मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ ओव्या २०१ ते ३००

    दारुण होतां संग्रामासी । पावडा पावो युद्धासी ।

    तेव्हां ब्रह्मज्ञान सांगसी । निज सख्यासी अर्जुना ॥१॥
    भयंकर रणसंग्रामात एकमेकांचा जीव घेण्याकरतां पाऊल पुढे करून राहिलेल्या प्रसंगी आपला सखा जो अर्जुन त्याला ब्रह्मज्ञान सांगितलेस १.


    ऐसा कृपाळू तूं नारायण । यालागीं तुज आलों शरण ।
    त्रिविधतापें तापलों जाण । दुःख दारुण संसारु ॥२॥
    नारायण असा कृपाळू असल्यामुळें मी तुला शरण आलो आहे. आधिभौतिक, आध्यात्मिक व आधिदैविक ह्या विविध तापांनी मी तप्त झालों आहे. हा संसार भयंकर दुःखानें युक्त आहे २.


    संसार म्हणजे अंधकूप । माजीं कामक्रोधादि दुष्ट सर्प ।
    निंदा स्पर्धा कांटे अमूप । दुःखरूप मी पडिलों ॥३॥
    संसार म्हणजे एक अंधारी विहीर आहे. तींत कामक्रोधादि महादुष्ट सर्प आहेत. निंदा व स्पर्धा हे कांटे तींत पसरले आहेत. अशा दुःखांत मी पडलो आहे ३.


    तेथ पडीलियापाठीं । ब्रह्मद्वेषाचा शूळ पोटीं ।
    भरला जी उठाउठी । तेणें हिंपुटी होतुसें ॥४॥
    तेथे पडल्यामुळें ब्रह्मद्वेषाचा पोटांत शूळ उठून त्यानें मी तळमळत आहे ४.


    तेथून निघावया त्रिशुद्धी । उपावो न दिसे गा निजबुद्धी ।
    कृपाळुवा कृपानिधी । आत्मबोधीं मज काढीं ॥५॥
    त्यांतून बाहेर निघावयाला आपल्या बुद्धीला तर मुळीच उपाय सुचत नाही. ह्याकरतां हे कृपानिधे ! हे दयाळा ! मला आत्मज्ञानाचा बोध करून वर काढ ५.


    श्रीभगवानुवाच -
    प्रायेण मनुजा लोके लोकतत्त्वविचक्षणाः ।
    समुद्धरन्ति ह्यात्मानमात्मनैवाशुभाशयात् ॥ १९ ॥
    [श्लोक १९]-श्रीकृष्ण म्हणाले - हे उद्धवा ! जगामध्ये जे लोक व्यवहारात चतुर आहेत, ते चित्तातील अशुभ वासनांपासून बहुधा स्वतःच स्वतःचा उद्वार करून घेतात. (१९)


    भूत संचरलियापाठीं । सुटती जल्पवादगोठी ।
    त्यातें गुणिया पाहोनि दिठीं । अक्षता त्राहाटी मंत्रोनी ॥६॥
    अंगांत भुताचा संचार झाला म्हणजे तो मनुष्य अचावचा बडबडत सुटतो. त्याला पाहून पंचाक्षरी अक्षता मंत्रून त्याच्यावर टाकतो ६.


    पाहतां पांचभौतिक संसारु । सहजें झाला असे थोरु ।
    माजीं झोंबलासे कृष्णवियोगखेचरु । उद्धव लेंकरूं झडपिलें ॥७॥
    त्याप्रमाणें पंचमहाभूतांचा संचार अगोदरच झाला होता, त्यांत कृष्णवियोगरूप समंध अंगांत शिरल्यामुळें उद्धव लेंकरूं अगदी झडपून गेलें ! ७.


    मिसें उद्धवाची झडपणी । अहं-म्हैसासुर लागला जनीं ।
    त्यासी करावया झाडणी । कृष्ण गुणी चालिला ॥८॥
    तेव्हां उद्धवाला झपाटा झाल्याचे निमित्त करून लोकांमध्यें जो 'अहं' नावाचा म्हसोबा शिरला होता, त्याला काढून टाकण्यासाठी कृष्णरूप पंचाक्षरी निघाला ८.


    तेथ झाडणीलागीं आतां । यदुअवधूतसंवाद कथा ।
    त्याचि मंत्रूनि मंत्राक्षता । होय झाडिता श्रीकृष्णु ॥९॥
    त्या अहं - महषासुराला काढून टाकण्यासाठी यदुअवधूतसंवादकथेच्या मंत्राक्षता मंत्रून श्रीकृष्ण त्या भूताला झाडीत आहे. ९.


    श्रीकृष्ण म्हणे उद्धवासी । सावध होईं निजमानसीं ।
    येऊनियां मनुष्यलोकासी । आपआीपणांसी उद्धरिती ॥२१०॥
    श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला, आतां तूं आपले मन सावध कर; ह्या मृत्युलोकाला येऊन आपणच आपला उद्धार करून घेतला पाहिजे २१.


    पाहतां यया परमार्था । साह्य नव्हे माता पिता ।
    पुत्र भ्राता दुहिता कांता । साह्य सर्वथा हे नव्हती ॥११॥
    खरे पाहूं गेलें असतां ह्या परमार्थाला माता पिता साहाय्य करूं शकत नाहीत. पुत्र, बंधु, कन्या किंवा कांता ही कधीच साह्य होत नाहींत ११.


    साह्य परमार्था नव्हे व्याही । शेखीं साह्य नव्हे जांवयी ।
    आपणिया आपण साह्य पाहीं । जो निजदेहीं विवेकी ॥१२॥
    परमार्थाला व्याही साह्य होत नाहीं; शेवटीं जांवयीही साह्य करीत नाही; तर जो आपल्या देहांत राहून विवेक करीत असतो, तोच आपण आपल्याला साह्य होतो १२.


    मुमुक्षुमार्गींचे सज्ञान । लोक तत्वविचक्षण ।
    विचारूनि कार्याकारण । स्वबुद्धीं जाण उद्धरले ॥१३॥
    मुमुक्षुमार्गांतील तत्त्वविचार करणारे सज्ञान लोक, कार्यकारणाचा विचार करून आपल्याच बुद्धीनें हा संसार तरून जात असतात १३.


    नित्यानित्यविवेकें । अनित्य सांडिती त्यागमुखें ।
    नित्य तें यथासुखें । हित संतोखें अंगीकारिती ॥१४॥
    नित्य कोणतें व अनित्य कोणते याचा विचार करून त्यागाच्या द्वारें अनित्याला सोडून देतात आणि नित्य असते त्याचा स्वहितासाठी मोठ्या संतोषानें व स्वेच्छेनें अंगीकार करतात १४.


    नित्यत्वें जें उरलें जाण । तें स्वरूप माझें चिद्‌घन ।
    तेंचि साधकांचे साधन जाण । अनन्यपणें चिंतिती ॥१५॥
    नित्यत्वानें हें शिल्लक राहते, तेच माझें चिद्घन स्वरूप होय हे लक्षात ठेव. साधकांचे साधनही तेच. म्हणून तेही अनन्यत्वानें म्ह. आपणच ते तत्त्व अशा भावनेनें त्याचे चिंतन करीत असतात १५.


    भावितां माझी दृढ भावना । मीचि ते होती जाणा ।
    कीटकी-भृंगीचिया खुणा । आपआणपणियां उद्धरिती ॥१६॥
    ह्याप्रमाणें माझी दृढभावना भावीत गेल्याने, कीट-भृंगन्यायानें ते मीच होऊन जातात, व आपणच आपला उद्धार करतात १६.


    आत्मनो गुरुरात्मैव पुरुषस्य विशेषतः ।
    यत्प्रत्यक्षानुमानाभ्यां श्रेयोऽसावनुविन्दते ॥ २० ॥
    [श्लोक २०]- सर्व प्राण्यांचा, विशेषतः मुनष्याच्या बाबतील आपणच आपले गुरू असतो कारण मनुष्य प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्या द्वारेच आपले कल्याण करून घेतो. (२०)


    पश्वादि योनींच्या ठायीं । हिताहितज्ञान असे पाहीं ।
    मा पुरुषाच्या पुरुषदेहीं । ज्ञान पाहीं स्फुरद्‌रूप ॥१७॥
    पशुपक्ष्यादि योनीमध्यें सुद्धां हित कशांत आहे व अनहित कशांत आहे, ह्याचे ज्ञान असते. मग मनुष्याच्या देहांत ते कसे असणार नाहीं ? ते सहज स्फुरद्‌रूप असते हे लक्षात ठेव १७.


    जें कर्म करितों मी देहीं । तेणें तरेन कीं नाहीं ।
    हें ज्याचे त्याचे ठायीं । स्फुरद्‌रूप पाहीं कळतसे ॥१८॥
    मी देहानें हें कर्म करतो, त्यानें तरेन किंवा नाही, हे ज्याचे त्याला आपापल्या ठिकाणी स्फूर्तीच्या रूपानें कळतच असते १८.


    सांडूनि अशुभ वासना । जो न करी विषयकल्पना ।
    तो आपुला गुरु आपण जाणा । नरकयातना चुकविली ॥१९॥
    अशुभ वासना सोडून देऊन जो विषयाची कल्पनाहीं मनांत आणीत नाहीं, तो आपला आपणच गुरु होऊन नरकाच्या यातना चुकवितो हे लक्षात ठेव १९.


    जो कंटाळला जन्मगर्भासी । मरमरों उबगला मरणासी ।
    आधि लागली मानसीं । जन्ममरणासी नासावया ॥२२०॥
    जो गर्भावस्था व जन्म ह्यांना कंटाळतो, मरमर मरण्याचा ज्याला उबग येतो, जन्ममृत्यूच्या नाशाविषयीं ज्याच्या मनाला तळमळ लागून राहाते २२०,


    आवडी नुपजे स्त्रीपुत्रांसी । निद्रा न लागे अहर्निशीं ।
    काळें ग्रासिलें आयुष्यासी । निजहितासी न देखिजे ॥२१॥
    स्त्रीपुत्राविषयीं ज्याच्या मनांत मोह वसत नाही, आयुष्य काळानें ग्रासलें तरी आपलें खरें हित अजून कशांतच दिसत नाही, अशा विचारानें त्याला रात्रंदिवस झोप नसते २१.


    तुझीच तुजचि देखतां । काळें गिळिली बाल्यावस्था ।
    तारुण्याचा ग्रासिला माथा । वार्धक्याभंवता लागला असे ॥२२॥
    विचार कर की, तुझ्याच देखत तुझी बाल्यावस्था काळानें ग्रासून टाकली, तारुण्याचे शिखर त्यानें गिळून सोडले आणि आतां तो वार्धक्याभोवती घिरट्या घालीत आहे २२.


    केवळ वार्धक्याचा जरंगा । त्यासीही काळु लागला पैं गा ।
    आयुष्य व्यर्थ जातसे वेगा । हा निजनाडु जगा कळेना ॥२३॥
    वार्धक्य म्हणजे केवळ जाळे आहे, पण त्याच्याही मागे काळ लागलाच आहे. आयुष्य हे अशा प्रकारें झपाट्यानें व्यर्थ जात आहे, हा आपला घात जगाला कळत नाहीं २३.


    क्षणक्षणा काळु जातसे व्यर्थ । कांही न साधे जी परमार्थ ।
    जन्ममरणांचा आवर्त । पुढें अनर्थ रोकडा ॥२४॥
    क्षणोक्षणी काळ व्यर्थ चाललेला आहे, परमार्थाचे साधन तर कांहींच होत नाही, त्यामुळें जन्ममरणाचा भोंवरा हा अनर्थ पुढे दिसत असतो २४.


    स्वर्ग नरक कर्म ब्रह्म । चहूं प्राप्तींसी मनुष्यधर्म ।
    यालागीं त्यजूनि पापकर्म । मोक्षधर्म धरावा ॥२५॥
    स्वर्ग, नरक, कर्म व ब्रह्म ह्या चारीही गोष्टी मनुष्यत्वामुळेच प्राप्त होत असतात. ह्याकरतां पापकर्म सोडून देऊन मोक्षधर्माचाच स्वीकार केला पाहिजे २५,


    नरदेह मोक्षाचा वांटा । वृथा जातसे कटकटा ।
    हृदयीं आधी लागला मोठा । विषयचेष्टा विसरला ॥२६॥
    अरेरे ! नरदेह हा मोक्षाचा वांटा असून तो व्यर्थ जात आहे ना ! ही गोष्ट त्याला शल्यासारखी हृदयांत सलते, म्हणून तो विषयव्यापार विसरून जातो २६.


    'प्रत्यक्ष' लक्षणें अनित्य । संसारु दिसे नाशवंत ।
    यालागीं तो नव्हे आसक्त । होय विरक्त इहभोगीं ॥२७॥
    अनित्यपणाच्या प्रत्यक्ष लक्षणानेंच संसार हा नाशवंत असल्याचे दिसून येते, म्हणून तो त्यांत आसक्त होत नाहीं; ह्या मृत्युलोकाच्या भोगाविषयीं तो विरक्त होतो २७.


    याचिपरी 'अनुमाना' । परलोकभोगभावना ।
    आतळों नेदी मना । नश्वर पतना जाणोनि ॥२८॥
    ह्याचप्रमाणें परलोकच्या सुखाचेही अनुमान बांधून तेही नश्वरच आहे, त्यांतही पतनच आहे, हे लक्षात आणून त्याचाही मनाला स्पर्श होऊ देत नाहीं २८,


    कैं कृपा करील गोविंद । कैं तुटेल भवबंध ।
    कैं देखेन तो निजबोध । परमानंद जेणें होय ॥२९॥
    भगवान् केव्हां कृपा करील ? संसाराचे बंधन केव्हां तुटेल ? ज्याच्या योगानें परमानंद प्राप्त होतो असा तो आत्मबोध केव्हां लाभेल ? २५.


    धांव पाव गा श्रीहरी । कृपा करीं दीनावरी ।
    मज उद्धरीं भवसागरीं । भक्तकैवारी श्रीकृष्णा ॥२३०॥
    हे श्रीहरी ! लवकर धाव, ह्या दीनावर दया कर; हे भक्तकैवारी श्रीकृष्णा ! ह्या संसारसागरांतून माझा उद्धार कर २३०,


    जैसी जीवनावेगळी मासोळी । तैसा बोधालागीं तळमळी ।
    प्रेमपडिभराच्या मेळीं । देह न सांभाळी सर्वथा ॥३१॥
    ज्याप्रमाणे, पाण्याशिवाय जसा मासा तळमळतो, तसा आत्मज्ञानासाठी तो तळमळत असतो; भक्तिप्रेमाच्या उसळ्यांवर उसळ्या येत असल्यामुळें देहसंरक्षणाचीही त्याला मुळीच शुद्ध राहात नाहीं ३१.


    एक नेणोनि नरदेहा मुकले । एकीं नव्हे म्हणोनि उपेक्षिले ।
    एक ज्ञानगर्वे गिळिले । एक भुलले विषयार्थी ॥३२॥
    कोणी न कळल्यामुळें नरदेहाला मुकले, कोणी नास्तिकपणामुळें त्याची उपेक्षा केली, कोणाला ज्ञानाच्या गर्वानें ग्रासून टाकलें, आणि कोणी विषयालाच भुलून पडले ३२.


    एक साधनाभिमानें ठाकिले । एक करूं करूं म्हणता गेले ।
    एक करितां अव्हाटां भरले । करणें ठेलें तैसेंचि ॥३३॥
    कोणी साधनाच्या अभिमानानें ठकले गेले, कोणी करूं करूं असें म्हणता म्हणतां मरण पावले, कोणी करतां करतां आडमार्गात घुसून भलतीकडेच वाहवले आणि करणे जेथल्या तेथेच राहिले ३३.


    जरी विवेक कळला मना । तरी न तुटती विषयवासना ।
    तेणें संतप्त होऊनि जाणा । नारायणा चिंतितु ॥३४॥
    मनाला विवेक कळला तरी विषयवासना सुटत नाहीत, त्यामुळें संताप उत्पन्न होऊन तो नारायणाचें चिंतन करतो ३४,


    कृष्ण म्हणे उद्धवासी । सविवेक वैराग्य असे ज्यासी ।
    तोचि आपुला गुरु आपणासी । विशेषेंसी जाणावा ॥३५॥
    कृष्ण उद्धवाला म्हणतो-विवेकासह वैराग्य ज्याला उत्पन्न होते, तोच विशेषेकरून आपणाला आपण गुरु होतो असें जाण ३५.


    त्याचिये निजबुद्धीसी । मीचि विवेकु प्रकाशीं ।
    तो स्वयें जाणे निजबोधासी । निजमानसीं विवेकें ॥३६॥
    त्याच्या बुद्धीला मीच विवेकाचा प्रकाश देतो, आणि त्या विवेकानें तो आपल्या मनामध्यें आत्मबोध जाणतो ३६.


    ज्यासी जैसा भावो । त्यासी मी तैसा देवो ।
    ये अर्थी संदेहो । उद्धवा पहा हो न धरावा ॥३७॥
    ज्याचा जसा भाव असतो, त्याला मी देवही तसाच होतो. ह्यांत तिळमात्र संशय धरूं नकोस ३७.


    उद्धवा येथ केवळ । पाहिजे निजबुद्धि निर्मळ ।
    तरी आत्मबोध तत्काळ । होय सफळ सर्वथा । ॥३८॥
    हे पाहा उद्धवा ! ह्याला केवळ बुद्धीच निर्मळ पाहिजे, तरच आत्मबोध तत्काळ सफळ होतो ३८.


    पुरुषत्वे च मां धीराः साङ्ख्ययोगविशारदाः ।
    आविस्तरां प्रपश्यन्ति सर्वशक्त्युपबृंहितम् ॥ २१ ॥
    [ श्लोक २१] - सांख्ययोगपारंगत विद्वान या मनुष्ययोनीमध्ये इंद्रियशक्ती, मनःशक्ती इत्यादींना आश्रयभूत असणार्‍या माझा आत्मतत्त्वाचा पूर्णतः प्रगटरूपाने साक्षात्कार करून घेतात. (२१)


    एवं वैराग्यें पूर्ण भरित । धीर पुरुष विवेकयुक्त ।
    सांख्ययोग विवंचित । निजीं निज प्राप्त तत्काळ ॥३९॥
    अशा प्रकारे वैराग्यानें पूर्ण भरलेला व विवेकानें युक्त असा जो धैर्यवान् पुरुष असतो, तो सांख्याचा व योगाचा विचार करतो, त्याला अंतःकरणामध्यें आत्मज्ञानाची प्राप्ति तत्काळ होते ३९.


    नरदेहीं विवेक वसे । निजरूप पावले कैसे ।
    जें सर्वशक्तियुक्त असे । तें सावकाशें देखती ॥२४०॥
    ज्या नरदेहांमध्यें विवेक राहतो, त्यांना आत्मस्वरूपाची प्राप्ति होते. जें सर्वशक्तिमान् तत्त्व आहे, तेच त्यांना हळुहळू दृष्टिगोचर होत असते २४०.


    जें प्रसवे सर्वशक्तींतें । तें सर्वशक्ति-शक्तिदातें ।
    जें नातळे सर्वशक्तीतें । त्या स्वरूपातें पाहताति ॥४१॥
    ज्याच्यापासून सर्व शक्ति उत्पन्न होतात, ते सर्व शक्तीला शक्ति देणारे आहे; परंतु ते सर्व शक्तींनाहीं कळत नाही, अशा स्वरूपाला ते पाहातात ४१.


    उद्धवा काय सांगों गोष्टी । बहुत शरीरें सृजिलीं सृष्टीं ।
    मज नरदेहीं आवडी मोठी । उठाउठीं मी होती ॥४२॥
    हे उद्धवा ! काय काय आणि किती किती गोष्टी म्हणून तुला सांगाव्यात ? ह्या सृष्टीमध्यें मी अनेक प्रकारची शरीरें निर्माण केली, परंतु मला नरदेहाचीच फार आवड; कारण तो देह धारण करणारे जीव तत्काळ मद्‌रूप होऊ शकतात ४२.


    एकद्वित्रिचतुस्पादो बहुपादस्तथापदः ।
    बह्व्यः सन्ति पुरः सृष्टास्तासां मे पौरुषी प्रिया ॥ २२ ॥
    [श्लोक २२]-मी एक, दोन, तीन, चार आणि चारापेक्षाही अधिक पाय असलेली आणि पाय नसलेली अशी अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली आहेत त्या सर्वांमध्ये मला माणसाचेच शरीर अधिक प्रिय आहे. (२२)


    केलीं एकचरणी शरीरें । दोंपायांची अपारें ।
    तींपायांचीं मनोहरें । अतिसुंदरें चतुष्पदें ॥४३॥
    मी काही शरीरें एका पायाचीच केली, दोन पायांची शरीरें तर पुष्कळच केली, कांहीं तीन पायांची केली ती तर मौजेची दिसतात; चतुष्पाद प्राणी तर फारच सुंदर दिसतात ४३.


    सर्पादि योनींच्या ठायीं । म्यां चरणचि केले नाहीं ।
    एकें चालती बहु पायीं । केलीं पाहीं शरीरें ॥४४॥
    सर्पादि प्राण्यांना मी पायच दिले नाहीत; कितीएक अनेक पायांनी चालणारे आहेत; अशी नानाप्रकारची शरीरे मी घडवलेली आहेत ४४.


    ऐशीं शरीरें नेणो किती । म्यां निर्माण केलीं ये क्षितीं ।
    मज कर्त्यातें नेणती । मूढमति यालागीं ॥४५॥
    अशी पृथ्वीवर मी निर्माण केलेली शरीरे किती आहेत त्यांचा अंत नाही; पण ते प्राणी मला कर्त्याला ओळखीत नाहीत म्हणून मंतिमंद होत ४५.


    मज कर्त्याची प्राप्ति । होआवयालागीं निश्चितीं ।
    स्वांशें प्रकाशोनि ज्ञानशक्ती । पौरुषी प्रकृति म्यां केली ॥४६॥
    मज कर्त्यांची प्राप्ति होण्यासाठी म्हणून मी आपल्या अंशानें ज्ञानशक्ति प्रकाशित करून मनुष्यशरीर निर्माण केले ४६.


    जेणें देहें मज पावती । त्या देहाची मज अतिप्रीति ।
    यालागीं श्रुति नरदेह वर्णिती । देव वांछिती नरदेहा ॥४७॥
    ज्या देहानें मला पावतात, त्या देहाची मला फार आवड; म्हणूनच वेद नरदेहाचे वर्णन करतात, आणि देवही नरदेहाची इच्छा करतात ४७.


    ऐशी नरदेहाची प्रीती । कृष्ण सांगे उद्धवाप्रती ।
    येणें शरीरें मज पावती । नाना युक्तिविचारें ॥४८॥
    अनेक युक्तींच्या विचारानें लोक ह्याच नरदेहानें मला पावतात. अशी नरदेहाची असलेली प्रीति श्रीकृष्णानें उद्धवाला सांगितली ४८.


    अत्र मां मृगयन्त्यद्धा युक्ता हेतुभिरीश्वरम् ।
    गृह्यमाणैर्गुणैर्लिङ्गैरग्राह्यमनुमानतः ॥ २३ ॥
    [श्लोक २३ ]- कारण या मनुष्यशरीरात एकाग्रचित्त मनुष्य बुद्धी इत्यादी ग्रहण केल्या जाणार्‍या साधनांनी अनुमानाचा विषय नसूनही माझासर्वप्रवर्तक ईश्वराचा साक्षात अनुभव घेतात. (२३)


    येऊनि नरदेहाप्रती । कर्त्याची गवेषणा जे करिती ।
    जो मी ईश्वर त्रिजगतीं । उत्पत्तिस्थितिसंहर्ता ॥४९॥
    नरदेहाला येऊन ते कर्त्यांचा शोध करतात; जो मी त्रिभुवनाची उत्पत्ति, स्थिति व संहार करणारा परमेश्वर ४९,


    बुद्धियुक्तीं विवेक करणें । ते जडें प्रकाशपणें ।
    त्याचाही मी प्रकाशकु म्हणे । येणें लक्षणें लक्षिती ॥२५०॥
    त्या माझा बुद्धीच्या अनुमानानें विचार करतात, पण ते अनुमान व त्यापासून निष्पन्न होणारे ज्ञानही जडच असते; कारण, त्या ज्ञानाला प्रकाशित करणारा स्वयंप्रकाश मी त्याहून निराळा आहे. अशा लक्षणानें मला ते जाणतात २५०.


    ऐशा नानापरींच्या अनुमानां । मी तंव वश नव्हें जाणा ।
    जे लक्षिती सांडोनि अभिमाना । साक्षात्पणा ते येती ॥५१॥
    पण अशा प्रकारची कितीही अनुमानें केली तरी मी काही त्यांना वश होणारा नव्हे; तर जे कोणी अभिमान सोडून माझें स्वरूप पाहूं लागतात, त्यांनाच माझ्या स्वरूपाचा साक्षात् अनुभव येत असतो हे लक्षात ठेव ५१.


    ज्याची आशा होय निराश । तोचि ब्रह्म पावे सावकाश ।
    तेणें कळीकाळावरी कांस । जाण अवश्य घातली ॥५२॥
    ज्याची सर्व आशा नाहीशी होते, तोच सावकाशपणे ब्रह्मस्वरूपाला पोचतो; त्यानेंच कलिकाळाशी झगडण्याकरतां कास घातली म्हणून समजावें ५२.


    मुख तंव स्वतःसिद्ध असे । तें निर्मळ आरिसां दिसे ।
    तेवीं बुद्धीचेनि विवेकवशें । आत्मा भासे नरदेहीं ॥५३॥
    तोंड हे तर स्वतःसिद्ध असतेच, पण निर्मळ आरसा असेल तरच ते त्यांत दिसेल; त्याचप्रमाणें बुद्धीला विवेक प्राप्त झाला म्हणजे नरदेहांत आत्मा भासू लागतो ५३.


    येचिविखींचा इतिहास जाण । तुज मी सांगेन पुरातन ।
    यदुअवधूतसंवादलक्षण । ज्ञानसाधन साधकां ॥५४॥
    ह्याविषयींचा एक जुना इतिहास आहे, तो मी आतां तुला सांगतो. यदु आणि अवधूत ह्या दोघांचा हा संवाद साधकांना ज्ञानसाधनरूप आहे ५४.


    अत्राप्युदाहरन्तीममितिहासं पुरातनम् ।
    अवधूतस्य संवादं यदोरमिततेजसः ॥ २४ ॥
    [श्लोक २४ ]- या संबंधात महात्मे हा एक प्राचीन इतिहास सांगतात हा इतिहास म्हणजे परम तेजस्वी अवधूत आणि राजा यदू यांच्यातील संवाद आहे. (२४)


    हरिखें म्हणतसे गोविंदु । उद्धवा आमुचा पूर्वज यदु ।
    तेणें ब्रह्मज्ञानासी संवादु । केला विशदु अवधूतासीं ॥५५॥
    श्रीकृष्ण आनंदानें म्हणाला, उद्धवा ! आमचा यदु म्हणून जो पूर्वज होऊन गेला, त्यानें अवधूताबरोबर ब्रह्मज्ञानासंबंधी सुंदर संवाद केला होता ५५.


    राजा यदु म्हणसी कैसा । क्षात्रसृष्टीचा सूर्यो जैसा ।
    राजा चंद्राच्या प्रकाशा । निजतेजवशा लोपितु ॥५६॥
    तो यदुराजा कसा होता म्हणशील, तर क्षत्रिय ज्ञातीतील जणूं काय सूर्यच; इतर नृपतिरूप चंद्राच्या प्रकाशाला तो आपल्या तेजानें दिपवीत असे ५६.


    तेणें गुरूचीं लक्षणें ऐकतां । सायुज्यमुक्ति आली हाता ।
    ते हे पुरातन कथा । तुज मी आतां सांगेन ॥५७॥
    त्यानें अवधूताकडून गुरूची लक्षणे श्रवण केल्यामुळे, सायुज्यता मुक्ति त्याच्या हाताला आली. तीच प्राचीन कथा आतां मी तुला सांगतों ५७.


    अवधूतं द्विजं कञ्चिच्चरन्तमकुतोभयम् ।
    कविं निरीक्ष्य तरुणं यदुः पप्रच्छ धर्मवित् ॥ २५ ॥
    [श्लोक २५ ]-धर्माचे मर्म जाणणार्‍या यदूने एकदा एक त्रिकालदर्शी, तरूण, अवधूत, ब्राह्मण निर्भयपणे विहार करीत असलेले पाहून त्यांना विचारले. (२५)


    कोणी एक अवधूतु । निजतेजें प्रकाशवंतु ।
    ब्रह्मानंदें डुल्लतु । यदूनें येतु देखिला ॥५८॥
    आत्मतेजानें प्रकाशणारा आणि ब्रह्मानंदानें डुलत असणारा कोणीएक अवधूत येत असलेला यदूनें पाहिला ५८.


    त्या अवधूताचें लक्षण । यदु निरीक्षी आपण ।
    देखिलें ब्रह्मसूत्रधारण । होय ब्राह्मण ब्रह्मवेत्ता ॥५९॥
    यदूनें त्या अवधूताच्या स्वरूपाचे बारीक निरीक्षण केले. त्यानें यज्ञोपवीत धारण केलेले त्याच्या दृष्टीस पडले त्यावरून तो ब्राह्मण असून ब्रह्मवेत्ता असावा अशी त्याची खात्री झाली ५९.


    ऐसा तो अवधूतु । निर्भय निःशंक वर्ततु ।
    यदु व्याहाळिये होता जातु । देखिला वनांतु सन्मुख ॥२६०॥
    यदु हा वनामध्यें क्रीडा करण्याकरतां गेला असतां, हा अवधूत निर्भय आणि निःशंकपणानें वागणरा त्याला समोरच येत असलेला दिसला २६०.


    आंतुला प्राण तत्त्वतां । बाहेर रिघों नेदी सर्वथा ।
    स्वभावें प्राणापानसमता । झाली न धरितां धारणा ॥६१॥
    आंतला प्राण तो बाहेर निवू देत नव्हता अशी प्राणापानाची समता, धारणा न धरतांच, त्याची आपोआप झालेली होती ६१.


    नवल तयाचें पाहणें । दृश्य दृश्यत्वें देखों नेणे ।
    झाला सर्वांगें देखणें । देखणेंपणें पाहातसे ॥६२॥
    त्याचे पाहणेही नवलाचेच होते. दृश्यपणानें दृश्य पाहाणे त्याला कळत नव्हते. तो सर्वांगानें देखणे झालेला असून द्रष्टेपणानेंच तो दृश्य पाहात असे ६२.


    मी एकु वनीं वसता । हेंही नाठवे त्याचिया चित्ता ।
    झाली सर्वत्र सर्वगतता । समसाम्यता समत्वें ॥६३॥
    मी एक वनांत फिरणारा अशी त्याच्या मनाला जाणीवच नव्हती. समदृष्टीच्या योगानें त्याला सर्वत्र व्यापकपणाच आलेला होता ६३.


    कर्म कार्य कर्ता जाण । अवघा जाहला तो आपण ।
    क्रियेनें वाहूनियां आण । निंबलोण जीवें केलें ॥६४॥
    कर्म, कार्य आणि कर्ता ही सारी तो आपण स्वतःच बनून राहिलेला होता. क्रियेनें शपथ घेऊन जिवाभावानें लिंबलोणच उतरलेले होते ६४.


    देहाचिया माथां । ठेविली होती अहंता ।
    तें देहमिथ्यात्व पावतां । समूळ अहंता पळाली ॥६५॥
    देहावर अहंता ठेवली होती, तो देह मिथ्या ठरतांच ती अहंता पळून गेली ! ६५,


    नित्यानित्य होमद्वारें । ब्रह्माग्नि प्रज्वळला एकसरें ।
    जाळूनि आश्रमांची चारी घरें । केलें खरें निराश्रमी ॥६६॥
    नित्यानित्यविवेकरूपी होमामुळें एकदम ब्रह्माग्नीच प्रज्वळित झाला. त्यानें चारही आश्रमांची घरे जाळून त्याला निराश्रमीच करून टाकले ६६.


    त्या आश्रमामाजीं होती । शास्त्रश्रवणविधिवादपोथी ।
    ते जळाली जी निश्चितीं । भस्म हातीं न लगेचि ॥६७॥
    त्या आश्रमामध्यें शास्त्रश्रवणविधीची पोथी होती ती जळून खाक झाली. तिची राखसुद्धा हाती लागली नाहीं ६७.


    विधिनिषेध पैजा । जळाली पंचायतनदेवपूजा ।
    होता संचितक्रियमाणपुंजा । तोही वोजा जळाला ॥६८॥
    विधिनिषेधाच्या पैजा व पंचायतन देवपूजा ह्यांची राखरांगोळी झाली. संचित-क्रियमाणकर्माची पुंजी होती तीही जळून खाक झाली ६८.


    यापरी तो अवधूतु । ब्रह्मानंदें जी डुल्लतु ।
    निजसुखें वेल्हावतु । देखिला येतु यदुरायें ॥६९॥
    ह्याप्रमाणें तो अवधूत ब्रह्मानंदानें डुलत असणारा व निजसुखानें झुलत राहणारा येत असलेला यदूनें पाहिला ६९.


    संकल्प-विकल्परहित । शुद्ध सर्वांगी विभूत ।
    यालागीं बोलिजे 'अवधूत' । येर्हलवीं विख्यात ब्राह्मणु ॥२७०॥
    सर्वसंकल्पविकल्परहितपणाची विभूति त्यानें सर्वांगाला लावलेली होती. म्हणूनच त्याला ' अवधूत' असे म्हणावयाचें; एरव्हीं तो ब्राह्मणच होता २७०.


    सभोंवता समस्तु । प्रपंच निजबोधें असे धूतु ।
    यालागीं बोलिजे 'अवधूतु' । येर्हरवीं विख्यातु ब्राह्मणु ॥७१॥
    सभोवती असलेला सारा प्रपंच त्यानें आत्मबोधानें धुऊन टाकला होता. म्हणूनही त्याला 'अवधूत' म्हणावें. एरव्हीं तो एक विख्यात ब्राह्मण होता ७१.


    अहं धुई तो 'अवधूतु' । तोचि योगी तोचि पुनीतु ।
    जो का अहंकारग्रस्तु । तोचि पतितु जन्मकर्मी ॥७२॥
    'अहं' जो धुतो तोच अवधूत, तोच योगी, आणि तोच पुनीत होय. जो अहंकारग्रस्त असतो तोच जन्मकर्मामध्यें पतित होतो म्हणून समजावे ७२.


    वार्धक्य यावें देहासी । तंव देहपण नाहीं देहापासीं ।
    रिगमु नव्हेच जरेसी । तारुण्यासी तें मूळ ॥७३॥
    त्या अवधूताच्या देहाला वार्धक्य यावे, तर देहाला मुळी देहत्वच नाही, तेव्हां वार्धक्य येणार कोठून ? वार्धक्याला मुळी शिरकावच नाहीं; व हेच तारुण्य कायम राहाण्याचे मूळ कारण होय ७३.


    आणिकही त्याचीं लक्षणें । नीच नवा बोधु मैळों नेणें ।
    भोगिजे नित्य नूतनपणें । परम तारुण्यें टवटवला ॥७४॥
    आणखीही त्याची लक्षणे आहेत. त्याचे नित्य नवें असणारे ज्ञान मळत नाहीं; तो तें नित्यनवेपणानेंच भोगीत असतो. म्हणून तो नेहमीं तारुण्यानें अगदी मुसमुसलेला होता ७४.


    निजबोधाचिया सत्ता । द्वैत जिंतिलें तत्त्वतां ।
    ऐसा निःशंकु विचरतां । भय सर्वथा त्या नाहीं ॥७५॥
    आत्मज्ञानाच्या सामर्थ्यानें त्यानें द्वैताला जिंकले असल्यामुळें तो असा निःशंकपणानें वावरत होता. त्याला भय म्हणून कोठेच कसलेही वाटत नव्हते ७५.


    ऐशीं लक्षणें निर्धारितां । अवधूत निजबोधें पुरता ।
    यदूसी उपजली विनीतता । श्रद्धा सर्वथा अनिवार ॥७६॥
    अशा प्रकारे अवधूताच्या लक्षणांचा निश्चय झाला व तो आत्मज्ञानानें पूर्ण आहे असे वाटले, त्यामुळें यदूच्या मनांत त्याच्याविषयीं पूज्यबुद्धि उत्पन्न होऊन त्याच्यावर अनिवार श्रद्धा बसली व नम्रपणा उत्पन्न झाला ७६.


    करूनि साष्टांग दंडवत । अतिनम्र श्रद्धायुक्त ।
    हात जोडूनि पुसत । प्रसन्न चित्त रायाचें ॥७७॥
    राजाचे चित्त प्रसन्न झाले व त्यानें त्यास साष्टांग दंडवत घालून अत्यंत नम्रतेनें भक्तिपूर्वक हात जोडून प्रश्न केला ७७.


    श्रीयदुरुवाच -
    कुतो बुद्धिरियं ब्रह्मन्नकर्तुः सुविशारदा ।
    यामासाद्य भवाल्लोकं विद्वांश्चरति बालवत् ॥ २६ ॥
    [श्लोक २६ ] - यदूने विचारले ब्रह्मन ! आपण काही कर्म तर करीत नाही, तरीपण आपल्याला ही चतुर बुद्धी कोठून प्राप्त झाली ? जिच्यामुळे आपण विद्वान असूनही लहान मुलासारखे जगामध्ये वावरत आहात. (२६)


    अपूर्व बुद्धि हे स्वामी । तुमचे ठायीं देखों आम्ही ।
    जे न लभे यमनियमीं । कर्मधर्मीं आचरतां ॥७८॥
    यदु म्हणाला, स्वामी ! धर्मकर्म आचरून किंवा यमनियम साधूनही जी बुद्धि प्राप्त व्हावयाची नाही, ती अपूर्व बुद्धि मला आपल्यामध्यें दिसून येत आहे ७८.


    दिसतोसी सर्वार्थी कुशळ । परी कांही न करूनि निश्चळ ।
    अकर्तात्मबोधें तूं केवळ । जैसें बाळ अहेतुक ॥७९॥
    आपण सर्व कर्मामध्यें तर कुशल दिसतां, परंतु कांहीं एक न करतां निश्चल असतां; आत्मज्ञानामुळें अकर्तात्मबोध आपल्या ठिकाणी बाणला आहे आणि त्यामुळेच अहेतुक बालकाप्रमाणे आपली स्थिती दिसून येते. ७९.


    तूं बालाऐसा वर्तसी । परी बालबुद्धि नाहीं तुजपासीं ।
    सर्वज्ञ सर्वथा होसी । ऐसें आम्हांसी दिसतसे ॥२८०॥
    आपण बालासारखे वागतां, पण बालबुद्धि मात्र आपणापाशीं नाहीं; आपण सर्वथा सर्वज्ञ आहां असें मला वाटते २८०.


    येवोनियां या लोकासी । पावोनियां नरदेहासी ।
    सार्थकता तुझ्याऐसी । आणिकापाशीं न देखों ॥८१॥
    ह्या मृत्युलोकांत येऊन नरदेह मिळून आपल्यासारखी त्याची सार्थकता केलेली इतरांपाशी दिसत नाहीं ८१.


    प्रायो धर्मार्थकामेषु विवित्सायां च मानवाः ।
    हेतुनैव समीहन्ते आयुषो यशसः श्रियः ॥ २७ ॥
    [श्लोक २७] - साधारणतः असे दिसते की, माणसे आयुष्य, यश, संपत्ती किंवा मोक्ष इत्यादींच्या इच्छा मनात धरूनच धर्म, अर्थ, काम किंवा तत्त्वजिज्ञासामध्ये प्रवृत्त होतात. (२७)


    प्रायशा ये लोकीं लोक । धर्मअर्थकामकामुक ।
    येचिविखीं ज्ञान देख । आवश्यक करिताति ॥८२॥
    ह्या लोकांतील लोक बहुतकरून धर्मार्थकामाचीच इच्छा करणारे आहेत, म्हणून त्या विषयांचेच ज्ञान ते अवश्य प्राप्त करून घेतात ८२.


    आम्ही स्वधर्म करितों म्हणती । स्नानसंध्येची कीर्ति मिरविती ।
    शेवटीं गायत्रीचें फळ देती । अर्थप्राप्तीलागोनी ॥८३॥
    आम्ही स्वधर्म पाळतो म्हणतात, स्नानसंध्येची कीर्ति मिरवतात आणि शेवटी द्रव्यासाठी गायत्रीचें फळ देऊन टाकतात ! ८३.


    वेदोक्त आम्ही करितों याग । संस्थापितों वेदमार्ग ।
    शेखीं तो करिती जीविकायोग । स्वर्गभोग वांछिती ॥८४॥
    आम्ही वेदोक्त यज्ञ करतो, वेदमार्गाची स्थापना करतो, असें म्हणून शेवटी इच्छा धरून ते एक उदरनिर्वाहाचेच साधन करून सोडतात ८४.


    एक म्हणती आम्ही स्वकर्मक । कुश मृत्तिका नाशिती उदक ।
    समयीं आलिया याचक । इवलीसी भीक न घालिती ॥८५॥
    कोणी आम्ही स्वकर्मनिष्ठ आहोत असे म्हणून दर्भ, मृत्तिका व पाणी ह्यांचा नाश करतात; पण वेळेला एखादा याचक आला असता त्याला मूठभर भीकही घालीत नाहीत ! ८५.


    दांभिक वाढवावया स्फीती । वैष्णवदीक्षा अवलंबिती ।
    देवपूजा झळफळीत दाविती । शंख लाविती दों हातीं ॥८६॥
    ढोंगी लोक आपला लौकिक वाढविण्यासाठी वैष्णवदीक्षा घेतात, आणि झकपक देवपूजा करून दोहों हातांनी शंख वाजवून दाखवितात ! ८६.


    आयुष्यदानी पुण्यपुरुष । आम्ही चिकित्सक अहिंस ।
    स्थावर जंगम जीव अशेष । मारूनियां यश मिरविती ॥८७॥
    आयुष्य दान देणारे पुण्यपुरुष आपल्याला वैद्य व अहिंसक म्हणवितात; परंतु स्थावरजंगमादि सर्व जीवांच्या हत्या करून यशाचे स्तोम मिरवितात ८७.


    यश वाढवावया कारण । तुळापुरुष करिती दान ।
    देहो मूत्रविष्ठें परिपूर्ण । धन त्यासमान जोखिती ॥८८॥
    आपली कीर्ति वाढवावी म्हणून कोणी कोणी तुळापुरुषदान करतात; ते लोक मळमूत्रानें भरलेला देह द्रव्याबरोबर तोलतात ! ८८.


    परी परमार्थाचिया चाडा । कोणी वेंचीना कवडा ।
    भूल कैशी पडली मूढां । स्वार्थ रोकडा विसरले ॥८९॥
    परंतु परमार्थाच्या इच्छेनें कोणी कवडीसुद्धा खर्चीत नाहीत. मूर्ख लोकांना ही कशी भुरळ पडते पाहा ! ते खरा स्वार्थ विसरून जातात ! ८९.


    पूर्वीं अदृष्टीं नाहीं प्राप्ती । ते श्रीकामा उपास्ती करिती ।
    श्रियेचा स्वामी श्रीपती । त्यातें न भजती अभाग्य ॥२९०॥
    पूर्वी पेरून ठेवलेला द्रव्ययोग नशिबांत नसलेले लोक लक्ष्मीची उपासना करतात; पण लक्ष्मीचा पति जो श्रीहरि त्याचे ते अभागी भजन करीत नाहींत २९०.


    लक्ष्मी विश्वगुरु हरीची पत्‍नी । तीतें जो तो राखे अभिलाषूनी ।
    नेदिती हरीची हरिलागोनी । त्यातें पतनीं हरि पचवी ॥९१॥
    विश्वाचा गुरु जो श्रीहरि, त्याची लक्ष्मी ही पत्नी होय. तिचा जो तो अभिलाष करून राखून ठेवतो. हरीची पत्नी हरीला देत नाहीत. त्यांना हरि नरकांत घालतो ९१.


    रोगत्यागें आयुष्य मागती । यालागीं सविता उपासिती ।
    देहो नश्वर हें नाठवे चित्तीं । पडली भ्रांती निजपदा ॥९२॥
    रोगाचा नाश होऊन आयुष्य मिळावे म्हणून सूर्याची उपासना करतात; परंतु देह हा नश्वर आहे, ह्याची आठवणही नसते. त्यामुळें आत्मस्वरूपाची विस्मृति पडते ! ९२.


    एवं आयुष्य-यश-श्रीकामीं । समस्त भजतां देखों आम्ही ।
    परी नवल केलें तुवां स्वामी । परब्रह्मीं निजबोधु ॥९३॥
    अशा प्रकारे आयुष्याकरतां, कीर्तीकरतां व द्रव्याकरतांच लोक भजनी लागलेले आम्ही पाहातों; परंतु स्वामी ! आपले मोठे नवल दिसते की, आपण परब्रह्मस्वरूपांत संलग्न होऊन राहिला आहां ९३.


    विषयबळ अलोलिक । मिथ्या भ्रमें भ्रमले लोक ।
    ज्ञानसाधनें साधोनि देख । विषयसुख वांछिती ॥९४॥
    विषयाचा जोर विलक्षण असतो. त्यामुळें मिथ्या भ्रमानें लोक भ्रमले आहेत. ज्ञानाची साधनें साध्य करून विषयसुखाची इच्छा करतात ! ९४.


    वेदांतवार्तिकवाक्स्फू र्ती । अद्वैत ब्रह्म प्रतिपादिती ।
    शेखीं पोटासाठीं विकिती । नवल किती सांगावें ॥९५॥
    वेदांत-वार्तिकाच्या वाक्पटुत्वानें अद्वैतब्रह्माचें प्रतिपादन करतात, पण शेवटी पोटासाठी त्या ज्ञानाचा ते विक्रा करतात, त्याचे आश्चर्य किती वर्णावें बरें ? ९५.


    एक म्हणविती योगज्ञानी । वायुधारणा दाविती जनीं ।
    टाळी लावूनि बैसती ध्यानीं । जीविका मनीं विषयांची ॥९६॥
    कोणी आपल्याला योगज्ञानी म्हणवून लोकांमध्यें वायु कोंडून दाखवितात व डोळे मिटून ध्यानस्थ बसतात; पण मनांत मात्र विषयाचे चिंतन ! ९६.


    ऐसे विविदिषा लोक । साधनें साधूनि झाले मूर्ख ।
    तुवां केलें जी अलोलिक । आत्मसुख साधिलें ॥९७॥
    ह्याप्रमाणें ज्ञानेच्छु लोक अनेक प्रकारची साधनें साध्य करून मूर्ख बनतात; पण आपण मात्र आत्मसुखच संपादन केलें हें मात्र अलौकिक होय ९७.


    ऐसें स्वामी अवधूता । तुवां तृणप्राय केलें जीविता ।
    तुच्छ करोनि लोकां समस्तां । निजात्महिता मीनलासी ॥९८॥
    ह्याप्रमाणें हे अवधूत स्वामी ! आपण जीविताला तृणप्राय करून सोडले असून व सर्व लोकांना तुच्छ करून अगदी आत्महितालाच गांठ घातली आहे ! ९८.


    निजानंदें निवालासी । अंतरी शीतळ झालासी ।
    ऐसें दिसताहे आम्हांसी । उपलक्षणेंसी परियेसीं ॥९९॥
    आपण आत्मानंदानें तृप्त होऊन हृदयांत शांत झाला आहां, असें आम्हांला दिसते. त्याची लक्षणेही ऐकावीत ९९.


    त्वं तु कल्पः कविर्दक्षः सुभगोऽमृतभाषणः ।
    न कर्ता नेहसे किञ्चिज्जडोन्मत्तपिशाचवत् ॥ २८ ॥
    [श्लोक २८] - परंतु आपण कर्म करण्यासाठी समर्थ, विद्वान, निपुण, सुंदर आणि अमृतमधुर बोलणारे आहात असे असूनही आपण वेडा, उन्मत्त किंवा पिशाच्च यांच्यासारखे राहाता काही करीत नाही की काही इच्छित नाही. (२८)


    सर्वज्ञज्ञाता तूं होसी । तें ज्ञातपण दिसों न देसी ।
    कांहीं करिसी ना वांछिसी । जडत्वें दाविसी निजशांती ॥३००॥
    आपण सर्वज्ञ आहां; परंतु ते ज्ञातेपण आपण दिसू देत नाही. आपण काही करीतही नाहीं व कांहीं इच्छीतही नाही. आपली आत्मशांति जडत्वाची आहे असे लोकांस दाखवितां ३००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...