मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ ओव्या १0१ ते २००

    म्हणे दोघांचा संगु एके स्थानीं । तेथें सर्वथा न राहे ध्वनी ।

    दोंतील एक वेगळें काढोनी । बसे कांडणीं कुमारी ॥१॥
    तेव्हां ती म्हणाली की, हेही उपयोगी नाही. दोघांची गांठ एके ठिकाणी असली, की तेथे शब्द हा उत्पन्न व्हावयाचाच; म्हणून त्या दोहोंतीलही आणखी एक एक कांकण काढून ती मुलगी कांडावयाला बसली. १०१


    एकपणीं कांडितां । ध्वनि नुठेचि तत्त्वतां ।
    तो उपदेशु नृपनाथा । झालों शिकता मी तेथ ॥२॥
    तेव्हां एका कांकणाचा नाद मुळीच उठेनासा झाला. हे राजवर्या ! तोच उपदेश मी तेथे शिकून घेतला २.


    अन्वशिक्षमिमं तस्या उपदेशमरिन्दम ।
    लोकाननुचरन्नेतान् लोकतत्त्वविवित्सया ॥ ९ ॥
    [श्लोक ९] हे शत्रूंचे दमन करणार्‍या ! त्या वेळी लोकव्यवहार जाणण्याच्या इच्छेने मीसुद्धा तेथे जाऊन पोहोचलो मी त्या प्रसंगातून हे शिकलो की, जेव्हा पुष्कळ लोक एकत्र राहातात तेव्हा त्यांच्यामध्ये कलह होतो; (९)




    जिणोनि प्रतिस्पर्धी भूपाळ । किंकर केले राजे सकळ ।
    तूं अरिमर्दन सबळ । मिथ्या केवळ तो गर्व ॥३॥
    तूं आपले प्रतिस्पर्धी असलेले सारे राजे जिंकून, त्यांना आपले दास करून ठेवलेस, त्यामुळे मी मोठा समर्थ, शत्रूंना अजिंक्य, असा गर्व मानीत असशील तर तो व्यर्थ होय ३.


    कामक्रोधादि अरिवर्ग । न जिणतां सकळ साङ्ग ।
    'अरिमर्दन' हा बोल व्यंग । होईल चांग ये अर्थी ॥४॥
    कारण, कामक्रोधादिक शत्रूंचा सगळा वर्ग यथासांग जिंकल्याशिवाय, 'अरिमर्दन' हा शब्द योग्य होणार नाही. त्या शब्दाला कमीपणा मात्र येईल ४.


    कामादिक सहा वैरी । येणें उपदेशशस्त्रधारीं ।
    जिणोनि घालितां तोडरीं । मग संसारी अरि नाहीं ॥५॥
    कामादिक जे षडरिपु आहेत ते या उपदेशरूप शस्त्राच्या धारेनें हतवीर्य करून त्यांना वठणीस आणशील, तेव्हांच तुला संसारांत शत्रु नाहीं असे म्हणता येईल. असो ६.


    लोकांवेगळा अवधूतु । म्हणसी कुमारी ते घरांआंतु ।
    तो एकांतींचा वृत्तांतु । कैसेनि प्राप्तु तुज झाला ॥६॥
    आतां तूं म्हणशील की, तूं अवधूत केवळ लोकविरहित राहतोस आणि ती कन्या तर घराच्या आंत असणारी, तिचा एकांतांतील वृत्तांत तुला कसा कळला ? ६.


    राहोनियां विजनस्थानीं । विश्वासोनि गुरुवचनीं ।
    दृढ बैसोनि आसनीं । निजतत्त्व ध्यानीं आकळिलें ॥७॥
    तर (सांगतों ऐक) मी निर्जन अरण्यांत राहन गुरुवचनावर विश्वास ठेवून आसनावर अढळ बसून ध्यानामध्ये निजतत्त्वाचे आकलन केले आहे. ७.


    त्याचि तत्त्वनिश्चयालागुनी । मी विचरतसें ये मेदिनी ।
    निजात्मभावो जनीं वनीं । दृढ करोनि पाहतसें ॥८॥
    त्याच तत्त्वनिश्चयाकरितां मी या पृथ्वीवर फिरत असतो आणि जनांत असो की वनांत असो, निजात्मभावच दृध करून मी पाहात असतों ८.


    होतां दृश्येंसीं भेटी । दृश्य दृश्यत्वें न पडे मिठी ।
    द्रष्टेपणही घालोनि पोटीं । ऐशिया दृष्टीं विचरत ॥९॥
    दृश्य पदार्थाची भेट झाली तरी दृश्य हे दृश्यत्वाने दिसतच नाही. इतकेच नव्हे, तर द्रष्टेपणही नाहीसे होते. अशा दृष्टीनें मी फिरत असतों ९.


    अंगीकारितां गुरुत्वगुण । देखतां जगाचें दर्शन ।
    मज होतसे चैतन्यभान । ऐसेन जाण मी विचरत ॥११०॥
    याप्रमाणे गुरुत्वाचे गुण स्वीकारून जगाकडे पाहात असतां मला चैतन्यभावच स्फुरूं लागतो. अशा रीतीनें मी फिरत असतो ११०,


    ऐशिया निजदृष्टीं वीरा । मज विचरतां चराचरा ।
    अवचटें कुमारीमंदिरा । त्याचि अवसरा मी आलों ॥११॥
    अशा आत्मदृष्टीनं चराचर सृष्टीत फिरत असतां, अकस्मात त्याच वेळी मी त्या मुलीच्या घरीं पोचलों ११.


    करितां कंकणविवंचना । निजस्वार्थाचिया खुणा ।
    पाहोनि घेतलें ज्या लक्षणा । ते विचक्षणा परियेसीं ॥१२॥
    हे चतुरा ! आपला हेतु सिद्धीस नेण्याकरितां या मुलीनें कांकणाची युक्ति कशा काढली याचा विचार करून त्यापासून मी कोणता बोध घेतला ते ऐक १२.


    वासे बहूनां कलहो भवेद् वार्ता द्वयोरपि ।
    एक एव चरेत्तस्मात् कुमार्या इव कङ्कणः ॥ १० ॥
    [श्लोक १०] आणि जेव्हा दोघेजण राहतात तेव्हा सुद्धा गप्पागोष्टी होतात म्हणून साधकाने कुमारिकेच्या बांगडीप्रमाणे एकट्यानेच राहिले पाहिजे. (या प्रसंगातून 'मुनीने एकट्याने राहावे' हे कळते). (१०)




    जेथ होय बहुतांची वस्ती । तेथ अनिवार कलहप्राप्ती ।
    दोघे बैसल्या एकांतीं । वार्ता करिती बहुविधा ॥१३॥
    ज्या ठिकाणी पुष्कळ लोक वास करतात, तेथें अनिवार कलह माजून राहतो. इतकेच नव्हे, तर दोघेच असामी जरी एकांतांत बसले, तरीसुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी करूं लागतात १३.


    जेथें गोष्टीखालीं काळु जाये । तेथें निजस्वार्थु हों न लाहे ।
    यालागीं मी पाहें । विचरत आहें एकाकी ॥१४॥
    जेथे गोष्टींमध्येच वेळ जातो, तेथे आपला स्वार्थ असा कांहीच साधत नाही. म्हणूनच पाहा ! मी हा एकटाएकच फिरत असतो १४.


    एकाकी एकाग्रता । साधिल्या थोर लाभु ये हाता ।
    येचविषयीं शरकर्ता । गुरु तत्त्वतां म्यां केला ॥१५॥
    एकटाच असतां एकाग्रता साधली, तर मोठा लाभ हाताला चढतो; आणि त्याकरितांच खरोखर मी एका बाण करणाऱ्या मनुष्याला गुरु करून घेतले १५.


    मन एकत्र संयुज्याज्जितश्वासो जितासनः ।
    वैराग्याभ्यासयोगेन ध्रियमाणमतन्द्रितः ॥ ११ ॥
    [श्लोक ११] आसन आणि श्वास यांच्यावर विजय मिळवून वैराग्य व अभ्यासाने आपले मन ताब्यात आणावे त्यानंतर सावधपणे ते एका लक्ष्यावर लावावे. (११)




    वैराग्येंवीण अभ्यासु घडे । तेथ विषयचोर उठती गाढे ।
    कामाचा घाला पडे । मुद्दल बुडे निजज्ञान ॥१६॥
    वैराग्याशिवायच अभ्यास सुरू केला, तर तेथें विषयरूप दांडगे चोर उठतात ; काम दरवडा घालतो; आगि मुद्दल जे आत्मज्ञान तेच नाहींसें होतें १६.


    विवेकदीप करूनि धुरे । निरसी अज्ञानाचें अंधारें ।
    वैराग्याचें बळ पुरें । महामुद्रेचेनि योगें ॥१७॥
    ह्याकरितां विवेकरूप दिवा पुढे करून अज्ञानरूप अंधार आधीं नाहींसा करावा आणि (भूचरी, खेचरी, अगोचरी व अलक्ष्य अशा) महामुद्रेच्या योगानें वैराग्याचंही पुरे पाठबळ घ्यावें १७.


    प्राणापानाची चुकामुकी । झाली होती बहुकाळ कीं ।
    ते अभ्यासबळें एकाएकीं । केली वोळखी दोघांसी ॥१८॥
    प्राणाची आणि अपानाची फार दिवस चुकामुक झालेली होती; ती अभ्यासाच्या बळाने दोघांची एकदम भेट करून दिली १८.


    वोळाखीसवेंचि जाण । पावली जुनाट पहिली खूण ।
    दोघां पडिलें आलिंगन । समाधान समसाम्यें ॥१९॥
    ती ओळख झाल्याबरोबर पूर्वीची जुनी खूण पटली. तेव्हां त्या दोघांनी एकमेकांस मिठी मारली आणि समसाम्याने त्यांचे समाधान झालें १९.


    दृढ बैसोनि आसनीं । ऐशी प्राणापान मिळणी ।
    करूनि लाविली निशाणी । ब्रह्मस्थानीं रिघावया ॥१२०॥
    अशा प्रकार आसनावर दृढ बसून प्राणाचें आणि अपानाचे ऐक्य करून सोडले आणि ब्रह्मस्थानामध्ये घुसण्याकरितां बाहुटा चढविला २०.


    ब्रह्मगिरीचिया कडा । शमदमें घालोनियां वेढा ।
    प्रत्याहाराचा झगडा । पुढिले कडां लाविला ॥२१॥
    ब्रह्मगिरीच्या कड्याला शमदमाने वेढा घालून पुढच्या तोंडाला प्रत्याहाराचे युद्ध सुरू केले (प्रत्याहार म्ह. इंद्रियांची अंतर्मुखता) २१.


    प्राणापानांच्या विवरीं । पहिली ओळखी होती खरी ।
    माळ लाविली अभेदकरीं । मन एकाग्रीं राखोनि ॥२२॥
    प्राणापानाच्या विवरामध्ये पूर्वीची ओळख होती तरी, मन एकाग्र राखून त्यांची माळ लावून दिली २२.


    एकाग्रतेचेनि कल्लोळें । पुढारें न ढळवे चालिले बळें ।
    उल्हाटयंत्राचेनि मेळें । षट्चक्रपाळें भेदिलें ॥२३॥
    एकाग्रतेच्या हल्ल्यामुळे पुढे चाललेले प्राण न ढळतां तसेच जोराने पुढे घुसले आणि त्यांनी कुंडलिनीच्याद्वारे धडाक्याचा तोफांचा मारा सुरू करून षट्चक्रांचे बुरूज फोडून टाकले २३.


    वैराग्याचीं वज्रकवचें । निधडे वीर लेऊनि साचे ।
    एकाग्रताबळें बळाचें । झळके ध्यानाचें करीं खड्ग ॥२४॥
    त्या शूरवीरांनी वैगग्याची चिलखतें अंगामध्ये घातली आणि एकाग्रतेच्या बळाने ध्यानरूपी तरवारी त्यांच्या हातांत चमकू लागल्या २४.


    नवल खड्‍गांचा वाहो । लहान थोर निवटी पहा हो ।
    संमुख आलिया संदेहो । न लगतां घावो छेदित ॥२५॥
    त्या तरवारीचा चमत्कार काय सांगावा ? ती लहानथोरांसकट सर्वांना सारखी छाटून टाकीत असे. तिच्यासमोर एखादा संशय येऊन उभा राहिला पुरे, की त्याला पुरता घाव लागला न लागला तोच त्याचे तुकडे उडवून देत असे २५.


    निर्दाळूनि आळसासी । दासी केलें निद्रेसी ।
    ऐसें सावधान अहर्निशीं । योगदुर्गासी झोंबती ॥२६॥
    आळसाला रसातळाला घालवून, निद्रेला आपली दासी करून सोडलं. अशा रीतीने रात्रंदिवस सावध राहून योगरूपी किल्ला सर करण्याकरितां ते झटत असतात २६.


    रणरंगींचे वीर गाढे । निजबळें चालिले पुढें ।
    सत्रावीचें पाणीयाडें । जिंतिलें रोकडें महावीरीं ॥२७॥
    समरांगणांतील वीर मोठे रणधुरंधर होते. ते आपल्याच जोरावर पुढे पुढे चाल करू लागले. आणि सत्रावी जीवनकला जो ब्रह्मरंध्रांतील अमृतस्रावाचा साठा (तलाव) तो त्या महावीरांनी काबीज केला २७.


    तेथ युद्ध झालें चांग । कामादिक अरिषड्वर्ग ।
    रणीं पाडिले अमोघ । सतेज खड्ग झळकत ॥२८॥
    तेथे मोठे भयंकर युद्ध झाले. युद्धांत कामादिक सहा शत्रु मारून टाकले व ते अमोघ आणि दिव्य खड्ग झळकत राहिले २८.


    ऐसे वैरी पाडूनि रणीं । प्राशिलें सत्रावीचें पाणी ।
    तंव अनुहताची सुडावणी । दुर्गामधोनि ऊठली ॥२९॥
    अशा प्रकारे शबूंना रणांगणांत पाडून सत्रावीचे पाणी म्हणजे अमृत प्राशन केलें. तो त्या किल्ल्यामधून अनुहताचा ध्वनि एकदम ऐकू येऊ लागला २९.


    तेथ सोहंवीराची एकाग्रता । होतां भीतरील भेदु आला हाता ।
    दुर्गराखती । अहंममता । मरों सर्वथा टेंकली ॥१३०॥
    सोहंवीराची एकाग्रता होतांच आंतील सर्व भेद हाती आला. किल्ला राखणारी अहंममता अगदी मरावयास टेंकली १३०.


    यस्मिन्मनो लब्धपदं यदेत
    च्छनैः शनैर्मुञ्चति कर्मरेणून् ।
    सत्त्वेन वृद्धेन रजस्तमश्च
    विधूय निर्वाणमुपैत्यनिन्धनम् ॥ १२ ॥
    [श्लोक १२] जेव्हा परमात्म्यामध्ये मन स्थिर होते, तेव्हा ते हळू हळू कर्मवासनांची धूळ झटकून टाकते होता होता सत्त्वगुण वाढून रजतम नाहीसे होतात अखेर जसे इंधन नसलेला अग्नी शांत होतो, त्याप्रमाणे मन शांत होते. (१२)




    कामक्रोधादि महाशूर । पुत्र रणीं पडले थोर ।
    तेणें दुःखें अतिजर्जर । मरणतत्पर दिसताति ॥३१॥
    कामक्रोधादि मोठमोठाले शूर पुत्र रणांत पडले, त्या दुःखाने अहंता व ममता अत्यंत विव्हल होऊन मरणाच्या अगदी दारी बसल्या ३१.


    ऐसी ऐकोनि दुर्गाची वार्ता । उल्हासु वीरांचिया चित्ता ।
    उठावा दीधला मागुता । दुर्ग सर्वथा घ्यावया ॥३२॥
    अशी किल्ल्यांतील बातमी ऐकतांच त्या (शमदमादि ) वीरांच्या मनाला अधिकच स्फुरण चढलें, आणि त्यांनी तो किल्ला पुरता घेण्यासाठी पुन्हा उठावणी केली ३२.


    निजधैर्ये वीर अदट । निजसत्त्वें अतिउद्भट ।
    पुढें निर्धारितां वाट । थोर अचाट देखिलें ॥३३॥
    त्या वीरांचे धैर्य मोठे अचाट होते. पराक्रमाने तर ते प्रसिद्धच होते. त्यांनी पुढील मार्ग पाहिला, तो त्यामध्ये मोठे विकट संकट दिसले ३३.


    कर्मरेणूंचे दुर्धर घाट । विधिवादें अवघड वाट ।
    हळूहळू उल्लंघितां अचाट । समूळ सपाट तो केला ॥३४॥
    कमरेणूंचे (वासनांचे) घाट दुर्धर होते. त्यांतील विधिवादाची वाट अतिशय दुर्गम होती. परंतु हळुहळू चढून जाऊन तो सारा घाट सपाट करून सोडला ३४.


    पुढां रजतमाचें आगड । खोलपणें अत्यंत गूढ ।
    घालूनि निवृत्तीचे दगड । सत्त्वें सुदृढ बूजिलें ॥३५॥
    त्यापुढे रजतमाचा खंदक लागला. तो अपरंपार खोल असल्यामुळे त्यांत निवृत्तीचे दगड घालून सत्त्वाने निखालस बुजवून टाकला ३५.


    सांचलू नव्हतां बाहेरी । जिणोनि मनकर्णिकावोवरी ।
    माळ* न चढविली ब्रह्मगिरी । ब्रह्मरंध्रीं उसळले ॥३६॥ [*दोराची शीडी]
    बाहेर चाहूल न लागू देतां, 'मनकर्णिकावोवरी'-आज्ञाचक्र काबीज करून ब्रह्मगिरीवर माळ (दोराची शिडी) चढविली, आणि ब्रह्मरंध्रांत घुसले ३६.


    तेथ जैताची एक घायी । अनुहत निशाण लागलें पाहीं ।
    शोधितां पारखें कोणी नाहीं । केलें ठायीं स्ववश ॥३७॥
    तेव्हां दिग्विजयाची एकच घाई उडून राहिली. अनुहताचा बाहुटा लागला, शोध केला तो किल्यावर शत्रु कोणीच नाही. सारे आपलेंच राज्य ३७.


    तेथ रजतमाच्या वाटा । सहजें झाल्या सपाटा ।
    हरिखें रामराज्याचा चोहटा । धेंडे दारवंटा पीटिले ॥३८॥
    तेव्हां रजतमाच्या वाटा आपोआपच सपाट होऊन गेल्या आणि आनंदाने चव्हाट्यावर रामराज्याची द्वाही-दौंडी पिटली गेली ३८.


    पारिखें कोणी न पडे दृष्टी । ध्यानखड्गाची सोडिली मुष्टी ।
    वैराग्यकवचाचिया गांठी । समदृष्टीं सोडिल्या ॥३९॥
    परकी कोणीच तेथे दृष्टीस पडेना, तेव्हां ध्यानरूप खड्गाची मूठ सोडली. समदृष्टीनें वैराग्यकवचाच्या गांठीही मोकळ्या केल्या ३९.


    ध्येय ध्यान ध्याता । त्रिपुटी न दिसे पाहतां ।
    ध्यानखड्ग तत्त्वतां । न धरी सर्वथा या हेतू ॥१४०॥
    ध्येय, ध्यान, आणि ध्याता ही त्रिपुटीच पाहावयास गेले असतां दिसेना; त्यामुळे ध्यानखनाचे कारण राहिले नाही १४०.


    दारुण युद्धसामग्री । सत्त्वें केली होती भारी ।
    ते साधने सांडिलीं दुरी । कोणी वैरी असेना ॥४१॥
    सत्त्वाने युद्धाची सामग्री फारच प्रचंड जमविलेली होती, तीही लांब टाकून दिली; कारण पुढे कोणी शत्रु म्हणून दिसेचना ४१.


    तन्मयतेचें छत्र धरूनी । समसाम्यसिंहासनीं ।
    बैसला सहज समाधानी । त्यागी वोंवाळुनी जीवभावो ॥४२॥
    तेव्हां तन्मयतारूपी छत्र धरून समसाम्याच्या सिंहासनावर जीव ही भावना ओवाळून टाकून सहज समाधानाने (तो योगी) बसला ४२.


    शोधित वाढला सत्त्वगुण । तेणें सर्वस्वें केलें निंबलोण ।
    पायां लागोनि आपण । स्वयें जाण उपरमला ॥४३॥
    नंतर शुद्ध सत्त्वगुण वाढला व त्याने सर्वस्वाचे निंबलोण केले व आपण चरणीं लागून आत्मस्वरूपांत स्वत:च लय पावला ४३.


    जैसा अग्नि असे काष्ठांच्या मेळीं । मंथिल्या काष्ठाची करी होळी ।
    काष्ठ नाशूनि तत्काळीं । त्यजूनि इंगळीं उपशमे ॥४४॥
    ज्याप्रमाणे मंथन करून काढलेल्या काष्ठांतील अग्नि त्या काष्ठांची होळी करतो, व आपण शांत होतो ४४.


    तैसें वाढोनि सत्त्व उत्तम । नाशूनि सांडी रजतम ।
    पाठीं सत्त्वाचाही संभ्रम । स्वयें उपरम पावला ॥४५॥
    त्याप्रमाणे उत्तम (म्ह. रजतमलेशरहित ) सत्त्व काढले म्हणजे रज आणि तम यांचा नाश करून टाकतें व नंतर त्या सत्त्वाचा संभ्रम आपोआपच लयास जातो ४५,


    तेथें निमालें जीवाचें जीवपण । ज्ञातृत्वेंसीं निमालें ज्ञान ।
    निमालें प्रपंचाचें भान । चिन्मात्र पूर्ण कोंदलें ॥४६॥
    तेव्हां जिवाचे जीवपण नाहीसे होते, ज्ञातृत्वासहवर्तमान ज्ञान लयास जाते, प्रपंचाचे भानही शिल्लक न राहतां चिन्मात्र स्वरूप पूर्णपणे भरून राहते ४६.


    तदैवमात्मन्यवरुद्धचित्तो
    न वेद किञ्चिद् बहिरन्तरं वा ।
    यथेषुकारो नृपतिं व्रजन्त
    इषौ गतात्मा न ददर्श पार्श्वे ॥ १३ ॥
    [श्लोक १३] अशा प्रकारे जेव्हा चित्त आपल्या आत्म्यामध्येच स्थिर होते, तेव्हा त्याला आतबाहेर अशा कोणत्याही पदार्थांचे भान राहात नाही मी असे पाहिले होते की, बाण तयार करणारा एक कारागीर बाण तयार करण्यात इतका मग्न झाला होता की, त्याच्या जवळूनच सैन्यासह राजाची स्वारी निघून गेली, तरी त्याला तिचा पत्ता लागत नाही. (बाणकर्त्याकडून 'एकाग्रता' हा गुण घ्यावा). (१३)




    ऐसी चिन्मात्र परिपूर्णता । तेथ निरोधूनि आणितां चित्ता ।
    चित्त पावे चैतन्यता । जाण सर्वथा नरवीरा ॥४७॥
    असे परिपूर्ण भरलेल्या चिन्मात्र स्वरूपांत चित्ताला निरोध करून आणले म्हणजे हे राजेन्द्रा ! त्या चित्तालाही तेथे चैतन्यस्वरूपच प्राप्त होते असें तूं समज ४७.


    तेव्हां अंतरीं चैतन्यघन । बाह्य चिन्मात्र परिपूर्ण ।
    आणिक न दिसे गा जाण । वृत्तीनें आण वाहिली ॥४८॥
    तेव्हां हृदयांत चैतन्यघन, आणि बाहेरही परिपूर्ण शुद्ध चैतन्य भरून जाते; तेथे दुसरे काही दिसतच नाही. वृत्तीने जणू शपथच घेतलेली असते ४८.


    पाहतां ध्येय ध्याता ध्यान । जेथ उल्हासें विगुंतलें मन ।
    ते 'संप्रज्ञातसमाधी' जाण । गुणेंवीण भोगिती ॥४९॥
    ध्येय, ध्याता आणि ध्यान ही तिन्ही एकच पाहिली म्हणजे मन हें उल्हासानेच त्यांत गुंतून पडते. तिलाच 'सविकल्प समाधि' असे म्हणतात. तिचा गुणावांचूनच उपभोग घेतात ४९.


    तेथ निःषेष समरसे मन । झाला सुखरूप चिद्‍घन ।
    ते समाधी परम कारण । विचक्षण बोलती ॥१५०॥
    तेथे मन हे निखालस समरस होऊन राहते आणि तो सुखरूप चिद्धनस्वरूपच होऊन राहतो. ज्ञानी लोक ह्याच समाधीला अत्यंत श्रेष्ठ असे म्हणतात १५०.


    ब्रह्म इंद्रियां गोचर नसे । गुण गेलिया डोळां दिसे ।
    हे अनुभव्यासीचि भासे । बोलावें ऐसें तें नव्हे ॥५१॥
    ब्रह्म हें इंद्रियांना गोचर होत नाही. गुण नाहीसे झाल्यानंतरच ते डोळ्यांना दिसू लागते. जो अनुभव घेईल, त्यालाच ह्याची प्रतीति येते. ते बोलून दाखविण्यासारखे नाही ५१.


    येथ शास्त्रें विषम झालीं वादें । 'नेति नेति' म्हणितलें वेदें ।
    थोटावलीं योगिवृंदें । अनुभवी निजबोधें जाणती ॥५२॥
    त्याचा वाद करता करतां शास्त्रेंही परस्परविरुद्ध होऊन बसली आहेत. वेदानें तर 'नेति' 'नेति' (असे नव्हे, असे नव्हे) असे म्हटलें आहे. योग्यांचे समुदाय तर हात टेंकून स्वस्थ बसतात. अनुभवी लोक मात्र आत्मज्ञानाने त्याला जाणतात ५२.


    तेथ हेतु-मातु-दृष्टांतु । समूळ बुडाला समस्तु ।
    अद्वैतवादाची मातु । ज्या ठायांतु लाजिली ॥५३॥
    त्या ठिकाणी हेतु-मातु-दृष्टांत वगैरे सफै बुडून जातात आणि अद्वैतवादही त्या ठिकाणी लाजून जातो ५३.


    सबाह्य समदर्शन । हे अनुभवाची निर्वाणखूण ।
    'शरकार' गुरु केला जाण । हेंचि लक्षण लक्षूनि ॥५४॥
    अंतर्बाह्य समदृष्टि होणे, हीच अनुभवाच्या निर्वाणींची खूण आहे. हीच गोष्ट लक्षात आणून मी बाण करणाराला गुरु केले ५४.


    तावूनि उजू करितां बाण । दृढ लागलें अनुसंधान ।
    इतुकेन प्रपंचाचें भान । खुंटलें जाण तयाचें ॥५५॥
    तो बाणाचे टोक तापवून सरळ (अणकुचीदार ) करूं लागला असता त्याचे सारे लक्ष तिकडेच लागून राहिले. तेवढ्यानेच त्याचे बाह्य प्रपंचाकडील लक्ष नाहीसे झाले ५५.


    निशाण भेरी वाजंतरें । रथ गज सैन्य संभारें ।
    राजा गेला अतिगजरें । नेणिजे शरकारें शरदृष्टीं ॥५६॥
    मग जरीपटका, डंका, नौबती, वाजंत्री, गाड्या, घोडे, हत्ती, शिपाई, प्यादे वगैरे घेऊन राजा वाजत गाजत मोठ्या समारंभाने त्याच्या दारावरून गेला, तरी त्या बाण करणाराची दृष्टि बाणाकडेच वेधून राहिल्यामुळे त्याची त्याला दादही लागली नाहीं ५६.


    मागूनि रायाचा हडपी आला । तो पुसे ये मार्गी राजा गेला ।
    येरु म्हणे नाहीं देखिला । गेला कीं न गेला कोण जाणे ॥५७॥
    इतक्यांत राजाचा हडपी ( एक चाकर ) पाठीमागून आला, त्याने त्याला विचारले की, 'या वाटेने सरकारस्वारी गेली काय ?' पण त्याने त्याला उत्तर दिले की, पाहिली नाही बुवा. कोण जाणे गेली का नाही ती ! ५७.


    तो शरकारू देखिला दृष्टीं । हे ऐकोनि तयाची गोष्टी ।
    जगीं एकाग्रता मोठी । प्रपंच दृष्टीं येवों नेदी ॥५८॥
    ( अवधूत म्हणतात ) त्या बाण करणाराला मी डोळ्यांनी पाहिले आणि त्याचे ते भाषण ऐकून मी मनांत बोध घेतला की, जगामध्ये एकाग्रता ही मोठी श्रेष्ठ आहे. ती प्रपंचाला डोळ्यांपुढेच येऊ येत नाही ५८.


    हेंचि साधावया साधन । गृहारंभेंवीण एकपण ।
    'सर्प' गुरु केला जाण । हेंचि लक्षण देखोनि ॥५९॥
    हेच साधन साध्य करण्याकरितां घरादाराचा आरंभ केल्यावांचून एकटेच राहणे योग्य आहे. हेंच लक्षण सर्पामध्ये दृष्टीस पडल्यावरून सर्पाला मी गुरु केले ५९.


    एकचार्यनिकेतः स्याद् अप्रमत्तो गुहाशयः ।
    अलक्ष्यमाण आचारैर्मुनिरेकोऽल्पभाषणः ॥ १४ ॥
    [श्लोक १४] मुनीने एकटेच राहावे राहाण्याच्या ठिकाणाविषयी ममता नसावी सावध असावे एकांतात किंवा गुहेत राहावे बाह्य वेषावरून स्वतःला कोणासमोर प्रगट करू नये आणि कमी बोलावे. (१४)




    सर्प सांघातु न साहे । एकाकी सुखें विचरत जाये ।
    सदा सावधान राहे । श्वासु वाये जावों नेदी ॥१६०॥
    सर्पाला कोणाची सोबत आवडत नाही. तो एकटाच सुखाने फिरत असतो. तो निरंतर दक्ष राहून एक श्वासोच्छ्‍वासही व्यर्थ दवडीत नाही १६०.


    तैसीच योगियाची गती । न साहे द्वैताची संगती ।
    एकाकी वसे एकांतीं । जनाप्रती अलक्ष्य ॥६१॥
    योग्याची स्थितिही तशीच असते. त्यालाही दुसऱ्याचा उपसर्ग खपत नाही, लोकांच्या दृष्टीस न पडेल अशा ठिकाणी तो एकांतांत एकटाच राहत असतो ६१.


    विषमाचा संगु न करी । परी समाचाही संगु न धरी ।
    निघे देह संगाबाहेरी । त्वचेचे परी सर्पाचे ॥६२॥
    तो वाइटाची संगत धरीत नाही, पण चांगल्याचीही करीत नाही. सर्पाने कांत टाकल्याप्रमाणे तोही देहसंगाच्या बाहेर पडतो ६२.


    सदा सावधानबुद्धी । लवनिमेष वायां जावों नेदी ।
    अनुसंधान त्रिशुद्धी । तुटों नेदी सर्वथा ॥६३॥
    बुद्धीमध्ये निरंतर सावधानता ठेवून तो एक क्षणही फुकट जाऊं देत नाही. तो खरोखर आपलें स्वरूपानुसंधान कधीही तुटू देत नाही ६३.


    सर्प बिळामाजीं रिघें बळें । मार्गीं मागू देखती सकळें ।
    धाला भुकेला हें त्यां न कळे । गेला कळे सर्वांसी ॥६४॥
    सर्प आपणहून बिळामध्ये शिरतो तो त्याचा माग पडलेला मार्गावर सारे लोक पाहातात; पण तो तेथून गेला आहे एवढेच त्यांना कळते; तो भुकेलेला आहे की तृप्त झालेला आहे, हे काही त्यांना कळत नसते ! ६४.


    तैसाचि योगियाही योगबळें । न राहे जनांमाजीं जनमेळें ।
    गुहेमाजीं पडिला लोळे । एकला खेळे एकपणीं ॥६५॥
    त्याप्रमाणेच योगीही योगसामर्थ्याने लोकांच्या संसर्गात न राहतां गुहेमध्येच लोळत पडतो; आणि एकटाच आपआपल्याशी क्रीडत असतो ६५.


    हो का योगियांचा आचार । करितां देखती लहान थोर ।
    सविकल्पनिर्विकल्प विचार । न कळे साचार कोणासी ॥६६॥
    योगी वागत असता त्याचा आचार लहानथोर सारे पाहातात, पण तो खरोखर सविकल्प आहे की निर्विकल्प आहे, हे कोणासच काही कळत नाही ६६.


    एक म्हणती कर्मठ । एक म्हणती कर्मभ्रष्ठ ।
    एक म्हणती आत्मनिष्ठ । कळेना स्पष्ट कोणासी ॥६७॥
    कोणी म्हणतात तो कर्मठ आहे; कोणी म्हणतात, तो कर्मभ्रष्ट आहे. कोणी म्हणतात, तो आत्मनिष्ठ आहे. पण स्पष्ट असें कोणासच काही त्याचे कळत नाही ६७.


    सर्पास बोलणेंचि नाहीं । बोले तरी अल्प कांहीं ।
    तैसाच योगिया पाहीं । वाग्वादीं नाहीं सादर ॥६८॥
    सर्पाला बोलतां मुळीच येत नाहीं; तो काहीं थोडासा शब्द मात्र करतो; त्याप्रमाणेच योगीही वादविवादामध्ये कधी पडत नाही ६८.


    आंतुले कृपेचेनि बळें । बोले मृदु मंजुळ कोंवळें ।
    श्रवणासी दोंदें एकवेळे । तेणें वचनमेळें निघालीं ॥६९॥
    अंत:करणांतील कृपेच्या बळाने थोडेसे पण मृदु, मंजुळ आणि कोमळ असेंच बोलतो. त्यामुळे त्याचे ते भाषण एक वेळ ऐकलें तरी कान अगदी तृप्त होऊन जातात ६९,


    बोलणें तरी अतिअल्प । परी छेदी संकल्पविकल्प ।
    त्याच्या बोलाचे स्वरूप । सत्यसंकल्प जाणती ॥१७०॥
    त्याचे बोलणे पाहूं गेलें तर अतिशय थोडे असते; पण ते संकल्पविकल्पाचा नाश करून सोडते. त्याच्या शब्दाचे स्वरूप जे कोणी सत्यसंकल्पी असतात त्यांसच कळतें १७०.


    जो एकाकी उदास । ज्याचें परमार्थीं मानस ।
    तेणें गृहारंभाची आस । वृथा प्रयास न करावे ॥७१॥
    जो एकटा व उदासीन असतो, ज्याचे मन परमार्थाकडेच लागून राहिले आहे, त्याने घरदार करण्याची आशा धरून व्यर्थ यातायातीत पडूं नये ७१.


    गृहारम्भोऽति दुःखाय विफलश्चाध्रुवात्मनः ।
    सर्पः परकृतं वेश्म प्रविश्य सुखमेधते ॥ १५ ॥
    [श्लोक १५] या अनित्य शरीरासाठी अपार कष्ट करून घर बांधणे निरर्थक आहे उंदराने तयार केलेल्या बिळामध्ये साप आरामात राहातो. (सापाच्या उदाहरणाने साधकाने घर वगैरे बांधू नये, हा धडा घ्यावा). (१५)




    मूळीं गृहारंभ तें दुःख । कष्ट करितां दुःखकारक ।
    निपजविलें त्रिमाळिक । तें अध्रुव देख सर्वथा ॥७२॥
    घर करणें हेंच मुळी दुःखास कारण आहे. कारण, जिवापाड कष्ट सोसून तीन मजली वाडा बांधावयाचा, पण तो सर्वथैव अशाश्वतच असतो ७२.


    जेथें संसारचि नाशवंत । देह प्रत्यक्षाकारें असंत ।
    तेथींचें गृह काय शाश्वत । मूर्ख मानित सत्यत्वें ॥७३॥
    जेथे संसारच मुळी नाशवंत आहे; देहाचा प्रत्यक्ष आकारच जेथे मिथ्या आहे; तेथचे घरच तेवढे शाश्वत काय ? पण मूर्ख लोक हेच सत्य धरून चालतात ७३.


    जें गर्भीच निमालें । तें उपजतां जातक केलें ।
    मृताचें जन्मनांव ठेविलें । तैसें गृह केलें असंत ॥७४॥
    जे गर्भामध्येच मरण पावलें, तें उपजतांच त्याचे म्हणे जातक केलें आणि मृताचेंच जन्मनांव ठेवले, त्याप्रमाणेच अशाश्वत गृहाची स्थापना करणे आहे ७४.


    तोही असंतु आरंभ कुडा । मृत्तिकेसाठीं लावी झगडा ।
    भांडवी दगडासाठीं कां लांकुडा । सुहृदभिडा सांडोनि ॥७५॥
    अशा गृहाचा हा आरंभ सुद्धा खोटाच; कारण, तो मातीसाठी तंटा लावतो. दगडासाठी किंवा लाकडासाठी आप्तसंबंध बाजूस ठेवून भांडण करवितो ! ७५,


    वोळंबा घर करी सायासें । त्यामाजीं सर्प राहे सावकाशें ।
    न शिणतां अप्रयासें । परघरवासें संतुष्ट ॥७६॥
    वाळवी मोठ्या प्रयत्नाने वारुळ तयार करिते, आणि त्यांत सर्प जाऊन खुशाल राहतो; कांहीं एक कष्ट न करता आयताच दुसर्‍याच्या घरांत राहून मौज मारतो ७६.


    तैसाचि योगियाही जाण । न धरी देहगेह अभिमान ।
    परगृहीं वसे निरभिमान । सुखसंपन्न सर्वदा ॥७७॥
    त्याचप्रमाणे योगी सुद्धा घरादाराचा किंवा देहाचा अभिमान बाळगीत नाही. निरभिमानपणाने दुसऱ्याच्या घरांत राहून सदासर्वदा आनंदांत असतो ७७.


    एकही गृह न करावें । हें सत्य मानिलें जीवें ।
    एवढी सृष्टि केली देवें । बाधूं न पवे त्या केवीं ॥७८॥
    एकही घर करावयाचे नाही, हाच निश्चय मी केला. परंतु देवाने एवढी सृष्टि केली असता, तिच्यापासून त्याला कशी बाधा होत नाहीं ? ( असा प्रश्न येतो) ७८.


    सृष्टि रचिली कैसेनी । निपजली कोणापासूनी ।
    येचि अर्थी गुरु कांतिणी । लक्षण लक्षुनी म्यां केली ॥७९॥
    तर सृष्टि कशी रचली गेली ? ती कोणापासून उत्पन्न झाली ? ह्याचकरितां मी कांतिणीला तिच्या लक्षणाकडे लक्ष देऊन गुरु केले ७९.


    एको नारायणो देवः पूर्वसृष्टं स्वमायया ।
    संहृत्य कालकलया कल्पान्त इदमीश्वरः ॥ १६ ॥
    [श्लोक १६] आपल्या मायेने एका नारायण देवांनीच निर्माण केलेले हे विश्व कल्पाच्या शेवटी आपल्या कालशक्तीद्वारे स्वतःमध्येच विलीन करून; (१६)




    नरांचे आश्रयस्थान । यालागीं बोलिजे 'नारायण' ।
    जीवाचें तोचि जीवन । स्वामी नारायण सर्वांचा ॥१८०॥
    नरांचे आश्रयस्थान, म्हणूनच त्याला 'नारायण' असे म्हणतात. साऱ्या जीवांचे जीवन तोच नारायण सर्वांचा स्वामी होय १८०.


    ऐसा एक नारायण । तेणें पूर्वी जग सृजिलें जाण ।
    उपकरणसामग्रीवीण । केलें निर्माण जगांचे ॥८१॥
    असा जो एक नारायण, त्याने हे जग पूर्वी उत्पन्न केलें. कोणतीही बाह्य सामुग्री न घेतां या विश्वाची त्याने उत्पत्ति केली ८१.


    एकलेनि सामग्रीवीण । केवीं केलें जग संपूर्ण ।
    स्वमायाक्षोभवूनि जाण । करी निर्माण जगाचें ॥८२॥
    एकट्याने आणि सामुग्रीशिवायच सारे जग केले कसे ? तर त्याने आपल्याच मायेला क्षुब्ध करून हे जग निर्माण केले ८२.


    ते निजमायेच्या पोटीं । असंख्य जीवसामग्रीच्या कोटी ।
    ते माया अवलोकिली दृष्टीं । तोचि उठाउठी निजकाळु ॥८३॥
    त्याला त्याच्या मायेच्या पोटामध्ये जीवसमुदायाच्या असंख्य कोटी भरलेल्या मायेच्या पोटामध्ये जीवसमुदायाच्या असंख्य कोटी भरलेल्या असतात. ती माया त्याने दृष्टीने अवलोकन केली. या 'ईक्षणा' लाच 'काळ' असे म्हणतात ८३.


    ऐसी निजमाया अवलोकिली । ते निजांगावरी नांदविली ।
    परी अंगीं लागों नाहीं दिधली । हे अलिप्तता केली तो जाणे ॥८४॥
    अशा प्रकारे त्याने आपल्या मायेकडे पाहिले; आणि तिला आपल्या अंगावर खेळूं दिलें, पण आपल्या अंगाला लागूं दिली नाही. इतक्या अलिप्सतेचा खेळ तो करणाराच एक जाणत असतो ८४.


    धुई दाटली आकाशीं । आकाश नातळे धुईसी ।
    तैसी निजांगे वाढवूनि मायेसी । अलिप्त तियेसी वर्ततु ॥८५॥
    आकाशामध्ये धुकें भरते. परंतु आकाश कांहीं धुक्याला स्पर्शत नाही. त्याप्रमाणे तो आपल्या अंगाने मायेला वाढवितो, पण तिच्याशी अलिप्तपणेच राहतो ८५.


    उदकें कमळिणी वाढविली । ते जळ आवरी निजदळीं ।
    तैसी माया आनंद आकळी । चित्सत्ता मोकळी सदंशेंसीं ॥८६॥
    उदकानेंच कमळिणीला वाढविलें, पण तेच उदक ती आपल्या पानाने झाकून टाकते. त्याप्रमाणे माया ही सत्-चित्-आनंद ह्यांपैकी आनंदांशाला आवरण घालते; परंतु सत्-अंशासह चित्-सत्ता ही मोकळीच असते ८६.


    स्वमायेसी जो अधिष्ठान । मायेसी नांदावया तोचि भुवन ।
    एवं मायानियंता नारायण । सत्य जाण सर्वथा ॥८७॥
    जो आपल्या मायेला अधिष्ठान, तोच त्या मायेचें नांदावयाचें घर. याप्रमाणे खरोखर मायेचा नियंता नारायणच होय ८७.


    रजोगुण सृजी सृष्टीसी । सत्त्वगुण प्रतिपाळी तिसी ।
    कल्पांतीं क्षोभवोनि तमोगुणासी । काळरूपेंसीं संहारी ॥८८॥
    रजोगुण सृष्टीला उत्पन्न करतो; सत्त्वगुण तिचा प्रतिपाळ करतो; आणि तमोगुण कल्पांताच्या वेळी क्षुब्ध होऊन काळाच्या रूपाने तिचा संहार करतो ८८.


    हे मायेची क्षोभक शक्ती । असे नारायणाचे हातीं ।
    यालागीं संहारिता अंतीं । ईश्वरु म्हणती या हेतू ॥८९॥
    परंतु ही मायेची क्षोभक शक्ति नारायणाच्या हातांत असते; याच दृष्टीने अंती संहार करणारा ईश्वर असें म्हणतात ८९.


    एक एवाद्वितीयोऽभूदात्माधारोऽखिलाश्रयः ।
    कालेनात्मानुभावेन साम्यं नीतासु शक्तिषु ।
    सत्त्वादिष्वादिपुरुषः प्रधानपुरुषेश्वरः ॥ १७ ॥
    परावराणां परम आस्ते कैवल्यसंज्ञितः ।
    केवलानुभवानन्द सन्दोहो निरुपाधिकः ॥ १८ ॥
    [श्लोक १७-१८] सर्वांना आपल्यात घेऊन स्वतःच्याच आधारावर ते एकमेवाद्वितीय होऊन राहिले प्रकृती आणि पुरूष या दोहोंचे नियामक असलेले तेच आदिपुरूष जेव्हा आपल्या कालशक्तीच्या सामर्थ्याने या सत्त्वादी शक्तींना साम्यावस्थेत घेऊन जातात, तेव्हा सर्व कार्यकारणांचे परम कारण असे ते एकटेच असतात ते केवळ अनुभवस्वरूप व आनंदाचा पुंज आहेत तेथे प्रकृतीची कोणतीही उपाधी नाही. (१७-१८)




    एवं संहारोनि कार्यकारण । एक अद्वितीय नारायण ।
    एकपणें परिपूर्ण । गुणागुण निरसोनि ॥१९०॥
    अशा प्रकारे कार्यकारण नाहीसे केल्यानंतर एकटा एक अद्वितीय परिपूर्ण असा नारायणच गुणागुण सोडून देऊन शिल्लक राहतो १९०.


    एकला एकु नारायण । हेंही तेथ म्हणे कोण ।
    हें अद्वितीय लक्षण । भेदशून्य अवस्था ॥९१॥
    पण तेथे एकटा एक नारायण राहतो, असें म्हणणारे तरी कोण ? लक्षण केवळ अद्वितीय आहे. भेदशून्य अवस्था ती हीच ९१.


    'विजातीयभेद' ते ठायीं । नसे 'सजातीयभेद' कांहीं ।
    'स्वगतभेदु' तोही नाहीं । भेदशून्य पाहीं ये रीतीं ॥९२॥
    तेथे 'सजातीय' भेद नाहीं; 'विजातीय' भेदही नाहीं; आणि 'स्वगत' भेदही पण तेथें नाहीं; अशा रीतीनें तो भेदरहितच असतो (झाडाशी झाड 'सजातीय', झाडाची पाने, फुले, फळे 'स्वगत' व झाडाशी 'पाषाण' विजातीय,; ह्याप्रमाणे परमात्म्यांत-आत्मा, जीव व जगत्-असे विविध भेद नाहीत) ९२.


    ऐसा अभेदु जो साचारु । तोचि प्रकृतिपुरुषांचा ईश्वरु ।
    नियंता तो परावरु । तोही निर्धारु परियेसीं ॥९३॥
    असा जो खरोखर अभेद तोच प्रकृतिपुरुषांचा ईश्वर होय. तोच सर्वांचा श्रेष्ठ नियंता व 'पर' आणि 'अवर ' आहे. त्याचाही निर्णय ऐक ९३.


    प्रकृति पुरुष हे दोन्ही । कल्पिलीं जेणें अमन-मनीं ।
    तो ईश्वर होय भरंवसेनी । त्याचे सामर्थ्येंकरूनि वर्तती ॥९४॥
    मनरहित संकल्पाने ज्याने प्रकृति आणि पुरुष दोन्ही उत्पन्न केली, तोच खरोखर ईश्वर होय. त्याच्याच सामर्थ्यानें ती वागतात ९४.


    प्रकृतीतें चेतविती सत्ता । तेचि याची पुरुषता ।
    यालागीं प्रकृतीचा भर्ता । होय सर्वथा हाचि एकु ॥९५॥
    प्रकृतीला सत्ता चेतविते तेंच याचे पुरुषत्व होय. म्हणून प्रकृतीचा पति सर्वतोपरी हाच एक होय ९५.


    'पर' जे अज-प्रमुख । 'अवर' मनुमुख्य स्थावरांतक ।
    यांचा नियंता तो देख । सर्वचाळक सर्वांचा ॥९६॥
    ब्रह्मदेवादिक देव 'पर', आणि मनूपासून स्थावरापर्यंत सर्व जीव ते 'अवर' होत. यांचा नियंता व चालक तोच होय ९६.


    ज्याचे आज्ञेवरी पाहें । सैरा वायु जाऊं न लाहे ।
    समुद्र वेळेमाजीं राहे । सूर्य वाहे दिनमान ॥९७॥
    ज्याच्या आज्ञेबाहेर वायुसुद्धा पाऊल टाकीत नाहीं; समुद्र आपल्या मर्यादेत राहतो; आणि सूर्य दिनमान चालवितो ९७.


    ज्याची आज्ञा करूनि प्रमाण । बारा अंगुळें विचरे प्राण ।
    परता जाऊं न शके जाण । आज्ञेभेणें सर्वथा ॥९८॥
    ज्याची आज्ञा शिरसावंद्य करून प्राणसुद्धा (नाकांतून) बारा अंगुलेंच फिरत राहतो. आज्ञेच्या धाकानें त्याच्या पुढे जाऊ शकत नाही ९८.


    आज्ञा जाणोनि धडफुडी । मेरु बैसका न सोडी ।
    चेतना आज्ञा करी गाढी । अचेतन कुडी चेतवी ॥९९॥
    सक्तीची आज्ञा लक्षात आणून मेरूही आपले स्थान सोडीत नाहीं. चेतनशक्तीला आज्ञा होतांच ती अचेतन देहाला सचेतन करून सोडते ९९.


    तो स्वयें तंव निराधार । परी झाला विश्वासी आधार ।
    जेवीं सर्पाभासा दोर । दिसे साचार आश्रयो ॥२००॥
    तो स्वतः निराधार असून साऱ्या विश्वाला आधार होऊन राहिलेला आहे. ज्याप्रमाणे सर्पाभासाला आश्रय दोराचाच दिसतो २००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...