मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २६ ओव्या १ ते १००

    श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

    ॐ नमो देव जगन्मोहन । मोहिनीमोहना आद्कारण ।
    कार्यकारणातीत चिद्घन । जय जनार्दन जगद्गुरू ॥ १ ॥
    हे देवा जगन्मोहना  ! हे मोहिनीच्या मोहकपणाला मूळ कारण होणाऱ्या देवा ! तुला नमस्कार असो. कार्यकारणातीत व ज्ञानस्वरूप अशा जगद्गुरू  जनार्दनाचा जयजयकार असो १. 


    जगासी पडे मायामोहन । तें तूं निर्दळिसी ज्ञानघन ।
    जगीं जगद्रूप जनार्दन । कृपाळू पूर्ण दीनांचा ॥ २ ॥
    जगावर मायेचा जो मोह पडतो, तो अज्ञानस्वरूप असल्याकारणाने दूर करतोस. जगामध्ये सर्व जगद्रूपाने जनार्दनच आहे. तो दीनांचा पूर्ण कृपाळू आहे २.


    दीनासी देवमाया स्त्रीरूपें । भुलवी हावभावखटाटोपें ।
    तें स्त्रीमोहादि मोहक रूपें । जनार्दनकृपें निर्दळिती ॥ ३ ॥
    देवाची माया स्त्रियेच्या रूपाने हावभाव व नेत्रकटाक्षांनी मोह घालून दीनदुबळ्यांना भुरळ घालते. पण स्त्रियेच्या मोहासारखी मोहक असणारी अशी जी सर्व स्वरूपें , ती जनार्दनाच्या कृपेनें नाश पावतात ३. 


    जेथ वैराग्य वाढे संपूर्ण । तेथ जनार्दनाची कृपा पूर्ण ।
    वैराग्य तेथ ब्रह्मज्ञान । सहजें जाण ठसावे ॥ ४ ॥
    जेथें परिपूर्ण वैराग्य वाढते, तेथें जनार्दनाची पूर्ण कृपा आहे म्हणून समजावे. जेथे वैराग्य असते तेथे ब्रह्मज्ञान हें  सहज ठसते  ४.


    जीव सहजें ब्रह्मचि आहे । तो मायागुणें जीवत्व वाहे ।
    जेवीं भद्रीं निजेलेनि रायें । तो स्वप्नींचें लाहे रंकत्व ॥ ५ ॥
    जीव हा मूळचा ब्रह्मच आहे , पण तो मायेच्या गुणांनी जीवपणा बाळगतो. ज्याप्रमाणे पलंगावर निजलेल्या राजाने स्वप्नांत  स्वतःला भिकारी झाल्याचे पहात असावें ५, 


    त्यासी राजपदा यावया जाण । सेवक करिती थापटण ।
    तेवीं वैराग्य निर्दळी त्रिगुण । जीवा ब्रह्मपण स्वयंभचि ॥ ६ ॥
    परंतु त्याचे सेवक त्याला राज्यपदावर बसण्याकरता थापटून जागे करितात, त्याप्रमाणे वैराग्य त्रिगुणांचा नाश करिते, तेव्हां जीवाला स्वयंसिद्धच  ब्रह्मत्व आहे ६. 


    ऐसें स्वयंभ जोडल्या ब्रम्ह पूर्ण । तेव्हा स्त्री पुरुष हें मिथ्या ज्ञान ।
    मृषा दृश्याचें दृश्यभान भोग्यभोक्तेपण असेना ॥ ७ ॥
    असें स्वयंभूच असणारें परब्रह्म प्राप्त झालें  म्हणजे स्त्री आणि पुरुष हें  ज्ञानच मिथ्या होते, दृश्याचे दृश्यभानच मिथ्या होते, व भोग्य भाणि भोक्तपणच उरत नाही ७. 


    असो साधकासी देवमाया । स्त्रीरूपें ये भुलवावया ।
    तेथ स्मरतां भावें गुरुराया । जाय विलया स्त्रीबाधू ॥ ८ ॥
    असो. साधकाला देवाची माया हीच स्त्रियेच्या रूपाने भुलवावयाला येते. त्या वेळी भक्तीने गुरुराजाचे स्मरण केले असता त्या स्त्रीची पीडा विलयास जाते ८.


    सद्गुरूचें निजनाम एक । निवारी बाधा महादोख ।
    वैराग्य उपजवी अलोलिक । तेणें होय निजसुख साधकां ॥ ९ ॥
    सद्गुरुंचे  केवळ एक नाम मोठमोठ्या दोषांची बाधा दूर करते, आणि लौकिक वैराग्य उत्पन्न  करते, तेणेकरून साधकांना मोठे सुख होते ९.


    निर्विशेष निजसुखदाता । आम्हां सद्गुरूचि तत्त्वतां ।
    त्याचे चरणीं ठेवितां माथा । सुखसंपन्नता साधकां ॥ १० ॥
    खरे पाहिलं तर आम्हांला निर्वेध सुख देणारा एक सद्गुरुच आहे. त्याच्या चरणावर मस्तक ठेविलें असता साधकांना सुखाचा लाभ होतो १०. 


    संत साधकांची निजमाउली । शांति निजसुखाची साउली ।
    जनार्दनकृपेच्या पाउलीं । कथा चालिली यथार्थ ॥ ११ ॥
    संत ही साधकांची खरी माता आहे. आणि शांति ही आत्मसुखाची सावली आहे. जनार्दनाच्या कृपामय पायांच्या प्रसादानें ही कथा यथार्य रीतीने चालली आहे " ११. 


    हाता आलिया निजनिर्गुण । साधक होती सुखसंपन्न ।
    तदर्थ करावें माझें भजन । हें बोलिला श्रीकृष्ण पंचविसावां ॥ १२ ॥
    निर्गुण हाती आलें म्हणजे साधक सुखसंपन्न होतात, म्हणून त्याकरिता माझें भजन करावे. असें पंचविसाव्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणाले १२.


    भावें करितां भगवद्भजन । देव दारारूपें करिती विघ्न ।
    तें निर्दळावया जाण । माझें नामस्मरण करावें ॥ १३ ॥
    भक्तिभावाने भगवद्‌भजन करु  लागले असता देव हे स्त्रीच्या रूपाने त्यांत विघ्न आणतात. तें विघ्न निवारण करण्याकरितां माझें नामस्मरण करीत जावें १३.


    अच्युत हें स्मरतां नाम । प्रतापें निर्दळी कर्माकर्म ।
    सकळ पातकें करी भस्म । दाटुगें नाम हरीचें ॥ १४ ॥
    अच्युत ह्या नामाचे स्मरण केले असता ते आपल्या प्रभावानेच कर्माकर्माचा नाश करितें व सर्व पातकांचे भस्म करून टाकते. इतकें हरीचे नाम समर्थ आहे १४.


    नामें होइजे विरक्त । नामें निर्मळ होय चित्त ।
    नामें साधे गुणातीत । नामें निर्मुक्त भवपाश ॥ १५ ॥
    नामानेच मनुष्य विरक्त होतो, नामानेच चित्त निर्मळ होते, नामानेच गुणातीतता प्राप्त होते, व नामानेच संसारपाश तुटतात १५.


    नामीं लोलिंगत चित्त । भवभय रिघों न शके तेथ ।
    नामीं विश्वास ऐसा जेथ । भगवंत तेथ तुष्टला ॥ १६ ॥
    नामामध्ये चित्त लोलुप झाले असतां तेथें संसारभयाचा शिरकाव होत नाही. असा जेथें नामावर विश्वास असतो, तेथें भगवान् प्रसन्न आहे असे समजावें १६.


    दुष्टसंगें विषयासक्त । जरी झाला लोलिंगत ।
    अनुताप उपजलिया तेथ । होय विरक्त क्षणार्धें ॥ १७ ॥
     दुष्टाच्या संगतीने जरी विषयासक्त मनुष्य विषयांतच पूर्णपणे रममाण झालेला असला, तरी त्याला पश्चात्ताप होतांच तोही अर्ध्या क्षणांत विरक्त होतो १७.


    महादोषासी प्रायश्चित्त । केवळ अनुताप निश्चित ।
    अनुतापेंवीण प्रायश्चित्त । जाण एथ विटंबू ॥ १८ ॥
    मोठमोठ्या दोषांना खरा पश्चात्ताप हेच खरोखर मोठे प्रायश्चित्त आहे. अनुताप झाल्याशिवाय प्रायश्चित घेणे ती केवळ थट्टा होय १८.


    अनुतापाएवढा सखा । जगीं आणिक नाहीं लोकां ।
    धडाडिल्या अनुताप देखा । सकळ पातकां निर्दळी ॥ १९ ॥
    लोकांना पश्चात्तापासारखा मित्र ह्या जगामध्ये दुसरा नाही. एकदा पश्चात्ताप झाला की तो सर्व पातकांचे भस्म करून सोडतो १९.


    अनुतापा चढलिया हात । क्षणार्धें करी विरक्त ।
    येचि अर्थीं ऐलगीत । हरि सांगत उद्धवा ॥ २० ॥
    पश्चात्ताप हाती आला की तो क्षणार्धात विरक्त करून सोडतो. याच अर्थाचे 'ऐलगीत' श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहे २०.


    सव्विसाव्या अध्यायीं येथ । विषयासक्त ज्याचें चित्त ।
    त्यासी व्हावया विरक्त । ऐलगीतप्रस्तावो ॥ २१ ॥
    येथे ह्या सव्वीसाव्या अध्यायांत, ज्याचे चित्त विषयासक्त असेल त्याला विरक्त होण्याकरिता 'ऐलगीता'ची ही प्रस्तावना आहे २१.


    श्रीभगवानुवाच -
    मल्लक्षणमिमं कायं लब्ध्वा मद्धर्म आस्थितः ।
    आनन्दं परमात्मानमात्मस्थं समुपैति माम् ॥ १ ॥
    [श्लोक १] भगवान श्रीकृष्ण म्हणाले - माझ्या प्राप्तीचे मुख्य साधन असलेले हे शरीर मिळाल्यावर जो माझी भक्ती करतो, तो प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेल्या मला आनंदस्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो. (१)


    ब्रह्म लक्षिजे परिपूर्ण । हेंचि कायेचें मुख्य लक्षण ।
    तें हें मानवी शरीर जाण । परम पावन तिहीं लोकीं ॥ २२ ॥
    ब्रह्म पूर्णपणे जाणावें हेच ह्या नरदेहाचे मुख्य कर्तव्य आहे. ते हें मानवी शरीर तिन्ही लोकांतही पवित्र आहे २२.


    मनुष्यदेहीं अधर्म । करितां नातुडे परब्रह्म ।
    तेथ करावे भागवतधर्म । जे कां परम पावन ॥ २३ ॥
    ह्या मनुष्यदेहाला येऊन अधर्म केला असतां परब्रह्म हाती लागत नाही. ह्याकरितां जे परम पावन असे भागवतधर्म, तेच आचरण करावे २३.


    भागवतधर्में करितां भक्ती । निर्मळ होय चित्तवृत्ती ।
    जीव तोचि ब्रह्म निश्चितीं । ऐशी शुद्ध स्फूर्ती ठसावे ॥ २४ ॥
    भागवतधर्माला अनुसरून भक्ति केली असतां चित्तवृत्ति निर्मळ होते. आणि जीव तोच ब्रह्म असें निश्चयाचे ज्ञान मनांत ठसते २४.


    ठसावल्या ब्रह्मस्फूर्ती । होय स्वानंदाची अवाप्ती ।
    तेणें परमानंदीं लीन होती । हे शुद्धप्राप्ती पैं माझी ॥ २५ ॥
    ब्रह्मस्फूर्ति मनांत ठसली की त्या योगाने साधक परमानंदांत लीन होतात. हीच माझी खरी प्राप्ति होय २५.


    माझिये प्राप्तीचें लक्षण । देहीं असतां वर्तमान ।
    सर्वथा नाहीं विषयस्फुरण । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ २६ ॥
    माझी प्राप्ति झाल्याचे लक्षण हेच की, प्रत्यक्ष देहांत असूनही विषयाची मुळीच आठवण नसणे. तेच निरूपण श्रीकृष्ण सांगतात २६.


    गुणमय्या जीवयोन्या विमुक्तो ज्ञाननिष्ठया ।
    गुणेषु मायामात्रेषु दृश्यमानेष्ववस्तुतः ।
    वर्तमानोऽपि न पुमान् युज्यतेऽवस्तुभिर्गुणैः ॥ २ ॥
    [श्लोक २] जीव ज्ञाननिष्ठेने गुणमय जीवयोनीपासून कायमचा मुक्त झाला असता वास्तविक नसूनही दिसणार्‍या केवळ मायास्वरूप गुणांच्या पसार्‍यात राहूनही त्यांच्यामुळे बांधला जात नाही कारण त्या गुणांना वास्तविक अस्तित्वच नाही. (२)


    जे मूळ अज्ञानाची खाणी । जे संसारप्रवाहाची श्रेणी ।
    जे तिहीं गुणांची जननी । माया राणी अनादि ॥ २७ ॥
    जी मूळ अज्ञानाची खाण, जी संसारप्रवाहाची पंक्ति, जी तीन गुणांची माता, ती अनादि मायाराणी होय २७.


    मायागुणयोगें पहा हो । सोळा कळांचा संभवो ।
    तो वासनात्मक लिंगदेहो । जीवासी पहा हो दृढ झाला ॥ २८ ॥
    अहो पहा ! ह्या मायागुणांच्या योगानें सोळा कळांचा (पांच ज्ञानेंद्रिये, पांच कर्मेंद्रिय, पांच विषय आणि मन मिळून सोळा) उत्पन्न झालेला जो वासनात्मक लिंगदेह, तोच जिवाला खिळून बसतो २८.


    ज्या लिंगदेहाचिये प्राप्ती । भोगी नाना सुखदुःखसंपत्ती ।
    पडे स्वर्गनरक‍आवर्तीं । मिथ्यामरणपंक्ती स्वयें सोशी ॥ २९॥
    ज्या लिंगदेहामुळेच तो जीव नानाप्रकारच्या सुखदुःखसंपत्ति भोगतो, स्वर्गनरकाच्या भोवऱ्यांत पडतो, आणि मिथ्या असलेल्या जन्ममरणपंक्ति स्वतः सोसतो २९.


    वंध्यापुत्राचा घराचार । तैसा जीवासी संसार ।
    देहाभिमानें केला थोर । अपरंपार अनिवार्य ॥ ३० ॥
    वांझेच्या मुलाचा जसा गृहस्थाश्रम, तसा हा संसार जीवाला आहे. आणि देहाभिमानाने त्याला अपरंपार व अनिवार असा वाढविला आहे ३०.


    तेथ गुरुवाक्यें ज्ञानानुभावो । पाहतां मायेचा अभावो ।
    लिंगदेह झाला वावो । जीवा जीवभावो तो मिथ्या ॥ ३१ ॥
    परंतु त्या जीवाला गुरूपदेशाने ज्ञानाचा अनुभव आला असतां मायेचा अभाव होतो, लिंगदेहच खोटा वाटू लागतो व जीवाचा जीवपणाही मिथ्या होतो ३१.


    जेवीं उगवलिया गभस्ती । अंधारेंसीं हारपे राती ।
    तेवीं गुरुवाक्यें ज्ञानप्राप्ती । मायेची स्थिती मावळे ॥ ३२ ॥
    ज्याप्रमाणे सूर्योदय झाला म्हणजे अंधारासह रात्र नाहीशी होते, त्याप्रमाणे गुरूपदेशाने ज्ञानप्राप्ति झाली की मायेचे स्वरूप मावळते ३२.


    एवं नासल्या गुणविकार । जीवन्मुक्त होती नर ।
    जेवीं कां कुलालचक्र । भंवे साचार पूर्वभ्रमणें ॥ ३३ ॥
    अशा प्रकारे गुणांचे विकार नाहीसे झाल्यावर पुरुष जीवन्मुक्त होतात. ज्याप्रमाणे कुंभाराचे चाक पूर्वी प्राप्त झालेल्या गतीने खरोखर फिरतच रहातें ३३, 


    तेवीं प्रारब्धशेषवृत्तीं । ज्ञाते निजदेहीं वर्तती ।
    वर्ततांही देहस्थिती । देह‍अहंकृती असेना ॥ ३४ ॥
    त्याप्रमाणे पूर्वप्रारब्धाच्या उरलेल्या वृत्तीने ज्ञातेही आपल्या देहामध्ये वागत असतात. परंतु ते देहस्थितीने वागत असतांही त्यांना देहाचा अभिमान असत नाही ३४.


    जेवीं कां छाया आपुली । कोणीं गांजिली ना पूजिली ।
    परी कळवळ्याची न ये भुली । तेवीं देहींची चाली सज्ञाना ॥ ३५ ॥
    ज्याप्रमाणे आपल्या छायेला कोणी त्रास दिला किंवा तिची पूजा केली तरी त्याबद्दल कोणाला कळवळा वाटत नाही, त्याप्रमाणेच सज्ञान्यालाही देहांतील चालनेचे काही वाटत नाही ३५.


    तो देहाचेनि दैवमेळें । जरी विषयांमाजीं लोळे ।
    परी विकाराचेनि विटाळें । वृत्ति न मैळे अणुमात्र ॥ ३६ ॥
    तो देहाच्याच दैवयोगाने जरी विषयांत लोळत असला, तरी त्याची वृत्ति त्या विकाराबरोबर अणुमात्रही मलिन होत नाही ३६.


    त्यासी विषयांचें दर्शन । समूळत्वें मिथ्या जाण ।
    करितां मृगजळाचें पान । करा वोलेपण बाधीना ॥ ३७ ॥
    त्याला विषयांचे दर्शन समूळ मिथ्या असते. मृगजळ प्यालें असता पिणाराचे हात काही ओले व्हावयाचे नाहीत ३७.


    गगनकमळांचा आमोद । जैं भ्रमर सेवी सुगंध ।
    तैं सज्ञाना विषयसंबंध । निजांगीं बाध लागतां ॥ ३८ ॥
    आकाशकमलांचा मकरंद व सुवास जर भ्रमर सेवन करील, तरच ज्ञात्याला विषयाचा संबंध अंगी लागला असतां बाधेल ३८.


    असो अतर्क्य मुक्तांची स्थिती । परी मुमुक्षांलागीं श्रीपती ।
    नियमाची यथानिगुती । निजात्मप्राप्तीलागीं सांगे ॥ ३९ ॥
    असो; मुक्तांची स्थिति अतर्क्य आहे. परंतु श्रीकृष्ण मुमुक्षूंना आत्मप्राप्तीसाठी त्याविषयींचे असलेले नियम सांगतात ३९.


    सङ्ग न कुर्यादसतां शिश्नोदरतृपां क्वचित् ।
    तस्यानुगस्तमस्यन्धे पतत्यन्धानुगान्धवत् ॥ ३ ॥
    [श्लोक ३] जे लोक कामसेवन आणि उदरभरण यांनी संतुष्ट असतात, अशा दुर्जनांची संगत कधीही धरू नये कारण त्यांचे अनुकरण करणार्‍यांची अधोगतीच होते जसा एखादा आंधळा दुसर्‍या आंधळ्याच्या साहाय्याने वाटचाल करू लागला, तर त्याची जशी स्थिती होते, तशीच याचीही होते. (३)


    शिश्नोदरार्थ आसक्त । स्वधर्मत्यागें अधर्मरत ।
    ऐसे जे विषयासक्त । ते जाण निश्चित असाधू ॥ ४० ॥
    कामविषयभोग व उदरभरण ह्यांतच केवळ आसक्त होउन स्वधर्माचा त्याग करून अधर्मातच मग्न असणारे असे जे विषयासक्त असतात, ते खरोखर असाधु होत असें समज ४०.


    ऐसे जे असाधू जन । त्यांसीं सर्वथा आपण ।
    संगती न करावी जाण । कायावाचामनःपूर्वक ॥ ४१ ॥
    असे जे कोणी असाधु लोक असतील, त्यांची आपण कधीही कायावाचामनेंकरूनही मुळीच संगति करूं नये ४१.


    वोढाळेचे संगतीं पाहें । क्षणभरीं गेलिया धर्मगाये ।
    त्या क्षणसाठीं पाहें । लोढणें वाहे निरंतर ॥ ४२ ॥
    ओढाळ गुरांच्या संगतींत एखादी चांगली गाय जरी क्षणभर गेली, तरी त्या क्षणाच्या संगतीसाठी तिला निरंतरचा लोढणा गळ्यांत वागवावा लागतो ४२.


    यालागीं दुर्जनाची संगती । क्षणार्धें पाडी अनर्थीं ।
    मुमुक्षीं ऐशियाप्रती । अणुमात्र वस्ती न वाचावें ॥ ४३ ॥
    त्याप्रमाणे दुर्जनांची संगतही क्षणार्धामध्येसुद्धा अनर्थात घालते. मुमुक्षूंनी  अशा ठिकाणी एक क्षणभरसुद्धा वस्तीला जाऊं नये ४३.


    लोहाराची आगिठी जैसी । सहजें पोळी भलत्यासी ।
    दुर्जनाची संगति तैशी । पाडीं अपभ्रंशीं भाविकां ॥ ४४ ॥
    लोहाराची भट्टी जशी कोणालाही सहज पोळते, त्याप्रमाणे दुर्जनाची संगत भाविक लोकांना भ्रमात टाकते ४४.


    अवचटें असाधुसंगती । जोडल्या वाढे विषयासक्ती ।
    तेणें उठी अधर्मरती । विवेक-स्फूर्तिघातक ॥ ४५ ॥
    चुकून जरी असाधूची संगत घडली तरी विषयासक्ति वाढते. आणि तेणेकरून विवेकस्फूर्तीचा घात करणारी अधर्माची प्रीति उत्पन्न होते ४५.


    मावळल्या विवेकवृत्ती । अंध होय ज्ञानस्फूर्ती ।
    आपण आपली न देखे गती । जेवीं आभाळीं राती अंवसेची ॥ ४६ ॥
    विवेकवृत्ति मावळली की, ज्ञानस्फूर्ति अंध होउन, मेघांनी व्याप्त झालेल्या अमावास्येच्या रात्रीप्रमाणे आपली गति आपणास समजत नाही ४६.


    जेवीं अंधें अंध धरिल्या हातीं । दोघां पतन महागर्ती ।
    तेवीं अविवेकाचिया स्थितीं । अंधतमा जाती विषयांध ॥ ४७ ॥
    आंधळ्याने आंधळ्याच्याच हाताला धरलें म्हणजे दोघेही खड्यांत पडतात, त्याप्रमाणे अविवेकाच्या स्थितीमुळे विषयांध लोक 'अंधतम' नांवाच्या नरकांत पडतात ४७.


    कुसंगाचा जो सांगत । तेणें वोढवें नरकपात ।
    अनुताप सोडविता तेथ । तें 'ऐलगीत' हरि सांगे ॥ ४८ ॥
    दुःसंगतीच्या सहवासाने नरकवास प्राप्त होतो. त्यापासून सोडविणारा एक पश्चात्तापच. त्यासंबंधानें श्रीकृष्ण 'ऐलगीत' सांगतात ४८.


    ऐलः सम्राडिमां गाथामगायत बृहच्छ्रवाः ।
    उर्वशीविरहान्मुह्यन्निर्विण्णः शोकसंयमे ॥ ४ ॥
    [श्लोक ४] परम यशस्वी सम्राट पुरूरवा प्रथम उर्वशीच्या विरहाने वेडापिसा झाला होता पण नंतर शोक आवरल्यावर त्याला प्रबळ वैराग्य आले तेव्हा तो म्हणाला. (४)


    समुद्रवलयांकित क्षिती । सकळ रायांचा राजपती ।
    पुरूरवा चक्रवर्ती । ज्याचे ख्याती पुराणीं ॥ ४९ ॥
    समुद्रवलयांकित पृथ्वीचा पालन करणारा, सर्व राजांचा मुगुटमणि, पुरूरवा नांवाचा चक्रवर्ती राजा, त्याची कीर्ति पुराणांतून प्रसिद्ध आहे ४९.


    तेज प्रभाव महाशौर्य । उचित वदान्य गांभीर्य ।
    महिमा महती अतिवीर्य । धर्मधैर्य पुरूरवा ॥ ५० ॥
    तेज, प्रभाव, महाशौर्य, उचित दातृत्व, गांभीर्य, ख्याति, महती, पराक्रम आणि धार्मिक धैर्य इत्यादि गुणांनी पुरूरवा राजा युक्त होता ५०.


    राजधर्माचिया नीतीं । स्वधर्में प्रतिपाळी क्षिती ।
    ब्राह्मण तितुका ब्रह्ममूर्ती । हा भाव निश्चितीं रायाचा ॥ ५१ ॥
    राजधर्माच्या नीतीनुसार स्वधर्मानें तो पृथ्वीचे पालन करीत असे. ब्राह्मण म्हणून जितका तितका ब्रह्माचीच मूर्ति होय, असा त्या राजाचा निश्चित भाव असे ५१.


    प्राणान्तेंही आपण । न करी ब्राह्मणहेळण ।
    गाईलागीं वेंची प्राण । करी संरक्षण दीनाचें ॥ ५२ ॥
    प्राण गेला तरी तो ब्राह्मणाची निंदा कधी करीत नसे. गाईसाठी तर प्राणसुद्धा खर्ची घाली. दीनांचा तर केवळ पाठिराखा होता ५२.


    ऐसा धार्मिक ऐल-चक्रवर्ती । तोही उर्वशीचे आसक्तीं ।
    भुलोनि ठेला भूपती । निजात्मगती विसरला ॥ ५३ ॥
    पुरूरव्याला दुसरें नांव 'ऐल' असे होते. असा तो धार्मिक ऐल चक्रवर्ती  पुरुरवा राजा उर्वशीच्या नादी लागून तिला भुलून आपली स्थिति विसरून गेला ५३.


    तेणें अनुतापें गाइली गाथा । ते तुज मी सांगेन आतां ।
    परी त्याची पूर्वकथा । कामासक्तता ते ऐक ॥ ५४ ॥
    त्या वेळी त्याने पश्चात्तापपूर्वक गीत गाइलें, तें मी आतां तुला सांगतो. पण त्याची पूर्वीची कथा व कामासक्तता आधी ऐक ५४.


    विसरोनि निजमहत्त्वासी । अतिदीन झाला वेश्येसी ।
    काम पिसें लावी मनुष्यासी । तें ऐल-इतिहासीं हरि सांगे ॥ ५५ ॥
    तो आपला मोठेपणा विसरून जाऊन वेश्येला लंपट होऊन अगदी दीन झाला. काम हा मनुष्याला कसे वेड लावतो, तें श्रीकृष्ण ऐलाच्या इतिहासाने सांगतात ५५.


    ऐल-उर्वशीकामासक्ती । सवेंचि अनुतापें विरक्ती ।
    हे कथा बोलिली वेदोक्तीं । तेचि यदुपति स्वयें सांगे ॥ ५६ ॥
    ऐल (म्हणजे इलेपासून बुधाला झालेला मुलगा) पुरूरवा राजा उर्वशीशी किती लंपट झाला होता आणि त्याला पश्रात्ताप होऊन विरक्ति कशी उत्पन्न झाली, ही कथा वेदामध्येही सांगितलेली आहे. तीच श्रीकृष्ण स्वतः सांगतात ५६.


    उर्वशीपुरूरव्याचा संबंध । नवम स्कंधीं असे विशद ।
    तेणें जाणोनियां गोविंद । एथ कथाअनुवाद न करीच ॥ ५७ ॥
    उर्वशीचा आणि पुरूरव्याचा संबंध नवच्या स्कंधामध्ये खुलासेवार आलेला आहे. ते लक्षात आणून श्रीकृष्णांनी ती कथा पुन्हा सविस्तर सांगितली नाही ५७.


    पूर्वकथासंबंधः ॥
    [पूर्वकथेचा संबंध]


    उर्वशी स्वर्गभूषण । नारायणें धाडिली आपण ।
    तो उर्वशीसी गर्व पूर्ण । श्रेष्ठपण मानूनी ॥ ५८ ॥
    उर्वशी म्हणजे स्वर्गाला एक भूषण म्हणून नारायणांनी तिला स्वर्गात आपण होऊन पाठविली; पण तेथे आपणच काय ती श्रेष्ठ, असे मानून ती गर्वानें फुगली ५८.


    तया गर्वाचिये स्थिती । ताल चुकली नृत्यगतीं ।
    तेणें ब्रह्मशापाची प्राप्ती । तुज मानवी भोगिती भूतळीं ॥ ५९ ॥
    त्या गर्वाच्याच ऐटीमध्ये नृत्य करतांना तालाचे पाऊल चुकले, त्यामुळे तिला ब्रह्मदेवांनी शाप दिला की, तूं मृत्युलोकीं जाशील व मनुष्य तुझा उपभोग घेतील ५९.


    उच्छाय मागतां तिसी । ब्रह्मा सांगे तियेपाशीं ।
    नग्न देखिल्या पुरूरव्यासी । स्वर्गा येसी मेषप्रसंगें ॥ ६० ॥
    तेव्हा तिने हात जोडून उशाप मागितला. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले की, तूं पुरूरव्याला मेषप्रसंगानें नग्न पाहिलेंस की स्वर्गाला येशील ६०.


    ऐशा लाहोनि शापासी । भूतळा आली उर्वशी ।
    देखोनि तिचिया स्वरूपासी । पुरूरवा तिसी भूलला ॥ ६१ ॥
    असा शाप पावून उर्वशी मृत्युलोकी आली. तिच्या स्वरूपाला पाहतांच पुरूरवा राजा भुलून गेला ६१.


    विसरोनि आपुली महती । वश्य झाला वेश्येप्रती ।
    रूपा भुलला भूपती । विचारस्फूर्ती विसरला ॥ ६२ ॥
    आणि आपला थोरपणा विसरून त्या वेश्येला वश झाला तो तिच्या रूपाने इतका वेडा झाला की, त्याला विचार करण्याचेही भान राहिले नाहीं ६२.


    नग्न देखिल्या रायासी । सांडूनि जावें उर्वशीं ।
    ऐशी भाक देऊनि तिसी । निजभोगासी आणीली ॥ ६३ ॥
    राजाला नग्न स्थितीत पाहिले असतां उर्वशीने त्याला सोडून जावे, असा करार मान्य करून त्याने तिला आपल्या उपभोगार्थ आणली ६३.


    तिणें आपुलिया उच्छापासी । आणिलें दोघां एडक्यांसी ।
    पुत्रस्नेहें पाळावें त्यांसी । तेविखीं दिधलें रायें ॥ ६४ ॥
    तिने आपल्या शापाच्या परिहाराकरितां म्हणून आपल्याबरोबर दोन मेंढे आणले होते. त्यांना केवळ पुत्रवत् पाळावेत असे तिने सांगितल्यावरून राजाने त्या विषयीही आणभाक दिली ६४.


    ते उर्वशीच्या कामप्राप्ती । अतिशयें वाढली कामासक्ती ।
    तो नेणे उदयास्त-दिवसराती । ऐशा अमित तिथी लोटल्या ॥ ६५ ॥
    ह्याप्रमाणे उर्वशीची गांठ पडतांच राजाची कामेच्छाही प्रबळ झाली. तिच्या विलासांत उजाडलें केव्हां व रात्र झाली केव्हां, हेही त्यास कळेनासे झाले. असे किती तरी दिवस लोटले ६५.


    भोगितां उर्वशीकाम । विसरला स्वधर्मकर्म ।
    विसरला नित्यनेम । कामसंभ्रम वाढला ॥ ६६ ॥
    ह्याप्रमाणे उर्वशीच्या संगतीने विलास करतांना तो स्वधर्मकर्म विसरून गेला. त्याचे नित्यनेम टळले व विलासभोगाचा अतिरेक होत चालला ६६.


    तेथ मेषरूपें दोघे जण । झाले अश्विनीकुमार आपण ।
    उर्वशीभोगक्षया कारण । इंद्रें जाण पाठविले ॥ ६७ ॥
    त्यावेळी बोकडांच्या रूपाने उर्वशीबरोबर आलेले ते दोघे अश्विनीकुमार होते; ते उर्वशीचा भोगक्षय करण्याकरितां इंद्राने तिच्याबरोबर पाठविले होते ६७.


    पुरूरव्याचा भोगप्राप्ती । उर्वशी न्यावया स्वर्गाप्रती ।
    दोनी फडके चोर नेती । मध्यरातीं मेमात ॥ ६८ ॥
    पुरूरव्याच्या भोगाच्या अखेरीस उर्वशीला स्वर्गास न्यावी म्हणून चोरांनी ते दोन्ही मेंढे मध्यान्ह रात्री चोरून नेले. तेव्हां ते ' ब्या ब्या ' करून ओरडूं लागले ६८.


    ऐकोनि मेषांच्या शब्दासी । दुःखें हडबडली उर्वशी ।
    रागें निर्भर्त्सी रायासी । नपुंसक होसी तूं एक ॥ ६९ ॥
    तो बोकडांचा शब्द ऐकून उर्वशी दुःखाने खडबडून उठली आणि राजाची निर्भर्त्सना करून त्यास म्हणाली की, 'तूं एक षंढ आहेस ६९, 


    वृथा वल्गसी पुरुषबळें । चोरें नेलीं माझीं बाळें ।
    जळो तुझें तोंड काळें । म्हणोनि कपाळें ते पिटी ॥ ७० ॥
    फुकट पुरुषार्थाच्या गोष्टी मात्र सांगतोस, माझी लेकरें चोरांनी नेली, तुझ्या त्या काळ्या तोंडाला आग लागो !' असें म्हणून ती कपाळ पिटू लागली ७०.


    ऐकोनि स्त्रियेचा शोक थोरु । शस्त्र घेऊनि सत्वरु ।
    धांवतां फिटला पीतांबरू । ते नृपवरू स्मरेना ॥ ७१ ॥
    हा त्या उर्वशीचा भयंकर शोक पाहून त्याने लवकर लवकर हातांत शस्त्र घेतले, आणि धावत धावत चोरांमागे निघाला. तो धावतांना त्याचा पीतांबर फिटला, त्याचेही त्याला भान राहिले नाही ७१.


    पराभवूनि ते चोर । मेष आणितां सत्त्वर ।
    विद्युल्लता झळकली थोर । तंव नग्न शरीर रायाचें ॥ ७२ ॥
    त्याने त्या चोरांचा पराभव करून त्या बोकडांना आणून उर्वशीपुढे उभे केले. इतक्यांत एकदम मोठी वीज चमकली, तो राजाचे शरीर सारे नागवे उघडे ! ७२.


    नग्न देखोनि रायासी । सांडूनि निघाली उर्वशी ।
    तिचेनि वियोगें मानसीं । अतिशोकासी पावला ॥ ७३ ॥
    राजाला नग्न पहातांच उर्वशी आपल्या कबुलायतीप्रमाणे त्याला सोडून निघाली, तेव्हा तिच्या वियोगाने राजा अतिशय शोकाकुल झाला ७३.


    त्यक्त्वाऽऽत्मानं व्रजन्तीं तां नग्न उन्मत्तवन्नृपः ।
    विलपन्नन्वगाज्जाये घोरे तिष्ठेति विक्लवः ॥ ५ ॥
    [श्लोक ५] आपल्याला सोडून निघून जाणार्‍या उर्वशीच्या मागे राजा पुरूरवा नग्न अवस्थेत वेड्यासारखा अतिशय विव्हळ, होऊन, जात जात म्हणू लागला "हे निष्ठुरहृदये प्रिये थांब, थांब". (५)


    पृथ्वीपरिपालानीं वरिष्ठ । स्वधर्मीं धार्मिक श्रेष्ठ ।
    शत्रुदमनीं अतिसुभट । प्रतापें उद्भट महावीर ॥ ७४ ॥
    पृथ्वीचे परिपालन करण्यात वरिष्ठ; स्वधर्मकमांत श्रेष्ठ धार्मिक, शत्रुचा संहार करण्यांत मोठा शूर व पराक्रमाने मोठा वीर ७४, 


    जाणे वेदशास्त्रविवेक । ज्यासी वंदिती सकळ लोक ।
    तोही वेश्येचा केवळ रंक । झाला देख निजांगें ॥ ७५ ॥
    वेदशास्त्रविवेक जाणणारा; ज्याला सारे लोक वंदन करतात; तो सुद्धा एका वेश्येचा केवळ दास बनून राहिला ! ७५, 


    सुरां असुरां न खालवी मान । जो अल्पही न साहे अपमान ।
    तो वेश्येलागीं झाला दीन । निजसन्मान विसरोनी ॥ ७६ ॥
    देवदानवांनाही जो कधी खाली मान करावयाचा नाहीं; ज्याला रेसभरही अपमान सहन होत नसे; तो आपला थोरपणा विसरून एका वेश्येपुढे दीन होऊन बसला ७६.


    उर्वशी जातां देखोनि दिठीं । नग्न उन्मत्त उठाउठीं ।
    रडत पडत लागे पाठीं । स्फुंदतां पोटीं श्वास न रिघे ॥ ७७ ॥
    उर्वशी जाते असे डोळ्यांनी पहातांच तो तसाच नागवा उघडा व बेहोष होऊन रडत पडत तिच्या पाठीस लागला; हुंदके देतांना त्याच्या तोंडातून नीट शब्द फुटेना ७७.


    डोळेभरी पाहूं दे दिठीं । सांगेन जीवींच्या गुह्य गोष्टी ।
    प्राण रिघों पाहे उठाउठी । क्षणभर भेटी न देतां ॥ ७८ ॥
    "अग ! एकदा मला डोळे भरून पाहू दे, हितगुजाच्या गोष्टी तरी एकदा बोलून घेऊ दे, एक क्षणभर तूं दृष्टीआड झालीस तर हा जीव अगदी जावयाच्या बेतांत येतो ७८.


    आपुल्या पूर्वजांची आण । कदा नुल्लंघीं तुझें वचन ।
    सत्य मानीं माझें प्रमाण । तुज काय कारण रुसावया ॥ ७९ ॥
    माझ्या पूर्वजांची शपथ घेऊन सांगतों की, तुझें वचन मी कधीही उल्लंघन करणार नाही; हे माझे प्रमाण अगदी सत्य मान; तुला रुसावयाला कारण तरी काय ? ७९.


    तुज चालतां लवलाहीं । झणीं खडे रुततील पायीं ।
    तुज जाणें कोणे ठायीं । तरी सवें मीही ये‍ईन ॥ ८० ॥
    चालतांना तुझ्या पायाला खडे रुततील ; तूं जात आहेस तरी कुठं ? मीही तुझ्याबरोबर येतों ८०.


    जाऊं नको उभी राहें । परतोनी मजकडे पाहें ।
    म्हणोनि धरूं धांवे पाये । तंव ते जाये उपेक्षुनी ॥ ८१ ॥
    अग जाऊं नको, थोडी उभी रहा; एकदा मागे वळून माझ्याकडे पहा तरी." असे म्हणून तो तिचे पाय धरावयास लागला. तो ती त्याच्याकडे न पहातां निघून गेली ८१.


    ज्यासी राजे मुकुटमणी । सदा येती लोटांगणीं ।
    तो लागे वेश्येचे चरणीं । बाप करणी कामाची ॥ ८२ ॥
    ज्याला मोठमोठाले राजे नेहमी लोटांगण घालावयाचे, तो राजाधिराज वेश्येच्या पायाला लागला ! ह्यावरून ह्या कामाची करणी किती विलक्षण आहे ती पहा! ८२.


    तुझी मज अति कळवळ । तुजलागीं मन माझें कोमळ ।
    तूं कठिण झालीस केवळ । कोप प्रबळ कां धरिला ॥ ८३ ॥
    तो म्हणाला, तुझा मला अतिशय कळवळा येतो, तुझ्यासाठी माझें चित्त अगदी तळमळते; तूं केवळ पाषाणहृदयी बनलीस ना ? इतका राग का बरे धरलास? ८३.


    यापरी रायाचें चित्त । विरहातुर शोकाकुलित ।
    अतिशयें ग्लानियुक्त । ते ग्लानि सांगत श्रीकृष्ण ॥ ८४ ॥
    अशा प्रकारे राजाचे चित्त अत्यंत विरहातुर आणि शोकानें व्याप्त झाले. तो अतिशय ग्लानियुक्त झाला. ती त्याची ग्लानि श्रीकृष्ण सांगतात ८४.


    कामानतृप्तोऽनुजुषन् क्षुल्लकान्वर्षयामिनीः ।
    न वेद यान्तीर्नायान्तीरुर्वश्याकृष्टचेतनः ॥ ६ ॥
    [श्लोक ६] उर्वशीने त्याचे चित्त आकर्षून घेतले होते क्षुद्र विषयांच्या सेवनामध्ये तो इतका बुडून गेला होता की, कित्येक वर्षाच्या रात्री आल्या आणि गेल्या तरी त्याला त्याचे ज्ञान नव्हते. (६)


    उर्वशीकामीं कामासक्त । एकाग्र झालें रायाचें चित्त ।
    नेणे सूर्याचें गतागत । केला भ्रांत कंदर्पें ॥ ८५ ॥
    उर्वशीच्या कामभोगांत राजाचे चित्त अगदी तल्लीन होऊन गेलें होतें. सूर्य उगवतो केव्हां व मावळतो केव्हां हेंही त्याला समजेना. इतके मदनाने त्याला वेडे करून सोडले ८५,


    भोगिलीचि कामिनी । भोगितांही अनुदिनीं ।
    अधिक प्रेम वाढलें मनीं । ऐसा तिजलागूनी आसक्त ॥ ८६ ॥
     उपभोग घेतलेल्या स्त्रीचाच रोजच्यारोज उपभोग घेऊ लागलें असतां प्रेम अधिकाधिकच वाढते. त्याप्रमाणेच त्याची अवस्था होऊन तो तिच्यावर अतिशय आसक्त होऊन राहिला ८६.


    भोगितां उर्वशीकामासी । नेणे दिवसमासवर्षांसी ।
    व्ययो झाला आयुष्यासी । हेंही त्यासी स्मरेना ॥ ८७ ॥
    उर्वशीचा भोग घेता घेतां दिवस, महिने किंवा वर्षेसुद्धा गेलेली त्याला समजली नाहीत. आयुष्याचा नाश झाला याचीसुद्धा त्याला आठवण राहिली नाही ८७.


    जेवीं अग्निमाजीं घृत पडे । तंव तंव ज्वाळा अधिक वाढे ।
    तेवीं कांता भोगितां वाडेंकोडें । काम पुढें थोरावे ॥ ८८ ॥
    अग्नीमध्ये तूप पडले असता त्याच्या ज्वाळा अधिकाधिकच वाढतात, त्याप्रमाणेच स्त्रीचा वारंवार उपभोग घेतल्याने कामही वाढत जातो ८८.


    विचारितां स्त्रीकामासी । अतितुच्छत्व दिसे त्यासी ।
    तोही भोगितां अहर्निशीं । विरक्ती रायासी नुपजेचि ॥ ८९ ॥
    स्त्रीविषयाचा विचार केला असता तो अत्यंत तुच्छ वाटतो. पण तो विषय रात्रंदिवस भोगीत असताही  राजाला वैराग्य उत्पन्न झाले नाही ८९.


    प्रीति गुंतली उर्वशीसीं । अतिग्लानी करितां तिसी ।
    परतोनि न येचि रायापाशीं । निघे वेगेंसीं सांडूनि ॥ ९० ॥
    उर्वशीवर त्याचा अगदी जीव जडून राहिला होता, म्हणून त्याने तिची अतिशय करुणा भाकली. तरी राजाकडे परतून न येता त्याला सोडून ती झपाट्याने निघून गेली ! ९०.


    उर्वशी न देखूनि पुढें । राजा विरहें मूर्च्छित पडे ।
    पाहों धांवे इकडेतिकडे । आक्रोशें रडे अतिदुःखी ॥ ९१ ॥
    उर्वशी जेव्हा समोर दृष्टीस पडेना, तेव्हां राजा तिच्या विरहदुःखानें मूर्च्छित पडला. आणि पुन्हा उठून इकडे तिकडे पाहू लागला. मोठमोठ्याने रडून त्याने आकांत मांडला ९१.


    अटण करितां दाही दिशीं । अवचटें आला कुरुक्षेत्रासी ।
    तंव अंतरिक्षीं उर्वशी । देखे दृष्टीसी नृपनाथ ॥ ९२ ॥
    याप्रमाणे दाही दिशांना हिंडत असतां तो अकस्मात् कुरुक्षेत्राला आला. तो अंतरिक्षांत असलेली उर्वशी राजाच्या दृष्टीस पडली ९२.


    देखोनि म्हणे धांव पाव । मजलागीं दे कां वेगीं खेंव ।
    येरी म्हणे मूढभाव । सांडीं सर्व विषयांधा ॥ ९३ ॥
    तिला पाहतांच तो म्हणाला, " अग उर्वशी, धाव ! मला पाव ! ये आणि मला लवकर आलिंगन दे." तेव्हा ती म्हणाली, " हे विषयांधा! हा सारा मूर्खपणा सोडून दे ९३; 


    आम्हां स्त्रियांची आसक्ती । कदा धड नव्हे गा भूपती ।
    सदा स्त्रियांची दुष्ट जाती । जाण निश्चितीं महराजा ॥ ९४ ॥
    भूपते, आमची स्त्रियांची आसक्ति कधीच बरी नव्हे. हे महाराजा ! स्त्रियांची जात नेहमी दुष्ट असते, हे पक्के लक्षात ठेव ९४, 


    विशेषें आम्ही स्वैरिणी । स्वेच्छा परपुरुषगामिनी ।
    आमुचा विश्वास मनीं । झणीं न मानीं नृपनाथा ॥ ९५ ॥
    विशेषेकरून आम्ही वेश्या स्वच्छंदी असतों, मनःपूत वागतों, व परपुरुषाशी स्वेच्छेने संग करतों; ह्याकरिता हे राजश्रेष्ठा ! तूं मनामध्ये आमचा विश्वास कधीही धरूं नको ९५.


    आम्हां प्रमदांच्या संगतीं । राया ठकले नेणों किती ।
    आतां सांडूनि आमची आसक्ती । होईं परमार्थीं विरक्त ॥ ९६ ॥
    हे राजा ! आम्हां स्त्रियांच्या संगतीने आजपर्यंत किती लोक फसले आहेत त्यांचा पत्ता नाही; तूं आता आमची आसक्ति सोडून विरक्त होउन परमार्थ-मार्गाला लाग ९६; 


    बहु काळ भोगितां माझा भोग । अद्यापि नुपजे तुज विराग ।
    कामासक्ति सांडूनि साङ्ग । साधीं चांग निजस्वार्थ ॥ ९७ ॥
    किती तरी काल तूं माझा भोग घेतलास, पण अद्यापही तुला वैराग्य उत्पन्न होत नाही ! तरी असें न करता कामासक्ति समूळ सोडून देऊन आपला खरा स्वार्थ साधण्याच्या मार्गास लाग" ९७.


    राजा ग्लानि करी अनेग । एकवेळ निजांगें अंग ।
    मज दे‍ई अंगसंग । सुखसंभोग भामिनी ॥ ९८ ॥
    परंतु तिचे हे भाषण राजाला रुचलें नाही. तो पुन्हा तिच्या पायधरण्या करूं लागला. तो म्हणाला, "तूं कसेंही करून मला एकदा अंगसंग दे. हे सुंदरी ! तूं मला एकवार सुखसंभोग दे" ९८.


    निलाग देखोनि ग्लानीसी । कृपेनें द्रवली उर्वशी ।
    मग ते आपुल्या पूर्व वृत्तांतासी । रायापाशीं निवेदी ॥ ९९ ॥
    त्याची अत्यंत ग्लानि पाहून उर्वशीच्या मनाला पाझर फुटला. आणि ती आपला पूर्ववृत्तांत राजापाशी सांगू लागली ९९.


    मी स्वर्गांगना अतिसुरूप । मज घडला ब्रह्मशाप ।
    तूं महाराजा पुण्यरूप । संगें निःशाप मी झालें ॥ १०० ॥
    मी अत्यंत सुस्वरूप अशी स्वर्गांगना आहे; मला ब्रह्मादेवाचा शाप झाला होता; परंतु तूं अत्यंत पुण्यवान् राजा असल्यामुळे तुझ्या संगतीने मी त्या शापापासून मुक्त झाले १००; 

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...