मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २२ ओव्या १0१ ते २००

    जीव नियम्य ईश्वर नियंता । जीव अज्ञान ईश्वर ज्ञानदाता ।

    जीव परिच्छिन्न एकदेशिता । ईश्वर सर्वथा सर्वगत ॥ १ ॥
    जीव हा नियम्य व ईश्वर  हा नियामक म्ह. शास्ता आहे. जीव हा अज्ञानी आहे; आणि ईश्वर ज्ञानदाता आहे. जीव एकदेशीय असल्यामुळे मर्यादित आहे, आणि ईश्वर सदासर्वदा सर्वव्यापक आहे १.


    जीव हीन दीन अज्ञान । ईश्वर समर्थ सर्वज्ञ ।
    जीवास दृढ कर्मबंधन । ईश्वर तो जाण निष्कर्म ॥ २ ॥
    जीव हा हीन, दीन व अज्ञान आहे; ईश्वर सर्वसमर्थ व सर्वज्ञ  आहे. जीवाला कर्माचें दृढ  बंधन आहे, आणि ईश्वर हा कर्मातीत आहे २.


    एवं ईश्वरकृपें जाण । जीवासी प्राप्त होय ज्ञान ।
    यालागीं ईश्वराहून । जीव भिन्न या हेतू ॥ ३ ॥
    अशा कारणाने ईश्वरकृपेनेंच जीवाला ज्ञान प्राप्त होते. आणि याकरितांच जीव हा ईश्वराहून भिन्न होय ३.


    म्हणशी करितां कर्माचरण । जीवासी प्राप्त होईल ज्ञान ।
    हें सर्वथा न घडे जाण । जडत्वपण कर्मासी ॥ ४ ॥
    आता कदाचित तूं म्हणशील की, कर्माचरण केले म्हणजे जीवाला ज्ञान प्राप्त होईल; पण तसे कधीही होणे नाही. कारण, कर्माला जडत्व आहे ४.


    कर्मा जडत्व जाण । त्यासी बहुत अज्ञान ।
    त्या कर्मासी अत्यंत बद्धपण । हें सज्ञान जाणती ॥ ५ ॥
    कर्माला जडत्व असल्यामुळे त्याला बंधन व अज्ञानही आहे. त्या कर्माला अत्यंत बद्धपणा असल्याचे सज्ञान लोक जाणतात ५.


    कर्म स्वरूपें जड अचेतन । त्यासी चेतविता ईश्वर जाण ।
    तें न करितां ईश्वरार्पण । ज्ञानदाता कोण कर्मासी ॥ ६ ॥
    कर्म हे स्वभावतः जड म्ह• अचेतन असते. त्याला चेतविणारा ईश्वर असतो. याकरितां तें जर ईश्वरार्पण केले नाही, तर त्या कर्माला ज्ञान देणारा कोण ? ६.


    कर्मासी जडत्वें नाहीं सत्ता । कर्मक्रियेचा ईश्वर ज्ञाता ।
    ईश्वरचि कर्मफळदाता । कर्मचेतविता ईश्वरु ॥ ७ ॥
    कर्म जड असल्यामुळे त्याला सत्ता नसते; कर्मक्रियेला जाणणारा ईश्वर असतो; म्हणून कर्माचे फळ देणाराही ईश्वर आणि कर्माला चेतना देणाराही ईश्वरच होय ७.


    ज्ञान तोचि ईश्वर । तेणें रचिला हा विस्तार ।
    संहारितां तोचि निर्धार । सत्तमात्र ईश्वर जाणावा ॥ ८ ॥
    ज्ञान तोच ईश्वर असून त्यानेच हा सृष्टिविस्तार रचला आहे. त्याचा संहार करणाराही सत्तामात्र ईश्वरच आहे ८.


    जीवासी ज्ञानसायुज्यता । कां स्वर्गभोगफळदाता ।
    अथवा इहलोकें वर्तविता । जीवासी तत्त्वतां ईश्वरु ॥ ९ ॥
    जीवाला ज्ञानसायुज्यता म्ह० मोक्ष किंवा स्वर्गफळ देणारा अथवा इहलोकांत वागविणारा खरोखर ईश्वरच होय ९.


    यापरी अवश्य जाण । जीव ईश्वर् करितां भिन्न ।
    तत्त्वें सव्वीस संपूर्ण । बोलिले ब्राह्मण या हेतू ॥ ११० ॥
    याकरितां जीव व ईश्वर हे भिन्न भिन्न मानणेच अवश्यं आहे; या हेतूनेंच ब्राह्मणांनी सारी तत्वें सव्वीस  मानलेली आहेत ११०.


    पंचवीस तत्त्वांची कथा । ते जीवेश्वरांची ऐक्यता ।
    तेही सांगेन मी आतां । त्यांच्या मता संमत ॥ ११ ॥
    आता त्यांच्या मताप्रमाणे पंचवीस तत्त्वांचे विवरण म्हणजे जीवेश्वराची ऐक्यता मानणे तीही मी तुला सांगतों ११.


    पुरुषेश्वरयोरत्र न वैलक्षण्यमण्वपि ।
    तदन्यकल्पनापार्था ज्ञानं च प्रकृतेर्गुणः ॥ ११ ॥
    [श्लोक ११] या शरीरामध्ये असणार्‍या जीव आणि ईश्वरामध्ये किंचितही भेद नाही म्हणून त्यांना वेगळे मानू नये ज्ञान हा सत्त्वगुणात्मक प्रकृतीचा गुण आहे. (अशा प्रकारे २४ जड तत्त्वे आणि एक चेतन पुरूष मिळून २५ तत्त्वे झाली). (११)


    जीवेश्वरांची ऐक्यता । सहजचि असे स्वभावतां ।
    तेथ अणुमात्र भेदवार्ता । न रिघे सर्वथा निश्चित ॥ १२ ॥
    खरें म्हटलें तर जीवेश्वराची ऐक्यता सहजच व स्वाभाविकच आहे. त्यांत अणुमात्रही भेद मानण्याचे कारण नाही, हे अगदी निश्चित होय १२.


    स्वभावें पाहतां दर्पण । एकाचें देखिजे दोन्हीपण ।
    परी द्विधा नव्हेचि आपण । यापरी जाण जीवशिव ॥ १३ ॥
    सहज आरसा घेऊन पाहू लागले असता एका व्यक्तीची दोन रूपें दिसावयास लागतात. पण पहाणारा आपण काही द्विधा होत नाही. त्याप्रमाणेच हे जीव आणि शिव आहेत असें तूं समज १३.


    अज्ञानप्रतिबिंब तें जीव । त्याचा द्रष्टा तो सदाशिव ।
    तरी ऐक्यतेचें जें वैभव । तो निजस्वभाव मोडेना ॥ १४ ॥
    अविद्येत  प्रतिबिंबित झालेला तो जीव, आणि त्याचा दृष्य तो सदाशिव होय. तरी उभयतांचे ऐक्य हा त्यांचा जो मूळचा स्वभावधर्म आहे तो काही मोडत नाही १४.


    जेवीं दर्पणामाजीं आपण । तेवीं जीवरूपें शिवुचि जाण ।
    दोनी चेतनत्वें समान । तेंही लक्षण अवधारीं ॥ १५ ॥
    आरशामध्ये ज्याप्रमाणे आपण असतो, त्याप्रमाणे जीवरूपाने शिवच असतो. चैतन्यधनि ते दोन्ही सारखेच असतात. त्याचेही लक्षण ऐक १५, 


    जैशी चेष्टा कीजे आपण । तेचि प्रतिबिंबीं दिसे जाण ।
    तेवीं ईश्वरसत्ता सचेतन । गमनागमन जीवासी ॥ १६ ॥
    आपण जशी हालचाल करावी, तशीच हालचाल केलेली प्रतिबिंबांतही दृष्टीस पडते. त्याप्रमाणेच ईश्वरसत्ता ही जीवाला जाण्यायेण्याला कारणीभूत होत असते १६.


    जेणें स्वरूपें असे आपण । तद्रूप प्रतिबिंबीं दिसे जाण ।
    तेवीं ईश्वरत्व संपूर्ण । असे अविच्छिन्न जीवामाजीं ॥ १७ ॥
    जसें आपलें स्वरूप असते; तसेंच प्रतिबिंबांतही दिसते; त्याप्रमाणे जीवामध्येही परिपूर्ण ईश्वरपणा भरलेला असतो १७.


    जैसा अग्नि राखां झांकोळिला । तरी अग्नि अग्निपणें असे संचला ।
    तेवीं शिवासी जीवभावो आला । परी नाहीं मुकला निजत्वा ॥ १८ ॥
    ज्याप्रमाणे अग्नि राखेने झांकलेला असला तरी तो अग्नीच्या रूपानेच असतो, त्याप्रमाणे शिवाला जरी जीवपणा आला तरी तो आत्मस्वरूपापासून निराळा होत नाही १८.


    आशकां - "हो कां जीव शिव दोनी एक । तरी एक मलिन एक चोख ।
    तैसें सदोख आणि निर्दोख । हे विशेख कां दिसती" ॥ १९ ॥
    [आशंका] जीव आणि शिव हे दोन्ही जर एक आहेत, तर एक मलिन व एक शुद्ध; एक सदोष, एक निर्दोष; असे भिन्न भिन्न का दिसतात ? १९.


    थिल्लरीं प्रतिबिंबला सविता । त्या प्रतिबिंबाअंगीं सर्वथा ।
    थिल्लरिंचे मळ पाहतां । दिसती तत्त्वतां लागलेसे ॥ १२० ॥
    [ समाधान ] एखाद्या  डबक्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडते, त्या प्रतिबिंबाला डबक्यांतील सारी घाण लागलेली आहे असेंच दिसण्यांत दिसते १२०.


    तेचि निर्वाळोनि पाहतां वेगीं । बिंबप्रतिबिंबनियोगीं ।
    सर्वथा मळ न लगे अंगीं । उभयभागीं विशुद्ध ॥ २१ ॥
    पण तेंच नीट न्याहाळून पाहिले, तर त्या बिंबाला किंवा प्रतिबिंबाला ती घाण मुळीच लागलेली नसते. ती दोन्ही निर्मळच असतात २१.


    आरशाअंगीं टिकले मळ । सुबद्ध बैसले बहुकाळ ।
    ते प्रतिबिंबाअंगीं केवळ । दिसती प्रबळ जडलेसे ॥ २२ ॥
    आरशाच्या अंगावरच मळ बसलेला असून त्याच्यावर फारा दिवसांत कीट बसले असेल, तर तेच प्रतिबिंबावरही चढलेले आहे असे वाटते २२.


    तो मळ जैं पडे फेडावा । तैं आरिसा साहणे तोडावा ।
    परी प्रतिबिंब केव्हां । साहणे धरावा हें बोलूं नये ॥ २३ ॥
    तो  मळ कातून टाकावयाचा असेल, तर आरसाच सहाणेवर घासून स्वच्छ केला पाहिजे, प्रतिबिंब घेऊन सहाणेवर घांसावे असे कधी बोलतां कामा नये २३.


    तेवीं सदोष आणि निर्दोष । केवळ अविद्याचि हे देख ।
    जीव शिव उभयतां चोख । नित्य निर्दोख निजरूपें ॥ २४ ॥
    त्याप्रमाणे सदोष व निर्दोष ही केवळ अविद्याच आहे; जीव आणि शिव हे दोघेही सदासर्वदा आत्मस्वरूपाने निर्दोषच असतात २४.


    पाहतां शुद्धत्वें स्फटिक जैसा । जे रंगीं ठेवावा दिसे त्याऐसा ।
    स्वयें अलिप्त जैसातैसा । जीव स्वभावतां तैसाचि ॥ २५ ॥
    स्फटिक पाहिला तर तो स्वच्छच असतो; पण ज्या रंगावर ठेवावा त्या रंगासारखा दिसू लागतो. तरी तो त्या रंगापासून शुद्ध म्ह० अलिप्तच असतो; त्याप्रमाणेच जीव स्वभावतः अलिप्तच आहे २५.


    जीव स्वयें चित्स्वरूप । जे गुणीं मिळे दिसे तद्रूप ।
    परी गुणदोष पुण्यपाप । जीवासी अल्प लागेना ॥ २६ ॥
     जीव स्वभावतः चित्स्वरूप आहे, पण तो ज्या गुणाशी संलग्न होतो, त्यासारखा दिसतो. तरी गुणदोष किंवा पापपुण्य जीवाला मुळींच लागत नाही २६.


    प्रत्यक्ष प्रतिबिंबीं मिथ्यता । दिसे निजबिंबाचिया सत्ता ।
    तेवीं जीवशिवांसी अभिन्नता । जाण तत्त्वतां निश्चित ॥ २७ ॥
    मूळबिंबाच्या सामर्थ्यानेच प्रत्यक्ष प्रतिबिंबामध्ये गुणांचे मिथ्यात्व दिसते, त्याप्रमाणे जीवामध्ये व शिवामध्ये अभिनव निश्चित आहे २७.


    जीवशिवांचें एकपण । तेणें सव्विसांमाजीं जाण ।
    एक तत्त्व होतां न्यून । शेष तेंचि पूर्ण पंचवीस ॥ २८ ॥
    अशा प्रकारें जीवशिवांचे ऐक्य मानलें असतां सव्वीस तत्त्वांतून एक तत्त्व कमी होऊन बाकी पंचवीसच राहतात २८.


    आशंका - "जीवशिवांचें एकपण । ऐसें जें जाणणें तें 'ज्ञान' ।
    तें एक तत्त्व येथें आन । त्यांमाजीं जाण उपजलें ॥ २९ ॥
    [आशंका]  'मग आतां जीवशिवाचे ऐक्य आहे असें जें जाणणें तें एक ज्ञानच होय. एक नवेंच तत्त्व त्यामध्ये उत्पन्न झाले २९.


    तें ज्ञानतत्त्व अंगीकारितां । पंचवीस सव्वीस तत्त्वकथा ।
    दोनी मतें होती वृथा'' । ऐसें सर्वथा न म्हणावें ॥ १३० ॥
    त्या ज्ञानतत्त्वाचा स्वीकार केल्यास पंचवीस व सव्वीस तत्व ही दोन्ही मते व्यर्थ होतात पण असे कधी म्हणता कामा नये १३०.


    येथ मूळींचें निरूपण । श्लोकाचे अंतींचा चरण ।
    ज्ञान तें प्रकृतीचा गुण । त्यासी वेगळेपण असेना ॥ ३१ ॥
    कारण, मूळच्या श्लोकाच्या शेवटच्या चरणांत ('ज्ञानप्रकृतेर्गुणः '.) ज्ञान हा प्रकृतीचा गुण आहे, तो वेगळा नाही, असे निरूपण केलें आहे ३१.


    गुणकर्मांच्या खटपटा । प्रपंच अज्ञानें अतिलाठा ।
    ज्ञान अज्ञानाचा सत्त्ववांटा । जेवीं कांटेनि कांटा फेडिजे ॥ ३२ ॥
    गुणकर्माच्या खटपटीमुखें प्रपंच हा अज्ञानाने फार माजलेला आहे आणि ज्ञान हा अज्ञानाचा सत्त्वांश आहे. काट्यानेच काटा काढल्याप्रमाणे ज्ञानाने अज्ञान घालविले पाहिजे ३२.


    शोधित जो सत्त्वगुण । त्या नांव बोलिजे मुख्य 'ज्ञान' ।
    तेंही गुणांमाजीं पडे जाण । वेगळेंपण नव्हेचि तत्त्व ॥ ३३ ॥
    शुद्ध झालेला जो सत्त्वगुण असतो, त्यालाच 'मुख्य ज्ञान' असे म्हणतात. ही गुणांमध्येच मोडते. त्याला निराळे तत्त्व म्हणता येत नाही ३३.


    ज्ञान स्वतंत्र तत्त्व होतें । तरी नासतीं दोनी मतें ।
    तें पडे गुणाअंतौतें । यालागीं दोनी मतें निर्दुष्ट ॥ ३४ ॥
    ज्ञान हें जर निराळे तत्त्व झाले असते, तर ही दोन्ही मते व्यर्थ होती; पण ते गुणांमध्येच मोडत असल्याने ती दोन्ही मते निर्दोष आहेत ३४.


    तेचि त्रिगुणांची व्यवस्था । तुज मी सांगेन आतां ।
    ऐक उद्धवा तत्त्वतां । गुण सर्वथा आविद्यक ॥ ३५ ॥
    उद्धवा ! आता मी तुला त्या तीन गुणांची व्यवस्था सांगतो. गुण हे निखालस अविद्यात्मकच आहेत ३५.


    प्रकृतिर्गुणसाम्यं वै प्रकृतेर्नात्मनो गुणाः ।
    सत्त्वं रजस्तम इति स्थित्युत्पत्त्यन्तहेतवः ॥ १२ ॥
    [श्लोक १२] तीन गुणांची साम्यावस्था हेच प्रकृतीचे स्वरूप आहे म्हणून सत्त्व, रज आणि तम हे गुण प्रकृतीचेच आहेत, आत्म्याचे नव्हेत हेच जगाची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलय यांना कारण आहेत. (१२)


    उत्पत्तिस्थितिनिर्दळण । हें त्रिगुणांचें कार्य पूर्ण ।
    'गुणसाम्य' ते प्रकृति जाण । आत्मा 'निर्गुण' गुणातीत ॥ ३६ ॥
    उत्पत्ति, स्थिति आणि नाश हे कार्य त्रिगुणांचे आहे. त्या तीन गुणांची जी साम्यावस्था ती प्रकृति होय. आत्मा हा निर्गुण म्ह० गुणातीत आहे ३६.


    म्हणशी परमात्मा गुणातीत । परी जीवात्मा गुणग्रस्त ।
    हेही गा मिथ्या मात । ऐक वृत्तांत सांगेन ॥ ३७ ॥
    आतां तूं म्हणशील की, परमात्मा जरी गुणातीत असला, तरी जीवात्मा गुणांनी प्रस्त आहे की नाही? पण ती गोष्टही खोटी. कसे ते सांगतों ऐक ३७.


    चंद्र निश्चळ निजस्वभावें । तो चाले त्या अभ्रासवें ।
    दिसे जेवीं सवेग धांवे । तेवीं गुणस्वभावें जीवात्मा ॥ ३८ ॥
    चंद्र हा मूळांत निश्चल असतो. पण तो ढगांबरोबर झपाट्यानें  चालतो असे दिसते. त्याप्रमाणेच गुणस्वभावामुळे जीवात्मा तसा काही तरी भासतो ३८.


    घटामाजी उदक भरितां । घटाकाश भिजेना सर्वथा ।
    तेवीं जीवात्मा गुणीं वर्ततां । अलिप्तता गुणकर्मीं ॥ ३९ ॥
    घटांत पाणी भरले असतां घटाकाश ओलें होत नाहीं; त्याप्रमाणे जीवात्माही गुणांमध्ये वागत असतांना गुणकर्मामध्ये अलिप्त असतो ३९.


    जीव अहंकर्तेपणीं विख्यात । तो केवीं म्हणावा कर्मातीत ।
    येचि अर्थीं कृष्णनाथ । विशदार्थ सांगत ॥ १४० ॥
    पण जीव हा 'मी कर्ता' असा अहंकार धरण्यामध्ये प्रसिद्ध आहे. तो 'कर्मातीत' असें कसें म्हणावें? याचाच खुलासा श्रीकृष्ण सांगतात १४०.


    सत्त्वं ज्ञानं रजः कर्म तमोऽज्ञानमिहोच्यते ।
    गुणव्यतिकरः कालः स्वभावः सूत्रमेव च ॥ १३ ॥
    [श्लोक १३] या विवेचनात सत्त्वगुणच ज्ञान आहे, रजोगुणच कर्म आहे आणि तमोगुणच अज्ञान म्हटले गेले आहे तसेच गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न करणारा ईश्वरच काळ आहे आणि सूत्र म्हणजे महत्तत्त्वच स्वभाव होय. (१३)


    सत्त्वगुणास्तव 'ज्ञान' । रजोगुणें 'कर्म' जाण ।
    मोह आलस्ययुक्त गहन । तमीं 'अज्ञान' नांदत ॥ ४१ ॥
    सत्त्वगुणापासून ज्ञान होते; रजोगुणापासून कर्म होते; आणि तमामध्ये आळसयुक्त मोह व अज्ञान नांदत असते ४१.


    सत्त्वादि जे तिन्ही गुण । केवळ प्रकृतीचे हे जाण ।
    यांसी स्वतंत्रपण । नव्हेचि जाण या हेतू ॥ ४२ ॥
    सत्वादिक जे तिन्ही गुण आहेत ते केवळ प्रकृतीचेच आहेत, म्हणूनच त्यांना स्वतंत्रपणा नाही ४२.


    गुणक्षोभक 'काळ' देख । तो पुरुषाचा अवलोक ।
    पुरुष काळ हा नामविशेख । स्वरूपें एक हे दोन्ही ॥ ४३ ॥
    काळ हा गुणांचा क्षोभक आहे. तो पुरुषाचा अवलोक म्ह• 'ईक्षण' अथवा पाहणे आहे. पुरुष आणि काळ हा नांवांतच काय तो भेद, स्वरूपतः दोन्ही एकच आहेत ४३.


    स्वाभाविक मायेचें स्फुरण । प्रथम कार्य जें निर्माण ।
    त्या नांव 'महत्तत्त्व' जाण । 'सूत्र' 'प्रधान' ज्यासी म्हणती ॥ ४४ ॥
    आणखी मायेचें जें स्वभावसिद्ध स्फुरण होऊन जे पहिले कार्य निर्माण होते, त्याला 'महत्तत्व' असे नाव आहे व त्यालाच 'प्रधान-सूत्र' असेही म्हणतात ४४.


    यालागीं प्रकृतीहूनि भिन्न । यासी न ये वेगळेंपण ।
    हे प्रकृति कार्यकारणीं अभिन्न । तत्त्वविचक्षण मानिती ॥ ४५ ॥
    म्हणून त्यालाही प्रकृतीहून मित्रत्व येत नाही, असे विचारी लोक समजतात ४५.


    अठ्ठावीस तत्त्वें पूर्वोक्त । हें भगवंताचें निज मत ।
    तेंचि अडीचा श्लोकीं सांगत । संख्यातत्त्वार्थ निजबोधें ॥ ४६ ॥
    पूर्वी सांगितलेली अठ्ठावीस तत्त्वें हें  भगवंताचे मत आहे.  ह्याविषयींच पुढील अडीच श्लोकांमध्यें  प्रतिपादन करितात ४६.


    पुरुषः प्रकृतिर्व्यक्तमहङ्‌कारो नभोऽनिलः ।
    ज्योतिरापः क्षितिरिति तत्त्वान्युक्तानि मे नव ॥ १४ ॥
    श्रोत्रं त्वग्दर्शनं घ्राणो जिह्वेति ज्ञानशक्तयः ।
    वाक्पाण्युपस्थपाय्वङ्‌‌घ्रि कर्माण्यङ्‌गोभयं मनः ॥ १५ ॥
    शब्दः स्पर्शो रसो गन्धो रूपं चेत्यर्थजातयः ।
    गत्युक्त्युत्सर्गशिल्पानि कर्मायतनसिद्धयः ॥ १६ ॥
    [श्लोक १४-१६] पुरूष, प्रकृती, महत्तत्त्व, अहंकार, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही नऊ तत्त्वे, मी अगोदरच सांगितली आहेत कान, त्वचा, डोळे, नाक आणि जीभ ही पाच ज्ञानेंद्रिये वाणी, हात, पाय, गुदद्वार आणि जननेंद्रिय ही पाच कर्मेंद्रिये. तसेच कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये असे उभयरूप मन, अशी अकरा इंद्रिये आणि शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे ज्ञानेंद्रियांचे पाच विषय अशा प्रकारे तीन, नऊ, अकरा आणि पाच अशी सर्व मिळून अठ्ठावीस तत्त्वे होतात कम]द्रियांच्या द्वारे होणारी, चालणे, बोलणे, मलमूत्र त्याग आणि काम करणे या पाच कर्मांमुळे तत्त्वांची संख्या वाढत नाही यांना कर्मेंद्रियस्वरूप मानावे. (१४-१६)


    प्रकृति पुरुष महत्तत्त्व । महाभूतें अहंभाव ।
    अठ्ठाविसांत हीं तत्त्वें नव । इतर वैभव तें ऐक ॥ ४७ ॥
    त्या अठ्ठाविसांत प्रकृति, पुरुष, महत्तत्त्व, पंचमहाभूते आणि अहंकार ही नऊ तत्त्वे आहेत. बाकीच्यांचेही माहात्म्य ऐक ४७.


    मुख्य 'ज्ञानेंद्रियें' पांच जाण । पांच 'कर्मेंद्रियें' आन ।
    कर्मेंद्रियें ज्ञानेंद्रियांअधीन । स्वतां गमन त्यां नाहीं ॥ ४८ ॥
    मुख्य ज्ञानेंद्रिये पांच, दुसरी पांच कर्मेदिये. कर्मेदिये ही ज्ञानेंद्रियांच्या स्वाधीन असतात. त्यांना स्वतःचे चलन नाही ४८.


    आंधळें पायीं चालों जाणे । पांगुळ केवळ देखणें ।
    अंधें पंगू खांदीं घेणें । परी बोलें वर्तणें देखण्याचेनि ॥ ४९ ॥
    आंधळ्याला पायाने चालतां येते; पांगळ्याला फक्त पाहतां येते; आंधळ्याने पांगळ्याला खांद्यावर घेतले, तर पाहणाऱ्याच्या शब्दाप्रमाणेच त्यास चालावे लागते ४९.


    तेंवी ज्ञानेंद्रियां कर्मेंद्रियांसी । संगती घडली असे तैशी ।
    यालागीं मुख्यत्वें ज्ञानेंद्रियांसी । हृषीकेशी बोलिला ॥ १५० ॥
    त्याप्रमाणेच ज्ञानेंद्रियांची आणि कर्मेंद्रियांची सांगड जुळलेली आहे. म्हणून श्रीकृष्णांनी ज्ञानेंद्रियांलाच मुख्यत्व दिले आहे १५०.


    उभय इंद्रियां चाळक । तें मनचि गा एकलें एक ।
    येणेंचि अकरा इंद्रियें देख । यदुनायक सांगत ॥ ५१ ॥
    परंतु दोन्ही इंद्रियांना चालक असें एक मनच आहे. ह्याकरितां श्रीकृष्णांनी इंद्रिये अकरा सांगितली ५१.


    इंद्रियविषयनिरूपण । स्वयें सांगताहे नारायण ।
    मुख्यत्वें विषय पांच जाण । तयाचें साधन गत्यादिक ॥ ५२ ॥
    त्या इंद्रियांच्या विषयांचे निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत. मुख्य विषय पांच असून त्यांचे साधन व क्रिया इत्यादि भगवान् सांगतात ५२.


    रसस्पर्शादि लक्षण । पांचही विषय हे जाण ।
    गत्यादि क्रियाचरण । तें जाण साधन या विषयांचें ॥ ५३ ॥
    शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध  असे पांच विषय आहेत (हे ज्ञानेंद्रियगम्य होत), गमन-भाषण इ. क्रियाचरण हे त्या विषयांचे साधन होय ५३.


    दृष्टि रूपातें प्रकाशी । चरण धांवती तयापाशीं ।
    हस्त उद्यत घ्यावयासी । रसस्पर्शसिद्धीसी विषयांचे ॥ ५४ ॥
    दृष्टि ही रूपविषय दाखविते; आणि पाय त्याच्याकडे धावत जातात. रसविषय व स्पर्शसुख इ. घेण्याला हात पुढे होत असतात ५४.


    एवं उभय इंद्रियीं जाण । विषय पांचचि प्रमाण ।
    नव्हे अधिक तत्त्व गणन । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ५५ ॥
    मिळून दोन्ही इंद्रियांमध्ये विषय मुख्य पांचच आहेत. त्यांची  संख्या वस्तुतः अधिक होतच नाहीं असें श्रीकृष्णांनी सांगितले ५५.


    नव एकादश तत्त्वलक्षण । मागां दों श्लोकीं केलें निरूपण ।
    येणें श्लोकें परम प्रमाण । विषय जाण पांचचि ॥ ५६ ॥
    नऊ आणि अकरा तत्त्वांचे लक्षण पूर्वी दोन श्लोकांत सांगितलेच आहे. या श्लोकांवरून विषय हे पांचच ठरतात ५६.


    केवळ ज्ञानेंद्रियीं भोगु नव्हे । कर्मेंद्रियींही भोग न पावे ।
    उभयसंयोगें भोग पावे । परी विषय आघवे पांचचि ॥ ५७ ॥
    केवळ ज्ञानेंद्रियांना विषयाचा उपभोग घेतां येत नाही; किंवा फक्त कर्मेंद्रियांनाही तो मिळत नाही. दोहोंचा संयोग होतो, तेव्हांच त्यांचा भोग घडतो. पण विषय अवधे पांचच ५७.


    इंहीं पांच विषयीं आपण । व्यापिलें चतुर्दश भुवन ।
    सुरासुर भुलविले जाण । यांचें गोडपण मारक ॥ ५८ ॥
    या पांचच विषयांनी ही चतुर्दश भुवनें व्यापून टाकिलीं आहेत. यांची चटक प्राणघातक असून तिने सुरनरांनाही मोहून  टाकले आहे ५८.


    जेवीं कां मैंद गोडपणें । संगती लागोनि जीव घेणें ।
    तेवीं विषयसंगाचें साजणें । बांधोनि नेणें नरकासी ॥ ५९ ॥
    ठक लोक ज्याप्रमाणे स्नेहभावाने सोबतीला राहून संधि सांपडतांच प्राण घेतात, त्याप्रमाणे विषयसंग हा जीवाला बांधून नरकांत टाकतो ५९.


    नरकीं निरय भोगिती । तेथही न सोडी विषयासक्ती ।
    या विषयांऐसा विश्वासघाती । आन त्रिजगतीं असेना ॥ १६० ॥
    नरकांत दुःख भोगतात तरी तेथेसुद्धा विषयासक्ति सोडीत नाहीत. विषयाइतका विश्वासघातकी त्रिभुवनांत मिळायचा नाही १६०.


    ते हे पंच विषय प्रमाण । पांचचि परी अतिदारुण ।
    ब्रह्मादिक नाडले जाण । इतरांचा कोण पडिपाडु ॥ ६१ ॥
    असे हे विषय पांचच आहेत, पण ते महाभयंकर आहेत; त्यांच्यामुळे ब्रह्मदेवासारखे संकटांत पडतात, मग इतरांचा पाड काय ? ६१.


    विषयांचें जें गोडपण । तें विखाहूनि दारुण ।
    विष एकदां आणी मरण । पुनः पुनः मारण विषयांचें ॥ ६२ ॥
    विषयांचा गोडपणा आहे तो विषाहूनही भयंकर होय. कारण विषाने एकदाच मरण येते, विषयांमुळे पुनःपुन्हा मरण ओढवतें ६२.


    पुढती जन्म पुढती मरण । हें विषयास्तव घडे जाण ।
    संसाराचें सबळपण । विषयाधीन उद्धवा ॥ ६३ ॥
    पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण, हें  विषयांमुळेच घडते. उद्धवा ! जन्ममरणरूप संसाराचा जोर विषयाधीनच आहे ६३.


    जेथ विषयांचा विषयत्यागु । तेथें उन्मळे भवरोगु ।
    त्याचा आंदणा मी श्रीरंगु । ज्यासी विषयभोगु नावडे ॥ ६४ ॥
    जेव्हां विषयांचा म्ह. विषयासक्तीचा त्याग होतो, तेव्हांच संसाररूपी रोग उन्मळून पडतो. ज्याला विषयांचे भोग आवडत नाहीत, त्याचा मी श्रीकृष्ण दास होऊन राहतों ६४.


    ते हे पंच विषय गा जाण । तुज म्यां केले निरूपण ।
    आतां त्रिगुणांचें लक्षण । ऐक सावधान सांगतों ॥ ६५ ॥
    असे हे पांच विषय मी तुला सांगितले. आतां तीन गुणांचेही लक्षण सांगतो. तेंही नीट लक्ष देऊन श्रवण कर ६५.


    उत्पत्तिस्थितिनिर्दळण । त्रिगुणांस्तव घडे जाण ।
    यालागीं स्वयें श्रीकृष्ण । तिन्ही गुण अंगीकारी ॥ ६६ ॥
    उत्पत्ति, स्थिति आणि लय हे त्रिगुणांमुळेच होतात. म्हणून श्रीकृष्ण त्या तिन्ही गुणांचा स्वीकार करतात ६६.


    अंगीकारूनि तिन्ही गुण । अठ्ठावीस तत्त्वें केलीं पूर्ण ।
    हें कृष्णसंमत लक्षण । उद्धवा जाण निश्चित ॥ ६७ ॥
    हे तिन्ही गुण जमेस धरून अठ्ठावीस तत्वे त्यांनी पूर्ण केली. उद्धवा ! हेच श्रीकृष्णाच्या मताचें खरें लक्षण आहे, असे निश्चित समजावें ६७.


    त्रिगुणगुणेंवीण प्रकृती । सृष्टिसर्जनीं नाहीं शक्ती ।
    गुणद्वारा उत्पत्तिस्थिती । संहारी अंतीं स्वकार्यें ॥ ६८ ॥
    त्रिगुणांशिवाय प्रकृतीलाही सृष्टि करण्याची शक्ति नाहीं; गुणांच्या द्वारानेच उत्पत्ति, स्थिति आणि अंतीं  संहार ही कार्य ती करिते ६८.


    तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण ।
    कार्यकारणलक्षण । यथार्थ जाण विभाग ॥ ६९ ॥
    ह्याच अर्थाने कार्यकारणाचे लक्षण आणि यथार्थ विभाग श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत ६९.


    सर्गादौ प्रकृतिर्ह्यस्य कार्यकारणरूपिणी ।
    सत्त्वादिभिर्गुणैर्धत्ते पुरुषोऽव्यक्त ईक्षते ॥ १७ ॥
    [श्लोक १७] सृष्टीच्या प्रारंभी कार्य. (अकरा इंद्रिये आणि पंचमहाभूते) आणि कारण. (महत्तत्त्व इत्यादी) यांच्या रूपाने प्रकृतीच असते तीच सत्त्वादी गुणांच्या रूपाने विश्व स्वतःमध्ये धारण करते अव्यक्त परमात्मा या प्रकृतीचा फक्त साक्षी असतो. (१७)


    प्रकृतीपासाव विकारमेळा । त्रिगुणांचिया गुणलीळा ।
    सात कारणें कार्ये सोळा । ऐक वेगळा विभाग ॥ १७० ॥
    प्रकृतीपासूनच सारे विकार, त्रिगुणांच्या साऱ्या लीला, सात कारणे आणि सोळा कार्यें  उत्पन्न होतात. त्यांचे निरनिराळे विभागही ऐक १७०.


    महदहंकारमहाभूतें । सातही 'कारणे' निश्चितें ।
    अकरा इंद्रियें विषययुक्तें । जाणावीं येथे 'कार्यें' सोळा ॥ ७१ ॥
    महत, अहंकार, पंचमहाभूते ही खरोखर सात 'कारणे' होत. आणि पंचविषययुक्त अकरा इंद्रिये ही येथे सोळा 'कार्य' म्हणून समजावीत ७१.


    यापरी निजप्रकृती । रजोगुणातें धरोनि हातीं ।
    कार्यकारणांचिया युक्तीं । करी उत्पत्ती सृष्टीची ॥ ७२ ॥
    अशा प्रकारची ही प्रवृत्ति रजोगुणाला हाताशी धरून कार्यकारणांच्या युक्तीने सृष्टीची उत्पत्ति करते ७२.


    सृजिलिये सृष्टीसी जाण । सत्त्वगुणें करी पालन ।
    तमोगुण निर्दळण । प्रकृति आपण स्वयें करी ॥ ७३ ॥
    उत्पन्न केलेल्या सृष्टीचे सत्त्वगुणाने पालन करते; आणि तमोगुणानें प्रकृति आपण होऊनच तिचा संहार करते ७३.


    पुरुषें न करितां 'ईक्षण' । उत्पत्ति स्थिति निर्दळण ।
    प्रकृतीचेनि नव्हे जाण । तेंही उपलक्षण अवधारीं ॥ ७४ ॥
    परंतु पुरुषाने जर तिच्याकडे पाहिले नाही, तर प्रकृतीच्यानेही उत्पत्ति, स्थिति, संहार होत नाही. त्याचेही कारण श्रवण कर ७४.


    हात पाय न लावितां जाण । केवळ कूर्मीचें अवलोकन ।
    करी पिलियांचें पालन । तैसें ईक्षण पुरुषाचें ॥ ७५ ॥
    हातपाय न हालवितां कांसवी आपल्या दृष्टीनेच जसें पिलाचे पालन करते त्याप्रमाणेच हे पुरुषाचे पाहाणे असते ७५.


    कां सूर्याचिया निजकिरणीं । जेवीं अग्नीतें स्रवे मणी ।
    तेणें स्वधर्मकर्में ब्राह्मणीं । कीजे यज्ञाचरणीं महायागु ॥ ७६ ॥
    किंवा सूर्याच्या किरणामुळे ज्याप्रमाणे सूर्यकांत मण्यांतून आग्न निघतो, आणि त्याच्या योगानेच ब्राह्मण आपल्या स्वधर्मकर्मानें यज्ञयागादिक किंवा मोठमोठे होम करतात ७६.


    तैसें हें जाण चिन्ह । येणें होय कार्य कारण ।
    चाले स्वधर्मआ चरण । यापरी जाण उद्धवा ॥ ७७ ॥
    उद्धवा ! त्याप्रमाणेच हेही लक्षण आहे. ह्याच रीतीने कार्य आणि कारण उत्पन्न होऊन स्वधर्माचरण चालतें ७७.


    ऐसें चालता प्रकृतिपर । ब्राह्मण करिती स्वाचार ।
    तेणें वृद्धि कर्माचार । परापर उद्धवा ॥ ७८ ॥
    प्रकृतीच्या अनुरोधाने चालून ब्राह्मण आपला आचार करीत असतात आणि त्यामुळेच उच्च नीच कर्माची वृद्धि होते ७८.


    तेवीं पुरुषाचें ईक्षण । प्रकृति लाहोनि आपण ।
    उत्पत्ति-स्थिति-निर्दळण । करावया पूर्ण सामर्थ्य पावे ॥ ७९ ॥
    ह्याचप्रमाणे पुरुषाचे ईक्षण मिळवून प्रकृति ही उत्पत्ति, स्थिति व संहार करण्याचे सामर्थ्य पावते ७९.


    छायामंडपींचें विचित्र सैन्य । दिसावया दीपचि कारण ।
    तेवीं प्रकृतिकार्यासी जाण । केवळ ईक्षण पुरुषाचें ॥ १८० ॥
    पडद्यावर दिव्याच्या प्रकाशाने दाखविलेल्या चित्रांतील विचित्र सैन्य दिसायला ज्याप्रमाणे दिवाच कारण असतो, त्याप्रमाणे प्रकृतीच्या कार्याला पुरुषाचे ईक्षणच कारण असते १८०.


    जगाचें आदिकारण । प्रकृति होय गा आपण ।
    प्रकृति प्रकाशी पुरुष जाण। तो महाकारण या हेतु ॥ ८१ ॥
    जगाचे आदिकारण प्रकृति होय; आणि प्रकृति ही पुरुषाकडून प्रकाशिली जात असल्यामुळे पुरुष हा महाकारण होय ८१.


    प्रकृति व्यक्त पुरुष अव्यक्त । हे विकारी तो विकाररहित ।
    हे गुणमयी गुणभरित । तो गुणातीत निजांगें ॥ ८२ ॥
    प्रकृति दृश्य व पुरुष अदृश्य आहे; ही विकारी आहे, तो अविकारी आहे; ही गुणयुक्त आहे, आणि तो स्वतःसिद्ध गुणातीत आहे ८२.


    प्रकृति स्वभावें चंचळ । पुरुष अव्ययत्वें अचळ ।
    प्रकृति बद्धत्वें शबळ । पुरुष केवळ बंधातीत ॥ ८३ ॥
    प्रकृति स्वभावानें चंचल, आणि पुरुष हा अव्यय असल्यामुळे अचळ आहे. प्रकृति ही औपाधिक असल्यामुळे बद्ध आहे; आणि पुरुष हा बंधनापासून अगदी मुक्त आहे ८३.


    प्रकृति स्वभावें सदा शून्य । पुरुष केवळ चैतन्यघन ।
    प्रकृतीस होय अवसान । पुरुष तो जाण अनंत ॥ ८४ ॥
    प्रकृति ही स्वभावतः शून्य म्ह• जड आहे; आणि पुरुष हा केवळ चैतन्यघन आहे. प्रकृतीला अंत आहे; आणि पुरुष हा अनंत आहे ८४.


    प्रकृति केवळ निरानंद । यालागीं तेथ विषयच्छंद ।
    पुरुष पूर्ण परमानंद । विषयकंदच्छेदक ॥ ८५ ॥
    प्रकृति ही आनंदरहित असल्यामुळे तिच्यांत विषयाचा छंद आहे; पुरुष हा पूर्णपणे परमानंदस्वरूप असल्यामुळे विषयाचे मूळच छेदून टाकणारा आहे ८५, 


    प्रकृतिपुरुषांचें वेगळेंपण । तुज म्यां सांगितलें संपूर्ण ।
    हेचि परमार्थाची निजखूण । पुरुष तो भिन्न प्रकृतीसी ॥ ८६ ॥
    अशा प्रकारें प्रकृतीचे आणि पुरुषाचे भिन्न भिन्न स्वरूप सारें मी तुला सांगितले. परमार्थातील मुख्य खूण ती हीच की, पुरुष हा प्रकृतीहून भिन्न आहे ८६.


    तेंचि जाणावया विशद । नाना मतांचे मतवाद ।
    त्या मतांचा मतप्रबोध । तुज मी शुद्ध सांगेन ॥ ८७ ॥
    हेच स्पष्ट कळावयासाठी नाना मतांचे मतवाद झाले आहेत. त्या मतांचा शुद्ध प्रबोध मी तुला सांगतों ऐक ८७.


    व्यक्तादयो विकुर्वाणा धातवः पुरुषेक्षया ।
    लब्धवीर्याः सृजन्त्यण्डं संहताः प्रकृतेर्बलात् ॥ १८ ॥
    [ श्लोक १८] महत्तत्त्व इत्यादी प्रकृतीचे कार्य व अहंकारादिकांचे कारण असणारे पदार्थ आदिपुरूषाच्या संकल्पामुळे शक्ती प्राप्त करून घेऊन एकमेकांत मिसळतात आणि प्रकृतीच्या साह्याने ब्रह्मांड निर्माण करतात. (१८)


    पुरुषेक्षण झालिया प्राप्त । महदहंकरादि पदार्थ ।
    प्रकृतिबळें समस्त । एकत्र होत ब्रह्मांडें ॥ ८८ ॥
    पुरुषाचे ईक्षण प्राप्त झाले असतां प्रकृतीच्या सामर्थ्याने महत्तत्त्व-अहंकारादि पदार्थ एकत्र होऊन ब्रह्मांड उत्पन्न होते ८८.


    पुरुषावलोकें वीर्यप्राप्ती । लाहोनि ब्रह्मांडांतें धरिती ।
    यालागीं यातें 'धातु' म्हणती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ८९ ॥
    पुरुषाच्या अवलोकनानेच प्रकृतीला वीर्यप्राप्ति होऊन ती ब्रह्मांडाला धारण करते; म्हणूनच उद्धवा ! ह्याला 'धातु' असे म्हणतात ८९.


    हें सामान्यतां निरूपण । तुज म्यां सांगितलें आपण ।
    जे नाना मतवादि जाण । विशेष लक्षण बोलती ॥ १९० ॥
    हे मी तुला सामान्य लक्षण सांगितले; परंतु अनेक प्रकारचे मतवादी आहेत, ते तिचे विशेष लक्षणही सांगतात ९०.


    सप्तैव धातव इति तत्रार्थाः पञ्च खादयः ।
    ज्ञानमात्मोभयाधारस्ततो देहेन्द्रियासवः ॥ १९ ॥
    [श्लोक १९] उद्धवा ! जे लोक तत्त्वांची संख्या सात मानतात, त्यांच्या विचारसरणीनुसार आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूते, सहावा जीव आणि सातवा परमात्मा होय तो जीव व जग या दोहोंचा आधार आहे या सातांपासून देह, इंद्रिये व प्राण उत्पन्न होतात म्हणून ते स्वतंत्र मानले नाहीत. (१९)


    पंचवीस सव्वीस तत्त्वगणन । मागां सांगितलें निरूपण ।
    आतां साता तत्त्वांचें लक्षण । ऐक सुलक्षण सांगेन ॥ ९१ ॥
    पंचवीस आणि सव्वीस तत्त्वांच्या संख्येचे निरूपण मी तुला पूर्वी सांगितले; आतां सात तत्त्वांचे लक्षणही यथार्थ रीतीने सांगतों ऐक ९१.


    महाभूतें जीव शिव । हा सातां तत्त्वांचा जाण भाव ।
    प्राणेंद्रियसमुदाव । याचिपासाव पैं होत ॥ ९२ ॥
    पंचमहाभूते, जीव आणि शिव हें सात तत्त्वांचे स्वरूप आहे. प्राणांचा आणि इंद्रियांचा समुदायही ह्यांच्याचपासून होतो ९२.


    महाभूतें अचेतन । यांसी चेतविता जीवजाण ।
    त्याचाही द्रष्टा परिपूर्ण । ईश्वर जाण सातवा ॥ ९३ ॥
    महाभूतें अचेतन आहेत. त्यांना चेतना देणारा जीव आहे. त्याचाही परिपूर्ण दृष्टा ईश्वर हा सातवा होय ९३.


    माया महत्तत्त्व अहं जें येथ । हें सूक्ष्मकारणें निश्चित ।
    यांपासोनि स्थूळ भूतें होत । कारणें कार्यांत सबाह्य ॥ ९४ ॥
    माया, महत्तत्त्व आणि अहंकार येथे आहेत. ह्यांच्यापासूनच सूक्ष्म कारणे उत्पन्न होतात; आणि त्यांच्यापासून स्थूल भूतें उत्पन्न होतात. कार्यात कारणे सबाह्य व्यापून असतात ९४.


    मनइंद्रियादि जें कां येथें । तेंही यांत अंतर्भूतें ।
    एवं जाण येणें मतें । पांच महाभूतें नेमिलीं ॥ ९५ ॥
    मनइंद्रियादिकांचाही यांतच अंतर्भाव होतो. अशा प्रकारे ह्या मताने पंचमहाभूते नेमली आहेत ९५.


    यांसी चेतविता जीव । सर्वनियंता सदाशिव ।
    एवं सप्ततत्त्वसमुदाव । तो हा उगव उद्धवा ॥ ९६ ॥
    ह्या सर्वांना चेतना देणारा जीव होय: आणि त्या सर्वांचा नियंता सदाशिव होय. उद्धवा ! अशा प्रकारे हा सात तत्त्वांचा समुदाय स्पष्ट झाला आहे ९६.


    आतां सहा तत्त्वें ये पक्षीं जाण । तुज मी सांगेन निरूपण ।
    जें बोलिले ऋषिजन । तें विवंचन अवधारीं ॥ ९७ ॥
    आतां सहा तत्वे म्हणून जो पक्ष आहे, त्याचेही मी तुला निरूपण करतो. त्याविषयी ऋषींचे म्हणणे काय आहे व त्याची संगति कशी तेही सांगतों ऐक ९७.


    षडित्यत्रापि भूतानि पञ्च षष्ठः परः पुमान् ।
    तैर्युक्त आत्मसम्भूतैः सृष्ट्वेदं समुदपाविशत् ॥ २० ॥
    [श्लोक २०] जे फक्त सहा तत्त्वांचा स्वीकार करतात, ते असे म्हणतात की, पाच महाभूते आणि सहावा परमात्मा तो परमात्मा आपण निर्माण केलेल्या पंचमहाभूतांनी युक्त होऊन देह इत्यादींची सृष्टी निर्माण करतो आणि त्यामध्ये जीवरूपाने प्रवेश करतो. (२०)


    पाहें पां पंच महाभूतें । पुरुषें सृजिलिया येथें ।
    स्वयें प्रवेशला तेथें । यालागीं त्यातें 'षट्' म्हणती ॥ ९८ ॥
    पंचमहाभूतें ही पुरुषच निर्माण करून तोही त्यांतच प्रवेश करतो, म्हणून त्याला सहावें तत्त्व म्हणतात ९८.


    ज्यांचेनि मतें तत्त्वें चारी । तयांची ऐक नवलपरी ।
    जो देखे प्रत्यक्षाकारीं तोचि धरी तत्त्वार्थ ॥ ९९ ॥
    आतां ज्यांच्या मताने चारच तत्त्वे आहेत, त्यांचाही चमत्कार ऐक. तो जो प्रत्यक्ष साकार पदार्थ पाहातो, त्यालाच तो तत्व असें समजतो ९९.


    चत्वार्येवेति तत्रापि तेज आपोऽन्नमात्मनः ।
    जातानि तैरिदं जातं जन्मावयविनः खलु ॥ २१ ॥
    [श्लोक २१] काहीजण आत्म्यापासून तेज, जल आणि पृथ्वीची उत्पत्ती झाली आहे, म्हणून ही चारच तत्त्वे आहेत असे म्हणतात कारण सर्व कार्यांचा जन्म यांच्यापासूनच आहे. (२१)


    प्रत्यक्ष देखिजेती नयनीं । अग्नि आप आणि अवनी ।
    तींचि सत्यत्वें मानी । मतज्ञानी मतवादी ॥ २०० ॥
    अग्नि, जल आणि पृथ्वी ही प्रत्यक्ष डोळ्याला दिसतात, तीच खरी तत्त्वे होत; असे ते मतवादी मानतात २००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...