मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २५ ओव्या १0१ ते २००
मस्तकीं केश चिकटले होती । ते ज्याचे त्या नुगवती ।
तेवीं त्रिगुणांची गुणगुंती । जीवाहातीं उगवेना ॥ १ ॥
स्त्रियांच्या मस्तकावर केस एकमेकांत मिसळून गेलेले असले, तर ते काही जिचे तिलाच सोडवावयाला येत नाहीत, त्याप्रमाणेच ही त्रिगुणांची गुंतागुंतही जीवाच्या हाताने सुटत नाही १.
मिळोनि सख्या मायबहिणी । हातीं घेऊनि तेल फणी ।
उगविती चिकटल्या केशश्रेणी । तेवीं त्रिगुणांची वेणी जीवासी ॥ २ ॥
उगविती चिकटल्या केशश्रेणी । तेवीं त्रिगुणांची वेणी जीवासी ॥ २ ॥
मैत्रिणी, आई, बहिणी, या एकत्र जमून हातांत तेल व फणी घेऊन त्या चिकटून गुंतलेल्या केसांची गुंतागुंती सोडवितात, त्याप्रमाणेच जीवाला ही त्रिगुणांची वेणी आहे २.
त्रिगुणांची विभागवृत्ती । जीवसामर्थ्यें जरी होती ।
तरी शुद्धसत्त्वी करूनि वस्ती । गुणातीतीं प्रवेशता ॥ ३ ॥
तरी शुद्धसत्त्वी करूनि वस्ती । गुणातीतीं प्रवेशता ॥ ३ ॥
त्रिगुणांचे विभाग जीवाच्याच सामर्थ्याने जर झाले असते, तर तो जीव शुद्ध सत्त्वांत राहून नंतर गुणातीत अवस्थेत शिरला असता ३.
ऐसा निजगुणांचा उगवो । जीवाचेनि नोहे निर्वाहो ।
यालागीं गुरुचरणीं सद्भावो । सभाग्य पहा वो राखिती ॥ ४ ॥
यालागीं गुरुचरणीं सद्भावो । सभाग्य पहा वो राखिती ॥ ४ ॥
असा हा आपल्याच गुणांचा उलगडा जीवाला करता येणे शक्य नाही. म्हणूनच अहो ! असे पहा की, जे भाग्यवान् आहेत ते गुरुचरणांवरच एकनिष्ठ भाव ठेवितात ४.
जे सभाग्य भाग्यवंत जनीं । ज्यांसी सद्गुरु सखी जननी ।
विवेक-वैराग्य घेऊनि फणी । जो त्रिगुणांची वेणी उगवितू ॥ ५ ॥
विवेक-वैराग्य घेऊनि फणी । जो त्रिगुणांची वेणी उगवितू ॥ ५ ॥
जे जगामध्ये भाग्याने भाग्यवान झालेले असतात, ज्यांना सद्गुरु हीच सख्खी आई असते, ते सद्गुरु विवेक वैराग्याची फणी घेऊन त्यांची त्रिगुणांची वेणी सोडवितात ५.
ज्यांची उगविली गुणगुंती । पुढती गुंती पडे मागुती ।
यालागीं ते महामती । मुंडूनि सांडिती संन्यासीं ॥ ६ ॥
यालागीं ते महामती । मुंडूनि सांडिती संन्यासीं ॥ ६ ॥
ज्यांची गुणांची गुंतागुंत एकदा सोडविली गेली, ती तशी पुन्हा पुढे कदाचित होईल, म्हणूनच ते महामति मुळासह गुण मुंडून त्यांना संन्यासी बनवितात ६.
एकाची नवलगती । उद्धट वैराग्याची स्थिती ।
गुंती उगवाया न रिघते । मुळींचि मुंडिती समूळ ॥ ७ ॥
गुंती उगवाया न रिघते । मुळींचि मुंडिती समूळ ॥ ७ ॥
कित्येकांचा आणखी चमत्कार असतो. त्यांच्या वैराग्याची स्थिति फारच कडक असते. ते गुंतागुंत सोडवावयाच्या भरीसच पडत नाहीत. तें मूळासकटच पूर्णपणे मुंडण करतात ७.
विवेकफणीचेनि मेळें । ओढितां वैराग्य बळें ।
जो अशक्त भावबळें । तो मध्येंचि पळे उठूनी ॥ ८ ॥
जो अशक्त भावबळें । तो मध्येंचि पळे उठूनी ॥ ८ ॥
विवेकरूपी फणी वैराग्यबळाने ओढू लागले असतां जे भावबळाने अशक्त असतात, ते मध्येच उठून पळून जातात ८.
अशक्तें पळतां देखोनि दूरी । एकें पळालीं मोहअंधारीं ।
एकें गुंती राखोनि शिरीं । गुंतीमाझारी रिघालीं ॥ ९ ॥
एकें गुंती राखोनि शिरीं । गुंतीमाझारी रिघालीं ॥ ९ ॥
अशा प्रकारचे दुर्बळ असलेले लोक दूर पळून जाताना पाहिले, म्हणजे दुसरे कितीएकजण मोहरूप अंधारांतच धाव घेतात. कोणी केसांची ही गुंतागुंत मस्तकावर तशीच ठेवून त्या गुंतीमध्येच अडकून राहातात ९.
एकें अत्यंत करंटीं । नव्हेचि गुरुमाउलीसी भेटी ।
ऐशीं संसारीं पोरें पोरटीं । गुणदुःखकोटी भोगिती ॥ ११० ॥
ऐशीं संसारीं पोरें पोरटीं । गुणदुःखकोटी भोगिती ॥ ११० ॥
कोणी अगदीच कपाळकरंटे असतात, त्यांना गुरुमाउलीची कधी भेटच होत नाही. अशी संसारामध्ये पोरटी पोरें त्रिगुणांपासून उद्भवणारी कोटीच्या कोटी दुःखें भोगीत असतात ११०.
द्विपरार्धायु विधाता । त्याचेनि नोहे गुणभागता ।
मग इतरांची कोण कथा । गुण तत्त्वतां निवडावया ॥ ११ ॥
मग इतरांची कोण कथा । गुण तत्त्वतां निवडावया ॥ ११ ॥
दोन परार्ध वर्षे आयुष्य असणारा जो ब्रह्मदेव, त्याच्यानेसुद्धा गुणांचे विभाग होत नाहीत. मग गुणांची खरोखर निवड करावयाला इतरांना सामर्थ्य कसे असणार? ११.
ऐशिया ज्या त्रिगुणवृत्ती । मजही निःशेष न निवडती ।
यालागीं ध्वनितप्राय पदोक्ती । देव श्लोकार्थीं बोलिला ॥ १२ ॥
यालागीं ध्वनितप्राय पदोक्ती । देव श्लोकार्थीं बोलिला ॥ १२ ॥
अशा ज्या त्रिगुणांच्या वृत्ति आहेत, त्या मलासुद्धा पूर्णपणे वर्णन करता येत नाहीत, म्हणून तसा ध्वनितार्थ निघण्यासारखे शब्द असलेल्या श्लोकार्थानं देवाने सांगितले १२.
मागिल्या तीं श्लोकार्थीं । सांगीतल्या त्रिगुणस्थिती ।
त्रिगुणांची मिश्रित गती । सन्निपातवृत्ती ते ऐका ॥ १३ ॥
त्रिगुणांची मिश्रित गती । सन्निपातवृत्ती ते ऐका ॥ १३ ॥
मागच्या तीन श्लोकांच्या अर्थामध्ये तीन गुणांच्या अवस्था सांगितल्या. आता त्याच त्रिगुणांची मिश्रित स्थिति, जिला सन्निपातवृत्ति असे म्हणतात, ती ऐका १३.
सन्निपातस्त्वहमिति ममेत्युद्धव या मतिः ।
व्यवहार संनिपातो मनोमात्रेन्द्रियासुभिः ॥ ६ ॥
व्यवहार संनिपातो मनोमात्रेन्द्रियासुभिः ॥ ६ ॥
[श्लोक ६] उद्धवा ! तीन गुणांच्या मिश्रणानेच "मी" आणि "माझे" या प्रकारची बुद्धी उत्पन्न होते मन, शब्दादी विषय, इंद्रिये आणि प्राण यांच्या योगाने वृत्तींचा वव्यहार होतो. (६)
गुणसन्निपातप्रकारू । एकचि जो कां अहंकारू ।
तो गुणसंगे त्रिप्रकारू । ऐक विचारू तयाचा ॥ १४ ॥
तो गुणसंगे त्रिप्रकारू । ऐक विचारू तयाचा ॥ १४ ॥
गुणसन्निपाताचा प्रकार असा की, एकच असणारा जो अहंकार, तो गुणांच्या संगतीने तीन प्रकारचा होतो. त्याचाही विचार ऐक १४.
वर्णाश्रमविहित विलास । वेदाज्ञा पाळणें अवश्य ।
मी आत्मा जाण चिदंश । हा अहंविलास सात्त्विक ॥ १५ ॥
मी आत्मा जाण चिदंश । हा अहंविलास सात्त्विक ॥ १५ ॥
वर्णाश्रमाला विहित असाच व्यवहार करणे, वेदाज्ञा अवश्य पालन करणे, आणि मीच ज्ञानस्वरूप आत्मा आहे असे मानणे, हा अहंकार सात्त्विक होय १५.
मी स्वधर्मकर्मकर्ता । मी स्वर्गादि सुखभोक्ता ।
मज पावती नानावस्था । या नांव अहंता राजस ॥ १६ ॥
मज पावती नानावस्था । या नांव अहंता राजस ॥ १६ ॥
मी स्वधर्मकर्मे करणारा, मी स्वर्गादि सुखं भोगणारा, मलाच नानाप्रकारचे सुखविलास प्राप्त होतात, असे समजणे ह्याचे नांव राजस अहंता होय १६.
मी देहधारी सुभट नर । मीचि कर्ता शत्रुसंहार ।
मी सर्वार्थी अतिदुर्धर । हा अहंकार तामस ॥ १७ ॥
मी सर्वार्थी अतिदुर्धर । हा अहंकार तामस ॥ १७ ॥
मी देहधारी मोठा योद्धा, मीच शत्रूचा संहार करणारा, मी सर्वात अजिंक्य, असे समजणे हा तामस अहंकार होय १७.
गुणानुसारें ममता जाण । त्रिविधरूपें स्फुरण ।
तेचि अर्थींचें निरूपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥ १८ ॥
तेचि अर्थींचें निरूपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥ १८ ॥
(एकच अहंकार गुणानुसार जसा तीन प्रकारचा झाला, त्याप्रमाणे) ममता ही गुणानुरूप तीन प्रकारच्या स्वरूपांनी सुरत असते. त्याच अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण स्पष्ट करून सांगतात १८.
माझे हृदयींचा भगवंत । तोचि सर्व भूतीं हृदयस्थ ।
भूतें माझींच समस्त । हे ममता शोधित सत्त्वाची ॥ १९ ॥
भूतें माझींच समस्त । हे ममता शोधित सत्त्वाची ॥ १९ ॥
'माझ्या हृदयामध्ये जो भगवान् आहे, तोच सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये आहे. सर्व प्राणिमात्र माझेच आहेत' असे समजणे हीच शुद्ध सात्विक गुणाची ममता होय १९.
भक्त संत साधु सज्जन । तेचि माझे सुहृज्जन ।
ऐशी जे ममता पूर्ण । उद्धवा जाण सत्त्वस्थ ॥ १२० ॥
ऐशी जे ममता पूर्ण । उद्धवा जाण सत्त्वस्थ ॥ १२० ॥
उद्धवा ! जे भक्त, संत, साधु, सज्जन आहेत, तेच माझे आप्त इष्ट, अशी जी पूर्ण ममता, ती सात्विक ममता होय असे समज १२०.
जीवाहून परती । सद्गुरुचरणीं अतिप्रीती ।
ऐशी ममतेची जे जाती । ते जाण निश्चितीं सात्त्विक ॥ २१ ॥
ऐशी ममतेची जे जाती । ते जाण निश्चितीं सात्त्विक ॥ २१ ॥
जिवाहून अधिक प्रेम सद्गुरुचरणांवर ठेवणे असा जो ममतेचा प्रकार आहे, तोही खरोखर सात्त्विकच होय २१.
ज्या देवाची उपासकता । शैवी वैष्णवी दीक्षितता ।
देवीं धर्मीं पूर्ण ममता । ते जाण सात्त्विकता सत्त्वस्थ ॥ २२ ॥
देवीं धर्मीं पूर्ण ममता । ते जाण सात्त्विकता सत्त्वस्थ ॥ २२ ॥
ज्या देवाची उपासना असेल त्याप्रमाणे शैवी किंवा वैष्णवी दीक्षा घेणे, किंवा देवधर्मावर परिपूर्ण ममता ठेवणे, हीही सात्त्विक ममताच होय २२.
शैवी वैष्णवी धर्मममता । दंभरहित निष्कामता ।
ते ते सात्त्विकी ममता । ऐक अवस्था राजसाची ॥ २३ ॥
ते ते सात्त्विकी ममता । ऐक अवस्था राजसाची ॥ २३ ॥
शैवी किंवा वैष्णवी धर्मावर ढोंग न करतां निरिच्छ ममता ठेवणे, ती सात्त्विक ममता होय. आतां राजसाची स्थिति ऐक २३.
निवृत्तिमार्ग मानी लटिक । सत्य साचार लौकिक ।
लौकैषणेची ममता देख । ते आवश्यक राजसी ॥ २४ ॥
लौकैषणेची ममता देख । ते आवश्यक राजसी ॥ २४ ॥
निवृत्तिमार्ग हा खोटा असे समजावयाचें, लौकिक भाग असेल तेवढाच खरा मानावयाचा, लौकिकांत मानसन्मानाची इच्छा धरावयाची, अशी जी ममता ती खरोखर राजसी होय २४.
प्रवृत्तिशास्त्रीं आवडी । लौकिकाची अतिगोडी ।
नामरूपांची उभवी गुढी । हे ममता रोकडी राजस ॥ २५ ॥
नामरूपांची उभवी गुढी । हे ममता रोकडी राजस ॥ २५ ॥
प्रपंचामध्ये आवड असणे, लौकिकाची अत्यंत गोडी असणे, नामरूपांची ध्वजा फडकाविणे, ही खरी राजस ममता होय २५.
स्त्रीपुत्रें माझीं आवश्यक । शरीरसंबंधी आप्त लोक ।
द्रव्याची ममता निष्टंक । हे बुद्धि वोळख राजस ॥ २६ ॥
द्रव्याची ममता निष्टंक । हे बुद्धि वोळख राजस ॥ २६ ॥
बायकामुले ही अवश्य माझीच आहेत, शरीरसंबंधी आप्तइष्ट सोयरेधायरे सर्व माझे आहेत, असे समजणें, द्रव्याचा मोठा लोभ धरणे, अशी बुद्धि राजस म्हणून ओळखावी २६.
ज्या देवाची करितां भक्ती । नाम रूप जोडे संपत्ती ।
तीं तीं दैवतें आवडती । हे ममता निश्चितीं राजस ॥ २७ ॥
तीं तीं दैवतें आवडती । हे ममता निश्चितीं राजस ॥ २७ ॥
ज्या दैवतांची भक्ति करतांना नावलौकिक होईल, संपत्ति मिळेळ, ती ती दैवते आवडतात अशी ममता खरोखर राजस होय २७.
काम्य कर्मीं आवडी देख । आप्त मानी सकामकर्मक ।
सत्य स्वर्गादि विषयसुख । हे ममता निष्टंक राजस ॥ २८ ॥
सत्य स्वर्गादि विषयसुख । हे ममता निष्टंक राजस ॥ २८ ॥
काम्यकामध्ये आवड धरणे, सकाम कमैं करणारे असतील ते आप्त असे समजणे, स्वर्गादि विषयसुख हेंच खरे असें मानणे, ही ममता खरोखर राजस होय २८.
हे रजोगुणाची ममता । तुज म्यां सांगीतली तत्त्वतां ।
तमोगुणाची जे अवस्था । ऐक व्यवस्था सांगेन ॥ २९ ॥
तमोगुणाची जे अवस्था । ऐक व्यवस्था सांगेन ॥ २९ ॥
ही रजोगुणाची ममता तुला मी यथातथ्य रीतीने सांगितली. आतां तमोगुणाचे जे स्वरूप, त्याची व्यवस्थाही सांगतों ऐक २९.
आपुल्या देहासी जो हूंतूं करी । कां पूर्वपूर्वजांचा वैरी ।
त्यांच्या लेंकरांसीं वैर धरी । हे बुद्धि निष्ठुरी तामस ॥ १३० ॥
त्यांच्या लेंकरांसीं वैर धरी । हे बुद्धि निष्ठुरी तामस ॥ १३० ॥
जो आपल्या देहाचा अपमान करितो, किंवा जो पूर्वीच्या वाडवडिलांचा द्वेष करतो, त्यांच्या मुलाबाळांशी वैर परतो, ती त्याची निष्ठुर बुद्धि तामस होय १३०.
पुढे लेंकुरांचे लेंकुरीं । वृत्तिभूमि जीविकेवरी ।
आडवा येईल स्वगोत्री । त्यासी वैर धरी तामस ॥ ३१ ॥
आडवा येईल स्वगोत्री । त्यासी वैर धरी तामस ॥ ३१ ॥
पुढे नातवंडे पणतवंडे आपली वतनवाडी सांभाळून उपजीविका चालवतील त्यांना जो भाऊबंद आड येणे शक्य आहे त्याच्याबरोबर तामस वैर घरतो ३१,
ऐसे पूर्वापर माझे वैरी । मी निर्दळीन संसारी ।
यालागीं रिघे अभिचारीं । ते ममता खरी तामस ॥ ३२ ॥
यालागीं रिघे अभिचारीं । ते ममता खरी तामस ॥ ३२ ॥
असे पूर्वापर आपले शत्रु मी संसारामध्ये ठार मारीन म्हणून जारणमारणादि अभिचारकर्मामध्ये शिरतो, ती त्याची ममता खरोखर तामसी होय ३२.
अभिचारिकी जे मंत्रज्ञ । ते मानी माझे आप्त स्वजन ।
शाकिनीडाकिनीउपासन । हे ममता संपूर्ण तामसी ॥ ३३ ॥
शाकिनीडाकिनीउपासन । हे ममता संपूर्ण तामसी ॥ ३३ ॥
जे अभिचारकर्माचे मैत्र जाणणारे असतात, तेच आपले आप्त व मोठे जिवलग समजतो, आणि शाकिनी, डाकिनी, ह्यांची उपासना करतो, ही पूर्णपणे तामसी ममता होय ३३.
असो बहुसाल व्युत्पत्ती । एकेक गुणीं अनंत शक्ती ।
हे तिन्ही जेथ मिश्र होती । सन्निपातवृत्ती या नांव ॥ ३४ ॥
हे तिन्ही जेथ मिश्र होती । सन्निपातवृत्ती या नांव ॥ ३४ ॥
हे वर्णन फार झालें . एकेक गुणामध्ये अनंत शक्ति आहेत. तिन्ही गुण जेथे मित्र होतात, त्याला ' सन्निपातवृत्ति' असें नांव आहे ३४.
कफ वात आणि पित्त । तिन्ही एकत्र जेथ होत ।
तेथ उपजे सन्निपात । तेवीं सन्निपात येथ त्रिगुणांचा ॥ ३५ ॥
तेथ उपजे सन्निपात । तेवीं सन्निपात येथ त्रिगुणांचा ॥ ३५ ॥
कफ, वात आणि पित्त तिन्ही जेथें एकत्र होतात, तेथें सन्निपात उत्पन होतो. त्याप्रमाणेच येथेही तीन गुणांचा सान्निपात होतो ३५.
संकल्पविकल्पात्मक मन । पंच विषय पंच प्राण ।
दशेंद्रियीं व्यवहार संपूर्ण । तेथ उपजे त्रिगुणसन्निपात ॥ ३६ ॥
दशेंद्रियीं व्यवहार संपूर्ण । तेथ उपजे त्रिगुणसन्निपात ॥ ३६ ॥
संकल्पविकल्पात्मक मन, पंचविषय, पंचप्राण, आणि दशद्रियांचा संपूर्ण व्यवहार यांत तीन गुणांचा सन्निपात होतो ३६.
तेंचि सन्निपातनिरूपण । त्रिगुणांचे मिश्रलक्षण ।
स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । मिश्रगुणसन्निपातू ॥ ३७ ॥
स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । मिश्रगुणसन्निपातू ॥ ३७ ॥
तेच सन्निपाताचे निरूपण म्हणजे तीन गुणांचे मिश्र लक्षण-ज्याला मिश्रगुणसन्निपात म्हणतात तें-श्रीकृष्ण स्वतः सांगत आहे ३७.
धर्मे चार्थे च कामे च यदासौ परिनिष्ठितः ।
गुणानां सन्निकर्षोऽयं श्रद्धारतिधनावहः ॥ ७ ॥
गुणानां सन्निकर्षोऽयं श्रद्धारतिधनावहः ॥ ७ ॥
[श्लोक ७] जेव्हा मनुष्य धर्म, अर्थ आणि काम हे पुरूषार्थ साध्य करण्यात तत्पर असतो, तेव्हा त्याला सत्त्वगुणापासून श्रद्धा, तमोगुणापासून धन आणि रजोगुणापासून प्रेम यांची प्राप्ती होते. हेही गुणांचेच मिश्रण होय. (७)
पुरुषाच्या ठायीं क्रियाकर्म । क्षणें स्वधर्म क्षणें काम ।
क्षणें वाढतीं अर्थोद्यम । हा संक्रम त्रिगुणांचा ॥ ३८ ॥
क्षणें वाढतीं अर्थोद्यम । हा संक्रम त्रिगुणांचा ॥ ३८ ॥
पुरुषाच्या ठिकाणी क्षणांत क्रिया, क्षणांत कर्म, क्षणांत स्वधर्म, क्षणांत काम, क्षणांत द्रव्य मिळविण्याचा उद्योग, अशा भिन्नभिन्न वृत्ति उद्भवणे हाच त्रिगुणांचा सन्निपात होय ३८.
गुणसंक्रमण करी काय । त्रिगुणीं धर्म त्रिविध होय ।
कामही त्रिविध होऊनि ठाय । अर्थस्वार्थनिर्वाह त्रिगुणात्मकः ॥ ३९ ॥
कामही त्रिविध होऊनि ठाय । अर्थस्वार्थनिर्वाह त्रिगुणात्मकः ॥ ३९ ॥
गुणांचे हे मिश्रण काय करितें तर या तीन गुणांनी धर्म तीन प्रकारचा होतो, काम तीन प्रकारचा होऊन राहतो, आणि अर्थ, स्वार्थ व निर्वाह ही सर्व तीन प्रकारची होतात ३९.
येथ कर्मासी दोष नाहीं । दोष कर्त्याचे बुद्धीच्या ठायीं ।
तो जे कल्पना करील कांहीं । तें फळ पाहीं स्वयें भोगी ॥ १४० ॥
तो जे कल्पना करील कांहीं । तें फळ पाहीं स्वयें भोगी ॥ १४० ॥
शांत कर्माला दोष नाही. दोष हा कर्त्यांच्या बुद्धीमध्ये असतो. तो जी काही कल्पना करतो, तिचे फळ तो स्वतः भोगितो १४०.
सोनें वंद्य सोनेपणें । त्याचें स्वयें घडविल्या सुणें ।
वंद्य तेंचि निंद्य करणें । तेवीं स्वकर्म दूषणें गुणबुद्धी ॥ ४१ ॥
वंद्य तेंचि निंद्य करणें । तेवीं स्वकर्म दूषणें गुणबुद्धी ॥ ४१ ॥
सोने हे आपल्या सोनेंपणाने सन्माननीय आहे. त्याचेच जर आपण एखादें कुत्रे बनविले, तर त्या वंदनीय सोन्याची विटंबना केल्याप्रमाणे होते. त्याप्रमाणेच स्वकर्म हें गुणबुद्धीने दूषित होते ४१.
भूमि सहजें शुद्ध आहे । जें पेरिजे तें पीक होये ।
तेवीं स्वकर्म शुद्ध स्वयें । फलभोगू लाहे गुणवृत्ती ॥ ४२ ॥
तेवीं स्वकर्म शुद्ध स्वयें । फलभोगू लाहे गुणवृत्ती ॥ ४२ ॥
भूमि ही मूळचीच शुद्ध आहे. तिच्यात जें पेरावे त्याचे पीक येते. त्याप्रमाणे स्वकर्म हें स्वतः मूळचे शुद्धच आहे, परंतु गुणांच्या वृत्तीप्रमाणे त्याचे फल भोगावे लागते ४२.
वाचा सहज सरळ गोमटी । रामनामें जोडे ब्रह्मपुष्टी ।
वृथा जाय करितां चावटी । भोगी निंदेपाठीं महापाप ॥ ४३ ॥
वृथा जाय करितां चावटी । भोगी निंदेपाठीं महापाप ॥ ४३ ॥
वाणी स्वभावतः सरळ आणि शुद्ध आहे. तिला रामनामाने ब्रह्मस्वरूप प्राप्त होते. परंतु तिने भलतीच बडबड केली असता ती व्यर्थ जाते. आणि तिने निंदा केली तर त्यामुळे मागाहून महापाप भोगावे लागते ४३.
तेवीं स्वधर्म श्रद्धायुक्त । पुरुषास करी विरक्त ।
तेथ त्रिगुणांचा सन्निपात । श्रद्धा छळित तें ऐक ॥ ४४ ॥
तेथ त्रिगुणांचा सन्निपात । श्रद्धा छळित तें ऐक ॥ ४४ ॥
त्याप्रमाणे श्रद्धायुक्त बुद्धीने स्वधर्माचरण केले, तर ते स्वधर्माचरण मनुष्याला विरक्त करिते, पण त्यांत त्रिगुणांचा सन्निपात झाला तर तीच श्रद्धा छळ करूं लागते. तोही प्रकार ऐक ४४.
स्वधर्मकर्मीं श्रद्धा जोडे । क्षणैकें लागे विरक्तीकडे ।
क्षणें भोगफळाशा वाढे । क्षणैक पडे ममतासंधीं ॥ ४५ ॥
क्षणें भोगफळाशा वाढे । क्षणैक पडे ममतासंधीं ॥ ४५ ॥
स्वधर्मकर्मामध्ये श्रद्धा उत्पन्न होते, आणि त्यामुळे मनुष्य क्षणैक विरक्तीकडे वळतो. क्षणांत त्याला भोगफळाची आशाही वाढत वाढत जाते, किंवा तो क्षणैक ममतेच्या संधींत सांपडतो ४५.
तैशीच कामाचीही रती । क्षणैक निष्कामीं अतिप्रीती ।
क्षणें स्त्रीभोगआसक्ती । क्षणें कामरती परद्वारीं ॥ ४६ ॥
क्षणें स्त्रीभोगआसक्ती । क्षणें कामरती परद्वारीं ॥ ४६ ॥
कामाचाही प्रकार तसाच आहे. क्षणैक निष्कामतेमध्ये अत्यंत प्रेम असते, क्षणांत स्त्रीभोगाविषयीं आसक्ति उत्पन्न होते, किंवा क्षणांत परस्त्रीच्या ठिकाणीच कामवासना उत्पन्न होते ४६.
याचिपरी धनाची जोडी । क्षणैक द्रव्याशा सोडी ।
क्षणैक अर्थाची अतिगोडी । क्षणैक आसुडी परद्रव्य ॥ ४७ ॥
क्षणैक अर्थाची अतिगोडी । क्षणैक आसुडी परद्रव्य ॥ ४७ ॥
याचप्रमाणे द्रव्याचीही गोष्ट आहे. क्षणांत द्रव्याची आशा सोडून देतो, क्षणांत द्रव्याविषयी अत्यंत आवड उत्पन्न होते, किंवा क्षणामध्ये दुसऱ्याचे द्रव्य लुबाडून घेतो ४७.
त्रिविध धर्म त्रिविध कर्म । त्रिविध रूपें धनागम ।
या गुणवृत्तीस्तव स्वधर्म । सांडूनि अकर्म करी प्राणी ॥ ४८ ॥
या गुणवृत्तीस्तव स्वधर्म । सांडूनि अकर्म करी प्राणी ॥ ४८ ॥
धर्म तीन प्रकारचे, कर्म तीन प्रकारचे, आणि द्रव्यं मिळविण्यामध्ये तीन भेद आहेत. या गुणवृत्तीच्या भेदांमुळे लोक स्वधर्म सोडून अकर्म करीत असतात (धर्म सात्त्विक, अर्थ तामस, आणि काम राजस होय. श्रद्धा, रति व द्रव्य ही त्यांची अनुक्रमाने फळे आहेत. मनुष्य धर्म-अर्थ-काम या तिहींमध्ये आसक्त होतो हें सन्निपाताचे कार्य समजावें ) ४८.
एवं धर्मअर्थकामांआंत । गुणसन्निपात अनंत ।
फोडूनि सांगतां येथ । वाढेल ग्रंथ अनिवार ॥ ४९ ॥
फोडूनि सांगतां येथ । वाढेल ग्रंथ अनिवार ॥ ४९ ॥
मशा प्रकारें धर्म, भयं व काम झांमध्ये अनंत गुणांचे संनिपात आहेत. ते सर्वच जर येथे फोडून सांगू लागलों, तर ग्रंथाचा विस्तार अतिशय वाढेल ४९.
यालागीं गुणसन्निपात । सांगीतला संकलित ।
तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथ । असे सांगत संक्षेपें ॥ १५० ॥
तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथ । असे सांगत संक्षेपें ॥ १५० ॥
म्हणून हा त्रिगुणांचा सन्निपात संक्षेपाने सांगितला. श्रीकृष्णही पुन्हा त्याच अर्थाचें निरूपण संक्षेपानेच सांगत आहेत १५०.
प्रवृत्तिलक्षणे निष्ठा पुमान्यर्हि गृहाश्रमे ।
स्वधर्मे चानुतिष्ठेत गुणानां समितिर्हि सा ॥ ८ ॥
स्वधर्मे चानुतिष्ठेत गुणानां समितिर्हि सा ॥ ८ ॥
[श्लोक ८] जेव्हा माणूस सकाम कामात किंवा गृहस्थाश्रमात किंवा स्वधर्मापालनात निष्ठा ठेवून ती ती कामे करतो, त्यावेळी सुद्धा त्याचे ठिकाणी तिन्ही गुणांचे मिश्रण आहे, असे समजावे. (८)
पुरुषासी जो गृहाश्रम । तो जाणावा केवळ काम ।
तेथ नित्यनैमित्तिक कर्म । हा स्वधर्म चित्तशुद्धी ॥ ५१ ॥
तेथ नित्यनैमित्तिक कर्म । हा स्वधर्म चित्तशुद्धी ॥ ५१ ॥
पुरुषाला जो गृहस्थाश्रम आहे, तो केवळ कामच आहे असे समजावें. त्यांत चित्तशुद्धीसाठी नित्यनैमित्तिक कर्मे करणे हाच स्वधर्म होय ५१.
गृहाश्रमीं हिंसा पंचसून । यालागीं तमोगुण प्रधान ।
गृहीं स्त्रीभोग पावे जाण । रजोगुण हा हेतू ॥ ५२ ॥
गृहीं स्त्रीभोग पावे जाण । रजोगुण हा हेतू ॥ ५२ ॥
गृहस्थाच्या घरांत दळणे, कांडणे, चूल पेटविणे, पाणी भरणे व झाडणे ह्या क्रिया करतांना जाणतेपणाने किंवा अजाणतेपणानें जीवहिंसा घडतात, तेच पंचसूना दोष होत. गृहस्थाश्रमाने हे पंचसूना दोष घडतात, म्हणून त्यांत तमोगुणच मुख्य असतो. आणि घरामध्ये गृहस्थ स्त्रीसुखाचा उपभोग घेतो, म्हणून त्यांत रजोगुण आहे ५२.
नित्यनैमित्तिक स्वधर्म । हें गृहस्थाचें निजकर्म ।
हें चित्तशुद्धीचें निजवर्म । सत्त्व सुगम या हेतू ॥ ५३ ॥
हें चित्तशुद्धीचें निजवर्म । सत्त्व सुगम या हेतू ॥ ५३ ॥
नित्य नैमित्तिक कर्म करणे आणि स्वधर्म पाळणे, हेच गृहस्थाचे मुख्य कर्तव्य होय. हेंच चित्तशुद्धीचे रहस्य आहे, म्हणून गृहस्थाश्रमामध्ये सत्त्वगुणही सुलभ आहे ५३.
गृहाश्रमप्रवृत्ति जाण । सदा मिश्रित तिनी गुण ।
गुणीं गुणवंत करून । कर्माचरण करविती ॥ ५४ ॥
गुणीं गुणवंत करून । कर्माचरण करविती ॥ ५४ ॥
गृहस्थाश्रमाची जी प्रवृत्ति आहे, ती नेहमी या तीन गुणांनी मिश्रित आहे. त्या गुणांनींच त्याला गुणयुक्त केले असून ते त्याच्याकडून कर्माचरण करवितात ५४.
न रंगतां तेणें रंगें । स्फटिक तद्रूप भासों लागे ।
तेवीं गुणात्मा गुणसंगें । वर्तों लागे गुणकर्मीं ॥ ५५ ॥
तेवीं गुणात्मा गुणसंगें । वर्तों लागे गुणकर्मीं ॥ ५५ ॥
कोणत्याच रंगानें न रंगतांही स्फटिक त्या रंगासारखा भासू लागतो, त्याप्रमाणेच गुणांच्या संगतीने गुणात्मक आत्माही गुणकर्मामध्ये वागू लागतो ५५.
जेवीं कां कसवटी आपण । कसूनि दावी सुवर्णवर्ण ।
तेवीं पुरुषाची क्रिया जाण । दावी गुणलक्षणविभाग ॥ ५६ ॥
तेवीं पुरुषाची क्रिया जाण । दावी गुणलक्षणविभाग ॥ ५६ ॥
ज्याप्रमाणे कसोटी आपण होऊन सोन्याचा वर्ण स्पष्टपणे दाखविते, त्याप्रमाणे पुण्याची क्रियाही गुणलक्षणाचे विभाग दाखविते ५६.
पुरुषं सत्त्वसंयुक्तमनुमीयाच्छमादिभिः ।
कामादिभी रजोयुक्तं क्रोधाद्यैस्तमसा युतम् ॥ ९ ॥
कामादिभी रजोयुक्तं क्रोधाद्यैस्तमसा युतम् ॥ ९ ॥
[श्लोक ९] माणसाच्या ठिकाणी शमदमादी गुणांवरून सत्त्वगुण, कामादी प्रवृत्तींवरून रजोगुण आणि कामक्रोध इत्यादींवरून तमोगुण प्रबल आहे, असे समजावे. (९)
इंद्रियनिग्रहो यथोचित । जो शमदमीं सदा क्रीडत ।
शांति वसे जयाआंत । तो जाण निश्चित सात्त्विक ॥ ५७ ॥
शांति वसे जयाआंत । तो जाण निश्चित सात्त्विक ॥ ५७ ॥
जो योग्य प्रकारे इंद्रियनिग्रह करतो, जो शमदमांत निरंतर खेळत असतो, ज्याच्या अंत:करणांत शांति राहते, तोच खरोखर सात्त्विक आहे असे समज ५७.
जो सदा फळकामें कामुक । वांछी संसारभोगसुख ।
द्रव्यार्थी अतिदांभिक । रजोगुणी लोक तो जाण ॥ ५८ ॥
द्रव्यार्थी अतिदांभिक । रजोगुणी लोक तो जाण ॥ ५८ ॥
जो सदोदित फलेच्छेने लोभी बनलेला असतो, संसारभोगांतील सुखाची इच्छा करतो, द्रव्यासाठी पाहिजे ते ढोंग करितो, तो मनुष्य रजोगुणी होय, हे लक्षात ठेव ५८.
ज्यासी स्वधर्मीं नाहीं रती । आवडे अधर्मप्रवृत्ती ।
क्रोधलोभें गिळिली स्फूर्ती । तो जाण निश्चितें तामसू ॥ ५९ ॥
क्रोधलोभें गिळिली स्फूर्ती । तो जाण निश्चितें तामसू ॥ ५९ ॥
स्वधर्मामध्ये ज्याला प्रेम वाटत नाही, अधर्मप्रवृत्तीच आवडते, क्रोधाने आणि लोभाने ज्याची स्फूर्ति गिळूनच टाकलेली असते, तो खरोखर तामस होय असे समज ५९.
एवं देखोनि कर्माचरण । लक्षिजे पुरुषलक्षण ।
या नांव गा अनुमान । विवेकसंपन्न जाणती ॥ १६० ॥
या नांव गा अनुमान । विवेकसंपन्न जाणती ॥ १६० ॥
अशा प्रकारे पुरुषाचे कर्माचरण पाहून त्याचे लक्षण ओळखावें. ह्याचे नांव अनुमान. विचारशील पुरुष हे जाणतात १६०.
सामान्यतः तिन्ही गुण । सांगीतलें निरूपण ।
हें न कळे म्हणेल मन । गुणवृत्ति भिन्न अवधारीं ॥ ६१ ॥
हें न कळे म्हणेल मन । गुणवृत्ति भिन्न अवधारीं ॥ ६१ ॥
सामान्यतः या तिन्ही गुणांचे निरूपण सांगितले. पण हेही कळत नाही असें मनाला वाटत असेल, तर त्याच गुणांच्या भिन्नभिन्न वृत्तीही श्रवण कर ६१.
यदा भजति मां भक्त्या निरपेक्षः स्वकर्मभिः ।
तं सत्त्वप्रकृतिं विद्यात्पुरुषं स्त्रियमेव वा ॥ १० ॥
तं सत्त्वप्रकृतिं विद्यात्पुरुषं स्त्रियमेव वा ॥ १० ॥
[श्लोक १० ] पुरूष असो की स्त्री, जेव्हा निष्काम भावनेने आपल्या नित्यनैमित्तिक कर्मांनी माझी आराधना करते, तेव्हा ती व्यक्ती सत्त्वगुणी समजावी. (१०)
स्वकर्मीं वांछित फळ । तेचि मायेचें दृढ पडळ ।
ते फळाशा सांडोनि केवळ । जे भजनशीळ मद्रूपीं ॥ ६२ ॥
ते फळाशा सांडोनि केवळ । जे भजनशीळ मद्रूपीं ॥ ६२ ॥
आपण स्वकर्म आचरीत असतां त्यांत फळाची इच्छा धरणे हेच मायेचे मोठे पटल होय. पण ती फळाची आशा निखालस सोडून देऊन जे मत्स्वरूप होऊन माझ्याच भजनांत निमग्न असतात ६२,
करूनि फळाशेचें शून्य । स्वधर्में करिती माझें भजन ।
पुरुष अथवा स्त्रिया जाण । ते सत्त्वसंपन्न निश्चित ॥ ६३ ॥
पुरुष अथवा स्त्रिया जाण । ते सत्त्वसंपन्न निश्चित ॥ ६३ ॥
फळाच्या आशेचे शून्य करून स्वधर्मानेच माझे भजन करतात, मग ते पुरुष असोत किंवा स्त्रिया असोत-ते खरोखर सत्त्वगुणसंपन्न जाणावे ६३.
देहावयवलिंगदर्शन । तेणें स्त्रीपुरुषनामाभिधान ।
परी आत्मा आत्मीं नाहीं जाण । जीवत्व समान स्त्रीपुरुषीं ॥ ६४ ॥
परी आत्मा आत्मीं नाहीं जाण । जीवत्व समान स्त्रीपुरुषीं ॥ ६४ ॥
देहाच्या अवयवांचे जे स्वरूप दिसतें त्यावरून स्त्री किंवा पुरुष हे नाव प्राप्त होत असते. परंतु त्या स्त्रीपुरुषांमध्ये आत्मी व आत्मा असा भेद असत नाही. त्यांच्यात जीवभाव सारखाच असतो ६४.
चित्तवृत्तिक्रियाचरण । त्या नांव गा कर्म जाण ।
तेथ निरपेक्ष तें माझें भजन । स्वधर्म संपूर्ण या नांव ॥ ६५ ॥
तेथ निरपेक्ष तें माझें भजन । स्वधर्म संपूर्ण या नांव ॥ ६५ ॥
एकाग्र चित्तवृत्ति ठेवून जे क्रियेचे आचरण होते, त्याचे नांव कर्म. त्यांत निरपेक्ष रीतीनें जें माझें भजन करणे, तोच संपूर्ण स्वधर्म होय ६५.
ऐशिया स्वधर्मवृत्ती । जेथ प्रगटे माझी भक्ती ।
ते ते सात्त्विक प्रकृती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ६६ ॥ आशंका ॥
ते ते सात्त्विक प्रकृती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ६६ ॥ आशंका ॥
उद्धवा! अशा स्वधर्मवृत्तीनें जेथे माझी भक्ति प्रगट होते, ती ती खरोखर सात्त्विक वृत्ति होय हे लक्षात ठेव ६६.
कर्म करितां फळाशा वाढे । तो फळभोग भोगणें पडे ।
स्वकर्में भक्ति केवीं घडे । कर्म तें कुडें अत्यंत ॥ ६७ ॥
स्वकर्में भक्ति केवीं घडे । कर्म तें कुडें अत्यंत ॥ ६७ ॥
येथे अशी आशंका येते की, कर्म करतांना फलाची आशाच जर वाढत गेली, तर त्या फलाचा भोग भोगावा लागतो. मग अशा स्वकर्मानें भक्ति कशी घडणार ? अर्थात् ते कर्म अत्यंत वाईट होय ६७.
कर्म करितां फळ बाधक । न करितां प्रत्यवाय नरक ।
कर्में कर्मबद्ध लोक । केले देख संसारीं ॥ ६८ ॥
कर्में कर्मबद्ध लोक । केले देख संसारीं ॥ ६८ ॥
कर्म केले असता त्याचे फळ बाधक होते, आणि तें न केले तर प्रत्यवायप्राप्तीने नरक भोगावा लागतो. अशा रीतीने ह्या संसारामध्ये कर्मानेच लोक बद्ध केले आहेत ६८.
जीव होता जो स्वतंत्र । तो कर्में केला परतंत्र ।
एवढें कर्माचें चरित्र । अतिविचित्र बाधक ॥ ६९ ॥
एवढें कर्माचें चरित्र । अतिविचित्र बाधक ॥ ६९ ॥
जो जीव स्वतंत्र होता, तो कर्मानेंच परतंत्र केला. इतकें ह्या कर्माचे चरित्र अत्यंत विचित्र असून बाधक आहे ६९.
स्वकर्में भगवद्भक्ती । म्हणशी घडे कैशा रीतीं ।
तेचि अर्थींची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ १७० ॥
तेचि अर्थींची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ १७० ॥
तेव्हां स्वकर्मानेंच भगवद्भक्ति कशी घडेल ?-असें कदाचित् तूं म्हणशील, तर ह्या शंकेला उत्तर म्हणून श्रीकृष्ण त्याचाच प्रकार स्वतः सांगतात १७०.
सर्प धांवोनि धरिल्या तोंडीं । तो सर्वांगीं घाली आढी ।
तेणें धाकें जो सोडी । तरी तो विभांडी महाविखें ॥ ७१ ॥
तेणें धाकें जो सोडी । तरी तो विभांडी महाविखें ॥ ७१ ॥
जर धावून जाऊन सर्पाचे तोंड धरले तर तो साऱ्या अंगाला विळखे घालतो. आणि त्या विळख्यांच्या भीतीने जर त्याचे तोंड सोडिले, तर तो दंश करून तीव्र विषाने प्राणनाश करितो ७१.
ते सर्पबाधेची सांकडी । निवारी मंत्रवादी गारुडी ।
तेवीं कर्मीं कर्मबाधा गाढी । निवारी रोकडी गुरुरावो ॥ ७२ ॥
तेवीं कर्मीं कर्मबाधा गाढी । निवारी रोकडी गुरुरावो ॥ ७२ ॥
असें सर्पदंशाचे संकट ज्याप्रमाणे मंत्रवादी किंवा गारुडी निवारण करतो, त्याप्रमाणे कर्मामध्येच उत्पन्न झालेली कर्माची बाधा गुरुराज तत्काळ नष्ट करतो ७२.
रिघतां सद्गुरूसी शरण । कर्म करावी ब्रह्मार्पण ।
हेंचि निरपेक्षलक्षण । उद्धवा जाण निश्चित ॥ ७३ ॥
हेंचि निरपेक्षलक्षण । उद्धवा जाण निश्चित ॥ ७३ ॥
सद्गुरूला शरण गेले असतां तो सर्व कर्म ब्रह्मार्पण करवितो, आणखी उद्धवा ! निष्काम बुद्धीने भगवत्सेवा करणाऱ्याचे खरे लक्षण हेच आहे असे समज ७३.
ब्रह्म कर्माचें प्रकाशक । कर्म तितुकें ब्रह्मात्मक ।
हेंचि मदर्पण चोख । माझें भजन देख या रीतीं ॥ ७४ ॥
हेंचि मदर्पण चोख । माझें भजन देख या रीतीं ॥ ७४ ॥
ब्रह्म हेच कर्माचे प्रकाशक आहे, म्हणून कर्म तितकें सर्व ब्रह्मात्मकच होय. अशी भावना असणे हेच खरोखर मला कर्म अर्पण करणे होय. अशा रीतीने माझें भजन करावें ७४.
सर्वेंद्रियीं ज्ञानस्फूर्ती । ते ब्रह्मींची ब्रह्मशक्ती ।
ऐसोनि निश्चयें कर्मस्थिती । स्वकर्मभक्ति या नांव ॥ ७५ ॥
ऐसोनि निश्चयें कर्मस्थिती । स्वकर्मभक्ति या नांव ॥ ७५ ॥
सर्व इंद्रियांमध्ये ज्ञानाची स्फूर्ति होणे ही ब्रह्माची ब्रह्मशक्ति होय. अशा निश्चयाने कर्माचे आचरण करणे ह्याचंच नांव स्वकर्मभक्ति होय ७५.
ऐसेनि स्वकर्में स्वाभाविक । जे मज भजती भाविक ।
ते ते शुद्ध सात्त्विक लोक । जाण निष्टंक उद्धवा ॥ ७६ ॥
ते ते शुद्ध सात्त्विक लोक । जाण निष्टंक उद्धवा ॥ ७६ ॥
अशा प्रकारच्या स्वकर्माने स्वाभाविकपणेच जे जे भाविक मला भजतात. ते ते सर्व लोक, उद्धवा ! शुद्ध सात्त्विक होत असें निःसंशय समज ७६.
स्वधर्म सर्वथा निष्फळ । म्हणती ते मूर्ख केवळ ।
स्वधर्म निरसी चित्तमळ । कर्म समूळ निर्दळी ॥ ७७ ॥
स्वधर्म निरसी चित्तमळ । कर्म समूळ निर्दळी ॥ ७७ ॥
स्वधर्म हा सर्वस्वीं निष्फळ आहे असे जे म्हणतात, ते केवळ मूर्ख लोक होत. स्वधर्म हाच चित्तांतील मळ नाहींसे करितो, आणि सर्व कर्म समूळ नष्ट करतो ७७.
एवढी स्वधर्माची जोडी । सांडूनि वांछिती विषयगोडी ।
तें तें राजसें बापुडीं । केवळ वेडीं विषयार्थी ॥ ७८ ॥
तें तें राजसें बापुडीं । केवळ वेडीं विषयार्थी ॥ ७८ ॥
स्वधर्माचा एवढा लाभ होत असतां तो सोडून जी माणसें विषयाच्या गोडीची इच्छा धरतात, ती ती बिचारी राजस होत. ती विषयसुखामध्येच केवळ वेडी झालेली असतात ७८.
विषयफळ वांछितां देख । देह धरणें आवश्यक ।
देहसंभव दुःखदायक । स्वर्गनरकफळ भोगी ॥ ७९ ॥
देहसंभव दुःखदायक । स्वर्गनरकफळ भोगी ॥ ७९ ॥
विषयाच्या फळाची इच्छा ठेवली असतां त्यासाठी देह धारण करणे भाग पडते. आणि देहधारणा हे दुःखदायक असल्यामुळे त्याच्या योगाने स्वर्ग, नरक इत्यादि फळे भोगावी लागतात ७९.
यापरी जनीं दुःखदाती । राजसतमसप्रकृती ।
ऐक त्या दोनी गुणवृत्ती । विशद तुजप्रती सांगेन ॥ १८० ॥
ऐक त्या दोनी गुणवृत्ती । विशद तुजप्रती सांगेन ॥ १८० ॥
अशा प्रकारे जगामध्ये राजस आणि तामस प्रकृति ह्या दुःखदायकच आहेत. त्यांच्या त्या दोन्ही प्रकारच्या गुणवृत्ति ऐक. तुला स्पष्ट करून सांगतों १८०.
यदा आशिष आशास्य मां भजेत स्वकर्मभिः ।
तं रजःप्रकृतिं विद्याद्धिंसामाशास्य तामसम् ॥ ११ ॥
तं रजःप्रकृतिं विद्याद्धिंसामाशास्य तामसम् ॥ ११ ॥
[श्लोक ११] सकाम भावनेने आपल्या कर्मांनी माझे भजनपूजन करणारा रजोगुणी होय आणि जो शत्रुनाश इत्यादीसाठी माझे पूजन करतो, तो तमोगुणी समजावा. (११)
जो कां आचरोनि स्वधर्म । वांछी नाना फळकाम ।
तें तें जाण काम्य कर्म । राजस धर्म या नांव ॥ ८१ ॥
तें तें जाण काम्य कर्म । राजस धर्म या नांव ॥ ८१ ॥
स्वधमाचे आचरण करून जो नाना प्रकारच्या फळांची इच्छा करितो, ते त्याचे कर्म काम्य होय असें समज. त्याला राजस धर्म असें नांव आहे ८१.
जो अभ्यंतरीं अतिसकाम । तो जे जे आचरे कर्मधर्म ।
ते ते अवघेचि सकाम । फळसंभ्रम निजहेतू ॥ ८२ ॥
ते ते अवघेचि सकाम । फळसंभ्रम निजहेतू ॥ ८२ ॥
अंत:करणामध्ये जो अत्यंत लोभिष्ट असतो, तो जे जे काही कर्मधर्म आचरण करतो, ते ते सर्व लोभिष्टपणाचेच असतात. कारण, त्यांत कर्माचे फळ मिळावे असाच त्याचा हेतु असतो. ८२.
स्वरूपीं काम्य कर्म नाहीं । कामना काम्य करी पाहीं ।
सोनें स्वभावें असे ठायीं । लेणें उपायीं स्वयें कीजे ॥ ८३ ॥
सोनें स्वभावें असे ठायीं । लेणें उपायीं स्वयें कीजे ॥ ८३ ॥
कर्माच्या मूळ स्वरूपांत काम्यत्व मुळीच नसते. कामना ही त्या कर्माला काम्य बनविते. सोनें हें वस्तुतः आपल्या मूळ स्वरूपामध्येच स्थिर असते, पण आपण प्रयत्न करून त्याचे दागिने बनवितो ८३;
स्वकर्म स्वभावें पवित्र जाण । स्वधर्में माझें शुद्ध भजन ।
तेथ कामनाफळ कामून । काम्य आपण स्वयें कीजे ॥८४ ॥
तेथ कामनाफळ कामून । काम्य आपण स्वयें कीजे ॥८४ ॥
त्याप्रमाणे स्वकर्म हे स्वभावत: पवित्रच आहे. स्वधर्मानं माझें शुद्ध भजन घडते, पण असे असता त्यांत इष्ट फळाची इच्छा धरून आपण स्वतःच त्या स्वकर्मधर्माला काम्य बनवितों ८४.
फळकामें जें माझें यजन । तें केवळ फळाचेंचि भजन ।
सकामें जें स्वधर्माचरण । ते प्रकृति जाण राजस ॥ ८५ ॥
सकामें जें स्वधर्माचरण । ते प्रकृति जाण राजस ॥ ८५ ॥
फळाच्या इच्छेनें जी माझी उपासना करावयाची, तें माझें भजन नव्हे, तर ते केवळ त्या फळाचेंच भजन होय. अशा प्रकारें जें सकाम स्वधर्माचरण करणे, ती प्रकृति राजस होय असें समज ८५.
ऐसऐशिये प्रकृतीचा विलास । स्त्री अथवा हो कां पुरुष ।
तें तें जाण पां राजस । ऐक तामस गुणवृत्ति ॥ ८६ ॥
तें तें जाण पां राजस । ऐक तामस गुणवृत्ति ॥ ८६ ॥
अशा प्रकारच्या प्रकृतीचा खेळ जेथे जेथे दृष्टीस पडेल, मग ती स्त्री असो की पुरुष असो, ते ते सारे लोक राजस म्हणून समजावे. आतां तामसाची गुणवृत्ति ऐक ८६.
क्रोधयुक्त अंतःकरण । तेणेंसीं ज्याचें स्वधर्माचरण ।
फळ वांछी शत्रुमरण । ते प्रकृति जाण तामसी ॥ ८७ ॥
फळ वांछी शत्रुमरण । ते प्रकृति जाण तामसी ॥ ८७ ॥
अंतःकरण शोधयुक्त असून त्यानेच त्याचे स्वधर्माचरण होत असते, म्हणून तो आपल्या शत्रूला मरण येण्याच्याच फलाची इच्छा धरतो. ती प्रकृति तामस होय ८७.
जेथें द्वेषें बांधलें घर । जे ठायीं क्रोध अनिवार ।
जो भूतमात्रीं निष्ठुर । ज्याची प्रकृति क्रूर सर्वदा ॥ ८८ ॥
जो भूतमात्रीं निष्ठुर । ज्याची प्रकृति क्रूर सर्वदा ॥ ८८ ॥
ज्याच्या ठिकाणी द्वेषाने घर बांधलेले असते, ज्याच्या ठिकाणी अनिवार क्रोध असतो, जो प्राणिमात्राच्या ठिकाणी निष्ठुर असतो, ज्याची प्रकृति सदासर्वदा क्रूर असते ८८,
ऐशिया स्वभावावरी । नर अथवा हो कां नारी ।
ते ते तामस संसारीं । निजनिर्धारीं उद्धवा ॥ ८९ ॥
ते ते तामस संसारीं । निजनिर्धारीं उद्धवा ॥ ८९ ॥
अशा स्वभावाचा पुरुष असो अथवा स्त्री असो; उद्धवा ! ते ते लोक संसारामध्ये तामस होत हें निश्चयाने ध्यानात ठेव ८९.
जीव स्वरूपें चैतन्य पहा हो । त्यासी ‘मां भज’ कां म्हणे देवो ।
जीवासी कां सेवकभावो । सेव्य देवो कैसेनी ॥ १९० ॥
जीवासी कां सेवकभावो । सेव्य देवो कैसेनी ॥ १९० ॥
अहो ! पहा, " जीव हा स्वरूपतः ब्रह्मच असतो, तर मग देव त्याला 'माझी (देवाची) भक्ति कर ' असें कां म्हणतो ? जीवालाच सेवकपणा कां आला ? आणि देव हाच सेव्य (ज्याची सेवा करावयाची तो) कसा झाला?" १९०
येच अर्थींचें निरूपण । कृष्ण सांगताहे आपण ।
सेव्यसेवकलक्षण । मायागुणसंबंधें ॥ ९१ ॥
सेव्यसेवकलक्षण । मायागुणसंबंधें ॥ ९१ ॥
अशी शंका नष्ट व्हावी म्हणून श्रीकृष्ण त्याच अर्थाचें निरूपण असे करीत आहेत की, असा हा सेव्य-सेवकपणा मायेच्या गुणसंबंधानें उत्पन्न झाला आहे ९१.
सत्त्वं रजस्तम इति गुणा जीवस्य नैव मे ।
चित्तजा यैस्तु भूतानां सज्जमानो निबध्यते ॥ १२ ॥
चित्तजा यैस्तु भूतानां सज्जमानो निबध्यते ॥ १२ ॥
[श्लोक १२] सत्त्व, रज, तम हे तीन गुण जीवाचे आहेत, माझे परमात्म्याचे नव्हेत. हे प्राण्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होतात त्यांमध्ये आसक्त झाल्याने जीव संसारबंधनात बांधला जातो. (१२)
बांधोनि नाणितां आया । जेवीं देहाधीन असे छाया ।
तेवीं भगवंताधीन माया । नातळोनियां वर्तवी ॥ ९२ ॥
तेवीं भगवंताधीन माया । नातळोनियां वर्तवी ॥ ९२ ॥
छाया ही देहाबरोबर बांधून वश केलेली नसतांही ज्याप्रमाणे देहाच्या आधीन राहाते, त्याप्रमाणे माया ही भगवंताच्या आधीन असून तो तिला स्पर्श न करतांच आपल्याबरोबर वागवीत असतो ९२.
माया वर्तविता निवर्तविता । स्वामी भगवंत तत्त्वतां ।
यालागीं मायाअध्यक्षता । त्यासीचि सर्वथा वेद बोले ॥ ९३ ॥
यालागीं मायाअध्यक्षता । त्यासीचि सर्वथा वेद बोले ॥ ९३ ॥
खरोखर मायेला वागविणारा व तिला नाहीशी करणारा प्रभु भगवानच होय. म्हणून वेद त्यालाच सर्वस्वी मायेचा नियंता असे म्हणतो ९३.
सूर्य अंधारातें नाशी । परी तो संमुख न ये त्यापाशीं ।
तेवीं मायानियंता हृषीकेशी । परी माया देवासी दृष्ट नव्हे ॥ ९४ ॥
तेवीं मायानियंता हृषीकेशी । परी माया देवासी दृष्ट नव्हे ॥ ९४ ॥
सूर्य हा अंधाराचा नाश करतो, पण तो अंधार त्याच्यासमोर ज्याप्रमाणे कधीच येत नाही, त्याप्रमाणे मायेचा नियंता जरी श्रीहरि आहे, तरीपण माया ही कांहीं देवाला दिसत नाही ९४.
माझें जें देखणेपण । तेंचि मायेचें मुख्य लक्षण ।
मजपाशीं माय जाण । गुणाभिमानेंसीं नाहीं ॥ ९५ ॥
मजपाशीं माय जाण । गुणाभिमानेंसीं नाहीं ॥ ९५ ॥
माझा देखणेपणा तेंच मायेचे मुख्य लक्षण होय. माझ्यापाशीं माया ही गुणाभिमानासह असत नाहीं ९५.
मायाबिंबित चैतन्य । त्यासी बोलिजे जीवपण ।
त्या जीवासी त्रिगुणीं बांधोन । देहाभिमान दृढ केला ॥ ९६ ॥
त्या जीवासी त्रिगुणीं बांधोन । देहाभिमान दृढ केला ॥ ९६ ॥
मायेमध्ये प्रतिबिंबित झालेलें जें चैतन्य असते, त्यालाच जीवपणा असे म्हणतात, तीन गुणांनी त्या जीवाला बद्ध करून देहाभिमान दृढ केला आहे ९६.
जीवासी लागतां देहाभिमान । तो झाला मायाधीन ।
मायानियंता श्रीनारायण । तो स्वामी जाण जीवाचा ॥ ९७ ॥
मायानियंता श्रीनारायण । तो स्वामी जाण जीवाचा ॥ ९७ ॥
जीवाला देहाभिमान चिकटला असता तो मायेच्या आधीन होतो. म्हणून मायेचा नियंता जो मी नारायण, तोच जीवाचाही स्वामी झालों असें समज ९७.
जीव गुणाभिमानें बद्धक । यालागीं झाला तो सेवक ।
आत्मा गुणातीत चोख । बंधमोचक जीवाचा ॥ ९८ ॥
आत्मा गुणातीत चोख । बंधमोचक जीवाचा ॥ ९८ ॥
जीव हा गुणांच्या अभिमानाने बद्ध झालेला असतो, म्हणून तो सेवक झाला आणि आत्मा हा गुणांपासून अलिप्त अर्थात निर्मळ असल्यामुळे तोच जीवाला जन्ममरणांच्या बंधनांपासून सोडविणारा झाला ९८.
यापरी सेव्यसेवकभावो । विभाग दावोनियां पहा हो ।
त्रिगुणगुणांचा अन्वयो । विशद देवो स्वयें सांगे ॥ ९९ ॥
त्रिगुणगुणांचा अन्वयो । विशद देवो स्वयें सांगे ॥ ९९ ॥
अहो ! पहा, ह्याप्रमाणे सेव्यसेवकभावाचे विभाग दाखवून तीन गुणांचा संबंध देव स्वतः स्पष्ट करून सांगत आहे ९९.
गुण तिन्ही समसमान । त्यांमाजीं क्षोभोनियां जाण ।
जो जो वाढे अधिक गुण । तें तें लक्षण हरि सांगे ॥ २०० ॥
जो जो वाढे अधिक गुण । तें तें लक्षण हरि सांगे ॥ २०० ॥
तीन गुण सारखेसारखेच आहेत, परंतु त्यांमध्ये ज्या ज्या गुणांचा क्षोभ होऊन तो अधिक वाढतो, त्याचे स्वरूप श्रीहरि सांगतो २००.
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...