मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २६ ओव्या ४०१ ते ५०२

    निरपेक्षा निजप्रीतीं । भावें करितां अनन्य भक्ती ।

    भक्तांसी स्वानंदाची प्राप्ती । भजनस्थितीमाझारीं ॥ १ ॥
    निरपेक्ष आणि प्रेमपूर्वक भक्तीने माझे अनन्य भजन केले असता त्या भजनस्थितीमध्येच भक्तांना स्वानंदाची प्राप्ति होते १.


    जेवीं गर्भेंसीं वर्ते गुर्विणी । कां तरुणपणेंसीं तरुणी ।
    तेवी स्वानंदाच्या पूर्णपणें । माझे निजभजनीं मद्भक्त ॥ २ ॥
    ज्याप्रमाणे गरोदर स्त्री गर्भासह वागते, किंवा तरुणी तारुण्यासह वागते, त्याप्रमाणे आत्मानंदाच्या पूर्णपणानिशी माझे भक्त माझ्या भजनांत निमग्न असतात २.


    तेथ सगुण अथवा निर्गुण । उभयरूपें मीचि ब्रह्म पूर्ण ।
    तेथ भावें करितां भजन । ब्रह्मसंपन्न मद्भक्त ॥ ३ ॥
    त्या वेळी सगुण अथवा निर्गुण ह्या दोन्ही रूपांनी परिपूर्ण ब्रह्म मीच असतो. त्यामुळे भक्तीनें भजन केले असता माझे भक्त ब्रह्मसंपन्न होतात ३.


    भावें करितां माझी भक्ती । भाविकां कोण पां अप्राप्ती ।
    विवेकवैराग्यज्ञानसंपत्ती । पायां लागती मद्भक्तांच्या ॥ ४ ॥
    एकनिष्ठपणे माझी भक्ति केली असता भाविकांना न मिळेल असें काय आहे ? विवेक, वैराग्य, ज्ञानसंपत्ति ही माझ्या भक्तांच्या पायीं लागतात ४.


    माझे निजभजनें तुटे भेद । स्वयेंचि प्रकटे अभेदबोध ।
    तेणें वोसंडे परमानंद । स्वानंदकंद स्वयंभ ॥ ५ ॥
    माझ्या भजनाने भेदभाव नाहीसा होतो, तेव्हां अभेदज्ञान तेथें आपोआपच प्रगट होते. त्यामुळे परमानंद भरून जाऊन तो स्वतःसिद्ध स्वानंदाचा गड्डाच बनून राहतो ५.


    माझे स्वरूपा नाहीं अंत । यालागीं नांवें मी 'अनंत' ।
    बाप भक्तभाव समर्थ । तिहीं मी अनंत आकळिलों ॥ ६ ॥
    माझ्या ' स्वरूपाला अंत नाही, म्हणूनच मला ' अनंत ' असें नाव आहे. परंतु भक्ताचा भाव इतका समर्थ व श्रेष्ठ असतो की, तो मला अनंतालाही बांधून ठेवू शकतो ६.


    ऐसें ज्यांचे प्रेम गोड । त्यांचे सेवेचें मज कोड ।
    त्यांचें सोशीं मी सांकड । निचाडा चाड मज त्यांचि ॥ ७ ॥
    असे ज्यांचे प्रेम गोड, त्यांच्या सेवेची मला आवड असते. त्यांचे संकट मी सोसतों, आणि मला निरिच्छालाही त्यांची इच्छा होते ७.


    देव सप्रेमें भुलला । म्हणे मी त्यांचाचि अंकिला ।
    जीवेंभावें त्यांसी विकिला । मी त्यांचा जाहला तिहीं लोकीं ॥ ८ ॥
    देव प्रेमाला भुलला आणि म्हणाला की, मी त्यांचाच अंकित आहे. मी जीवाभावाने त्याला विकलों आहे. आणि साऱ्या त्रिभुवनांत मी त्यांचाच होऊन राहिलों आहे ८.


    एथवरी भक्तां माझी प्राप्ती । अवचटें झाल्या सत्संगती ।
    मा सद्भावें जे साधु सेविती । त्यांची निजगती मज न बोलवे ॥ ९ ॥
    अकस्मात सत्संगति घडली, तर भक्तांना माझी एवढी प्राप्ति होते, मग अनन्य भक्तीने जे साधूची सेवा करतात, त्यांची गति मला शब्दांनी वर्णनच करता येत नाही ९.


    ऐसा संतमहिमा वानितां । धणी न पुरे श्रीकृष्णनाथा ।
    तोचि संतमहिमा मागुता । होय वानिता चौं श्लोकीं ॥ ४१० ॥
    असा संतांचा महिमा वर्णन करतांना श्रीकृष्णाची तृप्ति होईना, म्हणून तोच संतमहिमा पुन्हा चार श्लोकांनी वर्णन करीत आहेत ४१०.


    यथोपश्रयमाणस्य भगवन्तं विभावसुम ।
    शीतं भयं तमोऽप्येति साधून् सम्सेवतस्तथा ॥ ३१ ॥
    [श्लोक ३१] ज्याने अग्नीचा आश्रय घेतला, त्याला थंडी किंवा अंधार यांची काळजी नसते, त्याप्रमाणे जे संतांना शरण जातात, त्यांची जडता, संसारभय आणि अज्ञान नाहीसे होते. (३१)


    जेवीं वैश्वानर तेजोमूर्ती । त्याची सेवा जे करूं जाणती ।
    त्यांचें शीततमभयनिवृत्ती । तो करी निश्चितीं उद्धवा ॥ ११ ॥
    उद्धवा ! तेजोमूर्ति अग्नीची सेवा जे करूं जाणतात, त्यांचे थंडी, अंधार व भय तो ( अग्नि) निवारण करतो ११.


    शीत निवारी संनिधी । तम निवारी तेजोवृद्धी ।
    भय निवारी भगवद्बुद्धी । जेवीं त्रिशुद्धी विभावसु ॥ १२ ॥
    तो जवळ असला म्हणजे थंडी नाहीशी होते, त्याच्या तेजोवृद्धीने अंधार नाहीसा होतो, आणि त्याच्यावर ईश्वरभावना धरल्याने भय निवारण होते १२.


    तैशीच जाण सत्संगती । संगें त्रिविध ताप निवारती ।
    तेचि अर्थींची निजयुक्ती । ऐक उपपत्ती उद्धवा ॥ १३ ॥
    त्याप्रमाणेच सत्संगति आहे असें तूं समज. त्या संगतीने त्रिविध तापांचे निवारण होते, हीच गोष्ट उद्धवा ! तुला स्पष्ट करून सांगतो ऐक १३.


    शीत म्हणिजे द्वंद्वबाधु । तो समूळ निवारिती साधु ।
    तम म्हणिजे अज्ञानांधु । त्यासी करिती प्रबोधु निजज्ञानें ॥ १४ ॥
    थंडी म्हणजे द्वंद्वापासून होणारी पीडा; ती साधु समूल नाहीशी करून टाकतात. तम म्हणजे अज्ञानांधकार ; याचाही आत्मज्ञानोपदेशाने नाश करतात १४.


    भयांमाजीं श्रेष्ठ मरण । भय निवारी साधु विचक्षण ।
    निवारिती जन्ममरण । कृपाळु पूर्ण दीनांचे ॥ १५ ॥
    भयामध्ये मरणासारखं दुसरें भय नाहीं; तें ज्ञानी साधु निवारण करतात. इतकेच नव्हे, तर जन्ममरणही दूर करतात. कारण, ते दीनांचे पूर्ण दयाळू आहेत १५.


    अग्नीसमान म्हणों साधु । हाही बोल अतिअबद्धु ।
    अग्नीहूनि अधिक साधु । तोचि प्रबोधु हरि सांगे ॥ १६ ॥
    आतां साधु हे अग्नीसारखे आहेत, असे म्हणणेही असंबद्ध आहे ; कारण साधु हे अग्नीहूनही श्रेष्ठ आहेत. ते कसे तें श्रीकृष्ण सांगतात १६.


    अग्नीपाशीं प्रबळ धूम । साधु निष्क्रोध निर्धूम ।
    अग्नि पोळी अधमोत्तम । साधु सर्वसम सुखदाते ॥ १७ ॥
    अग्नीपाशी भयंकर धूर असतो आणि साधु क्रोधरहित व धूमरहित असतात. अग्नि हा अधम व उत्तम या दोघांनाही पोळतो; परंतु साधु हे सर्वांना सारखेच सुखदाते असतात १७.


    साधूंची धन्य संगती । संगे जडजाड्य तोडिती ।
    कर्माचें कर्मत्व मोडिती । बुडत्या तारिती निजसंगें ॥ १८ ॥
    साधूची संगति धन्य धन्य होय. ते आपल्या संगतीने जडांचे जाड्य नाहींसें करतात. ते कर्माचे, कर्मत्व मोडतात आणि निजसंगतीने बुडत्याला तारतात १८.


    निमज्ज्योन्मज्जतां घोरे भवाब्धौ परमायनम् ।
    सन्तो ब्रह्मविदः शान्ता नौर्दृढेवाप्सु मज्जताम् ॥ ३२ ॥
    [श्लोक ३२] जशी पाण्यात बुडणार्‍या लोकांना बळकट नौकाच आश्रय असते, त्याप्रमाणे जे या घोर संसारसागरात गटांगळ्या खातात, त्यांच्यासाठी ब्रह्मवेत्ते शांत संतच आश्रय होत. (३२)


    प्रतिक्षणीं अधिक वृद्धी । अमर्याद वाढे भवाब्धी ।
    तेथ उबकल्या चुबकल्या त्रिशुद्धी । अधर्मबुद्धि जनांसी ॥ १९ ॥
    संसारसागराला क्षणोक्षणी भरती येऊन तो अमर्याद वाढत असतो. त्यांत गटंगळ्या खाता खातां लोकांना अधर्मबुद्धीच उत्पन्न होते १९.


    अधर्में निमज्जन नरकांत । स्वधर्में उन्मज्जन स्वर्गांत ।
    ऐसे भोगिती आवर्त । स्वर्गनरकांत संसारी ॥ ४२० ॥
    अधर्माने नरकांत बुडतात व स्वधर्माने स्वर्गात चढतात. ह्याप्रमाणे संसारी लोक स्वर्गात व नरकांत भोंवऱ्याप्रमाणे गिरक्या खात असतात ४२०.


    यापरी संसारी जन । पावतां उन्मज्जन निमज्जन ।
    त्यासी तरावया भवाब्धि जाण । साधु सज्जन दृढ नाव ॥ २१ ॥
    अशा रीतीने संसारी लोक संसारसागरामध्ये खालवर गटंगळ्या खात असतां त्यांना तारण्यास साधुसज्जन हीच मजबूत नाव आहे २१.


    पडल्या जळार्णवामाझारीं । जेवीं अच्छिद्र नाव तारी ।
    तेवीं बुडतां भवसागरीं । सुखरूप तारी सज्जननाव ॥ २२ ॥
    पाण्याच्या समुद्रात पडले असता त्यांतून छिद्ररहित नौकाच तारते, त्याप्रमाणे संसारसागरामध्ये बुडणाऱ्यांनाही सज्जनरूप नौकाच सुखाने तारून नेते २२.


    कामक्रोधरहित शांती । हेचि नावेची अच्छिद्र स्थिती ।
    ब्रह्मज्ञानें सपुरती । सुखरूप निश्चितीं या हेतु ॥ २३ ॥
    कामक्रोधरहित शांति हाच नावेचा अछिद्रपणा होय. ती ब्रह्मज्ञानाने बळकट असल्यामुळे खरी सुखरूप आहे २३.


    कामक्रोधादि सावजांसी । बळें घ्यावया आंविसासी ।
    कदा न येववे नावेपाशीं । संगें सकळांसी तारक ॥ २४ ॥
    कामक्रोधादि भयंकर जलचरांना आमिष खाण्याकरितां ह्या नावेजवळ कधीच येववत नाही. तात्पर्य, सत्संग हा सर्वांना तारक आहे २४, 


    नवल ये नावेची स्थिती । जुनी नव्हे कल्पांतीं ।
    बुडवूं नेणे धारावर्तीं । तारक निश्चितीं निजसंगें ॥ २५ ॥
    या नावेची एक गोष्ट मोठी अपूर्व आहे. ती ही की, ती कल्पांतीही जुनी म्हणून होतच नाही. आणि मोठ्या धारेतल्या भोवऱ्यातही तिला बुडविता येत नाही. ती आपल्या संगतीने सर्वानाच तारते २५.


    परी ये नावेची नवल गती । वरी चढले ते बुडती ।
    तळीं राहिले ते तरती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ २६ ॥
    पण उद्धवा ! या नावेचा आणखी एक चमत्कार आहे. तो हा की, जे ह्या नावेच्या 'वर' चढतात ते बुडतात, आणि ' तळाला' राहतात ते तरतात, हे तूं लक्षात ठेव २६ 


    दीनांचा कळवळा पहा हो । हाचि मुख्यत्वें तरणोपावो ।
    त्या कळवळ्याचा अभिप्रावो । स्वयें देवो सांगत ॥ २७ ॥
    येथे पहा ! दीनांचा कळवळा हाच मुख्यत्वे तरणोपाय आहे. त्या कळवळ्यांतील हेतु स्वतः श्रीकृष्ण सांगतात २७.


    अन्नं हि प्राणिनां प्राण आर्तानां शरणं त्वहम् ।
    धर्मो वित्तं नृणां प्रेत्य सन्तोऽर्वाग्बिभ्यतोऽरणम् ॥ ३३ ॥
    [श्लोक ३३] जसे अन्नच प्राण्यांचे प्राण आहे, दीनांचा रक्षण करणारा मी आहे, माणसांचे परलोकामध्ये धर्म हेच धन आहे, त्याचप्रमाणे संसारामुळे भयभीत झालेल्यांसाठी संतजनच रक्षणकर्ते आहेत. (३३)


    जेवीं अन्नेवीण प्राण । सर्वथा न वांचती जाण ।
    प्राण्यांचें प्राणपोषण । करावया सामर्थ्य पूर्ण अन्नीं नांदे ॥ २८ ॥
     अन्नाशिवाय प्राण कधीच वाचत नाहीत, कारण प्राण्यांच्या प्राणांचे पोषण करण्याचे पूर्ण सामर्थ्य अन्नामध्येच असते २८.


    जोडली धर्माची संपत्ती । ते इहलोकीं होय रक्षीती ।
    तेचि धर्मधन देहांतीं । उत्तम गतिदायक ॥ २९ ॥
    धर्माने मिळविलेली संपत्ति ह्या लोकामध्ये आपले संरक्षण करते. तेंच धर्मरूप धन देहांतीही उत्तम गतिदायक असते २९.


    संसारीं पीडिले दारुण । त्रिविध तापें तापले पूर्ण ।
    ऐशिया शरणागता शरण्य । मी नारायण रक्षिता ॥ ४३० ॥
    संसारामध्ये अतिशय गांजलेल्या आणि त्रिविध तापाने तापलेल्या अशा शरणागतांना आश्रयस्थान असा मीच एक नारायण असून त्यांचे संरक्षण करणारा होतो ४३०.


    माझें करितां नामस्मरण । सहजें निवारे जन्ममरण ।
    त्या मज रिघालिया शरण । बाधी दुःख कोण बापुडें ॥ ३१ ॥
    माझें नामस्मरण केले असतां जन्ममरण सहज दूर होते; त्या मला शरण आल्यावर बिचारे कोणतें दुःख पीडा देणार ? ३१.


    दुःखभय न पावतां आधीं । जिंहीं साधु सेविले सद्बुद्धीं ।
    त्यांसी भवभयाची आधिव्याधी । जाण त्रिशुद्धी बाधिना ॥ ३२ ॥
    दुःखाचे भय प्राप्त होण्यापूर्वीच जे सदबुद्धीने साधूची सेवा करतात, त्यांना संसारभयाची आधिव्याधि मुळीच बाधत नाही ३२.


    प्राणियांसी होतां पतन । भाग्यें भेटल्या सज्जन ।
    निवारूनि अधोगमन । जन्ममरण छेदिती ॥ ३३ ॥
    प्राण्याला पतन घडले आणि तेथे सुदैवाने सज्जनांची गांठ पडली, तर अधोगतीला निवारण करून जन्ममरणालाही ते छेदून टाकतात ३३.


    संसार तरावया जाण । सत्संगतीचि प्रमाण ।
    त्यांचे भावें धरितां चरण । दीनोद्धरण त्यांचेनी ॥ ३४ ॥
    संसारांतून तरून जाण्याला सत्संगति हाच खरा आधार आहे. संतांचे भक्तिभावाने चरण धरले असता त्यांच्याकडून दीनांचा उद्धार होतो ३४.


    सन्तो दिशन्ति चक्षूंषि बहिरर्कः समुत्थितः ।
    देवता बान्धवाः सन्तः सन्त आत्माहमेव च ॥ ३४ ॥
    [श्लोक ३४] जसा सूर्य उदय पावून लोकांच्या डोळ्यांना पाहाण्याची शक्ती देतो, त्याप्रमाणे संतपुरूष स्वतःला आणि भगवंतांना पाहाण्याची दृष्टी देतात संत हे अनुग्रहशील देवता आहेत संत आपले हित इच्छिणारे सुहृद आहेत संत आपले प्रियतम आत्मा आहेत किंबहुना संत म्हणजे मीच आहे. (३४)


    जेवीं आंधारेंसीं सगळी राती । निजतेजें निरसी गभस्ती ।
    तेवीं सत्संगसूर्यप्राप्ती । अविद्येची निश्चितीं निरसी निशा ॥ ३५ ॥
    ज्याप्रमाणे अंधारासहवर्तमान सगळी रात्र सूर्य आपल्या तेजाने नाहीशी करून टाकतो, त्याप्रमाणे सत्संगरूपी सूर्य उगवला की, तो अविद्येची रात्र निश्चयाने नाहींशी करून टाकतो ३५.


    बाह्य उगवल्या गभस्ती । चोरभयाची होत निवृत्तीं ।
    तेवीं जोडल्या सत्संगती । भवभय कल्पांतीं असेना ॥ ३६ ॥
    बाहेर सूर्योदय झाला की, चोराचे भय दूर होते, त्याप्रमाणे सत्संगति प्राप्त झाल्याने संसाराचे भय कल्पांतीही उरत नाही ३६.


    बाह्य सूर्योदयकाळीं । पक्षी सांडिति आविसाळीं ।
    सत्संगसूर्याचे मेळीं । देहाचीं आविसाळीं सांडिती जीव ॥ ३७ ॥
    बाहेरचा सूर्योदय झाला म्हणजे पक्षी आपली घरटी सोडून देतात, त्याचप्रमाणे सत्संगाचा सूर्योदय झाला म्हणजे जीव आपली देहरूप घरटी सोडून देतात (देहाचा अभिमान सोडतात) ३७.


    बाह्य सूर्याच्या किरणीं । हर्षें विकासे कमळिणी ।
    सत्संगसूर्याचे मिळणीं । निर्विकल्प कमळणी विकासे ॥ ३८ ॥
    बाहेरच्या सूर्यकिरणांनी कमलिनी हर्षानें विकसित होतात, त्याप्रमाणे सत्संगरूपी सूर्याच्या प्रकाशाने निर्विकल्प कमलिनी प्रफुल्लित  होते ३८.


    सूर्य उगवलिया गगनीं । चक्रवाकें मिळती मिळणीं ।
    तेवीं सत्संग पावोनि । जीव शिव दोनी एकवटती ॥ ३९ ॥
    आकाशांत सूर्योदय झाला म्हणजे चक्रवाक पक्ष्यांच्या नरमादीची भेट होते, त्याप्रमाणे सत्संग प्राप्त झाला असतां जीव आणि शिव हे दोन्ही एक होतात ३९.


    बाह्य सूर्याचे पहांटेसी । पांथिक चालती स्वग्रामासी ।
    सत्संगसूर्याचे प्रकाशीं । मुमुक्षु निजधामासी पावती ॥ ४४० ॥
    बाह्य सूर्याची पहाट झाली म्हणजे वाटसरू आपापल्या गांवचा मार्ग चालू लागतात, त्याप्रमाणे सत्संगसूर्याचा प्रकाश होतांच मुमुक्षु निजधामाला पावतात ४४०.


    बाह्य सूर्याचे उदयस्थितीं । कर्माची चाले कर्मगती ।
    सत्संगसूर्याचे संगतीं । निष्कर्मप्रवृत्ति प्रवर्ते ॥ ४१ ॥
    बाह्य सूर्याचा उदय झाला म्हणजे कर्माची गति सुरू होते, त्याप्रमाणे सत्संगसूर्याच्या संगतीने निष्कर्मप्रवृत्ति सुरू होते ४१.


    सूर्यबिंबाचे उदयसंधी । अर्घ्यदान दीजे वेदविदीं ।
    सत्संगसूर्याचे संबंधीं । दीजे देहबुद्धी तिलांजळी ॥ ४२ ॥
    सूर्यबिंबाच्या उदयाच्या संधीला वेदज्ञलोक अर्घ्यदान देतात, त्याप्रमाणे सत्संगसूर्याचा संबंध घडतांच मुमुक्षु देहबुद्धीला तिळांजळी देतात ४२.


    सूर्य‌उदयचिया प्राप्ती । याज्ञिक होमातें हविती ।
    तेवीं सत्संगसूर्यस्थिती । अहंता हविती ज्ञानाग्नीं ॥ ४३ ॥
    सूर्योदय झाला म्हणजे याज्ञिक लोक होमात आहुति देतात, त्याप्रमाणे सत्संगरूप सूर्योदय झाला म्हणजे मुमुक्षु लोक ज्ञानाग्निमध्ये अहंतेची आहुति देतात ४३.


    सूर्य उगवूनि आकाशीं । जगाची जड निद्रा निरसी ।
    संत उगवूनि चिदाकाशीं । जीव चित्प्रकाशीं प्रबोधी ॥ ४४ ॥
    सूर्य आकाशात उगवून जगाची जड झोंप दूर करतो; संत हे चिदाकाशामध्ये उदय पावून जीवांना चित्प्रकाशाने जागृत करतात ४४.


    हो कां साधु सूर्यासमान । हें बोलणें निलाग हीन ।
    सूर्यो पावे अस्तमान । साधु प्रकाशमान सर्वदा ॥ ४५ ॥
    याप्रमाणे साधु हे सूर्यासारखे आहेत म्हणावे, पण हे म्हणणेही निखालस गौण होय. कारण, सूर्य हा अस्ताला जात असतो, पण साधु हे सदासर्वदा प्रकाशमानच असतात ४५.


    सूर्यासी आच्छादी आभाळ । साधु सदा निजनिर्मळ ।
    सूर्यासी सदा भ्रमणकाळ । साधु अचंचळ भ्रमणरहित ॥ ४६ ॥
    सूर्याला अभ्रे झांकू शकतात, पण साधु हे जगामध्ये सदासर्वदा निर्मळच असतात. सूर्याला सर्वकाळ फिरत रहावे लागते, पण साधु हे न फिरतां अढळ असेच असतात ४६.


    ग्रहणकाळाचा लवलाहो । पावतां सूर्यातें ग्रासी राहो ।
    साधु ग्रहांचा पुसोनि ठावो । स्वानंदें पहा हो नांदती ॥ ४७ ॥
    ग्रहणाची वेळ आली असतां सूर्याला राहु ग्रासून टाकतो, पण साधु ग्रहांचा ठावठिकाण नाहींसा करून आत्मानंदांतच राहतात ४७.


    दुई दाटतां प्रबळ । तेणें आच्छादे रविमंडळ ।
    तम धूम मोहपडळ । साधूंसी अळुमाळ बाधीना ॥ ४८ ॥
    दाट धुके पडले असतां रविमंडळ झांकून जाते; परंतु साधूंना अंधार, धुके किंवा मोहपटल यत्किंचितही बाधत नाही ४८.


    सूर्य निजकिरणें सर्वांतें तावी । साधु निजांगें जग निववी ।
    सूर्य सर्वांतें क्षयो दावी । साधु अक्षयी करी निजबोधें ॥ ४९ ॥
    सूर्य आपल्या किरणांनी सर्वांना ताप देतो पण साधु निजांगाने जगाला शांत करतात. सूर्य हा सर्वांना आयुष्यक्षय दाखवितो, पण साधु आत्मोपदेशाने सर्वाना अक्षय करून सोडतात ४९.


    सूर्यो साह्य झालिया दृष्टीं । दृश्याकारें उघडे सृष्टी ।
    सत्संग साह्य झालिया दृष्टीं । चिन्मात्रें सृष्टी ठसावे ॥ ४५० ॥
    सूर्य दृष्टीला सहाय झाला असता दृश्याकाराने सृष्टि दिसू लागते; आणि सत्संग दृष्टीला सहाय झाला असतां चिन्मात्रस्वरूपाने सृष्टीची स्थिति ठसते ४५०.


    विवेकें विचारितां देख । सूर्याहूनि साधु अधिक ।
    साधु धरातळीं ज्ञानार्क । भवाब्धितारक निजसंगियां ॥ ५१ ॥
    ह्याप्रमाणे विचार करून पाहिले असतां साधु हे सूर्याहून श्रेष्ठ आहेत. साधु हे पृथ्वीवरचे ज्ञानसूर्य असून आपल्या संगतीने संसारीजनांना संसारांतून तारणारे आहेत ५१.


    पृथ्वीतळीं देवता साधु । साधु दीनांचे सखे बंधु ।
    साधुरूपें मी परमानंदु । जाण प्रसिद्ध परमात्मा ॥ ५२॥
    मृत्युलोकावर साधु हेच खरे देव आहेत; साधु हे दीनांचे मित्र व सखे बंधु आहेत. मी परमानंदस्वरूप प्रसिद्ध जो परमात्मा, तोच साधुरूपाने जगांत नांदत आहे ५२.


    देवां दीजे बळिअवदान । तेव्हां देवा होती प्रसन्न ।
    कृपातारक निजसज्जन । दयाळु पूर्ण दीनांचे ॥ ५३ ॥
    देवांना बलिप्रदान द्यावे, तेव्हांच देव प्रसन्न होतात; परंतु सज्जन पूर्ण दीनदयाळू असल्यामुळे ते कृपेनेंच तारणारे आहेत ५३.


    सुहृद सखे सगोत्र बंधु । द्रव्यलोभें भजनसंबंधु ।
    निर्लोभें कृपाळू साधु । सखे बंधु दीनांचे ॥ ५४ ॥
    इष्ट, मित्र, भाऊबंद, बंधु वगैरे केवळ द्रव्यलोभानेच आप्तांच्या भजनी लागणारे असतात; परंतु साधु हे निर्लोभी  असून कृपाळू असल्याने दीनांचे खरे मित्र व बंधु आहेत ५४.


    संत केवळ कृपेचे दीप । संत ते माझें निजस्वरूप ।
    यालागीं सत्संगें फिटे पाप । होती निष्पाप साधक ॥ ५५ ॥
    संत हे कृपेचे केवळ दीप आहेत; संत हे माझे निजस्वरूप आहे. म्हणूनच सत्संगाने पातक जाते आणि साधक निष्पाप होतात ५५.


    निष्पाप करूनि साधकांसी । ब्रह्मस्वरूपता देती त्यांसी ।
    ऐसें कृपाळुत्व साधूंपाशीं । जाण निश्चयेंसीं उद्धवा ॥ ५६ ॥
    साधकांना निष्पाप करून त्यांना ब्रह्मस्वरूपाला ते पोंचवितात. उद्धवा ! साधूंपाशी खरोखरच इतका कृपाळूपणा असतो, हें  तूं निश्चित जाण ५६.


    मी निर्गुणत्वें ब्रह्म पूर्ण । साधु चालतेंबोलतें ब्रह्म जाण ।
    साधूंसी रिघालिया शरण । तैं जन्ममरण असेना ॥ ५७ ॥
    मी निर्गुणपणाने पूर्ण ब्रह्म आहे. आणि साधु हे चालते बोलते ब्रह्म आहेत. त्यांना शरण गेलें असतां जन्ममरण नाहीसे होते ५७.


    साधूंसी सद्भावें शरण । रिघाल्या नुरे जन्ममरण ।
    साधु शरणागतां शरण्य । सत्य जाण उद्धवा ॥ ५८ ॥
    साधूंना भक्तिभावाने शरण गेले असतां जन्ममरणाचें नांवच रहात नाही. उद्धवा ! खरोखर साधु हे शरण जाणाराला आश्रयरूप आहेत ५८.


    भावें धरिलिया सत्संगती । संसारिया होय निर्मुक्ती ।
    हें प्रतिज्ञापूर्वक श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥ ५९ ॥
    भक्तिभावाने सत्संगति धरली, तर संसारी लोकांना मुक्ति मिळते, असें उद्ध्वाला श्रीकृष्णांनी प्रतिज्ञापूर्वक सांगितले ५९.


    सद्भावेंसीं सत्संगती । धरितां घरा ये ब्रह्मस्थिती ।
    हें निजवर्म उद्धवाप्रती । देवें अध्यायांतीं निरूपिलें ॥ ४६० ॥
    सद्भावानें सत्संगति धरली असतां ब्रह्मस्थिति घरी चालत येते. हे निजवर्म देवांनी उद्धवाला अध्यायाच्या शेवटी सांगितले ४६०.


    परम विरक्तीचें कारण । तें हें पुरूरवाप्रकरण ।
    उपसंहार श्रीकृष्ण । अध्यायांतीं जाण संपवी ॥ ६१ ॥
    परम विरक्तीचे कारण म्ह. साधन असे हे पुरूरव्याचे आख्यान सांगून श्रीकृष्ण अध्यायाचे शेवटी त्याचा उपसंहार करितात ६१.


    वैतसेनस्ततोऽप्येवमुर्वश्या लोकनिःस्पृहः ।
    मुक्तसङ्गो महीमेतामात्मारामश्चचार ह ॥ ३५ ॥
    इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमंहस्यां
    संहितायामेकादशस्कन्धेषङ्‍विंशोऽध्यायः ॥ २६ ॥
    [श्लोक ३५] अशा रीतीने पुरूरव्याला आत्मसाक्षात्कार होताच त्याचे उर्वशीलोकाचे आकर्षण नाहीसे झाले त्याच्या सर्व आसक्ती नष्ट झाल्या आणि आत्म्यात रममाण होऊन तो या पृथ्वीवर वावरू लागला. (३५)


    पूर्वीं सूर्यवंश प्रसिद्ध । तेथ सोमवंशाचा संबंध ।
    'वैतसेन' श्लोकींचें पद । लावूनि गोविंद बोलिला ॥ ६२ ॥
    पूर्वी सूर्यवंश प्रसिद्ध असून त्यांत आलेला सोमवंशाचा संबंध श्रीकृष्ण 'वैतसेन' असें पद श्लोकांत घालून सांगतात ६२.


    उमावनीं अतिएकांत । तेथ उमा आणि उमाकांत ।
    विगतवासेंसीं क्रीडत । स्वानंदयुक्त स्वलीला ॥ ६३ ॥
    पार्वतीच्या क्रीडावनांत एकदा संपूर्णपणे एकांत असतां शंकर आणि पार्वती वस्त्ररहित होऊन आनंदयुक्त लीला करीत होती ६३.


    तेथ शिवाचे दर्शनासी । अवचटें आले सप्तऋषी ।
    लज्जा उपजली पार्वतीसी । तिणें त्या वनासी शापिलें ॥ ६४ ॥
    तेथे शिवाच्या दर्शनासाठी अकस्मात् सप्तऋषि प्राप्त झाले. तेव्हां पार्वतीला फार लाज वाटली व तिने त्या वनाला शाप दिला ६४.


    'जो पुरुष या वनाआंत । ये‍ईल तो हो हो स्त्रीरूप एथ' ।
    ऐसा शाप क्रोधयुक्त । वदली निश्चित जगदंबा ॥ ६५ ॥
    तो असा की, जो पुरुष ह्या वनाच्या आंत येईल तो येथे स्त्रीरूप होईल. असा जगदंबेनें रागारागाने त्या वनास शाप दिला ६५.


    तेथ राजा 'सुद्युम्न' सूर्यवंशी । नेणॊनियां शापप्रभावासी ।
    पारधी आला त्या वनासी । सकळ सेनेसीं सन्नद्ध ॥ ६६ ॥
    तो एके दिवशी सूर्यवंशांतला राजा सुद्युम्न शापाचे सामर्थ्य माहीत नसल्यामुळे सर्व सेनेसहवर्तमान त्या वनांत शिकारीला आला ६६.


    रिघतांचि त्या वनाआंत । पुरुषत्व पालटलें तेथ ।
    बाप शापाचें सामर्थ्य । झाले समस्त स्त्रीरूप ॥ ६७ ॥
    परंतु त्या वनांत जातांच त्याचे पुरुषत्व पालटले ! त्या शापाचे सामर्थ्य किती विलक्षण पहा ! ते सारेच स्त्रीरूप झाले ! ६७.


    तेथ पुरुषत्वाची आठवण । निःशेष विसरलें मन ।
    आपण पूर्वीं होतों कोण । हेंही संपूर्ण विसरले ॥ ६८ ॥
    त्यांच्या मनाला पुरुषत्वाची आठवण मुळीच राहिली नाही. आपण पूर्वी कोण होतो हेही सारे विसरून गेले ६८.


    अश्व झाले अश्विनी । हस्ती झाले हस्तिणी ।
    पुरुषा झाले कामिनी । तत्क्षणीं त्या वनांव ॥ ६९ ॥
    तत्क्षणी त्या वनांत घोडे होते त्यांच्या घोड्या झाल्या; हत्तींच्या हत्तिणी झाल्या; पुरुष होते ते स्त्रिया झाले ६९.


    तेथ पुरुषकामें कामासक्ती । अनुकूल पुरुषांप्रती ।
    स्त्रिया गेलिया त्या समस्ती । अतिकामरतीं संभोगा ॥ ४७० ॥
    तेव्हां पुरुषाच्या इच्छेनें कामातुर होऊन त्या सर्व स्त्रिया (वनाबाहेर) पांगून गेल्या ४७०.


    राजा सुद्युम्न झाला नारी । अतिसुकुमार सुंदरी ।
    तो सोमपुत्र बुधातें वरी । अतिप्रीतीकरीं भाळोनि ॥ ७१ ॥
    राजा सुद्युम्नही अत्यंत सुंदर सुकुमार अशी स्त्री झाला; आणि त्याने सोमाचा पुत्र जो वुध, त्याला भुलून मोठ्या प्रीतीनें माळ घातली ७१.


    बुधें सुद्युम्न देखोनि नारी । तो भुलला स्त्रीकामेकरीं ।
    एवं अतिप्रीतीं परस्परीं । येरयेरावरी भाळलीं ॥ ७२ ॥
    बुधही सुद्युम्न स्त्री झालेला पाहून स्त्रीकामेच्छेने त्याला भुलला. अशा प्रकारे ती उभयतांही एकमेकांवर फारच लुब्ध झाली ७२.


    बुध महाराजचूडामणी । तो सुद्युम्नातें स्त्रीत्वें पर्णी ।
    केली पटाची निजराणी । बाप करणी कर्माची ॥ ७३ ॥
    राजचूडामणि अशा बुधमहाराजाने सुद्युम्नरूपी स्त्रियेशी विवाह करून तिला आपली पट्टराणी केली ! कर्माची गति किती विचित्र आहे पहा ! ७३.


    सुद्युम्नबुधवीर्येंकरीं । पुरूरवा जन्मे त्यांचे उदरीं ।
    एवं सूर्यवंशामाझारीं । सोमवंश यापरी संचरला ॥ ७४ ॥
    त्या सुद्युम्नरूपी स्त्रियेच्या पोटीं बुधाच्या वीर्यापासून पुरुरवा उत्पन्न झाला. अशा प्रकारें सूर्यवंशामध्ये सोमवंश घुसला !  ७४.


    हे सोमवंशींची आद्यकथा । एथूनि सोमवंश वाढता ।
    श्रीकृष्ण बोलिला ध्वनितार्था । तेचि म्यां कथा उपलविली ॥ ७५ ॥
    ही सोमवंशांतील मूळची कथा आहे. येथूनच सोमवंश वाढला. तें श्रीकृष्णांनी फार थोडक्यात सांगितले होते, तीच कथा (नाथ म्हणतात ) मी थोडीशी विस्ताराने सांगितली ७५.


    सुद्युम्न झाला बुधाची नारी । मागें सूर्यवंशामाझारीं ।
    नाहीं राज्यासी अधिकारी । संकट भारी वोढवलें ॥ ७६ ॥
    सुद्युम्म हा बुधाची स्त्री झाला, तेव्हां त्याच्या पश्चात राज्याला कोणी अधिकारी राहिला नाही, आणि मोठे संकट ओढवले ७६.


    ते सूर्यवंशींचा कुळगुरु । वसिष्ठ महायोगीश्वरु ।
    तेणें करूनि अत्यादरु । गौरी-हरु प्रार्थिलीं ॥ ७७ ॥
    तेव्हां महायोगीश्वर वसिष्ठ  हा सूर्यवंशाचा कुलगुरु. त्याने मोठ्या भक्तिभावाने गौरीहरांची प्रार्थना केली ७७.


    प्रसन्न करूनि पार्वतीसी । मागे सुद्युम्नाच्या उच्छापासी ।
    येरी सांगे महादेवासी । तुम्हीं वसिष्ठासीं बुझवावें ॥ ७८ ॥
    पार्वतीला प्रसन्न करून घेऊन सुद्युम्नाला उःशाप मागितला. तेव्हा तिने शंकरांनाच सांगितले, की तुम्ही वसिष्ठाची समजूत करा ७८.


    जें भवानीचें शापवचन । कदा अन्यथा नव्हे जाण ।
    धरावया वसिष्ठाचें मन । नवलविंदान शिवें केलें ॥ ७९ ॥
    त्यांना सांगा की, पार्वतीचें शापवचन कधीच खोटें होणार नाही. तेव्हां वसिष्ठाची समजूत करण्याकरितां शंकरांनी एक तिसराच चमत्कार केला ७९.


    शुक्ल पक्षीं सुद्युम्नासी । पुरुषत्व प्राप्त होईल त्यासी ।
    कृष्णपक्षीं बुधापाशीं । स्त्रीभावेंसीं वर्तेल ॥ ४८० ॥
    त्यांनी सांगितले की, शुक्लपक्षी सुद्युम्नाला पुरुषत्व प्राप्त होत जाईल, आणि कृष्णपक्षी तो स्त्री होऊन बुधापाशी विलास करील ४८०.


    पक्षें पुरुष पक्षें नारी । ऐशिया उच्छापाची परी ।
    शिवें करूनि कृपेकरीं । केला अधिकारी निजराज्या ॥ ८१ ॥
    एक पंधरवडा पुरुष आणि एक पंधरवडा स्त्री, असा उःशापाचा पर्याय करून शिवांनी त्याच्यावर कृपा केली, आणि त्याच्या राज्याचा तो अधिकारी केला ८१.


    पुरुषत्व पावल्या सुद्युम्नासी । तें पुरुषत्व नावडे त्यासी ।
    स्त्रीसंभोगें बुधापाशीं । अतिप्रीतीसीं लोधला ॥ ८२ ॥
    ह्याप्रमाणे सुद्युम्नाला पुरुषत्व प्राप्त झाले खरे; पण तें पुरुषत्व कांहीं त्याला आवडेना. त्याची स्त्रीसंभोगानें बुधापाशीच प्रीति जडून राहिली होती ८२.


    स्वर्ग‍अप्सरा आलिया पाशीं । त्याही नावडती सुद्युम्नासी ।
    त्याहूनि प्रीति बुधापाशीं । स्त्रीभावेंसीं अनिवार ॥ ८३ ॥
    स्वगातील अप्सरा जरी त्याच्यापाशी आल्या, तरी त्या सुद्युम्नाला आवडेनात; त्याच्यापेक्षा स्त्रीच्या नात्याने त्याची बुधावरच पराकाष्ठेची प्रीति जडली ८३.


    बुधासीही स्वर्गांगना । संभोगीं न येती मना ।
    ऐसी अतिप्रीति सुद्युम्न । स्त्रीभोगें जाण विगुंतली ॥ ८४ ॥
    बुधालासुद्धा देवांगनाही उपभोगाला आवडत नाहीशा झाल्या; अशी त्याची सुषुम्नावर प्रीति जडली; इतके तिच्या स्त्रीत्वाने त्याला मोहित केले होते ८४.


    पुरुषीं पुरुषत्वाची रती । भोगूं जाणें मी श्रीपती ।
    इतर बापुडीं तीं किती । स्त्रीदेहासक्तीं भुललीं ॥ ८५ ॥
    पुरुषाने पुरुषत्वाशींच रममाण होणेंचे वर्म, एक मला श्रीकृष्णालाच माहीत आहे. इतर पामरे बिचारी स्त्रीदेहावरच आसक्त होऊन भुलून पडतात ! ८५.


    स्त्रीदेहीं जो आत्मा असे । तो भोगिजे म्यां हृषीकेशें ।
    इतरांसी स्त्रीदेहींचें पिसें । विषयावेशें भुलोनी ॥ ८६ ॥
    स्त्रीदेहांत जो आत्मा असतो, त्याचा भोग मी श्रीकृष्णच घेऊ शकतों; इतरांना विषयाच्या इच्छेने स्त्रीदेहाचेच वेड असते ! ८६.


    असो हें सांगावें किती । कामीं निष्कामतेची रती ।
    ते मी जाणें रमापती । कां जाणती निजानुभवी ॥ ८७ ॥
    असो; हे किती सांगावें ? कामामध्येच निष्कामाने कसे रमावें तें एक मी रमापतिच जाणतों; किंवा जे निजानुभवी असतील ते जाणतील ८७.


    पुरुत्वापरीस कामरती । स्त्रीदेहीं अतिआसक्तीं ।
    त्या स्त्रीकामाची निवृत्ती । जाण निश्चितें सत्संगें ॥ ८८ ॥
    पुरुषत्वापेक्षां कामरतिविषयांत स्त्रीदेहामध्येच अत्यंत आसक्ति असते. त्या स्त्रीविषयाची निवृत्ति एका सत्संगानेच होते. ८८.


    वसिष्ठाचिये सत्संगतीं । झाली स्त्रीभावाची निवृत्ती ।
    सुद्युम्न पावला पुरुषत्वप्राप्ती । धन्य त्रिजगतीं सत्संग ॥ ८९ ॥
    वसिष्ठाच्या सत्संगतीने स्त्रीभावाची निवृत्ति झाली, आणि सुद्युम्नाला पुरुषत्व प्राप्त झाले. यावरून सत्संग हा त्रिभुवनांत धन्य होय ८९.


    पुरुषत्व पावोनि सुद्युम्न । निजनगरा येतां जाण ।
    स्त्रीभावें नष्टलें सैन्य । एकला आपण स्वयें आला ॥ ४९० ॥
    सुद्युम्नाला पुरुषत्व येतांच तो आपल्या नगराला आला, परंतु सैन्य सारें स्त्रीरूप झाल्याने ते नष्ट होऊन गेले होते; म्हणून तो एकटाच नगरांत आला ४९०.


    एवं निःशेष विगतसैन्य । यालागीं नांवें 'वीतसेन' ।
    त्या वीतसेनाचा पुत्र जाण । 'वैतसेन' पुरूरवा ॥ ९१ ॥
    अशा प्रकारे त्याचे सगळे सैन्य विगत झाल्यामुळे त्याला 'वीतसेन' असे नाव पडले. वीतसेनाचा जो पुत्र तो 'वैतसेन' म्हणजे पुरुरवा होय ९१.


    तेणें निजात्मता अतिविरक्ती । सांडूनि स्वर्गभोगसंपत्ती ।
    त्यजूनि उर्वशीकामासक्ती । आत्मारामस्थिती पावला ॥ ९२ ॥
    त्याने आत्मस्वरूप ओळखून अत्यंत विरक्तीनें स्वर्गातील भोगसंपत्ति सारी सोडून देऊन, उर्वशीवरील कामासक्ति झुगारून तो आत्मस्वरूपामध्येच रममाण झाला ९२.


    आत्माराम निजस्थिती । मिथ्या देहसंग सांगाती ।
    निजात्मबोधें त्रिजगतीं स्वानंदें नृपति विचरत ॥ ९३ ॥
    अशा प्रकारें आत्मस्वरूपात स्थिर राहून देहसंग व इतर संगति मिथ्या मानून तो राजा त्रिभुवनामध्ये स्वानंदाने संचार करीत होता ९३.


    जेथें जेथें पाउल उठी । तेथें तेथें होती सुखाच्या कोटी ।
    स्वानंदें कोंदली सृष्टी । ब्रह्मदृष्टीं विचरतु ॥ ९४ ॥
    त्यामुळे जेथे जेथें तो पाऊल टाकी, तेथे तेथे सुखाच्या कोटीच उत्पन्न होत. कारण आत्मानंदानेच सारी सृष्टि त्याला भरून गेलेली दिसे. असा तो ब्रह्ममय दृष्टीनेंच फिरत असे ९४.


    ब्रह्मीं विचरतां ब्रह्मपणें । ब्रह्मरूप झालें जिणें ।
    विसरला जिणेंमरणें । पूर्णीं पूर्णपणें परिपूर्ण ॥ ९५ ॥
    ब्रह्मस्वरूप होऊन ब्रह्मामध्ये संचार करीत असता त्याचे जीवनच ब्रह्मरूप झाले. तो जन्ममरण विसरून जाऊन पूर्णपणाने पूर्णामध्ये पूर्णस्वरूपच होऊन राहिला ९५.


    हें उर्वशी-पुरूरवोपाख्यान । जो स्वयें ऐके सावधान ।
    तैं दोष जाती अगम्यागमन । विरक्ती संपूर्ण साधकां ॥ ९६ ॥
    हें उर्वशीपुरूरव्याचे आख्यान जो लक्ष देऊन श्रवण करील, त्याचे अगम्यागमनादि दोष नाश पावतील आणि साधकांना पूर्ण विरक्ति प्राप्त होईल ९६.


    यापरी वैराग्ययुक्तीं । राजा पावला ब्रह्म प्राप्ती ।
    वैराग्य उपजे सत्संगतीं । सत्संगें विरक्ती मद्भजनें ॥ ९७ ॥
    याप्रमाणे वैराग्ययुक्तीने तो राजा ब्रह्मपदाला पोचला. वैराग्य हे सत्संगतीने उत्पन्न होते ; आणि माझ्या भजनाने सत्संग व विरक्ति ही दोन्ही प्राप्त होतात ९७.


    'सद्भावें करितां माझी भक्ती । साधकां उपजे विरक्ती' ।
    ऐसें बोलिला श्रीपती । तें उद्धवें चित्तीं दृढ धरिलें ॥ ९८ ॥
    सद्भावाने माझी भक्ति केली असतां साधकांना विरक्ति उत्पन्न होते, असें श्रीकृष्णांनी सांगितले, ते उद्धवाने नीट मनांत धरले ९८.


    ते भजनक्रियेचा प्रश्न । पुढिले अध्यायीं जाण ।
    उद्धव पुसेल आपण । जेणें श्रीकृष्ण संतोषे ॥ ९९ ॥
    आता त्या भजनक्रियेसंबंधींचा प्रश्न पुढच्या अध्यायांत उद्धव विचारील आणि त्यापासून श्रीकृष्णाला संतोष होईल ९९.


    उद्धव पुसेल गोड गोठी । जेणें श्रीकृष्ण सुखावें पोटीं ।
    तेणें स्वानंदें निजपुष्टी । भजनहातवटी सांगेल ॥ ५०० ॥
    उद्धव मोठ्या गोड गोष्टी विचारील, आणि त्यामुळे श्रीकृष्णाच्या मनाला आनंद होईल. त्याच आनंदाच्या भरांत भजनाचा मार्ग ते सांगतील ५००.


    उपासनाकांडरहस्य पूर्ण । मुख्य क्रियायोगनिरूपण ।
    समूळ आगमलक्षण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगेल ॥ १ ॥
    उपासनाकांडाचे पूर्ण रहस्य, मुख्यत्वेकरून क्रियायोगाचे निरूपण व आगमाचे सारे लक्षण आपल्या मुखाने श्रीकृष्ण सांगतील १. 


    ते कथेसी अवधान । श्रोतां द्यावें सावधान ।
    एका तुष्टला जनार्दन । स्वानंदघन निजबोधें ॥ ५०२ ॥
    त्या कथेकडे श्रोत्यांनी नीट लक्ष द्यावे. आत्मानंदाचे केवळ मेघ असे जे गुरु जनार्दन त्यांनी ज्ञानबोधाने एकनाथाला तृप्त केलें २.


    इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे
    एकाकारटीकायां ऐलगीतोपाख्यानं नाम षड्‌विंशोध्यायः ॥ २६ ॥
    श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ३५ ॥ ओव्या ॥ ५०२ ॥
    याप्रमाणे श्रीमद्भागवत महापुराणांतील एकादशस्कंधामधील श्रीकृष्णउद्धवसंवादाचा एकनाथकृत टीकेचा 'ऐलगीतोपाख्यान' नावाचा सव्वीसावा अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु.  सव्वीसावा अध्याय समाप्त.​

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...