मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १७ ओव्या ३०१ ते ४००

    सकळ वेदांचें निजसार । तें सद्‍गुरुस्वरूप साचार ।

    ऐसा शिष्यासी निर्धार । निरंतर असावा ॥ १ ॥
    तसेंच जें  साऱ्या वेदांचें गुप्त रहस्य, तेच खरोखर सद्गुरूचे स्वरूप होय, असाच शिष्याचा निरंतर निश्चय असला पाहिजे १.


    त्यासी मनुष्यबुद्धीं आपण । कदा न करावें हेळण ।
    गुरुनिंदा बोलतां जाण । आली नागवण सर्वार्थीं ॥ २ ॥
    त्याला केवळ सामान्य मनुष्य आहे असे समजून त्याचा कधीं अनादर करूं नये. गुरूची निंदा तोंडांतून काढली तर सर्वस्वी नाश झालाच म्हणून समजावें २.


    सद्‍गुरुनिंदेचा एकांतु । करूं आला परम आप्तु ।
    तो त्यागावा जेवीं पतितु । हा नव्हे अर्थु तैं पळावें ॥ ३ ॥
    एखादा कोणी अत्यंत आप्त असून एकांती सद्गुरूची निंदा करण्यासाठी आला, तर बाटलेल्या मनुष्याचा जसा धिक्कार करतात, त्याप्रमाणे त्याचा त्याग करावा. ते न साधेल तर तेथून आपण पळून जावें ३.


    सद्‍गुरुनिंदेची वाणी । ऐकतां बोटें द्यावीं कानीं ।
    सद्‍गुरूसी भावें स्मरोनी । तें स्थानही त्याजोनी पळावें ॥ ४ ॥
    सदुरूच्या निंदेचे शब्द ऐकू आले तर कानांत बोटे घालावीत. भक्तिभावानें सद्गुरूचे स्मरण करून ती जागा सोडून निघून जावें ४.


    त्या सद्‍गुरुनिंदेची स्वयें मातु । करिता बुडाला निजस्वार्थु ।
    धुळीस मिळाला परमार्थु । आला अपघातु अंगासी ॥ ५ ॥
    सद्गुरुनिंदेची गोष्ट आपण स्वतःच बोलली तर सर्वस्व बुडालें, परमार्थ सारा धुळीला मिळाला आणि सारीच बाजू आंगावर आली म्हणून समजावे ५.


    ऐशिया गुरूच्या ठायीं जाण । पत्र पुष्प अन्न धन ।
    शिष्यें करूं नये वंचन । तें स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ६ ॥
    अशा गुरूच्या ठिकाणी पत्र, पुष्प, अत्र, धन याविषयी कधीही प्रतारणा करूं नये, असें श्रीकृष्ण स्वतः (पुढील श्लोकात ) सांगत आहेत ६.


    सायं प्रातरुपानीय भैक्ष्यं तस्मै निवेदयेत् ।
    यच्चान्यदप्यनुज्ञातमुपयुञ्जीत संयतः ॥ २८ ॥
    [श्लोक २८] सकाळ संध्याकाळ भिक्षा मागून आणून ती गुरूंसमोर ठेवावी तसेच इतरही गुरूदेवांना अर्पण करावे त्यांची आज्ञा झाल्यावरच त्याचा उपयोग करावा. (२८)


    अन्नधनपुष्पी फळीं । सायंप्रातर्मध्यान्हकाळीं ।
    भिक्षा मिळे ते गुरूजवळी । अर्पूनि कृतांजळी रहावें ॥ ७ ॥
    सकाळी, दुपारी व संध्याकाळी अन्न, द्रव्य, पुष्पें, फळे जी काय भिक्षा मिळेल ती गुरूजवळ ठेवून हात जोडून त्यांच्यापुढे उभे रहावे ७.


    तेथ गुरुआज्ञा जाहल्याही जाण । उदरापुरतें घ्यावें अन्न ।
    अन्नावेगळें पदार्थभरण । घेवों न ये जाण ब्रह्मचार्‍या ॥ ८ ॥
    त्या वेळी गुरूंनी आज्ञा दिली तरी पोट भरण्यापुरतेच अन्न त्यांतून ग्रहण करावें, ब्रह्मचाऱ्याने अन्नाशिवाय दुसरा कोणताच पदार्थ ग्रहण करू नये. ८.


    सायं प्रातः काळीं जाण । ब्रह्मचार्‍या विहित भोजन ।
    गुरुआज्ञा जें दिधलें अन्न । तेणें प्राणतर्पण करावें ॥ ९ ॥
    सकाळी आणि संध्याकाळी भोजन करणे ब्रह्मचाऱ्याला विहित आहे. गुरुआज्ञेने जेवढे अन्न मिळेल तेवढ्यानेच क्षुधाशांति करावी ९.


    तेथ न म्हणावें धडगोड । न करावें रसनाकोड ।
    न वाढवावा विषय वाड । देहनिर्वाहीं चाड शिष्यासी ॥ ३१० ॥
    त्यांत बरेवाईट काहीएक म्हणू नये; जिव्हेचे लाड कधी पुरवू नयेत; विषयविस्तार वाढवू नये. देहाचा निर्वाह झाला म्हणजे झाले, अशीच शिष्याची इच्छा असावी ३१०, 


    भोजनीं कांहीं न मागावें जाण । यालागीं दृढ धरावें मौन ।
    अधिक खादलिया अन्न । तें प्रतिबंधन गुरुसेवे ॥ ११ ॥
    भोजन करतांना काहीएक मागू नये; त्याकरितां मौन धरावें. अधिक अन्न खाल्ले तर ते गुरुसेवेला प्रतिबंधक होते ११.


    आहारीं अधिक घेतलिया अन्न । निद्रा आलस्य दाटी गहन ।
    अत्यंत अल्प जें भोजन । तेणें विकळचळण देहाचें ॥ १२ ॥
    जेवतांना अधिक अन्न घेतले तर निद्रा व आळस अतिशय येतो, आणि. फारच थोडे जेवले तर देहाला विकळपणा येतो १२.


    गुरुसेवेलागीं जाण । वृत्ती राखावी सावधान ।
    यालागीं शिष्यासी भोजन । युक्ताहारपण सर्वदा ॥ १३ ॥
    गुरुसेवेसाठी वृत्ति सावधान राखावी. ह्यासाठी शिष्याचे जेवण नेहमी बेताचे असावें १३.


    गुरुसेवेलागीं जाण । शरीर राखावें सावधान ।
    तें गुरुसेवेचें लक्षण । स्वयें जनार्दन सांगत ॥ १४ ॥
    गुरूच्या सेवेसाठी शरीरही चांगलें सावधान राखावें. तें गुरुसेवेचे लक्षण स्वतः जनार्दन (श्रीकृष्ण) सांगत आहेत १४.


    शुश्रूषमाण आचार्यं सदोपासीत नीचवत् ।
    यानशय्यासनस्थानैर्नातिदूरे कृताञ्जलिः ॥ २९ ॥
    [श्लोक २९] आचार्य कुठे जात असतील, तर त्यांच्या मागे मागे चालावे ते झोपल्यानंतर त्यांच्या जवळपास झोपावे. ते बसले असतील तर त्यांच्या आज्ञेची वाट पाहात, हात जोडून, जवळच उभे राहावे. अशा प्रकारे स्वतःकडे कमीपणा घेऊन शुश्रूषा करून आचार्यांची आज्ञा पालन करण्यात नेहमी तत्पर असावे. (२९)


    सर्वदा अतिसादर । न पडतांही अंतर ।
    गुरुसेवेसी निरंतर । अतितत्पर उल्हासें ॥ १५ ॥
    गुरुसेवेमध्ये तिळभरही अंतर न पडूं देतां सदासर्वदा उल्हासानें अत्यंत तत्पर असावें १५.


    गुरु यानारूढ असतां । पुढें चालावें साटोपतां ।
    पाठीसी यावें चरणीं चालतां । उपचारतासमवेत ॥ १६ ॥
    गुरु एखाद्या वाहनारूढ झाले असतां आपण त्यांच्यापुढे मोठ्या उत्साहाने चालावें : आणि ते पायाने चालू लागले असता त्यांचे सामान घेऊन त्यांचे पाठीमागून चालावें १६.


    समयोचित जाणोन । द्यावें तांबुल जीवन ।
    करावें चरणसंवाहन । घालावें आसन बैसती तेथें ॥ १७ ॥
    त्यांचा कल व प्रसंग पाहून त्यांना पाणी, विडा वगैरे द्यावा; ते बसतील तेथे त्यांचे आसन घालावे व त्यांचे पाय रगडावेत १७.


    सद्‍गुरु बैसल्या आसनीं । शिष्यें न बसावें नेहटूनी ।
    दूरी नवजावें तेथूनी । नयनोन्मीलनीं रहावें ॥ १८ ॥
    सद्गुरु आसनावर बसलेले असतां शिष्याने त्यांच्या अगदी जवळ बसूं नये व फार लांबही जाऊं नये. त्यांच्या नजरेखाली असावें १८.


    अंजळीसंपुट जोडुनी । संमुख राहावें सावधानीं ।
    गुरूची संज्ञा ज्यालागूनी । तें अविलंबनीं करावें ॥ १९ ॥
    हात जोडून समोर सिद्ध असावें. गुरूंनी खूण केली की ते तत्काल करावें १९.


    गुरु शेजेवरी निजले असतां । जवळी नसावें तत्त्वतां ।
    जेथूनि ऐकूं ये वचनार्था । तेथें निशीं अवस्था क्रमावी ॥ ३२० ॥
    गुरु बिछान्यावर निजले असता, त्यांच्याजवळ राहू नये. त्यांनी हाक मारलेली ऐकावयास येईल इतक्या अंतरावर रात्र घालवावी ३२०.


    मी एक सेवेनें संपन्न । ऐसा धरिलिया अभिमान ।
    केले सेवेसी आंचवण । सवेंचि जाण होईल ॥ २१ ॥
    सेवा करणारा काय तो एक मीच, असा मनांत अभिमान बाळगला तर सारीच सेवा व्यर्थ होईल २१.


    सेवकांमाजीं मी एक । केवळ रंकाचाही रंक ।
    ऐसा भावो निष्टंक । सेवेसी देख धरावा ॥ २२ ॥
    सेवा करतांना साऱ्या सेवकांमध्ये मी केवळ रंकाचाही रंक म्हणजे सेवकाचा सेवक आहे, असाच निश्चयाने भाव धरावा २२.


    तैसेंचि नीच काम करितां । लाज न धरावी सर्वथा ।
    उबग न मानूनी चित्ता । उल्हासता गुरुभजनीं ॥ २३ ॥
    त्याचप्रमाणे सेवेचे एखादें नीच काम करतांना लाज अशी मुळीच धरूं नये, मनांत कोणत्याही प्रकारचा कंटाळा न धरतां गुरुभजनामध्ये नेहमी उल्हासच बाळगीत जावा २३.


    एवंवृत्तो गुरुकुले वसेद्‍भोगविवर्जितः ।
    विद्या सामाप्यते यावद्‌बिभ्रद्‌व्रतमखण्डितम् ॥ ३० ॥
    [श्लोक ३०] विद्याध्ययन संपेपर्यंत सर्व सुखोपभोगांपासून दूर राहून गुरूकुलात या प्रकारे वागत राहावे आणि ब्रह्मचर्यव्रत कधीही खंडित होऊ देऊ नये. (३०)


    सांडोनि सकळ भोगांतें । गुरुकुळीं राहोनि तेथें ।
    गुरुसेवेचेनि व्रतें । प्रिय सर्वांतें तो जाहला ॥ २४ ॥
    सर्व सुखोपभोग सोडून गुरूच्या घरी राहून तेथें गुरूच्या सेवेच्या व्रतानेच तो सर्वांना प्रिय होतो २४.


    एवं गुरुसेवायुक्त । धरोनियां अखंड व्रत ।
    पावला वेदशास्त्र समस्त । पढणें समाप्त पैं जाहलें ॥ २५ ॥
    अशा प्रकारें गुरुसेवा करून अखंड ब्रह्मचर्यव्रत पाळून वेदशास्त्रांत प्रवीण होऊन सारें शिकणे संपलें २५, 


    एवं विद्या जाहलिया समाप्त । उपकुर्वाण नैष्ठिक व्रत ।
    स्वयें सांगावया अनंत । पुढील श्लोकार्थ सांगतु ॥ २६ ॥
    व सारी विद्या संपूर्ण झाली, म्हणजे नष्ठिक व उपकुर्वाण व्रत कसे पाळावे हे सांगण्यासाठी श्रीकृष्ण पुढील श्लोकार्थ सांगत आहेत २६.


    यद्यसौ छन्दसां लोकमारोक्ष्यन् ब्रह्मविष्टपम् ।
    गुरवे विन्यसद्देहं स्वाध्यायार्थं बृहद्‌व्रतः ॥ ३१ ॥
    [श्लोक ३१] ब्रह्मचार्‍याची वेदांच्या निवासस्थानीब्रह्मलोकात जाण्याची इच्छा असेल तर त्याने जन्मभर नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळून वेदांचे अध्ययन करण्यासाठीच आपले संपूर्ण जीवन आचार्यांच्या सेवेमध्येच समर्पित करावे. (३१)


    जरी ब्रह्मचारी व्रतस्थ । येणेंचि आश्रमें निश्चित ।
    सत्यलोक वैकुंठपर्यंत । वांछी वेदोक्त मत्प्राप्ती ॥ २७ ॥
    ब्रह्मचर्यव्रत पाळीत असतां तोच आश्रम निरंतर चालविण्याचा जो निश्चय करितो व वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे सत्यलोकापासून वैकुंठापर्यंतची माझी प्राप्ति इच्छितो २७, 


    तेणें यावज्जन्म आपण । दृढ करावें गुरुभजन ।
    निजदेहाचेंही जाण । करी समर्पण गुरुचरणीं ॥ २८ ॥
    त्याने स्वतः यावज्जन्म गुरुभजनच यथास्थित घडण्याकरिता आपला सारा देहच गुरुचरणाला अर्पण करावा २८.


    सद्‍गुरुभजनाची परवडी । नित्य नूतन आवडी ।
    निजात्मभावें चोखडी । लागली गोडी गुरुचरणीं ॥ २९ ॥
    रोज नव्या आवडीनें गुरूचे भजन करावे. गुरुचरणीं आत्मभावनाच ठेवली म्हणजे त्याचीच गोडी लागून रहाते २९.


    पूर्वील व्रतें व्रत धरी । तेंचि व्रत दृढ करी ।
    होय नैष्ठिक ब्रह्मचारी । गुरुभजनावरी निर्धारु ॥ ३३० ॥
    असा पुरुष पूर्वी धरलेलें ब्रह्मचर्यव्रतच पुढे चालवितो आणि तेच दृढ करितो. तोच 'नैष्ठिक' ब्रह्मचारी होतो व गुरुभजनावरच निश्चय ठेवतो ३३०.


    न मनी सन्मानाचें कोड । न म्हणे विषय गोड ।
    न धरी संसाराची चाड । व्रतीं दृढ व्रतस्थ ॥ ३१ ॥
    तो सन्मानाची इच्छा करीत नाहीं; विषयाची गोडी धरीत नाहीं; संसाराची चाड बाळगीत नाही; आपल्या व्रतांत दृढ व्रतस्थ राहतो ३१.


    ऐसा थोर व्रतें व्रतधर । तैसाचि गुरुभजनीं सादर ।
    करी सद्‍गुरूशीं विचार । वेदांतसार स्वाध्यायें ॥ ३२ ॥
    असें व्रत पाळून तो थोर व्रतधारी होतो, गुरुभजनावर त्याची तशीच निष्ठा जडते , आणि तो सद्गुरूंशी स्वाध्यायपूर्वक वेदांतरहस्याचाच विचार करीत राहतो ३२.


    'स्व' म्हणिजे आत्मा जाण । ते ठायीं नित्य अनुसंधान ।
    तो 'स्वाध्याय' म्हणती सज्ञान । ज्ञानविचक्षण निजद्रष्टे ॥ ३३ ॥
    'स्व' म्हणजे आत्मा हें  लक्षात ठेव. त्याचेच नित्य अनुसंधान ठेवणे, यालाच सुज्ञ ज्ञानविचक्षण व निजद्रष्टे लोक 'स्वाध्याय' असे म्हणतात ३३.


    ऐशिया साधकासी जाण । सर्वत्र ब्रह्मभावन ।
    हेंचि स्वमुखें मधुसूदन । स्वयें आपण सांगता ॥ ३४ ॥
    अशा प्रकारच्या साधकाला सर्वत्र ब्रह्माचीच भावना करणे योग्य असते. हेच श्रीकृष्ण आपल्या मुखाने (पुढील श्लोकांत) सांगत आहेत ३४.


    अग्नौ गुरावात्मनि च सर्वभूतेषु मां परम् ।
    अपृथग्धीरुपासीत ब्रह्मवर्चस्व्यकल्मषः ॥ ३२ ॥
    [श्लोक ३२] असा ब्रह्मचारी खरोखर ब्रह्मतेजाने संपन्न होतो आणि त्याची सर्व पापे नष्ट होतात त्याने अग्नी, गुरू, आपले शरीर आणि सर्व प्राण्यांचे ठायी मज परमात्म्याची उपासना करावी सर्वत्र एकच परमात्मा आहे, असा भाव ठेवावा. (३२)


    ब्रह्मचर्यव्रत धरणें । ब्रह्मवर्चस्व चढे तेणें ।
    आणि सद्‍गुरूचेनि भजनें । निष्पाप होणें निजवृत्तीं ॥ ३५ ॥
    अशा प्रकारें ब्रह्मचर्यव्रत धारण केले असतां आंगीं ब्रह्मतेज चढते. सगुरूच्या भजनानें व आत्मवृत्तीने तो निष्पाप होतो ३५.


    तेथें अग्निगुरु आपण । सर्व भूतांच्या ठायीं जाण ।
    अभिन्न ब्रह्मभावन । अनुसंधान सर्वदा ॥ ३६ ॥
    त्याने अग्नीमध्ये, गुरूमध्ये, आपणामध्ये आणि सर्व प्राणिमात्रामध्ये  अभिन्नपणे ब्रह्मभावना करून निरंतर तेंच अनुसंधान धरावें ३६.


    तेव्हां जें जें देखे दृश्यजात । तेथ ब्रह्मभावो अचुंबित ।
    यापरी मातें उपासित । ब्रह्मयुक्त सद्‍भावें ॥ ३७ ॥
    असें करितो तेव्हां जो जो म्हणून दृश्य पदार्थ त्याच्या नजरेसमोर येतो, तो तो शुद्ध ब्रह्मरूप आहे असे त्याला वाटते. ह्याप्रमाणे ब्रह्मत्वरूप होऊन सद्भावाने तो माझी उपासना करीत असतो ३७.


    नैष्ठिक ब्रह्मचर्याचा नेम । वानप्रस्थसंन्यासिया सम ।
    तेथील आवश्यक जो धर्म । मुख्य वर्म त्यागाचें ॥ ३८ ॥
    तात्पर्य, नैष्ठिक ब्रह्मचर्याचा नेम म्हटला म्हणजे तो वानप्रस्थ आणि संन्यासी ह्यांच्यासारखाच असतो. त्यांनी अवश्य आचरण करण्याचा धर्म असतो, त्यांत सर्वसंगपरित्याग हेंच मुख्य वर्म असते ३८.


    स्त्रीणां निरीक्षणस्पर्शसंलापक्ष्वेलनादिकम् ।
    प्राणिनो मिथुनीभूता न गृहस्थोऽग्रतस्त्यजेत ॥ ३३ ॥
    [ श्लोक ३३] ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्याशांनी स्त्रीकडे पाहाणे, तिला स्पर्श करणे, तिच्याशी बोलणे किंवा थट्टामस्करी करणे इत्यादींपासून लांब राहावे मैथुन करणार्‍या प्राण्यांकडे पाहू नये. (३३)


    नैष्ठिक ब्रह्मचारी संन्यासी । वानप्रस्थ वनवासी ।
    तिहीं न पहावें स्त्रियांसी । हा मुख्यत्वें त्यांसी स्वधर्म ॥ ३९ ॥
    नैष्ठिक ब्रह्मचारी, संन्यासी व वनांत राहणारे वानप्रस्थ यांनी मुख्यत्वेकरून स्त्रियांकडे पाहतां कामा नये, हाच त्यांचा मुख्य धर्म होय ३९.


    स्त्री देखतांचि दिठीं । सांडूनियां पर्णकुटी ।
    पळावें गा उठाउठी । मा कराव्या गोठी घडे केवीं ॥ ३४० ॥
    स्त्री दृष्टीस पडली की आपली झोपडी सोडून तात्काल उठून पळून जावें. मग तिच्याकडे गोष्टी करणे कसे घडेल ? ३४०.


    स्वप्नींही स्त्रियेच्या स्पर्शासी । करूं नये या तिघांशीं ।
    करितांचि मदनु त्यांसी । वीर्यपातासी उपजवी ॥ ४१ ॥
    या तिघांनी स्वप्नांतसुद्धा स्त्रीला स्पर्श करू नये. केल्यास मदन त्यांचे रेतस्खलन करवील ४१.


    त्या स्त्रियांसी क्रीडाविनोद । करितां विध्वंसे स्वधर्मकंद ।
    यालागीं स्त्रीगुणानुवाद । न करिती शुद्ध सज्ञान ॥ ४२ ॥
    त्या स्त्रियांबरोबर हास्यविनोदादि क्रीडा केली, तर धर्माचें मूलबीजच नष्ट होऊन जाईल, म्हणून शुद्ध ज्ञानी लोक स्त्रीगुणांचे वर्णन करीत नाहीत ४२.


    स्त्रियांचे हावभावदर्शन । एकांत गुह्य संभाषण ।
    नाना विनोद अंगस्पर्शन । परिहासन मदनोक्ती ॥ ४३ ॥
    स्त्रियांचे हावभाव पाहणे, त्यांशी एकांत करणे, गुह्य भाषण बोलणे, अनेक प्रकारचा विनोद करणे, अंगास अंग लावणे, थट्टामस्करी किंवा अंगारिक भाषण करणे ४३, 


    इतुकेंही जेथ घडे । तेथ कामाचा घाला पडे ।
    स्वधर्म समूळ बुडे । धैर्याचें उडे निजसत्त्व ॥ ४४ ॥
    इतकेंही जेथे घडेल, तेथे कामाचा घाला पडेल आणि स्वधर्म सारा बुडून जाईल व धैर्याचे मूलतत्त्व नाश पावेल ४४.


    गृहस्थाचिये प्रवृत्ती । परस्त्रियेसी ऐसी गती ।
    जाहलिया जाण निश्चितीं । अपावो अंतीं पावेल ॥ ४५ ॥
    गृहस्थाची सुद्धा परस्त्रियेशी वागण्याची अशीच प्रवृत्ति असेल, तर तोसुद्धा शेवटी अपायांत पडेल ४५.


    स्त्री ते अग्निकुंडासमान । पुरुष तो घृतकुंभ जाण ।
    तेथ द्रवतां अंतःकरण । अर्ध क्षण लागेना ॥ ४६ ॥
    स्त्री ही अग्नीच्या कुंडासारखी आहे; आणि पुरुष हा तुपाच्या घटासारखा आहे. करितां अंत:करणाला द्रव फुटायला अर्धक्षणही नको ! ४६.


    घृत वेंचलियापाठीं । घटासी झालीं वर्षें साठी ।
    तरी अग्नीशीं जाहल्या भेटी । द्रवता पोटीं तोही धरी ॥ ४७ ॥
    आंतील तूप सरून त्या घटाला साठ वर्षे जरी झाली असली, तरी त्याला अग्नीचा संपर्क होतांच त्याच्या पोटात पाझर फुटतोच ४७.


    तेवीं वार्धक्यावयसेंसीं । एकांत जाहलिया स्त्रियेंशीं ।
    गोष्टीमात विनोदेसीं । कामाचा त्यासी घाला पडे ॥ ४८ ॥
    त्याप्रमाणे म्हातारपणीसुद्धा  स्त्रियेशी एकांत केल्यास, व त्यांत थट्टामस्करीच्या गोष्टी सांगत बसल्यास, त्याच्यावरही कामाचा घाला पडल्याशिवाय राहणार नाही ४८.


    त्यागावी कामिनीसंगती । हा मुख्य त्याग परमार्थीं ।
    हेंचि स्वमुखें श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥ ४९ ॥
    याकरितां स्त्रियांची संगत टाळावी, हाच परमार्थामध्ये मुख्य त्याग आहे; हेच श्रीकृष्णांनी आपल्या मुखाने उद्धवाला सांगितले ४९.


    पराशर‍ऐसा महंत । मत्स्योदरीशीं जाहला रत ।
    यालागीं स्त्रियेचा एकांत । अनर्थभूत पुरुषासी ॥ ३५० ॥
    पराशरासारखा महंतसुद्धा मत्स्योदरीशीं रममाण झाला .'यावरून स्त्रियेचा एकान्त हा पुरुषाला अनर्थावहच आहे (असें निश्चयाने समजावे.) ३५०, 


    मैथुनभूत जे प्राणी । पशुपक्षी आदिकरूनी ।
    सादरें न पहावे नयनीं । पाहतां कडकडूनि काम खवळे ॥ ५१ ॥
    पशुपक्षी आदिकरून मैथुन करीत असलेले प्राणी मुद्दाम होऊन डोळ्यांनी कधीही पाहूं नयेत; पाहिले तर काम कडकडून खवळतो ५१.


    मत्स्यमैथुन देखिल्यासाठीं । खवळल्या कामाच्या परिपाठी ।
    सौभर ऋषीश्वरें तपकोटी । मैथुनासाठीं नाशिल्या ॥ ५२ ॥
    मत्स्याचें मैथुन डोळ्यांनी पाहिल्यामुळे कामाच्या लहरी क्षुब्ध झाल्या आणि ऋषिश्रेष्ठ सौभराने मैथुनासाठींच कोट्यवधि तपें नष्ट करून टाकली ५२.


    यालागीं कामाचें दर्शन । कां कामाची आठवण ।
    पुरुषासी बाधक जाण । कामस्मरण न करावें ॥ ५३ ॥
    ह्याकरिता कामाचे दर्शन किंवा कामाची आठवण हीसुद्धा पुरुषांना बाधक आहे. याकरिता कामाचे स्मरणसुद्धा करूं नये ५३.


    हृदयीं नव्हे कामसंचार । तैसा करावा सदाचार ।
    भूतें पहावीं मदाकार । हा मुख्य प्रकार हरी बोले ॥ ५४ ॥
    हृदयांत कामाचा संचारच होणार नाही अशा प्रकारचा सदाचार असावा. श्रीकृष्ण म्हणतात, सर्व प्राणिमात्र मत्स्वरूप आहेत असे मानावे हीच मुख्य गोष्ट आहे ५४.


    शौचमाचमनं स्नानं संध्योपासनमार्जवम् ।
    तीर्थसेवा जपोऽस्पृश्याभक्ष्यासंभाष्यवर्जनम् ॥ ३४ ॥
    [श्लोक ३४] प्रिय उद्धवा ! शुचिता, आचमन, स्नान, संध्योपासना, सरळपणा, तीर्थसेवन, जप, सर्व प्राण्यांच्या ठायी मलाच पाहाणे, मन, वाणी तसेच शरीराचा संयम हे नियम सर्व आश्रमांनाच लागू आहेत (३४)


    शौच आचमन स्नान । संध्या तर्पण उपासना ।
    जपादिक अनुष्ठान । तीर्थसेवन विश्वासें ॥ ५५ ॥
    शुचिर्भूतपणा, आचमन, स्नान, संध्या, तर्पण, पूजा, अर्चा, जपादि अनुष्ठान, भक्तिपूर्वक तीर्थसेवन इत्यादि करावें ५५.


    अधर्म-अकर्मांचा विटाळु । हों न द्यावा अळुमाळु ।
    आलियाही संकटकाळु । अभक्षणशीळु नव्हे भावो ॥ ५६ ॥
    अधर्माचा किंवा अकर्माचा यत्किंचितही विटाळ होऊ देऊ नये, संकटकाल प्राप्त झाला तरीसुद्धा अभक्ष्य भक्षण करूं नये ५६.


    ज्यासी असे व्रतधारण । तेणें रजस्वलादि निंद्य जन ।
    त्यांसी न करावें संभाषण । धरावें मौन निंदास्तवनीं ॥ ५७ ॥
    जो व्रतस्थ असेल त्याने रजस्वला व निंद्य लोक यांच्याशी भाषण करूं नये. निंदा किंवा स्तुति याविषयी मौन धरून असावें ५७.


    सर्वांही आश्रमांसी जाण । स्वधर्मनियमाचें लक्षण ।
    सांगेन म्हणे श्रीकृष्ण । ऐक सावधान उद्धवा ॥ ५८ ॥
    श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा ! आता साऱ्याच आश्रमांतील स्वधर्मनियमांचे लक्षण कसे असते ते सांगतों, नीट लक्ष देऊन श्रवण कर ५८.


    सर्वाश्रमप्रयुक्तोऽयं नियमः कुलनंदन ।
    मद्‍भावः सर्वभूतेषु मनोवाक्कायसंयमः ॥ ३५ ॥
    [श्लोक ३५] अस्पृशांना न शिवणे, अभक्ष्य वस्तू न खाणे आणि ज्यांच्याशी बोलू नये त्यांच्याशी न बोलणे, हे नियमसुद्धा या सर्वांसाठी आहेत. (३५)


    यदुवंशकुलनंदना । ऐक उद्धवा सज्ञाना ।
    वर्णाश्रमस्वधर्मलक्षणा । सर्वांस जाणा हे एकी निष्ठा ॥ ५९ ॥
    हे यदुकुलदीपका सुज्ञ उद्धवा ! ऐक. सर्व वर्णाश्रमस्वधर्मलक्षणाची निष्ठा ही एकच आहे ५९.


    मनसा वाचा कर्मणा । नेमूनि आपआपणा ।
    सर्वांभूतीं ब्रह्मभावना । अखंड धारणा राखावी ॥ ३६० ॥
    (ती अशी की)-कायावाचामनाने आपले आपण संयमन करून, सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी मत्स्वरूपाची भावना अखंड धरावी ३६०.


    ऐसा मद्‍भाव सार्वांभूतीं । दृढ ठसावल्या चित्तवृत्ती ।
    ऐशा नैष्ठिक ब्रह्मचार्‍याप्रती । मोक्षफलप्राप्ती हरि बोले ॥ ६१ ॥
    श्रीहरि म्हणतात, अशी सर्व प्राणिमात्रांवर मत्स्वरूपाचीच दृढतर भावना मनात विंबून राहिली, म्हणजे अशा प्रकारच्या नैष्ठिक ब्रह्मचाऱ्याला मोक्षफलप्राप्ति होते ६१,


    एवं बृहद्व्रतधरो ब्राह्मणोऽग्निरिव ज्वलन् ।
    मद्‍भक्तस्तीव्रतपसा दग्धकर्माशयोऽमलः ॥ ३६ ॥
    [श्लोक ३६] नेष्ठिक ब्रह्मचारी ब्राह्मणाने या नियमांचे पालन केल्याने तो अग्नीसारखा तेजस्वी होतो तीव्र तपश्चर्येमुळे त्याच्या वासना भस्म होऊन जातात अंतःकरण शुद्ध होते आणि तो माझा भक्त होतो. (३६)


    यापरी जो ब्रह्मचारी । महाव्रतें व्रत धरी ।
    मद्‍भावना भूताकारीं । धारण धरी अविश्रम ॥ ६२ ॥
    याप्रमाणे जो ब्रह्मचारी हे कडकडीत व्रत पाळतो, सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी माझीच भावना करतो, आणि ती भावना अंत:करणांत निरंतर धरितो ६२, 


    यापरी करितां मद्‍भजना । जळाल्या कर्मबीजेंसीं वासना ।
    तेव्हां पूर्ण भक्ति माझी जाणा । वरी अंतःकरणा भक्तांच्या ॥ ६३ ॥
    तो अशा प्रकारे माझ्या भजनीं लागल्यामुळे कर्मबीजासहवर्तमान त्याच्या वासना जळून जातात. त्याच वेळी माझी पूर्ण भक्ति भक्ताच्या अंत:करणास वरते ६३.


    तेव्हां निरुपचार निजस्थिती । सहजचि घडे माझी भक्ति ।
    तेथ ज्या ज्या देखे दृष्य व्यक्ती । मद्‍भावप्रतीती चिद्‌रूपें ॥ ६४ ॥
    तेव्हा कोणत्याही उपचाराशिवाय सहज स्थितीने त्याला माझी भक्ति घडते. तेव्हां तो ज्या ज्या दृश्य व्यक्ति पाहतो, त्यांच्यांत चिद्रूपाने मीच आहे अशी त्याला प्रतीति येते ६४.


    ऐशी घडतां माझी भक्ती । आर्त जिज्ञासु अर्थार्थी ।
    यांची उठवूनिया पंक्ती । चिन्मात्रैक चौथी भक्ती तो लाभे ॥ ६५ ॥
    अशी माझी भक्ति घडली, म्हणजे तो आतं, जिज्ञासु व अर्थार्थी ह्यांच्या पंक्ति उठवून, चिन्मात्रैकस्थिति अशी चौथी भक्ति त्याला प्राप्त होते ६५.


    साचचि जे भक्तिच्या ठायीं । चारी मुक्ती लोळती पायीं ।
    जो स्वानंद मद्‍भक्तांच्या देहीं । संपूर्ण पाहीं उल्हासे ॥ ६६ ॥
    खरोखर ज्या भक्तीमुळे चारी मुक्ति पायांशी लोळतात, तो स्वानंद माझ्या भक्तांच्या देहांत पूर्णपणे उल्हसून राहतो ६६.


    तेव्हां मज व्हावी मुक्तता । हेंही नाठवे त्याच्या चित्ता ।
    हो कां 'गेली माझी बद्धता' । हेंही सर्वथा स्मरेना ॥ ६७ ॥
    त्या वेळी मला मुक्तता प्राप्त व्हावी, असेंही त्यांना आठवत नाही. किंवा 'माझें बंधन नाहीसे झाले,' असें त्याला स्मरत नाही ६७.


    एवं माझेनि भजनसुखें । विसरला सकळ सुखदुःखें ।
    माझे भक्तिचेनि हरिखें । स्वानंदतोखें संतुष्ट ॥ ६८ ॥
    तात्पर्य, माझ्या भजनसुखामध्येच तो सारी सुखे आणि दुःखें विसरून जातो. आणि माझ्या भक्तीच्या हर्षाने स्वानंदसुखांत तृप्त राहतो ६८.


    ऐसा नैष्ठिक ब्रह्मचारी । मज पावला स्वधर्मेंकरीं ।
    आतां उपकुर्वाणाची परी । ऐक दुसरी अवस्था ॥ ६९ ॥
    अशा प्रकारचा नैष्ठिक' ब्रह्मचारी आपल्या स्वधर्मानं मत्स्वरूपाला पोचतो. असो. आतां दुसरी स्थिति — उपकुर्वाण' ब्रह्मचाऱ्याची, तीही तुला सांगतों, ऐक ६९.


    अथानंतरमावेक्ष्यन्यथा जिज्ञासितागमः ।
    गुरवे दक्षिणां दत्वा स्नायाद्‍गुर्वनुमोदितः ॥ ३७ ॥
    [श्लोक ३७] प्रिय उद्धवा ! ब्रह्मचारी जर गृहस्थाश्रमात प्रवेश करू इच्छित असेल, तर त्याने विधिपूर्वक वेदाध्ययन संपवून गुरूंना दक्षिणा द्यावी आणि त्यांची अनुमती घेऊन समावर्तन संस्कार करावा. (३७)


    संपूर्ण केलिया अध्ययन । जाहलिया वेदशास्त्रसंपन्न ।
    तेणें गुरूसी आज्ञा पुसोन । व्रतविसर्जन सकामा ॥ ३७० ॥
    सारे अध्ययन पूर्ण झालें, वेदशास्त्रांत निपुण झाला, म्हणजे त्याने विषयोपभोगाची इच्छा असल्यास - गुरूची आज्ञा घेऊन व्रताचे विसर्जन करावे ३७०.


    सकामनिष्कामतेचा भरु । देखोनि विवेकविचारु ।
    तैशीच आज्ञा देती गुरु । जैसा अधिकारु शिष्याचा ॥ ७१ ॥
    विषययोपभोगाची इच्छा किंवा अनिच्छा - जशी ज्याची प्रवृत्ति असेल, त्याचा नीट विचार करून, शिष्याचा जसा अधिकार असेल, तशीच गुरुही आज्ञा देतात ७१.


    ज्यासी गृहाश्रमाची आसक्ती । तेणें आपुल्या यथाशक्ती ।
    दक्षिणा देऊनि गुरुप्रती । व्रतसमाप्ती करावी ॥ ७२ ॥
    ज्याला गृहस्थाश्रम करण्याची आवड असेल, त्याने यथाशक्ति गुरूला दक्षिणा देऊन ब्रह्मचर्यव्रताची समाप्ति करावी ७२.


    करावया समावर्तन । घेऊनि गुरूचें अनुमोदन ।
    करावें मंगलस्नान । विसर्जन व्रतबंधा ॥ ७३ ॥
    सोडमुंज करण्याकरितां गुरूचे अनुमोदन घेऊन मंगल स्नान करावे, आणि मग  व्रतबंधाचे विसर्जन करावें ७३.


    येथ अधिकाराचा भेदु । स्वयें सांगतो गोविंदु ।
    तोचि श्लोकार्थे विशदु । वैराग्यसंबंधु अधिकारा ॥ ७४ ॥
    येथे श्रीकृष्ण अधिकारभेदाचे वर्णन करीत आहेत. तोच वैराग्याच्या संबंधानें प्राप्त होणारा अधिकार पुढील श्लोकाच्या अर्थाने व्यक्त करतों ७४.


    गृहं वनं वोपविशेत्प्रव्रजेद्वा द्विजोत्तमः ।
    आश्रमादाश्रमं गच्छेत् नान्यथा मत्परश्चरेत् ॥ ३८ ॥
    [श्लोक ३८] त्यानंतर ब्रह्मचार्‍याने गृहस्थाश्रमात किंवा वानप्रस्थाश्रमात प्रवेश करावा तो ब्राह्मण असेल तर संन्याससुद्धा घेऊ शकतो किंवा क्रमाने एका आश्रमातून दुसर्‍या आश्रमात प्रवेश करावा मत्परायण भक्ताने याहून वेगळ्या प्रकारे वागू नये. (३८)


    ज्यासी वैराग्य नाहीं सर्वथा । हृदयीं स्त्रीकामाची आस्था ।
    तेणें द्वितीयाश्रमसंस्था । गार्हस्थ्या करावें ॥ ७५ ॥
    ज्याला मुळीच वैराग्य नाही, अंत:करणामध्ये स्त्रीच्या उपभोगाची आवड, त्याने दुसरा म्हणजे गृहस्थाश्रम पतकरावा ७५, 


    स्त्रीकामु तरी नावडे । विवेक वैराग्य ज्यासी थोडें ।
    तेणें वानप्रस्थाश्रमाकडे । निघावें रोकडें तत्काळ ॥ ७६ ॥
    अथवा स्त्रीकाम तर आवडत नाही, परंतु विवेक वैराग्य ज्याला थोडे असते स्त्रीसुखाची फारशी आवड नाही, पण विवेक-वैराग्य पूर्ण नाही, असे असेल त्याने तत्काल वानप्रस्थाश्रमाकडे निघावे ७६.


    जो विवेकतेजें दीप्तिमंत । ज्यासी सदा वैराग्य धडधडित ।
    जो सर्वार्थी दिसे विरक्त । त्यासीच निश्चित चतुर्थाश्रम ॥ ७७ ॥
    जो विवेकाच्या तेजाने देदीप्यमान असेल, ज्याच्यापाशी सर्वकाळ वैराग्य जागृत असेल, जो कोणत्याही विषयांत अगदी विरक्त असेल, त्यालाच संन्यासाश्रम खरोखर योग्य होय ७७.


    मुख्यत्वें ज्यासी ब्राह्मणजन्म । तोचि बोलिजे द्विजोत्तम ।
    त्यासीच बोलिला चतुर्थाश्रम । वैश्यक्षत्रियां नेम संन्यासी नाहीं ॥ ७८ ॥
    जो जन्मत: ब्राह्मण असेल तोच द्विजोत्तम म्हणावा. त्यालाच चतुर्थाश्रम सांगितला आहे. वैश्यांना व क्षत्रियांना चतुर्थाश्रमाचा नियम सांगितलेला नाही ७८.


    क्षत्रीय संन्यास अंगीकारिती । तिंही रिघावें महापंथीं ।
    दंड-कमंडलादिप्रवृत्ती । व्यवहारस्थिती त्यां नाहीं ॥ ७९ ॥
    क्षत्रियांनी संन्यास घेतला तर त्यांनी महापंथांत शिरावें. दंड-कमंडलु इत्यादिकांचे व्यवहार त्याला सांगितलेले नाहीत ७९.


    ब्राह्मणासी ब्रह्मचर्याच्या पोटीं । धडधडीत जैं वैराग्य उठी ।
    तै संन्यासपरिपाठीं । उठाउठीं अंगीकारु ॥ ३८० ॥
    ब्राह्मणाला ब्रह्मचर्याश्रमांतच कडकडीत वैराग्य उत्पन्न झाले, तर त्याने तत्काळ संन्यास स्वीकारावा ३८०.


    बैसतां भार्येच्या पाटीं । बहुल्यावरी वैराग्य उठी ।
    त्यासी संन्यासग्रहणीं गोठी । अधिकारु श्रेष्ठीं बोलिला ॥ ८१ ॥
    लग्नाच्या वेळी भार्येच्या समोर पाटावर बसतांच म्ह. बहुल्यावरच ज्याला वैराग्य उत्पन्न होईल त्याने लगेच संन्यास घ्यावा, असें श्रेष्ठांनी सांगितले आहे ८१.


    संन्यासग्रहणीं ज्याचें । वैराग्य दिसे अर्धकाचें ।
    त्यासी संन्यासग्रहणाचें । योग्यत्व साचें असेना ॥ ८२ ॥
    संन्यासग्रहणाविषयीं ज्याचें वैराग्य अर्धेकच्चे दिसून येईल, त्याला संन्यासग्रहणाची खरोखर योग्यताच नाही असे समजावे ८२.


    जैसा कां वोकिला वोक । ज्याचा त्यास नावडे देख ।
    तैसें विषयभोगसुख । ज्यासी निःशेष नावडे ॥ ८३ ॥
    ओकून टाकलेली ओक ज्याची त्याला आवडत नाही, त्याप्रमाणे विषयोपभोगाचे सुख ज्याला निखालस आवडत नाही ८३, 


    त्यासी संन्यासीं अधिकारु । तोचि संन्यासी साचारु ।
    ज्यासी विषयांचा विकारु । अणुमात्रु बाधेना ॥ ८४ ॥
    त्यालाच संन्यासाचा अधिकार आहे. ज्याला विषयाच्या विकाराने अणुमात्र बाधा होत नाही, तोच खराखुरा संन्यासी होय ८४.


    प्रथम ब्रह्मचर्ययुक्त । वैराग्य न चढेचि हात ।
    तरी हो‍ऊनि गृहस्थ । स्वधर्मयुक्त वर्तावें ॥ ८५ ॥
    प्रथम ब्रह्मचर्यवत पाळीत असतां वैराग्य हाताला चढत नसेल, तर त्याने गृहस्थ होऊन स्वधर्माचरणाने वागावें ८५.


    तेथें स्वधर्में विषय सेवितां । दृढ साधावी विरक्तता ।
    तेथेंही वैराग्य न ये हाता । तरी वानप्रस्थाश्रमी व्हावें ॥ ८६ ॥
    त्यांत स्वधर्मानुरूप विषयसेवन करून खरीखरी विरक्तता साधावी. तेथेही वैराग्य उत्पन्न न होईल तर वानप्रस्थाश्रमी व्हावें ८६.


    यापरी आश्रमादाश्रमा जातां । वैराग्यें संन्यासग्रहणता ।
    परी अनाश्रमीं तत्त्वतां । नाहीं सर्वथा अधिकारु ॥ ८७ ॥
    याप्रमाणे एका आश्रमांतून दुसऱ्या आश्रमात जात जातच वैराग्य संपादन करून मग संन्यासाचे ग्रहण करावें. परंतु कोणत्याच आश्रमाशिवाय राहण्याला कोणालाच अधिकार नाही ८७.


    सांडूनि पूर्वाश्रमासी । जो गेला आश्रमांतरासी ।
    तेथूनि पुढारां मार्ग त्यासी । परी मागें यावसायी विधि नाहीं ॥ ८८ ॥
    पूर्वाश्रम सोडून जो कोणी दुसऱ्या आश्रमात जातो, त्याला त्याच्या पुढच्या आश्रमात जाण्याला अधिकार आहे. पण पुन्हा मागच्या आश्रमात येण्याचा विधि शास्त्रांत नाहीं ८८.


    कां मत्पर जो माझा भक्त । त्यासी आश्रमनेम नाहीं येथ ।
    तो माझेनि भजनें कृतकृत्य । जाण निश्चित उद्धवा ॥ ८९ ॥
    आतां जो माझा भक्त माझ्या भजनीं तत्परतेने लागतो, त्याला मात्र ह्या आश्रमांचा नियम लागू नाही. उद्धवा ! तो माझ्या भजनानेच कृतकृत्य होतो, हे निश्चित समज ८९.


    सद्‍भावें माझी भक्ति करितां । विवेकवैराग्य-योग्यता ।
    पावोनि माझी पूर्ण सत्ता । सायुज्यता नेघती ॥ ३९० ॥
    सद्भावाने माझी भक्ति करूं लागले म्हणजे विवेकयुक्त  वैराग्याची योग्यता प्राप्त होते; माझी पूर्ण सत्ताच त्यांच्या हाती लागते. त्यामुळे ते सायुज्यतामुक्ति दिली तरी घेत नाहीत ३९०.


    ऐसे जे माझे भक्तोत्तम । त्यांसी न लगे आश्रमनेम ।
    त्यांचा सर्वही मी स्वधर्म । ऐसें पुरुषोत्तम बोलिला ॥ ९१ ॥
    असे जे माझे श्रेष्ठ भक्त असतात, त्यांना आश्रमाचा नियम लागू नाही. त्यांचा सारा स्वधर्मम्हणजे मीच. असें श्रीकृष्णाने सांगितले ९१.


    उद्धवा ऐक पां निश्चितीं । गृहस्थाची स्वधर्मस्थिती ।
    समूळ सांगेन तुजप्रती । ऐसें श्रीपति बोलिला ॥ ९२ ॥
    पुन्हा तो श्रीपति म्हणाला की, हे उद्धवा ! आता तुला गृहस्थाच्या स्वधर्माचेही साद्यन्त  श्रवण करवितों, तेही तूं लक्षपूर्वक ऐक ९२.


    गृहार्थी सदृशीं भार्यां उद्वहेदजुगुप्सिताम् ।
    यवीयसीं तु वयसा यां सवर्णामनुक्रमात् ॥ ३९ ॥
    [श्लोक ३९] गृहस्थाश्रमाचा स्वीकार करू इच्छिणार्‍याने आपल्याला अनुरूप व उत्तम लक्षणांनी संपन्न अशा कुलीन कन्येशी विवाह करावा ती वयाने लहान आणि आपल्याच वर्णाची असावी अन्य वर्णाची कन्या वरावयाची असल्यास आपल्याहून खालच्या वर्णाची वरावी. (३९)


    करोनियां समावर्तन । व्रतबंधाचें विसर्जन ।
    गुरुआज्ञा घेऊनि जाण । पाणिग्रहण करावें ॥ ९३ ॥
    सोडमुंज करून व्रतबंधाचेही विसर्जन करावे व गुरूची आज्ञा घेऊन लग्न करून घ्यावें ९३.


    भार्या पर्णावी सवर्ण । इतर वर्जिले तिन्ही वर्ण ।
    स्ववेद-स्वशाखेचे वर्ण । सगोत्रपण चुकवूनि ॥ ९४ ॥
    भार्या करावयाची ती आपल्याच वर्णाची करावी, इतर तीन वर्णातील करूं नये; आपलेच गोत्र असेल तर तें वर्ज्य करून आपल्याच वेदशाखेतील जातीची करावी ९४.


    जे उभय कुळीं विशुद्ध । जे दशलक्षणीं अनिंद्य ।
    देतां मातापित्यांसी आल्हाद । तो श्लाघ्य संबंध पर्णावा ॥ ९५ ॥
    माता व पिता अशी उभयतां कुठे पवित्र असलेली शास्त्रोक्त दश लक्षणांनी अनिंद्य व कन्यादान करतांना माता-पित्यांना आनंद होत असतो तोच योग्य संबंध जाणावा ९५.


    जिची जन्मोत्तरी पाहतां । स्वयें वरापरीस अधिकता ।
    कां समान वयें समता । या दोनी सर्वथा त्यागाव्या ॥ ९६ ॥
    जन्मपत्रिकेवरून जी नवऱ्यापेक्षा वयाने अधिक आहे, किंवा वयाने बरोबरीची असेल, तर त्या दोन्ही कन्या त्याज्य समजाव्या ९६.


    जन्मपत्र पाहतां दिठीं । वरुषें सातें पांचें धाकुटी ।
    ते पर्णावी स्वधर्मदृष्टीं । भार्या गोमटी ती नांव ॥ ९७ ॥
    जी मुलगी नवऱ्यापेक्षा पांच सात वर्षांनी लहान असेल, तिच्याशीच स्वधर्माप्रमाणे विवाह करावा. तीच भार्या उत्तम होय ९७.


    नोवरी पाणिग्रहणयुक्त । आठांपासूनि दशवर्षांत ।
    अधिक ते वृषली निश्चित । शास्त्रार्थप्रयोगें ॥ ९८ ॥
    नवरी आठ पासून दहा वर्षापर्यंतची असेल तिचेच पाणिग्रहण करावे. ह्याहून अधिक वर्षांची ती 'वृषली' म्ह. शूद्र असें शास्त्राने निश्चित केलेले आहे ९८.


    गर्भाष्टमाहूनि खालती । जिची वयसा असे निश्चितीं ।
    तो नोवरी वराधिकारीं अप्राप्ती । ऐसें शास्त्रार्थीं बोलिलें ॥ ९९ ॥
    तसेंच गर्भधारणापासून आठ वर्षांच्या खाली वय असलेली नवरी लग्न करण्यास अयोग्य, असे शास्त्रांत सांगितले आहे ९९.


    ऐशा लक्षणांचा नाहीं बाधू । तैशी पर्णावी शुद्ध वधू ।
    मग आश्रमधर्म अतिशुद्धू । शास्त्राविरुद्धु तो ऐक ॥ ४०० ॥
    अशा लक्षणांचा जिला बाध नाही, अशी पवित्र नवरी पाहून तिच्याशी विवाह करावा. यानंतर शास्त्राला अविरुद्ध असा शुद्ध आश्रमधर्म कसा असतो ते सांगतों ऐक ४००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...