४॥
जे जे सद्गुयण म्यां देखिले भूतीं । ते ते स्थितीं तो गुरु ॥२४॥
आत्मबुद्धीच्या विचारांत गुंतलों असतांना मी अनेक गुरु केले. ज्या ज्या प्राण्यामध्यें जे जे सद्गुण दृष्टीस पडले, त्या त्या गुणापुरता तो तो गुरु मी केला २४.
बुद्धीनें अंगिकारिलें गुणा । निजधैर्यें धरिली धारणा ।
तेणें मी मुक्त झालों जाणा । स्वेच्छा अटणा करीतसें ॥२५॥
तेणें मी मुक्त झालों जाणा । स्वेच्छा अटणा करीतसें ॥२५॥
बुद्धीनें त्या त्या गुणाचा स्वीकार केला; आणि निजधैर्यानें त्याची धारणा धरली. त्यामुळें मी मुक्त झालों आणि असा स्वेच्छेनें फिरत असतों २५.
संसारु तरावया । मुख्य 'सद्बुेद्धि' गा राया ।
रिगमू नाहीं आणिका उपाया । व्यर्थ कासया शिणावें ॥२६॥
रिगमू नाहीं आणिका उपाया । व्यर्थ कासया शिणावें ॥२६॥
हे राजा ! संसारांतून तरून जाण्याला मुख्य 'सद्बुद्धि' पाहिजे. दुसर्या उपायाचा तेथें रिघाव नाही. मग व्यर्थ कष्ट सोसण्यांत काय अर्थ ? २६.
सद्बु द्धि नाहीं ज्यापासीं । तो संसाराची आंदणी दासी ।
उसंत नाहीं अहर्निशीं । दुःखभोगासी अनंत ॥२७॥
उसंत नाहीं अहर्निशीं । दुःखभोगासी अनंत ॥२७॥
ज्याच्यापाशीं सद्बुद्धि नसते, तो संसाराला आंदण दिलेल्या दासीसारखाच होय. रात्रंदिवस हजारों दुःखें भोगीत असतां त्याला क्षणाचीही विश्रांति मिळत नाहीं २७.
सद्बुनद्धि नाहीं हृदयभुवनीं । तेथ वैराग्य नुपजे मनीं ।
मा तो तरेल कैसेनीं । विवेक स्वप्नीं न देखे ॥२८॥
मा तो तरेल कैसेनीं । विवेक स्वप्नीं न देखे ॥२८॥
ज्याच्या हृदयमंदिरांत सद्बुद्धि नसते, त्याच्या मनांत वैराग्य कधींच उत्पन्न होत नाही. मग तरणार कशानें ? विवेक म्हणून कसला तो स्वप्नांत सुद्धा पाहात नाहीं २८.
वैराग्याचेनि पडिपाडें । ज्यासी सद्बु द्धि सांपडे ।
तेथ संसार कोण बापुडें । घायें रोकडें विभांडी ॥२९॥
तेथ संसार कोण बापुडें । घायें रोकडें विभांडी ॥२९॥
वैराग्याच्या बरोबर सद्बुद्धि मिळाली, म्हणजे तिच्यापुढे संसार बिचारा काय करणार ? ती त्याचे एका घावांत दोन तुकडे करून टाकील २९.
आधीं संसारु एकु असावा । मग तो खटाटोपें नासावा ।
जो रिघाला विवेकगांवा । त्यासी तेव्हां तो नाहीं ॥३३०॥
जो रिघाला विवेकगांवा । त्यासी तेव्हां तो नाहीं ॥३३०॥
आधी संसार म्हणून काही एक असला पाहिजे, तरच त्याच्या नाशाकरतां खटाटोप केला तर चालेल; पण जो मनुष्य विवेकाच्या गांवांत शिरतो, त्याचा संसार नाहींसाच होतो ३३०.
संसारनाशासी मूळ । शिष्य-प्रज्ञाचि केवळ ।
तिचें झाल्या अढळ बळ । होये मृगजळ संसारु ॥३१॥
तिचें झाल्या अढळ बळ । होये मृगजळ संसारु ॥३१॥
संसारनाशाचे खरे कारण म्हणजे शिष्याची 'प्रज्ञाच' होय. तिचे बळ कायम असले की, संसार हा मृगजळवत् होऊन जातो ३१.
जे मी गुरु सांगेन म्हणे । तें निजप्रज्ञेचेनि लक्षणें ।
हेयादेयउरपायपणें । घेणें त्यजणें सविवेकें ॥३२॥
हेयादेयउरपायपणें । घेणें त्यजणें सविवेकें ॥३२॥
मी जे गुरु सांगेन म्हणतो, ते मी आपल्या बुद्धीच्या निवडीप्रमाणें सांगणार आहे. त्याचा ग्राह्याग्राह्य विचार करून ग्राह्याचा स्वीकार करावा व त्याज्याचा त्याग करावा ३२.
हेचि मर्हा ठिया भाखा । सांगेन तें सावध ऐका ।
जेणें शिष्याचा आवांका । पडे ठाउका प्रत्यक्ष ॥३३॥
जेणें शिष्याचा आवांका । पडे ठाउका प्रत्यक्ष ॥३३॥
तेच मी आतां मराठी भाषेनें सांगेन, ते नीट लक्ष देऊन ऐक. त्याच्या योगानें शिष्याची ग्राहकशक्ति स्पष्टपणे दृष्टोत्पत्तीस येईल ३३.
ऐक प्रज्ञेचीं लक्षणें । सांगेन दृष्टांतपणें ।
सूप चाळणी रांधणें । घेणें त्यजणें विवेकें ॥३४॥
सूप चाळणी रांधणें । घेणें त्यजणें विवेकें ॥३४॥
आतां त्या बुद्धीची लक्षणे दृष्टांताच्या रूपानें सांगतो. सूप, चाळण व रांधण म्ह. चूल * ह्याप्रमाणें बुद्धीचा उपयोग करावा ३४.
चाळणीमाजीं जें जें पडे । सूक्ष्म निजतत्त्व तळीं सांडे ।
उरती गुणदोषांचे खडे । करिती बडबडे खडबडित ॥३५॥
उरती गुणदोषांचे खडे । करिती बडबडे खडबडित ॥३५॥
चाळणीमध्यें जें जें पडते, त्यांतील खरें सूक्ष्मतत्त्व खाली सांडते, आणि गुणदोषांचे खडे मात्र तिच्या पोटांत राहतात, व खडबड खडबड करीत असतात ३५.
ऐसी जे अवस्था । ते त्यागावी सर्वथा ।
भ्रंशु होईल स्वार्था । हे राखतां त्रिशुद्धी ॥३६॥
भ्रंशु होईल स्वार्था । हे राखतां त्रिशुद्धी ॥३६॥
अशा स्थितीचा त्याग करावा. तसे न केल्यास म्ह. गुणदोषांचे खडे पोटांत ठेवल्यास स्वार्थाची निश्चित हानी होईल ३६.
सुपाची दशा ते ऐशी । त्यजी रजःकण भुसासी ।
निडारल्या निजबीजासी । निजहृदयेंसीं राखत ॥३७॥
निडारल्या निजबीजासी । निजहृदयेंसीं राखत ॥३७॥
पण सुपाची स्थिति निराळी असते; भूस, कोंडा अथवा कचरा वगैरे ते टाकून देते. आणि अस्सल बीज आपल्या पोटांत धरून ठेवतें ३७.
स्वयें वैराग्यें तापणें । ते दशा 'रांधणें' म्हणें ।
अपक्कासी परिपक्क करणें । निजगुणें निजांगें ॥३८॥
अपक्कासी परिपक्क करणें । निजगुणें निजांगें ॥३८॥
स्वतः वैराग्यानें तापणे व आपल्या गुणांनी अपक्वाला परिपक्क करणे हा स्वभाव चुलीचा होय ३८.
एवं या दोनी दशा । दृढ धराव्या वीरेशा ।
तेणें परमार्थु होये आपैसा । जेवी आरिसा हातींचा ॥३९॥
तेणें परमार्थु होये आपैसा । जेवी आरिसा हातींचा ॥३९॥
हे वीरवर्या ! अशा प्रकारे ह्या दोन्ही (तिन्ही) स्थिति निश्चयेंकरून धारण कराव्यात, म्हणजे हातच्या आरशाप्रमाणें परमार्थही आपोआप हाती येतो ३९.
यदूसी म्हणे ब्राह्मण । जें म्यां सांगितलें लक्षण ।
तेथें ठेवूनियां मन । सावधान परियेसीं ॥३४०॥
तेथें ठेवूनियां मन । सावधान परियेसीं ॥३४०॥
यदूला तो ब्राह्मण म्हणाला, मी जें लक्षण सांगितले, त्यावर लक्ष ठेवून नीट ऐकत रहा ३४०.
जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरु म्यां केला जाण ।
गुरूसी आलें अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे ॥४१॥
गुरूसी आलें अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे ॥४१॥
ज्याचा जो जो गुण मी घेतला, तो मीं गुरु केला; ह्यामुळें माझे गुरु अगणित झाले. ते इतके की, सारे जग गुरूंनीच भरलेले मला दिसत आहे ४१.
ज्याचा गुण घेतला । तो सहजें गुरुत्वा आला ।
ज्याचा गुण त्यागरूपें घेतला । तोही गुरु झाला अहितत्यागें ॥४२॥
ज्याचा गुण त्यागरूपें घेतला । तोही गुरु झाला अहितत्यागें ॥४२॥
ज्याचा मी गुण घेतला, तो सहजच माझा गुरु झाला. पण ज्याच्यांतील दोष पाहून मी त्याग केला, तोही पण माझा गुरुच झाला ४२.
एवं त्यागात्यागसमतुकें । दोहींसी गुरुत्व आलें निकें ।
राया तूं पाहें पां विवेकें । जगचि असकें गुरु दिसे ॥४३॥
राया तूं पाहें पां विवेकें । जगचि असकें गुरु दिसे ॥४३॥
अशा रीतीनें गुणग्रहण आणि दोषत्याग ह्या दोन्हींतील समान भावानें दोघांकडेही गुरुपणाच आला. राजा ! आतां तूंसुद्धा विचार करून पाहा. म्हणजे तुलाही सारे जग गुरुमय दिसेल ४३.
ऐसें पाहतां सावकाशीं । गुरुत्व आलें जगासी ।
हेंचि साधन जयापासीं । तोचि परमार्थासी साधकु ॥४४॥
हेंचि साधन जयापासीं । तोचि परमार्थासी साधकु ॥४४॥
अशा रीतीनें सावकाश पाहिले असतां सारे जगच गुरु दिसू लागते. हेच साधन ज्याच्यापाशी असते तोच परमार्थाला साधतो ४४.
ऐसें सांगतां अचाट । तुज वाटेल हें कचाट ।
तरी गुरु सांगो श्रेष्ठ श्रेष्ठ । मानिले वरिष्ठ निजबुद्धीं ॥४५॥
तरी गुरु सांगो श्रेष्ठ श्रेष्ठ । मानिले वरिष्ठ निजबुद्धीं ॥४५॥
असें हें अचाट सांगितलेले ऐकून तुला मोठे कचाट (अवघड) वाटेल; ह्याकरतां श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणून मी ज्यांना गुरु मानले, त्यांपैकी मुख्य मुख्य सांगतों ते ऐक ४५.
पृथिवी वायुराकाशमापोऽग्निश्चन्द्रमा रविः ।
कपोतोऽजगरः सिन्धुः पतङ्गो मधुकृद्गजः ॥ ३३ ॥
मधुहा हरिणो मीनः पिङ्गला कुररोऽर्भकः ।
कुमारी शरकृत्सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत् ॥ ३४ ॥
कपोतोऽजगरः सिन्धुः पतङ्गो मधुकृद्गजः ॥ ३३ ॥
मधुहा हरिणो मीनः पिङ्गला कुररोऽर्भकः ।
कुमारी शरकृत्सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत् ॥ ३४ ॥
[श्लोक ३३-३४ ] - माझ्या गुरूंची नावे अशी आहेत पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबुतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध गोळा करणारा, हरीण, मासा, पिंगला, टिटवी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा, साप, कोळी (कीटक) आणि कुंभारमाशी. (३३-३४)
गुरु सांगेन अशेष । संख्याप्रमाण 'चोवीस' ।
त्यांचीं नांवें तूं परिस । सावकाश सांगेन ॥४६॥
त्यांचीं नांवें तूं परिस । सावकाश सांगेन ॥४६॥
माझे सारे गुरु सांगतो. त्यांच्या संख्येचे प्रमाण चोवीस आहे. त्यांची नांवें मी सावकाशपणे सांगतों ती तूं ऐक ४६.
पृथ्वी वायु आकाश । अग्नि आप सीतांश ।
सातवा तो चंडांष । कपोता परिस आठवा ॥४७॥
सातवा तो चंडांष । कपोता परिस आठवा ॥४७॥
(१) पृथ्वी, (२) वायु, (३) आकाश, (४) अग्नि, (५) जल, (६) चंद्र, आणि सातवा तो सूर्य. आठवा कपोत, तोही ऐकून ठेव ४७.
अजगर सिंधु पतंग । मधुमक्षिका गज भृंग ।
हरिण मीन वेश्या साङ्ग । नांवें सुभग 'पिंगला' ॥४८॥
हरिण मीन वेश्या साङ्ग । नांवें सुभग 'पिंगला' ॥४८॥
(९) अजगर, (१०) समुद्र, (११) पतंग, (१२) मधमाशी, (१३) हत्ती (१४) भुंग, (१५) हरिण, (१६) मासा, (१७) पिंगला नांवाची वेश्या, (१८) ४८.
टिटवी आणि लेंकरूं । कुमारी आणि शरकारु ।
सर्प कातणी पेशस्करु । इतुकेन गुरु चोवीस ॥४९॥
सर्प कातणी पेशस्करु । इतुकेन गुरु चोवीस ॥४९॥
टिटवी, आणि (१९) मूल. (२०) कुमारी (२१), बाण करणारा लोहार, (२२) सर्प, (२३) कांतणी, (२४) कुंभारीण माशी, इतके मिळून चोवीस गुरु होत ४९.
पावावया तत्त्व पंचविसावें । चोविसां गुरूंसी उपासावें ।
विवेकयुक्तिस्वभावें । गुरु भजावे निजबुद्धीं ॥३५०॥
विवेकयुक्तिस्वभावें । गुरु भजावे निजबुद्धीं ॥३५०॥
पंचविसावें तत्त्व हें परब्रह्म तें प्राप्त होण्यासाठी ह्या चोवीस गुरूंची उपासना केली पाहिजे. विचाराच्या युक्तीनें व आत्मबुद्धीनें ह्या गुरूंचे भजन करावें ३५०.
ठाकावया निजबोधासी । निजविवेकें अहर्निशीं ।
गुरुत्व देऊनि अनेकांसी । निजहितासी गुरु केले ॥५१॥
गुरुत्व देऊनि अनेकांसी । निजहितासी गुरु केले ॥५१॥
आत्मज्ञान हृदयांत नीटपणे ठसावे म्हणून आत्मविचारानेंच रात्रंदिवस अनेकांना गुरुत्व देऊन आत्महिताकरतां त्यांस मी गुरु करून घेतले ५१,
कोण युक्ति कोण विचारु । कोणें लक्षणें कोण गुरु ।
केला तोही निजनिर्धारु । सविस्तारु परियेसीं ॥५२॥
केला तोही निजनिर्धारु । सविस्तारु परियेसीं ॥५२॥
कोणत्या युक्तीने, कोणत्या विचाराने, कोणत्या गुणासाठी कोणता गुरु केला ? तोही माझा निश्चय सविस्तर ऐक ५२.
एते मे गुरवो राजन् चतुर्विंशतिराश्रिताः ।
शिक्षा वृत्तिभिरेतेषामन्वशिक्षमिहात्मनः ॥ ३५ ॥
शिक्षा वृत्तिभिरेतेषामन्वशिक्षमिहात्मनः ॥ ३५ ॥
[ श्लोक ३५]-राजन ! मी या चोवीस गुरूंचा आश्रय घेतला आणि हे करीत असलेल्या आचरणावरून माझ्यासाठी शिकवण घेतली. (३५)
ऐकें राजवर्य नृपती । विवेकधवलचक्रवर्ती ।
गुरुसंख्या तुजप्रती । यथानिगुतीं सांगितली ॥५३॥
गुरुसंख्या तुजप्रती । यथानिगुतीं सांगितली ॥५३॥
हे निर्मलविवेकचक्रवर्ती राजराजेश्वरा ! गुरूंची संख्या जेवढी होती ती मी तुला सांगितली ५३.
यांचिया शिक्षिता वृत्ती । शिकलों आपुलिया युक्तीं ।
मग पावलों आत्मस्थिती । विकल्पभ्रांती सांडूनी ॥५४॥
मग पावलों आत्मस्थिती । विकल्पभ्रांती सांडूनी ॥५४॥
त्यांच्यापाशी घेण्यासारखे जे जे गुण होते, ते ते मी आपल्याच युक्तीनें शिकलो. आणि मग विकल्पाची भ्रांति सोडून देऊन आत्मस्थितीला पोंचलों ५४.
यतो यदनुशिक्षामि यथा वा नाहुषात्मज ।
तत्तथा पुरुषव्याघ्र निबोध कथयामि ते ॥ ३६ ॥
तत्तथा पुरुषव्याघ्र निबोध कथयामि ते ॥ ३६ ॥
[श्लोक ३६]- हे वीरवर ययातिनंदन ! मी ज्याच्याकडून, ज्या प्रकारे, जे काही शिकलो आहे, ते सर्व तुला सांगतो ऐक. (३६)
नहुषाचा पुत्र ययाती । ययातीचा यदु निश्चितीं ।
'नहुषनंदन' यदुसी म्हणती । मूळ व्युत्पत्ती तेणें योगें ॥५५॥
'नहुषनंदन' यदुसी म्हणती । मूळ व्युत्पत्ती तेणें योगें ॥५५॥
नहुषाचा पुत्र ययाति; ययातीचा पुत्र यदु; ह्या वंशपरंपरेनें यदूला 'नाहुषनंदन' असे म्हणतात ५५.
यालागीं म्हणे 'नाहुषनंदना' । पुरुषांमाजीं पंचानना ।
सांगेन गुरूंच्या लक्षणा । विचक्षणा परियेसीं ॥५६॥
सांगेन गुरूंच्या लक्षणा । विचक्षणा परियेसीं ॥५६॥
म्हणून अवधूत म्हणाला, हे नाहुषपुत्रा ! पुरुषसिंहा ! आतां गुरुची लक्षणे सांगतों, तर हे चतुरा ! ती तूं श्रवण कर ५६.
ज्या गुरूचें जें शिक्षित । मी शिकलों सुनिश्चित ।
तें ते सांगेन समस्त । सावध चित्त करीं राया ॥५७॥
तें ते सांगेन समस्त । सावध चित्त करीं राया ॥५७॥
ज्या गुरूचा जो जो गुण होता, तो तोच मी निश्चितपणे शिकलों. ते कसे ते मी सारे सांगतो. हे राजा ! ते नीट लक्ष देऊन ऐक ५७.
ऐकावया गुरुलक्षण । यदूनें सर्वांग केलें श्रवण ।
अर्थीं बुडवूनियां मन । सावधान परिसतु ॥५८॥
अर्थीं बुडवूनियां मन । सावधान परिसतु ॥५८॥
ते गुरूंचे लक्षण ऐकण्यासाठी यदूनें साऱ्या अंगाचे कान केले आणि अर्थामध्ये मन घालून तो लक्ष देऊन ऐकू लागला ५८.
शब्द सांडोनियां मागें । शब्दार्थामाजीं रिगे ।
जें जें परिसतु तें तें होय अंगें । विकल्पत्यागें विनीतु ॥५९॥
जें जें परिसतु तें तें होय अंगें । विकल्पत्यागें विनीतु ॥५९॥
शब्द मागे टाकून तो शब्दांच्या अर्थामध्येंच शिरत होता. सर्व विकल्प सोडू्न मन झालेला तो राजा, जो जो विषय ऐके तो तो अंगानें तद्रूपच होत असे ५९.
भूतैराक्रम्यमाणोऽपि धीरो दैववशानुगैः ।
तद्विद्वान्न चलेन्मार्गादन्वशिक्षं क्षितेर्व्रतम् ॥ ३७ ॥
तद्विद्वान्न चलेन्मार्गादन्वशिक्षं क्षितेर्व्रतम् ॥ ३७ ॥
[ श्लोक ३७ ]-पृथ्वीपासून मी क्षमा शिकलो पृथ्वीला लोकांनी कितीही त्रास दिला, तरी ती तो सर्व शांतपणे सहन करते तिच्याकडून मी 'क्षमा' हे व्रत शिकलो जगातील प्राणी आपापल्या प्रारब्धानुसार वागत असतात त्यांच्यापासून त्रास झाला तरी धैर्यवान पुरूषाने त्यांची अगतिकता जाणून आपला धीर सोडू नये आणि आपल्या मार्गापासून ढळू नये. (३७)
परमार्थी मुख्य शांती । साधकांसी पाहिजे निश्चितीं ।
यालागीं प्रथम गुरु क्षिती । निजशांतीलागूनी ॥३६०॥
यालागीं प्रथम गुरु क्षिती । निजशांतीलागूनी ॥३६०॥
परमार्थामध्यें शांति ही मुख्य आहे. याकरतां खरोखर साधकाच्या अंगी ती अवश्य असली पाहिजे. म्हणून प्रथमतः त्या शांतीकरतां मी पृथ्वी हा गुरु केला ३६०.
'पृथ्वी' गुरु त्रिविध पाहीं । पर्वत वृक्ष आणि मही ।
यांचीं लक्षणें धरितां देहीं । गुरुत्व पाहीं पृथ्वीसी ॥६१॥
यांचीं लक्षणें धरितां देहीं । गुरुत्व पाहीं पृथ्वीसी ॥६१॥
पृथ्वी तीन प्रकारें गुरु आहे. पर्वत, पक्ष आणि भूमि; या तिन्हींचे गुण देहामध्यें धारण केल्यामुळें पृथ्वीकडे गुरुपणा आलेला आहे ६१.
अंतरनिग्रहो ते 'शांती' । बाह्येंद्रियनिग्रहो ते 'दांती' ।
उभयसहिष्णुता ते 'क्षांती' । क्षांतीसी क्षिति गुरु केली ॥६२॥
उभयसहिष्णुता ते 'क्षांती' । क्षांतीसी क्षिति गुरु केली ॥६२॥
अंतर्निग्रह करणे ती 'शांति' आणि बाह्येंद्रियनिग्रह करणे ती 'दांती' होय; आणि द्वंद्वसहिष्णुता ती 'क्षांति' होय. म्हणून क्षांति हा गुण संपादण्यासाठी पृथ्वीला गुरु केले ६२.
पृथ्वीते नानाभूतीं । माझी माझी म्हणौनि झोंबती ।
नाना भेदीं भिन्न करिती । निजवृत्तिव्यवहारें ॥६३॥
नाना भेदीं भिन्न करिती । निजवृत्तिव्यवहारें ॥६३॥
अनेक प्रकारचे प्राणी ही 'पृथ्वी माझी माझी' म्हणून तिला झोंबत असतात. आणि आपापल्या वृत्तीप्रमाणे, व्यवहाराप्रमाणे, तिचे अनेक प्रकारांनी तुकडे तुकडे करीत असतात ६३.
त्या भूतांचे भिन्न वर्तन । पृथ्वी संपादी आपण ।
मोडों नेदी अभिन्नपण । अखंड जाण सर्वदा ॥६४॥
मोडों नेदी अभिन्नपण । अखंड जाण सर्वदा ॥६४॥
परंतु त्या जीवांचे निरनिराळे व्यापार पृथ्वी आपण होऊन चालवीत असते. पण आपली एकात्मता न मोडता ती सदासर्वदा अखंडच असते असे समज ६४.
तैसें योगियांचे लक्षण । करितां कर्म भिन्नभिन्न ।
वृत्ति अखंडदंडायमान । सर्वदा जाण असावी ॥६५॥
वृत्ति अखंडदंडायमान । सर्वदा जाण असावी ॥६५॥
तसेच योग्यांचे लक्षण असते. तो जरी भिन्न भिन्न कर्म करूं लागला तरी वृत्ति सदा सर्वदा अखंडदंडायमान म्ह. एकरूपच असते ६५,
देहासी अदृष्टयोगें गती । भूतें अदृष्टयोगें आक्रमिती ।
भूतीं निजात्मता भाविती । द्वंद्वें न बाधिती साधकां ॥६६॥
भूतीं निजात्मता भाविती । द्वंद्वें न बाधिती साधकां ॥६६॥
देह हा प्रारब्धयोगानेंच चालतो; आणि जीव हेही प्रारब्धाप्रमाणेच वागत असतात. हे लक्षात आणून प्रत्येक जीवांत आपलाच आत्मा भरलेला आहे, अशी जे भावना धरतात, त्या साधकांना द्वंद्वाची बाधा होत नाहीं ६६.
येथ भूतीं पृथ्वी पूजिली । नातरी विष्ठामूत्रीं गांजिली ।
हर्षविषादा नाहीं आली । निश्चल ठेली निजक्षांती ॥६७॥
हर्षविषादा नाहीं आली । निश्चल ठेली निजक्षांती ॥६७॥
येथे जीवांनी पृथ्वीची पूजा केली, किंवा मलमूत्रोत्सर्ग करून गांजिली, तरी तिला हर्षही होत नाही, किंवा वाईटही वाटत नाहीं आपल्या क्षांतीमुळें ती अगदी निश्वळ असते ६७.
भूतें पार्थिवेंचि तंव झालीं । तिंहीं पृथ्वी पूजिली ना गांजिली ।
ऐक्यें द्वंद्वभावा मुकलीं । निश्चळ झाली निजरूपें ॥६८॥
ऐक्यें द्वंद्वभावा मुकलीं । निश्चळ झाली निजरूपें ॥६८॥
सर्व प्राणिमात्र पृथ्वीपासून उत्पन्न झालेले आहेत. त्यांनी आपल्या बर्याबाईट कृतीनें पृथ्वीची पूजाही केली नाही, किंवा तिला छळलेही नाही, तर ऐक्यभावामुळें द्वंद्वभावाला मुकून ती निजरूपानें निश्चळच होउन राहते ६८.
तैसाचि योगियाही जाणा । भूतवैषम्यें डंडळेना ।
सर्वभूती निजात्मभावना । विषमीं समाना भावितां ॥६९॥
सर्वभूती निजात्मभावना । विषमीं समाना भावितां ॥६९॥
त्याचप्रमाणें योगीही प्राणिमात्रांच्या भिन्नभिन्न स्वभावामुळें भीत नाही. सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी त्याची निजात्मभावना असल्यामुळे, विषमाच्या ठिकाणीही त्याचा समभाव असतो ६९.
आतां पृथ्वीची अभिनव शांति । ते सांगेन राया तुजप्रती ।
जे शांति धरोनि संती । भगवद्भक्ती पावले ॥३७०॥
जे शांति धरोनि संती । भगवद्भक्ती पावले ॥३७०॥
हे राजा ! आतां तुला, पृथ्वीची अद्भुत शांति सांगतों ऐक. तीच शांति साधुसंतांनी धरल्यामुळें ते भगवद्भक्तीला पात्र झाले ३७०.
पृथ्वी दाहेंकरूनि जाळिली । नांगर घालूनि फाळिली ।
लातवरीं तुडविली । तोडिली झाडिली पैं भूतीं ॥७१॥
लातवरीं तुडविली । तोडिली झाडिली पैं भूतीं ॥७१॥
पृथ्वीवर अग्नि पेटवून तिला जाळली; किंवा नांगर घालून तिला फाळली; अथवा लाथा मारून तिला तुडविली; किंवा जीवांनी तिला तोडली व झोडली ७१,
तो अपराधु न मनूनि क्षिती । सवेंचि भूतांतें प्रसन्न होती ।
तेथेंचि पिकवूनि नाना संपत्ती । तृप्ति देती भूतांतें ॥७२॥
तेथेंचि पिकवूनि नाना संपत्ती । तृप्ति देती भूतांतें ॥७२॥
तरी पृथ्वी तो अपराध मनांत न आणतां त्या प्राण्यांवर तत्काळ प्रसन्नच होते आणि तेथेच नानाप्रकारची पिके पिकवून प्राणिमात्रांना तृप्त करून सोडते ७२.
ऐसऐेशिया निजशांती-। लागीं गुरु म्यां केली क्षिती ।
ऐक सभाग्या भूपती । शांतीची स्थिति अभिनव ॥७३॥
ऐक सभाग्या भूपती । शांतीची स्थिति अभिनव ॥७३॥
अशा प्रकारच्या निजात्मशांतीसाठी मी पृथ्वीला गुरु करून घेतले. हे भाग्यवंता राजा ! अशी शांतीची अभिनव स्थिति ऐकून घे ७३.
एकें अपराधु केला । दुजेनि उगाचि साहिला ।
इतुकेनि शांतु केवीं झाला । उपेक्षिला अपराधी ॥७४॥
इतुकेनि शांतु केवीं झाला । उपेक्षिला अपराधी ॥७४॥
हे पाहा ! एकानें दुसऱ्याचा अपराध केला, आणि दुसऱ्यानें तो मुकाट्यानें सहन करून घेतला, म्हणजे त्यानें अपराध्याची उपेक्षा केली इतकेंच; पण तेवढ्यानेंच तो शांत कसा म्हणता येईल ७४.
ऊंसु मोडी त्या गोड भारी । छेदितें शस्त्र गोड करी ।
पिळिलियाआळिलियावरी । स्वादाचिया थोरी अपकार्यां देतु ॥७५॥
पिळिलियाआळिलियावरी । स्वादाचिया थोरी अपकार्यां देतु ॥७५॥
ऊंस मोडतो त्याला गोड लागतो, त्याला छेदणारे शस्त्रही तो गोड करून सोडतो; आणि त्याला पिळलें, कढविलें, म्हणजे त्या अपकार करणाऱ्यांना तर तो उत्कृष्ट स्वादच देतो ७५,
अपराध साहोनु अंगी । त्याच्या प्रवर्ते हितालागीं ।
तेचि 'शांति' पैं जगीं । होय दाटुगी निर्द्वंद्व ॥७६॥
तेचि 'शांति' पैं जगीं । होय दाटुगी निर्द्वंद्व ॥७६॥
त्याप्रमाणें स्वतः दुसऱ्याचा अपराध सहन करून त्याचे हित करूं लागावयाचे, हीच जगांतील खरीखरी व निर्द्वंद्व 'शांति ' होय ७६.
अपराध साहोनि अंगावरी । अपराध्या होईजे उपकारी ।
हें शिकलों पृथ्वियेवरी । परोपकारीं पर्वत ॥७७॥
हें शिकलों पृथ्वियेवरी । परोपकारीं पर्वत ॥७७॥
आपण अपराध सहन करून अपराध्यावर उपकार करणे, हे पृथ्वीवरील परोपकारी पर्वतापासून मी शिकलों ७७.
शश्वत्परार्थसर्वेहः परार्थैकान्तसम्भवः ।
साधुः शिक्षेत भूभृत्तो नगशिष्यः परात्मताम् ॥ ३८ ॥
साधुः शिक्षेत भूभृत्तो नगशिष्यः परात्मताम् ॥ ३८ ॥
[श्लोक ३८] - पृथ्वीचेच रूप असणारे पर्वत आणि वृक्ष यांच्या सर्व क्रिया नेहमी दुसर्यांच्या हितासाठीच असतात. किंबहुना दुसर्याचे हित करण्यासाठीच त्यांचा जन्म असतो साधु पुरूषाने त्यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून परोपकार करण्याचे शिकावे. (पृथ्वी पासून क्षमा व परोपकार हे गुण घ्यावेत). (३८)
पृथ्वीपासोनि झाले । ते पर्वतही म्यां गुरु केले ।
त्यांपासोनि जें जें शिकलें । तेंही वहिलें परियेसीं ॥७८॥
त्यांपासोनि जें जें शिकलें । तेंही वहिलें परियेसीं ॥७८॥
पृथ्वीपासून झालेल्या पर्वतांनाहीं मी गुरु केले, आणि त्यांच्यापासून जें जें शिकलों, तेही आतां ऐक ७८.
रत्नं-निकर समस्त । पर्वत परार्थचि वाहत ।
तृण जळ नाना अर्थ । तेही परार्थ धरितसे ॥७९॥
तृण जळ नाना अर्थ । तेही परार्थ धरितसे ॥७९॥
रत्नादि पदार्थांचा पर्वत जो संग्रह करून ठेवतो, तो केवळ परोपकाराकरतांच असतो. गवत, पाणी किंवा दुसरे अनेक पदार्थ तो केवळ परोपकाराकरतांच बाळगतो ७९.
कोणासी नेमी ना निवारी । उबगोनि न घाली बाहेरी ।
याचकाचे इच्छेवरी । परोपकारीं देतसे ॥३८०॥
याचकाचे इच्छेवरी । परोपकारीं देतसे ॥३८०॥
तो कोणाला या म्हणत नाही, व नकोही म्हणत नाही; किंवा कोणाला उबगून बाहेर घालीत नाही. याचकाची जी इच्छा असेल, ती परोपकारबुद्धीनें तो पुरी करीत असतो ३८०.
ग्रीष्माअंतीं सर्व सरे । परी तो देतां मागें न सरे ।
सवेंचि भगवंते कीजे पुरें । वर्षोनि जळधरें समृद्धी ॥८१॥
सवेंचि भगवंते कीजे पुरें । वर्षोनि जळधरें समृद्धी ॥८१॥
ग्रीष्मऋतु संपला की, त्याच्यावरील तृण धान्य वगैरे सर्व संपून जाते; पण पर्वत देतांना काही मागें सरत नाही, म्हणून परमेश्वरही लागलीच मेघवृष्टि करून त्याला समृद्ध करून सोडतो ८१.
जंव जंव उल्हासें दाता देतु । तंव तंव पुरवी जगन्नाथु ।
विकल्प न धरितां मनाआंतु । देता अच्युतु अनिवार ॥८२॥
विकल्प न धरितां मनाआंतु । देता अच्युतु अनिवार ॥८२॥
दाता जों जों उल्हासानें देऊ लागतो, तों तों जगन्नाथ त्याला पुरवठा करीतच असतो. मनांत विकल्प ठेवला नाहीं तर अच्युत भगवान् अनिवार देणारा आहे ८२.
सत्य अच्युत दाता । हें न मनेचि तत्त्वतां ।
यालागीं दरिद्रता । विकल्पवंता लागली ॥८३॥
यालागीं दरिद्रता । विकल्पवंता लागली ॥८३॥
परंतु संशयखोर लोकांना भगवान् खराखुरा दाता आहे हे खरे वाटत नाही. म्हणूनच त्यांना दारिद्य भोगावे लागते ८३.
एवं पर्वताची जे उत्पत्ती । ते परोपकारार्थ एकांतीं ।
उपकारावांचूनि चित्तीं । दुजी वृत्ति जाणेना ॥८४॥
उपकारावांचूनि चित्तीं । दुजी वृत्ति जाणेना ॥८४॥
ह्याप्रमाणें पर्वताची उत्पत्ति फक्त परोपकाराकरतांच आहे. परोपकारावांचून दुसरी कल्पनाच त्याच्या मनाला माहीत नाहीं ८४.
त्या पर्वताऐशी तत्त्वतां । असावी साधकासी उदारता ।
काया वाचा आणि चित्ता । सर्वस्व देतां उल्हासु ॥८५॥
काया वाचा आणि चित्ता । सर्वस्व देतां उल्हासु ॥८५॥
साधकाला खरोखर त्या पर्वतासारखें औदार्य पाहिजे. कायेनें, वाचेनें आणि मनानें सर्वस्व देतांनाहीं उल्हासच वाटला पाहिजे ८५.
चेष्टामात्रें परोपकारता । सर्वदा करावी समस्तां ।
कोटिलाभा हाणोनि लाता । उपकारीं तत्त्वतां उद्यतु ॥८६॥
कोटिलाभा हाणोनि लाता । उपकारीं तत्त्वतां उद्यतु ॥८६॥
नेहमी हरएक काम करतांना सर्वांवर उपकार करीत असावें. कोट्यवधि लाभांवर लाथ मारूनही उपकार करण्याविषयी नेहमी तयार असावें ८६.
परमार्थाचिया चाडा । स्वार्थ सांडोनि रोकडा ।
परोपकारार्थ अवघडा । रिघे सांकडा परार्थें ॥८७॥
परोपकारार्थ अवघडा । रिघे सांकडा परार्थें ॥८७॥
परमार्थाची खरी इच्छा असणारा साधक समोर आलेला प्रत्यक्ष स्वार्थ सोडून, परोपकाराकरतां अवघड संकटांतही उडी घालतो ८७.
उपकारुचि साकारला । कीं परोपकारु रूपा आला ।
तैसा जन्मोनि उपकारी झाला । उपकारला सर्वांसी ॥८८॥
तैसा जन्मोनि उपकारी झाला । उपकारला सर्वांसी ॥८८॥
मूर्तिमंत उपकार जन्मावा किंवा परोपकारच रूपाला यावा त्याप्रमाणें हा जन्मून उपकारी होऊन राहातो ८८.
ऊंसु जैसा अवधारीं । सर्वासी गोडपणें उपकारी ।
तैसाचि योगिया संसारीं । परोपकारी मधुरत्वें ॥८९॥
तैसाचि योगिया संसारीं । परोपकारी मधुरत्वें ॥८९॥
हे पाहा ! ऊस जसा अंगच्या गोडपणानें सर्वांवर उपकार करतो, त्याचप्रमाणें योगीही संसारामध्यें राहून गोड वर्तनानें परोपकार करीत असतो ८९.
जैसे पर्वतीं निर्झर । तैसे उपकाराचे पाझर ।
सुकों नेणती निरंतर । कृतोपकार जग केलें ॥३९०॥
सुकों नेणती निरंतर । कृतोपकार जग केलें ॥३९०॥
पर्वतांतून जसे झरे निघत असतात, त्याप्रमाणें त्याच्यापासून उपकाराचे पाझर फुटून ते निरंतर वाहातच असतात. त्यांना आटावयाचे कधी माहीतच नाही. इतके त्यानें जगाला उपकारबद्ध करून सोडलेले असते ३९०.
सांडोनि कृपणवृत्तीची संगती । उपकारी पर्वत एकांतीं ।
राहिलासे उपकारमूर्ती । धैर्यवृत्ति निर्धारें ॥९१॥
राहिलासे उपकारमूर्ती । धैर्यवृत्ति निर्धारें ॥९१॥
कृपणपणाची संगत सोडून देऊन पर्वत एकांतांत उपकार करीत राहतो किंवा धैर्यवृत्तीच्या निर्धारानें तो उपकाराची साक्षात् मूर्तिच बनून राहातो ९१.
परोपकारालागीं निश्चित । गुरु केला म्यां पर्वत ।
आतां वृक्षापासोनि जें शिक्षित । तेंही समस्त परियेसीं ॥९२॥
आतां वृक्षापासोनि जें शिक्षित । तेंही समस्त परियेसीं ॥९२॥
खरोखर परोपकारासाठीच मी पर्वताला गुरु केलें. आतां वृक्षापासून काय शिकण्यासारखे असते तेही ऐक ९२.
सर्वांगें सर्वभावेंसी । सर्वकाळ सर्वदेशीं ।
पराधीन होआवें सर्वांसी । हें वृक्षापाशीं शिकलों ॥९३॥
पराधीन होआवें सर्वांसी । हें वृक्षापाशीं शिकलों ॥९३॥
सर्वांगानें सर्वोपरी, सर्वकाळ आणि सर्वत्र सर्वांच्या पराधीनतेत असावें, हेच मी वृक्षापाशी शिकलों ९३.
वृक्ष जेणें प्रतिपाळिला । तो त्या आधीन जाहला ।
कां जो छेदावया रिघाला । त्याही झाला स्वाधीनु ॥९४॥
कां जो छेदावया रिघाला । त्याही झाला स्वाधीनु ॥९४॥
वृक्ष ज्यानें लावलेला असतो, त्याच्याच तो अधीन असतो असें नाही, तर त्याला तोडावयला जो तयार होतो, त्याच्याही तो अधीनच असतो ९४.
योगिया पालखीसी घातला । तेव्हां त्याचिया आधीन झाला ।
एकीं शूळीं द्यावया चालविला । तेव्हां त्याच्याही बोला आधीनु ॥९५॥
एकीं शूळीं द्यावया चालविला । तेव्हां त्याच्याही बोला आधीनु ॥९५॥
त्याचप्रमाणें योग्याला पालखीत बसविले, तर तो त्यांच्या अधीन होतो. किंवा कोणी सुळावर द्यावयाला चालविले, तर तो त्यांच्याही आज्ञेत चालत असतो ९५.
सांडूनि देहींची अहंता । योगियासी झाली पराधीनता ।
विश्व माझा आत्मा सर्वथा । सर्वांच्या वर्तता बोलाआंतु ॥९६॥
विश्व माझा आत्मा सर्वथा । सर्वांच्या वर्तता बोलाआंतु ॥९६॥
देहाची अहंता सोडून दिल्यामुळें योग्याला पराधीनता प्राप्त झालेली असते. विश्व हें सर्वोपरी माझा आत्माच आहे, असे समजून सर्वांच्या बोलण्याप्रमाणें तो वागतो ९६.
सर्वं तें मीचि आहें । यालागीं साधक बाधक न पाहे ।
त्याच्या बोलामाजीं राहे । वर्तता होये संतोषें ॥९७॥
त्याच्या बोलामाजीं राहे । वर्तता होये संतोषें ॥९७॥
सारे आहे ते मीच आहे, असे समजून तो साधकाबाधकाकडे लक्ष न देतां त्याच्या आज्ञेंत राहून संतोषानें वागत असतो ९७.
प्राप्त जें जें सुखदुःख । तें तें अदृष्टाआधीन देख ।
आत्मा मानुनी सकळ लोक । पराधीन देख वर्तत ॥९८॥
आत्मा मानुनी सकळ लोक । पराधीन देख वर्तत ॥९८॥
सुख दुःख म्हणून जें जें प्राप्त होईल, तें तें प्राक्तनाच्या अधीन असते; सारे लोक हाच आपला आत्मा असे समजून तो पराधीन होऊन वागत असतो ९८.
सकळ लोकीं निजात्मता । देखता जाहली पराधीनता ।
हें वृक्षापासोनि तत्त्वतां । 'परात्मता' शिकलों ॥९९॥
हें वृक्षापासोनि तत्त्वतां । 'परात्मता' शिकलों ॥९९॥
सर्व लोकांमध्यें आपला आत्मा आहे, असे पाहूं लागल्याबरोबर पराधीनता सहज प्राप्त होते. हीच 'परात्मता' खरोखर मी वृक्षापासून शिकलों ९९.
आणीक एक लक्षण । वृक्षापासोनि शिकलों जाण ।
अतिथीचें पूजाविधान । तें सावधान परियेसीं ॥४००॥
अतिथीचें पूजाविधान । तें सावधान परियेसीं ॥४००॥
वृक्षापासून आणखी एक गुण शिकलो आहे. तो कोणता ? तर अतिथीचे पूजन करणे. तेही नीट लक्ष देऊन श्रवण कर ४००.
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...