मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २५ ओव्या २०१ ते ३००
ब्रह्म निर्मळत्वें प्रसिद्ध । कर्म शोधकत्वें अतिशुद्ध ।
येथ कर्मीं उपजे कर्मबाध । तो चित्तसंबंध गुणक्षोभें ॥ १ ॥
ब्रह्म हें पवित्रपणात प्रसिद्धच आहे. कर्मही निर्मळपणाने अत्यंत शुद्धच आहे. असे असतांही कर्मामध्ये जो कर्मबंध उत्पन्न होतो, तो गुणक्षोभाच्या योगाने विकृत झालेल्या चित्ताचा संबंध होय १.
कर्मब्रह्मीं दोष नाहीं । दोष चित्तवृत्तीच्या ठायीं ।
तोही गुणक्षोभें पाहीं । घाली अपायीं पुरुषातें ॥ २ ॥
तोही गुणक्षोभें पाहीं । घाली अपायीं पुरुषातें ॥ २ ॥
कर्म आणि ब्रह्म यांत काही दोष नाही. दोष चित्तवृत्तीमध्ये आहे. आणि तोही गुणक्षोभाच्या योगानेंच असतो. तोच पुरुषाला अनर्थात पाडतो २.
येचि अर्थींचें निरूपण । सांगितलें मिश्रलक्षण ।
आतां वाढल्या एकेक गुण । गुणलक्षण तें ऐक ॥ ३ ॥
आतां वाढल्या एकेक गुण । गुणलक्षण तें ऐक ॥ ३ ॥
या अर्थाचे निरूपण करून मी गुणांचे मिश्र लक्षण सांगितले. आतां एकेक गुण वाढल्यास त्या गुणाचे स्वरूप कसे असते ते ऐक ३.
जो गुण वाढे अतिउन्नतीं । इतर त्यातळीं वर्तती ।
ते काळींची पुरुषस्थिती । उद्धवाप्रती हरि सांगे ॥ ४ ॥
ते काळींची पुरुषस्थिती । उद्धवाप्रती हरि सांगे ॥ ४ ॥
जो गुण अतिशय वाढतो, त्याच्या आज्ञेखाली इतर गुण वागत असतात. त्या काळी पुरुषाची स्थिति कशी असते, ती श्रीहरि उद्धवाला सांगतो ४.
यदेतरौ जयेत्सत्त्वं भास्वरं विशदं शिवम् ।
तदा सुखेन युज्येत धर्मज्ञानादिभिः पुमान् ॥ १३ ॥
तदा सुखेन युज्येत धर्मज्ञानादिभिः पुमान् ॥ १३ ॥
[श्लोक १३] सत्त्वगुण हा प्रकाशदायी, निर्मल आणि शांत आहे. तो जेव्हा रजोगुण आणि तमोगुण यांचा पराभव करून वाढतो, तेव्हा पुरूष सुख, धर्म, ज्ञान इत्यादींनी युक्त होतो. (१३)
समूळ फळाशा त्यागूनी । निर्विकल्प निराभिमानी ।
जो लागे स्वधर्माचरणीं । तैं रज तम दोनी जिणे सत्त्व ॥ ५ ॥
जो लागे स्वधर्माचरणीं । तैं रज तम दोनी जिणे सत्त्व ॥ ५ ॥
जो पुरुष फलाची आशा समूळ सोडून निर्विकल्प अशा निरभिमानपणाने स्वधर्माचरण करावयास लागतो, त्याचे ठिकाणी सत्वगुण हा रज व तम या दोहोंनाही जिंकतो ५.
जैं भाग्याचें भरण उघडे । तैं हरिकथाश्रवण घडे ।
मुखीं हरिनामकीर्ति आवडे । तेणें सत्त्व वाढे अतिशुद्ध ॥ ६ ॥
मुखीं हरिनामकीर्ति आवडे । तेणें सत्त्व वाढे अतिशुद्ध ॥ ६ ॥
जेव्हां भाग्याचे भांडार उघडते, त्या वेळी हरिकथेचे श्रवण घडते, मुखाने हरिनामाची कीर्ति वर्णन करणे आवडते, आणि तेणेंकरून अत्यंत शुद्ध अशा सत्त्वाची वृद्धि होते ६.
कां दैवें जोडिल्या सत्संगती । श्रवणीं श्रवण लांचावती ।
वाचा लांचावे नामकीर्ती । अतिप्रीतीं अहर्निशीं ॥ ७ ॥
वाचा लांचावे नामकीर्ती । अतिप्रीतीं अहर्निशीं ॥ ७ ॥
किंवा दैवयोगानें सत्संगतीचा लाभ घडला असतां भगवंताचे गुणानुवाद ऐकण्याविषयी कान लोलुप होतात, आणि वाणी अत्यंत प्रेमाने रात्रंदिवस भगवंताची नामकीर्ति वर्णन करण्यांत गढून जाते ७.
ऐसऐशिया अनुवृत्ती । रज तम दोनी क्षीण होती ।
सत्त्व वाढे अनुद्वेगवृत्तीं । त्यां सत्त्वाची स्थिति समूळ ऐक ॥ ८ ॥
सत्त्व वाढे अनुद्वेगवृत्तीं । त्यां सत्त्वाची स्थिति समूळ ऐक ॥ ८ ॥
अशा प्रकारच्या आचरणाने रज आणि तम हे दोन्ही गुण क्षीण होतात, व मोठ्या उत्साहाने सत्त्वगुण वाढतो. त्या सत्वाची साद्यन्त स्थिति ऐक ८.
भास्करत्वें प्रकाश बहुळ । विशदत्वें अतिनिर्मळ ।
शिव म्हणीजे शांत सरळ । हें सत्त्वाचें केवळ स्वरूप मुख्य ॥ ९ ॥
शिव म्हणीजे शांत सरळ । हें सत्त्वाचें केवळ स्वरूप मुख्य ॥ ९ ॥
तेजोरूपाने पुष्कळ प्रकाशयुक्त, स्वच्छपणाने अत्यंत निर्मळ, शिव म्हणजे शांत आणि सरळ हे सत्त्वाचे केवळ मुख्य स्वरूप होय ९.
हे सत्त्वाची सत्त्ववृत्ती । आतुडे ज्या साधकाहातीं ।
ते काळींची पुरुषस्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ २१० ॥
ते काळींची पुरुषस्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ २१० ॥
ही सत्त्वाची सत्त्ववृत्ति ज्या साधकाच्या हाती लागते, त्या साधक पुरुषाची स्थिति त्या वेळी कशी होते ते सांगतों, ऐक २१०.
तैं विवेकाचें तारूं आतुडे । वैराग्याचें निजगुज जोडे ।
सर्वेंद्रियीं प्रकाश उघडे । शिगे चढे स्वधर्म ॥ ११ ॥
सर्वेंद्रियीं प्रकाश उघडे । शिगे चढे स्वधर्म ॥ ११ ॥
त्याला त्या वेळी विवेकाची नौका सांपडते. वैराग्याचे आत्मरहस्य त्याला प्राप्त होते. सर्व इंद्रियांमध्ये प्रकाश पडतो आणि स्वधर्म तर शिखरास पोचतो ११.
ते काळीं जन अधर्मता । गर्व अभिमान असत्यता ।
बलात्कारेंही शिकवितां । न करी सर्वथा अधर्म ॥ १२ ॥
बलात्कारेंही शिकवितां । न करी सर्वथा अधर्म ॥ १२ ॥
त्या वेळी लोक त्याला अधर्म, गर्व, अभिमान, खोटपणा इत्यादि बळजबरीने शिकवीत असले, तरी ती अधर्माची कृत्ये तो मुळीच करीत नाही १२.
निकट असतां दुःखसाधन । सात्त्विक सदा सुखसंपन्न ।
बलात्कारें क्षोभवितां मन । सात्त्विक जाण क्षोभेना ॥ १३ ॥
बलात्कारें क्षोभवितां मन । सात्त्विक जाण क्षोभेना ॥ १३ ॥
दुःखाचे साधन अगदी जवळ आले असतांनासुद्धा सात्विक वृत्तीचा मनुष्य सदोदित सुखसंपन्नच असतो. सात्विकाचे मन बलात्कारानें क्षोभविलें असताही तो क्षुब्ध होत नाही १३.
ऐशिया निजसत्त्व दृष्टी । सुख सुख येतां भेटी ।
त्यासी स्वानंदें कोंदे सृष्टीं । शुद्ध सत्त्वपुष्टी या नांव ॥ १४ ॥
त्यासी स्वानंदें कोंदे सृष्टीं । शुद्ध सत्त्वपुष्टी या नांव ॥ १४ ॥
अशा आत्मतत्त्वाच्या दृष्टीने सुखच सुखाला भेटावयास आले असता त्याला आत्मानंदानेच सर्व सृष्टि भरून गेली आहे असे वाटते. ह्यालाच शुद्ध सत्त्वाची वाढ असें नांव आहे १४.
ऐसें विशद सत्त्व जयांपाशीं । शमदम सेविती तयांसी ।
वैराग्य लागे पायांसी । शुद्ध सत्त्वराशी ते उद्धवा ॥ १५ ॥
वैराग्य लागे पायांसी । शुद्ध सत्त्वराशी ते उद्धवा ॥ १५ ॥
असें शुद्ध सत्व ज्याच्यापाशी असते, त्याची सेवा शम आणि दम करितात. वैराग्य त्याच्या पायांशी लागते. उद्धवा! असा सात्त्विक मनुष्य म्हणजे ती शुद्ध सत्वाची रासच होय १५.
तैसेंचि सत्त्व तम जिणोन । जैं वाढे गा रजोगुण ।
तैं राजसाचें लक्षण । ऐक संपूर्ण हरि सांगे ॥ १६ ॥
तैं राजसाचें लक्षण । ऐक संपूर्ण हरि सांगे ॥ १६ ॥
त्याचप्रमाणे सत्त्व आणि तम ह्यांना जिंकून जेव्हां रजोगुण वाढतो, त्या वेळचें तें राजसाचे लक्षण ऐक. असें म्हणून श्रीहरि सांगू लागला १६.
यदा जयेत्तमः सत्त्वं रज सङ्गं भिदा बलम् ।
तदा दुःखेन युज्येत कर्मणा यशसा श्रिया ॥ १४ ॥
तदा दुःखेन युज्येत कर्मणा यशसा श्रिया ॥ १४ ॥
[श्लोक १४] रजोगुण भेदबुद्धीला कारणीभूत आहे आसक्ती आणि प्रवृत्ती हा त्याचा स्वभाव आहे जेव्हा तमोगुण आणि सत्त्वगुण यांच्यावर मात करून रजोगुण वाढतो, तेव्हा मनुष्य दुःख, कर्म, यश आणि आर्थिक संपन्नता यांनी युक्त होतो. (१४)
रजोवृद्धीचें कारण । देहीं उपजे ज्ञानाभिमान ।
पदोपदीं देखे दोषगुण । वांछी सन्मान प्रतिष्ठा ॥ १७ ॥
पदोपदीं देखे दोषगुण । वांछी सन्मान प्रतिष्ठा ॥ १७ ॥
रजोवृद्धीचे कारण हें की, देहामध्ये ज्ञानाभिमान उत्पन्न होतो. असा मनुष्य पावलोपावली दुसऱ्याचे दोष आणि गुण पहात बसतो आणि सन्मानाची व प्रतिष्ठेची इच्छा करितो १७.
नवल रजोगुणाची ख्याती । ज्ञातेपणें कामासक्ती ।
नाना भोग वांछी चित्तीं । तेणें रजाची प्राप्ती अनिवार ॥ १८ ॥
नाना भोग वांछी चित्तीं । तेणें रजाची प्राप्ती अनिवार ॥ १८ ॥
रजोगुणाची कीर्ति आश्चर्यकारक आहे. अशा मनुष्याला ज्ञातेपणा असूनही कामासक्ति असते. तो मनामध्ये अनेक प्रकारच्या भोगांची इच्छा धरतो. त्यामुळे रजाची वाढ अनिवार होते १८.
ऐसेनि रजोगुण वाढोनि वाढी । सत्त्वतमांतें तळीं पाडी ।
त्या रजाची स्वरूपतामोडी । ऐक निरवडी सांगेन ॥ १९ ॥
त्या रजाची स्वरूपतामोडी । ऐक निरवडी सांगेन ॥ १९ ॥
अशा प्रकारें रजोगुणाची वाढ बळावून तो सत्त्व आणि तम यांना जमीनदोस्त करतो. आतां त्या रजाचेही स्वरूप नष्ट करील असा प्रकार तुला सांगतों, ऐक १९.
श्लोकीं त्रैपदीं प्रबळ । रज संगभिदाबळ ।
बोलिला रजोगुण केवळ । तेंचि विवळ हरि सांगे ॥ २२० ॥
बोलिला रजोगुण केवळ । तेंचि विवळ हरि सांगे ॥ २२० ॥
मूळ श्लोकांत रजोगुण हा 'सई-भिदा-बलम्' अशा तीन शब्दांत सांगितलेल्या तीन प्रकारांनी प्रबळ होतो, असें केवळ रजोगुणाचे वर्णन केलेले आहे. तेच श्रीकृष्ण स्पष्ट करून सांगतो २२०.
संग म्हणिजे देहाभिमान । भेद म्हणिजे मीमाझेपण ।
बळ म्हणिजे काम गहन । आग्रहो पूर्ण प्रवृत्तीचा ॥ २१ ॥
बळ म्हणिजे काम गहन । आग्रहो पूर्ण प्रवृत्तीचा ॥ २१ ॥
संग म्हणजे देहाभिमान, भेद म्हणजे 'मी व माझे' असा भेदभाव. बळ म्हणजे बलवत्तर इच्छा व प्रवृत्तीचा पूर्ण आग्रह २१.
देहाभिमानें दुःख उठी । भेदें भय लागे पाठी ।
त्या नश्वर देहाचिया पुष्टी । काम्यकामाठी कर्माची मांडी ॥ २२ ॥
त्या नश्वर देहाचिया पुष्टी । काम्यकामाठी कर्माची मांडी ॥ २२ ॥
देहाभिमानाने दुःख उत्पन होते. भेदानें भय पाठीस लागते, आणि असा मनुष्य त्या नश्वर देहाच्या बळाने काम्य कर्माचे आचरण सुरू करितो २२.
ज्या कर्माचेनि कैवाडें । यश श्री उदंड जोडे ।
तें तें कर्म वाढवी पुढें । हें रजोगुणें घडे आचरण ॥ २३ ॥
तें तें कर्म वाढवी पुढें । हें रजोगुणें घडे आचरण ॥ २३ ॥
ज्या कर्माच्या योगाने प्रत्यक्ष यश व अलोट संपत्ति मिळेल तें तें कर्म तो पुढे वाढवीतच असतो. रजोगुणाने असे आचरण घडतें २३.
मी एक पवित्र त्रिजगतीं । माझीच उत्तम कर्मस्थिती ।
प्रवृत्ति मान्यता आसक्ती । जे जाणावी स्थिती राजस ॥ २४ ॥
प्रवृत्ति मान्यता आसक्ती । जे जाणावी स्थिती राजस ॥ २४ ॥
त्रिभुवनामध्ये मीच काय तो एकटा पवित्र, माझेच कर्माचरण श्रेष्ठ, अशा प्रकारची प्रवृत्ति, मान्यता आणि आसक्ति असणे, तीच राजस स्थिति समजावी २४.
रजाचें बळ उद्भट । कर्म आदरी अचाट ।
वाढवी कर्मकचाट । तो जाण श्रेष्ठ राजस ॥ २५ ॥
वाढवी कर्मकचाट । तो जाण श्रेष्ठ राजस ॥ २५ ॥
रजाचे बळ मोठे विलक्षण असते. त्यामुळे रजोगुणी मनुष्य अचाट काम अंगिकारतो, आणि उद्योगाचा पसारा वाढवितो. तो श्रेष्ठ राजस गुण समजावा २५.
बाहेर दिसे सात्त्विकस्थिती । अंतरीं कर्मवासना द्रव्यासक्ती ।
ज्यासी प्रिय आवडे चित्तीं । तो जाण निश्चितीं राजसू ॥ २६ ॥
ज्यासी प्रिय आवडे चित्तीं । तो जाण निश्चितीं राजसू ॥ २६ ॥
बाहेरून पाहिले तर ज्याची वृत्ति सात्त्विक दिसते, परंतु अंत:करणांत कर्माची वासना आणि द्रव्यलोभ ही असतात आणि ज्याच्या मनात स्त्रीचीच आवड असते, तो खरोखर राजस होय २६.
जेव्हां सत्त्व रज दोनी गुण । जिणोनि तम वाढे पूर्ण ।
ते काळींचें पुरुषलक्षण । स्वयें नारायण सांगता ॥ २७ ॥
ते काळींचें पुरुषलक्षण । स्वयें नारायण सांगता ॥ २७ ॥
आतां सत्त्व आणि रज हे दोन्ही गुण जिंकून तमोगुणच जेव्हां पूर्णपणे वाढतो, त्या वेळची त्या पुरुषाची लक्षणे स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत २७.
यदा जयेद्रजः सत्त्वं तमो मूढं लयं जडम् ।
युज्येत शोकमोहाभ्यां निद्रया हिंसयाऽऽशया ॥ १५ ॥
युज्येत शोकमोहाभ्यां निद्रया हिंसयाऽऽशया ॥ १५ ॥
[श्लोक १५] अज्ञान हे तमोगुणाचे स्वरूप आहे. आळस आणि बुद्धीची मूढता हे त्याचे स्वभाव हाेेत जेव्हा तो वाढून सत्त्वगुण आणि रजोगुणाला मागे टाकतो, तेव्हा माणूस आकांक्षा शोक, मोह, हिंसा, निद्रा, आळस यांना वश होतो. (१५)
रज सत्त्व करूनि गूढ । जैं तमोगुण होय रूढ ।
तैं तो पुरुषातें सदृढ । करी जडमूढ अतिस्तब्ध ॥ २८ ॥
तैं तो पुरुषातें सदृढ । करी जडमूढ अतिस्तब्ध ॥ २८ ॥
सत्त्व आणि रज यांचा लोप करून तमोगुण जेव्हा प्रबळ होतो, तेव्हां तो त्या पुरुषाला पक्का जड, मूढ व अत्यंत स्तब्ध करून सोडतो २८.
विश्वासूनि वाडेंकोडें । जैं परद्रव्य बुडवणें पडे ।
कां परदारागमन घडे । तैं तेणें वाढे तमोगुण ॥ २९ ॥
कां परदारागमन घडे । तैं तेणें वाढे तमोगुण ॥ २९ ॥
मोठ्या मानभावीपणाने विश्वास दाखवून जेव्हां परद्रव्य बुडविण्याचे कार्य घडते, किंवा परस्त्रीगमन घडते, तेव्हां त्या योगाने तमोगुण वाढला असे समजावें २९.
स्वमुखें परापवाद बोलणें । स्वयें साधुनिंदा करणें ।
संतसज्जनां द्वेषणें । तैं तमाचें ठाणें अनिवार ॥ २३० ॥
संतसज्जनां द्वेषणें । तैं तमाचें ठाणें अनिवार ॥ २३० ॥
स्वमुखाने दुसऱ्याचे दोष उच्चारणे, स्वतः साधूची निंदा करणे, संतसज्जनांचा द्वेष करणे, ही लक्षणे जेथे दिसतील तेथें तमोगुणाचे ठाणे अनिवार्य होऊन बसलेंच असे समजावें २३०.
धुईचेनि आलेपणें । पडे सूर्यासी झांकणे ।
तेवीं विवेकाचें जिणें । तमोगुणें ग्रासिजे ॥ ३१ ॥
तेवीं विवेकाचें जिणें । तमोगुणें ग्रासिजे ॥ ३१ ॥
धुकें आलें म्हणजे त्याच्या योगाने सूर्यावर झाकण पडते, त्याप्रमाणे विवेकाच्या अस्तित्वालाही तमोगुण झांकून टाकतो ३१.
सत्त्वगुण प्रकाशक । रज प्रवृत्तिप्रवर्तक ।
दोनींतें गिळूनि देख । तमाचें आधिक्य अधर्में वाढे ॥ ३२ ॥
दोनींतें गिळूनि देख । तमाचें आधिक्य अधर्में वाढे ॥ ३२ ॥
सत्त्वगुण हा प्रकाश देणारा आहे, रजोगुण प्रवृत्ति वाढविणारा आहे, आणि ह्या दोघांना गिळून तमोगुणाची वाढ अधर्माच्या योगाने वाढतच आहे पहा! ३२.
करितां पूज्याचें हेळण । साधूचे देखतां दोषगुण ।
तेणें खवळला तमोगुण । त्याचें स्वरूप पूर्ण तें ऐक ॥ ३३ ॥
तेणें खवळला तमोगुण । त्याचें स्वरूप पूर्ण तें ऐक ॥ ३३ ॥
श्रेष्ठांचा अपमान केला असता किंवा साधूचे गुणदोष पाहूं लागले असता तेणेकरून जो तमोगुण खवळतो, त्याचे सारे स्वरूप ऐक ३३.
तमोगुण वाढल्या प्रौढ । स्फूर्तिमात्र होय मूढ ।
लयो उपजवोनि दृढ । करी जड जीवातें ॥ ३४ ॥
लयो उपजवोनि दृढ । करी जड जीवातें ॥ ३४ ॥
तमोगुण भरपूर वाढला म्हणजे स्फूर्ति मंद होते आणि तो तमोगुण बुद्धिनाश उत्पन्न करून जिवाला जड करून सोडतो ३४.
कार्याकार्यविवेकज्ञान । ते स्फूर्ति अंध होय पूर्ण ।
या नांव गा मूढपण । ऐक चिन्ह लयाचें ॥ ३५ ॥
या नांव गा मूढपण । ऐक चिन्ह लयाचें ॥ ३५ ॥
कार्य कोणते व अकार्य कोणते या विचाराचे जे ज्ञान, त्याची स्फूर्ति पूर्णपणे आंधळी होऊन जाते. ह्याचे नांव मूढपणा. आतां लयाचे लक्षण ऐक ३५.
जागृतीमाजीं असतां चित्त । अर्थ स्वार्थ परमार्थ ।
कांहीं स्फुरेना कृत्याकृत्य । लयो निश्चित या नांव ॥ ३६ ॥
कांहीं स्फुरेना कृत्याकृत्य । लयो निश्चित या नांव ॥ ३६ ॥
चित्त जागृतींत असूनही अर्थ, स्वार्थ, परमार्थ, किंवा कृत्याकृत्य काही एक स्फुरत नाही, ह्याचेच नांव खरोखर लय ३६.
समस्ताही इंद्रियवृत्ती । अनुद्यमें स्तब्धगती ।
निःशेष लोपे ज्ञानशक्ती । जडत्वप्राप्ती या नांव ॥ ३७ ॥
निःशेष लोपे ज्ञानशक्ती । जडत्वप्राप्ती या नांव ॥ ३७ ॥
सर्व इंद्रियांचे व्यापार उद्योग न केल्यामुळे खुंटून जातात, आणि ज्ञानशक्ति पूर्णपणे लोपून जाते, ह्याचें नांव जडत्वप्राप्ति ३७.
मूढत्वें पावे शोक दुःख । जडत्वें मिथ्या मोह देख ।
मोहास्तव होय पातक । अतिअविवेक अधर्मीं ॥ ३८ ॥
मोहास्तव होय पातक । अतिअविवेक अधर्मीं ॥ ३८ ॥
मूढत्वाच्या योगानें शोक व दुःख प्राप्त होते. जडत्वाने मिथ्या मोह उत्पन्न होतो. आणि मोहामुळे अधर्मामध्ये अत्यंत अविचारीपणा होऊन पाप घडते ३८.
ऐक लयाचें कौतुक । अहोरात्र निद्रा अधिक ।
निद्रेवेगळें ब्रह्मसुख । नावडे देख तामसा ॥ ३९ ॥
निद्रेवेगळें ब्रह्मसुख । नावडे देख तामसा ॥ ३९ ॥
आता लयाचा चमत्कार ऐक. अहोरात्र अतिशय निद्रा येते. तामसाला निद्रेशिवाय दुसरे ब्रह्मानंदाचे सुखही आवडत नाही ३९.
पूर्ण वाढल्या तमोगुण । ऐसें होय पुरुषलक्षण ।
वाढल्या सत्त्वादि गुण । फळ कोण तें हरि सांगे ॥ २४० ॥
वाढल्या सत्त्वादि गुण । फळ कोण तें हरि सांगे ॥ २४० ॥
तमोगुण पूर्ण वाढला असतां पुरुषाची अशी स्थिति होते. आतां सत्त्वादि गुण वाढले म्हणजे कोणते फळ प्राप्त होतें तें श्रीकृष्ण सांगतो २४०.
यदा चित्तं प्रसीदेत इन्द्रियाणां च निर्वृतिः ।
देहेऽभयं मनोऽसङ्गं तत्सत्त्वं विद्धि मत्पदम् ॥ १६ ॥
देहेऽभयं मनोऽसङ्गं तत्सत्त्वं विद्धि मत्पदम् ॥ १६ ॥
[श्लोक १६] जेव्हा चित्त प्रसन्न असते, इंद्रिये शांत असतात, देह निर्भय असतो आणि मनामध्ये आसक्ती नसते, तेव्हा सत्त्वगुण वाढलेला आहे असे समजावे माझ्या प्राप्तीचे सत्त्वगुण हे साधन आहे. (१६)
वाढलिया सत्त्वगुण । चित्त सदा सुप्रसन्न ।
कामक्रोधलोभाचें स्फुरण । सर्वथा जाण स्फुरेना ॥ ४१ ॥
कामक्रोधलोभाचें स्फुरण । सर्वथा जाण स्फुरेना ॥ ४१ ॥
सत्त्वगुण वाढला असतां चित्त सदासर्वकाल सुप्रसन्न असते; आणि काम, क्रोध व लोभ यांचे स्फुरण मुळीच स्फुरत नाही ४१.
जें चित्त वणवणी विषयांलागीं । तें उदास होय विषयभोगीं ।
विषय आदळतांही अंगीं । तैं विषयसंगीं विगुंतेना ॥ ४२ ॥
विषय आदळतांही अंगीं । तैं विषयसंगीं विगुंतेना ॥ ४२ ॥
विषयासाठींच जें चित्त वणवण करीत असावयाचे, तेच विषयोपभोगांत उदास होते. विषय जरी आंगावर आदळले, तरी तो विषयसंगामध्ये गुंतत नाही ४२.
जेवीं जळामाजीं जळस्थ । पद्मिणीपत्र जळीं अलिप्त ।
तेवीं विषयांमाजीं चित्त । विषयातीत मद्बोधें ॥ ४३ ॥
तेवीं विषयांमाजीं चित्त । विषयातीत मद्बोधें ॥ ४३ ॥
ज्याप्रमाणे पाण्यामध्ये पाण्यांतच राहाणाऱ्या कमळिणीचे पान पाण्यापासून अलिप्त असते, त्याप्रमाणे माझ्या ज्ञानामुळे चित्तही विषयांत असून त्या विषयांपासून अलिप्त असते ४३.
सदा मरणभय देहासी । तें मरणाआलिया देहापाशीं ।
भय नुपजे सात्त्विकासी । भावें मत्पदासी विनटले ॥ ४४ ॥
भय नुपजे सात्त्विकासी । भावें मत्पदासी विनटले ॥ ४४ ॥
देहाला मरणाचे भय हे नेहमीचेच आहे. ते मरण देहाजवळ येऊन ठेपलें तरी सात्त्विकाच्या मनात भय उत्पन्न होत नाही. कारण असे सात्त्विक लोक माझ्या पायांशी भक्तिपूर्वक रंगलेले असतात ४४.
जंववरी भासे मीतूंपण । तंववरी अवश्य बाधी मरण ।
सात्त्विक मत्पदीं अभिन्न । यालागीं मरणभय त्या नाहीं ॥ ४५ ॥
सात्त्विक मत्पदीं अभिन्न । यालागीं मरणभय त्या नाहीं ॥ ४५ ॥
जोपर्यंत ' मी तू ' पणा भासतो, तोपर्यंत मरण अवश्य बाधक होते. पण सात्त्विक भक्त माझ्या अधिकाराहून निराळा नसतो, म्हणून त्याला मरणाचे भय नाही ४५.
सात्त्विक मत्पदीं अनन्य शरण । यालागीं बाधीना जन्ममरण ।
या स्थितीं वर्तवी सत्त्वगुण । आतां ऐक लक्षण रजाचें ॥ ४६ ॥
या स्थितीं वर्तवी सत्त्वगुण । आतां ऐक लक्षण रजाचें ॥ ४६ ॥
सात्विक असतो तो माझ्या चरणी अनन्यभावानें शरण आलेला असतो. म्हणून त्याला जन्ममरण बाधक होत नाही. सत्त्वगुण माणसाला अशा रीतीने वागवीत असतो. आतां रजाचे लक्षण ऐक ४६.
विकुर्वन् क्रियया चाधीरनिर्वृत्तिश्च चेतसाम् ।
गात्रास्वास्थ्यं मनो भ्रांतं रज एतैर्निशामय ॥ १७ ॥
गात्रास्वास्थ्यं मनो भ्रांतं रज एतैर्निशामय ॥ १७ ॥
[श्लोक १७] जेव्हा कर्म करीत असताना जीवाची बुद्धी चंचल, ज्ञानेंद्रिये असंतुष्ट, कम]द्रिये अस्वस्थ आणि मन भ्रांत होते, तेव्हा रजोगुणाचा जोर वाढला आहे, असे समजावे. (१७)
खवळलिया रजोगुण । विषयचिंता अतिदारुण ।
कर्मेंद्रियीं क्रियाभरण । नाना परींचें जाण उपपादी ॥ ४७ ॥
कर्मेंद्रियीं क्रियाभरण । नाना परींचें जाण उपपादी ॥ ४७ ॥
रजोगुण खवळला असता अत्यंत भयंकर अशी विषयाची चिंता उत्पन्न होते. त्यामुळे कर्मेंद्रियांनी नाना प्रकारचे थाटमाट आरंभितो ४७.
शरीर असतांही स्वस्थ । मन चिंतातुर अतिभ्रांत ।
वाढवितां विषयस्वार्थ । दुःखी होत सर्वदा ॥ ४८ ॥
वाढवितां विषयस्वार्थ । दुःखी होत सर्वदा ॥ ४८ ॥
शरीर स्वस्थ असले तरीसुद्धा मन चिंतातुर आणि अत्यंत भ्रांत असते. आणि विषयांचा स्वार्थ वाढवून नेहमी दुःखी होते ४८.
असतां पुत्रवित्तसंपत्ती । अधिक स्वार्थ वाढवी चित्तीं ।
राजसाची चित्तवृत्ती । न मनी निवृत्ती क्षणार्ध ॥ ४९ ॥
राजसाची चित्तवृत्ती । न मनी निवृत्ती क्षणार्ध ॥ ४९ ॥
मुलेबाळे, धन, संपत्ति वगैरे असताही तो रजोगुण मनामध्ये अधिक स्वार्थ वाढवितो. राजसाची चित्तवृत्ति अर्धक्षण देखील निवृत्ति मानीत नाही ४९.
नसतां विकाराचें कारण । चित्तीं विकार चिंती आपण ।
हेंचि राजसाचें लक्षण । मुख्यत्वें जाण उद्धवा ॥ २५० ॥
हेंचि राजसाचें लक्षण । मुख्यत्वें जाण उद्धवा ॥ २५० ॥
उद्धवा ! विकाराचे कारण नसतां आपणच मनामध्ये विकाराचे चिंतन करतों, हेच राजसाचे मुख्यत्वेकरून लक्षण होय २५०.
रात्री नोहे पैं प्रबळ । ना दिवस नव्हे सोज्ज्वळ ।
जैसी झांबवली सांजवेळ तैसा केवळ रजोगुण ॥ ५१ ॥
जैसी झांबवली सांजवेळ तैसा केवळ रजोगुण ॥ ५१ ॥
गाढ अंधाराची रात्रही नव्हे, किंवा चांगला स्वच्छ प्रकाशयुक्त दिवसही नव्हे, अशा या दोहोंच्या मधली जशी अंधुक संध्याकाळ असते, त्याप्रमाणेच हुबेहुब रजोगुण होय ५१.
सत्त्वरजांची उणखूण । तुज दाविली ओळखण ।
आतां ऐक तमोगुण । जड लक्षण तयाचें ॥ ५२ ॥
आतां ऐक तमोगुण । जड लक्षण तयाचें ॥ ५२ ॥
सत्त्व आणि रज यांच्या लक्षणांची ओळख मी तुला सांगितली. आतां तमोगुण ऐक. त्याचे लक्षण जडत्व हे आहे ५२.
सीदच्चित्तं विलीयेत चेतसो ग्रहणेऽक्षमम् ।
मनो नष्टं तमो ग्लानिस्तमस्तदुपधारय ॥ १८ ॥
मनो नष्टं तमो ग्लानिस्तमस्तदुपधारय ॥ १८ ॥
[श्लोक १८] चित्त जेव्हा ज्ञानेंद्रियांच्या द्वारा शब्द इत्यादी विषय योग्य रीतीने समजण्यास असमर्थ ठरेल आणि खिन्न होऊन निराश होईल, मन सुन्न होईल, तसेच अज्ञान आणि खेद यांची वाढ होईल, तेव्हा तमोगुण वाढला आहे, असे समजावे. (१८)
चित्तीं चिंता अतिगहन । ते महामोहीं होय निमग्न ।
कोणेही अर्थींचें ज्ञान । हृदयीं जाण स्फुरेना ॥ ५३ ॥
कोणेही अर्थींचें ज्ञान । हृदयीं जाण स्फुरेना ॥ ५३ ॥
चित्तामध्ये अत्यंत गहन चिंता उत्पन्न होऊन त्या चिंतेच्या दुर्धर मोहामध्ये चित्त गढून जाते, आणि कोणत्याही तऱ्हेचे ज्ञान त्याच्या हृदयामध्ये स्फुरत नाही ५३.
सुषुप्तीवेगळें अज्ञान । सदा पळे देखोनि ज्ञान ।
तेथ नवल कैसें झालें जाण । त्या ज्ञानातें अज्ञान गिळूनि ठाके ॥ ५४ ॥
तेथ नवल कैसें झालें जाण । त्या ज्ञानातें अज्ञान गिळूनि ठाके ॥ ५४ ॥
गाढ झोपेशिवाय अज्ञान म्हणून जेवढे असते, तेवढे सर्व ज्ञानाला पाहून पळत सुटते, पण त्यांत एक चमत्कार कसा होतो तो पहा ! तो हा की, ते अज्ञान त्या ज्ञानाला गिळून टाकतें ५४.
जागाचि परी निजेला दिसे । कर्म करी स्फुरण नसे ।
जेवीं कां आभाळांतिले अंवसे । रात्रीं चाले जैसें आंधळें ॥ ५५ ॥
जेवीं कां आभाळांतिले अंवसे । रात्रीं चाले जैसें आंधळें ॥ ५५ ॥
तामस मनुष्य जागा असला तरी निजल्यासारखा दिसतो. ज्याप्रमाणे एखादा आंधळा अमावास्येच्या रात्री आकाश ढगांनी व्यापलें असतां कसातरी अडखळत चालत असतो. त्याप्रमाणे तो कर्में करतो, पण योग्य स्फुरण होत नाही ५५.
सकळ शरीराचा गोळा । होय आळसाचा मोदळा ।
हा तमोग्लानीचा सोहळा । पडळ ये डोळां चित्तवृत्ती ॥ ५६ ॥
हा तमोग्लानीचा सोहळा । पडळ ये डोळां चित्तवृत्ती ॥ ५६ ॥
सर्व शरीराचा गोळा म्हणजे आळसाची केवळ गठडीच बनून राहतो. तमोगुणाच्या ग्लानीची लीला अशी असते. तिच्यामुळे चित्तवृत्तीच्या डोळ्यांवर पडदा येतो ५६.
संकल्प विकल्पांची ख्याती । उपजवी सदा मनोवृत्ती ।
त्या मनाची जड होय स्थिती । संकल्पस्फूर्ती स्फुरेना ॥ ५७ ॥
त्या मनाची जड होय स्थिती । संकल्पस्फूर्ती स्फुरेना ॥ ५७ ॥
मनोवृत्ति सदासर्वदा संकल्पांची आणि विकल्पांची मोठमोठी कल्पना उत्पन्न करीत असावयाची, पण तमोगुणामुळे त्या मनाची स्थिति जड होते व संकल्पाची स्फूर्तीही उत्पन्न होत नाही ५७.
आणिकही नवलस्थिती । चित्तासी नाठवे चित्तस्फूर्ती ।
एवढी वाढे तमाची ख्याती । मनोवृत्तिविनाशक ॥ ५८ ॥
एवढी वाढे तमाची ख्याती । मनोवृत्तिविनाशक ॥ ५८ ॥
त्यांत आणखीही एक चमत्कार आहे. तो हा की, चित्ताला आपली चित्तस्फूर्तीच आठवत नाही. एवढी मनोवृत्तीलाही लयास नेणारी अशी तमोवृत्तीची वाढ होते ५८.
यापरी तमाचें बळ होय । तैं मनातें अज्ञान खाय ।
ते काळीं मन नष्टप्राय । मूर्च्छित राहे मूढत्वें ॥ ५९ ॥
ते काळीं मन नष्टप्राय । मूर्च्छित राहे मूढत्वें ॥ ५९ ॥
अशा प्रकारे तमाचे बल वाढले, म्हणजे त्या वेळी अज्ञानच मनाला खाऊन टाकते. त्या वेळी मन केवळ नष्टप्राय होऊन मूढपणाने मूर्च्छित होऊन राहतें ५९.
मन निःशेष जैं नासतें । तैं महादुःख कोण भोगितें ।
यालागीं तमाचेनि ऐक्यमतें । मन उरे तेथें जडमूढ ॥ २६० ॥
यालागीं तमाचेनि ऐक्यमतें । मन उरे तेथें जडमूढ ॥ २६० ॥
मन जर निखालस नाहींसेंच झाले असते, तर महादुःख कोणी भोगलें असतें ? म्हणून तमाशींच एकरूप होऊन मन जडमूढरूपाने तेथें शिल्लक उरतें २६०.
यापरी जे वर्तती गती । तेचि अत्यंत दुःखदाती ।
या नांव गा तमाची स्थिती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ६१ ॥
या नांव गा तमाची स्थिती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ६१ ॥
उद्धवा ! अशा रीतीने जी वागणूक होते, तीच अत्यंत दुःखदायक असते. यालाच खरोखर तमाची स्थिति असें नांव आहे असे समज ६१.
वाढवितां गुणवृत्ती । कोणे गुणें कोण वाढती ।
येचि अर्थींची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ६२ ॥
येचि अर्थींची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ६२ ॥
गुणांच्या वृत्ति वाढवीत असतां कोणत्या गुणाने कोणत्या वृत्ति वाढतात, याच अर्थाचे सर्व निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगत आहे ६२.
एधमाने गुणे सत्त्वे देवानां बलमेधते ।
असुराणां च रजसि तमस्युद्धव रक्षसाम् ॥ १९ ॥
असुराणां च रजसि तमस्युद्धव रक्षसाम् ॥ १९ ॥
[ श्लोक १९] उद्धवा ! सत्त्वगुण वाढल्यावर देवतांचे, रजोगुण वाढल्यावर असुरांचे आणि तमोगुण वाढल्यावर राक्षसांचे बळ वाढते. (वृत्तींमध्ये सुद्धा अनुक्रमे सत्त्व इत्यादी गुण वाढल्यावर देवत्व, असुरत्व आणि राक्षसत्वप्रधान, निवृत्ती, प्रवृत्ती किंवा मोह यांचे प्राबल्य दिसून येते). (१९)
दैवी आसुरी राक्षसी स्थिती । हे त्रिगुण गुणांची संपत्ती ।
जे जे ब्रह्मांडीं इंद्रियवृत्ती । तेचि स्थिती पिंडींही ॥ ६३ ॥
जे जे ब्रह्मांडीं इंद्रियवृत्ती । तेचि स्थिती पिंडींही ॥ ६३ ॥
दैवी, आसुरी आणि राक्षसी स्थिति हीच तीन प्रकारच्या गुणांची संपत्ति आहे. जी जी इंद्रियांची वृत्ति ब्रह्मांडांत असते. तीच स्थिति पिंड (देहां )तही असते ६३.
ब्रह्मांडीं सकळ देव । महापुरुषाचे अवयव ।
पिंडींही तेचि स्वयमेव । वर्तती सर्व निजऐक्यें ॥ ६४ ॥
पिंडींही तेचि स्वयमेव । वर्तती सर्व निजऐक्यें ॥ ६४ ॥
ब्रह्मांडामध्ये सर्व देव हे महापुरुषाचे अवयव आहेत. पिंडामध्येही तेच स्वतः सर्वजण परस्परांत एकोप्याने वागत असतात ६४.
उचित स्वधर्मशास्त्रस्थिती । निवृत्तिकर्मीं जे प्रवृत्ती ।
ऐशी जेथ इंद्रियवृत्ती । ते दैवी संपत्ती सत्त्वस्थ ॥ ६५ ॥
ऐशी जेथ इंद्रियवृत्ती । ते दैवी संपत्ती सत्त्वस्थ ॥ ६५ ॥
स्वधर्मशास्त्राप्रमाणे उचित अशी निष्कर्माकडेच जी प्रवृत्ति असते, अशी इंद्रियप्रवृत्ति जेथे असेल, तोच दैवी किंवा सत्त्वस्थ संपत्ति होय ६५.
कामाभिलाष दृढ चित्तीं । आणि स्वधर्मीं तरी वर्तती ।
ऐशी जे इंद्रियस्थिती । जे आसुरी संपत्ती राजसी ॥ ६६ ॥
ऐशी जे इंद्रियस्थिती । जे आसुरी संपत्ती राजसी ॥ ६६ ॥
मनामध्ये उतर कामासक्ति आणि स्वधर्माप्रमाणे तर वागावयाचे, अशी जी इंद्रियप्रवृत्ति असते, ती राजस अशी आसुरी संपत्ति होय ६६.
सलोभमोहें क्रोध चित्तीं । सदा अधर्मीं प्रवृत्ती ।
ऐशी जे इंद्रियस्तिथी । ते राक्षसी संपत्ती तामसी ॥ ६७ ॥
ऐशी जे इंद्रियस्तिथी । ते राक्षसी संपत्ती तामसी ॥ ६७ ॥
लोभ आणि मोह ह्यांना वश झाल्यामुळे मनांत क्रोध असणे, आणि अधर्माकडेच प्रवृत्ति असणे, अशी जी इंद्रियांची स्थिति असेल, ती तामसी अशी राक्षसी संपत्ति होय ६७.
क्षणें सकाम क्षणें निष्काम । ऐसा जेथ वाढे स्वधर्म ।
तेथ देवां असुरां परम । होय संग्राम वृत्तीसी ॥ ६८ ॥
तेथ देवां असुरां परम । होय संग्राम वृत्तीसी ॥ ६८ ॥
क्षणांत कामासक्ति, क्षणांत निरिच्छपणा, असा स्वधर्म जेथे वाढतो, तेथें दैवी व आसुरी वृत्तींचा दांडगा संग्राम माजतो ६८.
चित्तीं वाढवूनि मोहभ्रम । अधर्मचि मानी स्वधर्म ।
तैं राक्षसाचा पराक्रम । देवासुरां परम निर्दाळी ॥ ६९ ॥
तैं राक्षसाचा पराक्रम । देवासुरां परम निर्दाळी ॥ ६९ ॥
चित्तामध्ये मोह व भ्रम वाढवून अधर्मालाच स्वधर्म मानतो, तेव्हा ती राक्षसी वृत्ति समजावी. ती दैवी व आसुरी ह्या वृत्तींचा नाश करिते ६९.
सकामनिष्काममोहभ्रमेंसी । वृत्ती वर्ते गा जयापाशीं ।
तेथ देवांअसुरांराक्षसांसीं । कलहो अहर्निशीं अनिवार ॥ २७० ॥
तेथ देवांअसुरांराक्षसांसीं । कलहो अहर्निशीं अनिवार ॥ २७० ॥
सकाम-निष्कामांच्या मोहभ्रमांशी संयुक्त होऊन ज्याच्यापाशी वृत्ति वागत असते, तेथें देव, असुर आणि राक्षस ह्यांच्यामध्ये रात्रंदिवस भयंकर झगडा माजतो २७०.
क्षणैक रति परमार्थीं । क्षणैक रति अर्थस्वार्थीं ।
क्षणैक होय अनर्थीं । परदारारती परद्रव्यें ॥ ७१ ॥
क्षणैक होय अनर्थीं । परदारारती परद्रव्यें ॥ ७१ ॥
क्षणभर परमार्थात गोडी, क्षणभर द्रव्यलोभांत गोडी, क्षणभर अनर्थापात करण्यांत गोडी, क्षणांत परद्रव्य व परदारा ह्यांतच गोडी ७१,
ऐशिये गा चित्तवृत्तीं । कदा नुपजे निजशांती ।
मा परमार्थाची प्राप्ती । कैशा रीती होईल ॥ ७२ ॥
मा परमार्थाची प्राप्ती । कैशा रीती होईल ॥ ७२ ॥
अशा चित्तवृत्तीमध्ये खरी शांति कधीच प्राप्त व्हावयाची नाही. मग परमार्थांची प्राप्ति कोणत्या रीतीने होणार? ७२.
साधक सर्वदा पुसती । कोण बाधा असे चित्तवृत्ती ।
ते बाधकत्वाची स्थिती । विशद तुजप्रती सांगीतली ॥ ७३ ॥
ते बाधकत्वाची स्थिती । विशद तुजप्रती सांगीतली ॥ ७३ ॥
साधक लोक नेहमी विचारीत असतात की, चित्तवृत्तीमध्ये कोणती पीडा असते ? त्याच पीडेची स्थिति तुला स्पष्ट करून सांगितली ७३.
एकचि गुण जैं पुरता जोडे । तैं एकविध वृत्ती वाढे ।
हें तंव सर्वथा न घडे । गुण गुणासी भिडे उपमर्दें ॥ ७४ ॥
हें तंव सर्वथा न घडे । गुण गुणासी भिडे उपमर्दें ॥ ७४ ॥
एकच गुण जर पूर्णपणे जडून राहिला, तर एकाच प्रकारची वृत्ति वाढावी, पण तसे मुळीच घडत नाही. गुण हे इतर गुणांचा उपमर्द करूनच झगडत असतात ७४.
एकचि न जोडे गुणावस्था । यालागीं नव्हे एकविधता ।
तेणें अनिवार भवव्यथा । बाधी भूतां गुणक्षोभें ॥ ७५ ॥
तेणें अनिवार भवव्यथा । बाधी भूतां गुणक्षोभें ॥ ७५ ॥
एकच गुणावस्था प्राप्त होत नाही म्हणून एकविधता होत नाही. आणि त्यामुळे अनिवार भवपीडा गुणक्षोभाने बाधत असते ७५.
तम अधर्माकडे वाढे । रजोगुण देहकर्माकडे ।
सत्त्वगुणासी वाढी न घडे । मुक्तता जोडे कैसेनी ॥ ७६ ॥
सत्त्वगुणासी वाढी न घडे । मुक्तता जोडे कैसेनी ॥ ७६ ॥
तमोगुण अधर्माकडे वाढत असतो, रजोगुण देहकर्माकडे लागतो, आणि सत्त्वगुणाची वाढच होत नाही. तेव्हां जीवाची मुक्तता व्हावी कशी? ७६.
रजतमौभयसंधीं । सत्त्व अडकलें दोहींमधीं ।
तें वाढों न शके त्रिशुद्धीं । नैराश्यें वृद्धी सत्त्वगुणा ॥ ७७ ॥
तें वाढों न शके त्रिशुद्धीं । नैराश्यें वृद्धी सत्त्वगुणा ॥ ७७ ॥
रज आणि तम ह्या दोहोंच्या कचाटींत सत्त्व हे दोघांच्यामध्ये अडकलेले असते. ते खरोखर वाढूच शकत नाही. त्या सत्त्वगुणाची वाढ फक्त आशा समूळ खणून टाकल्याने होते ७७.
त्रिगुण गुणांची त्रिपुटी । आपण कल्पी आपल्या पोटीं ।
तेंचि भवभय होऊनियां उठी । लागे पाठीं बाधकत्वें ॥ ७८ ॥
तेंचि भवभय होऊनियां उठी । लागे पाठीं बाधकत्वें ॥ ७८ ॥
तीन गुणांची त्रिपुटी आपणच आपल्या अंत:करणांत कल्पनेने उभी केलेली असते, आणि अखेर तीच संसारभयाच्या रूपाने उठून बाधकत्वाने पाठीस लागते ७८.
सत्त्वें देवांसी प्रबळ बळ । रजोगुणें दैत्य प्रबळ ।
तमोगुणें केवळ । आतुर्बळ राक्षसां ॥ ७९ ॥
तमोगुणें केवळ । आतुर्बळ राक्षसां ॥ ७९ ॥
सत्त्वाच्या योगाने देवांना अत्यंत बळ चढते, रजोगुणाने दैत्य प्रबळ होतात, तमोगुणाने केवळ राक्षसांनाच जोर चढतो ७९.
हे गुणवृत्तींची व्यवस्था । समूळ सांगीतली कथा ।
आतां त्रिगुणांच्या तीन अवस्था । ऐक तत्त्वतां सांगेन ॥ २८० ॥
आतां त्रिगुणांच्या तीन अवस्था । ऐक तत्त्वतां सांगेन ॥ २८० ॥
ही गुणांच्या वृत्तींची व्यवस्था कशी असते, त्याची कथा तुला सविस्तर सांगितली. आतां तीन अवस्था आहेत त्याही स्पष्टपणाने सांगेन २८०.
सत्त्वाज्जागरणं विद्याद्रजसा स्वप्नमादिशेत् ।
प्रस्वापं तमसा जन्तोस्तुरीयं त्रिषु संततम् ॥ २० ॥
प्रस्वापं तमसा जन्तोस्तुरीयं त्रिषु संततम् ॥ २० ॥
[श्लोक २०] सत्त्वगुणामुळे जागृती, रजोगुणामुळे स्वप्न आणि तमोगुणामुळे सुषुप्ती असते, असे समजावे तुरीय अवस्था आत्मरूप असल्याने या तिहींमध्ये साक्षित्वाने एकरूप होऊन व्याप्त असते. (२०)
सत्त्वगुणाचिये स्थिति । नातळे स्वप्न आणि सुषुप्ती ।
जीवीं सदा नांदे जे जागृती । इंद्रियप्रवृत्ती सावध ॥ ८१ ॥
जीवीं सदा नांदे जे जागृती । इंद्रियप्रवृत्ती सावध ॥ ८१ ॥
सत्त्वगुण अंगांत असला म्हणजे जीवाला स्वप्न आणि सुषुप्ति ही स्पर्शही करीत नाहीत, आणि जीवामध्ये सदोदित जी जागृति नांदत असते, त्यामुळे इंद्रियप्रवृत्ति सावध असते ८१.
रजोगुणाचेनि आधिक्यें । चित्तवृत्तीतें स्वप्न जिंके ।
जागृति सुषुप्ति दूरी ठाके । बैसला देखे स्वप्नचि ॥ ८२ ॥
जागृति सुषुप्ति दूरी ठाके । बैसला देखे स्वप्नचि ॥ ८२ ॥
रजोगुणाचे प्राबल्य झालें म्हणजे स्वप्नं चित्तवृत्तीला जिंकतें. जागृति आणि सुषुप्ति या लांब जातात आणि तो राजस मनुष्य बसल्या बसल्याच स्वप्न पाहूं लागतो ८२.
तमोगुण वाढल्या वाढी । जागृति स्वप्न दूरी दवडी ।
मग सुशुप्तीची अतिगाढी । आदळे रोकडी जीवाअंगीं ॥ ८३ ॥
मग सुशुप्तीची अतिगाढी । आदळे रोकडी जीवाअंगीं ॥ ८३ ॥
तमोगुण जास्त वाढला म्हणजे तो जागृति आणि स्वप्न ह्या दोहोंनाही दूर घालवितो, आणि मग जीवाच्या अंगावर अत्यंत गाढ अशी निद्रा येऊन आदळते ८३.
त्यासी सभे बैसविल्या पाहे । बोलतां-बोलतां डुलकी जाये ।
जेवितांजेवितांही पाहे । झोंपीं जाये कडकडां ॥ ८४ ॥
जेवितांजेवितांही पाहे । झोंपीं जाये कडकडां ॥ ८४ ॥
त्याला सभेत नेऊन बसविला असतां बोलतांबोलतांच त्याची डुलकी लागते. जेवतांजेवतांसुद्धा पहा ! तो खुशाल कडकडून झोप घेतो ८४.
क्षणां जागृति क्षणां सुषुप्ती । क्षणैक स्वप्नाची प्रतीती ।
हे त्रिगुणांची मिश्रित वृत्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ८५ ॥
हे त्रिगुणांची मिश्रित वृत्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ८५ ॥
उद्धवा ! क्षणामध्ये जागृति, क्षणामध्ये सुषुप्ति म्हणजे निद्रा, क्षणामध्ये स्वप्नाचा अनुभव; ही तीन गुणांची खरोखर मिश्रित वृत्ति होय, हे लक्षात ठेव ८५.
जागृति स्वप्न सुषुप्ती । तिहीं अवस्थांतें प्रकाशिती ।
यालागीं ते चौथी । तुरीय म्हणती सज्ञान ॥ ८६ ॥
यालागीं ते चौथी । तुरीय म्हणती सज्ञान ॥ ८६ ॥
आतां जागृति, स्वप्नं आणि सुषुप्ति, या तिन्ही अवस्थांना प्रकट करणारे जे आत्मतत्त्व, त्या चौथ्या अवस्थेला ज्ञाते लोक तुर्यावस्था असे म्हणतात ८६.
जे जागृतीतें जागवित । जे स्वप्नीं स्वप्नातें नांदवित ।
जे सुषुप्तीतें निजवित । त्यातें तुरीय म्हणत उद्धवा ॥ ८७ ॥
जे सुषुप्तीतें निजवित । त्यातें तुरीय म्हणत उद्धवा ॥ ८७ ॥
उद्धवा ! जी जागृतीला जागविते, जी स्वप्नांमध्ये स्वप्नांला नांदविते, आणि जी निद्रेलाही निजविते, त्या अवस्थेला तुरीय अवस्था असे म्हणतात ८७.
जे तिहीं अवस्थांआंत । असोनि नव्हे अवस्थाभूत ।
जे निर्गुण निजनित्य त्यातेंचि म्हणत तुरीय ॥ ८८ ॥
जे निर्गुण निजनित्य त्यातेंचि म्हणत तुरीय ॥ ८८ ॥
जी तिन्ही अवस्थांमध्ये असूनही त्यांत असल्यासारखी भासत नाही, जी निर्गुण असून नित्य असते, त्या अवस्थेलाच तुरीय असें म्हणतात ८८.
जेवीं पुत्राचेनि जाहलेपणें । पुरुषें पिता नांव पावणें ।
तेवीं तिहीं अवस्थागुणें । तुरीय म्हणणें वस्तूसी ॥ ८९ ॥
तेवीं तिहीं अवस्थागुणें । तुरीय म्हणणें वस्तूसी ॥ ८९ ॥
ज्याप्रमाणे पुत्राच्या जन्मामुळेच पुरुषाला 'पिता' हें नाम प्राप्त होते, त्याप्रमाणे तिन्ही अवस्थांचे गुण तिच्यामध्ये असल्यामुळेच त्या परमात्मवस्तूला तुरीय असे म्हणतात ८९.
वस्तूवरी अवस्था भासे । भासली अवस्था सवेंचि नासे ।
त्या नाशामाजीं वस्तु न नासे । उरे अविनाशें तुरीय ॥ २९० ॥
त्या नाशामाजीं वस्तु न नासे । उरे अविनाशें तुरीय ॥ २९० ॥
परब्रह्मावर ह्या सर्व अवस्था भासतात. आणि अशा रीतीने भासमान झालेली अवस्था लगेच नाहींशीही होते. परंतु त्या भासाच्या नाशामध्ये परब्रह्म काही नाश पावत नाही. तें तुरीय नाश न पावतां शिल्लक राहतें २९०.
तुरीय त्रिकाळीं संतत । यापरी जाणावें एथ ।
आतां गुणवृद्धिभूमिका प्राप्त । तोही वृत्तांत हरि सांगे ॥ ९१ ॥
आतां गुणवृद्धिभूमिका प्राप्त । तोही वृत्तांत हरि सांगे ॥ ९१ ॥
तुरीय ही अवस्था त्रिकाळी सतत असणारी आहे असे येथे समजावे, आतां गुणवृद्धीच्या योगाने जी जी कर्मांची गति प्राप्त होते, त्याचाही वृत्तांत श्रीकृष्ण सांगतात ९१.
उपर्युपरि गच्छन्ति सत्त्वेन ब्राह्मणा जनाः ।
तमसाधोऽध आमुख्याद्रजसान्तरचारिणः ॥ २१ ॥
तमसाधोऽध आमुख्याद्रजसान्तरचारिणः ॥ २१ ॥
[श्लोक २१] वेदाभ्यासामध्ये तत्पर असणारे ब्राह्मण सत्त्वगुणाच्याद्वारे उत्तरोत्तर वरच्या लोकांमध्ये जातात तमोगुणामुळे जीवांना वृक्ष इत्यादींपर्यंतची अधोगती प्राप्त होते आणि रजोगुणामुळे मनुष्यशरीर प्राप्त होते. (२१)
सत्त्वगुणाचें आयतन । मुख्यत्वें ब्राह्मण जन ।
ते न करूनि ब्रह्मार्पण । स्वधर्माचरण जे करिती ॥ ९२ ॥
ते न करूनि ब्रह्मार्पण । स्वधर्माचरण जे करिती ॥ ९२ ॥
ब्राह्मण लोक हेच मुख्यत्वेकरून सत्त्वगुणाचे आश्रयस्थान आहेत. असे जे ब्राह्मण ब्रह्मार्पण न करूनही स्वधर्माचरण करतात ९२.
त्यांसी स्वधर्माच्या कर्मशक्तीं । ऊर्ध्वलोकीं होय गती ।
लोकलोकांतरप्राप्ती । ब्राह्मण पावती ते ऐक ॥ ९३ ॥
लोकलोकांतरप्राप्ती । ब्राह्मण पावती ते ऐक ॥ ९३ ॥
त्यांना स्वधर्माच्या कर्मशक्तीनेच अर्ध्वलोकी जावयास मिळते. आता त्या ब्राह्मणांना निरनिराळे लोक कसे प्राप्त होतात, तोही प्रकार ऐक ९३.
स्वर्गलोक महर्लोक । क्रमूनि पावती जनलोक ।
उल्लंघोनियां तपोलोक । पावती सात्त्विक सत्यलोक पैं ॥ ९४ ॥
उल्लंघोनियां तपोलोक । पावती सात्त्विक सत्यलोक पैं ॥ ९४ ॥
सात्विक ब्राह्मण असतात ते स्वर्गलोक व महलोंक यांचे आक्रमण करून जनलोकाला जातात. आणि पुढे तपोलोकही उल्लंघन करून सत्यलोकाला जातात ९४.
वाढलिया रजोगुण । शूद्रादि चांडाळपण ।
पुढती जन्म पुढती मरण । अविश्रम जाण भोगवी ॥ ९५ ॥
पुढती जन्म पुढती मरण । अविश्रम जाण भोगवी ॥ ९५ ॥
रजोगुण वाढला म्हणजे जीवाला शूद्रादिक चांडाळ जाति प्राप्त होते, आणि पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यु हे सारखे भोगवीतच असतो ९५.
वाढलिया तमोगुण । पश्वादि योनि पावोन ।
दंश मशक वृक्ष पाषाण । योनि संपूर्ण भोगवी ॥ ९६ ॥
दंश मशक वृक्ष पाषाण । योनि संपूर्ण भोगवी ॥ ९६ ॥
तमोगुण वाढला म्हणजे पश्वादि योनीमध्ये जन्म घेउन डांस, माशी, झाडे, दगड इत्यादि सर्व योनी भोगाव्या लागतात ९६.
प्राण्यासी अंतकाळीं जाण । देहांतीं जो वाढे गुण ।
त्या मरणाचें फळ कोण । तेंही श्रीकृष्ण स्वयें सांगे ॥ ९७ ॥
त्या मरणाचें फळ कोण । तेंही श्रीकृष्ण स्वयें सांगे ॥ ९७ ॥
प्राण्याच्या अंतकाळी देहांत जो गुण वाढतो; त्या मरणाचे फळ काय, तेही श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत ९७.
अनन्य करितां माझी भक्ती । भक्तांसी अंतीं कोण गती ।
तेहीविखींची उपपत्ती । श्लोकार्थीं हरि सांगे ॥ ९८ ॥
तेहीविखींची उपपत्ती । श्लोकार्थीं हरि सांगे ॥ ९८ ॥
एकनिष्ठपणे माझी भक्ति केली असता, त्या भक्तांना अखेर कोणती गति प्राप्त होते, त्याविषयींचे वर्णन श्रीकृष्ण लोकार्थाने सांगतात ९८.
सत्त्वे प्रलीनाः स्वर्यान्ति नरलोकं रजोलयाः ।
तमोलयास्तु निरयं यान्ति मामेव निर्गुणाः ॥ २२ ॥
तमोलयास्तु निरयं यान्ति मामेव निर्गुणाः ॥ २२ ॥
[श्लोक २२] सत्त्वगुणांच्या वृद्धीत मृत्यू आला असता स्वर्गाची प्राप्ती होते, रजोगुणाच्या वृद्धीत मृत्यू आलेल्याला मनुष्यलोक मिळतो आणि तमोगुणाची वृद्धी असताना ज्याला मृत्यू येतो, त्याला नरकाची प्राप्ती होते परंतु जे त्रिगुणातीत असतात, त्यांना माझीच प्राप्ती होते. (२२)
संसारीं मुख्यत्वें त्रिगुण । तेथ वाढोनियां सत्त्वगुण ।
ज्यासी प्राप्त होय मरण । तो स्वर्गभोगीं जाण दिव्य देह पावे ॥ ९९ ॥
ज्यासी प्राप्त होय मरण । तो स्वर्गभोगीं जाण दिव्य देह पावे ॥ ९९ ॥
संसारांत तीन गुण मुख्य आहेत. त्यांत ज्याला सत्त्वगुण वाढून मरण प्राप्त होते. तो स्वर्गातील सौख्य भोगण्यासाठी दिव्य देह पावतो ९९.
सत्त्वे निमाल्या सात्त्विक । ते पावती स्वर्गलोक ।
रजोगुणें निमाल्या देख । त्या मनुष्यलोक मानवां ॥ ३०० ॥
रजोगुणें निमाल्या देख । त्या मनुष्यलोक मानवां ॥ ३०० ॥
अशा प्रकारे सात्त्विक पुरुष सत्त्वगुणांच्याच प्राबल्यांत मृत्यु पावल्यास ते स्वर्गलोक पावतात. रजोगुणामध्येच मरण आले असता त्यांना मनुष्यलोक प्राप्त होतो ३००.
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...