मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ ओव्या ३०१ ते ४००

    देहासी उपभोगसाधनें । तितुकीं जाण पां बंधनें ।

    दृढ वासना तेणें । अनिवारपणें वाढते ॥१॥
    देहाला उपभोगाची म्हणून जितकी साधने आहेत, तितकी सारी बंधने आहेत, हें तूं लक्षात ठेव, त्यांच्या योगानें वासना प्रबळ होऊन अनिवार वाढते १.


    जायात्मजार्थपशुभृत्यगृहाप्तवर्गान्
    पुष्णाति यत्प्रियचिकीर्षया वितन्वन् ।
    स्वान्ते सकृच्छ्रमवरुद्धधनः स देहः
    सृष्ट्वास्य बीजमवसीदति वृक्षधर्मः ॥ २६ ॥
    [श्लोक २६] जो मनुष्य पत्‍नी, पुत्र, धनदौलत, पशू, सेवक, घर, आप्तेष्ट यांची वाढ करीत त्यांच्याकडून ज्या देहाला सुख मिळेल, अशी इच्छा बाळगून त्यांचे पालनपोषण करतो आणि अतिशय कष्ट करून धनसंचय करतो, तोच देह शेवटी, बी निर्माण करून झाडाने नष्ट व्हावे, त्याप्रमाणे आपल्या पुढच्या जन्मासाठी कर्मरूप बीज तयार करून मृत्यूला कवटाळतो. (२६)




    देहभोगीं मुख्य गोडी । स्त्रीभोगाची अतिआवडी ।
    सर्वस्व वेंचोनि जोडी । आणी रोकडी योषिता ॥२॥
    देहभोगांतील मुख्य गोडी म्हटली म्हणजे स्त्रीभोगाची. सर्वस्व खर्च करून आपल्या जोडीला बायको करून घेऊन येतात २.


    स्त्री हातीं धरितां देख । वाढे प्रपंचाचें थोर दुःख ।
    गृह पाहिजे आवश्यक । भोगार्थ देख स्त्रियेच्या ॥३॥
    परंतु स्त्रीचे पाणिग्रहण केलें की, प्रपंचाचे दुःख वाढू लागते. त्या स्त्रियेच्या उपभोगासाठी घर करणे भाग पडतें ३.


    त्या गृहाचे गृहसिद्धीं । पाहिजे धनधान्यसमृद्धी ।
    झाली प्रजांची वृद्धी । तेणें अतिआधी अनिवार ॥४॥
    ते घर नीट चालावयाका धनधान्याची समृद्धि पाहिजे. पुढे मुलेबाळे होऊन प्रपंच वाढला, म्हणजे अनिवार चिंता उत्पन्न होते ४.


    त्या प्रजांचा अतिलालसु । दासदासी मेळवी पशु ।
    थोर कष्टांचा पडे सोसु । सुखलेशु पैं नाहीं ॥५॥
    त्या मुलाबाळांचा अतिशय लळा लागून राहतो. त्यांच्याकरितां गडीमाणसे, दासदासी, गुरेढोरे बाळगावी लागतात. त्यामुळे खडतर कष्ट सोसणे भाग पडते. सुखाचा एक क्षणही मिळत नाही ५.


    व्याही जांवयांच्या वोढी । आप्तवर्गाचिया कोडी ।
    पडे उचिताचिया सांकडीं । सोशितां कोरडी देहाची ॥६॥
    व्याह्यांची आणि जावयांची ओढ लागते; आप्तइष्टांच्या झुंडीच्या झुंडी जमा होतात. त्यांचा यथायोग्य सत्कार करावयाचे महासंकट पडते आणि तें सारे सहन करता करतां देहाची अगदी रेवडी वळून जाते ६.


    पोसावया पोष्यांसी । रची नाना उपायराशी ।
    हिंडे स्वदेशीं परदेशीं । अहर्निशीं व्याकुळ ॥७॥
    आश्रित जनांचे पोषण करण्याकरिता नाही नाही तितके उपाय करतो, स्वदेशांत परदेशांत हिंडू लागतो व रात्रंदिवस दगदग करून हैराण होतो ७.


    देहासी द्यावया सुख । शतधा वाढवी दुःख ।
    देहाभिमानें जन मूर्ख । वृथाभिलाख वाढविती ॥८॥
    देहाला सुख देण्याकरितां शेंकडोंपट दुःखच वाढवीत असतो. मूर्ख लोकांची अशी चालच आहे की, ते देहाभिमानाने फुकट अभिलाषा वाढवितात ८.


    देहसुखाचिया चाडा । पडे परिग्रहाचे खोडां ।
    दारागृहलोभें केला वेडा । न देखे पुढां निजस्वार्थु ॥९॥
    देहसुखाच्या इच्छेने म्ह. जमीनजुमला इत्यादिकांचा खोडा पायांत पडतो. घरदार, स्त्रीपुत्रांनी त्याला वेडे करून सोडल्यामुळे त्याचा निजस्वार्थ त्याला दिसत नाही ! ९.


    देहें वाढविली प्रीती । गृह दारा पुत्र संपत्ती ।
    तेचि वासना होय देहांतीं । देहांतराप्रती निजबीज ॥३१०॥
    घरदार, मुलेबाळें, संपत्ति ह्यांचा लोभ देहाने वाढविलेला असतो. तीच वासना देहाच्या अंतकाली, दुसऱ्या जन्माच्या प्राप्तीला बीजरूपाने कारणभूत होते ३१०.


    जैसा जोंधळा कणिसा चढे । कणसींचा क्षितीवरी झडे ।
    वाढी वाढलें झाड मोडे । तें बीज गाढें उरलेंसे ॥११॥
    जोंधला ज्याप्रमाणे कणसाच्या शेंड्यावर चढतो, आणि मग त्या कणसापासून जमिनीवर झडून पडतो आणि वाढीने वाढलेले झाड मोडून जाते, परंतु मुख्य बीज जमिनींत शिल्लक राहिलेले असते ११.


    तेंचि बीज जलभूमीचे संगतीं । सवेंचि झाड वाढे पुढतीं ।
    तैसी वासना उरे देहांतीं । देहांतराप्रती न्यावया ॥१२॥
    त्या बीजाला पाणी व जमीन सांपडली की, लागलेच पुढे त्याचे झाड वाढते. त्याप्रमाणे दुसऱ्या जन्मांत घालण्याकरितां वासना ही उरत असते १२.


    त्या वृक्षाचिया परी । वासनाबीज शरीरीं ।
    उरवूनि स्वर्गसंसारीं । योनिद्वारीं जन्मवी ॥१३॥
    त्या झाडाप्रमाणेच वासनाबीज लिंगदेहांत शिल्लक राहून योनिद्वारे जन्मास घालते व स्वर्गात किंवा संसारांत पाडतें १३.


    देहीं वासना केवीं वाढे । तेंही सांगेन तुज पुढें ।
    विषय सेवितां वाडेंकोडें । वासना वाढे अनिवार ॥१४॥
    देहामध्ये वासना कशी वाढते तेही तुला सांगेन. आसक्तिपूर्वक विषयांचे सेवन केलें असतां वासना अनिवार वाढते १४.


    जिह्वैकतोऽमुमपकर्षति कर्हि तर्षा
    शिश्नोऽन्यतस्त्वगुदरं श्रवणं कुतश्चित् ।
    घ्राणोऽन्यतश्चपलदृक् क्व च कर्मशक्तिः
    बह्व्यः सपत्न्य इव गेहपतिं लुनन्ति ॥ २७ ॥
    [श्लोक २७] जसे एखाद्या माणसाला त्याच्या पुष्कळशा सवती पत्‍न्या आपापल्याकडे ओढून त्याला सतावतात, त्याचप्रमाणे देहाभिमानी जीवाला एकीकडे त्याची रसना खाद्यपदार्थांकडे ओढते तर कधी तहान सतावते, कधी एकीकडे जननेंद्रिय व्याकूळ करते, तर दुसरीकडे त्वचा, पोट, कान हे आपापल्या विषयांकडे खेचून घेतात नाक कधी सुगंधाकडे ओढते तर कधी चंचल डोळे रूप पाहण्यासाठी आकर्षित करतात कधी कम]द्रिये आपापल्या विषयांकडे ओढतात. (२७)




    जिव्हा रसाकडे वोढी । तृषा प्राशनालागीं तोडी ।
    शिश्नासी रतिसुखाची गोडी । तें चरफडी रमावया ॥१५॥
    जिव्हा रसाकडे ओढ घेत असते; तृषा प्राशन करण्यासाठी जीव तोडते; शिस्नाला रतिसुखाची गोडी असल्यामुळे, त्यांत रममाण होण्याकरिता ते धडपडत असते १५.


    त्वचा पाहे मृदुपण । उदर वांछी पूर्ण अन्न ।
    श्रवण मागती गायन । मधुरध्वन आलापु ॥१६॥
    मऊ असेल तें त्वचा पहात असते. पोट भरपूर अन्न मिळण्याची इच्छा करीत असते. गायन, मंजुळ ध्वनि, आलाप हे कान मागत असतात १६.


    घ्राण उद्यत परिमळा । रूप पहावया वोढी डोळा ।
    हस्त वांछिती खेळा । नाना लीळा स्वभावें ॥१७॥
    नाक सुगंधाकरितां उद्युक्त झालेले असते. सुस्वरूप पाहण्याकरितां डोळा ओढीत असतो. अनेक प्रकारचे खेळ खेळावेत, मनास वाटतील त्या नानाप्रकारच्या लीला कराव्या म्हणून हात धडपडत असतात १७.


    पाय वांछिती गती । ऐशीं इंद्रियें वोढा वोढिती ।
    जेवीं एका गेहपती । बहुतां सवती तोडिती ॥१८॥
    पायांना इकडे तिकडे हिंडावेसे वाटते. ज्याप्रमाणे घरामध्ये एका नवऱ्याला पुष्कळ बायका असल्या म्हणजे त्याला सवती सक्ती तोडतोडून घेतात; त्याप्रमाणे इंद्रियें आपआपल्या आवडीप्रमाणे त्याला ओढीत असतात १८.


    एवं इंद्रियांसी विषयासक्ती । तेणें वासना दृढ होती ।
    त्या देहदेहांतराप्रती । पुरुषासी नेती सर्वथा ॥१९॥
    ह्याप्रमाणे इंद्रियांना विषयांची आसक्ति असल्यामुळे वासनाही प्रबळ होत जाते. आणि त्या वासनाच पुरुषाला खरोखर या देहांतून त्या देहांत घेऊन जात असतात १९.


    यालागीं करावया विषयत्यागु । अवश्य छेदावा देहसंगु ।
    इये अर्थी मनुष्यदेह चांगु । ज्ञानविभागु ये देहीं ॥३२०॥
    यासाठी विषयांचा त्याग करण्याकरितां देहसंगच मुळी सोडून दिला पाहिजे. असें करण्याला मनुष्यदेहच उत्तम आहे. कारण ज्ञानप्राप्ति आहे ती याच देहांत आहे ३२०.


    सृष्ट्वा पुराणि विविधान्यजयाऽऽत्मशक्त्या
    वृक्षान् सरीसृपपशून् खगदन्दशूकान् ।
    तैस्तैरतुष्टहृदयः पुरुषं विधाय
    ब्रह्मावलोकधिषणं मुदमाप देवः ॥ २८ ॥
    [श्लोक २८] भगवंतांनी आपल्या अचिंत्य शक्ती असलेल्या मायेद्वारे झाडे, सरपटणारे प्राणी, पशू, पक्षी, डास, मासे अशा अनेक प्रकारच्या योनी निर्माण केल्या, परंतु त्यांपासून त्यांचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी मनुष्यशरीराची निर्मिती केली ब्रह्माचा साक्षात्कार करून घेऊ शकणार्‍या बुद्धीने युक्त अशा याची रचना केल्यावर त्यांना आनंद झाला. (२८)




    हेचि जाणावया निजरूपातें । पूर्वीं तेणें श्रीअनंतें ।
    निजमायेचेनि हातें । केलीं बहुतें शरीरें ॥२१॥
    ह्याच आपल्या स्वरूपाला जाणतां यावे म्हणून सृष्टीच्या आरंभी श्रीअनंतांनी आपल्या मायेच्या हस्ते अनेक प्रकारची शरीरें निर्माण केली २१.


    एकें केलीं भूचरें । एकें तें केलीं खेचरें ।
    एकें केली जळचरें । चरें अचरें तीं एकें ॥२२॥
    कांही जमिनीवरून चालणारी तयार केली, कांही आकाशांतून फिरणारी तयार केली, कांही पाण्यात विहार करणारी तयार केली व कांही स्थावर व कांही जंगम अशी शरीरें निर्माण केली २२.


    वृक्ष सर्प पशु दंश । राक्षस पिशाच बक हंस ।
    मत्स्यकच्छादि अशेष । सृजी बहुवस योनिंतें ॥२३॥
    वृक्ष, सर्प, पशु, दंश करणारे प्राणी, राक्षस, पिशाच, बगळे, हंस, मासे, कांसव, इत्यादि झाडून सार्‍या योनी त्यानेच निर्माण केल्या २३.


    ऐसा चौर्‍यांशीं लक्ष योनी । सृजूनि पाहे परतोनी ।
    तंव निजप्राप्तीलागोनी । न देखे कोणी अधिकारी ॥२४॥
    अशा चौर्‍यायशीं लक्ष योनी तयार करून त्यांच्याकडे त्याने नजर देऊन पाहिले, तो त्यांच्यामध्ये आत्मप्राप्ति करून घेण्यासारखा अधिकारी त्याला कोणी दिसला नाहीं २४.


    ऐशिये देखोनि सृष्टीतें । सुख न वाटेचि देवातें ।
    मग मानवी प्रकृतीतें । आदरें बहुतें निर्मिलें ॥२५॥
    अशी सृष्टि पाहून देवाला समाधान वाटले नाही. म्हणून त्याने मुद्दाम मोठ्या आस्थेनें मानवी देहाची रचना केली २५.


    बाहुल्यें मनुष्यदेहीं । निजज्ञान घातलें पाहीं ।
    जेणें ज्ञानें देहीं । विदेह पाहीं पावती ॥२६॥
    आणि त्या मनुष्यामध्ये पुष्कळसें आपलें ज्ञान भरून ठेवलें, ज्या ज्ञानाने ते त्या देहांत असूनच विदेहस्थितीला पोचतात २६.


    आहार-निद्रा-भय मैथुन । सर्वा योनींसी समसमान ।
    मनुष्यदेहींचें ज्ञान । अधिक जाण सर्वांशीं ॥२७॥
    आहार, निद्रा, भय आणि मैथुन ही साऱ्या योनींना सारखी आहेत. परंतु मनुष्यदेहांतील ज्ञान हे सर्वांपेक्षा विशेष आहे २७.


    देखोनि मनुष्यदेहासी । सुख झालें भगवंतासी ।
    अधिकार ब्रह्मज्ञानासी । येणें देहेंसीं मत्प्राप्ती ॥२८॥
    अशा त्या मनुष्यदेहाला पाहून मात्र भगवंताला संतोष झाला. कारण या देहाला ब्रह्मज्ञान संपादन करण्याचा अधिकार असून याच देहाने माझी प्राप्ति होण्यासारखी आहे असे वाटले २८.


    पावोनियां मनुष्यपणा । जो न साधी ब्रह्मज्ञाना ।
    तो दाढीचा मेंढा जाणा । विषयाचरणा विचरतु ॥२९॥
    मनुष्यजन्माला येऊनही जो ब्रह्मज्ञान संपादन करणार नाही. तो विषयाचरणांतच सर्वकाळ चूर असणारा दाढीवाला बोकडच समजला पाहिजे २९.


    मनुष्यदेहींचेनि ज्ञानें । सच्चिदानंदपदवी घेणें ।
    एवढा अधिकार नारायणें । कृपावलोकनें दीधला ॥३३०॥
    मनुष्यदेहांतील ज्ञानाने सच्चिदानंदपदवी प्राप्त करून घेता येते, एवढा अधिकार नारायणाने कृपा करून दिला आहे ३३०.


    मनुष्यदेहीं ब्रह्मज्ञान । पुढील जन्मीं मी करीन ।
    म्हणे तो नागवला जाण । सोलींव अज्ञान त्यापासीं ॥३१॥
    मनुष्यदेहांतच ब्रह्मज्ञान संपादन करावयाचे तर तें मी पुढच्या जन्मांत संपादन करीन; असें म्हणेल तो पर बुडाला समजावें, त्यांच्याजवळ असलेलें अस्सल अज्ञान ते हेंच ३.


    लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसम्भवान्ते
    मानुष्यमर्थदमनित्यमपीह धीरः ।
    तूर्णं यतेत न पतेदनुमृत्यु यावन्
    निःश्रेयसाय विषयः खलु सर्वतः स्यात् ॥ २९ ॥
    [श्लोक २९] अत्यंत दुर्लभ असणारे हे मनुष्यशरीर पुष्कळ जन्मांनंतर मिळालेले आहे याच्यामुळे परम पुरूषार्थाची प्राप्ती होऊ शकते त्याचबरोबर हे नाशही पावणारे आहे, हे जाणून जोवर मृत्यूने त्याला आपल्या कवेत घेतले नाही, तोवरच शहाण्याने तत्काळ आपल्या परम कल्याणासाठी प्रयत्‍न करावेत कारण विषयभोग तर सर्वत्र मिळतात. (२९)




    चौर्‍यांशीं लक्षयोनींप्रती । जैं कोटिकोटी फेरे होती ।
    तैं नरदेहाची प्राप्ती । अवचटें लाहती निजभाग्यें ॥३२॥
    चौर्‍यायशीं लक्ष योनींचे जेव्हां कोटि कोटि फेरे होतात, तेव्हा मोठ्या भाग्याने अकस्मात् या नरदेहाची प्राप्ति होते ३२.


    जो मनुष्यदेही जन्मला । तो परमार्थासी लिगटला ।
    एवढा अलभ्य लाभ झाला । पितरीं मांडिला उत्साहो ॥३३॥
    जो मनुष्यदेहांत जन्मतो, तो परमार्थाला मिठी घालतो. एवढा अलभ्य लाभ झालेला पाहून त्याचे पितरही मोठा उत्सव करूं लागतात ३३.


    झालिया मनुष्यदेहप्राप्ती । परमार्थ साधूं भोगाअंतीं ।
    एवढी येथ नाहीं निश्चिती । मृत्युप्राप्ति अनिवार ॥३४॥
    मनुष्यदेह प्राप्त झाल्यावर आधी सारे भोग भोगून घेऊ आणि मग सावकाश परमार्थाला लागू, असे म्हटल्यास तेवढी शाश्वती येथे खरोखर नाही; कारण मृत्यूचा तडाखा अनिवार आहे ३४.


    मृत्यु न विचारी गुण-दोष । न म्हणे देश-विदेश ।
    न पाहे रात्र-दिवस । करीत नाश तत्काळ ॥३५॥
    मृत्यु हा कोणाच्या गुणांचाही विचार करीत नाही व दोषांचाही विचार करीत नाहीं; तो देश किंवा परदेश म्हणत नाहीं; हा दिवस आहे किंवा रात्र आहे हे पाहात नाहीं; तत्काल नाशच करतो ३५.


    देह जैंपासोनि झाला । तैंपासूनि मृत्यु लागला ।
    जेवीं सापें बेडूक धरिला । गिळूं लागला लवनिमिषें ॥३६॥
    सापाने ज्याप्रमाणे बेडूक धरल्यावर त्यास भराभर गिळू लागावे, त्याप्रमाणे देह जेव्हांपासून झाला, तेव्हांपासून मृत्यु हा लागलेलाच आहे ३६.


    साप बेडुकातें गिळी । बेडूक मुखें माशातें कवळी ।
    तैशीं मृत्युमुखीं पडलीं । विषयभुलीं झोंबतीं ॥३७॥
    साप बेडकाला गिळीत असतो, आणि बेडूक आपल्या तोंडाने माशा धरीत असतो; त्याप्रमाणे मृत्युमुखांत पडलेली मनुष्य़ॆम् विषयाच्या भुलीला झोंबतच असतात ! ३७.


    येथ आळसु जेणें केला । तो सर्वस्वें नागवला ।
    थिता परमार्थ हातींचा गेला । आवर्ती पडला भवचक्रीं ॥३८॥
    यांत जो आळस करील तो सर्वस्वी बुडतो. त्याच्या हातात असलेला परमार्थ जाऊन तो संसारचक्राच्या भोवऱ्यांत गिरक्या खात पडतो ३८.


    ऐसें जाणोनि यदुराया । देहाचिया लवलाह्या ।
    परमार्थ साधावया । ब्रह्मोपाया उद्यत व्हावें ॥३९॥
    हे यदुराजा ! हे सर्व लक्षात आणून ह्याच देहाने लगबग करून परमार्थ साधावयाला म्हणजे ब्रह्मप्राप्ति करून घेण्याला नेहमी तयार असावें ३९.


    छेदोनियां आळसासी । दवडूनियां निद्रेसी ।
    आत्मचिंतन अहर्निशीं । अविश्रमेंसीं साधावें ॥३४०॥
    आळसाला छाटून टाकून, झोपेला बाजूस सारून, रात्रंदिवस एकसारखें आत्मचिंतन करीत रहावें ३४०.


    रणीं रिघालिया शूरासी । न जिणतां परचक्रासी ।
    विसांवा नाहीं क्षत्रियांसी । तेणें वेगेंसीं साधावें ॥४१॥
    शूर क्षत्रिय वीर युद्धाला निघाले म्हणजे परचक्राला जिंकल्याशिवाय जसा विसावा म्हणून घेत नाहीत, तितक्याच वेगाने परमार्थाच्या मागे लागले पाहिजे ४१.


    साधावया आत्मलग्न । सावधान बिजवराचें मन ।
    तेणें साक्षेपें आपण । सायुज्यलग्न साधावें ॥४२॥
    आपले लग्न लागेपर्यंत बिजवराचे मन जितकें सावध असते, तितकें आपणही जीवशिवाचे लग्न लागेपर्यंत सावध असले पाहिजे ४२.


    रायाचें एकुलतें एक । चुकल्या अवचटें बाळक ।
    तो जेवीं शोधी सकळ लोक । तेवीं निजसुख साधावें ॥४३॥
    राजाचे एकुलते एक मूल अकस्मात् चुकले, तर तो जसा सारा मुलुख शोधतो, त्याप्रमाणे आपण आपलें निजसुख साधून घेण्याचा अटोकाट प्रयत्न केला पाहिजे ४३.


    काळाचा चपेटघात । जंव वाजला नाहीं येथ ।
    तंव साधावया परमार्थ । आयुष्य व्यर्थ न करावें ॥४४॥
    काळाचा तडाखा जोपर्यंत बसला नाही तोपर्यंत परमार्थ साधण्याकडेच आयुष्य खर्च केले पाहिजे. फुकट दवडता कामा नये ४४.


    नरदेहींचेनि आयुष्यें । प्रपंचाचेनि आवेशें ।
    विषयाचेनि विलासें । भोगपिसे नर झाले ॥४५॥
    परंतु नरदेहाच्या अमोल आयुष्यात, प्रपंचाच्या उमेदीमुळे, विषयाच्या लालसेनें सारे मनुष्य भोगवेडे झालेले आहेत ! १५,


    पश्वादियोनींच्या ठायीं । विषयांवांचोनि आन नाहीं ।
    तेचि विषयो नरदेहीं । वाढविल्या कायी हित झालें ॥४६॥
    पशु आदिकरून योनींमध्ये विषयावांचून दुसरे काहीच नाही. तोच विषय नरदेहांतही वाढविला तर त्यापासून हित ते कोणतें झालें ? ४६.


    विचारितां विवेकदृष्टीं । विषयांसी प्रारब्धें भेटी ।
    वृथा करितां आटाटी । मुद्दलतुटी नरदेहा ॥४७॥
    विवेकटष्टीने विचार केला तर, विषय हे प्रारब्धानुसारच मिळत असतात. त्यांच्यासाठी व्यर्थ यातायात करीत बसल्याने मूळ नरदेहाचाच नाश होतो ४७.


    नरदेह परम पावन । पावोनि न साधी ब्रह्मज्ञान ।
    तो लांडा गर्दभ जाण । पुच्छेंवीण दुपायी ॥४८॥
    नरदेह हा मोठा पवित्र आहे. तो प्राप्त झाला असून जो ब्रह्मज्ञान साध्य करीत नाही, तो दोन पायांचा पुच्छविहीन लांडा गाढवच समजला पाहिजे ४८.


    अपरोक्षज्ञानेंवीण वांझट । उदरार्थ दंभ खटपट ।
    जेवीं मदिरापानी मर्कट । उडे उद्भट तडतडां ॥४९॥
    अपरोक्षज्ञानाशिवाय केवळ पोटाकरितां ढोंगी ज्ञानाची खटपट करीत राहणे म्हणजे दारू प्यालेले माकड जसें जोराने तडातड उडत असते त्याप्रमाणेच होय ४९.


    ब्रह्मज्ञानेंवीण शास्त्रज्ञ । ते अंधारींचे खद्योत जाण ।
    अज्ञाननिशीमाजीं तेज गहन । सूर्योदयीं कोण त्यां देखे ॥३५०॥
    ब्रह्मसाक्षात्काराशिवाय मोठे शास्त्रज्ञानी झाले, तरी ते अंधारातले काजवे म्हणून समजावे. अज्ञानरूप रात्रीमध्ये ते मोठे चकाकतात, पण सूर्योदय झाल्यावर त्यांना कोण विचारतो ? ३५०.


    ब्रह्मज्ञानेंवीण संन्यासी । नटाच्या ऐसें मुंडण त्यांसी ।
    सोकले मिष्टान्नभिक्षेसी । वृथा गेरूसी नाशिलें ॥५१॥
    ब्रह्मज्ञानाशिवाय संन्यासी म्हणजे नाटकांतल्या पोर्‍यासारखे मिशा वगैरे बोडलेले व गोडगोड भिक्षेच्या अन्नाला सोकावलेले फुकट काव मात्र नासत असतात ! ५१.


    मनीं विषयांचें अभिलाषण । धरूनि करिती वेदाध्ययन ।
    ते वर्षाकाळींचे दर्दुर जाण । कर्दमपानें जल्पती ॥५२॥
    मनांत विषयाचा अभिलाष धरून वेदाध्ययन करितात, ते पावसाळ्यांतले बेडूक म्हणून समजावे. बेडूक चिखल खाऊन 'टरांव टरांव' करीत असतात (त्याप्रमाणे ते !) ५२.


    विषयप्राप्तीलागीं मौन । तें बकाचें बकध्यान ।
    विषयबुद्धी जें गायन । तें खरी देखोन खर भुंके ॥५३॥
    विषयप्राप्तीकरितां धरलेले मौन, तें बगळ्याचे ध्यान होय. आणि विषयबुद्धीने केलेले गायन म्हणजे गाढवीला पाहून गाढवाने खेकाळण्याप्रमाणे आहे ५३.


    विषयालागीं उपन्यास । नाना युक्तींचे विलास ।
    जेवीं पिंड देखोनि वायस । करिती बहुवस अतिशब्द ॥५४॥
    विषयाकरिता उपन्यास म्ह. प्रवचनें इत्यादि करणे व अनेक प्रकारच्या युक्ति प्रयुक्ति लढविणे म्हणजे भाताची उंडी पाहून कावळे जसे काव काव करून अगदी कल्लोळ करून सोडतात त्यांतलाच प्रकार होय ५४.


    पोट भरावया भांड । सैरा वाजविती तोंड ।
    तैसें विषयांलागीं वितंड । शास्त्रपाखंड बोलती ॥५५॥
    भांड म्ह. नकले वगैरे लोक पोट भरण्यासाठी पाहिजे तसे अचावचा तोंड सोडतात, त्याप्रमाणे विषयासाठी शास्त्राचे भलभलते अर्थ सागून वितंडवाद घालतात ५५.


    विषयवासना धरूनि थोर । बाह्य मिरविती आचार ।
    जेवीं कागाचा शौचाचार । विष्ठातत्पर मानसीं ॥५६॥
    मनामध्ये विषयाची दृढतर वासना धरून बाहेरून मात्र सदाचाराचा डौल आणतात, ते कावळ्याने बाहेरून शुद्धतेचा डौल आणून आंतून विष्ठेचे चिंतन करावें त्याप्रमाणे होत ५६.


    हृदयीं धरूनि जीविका चांग । करिती अग्निहोत्रयाग ।
    जेवीं वेश्या विकोनि अंग । चालवी साङ्ग संसारा ॥५७॥
    ज्याप्रमाणे वेश्या आपला देह विकून आपला संसार यथास्थित चालविते, त्याप्रमाणे पोटामध्ये उपजीविकेचा हेतु धरून अग्निहोत्र, यज्ञयाग वगैरे करतात ५७.


    नरदेहींचा हाचि स्वार्थ । साधावा चौथा पुरुषार्थ ।
    तो न करितां जो का अर्थ । तो अनर्थ जाणावा ॥५८॥
    परंतु चौथा पुरुषार्थ साधणे हाच नरदेहांतीळ खरा खरा स्वार्थ आहे. तो न साधतां भलताच अर्थ साधीत बसणें तो महाअनर्थ होय असें जाणावें ५८.


    साधीना देहीं ब्रह्मज्ञान । तो श्वानसूकरांसमान ।
    अथवा त्याहोनि हीन । तें विवेचन परियेसीं ॥५९॥
    नरदेहांत येऊन ब्रह्मज्ञान साधीत नाही, तो कुत्र्यासारखा अथवा डुकरासारखा समजावा, किंवा त्याहूनही हीन प्रतीचा समजावा; त्यासंबंधींचा विचार ऐक ५९.


    पशूसी हाणिल्या लाथा । द्वेष न धरी सर्वथा ।
    मनुष्यासी 'तूं' म्हणतां । जीवघाता प्रवर्ते ॥३६०॥
    पशूला लाथा मारल्या असता तो त्याचा कधींच द्वेष धरीत नाही; पण मनुष्याला 'तू' म्हटले की तो जीव घ्यावयाला उठतो ! ३६०.


    पशूसी लोभ नाहीं संग्रहता । एक आहार होय भक्षिता ।
    मग उरलिया अर्था । त्यागी सर्वथा तत्काळ ॥६१॥
    पशूला साठवून ठेवण्याचा लोभ कधीच नसतो. फक्त खावयाचे तेवढे खातो; आणि बाकी राहिलेलें साफ सोडून देतो ६१.


    मनुष्याचें लोभिष्ठपण । गांठीं असल्या कोटि धन ।
    पोटा न खाय आपण । मा त्यागितां प्राण त्यजील ॥६२॥
    पण मनुष्याचा लोभिष्टपणा किती पहा ! कोट्यवधि रुपये गांठीला असले तरी, आपण पोटाला सुद्धा खात नाही. मग ते द्यावयाचा प्रसंग आल्यास प्राणच टाकील ६२.


    सायंप्रातर्चिंता । पशूसी नाहीं सर्वथा ।
    मनुष्याची चिंता पाहतां । जन्मशतां न राहे ॥६३॥
    पशूंना सकाळची किंवा संध्याकाळची चिंता म्हणून नसते ; पण मनुष्याची चिंता शेकडों जन्मही सुटत नाहीं ६३.


    अमित धन असतां गांठीं । तरी चिंता अनिवार मोठी ।
    नाथिलेंचि भय घे पोटीं । अविश्वासी सृष्टीं नरदेही ॥६४॥
    अपरिमित द्रव्य गांठीला असले तरी चिंता ही अनिवार असतेच. नसतें भय पोटांत धरून बसतो. नरदेही प्राण्यास सारी सृष्टि अविश्वासाचीच वाटते ६४.


    जरी मरों टेंकलें शरीर । तरी व्यवहारीं साधी वृत्तिक्षेत्र ।
    पाया शोधोनि बांधी घर । पुत्रपौत्र नांदावया ॥६५॥
    शरीर जरी मरावयाला टेकलें, तरी देवघेवी करून वतनवाडी घेतच असतो. आणि पाया खणून नातू पणतू नांदावे म्हणून घर बांधीत असतो ! ६५.


    ऐसी दुस्तर चिंता । पशूसी नाहीं सर्वथा ।
    आतां मैथुनाची कथा । ऐक तत्त्वतां सांगेन ॥६६॥
    अशी दुर्धर चिंता पशूना कधीच नसते. आतां मैथुनाची खरी स्थिति सांगतो ती ऐक ६६.


    पशूसी ऋतुकाळीं मैथुन । मग स्त्रियेसी नातळे आपण ।
    पुरुषासी नित्य स्त्रीसेवन । गरोदरही जाण न सोडी ॥६७॥
    पशु हे ऋतुकालींच मैथुन करतात, आणि मग त्या स्त्रियेला शिवतही नाहीत, पण पुरुष हे दररोज स्त्रीसंग करीत असतात. गरोदरपणातही सोडीत नाहीत ! ६७.


    काम क्रोध सलोभता । चिंता निंदा अतिगर्वता ।
    हें मनुष्याचेचि माथां । पशूसी सर्वथा असेना ॥६८॥
    काम, क्रोध, लोभ, किंवा निंदा आणि गर्विष्टपणा हे सारे मनुष्याच्याच माथ्यावर आहेत. पशुंना ते मुळीच नसतात ६८.


    न साधितां आत्मज्ञान । केवळ जे विषयी जन ।
    ते श्वानसूकरांपरीस हीन । माणुसपण त्यां नाहीं ॥६९॥
    याकरितां आत्मज्ञान साध्य न करता जे लोक केवळ विषयी होऊन राहातात, ते कुत्र्यापेक्षा व डुकरापेक्षाही नीच होत. त्यांना मनुष्यपणाच नाही म्हणून समजावे ६९.


    विषयाचें जें सुख जाण । तें स्वर्गी नरकीं समान ।
    जें इहलोकीं भोगी श्वान । तें स्वर्गी जाण इंद्रासी ॥३७०॥
    विषयाचे जें सुख आहे, ते स्वर्गात काय आणि नरकांत काय, सारखेच असते. या मृत्युलोकांत जे विषयसुख कुठे भोगते, तेंच सुख स्वर्गामध्ये इंद्र भोगतो ३७०.


    मनुष्यदेहावांचोनी । पशुपक्ष्यादि नाना योनी ।
    त्या विषयभोगालागोनी । विषयच्छेदनीं नरदेह ॥७१॥
    मनुष्यदेहाशिवाय इतर ज्या पशुपक्ष्यादि अनेक प्रकारच्या योनी आहेत, त्या विषयोपभोगाकरितांच आहेत; परंतु नरदेह मात्र विषयत्यागाकरिता आहे ७१.


    तो नरदेह कैसेनि जोडे । ते प्राप्तीचें कठिण गाढें ।
    तें सांगेन तुजपुढें । परिस निवाडें विभागु ॥७२॥
    तो नरदेह कसा मिळतो ? तर तो मिळणे फारच कठिण आहे. त्याचाही प्रकार तुला पुढे सांगतों तो नीट ऐकून घे ७२.


    अत्यंत सुकृतें स्वर्गी चढे । अत्यंत पापें अधोगती घडे ।
    पापपुण्य निःशेष झडे । तैं आतुडे निजमुक्ति ॥७३॥
    पुण्य फार झाले म्हणजे जीव स्वर्गास चढतो, आणि पाप फार झाले म्हणजे तो नरकांत पडतो; पाप व पुण्य दोन्ही निखालस नाहीशी झाली म्हणजे मुक्ति प्राप्त होते ७३.


    जैं पापपुण्य समान समीं । तैं मनुष्यदेह आक्रमी ।
    जन्म पावे कर्मभूमीं । आश्रमधर्मी सुमेधा ॥७४॥
    जेव्हां पापपुण्य समसमान होते तेव्हां मनुष्यदेह प्राप्त होतो व कर्मभूमीत आश्रमधर्मामध्ये बुद्धिवंत होऊन जन्मास येतो ७४.


    साक्षेपें मनुष्यदेह जोडे । ऐसें करितां तंव न घडे ।
    अवचट हाता चढे । भाग्य चोखडें जयाचें ॥७५॥
    मनुष्यदेह हटकून प्राप्त होईल, असे कांही करता येत नाही. तर ज्याचे भाग्यच उत्तम असते, त्याच्याच हाताला तो अकस्मात लागतो ७५,


    मोलें अनर्घ्य रत्‍नें येती । तैसा चिंतामणी न ये हातीं ।
    बहुत योनिये जन्म होती । परी मनुष्यदेहप्राप्ती दुर्लभ ॥७६॥
    अमूल्य रलें मोल देऊन घेता येतात; तसा चिंतामणि कांहीं हाताला येत नाही. तद्वत् पुष्कळ योनींमध्ये जन्म येतो, पण मनुष्यदेह मिळणें परम दुर्लभ आहे ७६.


    ऐसा नरदेह पावोनि देख । जो न साधीचि ब्रह्मसुख ।
    तो जनांमाजीं परम मूर्ख । विश्वासघातक देवाचा ॥७७॥
    असा नरदेह प्राप्त झाला असतां जो ब्रह्मसुखाचे साधन करीत नाही, तो जनामध्ये महामूर्ख व देवाचा विश्वासघातकी समजावा ७७.


    निजात्मप्राप्तीलागोनी । देवें केली मनुष्ययोनी ।
    तो देवाचा विश्वास बुडवूनी । विषयसेवनीं निजपतन ॥७८॥
    निजात्मप्राप्तीसाठींच देवाने मनुष्ययोनी केलेली आहे; तो देवाचा विश्वास बुडविला असतां आपलें पतनच घडणार ७८.


    होतें पितरांचें मनोगत । पुत्र होईल हरिभक्त ।
    कुळ उद्धरील समस्त । विषयीं प्रतिहत तें केलें ॥७९॥
    पितरांचा मोठा हेतु असतो की, आपला पुत्र मोठा हरिभक्त होईल, आणि सार्‍या कुळाचा उद्धार करील. पण विषयासक्तीने त्या सर्वांवरच पाणी ओतले ७९.


    हो का सकळ भाग्याचें फळ । मनुष्यदेह गा केवळ ।
    तें करावया सफळ । वैराग्य अढळ म्यां केलें ॥३८०॥
    (अवधूत म्हणतात) मनुष्यदेह हा केवल सकळ भाग्याचे फळ आहे, हे वाक्य सफल करण्याकरितांच मी अढळ असें वैराग्य धारण केले आहे ३८०.


    एवं सञ्जातवैराग्यो विज्ञानालोक आत्मनि ।
    विचरामि महीमेतां मुक्तसङ्गोऽनहङ्कृतः ॥ ३० ॥
    [श्लोक ३०] अशा प्रकारे मला वैराग्य प्राप्त झाले अंतःकरणामध्ये विज्ञानाचा प्रकाश पसरला त्यामुळे मी अहंकार व आसक्ती सोडून या पृथ्वीवर स्वच्छंदपणे वावरतो. (३०)




    देहो निजात्मसाधनीं साधक । तोचि विषयभोगीं बाधक ।
    ऐसें देखोनियां देख । केलें निष्टंक वैराग्य ॥८१॥
    आत्मसाधन करण्याला देह हा साधक आहे ; पण तोच विषयभोगामुळे बाधक होतो. असें जाणून मी निश्चयाचे वैराग्यच धारण केले ८१.


    त्या वैराग्याचेनि बळें । गुरुकृपावचनमेळें ।
    विषय‍इंद्रियांचे पाळे । एकेचि वेळें विभांडिले ॥८२॥
    त्या वैराग्याच्या बळाने आणि गुरुकृपावचनाच्या साहाय्याने विषयांची आणि इंद्रियांची ताटातूट करून सोडली ८२.


    अविद्या जंव घ्यावी जीवें । तंव 'अविद्या' येणें नांवें ।
    स्वांगें मी विद्यमान नोहे । हेंही अनुभवें जाणितलें ॥८३॥
    जीवाने जो अविद्येचा अंगीकार करावा तोंच ती 'अविद्या' ह्या नांवाने म्हणजे 'मी मुळी विद्यमानच नाही' असे म्हणते, हे मी अनुभवाने ओळखले ८३.


    ऐशी मिथ्यात्वें अविद्या आतां । चित्प्रकाश पूर्ण लाभे हाता ।
    तेणें स्वदेहस्थ अहंता । गेली सर्वथा निःशेष ॥८४॥
    अशा प्रकारे मिथ्यात्वानें अविद्या नाहीशी झाल्यामुळे चिद्प्रकाशाचा पूर्ण लाभ पदरांत पडला व तो पडल्यामुळे या देहांत असलेली अहंताही निखालस निघून गेली ८४.


    ज्ञानसाधन जो निजदेहो । तयाच्या ठायीं वैराग्य पहा हो ।
    मा देहसंबंधाचा स्नेहो । कैसेनि राहों शकेल ॥८५॥
    ज्ञानाचें साधन जो आपला देह, त्याच्याच ठिकाणी जर वैराग्य, तर मग देहासंबंधीयांचा स्नेह तरी कसा राहणार ? ८५.


    ऐसेनि अनुभवें पाहीं । निःसंग मी विचरें मही ।
    अहंता स्वदेहीं नाहीं । पुशिलें तें पाहीं सांगितलें राया ॥८६॥
    अशाच अनुभवाने मी निःसंग होऊन पृथ्वीवर संचार करीत असतो. स्वदेहामध्ये अहंता मुळीच कशी नाही, हे जे तूं विचारलेंस, त्याचे उत्तर हें मी तुला सांगितले ८६.


    जैं पुरुषाची अहंता गळे । तैं देह अदृष्टयोगें चळे ।
    जेवीं सुकलें पान वायुबळें । पडिलें लोळे सर्वत्र ॥८७॥
    पुरुषाची अहंता जेव्हां नाहीशी होते, तेव्हां प्रारब्धयोगाप्रमाणे देह चालत असतो. सुकलेलें पान पडलेले असले, तर ते वाऱ्याच्या धक्क्याने चहूंकडे लोळत असते त्याप्रमाणेच हे ८७.


    यालागीं ब्रह्मसाक्षात्कारा । वृत्ति लय पावे जंव वीरा ।
    तंववरी जो वैराग्यें खरा । अभंग पुरा पुरुषार्थी तो ॥८८॥
    याकरिता हे वीरा ! जोपर्यंत ब्रह्मसाक्षात्कारामध्ये वृत्ति लय पावली नाही, तोपर्यंत जो खर्‍याखुऱ्या वैराग्याने राहतो, तोच निर्व्यंगणि परिपूर्ण पुरुषार्थी होतो ८८.


    म्हणसी एका गुरूचे ठायीं । तुज सर्वथा विश्वास नाहीं ।
    ये अर्थीं सावध होईं । विशद पाहीं सांगेन ॥८९॥
    आता तूं कदाचित् म्हणशील की, तुझाही एका गुरूवर असा असा कधींच विश्वास नव्हता, तर त्याकरिता आतां सावध होऊन ऐक. तेच तुला आतां विशद करून सांगतों ८९.


    गुरूनें सांगतांचि कानीं । ज्याची वृत्ति जाय विरोनी ।
    जेवीं मिळतां लवणपाणी । अभिन्नपणीं समरसे ॥३९०॥
    मीठ आणि पाणी एकत्र होतांच ऐक्यरूपाने जसे समरसून जाते, त्याप्रमाणे गुरुवाक्य कानी पडतांच ज्याची वृत्ति विरून जाते ३९०,


    केल्यासी साधकबाधकताबाध । हें बोलणें अतिअबद्ध ।
    जेवीं निमालियासी वोखद । न पाजवे दुग्ध गर्भस्था ॥९१॥
    त्याला साधकबाधकापासून पीडा होते असे म्हणणेच अगदी असंबद्ध आहे. जसें मेलेल्याला औषध किंवा गर्भाला दूध पाजतां येत नाही तसे ११.


    यापरी त्यासी कर्तव्यता । नाहीं नाहीं गा सर्वथा ।
    परी ऐसी हे अवस्था । ज्यासी तत्त्वतां न लभेचि ॥९२॥
    ह्याप्रकारे त्याला खरोखर कर्तव्य म्हणून उरलेले नसते; पण अशी अवस्था सर्वांना प्राप्त होत नाहीं ९२.


    गुरूनें सांगितलें कानीं । स्वरूपाबोध झाला मनीं ।
    परी तें न राहेचि निश्चळपणीं । बाह्यदर्शनीं विक्षेपु ॥९३॥
    गुरुने कानांत महावाक्य सांगितले व मनांत आत्मस्वरूपाचा बोध झाला; पण तो फार वेळ टिकत नाही. बाह्य पदार्थाकडे लक्ष गेलें की विक्षेप उत्पन्न झालाच ! ९३.


    आसनीं बैसल्या स्वरूपस्थितीं । आसन सोडिल्या प्रपंचस्फूर्ती ।
    ऐशी एकदेशी स्थिती । नातळती निजयोगी ॥९४॥
    आसनावर बसले की स्वरूपस्थिति व आसन सोडले की संसारस्फूर्ति ! अशी एकदेशीय स्थिति खऱ्या योग्याला कधी शिवत नाहीं ९४.


    देह आसनीं निश्चळ । अथवा कर्मीं हो चंचळ ।
    परी वृत्ति सर्वदा निश्चळ । तेचि निर्मळ निजयोगी ॥९५॥
    देह आसनावर स्थिर असो की कर्मामध्ये तो वावरत असो, पण ज्याची वृत्ति सर्वकाळ निश्चळ, तोच निर्मळ आत्मयोगी होय ९५.


    परशुरामेंसीं रणांगणीं । भीष्म भिडला निर्वाणबाणीं ।
    तोडरीं घातिला जिणोनी । वृत्ति समाधानीं अचंचळ ॥९६॥
    समरांगणामध्ये परशुरामाच्या समोरासमोर येऊन भीष्माने त्याच्यावर निर्वाणींचे बाण सोडले, त्याला पैजेने जिंकले, तरी भीष्माच्या समान वृत्तींत अंतर पडले नाही. ती समाधानांत अगदी स्थिर होती ९६.


    करितां निर्वाणयुद्धीं । ज्याची न मोडे समाधी ।
    हेंचि साधावया त्रिशुद्धी । चोवीस गुरु विधीं वंदिलें म्यां ॥९७॥
    निर्वाणयुद्धासारख्या घोर कर्मात सुद्धा समाधि मोडूं नये हेच खरोखर साधण्याकरिता मी चोवीस गुरूंना विधिपूर्वक वंदन केले ९७.


    देहनिश्चळत्वें वृत्ति निश्चळ । देहचंचळत्वें वृत्ति चंचळ ।
    तरी ते देहबुद्धीचि सबळ । नव्हे केवळ निजबोधु ॥९८॥
    देह स्थिर असला की वृत्ति स्थिर असावयाची, आणि देह चंचळ झाला की वृत्ति चंचळ व्हावयाची; तर ती सबळ देहबुद्धिच समजावी. तो शुद्ध आत्मबोध नव्हे ९८.


    होतां प्रपंचदर्शन । वृत्तीसी विक्षेप होय जाण ।
    तो विक्षेप करावया छेदन । बहुगुरुसाधन म्यां केलें ॥९९॥
    प्रपंच पाहिला की वृत्तीला विक्षेप होतो. असा विक्षेप काढून टाकण्यासाठीच मी बहुगुरु-साधन केलें. ९९.


    निजगुरूंनीं सांगितल्या अर्था । त्या साधावया परमार्था ।
    नाना प्रपंचपदार्था । गुरुसंस्था म्यां केली ॥४००॥
    निजगुरूंनी सांगून दिलेला जो परमार्थ, तो साधण्यासाठींच प्रपंचांतीलच अनेक पदार्थांना मी गुरुपद दिले ४००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...