मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १७ ओव्या १0१ ते २००

    पुत्र जन्मल्या होय सुख । तो गेलिया सवेंचि दुःख ।

    धन जोडलिया होय हरिख । सवेंचि शोक तन्नाशीं ॥ १ ॥
    पुत्र जन्मास आला असतां आनंद वाटतो; व तो गेला की लगेच दुःख होते; द्रव्य मिळाले म्हणजे हर्ष होतो, आणि तें गेलें की तत्काळ दुःख होते १.


    ज्या सुखाची होतां भेटी । निःशेष मावळे दुःखकोटी ।
    या नांव 'सत्यसुख' सृष्टी । इतर चावटी ते मिथ्या ॥ २ ॥
    पण ज्या सुखाची प्राप्ति होतांच कोटि दुःखें निखालस मावळून जातात, त्याचंच नांव खरें व शाश्वत सुख होय. ह्याशिवाय इतर जी बडबड ती व्यर्थ होय २.


    निरुपचार अंतरगती । मद्‍भावें जे सुखप्राप्ती ।
    जाहलिया संपत्ती विपत्ती । जे संतोषप्राप्ती समसाम्यें ॥ ३ ॥
    माझ्या भक्तीनें अंत:करणांत जें  स्वाभाविक सुख प्राप्त होते, ते संपत्ति किंवा विपत्ति आली तरी सर्वत्र समभाव झाल्याने संतोषच उत्पन्न करतें ३.


    येचि पदीं पाठांतर । 'तितिक्षा' म्हणती थोरथोर ।
    ऐक त्याचेंही अर्थांतर । पदार्थविचार तो ऐसा ॥ ४ ॥
    ह्या शब्दांमध्ये कोठे पाठभेद आढळतो. मोठमोठे विद्वान् लोक संतोषाऐवजी 'तितिक्षा' म्हणतात. त्याचाही अर्थ ऐक ४.


    शीत-उष्ण-मृदु-कठीण । अंगीं आदळातांही जाण ।
    ज्याचें डंडळीना मन । भावना पूर्ण मद्‍भावें ॥ ५ ॥
    त्यांतील रहस्य हें  की, थंडी व उन्ह, मृदु व कठीण ह्यांपैकी काहीही येऊन अंगावर कोसळले तरी त्याचे मन डळमळत नाहीं ५.


    संतोषतितिक्षा-व्याख्यान । हें पांचव्या पदाचें लक्षण ।
    उद्धवासी म्हणे श्रीकृष्ण । ऐक निरूपण शांतीचें ॥ ६ ॥
    ह्याचे कारण ह्या द्वंद्वांमध्ये त्याची मद्भावना असते. संतोष किंवा तितिक्षा ह्याचे निरूपण हें  ह्या श्लोकांतील पांचव्या शब्दाचे लक्षण आहे. इतकें सांगून उद्धवाला श्रीकृष्ण म्हणाले, आतां शांतीचे निरूपण ऐक ६.


    माझा निर्धारितां निजबोध । अंतरीं निमाले कामक्रोध ।
    त्यांसी केलियाही अपराध । न मनीं विरुद्ध पुढिलांचें ॥ ७ ॥
    माझा निजबोध हृदयांत ठसला म्हणजे अंतःकरणांतील कामक्रोध नाहीसे होतात. कोणी अपराध केला तरी त्याचे त्यांना काही विरुद्ध असें वाटतच नाही ७.


    परी तेथींची नवलपरी । अपकार्‍या होय उपकारी ।
    विकार नाहीं ज्याचे अंतरीं । जाण ते खरी 'निजशांति' ॥ ८ ॥
    उलट आश्चर्य हें  की, तो अपकाऱ्याला उपकारी होतो. त्याच्या अंत:करणांत विकार म्हणून उत्पन्नच होत नाही, तीच खरी 'शांति' होय ८.


    ऐशी सदा शांति संपूर्ण । तें ब्राह्मणाचें षष्ठ लक्षण ।
    ऐक आर्जवाचें निरूपण । जीवींची खूण सांगेन ॥ ९ ॥
    अशा प्रकारची सदासर्वकाल परिपूर्ण शांति असणे हे ब्राह्मणाचे सहावें लक्षण होय. आतां आर्जवाचे लक्षण ऐक. त्यांत अगदी अंतःकरणांतील खूणच सांगून देतों ९.


    कुरूप जरी जाहली माता । तरी स्नेहासीं नाहीं कुरूपता ।
    कां सुवर्णाचे नाग करितां । सोनें सर्वथा नव्हे सर्पु ॥ ११० ॥
    हे पहा, आई जरी कुरूप असली, तरी तिच्या ममतेत कांहीं कुरूपता नसते. किंवा सोन्याचा नाग केला, तर सोने कांही कधी साप होत नाही ११०.


    तेवीं कुटिलांसी कुटिलता । करावी म्हणोनि शिकवितां ।
    कुटिलत्व नुपजे चित्ता । जाण तत्त्वतां तें 'आर्जव' ॥ ११ ॥
    त्याप्रमाणे कुटिलाशी कुटिलपणानेच वागले पाहिजे, असें शिकवू लागले तरीसुद्धा ज्याच्या मनामध्ये कुटिलपणा येत नाही, तेच खरोखर 'आर्जव' म्ह० ऋजुता (सरळपणा) होय ११.


    गायीसी गोड व्याघ्रासी कडू । हा गंगाजळी नाहीं पवाडु ।
    तेवीं आर्जवाचा पडिपाडु । विषमांही गोडु समसाम्यें ॥ १२ ॥
    गाईला तेवढे गोड व्हावे  आणि वाघाला कडू व्हावे असा भेद गंगोदकांत नाही. त्याप्रमाणेच आर्जवाची गोष्ट आहे. ते ऐक्यभावनेने कुटिलापाशी गोडच होऊन राहते १२.


    या नांव जाण 'आर्जव' । सातवें लक्षण अपूर्व ।
    आतां निजभक्तीचा स्वभाव । देवाधिदेव सांगत ॥ १३ ॥
    ह्याचे नांव आर्जव आणि हेच ब्राह्मणाचें सातवें अद्भुत लक्षण होय. आता निजभक्तीचे लक्षण देवाधिदेव सांगतात १३.


    वन उद्यान गंगादि जीवन । यांसी पृथ्वीचि जेवीं अधिष्ठान ।
    तेवीं सकळ लक्षणां जन्मस्थान । माझी 'भक्ति' जाण उद्धवा ॥ १४ ॥
    अरण्य, उद्यान आणि गंगेचे उदक ह्या सर्वांना पृथ्वीच जशी आधारभूत आहे, त्याप्रमाणे उद्ध्वा ! साऱ्या लक्षणांचे उत्पत्तिस्थान माझी भक्तीच आहे असे समज १४.


    सकळ पिकांचिये प्राप्ती । आधारभूत जेवीं क्षिती ।
    तेवीं सकळ लक्षणां उत्पत्ती । माझिये भक्तीमाझारीं ॥ १५ ॥
    सारी पिकें उत्पन्न व्हावयाला आधारभूत जशी पृथ्वी, त्याप्रमाणे इतर सर्व लक्षणांची उत्पत्ति भक्तीमधूनच १५.


    ऐक ते भक्तीचा इत्यर्थ । सांडोनियां विषयस्वार्थ ।
    जीवींहूनि मजलागीं भावार्थ । तोचि निजभक्त पैं माझा ॥ १६ ॥
    त्या भक्तीचे लक्षण ऐक. विषयाचा स्वार्थ सोडून देऊन जो जिवाभावापासून मजवर भाव ठेवतो, तोच माझा भक्त होय १६.


    भक्त आणि करी धनार्जन । हेंचि भक्तिसी मुख्य विघ्न ।
    धनलोभी तो अभक्त पूर्ण । सत्य जाण उद्धवा ॥ १७ ॥
    भक्त म्हणावयाचे आणि धनार्जन करावयाचे, हेच भक्तीला मुख्य विघ्न आहे. उद्धवा ! धनलोभी म्हटला की तो निखालस अभक्त म्हणून समजावा १७.


    माझा भाव नाहीं जिव्हारीं । आहाचवाहाच माझी भक्ति करी ।
    तो आंधळ्या गरुडाचे परी । उडे परी निर्धारीं स्थान नेणे ॥ १८ ॥
    अंत:करणांत माझी भक्ति नाही, आणि दांभिकतेनें जो माझी भक्ति करितो तो आंधळ्या गरुडपक्ष्याप्रमाणे आकाशांत भरारी मारतो, पण बसण्याचे ठिकाण त्याला समजत नाही १८.


    माझा भावार्थ जेथ होये । तेथ मी जाती कुळ न पाहें ।
    मी भावाचेनि लवलाहें । वश्य होयें निजभक्तां ॥ १९ ॥
    जेथे माझी भक्ति असते. तेथे मी जाति किंवा कुळ पहात नाही. मी माझ्या भक्तांना भक्तीनेच त्वरित वश होतो १९.


    जेथ भावार्थे माझी आवडी । तेथ अवश्य माझी पडे उडी ।
    जेणें भावार्थाची उभविली गुढी । तो जाणे गोडी मद्‍भक्तीची ॥ १२० ॥
    जेथें भक्तिभावाने माझी आवड असते तेथें अवश्य माझी उडी पडते. भावार्थाची ज्याने गुढी उभारली तोच माझ्या भक्तीची गोडी जाणतो २०.


    जें जें भेटे तोचि देवो । ऐसा भावार्थीं ज्याचा भावो ।
    तो एक पढियंता मज पहा हो । त्याचेनि भावें जीवों आम्ही उद्धवा ॥ २१ ॥
    जें जें दिसेल ते ते देवच आहे अशा भावनेने ज्यांचा भक्तिभाव आहे, तोच एक माझा आवडता होय. उद्धवा ! त्याच्याच भक्तीने आम्ही जगत असतो २१.


    तोचि माझा जीवप्राण । त्यासी मी सर्वस्वें करीं निंबलोण ।
    मी सर्वदा त्याआधीन । जेवीं व्याली धेनु वत्सासी ॥ २२ ॥
    माझा जीव प्राण तोच. त्याच्यावरून मी सर्वस्व ओवाळून टाकतो. व्यालेली गाय जशी सर्वदा वासराच्या अधीन असते, त्याप्रमाणे मीही त्याच्या अधीन असतो २२.


    एवं निःसीम भावार्थाची स्थिती । त्या नांव उद्धवा माझी 'भक्ती' ।
    यापरी भक्तीची व्युत्पत्ती । ऐक पां ख्याती दयेची ॥ २३ ॥
    तात्पर्य, उद्धवा ! निःसीम अशी भाविकपणाची अवस्था तिचंच नांव माझी भक्ति. ह्याप्रमाणे भक्तीचे लक्षण आहे. आतां दयेचे स्वरूप ऐक २३.


    बाळक देखोनि संकटीं । जेवीं न सांवरत माय उठी ।
    तेवीं दीन देखोनि दृष्टीं । ज्याचे पोटीं दया द्रवे ॥ २४ ॥
    मूल संकटांत पडलेले पाहिले म्हणजे ज्याप्रमाणे आई ते दुःख असह्य होऊन तत्काळ साहाय्याकरितां उठते त्याप्रमाणे कोणी दीन दृष्टीस पडला की, ज्याच्या पोटांत दया उत्पन्न होते २४, 


    ऐशिया दयेच्या ठायीं जाण । आपुलें पारकें पुसे कोण ।
    स्वजाति-विजातिलक्षण । पुसायाही पण धीर नाहीं ॥ २५ ॥
    अशी दया उत्पन्न झाली म्हणजे मग आपलें आणि परके कोण विचारतो ? हा आपल्या जातीचा आहे की परक्या जातीचा आहे इतकी चौकशी करण्याइतकाही धीर त्याला नसतो २५.


    महापूरीं बुडतयातें । कृपाळू जाती न पुसे तेथें ।
    उडी घालूनि वांचवी त्यातें । 'दया' निश्चितें ती नांव ॥ २६ ॥
    महापुरांत बुडत असणाऱ्याला दयाळू मनुष्य त्याची जात कोणती आहे हे विचारीत बसत नाही, आधी उडी टाकून त्याला वाचवितो. याचेच नाव खरी दया २६.


    दीनाचिये दयेलागीं । जो रिघे जळत्या आगीं ।
    त्याचे चरण मी वंदीं वेगीं । धन्य जगीं दयाळू ॥ २७ ॥
    दीनावर 'दया' करण्यासाठी जो जळत्या आगीतसुद्धा उडी घालतो, त्याचे मी चरण वंदन करतो. जगामध्ये दयाळू मनुष्य धन्य होय २७.


    ऐशिये दयेचेनि गुणें । मज अनंतालागीं तेणें ।
    विकत घेतलें जीवें प्राणें । कीं जाहलों पोसणें मी त्याचें ॥ २८ ॥
    अशा दयेच्या गुणाने मला अनंताला त्याने जीवाभावासह विकतच घेतलेले असते. किंवा मी त्याचा पोसणाच झालेला असतो २८.


    यालागीं दयाळुवाचे घरीं । मी सदा नाटिका काम करीं ।
    जे दयावंताचे अवसरीं । तें माझे शिरीं सर्वदा ॥ २९ ॥
    म्हणून दयाशील मनुष्याच्या घरी मी पाहिजे तें काम करतो. दयाळू मनुष्यावर जो जो काही प्रसंग येतो, तो नेहमी माझ्याच माथ्यावर असतो २९.


    जो जाणे दीनांचा विचार । दीनदयाळू जो साचार ।
    उद्धवा तो माझें निजभांडार । सुखाचें सुखसार तो माझें ॥ १३० ॥
    उद्धवा! जो दीनजनाचा विचार करतो, जो खरोखर दीनदयाळू असतो, तो माझे केवळ भांडार होय. तो माझे केवळ सुखाचे सार होय १३०.


    या नांव गा 'दया' जाण । तें हें नववें लक्षण ।
    आतां सत्याची उणखूण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥ ३१ ॥
    ह्याचें नांव 'दया' हे लक्षात ठेव. हेच ते नववे लक्षण. आता सत्याचे संपूर्ण लक्षण तुला सांगतों ऐक. ३१ 


    सत्याचें सत्यत्व तें ऐसे । जागृतिस्वप्नसुषुप्तिवशें ।
    ज्यासी असत्यता न स्पर्शे । निजसत्य ऐसें निडारिलें ॥ ३२ ॥
    सत्याचा सत्यपणा असा आहे की, जागृती स्वप्नं  किंवा सुषुप्तीमध्येसुद्धा ज्याला असत्यपणा शिवत नाही हेच परिपक्व  झालेले 'सत्य' होय ३२.


    ऐसें सत्य परिपक्वल्या पोटीं । सत्य वाचा सत्य दृष्टी ।
    निजसत्यत्वें सत्य सृष्टी । पडिली तुटी असत्याची ॥ ३३ ॥
    अशा प्रकारचे सत्य अंत:करणांत पूर्णतेस पोंचलें म्हणजे वाणीही सत्य होते व दृष्टीही सत्यच होते. अंत:करणांतील सत्यत्वाने सर्व सृष्टीच सत्यमय होऊन जाते, आणि असत्य राहात नाही ३३.


    यापरी गा ‘सत्यत्व’ जाण । त्या नांव दहावें लक्षण ।
    हें ब्राह्मणाचें संपूर्ण । कर्माचरण स्वभावें ॥ ३४ ॥
    सत्य हे  अशा प्रकारचे असते हे लक्षात ठेव. हे दहावे लक्षण होय. हेंच ब्राह्मणांचे स्वभावसिद्ध कर्माचरण असते ३४.


    ब्राह्मणप्रकृतीचे स्थितीं । या दशलक्षणांची उत्पत्ती ।
    स्वाभाविक सहजगती । अकृत्रिम स्थिति उद्धवा ॥ ३५ ॥
    बाह्मणप्रकृतीच्या क्षेत्रामध्ये या दहा लक्षणांची उत्पत्ति होत असते. उद्धृवा! ब्राह्मणांची ही स्थिति स्वयंभू साहजिक व अकृत्रिम असते ३५.


    येंहीं दश लक्षणीं संपूर्ण । वर्णवरिष्ठ वंद्य ब्राह्मण ।
    आतां क्षात्रप्रकृतीचे गुण । ऐक निरूपण उद्धवा ॥ ३६ ॥
    या दहा लक्षणांनी परिपूर्ण असल्यामुळे  ब्राह्मण हे सर्व वर्णात श्रेष्ठ व वंद्य झाले आहेत. आतां उद्धवा ! क्षत्रियांच्या प्रकृतीचे जे गुण आहेत त्यांचे निरूपण ऐक ३६.


    तेजो बलं धृतिः शौर्यं तितिक्षौदार्यमुद्यमः ।
    स्थैर्यं ब्रह्मण्यतैश्वर्यं क्षत्रप्रकृतयस्त्विमाः ॥ १७ ॥
    [श्लोक १७] तेज, बल, धैर्य, वीरता, सहनशीलता, औदार्य, उद्योगशीलता, स्थिरता, ब्राह्मणभक्ती आणि ऐश्वर्य हे क्षत्रिय वर्णाचे स्वाभाविक धर्म होत. (१७)


    ब्राह्मणप्रकृति दश लक्षण । तुज म्यां सांगितली सुलक्षण ।
    आतां क्षात्रवृत्तीचे दश गुण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥ ३६A ॥
    उद्धवा ! ब्राह्मणप्रकृतीची उत्तमोत्तम दहा लक्षणे मी तुला सांगितली. आतां क्षात्रवृत्तीचे दहा गुण अथवा लक्षणे संपूर्णपणे तुला सांगतों ती ऐक ३६अ.


    'तेज' म्हणजे प्रतापशक्ती । जैसा क्षितितळींचा गभस्ती ।
    ज्याचिया प्रतापदीप्तीं । लोपले जाती महींद्र ॥ ३७ ॥
    तेज म्हणजे प्रतापाचे सामर्थ्य ; जणू काय भूतलावरील सूर्यच. ज्याच्या प्रतापाच्या तेजाने सारे राजे लोपून जातात ३७


    क्षात्रधर्मी प्रथम काज । तया नांव जाण 'तेज' ।
    आतां क्षात्रबळाची वोज । ऐक चोज सांगेन ॥ ३८ ॥
    क्षात्रधर्मातील जो पहिला गुण त्याचेच नाव 'तेज.' आतां क्षत्रियाच्या बळाचा चमत्कार सांगतों ऐक ३८.


    ज्याच्या शरीरबळाचें कोड । एकला लक्षावरी दे झड ।
    जरी तुटला दुधड । तरी वैरियांचे तोंड विभांडी ॥ ३९ ॥
    त्याच्या शरीरसामर्थ्याचा इतका चमत्कार असतो की, तो एकटाही लाखों मनुष्यांवर तुटून पडतो, आणि मस्तक तुटले तरी धडाने शत्रुचे तोंड फोडतो ३९.


    रिघतां रणामाझारीं । दुजयाचें साह्य न विचारी ।
    जेवीं वनगजीं केसरी । तेवीं रिघोनि दळभारीं विभांडी वीर ॥ १४० ॥
    तो समरांगणांत शिरला म्हणजे दुसऱ्याचे आपल्याला साहाय्य आहे किंवा नाही याचा विचार करीत नाही. रानहत्तींमध्ये सिंह घुसून जसा त्यांचा फडशा पाडतो, त्याप्रमाणे सैन्यांत मुसंडी देऊन तो मोठमोठ्या वीरांचा सप्पा उडवितो १४०.


    आकाश दाटल्या निशाचरीं । भूमंडळ कोंदल्या असुरीं ।
    ऐसे प्रबळ बळें आल्या वैरी । ज्याचे धृतीमाझारीं विस्मयो नुठी ॥ ४१ ॥
    सारें आकाश जरी राक्षसांनी भरून गेले, दैत्यांनी सारी पृथ्वी जरी गजबजून गेली, अशा महान् बलाढ्य शत्रूंनी जरी घेरले, तरी त्याच्या धैर्य बुद्धीत विस्मयच उठत नाही ४१.


    आकाश पडावया गडाडी । पृथ्वी उलथावया हडबडी ।
    तरी ज्याचे धृतीची रोकडी । नव्हे वांकुडी रोमावळी ॥ ४२ ॥
    आकाशाने कोसळून पडण्यासाठी जरी गडगडाट केला, पृथ्वी उलथून पडण्यासाठी जरी हडबडली, तरी त्याच्या धैर्याचे एक रोमही वांकडे होत नाही ४२.


    वोडवलियाही कल्पांता । धाक रिघों नेणे ज्याच्या चित्ता ।
    ऐसें निजधैर्य स्वभावतां । 'धृति' तत्त्वतां ती नांव ॥ ४३ ॥
    कल्पांतसमय जरी प्राप्त झाला, तरी त्याच्या चित्ताला धाक म्हणून वाटतच नाही. अशा प्रकारचे जें स्वभावसिद्ध अढळ धैर्य, त्यालाच धृति असे म्हणतात ४३.


    चौर्‍याशीं दंडायुधें धरूं जाणती । शस्त्रास्त्र-धारणाशक्ती ।
    स्वधर्में आवश्यकें करिती । या नांव 'धृति' क्षत्रियांची ॥ ४४ ॥
    चौऱ्यांशी प्रकारचे दांडपट्टे परजण्यामध्ये वाकबगार असून, शस्त्रास्त्रधारणाशक्तीही ज्यांची उत्तम असते व जे धर्मास अनुसरून युद्ध करण्यांत प्रवीण असतात. याचेच नांव क्षत्रियांची 'धृति' होय ४४.


    शूरांचें शौर्य तें कैसें । शत्रूंचें निःशेष नांवचि पुसे ।
    वैरी कोणी कोठेंचि नसे । करणें ऐसें तें शौर्य ॥ ४५ ॥
    आतां शूरांचे शौर्य कसे असते म्हणशील तर, तो शत्रूचे  नांवसुद्धा उरूं देत नाही, त्याला कोणी कुठे शत्रूच असत नाही. असे करणे ह्याचें नांव 'शौर्य' होय ४५.


    धर्मयुद्धाची शौर्यवृत्ती । जेणें विजयश्री चढे हातीं ।
    दुश्चित्त निःशस्त्री न हाणिती । पळतया न मारिती महाशूर ॥ ४६ ॥
    त्यांची शौयांची वृत्ति धर्मयुद्धाची असते. म्हणूनच त्याला विजयश्री प्राप्त होते. बेसावध किंवा निःशस्त्र असेल त्याला ते मारीत नाहीत; महाशूर असतात ते पळत्यालाही मारीत नाहीत ४६.


    संमुख आलिया रणांगणीं । मागें पावो न ठेवीं रणीं ।
    एकला विभांडी वीरक्षोणी । हे स्वधर्मकरणी निजशौर्यें ॥ ४७ ॥
    रणांगणांत एकदा समोरासमोर आले की, पाऊल मागे घेत नाहीत; एकटाच हजारा वीरांचा फडशा उडवितो. हेंच स्वधर्माप्रमाणे खरें शौर्य होय ४७.


    मृत्यूएवढा महावैरी । जो निःशेष नाहीं करी ।
    त्याच्या शौर्याची थोरी । सुरासुरी वानिजे ॥ ४८ ॥
    सर्वात मोठा शत्रु म्हणजे मृत्यु होय. त्याच्या एवढा शत्रु दुसरा कोणीच नाही. त्यालाच तो मुळीं नाहींसा करून टाकतो. त्याच्या शौर्याचे वर्णन देवदानवसुद्धा करीत असतात ४८.


    एवं निजशौर्यनिर्धारा । निर्वैर करणें धरा ।
    हा चौथा गुण खरा । जाण क्षात्रद्वारा क्षत्रियांचा ॥ ४९ ॥
    याप्रमाणे आपल्या शौर्यानं सारी पृथ्वी निर्वैर करून टाकणे हेच खरें 'शौर्य' होय व हाच क्षत्रिधर्माप्रमाणे क्षत्रियांचा चौथा गुण होय ४९.


    शस्त्रांचे घाय वाजतां माथां । कां सपिच्छ बाण खडतरतां ।
    रणांगणीं न सरे मागुता । हे 'सहिष्णुता' क्षत्रियाची ॥ १५० ॥
    शस्त्रांचे  धाव घेऊन मस्तकावर आदळले , किंवा पिसाऱ्यासहवर्तमान बाण अंगांत घुसले, तरी रणांगणामध्ये जो मागें  सरत नाही, हीच क्षत्रियांची 'सहिष्णुता' होय ५०.


    आलिया गजदळाचे थाट । महावीरांचे घडघडाट ।
    तो यावा साहे सुभट । 'सहिष्णुता' चोखट ती नांव ॥ ५१ ॥
    हत्तींच्या झुंडीच्या झुंडी जरी येऊन भिडल्या, मोठमोठाले वीर जरी चवताळून आले, तरी तो आवेग वीरशिरोमणि सहन करतो. ह्याचंच नांव खरीखुरी सहिष्णुता ५१.


    समुद्रलहरींच्या संपाता । कुलाचल न सरे परता ।
    तेवीं परसैन्याच्या आघाता । न सरे मागुता रणांगणीं ॥ ५२ ॥
    समुद्राच्या लाटांच्या तडाक्याने महापर्वत जसा मागे हटत नाही, त्याप्रमाणे जो शत्रुच्या सैन्याच्या आघाताने रणांगणांतून माघार घेत नाही ५२; 


    तेथ यश‍अपयशांची व्यथा । हर्षशोकविषमता ।
    बाधीना क्षत्रियांच्या चित्ता । सर्वसहिष्णुता या नांव ॥ ५३ ॥
    किंवा यशापयशाचें सुखदुःख किंवा हर्ष-विषाद ही क्षत्रियाच्या चित्ताला बाधत नाहीत, ह्यालाच संपूर्ण सहिष्णुता म्हणतात ५३.


    या नांव ' तितिक्षा ' जाण । हें क्षत्रियांचें पांचवे लक्षण ।
    ऐक औदार्याचा गुण । दातेपण क्षत्रियांचें ॥ ५४ ॥
    हिलाच 'तितिक्षा' असेही म्हणतात. हे क्षत्रियांचे पांचवें लक्षण होय. आतां क्षत्रियांचा औदार्याचा गुण म्ह, दातृत्वशक्ति तीही ऐक ५४.


    क्षत्रियांचे प्रकृतीस जाण । द्रव्य तें तृणसमान ।
    याचकांचें निवे मन । तंव देणें दान सर्वस्व ॥ ५५ ॥
    क्षत्रियांच्या स्वभावाला इव्य हे केवळ तृणासमान वाटते, म्हणून ते याचकांचे मन तप्त होईपर्यंत सर्वस्व दान देत असतात ५५.


    देश काल सत्पात्र स्थान । तेथही देऊनि सन्मान ।
    निर्विकल्पभावें गहन । देणें दान विध्युक्त ॥ ५६ ॥
    देश, काल, सत्पात्र पहावयाचे व तेथेही सन्मानपूर्वक आणि मनांत कोणताही किंतु न आणतां विधियुक्त मोठे दान करावयाचे ५६.


    चंद्र चकोरातें पाहीं । सदा देतां नुबगे कंहीं ।
    तेवीं हा याचकाचे ठायीं । पराङ्‍मुखता नाहीं क्षत्रियासी ॥ ५७ ॥
    चंद्रानें चकोराला पाहिले पुरे, की तो त्याला अमृत देतांना कधीं कंटाळत नाहीं; त्याप्रमाणेच ह्याची वृत्ति याचकाच्या ठिकाणी असते. क्षत्रिय कधी त्याला पराङ्मुख होत नाहीं ५७.


    ऐसें स्वाभाविक जें दान । हा क्षत्रियांचा प्रकृतिगुण ।
    या नांव गा 'उदारपण' । सहावें लक्षण क्षत्रियांचें ॥ ५८ ॥
    असें स्वाभाविकपणे दान देणे हाच क्षत्रियांचा स्वाभाविक गुण आहे. ह्याचंच नांव 'उदारपण.' हैं क्षत्रियांचे सहावें लक्षण होय ५८.


    परमार्थप्राप्तीउपायीं । स्वधर्मनिष्ठा क्षत्रियांठायीं ।
    जो जो व्यवसावो करणें कांहीं । तो 'उद्यम' पाहीं बोलिजे ॥ ५९ ॥
    क्षत्रियांचा परमार्थप्राप्तीचा उपाय म्हणजे स्वधर्मनिष्टा. तिला अनुसरून जो जो कांहीं उद्योग करावयाचा त्याला 'उद्यम' असे म्हणतात ५९.


    वेंचूनियां निजप्राण । गोब्राह्मणांचे संरक्षण ।
    स्वधर्में प्रजापालन । पृथ्वीरक्षण निरुपद्रव ॥ १६० ॥
    आपले प्राणसुद्धा खर्ची घालून गोब्राह्मणांचे संरक्षण करणे, स्वधर्माने प्रजेचे पालन करणे, आणि कोणासही उपद्रव  न देतां पृथ्वीचे रक्षण करणे १६०. 


    या नांव गा 'उद्यम' जाण । क्षत्रियांचे सातवें लक्षण ।
    आतां स्वधर्मस्थैर्यगुण । तेहीं निरूपण अवधारीं ॥ ६१ ॥
    ह्याचें नांव 'उद्यम' हें  लक्ष्यात ठेव. हेच क्षत्रियांचें सातवें लक्षण होय. आतां त्यांच्या धर्मातील 'स्थैर्य' ह्या गुणाचेही लक्षण ऐक ६१.


    गोब्राह्मणसंरक्षणता । स्वधर्मी प्रजापतिपाळकता ।
    ये ठायीं उबगु न ये चित्ता । या नांव ‘स्थिरता’ क्षत्रियांची ॥ ६२ ॥
    गोब्राह्मणांचे संरक्षण करतांना व स्वधर्मानें प्रजेचे पालन करतांना त्यांच्या मनाला कंटाळा येत नाही, हीच क्षत्रियांची स्थिरता होय ६२.


    स्वधर्मीं जे स्थिरता । तें आठवें लक्षण तत्त्वतां ।
    ब्राह्मणभक्तीची जे कथा । ऐक आतां सांगेन ॥ ६३ ॥
    स्वधर्मातील जी 'स्थिरता' तेच खरोखर क्षत्रियांचे आठवें लक्षण होय, आतां त्यांचे ब्राह्मणभक्तीचे लक्षण सांगतों ऐक ६३.


    परमार्थप्राप्तीचें कारण । क्षत्रियासी मुख्यत्वें गुरु ब्राह्मण ।
    त्या ब्राह्मणाचें ब्रह्मभावें भजन । सर्वस्वें जाण करावें ॥ ६४ ॥
    क्षत्रियांना परमार्थप्राप्तीसाठी ब्राह्मण हा गुरु होय. त्या ब्राह्मणांचे ब्रह्मभावाने भजन करावयाचे ६४.


    ब्रह्मभावें ब्राह्मणभजन । विधियुक्त देवोनि सन्मान ।
    अनुदिनीं ब्राह्मणपूजन । सद्‍भावें जाण जो करी ॥ ६५ ॥
    ब्राह्मणाचे ठिकाणी ब्रह्मभावना धरून, यथाविधि त्यांचा सन्मान करून दररोज भक्तिभावाने जो ब्राह्मणाचे पूजन करील ६५, 


    जो मद्‍भावें ब्राह्मणपूजा । सन्मानें सुखी करी द्विजा ।
    उद्धवा तो आत्मा माझा । तेणें मज अधोक्षजा पूजिलें ॥ ६६ ॥
    जो माझीच भावना धरून ब्राह्मणाची पूजा करील, सन्मानाने ब्राह्मणांना संतोष देईल, उद्धवा, ! तो केवळ माझा आत्मा होय. त्याने माझी श्रीकृष्णाचीच पूजा केली म्हणून समजावें ६६.


    क्षत्रिय सन्मानें द्विज पूजिती । तेणें त्यांसी ऐश्वर्यप्राप्ती ।
    ब्राह्मण ब्राह्मणां द्वेषिती । तेणें ते पावती दरिद्रदुःख ॥ ६७ ॥
    क्षत्रिय हे सन्मानाने ब्राह्मणांची पूजा करतात म्हणून त्यांना ऐश्वर्य प्राप्त होते. ब्राह्मण ब्राह्मणांचा द्वेष करतात म्हणून ते दारिद्रदुःख भोगतात ६७.


    ऐसें करितां ब्राह्मणभजन । मी परब्रह्म होय त्या अधीन ।
    त्याच्या ऐश्वर्याचें चिन्ह । दहावें लक्षण तें ऐक ॥ ६८ ॥
    असें ब्राह्मणाचे भजन केले असतां मी परब्रह्म त्याच्या आधीन होतो. त्याच्या ऐश्वर्याचे चिन्ह हेच दहावें लक्षण होय ६८.


    न करितां ब्राह्मणभजन । अंगीं ऐश्वर्य न ये जाण ।
    मी जाहलों षडगुणैश्वर्यसंपन्न । सदा द्विजचरण हृदयीं दृढ वाहतां ॥ ६९ ॥
    ब्राह्मणभजन न केले, तर अंगामध्ये ऐश्वर्य यावयाचें नाहीं; मी ब्राह्मणाचे पाय घट्ट पोटाशी धरल्यानेच षड्गुणैश्वर्यसंपन्न झालो आहे ६९.


    ब्राह्मणभजनमार्गें । ब्रह्मसुख पायां लागे ।
    ब्रह्मसायुज्य घर रिघे । तरी भक्त नेघे द्विजभजनें ॥ १७० ॥
    ब्राह्मणभजनाच्या मार्गाला लागले असतां ब्रह्मसुख पायाला लागते, ब्रह्मसायुज्य घरांत शिरतें, तरी ब्राह्मणभजनासाठी भक्त ते घेत नाहीं १७०.


    ब्राह्मणभजनें स्वभावतां । माझी सत्ता ये त्याच्या हाता ।
    तेव्हां त्याची आज्ञा वंदिती माथां । जाण तत्त्वतां सुरासुर ॥ ७१ ॥
    ब्राह्मणभजन केले, म्हणजे आपोआपच माझी सत्ता त्याच्या हाती येते. त्यामुळेच खरोखर त्याची आज्ञा देवदानवही शिरसावंद्य करतात ७१.


    त्याचे आज्ञेभेण । पडों न शके अवर्षण ।
    न्यायतां प्रजापालन । धर्मसंरक्षण त्याचेनी ॥ ७२ ॥
    त्याच्या आज्ञेच्या भयाने अवर्षणसुद्धा पडत नाही. न्यायाने प्रजेचे पालन आणि धर्माचे संरक्षण ही त्याच्यामुळेच होत असतात ७२.


    येणेंच स्वधर्में अतिचोख । भरत पुरूरवा जनकादिक ।
    महाऐश्वर्य पावले देख । अलोकिक द्विजभजनें ॥ ७३ ॥
    ह्याच अत्युत्कृष्ट स्वधर्माच्या योगकरून भरत, पुरूवा, जनक आदिकरून मोठ्या ऐश्वर्याला पोंचले. अशी ब्राह्मणाची सेवा मोठी अलौकिक आहे ७३.


    एवं क्षत्रियांचें दशलक्षण । तुज म्यां केलें निरूपण ।
    यांत मुख्यत्वें ब्राह्मणभजन श्रेयस्कर सर्वांसी ॥ ७४ ॥
    अशा प्रकारें क्षत्रियांची दहा दहा लक्षणे मी तुला सांगितली. ह्यांत मुख्यत्वेकरून ब्राह्मणभजन हेच सर्वांना श्रेयस्कर होय ७४, 


    वैश्याचे प्रकृतीस जाण । स्वाभाविक पंचलक्षण ।
    ऐक त्याचेंही निरूपण । आचरण यथार्थे ॥ ७५ ॥
    वैश्यांच्या प्रकृतीची स्वाभाविक पांच लक्षणे आहेत, त्यांचे निरूपण व आचरण यथार्थ रीतीने श्रवण कर ७५.


    आस्तिक्यं दाननिष्ठा च अदम्भो ब्रह्मसेवनम् ।
    अतुष्टिरर्थोपचयैर्वैश्यप्रकृतयस्त्विमाः ॥ १८ ॥
    [श्लोक १८] आस्तिकता, दानशूरपणा, दंभ नसणे, ब्राह्मणांची सेवा करणे आणि धनसंचयाने संतुष्ट न होणे, हे वैश्य वर्णाचे स्वाभाविक धर्म होत. (१८)


    वैश्याचे प्रकृतीसी जाण । अर्थतृष्णा अतिगहन ।
    जाहलिया कोट्यानुकोटी धन । तृष्णा परिपूर्ण हों नेणे ॥ ७६ ॥
    वैश्यांच्या स्वभावाला 'द्रव्यलोभ' फार मोठा असतो. कोट्यनुकोटीचा मालक झाला तरी त्याच्या इच्छेला तृप्त व्हावयाचें माहीतच नसते ७६.


    'आस्तिक्य' अर्थसंचयासी । द्वीपींहूनि द्वीपांतरासी ।
    नाना वस्तु ने विश्वासेंसी । साधावया अर्थासी भावार्थी ॥ ७७ ॥
    'आस्तिकपणा' तो द्रव्यसंग्रहासंबंधींचा. ह्या द्वीपाहून त्या द्वीपाला, त्यांत खास पैसा मिळवीन असा विश्वास बाळगून, अनेक प्रकारचा माल भरून न्यावयाचा ७७.


    कां वेदशास्त्रीं अतिविश्वासी । हें मुख्यत्वें 'आस्तिक्य' वैश्यासी ।
    वेदें लिहिल्या स्वधर्मासी । नव्हे उदासी अणुमात्र ॥ ७८ ॥
    किंवा वेदशास्त्रावर अत्यंत विश्वास, हेच मुख्यत्वेकरून वैश्याचे 'आस्तिक्य' होय. वेदाने सांगितलेला जो स्वधर्म त्याविषयीं ऐसभरही उदासीन नसावयाचे ७८.


    वैश्याचें स्वधर्माचरण । नेमेंसीं द्यावें नित्यदान ।
    प्राणान्त मांडल्या जाण । दानखंडण हों नेदी ॥ ७९ ॥
    वैश्याचे स्वधर्माचरण म्हणजे नेमाने नित्य 'दान' देणे. प्राणांतसमय प्राप्त झाला तरी दान देण्यामध्ये खंड पडू द्यावयाचा नाही ७९.


    परलोकप्राप्तीचें कारण । 'ब्राह्मणाची सेवा' जाण ।
    ब्राह्मणआज्ञा परम प्रमाण । विशेष जाण गुरुसेवा ॥ १८० ॥
    परलोकप्राप्तीचे मुख्य साधन म्हणजे 'ब्राह्मणाची सेवा ' आहे असें तूं समज. ब्राह्मणाची आज्ञा ही परम प्रमाणभूत. त्यापेक्षा विशेष म्हणजे गुरूची सेवा १८०.


    वेदशास्त्रार्थ प्रमाण । सद्‍गुरु परब्रह्म जाण ।
    तद्‌रूपें देखावे ब्राह्मण । सेवेसी प्राण अर्पावा ॥ ८१ ॥
    वेदशास्त्रांतसुद्धा 'सद्गुरु हेच परब्रह्म,' असल्याचे प्रमाण आहे. ब्राह्मणही तद्पच आहेत असें मानून त्यांचे सेवेसाठी प्राणसुद्धा खर्ची घालावा ८१.


    मी मान्य होईन अतिश्रेष्ठां । कां लौकिकीं जोडावी प्रतिष्ठा ।
    ऐशी जे दांभिक निष्ठा । वैश्या वरिष्ठा स्पर्शेना ॥ ८२ ॥
    आपण मोठमोठ्या लोकांस मान्य व्हावे, किंवा लौकिकामध्ये प्रतिष्ठा वाढवावी, अशा प्रकारची दांभिक निष्ठा वैश्यांना  स्पर्श  करीत नाही ८२.


    सांडूनियां धूर्तपण । निर्लोभ ‘निर्दंभ’ जाण ।
    विप्रसेवेसी वोपिती प्राण । हें मुख्य लक्षण वैश्याचें ॥ ८३ ॥
    कपट सोडून निर्लोभपणे व 'निर्दभपणे' ब्राम्हणाच्या  सेवेला प्राणही खर्च  करावयाचा, हेंच वैश्यांचे मुख्य लक्षण आहे ८३.


    येणेंचि परमार्थप्राप्ती । सत्य जाण वैश्ययाती ।
    हे स्वाभाविक गा प्रकृती । जाण निश्चितीं वैश्याची ॥ ८४ ॥
    येणेकरूनच वैश्यजातीला परमार्थ प्राप्ती  होते. सारांश, या प्रकारची वैश्याची स्वाभाविक प्रकृति असते ८४.


    आतां शूद्राचिया प्रकृती । त्रिविध कर्मांची पैं प्राप्ती ।
    तेही सांगेन मी तुजप्रती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥ ८५ ॥
    आता  उद्धवा! शूद्राच्या  प्रकृतींचीही  तीन प्रकारची कर्मे असतात  तीही निश्चयकरून तुला सांगतों श्रवण कर ८५.


    शुश्रूषणं द्विजगवां देवानां चाप्यमायया ।
    तत्र लब्धेन संतोषः शुद्रप्रकृतयस्त्विमाः ॥ १९ ॥
    [श्लोक १९] ब्राह्मण, गायी आणि देवतांची निष्कपट भावनेने सेवा करणे आणि त्यातून जे काही मिळेल, त्यात संतुष्ट असणे, हे शूद्र वर्णाचे स्वाभाविक धर्म होत. (१९)


    स्वधर्म शूद्राचिये ज्ञाती । द्विजसेवा यथानिगुती ।
    त्यांचेनि प्रसादें जीविकावृत्ती । निष्कपट स्थिति सेवेची ॥ ८६ ॥
    शूद्राच्या जातीचा स्वधर्म म्हटला म्हणजे मनापासून ब्राह्मणांची सेवा करावी; त्यांची सेवा निष्कपटभावाने केली म्हणजे त्यांच्याच कृपेने त्यांची उपजीविका चालते ८६


    करावें गृहस्थांचें गोरक्षण । चाराव्या जेथें तृणजीवन ।
    श्वापदभय आलिया जाण । वेंचूनि प्राण रक्षाव्या ॥ ८७ ॥
     ज्या ठिकाणी गवत व पाणी असेल त्या ठिकाणी नेऊन  गृहस्थाच्या गाई राखाव्यात. हिंस्त्र पशुंनी त्यांच्यावर घाला घातल्यास प्राणसुद्धा खर्ची घालून  रक्षण करावें ८७.


    गोरक्षणीं वेंचिल्या प्राण । त्यासी उत्तम गति जाहली जाण ।
    ज्यासी गायींचा कळवळा गहन । त्यासी मी श्रीकृष्ण सदा साह्य ॥ ८८ ॥
    गोरक्षणांत प्राण खर्ची  पडला, तर त्याला उत्तम गति प्राप्त  होते. ज्याला गाईचा अत्यंत कळवळा  असतो, त्याला मी श्रीकृष्ण सदासर्वदा साहाय्य असतों ८८.


    द्विजसेवा गोरक्षण । दोनही वृत्ति न मिळतां जाण ।
    तरी देवालयीं संमार्जन । जीविकार्थ जाण करावें ॥ ८९ ॥
    ब्राह्मणाची चाकरी आणि गुरांची राखण ही दोन्ही कामें न मिळतील, तर आपली उपजीविका चालण्यासाठी शुद्राने  देवालयांतील सडा-संमार्जनाचें काम करावें ८९ 


    निष्कपटभावें आपण । निर्मळ करावें हरिरंगण ।
    तेथील प्राप्तीचेनि जाण । करावी पूर्ण जीविका ॥ १९० ॥
    निष्कपटपणे श्रीहरीचे अंगण झाडून  सारवण घालून स्वच्छ ठेवावे. आणि तेथे जी मिळकत होईल, तिच्यावर आपला  निर्वाह करावा १९०.


    तेथ जे जे काळीं जे जे प्राप्ती । तेणें सुखें असावें निजवृत्तीं ।
    हे स्वधर्मकर्मस्थिती । शूद्रप्रकृतिस्वभावें ॥ ९१ ॥
    तेथे ज्या ज्या वेळेला जें जें मिळेल तेवढ्यातच  संतोष मानून आपला चरितार्थ चालवावा. हीच शूद्राच्या प्रकृतिस्वभावाची स्वधर्मकर्म स्थिति  होय ९१.


    विप्रासी अग्निहोत्रादिक कर्म । शूद्र नमी द्विजोत्तम ।
    तेथ दोंहींचा स्वधर्म । सहजें सम होतसे ॥ ९२ ॥
     ब्राह्मणाकडे  अग्निहोत्रादिक कर्म असते आणि शूद्र हे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांना नमस्कार करतात. त्यामुळे दोघांचाही धर्म सहजी सारखा होतो ९२.


    'गृहस्थाश्रमाचें' वर्तन । तिन्हीं आश्रमां आश्रयो आपण ।
    अन्न वस्त्र देऊनि जाण । संरक्षण करावें ॥ ९३ ॥
    गृहस्थाश्रमाचा  धर्म म्हणजे तिन्ही आश्रमाला आश्रय देणे; तसेंच इतर तिन्ही आश्रमातील लोकांना अन्नवस्त्र देऊन  त्यांचे संरक्षण करणे ९३.


    ‘ब्रह्मचर्याश्रम’ वर्तन । गुरुसेवा वेदाध्ययन ।
    त्यासी द्यावया दान । अधिकार जाण असेना ॥ ९४ ॥
     ब्रह्मचर्याश्रमाचे वर्तन म्हणजे गुरूवी सेवा व वेदाध्ययन करून राहाणे, त्याला दान  देण्याचा मात्र अधिकार नसतो ९४.


    ब्रह्मचार्‍यासी जें जें योजिलें । तें पाहिजे गुरूसी समर्पिलें ।
    गुरूसी वंचूनि दान दिधलें । ते तेणें केले अधर्म ॥ ९५ ॥
     ब्रह्मचाऱ्याला जें जें काय प्राप्त होईल,  ते ते त्याने गुरूला अर्पण केले  पाहिजे. गुरूवाचून  इतराला तो दानधर्म करील , तर तो अधर्म होईल  ९५.


    'वानप्रस्थाश्रमी' जाण । मुख्यत्वें तप प्रधान ।
    करावें अग्निशुश्रूषण । वेदोक्तलक्षण प्रकारें ॥ ९६ ॥
    वानप्रस्थाश्रमामध्ये विशेषकरून तप हेच मुख्य आहे.  वेदोक्तविधीप्रमाणे त्याने अग्नीची  सेवा करावी  ९६


    संन्यासी ब्रह्मचारी दीन । समयीं आश्रमा आल्या जाण ।
    यथानुशक्त्या द्यावें अन्न । हें आश्रमरक्षण वानप्रस्था ॥ ९७ ॥
     संन्यासी, ब्रह्मचारी किंवा दीन दुबळे प्रसंगानुसार आश्रमांत आल्यास त्यांना यथानुशक्ति अन्न द्यावे. हाच वानप्रस्थाचा आश्रमधर्म होय ९७.


    'संन्याशासी' अहिंसा प्रधान । ज्ञानपरिपाकें शांति संपूर्ण ।
    अनोळखीं भिक्षाटण । हा मुख्य धर्म जाण चतुर्थाश्रमीं ॥ ९८ ॥
    संन्याशाला अहिंसा हीच मुख्य आहे. ज्ञानपरिपाकाने त्याला पूर्ण शांति लाभते. ओळख नसेल अशा ठिकाणी फिरून भिक्षा मागणे हाच चतुर्थाश्रमांतील मुख्य धर्म होय ९८.


    वर्णाश्रमांहूनि बाह्य जाण । केवळ अंत्यजादि जे जन ।
    त्यांचे प्रकृतीचें जें लक्षण । स्वयें नारायण सांगत ॥ ९९ ॥
    आतां ह्या वर्णाश्रमाहून बाहेरचे जे केवळ अंत्यजादि लोक, त्यांच्या स्वभावाचे लक्षणही स्वतः श्रीकृष्ण सांगतात. ९९


    अशौचमनृतं स्तेयं नास्तिक्यं शुष्कविग्रहः ।
    कामः क्रोधश्च तर्षश्च स्वभावोऽन्तवसायिनाम् ॥ २० ॥
    [श्लोक २०] अपवित्रता, खोटे बोलणे, चोरी करणे, ईश्वर आणि परलोकाची फिकीर न करणे, खोटेनाटे भांडण करणे, काम, क्रोध, लोभ यांच्या आहारी जाणे, हे अंत्यजाचे स्वभाव होत. (२०)


    ये श्लोकींचे अष्ट गुण । त्यागावया न मनी ज्याचें मन ।
    तोही अंत्यजासमान । हें प्रकृतिलक्षण अतिनिंद्य ॥ २०० ॥
    प्रस्तुत श्लोकांतील आठ गुण टाकावयाचें ज्याच्या मनात येत नाही. तोसुद्धा अंत्यजासारखाच होय. हे स्वभावाचे लक्षण अत्यंत निंद्य आहे २००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...