मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २६ ओव्या ३०१ ते ४००

    एवढी पावावया निजप्राप्ती । त्यागावी कामिनीकामासक्ती ।

    मुख्यत्वें धरावी सत्संगती । हेंचि उद्धवाप्रती हरि बोले ॥ १ ॥
    एवढा निजलाभ पाहिजे असेल तर स्त्रियांची विषयासक्ति सोडून द्यावी. आणि मुख्यत्वेकरून सत्संगति धरावी, हेच उद्धवाला श्रीकृष्ण सांगत आहेत १.


    ततो दुःसङ्गमुत्सृज्य सत्सु सज्जेत बुद्धिमान् ।
    सन्त एतस्य छिन्दन्ति मनोव्यासङ्गमुक्तिभिः ॥ २६ ॥
    [श्लोक २६] म्हणून बुद्धिमान पुरूषाने दुःसंग सोडून देऊन सत्संग धरावा संतपुरूष सदुपदेशाने मनातील आसक्ती नष्ट करतात. (२६)


    अवश्य त्यागावी दुःसंगता । तो दुःसंग कोण म्हणशी आतां ।
    तरी स्त्री आणि स्त्रैणावरता । दुःसंग सर्वथा असेना ॥ २ ॥
    दुःसंग असेल तो अवश्य सोडून द्यावा. आता तो दुःसंग कोणता? असें तूं म्हणशील, तर स्त्री आणि स्त्रैण यांच्यापेक्षा अधिक दुःसंग दुसरा कोणताच नाही २.


    जो मानीना वेदशास्त्रार्था । जो अविश्वासी परमार्था ।
    ज्यामाजीं अतिविकल्पता । तोही तत्त्वतां दुःसंग ॥ ३ ॥
    जो वेदशास्त्रार्थाला मानीत नाहीं; जो परमार्थावर विश्वास ठेवीत नाही आणि अंतरांत विकल्प भरलेला असतो तोही खरोखर दुःसंग होय ३.


    जो बोल बोले अतिविरक्त । हृदयीं अधर्मकामरत ।
    कामरोधें द्वेषा येत । तोही निश्चित दुःसंग ॥ ४ ॥
    जो अत्यंत विरक्तीचे भाषण करतो; परंतु हृदयामध्ये अधर्म कामाची अत्यंत प्रीति असते; कामनेच्या आड आले की द्वेषाला चढतो; तोही खरोखर दुःसंग होय ४.


    कां स्वधर्मकर्मविनीतता । बाह्य दावी सात्त्विकता ।
    हृदयीं दोषदर्शी संतां । हे दुःसंगता अतिदुष्ट ॥ ५ ॥
    तसेंच स्वधर्म, कर्म, विनय व सात्त्विक वृत्ति बाहेरून दाखवावयाची आणि अंत:करणांतून संतांचे दोष पहावयाचे. ही दुःसंगता अत्यंत दुष्ट होय ५.


    जो मुखें न बोले आपण । परी देखे साधूंचे दोषगुण ।
    तेंचि संवादिया दावी उपलक्षण । तो अतिकठिण दुःसंग ॥ ६ ॥
    जो तोंडाने मात्र बोलत नाही, परंतु मनाने साधूंचे गुणदोष पहातो; आणि संवादांत तें उपलक्षण दाखवितो; तो अत्यंत कठिण दुःसंग होय ६.


    मुख्य आपली जे सकामता । तोचि द्ःसंग सर्वथा ।
    तो काम समूळ त्यागितां । दुःसगता त्यागिली ॥ ७ ॥
    मुख्य आपली सकामताच खरोखर दुःसंग होय. तो काम समूळ टाकून दिला की, दुःसंगाचा त्याग झाला ७.


    कामकल्पनेचा जो मार । तोचि दुःसंग दुर्धर ।
    ते कामकल्पना त्यागी जो नर । त्यासी संसार सुखरूप ॥ ८ ॥
    कामकल्पनेचा मार हाच दुर्धर असा दुःसंग होय; जो पुरुष कामकल्पना टाकून देईल, त्याचाच संसार सुखाचा होईल ८.


    कामकल्पना त्यागावया जाण । मुख्य सत्संगचि कारण ।
    संतांचे वंदितां श्रीचरण । कल्पनाकाम जाण उपमर्दे ॥ ९ ॥
    कामकल्पना सुटावयाला सत्संगच मुख्य कारण आहे. संतांच्या चरणी लीन झाले की, कल्पना आणि काम आपोआप लयास जातात ९.


    संग सर्वथा बाधक । म्हणशी त्यजावा निःशेख ।
    तरी सत्संग न धरितां देख । केवीं साधक सुटतील ॥ ३१० ॥
    संग हा सर्वथैव बाधक आहे, ह्याकरितां साराच संग सोडून द्यावा असे म्हणशील, तर सत्संग न धरल्यास साधक कसे सुटतील? ३१०.


    सत्संगेंवीण जें साधन । तेंचि साधकां दृढ बंधन ।
    सत्संगेंवीण त्याग जाण । तेंचि संपूर्ण पाषांड ॥ ११ ॥
    सत्संगाशिवाय जे साधन तेंच साधकाला दृढ बंधन होते. सत्संगाशिवाय केलेला त्याग पाखांडपणाचा होय ११.


    चित्तविषयांचा संबंध । गांठीं बैसल्या सुबद्ध ।
    त्यांचा करावया छेद । विवेकें विशद निजसाधु ॥ १२ ॥
    चित्त आणि विषय ह्यांच्या गांठी घट्ट बसलेल्या आहेत; त्या विवेकाने सोडवावयाला एक साधूच समर्थ आहेत १२.


    संताच्या सहज गोठी । त्याचि उपदेशांच्या कोटी ।
    देहात्मता जीवगांठी । बोलासाठीं छेदिती ॥ १३ ॥
    संतांच्या साहजिक गोष्टी असतात, त्या कोट्यवधि उपदेशांपेक्षा अधिक असतात; देहात्मभावाने उत्पन्न झालेल्या जीवगांठी ते शब्दाने छेदून टाकतात १३.


    भावें धरिल्या सत्संगती । साधकां भवपाशनिर्मुक्ती ।
    यालागीं अवश्य बुद्धिमंतीं । करावी संगती संतांची ॥ १४ ॥
    सद्भावाने सत्संगति धरली असतां साधकांची संसारपाशातून मुक्तता होते. म्हणून बुद्धिमंतांनी संतांची संगति अवश्य करावी १४.


    त्या संतलक्षणांची स्थिती । अतिसाक्षेपें श्रीपती ।
    आदरें सांगे उद्धवाप्रती । यथानिगुती निजबोधें ॥ १५ ॥
    त्या संतांची लक्षणे कशी असतात ती यथार्थ रीतीने व आपल्या प्रसादवाणीनें अतिसंक्षेपाने श्रीकृष्ण मोठ्या आवडीनें उद्धवाला सांगत आहेत १५.


    सन्तोऽनपेक्षा मच्चित्ताः प्रशान्ताः समदर्शिनः ।
    निर्ममा निरहङ्कारा निर्द्वन्द्वा निष्परिग्रहाः ॥ २७ ॥
    [श्लोक २७] संतांना कशाचीही अपेक्षा नसते त्यांचे चित्त माझे ठायी जडलेले असते ते अत्यंत शांत आणि समदर्शी असतात त्यांचे ठिकाणी मीमाझेपणा नसतो सुखदुःखादी द्वंद्वे त्यांना बाधत नाहीत तसेच ते कशाचाही संग्रह करीत नाहीत. (२७)


    साधूंचे अमित गुण । त्यांत मुख्यत्वें अष्टलक्षण ।
    निवडूनि सांगे श्रीकृष्ण । ते कोण कोण अवधारीं ॥ १६ ॥
    साधूंचे गुण अनंत आहेत; पण त्यांतील आठ लक्षणे निवडून काढून श्रीकृष्ण सांगतात. ती कोणतीं कोणतीं हें ऐक १६.


    प्राप्ताप्राप्त-लाभावस्था । बाधूं न शके साधूंच्या चित्ता ।
    चित्त रातलें भगवंता । 'निरपेक्षता' या नांव ॥ १७ ॥
    लाभ किंवा हानि साधूंच्या चित्ताला बाधा करूं शकत नाहीं; चित्त नेहमी भगवंताकडेच लागलेलें असते; याचे नांव 'निरपेक्षता' १७.


    पैल विषयो मज व्हावा । ऐसा आठव नाठवे जीवा ।
    हा साधूचा निरपेक्षा ठेवा । जाण उद्धवा गुण पहिला ॥ १८ ॥
    हा अमुक एक विषय मला प्राप्त व्हावा अशी जिवाला आठवणसुद्धा होत नाही. उद्धवा ! हा साधूचा निरपेक्षपणाचा ठेवा, हा पहिला गुण होय १८.


    चित्तें चिंतावें चैतन्य । याचि नांवे 'मचित्त' पण ।
    याचि नांवें निरपेक्ष पूर्ण । इतर चिंतन भवबंधु ॥ १९ ॥
    चित्ताने चैतन्याचेच चिंतन करणे याचंच नांव ' मच्चित्त ' होणे होय. ह्याचेच नांव पूर्ण 'निरक्षेपता.' इतर कोणताही विषय चिंतन करणे ते संसारबंधनास कारण होतें १९.


    निरपेक्ष व्हावया एथ । जागृति स्वप्न सुषुप्तीआंत ।
    चिन्मात्रीं जडलें चित्त । या नांव 'मच्चित्त' गुण दुजा ॥ ३२० ॥
    याप्रमाणे निरक्षेप होण्याकरिता जागृतींत, स्वप्नांत व सुषुप्तींत चित्स्वरूपीं चित्त जडून राहणे ह्याचेच नांव ' मच्चित्त.' हा दुसरा गुण होय ३२०.


    देह झालिया लक्ष्मीयुक्त । अथवा हो कां आपद्भूत ।
    चित्त परमानंदीं निश्चित । या नांव 'मच्चित' उद्धवा ॥ २१ ॥
    देह लक्ष्मीने शृंगारला, किंवा आपत्तीने ग्रस्त झाला, तरी उद्धवा, चित्त परमानंदांतच निमग्न असणे ह्याचंच नांव ' मच्चित्त' होय २१.


    कामलोभादिदोषरहित । परमानंदीं जडलें चित्त ।
    शांति सुखवासें वसे तेथ । यालागीं 'प्रशांत' बोलिजे त्यासी ॥ २२ ॥
    चित्त कामलोभादि दोषरहित होऊन परमानंदांत जडून राहिले म्हणजे तेथें शांति सुखानें वास करिते, ह्यासाठी त्याला 'प्रशांत' असे म्हणतात २२.


    जरी प्राणान्त केला अपकार । तरी न म्हणे हा 'दुष्ट' नर ।
    अपकाऱ्या करी अतिउपकार । प्रशांतिप्रकार या नांव ॥ २३ ॥
    कोणी प्राणान्त होईपर्यंत जरी अपराध केला, तरी त्याला जो कधी 'दुष्ट' असे म्हणत नाही, उलट त्या अपकार करणाऱ्यावरही अत्यंत उपकार करतो, त्यालाच उत्कृष्ट शांति असें नांव आहे २३.


    जरी ठकूनि सर्वस्व नेलें । तरी क्षोभेना दोष बोले ।
    तें जाण ब्रह्मार्पण झालें । येणें अंगा आलें प्रशांतत्व ॥ २४ ॥
    सर्वस्व जरी ठकवून नेले, तरी ज्याला राग येत नाही, तो दोष म्हणत नाही, तर तें ब्रह्मार्पण झाले असेंच समजतो; त्यामुळेच तसा प्रशांतपणा अंगी बाणतो २४.


    ब्रह्मभावेंचि तत्त्वता । विश्वासणें सर्व भूतां ।
    कदा विकल्प नुपजे चित्ता । हे प्रशांतता गुण तिजा ॥ २५ ॥
    खरोखर ब्रह्मभावनेनेच सर्व प्राणिमात्रांवर विश्वास ठेवणे व चित्तांत विकल्प कधी उपजूं न देणे हाच 'प्रशांतता' नामक तिसरा गुण होय २५.


    ऐसा हा प्रशांत गुण । अंगीं बाणावया हेंचि कारण ।
    जगीं देखे 'समदर्शन' । ब्रह्मपरिपूर्ण समसाम्यें ॥ २६ ॥
    असा हा प्रशांतता गुण अंगी येण्याला कारण हेच की, जगामध्ये ब्रह्म परिपूर्ण भरलेले आहे अशा भावनेने त्याचा सर्वत्र 'समभाव ' असतो २६.


    जग पाहतां दिसे विषम । परी विषमीं देखे सम ब्रह्म ।
    तोचि 'समदर्शी' परम । हा गुण निरुपम पैं चौथा ॥ २७ ॥
    जग पाहूं गेलें असतां सर्वत्र वैषम्यच भरलेले, पण त्या वैषम्यांतच जो 'सम ब्रह्म' पाहतो, तोच खरा 'समदर्शी' होय. हाच निरुपम चौथा गुण समजावा २७.


    हे समदृष्टी यावया हाता । भावें भजोनि भगवंता ।
    निःशेष त्यजावी अहंममता । तेही कथा अवधारीं ॥ २८ ॥
    ही समद्दष्टि हाती येण्याकरिता भक्तिभावाने भगवंताचें भजन करून अहंता व ममता निखालस सोडून दिली पाहिजे. तीही गोष्ट ऐक २८.


    देहीं धरितां देहाभिमान । ते अहंता वाढवी 'मीपण' ।
    मीपणें 'ममता' जाण । वाढे संपूर्ण देहसंबंधें ॥ २९ ॥
    देहांत देहाभिमान धरला म्हणजे ती अहंता 'मीपणा' वाढविते. आणि त्या मीपणानें देहसंबंधी ह्यांची 'ममता' वाढते २९.


    जे वाढली अहंअममता । ते वर्तवी महादुःखावर्ता ।
    तेचि निवारावया निजव्यथा । सद्भावें गुरुनाथा शरण जावें ॥ ३३० ॥
    ही जी वाढलेली अहंममता असते ती महहुःखाच्या भोंवांत पाडते. तें निज दुःख निवारण्यासाठी भक्तिभावानें गुरुचरणाला शरण गेले पाहिजे ३३०.


    गुरुकृपा झालिया पूर्ण । माझ्या देहींचें जें मीपण ।
    तें उकलोनि दावितां जाण । जग संपूर्ण मी एक ॥ ३१ ॥
    गुरूची पूर्ण कृपा झाली आणि त्यांनी देहांतील मीपण उघड करून दाखविलें, म्हणजे सारे जग आपणच आहे असा अनुभव येतो ३१.


    जें जें सान थोर दिसे दृष्टीं । तें तें अवघें मीचि सृष्टीं ।
    माझ्या मीपणाची निजपुष्टी । घोंटीत उठी त्रैलोक्य ॥ ३२ ॥
    लहान थोर जें जें दृष्टीला दिसते, तें तें सारें सृष्टीमध्ये माझेच स्वरूप आहे, माझ्या मीपणाची व्याप्ति एवढी मोठी आहे की, ती साऱ्या त्रैलोक्याला घोंटीत सुटते ३२.


    ऐसा मीपणें परिपूर्ण । तेथ 'मी' म्हणावया म्हणतें कोण ।
    निःशेष निमालें मीतूंपण । 'निरभिमान' या नांव ॥ ३३ ॥
    अशा शुद्ध मीपणाने आपण परिपूर्ण असता तेथें देहाला मी म्हणावयाला म्हणणारे कोण आहे ? मीतूंपण सारेच आटोपलें. याचंच नांव 'निरभिमान' ३३.


    ऐसें माझें मीपण पाहतां । समूळ हारपली ममता ।
    हें 'माझें' म्हणावया पुरता । ठाव रिता नुरेचि ॥ ३४ ॥
    असा माझ्या मीपणाचा विचार केला असता माझेपणा म्हणजे 'ममता' सारी नाहींशीच होते. 'हे माझें ' असे म्हणण्यापुरती रिकामी जागाच शिल्लक राहात नाही ३४.


    माझ्या मीपणाबाहिरें । जैं ममतास्पद दुजें उरे ।
    तैं तेथ पूर्ण ममता स्फुरे । ते म्यां चिन्मात्रें घोंटिली ॥ ३५ ॥
    माझ्या मीपणाबाहेर 'माझे' असे म्हणण्यासारखें जर दुसरे स्थान उरेल, तर तेथे ममता स्फुरण पावेल. तिला मी चिन्मात्रस्वरूपाने गिळूनच टाकिलें आहे ३५.


    तेथ मीपणेंसीं मी माझें । नुरेचि तूंपणेंसीं तुझें ।
    ऐसे परब्रह्माचेनि निजें । झाले सहजें 'निर्मम' ॥ ३६ ॥
    तेव्हा मीपणाने 'मी आणि माझे', तसेंच 'तूंपणाने तुझें' म्हणणेच उरत नाही. असें परब्रह्माशी ऐक्य झाल्यामुळे सहजच 'निर्मम' होतें ३६.


    निर्मम निरभिमान । तें हें उद्धवा गा संपूर्ण ।
    पांचवें सहावें लक्षण । संताचें जाण निजगुह्य ॥ ३७ ॥
    उद्धवा ! 'निर्मम ' आणि 'निरभिमान ' ते सारे हेच. संतांचे निजगुह्य आणि पांचवें व सहावें लक्षण तें हेंच ३७.


    ऐसे निर्मम निरहंकार । जे हो‍ऊनि ठेले साचार ।
    त्यांसी द्वंद्वदुःखडोंगर । अणुमात्र न बाधी ॥ ३८ ॥
    असे जे खरोखरच निर्मम व निरहंकार होऊन राहतात, त्यांना द्वंद्वदुःखाचे डोंगर असले तरी ते अणुमात्र बाधत नाहीत ३८.


    देह अदृष्टाच्या वांटा । लागतां सुखदुःखांच्या झटा ।
    तो ब्रह्मसुखाचे चोहटा । देहाचा द्रष्टा हो‍ऊनि वसे ॥ ३९ ॥
    देह प्रारब्धाच्या वाट्याला देऊन सोडल्यानंतर सुखदुःखांच्या झटा लागल्या तरी, तो ब्रह्मसुखाच्या चवाठ्यावर देहाचा द्रष्टा-साक्षी होऊन राहातो ३९.


    देहासी पदवी आली थोरी । तो श्लाघेना जीवाभीतरीं ।
    देह घोळसितां नरकद्वारीं । तो अणुभरी कुंथेना ॥ ३४० ॥
    देहाला मोठी पदवी म्हणजे प्रतिष्ठा प्राप्त झाली, तरी तो अंत:करणामध्ये हर्ष मानीत नाही; किंवा देह कोणी नरकामध्ये घोळसला तरी तो किंचितही खेद पावत नाही ३४०.


    देह व्याघ्रमुखीं सांपडे । तेणें दुःखें तो न सांकडे ।
    देह पालखीमाजीं चढे । तैं वाडेंकोडें श्लाघेना ॥ ४१ ॥
    देह हा वाघाच्या तोंडांत सांपडला, तरी तो त्या दुःखाने विवळत नाही; अथवा देह पालखीपदस्थ झाला तरी त्याला आनंद होत नाही ४१.


    छाया विष्ठेवरी पडे । कां पालखीमाजीं चढे ।
    तेणें पुरुषा सुखदुःख न जोडे । मुक्तासी तेणें पाडें देहभोग ॥ ४२ ॥
    सावली विष्ठेवर पडली किंवा पालखीमध्ये चढली, तरी त्यामुळे त्या पुरुषाला सुख किंवा दुःख कांहींच होत नाही, त्याप्रमाणेच देहभोग मुक्ताला वाटत असतात ४२.


    त्याचे दृष्टीखालीं एकाएक । दुःखपणा मुके दुःख ।
    सुखपणा विसरे सुख । 'निर्द्वंद्व' देख या हेतू ॥ ४३ ॥
    त्याच्या दृष्टीपुढे दुःख दुःखपणाला मुकतें आणि सुख सुखपणाला विसरतें; यामुळे तो ' निर्द्वंद्व ' बनतो ४३.


    जो निर्मम निरभिमान । त्यासी नाहीं भेदभान ।
    अभेदीं मिथ्या द्वंद्वबंधन । हा सातवा गुण निर्द्वंद्व ॥ ४४ ॥
    तसेंच जो निर्मम व निरभिमान असतो, त्याला भेदाचे भान राहत नाही आणि अभेदामध्ये द्वंद्वबंधन हे मिथ्या होय. हा ' निर्द्वंद्व  ' म्हणजे अभेदभाव हा मुक्ताचा सातवा गुण होय ४४.


    जो निर्द्वंद्व निरभिमान पहा हो । त्यासी समूळ मिथ्या निजदेहो ।
    तेथ देहसंबंधें परिग्रहो । उरावया ठावो मग कैंचा ॥ ४५ ॥
    अहो ! पहा. जो निर्द्वंद्व  व निरभिमान असतो, त्याला आपला देहच मुळी मिथ्या वाटतो; तेथे त्याला देहसंबंधी परिवार वाढविण्यास अवकाश कोठचा? ४५.


    स्वजनधनस्त्रीपुत्रांसी । नांदोनि तो नातळें त्यांसी ।
    स्वप्नींची घरवात जागृता जैशी । तैसा साधूसी संसारु ॥ ४६ ॥
    आप्तइष्ट, धनसंपत्ति, बायकामुले यांच्याबरोबर राहून तो त्यांना शिवतसुद्धा नाही. स्वप्नांतला व्यवहार जसा जागृताला नसतो, त्याप्रमाणेच साधूंनाही संसार नसतो ४६.


    एवं परिग्रही असोन । साधु 'अपरिग्रही' पूर्ण ।
    हें आठवें मुख्य लक्षण । अतर्क्य जाण जगासी ॥ ४७ ॥
    तात्पर्य, साधु हे परिग्रही असूनही पूर्णपणे 'अपरिग्रही' असतात. हे त्यांचे आठवें मुख्य लक्षण होय. हे जगाला अगदी अतर्क्य असते ४७.


    साधु परिग्रही दिसती । परी ते परीग्रही नसती ।
    हेचि संतांची पावावया स्थिती । त्यांची निजभक्ती करावी ॥ ४८ ॥
    कारण, साधु हे परिग्रही दिसतात, पण ते परिग्रही नसतात. ही संतांची स्थिति प्राप्त होण्याकरिता त्यांचीच भक्ति करावी ४८.


    हें साधूचें अष्टलक्षण । तें ब्रह्मींचें अष्टांग जाण ।
    कीं अष्टमहासिद्धी निर्गुण । ते हे अष्टगुण साधूंचे ॥ ४९ ॥
    ही साधूंची अष्ट लक्षणे म्हणजे ब्रह्माची अष्ट अंगेच होत. किंवा या निर्गुणाच्या अष्टमहासिद्धीच असे हे साधूचे आठ गुण समजावे ४९.


    चैतन्यसरोवरींचें कमळ । विकासलें अष्टदळ ।
    तें हें संतलक्षण केवळ । स्वानंदशीळ साधूंचें ॥ ३५०॥
    चैतन्यसरोवरांतील आठ पाकळ्यांचे हे केवळ कमळच उमलले, असें हें संताचे-स्वानंदशील साधूचे लक्षण आहे ३५०.


    ऐसे हे अष्ट महागुण । सकळ भूषणां भूषण ।
    ज्यांचे अंगीं बाणले पूर्ण । ते साधु सज्जन अतिशुद्ध ॥ ५१ ॥
    असे आठ श्रेष्ठ गुण सर्व भूषणांना-भूषण असे आहेत. ते पूर्णपणे ज्यांच्या अंगीं बिंबतील ते साधु-सज्जन अत्यंत पवित्र होत ५१.


    इतर संगाचिये प्राप्ती । संग बाधक निश्चितीं ।
    तैशी नव्हे सत्संगती । संगे छेदी आसक्ती देहसंगा ॥ ५२ ॥
    इतर कोणाचाही संग प्राप्त झाला तर खरोखर बाधक होतो. तशी ही सत्संगति नव्हे. या संगाच्या योगाने देहसंगाची आसक्ति तुटते ५२.


    तेथ उपदेश नलगे कांहीं । संगेंचि देही करी विदेही ।
    तेचि साते श्लोकीं पाहीं । संतांची नवाई हरि सांगे ॥ ५३ ॥
    त्यासाठी त्यांना उपदेश करावा लागत नाही. केवळ संगच देहीचा विदेही करितो. तीच अपूर्वता सात श्लोकांनी श्रीहरि सांगतात ५३.


    तेषु नित्यं महाभाग महाभागेषु मत्कथाः ।
    संभवन्ति हिता नृणां जुषतां प्रपुनन्त्यघम् ॥ २८ ॥
    [श्लोक २८] हे भाग्यवान उद्धवा ! संतांच्या सभेत नेहमी माणसांचे हित करणार्‍या माझ्या कथा चालतात जे त्या ऐकतात, त्यांचे सगळे पाप नाहीसे होते. (२८)


    इंद्रपदादि ब्रह्मसदन । ये प्राप्ती नांव 'भाग्य' गहन ।
    तेही सत्संगासमान । कोट्यंशें जाण तुके ना ॥ ५४ ॥
    इंद्रपदापासून ब्रह्मलोकापर्यंत प्राप्ति होणे ह्याला मोठे 'भाग्य' म्हणतात. पण हेसुद्धा सत्संगाच्या कोठ्यांशाशी तुलणार नाही ५४.


    ऐशी जे कां सत्संगती । सभाग्य भाग्याचे पावती ।
    भगवद्भावें साधु वर्तती । माझे कथाकीर्ति-अनुवादें ॥ ५५ ॥
    अशी जी सत्संगति ती महाभाग्यवंतांना प्राप्त होते. साधु हे माझ्या कथाकीर्ति गायन करीत भगवद्भावनेनेच वागत असतात ५५.


    जे कथा अवचटें कानीं । पडतां कलिमलाची धुणी ।
    करूनि सांडीत तत्क्षणीं । जे गंगेहूनी पवित्र ॥ ५६ ॥
    ती कथा अकस्मात जरी कानावर पडली तरी तत्काल कलियुगासंबंधीं पातक सारे धुऊन काढते. कारण ती गंगेहूनही पवित्र आहे ५६.


    जेथ माझी निजकथा गाती । तीर्थें तेथे पवित्र होती ।
    ऐशिया भगवत्कथाकीर्ती । साधु गर्जती सर्वदा ॥ ५७ ॥
    जेथे माझी निजकथा गायन करतात, तेथील तीर्थेसुद्धा पवित्र होऊन जातात. अशा त-हेच्या भगवंताच्या कथा-कीर्ति साधु सदासर्वदा गर्जत असतात ५७.


    स्वयें आपण भागीरथी । सर्वदा ऐसें जीवीं चिंती ।
    कोणी साधु ये जैं मजप्रती । तैं माझीं पापें जाती निःशेष ॥ ५८ ॥
    स्वतः भागीरथी सुद्धा नेहमी मनांत चिंतन करीत असते की, कोणी साधु माझ्याकडे येईल तर माझी सारी पातकें नाहीशी होऊन जातील ५८.


    पार्वतीचा द्वेष मनीं । तें बद्धपाप मजलागुनी ।
    तेंही झडे संतचरणीं । सकळ पापा धुणी सत्संगें ॥ ५९ ॥
    माझ्या मनांत पार्वतीचा द्वेष असल्यामुळे मीही पातकानें बद्ध झाल्ये आहे. तेंही पातक संतचरणाने झडून जाईल. कारण, सत्संगतीने सर्व पातकें धुऊन जातात ५९.


    कां ज्याचें मुखीं हरिनामकीर्ती । त्याचे पाय जैं मजमाजीं येती ।
    तैं सकळ पापें माझीं जाती । ऐसें भागीरथी स्वयें बोले ॥ ३६० ॥
    किंवा ज्याच्या मुखांत हरिनामाची कीर्ति असते त्याचे पाय जर माझ्या पात्रांत येतील, तर माझी सारी पापें जातील, असें स्वत: भागीरथी म्हणत असते ३६०.


    ऐसी संतांची संगती । सदा वांछी भागीरथी ।
    अवचटें गेलिया संतांप्रती । पापें पळतीं प्राण्यांचीं ॥ ६१ ॥
    याप्रमाणे भागीरथीसुद्धा संतांच्या संगतीची निरंतर इच्छा करते. याकरिता सहज जरी संतांकडे गेले तरी प्राण्यांची पातके पळून जातात ६१.


    ते संतमुखींची माझी कथा । जैं अत्यादरें ऐके श्रोता ।
    तैं त्याचें निजभाग्य तत्त्वतां । मजही सर्वथा न वर्णवे ॥ ६२ ॥
    अशा त्या संतांच्या मुखांतील माझी कथा अत्यादराने श्रोता श्रवण करील, तर त्याचे भाग्य खरोखर मलासुद्धा वर्णन करता येणार नाहीं ६२.


    माझे कथेची अतिआवडी । नित्य नूतन नवी गोडी ।
    सादरें ऐकतां पापकोडी । जाळोनि राखोडी उरवीना ॥ ६३ ॥
    माझ्या कथेची अत्यंत आवड धरली असतां तींत नित्य नवीन गोडी उत्पन्न होते. आणि आदरपूर्वक ऐकिली असतां कोट्यवधि पापे जाळून खाक करते. राखुंडीसुद्धा शिल्लक ठेवीत नाहीं ६३.


    माझी कथा कां माझे नाम । सकळ पातकां करी भस्म ।
    हेंचि चित्तशुद्धीचें वर्म । अतिसुगम उद्धवा ॥ ६४ ॥
    माझी कथा किंवा माझे नाम हें  साऱ्या पातकांचे भस्म करून टाकते. उद्धवा ! चित्तशुद्धीचे अत्यंत सुगम वर्म तें हेच आहे ६४.


    योग याग वेदाध्ययन । करितां पवित्र नव्हे मन ।
    तें करितां हरिकथाश्रवण । होय अंतःकरण पुनीत ॥ ६५ ॥
    अनेक प्रकारचे योगायोग किंवा वेदाध्ययन केले तरी मन पवित्र होत नाही. तीच हरिकथा श्रवण केली असतां अंत:करण पवित्र होते ६५.


    अबद्व पढतां वेद । दोष बाधिती सुबद्ध ।
    नाम पढतां अबद्ध । श्रोते होती शुद्ध परमार्थतां ॥ ६६ ॥
    अबद्ध रीतीनें वेद पठण केला तर अनेक प्रकारच्या दोषांची बाधा होते. परंतु नाम जरी अशुद्ध म्हटले तरी म्हणणारे परमार्थतः शुद्धच होतात ६६.


    नाना योग याग वेदाध्ययन । तेथ अधिकारी द्वीज संपूर्ण ।
    कथाश्रवणें चारी वर्ण । होती पावन उद्धवा ॥ ६७ ॥
    अनेक प्रकारचे योग, याग किंवा वेदाध्ययन ह्याचे अधिकारी फक्त ब्राह्मणच असतात; परंतु उद्धवा ! कथेच्या श्रवणानें चारही वर्ण पावन होतात ६७.


    ऐसा लाभ कथाश्रवणीं । तरी कां नाइकिजे सकळ जनीं ।
    तें भाग्य भगवत्कृपेवांचूनी । सर्वथा कोणी लाहेना ॥ ६८ ॥
    आतां कथाश्रवणापासून जर इतका लाभ आहे, तर ती सारे लोक कां ऐकत नाहीत असें कोणी म्हणतील, तर भगवत्कृपेशिवाय तेवढे भाग्य कोणालाच प्राप्त होत नाही ६८.


    भगवत्कृपा पावले साङ्ग । त्यांसी कथाकीर्तनीं अनुराग ।
    तेचि निजभाग्यें महाभाग । स्वमुखें श्रीरंग बोलिला ॥ ६९ ॥
    ज्यांच्यावर भगवंताची पूर्ण कृपा झालेली असते, त्यांचेच कथाकीर्तनावर प्रेम असते. तेच भाग्याने श्रेष्ठ होत. असें श्रीकृष्ण स्वमुखाने सांगतात ६९.


    जगातें पवित्र करिती । माझी जाण नामकीर्ती ।
    ऐसा कळवळोनि श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥ ३७० ॥
    माझें नाम व कीर्ति जगाला पवित्र करून सोडते, असे कळवळून श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितले ३७०, 


    ऐशी भगवत्कृपेची प्राप्ती । केवीं आतुडे आपुले हातीं ।
    तेचि अर्थीं श्रीपती । विशद श्लोकार्थीं सांगत ॥ ७१ ॥
    परंतु अशी भगवत्कृपाप्राप्ति आपल्या हाती कशी येणार ? त्याविषयींच श्रीकृष्ण पुढील श्लोकार्थाने स्पष्ट करून सांगताहेत ७१.


    ता ये श्रृण्वन्ति गायन्ति ह्यनुमोदन्ति चादृताः ।
    मत्पराः श्रद्दधानाश्च भक्तिं विन्दन्ति ते मयि ॥ २९ ॥
    [ श्लोक २९] जे लोक आदराने आणि श्रद्धेने माझ्या कथांचे श्रवण, गायन आणि कौतुक करतात, तसेच जे माझेच चिंतन करतात, तेच माझी भक्ती प्राप्त करून घेतात. (२९)


    आपुलिया गृहकार्यार्था विषयव्यापारीं जातां जातां ।
    कानीं पडली हरिकथा । स्वभावतां प्रसंगें ॥ ७२ ॥
    कोणी आपल्या घरच्या कामासाठी जात असतांना हरिकथा सहजासहजी व प्रसंगानुसार कानावर पडली ७२,


    कृष्णकीर्तिकथनाक्षरें । रिघतांचि कर्णद्वारें ।
    भीतरील पाप एकसरें । निघे बाहिरें गजबजोनि ॥ ७३ ॥
     तरी त्या कृष्णकीर्तीच्या कथेची अक्षरें कर्णद्वारांत शिरतांच आंत असलेली झाडून सारी पातकें खडबडून बाहेर पडतात ७३.


    जेवीं पंचाननाची आरोळी । करी मदगजां रांगोळी ।
    तेवीं हरिकथेच्या मेळीं । होय रंवदळी महापापा ॥ ७४ ॥
    सिंहाची गर्जना कानावर येतांच मदोन्मत्त हत्तीची जशी रेवडी उडते, त्याप्रमाणे हरिकथा कानी पडतांच महापातकांची राख होऊन जाते ७४.


    ऐसा निघाल्या पापाचा केरु । कथेसी उपजे अत्यादरु ।
    कथावधानीं धरितां धीरु । हर्षे निर्भरु नर होय ॥ ७५ ॥
    असा पातकाचा केर निघून गेला की हरिकथेवर अत्यंत भक्ति जडते. आणि कथाश्रवणाकडे लक्ष दिले म्हणजे मनही हर्षाने परिप्लुत होते ७५.


    जंव जंव कथारहस्य जोडे । तंव तंव अनुमोदनीं प्रीति वाढे ।
    वाढले प्रीतीचेनि पाडें । ते कथा कैवाडें स्वयें गाय ॥ ७६ ॥
    कथेतील रहस्य जों जों समजावयास लागते तों तो तिच्याविषयी प्रेम वाढत जाते आणि त्या प्रेमाच्या भरात आवडीने ती कथा तो स्वत:च गाऊं लागतो ७६.


    फेडूनि लोकलाजेचें बिरडें । गातां हरिकीर्तिगुण पवाडे ।
    न पाहे तो कर्माकडे । न सांकडें सुहृदासी ॥ ७७ ॥
    लोकलज्जेचे बिरडे सोडून खुल्या मनानें हरीचे गुणानुवाद गाऊं लागले असतां तो आपल्या कर्मागाकडे पहातच नाही. आप्तइष्टांना भीत नाहीं ७७.


    निजभावें भगवत्कथा गातां । स्वयंभ उपजे सादरता ।
    तेणें अत्यादरें हरिकथा । होय सांगता अतिश्रद्धा ॥ ७८ ॥
    भक्तिभावानें भगवत्कथा गाऊं लागले असतां आवड आपोआपच उत्पन्न होते. त्यामुळे तो अधिक आदराने व अधिकाधिक श्रद्धेनेंच कथा सांगू लागतो ७८.


    जंव जंव कथा सांगे निवाडें । तंव तंव श्रद्धा अधिक वाढे ।
    प्रेमाचा पूर चढे । त्यामाजीं बुडे निज श्रद्धा ॥ ७९ ॥
    आणि जो जो आवडीनें कथा सांगतो, तों तों श्रद्धाही अधिक अधिक वाढत जाते; आणि अखेर प्रेमाला पूर चढून त्यांत ती श्रद्धाही बुडून जाते ७९.


    कथाकीर्तन अनुकीर्ती । वाढत्या श्रद्धेचिये प्रीतीं ।
    बाधूं न शके विषयासक्ती । तेणें मत्पर स्थिति साधकां ॥ ३८० ॥
    कथाकीर्तनाचे वाढत्या श्रद्धेनें प्रतिपादन होऊ लागले म्हणजे विषयासक्ति बाधू शकत नाही. आणि तेणेकरून साधकांना मत्परायणस्थिति प्राप्त होते ३८०.


    न करितां भगवद्भजन । वेदाध्ययन यज्ञ दान ।
    येणेंचि आम्ही जाऊं तरोन । म्हणती ते जन महामूढ ॥ ८१ ॥
    भगवद्भजन न करतां वेदाध्ययन किंवा यज्ञदान करूनच आम्ही तरून जाऊं असें म्हणणारे लोक महामूर्ख होत ८१.


    एथ मुख्यत्वें भगवद्भक्ती । हा विश्व्वास धरितां चित्तीं ।
    भगवत्पर झालिया वृत्ती । सर्व भूतीं मद्भाव ॥ ८२ ॥
    यांत भगवद्भक्तीच मुख्य आहे, असा मनामध्ये विश्वास धरला असतां वृत्ति भगवत्परच होते; आणि तेणेकरून सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी मद्भाव उत्पन्न होतो ८२.


    ऐसा भाव धरोनि हृदयीं । माझे भक्तीवेगळें कांहीं ।
    सर्वथा स्वयें करणें नाहीं । 'मत्पर' पाहीं या रीतीं ॥ ८३ ॥
    असा भाव अंत:करणांत धरून माझ्या भक्तीशिवाय ते दुसरे काहीच करीत नाहीत. अशा रीतीने 'मत्पर' होतात ८३.


    ऐशिया मत्परा वृत्तीं । सावधान निजस्थिती ।
    तेणें उपजे 'चौथी भक्ती' । तेंचि श्रीपति स्वयें सांगे ॥ ८४ ॥
    अशा मत्पर वृत्तीने ते निजस्थितीत सावधान राहतात. त्यायोगाने त्या भक्तांच्या ठिकाणी चौथी भक्ती उत्पन्न होते, हेंच श्रीकृष्ण स्वतः विशद करून सांगतात ८४.


    तेथ न करितां आठवण । अखंड होय हरिचें स्मरण ।
    क्रियामात्रें भगवद्भजन । सहजें जाण सर्वदा ॥ ८५ ॥
    तेथे आठवण न करतांच अखंड हरीचे स्मरण होते; जी जी क्रिया घडते, त्या त्या क्रियेनें निरंतर भगवद्भजन सहजच घडत असते ८५.


    जें जें 'दृष्टीं' देख आपण । थोर अथवा सूक्ष्म सान ।
    तें तें होय हरीचें निजदर्शन । सहजें भजन अहेतुक ॥ ८६ ॥
    तो दृष्टीने जें जें 'दृश्य ' पाहतो, तें थोर असो की लहान असो, त्यांत त्याला हरीचेंच दर्शन होते. हेच अहेतुक व सहज भजन होय ८६, 


    जें जें 'वाचा' वदे वचन । तेंतें होय हरीचें स्तवन ।
    स्तव्य स्तविता उणखूण । हेही आठवण विसरोनी ॥ ८७ ॥
    त्याची वाणी जें जें  भाषण बोलते, ते तें स्तव्य, स्तविता, इत्यादि लक्षणाची आठवण विसरून हरीचे स्तवनच होतें ८७.


    शब्दीं शब्दातें शब्दवितां । ते शब्दरूपें हरीची सत्ता ।
    शब्द द्योती ज्या शब्दार्था । ते अर्थग्राहकता हरीची ॥ ८८ ॥
    शब्दाने शब्द शब्दवितांना शब्दरूपाने ती हरीची सत्ताच असते. तसेंच शब्द ज्या शब्दार्थाचा द्योतक असतो ती अर्थग्राहकताही हरीची म्हणजे हरिरूपच होय ८८.


    यापरी 'शब्दश्रवण' । श्रवणीं श्रवण होतां जाण ।
    तो शब्दार्थ संपूर्ण । होय ब्रह्मार्पण श्रवणेंसीं ॥ ८९ ॥
    याप्रमाणे कानांनी शब्द श्रवण होत असतां तो सारा शब्दार्थ श्रवणासहवर्तमान ब्रह्मार्पण होत असतो ८९.


    'गंध' घ्राणां होतां भेटी । भोक्तेपणें हरीचि उठी ।
    तो घ्रेय घ्राता घ्राण त्रिपुटी । स्वयें घोंटी चिदत्वें ॥ ३९० ॥
    नाकाची आणि सुवासाची गांठ पडली असतां भोक्तेपणाने हरिच उभा असतो. अर्थात् तो वास घेण्याचा पदार्थ, वास घेणारा, आणि नाक ही त्रिपुटी चिद्रुपाने गिळून टाकतो ३९०.


    'रस' रसना रसत्वबोध । तेथ निजभोक्ता गोविंद ।
    तो भोग्य भोक्ता भोजनसंबंध । करी परमानंद निजबोधें ॥ ९१ ॥
    'रस', 'रसना' आणि 'रसाभिरुचि' यांतही श्रीहरिच भोक्ता असतो. त्यामुळे भोग्य, भोक्ता व भोजनसंबंध निजबोधाच्या योगानें तो परमानंदरूप करितो ९१.


    'शीत-उष्ण-मृदु-कठीण' । निजांगीं लागतां जाण ।
    तें अंगेंचि होय आपण । मृदु कठिण मिथ्यात्वें ॥ ९२ ॥
    शीतउष्ण-मृदु-कठीण (हे 'स्पर्श' विषयांतील चार गुण) अंगास लागले असता ते स्वतःच तो होतो; कारण मृदु, कठीण इत्यादि भेद तो मिथ्या समजतो. त्याला या सर्वात चित्सत्ताच स्फुरते ९२.


    'करां' ची जे कर्तव्यता । तीतें चालवी अकर्तता ।
    यालागीं घेतां देतां । अकर्तात्मतां हरिभजन ॥ ९३ ॥
    हाताची जी किया ती तो अकर्तेपणानेच चालवितो; म्हणून देतां घेतांनाही अकर्तात्मभावानें हरीचेंच भजन होतें ९३.


    निश्चळ निजरूपावरी । चपळ पाउलांच्या हारी ।
    चालवी जैशा लहरी । सूर्यकरीं मृगजळाच्या ॥ ९४ ॥
    निजरूपावर निश्चळ झाला असल्याने, चपळ 'पाऊलांच्या ' पंक्ति या सूर्यकिरणांनी उत्पन्न झालेल्या मृगजळाच्या लाटांप्रमाणे चालवितो ९४.


    जागृति-स्वप्न-सुषुप्तीं । चिन्मात्रीं जडली वृत्ती ।
    चित्त चित्तत्वाची विसरे स्फूर्ति । या नांव 'मद्भक्ति' उद्धवा ॥ ९५ ॥
    जागृतिस्वप्नसुषुप्तीमध्ये चितस्वरूपातच वृत्ति जडलेली असते, त्यामुळे उद्धवा ! 'चित्त' हे चित्तपणाची स्फूर्तिच विसरून जातें ; ह्याचंच नांव ' मद्भक्ति ' होय ९५.


    हे माझी आवडती भक्ती । इचें नांव म्हणिजेत 'चौथी' ।
    हें भाग्य आतुडे ज्याचे हातीं । तैं चारी मुक्ती निजदासी ॥ ९६ ॥
    ही माझी अगदी आवडती भक्ति. हिलाच 'चौथी' भक्ति असें म्हणतात. या भक्तीचे भाग्य ज्याच्या हाती येते. त्याच्या चारही मुक्ति दासी होऊन राहतात ९६.


    भक्तिं लब्धवतः साधोः किमन्यदवशिष्यते ।
    मय्यनन्तगुणे ब्रह्मण्यानन्दानुभवात्मनि ॥ ३० ॥
    [लोक ३०] अनंत गुणांचा आश्रय, आनंदानुभवस्वरूप अशा ब्रह्मरूप माझी भक्ती ज्याला प्राप्त झाली, त्या सत्पुरूषाला दुसरे मिळवावयाचे काय शिल्लक राहाते ? (३०)


    अत्यंत माझी पढियंती । ते हे जाण चौथी भक्ती ।
    निजभाग्यें लाधल्या हातीं । चारी मुक्ती तृणप्राय ॥ ९७ ॥
    ही माझी अत्यंत आवडती अशी चौथी भक्ति होय. ही जर भाग्याने प्राप्त झाली, तर चारही मुक्ति होऊन जातात ९७.


    निरपेक्ष जेथ माझी भक्ती । तेथ पायां लागती चारी मुक्तीं ।
    त्यांतें भक्त न धरिती हातीं । एथवरी प्रीति मद्भजनीं ॥ ९८ ॥
    जेथें निरपेक्ष माझी भक्ति असते, तेथें चारही मुक्ति पायांला लागतात; पण भक्त त्यांना हातसुद्धा लावीत नाहीत. इतकी माइया भजनावर त्यांची प्रीति असते ९८.


    माझिया निजभजनप्रीतीं । स्वप्नींही बद्धता नेणिजे भक्तीं ।
    बद्धतेवीण मिथ्या मुक्ती । जाणोनि न घेती निजभक्त ॥ ९९ ॥
    माझ्या भजनाच्या प्रेमामुळे भक्तांना बद्धता म्हणजे काय तें स्वप्नांतसुद्धा जाणवत नाहीं; आणि बद्धतेशिवाय मुक्ति ही मिथ्या होय; म्हणून ती माझे भक्त घेत नाहीत ९९.


    जेथ बद्धता समूळ कुडी । तेथ मुक्ति कायशी बापुडी ।
    माझिया निजभजन‍आवडीं । स्वानंदकोडी मद्भक्तां ॥ ४०० ॥
    समूळ बद्धताच जेथें खोटी, तेथें मुक्ति बिचारी काय? माझ्या भजनाच्या आवडीमध्येच माझ्या भक्तांना स्वानंदाच्या राशि मिळत असतात ४००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...