मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ ओव्या ४०१ ते ५००

    जेथोनिया विक्षेपता । तेचि लाविली गुरुत्वपथा ।

    ऐसेनि साधनें साधितां । जग स्वभावतां परब्रह्म ॥१॥
    ज्याच्यापासून विक्षेप उत्पन्न व्हावयाचा, त्यालाच मी गुरुपणा दिला. अशा युक्तीने साधन केल्यामुळे, जग हे आपोआपच परब्रह्मस्वरूप झाले .१.


    पूर्वी गुरूंनीं बोधिलें नाहीं । तरी पृथ्व्यादिकें बोधितील कायी ।
    तोचि निजार्थ साधावया पाहीं । गुरूउपायीं प्रवर्तलों ॥२॥
    पूर्वी गुरूनेच जर बोध केला नसता, तर पृथ्वी वगैरेंनी काय बोध दिला असता ! निजस्वार्थ साधण्यासाठी मी गुरूंच्या साधनांत पडलों २.


    न ह्येकस्माद् गुरोर्ज्ञानं सुस्थिरं स्यात्सुपुष्कलम् ।
    ब्रह्मैतदद्वितीयं वै गीयते बहुधर्षिभिः ॥ ३१ ॥
    [श्लोक ३१] म्हणून एकाच गुरूकडून पुष्कळ ज्ञान मिळाले, तरी ते उत्तम ठसत नाही कारण एकाच अद्वितीय अशा ब्रह्माबद्दल ऋषींनी अनेक प्रकारे वर्णन केले आहे. (३१)




    गुरूनें सांगितलें निजज्ञान । हृदयीं प्रकाशलें चिद्भान ।
    तें विद्युत्प्राय चंचळ जाण । स्थैर्यपण त्या नाहीं ॥३॥
    गुरूने आत्मज्ञान सांगितल्याबरोबर हृदयांत चिद्‌भान प्रकट होते; पण ते विद्तुल्लतेत्रमाणे चंचळ असते, त्याला स्थिरता नसते ३.


    जें मूळींचि चंचळ । तें कदा नव्हे पुष्कळ ।
    क्षणां भासे क्षणां चपळ । तेणें तळमळ साधका ॥४॥
    मुळींच में चंचळ, ते कधींच दृढ होणे शक्य नाही. ते क्षणांत भासते, क्षणांत लुस्प्त होते. त्यामुळे साधकाला तळमळ लागून राहते ४.


    जैसें मुखींचें आमिष जाये । तेणें सर्प डंवखाइला राहे ।
    तैसी वेदना साधकां होये । वियोगु न साहे सर्वथा ॥५॥
    सापाच्या तोंडांतलें आमिष सुटून गेलें म्हणजे तो जसा चरफडत राहतो, त्याप्रमाणे साधकांना वेदना लागून राहतात. आत्मभानाचा वियोग त्याला मुळीच सहन होत नाही ५,


    येरवीं ब्रह्म अद्वितीय नित्य । हें सकळ ऋषींचें संमत ।
    त्यांसीही पुसों जातां बहुत । विक्षेप तेथ उठती ॥६॥
    बाकी ब्रह्म हें अद्वितीय व नित्य असल्याचे सर्व ऋषींना संमतच आहे; पण त्यांनाही विचारायला गेले असता त्यांतही अनेक विक्षेप उत्पन्न होतात ६.


    एक म्हणती ब्रह्म सगुण । एक म्हणती तें निर्गुण ।
    ऐसे वाद करिती दारुण । युक्तिखंडण अभिमानें ॥७॥
    कोणी म्हणतात ब्रह्म हे सगुण आहे, कोणी म्हणतात तें निर्गुण आहे. याप्रमाणे विद्वत्तेच्या अभिमानाने एकमेकांच्या युक्तिवादाचे खंडन करून मोठा कडाक्याचा वादविवाद माजवितात ७.


    एक म्हणती ब्रह्म सप्रपंच । एक म्हणती निष्प्रपंच ।
    मिळोनियां पांचपांच । शब्दकचकच वाढविती ॥८॥
    कोणी म्हणतात ब्रह्म सप्रपंच आहे; कोणी म्हणतात ते निष्प्रपंच आहे. असे पांचपांच जमून शब्दांची कचकच मात्र वाढवितात ८.


    प्रपंचदर्शन विक्षेपता । तेथ साधावया निज‍ऐक्यता ।
    सुबुद्धीनें नाना पदार्था । गुणग्राहकता गुरुरूपें ॥९॥
    प्रपंचदर्शनाने विक्षेपता उत्पन्न होते, त्या वेळी आत्मैक्य साधण्याकरितां सुबुद्धीने नाना पदार्थांच्या ठिकाणचे गुण गुरुरूपाने ग्रहण केले पाहिजेत ९.


    तेथ साधकांचे प्रश्न । सहसा न पवती समाधान ।
    यालागीं पुसावया मन । न रिघे जाण ते ठायीं ॥४१०॥
    विद्वान् लोकांकडे साधकांच्या प्रश्नाचे समाधान व्हावयाचे नाही, म्हणून विचारावयाला त्या ठिकाणी मन धजत नाही ४१.


    जेथूनि विक्षेपता वाढे । तेथेंचि ऐक्यता जोडे ।
    तें नानागुरुत्वें रोकडें । साधन चोखडें योजिलें ॥११॥
    याकरितां जेथून विक्षेप उत्पन्न होतो, तेथेच ऐक्य घडते; ह्याकरितां अनेक पदार्थांना गुरुत्व देणे हेच उत्तम साधन मी योजिले ११.


    जीं जीं सांगितलीं गुरुलक्षणें । तीं तीं निजबुद्धीचीं साधनें ।
    समूळ विक्षेपु तेणें । तीव्र धारणें छेदिला ॥१२॥
    गुरूची जी जी लक्षणे सांगितली, ती ती आत्मबुद्धीचीच साधनें होत. तेव्हा त्याच्याच तीक्ष्ण धारणेनें विक्षेप सारा छेदून टाकला १२.


    तेणें चंचलत्वें निश्चल । फावलें निजबोधाचें मूळ ।
    दृश्य देखतां केवळ । भासे सकळ चिन्मात्र ॥१३॥
    त्या चंचलपणानेच आत्मज्ञानाचे निश्चळ मूळ सांपडले. दृश्य पदार्थ पाहिला तरीसुद्धा सगळे चित्स्वरूपच भासू लागले १३.


    जें माझ्या निजगुरूंनीं । पूर्वी दिधलें होतें बोधुनी ।
    तेंचि नाना गुरुत्वें साधूनी । विक्षेप छेदुनी पावलों ॥१४॥
    पूर्वी माझ्या गुरूंनी जे ज्ञान मला दिले होते, तेंच अनेक गुरु करून विक्षेपाचें छेदन केल्याने मला दृढ झालें १४.


    निजगुरु तो एकुचि जाण । इतर गुरु साधकत्वें साधन ।
    हें यथातथ्य लक्षण । तुज निरूपण म्यां केलें ॥१५॥
    मोक्षगुरु हा एकच असतो; पण इतर गुरु त्याचेच ज्ञान दृढतर करण्यास साधनीभूत होतात. त्याचे यथातथ्य स्वरूप मी तुला पूर्वी सांगितलेच आहे १५.


    येथ प्रपंचाचें भानाभान । कर्म करितां न कळे जाण ।
    लाधली निजबोधाची खूण । समदर्शन सर्वदा ॥१६॥
    आतां कर्म केले तरी प्रपंचाचे भानाभान मुळी कळत सुद्धा नाही. निजबोधाची खूण पटल्यामुळे सदासर्वदा समदृष्टीच होऊन राहिली आहे १६.


    दृश्य देखतां दृष्टीं । नव्हे दृश्येंसीं भेटी ।
    हारपली कर्मत्रिपुटी । बोधकसवटी अभिनव ॥१७॥
    आतां दृश्य पदार्थ डोळ्यांनी जरी पाहिला, तरी तो दृश्यपणाने मुळीच दिसत नाही. कर्माची त्रिपुटी मुळीं नाहींशीच होऊन गेली. इतका ज्ञानाचा प्रभाव अपूर्व आहे १७.


    यथेष्ट करितां भोजन । उष्टेना निराहारलक्षण ।
    जगेंसीं वागतां जाण । एकलेपण मोडेना ॥१८॥
    यथेच्छ भोजन केले तरी निराहार लक्षण मोडत नाही, त्याप्रमाणेच जगाशी संबंध ठेवला तरी, आपला एकटेपणा मोडत नाहीं १८.


    तरंग सागरामाजीं क्रीडतां । न मोडे उदकाची एकात्मता ।
    तेवीं जगामाजीं वर्ततां । दुजी वार्ता मज नाहीं ॥१९॥
    समुद्रामध्ये लाटा खेळत असल्या तरी पाण्याचे ऐक्य कांहीं मोडत नाही. त्याप्रमाणेच जगामध्ये वागत असताही मला दुजेपणाची वार्ता माहीत नाहीं १९.


    नवल सद्‍गुरूची नवायी । सर्वी सर्व तोचि पाहीं ।
    गुरूवेगळें रितें कांहीं । उरलें नाहीं सर्वथा ॥४२०॥
    सद्गुरुचमत्कार मोठा अपूर्व आहे. सर्वांमध्ये सारा तोच भरून राहिला आहे. गुरूशिवाय रिकामें असें मुळींच काही उरलेले नाही ४२०.


    आतां माझें जें मीपण । तें सद्‍गुरु झाला आपण ।
    बोलतें तुझें जें तूंपण । तेंही जाण सद्‍गुरुचि ॥२१॥
    आता माझे जे मीपण आहे, तेही गुरु आपणच होऊन राहिला आहे. आणि तुझे म्हणून बोलणारें जें तूंपण आहे, तेंही सद्गुरुच आहे, असें तूं समज २१.


    याहीपरी पाहतां । माझा गुरु एक एकुलता ।
    तेथें दुजेपणाची वार्ता । नाहीं सर्वथा यदुराया ॥२२॥
    हे यदुराजा ! अशा रीतीनेही पाहिले असतां माझा गुरु एकुलता एकच आहे. त्याच्या दुसरेपणाची गोष्टच नाही २२.


    ऐशी सद्‍गुरुकथा । तुज सांगिली परमार्था ।
    हरिखें आलिंगिलें नृपनाथा । दोघां ऐक्यता निजबोधें ॥२३॥
    अशी ही सद्‌गुरूची कथा परमार्थाचा लाभ व्हावा म्हणून तुला सांगितली. असें म्हणून मोठ्या आनंदाने अवधूताने राजास आलिंगन दिले. निजबोधाच्या योगानें ते दोघे एकरूप होऊन गेले २३.


    जीवीं जीवा पडली मिठी । आनंदें वोसंडली सृष्टी ।
    तेणें वाचेसी पडली बेलवटी । बोलों उफराटी विसरली ॥२४॥
    अंतरंगाला अंतरंग भिडले. सृष्टि आनंदाने ओसंडून आली. तेणेंकरून वाणीला खीळ बसली, उत्तर प्रत्युत्तर करण्याचे ती विसरली २४.


    हरिखु न संठवे हृदयभवनी । बाहेर वोसंडे स्वेदेजोनी ।
    आनंदघन वोळला नयनीं । स्वानंदजीवनीं वर्षतु ॥२५॥
    तो हर्ष हृदयमंदिरांत मावेनासा होऊन घामाच्या रूपाने बाहेर पडला आणि आनंदरूपी मेघ डोळ्यांमध्ये भरून येऊन प्रेमाश्रूचा वर्षाव करूं लागला २५,


    तुटली अहंकाराची बेडी । पावलों भवार्णवपरथडी ।
    म्हणौनि रोमांची उभविली गुढी । जिंतिली गाढी अविद्या ॥२६॥
    अहंकाराची बेडी तुटली; संसारसमुद्राच्या पैलतीराला पोंचलों आणि अभेद्य अविद्या जिंकली म्हणून रोमांनी आपली गुढी उभारली (सर्वांग रोमांचित झाले) २६.


    समूळ देह भावो पळाला । यालागीं गात्रकंपु चळचळा ।
    संकल्पविकल्प निमाला । मनेंसीं बुडाला मनोरथु ॥२७॥
    देहाचे भान समूळ नाहीसे झाल्यामुळे शरीर थरथर कापू लागले; संकल्पविकल्प मावळला; आणि मनासह मनोरथ बुडाला २७.


    जीवभावो उखिता । यदूनें अर्पिला गुरुनाथा ।
    तें चिह्न बाहेरीं तत्त्वतां । दावी सर्वथा निजांगीं ॥२८॥
    यदूनें सारा जीवभाव गुरुनाथाला अर्पण केला. ते चिन्ह बाहेरही त्याच्या अंगावर दिसू लागले २८.


    तो अवधूत जाण दत्तात्रेया । तेणें आलिंगूनि यदुराया ।
    निजरूपाचा बोधु तया । अनुभवावया दीधला ॥२९॥
    तो अवधूत साक्षात् दत्तात्रेयच होता; त्यानें यदुराजाला आलिंगन दिले; आणि आत्मस्वरूपज्ञानाचा त्याला अनुभव आणून दिला २९.


    दत्तात्रेयशिष्यपरंपरा । सहस्रार्जुन यदु दुसरा ।
    तेणें जनार्दनु तिसरा । शिष्य केला खरा कलियुगीं ॥४३०॥
    दत्तात्रेयाची शिष्यपरंपरा म्हटली म्हणजे पहिला सहस्रार्जुन आणि दुसरा यदु आणि 'जनार्दन' हा तिसरा शिष्य दत्ताने कलियुगामध्ये केला ४३०.


    गुरुप्राप्तीलागीं सर्वथा । थोर जनार्दनासी चिंता ।
    विसरला तिन्ही अवस्था । सद्‍गुरु चिंतितां चिंतनीं ॥३१॥
    आपल्याला गुरुप्राप्ति कशी होईल म्हणून जनार्दनाला अतिशय चिंता लागून राहिली होती. त्या सद्गुरूच्या चिंतनामध्ये त्याला तिन्ही अवस्थांचा विसर पडला ३१.


    देवो भावाचा भोक्ता । दृढ जाणोनि अवस्था ।
    येणें जाहलें श्रीदत्ता । तेणें हातु माथां ठेविला ॥३२॥
    परंतु देव हा भावाचा भोक्ता असल्यामुळे, त्याची ती खरीखरी तळमळ जाणून श्रीदत्तदेव त्याच्याकडे आले व त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला ३२.


    हातु ठेवितांचि तत्काळ । बोधु आकळिला सकळ ।
    मिथ्या प्रपंचाचे मूळ । स्वरूप केवळ स्वबोधें ॥३३॥
    हात ठेवण्याबरोबर तत्काल जनार्दनाला आत्मबोधाचे आकलन झाले व त्या बोधाच्या योगाने प्रपंचाचें मूळच मिथ्या करून सोडले ३३.


    कर्म करूनि अकर्ता । तोचि अकर्तात्मबोधु जाहला देता ।
    देहीं असोनि विदेहता । तेही तत्त्वतां आकळिली ॥३४॥
    कर्म करून अकर्ता असणे तोच अकर्तेपणाचा बोध श्रीदत्तांनी त्याला दिला. देहांत असून विदेही राहण्याचा बोधही त्याने आकलन केला ३४.


    गृहाश्रमु न सांडितां । कर्मरेखा नोलांडितां ।
    निजव्यापारीं वर्ततां । बोधु सर्वथा न मैळे ॥३५॥
    गृहस्थाश्रम न सोडतां, कर्ममर्यादेचे उल्लंघन न करता, आपल्या व्यवहारांत वागले तरी आत्मबोध केव्हाही मळत नाही ३५.


    तो बोधु आकळतां मना । मन मुकलें मनपणा ।
    अवस्था नावरेचि जनार्दना । मूर्च्छापन्न पडियेला ॥३६॥
    असा बोध मनाने ग्रहण केल्यामुळे मनाचा मनपणाच नाहीसा झाला. ती अवस्था जनार्दनाला न आवरता आल्यामुळे तो मूर्छा येऊन पडला ३६.


    त्यासी सावध करूनि तत्त्वतां । म्हणे प्रेमा आहे सत्त्वावस्था ।
    तोही गिळोनि सर्वथा । होयीं वर्तता निजबोधें ॥३७॥
    तेव्हा त्याला तत्काळ सावध करून दत्तात्रेय म्हणाले की, "असा प्रेमा ही सत्त्वगुणाची अवस्था आहे; करितां तो गिळून टाकून निजबोधानेच वर्तत राहा" ३७.


    पूजाविधी करोनियां । जंव जनार्दनु लागला पायां ।
    तंव अदृश्य जाहला दत्तात्रेया । योगमायाचेनि योगें ॥३८॥
    तेव्हां जनार्दन पूजाविधि करून पायांवर मस्तक ठेवतो आहे, तोच योगमायेच्या योगाने दत्तात्रेय अदृश्य झाले ३८.


    कथेसी फांकलों सर्वथा । तो कोपु न मनावा श्रोतां ।
    प्रसंगें गुरुविवंचना होतां । मीही गुरुकथा बोलिलों ॥३९॥
    (एकनाथ श्रोत्यांना म्हणतात ) कथेमध्ये ही आडकथा झाली, याबद्दल श्रोत्यांनी राग मानू नये. प्रसंगानुसार गुरूसंबंधी विचार निघाला, म्हणून मीही गुरूचीच कथा सांगितली ३९.


    मज तंव चुकी पडिली मोठी । चुकूनि सांगितली गुरुगोठी ।
    तेही संस्कृत नव्हे मराठी । वृथा चावटी न म्हणावी ॥४४०॥
    माझ्या हातून ही मोठीच चुकी झाली. माझ्या गुरूची कथा मी चुकून सांगितली. तीही संस्कृतांत नव्हे, तर मराठीत ! पण ही उगीच बडबड केली असें मात्र म्हणू नये ४४०.


    जो असेल गुरुभक्त । तो हें जाणेल मनोगत ।
    जो गुरुस्मरणीं सदोदित । त्यासी हें हृद्‍गत कळेल ॥४१॥
    जो गुरूचा भक्त असेल, तो ह्यांतील हृद्‌गत ओळखील आणि जो निरंतर गुरूचे स्मरण करीत असेल, त्यालाच ह्यांतील मर्म कळेल ४४१ .


    ज्यांसी गुरुचरणीं श्रद्धा गाढी । ज्यांसी गुरुभजनीं अतिआवडी ।
    जिंहीं गुरुप्रेम जोडिलें जोडी । हे गोडी जाणती ॥४२॥
    ज्यांची गुरुचरणावर दृढतर निष्ठा असेल; गुरुभजनाची ज्यांना अत्यंत आवड असेल, ज्यांनी गुरुप्रेम संपादन केले असेल, त्यांनाच यांतील गोडी समजेल ४२.


    ज्या सद्‍गुरूचें नांव घेतां । चारी मुक्ती वोडविती माथा ।
    मुक्ति नावडे गुरुभक्तां । नित्यमुक्तता गुरुचरणीं ॥४३॥
    सद्गुरूचें नांव घेतले असतां चारीही मुक्ति मस्तक वांकवितात, परंतु गुरुभक्तांना मुक्ति मुळीच आवडत नाही. कारण, गुरुचरणाच्या ठिकाणी नित्यमुक्तता सहजच असते ४३.


    ज्याचें घेतां चरणतीर्थ । चारी मुक्ती पवित्र होत ।
    पायां लागती पुरुषार्थ । धन्य गुरुभक्त त्रिलोकीं ॥४४॥
    ज्यांच्या चरणाचे तीर्थ घेतले असतां चारीही मुक्ति पवित्र होऊन जातात आणि सारे पुरुषार्थ पायाला लागतात, ते गुरुभक्त त्रैलोक्यांत धन्य होत ४४.


    चैतन्य नित्य निराधार । निर्धर्मक निर्विकार ।
    त्याचा केला जीर्णोद्धार । सत्य साचार जगद्‍गुरु ॥४५॥
    नित्य, निराधार, निर्धर्म व निर्विकार अशा चैतन्याचा सद्गुरूंनीच खरोखर जीर्णोद्धार केला, म्हणून सद्गुरु हेच सत्स्वरूप होत ४५.


    सद्‍गुरुकृपा नव्हतां । नव्हती देवाची कथावार्ता ।
    देवासी देवपणीं स्थापिता । सत्य सर्वथा सद्‍गुरु ॥४६॥
    सद्गुरूची कृपा नसती तर देवांची कोणी वास्तपुस्तसुद्धा केली नसती. देवाला देवपणा देणारा खरोखर एक सद्गुरुच ४६.


    सद्‍गुरु कृपेवीण पाहीं । देवो असतुचि झाला होता नाहीं ।
    त्यासी देवपणीं ठेवूनि ठायीं । भजविता पाहीं गुरुरावो ॥४७॥
    खरोखर सद्गुरूच्या कृपेशिवाय, देव असूनही नाहींसारखा झाला होता. त्याला देवपणाने ठिकाणावर आणून त्याचे भजन करावयास लावणारा एक गुरुराजच होय ४७.


    त्या सद्‍गुरूची कथा । चुकोनि झालों बोलता ।
    थोर अपराधु हा माझे माथां । क्षमा श्रोतां करावी ॥४८॥
    त्या सद्गुरूची कथा मी चुकून बोललो. हा फार मोठा अपराध झाला. श्रोत्यांनी त्याबद्दल क्षमा करावी ४८.


    वृथा बोलिलों नाहीं जाण । झालें बोलावया कारण ।
    दत्तात्रेयशिष्यकथन । करितां जनार्दन आठवला ॥४९॥
    पण हे मी काही उगीच बोललों नाही. ते बोलावयाला एक कारण झाले ते असें की, दत्तात्रेयाचे शिष्य सांगतांना जनार्दनाचेही स्मरण झाले ४९.


    मी जरी नाठवीं जनार्दनासी । परी तो विसरों नेदीच आपणासी ।
    हटें देतुसे आठवणेंसी । अहर्निशीं सर्वदा ॥४५०॥
    मी जरी जनार्दनाची आठवण करीत नाही म्हटले, तरी तो मला आपला विसर पडूंच देत नाही. तो हट्टानें निरंतर अहोरात्र मला आठवण देतच असतो ४५०.


    जिकडे मी विसरों जायें । तिकडेचि तो येऊनि राहे ।
    मी जरी त्याजकडे न पाहें । तें न पाहणें होये तो माझें ॥५१॥
    मी जिकडे विसरावयाला जातो, तिकडेच तो येऊन उभा राहतो; मी जरी त्याच्याकडे न पाहिले तरी ते माझें न पाहणेंही तोच होतो ५१.


    घटु सांडूं पाहे आकाशासी । तंव आकाश न सांडी घटासी ।
    तेवीं जनार्दनु आम्हांसी । अहर्निशीं लागला ॥५२॥
    घट आकाशाला सोडायला पहातो, पण आकाशच घटाला सोडीत नाही; त्याप्रमाणे जनार्दन हा रात्रंदिवस आमच्या मागे लागलेला आहे ५२.


    मी न करीं त्याची कथा । तंव तोचि होये मुखीं वक्ता ।
    ऐसेंनि बलात्कारें बोलविता । काय म्यां आतां करावें ॥५३॥
    मी त्याची गोष्ट करीत नाही; पण तोच माझ्या मुखांत वक्ता होऊन राहातो. असें बळजबरीने तो बोलावयाला लावतो. तेव्हां आता मी करावे तरी काय ? ५३.


    दृश्य मी देखावया बैसें । तंव दृश्या सबाह्य जनार्दनु दिसे ।
    श्रवणीं ऐकतां सौरसें । शब्दीं प्रवेशे जनार्दनु ॥५४॥
    मी एखादा दृश्य पदार्थ पहावयाला बसतो, तो त्या दृश्य पदार्थाच्या आंत बाहेर जनार्दनच दिसू लागतो. बरे, कानांनी काही ऐकावयाला जातो, तर त्या शब्दांमध्ये जनार्दनच शिरूर बसतो ५४.


    आतां नाइकें न पाहें । म्हणौनि मी उगा राहें ।
    तंव उगेपणाचेनि अन्वयें । जनार्दनु पाहे लागला ॥५५॥
    आता मी ऐकूही नये आणि पाहूंही नये, असे म्हणून उगाच बसलों, तर त्या उोगेपणाच्या रूपानेही जनार्दनच दिसू लागतो ५५.


    ऐसा अडकलों त्रिशुद्धी । जनार्दनु उगंडूं नेदी ।
    श्रोता सांगावी जी बुद्धी । मी अपराधी सर्वथा ॥५६॥
    असा खरोखर मी अडकून पडलों आहे. जनार्दन कांही विसरूं देत नाही. मी सर्वस्वी अपराधी आहे. श्रोत्यांनीच ह्यावर उपाय सांगावा ५६.


    श्रोते म्हणती नवलावो । येथ न देखों अहंभावो ।
    पाहतां बोलाचा अभिप्रावो । प्रेम पहा हो लोटत ॥५७॥
    तेव्हां श्रोते म्हणाले, "हे मोठे आश्चर्य आहे; या बोलण्यांत अहंभाव असा मुळीच दिसत नाही ; याच्या बोलण्याचा अभिप्राय पाहिला तर प्रेमाचेंच भरतें येते ५७.


    येथील विचारितां बोल । क्षीराब्धीहून सखोल ।
    नवल प्रेमाची वोल । येताति डोल स्वानंदें ॥५८॥
    तुझ्या शब्दांचा विचार केला तर ते क्षीरसागराहूनही खोल दिसतात. तुझ्या प्रेमाचा जिव्हाळा कांही अपूर्व आहे ! आम्हांला स्वानंदाने डोलावेसे वाटते ५८.


    जें त्वां केलें गुरुनिरूपण । तें सप्रेम ब्रह्मज्ञान ।
    थोर निवविलों जाण । नाहीं दूषण निरूपणा ॥५९॥
    तूं जें गुरूबद्दल निरूपण केलेंस ते प्रेमळ ब्रह्मज्ञानाचेंच स्वरूप आहे. त्यामुळे आम्ही फार समाधान पावलों. तुझ्या निरूपणाला दूषण ठेवण्याला जागाच नाही ५९.


    नित्य करावें गुरुस्मरण । तें गुरूनें केलें निजकथन ।
    करितां अमृताचें आरोगण । पुरे कोण म्हणेल ॥४६०॥
    गुरूचे स्मरण नित्य करीत असावे, हे तत्त्व गुरूनेच आपले आपण सांगितले. अमृताची मेजवानी पुरे कोण म्हणणार ? ४६०.


    जनार्दनीं दृढ भावो । हाही कळला अभिप्रावो ।
    निरूपणाचा नवलावो । रसाळ पहा हो वोडवला ॥६१॥
    आणखी ह्यावरून जनार्दनाच्या ठिकाणी तुझी भक्ति अलोट आहे, हीही गोष्ट आम्हांस कळून चुकली. निरूपण केवळ अपूर्व होऊन त्याला रसाळपणाही प्राप्त झाला ६१.


    तूं मूळकथा निरूपिसी । अथवा आडकथा सांगसी ।
    परी गोडी या निरूपणाऐसी । न देखों आणिकांसी सर्वथा ॥६२॥
    तूं मूळकथा निरूपण केलीस किंवा आडकथा सांगितलीस, तरी तुझ्या निरूपणाची गोडी दुसर्‍या कशाला कधीच येणार नाही ६२.


    शुद्ध निरूपणें गुरु वर्णिसी । वर्णूनि अपराधी म्हणविसी ।
    ऐक्यें घोळली बुद्धी कैसी । मानु श्रोत्यांसी वाढविला ॥६३॥
    शुद्ध निरूपणानें तूं गुरूचे वर्णन करतोस, आणि ते करून आपल्याला अपराधी म्हणवून घेतोस , ह्यावरून तुझी बुद्धि किती एकरूप झाली आहे ते दिसून येते. (विनय धरून) श्रोत्यांचा मान मात्र अधिक वाढवितोस ६३.


    तुझी जे अपराधबुद्धी । ते प्रवेशली भगवत्पदीं ।
    जाहली अपराधाची शुद्धी । देखणा त्रिशुद्धी तूं होसी ॥६४॥
    तुझी जी अपराधबुद्धि ती भगवत्पदींच लीन झालेली आहे. तेव्हां अपराधाचीही शुद्धी झालीच. खराखुरा ज्ञानी तूंच आहेस ६४.


    गुरुस्तवनीं रतसी । तेव्हां मूळकथा विसरसी ।
    प्रेमाची जाती ऐसी । कळलें आम्हांसी सर्वथा ॥६५॥
    गुरूच्या स्तवनामध्ये तल्लीन होतोस तेव्हां मूळ कथा विसरतोस. प्रेमाचे लक्षण असेंच असतें हेही आम्हांस उत्कृष्ट रीतीने कळून चुकले." ६५.


    श्रोते म्हणती आतां । विस्मयो दाटला चित्ता ।
    वेगीं चालवावें ग्रंथा । पूर्वकथा मूळींची ॥६६॥
    आणखी श्रोते म्हणाले, "आमच्या मनाला मोठा विस्मय वाटत आहे. करितां पुढील ग्रंथास सुरवात करून मूळ कथा सांग" ६६.


    हें संतवचन मानूनि माथां । चरण वंदूनि तत्त्वतां ।
    सावधान व्हावें चित्ता । पुढील कथा सांगेन ॥६७॥
    संतांच्या ह्या भाषणाला मान देऊन त्यांचे चरण शिरसावंदन करून पुढील कथा सांगतों, श्रोत्यांनी लक्ष द्यावें ६७.


    यापरी तो अवधूतु । यदूसी सांगे परमार्थु ।
    संवादें निवाला परमाद्‍भूतु । मग निवांतु राहिला ॥६८॥
    ह्याप्रमाणे त्या अवधूतानें यदूला परमार्थ सांगितला. त्या भाषणाने अत्यंत समाधान झाले ; त्यानंतर तो स्वस्थ राहिला ६८.


    श्रीभगवानुवाच ।
    इत्युक्त्वा स यदुं विप्रस्तमामन्त्र्य गभीरधीः ।
    वन्दितोऽभ्यर्चितो राज्ञा ययौ प्रीतो यथागतम् ॥ ३२ ॥
    [श्लोक ३२] श्रीकृष्ण म्हणाले - धीर गंभीर अशा त्या अवधूत दत्तात्रेयांनी राजा यदूला असा उपदेश केला यदूनेही त्यांना वंदन करून प्रार्थना केली नंतर दत्तात्रेय प्रसन्नचित्ताने आपल्या इच्छेनुसार तेथून निघून गेले; (३२)




    उद्धवासी म्हणे श्रीकृष्ण । रायासी सांगोनि ब्रह्मज्ञान ।
    जाहलें देखोनि समाधान । मग पुसोन निघाला ॥६९॥
    श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, "ह्याप्रमाणे राजाला ब्रह्मज्ञान सांगून त्याचे समाधान झालेले पाहून तो (अवधूत) त्याला विचारून जावयास निघाला ६९.


    राजा धांवोनि लागला चरणां । परम प्रेमें करीं पूजना ।
    करोनियां प्रदक्षिणा । मागुता चरणां लागला ॥४७०॥
    तेव्हां राजाने धावत जाऊन त्याचे पाय धरले. आणि मोठ्या प्रेमाने त्याची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालून पुन्हा त्याच्या पायांवर मस्तक ठेवले ४७०.


    'जाय' ऐसें न बोलवे सर्वथा । 'राहे' म्हणतां दिसे स्वामिता ।
    वियोगु न साहवे तत्त्वतां । बोलु सर्वथा खुंटला ॥७१॥
    'जा' असें त्याला मुळींच म्हणवेना. व 'रहा' म्हणावे तर स्वामित्व दाखविल्यासारखे होते, आणि वियोग तर दुःसह वाटू लागला. त्यामुळे बोलणे सर्वोपरी खुंटले ७१.


    ते देखोनि अवस्था । कृपा उपजली श्रीदत्ता ।
    हात ठेवूनि माथां । प्रसन्नता उपजली ॥७२॥
    ती त्याची अवस्था पाहून श्रीदत्तात्रेयाला करुणा उत्पन्न झाली, आणि त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून प्रसन्न मुद्रेने सांगितले ७२,


    'येथून तुज मज आतां । वियोगु नाहीं सर्वथा' ।
    ऐसें आश्वासोनि नृपनाथा । होय निघता श्रीदत्त ॥७३॥
    की आजपासून तुझा व माझा कधीच वियोग होणार नाही. असें त्या राजाधिराजाला आश्वासन देऊन श्रीदत्तात्रेय निघाले ७३.


    जेणें सुखें होता आला । तेणेंचि सुखें निघता झाला ।
    राजा अतिप्रीतीं निवाला । सुखी झाला निजबोधें ॥७४॥
    जितक्या आनंदाने ते आले होते, तितक्याच आनंदाने ते निघून गेले. राजा अत्यंत प्रेमाने समाधान पावला आणि निजात्मबोधानें निरंतरचा सुखी झाला ७४.


    अवधूतवचः श्रुत्वा पूर्वेषां नः स पूर्वजः ।
    सर्वसङ्गविनिर्मुक्तः समचित्तो बभूव ह ॥ ३३ ॥
    इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
    एकादशस्कन्धे नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
    [श्लोक ३३] आमच्या पूर्वजांचे सुद्धा पूर्वज असलेल्या यदूंनी अवधूतांचे हे म्हणणे ऐकून सर्व आसक्तींपासून आपली सुटका करून घेतली आणि ते समदर्शी झाले. (३३)




    पाहोनि उद्धवा उजू । बोलता जाला अधोक्षजु ।
    म्हणे आमचे पूर्वजांचा पूर्वजु । राजध्वजु यदुवीरु ॥७५॥
    उद्धवाला समोर पाहून श्रीकृष्ण म्हणाले, यदुराजा हा आमच्या पूर्वजांचाही पूर्वज व राजांचा मुकुटमणि होता ७५.


    म्हणसी मी नेणें त्याचें नांव । तूं सांगतोसी हें अपूर्व ।
    परी ज्याचेनि नामें आम्ही सर्व । वीर 'यादव' म्हणवितों ॥७६॥
    तूं म्हणशील की, मला त्याचे नावही माहीत नाही, तेव्हां तूं सांगतोस हे मोठे अपूर्व वाटते. पण बाबा, त्याच्याच नांवावरून आम्ही सारे वीर आपणाला 'यादव' असें म्हणवून घेतों, ७६.


    हरिखें म्हणे नंदनंदु । तो आमचा पूर्वज यदु ।
    ब्रह्मज्ञानाचा संवादु । दत्तात्रेयेंसीं पैं केला ॥७७॥
    तो नंदाचा पुत्र श्रीकृष्ण आनंदाने पुन्हा म्हणाला, तोच यदु आमचा पूर्वज होय. त्यानेच दत्तात्रेयाबरोबर ब्रह्मज्ञानाचा संवाद केला ७७.


    श्रीदत्तात्रेयाच्या वचनार्था । विश्वासोनि जाहला घेता ।
    तेणें सर्वसंगविनिर्मुक्तता । आली हाता यदूच्या ॥७८॥
    श्रीदत्तात्रेयाच्या भाषणांतील हृद्तावर विश्वास ठेवल्यामुळेंच सर्वसंगपरित्यागाची पात्रता यदूच्या अंगी आली ७८.


    जो संगु सांडूनि दूर गेला । तेणें 'संगत्यागु' चि केला ।
    संगीं असोनि स्नेह सांडिला । 'संगमुक्त' झाला तो जाण ॥७९॥
    जो संगाला सोडून दूर गेला त्याने फक्त 'संगत्याग' केला असे म्हणावें, पण संगांत असून जो स्नेह सोडून देतो, तोच 'संगमुक्त' झाला म्हणून समजावे ७९,


    आकाश सर्व पदार्थासी । मिळालें असे सर्व देशीं ।
    परी नातळेचि सर्वसंगासी । 'संगमुक्तता' त्यासी बोलिजे ॥४८०॥
    आकाश सर्व ठिकाणी सर्व पदार्थांना व्यापून असते, पण ते कशालाच स्पर्श करीत नाही. असे असणे याचंच नाव 'संगमुक्तता' ४८०.


    याहूनि विशेष संगमुक्तता । आली यदूचिया हाता ।
    तेही सांगेन कथा । परिसें तत्त्वतां उद्धवा ॥८१॥
    पण त्याहूनही विशेष संगमुक्तता यदूच्या हाती आली होती. उद्धवा ! तीही कथा आता सांगतों ऐक ८१.


    दत्तात्रेयबोधें तत्त्वतां । सर्वसंगामाजी असतां ।
    न देखे संगाची कथावार्ता । 'विशेषमुक्तता' या नांव ॥८२॥
    खरोखर तो सर्व संगांत असतांही दत्तात्रेयाच्या बोधाने संगाची कथावार्तासुद्धा त्याला जाणवत नव्हती. आणि याचेच नांव 'विशेषमुक्तता' ८२.


    'मज पूर्वी द्वैतसंगु होता । तो जाऊनि निःसंग झालों आतां' ।
    या दोनी समूळ मिथ्या वार्ता । विनिर्मुक्तता पावलों ॥८३॥
    मला पूर्वी द्वैताची संगति होती, ती जाऊन मी आतां निःसंग झालों,' या दोन्ही गोष्टी मुळी खोट्या आहेत. मी सर्वातूनच 'विनिर्मुक्त' झालों आहे ८३.


    दोर सापु नाहीं झाला । परी सापुपणाचा आळ आला ।
    तोही दोरें नाहींसा केला । भ्रांतीं कल्पिला निजभ्रमु ॥८४॥
    दोर कधी साप होत नाही; पण त्याच्यावर सापपणाचा आळ येतो. तोही दोरानेच नाहीसा होतो. हा आत्मभ्रम भ्रांतीमुळे कल्पिलेला असतो ८४.


    दोरु दोरपणें असे । सर्पु तो भ्रांतामनीं वसे ।
    ऐसें सांडूनि द्वैतपिसें । रायासी सावकाशें समाधी ॥८५॥
    दोर तो दोराच्याच स्वरूपाने असतो. भ्रमिष्टांच्या मनामध्ये मात्र सर्प म्हणून भासतो. असें जें द्वैताचे वेड तें सुटल्यामुळे राजालाही सावकाश समाधि लागली ८५.


    समसाम्यें समानबुद्धी । ते बोलिजे 'निजसमाधी' ।
    ते समाधी पावोनी त्रिशुद्धी । राजा निजपदीं पावला ॥८६॥
    ऐक्यभावानें समबुद्धि होणे तिलाच 'निजसमाधि' असे म्हणतात. तीच समाधि खरोखर राजाला प्राप्त झाल्यामुळे तो ब्रह्मस्वरूपाला पोंचला ८६.


    कृष्ण म्हणे उद्धवासी । 'तूं जन्मूनि ऐशिये वंशीं ।
    जरी ब्रह्मज्ञान न साधिशी । तरी उणें पूर्वजांसी येईल ' ॥८७॥
    कृष्ण उद्धवाला म्हणाले, 'तूंही अशाच्या वंशामध्ये जन्म घेऊन जर ब्रह्मज्ञान संपादन न करशील, तर तो पूर्वजांना कमीपणा येईल' ! ८७.


    यापरी हृषीकेशी । तिरस्कारोनि उद्धवासी ।
    झोंबावया अद्वैतासी । पुट बुद्धीसी देतुसे ॥८८॥
    ह्याप्रमाणे श्रीकृष्णांनी तिरस्काराने उद्धवाला बोलून अद्वैतावर झटून पडण्यासाठीं त्याच्या उत्कंठेवर आणखी एक पुट चढविलें ८८.


    आधींचि विखारू काळियाणा । त्याचेंही पुच्छ रगडिल्या जाणा ।
    मग झोंबिन्नल्या सत्राणा । नावरे कोणा सर्वथा ॥८९॥
    आधींच विषारी काळा सर्प, त्यांत त्याच्या शेपटावर पाय दिला, तर तो रागाने दंश करायला धावतो, कोणालाच आवरत नाही ८९.


    आधींचि अनुताप उद्धवासी । वरी तिरस्कारिला हृषीकेशीं ।
    तो गिळावया चिद्‍ब्रह्मासी । निजमानसी खवळला ॥४९०॥
    त्याप्रमाणे उद्धवाला आधीच अनुताप झालेला, त्यावर श्रीकृष्णांनी त्याचा तिरस्कार केला, तेव्हां तो परब्रह्माला गिळण्यासाठी मनांतून अगदी खवळून गेला ४९०.


    पुढिले अध्यायीं निरूपण । कृष्ण‍उद्धवसंवाद जाण ।
    सांगेल गुरुशिष्यलक्षण । श्रोते विचक्षण परिसतु ॥९१॥
    त्या कृष्णाचा आणि उद्धवाचा तो संवाद पुढील अध्यायांत आहे ; त्यांत गुरुशिष्याचे लक्षण सांगितले जाईल. चतुर श्रोत्यांनी ते श्रवण करावें ९१.


    एका जनार्दनु म्हणे । अगाध कृष्णमुखींचें बोलणें ।
    तें मी जरी निरोपूं नेणें । परी तें गोडपणें निववित ॥९२॥
    एका जनार्दन म्हणतो, कृष्णमुखांतील भाषण फार गहन आहे. ते जरी मला नीट सांगता येत नाही, तरी त्याच्या स्वाभाविक गोडपणाने अंत:करणाची तृप्ति होते ९२.


    साखरेचा बोळू केला । परी कडूपणा नाहीं आला ।
    तैसा ग्रंथु प्राकृतभाषा झाला । असे संचला स्वानंदु ॥९३॥
    साखरेचा बोळ केला, तरी त्यांत कडूपणा येत नाही. त्याप्रमाणे हा ग्रंथ जरी प्राकृत भाषेत झाला, तरी त्यांत स्वानंदच परिपूर्ण भरलेला आहे ९३.


    जरी सोन्याचें पेंडुकें केलें । परी तें दगडमोला नाहीं आलें ।
    तैसें भागवत प्राकृत झालें । परी नाहीं चुकलें निजज्ञाना ॥९४॥
    सोन्याचा जरी गोटा बनविला तरी तो काही दगडाच्या मोलाने विकावयाचा नाही, त्याप्रमाणे भागवत जरी प्राकृतांत झाले, तरी ते आत्मज्ञानाला काही मुकले नाही ९४.


    मुक्ताफळालागीं सागरीं । बुड्या देती नानापरी ।
    तें सांपडलिया घरींच्या विहिरीं । जो अव्हेरी तो मूर्ख ॥९५॥
    मोत्याकरितां समुद्रामध्ये बुड्या देतात, तेच मोती घरांतल्या विहिरींत सांपडले म्हणून कोणी फेंकून देईल, तर तो मूर्खच समजला पाहिजे ९५.


    तैशी संस्कृत व्याख्यानआटाटी । अतिकष्टें परमार्थीं भेटी ।
    तें जोडिल्या मराठीसाठीं । उपेक्षादृष्टि न करावी ॥९६॥
    तद्वत् संस्कृत भाषेचा अभ्यास करून मोठ्या माराकुटीनें परमार्थाची गांठ पडते; तोच परमार्थ जर मराठी भाषेमध्ये मिळाला तर त्याची उपेक्षा करूं नये ९६.


    धनवंतु रत्‍नपारखी पुरा । तेणें धुळीमाजीं देखिल्या हिरा ।
    गांठीं बांधोनि आणी घरा । पारखी खरा निजज्ञानें ॥९७॥
    श्रीमंत व पक्का रत्नपरीक्षक आहे, त्याने जर अकस्मात धुळीत पडलेला हिरा पाहिला तर तो गांठीला बांधून घरी आणल्याशिवाय राहात नाही. कारण, तो खऱ्या ज्ञानानें परीक्षक असतो ९७.


    तैसें ज्ञाते विद्वज्जन । ग्रंथु मराठी देखोन ।
    उपेक्षा न करितां करावा यत्‍न । पारखोनि चिद्‍रत्‍न साधावया ॥९८॥
    त्याप्रमाणे जे कोणी ज्ञाते व विद्वान् लोक असतील, त्यांनी हा ग्रंथ मराठी असे पाहून त्याचा अव्हेर न करितां नीट परीक्षा करून चित्स्वरूपी रत्न मिळविण्याचा यत्न करावा ९८.


    क्षुद्रदृष्टीं पाहणें पाहतां । बोलु लागेल व्यासाचे ग्रंथा ।
    मा हे तरी मराठी कविता । सांडूनि कुटिलता पाहावी ॥९९॥
    क्षुद्र दृष्टीनेच पाहावयास लागले तर साक्षात् व्यासाच्या ग्रंथालासुद्धा नांवें ठेवतां येतील ; मग ही तर काय मराठी कविता आहे. याकरिता कुटिलता सोडून देऊनच ती वाचावी ९९.


    ज्यांसी निजसुखाची आवडी । ते प्राकृतीं न काढिती खोडी ।
    घेतील ज्ञानगर्भाची गोडी । अवस्था गाढी परमार्थी ॥५००॥
    ज्यांना आत्मसुखाची आवड आहे, ते प्राकृतांतील खोडी काढीत बसणार नाहीत; ते ज्ञानरहस्याची गोडीच ग्रहण करतील. कारण, त्यांना परमार्थाविषयी फार तळमळ असते. ५००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...