मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २० ओव्या २०१ ते ३००
धार्यमाणं मनो यर्हि भ्राम्यदाश्वनवस्थितम् ।
अतंद्रितोऽनुरोधेन मार्गेणात्मशं नयेत् ॥ १९ ॥
अतंद्रितोऽनुरोधेन मार्गेणात्मशं नयेत् ॥ १९ ॥
[श्लोक १९] स्थिर करताना जर मन चंचल होऊन इकडेतिकडे भटकू लागले, तर ताबडतोब आळस न करता त्याची समजूत घालून ते आपल्या ताब्यात आणावे. (१९)
स्वरूपीं लावितां अनुसंधान । जरी निश्चळ नव्हे मन ।
न सांडी आपुला गुण । चंचळपण स्वभावे ॥ १ ॥
न सांडी आपुला गुण । चंचळपण स्वभावे ॥ १ ॥
आत्मस्वरूपामध्येच लक्ष लावून बसले असतां मन जर स्थिर न राहील, ते आपल्या चंचल स्वभावाप्रमाणे आपले गुण न सोडील १,
साधक आळसें विकळे । कां आठवी विषयसोहळे ।
तैं स्वरूपींहूनि मन पळे । निज चंचळे स्वभावें ॥ २ ॥
तैं स्वरूपींहूनि मन पळे । निज चंचळे स्वभावें ॥ २ ॥
किंवा साधक आळसाने विकल होईल किंवा विषयाचे सुख आठवू लागेल, तर त्यामुळे मन हे आपल्या चंचल स्वभावाप्रमाणे स्वरूपांतून पळून जातें २.
तेथें नेहटूनि आसन । स्वयें होऊनि सावधान ।
स्मरोनि सद्गुरुचे चरण । स्वरूपीं मन राखावें ॥ ३ ॥
स्मरोनि सद्गुरुचे चरण । स्वरूपीं मन राखावें ॥ ३ ॥
अशा वेळी आपण आसन अढळ करून स्वत: सावधान राहून सगुरूचे चरण स्मरून स्वरूपांतच मनाला ठेवीत जावें ३.
नेदीतां विषयदान । हटावलें क्षोभे मन ।
तरी न सांडोनि अनुसंधान । द्यावें अन्नपान विधानोक्त ॥ ४ ॥
तरी न सांडोनि अनुसंधान । द्यावें अन्नपान विधानोक्त ॥ ४ ॥
मनाला विषयदान दिले नाही, तर हट्टानें अधिकच क्षुब्ध होते. अशा वेळी स्वरूपानुसंधान न सोडता त्याला विध्युक्त अन्नपाणी देत जावें ४.
(आशंका) ॥ 'सर्पा पाजिलें पीयूष । तेंचि परतोनि होय विष ।
तेवीं मनासी देतां विषयसुख । अधिक देख खवळेल' ॥ ५ ॥
तेवीं मनासी देतां विषयसुख । अधिक देख खवळेल' ॥ ५ ॥
(आशंका) 'सर्पाला अमृत पाजलें, तर तेच पुन्हा विष होते; त्याप्रमाणे मनालाही विषयसुख दिले तर तेंही पहिल्यापेक्षा अधिकच खवळेल.' ५.
तरी ऐसें द्यावें विषयदान । जेणें आकळलें राहे मन ।
तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें नारायण सांगता ॥ ६ ॥
तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें नारायण सांगता ॥ ६ ॥
याकरितां मनाला जे विषयभोग द्यावयाचे ते असे द्यावेत की, त्याच्या योगानें तें स्वाधीनच राहील. ह्याच अर्थाचे निरूपण स्वतः श्रीकृष्ण (पुढील श्लोकांत ) सांगतात ६.
मनोगतिं न विसृजेज्जितप्राणो जितेंद्रियः ।
सत्त्वसंपन्नया बुद्धया मन आत्मवशं नयेत् ॥ २० ॥
सत्त्वसंपन्नया बुद्धया मन आत्मवशं नयेत् ॥ २० ॥
[श्लोक २० ] इंद्रिये आणि प्राण यांच्यावर विजय मिळवून मनाच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नये नंतर सत्त्वसंपन्न बुद्धीने मनाला आपल्या ताब्यात घ्यावे. (२०)
मोकळें न सोडून मन । न सोडूनि अनुसंधान ।
करावें अन्नपानशयन । हें विषयदान निजहिता ॥ ७ ॥
करावें अन्नपानशयन । हें विषयदान निजहिता ॥ ७ ॥
मनाला मोकळे न सोडता, स्वरूपानुसंधानही न टाकतां, अन्नपाणी व निद्रा हे विषय मनाला देणे निजहिताचे असते ७.
साधकें साधूनि आपण । जरी जिंतिले इंद्रियप्राण ।
तरी मोकळें सोडूं नये मन । स्वरूपीं नेहटून राखावें ॥ ८ ॥
तरी मोकळें सोडूं नये मन । स्वरूपीं नेहटून राखावें ॥ ८ ॥
साधकानें साधन करून जरी स्वतः इंद्रियांना आणि प्राणांना जिंकले, तरी मनाला मोकळे सोडूंच नये. स्वरूपांतच नेटाने राखावें ८.
जो मनासी विश्वासला । तो कामक्रोधीं नागवला ।
संकल्पविकल्पीं लुटिला । विसंचिला महामोहे ॥ ९ ॥
संकल्पविकल्पीं लुटिला । विसंचिला महामोहे ॥ ९ ॥
मनावर जो विश्वास ठेवतो, त्याला कामक्रोध नागवून सोडतात; संकल्पविकल्प त्याला लुटतात; आणि महामोह त्याला ग्रासून टाकतो ९.
जाणोनि मनाचें महाबळ । त्यासी विवेक द्यावा मोकळ ।
तो हालों नेदी केवळ । करी निश्चळ निजांगें ॥ २१० ॥
तो हालों नेदी केवळ । करी निश्चळ निजांगें ॥ २१० ॥
मनाचे बळ मोठे आहे, हे लक्षात आणून विवेकाचा साखळदंड त्याच्या पायास बांधावा; म्हणजे तो त्याला इकडे की तिकडे हिचमिचू देत नाही. आपोआपच स्थिर करून सोडतो २१०.
मनाविवेकाचे उभयसंधीं । सत्त्वसंपन्न होय बुद्धी ।
ते विषयांचे कंद छेदी । तोडी उपाधी सविकार ॥ ११ ॥
ते विषयांचे कंद छेदी । तोडी उपाधी सविकार ॥ ११ ॥
मन आणि विवेक या दोहोंचे ऐक्य झाले की, बुद्धि सत्त्वगुणाने युक्त होऊन ती विषयाचे मूळच उपटून टाकते; आणि सविकार उपाधि तोडून टाकते ११.
मन जेथ जेथ पळोनि जाये । तेथ तेथ विवेक उभा राहे ।
मग सत्त्वबुद्धीचेनि साह्यें । मोडी पाये मनाचे ॥ १२ ॥
मग सत्त्वबुद्धीचेनि साह्यें । मोडी पाये मनाचे ॥ १२ ॥
मन जिकडे जिकडे पळून जाते; तिकडे तिकडे विवेक हा दत्त म्हणून उभाच असतो. आणि मग तो सत्त्वशील बुद्धीच्या साहाय्याने मनाचे पायच मोडून टाकतो १२.
ऐसें मनाचें खुंटलिया बळ । मग स्वरूपीं होय निश्चळ ।
जेवीं जळगार केवळ । ठाके गंगाजळ वस्तीसी ॥ १३ ॥
जेवीं जळगार केवळ । ठाके गंगाजळ वस्तीसी ॥ १३ ॥
अशा प्रकारे मनाचे बळ खुटले म्हणजे, पाण्याची गार ज्याप्रमाणे नदीच्या पाण्यांतच वस्तीला राहाते, त्याप्रमाणे मनही स्थिर होते १३.
यापरी स्वरूपीं मन । स्वयें पावे समाधान ।
तोचि योग परम पावन । समाधान जीवशिवां ॥ १४ ॥
तोचि योग परम पावन । समाधान जीवशिवां ॥ १४ ॥
याप्रकारे मन जें स्वत: स्वरूपामध्ये समाधान पावते, तोच योग अत्यंत श्रेष्ठ असून त्याच्या योगानें जीवाला आणि शिवालाही समाधान होते १४.
जीवपरमात्म्याची एकात्मता । तोच 'परमयोग' तत्त्वतां ।
येचिविखींची कथा । अश्वदृष्टांता हरि सांगे ॥ १५ ॥
येचिविखींची कथा । अश्वदृष्टांता हरि सांगे ॥ १५ ॥
जीवाची आणि परमात्म्याची एकात्मता करणे तोच खरोखर 'श्रेष्ठ योग' होय. याचविषयींचे निरूपण अश्वाच्या दृष्टांताने श्रीहरि सांगतात १५.
एष वै परमो योगो मनसः संग्रहः स्मृतः ।
हृरदयज्ञत्वमन्विच्छन् दम्भस्येवार्वतो मुहुः ॥ २१ ॥
हृरदयज्ञत्वमन्विच्छन् दम्भस्येवार्वतो मुहुः ॥ २१ ॥
[ श्लोक २१] घोडेस्वार जसा प्रथम घोड्याच्या कलाने घेऊन नंतर त्याला आपल्या इच्छेप्रमाणे चालवतो, त्याचप्रमाणे मनाचे भाव जाणून घेऊन मनाला आपल्या ताब्यात ठेवणे हाच खरा योग होय. (२१)
जैसा वारु उपलाणी । वश्य करी अश्वसाहणी ।
मागें तरटांचा कर झणाणी । पुढें राखे नेहटुनी रागबागा ॥ १६ ॥
मागें तरटांचा कर झणाणी । पुढें राखे नेहटुनी रागबागा ॥ १६ ॥
खोगीर न घातलेल्या घोड्याला चाबुकस्वार जसा आपल्या हुकमांत चालवितो; त्याला मागच्या बाजूने कोरडे लगावतो व पुढे नीट चाल लावण्यासाठी वांकडेतिकडे पाऊल पडू नये म्हणून दोऱ्यानी रेटून धरतो १६,
तेथ जें जें पाऊल वोजा करी । तेथ मान दे जीजीकारीं ।
जेथ फुटोनि पडे बाहेरी । तेथ तरट मारी सवर्म ॥ १७ ॥
जेथ फुटोनि पडे बाहेरी । तेथ तरट मारी सवर्म ॥ १७ ॥
त्या वेळी तो जें जें पाऊल योग्य रीतीने टाकतो, त्याबद्दल तो त्याला शाबासकी देतो; व 'भले भले' म्हणून चुचकारतो. पण जेथे त्याचे पाउल वाकडे पडते, तेथें तो वर्मावर फटकारा मारतो १७.
जेथ हटावला न सांडी खोडी । ते ठायीं दे मोकळवाडी ।
परी निःशेष पीडी ना सोडी । ऐसा पडिपाडीं राखत ॥ १८ ॥
परी निःशेष पीडी ना सोडी । ऐसा पडिपाडीं राखत ॥ १८ ॥
तो जेव्हा अडून हट्टाने आपली खोड टाकीतच नाहीं, तेव्हा त्याला तो थोडीशी मोकळीक देतो; परंतु त्याला अगदीच सोडीतही नाही व पीडीतही नाहीं; अशा युक्तिप्रयुक्तीने तो त्याला आपल्या कबजांत आणतो १८.
दमनीं देखोनि अत्यादरु । स्वामीहृदय जाणे वारु ।
आणि वारुवाचें अभ्यंतरु । कळे साचारु स्वामीसी ॥ १९ ॥
आणि वारुवाचें अभ्यंतरु । कळे साचारु स्वामीसी ॥ १९ ॥
आपल्या अगदीं कह्यांत ठेवण्याची धन्याची तीव इच्छा घोडा जागतो, आणि घोड्याचं मन धनी जाणतो १९.
ऐसें उभयहृदय ऐक्ययोगें । वारू न धरितां रागबागें ।
अडणें उडणें सांडी वेगें । मग नाचों लागे मोकळा ॥ २२० ॥
अडणें उडणें सांडी वेगें । मग नाचों लागे मोकळा ॥ २२० ॥
असें उभयतांचे मन एक झाल्यामुळे घोडा देखील लगामावांचूनही हुकमांत वागू लागतो. अडणे, उडणें हां हां म्हणता सोडून देतो. आणि मग मोकळाच धन्याने शिकविल्याप्रमाणे नाचू लागतो २२०.
ऐसें वश्य केलिया अश्वातें । मग कर्त्याचिया मनोगतें ।
वारू नाचे काचेनि सुतें । यापरी मनातें दमावें ॥ २१ ॥
वारू नाचे काचेनि सुतें । यापरी मनातें दमावें ॥ २१ ॥
ह्याप्रमाणे घोड्याला आपल्या कह्यांत आणलें म्हणजे मग तो धन्याच्या मर्जीप्रमाणे कच्च्या सुतानेही हवा तसा नाचूं लागतो. अशाच प्रकारे मनाचेही दमन करावें २१.
मनोजयो कीजे आपण । तोचि 'परमयोग'-कारण ।
हेंचि मागिले श्लोकीं निरूपण । तुज म्यां संपूर्ण सांगितलें ॥ २२ ॥
हेंचि मागिले श्लोकीं निरूपण । तुज म्यां संपूर्ण सांगितलें ॥ २२ ॥
मुख्यतः आपण मनोजय करावा, हेच 'परमयोगा' चे साधन आहे. हेंच मी तुला मागच्या श्लोकामध्ये सगळे निरूपण सांगितले आहे २२.
'नृदेहमाद्यं' या श्लोकाचे अंतीं । कर्मवैराग्यद्वारा मुक्ती ।
आतां सांगितली हे स्थिती । उत्तमगतीं अभ्यासें ॥ २३ ॥
आतां सांगितली हे स्थिती । उत्तमगतीं अभ्यासें ॥ २३ ॥
'नृदेहमा०' या श्लोकाच्या अखेरीला कर्मवैराग्याच्या द्वारे मुक्ति मिळत असल्याचे सांगितले. आतां म्ह० या श्लोकांत उत्तम गति अभ्यासानेच प्राप्त होते, ती स्थितीही सांगितली २३.
मुख्यतः सांख्ययोगें माझी प्राप्ती । तें मी सांगेन तुजप्रती ।
मिथ्या संसाराची स्फूर्ती । ब्रह्मसंविती साचार ॥ २४ ॥
मिथ्या संसाराची स्फूर्ती । ब्रह्मसंविती साचार ॥ २४ ॥
पण मुख्यत्वेकरून सांख्ययोगानेंच माझी प्राप्ति होते, हे मी तुला आता सांगणार आहे. त्याचे तात्पर्य असे की, संसाराची स्फूर्ति ही मिथ्या असून ब्रह्मसंविति हीच सत्य आहे २४.
हें ज्ञानगहन निरूपण । तुज मी सांगेन गुह्य ज्ञान ।
जें असोनि त्रिगुणीं वर्तमान । अलिप्त जाण गुणकार्या ॥ २५ ॥
जें असोनि त्रिगुणीं वर्तमान । अलिप्त जाण गुणकार्या ॥ २५ ॥
हे निरूपण गहनज्ञानात्मक आहे. तरी तें गुह्यज्ञान तुला मी सांगेन. जें त्रिगुणांत विद्यमान असूनही गुणकार्याला अलिप्त असते २५.
'तुज मी सांगेन गुह्य ज्ञान' । हें ऐकोनि देवाचें वचन ।
उद्धव स्वयेंचि झाला कान । अतिसावधान श्रवणार्थीं ॥ २६ ॥
उद्धव स्वयेंचि झाला कान । अतिसावधान श्रवणार्थीं ॥ २६ ॥
'तुला मी गुह्यज्ञान सांगेन' हे देवाचे भाषण ऐकून उद्धव स्वतः कानरूप झाला व श्रवणार्थ अत्यंत सावधान होऊन बसला २६.
देखोनि उद्धवाचा अत्यादरु । आर्तचित्तचकोरचंद्रु ।
निजज्ञानगुणसमुद्रु । काय यादवेंद्रु बोलिला ॥ २७ ॥
निजज्ञानगुणसमुद्रु । काय यादवेंद्रु बोलिला ॥ २७ ॥
इतकी उद्धवाची आवड पाहून व्याकुळचित्तरूप चकोराला तृप्त करणारा केवळ चंद्र व आत्मज्ञानरूप गुणाचा केवळ समुद्र, असा जो यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण तो काय म्हणाला ? २७.
सांख्येन सर्वभावानां प्रतिलोमानुलोमतः ।
भवाप्ययावनुध्यायेन्मनो यावत्प्रसीदति ॥ २२ ॥
भवाप्ययावनुध्यायेन्मनो यावत्प्रसीदति ॥ २२ ॥
[श्लोक २२] सांख्यशास्त्रामध्ये प्रकृतीपासून शरीरापर्यंत पदार्थांच्या उत्पत्तीचा जो क्रम सांगितला आहे आणि ज्या क्रमाने त्यांचा प्रकृतीमध्ये लय सांगितला आहे, त्यांचे मन स्थिर होईपर्यंत सतत चिंतन करावे. (२२)
जें सृष्टिपूर्वीं अलिप्त । तेंचि सृष्टिउदयीं सृष्टिआंत ।
महत्तत्त्वादि देहपर्यंत । तत्त्वीं अनुगत तेचि वस्तु ॥ २८ ॥
महत्तत्त्वादि देहपर्यंत । तत्त्वीं अनुगत तेचि वस्तु ॥ २८ ॥
सृष्टीच्या पूर्वी जें अलिप्त असतें तेंच सृष्टीच्या उत्पत्तींत व सृष्टीच्या स्थितीत म्हणजे सृष्टीमध्ये महत्तत्त्वादिकांपासून तो देहापर्यंत व्यापून राहणारें जें तत्त्व तेच ब्रह्म होय २८.
आणि सृष्टीच्या स्थितिविशेषीं । गुणकार्यातें तेंचि प्रकाशी ।
शेखीं गुणकार्यातें तेंचि ग्रासी । उरे अवशेषीं ते वस्तु ॥ २९ ॥
शेखीं गुणकार्यातें तेंचि ग्रासी । उरे अवशेषीं ते वस्तु ॥ २९ ॥
आणि सृष्टीच्या विशेष स्थितीमध्ये गुणकार्याला तेच प्रकाशित करते, आणि शेवटीं गुणकार्याला ग्रासून टाकतें व अवशेषही तेच राहते २९.
नग न घडतां सोनेंचि साचें । नग घडवितां सोनेंपण न वचे ।
नग मोडितां सोन्याचे । घडामोडीचें भय नाहीं ॥ २३० ॥
नग मोडितां सोन्याचे । घडामोडीचें भय नाहीं ॥ २३० ॥
दागिने घडविले नसतांनाही खरोखर तें सोनेच असते, आणि दागिने घडविले तरी त्याचा सोनेपणा कांहीं नाहीसा होत नाहीं; किंवा ते दागिने मोडले तरी सोनेपणाला घडण्यामोडण्याचे भय नाहीं २३०.
मेघापूर्वीं शुद्ध गगन । मेघा सबाह्य गगन जाण ।
मेघ विराल्या गगनीं गगन । अलिप्त जाण संचलें ॥ ३१ ॥
मेघ विराल्या गगनीं गगन । अलिप्त जाण संचलें ॥ ३१ ॥
ढग यावयाच्या आधी आकाश हे शुद्धच असते, आणि ढगाच्या आंत बाहेरही आकाशच असते; ढग वितळून गेले तरी, आकाशामध्ये आकाश अलिप्तपणाने सांठलेले असतेच ३१.
तेवीं उत्पत्तिस्थितिप्रळयांतीं । वस्तु संचली अलिप्तस्थितीं ।
तेहीविखींची उपपत्ती । उद्धवा तुजप्रती सांगेन ॥ ३२ ॥
तेहीविखींची उपपत्ती । उद्धवा तुजप्रती सांगेन ॥ ३२ ॥
त्याप्रमाणेच उत्पत्ति, स्थिति व प्रलय ह्यांच्या शेवटीं परब्रह्म हे अलिप्तपणाने सांठलेले असते. उद्धवा! त्याच्याबद्दलचा विचारही मी तुला सांगेन ३२.
कुलाल जें जें भांडें घडित । त्यासी मृत्तिका नित्य व्याप्त ।
तेवीं जें जें तत्त्व उपजत । तें तें व्यापिजेत वस्तूनें ॥ ३३ ॥
तेवीं जें जें तत्त्व उपजत । तें तें व्यापिजेत वस्तूनें ॥ ३३ ॥
कुंभार जें जें मडकें तयार करतो, त्याला त्याला मृत्तिका ही व्यापूनच असते, त्याप्रमाणे जें जें तत्त्व उत्पन्न होते, तें तें परब्रह्माने व्यापलेलेच असते ३३.
सागरीं जे जे उपजे लहरी । तिसी जळचि सबाह्यांतरीं ।
तेवीं महत्तत्त्वादी देहवरी । सबाह्याभ्यंतरीं चिन्मात्र ॥ ३४ ॥
तेवीं महत्तत्त्वादी देहवरी । सबाह्याभ्यंतरीं चिन्मात्र ॥ ३४ ॥
समुद्रामध्ये जी जी लाट उत्पन्न होते, तिच्या आंतबाहेर पाणीच असते; त्याप्रमाणे महत्तत्त्वापासून तो देहापर्यंत आंतबाहेर केवळ चित्स्वरूपच व्यापलेले असते ३४.
हो कां जो जो पदार्थ निफजे । तो आकाशें व्यापिजे सहजें ।
तेवीं जें जें तत्त्व उपजे । तें तें व्यापीजे चैतन्यें ॥ ३५ ॥
तेवीं जें जें तत्त्व उपजे । तें तें व्यापीजे चैतन्यें ॥ ३५ ॥
किंवा जो जो पदार्थ उत्पन्न होतो, तो अर्थातच आकाशाने व्यापलेला असतो; तद्वत् जें जें तत्त्व म्हणून उत्पन्न होते, ते ते चैतन्यस्वरूपानेच व्यापलेले असते ३५.
अनुलोमें पाहतां यापरी । वस्तूवेगळें तिळभरी ।
कांहीं न दिसे बाहेरी । निजनिर्धारीं विचारितां ॥ ३६ ॥
कांहीं न दिसे बाहेरी । निजनिर्धारीं विचारितां ॥ ३६ ॥
अशा प्रकारे अनुलोमरीतीने पाहिले म्हणजे विचाराअंती परब्रह्माहून भिन्न असें तिळभरही कांहीं दिसत नाही ३६.
पृथ्वीपासूनि प्रकृतीवरी । लयो पाहतां प्रतिलोमेंकरीं ।
जेवीं जळगारा जळाभीतरीं । तेवीं लयो चिन्मात्रीं तत्त्वांचा ॥ ३७ ॥
जेवीं जळगारा जळाभीतरीं । तेवीं लयो चिन्मात्रीं तत्त्वांचा ॥ ३७ ॥
तसेंच प्रतिलोमरीतीने पृथ्वीपासून तो प्रकृतीपर्यंत लय पाहूं लागले, तर जळाच्या गारांचा लय जसा पाण्यातच होतो, त्याप्रमाणे सर्व तत्त्वांचा लयही त्या चित्स्वरूपांतच होतो ३७.
प्रकृत्यादि तत्त्वें प्रबळलीं । विकरोनि लया गेलीं ।
वस्तु अलिप्तपणें संचली । नाहीं माखली अणुमात्र ॥ ३८ ॥
वस्तु अलिप्तपणें संचली । नाहीं माखली अणुमात्र ॥ ३८ ॥
प्रकृति आदिकरून तत्वं प्रबळ होतात, ती विकार पावून लयास जातात. परंतु परब्रह्मवस्तु अलिप्त असते तशीच असते. तिला अणुभरसुद्धा लेप म्हणून लागत नाही ३८.
एवं उत्पत्तिस्थितिप्रळयांत । वस्तु अविनाशी अलिप्त ।
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त । जाण निश्चित उद्धवा ॥ ३९ ॥
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त । जाण निश्चित उद्धवा ॥ ३९ ॥
उद्धवा ! तात्पर्य काय की, उत्पत्ति, स्थिति व प्रळय झाला तरी परब्रह्म हे अविनाशी असून अलिप्सच असते. तें नित्य-शुद्ध-बुद्धमुक्त-स्वभावाचेच असते हे लक्षात ठेव ३९.
ऐशा वस्तूच्या ठायीं भवजल्प । तो जाण पां मिथ्या आरोप ।
जेवीं दोराअंगीं सर्प । वृथा भयकंप भ्रांतासी ॥ २४० ॥
जेवीं दोराअंगीं सर्प । वृथा भयकंप भ्रांतासी ॥ २४० ॥
अशा परब्रह्माच्या ठिकाणी संसाराची कल्पना हा केवळ मिथ्या आरोप होय. ज्याप्रमाणे भ्रांत मनुष्याला दोराच्या अंगी सर्पाचा भास होऊन अंगाचा फुकटच थरकाप होतो २४०.
सर्प दवडोनि दोर शुद्ध । करावा ऐसा नाहीं बाध ।
एकला एक परमानंद । ऐसें गोविंद बोलिला ॥ ४१ ॥
एकला एक परमानंद । ऐसें गोविंद बोलिला ॥ ४१ ॥
त्या सर्पाला बाहेर घालवून दोर शुद्ध करावा असा कांहीं हा बाध नसतो. (ब्रह्मरूप रज्जूच्या ठिकाणी जगद्रूपी सर्प कधी झालाच नाही असें तात्पर्य.) त्याप्रमाणे जिकडे तिकडे एक परमानंदच भरलेला आहे, असें श्रीकृष्ण म्हणाले ४१.
ऐशिये वस्तूच्या ठायीं जाण । मन विसरे मनपण ।
येणें साधनें पैं जाण । होय ब्रह्म पूर्ण साधकु ॥ ४२ ॥
येणें साधनें पैं जाण । होय ब्रह्म पूर्ण साधकु ॥ ४२ ॥
अशा वस्तूच्या ठिकाणी मनही मनपणा विसरते आणि याच साधनाने साधकही पूर्ण ब्रह्मस्वरूप होतो ४२.
हें परम अगाध साधन । ज्यासी नाटोपे गा जाण ।
त्याचें निश्चळ व्हावया मन । सुगम साधन देवो सांगे ॥ ४३ ॥
त्याचें निश्चळ व्हावया मन । सुगम साधन देवो सांगे ॥ ४३ ॥
आतां हे श्रेष्ठ परंतु अत्यंत कठिण साधन ज्याला झेपणार नाही, त्याचे मन निश्चळ व्हावयाला दुसरें एक सुलभ साधन देव सांगतात ४३.
निर्विण्णस्य विरक्तस्य पुरुषस्योक्तवेदिनः ।
मनस्त्यजति दौरात्म्यं चिन्तितस्यानुचिन्तया ॥ २३ ॥
मनस्त्यजति दौरात्म्यं चिन्तितस्यानुचिन्तया ॥ २३ ॥
[श्लोक २३] जो मनुष्य विषयांचा उबग आल्याने संसारातून विरक्त झाला आहे आणि जो गुरूंचा उपदेश चांगल्या प्रकारे जाणून घेऊन आत्मस्वरूपाच्याच चिंतनात मग्न राहातो, त्याचे मन चंचलता सोडून देते. (२३)
जन्ममरणांचें महाआवर्त । भोगितां वैराग्यें अतिसंतप्त ।
अतएव विषयीं विरक्त । जैसें विषयुक्त परमान्न ॥ ४४ ॥
अतएव विषयीं विरक्त । जैसें विषयुक्त परमान्न ॥ ४४ ॥
जन्ममरणाच्या भयंकर भोवऱ्यांत गिरक्या खातां खातां साधक वैराग्याने अत्यंत संतप्त होतो. आणि त्यामुळे विष घातलेल्या पक्कान्नाप्रमाणे विषयांत त्याला विरक्ति प्राप्त होते ४४.
मघमघीत अमृतफळ । त्यावरी सर्पें घातली गरळ ।
तेवीं विषयमात्रीं सकळ । देखे केवळ महाबाधा ॥ ४५ ॥
तेवीं विषयमात्रीं सकळ । देखे केवळ महाबाधा ॥ ४५ ॥
घमघमीत अमृतफळ असावे आणि त्यावर सर्पाने गरळ टाकावी, त्याप्रमाणे सर्व विषयांत त्याला अत्यंत बाधा दिसत असते ४५.
ऐसेनि विवेकें विवेकवंत । श्रद्धापूर्वक गुरुभक्त ।
गुरूनें सांगितला जो अर्थ । तो हृदयांत विसरेना ॥ ४६ ॥
गुरूनें सांगितला जो अर्थ । तो हृदयांत विसरेना ॥ ४६ ॥
अशा विवेकानें तो विवेकशील झालेला असतो; तसाच श्रद्धायुक्त गुरुभक्त, गुरूने सांगितलेला अर्थ हृदयांतून विसरतच नाही ४६.
गुरूनें बोधिला जो अर्थ । तो सदा हृदयीं असे ध्यात ।
चित्तीं चिंतिलाचि जो अर्थ । तोचि असे चिंतित पुनः पुनः ॥ ४७ ॥
चित्तीं चिंतिलाचि जो अर्थ । तोचि असे चिंतित पुनः पुनः ॥ ४७ ॥
गुरुनें जो उपदेश सांगितला, तो निरंतर हृदयामध्ये ध्यात असतो; आणि चित्तामध्ये ज्या अर्थाचा विचार केलेला असतो त्याच अर्थाचे पुनः पुन्हा तो मनन करतो ४७.
करितां प्रत्यग्वृत्तीं चिंतन । संकल्प विकल्प सांडी मन ।
त्यजोनियां देहाभिमान । ब्रह्मसंपन्न स्वयें होय ॥ ४८ ॥
त्यजोनियां देहाभिमान । ब्रह्मसंपन्न स्वयें होय ॥ ४८ ॥
प्रत्यगात्म्याचे अखंड चिंतन करीत राहिले म्हणजे मन संकल्प विकल्प सोडून देते. मग तो देहाभिमान सोडून स्वतः ब्रह्मसंपन्न होतो ४८.
झालिया ब्रह्मसंपन्न । स्वरूपीं लीन होय मन ।
हाही एक उपावो जाण । न ठाके तरी आन अवधारीं ॥ ४९ ॥
हाही एक उपावो जाण । न ठाके तरी आन अवधारीं ॥ ४९ ॥
असा ब्रह्मसंपन्न झाला म्हणजे मन स्वरूपांत लीन होते. हाही एक उपाय आहे हे लक्षात ठेव. पण हाही झेपत नसेल तर दुसरा एक निराळा ऐकून ठेव ४९.
यमादिभिर्योगपथैरान्वीक्षिक्या च विद्यया ।
ममार्चोपासनाभिर्वा नान्यैर्योग्यं स्मरेन्मनः ॥ २४ ॥
ममार्चोपासनाभिर्वा नान्यैर्योग्यं स्मरेन्मनः ॥ २४ ॥
[श्लोक २४ ] यम, इत्यादी योगमार्गांनी, आत्मविद्येने किंवा माझ्या भक्तीने मन चिंतनास योग्य अशा परमात्म्याचे चिंतन करू लागते याखेरीज दुसरा कोणताही उपाय नाही. (२४)
त्यजोनियां सकळ भोग । यमनियमेंसीं योगमार्ग ।
आसनस्थ होऊनि चांग । दे मुद्रा साङ्ग 'आधारीं' ॥ २५० ॥
आसनस्थ होऊनि चांग । दे मुद्रा साङ्ग 'आधारीं' ॥ २५० ॥
सारे विषयभोग टाकून देऊन यमनियमांसह योगमार्गाचा आश्रय करावा. चांगल्या रीतीने आसनावर बसून (गुदस्थानाकडील) 'मूलाधार' चक्रावर लक्ष ठेवून मुद्रा साधावी २५०.
तेव्हां अपान ऊर्ध्वमुखें वाढे । जों वरता 'स्वाधिष्ठाना' चढे ।
प्राण प्राणायामें अडे । तो मागुता मुरडे नाभिस्थाना ॥ ५१ ॥
प्राण प्राणायामें अडे । तो मागुता मुरडे नाभिस्थाना ॥ ५१ ॥
त्या वेळी अपानवायुं ऊर्ध्वमुखाने (लिंगस्थानाकडील) 'स्वाधिष्ठान' चक्राला पोचेपर्यंत वाढत जातो. आणि प्राणवायु प्राणायामाने अडला म्हणजे पुन्हा नाभिस्थानाकडे मुरडतो ५१.
सम होतां प्राणापान । पिंडब्रह्मांडाचें शोधन ।
स्वयें वायु करी गा आपण । मलक्षालन शरीरीं ॥ ५२ ॥
स्वयें वायु करी गा आपण । मलक्षालन शरीरीं ॥ ५२ ॥
तेव्हा प्राण आणि अपान हे दोन्ही सम झाले म्हणजे स्वतः वायु शरीरांतील मलक्षालन करून पिंडब्रह्मांडाचे शोधन म्ह• शुद्धि करितो ५२.
कफ पित्त दोन्ही खाये । नाडींतें शोधीत जाये ।
जुने संचित मल पाहें । तेही लवलाहें निर्दळी ॥ ५३ ॥
जुने संचित मल पाहें । तेही लवलाहें निर्दळी ॥ ५३ ॥
कफ आणि पित्त दोन्ही खाऊन टाकून शरीरांतील नाड्या शुद्ध करूं लागतो. जुने सांचलेले मळ असतात तेही तो तत्काल नाहीसे करून टाकतो ५३.
नवल वायूचें प्रबळ बळ । पिंडब्रह्मांडींचे सकळ मळ ।
धोऊनि करी गा निर्मळ । पवित्रता केवळ महायोगें ॥ ५४ ॥
धोऊनि करी गा निर्मळ । पवित्रता केवळ महायोगें ॥ ५४ ॥
वायूचें सामर्थ्य फार मोठे व विलक्षण आहे. तो पिंडांतील व ब्रह्मांडांतील सारे मळ धुऊन टाकून निर्मळ करून सोडतो. इतकी पवित्रता केवळ ह्या 'महायोगाने' होते ५४.
तेथें प्रगटे रोगाची परवडी । महाविघ्नांची पडे उडी ।
धांवती विकल्पाच्या कोडी । सिद्धींची रोकडी नागवण पावे ॥ ५५ ॥
धांवती विकल्पाच्या कोडी । सिद्धींची रोकडी नागवण पावे ॥ ५५ ॥
पण त्या वेळी अनेक रोग प्रकट होतात. मोठमोठ्या विघ्नांची उडी येऊन पडते. नाना विकल्प मनांत उद्भवतात आणि सिद्धींची नागवण तर रोकडी येऊन पडते ५५.
इतुकीं अंगीं आदळतां जाण । साधक न सांडी जैं आंगवण ।
तैं सम होती प्राणापान । सत्य जाण उद्धवा ॥ ५६ ॥
तैं सम होती प्राणापान । सत्य जाण उद्धवा ॥ ५६ ॥
उद्धवा! इतकी विघ्नं अंगावर येऊन आदळली तरी साधक जर धैर्य सोडणार नाही, तरच खरोखर प्राणापान सम होतील, हे तूं सत्य समज ५६.
प्राणापानांच्या मिळणीं । शक्ति चेतवे कुंडलिनी ।
ते प्राणापानांतें घेउनि । सुषुम्नास्थानीं प्रवेशे ॥ ५७ ॥
ते प्राणापानांतें घेउनि । सुषुम्नास्थानीं प्रवेशे ॥ ५७ ॥
प्राणापानांची मिळणी झाली म्हणजे 'कुंडलिनी' शक्ति जागृत होते. आणि ती त्या प्राणापानांना घेऊन सुषुम्ना नाडीमध्ये शिरते ५७ .
ते आद्यशक्ति अचाट । चढे पश्चिमेचा महाघाट ।
तेथें षड्चक्रांचा कडकडाट । पूर्वींच सपाट पवनें केला ॥ ५८ ॥
तेथें षड्चक्रांचा कडकडाट । पूर्वींच सपाट पवनें केला ॥ ५८ ॥
ती अचाट असलेली आदिशक्ति पश्चिमेचा मोठा घाट (पाठीच्या कण्यांतून) चढू लागते. तेथील षट्चक्रांचा कडकडाट मोडून वायु अगोदरच तिचा मार्ग सपाट करून ठेवतो ५८.
कुंडलिनी चालतां वाटा । चुकल्या आधिव्याधींच्या लाटा ।
बुजाल्या विकल्पांच्या वाटा । महाविघ्नांच्या झटा बाधूं न शकती ॥ ५९ ॥
बुजाल्या विकल्पांच्या वाटा । महाविघ्नांच्या झटा बाधूं न शकती ॥ ५९ ॥
त्या मार्गानें कुंडलिनी जाऊ लागली म्हणजे आधिव्याधींच्या लाटा बंद पडतात. विकल्पाच्या वाटा मोडून जातात आणि मोठमोठ्या विघ्नांच्या झडीही बाधत नाहीत ५९.
साधितां उल्हाटशक्तिचे उलट । उघडे ब्रह्मरंध्रींचें कपाट ।
तंव लोटले सहस्रदळाचे पाट । अतिचोखट चंद्रामृत ॥ २६० ॥
तंव लोटले सहस्रदळाचे पाट । अतिचोखट चंद्रामृत ॥ २६० ॥
उल्हाटशक्ति ओलांडून गेलें की, ब्रह्मरंध्राचे कवाड उघडते. आणि सहस्रदल कमलांतून अत्यंत शुद्ध व मधुर चंद्रामृताचे झरे वाहू लागतात २६०.
तें प्राशूनि कुंडलिनी बाळा । संतोषें सांडी गरळा ।
ते शरीरीं वोतली कळा । तेणें पालटला देहभाव ॥ ६१ ॥
ते शरीरीं वोतली कळा । तेणें पालटला देहभाव ॥ ६१ ॥
तें अमृत सकुमारी कुंडलिनी प्राशन करून संतोषानें गरळा (गुळणा) टाकते. त्यामुळे शरीरावर कांति चई लागते; आणि तेणेंकरून देहभावच पालटून जातो ६१.
शरीराकारें वोतिली कळा । तेणें देहो दिसे अतिसोज्ज्वळा ।
ना तो ब्रह्मरसाचा पुतळा । कीं उमलला कळा शांतिसुखाचा ॥ ६२ ॥
ना तो ब्रह्मरसाचा पुतळा । कीं उमलला कळा शांतिसुखाचा ॥ ६२ ॥
शरीराकाराने ती कळा ओतली गेल्यामुळे त्याचे शरीर अत्यंत सोज्ज्वळ दिसू लागते; इतकें कीं, तो जणूं काय ब्रह्मरसाचा पुतळाच आहे, किंवा शांतिसुखाचा कळाच उमलला आहे असे वाटते ६२.
जीवाचें जीवन मुसावलें । कीं ब्रह्मविद्येसी फळ आलें ।
ना ते चैतन्या कोंब निघाले । तैसे शोभले अवयव ॥ ६३ ॥
ना ते चैतन्या कोंब निघाले । तैसे शोभले अवयव ॥ ६३ ॥
त्याचे अवयव तर काय ? जीवाचे जीवन मुसावलें जावें, किंवा ब्रह्मविद्येला फळ यावें किंवा चैतन्यालाच कोंब फुटावे, त्याप्रमाणे शोभू लागतात ६३.
त्या देहाचेनि लाघवें । जगाच्या डोळां सामावे ।
जीवामाजीं वावरों पावे । निजस्वभावें सबाह्य ॥ ६४ ॥
जीवामाजीं वावरों पावे । निजस्वभावें सबाह्य ॥ ६४ ॥
त्या देहाच्या सूक्ष्मत्वामुळे तो जगाच्या डोळ्यांतही शिरतो. आणि जीवामध्ये संचार करून आपल्या स्वभावाप्रमाणे तो वावरू शकतो ६४.
तो पवनाची करोनि पायरी । सुखें चाले गगनावरी ।
या नांव परम 'खेचरी' । सिद्धेश्वरीं बोलिजे ॥ ६५ ॥
या नांव परम 'खेचरी' । सिद्धेश्वरीं बोलिजे ॥ ६५ ॥
तो वायूची पायरी करून खुशाल आकाशांतून चालतो. यालाच श्रेष्ठ 'खेचरी' मुद्रा असें सिद्ध पुरुष म्हणतात ६५.
त्याचिया अंगींचिया दीप्ती । खद्योतप्राय गभस्ती ।
त्याचें चरणामृत वांछिती । अमरपति इंद्रचंद्र ॥ ६६ ॥
त्याचें चरणामृत वांछिती । अमरपति इंद्रचंद्र ॥ ६६ ॥
त्याच्या अंगच्या तेजापुढे सूर्यसुद्धा काजव्याप्रमाणे दिसू लागतो; अमरपति इंद्रचंद्रादि देवसुद्धा त्याच्या चरणामृताची इच्छा करतात ६६.
क्रमूनी औटपीठ गोल्हाट । भ्रमरगुंफादि शेवट ।
भेदूनि सोहंहंसाचें पीठ । परमात्मा प्रकट होऊनि ठाके ॥ ६७ ॥
भेदूनि सोहंहंसाचें पीठ । परमात्मा प्रकट होऊनि ठाके ॥ ६७ ॥
तो औटपीठ,गोल्हाट ओलांडून, भ्रमरगुंफा इत्यादिकांच्या शेवटास जाऊन, सोहंहंसाचे पीठ भेदून प्रगट परमात्माच होऊन बसतो ६७
हा योगाभ्यासें योग गहन । अवचटें कोणा साधे जाण ।
हा मार्ग गा अतिकठिण । स्वयें श्रीकृष्ण बोलिला ॥ ६८ ॥
हा मार्ग गा अतिकठिण । स्वयें श्रीकृष्ण बोलिला ॥ ६८ ॥
अशा ह्या अभ्यासामुळे हा योग फारच कठिण आहे. हा क्वचित् एखाद्याला साधतो. हा मार्ग अत्यंत कठिण असल्याचे स्वतः श्रीकृष्णांनीच सांगितले ६८.
हेंचि मानतें श्रीकृष्णनाथा । तरी आन साधन न सांगता ।
हा मूळश्लोकार्थ पाहातां । कळेल तत्त्वतां साधूंसी ॥ ६९ ॥
हा मूळश्लोकार्थ पाहातां । कळेल तत्त्वतां साधूंसी ॥ ६९ ॥
हाच मार्ग जर श्रीकृष्णाला मान्य असता, तर त्याने दुसरे साधन सांगितलेच नसते. मूळश्लोकार्थं पाहिला तर हे सज्जनांना समजून येईल ६९.
हा ऐकतां अतिगोड वाटे । परी करितां काळीज फाटे ।
तरी न साधेचि महाहटें । येथ ठकले लाठे सुरनर ॥ २७० ॥
तरी न साधेचि महाहटें । येथ ठकले लाठे सुरनर ॥ २७० ॥
हा ऐकतांना अत्यंत गोड वाटतो; पण करतांना काळीज फाटते. मोठ्या हट्टाने साधू म्हटले तर साधत नाही. मोठमोठे देव व ऋषिही ह्यांत फसले आहेत २७०.
असो हें अत्यंत कठिण । तुज मी सांगेन गा आन ।
'आन्वीक्षिकी' विद्या जाण । त्वंपदशोधनविवेकु ॥ ७१ ॥
'आन्वीक्षिकी' विद्या जाण । त्वंपदशोधनविवेकु ॥ ७१ ॥
हें कठिण साधन असूं द्या एका बाजूस. तुला मी आता दुसरेंच सांगतो. ते म्हणजे 'आन्वीक्षिकी' विद्या होय. हीत 'त्वंपद-शोधनाचा ' विवेक आहे ७१.
तत्पदाहूनि वेगळा । पांचभौतिक तत्त्वांचा गोळा ।
चुकोनि व्यापका सकळा । कोठें निपजला एकदेशी ॥ ७२ ॥
चुकोनि व्यापका सकळा । कोठें निपजला एकदेशी ॥ ७२ ॥
पंचभूतात्मक तत्वांचा गोळा तत्पदाहून भिन्न आहे. तो सर्वव्यापकाला चुकवून कोठें एकदेशी निपजलेला आहे ७२.
अनादि मायाप्रवाहयोगें । तन्मात्राविषयसंगें ।
मनाचेनि संकल्पपांगें । वेगळें सवेगें मानलें ॥ ७३ ॥
मनाचेनि संकल्पपांगें । वेगळें सवेगें मानलें ॥ ७३ ॥
अनादि मायेच्या प्रवाहामुळे तन्मात्रारूप विषयाच्या संगतीने मनाच्या संकल्पावांचून त्याने आपणास भिन्न मानलें आहे ७३.
मनें मानिला जो भेदु । त्यासी करावा अभेदबोधु ।
येचि अर्थीं स्वयें गोविंदु । विवेक विशदु दाखवी ॥ ७४ ॥
येचि अर्थीं स्वयें गोविंदु । विवेक विशदु दाखवी ॥ ७४ ॥
भेद मनानेच मानला आहे, करितां त्यालाच अभेदाचा उपदेश करावा. याच अर्थाचा विवेक स्वतः श्रीकृष्ण विशद करून दाखवितात ७४.
पांचभौतिक शरीर खरें । तेथ पृथ्वी प्रत्यक्ष जळीं विरे ।
पृथ्वीचा गंध जळीं भरे । तैं पृथ्वी सरे निःशेष ॥ ७५ ॥
पृथ्वीचा गंध जळीं भरे । तैं पृथ्वी सरे निःशेष ॥ ७५ ॥
शरीर हे पंचभूतात्मकच आहे हे खरे; पण त्यांतील 'पृथ्वी' ही प्रत्यक्ष पाण्यामध्ये विरून जाते; पृथ्वीचा गुण 'गंध' हा जळांत भरून पृथ्वी मुळीच नाहीशी होऊन जाते ७५.
त्या जळाचा जळरसु । शोधुनि जैं घे हुताशु ।
तैं जळाचा होयर्हासु । विरे निजनिःशेषु तेजतत्त्वीं ॥ ७६ ॥
तैं जळाचा होयर्हासु । विरे निजनिःशेषु तेजतत्त्वीं ॥ ७६ ॥
जळांतील 'जलरस' जेव्हां 'अग्नि' शोषून घेतो, तेव्हां जळाचाही ऱ्हास होतो. ते जळ तेजतत्त्वांत निःशेष आटून जातें ७६.
त्या तेजाचें कारणरूप । गिळी वायूचा पूर्ण प्रताप ।
तेव्हां तेजाचें मावळे स्वरूप । वायूची झडप लागतां ॥ ७७ ॥
तेव्हां तेजाचें मावळे स्वरूप । वायूची झडप लागतां ॥ ७७ ॥
पण 'वायूचा' प्रताप तें 'तेज' व त्याचे कारण 'रूप' ही दोन्ही ग्रासून टाकतो. वायूची झडप लागतांच तेजाचे स्वरूपही मावळून जातें ७७.
त्या वायूचा स्पर्शगुण । नेतां गगनें हिरून ।
तेव्हां वायूचें नुरे भान । राहे मुसावोन गगनचि ॥ ७८ ॥
तेव्हां वायूचें नुरे भान । राहे मुसावोन गगनचि ॥ ७८ ॥
त्या वायूचा स्पर्श' गुण आकाशाने हिरून घेतला म्हणजे वायूचेही भान राहात नाही. 'वायु' आकाशांत लीन होऊन आकाशच फक्त शिल्लक राहाते ७८.
केवळ गगना नुरे उरी । तें गुणकार्येंसीं रिघे अहंकारीं ।
अहंकारु रिघे मायेमाझारीं । माया परमेश्वरीं मिथ्या होय ॥ ७९ ॥
अहंकारु रिघे मायेमाझारीं । माया परमेश्वरीं मिथ्या होय ॥ ७९ ॥
एकट्या आकाशाला काही रूपच राहात नाही. तें गुणकार्यानिशी अहंकारांत शिरते. आकार मायेंत शिरतो, आणि माया परमेश्वरांत लीन झाली म्हणजे मिथ्या होते ७९.
रात्रि आपुलिया प्रौढीं । आंधारातें वाढवी वाढी ।
तेथ नक्षत्रें खद्योत कोडी । मिरवती गाढीं निजतेजें ॥ २८० ॥
तेथ नक्षत्रें खद्योत कोडी । मिरवती गाढीं निजतेजें ॥ २८० ॥
रात्र ही आपल्याच प्रौढीने अंधारच अंधार पसरून देते. तेव्हा कोट्यवधि नक्षत्रे व काजवे आपआपली तेजें मोठ्या डौलानें मिरवितात २८०.
ते रात्रि येतां सूर्यापुढें । स्वकार्येंसीं सगळी उडे ।
पाहों जातां मागेंपुढें । कोणीकडे असेना ॥ ८१ ॥
पाहों जातां मागेंपुढें । कोणीकडे असेना ॥ ८१ ॥
पण ती रात्र सूर्यापुढे आली की आपल्या कार्यासकट पार नाहीशी होऊन जाते. मागेपुढे पाहूं लागळे तर कोठेच दृष्टीस पडत नाही ८१.
तेवीं परमेश्वरीं माया । कार्यकारणेंसीं गेली वायां ।
मिथ्यात्वेंचि न ये आया । नुरेचि दिसावया मागमोसु ॥ ८२ ॥
मिथ्यात्वेंचि न ये आया । नुरेचि दिसावया मागमोसु ॥ ८२ ॥
त्याप्रमाणेच परमेश्वराच्या ठिकाणी माया ही कार्यकारणासहवर्तमान लोपून जाते. ती मिथ्याच असल्यामुळे तिला दिसावयाला काही स्वरूपच राहात नाही. त्यामुळे तिचा मागमूसही उरत नाहीं ८२.
मायाप्रतिबिंबित चैतन्या । आणी 'जीव' या अभिधाना ।
ते माया गेलिया जाणा । होय जीवपणार्हासु ॥ ८३ ॥
ते माया गेलिया जाणा । होय जीवपणार्हासु ॥ ८३ ॥
मायाप्रतिबिंबित चैतन्याला 'जीव' हें नांव प्राप्त होते. ती मायाच नाहीशी झाली की जीवपणाही नाहीसा होतो ८३.
बुडालें जीवशिवांचें भान । उडालें मनाचें मनपण ।
कोंदलें चैतन्यघन । परम समाधान साधकां ॥ ८४ ॥
कोंदलें चैतन्यघन । परम समाधान साधकां ॥ ८४ ॥
जीवशिवाचे भान राहात नाही. मनाचे मनपणच उडून जाते आणि सारें चैतन्यच भरून राहातें व साधकांना अत्यंत समाधान वाटते ८४.
करितां त्वंपदाचें शोधन । होय तत्पदीं समाधान ।
हे 'आन्वीक्षिकी विद्या' जाण । विवेकसंपन्न पावती ॥ ८५ ॥
हे 'आन्वीक्षिकी विद्या' जाण । विवेकसंपन्न पावती ॥ ८५ ॥
अशा रीतीने त्वंपदाचे शोधन केलें म्हणजे तत्पदांत समाधान होते. हिचें नांव 'आन्वीक्षिकी विद्या' असें तूं जाण. ही विवेकशील लोकांनाच साध्य होते ८५.
न करितां योगसाधन । न लगे त्वंपदाचें शोधन ।
याहोनि सुलभ साधन । तुज मी आन सांगेन ॥ ८६ ॥
याहोनि सुलभ साधन । तुज मी आन सांगेन ॥ ८६ ॥
आतां योगसाधनही नको व त्वंपदाचे शोधनही नको. ह्याच्याहीपेक्षा सुलभ असें दुसरेंच साधन तुला मी सांगतों ८६.
जेथ कष्ट करितां तरी थोडे । परी योगाचे सकळ फळ जोडे ।
त्वंपदशोधन त्यापुढें । होय बापुडें लाजोनि ॥ ८७ ॥
त्वंपदशोधन त्यापुढें । होय बापुडें लाजोनि ॥ ८७ ॥
ज्यांत कष्ट पाहूं गेले तर फार थोडे, पण त्यांत योगाचे सारे फळ जोडते. त्वंपदशोधन त्याच्यापुढे लाजून बापुडवाणे होऊन बसते ८७.
ते माझी गा निजभक्ति । माझ्या रामकृष्णादि ज्या मूर्तीं ।
पूजितां त्या अतिप्रीतीं । मी श्रीपती संतोषे ॥ ८८ ॥
पूजितां त्या अतिप्रीतीं । मी श्रीपती संतोषे ॥ ८८ ॥
ते कोणते? तर माझी भक्ति. माझ्या रामकृष्णादि ज्या मूर्ति आहेत त्या अत्यंत प्रीतीनें पूजिल्या असतां मी श्रीपती अत्यंत संतोष पावतों ८८.
तेथें माझें श्रवण माझें कीर्तन । माझें नाम माझें स्मरण ।
माझें ध्यान माझें भजन । माझें चिंतन सर्वदा ॥ ८९ ॥
माझें ध्यान माझें भजन । माझें चिंतन सर्वदा ॥ ८९ ॥
तेथे माझे गुणानुवाद श्रवण करावेत, माझे कीर्तन करावें, माझे नामस्मरण करावें, माझेच ध्यान, माझेच भजन, असें सदासर्वदा माझेच चिंतन करीत असावें ८९.
हृदयीं माझें सदा ध्यान । मुखीं माझें नाम माझें स्तवन ।
श्रवणीं माझी कथा माझें कीर्तन । करीं माझें पूजन सर्वदा ॥ २९० ॥
श्रवणीं माझी कथा माझें कीर्तन । करीं माझें पूजन सर्वदा ॥ २९० ॥
अंत:करणांत सदासर्वकाळ माझेच ध्यान; तोंडाने माझंच नाम व माझेंच स्तवन; कानांत माझीच कथा व माझेच कीर्तन; आणि हातानें सदासर्वदा माझेंच पूजन करावयाचे २९०.
चरणीं प्रदक्षिणा यात्रागमन । अष्टांगीं सर्वदा माझें नमन ।
ऐसें अनन्य माझें भजन । विनटलेंपण मद्भक्तिं ॥ ९१ ॥
ऐसें अनन्य माझें भजन । विनटलेंपण मद्भक्तिं ॥ ९१ ॥
पायांनी प्रदक्षिणा घालावयाच्या किंवा यात्रेला जावयाचें. अष्टांगांनी सर्वकाल मलाच नमन करावयाचे. अशा रीतीने अनन्यभावानें माझें भजन करून, माझ्याच भक्तीमध्ये गढून जावयाचें ९१.
ऐसे विनटले जे माझे भजनीं । त्यांसी मी विकलों चक्रपाणी ।
त्यांवेगळे पढियंतें कोणी । आन त्रिभुवनीं मज नाहीं ॥ ९२ ॥
त्यांवेगळे पढियंतें कोणी । आन त्रिभुवनीं मज नाहीं ॥ ९२ ॥
असे माझ्या भक्तीमध्ये जे निमग्न होतात, त्यांना मी चक्रपाणि विकला जातो. त्याच्याहून दुसरे कोणी आवडते असे मला त्रिभुवनातही नाही ९२.
यापरी करितां माझें भजन । न लगे योगादिकांचें स्मरण ।
मी भक्तिवेगळा श्रीकृष्ण । नातुडें जाण उद्धवा ॥ ९३ ॥
मी भक्तिवेगळा श्रीकृष्ण । नातुडें जाण उद्धवा ॥ ९३ ॥
अशा रीतीने माझें भजन केलें तर, योगादिकांची आठवणसुद्धा करावयाला नको. उद्धवा! मी श्रीकृष्ण भक्तीशिवाय दुसऱ्या कशानेच सांपडावायाचा नाहीं ९३.
अवचटें दैवगतीं येथ । योगियासी जैं घडे दुरित ।
तैं त्यासी न लगे कर्मप्रायश्चित्त । तेंचि सांगत श्रीकृष्ण ॥ ९४ ॥
तैं त्यासी न लगे कर्मप्रायश्चित्त । तेंचि सांगत श्रीकृष्ण ॥ ९४ ॥
असो. दैवगतीनें कदाचित् योग्यांच्या हातून जर पातक घडेल, तर त्याला कर्मप्रायश्चित्त घ्यावयाला नको. तेच श्रीकृष्ण सांगतात ९४.
यदि कुर्यात् प्रमादेन योगी कर्म विगर्हितम् ।
योगेनैव दहेदंहो नान्यत्तत्र कदाचन ॥ २५ ॥
योगेनैव दहेदंहो नान्यत्तत्र कदाचन ॥ २५ ॥
[श्लोक २५] जर एखादेवेळेस योग्याकडून एखादा प्रमाद घडलाच, तर त्याने ते पाप योगसाधनेनेच जाळून टाकावे यासाठी त्याला दुसर्या प्रायश्चित्ताची आवश्यकता नाही. (२५)
भक्तासी निंद्य कर्म न घडे । त्यासी मी राखता मागें पुढें ।
हें आलें गा योग्याकडे । तेथही घडे प्रमादें ॥ ९५ ॥
हें आलें गा योग्याकडे । तेथही घडे प्रमादें ॥ ९५ ॥
भक्ताच्या हातून निंद्य कर्म घडत नाही. कारण, त्याचे मागेंपुढें रक्षण करणारा मी असतो. तेव्हां तें (निंद्यकर्म ) योगाकडे येते. योगांत मात्र चुकून एखाद्या वेळी तसे घडते ९५.
प्रमादें घडलें जें पाप । त्याचा तीव्र अनुताप ।
जेवीं दावाग्नीं पोळल्या सर्प । तैसा सकंप पापासी ॥ ९६ ॥
जेवीं दावाग्नीं पोळल्या सर्प । तैसा सकंप पापासी ॥ ९६ ॥
असें चुकून जें पातक घडते, त्याचा त्याला अतिशय पश्चात्ताप होतो. ज्याप्रमाणे वणव्यामध्ये सर्प पोळावा, त्याप्रमाणे तो पातकाला भीत असतो ९६.
गोमाशी लागतां सिंहासी । तो जेवीं झाडी सर्वांगासी ।
तेवीं योगी देखोनि पापासी । जो अहर्निशीं अनुतापी ॥ ९७ ॥
तेवीं योगी देखोनि पापासी । जो अहर्निशीं अनुतापी ॥ ९७ ॥
सिंहावर गोमाशी बसली असता तो जसें सारें अंग झाडतो, त्याप्रमाणे योगीही पातकाला पाहून रात्रंदिवस अनुताप करीत राहतो ९७.
तेणें होऊनि सावचित्त । योगबळें निजयोगयुक्त ।
पाप निर्दाळावें समस्त । हेंचि प्रायश्चित्त योगियासी ॥ ९८ ॥
पाप निर्दाळावें समस्त । हेंचि प्रायश्चित्त योगियासी ॥ ९८ ॥
अशा वेळी त्याने सावध मन करून योगयुक्त होऊन योगबळानेंच साऱ्या पातकांचे क्षालन करावे. हेंच योग्याला प्रायश्चित्त होय ९८.
हे सांडोनियां योगस्थिती । जैं लावूं धांवे शेणमाती ।
तैं नागवला गा निश्चितीं । नव्हेचि निष्कृती पापाची ॥ ९९ ॥
तैं नागवला गा निश्चितीं । नव्हेचि निष्कृती पापाची ॥ ९९ ॥
ही योगस्थिति सोडून तो जर अंगाला शेणमाती लावावयाला धावू लागेल, तर तो खरोखर नागवला म्हणून समजावें. त्याने पातकाची निष्कृति होणार नाही ९९.
हृदयीं नाहीं अनुतापवृत्ती । वरिवरी गा शास्त्रोक्तीं ।
लावूं जातां शेणमाती । नव्हे निवृत्ती पापाची ॥ ३०० ॥
लावूं जातां शेणमाती । नव्हे निवृत्ती पापाची ॥ ३०० ॥
हृदयांत जर अनुताप झालेला नसेल, आणि वर वर मात्र शास्त्रांत -सांगितल्याप्रमाणे शेणमाती लावावयाला जाईल, तर पातकांची निवृत्ति होणार नाही ३००.
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...