मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २५ ओव्या ४०१ ते ४६१
पुरुषावेगळें समस्त । प्रकृतिकार्य मिथ्याभूत ।
त्यातें बोलिजे गुणवंत । जाण निश्चित उद्धवा ॥ १ ॥
उद्धवा ! पुरुषाशिवाय प्रकृतीचे म्हणून जेवढे सर्व कार्य आहे, तें मिथ्याभूत समजावें. त्याला खरोखर त्रिगुणात्मक असें म्हणतात, हे लक्षात ठेव १.
नरदेह पावोनियां येथ । जे न साधिती गुणातीत ।
ते नाडले हातोहात । निजस्वार्थ बुडाला ॥ २ ॥
ते नाडले हातोहात । निजस्वार्थ बुडाला ॥ २ ॥
येथे नरदेह प्राप्त झाला असूनही जे गुणातीतता साधीत नाहीत, ते स्पष्ट नाडले व त्यांचा स्वार्थ बुडाला म्हणून समजावें २.
तैसी नव्हे तुझी मती । विनटलासी भगवद्भक्ती ।
तेव्हांचि तूं गुणातीतीं । जाण निश्चितीं जडलासी ॥ ३ ॥
तेव्हांचि तूं गुणातीतीं । जाण निश्चितीं जडलासी ॥ ३ ॥
पण तुझी बुद्धि काही तशी नाही. तूं भगवद्भक्तीचा अंगीकार केलास, त्याच वेळेस तूं खरोखर गुणातीतपणा पावलास ३.
हरिभक्तांमध्यें वरिष्ठ । यालागीं निजमुखॆं वैकुंठ ।
उद्धवासी म्हणे पुरुषश्रेष्ठ । भाग्यें उत्कृष्ट तूं एक ॥ ४ ॥
उद्धवासी म्हणे पुरुषश्रेष्ठ । भाग्यें उत्कृष्ट तूं एक ॥ ४ ॥
उद्धव हा हरिभक्तांमध्ये श्रेष्ठ होता, म्हणून श्रीकृष्ण आपल्या मुखाने उद्धवाला म्हणाला, हे पुरुषश्रेष्ठा ! भाग्याने तूंच एक श्रेष्ठ आहेस ४.
त्रिगुणगुणीं सविस्तारू । दृढ वाढला संसारतरू ।
त्याचे छेदाचा कवण प्रकारू । तो शार्ङ्गधरू सांगत ॥ ५ ॥
त्याचे छेदाचा कवण प्रकारू । तो शार्ङ्गधरू सांगत ॥ ५ ॥
या तीन गुणांच्याच विस्ताराने संसारस्वरूप वृक्ष खूप फोफावला आहे. तो छेदण्याचा प्रकार कसा आहे, तें श्रीकृष्ण सांगतात ५.
एताः संसृतयः पुंसो गुणकर्मनिबन्धनाः ।
येनेमे निर्जिताः सौम्य गुणा जीवेन चित्तजाः ।
॥ ३२ ॥
येनेमे निर्जिताः सौम्य गुणा जीवेन चित्तजाः ।
॥ ३२ ॥
[श्लोक ३२] जीवाला योनी किंवा गती त्या त्या गुणकर्मानुसार मिळतात हे सौम्य ! जो जीव चित्तात उत्पन्न होणार्या विकारांवर विजय मिळवतो, तो भक्तियोगाने माझ्यामध्ये निष्ठा ठेवतो आणि त्यामुळे माझे स्वरूप प्राप्त करून घेतो. (३२)
सत्त्वादि तिन्ही गुण एथ । केवळ आणी मिश्रित ।
पुरुषातें संसारी करीत । गुणकर्मीं निश्चित बांधोनी ॥ ६ ॥
पुरुषातें संसारी करीत । गुणकर्मीं निश्चित बांधोनी ॥ ६ ॥
ह्यांत सत्वादी तिन्ही गुण, शुद्ध असोत, की मिश्रित असोत, ते पुरुषाला गुणांनी खरोखर बद्ध करून संसारी बनवितात ६.
त्रिगुणकर्मांस्तव जाण । जीवासी झालें दृढ बंधन ।
जेवीं घटामाजील जीवन । दावी आडकलेपण रविबिंबा ॥ ७ ॥
जेवीं घटामाजील जीवन । दावी आडकलेपण रविबिंबा ॥ ७ ॥
घड्यांतील पाणी ज्याप्रमाणे त्यांत सूर्य प्रतिबिंबरूपाने अडकला आहे असे दाखवितें, त्याप्रमाणे ह्या तीन गुणकांमुळेच जीवाला दृढतर बंधन प्राप्त झाले आहे ७.
घटीं भरल्या समळ जळ । त्यामाजीं रवि दिसे समळ ।
घटींचें डोलतांचि जळ । कापें चळचळ रविबिंब ॥ ८ ॥
घटींचें डोलतांचि जळ । कापें चळचळ रविबिंब ॥ ८ ॥
घागरीत गढूळ पाणी भरले असले तर, त्यामध्ये पडलेलें सूर्याचे प्रतिबिंबही मळकेंच आहे असे दिसते, किंवा घागरीतले पाणी हालत राहिले तर त्यांतील, सूर्यबिंबही चळचळा कापू लागते ८.
तेवीं त्रिगुणांचें कर्माचरण । शुद्धासी आणी जीवपण ।
तें छेदावया जीवबंधन । भगवद्भजन साधावें ॥ ९ ॥
तें छेदावया जीवबंधन । भगवद्भजन साधावें ॥ ९ ॥
त्याप्रमाणे तीन गुणांचे जे कर्माचरण आहे, तेंच शुद्ध ब्रह्माला जीवपणा आणते, तें जीवाचे बंधन तोडण्याकरितां भगवद्भजन साधावें ९.
जितावया गुणबंधन । रिघावें सद्गुरूसी शरण ।
तेथ मद्भावें करितां भजन । वाढे सत्त्वगुण अतिशुद्ध ॥ ४१० ॥
तेथ मद्भावें करितां भजन । वाढे सत्त्वगुण अतिशुद्ध ॥ ४१० ॥
गुणांचे बंधन जिंकण्यासाठी सद्गुरूला शरण जावें. माझ्याच भावनेने सद्गुरूचे ठिकाणी भजन कलें असतां अत्यंत शुद्ध असा सत्त्वगुण वाढतो ४१०.
पायीं जडली लोहाची बेडी । ते लोहेंचि लोहार तोडी ।
तेवीं सत्त्वगुणाचिया वाढी । त्रिगुणांतें तोडी गुरुरावो ॥ ११ ॥
तेवीं सत्त्वगुणाचिया वाढी । त्रिगुणांतें तोडी गुरुरावो ॥ ११ ॥
पायांत लोखंडाची बेडी पडली, तर ती लोहार लोखडानंच तोडून काढतो, त्याप्रमाणे सत्त्वगुणाची वाढ झाली म्हणजे गुरुराजच तिन्ही गुणांना तोडून टाकतो ११.
तेथ प्रवेशावया गुणातीतीं । अवश्य करावी गुरुभक्ती ।
जे गुरुभजनीं विश्वासती । त्यांसी चारी मुक्ती आंदण्या ॥ १२ ॥
जे गुरुभजनीं विश्वासती । त्यांसी चारी मुक्ती आंदण्या ॥ १२ ॥
याकरितां गुणातीत व्हावयाचे असेल तर गुरुभक्ति अवश्य करावी. गुरुभजनावर जे विश्वास ठेवतात, त्यांच्या चारही मुक्ति दासी होतात १२.
ज्यासी गुरुचरणीं भगवद्भावो । त्याचे सेवेसी ये ब्रह्मसद्भावो ।
तेथ ब्रह्मसद्भावेंसी पहा हो । मी देवाधिदेवो सबाह्य तिष्ठें ॥ १३ ॥
तेथ ब्रह्मसद्भावेंसी पहा हो । मी देवाधिदेवो सबाह्य तिष्ठें ॥ १३ ॥
गुरूच्या चरणाच्या ठायीं ज्याची भगवद्भावना असते, त्याच्या सेवेला ब्रह्मभावनाही येत असते. आणखी अहो ! पहा की, तेथें ब्रह्मभावनेबरोबरच मी देवाधिदेव अंतर्बाह्य तिष्ठत उभा असतों १३.
जो गुरुचरणीं अनन्य शरण । तो सहजें होय ब्रह्मसंपन्न ।
गुरुरूपें करितां माझें भजन । ब्रह्मसमाधान मद्भक्ता ॥ १४ ॥
गुरुरूपें करितां माझें भजन । ब्रह्मसमाधान मद्भक्ता ॥ १४ ॥
जो अनन्यभावाने गुरुचरणाला शरण जातो, तो सहज ब्रह्मस्वरूप होतो. गुरूरूपाने माझं भजन केलें असतां माझ्या भक्ताला ब्रह्मसुख प्राप्त होतें १४.
उद्धवा ऐसें माझें भजन । समूळ जाणशी तूं संपूर्ण ।
यालागीं ‘सौम्य’ हें विशेषण । स्वमुखें श्रीकृष्ण संबोधी ॥ १५ ॥
यालागीं ‘सौम्य’ हें विशेषण । स्वमुखें श्रीकृष्ण संबोधी ॥ १५ ॥
उद्धवा ! असें माझें भजन तूं पूर्णपणे जाणतोसच असें म्हणून श्रीकृष्णांनी त्याला 'सौम्य' असे स्वमुखाने संबोधिलें १५.
भाग्यें नरदेह पावल्या जाण । अवश्य करावें माझें भजन ।
येचि अर्थींचें निरूपण । स्वमुखें श्रीकृष्ण प्रतिपादी ॥ १६ ॥
येचि अर्थींचें निरूपण । स्वमुखें श्रीकृष्ण प्रतिपादी ॥ १६ ॥
मोठ्या भाग्याने मनुष्यदेह प्राप्त झाला असतां अगत्यपूर्वक माझं भजन करावे. ह्याच अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगतात १६.
भक्तियोगेन मन्निष्ठो मद्भावाय प्रपद्यते ।
तस्माद्देहमिमं लब्ध्वा ज्ञानविज्ञानसम्भवम् ॥ ३३ ॥
तस्माद्देहमिमं लब्ध्वा ज्ञानविज्ञानसम्भवम् ॥ ३३ ॥
[श्लोक ३३] म्हणून शहाण्या माणसांनी तत्त्वज्ञान आणि साक्षात्कार यांची प्राप्ती करून देणारे हे मनुष्यशरीर मिळाल्यावर गुणांची आसक्ती दूर करून माझेच भजन करावे. (३३)
ज्या नरदेहाकारणें । अमर उत्कंठित मने ।
त्या देहाचे जाहलेपणें । ज्ञान पावणें निष्टंक ॥ १७ ॥
त्या देहाचे जाहलेपणें । ज्ञान पावणें निष्टंक ॥ १७ ॥
ज्या मनुष्यदेहाच्या प्राप्तीसाठी देवादिकही मनापासून उत्कंठित असतात, तो देह आपल्याला प्राप्त झाला असतां आपण अखंड ज्ञान संपादन करावं १७.
नरदेह पावल्या जाण । आपणचि नव्हे ब्रह्मज्ञान ।
तेथें करावें माझें भजन । देहाभिमान सांडूनि ॥ १८ ॥
तेथें करावें माझें भजन । देहाभिमान सांडूनि ॥ १८ ॥
नरदेह प्राप्त झाला म्हणून ब्रह्मज्ञान हे काही आपोआपच प्राप्त होत नाही. याकरितां देहाभिमान सोडून माझेच भजन करावें १८.
करितां माझें अनन्य भजन । सहजें वाढे सत्त्वगुण ।
सत्त्वगुणास्तव जाण । उपजेज्ञान सविवेक ॥ १९ ॥
सत्त्वगुणास्तव जाण । उपजेज्ञान सविवेक ॥ १९ ॥
माझें अनन्यभावाने भजन केले असता सत्त्वगुण सहजच वाढतो. आणि त्या सत्त्वगुणापासूनच विवेकयुक्त ज्ञान उत्पन्न होते १९.
विवेकज्ञानाचिये वृत्ती । रज तम दोनी झडती ।
शोधितसत्त्वाचिये स्थिती । अभेद भक्ती उल्हासे ॥ ४२० ॥
शोधितसत्त्वाचिये स्थिती । अभेद भक्ती उल्हासे ॥ ४२० ॥
विवेकज्ञानाने युक्त अशी वृत्ति झाली म्हणजे रज आणि तम हे दोन्ही झडून जातात. आणि शुद्धसत्त्वाच्या स्थितीमध्ये अभेदभक्ति मोठ्या उल्हासाने वाढते ४२०.
करितां माझें अभेद भजन । होय स्वानंदाचे स्वादन ।
त्या नांव बोलिजे विज्ञान । तेथ तिनी गुण मिथ्यात्वें ॥ २१ ॥
त्या नांव बोलिजे विज्ञान । तेथ तिनी गुण मिथ्यात्वें ॥ २१ ॥
माझे अभेदभजन केले असतां आत्मानंदाचा आस्वाद प्राप्त होतो. आणि त्यालाच विज्ञान असे म्हणतात. तेथें तीनही गुण मिथ्या आहेत असा निश्चय होतो २१.
नरदेह जोडलिया हातीं । प्राण्यासी एवढी प्राप्ती ।
यालागीं मनुष्यदेहीं भक्ती । अवश्य समस्तीं करावी ॥ २२ ॥
यालागीं मनुष्यदेहीं भक्ती । अवश्य समस्तीं करावी ॥ २२ ॥
नरदेह प्राप्त झाला असता प्राण्याला एवढा लाभ होतो. याकरिता मनुष्यदेहामध्ये सर्वानी भक्ति अवश्य करावी २२.
हें भागवतींचें अतिगुह्य ज्ञान । मुख्यत्वेंसी भक्तिप्राधान्य ।
भावें करितां माझें भजन । स्त्रिया शूद्रजन उद्धरती ॥ २३ ॥
भावें करितां माझें भजन । स्त्रिया शूद्रजन उद्धरती ॥ २३ ॥
भागवतांतील हेंच अत्यंत गुह्य ज्ञान होय. तें मुख्यतः भक्तिप्रधान आहे. भक्तिभावाने माझे भजन केले असतां स्त्रिया व शूद्रसुद्धा उद्धरून जातात २३.
नरदेह जोडल्या जाण । माझी भक्ति करिती विचक्षण ।
भजनें जिणोनि गुणागुण । ब्रह्म परिपूर्ण स्वयें होती ॥ २४ ॥
भजनें जिणोनि गुणागुण । ब्रह्म परिपूर्ण स्वयें होती ॥ २४ ॥
म्हणून नरदेह प्राप्त झाला असता ज्ञाते लोक माझीच भक्ति करतात, आणि माझ्या भजनानेंच गुणागुण जिंकून स्वतः परिपूर्ण ब्रह्मस्वरूप होतात २४.
पूर्ण ब्रह्माचिया प्राप्ती । निरपेक्ष माझी भक्ती ।
तोचि भजनभाव श्रीपती । पुनः पुनः श्लोकार्थीं दृढ दावी ॥ २५ ॥
तोचि भजनभाव श्रीपती । पुनः पुनः श्लोकार्थीं दृढ दावी ॥ २५ ॥
पूर्ण ब्रह्माच्या प्राप्तीसाठी माझी निरपेक्ष भक्ति करावी. तोच भजनाचा प्रकार श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा श्लोकार्थाने दृढ करून दाखवितात २५.
गुणसङ्ग विनिर्धूय मां भजन्तु विचक्षणाः
निःसङ्गो मां भजेद्विद्वानप्रमत्तो जितेन्द्रियः ॥ ३४ ॥
रजस्तमश्चाभिजयेत्सत्त्वसंसेवया मुनिः ।
सत्त्वं चाभिजयेद्युक्तो नैरपेक्ष्येण शान्तधीः ॥ ३५ ॥
निःसङ्गो मां भजेद्विद्वानप्रमत्तो जितेन्द्रियः ॥ ३४ ॥
रजस्तमश्चाभिजयेत्सत्त्वसंसेवया मुनिः ।
सत्त्वं चाभिजयेद्युक्तो नैरपेक्ष्येण शान्तधीः ॥ ३५ ॥
[श्लोक ३४-३५] विचारवंताने सावध राहून सत्त्वगुण अंगीकारून रजोगुण आणि तमोगुण यांवर विजय मिळवावा इंद्रियांवर ताबा मिळवावा आणि आसक्ती सोडून माझ्या भजनी लागावे. (३४)
चित्तवृत्ती शांत करून कोणतीही अपेक्षा न ठेवता सत्त्वगुणावरसुद्धा विजय मिळवावा, अशा प्रकारे गुणांपासून मुक्त होऊन जीव आपला जीवभाव सोडतो आणि माझ्याशी एकरूप होतो. (३५)
चित्तवृत्ती शांत करून कोणतीही अपेक्षा न ठेवता सत्त्वगुणावरसुद्धा विजय मिळवावा, अशा प्रकारे गुणांपासून मुक्त होऊन जीव आपला जीवभाव सोडतो आणि माझ्याशी एकरूप होतो. (३५)
करूनि विषयांची विरक्ती । हृदयीं नापेक्षावी मुक्ती ।
ऐशी निरपेक्ष माझी भक्ती । वाढत्या प्रीतीं करावी ॥ २६ ॥
ऐशी निरपेक्ष माझी भक्ती । वाढत्या प्रीतीं करावी ॥ २६ ॥
विषयांची विरक्ति धरावी आणि अंत:करणांत मुक्तीची इच्छा मुळीच करूं नये. अशा रीतीनें माझी निरपेक्ष भक्ति अधिकाधिक प्रेमाने करावी २६.
तेणें अनिवार सत्त्वशुद्धी । सर्व भूतीं भगवद्बुद्धी ।
दृढ वाढे गा त्रिशुद्धी । हे भजनसिद्धी साधकां ॥ २७ ॥
दृढ वाढे गा त्रिशुद्धी । हे भजनसिद्धी साधकां ॥ २७ ॥
तेणेंकरून अपरंपार सत्त्वशुद्धि होते, आणि सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी खरोखर भगवदबुद्धि वाढत असते. साधकांना हीच भजनसिद्धि आहे. २७.
ऐसें करितां माझें भजन । विस्मरणासी ये मरण ।
सर्वेंन्द्रियीं सावधपण । सहजें जाण ठसावे ॥ २८ ॥
सर्वेंन्द्रियीं सावधपण । सहजें जाण ठसावे ॥ २८ ॥
अशा रीतीने माझें भजन केलें असतां विस्मरणालाच मरण येते, आणि सर्वेद्रियांमध्ये सावधपणा सहजच ठसून राहातो २८.
तेव्हां रज तम दोनी गुण । निःशेष जाती हारपोन ।
शुद्धसत्त्वाचें स्फुरण । तेणें स्वानंद पूर्ण साधकां ॥ २९ ॥
शुद्धसत्त्वाचें स्फुरण । तेणें स्वानंद पूर्ण साधकां ॥ २९ ॥
त्या वेळी रज आणि तम हे दोन्ही गुण निखालस नष्ट होऊन जातात, आणि त्या योगाने शुद्ध सत्त्वाच्या स्फूर्तीनें साधकांना पूर्ण आत्मानंद लाभतो २९.
केवळ उरल्या सत्त्वगुण । साधकां ऐसें स्फुरे स्फुरण ।
जगामाजीं एक पावन । धन्य धन्य मी होयें ॥ ४३० ॥
जगामाजीं एक पावन । धन्य धन्य मी होयें ॥ ४३० ॥
केवळ शुद्ध सत्वगुण शिल्लक राहिला म्हणजे साधकाला असें स्फुरण होऊ लागते की, जगामध्ये मीच काय तो पावन व अत्यंत धन्य आहे ४३०.
मी पावलों शुद्ध बोध । मज प्रकटला परमानंद ।
ऐसा सुखाचा जो स्फुंद । तो सत्त्वबोध साधकां ॥ ३१ ॥
ऐसा सुखाचा जो स्फुंद । तो सत्त्वबोध साधकां ॥ ३१ ॥
मला शुद्ध आत्मज्ञान प्राप्त झाले, माझ्यामध्ये परमानंद प्रकट झाला, असा जो काय सुखाचा अनुभव तोच सत्त्वाचा बोध झालेल्या सात्त्विकांना असतो ३१.
ऐसा उरला जो सत्त्वगुण । तो निवारावया साधन कोण ।
मी स्वयें सुखस्वरूप आपण । मज सुखाचें स्फुरण ते माया ॥ ३२ ॥
मी स्वयें सुखस्वरूप आपण । मज सुखाचें स्फुरण ते माया ॥ ३२ ॥
पण असा जो सत्त्वगुण शिल्लक राहतो, तो निवारण व्हावयाला साधन कोणते ? मी स्वतः तर सुखस्वरूपच आहे, आणि मला सुखाचा अनुभव होणे हीच माया होय ३२.
गूळ गुळा गोडपणें पांगे । कीं दुधा दूध गोड लागे ।
तैसा सुखरूप मी सर्वांगें । वृथा सुखभोगें कां फुंजें ॥ ३३ ॥
तैसा सुखरूप मी सर्वांगें । वृथा सुखभोगें कां फुंजें ॥ ३३ ॥
गूळ हा गुळालाच गोडपणाने श्रेष्ठ करतो काय ? किंवा दुधालाच दूध गोड लागते काय ? ह्याप्रमाणे मीच सर्वांगाने सुखस्वरूप असा सुखोपभोगानें व्यर्थ का फुगावे ? ३३.
ऐशी साधकीं स्फूर्ति स्फुरे । तंव सत्त्वगुण स्वरूपीं विरे ।
तेव्हां सुखाचाही फुंद सरे । निजसुख उरे निजशांती ॥ ३४ ॥
तेव्हां सुखाचाही फुंद सरे । निजसुख उरे निजशांती ॥ ३४ ॥
अशी साधकामध्ये स्फूर्ति स्फुरत असते तोच सत्त्वगुण आत्मरूपामध्ये लयास जातो. तेव्हां सुखाचाही अनुभव संपतो, आणि आत्मसुख व आत्मशांतीच काय ती बाकी राहते ३४.
ऐसे निवारल्य तिनी गुण । केवळ उरे निर्गुण ।
तेचि अर्थींचे निरूपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥ ३५ ॥
तेचि अर्थींचे निरूपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥ ३५ ॥
अशा प्रकारे तीन गुण नाहीसे झाले म्हणजे केवळ निर्गुणच बाकी राहते. त्याच अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण स्पष्ट करून सांगतात ३५.
संपद्यते गुणैर्मुक्तो जीवो जीवं विहाय माम् ।
जीवो जीवविनिर्मुक्तो गुणैश्चाशयसम्भवैः ।
मयैव ब्रह्मणा पूर्णो न बहिर्नान्तरश्चरेत् ॥ ३६ ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
एकादास्कन्धे पञ्चविंशोऽध्यायः ॥ २५ ॥
जीवो जीवविनिर्मुक्तो गुणैश्चाशयसम्भवैः ।
मयैव ब्रह्मणा पूर्णो न बहिर्नान्तरश्चरेत् ॥ ३६ ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
एकादास्कन्धे पञ्चविंशोऽध्यायः ॥ २५ ॥
[श्लोक ३६] जीवभावातून मुक्त झालेला जीव अंतःकरणात उत्पन्न होणार्या विकारांपासूनही मुक्त होतो आणि ब्रह्मस्वरूप माझ्याशी एकरूप होऊन पूर्ण होतो मग त्याचे कोठेही येणेजाणे होत नाही. (३६)
वाढल्या सत्त्वगुणाचा हरिख । त्यातें निर्दळी शुद्ध सत्त्वविवेक ।
पाठीं विवेकेंसीं सत्त्व देख । हारपे निःशेख निजात्मरूपीं ॥ ३६ ॥
पाठीं विवेकेंसीं सत्त्व देख । हारपे निःशेख निजात्मरूपीं ॥ ३६ ॥
सत्त्वगुणाचा हर्ष वाढला असतां शुद्ध सत्त्वविवेक त्या हर्षाला नष्ट करितो, आणि नंतर विवेकासह सत्त्व आत्मस्वरूपामध्ये निखालस लीन होऊन जातें ३६.
ऐसे निमाल्या तिनी गुण । निमे कार्य कर्म कारण ।
लिंगदेह नाशे संपूर्ण । जीवासी जीवपण मिथ्या होय ॥ ३७ ॥
लिंगदेह नाशे संपूर्ण । जीवासी जीवपण मिथ्या होय ॥ ३७ ॥
अशा प्रकारे तीन गुणांचा नाश झाला असतां कार्य, कर्म आणि कारण ही नाहीसे होते; सर्व लिंगदेहच नाश पावतो; आणि जीवाचे जीवपणच मिथ्या होते ३७.
तेव्हा कार्य कर्म कर्ता । भोग्य भोग आणि भोक्ता ।
ज्ञान ज्ञेय मी एक ज्ञाता । याची वार्ता असेना ॥ ३८ ॥
ज्ञान ज्ञेय मी एक ज्ञाता । याची वार्ता असेना ॥ ३८ ॥
तेव्हां कार्य, कर्म, कर्ता; किंवा भोग्य, भोग आणि भोक्ता; ज्ञान, ज्ञेय, किंवा मीच काय तो एक ज्ञाता ह्या त्रिपुटींची गोष्टच रहात नाहीं ३८.
ऐसें हारपल्या जीवपण । स्वयें सहजें निजनिर्गुण ।
होऊनि ठाके ब्रह्म पूर्ण । अहंसोहंपण सांडूनि ॥ ३९ ॥
होऊनि ठाके ब्रह्म पूर्ण । अहंसोहंपण सांडूनि ॥ ३९ ॥
ह्याप्रमाणे जीवपण लयास गेले असता तो स्वतः सहज निर्गुण होऊन व अहंसोहंपणा सोडून परिपूर्ण ब्रह्मच होऊन राहतो ३९.
यापरी मद्भक्त जाण । ब्रह्म होती परिपूर्ण ।
तेंचि जाहलेपणाचें लक्षण । श्लोकार्धें श्रीकृष्ण सांगत ॥ ४४० ॥
तेंचि जाहलेपणाचें लक्षण । श्लोकार्धें श्रीकृष्ण सांगत ॥ ४४० ॥
ह्याप्रमाणे माझे भक्त असतात ते परिपूर्ण ब्रह्म होतात. तेच पूर्ण ब्रह्म होण्याचे लक्षण अर्ध्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांगतात ४४०.
प्रपंच एक पूर्वीं होता । हे समूळ मिथ्या वार्ता ।
पुढें होईल मागुता । हेंही सर्वथा असेना ॥ ४१ ॥
पुढें होईल मागुता । हेंही सर्वथा असेना ॥ ४१ ॥
पूर्वी प्रपंच म्हणून एक होता, ही गोष्टच मुळी सर्वस्वी खोटी होय. अर्थात् पुन्हा तो होईल असेंही मुळीच घडावयाचें नाहीं ४१.
जैसे आंत बाहेरी भाग । नेणे साखरेचें अंग ।
तैसें सबाह्याभ्यंतर चांग । ब्रह्म निर्व्यंग निजानंदें ॥ ४२ ॥
तैसें सबाह्याभ्यंतर चांग । ब्रह्म निर्व्यंग निजानंदें ॥ ४२ ॥
ज्याप्रमाणे साखरेचे अंग आंतला व बाहेरचा भाग निरनिराळा समजत नाहीं (ती सर्वांगाने सारखीच गोड असते ), त्याप्रमाणे ब्रह्म हे अंतर्बाह्य दोषरहित आणि निजानंदाने परिपूर्ण असते ४२.
ऐसें पावल्या ब्रह्म परिपूर्ण । साधकासी न ये मरण ।
प्रारब्धें देहीं उरल्या जाण । देहाभिमान बाधीना ॥ ४३ ॥
प्रारब्धें देहीं उरल्या जाण । देहाभिमान बाधीना ॥ ४३ ॥
असे परिपूर्ण ब्रह्मस्वरूप प्राप्त झाले असतां साधकाला मरण येतच नाही. इतक्याउपर प्रारब्धाने आयुष्य शिल्लक असले, तरी त्याला देहाभिमानाची बाधा नसते ४३.
बाह्य न देखे दृश्यदर्शन । अंतरीं नाहीं विषयस्फुरण ।
देहींचें न देखे देहपण । जीवन्मुक्तलक्षण या नांव ॥ ४४ ॥
देहींचें न देखे देहपण । जीवन्मुक्तलक्षण या नांव ॥ ४४ ॥
तो बाहेरचे दृश्य पदार्थ पहात नाही. त्याच्या अंत:करणांत विषयाचे स्फुरण नसते व देहाचे देहपणही तो पाहात नाही. ह्याचंच नांव जीवन्मुक्तीचे लक्षण ४४,
बाह्य देखे दृश्यप्रतीती । अंतरीं विषयांची आसक्ती ।
या नांव अज्ञानाची स्थिती । अविद्याशक्ती बाधक ॥ ४५ ॥
या नांव अज्ञानाची स्थिती । अविद्याशक्ती बाधक ॥ ४५ ॥
बाहेर दृश्य सुखाचा अनुभव घ्यावयाचा, आणि हृदयांत विषयांची आसक्ति धरावयाची, ह्याचेच नाव अज्ञानाची स्थिति. ही अविद्येची शक्ति असून बाधक आहे ४५.
तें निरसावया अविद्याबंधन । अवश्य करावें माझें भजन ।
हें जाणोनी साधुसज्जन । भक्तीसी प्राण विकिला ॥ ४६ ॥
हें जाणोनी साधुसज्जन । भक्तीसी प्राण विकिला ॥ ४६ ॥
हें अविद्येचे बंधन तोडण्याकरितां अगत्यपूर्वक माझें भजन करावे. हेच मनांत आणून साधुसंतांनी भक्तीला प्राण विकलेला असतो ४६.
माझिये भक्तीपरती । आणिक नाहीं उत्तम गती ।
तेंही भजन अभेदयुक्तीं । तैं चारी मुक्ती कामाऱ्या ॥ ४७ ॥
तेंही भजन अभेदयुक्तीं । तैं चारी मुक्ती कामाऱ्या ॥ ४७ ॥
माझ्या भक्तीहून उत्तम अशी दुसरी गति नाही. आणि तें भजन अभेदभावाने केले असतां चारी मुक्ति दासी होतात ४७.
हृदयीं विषयाची विरक्ती । वरी अभेदभावें माझी भक्ती ।
तें भजन अनन्य प्रीतीं । त्याचा मी श्रीपती आज्ञाधार ॥ ४८ ॥
तें भजन अनन्य प्रीतीं । त्याचा मी श्रीपती आज्ञाधार ॥ ४८ ॥
हृदयांत विषयाची विरक्ति असून वर अभेदभावाने माझी भक्ति असेल, आणि तें भजन अनन्यभावनेचं असेल, तर मी श्रीकृष्ण त्याचा आज्ञाधारक आहे ४८.
भक्तिनामाचा इत्यर्थ । माझे स्वरूपीं निजभावार्थ ।
येणेंचि लाभे परमार्थ । सुफळ शास्त्रार्थ या नांव ॥ ४९ ॥
येणेंचि लाभे परमार्थ । सुफळ शास्त्रार्थ या नांव ॥ ४९ ॥
भक्ति या शब्दाचा अर्थ इतकाच की, माझ्या स्वरूपावर अभेदपणाने भाव धरणे. ह्या योगानेंच परमार्थाचा लाभ होतो. शास्त्राची सफलता ती हीच होय ४९.
माझिये भक्तीचेनि नांवें । पशु पक्षी उद्धरावे ।
मा मानवी भजनभावें । म्यां अवश्य न्यावे निजधामा ॥ ४५० ॥
मा मानवी भजनभावें । म्यां अवश्य न्यावे निजधामा ॥ ४५० ॥
माझ्या भक्तीच्या नांवाने मी जर पशुपक्ष्यांचा उद्धार करितों, तर मनुष्यांनी भक्तिभावाने माझं भजन केल्यास मला त्यांना निजधामाला नेणे भागच आहे ४५०.
यालागीं सांडोनि व्युत्पत्ती । जाणतीं नेणतीं गा समस्तीं ।
भावें करावी भगवद्भक्ती । तैं निजात्मप्राप्ती अनायासें ॥ ५१ ॥
भावें करावी भगवद्भक्ती । तैं निजात्मप्राप्ती अनायासें ॥ ५१ ॥
ह्याकरितां विद्वत्ता एका बाजूस ठेवून जाणत्यांनी व नेणत्यांनी सर्वांनीच भाव धरून भगवद्भक्ति करावी, म्हणजे अनायासेंच आत्मस्वरूपाचा लाभ होतो ५१.
भावें करितां माझें भजन । स्वयें निर्दळती तिन्ही गुण ।
सहजें प्रकटे निजनिर्गुण । हें सत्य श्रीकृष्ण बोलिला ॥ ५२ ॥
सहजें प्रकटे निजनिर्गुण । हें सत्य श्रीकृष्ण बोलिला ॥ ५२ ॥
भाव धरून माझें भजन केले असतां आपोआपच तिन्ही गुणांचा नाश होतो, आणि आपले निर्गुणत्व आपोआप प्रकट होते. हे सत्य समजावें असें श्रीकृष्णांनीच सांगितले ५२.
जेथ उगवली गुणगुंती । तेथ प्रकटे निजशांती ।
हेंचि ये अध्यायीं श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥ ५३ ॥
हेंचि ये अध्यायीं श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥ ५३ ॥
गुणांची गुंतागुंत जेथे संपते, तेथें आत्मशांति प्रकट होते. हेच या अध्यायामध्ये श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला ५३.
यालागीं जेथ भगवद्भक्ती । तेथ गुणजयो लाभे वृत्ती ।
सहजें प्रकटे निजशांती । निजात्मप्राप्ती स्वतःसिद्ध ॥ ५४ ॥
सहजें प्रकटे निजशांती । निजात्मप्राप्ती स्वतःसिद्ध ॥ ५४ ॥
म्हणून जेथें भगवद्भक्ति असते, तेथे वृत्तीला गुणांवर जय लाभतो आणि सहज आत्मशांति प्राप्त होऊन स्वतःसिद्धच आत्मस्वरूप प्राप्त होते ५४.
ते निजभक्ती माझी जननी । ज्या पैठा केलों जनार्दनचरणीं ।
एका जनार्दनचरणीं । मिळोनि मिळणीं भजतचि ॥ ५५ ॥
एका जनार्दनचरणीं । मिळोनि मिळणीं भजतचि ॥ ५५ ॥
तीच आत्मभक्ति माझी माता आहे. ज्या जनार्दनाने मला त्या भक्तीजवळ पोचविलें, त्या जनार्दनाच्या चरणांशी हा एकनाथ तल्लीन होऊन भजन करितो ५५.
पुढिले अध्यायीं कथा गहन । ऐलउर्वशीउपाख्यान ।
ज्या अध्यायाचें करितां पठण । अगम्यागमनदोष हरती ॥ ५६ ॥
ज्या अध्यायाचें करितां पठण । अगम्यागमनदोष हरती ॥ ५६ ॥
पुढच्या अध्यायांतील ऐल-उर्वशी उपाख्यानाची कथा मोठ्या बहारीची आहे. ज्या अध्यायाचे पठण केले असता अगम्यागमनाचेही दोष नाश पावतात ५६,
ज्या पुरूरव्याची विरक्ती । स्वमुखें वर्णील श्रीपती ।
वैराग्यें निजात्मप्राप्ती । सभाग्य पावती वैराग्य ॥ ५७ ॥
वैराग्यें निजात्मप्राप्ती । सभाग्य पावती वैराग्य ॥ ५७ ॥
त्यांत पुरूरव्याच्या ज्या विरक्तीचे वर्णन श्रीकृष्ण आपल्या मुखाने करतील. त्या वैराग्याच्या योगाने निजात्मप्राप्ति होते. भाग्यवान् लोकच तें वैराग्य प्राप्त करून घेऊ शकतात ५७.
त्या वैराग्याचें निरूपण । अतिगोड निरूपी श्रीकृष्ण ।
श्रोतां कृपा करावी पूर्ण । द्यावें अवधान कथेसी ॥ ५८ ॥
श्रोतां कृपा करावी पूर्ण । द्यावें अवधान कथेसी ॥ ५८ ॥
त्या वैराग्याचे निरूपण श्रीकृष्णांनी फारच रसभरित केले आहे. तेव्हां श्रोत्यांनी कृपा करून कथेकडे नीट लक्ष द्यावें ५८.
जे कथेचेनि अवधानें । दुरितदोष होती दहनें ।
ब्रह्मीं ब्रह्मत्व पावणें । होऊनि ठाकणें चिन्मात्र ॥ ५९ ॥
ब्रह्मीं ब्रह्मत्व पावणें । होऊनि ठाकणें चिन्मात्र ॥ ५९ ॥
ज्या कथेला अवधान दिले असतां महापातकादि दोष जळून जातात, ब्रह्मामध्येच ब्रह्मस्वरूप पावता येते, आणि ज्ञानस्वरूपाने राहतां येते ५९,
एवढ्या निरूपणाची गोडी । पुढिले अध्यायीं आहे फुडी ।
एका जनार्दनकृपा गाढी । परापरथडीप्रापक ॥ ४६० ॥
एका जनार्दनकृपा गाढी । परापरथडीप्रापक ॥ ४६० ॥
त्या निरूपणाची गोडी पुढल्या अध्यायांत उत्कृष्ट आहे. एकनाथावर जनार्दनाची थोर कृपा आहे, ती त्याला त्यांतून पैलथडीला पोचविणारी आहे ४६०.
भावें धरितां जनार्दनचरण । बांधू न शके बाधकपण ।
एका जनार्दना शरण । रसाळ निरूपण पुढें आहे ॥ ४६१ ॥
एका जनार्दना शरण । रसाळ निरूपण पुढें आहे ॥ ४६१ ॥
भक्तिभावाने जनार्दनाचे चरण धरले असता दुःखाची बाधा होऊ शकत नाही. एकनाथ जनार्दनाला शरण आहे. पुढे रसाळ निरूपण आहे ४६१.
इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे
गुणनिर्गुणनिरूपणं नाम पंचविंशोऽध्यायः ॥ २५ ॥
गुणनिर्गुणनिरूपणं नाम पंचविंशोऽध्यायः ॥ २५ ॥
पंचविसावा अध्याय समाप्त.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्लोक ॥ ३६ ॥ ओव्या ॥ ४६१ ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्लोक ॥ ३६ ॥ ओव्या ॥ ४६१ ॥
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...