मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ ओव्या २०१ ते ३००

    जे निजोनियां निजशेजारीं । जे काळीं माझी इच्छा करी ।

    तेचि काळीं तेचि अवसरीं । सुखशेजारीं मी निववीं ॥१॥
    जी आपल्या बिछान्यावर निजून ज्या वेळी माझी इच्छा करीत असे, त्याच वेळीं आणि अगदी त्याच क्षणाला मी तिला आनंददायक सहवासानें तृप्त करीत असें १.


    मज कुडकुडें नाहीं येणें । नाहीं कवाड टणत्कारणें ।
    नित्य निजशेजें निववणें । जे जीवेंप्राणें अनुसरली ॥२॥
    मला कधीं लपून छपून यावे लागत नसे, किंवा दारावर खुणेचा आवाजही करावा लागत नसे. जी जीवाभावानें मला वश झाली, तिला मी नेहमीं तिच्या शय्येवरच तृप्त करीत असें २.


    ऐसा सर्वकामदायक । पुरुषांमाजीं मीचि एक ।
    हा गोपिकीं जाणोनि विवेक । भाव निष्टंक धरियेला ॥३॥
    असा सर्व मनोरथ पूर्ण करणारा पुरुषांमध्यें एक मीच आहे, हा विचार जाणून गोपींनी सर्वस्वीं माझीच शुद्ध भक्ति धरिली होती ३.


    ज्यासी भाळले निष्काम तापसी । ज्यासी भाळले योगी संन्यासी ।
    गोपी भाळल्या त्यासी । देहगेहांसी विसरोनी ॥४॥
    ज्याच्यावर निष्काम तपस्वीही भुलून गेले आहेत, ज्याच्यावर योगी आणि संन्यासीही मोहित झाले आहेत, त्याच्यावरच देह व घरदार ही विसरून गोपी भाळल्या होत्या ४.


    अंधारीं गूळ खातां । कडू न लगे तो सर्वथा ।
    तेवीं नेणोनि माझी सच्चिदानंदता । मातें सेवितां मी जाहल्या ॥५॥
    अंधारांत गूळ खाल्ला असतां तो मुळींच कडू लागत नाही. त्याप्रमाणें माझें सच्चिदानंद स्वरूप न जाणतांही माझी सेवा करतां करतां त्या मत्स्वरूप झाल्या ५.


    परिस मानोनि पाषाण । फोडूं जातां लोहाचा घण ।
    लागतांचि होय सुवर्ण । तैशा जाण गोपिकां ॥६॥
    परीस हा दगडच आहे असे समजून लोखंडाच्या घणानें त्याला फोडूं लागले असतां तो लोखंडाचा घण त्याला लागतांच घणाचे सोनें होते. त्याप्रमाणेंच गोपींची अवस्था झाली, हें लक्षांत ठेव ६.


    विष म्हणोनि अमृत घेतां । मरण जाऊनि ये अमरता ।
    तेवीं जारबुद्धीं मातें भजतां । माझी सायुज्यता पावल्या ॥७॥
    विष असे समजून अमृत घेतले असतां मृत्यु टळून अमरत्व प्राप्त होते. त्याप्रमाणें जारबुद्धीनें माझ्या भजनीं लागल्या असतां त्या माझ्या सायुज्यपदाला पोंचल्या ७.


    म्यां गोपिकांसी कामू केला । कीं त्यांचा सर्व कामू हरिला ।
    विचारितां अर्थ एथिला । मोक्ष फावला मत्कामें ॥८॥
    मी गोपींशी कामविलास केला, की त्यांचा सर्व काम नष्ट केला, या प्रकरणांतील अर्थाचा विचार केला असतां असेंच दिसून येते की, त्यांना माझ्याविषयींच्या कामानें मोक्षच प्राप्त झाला ८.


    ज्यांसी झाली माझी संगती । त्या एक दोन सांगों किती ।
    शत सहस्र अमिती । निजपदाप्रती पावल्या ॥९॥
    ज्यांना माझी संगति घडली, अशा त्या एक, दोन, किती सांगू ? शंभर-हजार-नव्हे, असंख्य गोपिका आत्मपदाला गेल्या ९.


    वैरागराच्या मणीप्रती । खडे लागले हिरे होती ।
    तैशी गोपिका माझ्या संगतीं । नेणों किती उद्धरल्या ॥२१०॥
    वैरागर नांवाच्या रत्नाला खडे लागले तर ते हिरेच होतात. त्याप्रमाणें माझ्या संगतीनें किती गोपिका उद्धरल्या त्यांची संख्याच मी जाणूं शकत नाही २१०.


    मी परब्रह्ममूर्ति चोखडी । माझिया व्यभिचारपरवडी ।
    धुतल्या अविद्यापापकोडी । मुक्ती रोकडी पावल्या ॥११॥
    मी परब्रह्माची सुंदर मूर्ति. माझ्याशी व्यभिचार करण्याच्या योगानें गोपिकांची अविद्या आणि पातकांच्या राशी धुतल्या जाऊन त्या गोपिका प्रत्यक्ष मुक्ति पावल्या. ११


    मी अथवा माझे संत । संगती होईल ज्यांसी प्राप्त ।
    ते मज पावले निश्चित । संदेह येथ न धरावा ॥१२॥
    मी अथवा माझे संत यांची संगति ज्यांना प्राप्त होईल, ते निश्चितपणे मला पोंचले. ह्याविषयी संशय करूं नये १२.


    माझे स्वरूपावरी लोक । विकल्पें ठेविती नाना दोख ।
    संत माझे निर्दोख । तत्संगें सुख निर्दुष्ट ॥१३॥
    कित्येक लोक विकल्पाच्या योगानें माझ्या स्वरूपावर अनेक प्रकारची दूषणे ठेवतात. परंतु माझे संत निर्दोष असल्यामुळें, त्यांच्या संगतीनें निर्मल सुख प्राप्त होते १३.


    उद्धवा त्वांही येचि अर्थीं । बहुत न करावी व्युत्पत्ती ।
    धरोनियां सत्संगती । संसारगुंती उगवावी ॥१४॥
    उद्धवा ! तूंही त्याबद्दल विशेष वायवाट करूं नये, व सत्संगति धरून संसाराची गुंतागुंत सोडवून टाकावी १४.


    तस्मात्त्वमुद्धवोत्सृज्य चोदनां प्रतिचोदनाम् ।
    प्रवृत्तिं च निवृत्तिं च श्रोतव्यं श्रुतमेव च ॥ १४ ॥
    [श्लोक १४] म्हणून हे उद्ववा ! तू विधिनिषेध, प्रवृत्ती किंवा निवृत्ती तसेच इहपरलोकासंबंधी सर्व कर्मांचा त्याग करून,


    माझें स्वरूप शुद्ध निर्गुण । वेद तितुका गा त्रिगुण ।
    त्या वेदाचें जें प्रेरण । तें गौण जाण मत्प्राप्तीं ॥१५॥
    उद्धवा ! माझे स्वरूप शुद्ध निर्गुण आहे. वेद आहेत तितके त्रिगुणात्मक मदाहेत, म्हणून त्या वेदांची जी प्रेरणा आहे, ती माझ्या प्राप्तीला असमर्थ होय असे समज १५.


    त्या वेदार्थें श्रुतिस्मृती । नाना कर्में करविती ।
    त्या कर्मांची कर्मगती । न कळे निश्चितीं कोणासी ॥१६॥
    त्या वेदार्थानें श्रुति-स्मृति अनेक प्रकारची कर्में लोकांकडून करवितात. त्या कर्मांची कर्मगति निश्चयानें कोणालाच कळत नाही १६.


    कर्म स्वरूपें परम गूढ । विधिनिषेधें अतिअवघड ।
    सज्ञानासी नव्हे निवाड । शास्त्रें दृढ विचारितां ॥१७॥
    कर्म हें स्वरूपानें फार गहन गाहे. विधि आणि निषेध यांनी ते फारच कठीण झाले आहे. थोर ज्ञानी माणसालाही शास्त्राधारानें सूक्ष्म विचार करताना कर्मांचा निर्णय होत नाही १७.


    केवळ कर्मचि कर्माआंत । एक प्रवृत्त एक निवृत्त ।
    सकाम निष्काम अद्‍भुत । अंगीं आदळत साधकां ॥१८॥
    कर्मांमध्येंच एखादे कर्म केवळ प्रवृत्तीचे असते, तर एखादे केवळ निवृत्तीचें असते. तसेंच एखादे सकाम असते, तर दुसरे निष्काम असते. असे कर्माचे स्वरूप अद्‌भुत आहे. ते साधकाच्या आंगावर येऊन आदळते १८.


    कर्म तितुकें आविद्यक । वेद तों त्रिगुणात्मक ।
    तत्संबंधीं श्रवण देख । साधनरूप वेदांत ॥१९॥
    कर्म म्हणून जितके आहे, तितकें सर्व अविद्यात्मकच आहे; आणि वेद त्रिगुणात्मक आहेत. तत्संबंधी साधनरूप वेदांत हाच श्रवण करण्यासारखा आहे १९.


    तमोगुणें कर्मकांड । रजोगुणें उपासनाकांड ।
    सत्त्वगुणें ज्ञानकांड । वेद त्रिकांड त्रिगुणात्मक ॥२२०॥
    तमोगुणानें कर्मकांड उत्पन्न झाले आहे; रजोगुणानें उपासनाकांड उत्पन्न झाले आहे, आणि सत्त्वगुणानें ज्ञानकांड उत्पन्न झाले आहे. ह्याप्रमाणें वेद हे निकांडात्मक व त्रिगुणात्मक आहेत २२०.


    वेदशास्त्र विधानविधी । यांचें मूळ अविद्या आधीं ।
    जे अविद्येस्तव देहबुद्धी । विधिनिषेधीं गोंवित ॥२१॥
    वेद, शास्त्रें, विधान व विधि यांचे मूळ आधी अविद्याच आहे. ज्या अविद्येमुळें देहबुद्धि उत्पन्न होऊन ती विधिनिषेधांमध्यें गुंतवून टाकते २१.


    यालागीं उद्धवा तूं आधीं । सांडीं अविद्या पां त्रिशुद्धी ।
    अविद्या सांडिल्या संबंधीं । सहजें वेदविधी सांडिला ॥२२॥
    ह्याकरितां उद्धवा ! तूं आधी खरोखरच ही अविद्या सोडून दे, आणि अविद्येचा संबंध सोडला असतां सहजच वेदविधि सोडल्यासारखे होतें २२.


    आधीं अविद्या ते कोण । हेंच आम्हां न कळे जाण ।
    मग तिचें निराकरण । केवीं आपण करावें ॥२३॥
    "पण आधी अविद्या म्हणजे कोण ? हेंच आम्हांला कळत नाही. मग तिचे निराकरण आपण कसे करावे ?" २३.


    निजकल्पनेचा जो बोध । तेचि अविद्या स्वतःसिद्ध ।
    तेणेंचि बाधे विधिनिषेध । ते त्यागिल्या शुद्ध ब्रह्मचि तो ॥२४॥
    असें म्हणशील तर ऐक. आपल्या कल्पनेंचाच जो बोध, तीच स्वतःसिद्ध अविद्या होय. तिच्यामुळेंच विधिनिषेध बाधतो. ती टाकून दिली की तो शुद्ध ब्रह्मच होतो २४.


    धूर पडिलिया रणीं । सहज कटक जाय पळोनी ।
    तेवीं अविद्या सांडितां सांडणीं । विधिविधान दोनी सहजेंचि ॥२५॥
    सेनापति समरांगणांत पतन पावला, की सर्व सैन्य आपोआपच पळून जातें, त्याप्रमाणें अविद्या सोडून दिली असतां विधि आणि विधान दोन्ही सहजच सोडलीं जातात २५.


    आंखु छेदिलिया पडिपाडें । रथ न चाले असतांही घोडे ।
    तेवीं अविद्या छेदिलिया निवाडें । विधिनिषेध पुढें न चलती ॥२६॥
    रथाचा कणाच पूर्णपणे कापून टाकला असतां घोडे जोडलेले असले तरी रथ चालत नाही. त्याप्रमाणें माझ्या स्वरूपाचा निर्णय करून अविद्याच छेदून टाकली असतां विधिनिषेधही पुढे चालत नाहींत २६.


    मूळ छेदिलिया एके घायीं । शाखा पल्लव छेदिले पाहीं ।
    तेवीं अविद्या छेदिलिया लवलाहीं । विधिनिषेध राही सहजचि ॥२७॥
    , एकाच घावानें मूळ तोडून टाकलें असतां शाखा व पल्लव तोडल्यासारखेंच होते. त्याप्रमाणें अविद्या सपाट्यासरशी तोडली असतां विधिनिषेध सहजर जागच्या जागीं नष्ट होतो २७.


    ऐकें वेदींचा तात्पर्यार्थ । मुख्य भजावा मी भगवंत ।
    तोचि शास्त्रीं विशदार्थ । करी वेदांतश्रवणार्थें ॥२८॥
    ऐक, वेदांतील तात्पर्यार्थ असा आहे की, मुख्यत्वेंकरून मला भगवंताला भजावें. शास्त्रामध्यें वेदान्तश्रवणार्थानें तोच स्पष्टार्थ सांगितला आहे २८.


    श्रवण केलियाचें फळ जाण । करावें अविद्यानिरसन ।
    अविद्या निरसिलिया श्रवण । पुढारें जाण लागेना ॥२९॥
    तो वेदान्त श्रवण केल्याचे फळ असें समज कीं, अविद्येचे निरसन करावे. त्या अविद्येचे निरसन केले असतां मग पुढे श्रवण करावे लागत नाही २९.


    जेवीं ठाकिलिया स्वस्थान । पुढारें न लगे गमनागमन ।
    तेवीं झालिया अविद्या निरसन । श्रवण मनन लागेना ॥२३०॥
    आपल्या ठिकाणावर पोंचले असतां जसे पुढे जाणें येणें उरत नाही, त्याप्रमाणें अविद्येचे निरसन झाले असतां श्रवण व मनन ह्यांची गरज लागत नाही २३०.


    म्हणसी अविद्या केवीं सांडे । हेंचि अवघड थोर मांडे ।
    हें अवघें उगवे सांकडें । तें मी तुज पुढें सांगेन ॥३१॥
    आता तूं म्हणशील की, अविद्या नष्ट होणार कशी ? हेंच मोठे कठीण वाटते. पण संकटही कसे दूर होतें तें मी तुला पुढे सांगेन ३१.


    वेदशास्त्रकर्मविधान । हें अविद्यायुक्त साधन ।
    ते अविद्या जावया जाण । मजलागीं शरण रिघावें ॥३२॥
    वेद, शास्त्र, किंवा कर्माचें विधान हें साधन अविद्यात्मकच आहे. ती अविद्या जाण्यासाठी मलाच शरण यावें हे लक्षांत ठेव ३२.


    मामेकमेव शरणं आत्मानं सर्वदेहिनाम् ।
    याहि सर्वात्मभावेन मया स्या ह्यकुतोभयः ॥ १५ ॥
    [श्लोक १५] सर्व प्राण्यांचा आत्मा असलेल्या एकमेव मला परमात्म्यालाच अनन्य भावाने शरण ये मग तुला कोणत्याही प्रकारचे भय राहाणार नाही. (१५)


    सांडूनि स्त्रीपुत्रविषयध्यान । सांडूनि योग योग्यता शहाणपण ।
    सांडूनि कर्मठता कर्माभिमान । मजलागीं शरण रिघावें ॥३३॥
    स्त्रीपुत्रादि विषयांचा ध्यास सोडून आणि योग, योग्यता, शहाणपणा, कर्मठपणा व कर्मांचा अभिमान दूर सारून मला शरण यावें ३३.


    सांडूनियां वेदाध्ययन । सांडूनियां शास्त्रश्रवण ।
    सांडूनि प्रवृत्ति निवृत्ति जाण । मजलागीं शरण रिघावें ॥३४॥
    वेदाध्ययन सोडून, शास्त्रश्रवण सोडून, प्रवृत्ति व निवृत्ति सोडून मला शरण यावें ३४.


    सांडूनि धनमानचेष्टा । सांडूनि सज्ञान प्रतिष्ठा ।
    सांडूनियां नाना निष्ठा । शरण वरिष्ठा मज यावें ॥३५॥
    द्रव्य आणि मान यांच्या चेष्टा सोडून, ज्ञानीपणा व प्रतिष्ठा ह्यांना सोडून अनेक प्रकारच्या निंद्य सोडून मला श्रेष्ठ ईश्वराला शरण यावें ३५.


    सांडूनियां वैदिक लौकिक । सांडूनि आगम तांत्रिक ।
    मज शरण रिघालिया देख । माझें निजसुख पावसी ॥३६॥
    वैदिक व लौकिक आचार सोडून, पुराणोक्त व तांत्रिक आचार सोडून मला शरण आले असतां माझें आत्मसुख मिळवशील ३६.


    सांडूनि कुळाचें उंचपण । सांडूनि जातीचा अभिमान ।
    सांडूनि आश्रमाचें श्रेष्ठपण । मजलागीं शरण रिघावें ॥३७॥
    कुलाचा उच्चपणा सोडून, जातीचा अभिमान सोडून, आश्रमाचा थोरपणा सोडून मला शरण यावें ३७.


    सांडूनियां ज्ञान ध्यान । सांडूनियां विधिविधान ।
    सांडूनियां देहाभिमान । मजलागीं शरण रिघावें ॥३८॥
    ज्ञान व ध्यान सोडून, विधि व विधान यांना सोडून, देहाचा अभिमान सोडून मला शरण यावे ३८.


    माझें नांव अंतर्यामी । हृदयींचें जाणता मुख्यत्वें मी ।
    तो मी चाळवेना शब्दधर्मीं । श्रद्धा परब्रह्मीं निर्ममत्वें ॥३९॥
    'अंतर्यामी' हे माझे नाव आहे. कारण मी मुख्यत्वेंकरून हृदयांतील भाव जाणणारा आहे. तो मी शब्दांच्या योगानें कधींही निरनिराळा होत नाही. मात्र ममत्व सोडून परब्रह्माच्या ठिकाणीं श्रद्धा ठेविली पाहिजे ३९.


    सर्व त्यागाचें त्यागितेपण । उद्धवा तुज मी सांगेन खूण ।
    सर्व सांडावा अभिमान । हें मुख्य लक्षण त्यागाचें ॥२४०॥
    उद्धवा ! सर्व त्यागांतील त्यागीपणा कसा असतो त्याचे लक्षण मी तुला सांगतो. सर्व अभिमान सोडावा हेंच त्यागाचे मुख्य लक्षण आहे २४०.


    सर्वही सांडोनि अभिमान । मज रिघालिया शरण ।
    तुज कैंचें जन्ममरण । माझे प्रतापें जाण तरशील ॥४१॥
    सर्व अभिमान सोडून मला शरण आले असतां मग तुला जन्ममरण कोठले ? माझ्या प्रतापानेंच तूं तरशील हे लक्षांत ठेव ४१.


    शरण रिघावयासाठीं । काय रिघावें गिरिकपाटीं ।
    किंवा सेवावी दरकुटी । अथवा दिक्पटीं भंवावें ॥४२॥
    "तुला शरण येण्याकरितां काय गिरिकंदरांत जाउन बसावें, की एखाद्या झोपडींत रहावें, की दाही दिशांना धुंडीत फिरावें ? ४२.


    तुज वस्तीसी नाहीं गांवो । नित्य नेमस्त कोण ठावो ।
    शरण रिघावया कोठें धांवों । ऐसा भावो कल्पिसी ॥४३॥
    तुला राहावयाला कोठें एखादा गांव नाही. तुझी नेहमींची एखादी ठरीव जागा कोणती ? तुला शरण येण्यासाठी धावावें तरी कोणीकडे ?" अशी मनांत तूं कल्पना करशील ४३.


    म्हणसी शरण रिघावें कवणे ठायीं । तरी मी असें तुझ्या हृदयीं ।
    त्या हृदयस्थासी लवलाहीं । शरण पाहीं रिघावें ॥४४॥
    आणि म्हणशील की, "तुला कोणत्या ठिकाणीं शरण यावें ?" तर बाबा ! मी तुझ्या हृदयांतच आहे. त्या हृदयांत राहणाऱ्यालाच त्वरित शरण जावें ४४.


    सर्वभावें सर्वस्वेंसीं । मज हृदयस्था शरण येसी ।
    तैं माझी सर्वगतता पावसी । सर्वभूतनिवासी हृदयस्थू ॥४५॥
    सर्वभावानें व सर्वस्वासह मला हृदयस्थाला शरण येशील, तेव्हांच सर्व प्राणिमात्रांत व हृदयांत राहणारा जो मी, त्या माझी सर्वव्यापकता तुलाही प्राप्त होईल ४५.


    तिळभरी राखोनि अभिमान । जरी मज रिघशी शरण ।
    तरी माझी प्राप्ती नव्हे जाण । अभिमान विघ्न प्राप्तीसी ॥४६॥
    तिळमात्रही अभिमान शिल्लक ठेऊन जर मला शरण येशील, तर माझी प्राप्ति व्हावयाची नाही. कारण अभिमान हेंच माझ्या प्राप्तीला विघ्न आहे ४६.


    श्वानें स्पर्शिलें पक्कान्न । तें जेवीं नातळती ब्राह्मण ।
    तेवीं जीवीं असतां अभिमान । साधकासी मी जाण नातळें ॥४७॥
    कुत्र्यानें पक्वान्नाला स्पर्श केला असतां, ज्याप्रमाणें ब्राह्मण त्या पक्वान्नाला स्पर्श करीत नाहीत, त्याप्रमाणें मनांत अभिमान राहिला असतां, मीही साधकाला स्पर्श करीत नाही ४७.


    रजस्वलेची ऐकोनि वाणी । दूर पळिजे पुरश्चरणीं ।
    तेवीं अहंकाराच्या साधनीं । थिता जवळुनी मी जायें ॥४८॥
    रजस्वला स्त्रीचे बोलणे ऐकून पुरश्चण करणारा जसा लांब पळून जातो, त्याप्रमाणें अहंकाराचे साधन जवळ असल्यास मी जवळ असलेलाही दूर जातो १८.


    रजकविटाळाचें जीवन । जेवीं नातळती सज्जन ।
    तेवीं हृदयीं असतां अभिमान । उद्धवा मी जाण न भेटें ॥४९॥
    परटानें विटाळले पाणी ज्याप्रमाणें सज्जन स्वीकारीत नाहीत, त्याप्रमाणें उद्धवा ! हृदयात अभिमान असतां मी भेटत नाही असे समज ४९.


    डोळां हरळू न विरे । घायीं कोत न जिरे ।
    टांकी मुक्तापळीं न शिरे । खिरीमाजीं न सरे सरांटा ॥२५०॥
    डोळ्यामध्यें गेलेला खडा विरघळत नाही, जखमेत शिरलेले भाल्याचे टोक त्यांतच जिरत नाही, मोत्यामध्यें टांकी शिरत नाही, किंवा खिरींत सराटा चालत नाही २५०,


    तेवीं मजमाजीं अभिमान । उद्धवा न रिघे गा जाण ।
    हे त्यागतात्पर्याची खूण । तुज म्या संपूर्ण सांगीतली ॥५१॥
    त्याप्रमाणें उद्धवा ! माझ्यामध्येही अमिमान शिरत नाही, हे लक्षांत ठेव. ही त्यागांतील तात्पर्याची खूण मी तुला पूर्णपणे सांगितली ५१.


    पत्‍नी विचरतां परपुरुषीं । देखोनि निजपती त्यागी तिसी ।
    तेवीं अभिमानरत भक्तांसी । मी हृषीकेशी नातळें ॥५२॥
    आपली पत्नी परपुरुषाशी सहवास करतांना दिसली असतां तिचा पति तिला सोडून देतो, त्याप्रमाणें भभिमानांत गुंतून राहणाऱ्या भक्तांना मी श्रीकृष्ण स्वीकारीत नाही ५२.


    यालागीं सांडूनि अभिमान । मज हृदयस्था रिघालिया शरण ।
    तुज मी उद्धरीन जाण । देवकीची आण उद्धवा ॥५३॥
    याकरितां अभिमान सोडून मला हृदयस्थाला तूं शरण आलास, तर उद्धवा ! देवकीची शपथ, तुझा मी उद्धार करीन ५३.


    म्हणसी तुज दोघी माता । कोणतीची आण मानूं आतां ।
    मज तुझीच आण तत्त्वतां । तुज निर्भयता माझेनि ॥५४॥
    पण तूं म्हणशील की, "तुला तर दोन आया आहेत, तेव्हा कोणत्या आईची शपथ खरी मानावी ?" तर मला खरोखर मीच शपथ आहे. तुला माझ्यामुळेंच निर्भयता प्राप्त होईल ५४.


    तूं बोलीं नातुडसी कांहीं । तुज सर्वथा क्रिया नाहीं ।
    तुझी आणभाक मानावी कायी । ऐसें जरी कांहीं कल्पिसी ॥५५॥
    "पण तूं शब्दांत कांही सापडत नाहीस आणि क्रिया म्हणून तुला कांहीच नाही. तेव्हां तुझी आणभाक तरी खरी मानावी काय ?" अशी जर काहीं मनामध्यें कल्पना आणशील ५५,


    पातेजूनि तुझिया बोलासी । थितें सांडावें स्वधर्मासी ।
    लटकें जाहलिया आणेसी । कोणें समर्थासीं भांडावें ॥५६॥
    आणि "तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून असलेला स्वधर्म सोडून द्यावा, व तुझी शपथ खोटी ठरली तर मग तुझ्यासारख्या समर्थाशी कोणी भांडत बसावें ?" असें म्हणशील तर ५६,


    उद्धवा ऐसें न म्हण । म्या जे वाहिली तुझी आण ।
    तें परमात्म्यावरी प्रमाण । सत्य जाण सर्वथा ॥५७॥
    उद्धवा ! असें मात्र म्हणू नको. मी जी तुझी शपय वाहिली, ती परमात्म्याचीच शपथ होय. ती सर्वथैव खरी आहे असे समज ५७.


    उद्धवा तूं आत्मा परिपूर्ण । मज तुज नाहीं मीतूंपण ।
    त्या तुझी म्यां वाहिली आण । परम प्रमाण परमात्मता ॥५८॥
    उद्धवा ! तूं माझा परिपूर्ण आत्मा आहेस. माझ्यामध्यें आणि तुझ्यामध्यें मीतूंपणाचा भेद नाही. त्या तुझी शपथ मी वाहिली, तिला परमात्मतत्त्व हेच थोर साक्षीदार आहे ५८.


    असतां प्रत्यक्ष प्रमाण । कां लागे भाक आण ।
    सर्वभावें मज आलिया शरण । आतांचि जाण तरशील ॥५९॥
    पण मी सांगितलेल्या सिद्धांताला प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे प्रमाणच असतांना आणभाक तरी कशाला पाहिजे ? सर्वभावानें तूं मला शरण आलास, तर आतांच्या आतांच तरशील असें समज ५९.


    मज शरण रिघाल्या वाडेंकोडें । कळिकाळ तुझिया पायां पडे ।
    कायसे भवभय बापुडें । कोण तुजकडे पाहेल ॥२६०॥
    मला प्रेमानें शरण आलास तर कळिकाळसुद्धां तुझ्या पायां पडेल. मग बिचारे संसाराचे भय ते किती ? तुझ्याकडे वक्रदृष्टीनें पाहण्याची छाती कोणाची आहे ? २६.


    शरण रिघतांचि तत्काळ । तूं लाहासी माझें बळ ।
    तेव्हां भवभय पळे सकळ । तुज कळिकाळ कांपती ॥६१॥
    तूं शरण आलास की तत्काळ तुला माझेंच सामर्थ्य प्राप्त होईल. तेव्हां संसाराचे सर्व भय नाहींसें होईल, आणि कळिकाळ तुला कांपावयाला लागतील ६१.


    तृणीं पेटलिया अग्निस्फुलिंग । तो जाळी नाना वनांचे दांग ।
    तैसें शरण आलिया अव्यंग । संसारदांग तूं जाळिसी ॥६२॥
    गवतामध्यें विस्तवाची ठिणगी पडून पेटली असतां तो अग्नि अनेक अरण्यांतील झाडेंच्या झाडें जाळून टाकतो, त्याप्रमाणें शुद्ध अंतःकरणानें तूं मला शरण आलास तर संसाराचे अरण्य तूं जाळून टाकशील. ६२.


    शरण यावें हृदयस्थासी । तो हृदयस्थ न कळे आम्हांसी ।
    उद्धवा तूं ऐसें म्हणसी । तरी ऐक त्या स्वरूपासी सांगेन ॥६३॥
    "हृदयस्थाला शरण यावें हे खरे, पण तो हृदयस्थ आम्हांला कळत नाही" असें तूं म्हणशील, तर उद्धवा ! त्याचेही स्वरूप सांगतों ऐक. ६३.


    सांडूनि रूपनाम‍अभिमान । स्फुरे जें कां उद्धवपण ।
    तें मज हृदयस्थाचें रूप जाण । त्यासी तुवां शरण रिघावें ॥६४॥
    नाम, रूप, इत्यादिकांचा अभिमान सोडून उद्धवपण म्हणून जें काय स्फुरण राहते, तेंच माझे हृदयस्थाचे स्वरूप होय असे समज. त्यालाच तूं शरण जा ६४.


    नाम-रूप-गुणवार्ता । हे माया जाण तत्त्वतां ।
    ते सांडूनि जे स्फुरे सत्ता । तें मज हृदयस्थाचें रूप ॥६५॥
    नाम, रूप किंवा गुण यांचा जो संबंध, तीच खरोखर माया होय. ती सोडून जी शक्ति स्फुरणरूप होत असते, तेच माझे हृदयस्थाचे स्वरूप होय ६५.


    ऐसेनि हृदयस्थ जोडल्या पहा हो । तेव्हां सर्व भूतीं पाहतां देवो ।
    तेथ वेगळा उरावया उद्धवो । रिता ठावो न दिसेचि ॥६६॥
    अशा रीतीनें हृदयस्थाची प्राति झाली की त्या वेळी सर्व प्राणिमात्रांमध्यें पहातांना देवच दिसूं लागतो. तेथे उद्धव म्हणून कोणी वेगळा राहावयाला रिकामी जागाच दिसत नाही. ६६.


    तेव्हां सर्व भूतीं मी एकू । निश्चयें जाण निष्टंकू ।
    देखतांही अनेक लोकू । त्यांसी मी एकू एकला ॥६७॥
    त्या वेळी सर्व प्राणिमात्रांमध्यें एक मींच भरलेला दिसतो. हे निश्चयानें खात्रीपूर्वक लक्षांत ठेव. डोळ्यांनी अनेक लोक पाहिले असतांही त्या सर्वांत मीच एकीएक दिसत असतो ६७.


    ऐसा तूं मिळोनि हृदयस्थासी । मी होऊनि मज पावसी ।
    माझी प्राप्ती उद्धवा ऐसी । निर्भयेंसी निश्चळ ॥६८॥
    अशा प्रकारें तूं हृदयस्थाशीं ऐक्यता पावलास, म्हणजे मग मद्रूप होऊन मला पावशील. उद्धवा ! अशी माझी प्राप्ति अगदी निर्भयपणाची आणि अढळ आहे. १८.


    ऐशी सांगोनि गुह्य गोष्टी । देवो उद्धवाची पाठी थापटी ।
    येरें चरणीं घातली मिठी । उठवितां नुठी सर्वथा ॥६९॥
    अशी गुह्य गोष्ट सांगून देव उद्धवाची पाठ थोपटूं लागला, तेव्हा त्यानेही देवाच्या पायांना मिठी घातली. कृष्ण त्याला वर उठवूं लागला तरी तो उठेना ६९.


    तुवां जें सांगितलें निजगुज । तें मज मानलें गा सहज ।
    बोला एकाचा संशय मज । तो मी तुज पुसेन ॥२७०॥
    तो म्हणाला, "तूं जी आपली गुप्त गोष्ट सांगितलीस, ती सहजच मला मान्य झाली. आता एका गोष्टीबद्दल मात्र मला संशय वाटतो, ह्याकरितां तेवढे मी तुला विचारीन." २७०.


    श्रीउद्धव उवाच -
    संशयः श्रृण्वतो वाचं तव योगेश्वरेश्वर ।
    न निवर्तत आत्मस्थो येन भ्राम्यति मे मनः ॥ १६ ॥
    [श्लोक १६] उद्वव म्हणाला हे योगेश्वरांचे ईश्वर ! आपला उपदेश ऐकून माझ्या मनात संशय उत्पन्न झाला आहे तो असा "स्वधर्मानुसार मी कर्म करावे की, सर्व सोडून आपल्याला शरण यावे" यामुळे माझे मन गोंधळून गेले आहे. (१६)


    वेदशास्त्राचें मथित सार । योगदुर्गींचे भांडार ।
    पिकल्या सुखाचा सुखसागर । मज साचार उपदेशिला ॥७१॥
    श्रीकृष्णा ! वेदांचे आणि शास्त्रांचे मंथन करून काढलेलें सार, किंवा योगरूप किल्यांतील भांडार, किंवा रसाळ सुखाचा भरलेला सुखसमुद्रच खरोखर मला उपदेश करून सांगितलास २७१.


    तूं योगियांचा योगेश्वर । सकळ जगाचा ईश्वर ।
    तुझें सत्य गा उत्तर । संशयकर मज वाटे ॥७२॥
    तूं योग्यांश योगीश्वर आहेस. तूं सर्व जगाचा ईश्वर आहेस. तुझे भाषण सत्यच असावयाचे, पण मला तें संशयास्पद वाटतें ७२.


    तुवांच सांगितलें साक्षेपें जाण । करावें गा स्वधर्माचरण ।
    तें सत्य मानूनि वचन । सर्वस्वें जाण विश्वासलों ॥७३॥
    तूंच मोठ्या कळकळीनें प्रथम सांगितलेंस की, स्वधर्माचरण करावे. आणि तेंच तुझे भाषण खरे मानून मी त्याच्यावरच सर्वस्वी विश्वास ठेवला ७३.


    करावें जें स्वधर्माचरण । तेंच म्हणशी माझें भजन ।
    शेखीं तेंही आतां सांडून । रिघावें शरण म्हणतोसी ॥७४॥
    जें स्वधर्माचरण करावयाचे तेंच माझे भजन होय असें सांगितलेंस, आणि आतां अखेरीला तेही सोडून देऊन शरण यावें म्हणतोस ! ७४.


    तरी आत्मा कर्ता कीं अकर्ता । हेंचि न कळे तत्त्वतां ।
    कर्म करावें कीं सर्वथा । आम्हीं आतां सांडावें ॥७५॥
    तेव्हां आत्मा हा कर्ता आहे की अकर्ता आहे. हेंच खरोखर कळत नाही. आम्ही आतां सर्व प्रकारे कर्म करावें की सोडून द्यावें ? ७५.


    तुझी विषम उपदेशव्युत्पत्ती । सांगतां आम्हां अबळांप्रती ।
    थोर संदेह वाढत चित्तीं । काय श्रीपती करावें ॥७६॥
    श्रीकृष्णा, तुझ्या उपदेशाची तर्‍हाच कांही अव्यवस्थित आहे. ती तूं सांगत असतांना आम्हां दुबळ्यांच्या मनामध्यें मोठा संशय मात्र वाढत जातो. श्रीकृष्णा ! आतां करावें तरी काय ? ७६.


    जरी आत्मा झाला अकर्ता । तरी कर्माचा कोण कर्ता ।
    जैं आत्म्यासी आली अकर्तव्यता । तैं त्याग सर्वथा घडेना ॥७७॥
    आत्मा जर अकर्ता होईल, तर कर्माचा कर्ता तरी कोण ? आणि आत्म्याकडेच जर अकर्तव्यता येईल, तर त्याग घडणे मुळीं संभवतच नाहीं ७७.


    ऐकोनि उद्धवाचा प्रश्न । सांवळा राजीवलोचन ।
    काय बोलिला हांसोन । सावधान परिसावें ॥७८॥
    हा उद्ध्वाचा प्रश्न ऐकून कमलनयन घनश्याम श्रीकृष्ण हासून काय म्हणाला तें नीट श्रवण करावें ७८.


    श्रीभगवानुवाच -
    स एष जीवो विवरप्रसूतिः प्राणेन घोषेण गुहां प्रविष्टः ।
    मनोमयं सूक्ष्ममुपेत्य रूपं मात्रा स्वरो वर्ण इति स्थविष्ठः ॥ १७ ॥
    [श्लोक १७] श्रीभगवान म्हणाले तो हा परमेश्वरच प्रथम अनाहत नादस्वरूप परावाणी नावाच्या प्राणासह मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करतो नंतर तोच मनोमय सूक्ष्म रूप ग्रहण करून मणिपूर चक्रामध्ये पश्यंती नावाची वाणी होतो. नंतर तोच कंठस्थानी असलेल्या विशुद्ध नावाच्या चक्रात येऊन मध्यमा नावाने वाणीचे किंचित स्थूल रूप धारण करतो त्यानंतर तोच मुखामध्ये येऊन र्‍हस्वदिर्घ इत्यादी मात्रा, उदात्तादी स्वर आणि ककारादी वर्ण इत्यादी रूपांनी वैखरी नावाची स्थूल वाणी होतो. (१७)


    ऐक बापा उद्धवा । मी मायेच्या निजस्वभावा ।
    अनुसरोनि जीवभावा । कर्तृत्व जीवा जीवत्वें ॥७९॥
    बाबा उद्धवा ! ऐक. मी मायेच्या स्वभावाला अनुसरून जीवदशेला आलेलों आहे, म्हणून जीवाला जीवधर्मानेंच कर्तृत्व घडत असते ७९.


    जळीं प्रतिबिंबला सविता । तो जळकंपें दिसे कांपता ।
    तेवीं अकर्ताचि मी दिसें कर्ता । जीव‍अहंतास्वभावें ॥२८०॥
    पाण्यामध्यें सूर्य प्रतिबिंबित झाला, आणि ते पाणी हालूं लागले, म्हणजे त्यामुळें त्यांतील सूर्यच हालतो असे दिसते. त्याप्रमाणें मी अकर्ताच असतांही जीवाच्या अहंताधर्मानें मी कर्ता असल्याप्रमाणें दिसतों २८०.


    राजा झालिया निद्रेआधीन । तो स्वप्नीं रंक होय आपण ।
    तेवीं प्रकृतीस्तव मज जाण । जीवपण आभासे ॥८१॥
    राजा निला वश झाला असतां तो एखादेवेळी स्वप्नामध्यें स्वतः भिकारी बनतो, त्याचप्रमाणें प्रकृतीमुळेंच मला जीवपणा असल्याचा भास होतो हे लक्षांत ठेव ८१.


    स्वयें राजा आहे आपण । तो स्वप्नीं रंकत्वें करी कोरान्न ।
    तेथें जो दे पसाभर कण । त्यासी वानी आपण राजा रे तूं ॥८२॥
    वस्तुतः स्वतः आपणच राजा आहे. पण स्वनामध्यें तोच भिकारी होऊन कोरड्या अन्नाची भीक मागतो. त्या वेळी जो कोणी मूठभर दाणे देतो, त्याची तो राजा आपण होऊन स्तुति करतो की, 'अरे, तूं राजा आहेस बरें !' ८२.


    आपणचि राजा आहे । हें त्याचें त्यास ठाउकें नव्हे ।
    तैसेंच जीवासही होये । पूर्णत्व स्वयें स्मरेना ॥८३॥
    वास्तविक तो आपणच राजा आहे, पण त्या वेळीं हे त्याचे त्यालाच ठाऊक नसतें. त्याप्रमाणेंच जीवालाही होते. त्याचे स्वतांचे पूर्णत्व त्यालाच कळत नाही ८३.


    जेवीं स्वप्नाचिया अवस्था । राजा रंकक्रिया करी समस्ता ।
    तेवीं अविद्येस्तव तत्त्वतां । कर्मकर्ता मी झालों ॥८४॥
    ज्याप्रमाणें स्वप्नांतील अवस्थेमध्यें राजा हा भिकाऱ्याप्रमाणें सर्व कृति करतो, त्याप्रमाणेंच खरोखर अविद्येमुळें मी कर्मकर्ता झालों आहे ८४.


    तेथें वेदोक्त विधिविधान । जीवाअंगीं आदळे जाण ।
    जंव नव्हे ब्रह्मज्ञान । तंव स्वधर्माचरण करावें ॥८५॥
    अशाच अवस्थेमध्यें वेदोक्त विधिविधान जीवावर कोसळतें ( करणें भाग पडते ). ह्याकरिता जोपर्यंत ब्रह्मज्ञान झालेलें नाही, तोपर्यंत स्वधर्माचरण करावें ८५.


    राजा राजपदीं जागा नव्हे । तंव रंकक्रिया त्यासी संभवे ।
    तेवीं जंव ब्रह्मज्ञान नव्हे । तंव सर्व करावे स्वधर्म ॥८६॥
    राजा जागा होऊन राजवैभवावर आला नाहीं, तोपर्यंत भिकाऱ्याप्रमाणें सर्व काम त्याच्या कडून घडते. त्याप्रमाणें जोपर्यंत ब्रह्मज्ञान झालेलें नाही, तोपर्यंत स्वधर्माचरण करावें ८६.


    राजा राजपदीं जागा झाला । तो भीक म्हणतांचि लाजला ।
    तेवीं ब्रह्मज्ञान जो पावला । तो 'मी कर्ता' या बोला न बोले कदा ॥८७॥
    कारण, राजा जागा होऊन राजपदावर आला की, 'भीक' असा शब्द म्हणतांच तो लाजू लागतो. त्याप्रमाणें जो ब्रह्मज्ञान पावला, तो 'मी कर्ता' हे शब्द कधीच बोलत नाहीं ८७.


    जैसें रायास मिथ्या रंकपण । तेवीं परमात्म्यासी जीवत्व जाण ।
    त्या जीवास शरीरीं संसरण । तें उपलक्षण अवधारीं ॥८८॥
    राजाला जसा खोटाच भिकारीपणा आलेला होता, त्याप्रमाणें परमात्म्यालाही जीवपणा हा मिथ्या होय हे लक्षांत ठेव. आता त्या जीवाला शरीरामध्यें संचार करावा लागतो, त्याचेही थोडेसें लक्षण ऐक ८८.


    जैसा जीव जडातें जीवविता । यालागीं जीवू ऐशी वार्ता ।
    सहजें तरी स्वभावतां । चैतन्यरूपता जीवाची ॥८९॥
    जीव हा जडाला सजीव करणारा आहे, म्हणून त्याला 'जीव' असें म्हणतात, तेव्हां सहजच त्याच्या स्वभावधर्माप्रमाणें जीवाला चैतन्यरूपता प्राप्त होते ८९.


    घटामाजीं दीपू घातला । तैं घटभरी प्रकाशू झाला ।
    तोचि घरामाजीं ठेविला । घरभरी झाला प्रकाश ॥२९०॥
    घागरीमध्यें दिवा ठेवला, तेव्हां घागरभर प्रकाश झाला. तोच दिवा घरांत ठेवला, तेव्हां घरभर प्रकाश झाला २९०.


    तेवीं शरीरमाजीं तरी जीवू । सहजें तरी हा सदाशिवू ।
    येथ बोलणें न लगे बहू । जीवशिव‍अनुभवू तो ऐसा ॥९१॥
    त्याप्रमाणें शरीरांत आहे तोपर्यंतच हा 'जीव' आहे, एरवीं विचार केला तर हा साक्षात् सदाशिवच आहे, आतां याविषयीं अधिक बोलण्याचे कांही कारणच नाही. जीवाचा आणि शिवाचा जो अनुभव, तो असा आहे ९१.


    आरिशाचा सूर्य दिसे हातीं । तेवीं शरीरीं जीवाची प्रसूती ।
    प्रकर्षेंसीं राहती स्थिती । यालागीं 'प्रसूती' बोलिजे ॥९२॥
    आरशांतील सूर्य हातांत असल्यासारखा दिसतो, त्याप्रमाणें शरीरामध्येंही जीवाची प्रसूति (जन्म) झालेली आहे. त्या जीवाची स्थिति प्रकर्षेंकरून राहते म्हणून तिला 'प्रसूति' असें म्हणतात ९२.


    आरसा अत्यंत लहान । तेथें सूर्य बिंबे संपूर्ण ।
    तेवीं विदेहा देहधारण । 'विवरप्रवेशन' त्या नांव ॥९३॥
    आरसा अगदी लहान असतो, तरी त्यांत सगळा सूर्य प्रतिबिंबरूपानें राहतो. त्याप्रमाणें विदेहाला देह धारण करावा लागतो. त्याला 'विवरप्रवेशन' म्हणजे बिळांत शिरणें असें म्हणतात ९३.


    थिल्लरीं चंद्रासी अभिव्यक्ती । तो गगनींचा दिसे अधोगती ।
    तेवीं शरीरीं जीवाची प्रसूती । अव्यक्त व्यक्तीं प्रवेशे ॥९४॥
    डबक्यामध्यें चंद्राचे प्रतिबिंब पडले म्हणजे तो आकाशांतील चंद्रच खाली गेलेला दिसतो. त्याप्रमाणेंच शरीरामध्यें जीवाची प्रसूति होते. म्हणजेच अव्यक्त हें व्यक्तामध्यें प्रवेश करते ९५.


    जळीं सविता प्रतिबिंबला । परी तो जळें नाहीं ओला झाला ।
    तेवीं कर्में करोनि संचला । अलिप्त ठेला निजआत्मा ॥९५॥
    पाण्यांत सूर्य प्रतिबिंबित झाला, तरी तो कांही पाण्यानें ओला होत नाही. त्याप्रमाणें देहामध्यें कर्में करीत राहिला तरी आपला आत्मा अलिप्तच राहिलेला असतो ९५.


    जळीं प्रतिबिंब आंदोलायमान । तेवीं जीवासी जन्ममरण ।
    थिल्लरीं चंद्र अडकला संपूर्ण । तेवीं कर्मबंधन जीवासी ॥९६॥
    पाण्यांतील प्रतिबिंब पाण्याच्या हेलकाव्यानें जसें हालते, त्याप्रमाणेंच जीवाला जन्ममरण प्राप्त होते. डबक्यांत जसा पूर्णचंद्र प्रतिबिंबरूपानें अडकला जातो, त्याप्रमाणेंच जीवालाही कर्माचें बंधन प्राप्त होते ९६.


    थिल्लरजळ आटलें । तेथें काय चंद्रबिंब निमालें ।
    तें चंद्रबिंब होवोनि ठेलें । जाहलें निमालें दोनी मिथ्या ॥९७॥
    डबक्यांतील पाणी आटून गेलें व प्रतिबिंब दिसेनासे झाले, म्हणून त्यामुळें चंद्रबिंब नाहीसे झाले काय ? तें चंद्राचे बिंब होते तसेंच राहिले. डबक्यांतील पाण्यामुळें तें उत्पन्न झालें, व पाणी आटतांच नाहींसे झाले ही दोन्ही खोटींच ९७.


    थिल्लरींचा चंद्र काढूं जातां । तो मिथ्यात्वें न ये हाता ।
    तेवीं देहीं मिथ्या जीवता । ते सत्य मानितां अतिदुःखी ॥९८॥
    डबक्यांतला चंद्र बाहेर काढावयास गेले तर तो मुळींच खोटा असल्यामुळें हातांत येत नाही. त्याप्रमाणें देहामध्यें जीवपणा खोटाच असतो. तो खरा मानला असतां अतिशय दुःखी व्हावे लागतें ९८.


    आरसा थोर अथवा लहान । तेथें सूर्य बिंबे संपूर्ण ।
    तेवीं मी अंतर्यामी जाण । सर्वांभूतीं समान समग्र असें ॥९९॥
    आरसा थोर असो की लहान असो, त्यांत संपूर्ण सूर्याचे प्रतिबिंब असतेंच. त्याप्रमाणें अंत:करणांत असणारा मी सर्व प्राणिमात्रांमध्यें समान आणि संपूर्ण भरलेला असतों ९९,


    सूर्य थिल्लराआंतौता । अडकला दिसे समस्तां ।
    तेवीं जीवासी कर्मबद्धता । मूर्ख तत्त्वतां मानिती ॥३००॥
    ======
    सूर्य हा सर्वांना डबक्याच्या आंत अडकलेला दिसतो, त्याप्रमाणें जीवाला कर्माचें बंधन आहे ते खरेंच आहे असें मूर्ख लोक मानतात ३००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...