मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ ओव्या २०१ ते ३००

    तुटला आशेचा जिव्हाळा । सुकले वोंठ वाळला गळा ।

    कळा उतरली मुखकमळा । खेदु आगळा चिंतेचा ॥१॥
    आशेचा ओलावा तुटला; ओंठ सुकून गेले; घसा कोरडा पडला; व मुखकमल म्लान झालें ! जबरदस्त चिंता लागली. २०१.


    वित्त न येचि हाता । तेणें ते झाली दीनचित्ता ।
    वैराग्यें परम वाटली चिंता । सुखस्वार्था ते हेतु ॥२॥
    हाती द्रव्य पडलें नाहीं; त्यामुळे अंतरांत अगदी दीन होऊन गेली. वैराग्याने परम चिंता वाटू लागली व तीच तिच्या सुखस्वार्थाला कारण झाली २.


    तस्या निर्विण्णचित्ताया गीतं श्रृणु यथा मम ।
    निर्वेद आशापाशानां पुरुषस्य यथा ह्यसिः ॥ २८ ॥
    @न ह्यङ्गाजातनिर्वेदो देहबन्धं जिहासति ।
    यथा विज्ञानरहितो मनुजो ममतां नृप ॥ २९ ॥
    [श्लोक २८,२९] पिंगलेच्या चित्तामध्ये जेव्हा वैराग्य जागृत झाले, तेव्हा तिने गाइलेले गीत माझ्याकडून ऐक "मनुष्याची आशारूपी दोरी तोडणारी तलवार म्हणजे वैराग्य". (२८)
    राजन ! जसा अज्ञानी माणूस ममता सोडू इच्छित नाही, त्याचप्रमाणे ज्याला वैराग्य प्राप्त झाले नाही, तो शरीर आणि त्याची बंधने तोडून टाकू इच्छित नाही. (२९)


    कैसें वैराग्य उपजलें तिसी । जे चिंतीत होती विषयासी ।
    त्या विटली विषयसुखासी । छेदक आशेसी वैराग्य ॥३॥
    तिला वैराग्य कसे झाले पाहा. जी विषयाचे चिंतन करीत होती, ती त्या विषयसुखाला विटून गेली ! सारांश, वैराग्य हेच आशेला छेदणारे आहे ३.


    तेणें वैराग्यें विवेकयुक्त । पिंगलेनें गाइलें गीत ।
    तें आइक राया समस्त । चित्तीं सुचित्त होऊनि ॥४॥
    त्या वैराग्याने विवेकयुक्त होऊन पिंगलेने गीत गाइलें. हे राजा ! तें सर्व सांगतों, सावधान चित्त करून श्रवण कर ४.


    ऐक राया विवेकनिधी । वैराग्य नाहीं ज्याचे बुद्धीं ।
    त्यासी जन्ममरणाची आधिव्याधी । प्रतिपदीं बाधकु ॥५॥
    हे राजा ! विवेकसागरा ! ज्याच्या बुद्धींत वैराग्य नाही, त्याला जन्ममरणाची आधिव्याधि पावलोपावलीं बाधक होते ५.


    अनुतापु नाहीं ज्यासी । विवेक नुपजे मानसीं ।
    तो संसाराची आंदणी दासी । आशापाशीं बांधिजे ॥६॥
    ज्याला अनुताप नाही, ज्याच्या अंत:करणांत विवेक उत्पन्न होत नाही, तो संसाराची आंदण दिलेली दासी होय. आशारूप दोरीनें तो बांधला जातो ६.


    त्यासी मोहममतेची गाढी । घालिजे देहबुद्धीची बेडी ।
    अहोरात्र विषय भरडी । अर्ध घडी न राहे ॥७॥
    त्याला मोहममतेने आवळलेली देहबुद्धीची बेडी घातलेली असते. तो रात्रंदिवस विषयाचे दळण दळीत असतो. अर्ध घटकेचाही खळ नाही ७.


    जराजर्जरित वाकळे । माजीं पडले अखंड लोळे ।
    फुटले विवेकाचे डोळे । मार्गु न कळे विध्युक्त ॥८॥
    जरेनें जर्जर झालेल्या गोधडीमध्ये अखंड लोळत पडलेला असतो. त्याच्या विवेकाचे डोळे फुटलेले असतात. त्याला विध्युक्त मार्ग दिसत नाही ८.


    त्यासी अव्हासव्हा जातां । अंधकूपीं पडे दुश्चिता ।
    तेथूनि निघावया मागुता । उपावो सर्वथा नेणती ॥९॥
    असे लोक वेडेवांकडे भटकूं लागून चित्त चळून घोर काळोख्या विहिरींत पडतात; तेथून वर निघावयाला त्यांना बिलकूल मार्ग सापडत नाही ९.


    तेथ काया-मनें-वाचें । निघणें नाहीं जी साचें ।
    तंव फणकाविला लोभविंचें । चढणें त्याचें अनिवार ॥२१०॥
    खरोखर कायावाचामनेंकरून तेथून बाहेर निघण्याचीच इच्छा होत नाही. तितक्यांत लोभरूप विंचू नांगी मारतो. तो फणकारा अनिवार चढतो २१०.


    तेथ निंदेचिया तिडका । आंत बाहेर निघती देखा ।
    वित्तहानीचा थोर भडका । जळजळ देखा द्वेषाची ॥११॥
    मग आंतून बाहेरून निंदारूप कळा मारू लागतात. द्रव्यनाशाचा आगडोंबाळा व द्वेषाची फुणफुण सुरू होते ११.


    अभिमानाचे आळेपिळे । मोह‍उमासे येती बळें ।
    तरी विषयदळणें आगळें । दुःखें लोळे गेहसेजे ॥१२॥
    अभिमानाचे आळोकेपिळोके देऊं लागतो व मोहाचे उमासे जोराने येऊं लागतात. तरीही हा विषयाचे दळण जोराने दळीत गृहरूपी शेजेवर दुःखाने लोळत असतो १२.


    ऐशीं अवैराग्यें बापुडीं । पडलीं देहाचे बांदवडीं ।
    भोगितां दुःखकोडी । सबुडबुडीं बुडालीं ॥१३॥
    अशा प्रकारें बिचारे अवैराग्यामुळे देहाच्या कैदखान्यांत सांपडून कोट्यवधि दुःखें भोगून रसातळास जातात ! १३.


    पहा पां नीच सर्व वर्णांसी । निंद्य कर्में निंदिती कैशीं ।
    वैराग्य उपजलें वेश्येसी । देहबंधासी छेदिलें ॥१४॥
    पाहा. सर्व वर्णामध्ये नीच व अति निंद्य कर्में करणारी, अशा त्या वेश्येच्या पोटी वैराग्य उत्पन्न झाले व त्याने देहबंधन छेदून टाकिलें ! १४.


    देहबंध छेदी त्या उक्ती । वेश्या बोलिली नाना युक्ती ।
    झाली पिंगलेसी विरक्ती । चक्रवर्ती परीस पां ॥१५॥
    जेणेकरून देहबंधन तुटेल, अशींच भाषणे ती वेश्या बोलली. हे चक्रवर्ती राजा ! त्या पिंगलेला विरक्ति कशी बाणली तें ऐक १५.


    पिङ्गलोवाच -
    अहो मे मोहविततिं पश्यताविजितात्मनः ।
    या कान्तादसतः कामं कामये येन बालिशा ॥ ३० ॥
    [श्लोक ३०] पिंगला म्हणू लागली अहो ! इंद्रियांच्या अधीन झालेल्या माझा मूर्खपणा आणि मोहाची झेप तर पहा ! जी मी क्षुद्र माणसाकडून विषयसुखाची इच्छा करीत आहे. (३०)


    मिथ्या मोहाचा विस्तार । म्यां वाढविला साचार ।
    माझ्या मूर्खपणाचा पार । पाहतां विचार पांगुळे ॥१६॥
    पिंगला म्हणाली-खरोखरी लटकाच मायेचा विस्तार मी वादविला होता. माझ्या मूर्खपणाचा अंतपार पाहावयाला गेलें असतां विचारच कुंठित होतो १६.


    नाहीं अंतःकरणासी नेम । अपार वाढविला भ्रम ।
    असंतपुरुषांचा काम । मनोरम मानितां ॥१७॥
    माझ्या मनाला काही धरबंधच नव्हता. नीच पुरुषाशीं रममाण होऊन आनंद मानण्यांत मी भ्रमाचा कळस करून सोडला १७.


    जरी स्त्रीसी पुरुष पाहिजे । तरी जवळील पुरुष न लाहिजे ।
    हेंचि मूर्खपण माझें । सदा भुंजे असंतां ॥१८॥
    स्त्रीला जर पुरुष पाहिजे तर जवळचा (अंतरांतला) पुरुष टाकावयाचा आणि निरंतर नीच पुरुषाशी रत व्हावयाचे, हाच आधीं माझा मूर्खपणा ! १८.


    सन्तं समीपे रमणं रतिप्रदं वित्तप्रदं नित्यमिमं विहाय ।
    अकामदं दुःखभयाधिशोक मोहप्रदं तुच्छमहं भजेऽज्ञा ॥ ३१ ॥
    [श्लोक ३१] माझा खरा पती नेहमी माझ्याजवळच आहे तोच मला परमानंद आणि परमार्थधन देणारा आहे त्याला सोडून मी माझी एकही इच्छा पूर्ण करू शकत नाही, उलट जे मला दुःख, भय, आधिव्याधी, शोक आणि मोह देणारे आहेत, अशा क्षुद्र माणसांचे मी सेवन करीत राहिले किती मी मूर्ख ! (३१)


    संतपुरुषाची प्राप्ती । जवळी असतां नेणें आसक्ती ।
    ज्यासी केलिया रती । कामनिवृत्ती तत्काळ ॥१९॥
    संत म्ह. शाश्वत पुरुषाचा लाभ अगदी जवळ असतांना, विषयासक्तीमुळे तो मला कळला नाही. त्याच्याशी रत झाले असतां तत्काळ कामनिवृत्ति होते १९.


    काम निवर्तवूनि देख । अनिवार पुरवी नित्यसुख ।
    चित्तदाता तोचि एक । अलोलिक पैं देणें ॥२२०॥
    कामाची निवृत्ति करून अपार शाश्वत सुख जोडून देतो, तोच वित्तदाताही होय. त्याचे देणें अलौकिक असते ! २०.


    सकळ ऐश्वर्य निजपदेंसीं । संतोषोनि दे रतीसी ।
    रमवूं जाणे नरनारींसीं । रमणु सर्वांसी तो एकु ॥२१॥
    निजात्मपदासह संपूर्ण ऐश्वर्य - प्रेमरतीने संतोष पावून तो बहाल करतो; आणि पुरुष व स्त्रिया ह्या दोघांनाही तो रमवूं जाणतो ! तोच एक सर्वांचा रमण म्हणजे पति होय २१.


    सांडोनि ऐशिया कांतासी । माझी मूढता पहा कैशी ।
    नित्य अकामदा पुरुषासी । कामप्राप्तीसी भजिन्नलें ॥२२॥
    असा कांत टाकून मी केवढी मूर्ख पाहा, की निरंतर कामप्राप्तीसाठी ज्याच्यापासून काम पूर्ण व्हावयाचा नाही अशा पुरुषास भजत होते ! २२.


    आपुला पूर्ण न करवे काम । ते मज केवीं करिती निष्काम ।
    त्यांचेनि संगें मोहभ्रम । दुःख परम पावलें ॥२३॥
    ज्यांना आपला काम पूर्ण करता येत नाही, ते मला काय निष्काम करणार ? तशांच्या संगतीने मी मिथ्या मोह व अत्यंत दुःख मात्र पावलें ! २३.


    त्यांचेनि सुख नेदवेच मातें । परी झाले दुःखाचेचि दाते ।
    भय-शोक-आधि-व्याधींतें । त्यांचेनि सांगातें पावलें ॥२४॥
    त्यांच्याने मला सुख देववत नव्हतेंच; पण उलट मला दुःख देणारेच ते झाले. त्यांच्या संगतीने मी भय, शोक व आधिव्याधि मात्र पावलें ! २४.


    अहो मयाऽऽत्मा परितापितो वृथा साङ्केत्यवृत्त्यातिविगर्ह्यवार्तया ।
    स्त्रैणान्नराद् यार्थतृषोऽनुशोच्यात् क्रीतेन वित्तं रतिमात्मनेच्छती ॥ ३२ ॥
    [श्लोक ३२.] अरेरे ! मी अत्यंत निंद्य अशा वेश्यावृत्तीचा आश्रय करून व्यर्थच माझ्या शरीराला आणि मनाला क्लेश दिले स्त्रीलंपट, लोभी आणि निंद्य अशा लोकांना हे शरीर विकून मी धनाची आणि रतिसुखाची इच्छा करीत होते ! (३२)


    जारपुरुषापासोनि सुख । इच्छितें ते मी केवळ मूर्ख ।
    वृथा परितापु केला देख । मज असुख म्यां दीधलें ॥२५॥
    जार पुरुषापासून मी जी सुखाची इच्छा करीत होत्ये, ती मी केवळ मूर्ख म्हणूनच ! व्यर्थ संताप मात्र करून घेतला. मीच मला दुःख करून घेतलें २५.


    स्त्रैण पुरुष ते नराधम । वेश्यागामी त्याहूनि अधम ।
    त्यांत कृपणु तो अधमाधम । तयांचा संगम मी वांच्छीं ॥२६॥
    स्त्रीच्या अधीन असणारे पुरुष नराधम होत; वेश्यागामी पुरुष तर त्याहूनही अधम; त्यांतही जो कृपण, तो तर अधमाहूनही अधम होय ! अशांचा संग मी इच्छीत होते ! २६.


    जितुक्या अतिनिंदका वृत्ती । मज आतळतां त्या भीती ।
    योनिद्वारें जीविकास्थिती । नीच याती व्यभिचारु ॥२७॥
    अति निंद्य वृत्ति म्हणून जितक्या आहेत त्या मला स्पर्श करावयाला भीत असतील ! (हरहर !) भोगेंद्रियावर उदरनिर्वाह ! व्यभिचारव्यवसायाची जात नीच खरी २७.


    अल्प द्रव्य जेणें देणें । त्याची जाती कोण हें नाहीं पाहणें ।
    याहोनि काय लाजिरवाणें । निंदित जिणें पैं माझें ॥२८॥
    कारण थोडेसें धन जो देतो, त्याची जात कोण हे सुद्धा पाहावयाचे नाही ! याहून लाजीरवाणी स्थिति ती कोणती ? धिक्कार असो माझ्या जिण्याला ! २८.


    जया पुरुषासी देह विकणें । तें अत्यंत हीनदीनपणें ।
    काय सांगों त्याची लक्षणें । सर्वगुणें अपूर्ण ॥२९॥
    ज्या पुरुषाला देह विकावयाचा तोही अत्यंत हीन दीनपणाने ! त्या पुरुषाची लक्षणे काय सांगावी ? सर्वच गुणांनी अपूर्ण ! २९.


    वित्त नेदवे कृपणता । काम न पुरवे पुरता ।
    प्रीति न करवे तत्त्वतां । भेटी मागुती तो नेदी ॥२३०॥
    कंजुषपणामुळे पैसा देववत नाही, कामही पूर्ण करवत नाहीं; प्रीति म्हणावी तर तिचेही नांव नाही. इतकेच नव्हे तर तो फिरून तोंडही दाखवीत नाही ! ३०.


    ऐशियापासाव सुख । वांछितां वाढे परम दुःख ।
    जळो त्याचें न पाहें मुख । वोकारी देख येतसे ॥३१॥
    अशा लोकांपासून सुख इच्छिलें असतां अत्यंत दुःख मात्र वाढत असतें ! आग लागो त्याला ! त्याचे तोंडसुद्धा पाहूं नये. अगदी ओकारी येते हो ! ३१.


    एवं जारपुरुषाची स्थिती । आठवितां चिळसी येती ।
    पुरे पुरे ते संगती । चित्तवृत्ति वीटली ॥३२॥
    तात्पर्य, ती जारपुरुषाची स्थिति आठवली म्हणजे मनाला चिळसच येते. पुरे पुरे ती संगत ! मन अगदी विटून गेले ३२.


    यदस्थिभिर्निर्मितवंशवंश्य स्थूणं त्वचा रोमनखैः पिनद्धम् ।
    क्षरन्नवद्वारमगारमेतद् विण्मूत्रपूर्णं मदुपैति कान्या ॥ ३३ ॥
    [श्लोक ३३] जसे बांबूचे आढे, वासे, पट्‌ट्या इत्यादींनी घर बांधावे, त्याप्रमाणे पाठीचा कणा, हाडे इत्यादींनी हे शरीररूपी घर तयार झाले आहे ते त्वचा, लव तसेच नखांनी आच्छादिले आहे याच्या नऊ दरवाज्यांमधून सदैव मलमूत्र इत्यादी वाहात असते माझ्याखेरीज दुसरी अशी कोणती स्त्री असेल की, जी अशा या निंद्य शरीरालाच प्रिय समजून त्याचे सेवन करील ? (३३)


    नरशरीर गृह सांकडें । आढीं पाखाड्या नुसधीं हाडें ।
    अस्थींच्या मेढी दोंहीकडे । वोलेनि कातडें मढियेलें ॥३३॥
    हें मनुष्यदेहरूप घर मोठे किचाट ! येथल्या आढेंपाखाड्या म्हणजे निव्वळ हाडें; दोंहीकडे हाडांच्या मेढी; आणि ओल्या कातड्याने मढविलेलें ! ३३.


    त्यासी सर्वांगीं सगळे । दिधले रोमावळिचे खिळे ।
    घालूनि नखाचे खोबळे । अग्रीं आंगवळे बूजिले ॥३४॥
    त्याला सर्वांगास दरोबस्त केशसमुदायाचे खिळे मारले आहेत. अग्रांच्या ठिकाणी नखांच्या गुडद्या घालून फटी खुजवून टाकिल्या आहेत ! ३४.


    अस्थि-मांस-चर्मबांधा । सर्वांगीं आवळूनि दिधला सांदा ।
    रंगीत चर्मरसना स्वादा । पुढिले बांधा बांधिली ॥३५॥
    हाडे, मांस, कातडे यांची चौकट गच्च करून तिला सांधे बसविले आहेत आणि स्वादासाठी लाल चामड्याची जीभ पुढेंच तयार करून ठेविली आहे ३५,


    वायुप्रसरणपरिचारें । केलीं प्राणापानरंध्रें ।
    वरिले डळमळीत शिखरें । बालांकुरें लाविलीं ॥३६॥
    वायु आंत जाण्यायेण्यासाठी प्राण, अपान यांची झरोकीं तयार केली असून वरच्या हालत्याडोलत्या शिखरावर केशरूप रोपें लावून ठेविली आहेत ३६.


    बुजूनि भीतरील सवडी । बांधाटिलें नवनाडीं ।
    विष्ठामूत्रांची गाढी । नित्य परवडी सांठवण ॥३७॥
    आंतील अवकाश बुजवून नऊ नाड्यांनी बांधून काढिले आहे ह्याच्यांत मलमूत्राचा नित्यनवा साठांच होत असतो ! ३७.


    भीतरिले अवकाशीं । दुर्गंधि ऊठली कैशी ।
    तेचि प्रवाह अहर्निशीं । नवद्वारांसी वाहताति ॥३८॥
    आंतल्या पोकळीत कोण दुर्गंधि माजलेली ! नवद्वारांनी अहोरात्र त्याचेच पाट चाललेले असतात ३८.


    अखंड पर्‍हावे वाहती मळें । देखोनि ज्याचें तो कांटाळे ।
    अहर्निशीं धुतां जळें । कदा निर्मळे ते नव्हती ॥३९॥
    मोर्‍या एकसारख्या घाणीने वहाताहेत, हे पाहून ज्याचा तोच कंटाळतो. त्या रात्रंदिवस जरी पाण्याने धुतल्या तरी स्वच्छ म्हणून कधी होतच नाहीत ! ३९.


    सांगतांचि हे गोष्टी । ओकारी येतसे पोटीं ।
    ऐशियास मी भुलल्यें करंटी । विवेक दृष्टीं न पाहें ॥२४०॥
    हा प्रकार सांगितला म्हणजेच पोटांतून उमसून येते ! आणि मी फुटक्या नशिबाची अशाला भुलून पडत होत्ये ! विवेक म्हणून कसला तो करीतच नव्हत्ये २४०.


    अस्थिमांसाचा कोथळा । विष्ठामूत्राचा गोळा ।
    म्यां आलिंगिला वेळोवेळां । जळो कंटाळा न येचि ॥४१॥
    असा हा हाडामांसांचा कोथळा व विष्ठामूत्राचा गोळाच मी वेळोवेळां आलिंगीत होत्ये. आग लागो त्याला ! कंटाळा कसा तो येतच नसे. २४१


    विदेहानां पुरे ह्यस्मिन्नहमेकैव मूढधीः ।
    यान्यमिच्छन्त्यसत्यस्माद् आत्मदात् काममच्युतात् ॥ ३४ ॥
    [श्लोक ३४] या विदेही लोकांच्या जीवन्मुक्तांच्या नगरीत मी एकटीच मूर्ख आणि चारित्र्यहीन आहे कारण जी स्वतःचे सुद्धा दान करणार्‍या अविनाशी परमात्म्याला सोडून दुसर्‍या पुरूषाची अभिलाषा धरीत आहे. (३४)


    ये विदेहाचे नगरीं । मूर्ख मीचि एक देहधारी ।
    हृदयस्थ सांडूनि श्रीहरी । असंतां नरीं व्यभिचारु ॥४२॥
    या जनकराजाच्या नगरांत मीच एक मूर्ख जन्मास आल्यें ! हृदयस्थ श्रीहरीला सोडून नीच पुरुषाशी व्यभिचार केला ! ४२.


    असंत पुरुष नेणों किती । म्यां भोगिले अहोरातीं ।
    सुख न पवेंची निश्चितीं । रति भगवंतीं जंव नाहीं ॥४३॥
    मी असे नीच पुरुष रात्रंदिवस किती भोगले असतील कोण जाणे ! जोपर्यंत भगवंताचे ठिकाणी प्रेम उत्पन्न झाले नाहीं, तोपर्यंत खरोखरीचें सुख मिळणारच नाही ! ४३.


    जो निकटवर्ती हृदयस्थु । पुरुषीं पुरुषोत्तम अच्युतु ।
    वीर्यच्युतीवीण रमवितु । संतोषें देतु निजात्मना ॥४४॥
    जो अगदी निकटवर्ती हृदयस्थ, पुरुषांमध्ये पुरुषोत्तम व अच्युत, वीर्यच्युति न करितां रमविणारा, आणि संतोषाने निजात्मपद देणारा ४४;


    अच्युतें ज्यासि निजसुख दिधलें । ते सुख च्यवेना कांहीं केलें ।
    ऐशिया हृदयस्था विसरलें । आणिक भुललें अकामदा ॥४५॥
    त्या अच्युताने ज्याला निजसुख दिलें, त्वाच्या त्या सुखाला कांही केल्या च्युति नाही. अशा हृदयस्थाला (नारायणाला) विसरल्ये, आणि ज्यांच्या हातून कामप्राप्ति व्हावयाची नाही, अशा इतर पुरुषांना मात्र मी भाळल्यें ! ४५.


    अकामद ते नाशवंत । त्यांसी संग केलिया दुःखचि देत ।
    कैसें माझें मूर्ख चित्त । त्यासी आसक्त पैं होतें ॥४६॥
    अकामद पुरुष नाशवंत होत. त्यांची संगति केल्यास ते दुःखच देणार ! पण माझे मन पाहा ! किती मूर्ख ! ते त्यांवर आसक्त होतें ! ४६.


    त्या आसक्तीची झाली तडातोडी । लागली अच्युतसुखाची गोडी ।
    ज्याचें सुख भोगितां चढोवढी । घडियाघडी वाढतें ॥४७॥
    आतां त्या आसक्तीची ताटातूट झाली; आणि अच्युत सुखाची, अक्षय्य हरिसुखाची गोडी लागली. ज्याचें सुख भोगूं लागलें असतां क्षणोक्षणीं तें वृद्धिच पावतें ४७.


    सुहृत् प्रेष्ठतमो नाथ आत्मा चायं शरीरिणाम् ।
    तं विक्रीयात्मनैवाहं रमेऽनेन यथा रमा ॥ ३५ ॥
    [श्लोक ३५] हे सर्व प्राण्यांचे आत्मा, त्यांचे हित करणारे, माझे प्रियतम स्वामी आहेत आता मी स्वतःचीच किंमत देऊन यांना विकत घेईन आणि लक्ष्मीप्रमाणे यांच्याबरोबर विहार करीन. (३५)


    जो सोयरा माझा हृदयस्थु । सुख प्रीति प्रिय अच्युतु ।
    तोचि अंतरात्मा सर्वगतु । नाथ कांतु तो माझा ॥४८॥
    जो माझ्या हृदयांतला आप्त, जो (माझे) सुख, जो (माझी) प्रीति, (माझा ) प्रियकर अच्युत तोच सर्वत्र भरून राहिलेला माझा अंतरात्मा होय. तोच माझा स्वामी, व तोच माझा पति होय ४८.


    त्यासीच आपुले संवसाटी । विकत घेईन उठाउठी ।
    परमानंदें देईन मिठी । गोठी चावटी सांडोनी ॥४९॥
    त्यालाच मी आपलें साटेंलोटें करून ताबडतोब विकत घेईन, आणि इतर चावटपणाच्या गोष्टी टाकून मी त्यालाच परमानंदाने मिठी मारीन ४९.


    रमा झाली पायांची दासी । मी भोगीन अनारिसी ।
    सर्वकाळ सर्वदेशीं । सर्वरूपेसीं सर्वस्वें ॥२५०॥
    लक्ष्मी पायांची दासी झालेली आहे. पण मी त्याला-सर्वकाळी, सर्वदेशीं, सर्वरूपीं, अशा प्रकारे सर्वस्वेकरून स्वतंत्रपणेच भोगीन २५०.


    कियत् प्रियं ते व्यभजन् कामा ये कामदा नराः ।
    आद्यन्तवन्तो भार्याया देवा वा कालविद्रुताः ॥ ३६ ॥
    [श्लोक ३६] जितके म्हणून हे विषय किंवा ते देणारे जन्ममृत्यू असणारे पुरूष आहेत, यांनी तुझे काय प्रिय केले आहे ? किंवा काळाने कवटाळलेल्या देवांनी तरी आपल्या बायकांचे काय भले केले आहे ? (३६)


    सांडूनि हृदयस्था अच्युतातें । वरावें वरां निर्दैवांतें ।
    तंव तो द्वैतभये भयचकिते । काळग्रस्ते सर्वदा ॥५१॥
    हृदयस्थ अच्युताला टाकून इतर कपाळकरंट्यांना पति करावें, इतर ते सर्व द्वैताच्या भयाने भिऊन गेलेले, सदोदित काळग्रस्त असे आहेत ५१.


    जे निजभयें सर्वदा दुःखी । ते भार्येसी काय करिती सुखी ।
    अवघीं पडलीं काळमुखीं । न दिसे ये लोकीं सुखदाता ॥५२॥
    जे सदानकदा आपभयाने कष्टी झालेले, ते स्त्रीला काय कपाळाचे सुख देणार ? सारीच काळाच्या जबड्यांत सांपडलेली ! ह्या लोकांत सुख देणारा कोणीच दिसत नाही ५२.


    असो नराची ऐशी गती । वरूं अमरांमाजीं अमरपती ।
    विळांत ते चौदा निमती । पदच्युति अमरेंद्रा ॥५३॥
    असो. ही झाली मनुष्यांची स्थिति ; आतां देवांमधील देवाधिदेव इंद्राला वरावें, तर एका कल्पांत ते चौदा होऊन जातात. अर्थात् देवश्रेष्ठ इंद्राला पदभ्रष्ट व्हावें लागते ५३.


    एवं सुर नर लोक लोकीं । आत्ममरणें सदा दुःखी ।
    ते केवीं भार्येसी करिती सुखी । भजावें मूर्खीं ते ठायीं ॥५४॥
    अशा प्रकारे लोकांत देव काय, मनुष्य काय, आपमरणानेंच सदोदित कष्टी झालेले असतात, ते आपल्या स्त्रीला काय सुखी करणार ? त्या ठिकाणी मूर्खानींच रममाण व्हावें ! ५५.


    धन्य माझी भाग्यप्राप्ती । येचि क्षणीं येचि रातीं ।
    झाली विवेकवैराग्यप्राप्ती । रमापति तुष्टला ॥५५॥
    धन्य माझें भाग्य, की याच रात्रीं हाच क्षणीं मला विवेक व वैराग्य यांची प्राप्ति झाली; माझ्यावर लक्ष्मीपति संतुष्ट झाला ! ५५.


    नूनं मे भगवान् प्रीतो विष्णुः केनापि कर्मणा ।
    निर्वेदोऽयं दुराशाया यन्मे जातः सुखावहः ॥ ३७ ॥
    [श्लोक ३७] माझ्या कोणत्या तरी शुभकर्मामुळेच भगवान विष्णू निश्चितच माझ्यावर प्रसन्न झाले आहेत म्हणून तर भलतील आशा करणार्‍या मला अशा प्रकारे वैराग्य आले माझे हे वैराग्यच मला नक्की सुख देणारे ठरेल. (३७)


    ये जन्मींचें माझें कर्म । पाहतां केवळ निंद्य धर्म ।
    मज तुष्टला पुरुषोत्तम । पूर्वजन्मसामग्रीं ॥५६॥
    ह्या जन्मांतले माझे कर्म पाहिलें तर ते केवळ निंद्य स्वरूपाचे आहे. पूर्वजन्मींचा काही ठेवा होता, म्हणूनच मजवर पुरुषोत्तम प्रसन्न झाला ५६.


    मज कैंचे पूर्वजन्मीं साधन । ज्याचें नाम 'पतितपावन' ।
    कृपाळु जो जनार्दन । त्याचे कृपेन हें घडलें ॥५७॥
    पण पूर्वजन्मीं तरी माझ्या हातून काय घडले असेल ? तर 'पतितपावन ' हे ज्यांचे नांव, असा जो कृपाळू जनार्दन त्याच्या कृपेनेंच हे घडून आले आहे ५७.


    दुष्ट दुराशा व्यभिचारु । भगद्वारा चालवीं संसारु ।
    तिसी मज वैराग्ययुक्त विचारु । विष्णु साचारु तुष्टला ॥५८॥
    नीच, दुर्वासनायुक्त, व्यभिचारी, देह विकून संसार चालविणारी, अशा मला वैराग्यपूर्ण विचार ! म्हणजे खरोखरीच भगवान् विष्णु प्रसन्न झाला असे म्हटले पाहिजे ५८.


    जरी असतें पूर्वसाधन । तरी निंद्य नव्हतें मी आपण ।
    योनिद्वारा कर्माचरण । पतित पूर्ण मी एकी ॥५९॥
    जर कांहीं पूर्वजन्मींचें सुकृत असतें, तर मी नीच जन्माला आले नसतें. योनिद्वारे कर्माचरण करणारी मी केवळ पूर्णपातकी आहे ५९.


    यापरी मी पूर्ण पतित । पतितपावन जगन्नाथ ।
    तेणें कृपा करून येथ । केलें विवेकयुक्त वैरागी ॥२६०॥
    याप्रमाणे मी पूर्ण 'पतित' आणि तो जगन्नाथ 'पतितपावन,' त्यानेंच येथे कृपा करून मला विवेकयुक्त वैरागी केलें २६०.


    तेणें वैराग्यविचारें देख । दुष्ट दुराशेचें फिटलें दुःख ।
    मज झालें परम सुख । निजसंतोख पावलें ॥६१॥
    त्या वैराग्यविचारानेंच माझें दुष्ट दुर्वासनेचे दुःख लयास गेलें ! आणि मला परमसुख होऊन स्वात्मसुखाचा लाभ झाला ! ६१.


    दुःख आदळतां अंगासी । वैराग्य नुपजे अभाग्यासी ।
    भगवंतें कृपा केली कैशी । दुःखें निजसुखासी दीधलें ॥६२॥
    दुःख अंगावर येऊन कोसळलें असतां ज्यांना वैराग्य उत्पन्न होत नाहीं, ते अभागी होत. परंतु भगवंताची केवढी कृपा ! त्याने दुःखाच्या द्वाराने निजसुखच मला जोडून दिले ! ६२.


    मैवं स्युर्मन्दभाग्यायाः क्लेशा निर्वेदहेतवः ।
    येनानुबन्धं निर्हृत्य पुरुषः शममृच्छति ॥ ३८ ॥
    [श्लोक ३८] जर मी अभागिनी असते, तर मला झालेले दुःख हे माझ्या वैराग्याचे कारण ठरले नसते ! कारण अशा प्रकारच्या वैराग्यामुळेच मनुष्य आपले संसारबंधन तोडून परमशांती मिळवितो. (३८)


    अंगीं आदळतां दुःखद्वंद्व । अभाग्यासी ये सबळ क्रोध ।
    थिता विवेक होय अंध । भाग्यमंद ते जाणा ॥६३॥
    दुःखरूप द्वंद्व अंगाशी येऊन भिडले कीं, अभाग्याला फारच क्रोध चढतो ! ज्यांच्या अंगचा विवेक आंधळा होतो, ते मंदभाग्य समजावे ६३.


    दुःख देखतांचि दृष्टी । ज्यासी वैराग्य विवेकेंसी उठी ।
    तेणें छेदूनि स्नेहहृदयगांठी । पावे उठाउठी निजसुख ॥६४॥
    दुःख दृष्टीस पडतांच ज्याला विवेकयुक्त वैराग्य प्राप्त होते, तो हृदयांतील मोहममतेची गांठ तोडून तत्काळ आत्मसुख पावतो ६४.


    पुरुषांसी परमनिधान । विवेकयुक्त वैराग्य जाण ।
    तेणें होऊनियां प्रसन्न । समाधान पावती ॥६५॥
    'विवेकयुक्त वैराग्य' हेंच पुरुषाचें परम निधान आहे असे समज. त्याच्या योगानें ते सुखी होऊन परम समाधान पावतात ६५.


    मी पूर्वी परम अभाग्य । महापुरुषांचे जें निजभाग्य ।
    तें भगवंतें दिधलें वैराग्य । झालें श्लाघ्य तिहीं लोकीं ॥६६॥
    मी पूर्वी अत्यंत अभागी होते. परंतु भगवंताने महापुरुषाचे निजभाग्य जें वैराग्य, ते मला जोडून दिले, आणि मी त्रैलोक्यांत धन्य झाले ! ६६.


    तेनोपकृतमादाय शिरसा ग्राम्यसङ्गताः ।
    त्यक्त्वा दुराशाः शरणं व्रजामि तमधीश्वरम् ॥ ३९ ॥
    [श्लोक ३९] आता मी भगवंतांचे हे उपकार मस्तकावर झेलून आणि विषयभोगांची इच्छा टाकून देऊन त्याच जगदीश्वरांना शरण जाते. (३९)


    कृपा करोनि भगवंते । निजवैराग्य दिधलें मातें ।
    तेणें सांडविलें दुराशेतें । ग्राम्य विषयातें छेदिलें ॥६७॥
    भगवंतानें कृपा करून मला निजवैराग्य प्राप्त करून दिले, आणि त्याच्या योगाने दुर्वासना नाहीशी केली व ग्राम्य विषय छेदून टाकिले ६७.


    तो उपकार मानूनियां माथां । त्यासी मी शरण जाईन आतां ।
    जो सर्वाधीश नियंता । त्या कृष्णनाथा मी शरण ॥६८॥
    ते उपकार शिरावर धारण करून त्याला मी आतां शरण जात आहे; जो सर्वाधीश व सर्वनियंता त्या श्रीकृष्णनाथाला मी शरण आहे ६८.


    सन्तुष्टा श्रद्दधत्येतद् यथालाभेन जीवती ।
    विहराम्यमुनैवाहं आत्मना रमणेन वै ॥ ४० ॥
    [श्लोक ४०] आता मला माझ्या प्रारब्धानुसार जे काही मिळेल, त्यावरच मी संतोष मानून श्रद्धापूर्वक जीवन व्यतीत करीन तसेच आपले आत्मस्वरूप अशा या प्रियतम प्रभूंच्या बरोबरच विहार करीन. (४०)


    शरण गेलियापाठीं । सहज संतुष्ट मी ये सृष्टीं ।
    स्वभावें सत्‌श्रध्दा पोटीं । जीविका गांठी अदृष्ट ॥६९॥
    शरण रिघाल्यानंतर मी ह्या लोकांत सहजच सुखी होईन, पोटांत स्वभावतःच सात्त्विक श्रद्धा आहे; शरीरनिर्वाह अदृष्टावर सोपवून देईन ६९.


    मुनीश्वर भोगिती निजात्मा । त्या मी भोगीन आत्मयारामा ।
    जो का पुरवी निष्कामकामा । तो परमात्मा वल्लभु ॥२७०॥
    ज्या निजात्म्याचा महान् ऋषि उपभोग घेतात, त्याच आत्मारामाला मी भोगीन. निष्कामांचे काम पुरविणारा जो कां परमात्मा, तोच माझा पति होय २७०.


    ब्रह्मादिक समर्थ असती । ते सांडूनियां निश्चितीं ।
    भगवद्‍भजनाची स्थिती । अतिप्रीती कां म्हणसी ॥७१॥
    खरोखर ब्रह्मादिक समर्थ आहेत ते सोडून अत्यंत प्रेमपूर्वक भगवद्‌भजनच कां करावें असें म्हणशील ७१,


    मजसारिखिया दुराचारी । जड जीवांतें उद्धरी ।
    तारकु तोचि भवसागरीं । स्वामी श्रीहरि कृपाळु ॥७२॥
    (तर) मजसारख्या दुराचारी जड जीवांचा जो उद्धार करतो, तोच कृपाळु स्वामी श्रीहरि संसारसागरांत तारक आहे ७२.


    संसारकूपे पतितं विषयैर्मुषितेक्षणम् ।
    ग्रस्तं कालाहिनाऽऽत्मानं कोऽन्यस्त्रातुमधीश्वरः ॥ ४१ ॥
    [श्लोक ४१] हा जीव संसाराच्या विहिरीत पडला आहे विषयांनी याला अगदी आंधळे केले आहे काळरूपी अजगराने याला आपल्या दाढेत पकडले आहे आता याचे रक्षण करणारा भगवंतांखेरीज दुसरा कोण आहे ? (४१)


    संसारलक्षण कूप अंध । तेथ विषयदृष्टीं विषयांध ।
    पडोनि गेले अंधांध । बुद्धिमंद उपायीं ॥७३॥
    संसाररूप खोल अंधकारमय विहीर; तीत विषयदृष्टीने विषयांध झालेले आंधळे लोक पडले आहेत; वर निघण्याच्या उपायाविषयी त्यांची बुद्धिच चालत नाहीं ७३.


    ते कल्पनाजळीं बुडाले । वासनाकल्लोळीं कवळले ।
    दंभमदादि जळचरीं तोडिले । तृष्णेच्या पडले कर्दमीं ॥७४॥
    कोणी कल्पनेच्या जळांत बुडाले ; वासनांच्या लाटांत सांपडले ; दंभमदादि जलचरांनी कोणाचे लचके तोडले, आणि कोणी तृष्णेच्या चिखलात रुतून बसले ७४.


    दुःखाच्या खडकीं आदळले । स्वर्गपायरीसी अडकले ।
    तेथूनिही एक पडले । निर्बुजले भवदळें ॥७५॥
    कोणी दुःखरूप खडकावर आदळले; व स्वर्गाच्या पायरीला अडकून राहिले; कोणी तेथूनही कोसळले व संसाररूप पाण्याने गुदमरून गेले ७५,


    नास्तिकें गेलीं सबुडबुडीं । कर्मठीं धरिल्या कर्मदरडी ।
    वेदबाह्य तीं बापुडीं । पडलीं देव्हडीतळवटीं ॥७६॥
    नास्तिक होते त्यांना समूळ जलसमाधि मिळाली; कर्मठ होते त्यांनी कर्मरूप दरडी पकडल्या; आणि जी बिचारीं वेदबाह्य होती, ती देवडीच्या तळाशी जाऊन पडली ७६.


    निंदेचे शूळ कांटे । फुटोनि निघाले उफराटे ।
    द्वेषाचे पाथर मोठे । हृदय फुटे लागतां ॥७७॥
    तेथें निंदेचे सुळासारखे कांटे बोचून उरफाटे वर निघाले. तसेंच द्वेषाचे मोठमोठे फत्तर, त्यांची धडक बसली असतां हृदयाच्या ठिकर्‍या उडतात ! ७७.


    कामाची उकळी प्रबळ । भीतरूनि बाहेरी ये सबळ ।
    तेणें डहुळलें तें जळ । होय खळबळ जीवासी ॥७८॥
    कामाची उसळी जबर ! आंतून फारच जोरानें वर येते ! त्याच्या योगाने ते पाणी गढूळ होऊन जाते आणि जीवाची फार तारांबळ उडते ७८.


    सुटले क्रोधाचे चिरे । वरी पडिल्या उरी नुरे ।
    वनितामगरीं नेलें पुरें । विवरद्वारें आंतौतें ॥७९॥
    (तेथे ) क्रोधाचे चिरे सुटलेले आहेत, ते मस्तकावर पडले की काहीं बं पार आंत ओढून नेतात ! ७९.


    तेथ अवघियांसी एकसरें । गिळिलें काळें काळ‍अजगरें ।
    विखें घेरिलें थोरें घोरें । ज्ञान पाठिमोरें सर्वांसी ॥२८०॥
    तेथे एकदमच सगळ्यांना काळरूप काळसर्प गट्ट करून टाकतो; अति भयंकर विषाने ते घेरले जातात, आणि ज्ञानाची सर्वांशी फारकत होते २८०.


    सर्प चढलिया माणुसा । गूळ कडू लागे कैसा ।
    निंब खाये घसघसां । गोड गूळसा म्हणौनि ॥८१॥
    साप माणसाला चढला म्हणजे जसा गूळ कडू लागतो, आणि तो गोड गूळ म्हणून कडूलिंब जसा खसखसा खात असतो ८१.


    केवळ विषप्राय विषयो कडू । तो प्रपंचिया जाला गोडु ।
    अमृतप्राय परमार्थ गोडु । तो जाहला कडू विषयिकां ॥८२॥
    ; (त्याचप्रमाणे) प्रापंचिकांना विषय हा केवळ विषासारखा कडू असून गोड वाटतो; आणि परमार्थ हा अमृतासारखा गोड, पण विषयीजनांना कडू वाटतो ! ८२


    कूपाबाहेर वासु ज्यांसी । ते न देखती कूपाआंतुलांसी ।
    कूपांतले बाहेरिलांसी । कदाकाळेंसी न देखती ॥८३॥
    जे या कूपाच्या (विहिरीच्या) बाहेर राहातात, त्यांना कूपांत पडलेले दिसत नाहीत; आणि कूपांत जे आहेत, त्यांना कालत्रयींही बाहेरचे दिसत नाहीत ८३.


    ऐसिया पीडतयां जीवांसी । काढावया धिंवसा नव्हे कोण्हासी ।
    तुजवांचोनि हृषीकेशी । पाव वेगेंसीं कृपाळुवा ॥८४॥
    अशा पिडलेल्या प्राण्यांस वर काढण्याचे धैर्य, हे हृषीकेशा ! तुझ्याशिवाय इतर कोणालाही नाही. तर हे कृपाळो ! मला त्वरित भेट दे ८४.


    एवं दुःखकूपपतितां । हृदयस्थु भगवंतुचि त्राता ।
    धांव पाव कृष्णनाथा । भवव्यथा निवारीं ॥८५॥
    अशा प्रकारे दुःखरूप विहिरीत पडलेल्यांचा त्राता तूं हृदयस्थ नारायणच आहेस. तर हे कृष्णनाथा धाव, दर्शन दे, आणि माझे संसारदुःख निवारण कर ८५.


    ऐसें जाणोनि तत्त्वतां । त्याच्या चरणा शरण आतां ।
    शरण गेलिया सर्वथा । सहज भवव्यथा निवारे ॥८६॥
    हे मी तत्त्वतः जाणून आतां त्याच्या पायांस शरण जात आहे. त्यायोगें माझें संसारदुःख सहज नाहीसे होईल (असा मला विश्वास आहे) ८६.


    आत्मैव ह्यात्मनो गोप्ता निर्विद्येत यदाखिलात् ।
    अप्रमत्त इदं पश्येद्ग्रस्तं कालाहिना जगत् ॥ ४२ ॥
    [श्लोक ४२] ज्यावेळी जीव सर्व विषयांपासून विरक्त होतो, त्यावेळी तो स्वतःच आपले रक्षण करतो म्हणून हे सर्व जग काळरूपी अजगराने ग्रासले आहे, हे अत्यंत सावधानपूर्वक जाणले पाहिजे. (४२)


    ऐसें कळलें जी तत्त्वतां । येथ आपणचि आपणिया त्राता ।
    सर्व पदार्थीं सर्वथा । निर्वेदता दृढ जाहल्या ॥८७॥
    अहो ! मला तत्त्वत: असे कळून आले की, सर्व पदार्थमात्रांचे ठिकाणी निखालस दृढ वैराग्य बाणलें असतां येथे आपणच आपला उद्धारकर्ता होतों ८७.


    दृढ वैराग्यता ते ऐशी । विषयो टेंकल्या अंगासी ।
    चेतना नव्हे इंद्रियांसी । निद्रितापासीं जेवीं रंभा ॥८८॥
    दृढ वैराग्य तें असें की, गाढ झोपी गेलेल्यापाशी रंभा आली असतांही तो निर्विकार असतो, त्याप्रमाणे विषय अंगाशी येऊन भिडला तरीही इंद्रियांना विकार होत नाही ! ८८.


    अथवा वमिलिया अन्ना । जेवीं वांछीना रसना ।
    तेवीं विषय देखोनि मना । न धरी वासना आसक्ती ॥८९॥
    ओकलेल्या अन्नावर ज्याप्रमाणे रसनेची वांच्छा जात नाही, त्याप्रमाणे विषय पाहून मन आसक्त होत नाही किंवा वासना धरीत नाही ! ८९.


    तें वैराग्य कैसेनि जोडे । तरी सावधान पाहतां रोकडें ।
    जग काळें गिळिलें चहूंकडे । वेगळें पडे तें नाहीं ॥२९०॥
    असें तें वैराग्य कशाने प्राप्त होईल ? तर विवेकदृष्टीने पाहूं गेलें असतां दिसून येते की, जगाला सर्व बाजूंनी काळाने ग्रासले आहे, त्याच्या तडाक्यांतून कोणीही सुटत नाही २९०.


    पिता-पितामह काळें नेले । पुत्रपौत्रां काळें गिळिलें ।
    वैराग्य नुपजे येणें बोलें । तरी नागवले नरदेहा ॥९१॥
    बाप आजे काळ घेऊन गेला, पुत्र व नातू काळाने गट्ट केले, हे प्रत्यक्ष पाहूनसुद्धा ज्यांना वैराग्य होत नाही, ते मनुष्यजन्माला येऊन व्यर्थ गेले ! ९१.


    मृत्युलोक याचें नांव । अनित्य स्वर्गाची काइसी हांव ।
    वैराग्येंवीण निर्दैव । झाले सर्व सर्वथा ॥९२॥
    ह्याचें नांवच मुळीं मृत्युलोक ! स्वर्गसुद्धा असाच नाशिवंत ! त्याची तरी हांकाय कामाची ? एका वैराग्यावांचून सर्व जीव सर्वथैव हीनकपाळी झाले आहेत ! ९२.


    श्रीब्राह्मण उवाच -
    एवं व्यवसितमतिर्दुराशां कान्ततर्षजाम् ।
    छित्त्वोपशममास्थाय शय्यामुपविवेश सा ॥ ४३ ॥
    [श्लोक ४३] अवधूत म्हणतात असा निश्चय करून पिंगला वेश्येने आपल्या प्रिय धनवंतांची व्यर्थ आशा सोडून देऊन ती आपल्या अंथरूणावर शांतपणे जाऊन झोपली. (४३)


    अवधूत म्हणे यदूसी । धन्य भाग्य तये वेश्येसी ।
    वैराग्य उपजलें तिसी । विवेकेंसी निजोत्तम ॥९३॥
    अवधूत यदूला म्हणतो-धन्य भाग्य त्या वेश्येचें, की तिला उत्तम विवेकासहित वैराग्य उत्पन्न झाले ९३.


    एवं विवंचूनि निजबुद्धी । परपुरुषदुराशा छेदी ।
    ज्याचेनि संगें आधिव्याधी । बहु उपाधी बाधक ॥९४॥
    अशा प्रकारे स्वात्मबुद्धीने विचार करून, ज्यांच्या संसर्गानें आधिव्याधि व आणखीही नाना तर्‍हेच्या उपाधि ताप देत होत्या, त्या परपुरुषांविषयींची दुर्वासना तिने पार छाटून टाकिली ! ९४.


    जे उपाधीचेनि कोडें । जन्ममृत्यूचा पुरु चढे ।
    दुःखभोगाचें सांकडें । पाडी रोकडें जीवासी ॥९५॥
    ज्या उपाधींच्यामुळे जन्ममृत्यूचा पूर चढतो आणि जीवाला दुःखभोगाचे प्रत्यक्ष संकट भोगणें प्राप्त होते ९५,


    येणें वैराग्यविवेकबळें । छेदूनि दुराशेचीं मूळें ।
    उपरमु पावली एके वेळे । निजात्मसोहळे ते भोगी ॥९६॥
    त्या दुर्वासनेची मुळे वैराग्ययुक्त विवेकाच्या सामर्थ्यानें तिनें तोडून टाकली. त्याबरोबर तिला तत्काळ शांति प्राप्त झाली; आणि ती स्वात्मसुखाचे सोहळे भोगूं लागली ९६.


    नित्यसिद्धसुखदाता । तो हृदयस्थ कांत आश्रितां ।
    विकल्प सांडूनि चित्ता । वेगीं हृदयस्था मीनली ॥९७॥
    नित्यसिद्ध असलेले सुख देणारा असा जो हृदयस्थ कांत, त्याचा आश्रय करतांच चित्तांतले विकल्प नाहीसे होऊन ती हृदयस्थ आत्मारामाशी ऐक्य पावली ९७.


    त्यासी देखतां अनुभवाचे दिठीं । ऐक्यभावें घातली मिठी ।
    निजसुख पावली गोरटी । उठाउठीं तत्काळ ॥९८॥
    त्याला अनुभवदृष्टीने पाहतां क्षणीं ऐक्यभावाने आलिंगन दिले, त्याबरोबर ती सुंदरी तत्काळ निजसुख पावली ९८.


    बोलु घेऊनि गेला बोली । लाज लाजोनियां गेली ।
    दृष्य-द्रष्टा दशा ठेली । वाट मोडिली विषयांची ॥९९॥
    वाणी वाणीला घेऊन गेली; लाजच लजित झाली ; दृश्य-द्रष्टा ही अवस्था नाहीशी झाली; त्यामुळे विषयांचा मार्गच खुंटला ९९.


    सुखें सुखावलें मानस । तें सुखरूप जालें निःशेष ।
    संकल्पविकल्प पडिले वोस । दोघां सावकाश निजप्रीती ॥३००॥
    मन सुखानें (आत्मसुखानें) सुखावले; ते पूर्ण सुखरूपच होऊन बसलें; संकल्प माणि विकल्प वोस पडले; उभयताही निजप्रेमांत निमग्न झाले ३००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...