मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २० ओव्या १0१ ते २००
हो कां वमिलिया मिष्टान्ना । परतोनि श्रद्धा न धरी रसना ।
तेवीं विषयभोगीं जाणा । साचार मना चिळशी उपजे ॥ १ ॥
ओकून टाकलेल्या मिष्टान्नावर ज्याप्रमाणे जिव्हा पुन्हा वासना ठेवीत नाही; त्याप्रमाणेच खरोखर विषयोपभोगाविषयी जेव्हा मनाला चिळस उत्पन्न होते १ ;
तेथ कर्माची परिपाठी । समूळ खुंटली गा गोठी ।
कां दैवयोगें उल्हासु पोटीं । माझ्या कथेचा उठी श्रवणादरु ॥ २ ॥
कां दैवयोगें उल्हासु पोटीं । माझ्या कथेचा उठी श्रवणादरु ॥ २ ॥
तेव्हां कर्माचा मार्ग म्ह. त्याविषयींचा विचार समूळ बंद पडतो; किंवा दैवयोगाने अंत:करणांत उल्हास उत्पन्न होऊन माझी कथा ऐकण्याविषयी अत्यंत आदर उत्पन्न होतो (तेव्हाही कर्ममार्ग संपतो) २.
करितां माझी कथा श्रवण । प्रेमें वोसंडे अंतःकरण ।
विसरे देहगेहांची आठवण । तेथें प्रत्यवाय जाण बाधीना ॥ ३ ॥
विसरे देहगेहांची आठवण । तेथें प्रत्यवाय जाण बाधीना ॥ ३ ॥
माझी कथा श्रवण करीत असतां प्रेमाने अंत:करण उचंबळून येते, घरादाराची आठवण बुजून जाते, तेव्हां कर्मत्यागाचा प्रत्यवाय दोष बाधत नाही ३.
जैसें माझे कथेचें श्रवण । तैसेंचि माझे हृदयीं स्मरण ।
तेथें प्रत्यवाय न रिघे जाण । येथून बोळवण त्याची झाली ॥ ४ ॥
तेथें प्रत्यवाय न रिघे जाण । येथून बोळवण त्याची झाली ॥ ४ ॥
माझ्या कथेचे जसे श्रवण, तसेंच हृदयांत माझे स्मरणही चालते. अशा अवस्थेत प्रत्यवाय दोष शिरत नाही. त्याची बोळवणच झाली म्हणून समजावें ४.
करितां मत्कथाश्रवण । लोपल्या कोटिकर्माचरण ।
प्रत्यवाय न बाधी जाण । हा प्रताप पूर्ण मत्कथेचा ॥ ५ ॥
प्रत्यवाय न बाधी जाण । हा प्रताप पूर्ण मत्कथेचा ॥ ५ ॥
माझी कथा श्रवण करीत असतां कोट्यवधि कर्माचा लोप होऊन गेला तरी, कर्मलोपाचा दोष बाधत नाही. एवढा माझ्या कथेचा प्रभाव आहे ५.
(संमतिश्लोक) मत्कर्म कुर्वतां पुंसां कर्मलोपो भवेद्यदि ।
तत्कर्म तेषां कुर्वन्ति तिस्रः कोट्यो महर्षयः ॥ १ ॥
तत्कर्म तेषां कुर्वन्ति तिस्रः कोट्यो महर्षयः ॥ १ ॥
(संमति श्लोक)- मदर्थ कर्म करणार्यापुरुषांच्या विहित कर्मांचा जर लोप झाला तर त्याचें तें कर्म तीन कोटी महर्षि करतात.
(अर्थ) माझी करितां सप्रेम भक्ती । भक्तांचीं नित्यकर्में जैं राहती ।
तेतीस कोटी ऋषिमहंतीं । संपूर्ण करिती कर्में त्यांचीं ॥ ६ ॥
तेतीस कोटी ऋषिमहंतीं । संपूर्ण करिती कर्में त्यांचीं ॥ ६ ॥
माझी प्रेमपुरस्सर भक्ति करीत असतां जेव्हा माझ्या भक्तांकडून नित्यकर्मे होणेची राहातात, तेव्हां ती त्यांची कर्में तेहतीस कोटी ऋषि महंत पूर्ण करीत असतात ६.
एवढें मत्कथेचें महिमान । माझें करितां कीर्तन पूजन ।
तेथें प्रत्यवायाचें तोंड कोण । संमुख वदन दावूं न शके ॥ ७ ॥
तेथें प्रत्यवायाचें तोंड कोण । संमुख वदन दावूं न शके ॥ ७ ॥
एवढा माझ्या कथेचा महिमा आहे. माझे पूजन व कीर्तन चालू असतां तेथें विघ्नांची येण्याची बिशाद काय? समोर तोंडसुद्धा दाखविण्याचे त्यांना सामर्थ्य नाही ७.
हो कां पूर्ण विरक्त नर । कां माझे सेवेसी जो तत्पर ।
तेथ कर्म बापुडें किंकर । हें स्वयें श्रीधर बोलिला ॥ ८ ॥
तेथ कर्म बापुडें किंकर । हें स्वयें श्रीधर बोलिला ॥ ८ ॥
किंवा एखादा पुरुष पूर्ण विरक्त झाला, अथवा माझ्या सेवेत तत्पर होऊन राहिला, तर त्याच्या ठिकाणी कर्म बिचारें दास बनून राहाते. असें स्वत:च श्रीकृष्णांनी सांगितले ८.
कर्में करितां स्वधर्मस्थितीं । उद्धवा आहे माझी प्राप्ती ।
ते मी सांगेन तुजप्रती । यथानिगुती अवधारीं ॥ ९ ॥
ते मी सांगेन तुजप्रती । यथानिगुती अवधारीं ॥ ९ ॥
उद्धवा ! स्वधर्मानुरूप कर्मे केली असता माझी प्राप्ति होते. तेही मी तुला यथार्थ रीतीनें सांगतों ऐक ९.
स्वधर्मस्थो यजन्यज्ञैरनाशीः काम उद्धव ।
न याति स्वर्गनरकौ यद्यन्यत्र समाचरेत् ॥ १० ॥
न याति स्वर्गनरकौ यद्यन्यत्र समाचरेत् ॥ १० ॥
[श्लोक १० ] उद्धवा ! आपापल्या वर्णाश्रमधर्मानुसार फळाची आशा न करता यज्ञादी सत्कर्मे केली आणि निषिद्ध कर्मे केली नाहीत, तर त्याला स्वर्गनरकात जावे लागत नाही. (१०)
गृहस्थाश्रमी स्वधर्मस्थिती । जरी विचरेना 'अन्यगती' ।
तरी येथेंचि लाहे विरक्ति । सुनिश्चितीं उद्धवा ॥ ११० ॥
तरी येथेंचि लाहे विरक्ति । सुनिश्चितीं उद्धवा ॥ ११० ॥
उद्धवा! गृहस्थाश्रमामध्ये स्वधर्मानुरूपच राहिले, अन्यथा मार्गाने चाललें नाही, तर येथेच निश्चयेंकरून विरक्ति प्राप्त होते १०.
अन्यगतींचें विचरण । तें तूं म्हणशील कोण ।
ऐक त्याचेंही लक्षण । समूळ खूण सांगेन ॥ ११ ॥
ऐक त्याचेंही लक्षण । समूळ खूण सांगेन ॥ ११ ॥
आतां अन्यथा मार्गाचरण म्हणजे काय ? असें विचारशील तर त्याचेही साद्यन्त लक्षण सांगतों " ११.
परद्रव्य-परदारा-रती । परापवादाची वंदती ।
ही नांव गा 'नारकी गती' । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १२ ॥
ही नांव गा 'नारकी गती' । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १२ ॥
परद्रव्य आणि परदारा ह्यांचा अभिलाष व परनिंदेचा हव्यास, यालाच उध्दवा ! 'नरकाचा मार्ग' म्हणतात १२.
दिविभोगाचेनि श्रवणें । ज्याच्या मनाचें बैसे धरणें ।
कर्में तदनुकूल करणें । तैं स्वर्गा भोगणें अलोट ॥ १३ ॥
कर्में तदनुकूल करणें । तैं स्वर्गा भोगणें अलोट ॥ १३ ॥
स्वर्गातील सुख ऐकून तेच पाहिजे म्हणून ज्याचें मन धरणे घेते, आणि जो तदनुकूल कर्मे करितो, त्याला अचूक स्वर्गभोग प्राप्त होतो १३.
या जाण दोन्ही 'अन्यगती' । यांतूनि काढूनियां वृत्ती ।
यज्ञादिकीं मज यजिती । तैं नैराश्यस्थिती नित्यनैमित्यें ॥ १४ ॥
यज्ञादिकीं मज यजिती । तैं नैराश्यस्थिती नित्यनैमित्यें ॥ १४ ॥
ह्या दोन्ही 'अन्यगति' म्ह० विपरीत स्थिति आहेत. यांतून वृत्ति काढून यज्ञादिक कर्मानी माझे यजन केले असतां, नित्यनैमित्तिक कर्मानींच वैराग्यस्थिति म्ह. नैराश्य प्राप्त होतें १४.
तैं न पडे स्वर्गीचें पेणें । न घडे नरकासी जाणें ।
येचि लोकीं विरक्त होणें । तेंचि बोलणें हरि बोले ॥ १५ ॥
येचि लोकीं विरक्त होणें । तेंचि बोलणें हरि बोले ॥ १५ ॥
तेव्हां स्वर्गामध्ये वस्ती करावी लागत नाही, किंवा नरकालाही जावे लागत नाही. इहलोकींच विरक्तता प्राप्त होते. हीच गोष्ट श्रीकृष्ण सांगतात १५.
अस्मिंल्लोके वर्तमानः स्वधर्मस्थोऽनघः शुचिः ।
ज्ञान विशुद्धमाप्नोति मद्भक्तिं वा यदृच्छया ॥ ११ ॥
ज्ञान विशुद्धमाप्नोति मद्भक्तिं वा यदृच्छया ॥ ११ ॥
[श्लोक ११ ] आपल्या धर्माच्या ठिकाणी निष्ठा ठेवणारा या देहात राहूनच निषिद्ध कर्मे न करण्याने पवित्र होतो त्याला विशुद्ध ज्ञान प्राप्त होते किंवा त्याचे भाग्य असल्यास त्याला माझी भक्ती प्राप्त होते. (११)
असतां ये लोकीं वर्तमान । ऐसें करितां स्वधर्माचरण ।
होय पुण्यपापांचें निर्दळण । निर्मळत्वें जाण तो अतिपवित्र ॥ १६ ॥
होय पुण्यपापांचें निर्दळण । निर्मळत्वें जाण तो अतिपवित्र ॥ १६ ॥
ह्या लोकांत वागत असतांना अशा प्रकारे स्वधर्माचरण करीत राहिले म्हणजे पुण्य आणि पाप ह्या दोहोंचेही क्षालन होऊन तो निर्मलत्वाने अत्यंत पवित्र होतो १६.
तेथ निरसोनि भवभान । प्रकाशे माझें शुद्ध ज्ञान ।
कां सप्रेम माझें भजन । 'पराभक्ति' जाण तो लाहे ॥ १७ ॥
कां सप्रेम माझें भजन । 'पराभक्ति' जाण तो लाहे ॥ १७ ॥
तेव्हां संसाराचे भान नाहीसे होऊन त्याला माझें 'शुद्ध ज्ञान' प्राप्त होते, किंवा माझे सप्रेम भजन म्ह• 'पराभक्ति' त्याला प्राप्त होते १७.
जे भक्तीमाजीं मी आपण । सदा होय भक्ताअधीन ।
तेथ मोक्षासहित ज्ञान । येऊनि आपण पायां लागे ॥ १८ ॥
तेथ मोक्षासहित ज्ञान । येऊनि आपण पायां लागे ॥ १८ ॥
अशा भक्तीमध्ये मी स्वतः निरंतर भक्ताच्या अधीन होऊन राहातो. तेव्हा ज्ञान हे मोक्षासहवर्तमान आपणच येऊन भक्ताच्या पायाला लागते १८.
ऐक ज्ञानाचा परिपाक । संसारा नांव 'महादुःख' ।
मोक्ष तो म्हणे 'परमसुख' । मद्भक्त देख दोनी न मानी ॥ १९ ॥
मोक्ष तो म्हणे 'परमसुख' । मद्भक्त देख दोनी न मानी ॥ १९ ॥
आता त्या ज्ञानाचा परिणाम ऐक. ते संसाराला 'महादुःख' व मोक्षाला 'परमसुख' असें नांव देते. परंतु माझा भक्त असतो तो ही दोन्हीही मानीत नाही १९.
सप्रेम करितां माझें भजन । नाठवे भवभयबंधन ।
तेथ मोक्षासी पुसे कोण । मद्भक्तां भक्तिचा पूर्ण उल्हास ॥ १२० ॥
तेथ मोक्षासी पुसे कोण । मद्भक्तां भक्तिचा पूर्ण उल्हास ॥ १२० ॥
प्रेमाने माझे भजन करीत असतां संसारभयाचे बंधन मुळीच आठवत नाहीं. तिकडे मोक्षाला कोण विचारतो ? माझ्या भक्तांना भक्तीचाच पूर्ण उल्हास असतो १२०.
ज्यातें म्हणती 'महादुःख' । तें भक्तांसी भगवद्रूप देख ।
ज्यातें म्हणती 'परमसुख' । तेंही आवश्यक भगवंत ॥ २१ ॥
ज्यातें म्हणती 'परमसुख' । तेंही आवश्यक भगवंत ॥ २१ ॥
ज्याला 'महादुःख' असे म्हणतात' तें भक्तांना भगवद्रूपच असते; तसेच ज्याला 'महासुख' असे म्हणतात, तेही त्यांना भगवद्रूपच असते २१.
यापरी भक्त माझ्या भजनीं । विसरला सुखदुःखें दोनी ।
मी एकु भगवंतूवांचूनी । आन त्रिभुवनीं देखेना ॥ २२ ॥
मी एकु भगवंतूवांचूनी । आन त्रिभुवनीं देखेना ॥ २२ ॥
अशा प्रकारे माझा भक्त माझ्या भजनामध्ये सुख व दुःखें दोन्ही विसरतो . मी जो भगवंत त्या एकाशिवाय त्रिभुवनांत दुसरे काही त्याला दिसतच नाही २२.
ऐशी माझी भक्ति पूर्ण । साधूनि आणितां न ये जाण ।
जैं मी भगवंत होय प्रसन्न । तैं यदृच्छा जाण हे भक्ति लाभे ॥ २३ ॥
जैं मी भगवंत होय प्रसन्न । तैं यदृच्छा जाण हे भक्ति लाभे ॥ २३ ॥
पण अशा प्रकारची माझी जी पूर्ण भक्ति ती कधी आणून येत नाही हे लक्षात ठेव. तर जेव्हा मी भगवंत प्रसन्न होतो, तेव्हांच दैवयोगाने ती प्राप्त होते २३.
मी कैसेनि होय प्रसन्न । ऐसें कल्पील तुझें मन ।
तेथ नरदेह गा कारण । माझे प्रसन्नपण व्हावया ॥ २४ ॥
तेथ नरदेह गा कारण । माझे प्रसन्नपण व्हावया ॥ २४ ॥
आता मी कशाने प्रसन्न होतो असें तुझ्या मनात येईल, तर (सांगतों की) मला प्रसन्न करून घ्यावयाला हा नरदेहच एक कारण आहे २४.
स्वर्गिणोऽप्येतमिच्छन्ति लोकं निरयिणस्तथा ।
साधकं ज्ञानभक्तिभ्यामुभयं तदसाधकम् ॥ १२ ॥
साधकं ज्ञानभक्तिभ्यामुभयं तदसाधकम् ॥ १२ ॥
[श्लोक १२] स्वर्गातील देव आणि नरकातील लोकसुद्धा या मनुष्यदेहाची इच्छा करतात कारण हे शरीरच ज्ञान किंवा भक्ती यांचे साधन आहे स्वर्गीय किंवा नारकीय शरीरे फक्त भोगसाधने आहेत. (१२)
ज्यांसी स्वर्गभोगाची अति गोडी । जिंहीं अमरत्वाची उभविली गुढी ।
जे पडले स्वर्गाचे बांदवडीं । ते वांछिती आवडीं नरदेहातें ॥ २५ ॥
जे पडले स्वर्गाचे बांदवडीं । ते वांछिती आवडीं नरदेहातें ॥ २५ ॥
ज्यांना स्वर्गभोगाची अतिशय गोडी आहे, ज्यांनी अमरत्वाची गुढी उभारली आहे, असे जे स्वर्गाच्या बंदीखान्यांत पडले आहेत, ते सुद्धा मोठ्या आवडीनें नरदेहाचीच इच्छा करतात २५.
नरकयातना महाघोर । जिंहीं भोगिला भोग थोर ।
ते मनुष्यदेहातें नर । अतिसादर वांछिती ॥ २६ ॥
ते मनुष्यदेहातें नर । अतिसादर वांछिती ॥ २६ ॥
तसेच ज्यांनी भयंकर नरकयातना भोगलेल्या असतात, ते प्राणीही मोठ्या आवडीने नरदेहाची इच्छा करतात २६.
नरदेह परम पावन । जो भक्तिज्ञानाचें आयतन ।
जेणें साधे ब्रह्मज्ञान । तो धन्य धन्य नरदेह ॥ २७ ॥
जेणें साधे ब्रह्मज्ञान । तो धन्य धन्य नरदेह ॥ २७ ॥
नरदेह हा अत्यंत पवित्र असून भक्तीचे आणि ज्ञानाचें तो आश्रयस्थान आहे. ज्याच्या योगाने ब्रह्मज्ञान प्राप्त होते, तो नरदेह केवळ धन्य होय २७.
जेणें नरदेहें जाण । निःशेष खुंटे जन्ममरण ।
जेणें जीव पावे समाधान । स्वानंदघन स्वयें होय ॥ २८ ॥
जेणें जीव पावे समाधान । स्वानंदघन स्वयें होय ॥ २८ ॥
ह्या नरदेहामुळेच जन्ममरण निखालस खुंटून जातें, जीव समाधान पावतो, आणि स्वतः स्वानंदघन होतो २८.
ज्या नरदेहाचे संगतीं । होय अविद्येची निवृत्ती ।
लाभे भगवत्पदप्राप्ती । हे विख्यात ख्याती नरदेहीं ॥ २९ ॥
लाभे भगवत्पदप्राप्ती । हे विख्यात ख्याती नरदेहीं ॥ २९ ॥
ज्या नरदेहाच्या संगतीने अविद्येची निवृत्ति होते व भगवत्पदाची प्राप्ति होते, त्या नरदेहाची ही कीर्ति प्रसिद्धच आहे २९.
ज्या नरदेहाची प्राप्ती । प्राणिमात्र वांछिती ।
प्राणी बापुडे ते किती । स्वयें प्रजापती नरदेह वांछि ॥ १३० ॥
प्राणी बापुडे ते किती । स्वयें प्रजापती नरदेह वांछि ॥ १३० ॥
सर्व प्राणिमात्र नरदेहाचीच इच्छा करतात; पण प्राणी ते बिचारे काय होत? प्रत्यक्ष ब्रह्मदेवही नरदेहाची इच्छा करतो १३०.
ऐसें नरदेहाचें श्रेष्ठपण । येथ साधे भक्तिविज्ञान ।
परी भक्तिज्ञानास्तव जाण । मनुष्यपण साधेना ॥ ३१ ॥
परी भक्तिज्ञानास्तव जाण । मनुष्यपण साधेना ॥ ३१ ॥
इतका नरदेह श्रेष्ठ आहे. कारण यांत भक्ति आणि ज्ञान ही प्राप्त होतात; पण भक्तिज्ञानाने मात्र मनुष्यदेह प्राप्त होत नाही ३१.
न नरः स्वर्गतिं काङ्क्षेन्नारकीं वा विचक्षणः ।
नेमं लोकं च काङ्क्षेत देहावेशात्प्रमाद्यति ॥ १३ ॥
नेमं लोकं च काङ्क्षेत देहावेशात्प्रमाद्यति ॥ १३ ॥
[श्लोक १३] विचारवंताने स्वर्ग, नरक किंवा या देह यांपैकी कशाचीही कामना करू नये कारण देहात अहंबुद्धी बाळगल्यामुळेच त्याच्याकडून प्रमाद घडतात. (१३)
झालिया नरदेहाची प्राप्ती । अधर्में होय नरकागती ।
कां संचितां पुण्यसंपत्ती । तेणें स्वर्गप्राप्ती अनिवार ॥ ३२ ॥
कां संचितां पुण्यसंपत्ती । तेणें स्वर्गप्राप्ती अनिवार ॥ ३२ ॥
नरदेहाची प्राप्ति झाली तरी, अधर्माने वागल्यास नरकासच जावे लागते : किंवा पुण्यसंपत्तीचा संग्रह केल्यास त्यामुळे अचूक स्वर्गाची प्राप्ति होते ३२.
स्वर्गे होय पुनरावृत्ती । नरकीं घोर दुःखप्राप्ती ।
म्हणूनि साण्डोनि दोंहीचीही प्रीती । नरदेहीं आसक्ती धरूं म्हणती ॥ ३३ ॥
म्हणूनि साण्डोनि दोंहीचीही प्रीती । नरदेहीं आसक्ती धरूं म्हणती ॥ ३३ ॥
स्वर्ग मिळाल्याने पुनर्जन्माच्या फेऱ्यांत पडावे लागते; आणि नरकामध्ये तर दुःसह दुःख भोगावे लागते. याकरितां या दोहींचेही प्रेम सोडून नरदेहाची प्रीति धरावी म्हणतात ३३.
मनुष्यदेहाची आवडी । तेचि देहबुद्धि रोकडी ।
जेथ कामक्रोधांची जोडी । प्रमाद कोडी क्षणक्षणां ॥ ३४ ॥
जेथ कामक्रोधांची जोडी । प्रमाद कोडी क्षणक्षणां ॥ ३४ ॥
(त्यांतही असा विचार आहे की,) मनुष्यदेहाची आवड झाली तरी ती देहबुद्धिच होय. हिच्यामुळे कामक्रोधांची जोड होते. आणि क्षणोक्षणी असंख्य प्रमाद घडतात ३४.
स्वर्ग नरक इहलोक । यांची प्रीती सांडूनि देख ।
साधावें गा आवश्यक । ज्ञान चोख कां निजभक्ती ॥ ३५ ॥
साधावें गा आवश्यक । ज्ञान चोख कां निजभक्ती ॥ ३५ ॥
ह्याकरितां स्वर्ग, नरक किंवा मृत्युलोक ह्यांचीही प्रीति सोडून देऊन ज्ञान किंवा भक्तिच अवश्यमेव संपादन करावी ३५,
ज्ञान साधावयालागीं जाण । कष्टावें न लगे गा आपण ।
सप्रेम करितां माझें भजन । दवडितां ज्ञान घर रिघे ॥ ३६ ॥
सप्रेम करितां माझें भजन । दवडितां ज्ञान घर रिघे ॥ ३६ ॥
ज्ञान संपादन करण्यासाठी आपल्याला विशेष कष्ट सोसण्याचे कारण नाही. प्रेमाने माझे भजन केले असतां ज्ञानाला ढकलून घातले तरी ते घरांत शिरतच ३६.
गव्हांची राशी जोडल्या हातीं । सकळ पक्कान्नें त्याचीं होतीं ।
तेवीं आतुडल्या माझी भक्ती । ज्ञानसंपत्ती घर रिघे ॥ ३७ ॥
तेवीं आतुडल्या माझी भक्ती । ज्ञानसंपत्ती घर रिघे ॥ ३७ ॥
गव्हांच्या राशी हातांत आल्या म्हणजे त्यापासून पाहिजे ती पक्वान्ने करता येतात. त्याप्रमाणे माझी भक्ति हाती आली की, ज्ञानसंपत्ति घरांत शिरते ३७.
द्रव्य झालिया आपुले हातीं । सकळ पदार्थ घरास येती ।
तेवीं जोडल्या माझी भक्ती । भुक्तिमुक्ति होती दासी ॥ ३८ ॥
तेवीं जोडल्या माझी भक्ती । भुक्तिमुक्ति होती दासी ॥ ३८ ॥
आपल्या हातांत पैसा असला म्हणजे सारे पदार्थ घरबसल्या चालत येतात, त्याप्रमाणे माझी भक्ति साध्य केली म्हणजे भुक्ति आणि मुक्ति दोन्ही दासी होऊन राहातात ३८.
म्हणती करितां भगवद्भक्ती । विघ्नें छळावया आड येती ।
तेथें मी सुदर्शन घेऊन हातीं । राखें अहोरातीं निजभक्तां ॥ ३९ ॥
तेथें मी सुदर्शन घेऊन हातीं । राखें अहोरातीं निजभक्तां ॥ ३९ ॥
हे ऐकून कदाचित तूं म्हणशील की, माझी भक्ति करू लागले असतां छळ करण्याकरितां विघ्ने आड येतील. तर सांगतों की, मी हातामध्ये सुदर्शन घेऊन माझ्या भक्तांचे रात्रंदिवस संरक्षण करीत असतों ३९.
पक्ष्याचेनि नामोच्चारें । म्यां वेश्या तारिली चमत्कारें ।
पाडूनि विघ्नांचें दातौरें । म्यां व्यभिचारें उद्धरिली ॥ १४० ॥
पाडूनि विघ्नांचें दातौरें । म्यां व्यभिचारें उद्धरिली ॥ १४० ॥
पक्ष्याच्या निमित्ताने नामस्मरण केल्यावरून मी वेश्येचाही चमत्काराने उद्धार केला आहे. विघ्नांचे दात पाडून मी त्या व्यभिचारिणीचाही उद्धार केला १४०.
यालागीं नरदेह पावोन । जो करी माझें भजन ।
तोचि संसारीं धन्य धन्य । उद्धवा जाण त्रिशुद्धी ॥ ४१ ॥
तोचि संसारीं धन्य धन्य । उद्धवा जाण त्रिशुद्धी ॥ ४१ ॥
ह्याकरितां नरदेह प्राप्त झाला असतां जो माझें भजन करतो, तोच खरोखर उद्धृवा! ह्या संसारामध्ये धन्य होतो, हे लक्षात ठेव ४१.
भावें करितां माझे भक्तीसी । भाविका उद्धरीं मी हृषीकेशी ।
जे चढले ज्ञानाभिमानासी । ते म्यां यमासी निरविले ॥ ४२ ॥
जे चढले ज्ञानाभिमानासी । ते म्यां यमासी निरविले ॥ ४२ ॥
मनोभावाने माझी भक्ति केली असता मी श्रीकृष्ण त्या भाविकाचा उद्धार करतो आणि जे कोणी ज्ञानाभिमानाने चढून जातात, त्यांना मी यमाच्या हातांत देतों ४२.
साधितां माझी भक्ति कां ज्ञान । ज्यासी चढे ज्ञानाभिमान ।
तो म्यां आपुलेनि हातें जाण । दीधला आंदण महादोषां ॥ ४३ ॥
तो म्यां आपुलेनि हातें जाण । दीधला आंदण महादोषां ॥ ४३ ॥
माझी भक्ति किंवा ज्ञान संपादन करतांना ज्यांना ज्ञानाभिमान चढतो, त्यांना मी आपल्या हातानेच दोषांना आंदण देतों ४३.
उद्धवा तूं ऐसें म्हणशी । 'ते कां दीधले यमहातेशी' ।
तो जाचूनियां महादोषियांसी । ज्ञानाभिमानासी सांडवी ॥ ४४ ॥
तो जाचूनियां महादोषियांसी । ज्ञानाभिमानासी सांडवी ॥ ४४ ॥
आतां उद्धवा! तूं कदाचित् असें म्हणशील की, त्यांना यमाच्या हातांत का देतां ? तर ते एवढ्याचकरितां की, त्या महादोषी जनांचा छळ करून तो ज्ञानाभिमानापासून त्यांना सोडवितो ४४.
यालागीं सांडूनि देहाभिमान । भावें करितां माझें भजन ।
पूर्वील साधु सज्ञान । नरदेहें जाण मज पावले ॥ ४५ ॥
पूर्वील साधु सज्ञान । नरदेहें जाण मज पावले ॥ ४५ ॥
ह्याकरितां देहाभिमान सोडून भक्तिभावानें माझें भजन करूनच पूर्वीचे ज्ञानसंपन्न साधु नरदेहानेंच माझ्याप्रत येऊन पोचले आहेत ४५.
एतद्विद्वान्पुरा मृत्योरभवाय घटेत सः ।
अप्रमत्त इदं ज्ञात्वा मर्त्यमप्यर्थसिद्धिदम् ॥ १४ ॥
अप्रमत्त इदं ज्ञात्वा मर्त्यमप्यर्थसिद्धिदम् ॥ १४ ॥
[श्लोक १४] या शरीराला मरण असूनही ते परमात्मप्राप्ती करून देणारे आहे, असा विचार करून माणसाने सावधपणे मृत्यू येण्यापूर्वीच पुनर्जन्म टाळण्याचा प्रयत्न करावा. (१४)
केवल अस्थि चर्म मूत्र मळ । पाहतां देहो अतिकश्मळ ।
परी ब्रह्म परिपूर्ण निश्चळ । हें निर्मळ फळ येणें साधे ॥ ४६ ॥
परी ब्रह्म परिपूर्ण निश्चळ । हें निर्मळ फळ येणें साधे ॥ ४६ ॥
देह पाहूं गेले तर तो केवळ अस्थि, चर्म व मळमूत्र ह्यांचाच झालेला असल्यामुळे अत्यंत अमंगल होय; परंतु त्याने परिपूर्ण व निश्चळ असें जें ब्रह्म, तें निर्मळ फल प्राप्त होते ४६.
ऐसे नरदेहांचे कारण । जाणोनि पूर्वील सज्ञान ।
सांडोनियां देहाभिमान । ब्रह्मसमाधान पावले ॥ ४७ ॥
सांडोनियां देहाभिमान । ब्रह्मसमाधान पावले ॥ ४७ ॥
पूर्वीच्या ज्ञानसंपन्न लोकांनी नरदेहाचे कारण लक्षात आणून देहाभिमान सोडून ते ब्रह्मसुखाला पोचले ४७.
देह निंद्य म्हणोनि सांडावा । तरी एवढा लाभ हारवावा ।
वंद्य म्हणोनि प्रतिपाळावा । तैं नेईल रौरवा निश्चित ॥ ४८ ॥
वंद्य म्हणोनि प्रतिपाळावा । तैं नेईल रौरवा निश्चित ॥ ४८ ॥
देह हा निंद्य आहे म्हणून सोडून द्यावा, तर एवढा लाभ हातचा दवडावा; बरें तो वंद्य म्हणून त्याचा प्रतिपाळ करावा, तर निश्चयेंकरून रौरव नरकाला जावें ४८.
देह सांडावा न मांडावा । येणें परमार्थचि साधावा ।
तें सावधान ऐक उद्धवा । गुप्त निजठेवा सांगेन ॥ ४९ ॥
तें सावधान ऐक उद्धवा । गुप्त निजठेवा सांगेन ॥ ४९ ॥
ह्याकरितां देहाचा तिरस्कारही करूं नये व फारसा आदरही करूं नये. तर त्याच्याकडून परमार्थसाधन करून घ्यावे. उद्धवा ! ते कसे साध्य करावें ह्यांतील गुप्त रहस्य तुला सांगतो. नीट लक्ष देऊन श्रवण कर ४९.
जेणें देहें वाढे भवभावो । तेणेंचि देहेंकरीं पहा हो ।
होय संसाराचा अभावो । अहंभावो सांडितां ॥ १५० ॥
होय संसाराचा अभावो । अहंभावो सांडितां ॥ १५० ॥
ज्या देहाच्या योगानें संसारभाव वाढतो, त्याच देहामुळे संसाराचाच अभावही होऊन जातो, मात्र अहंभाव सोडला पाहिजे १५०.
सांडावया देहाभिमान । पूर्वील साधु सज्ञान ।
होऊनि नित्य सावधान । ब्रह्मसंपन्न मद्रूपें ॥ ५१ ॥
होऊनि नित्य सावधान । ब्रह्मसंपन्न मद्रूपें ॥ ५१ ॥
पूर्वीचे ज्ञानसंपन्न साधु देहाभिमान सोडण्याकरितां नित्य जागृति ठेवूनच मत्स्वरूप पावून ब्रह्मरूप होऊन गेले ५१.
नरदेहें ब्रह्मप्राप्ती । ऐसें मानूनि निश्चितीं ।
म्हणसी विषयभोगांचे अंतीं । ब्रह्मस्थिती साधीन ॥ ५२ ॥
म्हणसी विषयभोगांचे अंतीं । ब्रह्मस्थिती साधीन ॥ ५२ ॥
'नरदेहानें ब्रह्मप्राप्ति होते हें जर निश्चित आहे, तर मग अगोदर विषयभोग भोगून घेऊन, नंतरच ब्रह्मस्थिति साधीन ' असे कदाचित तूं म्हणशील ५२;
ऐसें विश्वासतां आपण । रोकडी आली नागवण ।
देहासवें लागलें मरण । हरिहरां जाण टळेना ॥ ५३ ॥
देहासवें लागलें मरण । हरिहरां जाण टळेना ॥ ५३ ॥
पण असा भरंवसा धरून राहिल्यास आपली आपण नागवण करून घेतल्यासारखे होईल! कारण, देहाबरोबरच मृत्यु पाठीस लागलेला असतो. तो हरिहरांनासुद्धा टाळतां येत नाही ५३.
एवं देहाचें अनिवार्य मरण । तें केव्हां येईल न कळे जाण ।
यालागीं पूर्वीच आपण । निजस्वार्थ जाण साधावा ॥ ५४ ॥
यालागीं पूर्वीच आपण । निजस्वार्थ जाण साधावा ॥ ५४ ॥
तात्पर्य, देहाचे मरण हें अपरिहार्य आहे. ते केव्हां येईल हें कळावयाचे नाही. ह्याकरितां तें येण्यापूर्वीच आपला स्वार्थ आपण साधून घ्यावा ५४.
धरितां निजदेहाची गोडी । अवचितां आदळे यमधाडी ।
बुडे निजस्वार्थाची जोडी । तें निजनिवाडीं हरि सांगे ॥ ५५ ॥
बुडे निजस्वार्थाची जोडी । तें निजनिवाडीं हरि सांगे ॥ ५५ ॥
आपल्या देहावर आपण लुब्ध झालों, तर यम अवचित येऊन त्याच्यावर धाड घालतो; आणि त्यांत आपला स्वार्थ बुडतो. याविषयींचा निर्णय श्रीकृष्ण सांगतात ५५.
छिद्यमानं यमैरेतैः कृतनीडं वनस्पतिम् ।
खगः स्वकेतमुत्सृज्य क्षेमं याति ह्यलम्पट: ॥ १५ ॥
खगः स्वकेतमुत्सृज्य क्षेमं याति ह्यलम्पट: ॥ १५ ॥
[श्लोक १५ ] हे शरीर एक वृक्ष आहे यावर घरटे तयार करून जीवरूपी पक्षी त्यात राहातो पक्षी जसा तुटणारे झाड सोडून सुरक्षित जागी उडून जातो, त्याप्रमाणेच या शरीरवृक्षाला सुद्धा यमासारखे निर्दय पुरूष रात्रंदिवस तोडतच असलेले पाहून; (१५)
जेवीं कां वृक्षाचे अग्रीं नीड । पक्षी करूनि वसे अतिगूढ ।
तळीं त्याचि वृक्षाचें बूड । छेदिती सदृढ निर्दय नर ॥ ५६ ॥
तळीं त्याचि वृक्षाचें बूड । छेदिती सदृढ निर्दय नर ॥ ५६ ॥
ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाच्या शेंड्यावर घरटे करून पक्षी अगदी लपून राहतो; त्या वृक्षाचे सदृढ असलेले मूळ निर्दय लोक खालून तोडू लागतात ५६.
तें देखोनि वृक्षच्छेदन । पक्ष्यें सांडोनि गृहाभिमान ।
पळाल्या पाविजे कल्याण । राहतां मरण अचूक ॥ ५७ ॥
पळाल्या पाविजे कल्याण । राहतां मरण अचूक ॥ ५७ ॥
तो वृक्ष तोडला जात आहे असे पाहतांच त्या पक्ष्याने आपल्या घरट्याचा अभिमान सोडून पलायन केले तरच त्याचे कल्याण होते. आणि तसाच राहिला तर त्याचे मरण अचूक आहे ५७.
त्या वृक्षाचिया ऐसें जाण । देहासवें लागलें मरण ।
तेथें जीवासी राहतां जाण । दुःख दारुण अनिवार ॥ ५८ ॥
तेथें जीवासी राहतां जाण । दुःख दारुण अनिवार ॥ ५८ ॥
त्या वृक्षाप्रमाणेच देहाबरोबर मरण हें लागलेले आहे ; त्यांत जीव राहिला असता त्याला भयंकर दुःख भोगावे लागते; ते कधीच चुकणार नाही ५८.
अहोरात्रैश्छिद्यमानं बुद्धाऽऽयुर्भयवेपथुः ।
मुक्तसङ्गः परं बुद्ध्वा निरीह उपशाम्यति ॥ १६ ॥
मुक्तसङ्गः परं बुद्ध्वा निरीह उपशाम्यति ॥ १६ ॥
[श्लोक १६ ] व त्यामुळे आपले आयुष्य क्षीण होत असलेले जाणून विषयलंपट नसलेला जीव भयकंपित होऊन शरीराची आसक्ती सोडून देतो व परमात्मतत्त्व जाणून घेऊन शांत होतो. (१६)
अहोरात्र आयुष्यभंग । कळिकाळाचा सवेग वेग ।
हा जाण नीच नवा रोग । अंगीं साङ्ग लागला ॥ ५९ ॥
हा जाण नीच नवा रोग । अंगीं साङ्ग लागला ॥ ५९ ॥
रात्रंदिवस आयुष्य कमी कमी होत असते. कलिकाळाचा वेग तर महाभयंकर असतो. हा एक नित्य नवा रोगच अंगाला अगदी जडून गेला आहे ५९.
काळें काळ वयसा खातु । हा देखोनि आयुष्याचा घातु ।
जाणोनि नरदेहाचा पातु । होय अनासक्तु देहगेहां ॥ १६० ॥
जाणोनि नरदेहाचा पातु । होय अनासक्तु देहगेहां ॥ १६० ॥
काळ हा कालमानाप्रमाणे वय खातच असतो. यांत आयुष्याचा घात होतो, हें लक्षात आणून व नरदेह हा पतन पावणार हे जाणून तो घरादाराविषयी उदासीन होतो १६०.
जाणोनि देहाचें क्षणिकपण । त्यागावया देहाभिमान ।
साधावया भक्तिज्ञान । अतिसावधान जो होय ॥ ६१ ॥
साधावया भक्तिज्ञान । अतिसावधान जो होय ॥ ६१ ॥
देहाचा क्षणभंगुरपणा लक्षात आणून देहाभिमान सोडून देण्याला व भक्ति ज्ञान संपादन करण्याला तो अत्यंत जागृत असतो ६१.
न सांडितां देहाभिमान । अंगीं आदळे मरण ।
तेणें भयें कंपायमान । वैराग्य पूर्ण स्वयें धरी ॥ ६२ ॥
तेणें भयें कंपायमान । वैराग्य पूर्ण स्वयें धरी ॥ ६२ ॥
देहाभिमान सोडला नाही तर मरण येऊन अंगावर कोसळेल ह्या भीतीने अंगांत कांपरें भरून तो स्वतःच पूर्ण वैराग्य धारण करतो ६२.
वैराग्ययुक्त करितां भक्ति । होय देहाभिमानाची निवृत्ती ।
तैं घर रिघे ज्ञानसंपत्ती । पायां लागती मुक्ती चारी ॥ ६३ ॥
तैं घर रिघे ज्ञानसंपत्ती । पायां लागती मुक्ती चारी ॥ ६३ ॥
वैराग्ययुक्त भक्ति केली म्हणजे देहाभिमानाची निवृत्ति होते. तेव्हां ज्ञानसंपत्ति घरांत शिरते व मग चारही मुक्ति पायांला लागतात ६३.
ऐशी झालिया निजात्मप्राप्ती । सहजेंचि राहे प्रवृत्ती ।
निवृत्तीसी होय निवृत्ती । संसाराची शांती स्वयें होय ॥ ६४ ॥
निवृत्तीसी होय निवृत्ती । संसाराची शांती स्वयें होय ॥ ६४ ॥
ह्याप्रमाणे निजात्मप्राप्ति झाली म्हणजे प्रवृत्ति आपोआपच बंद पडते व निवृत्तीचीही निवृत्ति होते. आणि मग संसाराची आपोआपच शांति होते ६४.
ऐसे नरदेहा येऊनि देख । पुरुष पावले 'परमसुख' ।
हें न साधिती जे मूर्ख । त्यांसी देवो देख निंदित ॥ ६५ ॥
हें न साधिती जे मूर्ख । त्यांसी देवो देख निंदित ॥ ६५ ॥
असे नरदेहाला येऊन पुष्कळ लोक आत्मानंदसुखाला पात्र झाले. असें असतां जे मूर्ख लोक हें सुख साध्य करीत नाहीत, त्यांची देव (पुढील श्लोकांत) निंदा करीत आहे ६५.
नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् ।
मयानुकूलेन नभस्वतेरितं पुमान् भवाब्धिं न तरेत्स आत्महा ॥ १७ ॥
मयानुकूलेन नभस्वतेरितं पुमान् भवाब्धिं न तरेत्स आत्महा ॥ १७ ॥
[श्लोक १७] सर्व फळांची प्राप्ती करून देणारे पण मिळण्यास अत्यंत कठीण असे मानवशरीर ही एक सुदृढ नाव आहे गुरूंना तिचे कर्णधार करून आणि मलाच अनुकूल वायू करून जो मनुष्य या संसारसागरातून पार होत नाही, तो आत्मघातकीच होय. (१७)
चौर्यायशीं लक्ष जीवयोनी । त्यांत मनुष्यदेहावांचूनी ।
अधिकारी ब्रह्मज्ञानीं । आन कोणी असेना ॥ ६६ ॥
अधिकारी ब्रह्मज्ञानीं । आन कोणी असेना ॥ ६६ ॥
चौऱ्यायशी लक्ष जीवयोनी आहेत. त्यांत मनुष्यदेहाशिवाय ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यास कोणीच अधिकारी नाहीं ६६.
जेणें देहें होय माझी प्राप्ती । यालागीं 'आद्य देहो' यातें म्हणती ।
याची दुर्लभ गा अवाप्ती । भाग्यें पावती नरदेह ॥ ६७ ॥
याची दुर्लभ गा अवाप्ती । भाग्यें पावती नरदेह ॥ ६७ ॥
नरदेहाने माझी प्राप्ति होते, म्हणून या देहाला 'आद्य' असे म्हटले आहे. याची प्राप्ति होणे फार कठिण आहे. मोठ्या भाग्यानेंच नरदेह प्राप्त होत असतो ६७.
'सदृढ' म्हणजे अव्यंग । 'अविकळ' म्हणजे सकळ भाग ।
नव्हे बहिरे मुके अंध पंग । सर्वांगें साङ्ग संपूर्ण ॥ ६८ ॥
नव्हे बहिरे मुके अंध पंग । सर्वांगें साङ्ग संपूर्ण ॥ ६८ ॥
सुदृढ म्हणजे सर्व अवयवांनी युक्त; कोठेही व्यंग नाहीं; बहिरा नाहीं, अंध नाहीं, पंगु नाही की मुका नाही ह्याप्रमाणे सर्वांगांनी संपूर्ण असा आहे ६८.
भरतखंडीं नरदेहप्राप्ती । हे परम भाग्याची संपत्ती ।
तेथही विवेकु परमार्थी । त्याचा वशवर्ती मी परमात्मा ॥ ६९ ॥
तेथही विवेकु परमार्थी । त्याचा वशवर्ती मी परमात्मा ॥ ६९ ॥
आणि तोही भरतखंडांत प्राप्त होणे हे मोठ्या भाग्याचे लक्षण होय. आणि त्यांतून अंत:करणांत परमार्थाविषयींचा विवेक असेल, तर त्याचा मी परमात्मा आज्ञाधारक होऊन असतों ६९.
मी परमात्मा जेथ वशवर्ती । तेथ सुरनरांचा केवा किती ।
परी हा देह न लभे पुढती । दुर्लभ प्राप्ती नरदेहा ॥ १७० ॥
परी हा देह न लभे पुढती । दुर्लभ प्राप्ती नरदेहा ॥ १७० ॥
प्रत्यक्ष मी परमात्माच त्याचा आज्ञाधारक, तेथे इतर देवांचा व मनुष्याचा पाड काय ? पण हा नरदेह पुन्हा प्राप्त होणार नाही. कारण नरदेह मिळणे परम कठिण असते १७०.
जोखितां पुण्यपाप समान । तैं नरदेहाची प्राप्ती जाण ।
तें पुढती पावावया आपण । जोखूनि कर्माचरण कोणी न करी ॥ ७१ ॥
तें पुढती पावावया आपण । जोखूनि कर्माचरण कोणी न करी ॥ ७१ ॥
पुण्य आणि पाप तोलले असतां जेव्हां समसमान भरतें तेव्हांच नरदेह प्राप्त होतो हे लक्षात ठेव. असा नरदेहच पुन्हा आपल्याला मिळावा, म्हणून कोणीही जोखून कर्माचरण करूं शकत नाही ७१.
पुण्य झालिया अधिक । स्वर्ग भोगणें आवश्यक ।
पापाचें वाढल्या तुक । भोगावे नरक अनिवार ॥ ७२ ॥
पापाचें वाढल्या तुक । भोगावे नरक अनिवार ॥ ७२ ॥
पुण्य अधिक झाले तर स्वर्ग भोगणें अवश्य पडते, आणि पातकाचे माप अधिक भरल्यास अनिवार नरक भोगावा लागतो ७२.
ऐशी कर्माची गति गहन । एथ काकतालीयन्यायें जाण ।
अचवटें लाभे माणुसपण । भवाब्धितारण महातारूं ॥ ७३ ॥
अचवटें लाभे माणुसपण । भवाब्धितारण महातारूं ॥ ७३ ॥
अशी कर्माची गति मोठी गहन आहे. ह्यांत काकतालीय न्यायानेच संसारसमुद्र तरून जाण्याचे महान् तारूं असें जें मनुष्यपण, ते एखाद्या वेळी चुकून वांट्यास येते ७३.
'सुलभ' म्हणिजे अविकळ । 'सुकल्प' म्हणिजे विवेकशीळ ।
यासी वागविता केवळ । नावाडा अति कुशळ गुरु कर्णधार ॥ ७४ ॥
यासी वागविता केवळ । नावाडा अति कुशळ गुरु कर्णधार ॥ ७४ ॥
'सुलभ' म्हणजे अविकल व 'सुकल्प ' म्हणजे विचार-शील ह्याला पैलतीरास नेणारा कुशल नावाडी असा एक गुरुच आहे ७४.
कानीं निजगुज उपदेशिता । यालागीं गुरु 'कर्णधार' म्हणती तत्त्वतां ।
कानीं धरितांचि उद्धरी भक्तां । यालागीं सर्वथा गुरु कर्णधार ॥ ७५ ॥
कानीं धरितांचि उद्धरी भक्तां । यालागीं सर्वथा गुरु कर्णधार ॥ ७५ ॥
गुरु हा निजगुज कानांत सांगतो म्हणूनच त्याला 'कर्णधार' असे म्हणतात. कानाला धरतांच (कानांत महावाक्याचा उपदेश करतांच) भक्तांचा उद्धार करीत असल्यामुळे गुरु हाच सर्वथैव ‘कर्णधार ' होय ७५.
भवाब्धीमाजीं नरदेह तारूं । तेथ सद्गुरु तोचि कर्णधारु ।
त्यासी अनुकूल वायु मी श्रीधरु । भवाब्धिपरपारु पावावया ॥ ७६ ॥
त्यासी अनुकूल वायु मी श्रीधरु । भवाब्धिपरपारु पावावया ॥ ७६ ॥
संसारसमुद्रामध्ये नरदेह हेंच तारूं आहे. तेथे सद्गुरु तोच कर्णधार म्ह० सुकाणूवाला आहे. तसेंच पैलथडीला पोचवावयाला मी श्रीहरि हा अनुकूल वाहणारा वायु आहे ७६.
कैसा गुरु कर्णधार कुशळ । आवर्त खळाळ आंदोळ ।
चुकवूनि विकल्पाचे कल्लोळ । साम्यें पाणिढाळ सवेग काढी ॥ ७७ ॥
चुकवूनि विकल्पाचे कल्लोळ । साम्यें पाणिढाळ सवेग काढी ॥ ७७ ॥
गुरु कर्णधार हा किती कुशल असतो म्हणून सांगू? भोवरे, धबधबे, खळाळाचे पाणी, हेलकावे, विकल्पाचे कल्लोळ व पाण्याचे एकामागून एक येत असलेले लोंढे या सर्वांस चुकवून तो आपली नौका झपाट्याने पुढे काढतो ७७.
लावूनि विवेकाचें आवलें । तोडिती कर्माकर्मांचीं जळें ।
भजनशिडाचेनि बळें । नाव चाले सवेग ॥ ७८ ॥
भजनशिडाचेनि बळें । नाव चाले सवेग ॥ ७८ ॥
विवेकाची वल्ही लावून कर्माकर्माचे पाणी तोडले जाते व भजनरूप शिडाच्या बळावर नौका मोठ्या वेगाने चालत असते ७८.
कामक्रोधादि महामासे । तळपती घ्यावया आमिषें ।
त्या घालूनि शांतिचेनि पाशें । तारूं उल्हासें चालवी ॥ ७९ ॥
त्या घालूनि शांतिचेनि पाशें । तारूं उल्हासें चालवी ॥ ७९ ॥
कामक्रोधादि थोर थोर मासे आमिष मिळविण्याकरितां टपत बसलेले असतात. त्यांवर शांतीचे जाळे टाकून तो आपले तारूं मोठ्या शिताफीने चालवीत असतो ७९.
ठाकतां सारूप्यादि बंदरें । तारुवामाजीं अतिगजरें ।
लागलीं अनुहाताचीं तुरें । जयजयकारें गर्जती ॥ १८० ॥
लागलीं अनुहाताचीं तुरें । जयजयकारें गर्जती ॥ १८० ॥
वाटेत सारूप्यादि मुक्तींची बंदरें लागतात, तेव्हां त्या तारवामध्ये अनुहत वाद्यांच्या तुताऱ्या जयजयकारानें गर्जू लागतात १८०.
नेतां सलोकतेचे पेठे । तारूं उलथेल अवचटें ।
लावितां समीपतेचे वाटे । तारूं दाटे दोंही सवां ॥ ८१ ॥
लावितां समीपतेचे वाटे । तारूं दाटे दोंही सवां ॥ ८१ ॥
सलोकतेच्या पेठेला तारूं नेले तर ते कदाचित् उलथून पडेल, किंवा समीपतेच्या मार्गाला लावलें तर ते दोन्ही बाजूला कलंडूं लागेल ८१.
करावें सरूपतेमाजीं स्थिरु । तंव तो दाटणीचा उतारु ।
ऐसा जाणोनियां निर्धारु । लोटिलें तारूं सायुज्यामाजीं ॥ ८२ ॥
ऐसा जाणोनियां निर्धारु । लोटिलें तारूं सायुज्यामाजीं ॥ ८२ ॥
ह्याकरितां सरूपतेमध्ये तारूं स्थिर करावे, तर तिकडे दाटी फार असते, हे सर्व लक्षात आणून तारूं सायुज्यबंदरांत ढकलतात ८२.
ते धार्मिकाची धर्मपेंठ । नाहीं सुखसारा खटपट ।
वस्तु अवघीच चोखट । घ्यावी एकवट संवसाटी ॥ ८३ ॥
वस्तु अवघीच चोखट । घ्यावी एकवट संवसाटी ॥ ८३ ॥
तेथे धार्मिक लोकांची निर्मळधर्मपेठच असते. तिच्यांत सुखसारा व खटपट नाही. वस्तु सगळीच निर्मळ ; पाहिजे तो माल एकदम द्यावा घ्यावा ८३.
ऐसें दुर्लभ नरदेहाचें तारूं । जेथ मी श्रीगुरुरूपें कर्णधारु ।
येणें न तरेच जो संसारु । तो जाणावा नरु आत्महंता ॥ ८४ ॥
येणें न तरेच जो संसारु । तो जाणावा नरु आत्महंता ॥ ८४ ॥
असें हें दुर्लभ नरदेहाचे तारूं असून त्यांत श्रीगुरुरूपानें मीच कर्णधार म्ह० नावाडी आहे. या तारवाच्या साहाय्याने जो कोणी संसार तरून जाणार नाही, तो पुरुष आत्मघातकी समजला पाहिजे ८४.
नरदेह वेंचिलें विषयांसाठीं । पुढें नरक भोगावया कल्पकोटी ।
तरी आपुलेनि हातें निजपोटीं । शस्त्र दाटी स्वयें जेवीं ॥ ८५ ॥
तरी आपुलेनि हातें निजपोटीं । शस्त्र दाटी स्वयें जेवीं ॥ ८५ ॥
पुढे कोटिकल्प नरकयातना भोगण्यासाठीच विषयांमध्ये हा नरदेह खर्च केला, तर आपल्या हातानेच आपल्या उरांत शस्त्र खुपसून घेण्यासारखे आहे ८५.
परपारा अवश्य आहे जाणें । तेणें नाव फोडूनि भाजिजे चणें ।
कां पांघरुणें जाळूनि तापणें । हिंवाभेणें सुज्ञांनीं ॥ ८६ ॥
कां पांघरुणें जाळूनि तापणें । हिंवाभेणें सुज्ञांनीं ॥ ८६ ॥
पलीकडच्या कांठाला जाणे अवश्य असल्याने नौका फोडून जाळून त्यावर चणे फुटाणे भाजून खावेत, किंवा शहाण्यांनी थंडीच्या भयाने पांघरुणे जाळून तापत बसावें ८६,
तैसें येथ झाले गा साचार । थित्या नरदेहा नागवले नर ।
पुढां दुःखाचे डोंगर । अतिदुस्तर वोढवले ॥ ८७ ॥
पुढां दुःखाचे डोंगर । अतिदुस्तर वोढवले ॥ ८७ ॥
तसेंच खरोखर येथें होतें. फुकटच्या नरदेहालाच लोक मुकतात. त्यामुळे पुढे दुःखाचे दुर्धर डोंगर येऊन पडतात! ८७.
सकळ योनीं विषयासक्ती । सर्वांसी आहे निश्चितीं ।
नरदेहीं तैशीच विषयस्थिती । तैं तोंडीं माती पडली कीं ॥ ८८ ॥
नरदेहीं तैशीच विषयस्थिती । तैं तोंडीं माती पडली कीं ॥ ८८ ॥
खरोखर साऱ्या योनीमध्ये विषयासक्ति ही सर्वांनाच लागलेली आहे. नरदेहांतही विषयसंबंधानें तशीच स्थिति राहिली, तर त्याच्या तोंडांत मातीच पडली म्हणून समजावें ८८.
पावोनि श्रेष्ठ नरशरीर । जो नुतरेचि संसारपार ।
तो आत्महत्यारा नर । सत्य साचार उद्धवा ॥ ८९ ॥
तो आत्महत्यारा नर । सत्य साचार उद्धवा ॥ ८९ ॥
अशा प्रकारचे श्रेष्ठ नरशरीर प्राप्त झाले असूनही जो संसाराच्या पैलथडीला जाणार नाहीं, तो उद्धवा ! खरोखर आत्महत्याच करणारा पुरुष होय ८९.
कोटी ब्रह्महत्या-गोहत्यांसी । प्रायश्चित्त आहे शास्त्रार्थेंसीं ।
परी आत्महत्या घडे ज्यासी । प्रायश्चित त्यासी असेना ॥ १९० ॥
परी आत्महत्या घडे ज्यासी । प्रायश्चित त्यासी असेना ॥ १९० ॥
कोट्यवधि ब्रह्महत्या किंवा गोहत्या केल्या तरी त्याला शास्त्रार्थाने प्रायश्चित्त आहे; पण जो आत्महत्याच करून घेतो, त्याला काही प्रायश्चित्त असत नाहीं ९० .
जो आत्महत्या करूनि निमाला । तो मरतांचि नरकासी गेला ।
प्रायश्चित्तासी कोण आहे उरला । मा शास्त्रार्थें बोला बोलावें ॥ ९१ ॥
प्रायश्चित्तासी कोण आहे उरला । मा शास्त्रार्थें बोला बोलावें ॥ ९१ ॥
कारण, जो आत्महत्या करून मरण पावतो, तो मरतांच नरकाला जातो. मग प्रायश्चित्त घ्यावयाला उरले कोण ? आणि शास्त्रार्थ तरी सांगावयाचा कोणाला ? ९१.
अमृत विकूनि कांजी प्याला । तैसा नरदेहीं भोगु भोगविला ।
हा थोर नाड जीवासी झाला । विसरोनि आपुला निजस्वार्थ ॥ ९२ ॥
हा थोर नाड जीवासी झाला । विसरोनि आपुला निजस्वार्थ ॥ ९२ ॥
अमृत विकून टाकून पेज प्यावी, त्याप्रमाणे नरदेहांत येऊन विषयभोगच भोगले, तर जीवाचा खरा स्वार्थ बुडून तो अधिक नाडला मात्र जातो ९२.
लाहोनि उत्तम शरीर । व्यर्थ विषयासक्तीं नर ।
नरकीं बुडाले अपार । हें शारङ्गधर बोलिला ॥ ९३ ॥
नरकीं बुडाले अपार । हें शारङ्गधर बोलिला ॥ ९३ ॥
उत्तम शरीर प्राप्त होऊन विषयासक्तीमुळे असंख्य लोक बुडतात, हेच श्रीकृष्णांनी सांगितले ९३.
असोत या मूर्खांचिया गोठी । ऐक उत्तमांची हातवटी ।
जे वेदार्थपरिपाठीं । निजहितदृष्टी सावध ॥ ९४ ॥
जे वेदार्थपरिपाठीं । निजहितदृष्टी सावध ॥ ९४ ॥
पण ह्या मूर्खाच्या गोष्टी राहू द्यात. आता वेदार्थाला अनुसरून आपल्या हितावर दृष्टि ठेवून सावध असणाऱ्या उत्तम लोकांची पद्धत ऐक ९४.
अतिविरक्त जे स्वभावें । तिंहीं काय कर्तव्य करावें ।
कोणा अर्थातें त्यजावें । तेंचि देवें सांगिजे ॥ ९५ ॥
कोणा अर्थातें त्यजावें । तेंचि देवें सांगिजे ॥ ९५ ॥
जे स्वभावानेच अत्यंत विरक्त असतात, त्यांनी कोणते कर्तव्य करावें? कोणती गोष्ट टाकून द्यावी हेच देव सांगतात ९५.
यदाऽऽरम्भेषु निर्विण्णो विरक्तः संयतेंद्रियः ।
अभ्यासेनात्मनो योगी धारयेदचलं मनः ॥ १८ ॥
अभ्यासेनात्मनो योगी धारयेदचलं मनः ॥ १८ ॥
[श्लोक १८] कर्मामध्ये दोष पाहून त्यांचा उबग आल्यामुळे विरक्त झालेल्या योग्याने इंद्रियांवर ताबा मिळवून अभ्यासाने आपले मन स्थिर करावे. (१८)
जो कर्मारंभींच विरक्त । फळाशा नातळे ज्याचें चित्त ।
मज निजमोक्ष व्हावा येथ । हेंही पोटांत स्मरेना ॥ ९६ ॥
मज निजमोक्ष व्हावा येथ । हेंही पोटांत स्मरेना ॥ ९६ ॥
जो कर्मारंभींच विरक्त असतो; फलाच्या आशेला ज्याचे चित्त शिवतही नाहीं; 'मला मोक्ष मिळावा' असेंही ज्याच्या अंत:करणाला आठवत नाही ९६,
खडतर वैराग्याची दृष्टी । इंद्रियांसी विषयांची गोष्टी ।
करूंचि नेदी महाहटी । धारणा नेहटीं दृढ राखे ॥ ९७ ॥
करूंचि नेदी महाहटी । धारणा नेहटीं दृढ राखे ॥ ९७ ॥
वैराग्याची दृष्टि खडतर असल्याने तो इंद्रियांना विषयाची गोष्टसुद्धा काढू देत नाही. इतका कडकडीत मनोनिग्रही असतो. आणि स्वरूपाची धारणा नेटाने दृढ राखतो ९७.
करूनियां श्रवण मनन । माझ्या स्वरूपाचें अनुसंधान ।
अखंड करी निदिध्यासन । तिळभरी मन ढळों नेदी ॥ ९८ ॥
अखंड करी निदिध्यासन । तिळभरी मन ढळों नेदी ॥ ९८ ॥
श्रवण व मनन करून माझ्या स्वरूपाचे नेहमीं अनुसंधान ठेवतो. अखंड माझाच निदिध्यास करीत राहातो. मन तिळभरसुद्धा ढळू देत नाही ९८.
धरोनि धारणेचें बळ । स्वरूपीं मन अचंचळ ।
अणुभरी होऊं नेदी विकळ । राखे निश्चळ निजबोधें ॥ ९९ ॥
अणुभरी होऊं नेदी विकळ । राखे निश्चळ निजबोधें ॥ ९९ ॥
धारणेच्या बळाने आत्मस्वरूपामध्येच मन स्थिर ठेवतो; यत्किंचितही ढळू देत नाही. निजबोधाने ते निश्चळ राखतो ९९.
एकाकी मन पाहें । स्वरूपीं कैसें निश्चळ होये ।
त्या अभ्यासाचे उपाये । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण ॥ २०० ॥
त्या अभ्यासाचे उपाये । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण ॥ २०० ॥
परंतु मन एकदम आत्मस्वरूपामध्ये निश्चळ कसे होते? त्या अभ्यासाचा उपायही स्वतः श्रीकृष्ण सांगतात २००.
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...