मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २५ ओव्या १ ते १००

    श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

    ॐ नमो देव निर्गुण । म्हणों पाहें तंव न देखें गुण ।
    गुणेंवीण निर्गुणपण । सर्वथा जाण घडेना ॥ १ ॥
    हे ओंकारस्वरूप निर्गुण देवा ! तुला नमस्कार असो असें म्हणावयास जावें, तो गुणच कोठे दृष्टीस पडत नाहीत, आणि गुणांशिवाय निर्गुणपणा तर कधीच यावयाचा नाही १. 


    सर्वथा न घडे निर्गुणपण । तरी घडों नेदिशी सगुणपण ।
    नातळशी गुणागुण । अगुणाचा पूर्ण गुरुराया ॥ २ ॥
    यावरून निर्गुणपणा तर मुळीच घडत नाही. पण सगुणपणाही तूं अंगी लावून घेत नाहीस. अशा प्रकारे तूं गुण किंवा अगुण ह्यांना शिवत नाहींस, म्हणून गुरुराया! तूं पूर्ण अगुणी आहेस २.


    अगुणाच्या विपरीत तूं गुणी । करिसी त्रिगुणगुणां झाडणी ।
    पंचभूतांपासूनी । सोडवितां जनीं जनार्दनू ॥ ३ ॥
    तसाच तूं अगुणाच्या विरुद्ध गुणी आहेस, पण तूं त्रिगुणांतील गुणांचा नाश करून टाकतोस. जगामध्ये पंचमहाभूतांपासून सोडविणारा एक जनार्दनच होय ३.


    ज्याचेनि जनांसी अर्दन । ज्याचेनि लिंगदेहा मर्दन ।
    जो जीवासी जीवें मारी पूर्ण । तो कृपाळु जनार्दन घडे केवीं ॥ ४ ॥
    ज्याच्या योगाने दुष्ट जनांचा संहार होतो, ज्याच्या योगाने लिंगदेहाचा नाश होतो, जो जीवाला जीवानेच ठार मारतो, तो जनार्दन कृपाळू होणार कसा? ४.


    जनार्दनाचें कृपाळूपण । सर्वथा नेणती जन ।
    नेणावया हेंचि कारण । जे देहाभिमान न सांडिती ॥ ५ ॥
    परंतु जनार्दनाचे कृपाळूपण लोक मुळीच जाणत नाहीत. तो न समजावयाला कारण हेच की, ते देहाभिमान सोडीत नाहींत ५.


    जननीजठरीं जन्म जाण । त्या जन्मास्तव म्हणती जन ।
    त्या जनजन्मा करी मर्दन । यालागीं जनार्दन नाम त्यासी ॥ ६ ॥
    जननीच्या जठरामध्ये जन्मास येतो म्हणून मनुष्याला त्या जन्मावरून 'जन' असे म्हणतात. त्या जनाच्या जन्माचाच संहार करतो म्हणून त्याला जनार्दन असे नाव आहे ६.


    मरण मारूनि वाढवी जिणें । जीव मारूनि जीवपणें ।
    देहीं नांदवी विदेहपणें । ऐशी जनार्दनें कृपा कीजे ॥ ७ ॥
    मरणालाच मारून आयुष्य वाढवितो, जीव मारून जगवितो, आणि देहांतच विदेहीपणाने नांदवितो अशी जनार्दनाने कृपा केली आहे ७.


    निजभावार्थें परिपूर्ण । एकाकी देखूनियां दीन ।
    कृपा करी जनार्दन । कृपाळु पूर्ण दीनांचा ॥ ८ ॥
    भक्तीने परिपूर्ण आणि एकटा एक असल्यामुळे दीन झालेला असा भक्त पाहिला की दीनांवर पूर्ण कृपा करणारा जनार्दन कृपा करितो ८.


    जे जे भावना भावी जन । ते ते पुरवी जनार्दन ।
    जो मागे परम समाधान । त्याचा देहाभिमान निर्दळी ॥ ९ ॥
    जन जी जी इच्छा करतात, ती ती जनार्दन पुरी करितो. जो कोणी पूर्ण समाधान मागतो, त्याचा देहाभिमान नाहींसा करून टाकतो ९.


    हो कां जनार्दनासमोर । कैं आला होता अहंकार ।
    मा तेणें घेऊनियां शस्त्र । करी शतचूर निजांगें ॥ १० ॥
    पण जनार्दनासमोर अहंकार आला होता कधीं ? तर मग तो हातांत शस्त्र घेऊन स्वतः त्याचे तुकडे तुकडे करणार ! १०.


    जेवीं सूर्याचेनि उजियेडें । अंधारेंसी रात्री उडे ।
    तेवीं जनार्दननामापुढें । अहंकार बापुडें उरे केवी ॥ ११ ॥
    ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाने अंधारासह रात्र निघून जाते, त्याप्रमाणे जनार्दनाच्या नावापुढे बिचारा अहंकार उरणार कसा? ११.


    ऐकतां गुरुनामाचा गजरू । समूळ विरे अहंकारू ।
    येथ दुःखदायक संसारू । कैसेनि धीरू धरील ॥ १२ ॥
    गुरुनामाचा गजर ऐकला की, अहंकार पूर्णपणे विरून जातो. मग अशा गुरुनामापुढे दुःखदायक संसार टिकाव कसा धरील' १२.


    ज्याचें नाम स्मरतां आवडीं । संसारबांदवडी फोडी ।
    जीवाचे जीवबंध सोडी । नामाची गोडी लाजवी मोक्षा ॥ १३ ॥
    आवडीने ज्याच्या नामाचे स्मरण केले तर ते संसाराचा बांध फोडून टाकतें, आणि जीवाचे जीवबंधन तोडून टाकते, त्याच्या त्या नामाची गोडी मोक्षाला सुद्धा लाजविते १३.


    निजमोक्षाही-वरतें । ज्याचें नाम करी सरतें ।
    त्याच्या कृपाळूपणातें । केवीं म्यां येथें सांगावे ॥ १४ ॥
    ज्याचें नाम मोक्षाहूनही श्रेष्ठ पदास चढवितें,  त्याच्या कृपाळूपणाविषयी मी येथे काय सांगणार? १४.


    नामप्रतापा न करवे सीमा । त्या सद्गुरूचा निजमहिमा ।
    कैशापरी आकळे आम्हां । काय निरुपमा उपमावें ॥ १५ ॥
    पण त्या नामप्रतापालासुद्धा ज्याची बरोबरी करता येत नाही, त्या सद्गुरूचा महिमा आम्हाला कोणत्या रीतीने कळेल ? निरूपमाला उपमा कोणती द्यावी? १५.


    अगाध कीर्ति गुरूची गहन । गुण गणितां अनंतगुण ।
    काय घ्यावें त्याचें आपण । नित्य निर्गुण निजांगें ॥ १६ ॥
    गुरूची कीर्ति अगाध आणि गहन आहे. त्याच्या गुणांची मोजदाद करूं गेलें तर ते गुण अनंत आहेत. जो स्वतः नित्य निर्गुण आहे, त्याचे आपण काय घ्यावें? १६.


    धाव घेऊनि त्यापें जावों । तंव त्या नाहीं गांवठावो ।
    त्याचे प्राप्तीसी न चले उपावो । एक सद्भावोवांचूनी ॥ १७ ॥
    धाव घेऊन त्याच्याजवळ जाऊं म्हटले, तर त्याला गांव नाही आणि स्थान नाही. एका सद्भावाशिवाय त्याचा लाभ होण्याला दुसरा उपाय नाही १७.


    सद्भावें स्मरतां नामासी । गुरु प्रकटे स्मरणापाशीं ।
    जेवीं सागरू सैंधवासी । ये भेटीसी निजांगें ॥ १८ ॥
    सद्भावाने जर त्याचे नामस्मरण केले, तर त्या स्मरणाबरोबरच गुरु प्रगट होतो, आणि ज्याप्रमाणे समुद्र आपण होऊनच मिठाला भेटावयाला आला १८.


    सागरा देतां आलिंगन । जेवीं सैंधव होय जीवन ।
    तेवीं वंदितां सद्गुरुचरण । मीतूंपण हारपे ॥ १९ ॥
    आणि म्हणून त्या सागराला आलिंगन देण्याबरोबर ज्याप्रमाणे त्या मिठाचे पाणी होते, त्याप्रमाणे सद्गुरूंचे पाय वंदन केले असता मीपणच विरून जाते १९.


    सद्गुरुकृपा झालिया पूर्ण । जनचि होय जनार्दन ।
    तेव्हां जन वन विजन । भिन्नाभिन्न भासेना ॥ २० ॥
    सद्गुरूची पूर्ण कृपा झाली म्हणजे जनच जनार्दनस्वरूप होतो. त्या वेळी जन, वन, किंवा विजन यांत भिन्नाभिन्नपणा भासतच नाहीं २०.


    जन तेंचि जनार्दन । जनार्दनचि सकळ जन ।
    हेंचि उपनिषत्सार पूर्ण । हे निजखूण जनार्दनीं ॥ २१ ॥
     म्हणून जन तोच जनार्दन होय, आणि जनार्दन तोच सारे जन होत. हेच उपनिषदांतील सर्व तात्पर्य आहे आणि हेच जनार्दनाचे खरे स्वरूप आहे २१.


    येणेंचि अभिन्नार्थें येथ । सांख्य बोलिला भगवंत ।
    उत्पत्ति-स्थिति-प्रळयांत । वस्तु सदोदित संपूर्ण ॥ २२ ॥
     ह्याच अभेदभावाने येथे भगवंतांनी सांख्यशास्त्र सांगितले. ते हेच की, परब्रह्म हें  उत्पत्ति, स्थिति आणि लय यांच्यामध्ये निरंतर परिपूर्णच असते २२.


    सांख्या ऐकोनियां उद्धवो । विचरी आपुला अभिप्रावो ।
    संसार वाढवी जो अहंभावो । तो अवश्य पहा हो सांडावा ॥ २३ ॥
     हें सांख्यमत ऐकून उद्धव आपल्याच मनाशी विचार करूं लागला की, अहंभाव हाच संसाराला वाढवितो, तर तोच मुळी सोडून द्यावा २३.


    अहंकार जडला चित्ता । तो सांडितां न वचे सर्वथा ।
    हें पुसों जरी श्रीकृष्णनाथा । तेणें सांख्य या अर्था निरूपिलें ॥ २४ ॥
    पण अहंकार जो चित्ताला जडलेला आहे, तो सोडावयाला लागले असतां मुळीच सुटत नाही. हे जर श्रीकृष्णाला विचारावें, तर त्याने याचसाठी सांख्य सांगितले आहे २४.


    सकळ प्राप्तीचा अभिप्रावो । सांख्य अनुवादला देवो ।
    अवश्य सांडावा अहंभावो । हेंचि पहा हो दृढ केलें ॥ २५ ॥
    सर्व प्राप्तीचे रहस्य जे सांख्य तेंच देवाने सांगितले. आणि अहो ! त्यांतच अहंभाव हा अवश्य सोडून द्यावा हेच निश्चित केलें २५.


    माझेनि पराक्रमें तत्त्वतां । माझें मीपण न वचे सर्वथा ।
    लाजिरवाणें कृष्णनाथा । किती आतां पुसावें ॥ २६ ॥
    खरोखर माझ्याच सामर्थ्यानें माझें मीपण मुळीच जाणार नाही. आणि कोडग्यासारखें श्रीकृष्णाला आता किती वेळां विचारावें ? २६.


    ऐशी उद्धवाची चिंता । कळूं सरली श्रीकृष्णनाथा ।
    बाप कृपाळु निजभक्तां । जेणें निवारे अहंता तें निजवर्म सांगे ॥ २७ ॥
    ही उद्धवाला पडलेली चिंता श्रीकृष्णाला कळून आली. श्रीकृष्ण आपल्या भक्तांचा अत्यंत कनवाळू असल्यामुळे ज्याच्या योगानें अहंता नाहीशी होते अशी युक्ति तो सांगू लागला २७.


    आजि उद्धवाचें भाग्य पूर्ण । जगीं उद्धवचि धन्य धन्य ।
    ज्यासी संतुष्टला श्रीकृष्ण । न करितां प्रश्न निजगुह्य सांगे ॥ २८ ॥
    आज उद्धवाचें  भाग्य पूर्णपणे प्रगट झाले. जगामध्ये उद्धवच अत्यंत धन्य होय. ज्याच्यावर श्रीकृष्ण प्रसन्न झाला व प्रश्न न करितांच आपलें रहस्य सांगू  लागला ! २८. 


    बाळक काय भूक सांगे । मग माता स्तन देऊं लागे ।
    ते कळवळ्याचे पांगें धांवोनि निजांगें स्तनपाना लावी ॥ २९ ॥
    मूल काय आपल्याला भूक लागली असें सांगते ? आणि मग आई त्याला स्तनपान देऊं लागते ? असें नाही. तर ती आपल्या अंत:करणांतील कळवळ्यानेच आपण होऊन धावत जाऊन स्वतः त्याला पाजू लागते २९.


    त्याहूनि अतिआगळा । कृष्णीं उद्धवकळवळा ।
    तो स्वभक्तांची भजनकळा । जाणोनि जिव्हाळा पोखित ॥ ३० ॥
    पण श्रीकृष्णाच्या अंत:करणांत उद्धवाविषयींचा कळवळा त्याहूनही कितीतरी अधिक होता. कारण, आपल्या भक्तांच्या भक्तीची थोरवी मनांत आणून त्याचे अंतःकरण अत्यंत कळवळत असे ३०.


    बाळक नेणे आपुली चिंता । परी माता प्रवर्ते त्याच्या हिता ।
    तेवीं उद्धवाचे निजस्वार्था । श्रीकृष्णनाथा कळवळा ॥ ३१ ॥
    मूल आपली चिंता जाणत नाही, पण आईच त्याचे हित करावयास प्रवृत्त होते. त्याप्रमाणे उद्धवाचा हेतु पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्णाला कळवळा होता ३१.


    त्या उद्धवाचें जें जें न्यून । तें तें करावया परिपूर्ण ।
    प्रवर्तलासे श्रीकृष्ण । तो निजनिर्गुण उपदेशी ॥ ३२ ॥
    त्या उद्धवाचे जें जें कांहीं न्यून असेल, तें तें परिपूर्ण करावयाला श्रीकृष्ण तयारच होता. त्याने त्याला आपल्या निर्गुणपणाचा उपदेश केला ३२.


    पंचविसावे अध्यायीं जाण । सांगोनि गुणजयोलक्षण ।
    लक्षवील निजनिर्गुण । हेंचि निरूपण निजनिष्ठा ॥ ३३ ॥
    पंचविसाव्या अध्यायामध्ये गुणांचा जय कसा करावा त्याचे लक्षण सांगून आपला निर्गुणपणाही दाखवून देईल. हेच एकनिष्ठेचे निरूपण आहे ३३.


    प्रकृति-पुरुषविवेक । झालियाही बुद्धिपूर्वक ।
    जंव गुणजयो नाहीं निष्टंक । तंव वाढे सुखदुःख अहंभावो ॥ ३४ ॥
    प्रकृतिपुरुषांचा विचार बुद्धिपूर्वक झाला, तरी जोपर्यंत गुणांवर पूर्णपणे जय मिळाला नाही, तोपर्यंत सुखदुःख व अहंभाव ही वाढावयाचींच ३४.


    तिहीं गुणांस्तव देह झाला । देही गुणजयो न वचे केला ।
    मूल‍उच्छेदू आपुला । न करवे वहिला कोणासी ॥ ३५ ॥
    तिन्ही गुणांपासून देह झाला आहे. म्हणून देहामध्ये गुणांचा जय केला जात नाही. कारण, आपल्याच मुळाचा उच्छेद कोणालाही मुळींच करवत नाही. ३५.


    दांडा जन्मला वृक्षजातीसीं । तो मिळोनियां कुऱ्हाडीसीं ।
    समूळ छेदवी वृक्षासी । तेवीं विवेकासीं सत्त्वगुण ॥ ३६ ॥
    दांडा वृक्षांच्या जातींतच जन्मास येतो, पण तो कुऱ्हाडीला मिळून तिच्याकडून साऱ्या वृक्षांचे छेदन करवितो. त्याप्रमाणे विवेकाला सत्त्वगुण मिळतो ३६, 


    विवेका मीनल्या सत्त्वगुण । समूळ उच्छेदी तिनी गुण ।
    सहजें प्रकटे निजनिर्गुण । तेव्हां गुणच्छेदन तें मिथ्या ॥ ३७ ॥
    आणि विवेकाला सत्त्वगुण मिळाला म्हणजे तो तिन्ही गुणांचा समूळ उच्छेद करून टाकतो. त्यामुळे मूळचे निर्गुणत्व आपोआप प्रगट होते. तेव्हां गुणांचे छेदन करणे हेही मिथ्याच होय ३७.


    समूळ मिथ्या तिनी गुण । नित्य सत्य निजनिर्गुण ।
    येचि अर्थींचें निरूपण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगत ॥ ३८ ॥
    तिन्ही गुण हेच मुळी मिथ्या आहेत; आणि आपलें निर्गुणत्व हेच काय ते नित्य व सत्य आहे. ह्याच अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण स्वत:च्या मुखाने सांगत आहे ३८.


    श्रीभगवानुवाच-
    गुणानामसमिश्राणां पुमान्येन यथा भवेत् ।
    तन्मे पुरुषवर्येदमुपधारयः शंसतः ॥ १ ॥
    [श्लोक १] भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे पुरूषश्रेष्ठा कोणत्या गुणामुळे माणसाचा स्वभाव कसा बनतो, ते मी तुला सांगतो लक्ष देऊन ऐक. (१)


    ज्याचेनि चरणें पवित्र क्षिती । नामें उद्धरे त्रिजगती ।
    ज्याची ऐकतां गुणकीर्ती । क्षयो पावती महपापें ॥ ३९ ॥
    ज्याच्या चरणाच्या स्पर्शाने सर्व पृथ्वी पवित्र होते; ज्याच्या नामाने त्रैलोक्य उद्धरतें ; ज्याच्या गुणांची कीर्ति श्रवण केली असता महापातकेंही लयास जातात ३९; 


    ज्याचें मृदु मधुर अविट नाम । उच्चरितां निववी परम ।
    तो उद्धवासी पुरुषोत्तम । आवडीं परम बोलत ॥ ४० ॥
    ज्यांचे मृदु, मधुर, व अवीट असें नाम उच्चारले असतां परमसंतोष देते; तो पुरुषोत्तम परम प्रीतीनें उध्दवाशी बोलू लागला ४०.


    सत्त्व रज तम तिनी गुण । न मिसळतां भिन्नभिन्न ।
    पुरुषापासीं एकैक गुण । उपजवी चिन्ह तें ऐका ॥ ४१ ॥
    सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण एकमेकांत न मिसळतां भिन्न भिन्न असतात, तेव्हां पुरुषापाशी जो भिन्न भिन्न एकेक गुण असतो, त्या प्रत्येकापासून कोणकोणते चिन्ह दृष्टीस पडते तें ऐका ४१.


    निःसंदेह सावधान । निर्विकल्प करूनि मन ।
    ऐकतां माझें वचन । पुरुषोत्तम पूर्ण होइजे स्वयें ॥ ४२ ॥
    हे माझें भाषण निःसंदेह, सावधान व निर्विकल्प मन करून ऐकलें असतां ऐकणारा स्वत:च परिपूर्ण पुरुषोत्तम होईल ४२.


    माझे स्वरूपीं सद्भावता । ते पुरुषाची उत्तमावस्था ।
    माझे वचनीं विश्वासतां । पुरुषोत्तमता घर रिघे ॥ ४३ ॥
    माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सद्भावना धरणे तीच पुरुषाची उत्तमावस्था होईल. माझ्या भाषणावर विश्वास ठेवला असतां पुरुषोत्तमपणा स्वतः घरी चालून येतो ४३.


    ऐशी उत्तमा अतिउत्तम । निर्गुण पदवी निरुपम ।
    तुज मी अर्पितसें पुरुषोत्तम । माझें वचन परम विश्वासल्या ॥ ४४ ॥
    असे हे उत्तमांतील उत्तम, निरुपम व निर्गुण स्थान, माझ्या वचनावर तूं पूर्ण विश्वास ठेवशील तर तुला मी अर्पण करीत आहे ४४.


    भक्तिभावार्थें परम श्रेष्ठ । वचनविश्वासीं अतिवरिष्ठ ।
    यालागीं उद्धवासी पुरुषश्रेष्ठ । स्वमुखें वैकुंठ संबोधी ॥ ४५ ॥
    उद्धव हा भक्तिभावार्थानं अत्यंत श्रेष्ठ, वचनावर विश्वास ठेवण्याबद्दल तर अत्यंत अग्रगण्य, म्हणून श्रीकृष्ण आपल्या मुखाने उद्धवाला  'हे पुरुषश्रेष्ठा !' असें म्हणून हाक मारूं लागला ४५.


    संसारीं योनि अनेग । त्यामाजीं मनुष्यत्व अतिचांग ।
    तेंहि अविकळ अव्यंग । संपूर्ण सांग निर्दुष्ट ॥ ४६ ॥
    या जगामध्ये अनेक योनी आहेत. त्यांत मनुष्यपणा हा अत्यंत उत्तम होय. आणि त्यांतही शुद्ध, अव्यंग, संपूर्ण अवयवांनी युक्त आणि कोणत्याही प्रकारे उणीव नाही असा देह असावा ४६.


    सकळ देहांमाजीं जाण । असे पुरुषदेहप्राधान्य ।
    त्याहीमाजीं विवेकसंपन्न । वेदशास्त्रज्ञ मुमुक्षू ॥ ४७ ॥
    अशाही सर्व देहांमध्ये पुरुषदेहाचेंच श्रेष्ठत्व आहे. त्यांतही विचारशील, वेदशास्त्रं  जाणणारा आणि मुमुक्षु असा पुरुष असावा ४७.


    वेदशास्त्रविवेकसंपन्न । त्याहीमाजीं ज्या माझें भजन ।
    भजत्यांमाजीं अनन्य शरण । सर्वस्वें जाण मजलागीं ॥ ४८ ॥
    आणि असा पुरुष वेद, शास्त्र, विवेक ह्यांनी संपन्न असून त्यांत आणखी ज्याला माझें भजन घडत असेल, आणि अशा भक्तांमध्येही मला जर अनन्यभावाने सर्वस्वीं शरण येणारा असेल ४८,


    सर्वस्वें जे अनन्य शरण । तेथ माझी कृपा परिपूर्ण ।
    माझें कृपें माझें ज्ञान । पावोनि संपन्न मद्भजनीं ॥ ४९ ॥
      तर असे जे सर्वस्वेकरून मला शरण येतात, त्यांच्यावर माझी परिपूर्ण कृपा असते. माझ्या कृपेनेच तो माझें ज्ञान पावून माझ्या भजनांत रममाण होतो ४९.


    येंहीं गुणीं विचारितां लोक । आथिला दिसे उद्धव एक ।
    त्यालागीं यदुनायक । पुरुषवर्याभिषेक वचनें करी ॥ ५० ॥
    अशा गुणांनी विचार केला असतां असा सर्वगुणसंपन्न एक उद्धवच दिसतो. यासाठीच यदुकुलश्रेष्ठ श्रीकृष्णाने 'पुरुषश्रेष्ठा' अशा संबोधनाने पुरुषत्वाचा अभिषेक उद्धवावर केला ५०.


    ऐसें संबोधूनि उद्धवासी । त्रिगुणगुणस्वभावांसी ।
    सांगतां प्रथम सत्त्वासी । हृषीकेशी उपपादी ॥ ५१ ॥
    ह्याप्रमाणे उद्धवाला संबोधून तीन गुणांचे स्वभाव सांगतांना प्रथम श्रीकृष्ण सत्त्वगुणाचे प्रतिपादन करूं लागला ५१.


    उदंड सत्त्वाचीं लक्षणें । त्यांत पंधरा बोलिलीं श्रीकृष्णें ।
    तेंचि ऐका कोणकोणें । निजनिरूपणें हरि सांगे ॥ ५२ ॥
    सत्वगुणाची लक्षणे अनेक आहेत, परंतु त्यांतील पंधराच श्रीकृष्णांनी सांगितली. ती श्रीकृष्णांनी आपल्या निरूपणांत सांगितलेली लक्षणे कोणतीं तें ऐका ५२.


    शमो दमस्तितिक्षेक्षा तपः सत्यं दया स्मृतिः ।
    तुष्टिस्त्यागोऽस्पृहा श्रद्धा हीर्दयादिः स्वनिर्वृतिः ॥ २ ॥
    [श्लोक २] मनः संयम, इंद्रियनिग्रह, सहिष्णूता, विवेक, तप, सत्य, दया, स्मृती, संतोष, त्याग, विषयउपभोगांबद्दल अनिच्छा, श्रद्धा, लज्जा, आत्मरती, दान, विनय, सरलता इत्यादी सत्त्वगुणाच्या वृत्ती होत. (२)


    आपुली जे चित्तवृत्ती । सांडूनि बाह्यस्फूर्ती ।
    अखंड राखणें आत्मस्थिती । शम निश्चितीं या नांव ॥ ५३ ॥
    बाह्यस्फूर्तीला सोडून देऊन आपली जी चित्तवृत्ति, ती अखंड आत्म्यामध्ये एकाग्र करणे यालाच 'शम' असें नांव आहे ५३.


    बाह्य इंद्रियांची चडफड । शमेंसीं करावा गलजोड ।
    निग्रहणें विषयचाड । दमाचें कोड या नांव ॥ ५४ ॥
    बाह्य इंद्रियांची जी चरफड असते, तिचे शांतीशी ऐक्य करून विषयाची इच्छा आवरून धरणे, याचें नांव दमाचे खरे स्वरूप होय ५४.


    जेणें हरिखें साहणें सुख । त्याचि वृत्तीं साहणें दुःख ।
    तितिक्षा या नांव देख । शुद्धसत्त्वात्मक उद्धवा ॥ ५५ ॥
    उद्धवा ! जितक्या आनंदाने आपण सुख भोगतों, तितक्याच संतोषवृत्तीने दुःखही सहन करणे, याचे नांव शुद्धसत्त्वात्मक तितिक्षा होय ५५.


    मी कोण कैंचा किमात्मक । निष्कर्म कीं कर्मबद्धक ।
    करणें निजात्मविवेक । ईक्षापरिपाक या नांव ॥ ५६ ॥
    मी कोण? कोठचा? माझे स्वरूप काय ? मी निष्कर्म आहे की कर्मबद्ध आहे ? अशा प्रकारें आत्मविचार करणे ह्याचें नांव ईक्षापरिपाक होय ५६.


    जागृतिस्वप्रसुषुप्तीआंत । भगवत्प्राप्तीलागीं चित्त ।
    झुरणीमाजीं पडे नित्य । तप निश्चित या नांव ॥ ५७ ॥
    जागृति, स्वप्नं व सुषुप्ति या तिन्ही स्थितींमध्ये  भगवत्प्राप्तीसाठी  चित्त निरंतर झुरणीला लागणे याचंच नांव खरोखर 'तप' होय ५७.


    आवडीं जेवीं नेघवे विख । तेवी प्राणांतें न बोले लटिक ।
    साचचि बोलणें निष्टंक । हें सत्य देख सात्त्विका ॥ ५८ ॥
    आवडीनें विष पिववत नाही, त्याप्रमाणे प्राणांतीही जो खोटे बोलत नाही, निरंतर सत्यच बोलणे असते, हेच सात्विकाचे सत्य होय ५८.


    भूतांवरी कठिणपण । जो स्वप्नीं न देखे आपण ।
    भूतदया ते संपूर्ण । उद्धवा जाण निश्चित ॥ ५९ ॥
    उद्धवा ! जो आपण होऊन स्वप्नातसुद्धा प्राणिमात्रावर निष्ठुरपणा कधीं धरीत नाही, त्याची तीच खरोखर परिपूर्ण भूतदया होय असे समज ५९.


    माझा मुख्य निजस्वार्थ कोण । मी काय करितों कर्माचरण ।
    ऐसें जें पूर्वानुस्मरण । स्मृति जाण या नांव ॥ ६० ॥
    माझें मुख्य हित कशांत आहे? मी कोणतें कर्माचरण करतो ? असें जें पूर्वीचे स्मरण, त्याचे नांव स्मृति हे लक्षात ठेव ६०.


    न करितां अतिआटाटी । यथालाभें सुखी पोटीं ।
    या नांव गा निजसंतुष्टी । जाण जगजेठी उद्धवा ॥ ६१ ॥
    हे जगांतील श्रेष्ठ भक्ता उद्धवा! अतिशय यातायात न करता जे काय मिळेल तेवढ्यानेंच अंत:करणांत सुखी राहावयाचे ह्याचेंच नांव आत्मतुष्टि होय असे समज ६१.


    जे मिळाले जीविकाभाग । त्यांतही सत्पात्रीं दानयोग ।
    विषयममता सांडणें सांग । त्या नांव त्याग उद्धवा ॥ ६२ ॥
    जे काय उपजीविकेसाठी अन्नादिक प्राप्त झाले असेल, त्यांतलेच काही सत्पात्री दान करावयाचे, आणखी उद्धवा ! सर्व विषयममता सोडावयाची, त्याचे नांव त्याग होय ६२.


    अर्थस्वार्थीं इच्छा चढे । अर्थ जोडतां अधिक वाढे ।
    ते इच्छा सांडणे निजनिवाडें । निस्पृहता घडे ते ठायीं ॥ ६३ ॥
    अर्थ आणि स्वार्थ ह्यांचे ठिकाणी इच्छा वाढतच असते, पैसा मिळाला म्हणजे तर ती अधिक वाढते, अशी ती इच्छा आपल्या मनानेच सोडून दिली, म्हणजे तेथे निस्पृहता घडते ६३.


    जेथ निस्पृहता समूळ सांग । त्याचि नांव दृढ वैराग्य ।
    हें परमार्थाचें निजभाग्य । येणें श्रीरंग सांपडे ॥ ६४ ॥
    जेथें पूर्णपणे सर्वलक्षणयुक्त निस्पृहता असते, त्याचंच नांव दृढ वैराग्य, हेच परमार्थाचं खरें भाग्य असून याच्याच योगाने श्रीहरि प्राप्त होतो ६४.


    जो गुरुवाक्यविश्वासी । सबाह्य विकला सर्वस्वेंसीं
    तोचि भावार्थ द्विजदेवांसी । श्रद्धा त्यापाशीं समूळ नांदे ॥ ६५ ॥
    जो गुरूच्या वाक्यावर विश्वास ठेवणरा असतो, जो त्यालाच सर्वस्वी अंतर्बाह्य विकलेला असतो, त्याचीच देवब्राह्मणांच्या ठिकाणी भक्ति जडते, आणि त्याच्यापाशी पूर्ण श्रद्धा नांदत असते ६५.


    नरदेहीं लाभे परब्रह्म । तदर्थ न करूनि सत्कर्म ।
    विषयार्थ करी धर्माधर्म । ते लज्जा परम अतिनिंद्य ॥ ६६ ॥
    नरदेहामध्येच परब्रह्माची प्राप्ति होते. असे असतां त्याकरितां जो सत्कर्म करीत नाही, विषयाकरितांच धर्म-अधर्म काय पाहिजे ते आचरण करतो, ती त्याची कृति अत्यंत निंद्य व लाजिरवाणी होय ६६.


    जेणें दुःखी होईजे आपणें । तें पुढिलासी नाहीं करणें ।
    दुःख नेदूनि सुख देणें । हे दया म्यां श्रीकृष्णें वंदिजे ॥ ६७ ॥
    जेणेकरून आपण दुःखी होतों ते दुसऱ्यास न करणे, दुःख न देतां सुखच देणे, हीच दया मी श्रीकृष्णाने वंद्य मानिली आहे ६७.


    पुढिलासी नेदूनि दुःख । स्वयें भूतमात्रीं देणें सुख ।
    हेचि दया पारमार्थिक । दुसरेनि देख यालागीं सांगे ॥ ६८ ॥
    दुसऱ्याला दुःख न देऊन स्वतः सर्व प्राण्यांना सुख द्यावयाचे, ही पारमार्थिक दया होय. म्हणूनच ही दुसऱ्यांदा सांगितली ६८.


    खातां नाबदेपुढें पेंड जैसी । तैसें गौण देखोनि विषयांसी ।
    जो विनटला ब्रह्मसुखासी । स्वनिवृत्ति त्यासी बोलिजे ॥ ६९ ।
    ज्याप्रमाणे साखर खात असतां त्यापुढे पेंड खाल्ली तर वाईट लागते, त्याप्रमाणे विषयांना गौण समजून जो ब्रह्मानंदात निमग्न झाला, त्याच्या त्या वृत्तीलाच आत्मनिवृति असे म्हणतात ६९.


    रंक बैसल्या पालखीसी । उपेक्षी पूर्वील सुडक्यासी ।
    तेवीं उपेक्षूनि विषयांसी । जो ब्रह्मसुखासी पकडला ॥ ७० ॥
    एखादा भिकारी पालखीत बसला असतां तो पूर्वीची आपली फाटकी वस्त्रे उपेक्षेनें फेकून देतो, त्याप्रमाणे विषयांची उपेक्षा करून जो ब्रह्मसुखालाच लांचावतो ७०; 


    कणाची वाढी भुसापाशीं । कण निडारे भुसेंसीं ।
    तो कण यावया हातासी । सांडिती भुसासी पाखडूनी ॥ ७१ ॥
    दाण्याची वाढ भुसापाशी असते, आणि भुसासहवर्तमानच कण पुष्ट होत असतो, पण तोच दाणा हाती येण्यासाठी भुसाला पाखडून टाकतात ७१, 


    तेवीं ब्रह्मसुखाचिये पाडें । नरदेहाचा पांगडा पडे ।
    तें ब्रह्मसुख जैं हाता चढे । तैं देहींचें नावडे विषयभूस ॥ ७२ ॥
    त्याप्रमाणे ब्रह्मसुखासारखाच देहाचाही मोह पडतो, पण तेंच ब्रह्मसुख जेव्हां हाती येते, तेव्हां देहाचे विषयरूपी भूस आवडत नाहींसें होते ७२.


    तेवीं सांडूनि विषयप्रीती । ज्यासी ब्रह्मसुखीं सुखप्राप्ती ।
    याचि नांव स्वनिवृत्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ७३ ॥
    त्याप्रमाणे विषयाची प्रीति सोडून देऊन ज्याला ब्रह्मसुखांत सुखप्राप्ति होते, त्यालाच उद्धवा ! खरोखर 'आत्मनिवृति' असें नांव आहे ७३.


    या पंधरा लक्षणांची स्थिती । वर्ते तो शुद्ध सत्त्वमूर्ती ।
    शोधितसत्त्वाची सत्त्ववृत्ती । ‘आदि’ शब्दें श्रीपती सांगत ॥ ७४ ॥
    या पंधरा लक्षणांची स्थिति ज्याच्या ठिकाणी असते, तोच शुद्ध सत्वाची मूर्ति होय. आता ' आदि' शब्दानें शोधितसत्त्वाची सत्त्ववृत्तीही श्रीकृष्ण सांगतो ७४.


    सर्व भूतीं अकृत्रिमता । देखे भगवद्भावें तत्त्वतां ।
    या नांव शोधितसत्त्वता । गुणावस्थाछेदक ॥ ७५ ॥
    सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी भगवंताची भावना धरून निष्कपटबुद्धि ठेवणे ह्याचेच  नांव सर्व गुणांची अवस्था छेदन करणारा शुद्ध सात्त्विकपणा होय ७५.


    ऐशियापरी सत्त्वगुण । सात्त्विकापासीं वर्ते पूर्ण ।
    आतां रजाचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ७६ ॥
    अशा रीतीने सात्विकापाशी सत्वगुण पूर्णपणाने राहात असतो. आता रजाचे लक्षण स्वतः श्रीकृष्ण सांगत आहे ७६.


    काम ईहा मदस्तृष्णा स्तम्भ आशीर्भिदा सुखम् ।
    मदोत्साहो यशः प्रीतिर्हास्यं वीर्यं बलोद्यमः ॥ ३ ॥
    [श्लोक ३] इच्छा, प्रयत्‍न, गर्व, लोभ, ताण, अपेक्षा, भेदबुद्धी, विषययोग, युद्ध इत्यादीसाठी गर्वयुक्त उत्साह, आपल्या यशावर प्रेम, हास्य, पराक्रम, हट्टाने उद्योग करणे इत्यादी रजोगुणाच्या वृत्ती होत. (३)


    काम म्हणीजे विषयसोसू । जेवीं इंधनीं वाढे हुताशू ।
    तेवीं पुरवितां कामाभिलाषू । कामासोसू पैं वाढे ॥ ७७ ॥
    काम म्हणजे विषयांचा हव्यास. ज्याप्रमाणे काष्ठादिकांनी अग्नि वाढतो. त्याप्रमाणे कामाची इच्छा पुरवितां पुरवितां कामाचा हव्यासही वाढतच जातो ७७.


    या नांव काम जाण । कामक्रिया ते ईहा पूर्ण ।
    झाले विद्योचा दर्प गहन । मदाचें लक्षण या नांव ॥ ७८ ॥
     ह्याचें नांव काम होय. कामाची जी क्रिया, तीच पूर्ण ईहा होय. संपादिलेल्या विद्येचा अतिशय गर्व वाटणे याचंच नांव मदाचे लक्षण होय ७८.


    झालिया अर्थप्राप्ती । वासनेसी नव्हे तृप्ती ।
    चढतीवाढती आसक्ती । तृष्णा निश्चितीं या नांव ॥ ७९ ॥
    अर्थप्राप्ति झाली असतांही वासनेची तृप्ति होत नाही. अशी जी नेहमी वाढत वाढत जाणारी आसक्ति, ह्याचेच  नांव खरोखर तृष्णा होय ७९.


    अतिगर्वें जे स्तब्धता । कोणा दृष्टीं नाणी सर्वथा ।
    या नांव स्तंभावस्था । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ८० ॥
    उद्धवा ! अत्यंत गर्वाने जो ताठा  प्राप्त होतो, कोणी डोळ्यांसमोर दिसू देत नाही, याचंच नांव खरोखर 'स्तंभावस्था' होय ८०.


    अर्थप्राप्तीकारणें । इष्टदेवता प्रार्थणें ।
    प्रापंचिक सुख मागणें । आशा म्हणणें य नांव ॥ ८१ ॥
    पैसा मिळविण्याकरिता इष्ट देवतेची प्रार्थना करणे, आणि तिच्याजवळ प्रापंचिक सुख मागणे, ह्याचें नांव आशा असे म्हणावे ८१. 


    भिदा म्हणिजे भेद जाण । स्फुरद्रूप प्रपंचभान ।
    माझें तुझें प्रपंचवचन । भिदालक्षण या नांव ॥ ८२ ॥
    भिदा म्हणजे भेद. प्रपंचाचे भान स्फुरणे, व 'हे माझे व हे तुझे' इत्यादि जें  प्रापंचिक भाषण त्याचे नांव भिदा होय ८२.


    राजससुखाचा नवलभाग । विषयसुखभोग जो साङ्ग ।
    तेंचि सुख मानिंती चांग । सुखप्रयोग या नांव ॥ ८३ ॥
    राजस सुखाचा एक मोठा चमत्कार आहे. तो हा की, विषयसुखाचे जे सर्व भोग, तेच उत्तम सुख असे मानतात. ह्याचे नांव सुखप्रयोग ८३.


    रणीं उत्साह शूरासी । कां पुत्रोत्साह नरासी ।
    विवाहोत्साह सुहृदांसी । महोत्साह त्यासी बोलिजे ॥ ८४ ॥
    शूराला युद्धामध्ये वीरश्री चढणें, किंवा सामान्य पुरुषाला पुत्रप्राप्तीमुळे उत्साह येणे, किंवा नातेवाइकांतील विवाहसमारंभामुळे आप्तइष्टांना उत्साह वाटणे, त्याला 'महोत्साह' असे म्हणतात ८४.


    शास्त्रविवादीं जयो घेणें । कां युद्धीं शूर पराभवणें ।
    तेणें ख्याति वाढविणें । यश मिरवणें या नांव ॥ ८५ ॥
    शास्त्रवादात जय मिळविणे, किंवा युद्धात शूराचा पराभव करणे, आणि त्यामुळे नावलौकिक पसरणे, ह्यालाच यश असें नांव द्यावे  ८५.


    बंदिजनांहातीं कीर्ती । स्वयें वाखाणवी दिगंतीं ।
    या नांव यशःप्रीती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ८६ ॥
    उद्धवा ! भाटाकडून आपली कीर्ती  आपण स्वतःच दिगंती वाखाणवून घ्यावयाची, ह्याचें नांव खरोखर यशःप्रीति होय ८६.


    ऐकोनि वचनोक्ति छंदोबद्ध । उपहासीं अतिविनोद ।
    तेथ राजसा हास्य विशद । जाण प्रसिद्ध उद्धवा ॥ ८७ ॥
    उद्धवा ! कविताबद्ध  भाषण ऐकून, किंवा उपहासाने अत्यंत विनोद चाललेला पाहुन राजसाला मोठे हसू येते,हें  'हास्य' प्रसिद्धच आहे ८७.


    वीर्य म्हणीजे केवळ । बळाढ्यता अतिप्रबळ ।
    दाखवणें शारीरबळ । या नांव शीळ वीर्याचें ॥ ८८ ॥
    वीर्य म्हणजे अत्यंत प्रबळ सामर्थ्य-शारीरबळ दाखविणे  ह्याचे नांव वीर्यशालीपणा होय ८८.


    राजबळें उद्यमव्यवहार । आंगदटा जो व्यापार ।
    न्याय सांडूनि स्वार्थ फार । बलोद्यमप्रकार या नांव ॥ ८९ ॥
    राजाच्या बळावर उदीम-व्यापार करणें , शिरजोरपणाचा जो व्यवहार तो करणे, न्याय सोडून फार स्वार्थ साधणे, ह्याचे नांव 'बलोद्यम' म्हणजे शिरजोरपणा होय  ८९.


    हीं पंधराही लक्षणें । ज्यापें नांदती संपूर्णें ।
    तो राजस वोळखणें जीवेंप्राणें निश्चित ॥ ९० ॥
    ही  पंधराही लक्षणें  ज्याच्यापाशी पूर्णपणाने वास करतात, तो खरोखर जीवाभावाने राजस म्हणून ओळखावें ९०.


    केवळ अविवेकसंपत्ती । तामसाची तमोवृत्ती ।
    सोळा लक्षणें त्याची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ९१ ॥
    केवळ अविचाराचीच संपत्ति अशी तामसाची तमोवृत्ति होय. सोळा लक्षणांनी त्याची स्थिति तुला सांगतो, ऐक ९१.


    क्रोधो लोभोऽनृतं हिंसा याञ्चा दम्भः क्लमः कलिः ।
    शोकमोहौ विषादार्ती । निद्राऽऽशाभीरनुद्यमः ॥ ४ ॥
    [श्लोक ४] क्रोध, लोभ, मिथ्या भाषण, हिंसा, याचना, पाखंड, श्रम, भांडण, शोक, मोह, विषाद, दीनता, निद्रा, आशा, भय आळस इत्यादी तमोगुणीच्या वृत्ती होत. (४)


    क्रोध कामाची पूर्णावस्था । लोभ म्हणीजे अतिकृपणता ।
    अनृत म्हणिजे असत्यता । हिंसा ते तत्त्वतां परपीडा ॥ ९२ ॥
    क्रोध म्हणजे कामाची परिपूर्ण वाढ झालेली स्थिति. लोभ म्हणजे अत्यंत कृपणपणा. अनृत म्हणजे खोटें भाषण. हिंसा म्हणजे खरोखर दुसऱ्याला पीडा देणे ९२.


    याञ्चा म्हणीजे लोलंगता । दंभ म्हणिजे अतिमान्यता ।
    क्लमनामें अतिआयासता । व्यर्थ कलहता कलि जाण ॥ ९३ ॥
    याच्चा म्हणजे हांजी हांजी करणे. दंभ म्हणजे अतिमान्यता मिळविण्यासाठी केलेले ढोंग, क्लम  म्हणजे अत्यंत परिश्रमांनी आलेला थकवा. आणि विनाकारण तंटा बखेडा करणे याचे नांव कलि ९३.


    शोक म्हणिजे हाहाकारू । मोह म्हणिजे भ्रमाचा पूरू ।
    विषाद म्हणीजे दुःखसंचारू । अभ्यंतरू जेणें पोळे ॥ ९४ ॥
    शोक म्हणजे हाहा:कार. मोह म्हणजे भ्रमाचा पूर. विषाद म्हणजे जेणेकरून अंत:करणाला चटका बसेल असा दुःखाचा संचार ९४.


    आर्ति म्हणिजे अतिसंताप । निंदा म्हणिजे असदारोप ।
    आशा म्हणिजे अतिलोलुप्य । महाभयकंप भीशब्दीं ॥ ९५ ॥
    आर्ति म्हणजे अत्यंत संताप. निंदा म्हणजे खोटे आरोप करणे. आशा म्हणजे अतिशय लोभिष्टपणा. भी म्हणजे भयाने अंगाचा अत्यंत थरकाप होणे ९५.


    ऐक निद्रेचें निजवर्म । जें आळसाचें निजधाम ।
    जाड्यता सोलींव परम । ते निद्रा निःसीम तामसी ॥ ९६ ॥
    आतां निद्रेतील वर्म ऐक .  जे आळसाचे माहेरघर, आणि जी अत्यंत मोठी अस्सल सुस्ती, तीच अमर्याद तामसी निद्रा होय ९६.


    सांडूनियां सर्व कर्म । स्तब्धता राहे परम ।
    या नांव अनुद्यम । सुखावलें तम ठायीं वसे ॥ ९७ ॥
    सर्व उद्योग सोडून अत्यंत सुस्ती असणे ह्याचे नांव 'अनुद्यम' (निरुद्योगीपणा) होय. यामध्येच तम सुखाने राहाते ९७.


    या तमोगुणाच्या सोळा कळा । ज्याचे अंगीं बाणती सकळा ।
    तो तमोरात्रींची चंद्रकळा । अविवेक आंधळा तामसू ॥ ९८ ॥
    या तमोगुणाच्या सोळा कळा आहेत. त्या ज्याच्या अंगांत बाणलेल्या असतात, तोच तमोगुणरूप रात्रीतला (अमावास्येचा) चंद्र होय. तो तामस मनुष्य अविचाराने आंधळा झालेला असतो ९८.


    सत्त्वरजतमोगुण । यांचे ओळखीलागीं जाण ।
    केलें भिन्नभिन्न निरूपण । अतां मिश्रलक्षण तें ऐक ॥ ९९ ॥
    सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांची ओळख होण्यासाठी त्यांचे निरनिराळे वर्णन केले. आता त्यांचे जें मिश्र लक्षण तें ऐक ९९.


    सत्त्वस्य रजसश्चैतास्तमसश्चानुपूर्वशः ।
    वृत्तयो वर्णितप्रायाः सन्निपातमथो शृणु ॥ ५ ॥
    [श्लोक ५] अशाप्रकारे मी सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांच्या बहुतेक वृत्तींचे वर्णन केले आता त्यांच्या मिश्रणाने ज्या वृत्ती निर्माण होतात, त्यांचे वर्णन ऐक. (५)


    सांगीतली त्रिगुणस्थिती । त्या एकएकाच्या अनंत वृत्ती ।
    त्याही अनंतप्राय होती । जीवासी गुणगुंती येथेंचि पडे ॥ १०० ॥
    तीन गुणांची स्थिति तुला सांगितली. त्या एकाएकाच्या अनंत वृत्ति आहेत. त्याही अनंत प्रकारच्या होतात. त्यामुळेच येथ जीवाला गुणाच्या गुंत्यांत पडावे लागते १००. 

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...