मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २२ ओव्या ४०१ ते ५००
तो नासावया देहाभिमान । वैराग्ययुक्त ज्ञानध्यान ।
मीचि बोलिलों साधन । समूळ अज्ञानच्छेदक ॥ १ ॥
त्या देहाभिमानाचा नाश करण्याकरितांच मी वैराग्ययुक्त ज्ञानध्यानाचे साधन कसें संपादन करावे हे सांगितले. कारण तेच समूळ अज्ञानाचे छेदक आहे १.
जंववरी अंगीं देहाभिमान । तंव अवश्य पाहिजे साधन ।
निःशेष निरसल्या अज्ञान । वृथा साधन मीही मानीं ॥ २ ॥
निःशेष निरसल्या अज्ञान । वृथा साधन मीही मानीं ॥ २ ॥
जोपर्यंत आंगामध्ये देहाभिमान असतो, तोपर्यंत साधनही अवश्य पाहिजे. अज्ञानाचे निखालस क्षालन झाले, म्हणजे साधन हे व्यर्थ होय हे मलाही मान्य आहे २.
म्हणशी तें कोण पां अज्ञान । जें शुद्धासी लावी जीवपण ।
त्या जीवाअंगीं जन्ममरण । अनिवार जाण वाढवी ॥ ३ ॥
त्या जीवाअंगीं जन्ममरण । अनिवार जाण वाढवी ॥ ३ ॥
आतां ते अज्ञान कोणतें म्हणशील तर, मूळचे शुद्ध स्वरूप असलेल्याला जें जीवपणा लावून देतें तें. तेच जीवाच्या आंगीं अनिवार जन्ममरण लावून देतें ३.
स्वस्वरूप विसरोनि जाण । देहीं स्फुरे जें मीपण ।
अत्यंत दृढतर अज्ञान । तो देहाभिमान उद्धवा ॥ ४ ॥
अत्यंत दृढतर अज्ञान । तो देहाभिमान उद्धवा ॥ ४ ॥
उद्धवा ! आत्मस्वरूपाचा विसर पडून देहामध्ये जे मीपण स्फुरते, तेच अत्यंत दृढतर अज्ञान होय. तोच देहाभिमान ४.
गौण नांव त्याचें अज्ञान । येर्हवीं मुख्यत्वें देहाभिमान ।
हें ऐकोनि देवाचें वचन । दचकलें मन उद्धवाचें ॥ ५ ॥
हें ऐकोनि देवाचें वचन । दचकलें मन उद्धवाचें ॥ ५ ॥
अज्ञान हे त्याचे नांव गौणच होय. एरवीं पाहिले तर देहाभिमान हाच मुख्य होय. हे देवाचे भाषण ऐकून उद्धवाचें मन दचकले ५.
तेचि अर्थींचा प्रश्न । देवासी पुसे आपण ।
कोण्या युक्तीं देहाभिमान । जन्ममरण भोगवी ॥ ६ ॥
कोण्या युक्तीं देहाभिमान । जन्ममरण भोगवी ॥ ६ ॥
म्हणून त्याच अर्थाचा प्रश्न तो आपणच देवाला विचारू लागला. तो असा की, देहाभिमान हा कोणत्या रीतीने जन्ममरण भोगावयास लावतो? ६.
उद्धव उवाच-
त्वत्तः परावृत्तधियः स्वकृतैः कर्मभिः प्रभो ।
उच्च्यावचान् यथा देहान् गृह्णन्ति विसृजन्ति च ॥ ३४ ॥
त्वत्तः परावृत्तधियः स्वकृतैः कर्मभिः प्रभो ।
उच्च्यावचान् यथा देहान् गृह्णन्ति विसृजन्ति च ॥ ३४ ॥
[श्लोक ३४] उद्धवाने विचारले भगवान ! आपल्याला विन्मुख असलेले जीव स्वतःच केलेल्या कर्मांमुळे उच्चनीच योनींमध्ये जात-येत राहातात. (३४)
सर्वत्र सदा संमुख गगन । त्यासी कदा न घडे विमुखपण ।
तेंवी आत्मा सबाह्य परिपूर्ण । वृत्ति विमुख जाण होय कैसी ॥ ७ ॥
तेंवी आत्मा सबाह्य परिपूर्ण । वृत्ति विमुख जाण होय कैसी ॥ ७ ॥
आकाश सर्व ठिकाणी नेहमी सन्मुखच असते. ते कधीही विन्मुख होत नाही. त्याप्रमाणे आत्मा हाही अंतर्बाह्य परिपूर्णच आहे. तेव्हा त्याची वृत्ति विन्मुख कशी होणार ? ७.
जैं जाळीं बांधवे गगन । तैं अक्रिया लागे कर्मबंधन ।
वंध्यागर्भ सटवे जाण । तैसें जन्ममरण मुक्तासी ॥ ८ ॥
वंध्यागर्भ सटवे जाण । तैसें जन्ममरण मुक्तासी ॥ ८ ॥
जाळ्यात जेव्हा आकाश बांधता येईल, तेव्हां अकर्त्याला कर्माचे बंधन लागेल. वंध्येचा गर्भ सटावणे हे जसें खोटे, तसेच मुक्ताला जन्ममरण हें खोटे आहे ८.
आत्म्यावेगळें कांहीं । रितें तंव उरलें नाहीं ।
तरी ये देहींचा ते देहीं । गमनसिद्धी पाहीं कैसेनी ॥ ९ ॥
तरी ये देहींचा ते देहीं । गमनसिद्धी पाहीं कैसेनी ॥ ९ ॥
आत्म्याशिवाय रिकामें असें जर काही उरलेलेच नाही, तर ह्या देहांतून त्या देहांत जाणे तरी कशाने पडते ९.
पृथ्वी रुसोनि वोसरां राहे । आकाश पळोनि पर्हां जाये ।
तैं देहींचा देहांतरा पाहें । आत्मा लाहे संसरण ॥ ४१० ॥
तैं देहींचा देहांतरा पाहें । आत्मा लाहे संसरण ॥ ४१० ॥
पृथ्वी रुसली आणि तिने आश्रय द्यावयाचा बंद केला, किंवा आकाशच दूर निघून गेले, तर देहांत असलेला आत्मा दुसऱ्या देहात जाऊ शकेल ४१०.
सात समुद्र गिळी मुंगी । तैं आत्मा उंचनीच योनी भोगी ।
हे अतर्क्य तर्केना मागी । भुलले योगी ये अर्थीं ॥ ११ ॥
हे अतर्क्य तर्केना मागी । भुलले योगी ये अर्थीं ॥ ११ ॥
मुंगी जर सप्त समुद्र गिळून टाकील, तर आत्म्याला उच्चनीच योनी भोगाव्या लागतील. अर्थात हें अशक्य आहे. ही गोष्ट अतर्क्य आहे. तिच्या संशोधनाबद्दल तर्क चालत नाही. त्याविषयीं योगीसुद्धा भ्रमात पडले ११.
तन्ममाख्याहि गोविन्द दुर्विभाव्यमनात्मभिः ।
न ह्येतत्प्रायशो लोके विद्वांसः सन्ति वञ्चिताः ॥ ३५ ॥
न ह्येतत्प्रायशो लोके विद्वांसः सन्ति वञ्चिताः ॥ ३५ ॥
[श्लोक ३५] हे गोविंदा ! ज्या लोकांना आत्मज्ञान नसते, त्यांना या विषयाची कल्पनाही करता येत नाही आणि जगात बहुतेक लोक आपल्या मायेत गुंतल्यामुळे हे जाणत नाहीत म्हणून आपणच मला याचे रहस्य सांगा. (३५)
अभिनव हे तुझी गती । सर्वथा न कळे श्रीपती ।
मायामोहित जे चित्तीं । त्यां तुझी स्थिती नेणवे ॥ १२ ॥
मायामोहित जे चित्तीं । त्यां तुझी स्थिती नेणवे ॥ १२ ॥
हे श्रीकृष्णा ! तुझी लीला अघटित आहे, ती मुळीच कळत नाही. ज्यांच्या चित्ताला मायेनें भुरळ पडली आहे, त्यांना तुझी स्थिति कळत नाही १२.
तूं आत्मा अद्वितीय अविनाश । तेथ उत्पत्ति स्थिति विनाश ।
नाथिला दाविसी भवभास । हा अतर्क्य विलास तर्केना ॥ १३ ॥
नाथिला दाविसी भवभास । हा अतर्क्य विलास तर्केना ॥ १३ ॥
आत्मा हा केवळ अद्वितीय, अविनाश असा असून तूं त्यांत उत्पत्ति, स्थिति व नाश दाखवून मिथ्या संसाराचा भास उत्पन्न करतोस, ही तुझी लीला अर्तक्य आहे. तिच्याविषयीं तर्क चालत नाही १३.
येथ वेदाची युक्ती ठेली । उपनिषदें वेडावलीं ।
पुराणें मुकीं झालीं । अतियत्नें लक्षिली न वचेचि मागी ॥ १४ ॥
पुराणें मुकीं झालीं । अतियत्नें लक्षिली न वचेचि मागी ॥ १४ ॥
ह्यांत वेदाची बुद्धि गुंग झाली, उपनिषदे वेडावून गेली, पुराणें मुकी होऊन बसली. या सर्वांनी नाही नाही तितके यत्न करून पाहिले. पण त्यांत त्यांची गति चालत नाही १४.
तुझे केवळ कृपेवीण । तुझें इत्थंभूत नव्हे ज्ञान ।
ऐसे जड मूढ हरिकृपाहीन । त्यांसी भवबंधन तुटेना ॥ १५ ॥
ऐसे जड मूढ हरिकृपाहीन । त्यांसी भवबंधन तुटेना ॥ १५ ॥
तुझें इत्थंभूत ज्ञान तुझ्या कृपेशिवाय व्हावयाचें नाहीं. म्हणून हरीच्या कृपेला पात्र न होणारे असे जे जड मूढ लोक असतात, त्यांना संसाराचे बंधन तुटत नाही १५.
तुझे योगमायेची अतर्क्यता । ब्रह्मा भुलविला वत्सें नेतां ।
शिवू भुलविला मोहिनी देखतां । इतरांची कथा ते कोण ॥ १६ ॥
शिवू भुलविला मोहिनी देखतां । इतरांची कथा ते कोण ॥ १६ ॥
तुझ्या योगमायेची करणी अतर्क्य आहे. तिने वासरे चोरून नेतांना ब्रह्मदेवालाही भुलवून सोडले. मोहनीला पाहतांच प्रत्यक्ष शंकरालासुद्धा भूल पाडली. मग इतरांची कथा काय? १६.
प्रपंचीं अथवा परमार्थी । तुझेनि चालती इंद्रियवृत्ती ।
यालागीं गोविंदनामाची ख्याती । त्रिजगतीं वाखाणिली ॥ १७ ॥
यालागीं गोविंदनामाची ख्याती । त्रिजगतीं वाखाणिली ॥ १७ ॥
प्रपंचात म्हणा, किंवा परमार्थात म्हणा, इंद्रियांच्या प्रवृत्ति तुझ्यामुळेच चालतात. म्हणूनच गोविंद ह्या नावाची कीर्ति त्रिभुवनामध्ये वर्णिलेली आहे. १७.
सादर कृपापूर्वक आपण । माझा सांगावा अतर्क्य प्रश्न ।
देहीं देहांतरा संचरण । जीवास जन्ममरण तें कैसें ॥ १८ ॥
देहीं देहांतरा संचरण । जीवास जन्ममरण तें कैसें ॥ १८ ॥
ह्याकरितां आपण कृपा करून ह्या माझ्या अतर्क्य प्रश्नाचे उत्तर सांगावे की, एका देहांतून दुसऱ्या देहांत जीव कसा जातो? व जीवाला जन्ममरण तरी कसे येतें? १८.
ऐकोनि उद्धवाचा प्रश्न । हांसितन्नला मधुसूदन ।
हें अवघें मायिक जाण । कल्पनाविंदान मनोमय ॥ १९ ॥
हें अवघें मायिक जाण । कल्पनाविंदान मनोमय ॥ १९ ॥
हा उद्ध्वाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण हासले आणि म्हणाले की, अरे ! हा सर्व मायिक, केवळ मनोमय कल्पनेचा खेळ आहे १९.
श्रीभगवानुवाच-मनः कर्ममयं नृणामिन्द्रियैः पंचभिर्युतम् ।
लोकाल्लोकं प्रयात्यन्य आत्मा तदनुवर्तते ॥ ३६ ॥
लोकाल्लोकं प्रयात्यन्य आत्मा तदनुवर्तते ॥ ३६ ॥
[श्लोक ३६] भगवान श्रीकृष्ण म्हणाले - मनुष्यांचे मन हे कर्मसंस्कारांचा समूह आहे त्या संस्कारांनुसार भोग प्राप्त करून घेण्यासाठी ते मन पाच इंद्रियांसह एका शरीरातून दुसर्या शरीरात जात असते. आत्मा त्यापासून वेगळा असूनही त्याचा अहंकार धरतो त्यामुळे त्याला सुद्धा आपले जाणेयेणे भासू लागते. (३६)
अकरा इंद्रियें पंच म्हाभूतें । हें सोळा कळांचें लिंगदेह येथें ।
मुख्यत्वें प्राधान्य मनाचें तेथें । नाना विषयांतें कल्पक ॥ ४२० ॥
मुख्यत्वें प्राधान्य मनाचें तेथें । नाना विषयांतें कल्पक ॥ ४२० ॥
अकरा इंद्रिये आणि पंचमहाभूतें ह्या सोळा कळांचा लिंगदेह होतो, आणि अनेक विषयांची कल्पना करणारे जें मन त्याचेच त्यांत विशेषेकरून प्राधान्य असते ४२०.
येथ लिंगदेह तेंचि मन । मनाआधीन इंद्रियें जाण ।
मनाचेनि देहासी गमन । तेथ देहाभिमान मनासवें ॥ २१ ॥
मनाचेनि देहासी गमन । तेथ देहाभिमान मनासवें ॥ २१ ॥
यांत लिंगदेह तेच मन होय, आणि त्या मनाच्या आधीन इंद्रिये असतात. मनामुळेच देह चालत असतो. त्यांत देहाभिमान असतो तोही मनाबरोबरच असतो २१.
मन ज्यातें सोडूनि जाये । तेथ अभिमान उभा न राहे ।
मनोयोगें अभिमान पाहें । देहाचा वाहे खटाटोप ॥ २२ ॥
मनोयोगें अभिमान पाहें । देहाचा वाहे खटाटोप ॥ २२ ॥
मन ज्याला सोडून जाते, तेथें देहाभिमान उभासुद्धा राहात नाही. मनाच्या योगानेच अभिमान हा देहाचा खटाटोप वहात असतो २२.
जेथ विषयासक्त मन । करी शुभाशुभ कर्माचरण ।
तेव्हां होऊनि कर्माधीन । देही करी गमन देहांतरा ॥ २३ ॥
तेव्हां होऊनि कर्माधीन । देही करी गमन देहांतरा ॥ २३ ॥
मन जेव्हां विषयासक्त होऊन शुभाशुभ कर्माचरण करते, तेव्हां जीव कर्माधीन होऊन दुसऱ्या देहांत प्रवेश करितो २३.
आत्मा यासी अलिप्त भिन्न । परी देहासवें दावी गमन ।
हें अतिअतर्क्य विंदान । ऐक लक्षण तयाचें ॥ २४ ॥
हें अतिअतर्क्य विंदान । ऐक लक्षण तयाचें ॥ २४ ॥
आत्मा हा देहापासून अगदी भिन्न व अलिप्स असतो, परंतु आपण देहाबरोबरच जातो असे भासवितो. हे त्याचे कौशल्य अद्भुत आहे. त्याचेही लक्षण ऐक २४.
घट जेथ जेथ हिंडों वैसे । आकाश त्यासवें जात दिसे ।
परी ढळणें नाहीं आकाशें । आत्म्याचें तैसें गमन येथें ॥ २५ ॥
परी ढळणें नाहीं आकाशें । आत्म्याचें तैसें गमन येथें ॥ २५ ॥
घट हा जिकडे जिकडे हिंडू लागतो, तिकडे तिकडे त्याच्याबरोबर घटाकाशही गेलेले दिसते. पण खरोखर आकाश कांहीं हालत नाही. त्याचप्रमाणे या आत्म्याचे जाणे आहे २५.
घटामाजीं भरिजे अमृत । अथवा घालिजे खातमूत ।
आकाश दोहींसीं अलिप्त । तेवीं सुखदुःखातीत देहस्थ आत्मा ॥ २६ ॥
आकाश दोहींसीं अलिप्त । तेवीं सुखदुःखातीत देहस्थ आत्मा ॥ २६ ॥
घटामध्ये अमृत भरलें, किंवा मलमूत्र भरले तरी त्या दोहोंपासून आकाश हे अलिप्तच असते, त्याप्रमाणे देहांत राहणारा आत्माही सुखदुःखांपासून निराळाच असतो २६.
घट घायें कीजे शतचूर । परी आकाशीं न निघे चीर ।
तेवीं नश्वरीं अनश्वर । जाण साचार निजात्मा ॥ २७ ॥
तेवीं नश्वरीं अनश्वर । जाण साचार निजात्मा ॥ २७ ॥
घटावर दगड घालून त्याचे शतशः तुकडे केले तरी आकाशाला एक भेगसुद्धा पडत नाही. त्याप्रमाणे नश्वरामध्येच आत्मा हा खरोखर अनश्वर असतो २७.
घट फुटोनि जेथ नाशे । तेथ आकाश आकाशीं सहज असे ।
नवा घट जेथ उपजो बैसे । तों तेथ आकाशें व्यापिजे ॥ २८ ॥
नवा घट जेथ उपजो बैसे । तों तेथ आकाशें व्यापिजे ॥ २८ ॥
घट फुटून जेव्हां नाश पावतो, त्या वेळी आकाश हें स्वयंसिद्ध आकाशामध्येच असते. किंवा नवा घट तयार व्हावयाला लागला, की त्यालाही आकाश व्यापून टाकतें २८.
तेवीं देहाचें नश्वरपण । आत्मा अखंडत्वें परिपूर्ण ।
आत्म्यासी देहांतरगमन । जन्ममरण असेना ॥ २९ ॥
आत्म्यासी देहांतरगमन । जन्ममरण असेना ॥ २९ ॥
त्याचप्रमाणे ह्या देहाची अशाश्वती आहे, आणि आत्मा हा अखंडपणाने परिपूर्णच आहे. आत्म्याला दुसऱ्या देहांतही जाणे नाही, आणि त्याला जन्ममरणही पण नाहीं २९.
देहीचें देहांतरगमन । वासनायोगें करी मन ।
तें मनोगमनाचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ ४३० ॥
तें मनोगमनाचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ ४३० ॥
जीवाचे एका देहांतून दुसऱ्या देहांत जाणे हें वासनेच्या योगाने मनच करितें. तें मन जीवासह दुसऱ्या देहांत कसे जातें तें सारे लक्षण सांगेन, ऐक ४३०.
ध्यायन्मनोऽनुविषयान् दृष्टान्वानुश्रुतानथ ।
उद्यत्सीदत् कर्मतन्त्रं स्मृतिस्तदनुशाम्यति ॥ ३७ ॥
उद्यत्सीदत् कर्मतन्त्रं स्मृतिस्तदनुशाम्यति ॥ ३७ ॥
[श्लोक ३७] कर्माच्या अधीन असणारे मन नेहमी या किंवा परलोकांशी संबंधीत विषयांचे चिंतन करीत असते जेव्हा ते नव्या विषयाचे चिंतन करते, तेव्हा ते पहिला विषय विसरते त्यावेळी त्याची अगोदरच्या विषयांची स्मृतीसुद्धा नाहीशी होते. (३७)
श्रुतदृष्टविषयांचें ध्यान । निरंतर वाढवी मन ।
तीव्र धारण दारुण । अन्य स्फुरण स्फुरेना ॥ ३१ ॥
तीव्र धारण दारुण । अन्य स्फुरण स्फुरेना ॥ ३१ ॥
मन नेहमी पाहिलेल्या व ऐकलेल्या विषयांचा निदिध्यास वाढवीत असते. तो त्या मनाचा निदिध्यास फार कठीण व अत्यंत भयंकर असतो. त्यापुढे त्याला दुसरे काही सुचत म्हणून नाही ३१.
आवडत्या विषयांचें ध्यान । अंतकाळीं ठसावे जाण ।
तेव्हां तदाकार होय मन । सर्वभावें आपण तन्निष्ठा ॥ ३२ ॥
तेव्हां तदाकार होय मन । सर्वभावें आपण तन्निष्ठा ॥ ३२ ॥
अंतकालच्या वेळी आवडत्या विषयाचेच ध्यान मनात ठसून राहते, तेव्हां मन तदाकार बनते. ते सर्वभावाने त्यांत मिळून जातें ३२.
तेव्हां भोगक्षयें जाण । मागल्या देहाचा अभिमान ।
सहजेंचि विसरे मन । पुढील ध्यान एकाग्रतां ॥ ३३ ॥
सहजेंचि विसरे मन । पुढील ध्यान एकाग्रतां ॥ ३३ ॥
तेव्हां ते भोग संपले की, मन हे सहजच पूर्वीच्या देहाचा अभिमान विसरून जाते, आणि पुढील देहाचेच एकाग्रतेने ध्यान करीत राहते ३३.
विषयवासनारूढ मन । निजकर्मतंत्रे जाण ।
देहांतरीं करी गमन । तेथ सप्राण संचरे ॥ ३४ ॥
देहांतरीं करी गमन । तेथ सप्राण संचरे ॥ ३४ ॥
विषयवासनेवर लुब्ध झालेले मन, आपल्या कर्मानुसार प्राणांसहवर्तमान दुसऱ्या देहांत संचार करिते ३४.
मागील सांडिल्या देहातें । सर्वथा स्मरेना चित्तें ।
पुढें धरिलें आणिकातें । हेंही मनातें स्मरेना ॥ ३५ ॥
पुढें धरिलें आणिकातें । हेंही मनातें स्मरेना ॥ ३५ ॥
पूर्वी सोडलेला जो देह असतो, त्याचे चित्ताला मुळींच स्मरण होत नाही. आणि आपण पुन्हा दुसरा देह धारण केला आहे, याचीही मनाला आठवण होत नाही ३५.
विषयाभिनिवेशेन नात्मानं यत्स्मरेत्पुनः ।
जन्तोर्वै कस्यचिद्धेतोर्मृत्युरत्यन्तविस्मृतिः ॥ ३८ ॥
जन्म त्वात्मतया पुंसः सर्वभावेन भूरिद ।
विषयस्वीकृतिं प्राहुर्यथा स्वप्नमनोरथः ॥ ३९ ॥
जन्तोर्वै कस्यचिद्धेतोर्मृत्युरत्यन्तविस्मृतिः ॥ ३८ ॥
जन्म त्वात्मतया पुंसः सर्वभावेन भूरिद ।
विषयस्वीकृतिं प्राहुर्यथा स्वप्नमनोरथः ॥ ३९ ॥
[श्लोक ३८, ३९] नवीन देहाच्या विषयात तल्लीन झाल्यामुळे जीवाला, पहिल्या देहाचे विस्मरण होते कोणत्याही कारणाने आपल्या अगोदरच्या शरीराविषयी मुळीच आत्मीयता नसणे. (किंवा त्याला पूर्णपणे विसरणे) म्हणजेच मृत्यू होय. (३८)
हे उदार उद्धवा ! मनुष्य जेव्हा नव्या शरीराचा पूर्णपणे आपलेपणाने स्वीकार करतो, तोच त्याचा जन्म होय ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये किंवा मनोरथ करताना माणूस नव्या शरीराचा आपले म्हणून स्वीकार करतो. (३९)
हे उदार उद्धवा ! मनुष्य जेव्हा नव्या शरीराचा पूर्णपणे आपलेपणाने स्वीकार करतो, तोच त्याचा जन्म होय ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये किंवा मनोरथ करताना माणूस नव्या शरीराचा आपले म्हणून स्वीकार करतो. (३९)
विषयाभिनिवेशें मन । ज्या स्वरूपाचें करी ध्यान ।
तद्रूप होय आपण । पूर्वदेहाचें स्मरण विसरोनियां ॥ ३६ ॥
तद्रूप होय आपण । पूर्वदेहाचें स्मरण विसरोनियां ॥ ३६ ॥
मन हे विषयलोलुपतेने ज्या स्वरूपाचे चिंतन करीत असते, त्यामध्येच ते स्वतः पूर्वदेहाची आठवण विसरून तद्रूप बनून राहते ३६.
तेंचि विस्मरण कैसें । निजबालत्व प्रौढवयसें ।
निःशेख नाठवे मानसें । पूर्वदेह तैसें विसरोनि जाय ॥ ३७ ॥
निःशेख नाठवे मानसें । पूर्वदेह तैसें विसरोनि जाय ॥ ३७ ॥
तें पूर्वदेहाला कसे विसरतें ? तर आपण प्रौढ वयांत आलों म्हणजे आपले लहानपण आपणांला जसे मुळीच आठवत नाही, त्याप्रमाणेच तेही आपल्या पूर्वीच्या देहाला विसरून जातें ३७.
ऐसें अत्यंत विस्मरण । त्या नांव देहाचें मरण ।
त्या विसरासवें जाण । चेतना सप्राण निघोनि जाये ॥ ३८ ॥
त्या विसरासवें जाण । चेतना सप्राण निघोनि जाये ॥ ३८ ॥
अशा प्रकारचे जें निखालस विस्मरण, त्याचेच नांव देहाचे मरण होय. त्या विस्मरणाबरोबरच चेतना प्राणांसह निघून जाते ३८.
जेव्हां चेतना जाय सप्राण । तेव्हां देहासी ये प्रेतपण ।
त्या नांव उद्धवा मरण । जन्मकथन तें ऐक ॥ ३९ ॥
त्या नांव उद्धवा मरण । जन्मकथन तें ऐक ॥ ३९ ॥
चेतना प्राणांसह निघून गेली म्हणजे देहाला प्रेतपणा प्राप्त होतो. उद्धवा! त्याचंच नाव मरण होय. आतां जन्माची गोष्ट ऐक ३९.
स्न्नेहें द्वेषें अथवा भयें । अंतकाळीं जें ध्यान राहे ।
पुरुष तद्रू्पचि होये । जन्मही लाहे तैसेंचि ॥ ४४० ॥
पुरुष तद्रू्पचि होये । जन्मही लाहे तैसेंचि ॥ ४४० ॥
मृत्युसमयीं स्नेहाने, द्वेषाने किंवा भयाने जो निदिध्यास राहतो, तद्रूपच तो होतो, आणि त्याला तसलाच जन्म प्राप्त होतो ४४०.
भरत करितां अनुष्ठान । अंतीं लागलें मृगाचें ध्यान ।
तो मृगचि झाला आपण । ध्यानानुरूपें मन जन्म पावे ॥ ४१ ॥
तो मृगचि झाला आपण । ध्यानानुरूपें मन जन्म पावे ॥ ४१ ॥
जडभरत अनुष्ठान करीत असतां अंतकालीं त्याला स्नेहाने मृगाचे ध्यान लागले, त्यामुळे तो स्वत:च मृग झाला. कारण, त्याच्या निदिध्यासाप्रमाणे त्याचे मन जन्मास आलें (भागवत स्कं.५ अ. ८१९) ४१.
भयास्तव भृंगाचें ध्यान । कीटकी करितां जाण । ते तद्रूओअ होय आपण । ध्यानानुरूपें मन जन्म पावे ॥ ४४२ ॥
अळी ही भीतीने कुंभारणीचें ध्यान करीत असतां ती स्वतः तद्रूप होते. कारण ध्यानाप्रमाणेच मन जन्मास येते ४२.
द्वेषें ध्यातां श्रीकृष्णासी । तद्रूपता झाली पौण्ड्रकासे ।
जैसें दृढ ध्यान मानसीं । ते गति पुरुषासी त्रिशुद्धी ॥ ४४३ ॥
जैसें दृढ ध्यान मानसीं । ते गति पुरुषासी त्रिशुद्धी ॥ ४४३ ॥
पौंडूकानें द्वेषाने श्रीकृष्णाचे ध्यान केले, त्यामुळेच त्याला तद्रूपता प्राप्त झाली. ह्यावरून मनाला ज्या विषयाचा दृढतर निदिध्यास लागलेला असतो, तशाच प्रकारची खरोखर पुरुषाला गति प्राप्त होते ४३.
वाढवूनियां संभ्रम । अंतकाळीं आवडे सप्रेम । जेथें ध्यान ठसावें मनोरम । तेंचि जन्म पुरुषासी ॥ ४४४ ॥
संसाराचा पसारा आपणच वाढवून ठेविलेला असल्यामुळे अंतकालींही तो सर्व प्रेमाचा आवडता विषय होऊन राहातो. पण त्यांतही जेथें विशेषतः ध्यान बसते, त्याच स्वरूपाचा जन्म पुरुषाला येतो ४४.
मग तेणें ध्यानानुभवें । जैसा कांहीं आकारू संभवे ।
तेथ देहाभिमान पावे । 'हें मी आघवें' म्हणोनी ॥ ४५ ॥
तेथ देहाभिमान पावे । 'हें मी आघवें' म्हणोनी ॥ ४५ ॥
मग त्या चिंतनाच्या सामर्थ्याप्रमाणे जशा आकाराचा देह प्राप्त होतो, तशाच देहाचा अभिमान उत्पन्न होतो. आणि 'हा सारा देह मीच' असें तो समजतो ४५.
येथ मन आणि अभिमान । स्वरूप एक कार्यें भिन्न ।
हें चित्तचतुष्टयलक्षण । जाणती सज्ञान एकात्मता ॥ ४६ ॥
हें चित्तचतुष्टयलक्षण । जाणती सज्ञान एकात्मता ॥ ४६ ॥
ह्यांत मन आणि अभिमान ह्यांचं स्वरूप पाहूं गेलें तर एकच असते, पण कार्य मात्र भिन्न असतात. हे चित्तचतुष्टयाचं स्वरूप ज्ञानी लोक एकात्मतेने जाणत असतात ४६.
दैवयोगें त्या देहाचें । बरवें वोखटें घडे साचें ।
तैं अभिमान घेऊनि नाचे । जन्म पुरुषाचें या नांव ॥ ४७ ॥
तैं अभिमान घेऊनि नाचे । जन्म पुरुषाचें या नांव ॥ ४७ ॥
त्या देहाचे बरे किंवा वाईट दैवयोगाप्रमाणेच वस्तुतः होत असते. पण तो देहाचाच अभिमान घेऊन नाचत असतो. ह्याचंच नांव पुरुषाचा जन्म ४७.
परी हें देह नव्हे आन । हेंही स्मरेना तें मन ।
पूर्वील जो देहाभिमान । तोचि येथ जाण आरोपी ॥ ४८ ॥
पूर्वील जो देहाभिमान । तोचि येथ जाण आरोपी ॥ ४८ ॥
पण हा देह पूर्वीचा नव्हे, हा दुसरा आहे, हेही त्याच्या मनाला स्मरत नाही. ह्यामुळे पूर्वीचा जो देहाभिमान असतो, तोच ह्या ठिकाणीही धरून बसतो ४८.
येचि अर्थींचा दृष्टांत । स्वयें सांगताहे श्रीकृष्णनाथ ।
जेवीं स्वप्न आणी मनोरथ । विसरवित निजदेहा ॥ ४९ ॥
जेवीं स्वप्न आणी मनोरथ । विसरवित निजदेहा ॥ ४९ ॥
ह्याच अर्थाचा दृष्टान्त श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत. ज्याप्रमाणे स्वप्नात किंवा मनोराज्यांत आपल्या देहाचे भान नसते ४९;
स्वगृहीं दरिद्री निद्रित । तो स्वप्नीं होय अमरनाथ ।
मग उर्वशीप्रमुख अप्सरांत । असे मिरवत ऐरावतीं ॥ ४५० ॥
मग उर्वशीप्रमुख अप्सरांत । असे मिरवत ऐरावतीं ॥ ४५० ॥
एकादा भिकारी आपल्या घरांतच निजलेला असतो आणि तो स्वप्नामध्ये इंद्र होतो; मग तो ऐरावतावरून उर्वशीसारख्या मोठमोठ्या अप्सरांमध्ये मिरवतो ४५०;
तें दरिद्रदेह माझें गेलें । हें अमरदेह प्राप्त झालें ।
ऐसें स्वप्नीं नाहीं आठवलें । तैसें जन्म झालें जनासी ॥ ५१ ॥
ऐसें स्वप्नीं नाहीं आठवलें । तैसें जन्म झालें जनासी ॥ ५१ ॥
आपला पूर्वीचा भिकार देह गेला, हा नवा देवाचा देह आपणांला प्राप्त झाला, असें कांहीं स्वप्नांत त्याला स्मरत नसते; त्याप्रमाणेच लोकांच्या जन्मांची स्थिति आहे ५१.
मजूर राउळींचें घृत नेतां । तो तुरुंगीं चढे मनोरथा ।
मन नाचूं लागे उल्हासतां । स्वकल्पिता कल्पना ॥ ५२ ॥
मन नाचूं लागे उल्हासतां । स्वकल्पिता कल्पना ॥ ५२ ॥
एकादा मजूर देवळांतील तुपाची घागर घेऊन जात असतां मनामध्ये मनोराज्य करीत असतो की, मी घोड्यावर बसलो आहे आणि त्याच स्वकल्पित कल्पनातरंगांतच मन उल्हासाने नाचू लागते ५२.
सबळ वारूचें उड्डाण । म्हणूनि उडूं जातां आपण ।
पडोनि घृतकुंभ होय भग्न । पुसती जन काय झालें ॥ ५३ ॥
पडोनि घृतकुंभ होय भग्न । पुसती जन काय झालें ॥ ५३ ॥
इतक्यांत त्या मनोराज्यांतच घोड्याने उंच उडी मारिली असें वाटून तो स्वतःही उडी मारतो, तेव्हा त्याच्याजवळची तुपाची घागर पडून तिचे तुकडे होऊन जातात, आणि मग लोक विचारूं लागतात की, 'हे काय झाले ?' ५३.
बळें उडाला माझा घोडा । परी स्मरेना तो फुटला घडा ।
बंदीं पडला रोकडा । नेणे बापुडा मनोरथें ॥ ५४ ॥
बंदीं पडला रोकडा । नेणे बापुडा मनोरथें ॥ ५४ ॥
तो त्या मनोराज्यांतच म्हणतो की, 'माझ्या घोडयाने जोराने उडी मारली. ' पण तुपाची घागर फुटली व त्या अपराधामुळे तो खरोखर बंदीतही पडला, तरी देखील त्याला मनोराज्यामुळे त्याचे भानही नसते ५४.
येथवरी तीव्र जें विस्मरण । त्या नांव देहाचें मरण ।
अतिउद्यत जें मनाचें ध्यान । तेंचि जन्म प्राण्यासी ॥ ५५ ॥
अतिउद्यत जें मनाचें ध्यान । तेंचि जन्म प्राण्यासी ॥ ५५ ॥
येथपर्यंतचे त्याचे जे तीव्र विस्मरण, त्याचंच नांव देहाचे मरण होय आणि मनाचा जो तीव्र निदिध्यास तेंच प्राण्याचें जन्म होय ५५.
एवं आत्म्यासी जन्ममरण । तें केवळ भ्रमाचें लक्षण ।
तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ५६ ॥
तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ५६ ॥
तात्पर्य, आत्म्याला जन्म किंवा मरण म्हणणे हे केवळ भ्रमाचे लक्षण होय. त्याच अर्थाचें निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत ५६.
स्वप्नं मनोरथं चेत्थं प्राक्तनं न स्मरत्यसौ ।
तत्र पूर्वमिवात्मानमपूर्वं चानुपश्यति ॥ ४० ॥
तत्र पूर्वमिवात्मानमपूर्वं चानुपश्यति ॥ ४० ॥
[श्लोक ४०] नव्या स्वप्नामध्ये किंवा मनोरथ करताना पहिले स्वप्न किंवा मनोरथ जीवाला मुळीच आठवत नाही त्याचप्रमाणे नव्या शरीराचा स्वीकार केल्यावर जीव आपण पूर्वीचेच असूनही नव्यानेच उत्पन्न झालो आहो, असे मानतो. (४०)
स्वप्न देखत्या पुरुषासी । विसरोनि निजदेहासी ।
स्वप्नींच्या देहगेहांसी । साभिमानेंसीं वाढवी ॥ ५७ ॥
स्वप्नींच्या देहगेहांसी । साभिमानेंसीं वाढवी ॥ ५७ ॥
स्वप्न हे पाहाणाऱ्या पुरुषाला देहभान विसरावयास लावून स्वप्नांतील घरादारांचाच पसारा त्याच्या अभिमानासह वाढवितें ५७.
जागृतिदेहो राहिला तेथें । स्वप्नदेहो पावलों येथें ।
एवं पूर्व अपूर्व दोहींतें । न स्मरे चित्ते पुरुष जैसा ॥ ५८ ॥
एवं पूर्व अपूर्व दोहींतें । न स्मरे चित्ते पुरुष जैसा ॥ ५८ ॥
जागृतींतील देह तिकडे राहिला, आणि येथे आपल्याला स्वप्नदेह प्राप्त झाला आहे, अशा प्रकारे पूर्वीच्या व सांप्रतच्या दोन्ही देहांना जसा पुरुष स्मरत नाही ५८,
जागृति आणि देखिलें स्वप्न । या दोहीं देहांसीं देखता भिन्न ।
तेवीं जन्म आणि मरण । जीवासी जाण असेना ॥ ५९ ॥
तेवीं जन्म आणि मरण । जीवासी जाण असेना ॥ ५९ ॥
जागृति व पाहिलेले स्वप्न अशा दोन्ही स्थितीतील देहांना पाहणारा त्यांच्याहून भिन्नच असतो; त्याप्रमाणेच जीव हा जन्म व मरण ह्या अवस्थांहून भिन्न आहे. म्हणजे जीवाला जन्म आणि मरण ही दोन्ही नाहींत ५९,
एवं देहासी जन्म नाश । आत्मा नित्यमुक्त अविनाश ।
स्वप्नमनोरथविलास । तैसा बहुवस संसार ॥ ४६० ॥
स्वप्नमनोरथविलास । तैसा बहुवस संसार ॥ ४६० ॥
तात्पर्य, जन्म आणि मृत्यु हे फक्त देहालाच आहेत. आत्मा आहे तो नित्य मुक्त व शाश्वत असून स्वप्नांतील मनोरथांच्या तरंगांप्रमाणे संसार हा अनेक प्रकारांनी विस्तारलेला आहे ४६०.
देहासी जन्म स्थिति मरण । यांसी मनचि गा कारण ।
मनःकल्पित संसार जाण । तेंचि श्रीक्रुष्ण सांगत ॥ ६१ ॥
मनःकल्पित संसार जाण । तेंचि श्रीक्रुष्ण सांगत ॥ ६१ ॥
देहाला उत्पत्ति, स्थिति आणि लय होण्याला मनच कारण आहे. म्हणून संसार आहे तो मनःकल्पित आहे. तेच श्रीकृष्ण सांगतात ६१.
इन्द्रियायनसृष्ट्येदं त्रैविध्यं भाति वस्तुनि ।
बहिरन्तर्भिदाहेतुर्जनोऽसज्जनकृद्यथा ॥ ४१ ॥
बहिरन्तर्भिदाहेतुर्जनोऽसज्जनकृद्यथा ॥ ४१ ॥
[श्लोक ४१] मनाच्या निरनिराळ्या देहांविषयीच्या अभिमानामुळे आत्म्याच्या ठिकाणी उत्तम, मध्यम व अधम असा नसलेलाच भेद उत्पन्न होतो तसाच आतबाहेर हा भेद उत्पन्न होतो जसा दृष्ट पुत्राला जन्म देणारा पिता त्या मुलामुळे लोकांचा शत्रू किंवा मित्र बनतो. (४१)
मनें कल्पिली सकळ सृष्टी । मनःकृत इंद्रियकामाठी ।
मनें वाढविली त्रिपुटी । कर्मकसवटी विभाग ॥ ६२ ॥
मनें वाढविली त्रिपुटी । कर्मकसवटी विभाग ॥ ६२ ॥
सर्व सृष्टि मनानेच कल्पिली आहे. इंद्रियांचे सर्व व्यापार मनामुळेच होतात, आणि कर्माच्या कसोटीच्या विभागाप्रमाणे मनानेच ही त्रिपुटी वाढविलेली आहे ६२.
अधिदेव अध्यात्म अधिभूत । हें त्रैविध्य मनःकृत ।
वस्तु अखंडचि तेथ । त्रिधा भासत कल्पना ॥ ६३ ॥
वस्तु अखंडचि तेथ । त्रिधा भासत कल्पना ॥ ६३ ॥
अधिदैव, अध्यात्म व अधिभूत हे तीन प्रकारही मनानेच केलेले आहेत. खरोखर आत्मवस्तु ही अखंड असूनही तीन प्रकारच्या कल्पनेचा भास होतो ६३.
जैसें भांडें कुंभार करी । तेथ नभ दिसे तदाकारीं ।
गगन सर्वथा अविकारी । तें दिसे विकारी भांडयोगें ॥ ६४ ॥
गगन सर्वथा अविकारी । तें दिसे विकारी भांडयोगें ॥ ६४ ॥
ज्याप्रमाणे कुंभार गाडगे तयार करतो त्या वेळी त्यांतले आकाशही त्याच आकाराचे दिसू लागते, खरे म्हटले तर आकाश हें निखालस निर्विकार आहे तरी त्या गाडग्याच्या योगाने तेही विकृत झालेले दिसते ६४,
तेवीं आत्मा अविकारी नित्य शुद्ध । तेथ मनःकल्पित त्रिविध ।
नानापरींच्या त्रिपुटी विविध । वाढविला भेद तो ऐक ॥ ६५ ॥
नानापरींच्या त्रिपुटी विविध । वाढविला भेद तो ऐक ॥ ६५ ॥
तद्वत् आत्मा हा अविकृत, नित्य आणि शुद्ध असाच आहे. त्याला मन हें तीन प्रकारचा कल्पिते आणि त्या नानाप्रकारच्या त्रिपुटींनीच अनेक प्रकारचा भेद वाढतो. तो कसा वाढतो तें ऐक ६५.
कार्य कर्म आणि कर्ता । ध्येय ध्यान आणि ध्याता ।
ज्ञेय ज्ञान आणि ज्ञाता । या मनःकल्पिता त्रिविध ॥ ६६ ॥
ज्ञेय ज्ञान आणि ज्ञाता । या मनःकल्पिता त्रिविध ॥ ६६ ॥
कार्य, कर्म आणि कर्ता; ध्येय, ध्यान आणि ध्याता; ज्ञेय, ज्ञान आणि ज्ञाता ; ह्या तीन त्रिपुटी मनानेच कल्पिलेल्या आहेत ६६.
अहं कोहं सोहं भेद । त्वंपद तत्पद असिपद ।
सत् चित् आणि आनंद । हेही संबंध मायिक ॥ ६७ ॥
सत् चित् आणि आनंद । हेही संबंध मायिक ॥ ६७ ॥
'अहं' म्हणजे मी, 'कोहं' म्हणजे मी कोण अशी आशंका, व 'सोहं' म्हणजे परब्रह्म तोच मी, असा हा भेद; किंवा 'त्वं' म्हणजे जीव, 'तत् ' म्हणजे ब्रह्म, आणि 'असि' म्हणजे तूं आहेस, ही पदें; किंवा सत, चित् व आनंद हे संबंध ही सर्व मायिक होत ६७.
असंताचिये निवृत्ती । संतत्व प्रतिपादी वेदोक्ती ।
जडाचिये समाप्ती । चिदत्व बोलती वस्तूसी ॥ ६८ ॥
जडाचिये समाप्ती । चिदत्व बोलती वस्तूसी ॥ ६८ ॥
असत् म्हणजे मिथ्या अशी जी माया, तिचा निरास करण्यासाठी वेदवाणीही सतचे प्रतिपादन करिते आणि जडाचा लय होण्यासाठी आत्मवस्तूलाच चैतन्यतत्त्व असें म्हणतात ६८.
करितां दुःखाचा छेद । वस्तूसी म्हणती परमानंद ।
एवं सच्चिदानंद । जाण प्रसिद्ध मायिक ॥ ६९ ॥
एवं सच्चिदानंद । जाण प्रसिद्ध मायिक ॥ ६९ ॥
दुःखाचा निरास करतांना परब्रह्मालाच परमानंद असें म्हणतात. म्हणून सच्चिदानंद हाही उघडच मायिक ठरतो ६९.
असंत मिथ्या मायिक पाहीं । तैसें तत्त्व कोण ठेवीं ठायीं ।
जडासीचि ठाव नाहीं । तेथ चिदत्व कायी संपादे ॥ ४७० ॥
जडासीचि ठाव नाहीं । तेथ चिदत्व कायी संपादे ॥ ४७० ॥
असत् हे मिथ्या असल्यामुळे मायिक आहे. तसलें तत्त्व ठिकाणावर ठेवणार कोण? जडालाच जर मुळी ठिकाण नाहीं, तर तेथे चैतन्याचे तत्त्व तरी हातीं कसें लागणार ? ४७०.
जेथ नाहीं दुःखसंबंध । तेथ कोण म्हणे आनंद ।
एवं वस्तूच्या ठायीं सच्चिदानंद । मायिक संबंध या हेतू ॥ ७१ ॥
एवं वस्तूच्या ठायीं सच्चिदानंद । मायिक संबंध या हेतू ॥ ७१ ॥
जेथें दुःखाचा मुळीच संबंध नाही, तेथे आनंद असें म्हणणार कोण ? म्हणून परब्रह्माच्या ठिकाणी सच्चिदानंद हा संबंध लावणे हेही मायिकच होय ७१.
जेथ जें भासे संसारभान । त्रिगुणत्रिपुटी विंदान ।
तें सर्व मायिक मनःकृत जाण । आत्मा तो भिन्न गुणातीत ॥ ७२ ॥
तें सर्व मायिक मनःकृत जाण । आत्मा तो भिन्न गुणातीत ॥ ७२ ॥
जेथें संसाराचे भान होतें तो त्रिगुणाच्या त्रिपुटीचाच खेळ होय. म्हणून तेही सर्व मायिक व मनःकृत होय, हे लक्षात ठेव. आत्मा आहे तो गुणांहून निराळाच आहे ७२.
आत्मा नित्य मुक्त शुद्ध बुद्ध । तेथ भासें जो त्रिविध भेद ।
तो मनःकृत गुणसंबंध । जाण प्रसिद्ध मायिक ॥ ७३ ॥
तो मनःकृत गुणसंबंध । जाण प्रसिद्ध मायिक ॥ ७३ ॥
आत्मा हा नित्य, मुक्त, शुद्ध आणि ज्ञानस्वरूपच आहे. त्यांत जो तीन प्रकारचा भेद दिसून येतो, तो मनाने केलेला गुणसंबंधी भेद आहे. म्हणून उघडच मायामय ठरतो ७३.
पुरुष श्रोत्रिय सदाचार । त्यासी स्त्री करी व्यभिचार ।
तेणें दोषी म्हणती भ्रतार । तैसा भेदप्रकार आत्म्यासी ॥ ७४ ॥
तेणें दोषी म्हणती भ्रतार । तैसा भेदप्रकार आत्म्यासी ॥ ७४ ॥
एकादा पुरुष अग्निहोत्री असून सदाचारी असतो. पण त्याची स्त्री जर व्यभिचार करील, तर त्यामुळे तिचा नवरा दोषी आहे असे लोक म्हणतात, तसाच हा आत्म्याच्या भेदांचा प्रकार आहे. म्हणजे आत्मा वास्तविक अलिप्त असून गुणांचे दोष त्याच्यावर आरोपिलेले असतात ७४.
जेवीं स्वप्नामाजीं नर । एकला होय संसार ।
तो निद्रायोगें चमत्कार । तैसा भेदप्रकार मायिक ब्रह्मीं ॥ ७५ ॥
तो निद्रायोगें चमत्कार । तैसा भेदप्रकार मायिक ब्रह्मीं ॥ ७५ ॥
स्वप्नांत ज्याप्रमाणे एकटाच पुरुष सर्व संसार बनतो, पण तो सर्व चमत्कार वास्तविक निद्रेमुळे होतो, तसाच भेदाचा मायिक प्रकार ब्रह्मामध्येही आहे ७५.
जडाजड देहभेद । परिच्छिन्नत्वें जीवभेद ।
हा स्वप्नप्राय मायिक बोध । आत्मा नित्य शुद्ध अद्वितीय ॥ ७६ ॥
हा स्वप्नप्राय मायिक बोध । आत्मा नित्य शुद्ध अद्वितीय ॥ ७६ ॥
जड आणि अजड हे देहांतील भेद; किंवा निराळा केलेला जीवाचा भेद; हा स्वप्नाप्रमाणेच मायेचा भास होय. आत्मा हा नित्य, शुद्ध आणि अद्वितीय असाच आहे ७६.
ऐसे मायाविभेदनिष्ठ जन । त्यांसी वैराग्यसिद्ध्यर्थं जाण ।
काळकृत जन्ममरण । तेंचि निरूपण हरि बोले ॥ ७७ ॥
काळकृत जन्ममरण । तेंचि निरूपण हरि बोले ॥ ७७ ॥
असे मायेने केलेल्या भेदावरच निष्ठा ठेवून रहाणारे जे लोक आहेत, त्यांना वैराग्य प्राप्त व्हावे म्हणूनच काळाने जन्ममरण लावून दिले आहे. त्याचेच वर्णन श्रीकृष्ण करितात ७७.
नित्यदा ह्यङ्ग भूतानि भवन्ति न भवन्ति च ।
कालेनालक्ष्यवेगेन सूक्ष्मत्वात्तन्न् दृश्यते ॥ ४२ ॥
कालेनालक्ष्यवेगेन सूक्ष्मत्वात्तन्न् दृश्यते ॥ ४२ ॥
[श्लोक ४२] उद्धवा ! काळाची गती सूक्ष्म असल्यामुळे क्षणोक्षणी प्राण्यांच्या शरीरांशी उत्पत्ती आणि नाश असूनही ते दिसून येत नाहीत. (४२)
म्हणे ऐक बापा उद्धवा । स्थावरजंगमादि देहभावा ।
काळाचिया काळप्रभाव । लागला नीच नवा जन्ममृत्यू ॥ ७८ ॥
काळाचिया काळप्रभाव । लागला नीच नवा जन्ममृत्यू ॥ ७८ ॥
ते म्हणाले, बा उद्धवा! ऐक. स्थावर व जंगम आदिकरून जी जी देहस्वरूपे आहेत, त्यांना काळाच्या प्रभावाने नित्य नवा जन्ममृत्यु लागलेलाच आहे ७८.
अतिसूक्ष्म काळगतीसीं । काळ ग्रासीतसे जगासी ।
या अंगींच्या जन्ममृत्यूंसी । नेणवे जीवासी मायामोहें ॥ ७९ ॥
या अंगींच्या जन्ममृत्यूंसी । नेणवे जीवासी मायामोहें ॥ ७९ ॥
काळ आपल्या अगदी सूक्ष्म गतीने साऱ्या जगाला प्रासून टाकीत असतो. हे आंगास चिकटलेले जे जन्ममृत्यु, ते मायेच्या मोहामुळे जीवांना समजू शकत नाहीत ७९.
निजमाता बाळवयासी । प्रकटावयवीं लाडवी पुत्रासी ।
तेचि माता प्रौढवयसेंसी । होय त्या पुत्रासी सलज्ज ॥ ४८० ॥
तेचि माता प्रौढवयसेंसी । होय त्या पुत्रासी सलज्ज ॥ ४८० ॥
आई आपल्या लहान मुलाचे सर्व अवयव उघडे नागडे असताही त्याच्या बालपणी त्याला लाडिकपणे खेळविते, पण तीच आई तो मुलगा मोठा झाला म्हणजे त्याला लाजते ४८०.
ते बाल्यावस्था काळें नेली । हे प्रौढवयसा नवी आली ।
यालागीं माता सलज्ज झाली । हे काळें केली घडामोडी ॥ ८१ ॥
यालागीं माता सलज्ज झाली । हे काळें केली घडामोडी ॥ ८१ ॥
ती बाल्यदक्षा काळाने नेली, आणि ही नवी प्रौढ दशा प्राप्त झाली, म्हणून आईसुद्धा लाजूं लागली. ही सर्व घडामोड काळाने केलेली आहे ८१.
ऐसा नित्य नाश नित्य जन्म । भूतांसी करी काळ सूक्ष्म ।
या जन्ममृत्यूंचें वर्म । नेणती संभ्रम भ्रांत प्राणी ॥ ८२ ॥
या जन्ममृत्यूंचें वर्म । नेणती संभ्रम भ्रांत प्राणी ॥ ८२ ॥
हा सूक्ष्म काळ प्राणिमात्रांना अशा रीतीने नित्य नवा नाश व नित्य नवा जन्म देत असतो, पण भ्रमाने भ्रांत झालेले प्राणी या जन्ममृत्यूचे वर्म जाणत नाहीत ८२.
जो अवस्थाभाग काळें नेला । त्यासवें तो देहचि गेला ।
पुढें वयसा नवी पावला । तो काळें आणिला नवा देहो ॥ ८३ ॥
पुढें वयसा नवी पावला । तो काळें आणिला नवा देहो ॥ ८३ ॥
आयुष्यातील अवस्थेचा जो भाग काळ घेऊन जातो, त्याबरोबर तो देहच जातो. पुढे नवें वय आले म्हणजे काळाने त्याला नवा देहही दिला असे समजावयाचे ८३.
ऐसा संभव आणि असंभवो । नीच नवा काळकृत पहा वो ।
यालागीं त्रिविधविकारीं देहो । स्वयें स्वयमेवो देखिजे ॥ ८४ ॥
यालागीं त्रिविधविकारीं देहो । स्वयें स्वयमेवो देखिजे ॥ ८४ ॥
अहो ! असा हा काळाने केलेला उद्भव आणि नाश नित्य नवाच असतो पहा ! म्हणूनच देह हा तीन प्रकारांनी युक्त आहे, हे आपले आपणच पहावे ८४.
अतर्क्य काळाची काळगती । भूतें जन्ममृत्यु पावती ।
ते अलक्ष्य गतीचे अर्थीं । दृष्टांत श्रीपति दावीत ॥ ८५ ॥
ते अलक्ष्य गतीचे अर्थीं । दृष्टांत श्रीपति दावीत ॥ ८५ ॥
काळाची काळगति अतर्क्य आहे, त्यामुळे प्राण्यांना जन्ममरण प्राप्त होते. त्या अत्यंत गहन काळगतीविषयींच श्रीकृष्ण दृष्टान्त दाखवून देतात ८५.
यथार्चिषां स्रोतसां च फलानां वा वनस्पतेः ।
तथैव सर्वभूतानां वयोऽवस्थादयः कृताः ॥ ४३ ॥
तथैव सर्वभूतानां वयोऽवस्थादयः कृताः ॥ ४३ ॥
[श्लोक ४३] कालाच्या प्रभावाने ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत, नद्यांचे प्रवाह किंवा झाडावरील फळांच्या अवस्था बदलत असतात, त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांच्या शरीराचे आयुष्य, अवस्था इत्यादीसुद्धा बदलत असतात. (४३)
नित्य नूतन दीपज्वाळा । होतां जातां न दिसती डोळां ।
सवेग वाहतां जळकल्लोळा । यमुनाजळा न देखिजे ॥ ८६ ॥
सवेग वाहतां जळकल्लोळा । यमुनाजळा न देखिजे ॥ ८६ ॥
दिव्याच्या ज्वाळा क्षणोक्षणी नव्या नव्या उत्पन्न होतात, पण त्या नवीन उत्पन्न होत असतांना व पूर्वीच्या नाश पावत असतांना डोळ्यांना दिसत नाहीत. यमुनेंतील पाण्याचा प्रवाह मोठमोठ्या लाटांनी वेगाने वाहत असला, म्हणजे त्या प्रवाहांतील पाणी क्षणोक्षणी नवें नवें येऊन जात आहे असे दिसत नाही ८६.
फळ न सांडितां वृक्षदेंठ । कडवट तुरट आंबट ।
तेचि गोड होय चोखट । ऐशी अतर्क्य अदृष्ट काळसत्ता ॥ ८७ ॥
तेचि गोड होय चोखट । ऐशी अतर्क्य अदृष्ट काळसत्ता ॥ ८७ ॥
फळ हे वृक्षाचा देठ न सोडता स्वतः कडवट, तुरट, आंबट किंवा उत्तम गोडही होते. अशी काळाची अदृष्ट सत्ता अतर्क्य आहे ८७.
तोचि काळ देहासरिसा । नित्य नूतन लागला कैसा ।
बाल्य तारुण्य वृद्धवयसा । देहदशा पालटी ॥ ८८ ॥
बाल्य तारुण्य वृद्धवयसा । देहदशा पालटी ॥ ८८ ॥
तोच काळ देहाबरोबर नित्य नवा कसा उत्पन्न होतो? याचे उत्तर असे की, तो बाल्य, तारुण्य व वार्धक्य अशा देहाच्या अवस्था बदलीत असतो ८८.
मूढ कुशळ अशक्तता । अवस्था नाशीत ये अवस्था ।
तेथ 'मी तोचि' हें तत्त्वतां । स्फुरे सर्वथा कैसेनी ॥ ८९ ॥
तेथ 'मी तोचि' हें तत्त्वतां । स्फुरे सर्वथा कैसेनी ॥ ८९ ॥
याशिवाय मूढ, चतुर, अशक्तपणा अशी नवीन नवीन अवस्था पूर्वीच्या अवस्थेचा नाश करून उत्पन्न होत असते. तेव्हां 'पहिला तोच खरोखर मी' हे तरी स्मरण कोणत्या कारणाने होते ? ८९.
ऐसें कल्पील तुझें मन । ते अर्थींचें निरूपण ।
अखंड स्फूर्तीचें कारण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४९० ॥
अखंड स्फूर्तीचें कारण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४९० ॥
अशीही कल्पना तुझ्या मनात येईल. असें म्हणून स्वतः श्रीकृष्ण त्या विषयाचे निरूपण करतांना अखंड स्फूर्तीचे कारण सांगत आहेत ४९०.
सोऽयं दीपोऽर्चिषां यद्वत् स्रोतसां तदिदं जलम् ।
सोऽयं पुमानिति नृणां मृषा गीर्धीर्मृषायुषाम् ॥ ४४ ॥
सोऽयं पुमानिति नृणां मृषा गीर्धीर्मृषायुषाम् ॥ ४४ ॥
[श्लोक ४४] त्याच ज्योतीचा हा दिवा आहे, प्रवाहातील पाणी तेच आहे, असे समजणे आणि म्हणणे जसे खोटे आहे, त्याचप्रमाणे विषयचिंतनामध्ये आपले आयुष्य व्यर्थ घालविणार्या अविवेकी पुरूषांचे तोच हा मनुष्य असे म्हणणे आणि समजणे सर्वथैव खोटे आहे. (४४)
दीपज्वाळा होती जाती । अग्नी जैसा पूर्वस्थिती ।
यालागीं तोचि दीपू म्हणती । ऐशा युक्ती उद्धवा ॥ ९१ ॥
यालागीं तोचि दीपू म्हणती । ऐशा युक्ती उद्धवा ॥ ९१ ॥
उद्धवा! दिव्याच्या ज्वाळा जरी नवीन नवीन उत्पन्न होतात व पूर्वीच्या नाश पावतात, तरी त्यांतील अग्नि पूर्वीप्रमाणेच एकसारखा असतो, एवढ्याकरितांच त्याला 'दिवा' म्हणतात. अशी ही योजना आहे ९१.
प्रवाह वाहती कल्लोळ । परी अखंड एकचि जळ ।
यालागीं म्हणती सकळ । तेंचि जळ या हेतू ॥ ९२ ॥
यालागीं म्हणती सकळ । तेंचि जळ या हेतू ॥ ९२ ॥
किंवा पाण्याच्या प्रवाहामध्ये जोराने मोठमोठ्या लाटा वहात असतात, तरी पाणी असते ते अखंड एकच असते. म्हणूनच सर्व लोक त्याला 'पाणी' असे म्हणतात ९२.
तेवीं देहीं वयसा होती जाती । आत्मा अखंड अनुस्यूती ।
तोचि मी हे स्फुरे स्फूर्ती । या उपपत्ती उद्धवा ॥ ९३ ॥
तोचि मी हे स्फुरे स्फूर्ती । या उपपत्ती उद्धवा ॥ ९३ ॥
त्याचप्रमाणे उद्धवा! देहामध्येही वयपरत्वे निरनिराळ्या अवस्था होतात व जातात, तरी आत्मा असतो तो अखंड सर्वव्यापीच असतो. याच कारणाने 'तोच मी' अशी स्फूर्ति स्फुरण पावते ९३.
म्हणसी मीपणें अहंकार रूढ । तोही अज्ञानत्वें जडमूढ ।
त्यासी प्रकाशक आत्मा दृढ । मीपणें अखंड वस्तुत्वें स्फुरे ॥ ९४ ॥
त्यासी प्रकाशक आत्मा दृढ । मीपणें अखंड वस्तुत्वें स्फुरे ॥ ९४ ॥
आता तू म्हणशील की, 'मीपणाने अहंकार रूढ झाला आहे.' पण त्याचे उत्तर असे की, तोही अज्ञानपणामुळे जड मूढच होय. त्याचा दृढ़ प्रकाशक आत्माच आहे. तेव्हा तोच नेहमीं परब्रह्मस्वरूपाने स्फुरण पावतो ९४.
येथ देहासीचि जन्ममरण । आत्मा अखंडत्वें परिपूर्ण ।
येथ देहात्मबुद्धीचें जें मीपण । ते वाचा जाण् अतिमिथ्या ॥ ९५ ॥
येथ देहात्मबुद्धीचें जें मीपण । ते वाचा जाण् अतिमिथ्या ॥ ९५ ॥
परंतु हें जें जन्ममरण असते, ते देहालाच असते. आत्मा हा सर्वव्यापित्वामुळे परिपूर्णच आहे. देह हाच आत्मा व तोच मी असे जे म्हणतात, ते म्हणणे मिथ्या होय ९५.
विषयांची विषयसिद्धी । देहीं जे कांहीं देहबुद्धी ।
तेही मिथ्या जाण त्रिशुद्धी । भवबंधीं स्थापक ॥ ९६ ॥
तेही मिथ्या जाण त्रिशुद्धी । भवबंधीं स्थापक ॥ ९६ ॥
विषयांची कार्यसिद्धि होणे, किंवा देहाच्या ठायीं 'मी'पणा असणे, ही खरोखर मिथ्याच होय. त्याच्या योगाने संसारबंधनांत मात्र गुंतावयास होते ९६.
कर्मभूमीं नरदेहाऐसें । निधान लाधलें अनायासें ।
तेथींचेनिही आयुष्यें । जे विषयविलासें विगुंतले ॥ ९७ ॥
तेथींचेनिही आयुष्यें । जे विषयविलासें विगुंतले ॥ ९७ ॥
कर्मभूमीत नरदेहासारखा लाभ अनायासे झाला असता, त्यांतील आयुष्यामध्ये जे विषयसुखांत गुंतून पडले ९७.
तो अमृत विकूनि कांजी प्याला । रत्नें देऊनि कोंडा घेतला ।
पर्वत फोडूनि टोळ धरिला । गज विकिला इटेसाठीं ॥ ९८ ॥
पर्वत फोडूनि टोळ धरिला । गज विकिला इटेसाठीं ॥ ९८ ॥
ते त्यांचे कृत्य अमृत विकून टाकून पेज प्याल्याप्रमाणे, किंवा रत्ने देऊन कोंडा घेतल्याप्रमाणे, किंवा पर्वत फोडून टोळ धरल्याप्रमाणे किंवा विटकरासाठी हत्ती विकून टाकल्याप्रमाणे होय ९८.
डोळे फोडूनि काजळ ल्याला । नाक कापूनि शिमगा खेळला ।
तैसा नरदेहा नाडला । नाश केला आयुष्याचा ॥ ९९ ॥
तैसा नरदेहा नाडला । नाश केला आयुष्याचा ॥ ९९ ॥
डोळे फोडून मग त्यांत काजळ घातले, किंवा नाक कापून मग शिमगा खेळला, अशा प्रकाराने त्यांनी नरदेहाची विटंबना केली व आयुष्याचा नाश केला म्हणून समजावें ९९.
वेंचितां धन लक्षकोटी । आयुष्यक्षणाची नव्हे भेटी ।
तेंही वेंचिलें विषयासाठीं । हतायु करंटीं अतिमूढें ॥ ५०० ॥
तेंही वेंचिलें विषयासाठीं । हतायु करंटीं अतिमूढें ॥ ५०० ॥
लाखों किंवा कोट्यवधि धन खर्च केले, तरी आयुष्याचा एक क्षणही मिळावयाचा नाही. असे ते आयुष्यही जी माणसें विषयासाठी खर्च करतात, ती आपल्या आयुष्याचा नाश केलेली, कपाळकरंटी व अत्यंत मूढ होत! ५००.
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २२ ओव्या १ ते १००
एकनाथी भागवत अध्याय २२ ओव्या १0१ ते २००
एकनाथी भागवत अध्याय २२ ओव्या २०१ ते ३००
एकनाथी भागवत अध्याय २२ ओव्या ३०१ ते ४००
एकनाथी भागवत अध्याय २२ ओव्या ४०१ ते ५००
एकनाथी भागवत अध्याय २२ ओव्या ५०१ ते ६००
एकनाथी भागवत अध्याय २२ ओव्या ६०१ ते ७००
एकनाथी भागवत अध्याय २२ ओव्या ७०१ ते ७३०
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...