मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ ओव्या २०१ ते ३००
एक बुद्धिस्तव पवित्र जाण । या समस्तांमाजीं पवित्रपण ।
तें माझे स्वरूप म्हणे श्रीकृष्ण । पावना पावन मी एक ॥ १ ॥
तें माझे स्वरूप म्हणे श्रीकृष्ण । पावना पावन मी एक ॥ १ ॥
कोणी बुद्धीनेच पवित्र होतात, पण अशा ह्या सर्वांमध्ये जे पवित्रपण म्हणून आहे, ते माझंच स्वरूप होय. पावनालाही पावन करणारा एक मीच आहे असें श्रीकृष्ण म्हणाले १.
जग माझेनि नामें पुनीत । हें सर्वांचे संमत ।
त्या माझें स्वरूप जें येथ । परम पुनीत पुनीतां ॥ २ ॥
त्या माझें स्वरूप जें येथ । परम पुनीत पुनीतां ॥ २ ॥
जग हे माझ्या नामानेच पवित्र होते, हे सर्वसंमत आहे. त्या माझे जें स्वरूप येथे आहे ते पुनीतांहूनही अत्यंत पुनीत आहे २.
योगानामात्मसंरोधो मन्त्रोऽस्मि विजिगीषताम् ।
आन्वीक्षिकी कौशलानां विकल्पः ख्यातिवादिनाम् ॥ २४ ॥
आन्वीक्षिकी कौशलानां विकल्पः ख्यातिवादिनाम् ॥ २४ ॥
[श्लोक २४] योगांमध्ये मनोनिरोधरूपी समाधियोग मी आहे जिंकण्याची इच्छा करणार्यांची गुप्त मसलत मी आहे आत्मानात्मविवेकाच्या चर्चेमधील ब्रह्मविद्या मी आहे वादविवाद करणार्यांमधील विकल्प मी आहे. (२४)
विविध योगांमाजीं आत्मरोधू । तो योग मी म्हणे गोविंदू ।
जेणें प्रकटे परमानंदू । समाधिबोधू साधकां ॥ ३ ॥
जेणें प्रकटे परमानंदू । समाधिबोधू साधकां ॥ ३ ॥
गोविंद म्हणतात, ज्याच्या योगाने साधकांच्या अंत:करणामध्ये परमानंद उत्पन्न होतो व समाधीचे ज्ञान प्राप्त होते, असा जो नाना प्रकारच्या योगांमध्ये 'आत्मनिरोध' म्हणून योग आहे, तो योग मी ३.
मुख्यत्वें विवेक धरोनि हातीं । जो न्यायतां विजयो वांछी चित्तीं ।
ते नीतीची नीति मी श्रीपती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ४ ॥
ते नीतीची नीति मी श्रीपती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ४ ॥
आणखी उद्ध्वा ! मुख्यत्वे विवेक हाताशी घेऊन नीतिन्यायानेच विजयी होण्याची जो इच्छा करतो, त्या नीतीचीही नीति मीच श्रीकृष्ण होय, हे निश्चित समज ४.
आत्मानात्मविवेक केवळ । ते आन्वीक्षिकी विद्या कुशळ ।
ते विद्या म्हणे मी गोपाळ । विवेक प्रबळ माझेनी ॥ ५ ॥
ते विद्या म्हणे मी गोपाळ । विवेक प्रबळ माझेनी ॥ ५ ॥
गोपाल म्हणतात, केवळ आत्मानात्माचा विचार करणारी अशी जी अध्यात्मविद्या, ती विद्या मी आहे. माझ्याच योगानें विवेक वृद्धिंगत होतो ५.
वादांमाजी वाद अनंत । जेथ विकल्पा नाही अंत ।
तो वादू मी म्हणे अच्युत । ऐक निश्चित विकल्प ॥ ६ ॥
तो वादू मी म्हणे अच्युत । ऐक निश्चित विकल्प ॥ ६ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, ज्याच्यामध्ये विकल्पाला अंतच नाही असा, वादांमध्ये अनंत चालणारा जो वाद, तो वाद मी. आणखी विकल्प कोणते ते ऐक ६.
आख्याती अन्यथाख्याती । शून्यख्याती सत्ख्याती ।
अनिर्वचनीय जे ख्याती । तो वादू निश्चितीं मी उद्धवा ॥ ७ ॥
अनिर्वचनीय जे ख्याती । तो वादू निश्चितीं मी उद्धवा ॥ ७ ॥
उद्धृवा! आख्याति, अन्यथाख्याति, शून्यख्याति, सत्ख्याति आणि अनिर्वचनीय अशी जी ख्याति ते वादही खरोखर मीच होय ७.
स्त्रीणां तु शतरूपाहं पुंसां स्वायम्भुवो मनुः ।
नारायणो मुनीनां च कुमारो ब्रह्मचारिणाम् ॥ २५ ॥
नारायणो मुनीनां च कुमारो ब्रह्मचारिणाम् ॥ २५ ॥
* [ श्लोक २५] मी स्त्रियांमध्ये मनुपत्नी शतरूपा, पुरूषांमध्ये स्वायंभुव मनू, मुनीश्वरांमध्ये नारायण आणि ब्रह्मचार्यांमध्ये सनत्कुमार आहे. (२५)
शतरूपा आणि मनू । इयें दोनी मी म्हणे जनार्दनू ।
मुनींमाजीं मी नारायणू । बदरी सेवुनू सदा असे ॥ ८ ॥
मुनींमाजीं मी नारायणू । बदरी सेवुनू सदा असे ॥ ८ ॥
जनार्दन म्हणाले, शतरूपा आणि मनु हे दोन्ही मीच. सदासर्वकाळ बदरिकाश्रमांत राहणारा मुनींमधील नारायण तो मी ८.
नैष्ठिक ब्रह्मचर्यधर । माझें स्वरूप सनत्कुमार ।
स्वयें सांगताहे श्रीधर । जाण साचार उद्धवा ॥ ९ ॥
स्वयें सांगताहे श्रीधर । जाण साचार उद्धवा ॥ ९ ॥
आणखी श्रीकृष्ण स्वतः सांगतात की, खरोखर हे उद्धवा ! निष्ठेने ब्रह्मचर्यव्रत धारण करून राहणारे जे सनत्कुमार तेही माझेंच स्वरूप होत असे समज ९.
धर्माणामस्मि सन्यासः क्षेमाणामबहिर्मतिः ।
गुह्यानां सूनृतं मौनं मिथुनानामजस्त्वहम् ॥ २६ ॥
गुह्यानां सूनृतं मौनं मिथुनानामजस्त्वहम् ॥ २६ ॥
[ श्लोक २६] धर्मांमध्ये सन्यासधर्म मी आहे कल्याण करून घेऊ इच्छिणार्यांची अंतर्मुख वृत्ती मी आहे कोणतीही गोष्ट गुप्त राखण्यासाठी लागणारी मधुर वाणी आणि मौन मी आहे, ज्याच्या शरीरापासून स्त्रीपुरूषांची पहिली जोडी उत्पन्न झाली, तो ब्रह्मदेव मी आहे. (२६)
भूतां अभयदान उपक्रमू । सर्वां भूतीं मी आत्मारामू ।
हा संन्यासाचा मुख्य धर्मू । तो धर्म पुरुषोत्तमू स्वयें मी म्हणे ॥ २१० ॥
हा संन्यासाचा मुख्य धर्मू । तो धर्म पुरुषोत्तमू स्वयें मी म्हणे ॥ २१० ॥
सर्व प्राणिमात्रांना अभयदान देण्याचा क्रम ठेवणे, सर्व भूतांमध्ये आत्माराम तो मी असे समजणे, हाच संन्यासाचा मुख्य धर्म होय. पुरुषोत्तम म्हणतात की, तो धर्म स्वतः मीच आहे २१०.
भूतांसी काया वाचा मनें । दुःख नेदूनि सुख देणें ।
या नांव संन्यासधर्म म्हणणें । तो धर्म मी म्हणे गोविंद ॥ ११ ॥
या नांव संन्यासधर्म म्हणणें । तो धर्म मी म्हणे गोविंद ॥ ११ ॥
कायावाचामनेंकरून कोणत्याही प्राण्याला दुःख न देतां सुखच देणे याला संन्यासधर्म असे म्हणतात. गोविंद म्हणाले, तो संन्यासधर्म मी आहे ११.
अंतरीं शुद्ध नाहीं बोध । दांत चावोनि साहतां द्वंद्व ।
ते क्षमा नोहे शुद्ध । ऐके विनोद क्षमेचा ॥ १२ ॥
ते क्षमा नोहे शुद्ध । ऐके विनोद क्षमेचा ॥ १२ ॥
अंत:करणामध्ये शुद्ध बोध झालेला नसतो, आणि दांत ओंठ चावून द्वंद्वे सहन करावयाची, ती काही खरी क्षमा नव्हे. क्षमेचे स्वरूप ऐक १२.
अंतरीं ठसावलें परब्रह्म । बाह्य सर्वा भूतीं जाहला सम ।
ते क्षमा मी म्हणे पुरुषोत्तम । द्वंद्वाराम बाधिना ॥ १३ ॥
ते क्षमा मी म्हणे पुरुषोत्तम । द्वंद्वाराम बाधिना ॥ १३ ॥
पुरुषोत्तम म्हणतात, अंत:करणांत परब्रह्माचा खरा ठसा उमटून जो बाहेर सर्व प्राणिमात्रांशी समान: भावाने वागतो, त्याची ती वृत्ति म्हणजेच क्षमा होय. ती क्षमा मी आहे. अशी क्षमा ज्याचेजवळ असते, त्याला द्वंद्वांची पीडा होत नाही १३.
असत्य पापी सकळ सृष्टीं । असत्यांमाजीं पापकोटी ।
असत्याची खोटी गोठी । जो तो पोटीं सांडीना । ॥ १४ ॥
असत्याची खोटी गोठी । जो तो पोटीं सांडीना । ॥ १४ ॥
सर्व जगामध्ये असत्यवादी मनुष्यच पातकी होय. असत्यामध्ये कोट्यवधि पातकें भरलेली असतात. असत्याची गोष्ट अत्यंत खोटी असते. ती कोणीही मनावर घेत नाही १४.
उभय लौकिकीं खोटेपणें । असत्यबहिर्मुख नाणें ।
तें मनींहूनि जेणें सांडणें । तो म्यां श्रीकृष्ण वंदिजे ॥ १५ ॥
तें मनींहूनि जेणें सांडणें । तो म्यां श्रीकृष्ण वंदिजे ॥ १५ ॥
बहिर्मति असणे हे इहलोकीं व परलोकीही खोटें नाणेच होय. ते ज्याने मनापासून सोडले, त्याला मी श्रीकृष्णसुद्धा वंदन करतों १५.
ते गुह्यामाजीं अतिगुह्य जाण । सत्य वाचा कां मनींहूनि मौन ।
तें मी म्हणे मधुसूदन । सत्य प्रिय जाण निजगुह्य ॥ १६ ॥
तें मी म्हणे मधुसूदन । सत्य प्रिय जाण निजगुह्य ॥ १६ ॥
सत्य भाषण करणे, किंवा जें मनःपूर्वक मौन धारण करणे तेंच गुह्यांतील अत्यंत मोठे गुह्य होय. श्रीकृष्ण म्हणाले की ते गुह्य मी होय. कारण सत्यावर प्रीति असणे हेच माझे आत्मगुह्य आहे १६.
स्रष्ट्याचे देह द्विधा जाण । मनू शतरूपा मूळमिथुन ।
तें मी म्हणे नारायण । मनुष्य सृजन सद्भावें ॥ १७ ॥
तें मी म्हणे नारायण । मनुष्य सृजन सद्भावें ॥ १७ ॥
ब्रह्मदेवाचा देह मनु आणि शतरूपा ह्या अगदी पहिल्या जोडप्याच्या रूपाने द्विभागात्मक झाला. नारायण म्हणतात, ते एकनिष्ठेनें मनुष्यसृष्टि उत्पन्न करणारे जोडपें मीच होय १७.
संवत्सरोऽस्म्यनिमिषाम् ऋतूनां मधुमाधवौ ।
मासानां मार्गशीर्षोऽहं नक्षत्राणां तथाभिजित् ॥ २७ ॥
मासानां मार्गशीर्षोऽहं नक्षत्राणां तथाभिजित् ॥ २७ ॥
[श्लोक २७] - नेहमी जागृत असणार्यांमध्ये संवत्सररूप काळ मी आहे, ऋतूंमध्ये वसंत, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आणि नक्षत्रांमध्ये अभिजित. (उत्तराषाढाचा चौथा व श्रवणाचा पहिला चरण याला अभिजित नाव आहे) मी आहे. (२७)
सावधानेंअविकळ । न चुकतां पळें पळ ।
संवत्सरात्मक जो काळ । तो मी गोपाळ स्वयें म्हणे ॥ १८ ॥
संवत्सरात्मक जो काळ । तो मी गोपाळ स्वयें म्हणे ॥ १८ ॥
श्रीकृष्ण म्हणतात, एक पळभरही न चुकतां निरंतर सावधपणाने दक्ष राहाणारा जो संवत्सरात्मक काळ, तो मीच स्वतः होय १८.
त्रसरेणूपासोनि जाण । लवनिमिषदिनमान ।
संवत्सरवरी सावधान । गणीं मी संकर्षण काळगणना ॥ १९ ॥
संवत्सरवरी सावधान । गणीं मी संकर्षण काळगणना ॥ १९ ॥
त्रसरेणूपासून संवत्सरापर्यंत लव, निमिष, दिवस इत्यादि मानांची कालगणना मी संकर्षणच सावधानतेने करीत असतों १९.
मधुमाधव वसंतयुक्तू । कृष्ण म्हणे तो मी ऋतू ।
मार्गशीर्ष मी मासांआंतू । धान्यपाकयुक्तू आल्हादी ॥ २२० ॥
मार्गशीर्ष मी मासांआंतू । धान्यपाकयुक्तू आल्हादी ॥ २२० ॥
कृष्ण म्हणतात, मधु-माधव या दोन महिन्यांचा जो वसंत ऋतु, तो ऋतु मी आहे. सर्व महिन्यांमध्ये, धान्ये परिपक्व दशेस आणणारा आल्हादकारक असा मार्गशीर्ष महिना मी आहे २०.
गणितां न ये पंचांगांत । नक्षत्रीं असोनि सदा गुप्त ।
अव्यक्त परी सज्ञाना प्राप्त । तें मी अभिजित् म्हणे हरी ॥ २१ ॥
अव्यक्त परी सज्ञाना प्राप्त । तें मी अभिजित् म्हणे हरी ॥ २१ ॥
पंचांगांत ज्याला गणितां येत नाहीं; नक्षत्रांत असूनही जें सर्वदा गुप्त असते, अदृश्य असतांही सुज्ञ लोकांना सांपडते; ते अभिजित् नक्षत्र मी आहे असें श्रीहरि म्हणतात २१.
अहं युगानां च कृतं धीराणां देवलोऽसितः ।
द्वैपायनोऽस्मि व्यासानां कवीनां काव्य आत्मवान् ॥ २८ ॥
द्वैपायनोऽस्मि व्यासानां कवीनां काव्य आत्मवान् ॥ २८ ॥
[श्लोक २८] मी युगांमध्ये सत्ययुग, विवेकी पुरूषांमध्ये महर्षी देवल व असित, व्यासांमध्ये द्वैपायन व्यास आणि विद्वानांमध्ये बुद्धिमान शुक्राचार्य आहे. (२८)
युगांमाजीं कृतयुग । तें मी म्हणे श्रीरंग ।
जेथ संपूर्ण धर्म सांग । अधर्मभाग असेना ॥ २२ ॥
जेथ संपूर्ण धर्म सांग । अधर्मभाग असेना ॥ २२ ॥
श्रीरंग म्हणतात, युगांमध्ये ज्यात सर्व धर्म यथासांग चालतात, अधर्माचा भाग मुळींच असत नाही, ते कृतयुग मी २२.
निजधैर्य अतिअद्भुत । असित देवल धैर्यवंत ।
तो मी म्हणे गा अच्युत । जाण निश्चित उद्धवां ॥ २३ ॥
तो मी म्हणे गा अच्युत । जाण निश्चित उद्धवां ॥ २३ ॥
अच्युत म्हणाले, उद्धवा ! धैर्यामध्ये आत्मधैर्य हे मोठे विलक्षण आहे. असे धैर्यशाली जे असित आणि देवल ते मीच होय, असें निश्चित समज २३.
वेदविभागी राजहंस । जो कां द्वैपायन व्यास ।
तो मी म्हणे हृषीकेश । निवडूनि द्विजांस दीधले वेद ॥ २४ ॥
तो मी म्हणे हृषीकेश । निवडूनि द्विजांस दीधले वेद ॥ २४ ॥
हृषीकेशी म्हणतात, वेदांचे विभाग करण्याविषयीं केवळ राजहंस, आणि ज्याने वेदांची निवड करून ते ब्राह्मणांना दिले असा जो द्वैपायन व्यास तो मी २४.
कवि त्यांमाजीं परमार्थज्ञाता । उशना कवी जाण तत्त्वतां ।
तो मी म्हणे रमाभर्ता । निजात्मकविता मी शुक्र ॥ २५ ॥
तो मी म्हणे रमाभर्ता । निजात्मकविता मी शुक्र ॥ २५ ॥
लक्ष्मीपति म्हणतात, जे कवि आहेत, त्यांमध्ये खरोखर परमार्थज्ञानी जो उशना (शुक्राचार्य) कवि, तो मी. साक्षात् आत्मस्वरूप ज्ञानच असा शुक्राचार्य मी होय २५.
वासुदेवो भगवतां त्वं तु भागवतेष्वहम् ।
किंपुरुषाणां हनुमान् विद्याध्राणां सुदर्शनः ॥ २९ ॥
किंपुरुषाणां हनुमान् विद्याध्राणां सुदर्शनः ॥ २९ ॥
[ श्लोक २९] मी षड्गुणैश्वर्य संपन्नांमध्ये वासुदेव, भगवद्भक्तांमध्ये तू. (उद्वव), किंपुरूषांमध्ये हनुमान आणि विद्याधरांमध्ये सुदर्शन आहे. (२९)
षड्गुणभाग्यें भाग्यवंत । पूर्णांशे जो भगवंत ।
वासुदेवनामें विख्यात । जाण तो मी येथे श्रीकृष्ण ॥ २६ ॥
वासुदेवनामें विख्यात । जाण तो मी येथे श्रीकृष्ण ॥ २६ ॥
षड्गुणैश्वर्याने भाग्यवान्, पूर्णाशाने भगवत्स्वरूप व वासुदेव ह्या नावाने प्रसिद्ध असणारा, असा श्रीकृष्णरूपाने मीच येथे आहे असे समज २६.
भागवतांमाजी अतिगहन । उद्धवा तूं तो मीचि जाण ।
ऐसें बोलतां श्रीकृष्ण । उद्धवें श्रीचरण वंदिले ॥ २७ ॥
ऐसें बोलतां श्रीकृष्ण । उद्धवें श्रीचरण वंदिले ॥ २७ ॥
आणखी उद्धवा ! भगवद्भक्तांमध्ये अत्यंत श्रेष्ठ जो तूं , तो मीच होय, हे लक्षात ठेव. असें श्रीकृष्णाने म्हणतांच उद्धवाने श्रीकृष्णाच्या चरणांना वंदन केले २७.
उद्धवें करितां नमन । कृष्णें दिधले आलिंगन ।
आनंदे कोंदलें त्रिभुवन । स्वानंदघन तुष्टला ॥ २८ ॥
आनंदे कोंदलें त्रिभुवन । स्वानंदघन तुष्टला ॥ २८ ॥
उद्धवाने नमस्कार करतांच श्रीकृष्णानेंही त्याला आलिंगन दिले. तेव्हां सर्व त्रैलोक्य आनंदाने भरून गेले. इतका आत्मानंदाचा केवळ मेघ असा श्रीकृष्ण संतुष्ट झाला २८.
उद्धव आणि श्रीकृष्ण । दोनी एक जाहले जाण ।
'मी तो तूं' जें बोलिला श्रीकृष्ण । तें उद्धवासी आपण सत्यत्वें दावी ॥ २९ ॥
'मी तो तूं' जें बोलिला श्रीकृष्ण । तें उद्धवासी आपण सत्यत्वें दावी ॥ २९ ॥
उद्धव आणि श्रीकृष्ण दोन्ही एकरूप झाले. 'मी' तोच 'तूं ' असे जे श्रीकृष्ण बोलला होता, तें उद्धवाला स्वतः प्रत्यक्षच खरे करून दाखविले २९.
दोघांचे मोडलें दोनीपण । उद्धव जाहला श्रीकृष्ण ।
कृष्णाअंगी उद्धवपण । संपूर्ण जाण बाणलें ॥ २३० ॥
कृष्णाअंगी उद्धवपण । संपूर्ण जाण बाणलें ॥ २३० ॥
दोघांचे दोन भिन्न भाव मोडून जाऊन उद्धव श्रीकृष्णच झाला आणि श्रीकृष्णाच्या आंगींही संपूर्ण उद्धवपणच बिंबून राहिले २३०.
तेणें उद्धव झाला विस्मित । नावेक श्लाघला आपणांत ।
मीच कृष्णाचा प्रिय भक्त । हें जाणोनि अनंत बोलिला ॥ ३१ ॥
मीच कृष्णाचा प्रिय भक्त । हें जाणोनि अनंत बोलिला ॥ ३१ ॥
त्यामुळे उद्धव आश्चर्यचकित झाला आणि श्रीकृष्णाचा प्रियभक्त काय तो मीच असें म्हणून क्षणभर आपल्या ठिकाणींच मोठेपणाने फुगला. हे जाणून श्रीकृष्ण म्हणाले ३१,
वानरांमाजी हनुमंत । तो मी म्हणे कृष्णनाथ ।
तंव उद्धव जाहला गर्वहत । लाजला पोटांत ते काळीं ॥ ३२ ॥
तंव उद्धव जाहला गर्वहत । लाजला पोटांत ते काळीं ॥ ३२ ॥
वानरांमध्ये हनुमंत तो मी असें श्रीकृष्ण म्हणाले. तेव्हां उद्धवाचा अभिमान नष्ट झाला आणि तो मनांतल्या मनांतच खजिल होऊन गेला ३२.
जेथ वानर आणि वनचर । मजहूनि कृष्णाचे प्रियकर ।
न कळे हरिभक्तांचा पार । मी कोण किंकर ते ठायीं ॥ ३३ ॥
न कळे हरिभक्तांचा पार । मी कोण किंकर ते ठायीं ॥ ३३ ॥
कारण की, जेथें वानरें आणि श्वापदेसुद्धा कृष्णाची माझ्याहून प्रियकर भक्त झाली, तेथे हरिभक्तांचा अंतच लागणे कठीण. मग मज दासाचा तेथ पाड काय? ३३.
ऐसें विचारूनि चित्तां । सवेंचि नमिलें कृष्णनाथा ।
तुझ्या विभूति अचुंबिता । कृपेनें तत्त्वतां मज सांग ॥ ३४ ॥
तुझ्या विभूति अचुंबिता । कृपेनें तत्त्वतां मज सांग ॥ ३४ ॥
असा मनामध्ये विचार करून लागलाच त्याने श्रीकृष्णाला नमस्कार केला. आणि म्हणाला, खरोखर आपल्या ज्या विभूति आहेत त्या कृपा करून सर्वच मला सांगाव्यात ३४.
तंव हांसोनि श्रीधर । काय बोलिला उत्तर ।
सुदर्शन जो विद्याधर । तो विभूति साचार पैं माझी ॥ ३५ ॥
सुदर्शन जो विद्याधर । तो विभूति साचार पैं माझी ॥ ३५ ॥
तेव्हां श्रीकृष्ण हसून काय म्हणाले? ते म्हणाले की, विद्याधर असा जो सुदर्शन तो खरोखर माझीच विभूति होय ३५.
रत्नानां पद्मरागोऽस्मि पद्मकोशः सुपेशसाम् ।
कुशोऽस्मि दर्भजातीनां गव्यमाज्यं हविःष्वहम् ॥ ३० ॥
कुशोऽस्मि दर्भजातीनां गव्यमाज्यं हविःष्वहम् ॥ ३० ॥
[श्लोक ३०] रत्नांमध्ये पद्मराग, सुंदर वस्तूंमध्ये कमळाची कळी, तृणांमध्ये कुश आणि हविर्द्रव्यांमध्ये गाईचे तूप मी आहे. (३०)
रत्नांमाजी जो पद्मराग । तो मी म्हणे श्रीरंग ।
मनोहरांमाजी अव्यंग । हरि म्हणे सांग पद्मकळा तो मी ॥ ३६ ॥
मनोहरांमाजी अव्यंग । हरि म्हणे सांग पद्मकळा तो मी ॥ ३६ ॥
श्रीरंग म्हणतात, रत्नांमध्ये जो पद्मराग तो मी. श्रीहरि म्हणाले, मनोहर वस्तूंमध्ये अत्यंत निर्दोष असा जो कमळाचा कळा तो मी ३६.
दशदर्भांमाझारीं । कुश तो मी म्हणे श्रीहरी ।
सकळ हविषांच्या शिरीं । गोघृत श्रीहरि स्वयें मी म्हणे ॥ ३७ ॥
सकळ हविषांच्या शिरीं । गोघृत श्रीहरि स्वयें मी म्हणे ॥ ३७ ॥
श्रीहरि म्हणतात, दहा प्रकारच्या दर्भांमध्ये कुश ज्याला म्हणतात तो मी. आणखी श्रीहरींनी स्वतः सांगितले की, सर्व होमद्रव्यांमध्ये अग्रगण्य जें गाईचे तूप ते मी ३७.
व्यवसायिनामहं लक्ष्मीः कितवानां छलग्रहः ।
तितिक्षास्मि तितिक्षूणां सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥ ३१ ॥
तितिक्षास्मि तितिक्षूणां सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥ ३१ ॥
[श्लोक ३१] मी व्यापार करणार्यांमध्ये राहाणारी लक्ष्मी, कपटाने खेळ करणार्यांमध्ये द्यूत, सहनशील लोकांची सहनशीलता आणि सात्त्विक पुरूषांचा सत्त्वगुण आहे. (३१) मी व्यापार करणार्यांमध्ये राहाणारी लक्ष्मी, कपटाने खेळ करणार्यांमध्ये द्यूत, सहनशील लोकांची सहनशीलता आणि सात्त्विक पुरूषांचा सत्त्वगुण आहे. (३१)
व्यवसायाचे व्यवस्थिती । दानयुक्त अतिसंपत्ती ।
ते लक्ष्मी मी म्हणे श्रीपती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ३८ ॥
ते लक्ष्मी मी म्हणे श्रीपती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ३८ ॥
लक्ष्मीपति म्हणाले, हे उद्ध्वा! व्यापार व उद्योगधदे करणाऱ्यांना साधनभूत व दुसन्याला दान देण्यास योग्य जी अपरंपार संपत्ति ती मीच होय. हे खरोखर लक्षात ठेव ३८.
कपटाचिये कपटगती । अगम्य जे छळणस्थिती ।
तो मी कृष्ण मायिकमूर्ती । अतर्क्य युक्ती छळणाची ॥ ३९ ॥
तो मी कृष्ण मायिकमूर्ती । अतर्क्य युक्ती छळणाची ॥ ३९ ॥
कापट्यातील जी कपटयुक्ति, जिच्या योगाने अतर्क्य छळ करता येतो, ती मायामय मूर्ति मीच श्रीकृष्ण आहे. माझी छळ करण्याची युक्ति केवळ अतर्क्य आहे ३९.
ब्रह्माचे अंगी निजजीविता । जीवासी ब्रह्मसायुज्यता ।
त्या कपटाचा मीचि कर्ता । देवांदेवतां अतर्क्य ॥ २४० ॥
त्या कपटाचा मीचि कर्ता । देवांदेवतां अतर्क्य ॥ २४० ॥
परब्रह्माच्या ठायीं जीवपणाची कल्पना आणि जीवाचे ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य ह्या सर्व कपटाचा कर्ताही मीच. हें कपट देव-देवतांनाही अतर्क्य आहे २४०.
आम्ही मायानियंते म्हणविती । तो शिवू ठकिला मोहिनीप्रती ।
ब्रह्मा ठकिला वत्सहरणार्थी । ठकडा निश्चितीं मी एकू ॥ ४१ ॥
ब्रह्मा ठकिला वत्सहरणार्थी । ठकडा निश्चितीं मी एकू ॥ ४१ ॥
ब्रह्मदेव व शंकर हे आपल्याला मायेचे नियंते असें म्हणवितात, पण तोच शंकर मोहिनीदर्शनाने मी फसविला आणि ब्रह्मदेव गाइचीं वत्सें चोरून नेण्यांत मी फसविला ! म्हणून खरोखर ठकांतला महाठक तो एक मीच ४१.
सहनशीळीं सहनशक्ती । ते मी म्हणे कमळापती ।
सात्त्विकांची निजसत्त्ववृत्ती । ते मी श्रीपती स्वयें म्हणे ॥ ४२ ॥
सात्त्विकांची निजसत्त्ववृत्ती । ते मी श्रीपती स्वयें म्हणे ॥ ४२ ॥
लक्ष्मीपति म्हणतात, सहनशीलांमध्ये सहनशक्ति म्हणतात ती मीच. आणखी श्रीपति सांगतात, सात्त्विकांची जी मूळची सत्त्ववृत्ति तीही मीच स्वत: होय ४२.
ओजः सहो बलवतां कर्माहं विद्धि सात्वताम् ।
सात्वतां नवमूर्तीनामादिमूर्तिरहं परा ॥ ३२ ॥
सात्वतां नवमूर्तीनामादिमूर्तिरहं परा ॥ ३२ ॥
[श्लोक ३२] मी बलवानांमधील उत्साह आणि पराक्रम, भगवद्भक्तांमधील भक्तियुक्त निष्काम कर्म आणि वैष्णवांना पूज्य अशा वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरूद्ध, नारायण, हयग्रीव, वराह, नृसिंह आणि वामन या नऊ मूर्तीमध्ये पहिली व श्रेष्ठ मूर्ती वासुदेव आहे. (३२)
बळवंतांच्या ठायीं प्रबळ । मनोबळ शरीरबळ ।
धैर्यबळ तें मी गोपाळ । जेणें अळुमाळ डंडळीना ॥ ४३ ॥
धैर्यबळ तें मी गोपाळ । जेणें अळुमाळ डंडळीना ॥ ४३ ॥
बलवानांच्या ठिकाणी अत्यंत प्रबळ असें जें मनोबळ, शरीरबळ व धैर्यबळ असते व ज्याच्या योगानें तो यत्किंचितही डगमगत नाही, ते धैयबळही मीच श्रीकृष्ण होय ४३.
भक्तांच्या ठायीं भजनकर्म । जेणें माझें अनिवार प्रेम ।
तें कर्म म्हणे मी पुरुषोत्तम । भक्तकामनिर्दळणू ॥ ४४ ॥
तें कर्म म्हणे मी पुरुषोत्तम । भक्तकामनिर्दळणू ॥ ४४ ॥
पुरुषोत्तम म्हणाले, ज्याच्या योगाने मजविषयीं अनिवार प्रेम उत्पन्न होते, असे जे भक्तांच्या अंगचे कामना नष्ट करणारे भजनकर्म ते मीच होय ४४,
नवव्यूह अर्चनस्थिती । सात्त्वतां ज्या नवमूर्ती ।
त्यांत वासुदेव प्रथमस्थिती । ऐक व्युत्पत्ती नवांची ॥ ४५ ॥
त्यांत वासुदेव प्रथमस्थिती । ऐक व्युत्पत्ती नवांची ॥ ४५ ॥
नऊ प्रकारच्या भक्तिपूर्वक पूजाविधीसाठी भक्तांना ज्या नऊ प्रकारच्या मूर्ति सांगितल्या आहेत, त्यांत मज वासुदेवाची मूर्ति प्रथम होय. आता नऊ मूर्तीचीही उपपत्ति ऐक ४५.
वासुदेव संकर्षण । अनिरुद्ध आणि प्रद्युम्न ।
हयग्रीव नारायण । वराह वामन नरसिंह ॥ ४६ ॥
हयग्रीव नारायण । वराह वामन नरसिंह ॥ ४६ ॥
वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध, प्रद्युन्म , हयग्रीव, नारायण, वराह, वामन आणि नरसिंह ४६,
हे नवव्यूहांची व्युत्पत्ती । यांमाजी मी प्रथम मूर्ती ।
येर आठही माझ्या विभूती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ४७ ॥
येर आठही माझ्या विभूती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ४७ ॥
ही नऊ प्रकारच्या मूर्तीची स्वरूप आहेत. त्यांत पहिली जी मूर्ति ती मी होय. उद्धवा! बाकीच्या ज्या आठ मूर्ति आहेत, त्याही खरोखर माझ्याच विभूति होत ४७.
हयग्रीव वेदमूर्ती । तेथें श्रीव्यासें करूनि भक्ती ।
वेदव्यासपदप्राप्ती । हे केली ख्याती तिहीं लोकीं ॥ ४८ ॥
वेदव्यासपदप्राप्ती । हे केली ख्याती तिहीं लोकीं ॥ ४८ ॥
हयग्रीव ही वेदाची मूर्ति आहे. तिची श्रीव्यासांनी भक्ति केल्यामुळे त्यांना 'वेदव्यास' ह्या पदवीची प्राप्ति झाली व त्रिभुवनांत आपला लौकिक गाजवून सोडला ४८.
नारायण निजमूर्ती । स्रष्ट्यानें करूनि त्याची भक्ती ।
चतुःश्लोकी ज्ञानस्थिती । पावोन निश्चितीं ब्रह्मत्वा आला ॥ ४९ ॥
चतुःश्लोकी ज्ञानस्थिती । पावोन निश्चितीं ब्रह्मत्वा आला ॥ ४९ ॥
नारायण ही मत्स्वरूपी मूर्ति आहे. ब्रह्मदेवाने तिची भक्ति करून चतुःश्लोकांनी ज्ञान प्राप्त करून घेतल्यामुळेच तो खरोखर ब्रह्मपदाला पोंचला ४९.
श्वेतवराह महामूर्ती । धरेनें केली पूर्ण भक्ती ।
तीस उद्धरूनि कृपामूर्ती । अभिनव शांती अर्पिली ॥ २५० ॥
तीस उद्धरूनि कृपामूर्ती । अभिनव शांती अर्पिली ॥ २५० ॥
श्वेतवराह ही सर्वात श्रेष्ठ मूर्ति होय. तिची पृथ्वीने परिपूर्ण भक्ति केली, म्हणून त्या दयासागराने तिचा उद्धार करून तिला अप्रतिम शांति अर्पण केली २५०.
माझी निजमूर्ती वामन । देवीं करूनि पूर्ण भजन ।
त्यांच्या छळें बळी बांधोन । देवांचा सन्मान स्वाधिकार केला ॥ ५१ ॥
त्यांच्या छळें बळी बांधोन । देवांचा सन्मान स्वाधिकार केला ॥ ५१ ॥
वामनही माझीच मूर्ति होय. त्याचे देवांनी पूर्णपणे भजन केले तेव्हा त्या देवांचा होणारा छळ बंद करण्यासाठी वामनाने बळीला बांधून टाकलें आणि देवांचा अधिकार देवांना देऊन त्यांचा सन्मान केला ५१.
नरहरि दिव्यमूर्ती । प्रल्हादें करूनि अनन्यभक्ती ।
मी सर्वात्मा सर्वांभूतीं । हे लोकप्रतीती विश्वासिली जेणें ॥ ५२ ॥
मी सर्वात्मा सर्वांभूतीं । हे लोकप्रतीती विश्वासिली जेणें ॥ ५२ ॥
नरहरि ही एक दिव्य मूर्ति आहे. प्रल्हादाने त्या मूर्तीची एकनिष्ठ भक्ति केली, व मी सर्व विश्वाचा आत्मा असून सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी सर्वत्र भरून राहिलेलों आहे, ही गोष्ट त्याने सर्व लोकांच्या अनुभवास आणून देऊन सर्वांचा विश्वास त्यावर बसविला ५२.
संकर्षण श्रेष्ठ मूर्ती । ब्रह्माज्ञा रैवतें केली भक्ती ।
अर्पूनियां रेवती । स्वानंदस्थितीं निवाला ॥ ५३ ॥
अर्पूनियां रेवती । स्वानंदस्थितीं निवाला ॥ ५३ ॥
संकर्षण म्हणजे बळराम ही मूर्तीही श्रेष्ठच आहे. ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून रैवतक पर्वताने त्याची भक्ति केली व आपली कन्या रेवती त्यास अर्पण करून तो आत्मानंदानुभवानें तृप्त झाला ५३.
प्रद्युम्न काममूर्ती । सकाम कामुकीं करूनियां भक्ती ।
जे जे काम वांछिती । ते ते निश्चितीं तो पुरवी ॥ ५४ ॥
जे जे काम वांछिती । ते ते निश्चितीं तो पुरवी ॥ ५४ ॥
प्रद्युम्न ही मूर्ति कामस्वरूप आहे. ह्याकरितां नाना प्रकारच्या इच्छा करणाऱ्या कामुकांनी त्याची भक्ति करून ज्या इच्छा मागितल्या, त्यांचे ते ते इच्छित मनोरथ तो निश्चयेंकरून पूर्ण करतो ५४.
अनिरुद्ध माझा निजसखा । शिवाज्ञा भक्ती केली उखा ।
बाणासुर तारिला देखा । साह्य चित्ररेखा नारदाज्ञा ॥ ५५ ॥
बाणासुर तारिला देखा । साह्य चित्ररेखा नारदाज्ञा ॥ ५५ ॥
अनिरुद्ध हाही माझा अत्यंत जिवलग होय. शिवाच्या आज्ञेवरून उषेने त्याची भक्ति केली, आणि तिने बाणासुराचा उद्धार केला. नारदाच्या आज्ञेनें चित्ररेखा तिला साहाय्य झाली ५५.
पूर्णांशे ब्रह्मस्थिती । वासुदेव मी आदिमूर्ती ।
लीलेनें तारिलें नेणों किती । तेथील निजभक्ती उद्धवार्जुनीं नांदे ॥ ५६ ॥
लीलेनें तारिलें नेणों किती । तेथील निजभक्ती उद्धवार्जुनीं नांदे ॥ ५६ ॥
पूर्णाशाने ब्रह्मस्वरूप आदिमूर्ति जो वासुदेव तो मीच होय. मी लीलेनेच कित्येकांचा उद्धार केला. त्यांची गणना करता येत नाही. त्या माझी भक्ति उद्धवाच्या ठिकाणी व अर्जुनाच्या ठिकाणी मात्र नांदत आहे ५६.
नव भक्ति नव मूर्ती । तेथील भक्तीची स्थिती ।
उद्धवा म्यां तुजप्रती । यथार्थ गती सांगीतली ॥ ५७ ॥
उद्धवा म्यां तुजप्रती । यथार्थ गती सांगीतली ॥ ५७ ॥
उद्धवा! ह्याप्रमाणे नऊ प्रकारच्या भक्ति, नऊ प्रकारच्या मूर्ति आणि त्यांच्या भक्तीचा प्रकार मी तुला यथार्थ रीतीने कथन केला ५७.
विश्वावसुः पूर्वचित्तिर्गन्धर्वाप्सरसामहम् ।
भूधराणामहं स्थैर्यं गन्धमात्रमहं भुवः ॥ ३३ ॥
भूधराणामहं स्थैर्यं गन्धमात्रमहं भुवः ॥ ३३ ॥
[श्लोक ३३] मी गंधर्वामध्ये विश्वावसू, अप्सरांमध्ये पूर्वचित्ती, पर्वतांमध्ये स्थैर्य आणि पृथ्वीमध्ये शुद्ध गंध तन्मात्रा आहे. (३३)
ज्याचें गायन अतिअपूर्व । जो विश्वावसु गंधर्व ।
तो मी म्हणे माधव । ऐके उद्धव सावध ॥ ५८ ॥
तो मी म्हणे माधव । ऐके उद्धव सावध ॥ ५८ ॥
ज्याचे गायन अत्यंत अपूर्व आहे, असा जो विश्वावसु नामक गंधर्व तो मी असें माधव म्हणाले. ५८.
नृत्य करूनि मनोहरा । सबाह्य सद्भावें सुंदरा ।
पूर्वचित्ती जे अप्सरा । ते मी म्हणे नोवरा भीमकीचा ॥ ५९ ॥
पूर्वचित्ती जे अप्सरा । ते मी म्हणे नोवरा भीमकीचा ॥ ५९ ॥
रुक्मिणीपति म्हणतात, मनोहर नृत्य करून सुस्वभावाने अंतर्बाह्य सुंदर दिसणारी जी 'पूर्वचित्ती' नांवाची अप्सरा, ती मी ५९.
पर्वतांमाजीं जें 'स्थैर्यपण' । तें मी म्हणे नारायण ।
पृथ्वीमाजीं जो 'गंध' जाण । तो मी श्रीकृष्ण स्वयें म्हणे ॥ २६० ॥
पृथ्वीमाजीं जो 'गंध' जाण । तो मी श्रीकृष्ण स्वयें म्हणे ॥ २६० ॥
नारायण म्हणतात, पृथ्वीमध्ये जे स्थैर्यपण आहे, ते मी आहे. पृथ्वीमध्यें जो गंध म्हणून आहे तोही स्वतः मीच ६०
अपां रसश्च परमस्तेजिष्ठानां विभावसुः ।
प्रभा सूर्येन्दुताराणां शब्दोऽहं नभसः परः ॥ ३४ ॥
प्रभा सूर्येन्दुताराणां शब्दोऽहं नभसः परः ॥ ३४ ॥
[श्लोक ३४] मी पाण्यामध्ये तन्मात्रा रस, तेजस्वी पदार्थांमध्ये अग्नी, सूर्य, चंद्र आणि नक्षत्रांमध्ये प्रभा आणि आकाशाचा गुण शब्द आहे. (३४)
उदकाच्या ठायीं 'रस' सुरसु । तो मी म्हणे श्रीनिवासु ।
तेजिष्टांमाजीं जो 'प्रकाशु' । तो मी निजतेजसु उद्धवा ॥ ६१ ॥
तेजिष्टांमाजीं जो 'प्रकाशु' । तो मी निजतेजसु उद्धवा ॥ ६१ ॥
श्रीनिवास म्हणतात, उदकामध्ये उत्तम रस तो मीच. आणखी उद्धवा! तेजस्वी प्राण्यांमध्ये जो प्रकाश तो मीच स्वयंज्योति होय ६१.
चंद्रसूर्यतारांच्या ठायीं । जें 'तेज' तें माझें पाहीं ।
'अनाहतशब्द' तो मीही । जो गगनासीं कंहीं नातळे ॥ ६२ ॥
'अनाहतशब्द' तो मीही । जो गगनासीं कंहीं नातळे ॥ ६२ ॥
चंद्र-सूर्य-तारांच्या ठिकाणी जें तेज आहे, ते माझेच आहे. आणखी आकाशालाही मुळीच लिप्त न होणारा अनाहतध्वनि तोही मीच ६२.
ब्रह्मण्यानां बलिरहं वीराणामहमर्जुनः ।
भूतानां स्थितिरुत्पत्तिरहं वै प्रतिसङ्क्रमः ॥ ३५ ॥
भूतानां स्थितिरुत्पत्तिरहं वै प्रतिसङ्क्रमः ॥ ३५ ॥
[श्लोक ३५] मी ब्राह्मणभक्तांमध्ये बली, वीरांमध्ये अर्जुन आणि प्राण्यांमध्ये त्यांची उत्पत्ती, स्थिती व लय आहे. (३५)
ब्राह्मणभजनीं 'बळी'ची थोरी । तो मी कृष्ण म्हणे निर्धारीं ।
ब्राह्मणभजनप्रतापें करीं । मी बळीच्या द्वारीं द्वारपाळु ॥ ६३ ॥
ब्राह्मणभजनप्रतापें करीं । मी बळीच्या द्वारीं द्वारपाळु ॥ ६३ ॥
श्रीकृष्ण म्हणतात, ब्राह्मणभजनामध्ये बळीचे श्रेष्ठत्व आहे. तो बळी निश्चयेंकरून मीच होय. ब्राह्मणभजनाच्या सामर्थ्याने मला बळीच्या द्वारांतील द्वारपाळ केले आहे ६३.
नरावतारें अतिसंपन्न । पांडवांमाजी वीर 'अर्जुन' ।
तो मी म्हणे नारायण । जीवप्राण तो माझा ॥ ६४ ॥
तो मी म्हणे नारायण । जीवप्राण तो माझा ॥ ६४ ॥
नारायण म्हणतात, पांडवांमध्ये सामर्थ्याने परिपूर्ण नरावतार जो अर्जुन तो मीच होय. म्हणूनच तो माझा जीव की प्राण आहे ६४.
भूतांची 'उत्पत्ति-स्थिती' । तो मी म्हणे श्रीपती ।
भूतांसी जे 'प्रळयगती' । तेही मी निश्चिती उद्धवा ॥ ६५ ॥
भूतांसी जे 'प्रळयगती' । तेही मी निश्चिती उद्धवा ॥ ६५ ॥
श्रीपति म्हणतात, उद्धवा ! प्राणिमात्रांची उत्पत्ति, स्थिति तीही मीच; आणि त्या प्राण्यांची जी संहारगति, तीही खरोखर मीच होय ६५.
गत्युक्त्युत्सर्गोपादानम् आनन्दस्पर्शलक्षणम् ।
आस्वादश्रुत्यवघ्राणम् अहं सर्वेन्द्रियेन्द्रियम् ॥ ३६ ॥
आस्वादश्रुत्यवघ्राणम् अहं सर्वेन्द्रियेन्द्रियम् ॥ ३६ ॥
[श्लोक ३६] चालणे, बोलणे, मलत्याग, घेणे, आनंद उपभोगणे, स्पर्श, पाहाणे, स्वाद घेणे, ऐकणे, वास घेणे ही कामे करणार्या सर्व इंद्रियांची शक्ती मीच आहे. (३६)
ज्ञान-कर्म उभय इंद्रियें । त्या इंद्रियांचे मी इंद्रिय पाहे ।
त्यांची क्रिया जे जे आहे । ते माझेनि होये अभिव्यक्त ॥ ६६ ॥
त्यांची क्रिया जे जे आहे । ते माझेनि होये अभिव्यक्त ॥ ६६ ॥
ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियें ह्या दोन्ही इंद्रियांचे खरें इंद्रिय मीच आहे असे समज. त्यांची जी जी क्रिया आहे ती ती माझ्यामुळेच प्रगट होते. ६६
'गति-ग्रहण-गमन' । 'उत्सर्ग' आणि 'मोहन' ।
'दर्शन' 'स्पर्शन' ' घ्राण' । 'श्रवण' स्वादन' माझेनी । ६७ ॥
'दर्शन' 'स्पर्शन' ' घ्राण' । 'श्रवण' स्वादन' माझेनी । ६७ ॥
गति, घेणे, जाणे, मलमूत्र विसर्जन करणे, दुसऱ्यावर छाप बसविणे, पहाणे, स्पर्श करणे, वास घेणे, ऐकणे किंवा चाखणे हे सर्व, माझ्यामुळेच होते ६७.
ते इंद्रियक्रियेचे चलन । तिळभरी नव्हे मजवीण ।
ऐक त्याचेंही लक्षण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥ ६८ ॥
ऐक त्याचेंही लक्षण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥ ६८ ॥
हे इंद्रियांच्या क्रियेचे चलन माझ्याशिवाय तिळभरही व्हावयाचे नाही. त्याचेही संपूर्ण लक्षण मी तुला सांगतों ऐक ६८.
मी मनाचेंही 'महामन' । नयनाचेंही 'नयन' ।
स्पर्शाचेंही 'स्पर्शन' । जिव्हेची जाण 'निजजिव्हा' ॥ ६९ ॥
स्पर्शाचेंही 'स्पर्शन' । जिव्हेची जाण 'निजजिव्हा' ॥ ६९ ॥
मनाचेही महामन मी आहे. नयनांचाही नयन मी आहे. स्पर्शाचा स्पर्श मी आहे आणि जिव्हेची मूलजिव्हा ती मी आहे ६९.
मी घ्राणाचेंही निजघ्राण । श्रवणाचें 'आदिश्रवण' ।
ग्रहणाचें निज 'ग्रहण' । गतीची जाण मी 'गती' ॥ २७० ॥
ग्रहणाचें निज 'ग्रहण' । गतीची जाण मी 'गती' ॥ २७० ॥
नाकाचे मूळ नाक ते मी ; कानाचे आद्य कान ते मी; ग्रहणाचें निजग्रहण ते मी; आणि गतीची गति ती मी असे समज ७०.
मी आनंदाचा 'आनंदु' । मी बुद्धीचाही 'प्रबोधु' ।
सकळ इंद्रियांचा 'विषय स्वादु' । तो मी मुकुंदु उद्धवा ॥ ७१ ॥
सकळ इंद्रियांचा 'विषय स्वादु' । तो मी मुकुंदु उद्धवा ॥ ७१ ॥
उद्धवा ! आनंदाचा आनंद तो मी; बुद्धीचाही प्रबोध तो मी; आणि सर्व इंद्रियांचा विषयस्वाद तो मीच मुकुंद होय ७१.
मी वाचेची 'वाचा' सावकाश । मी परेचाही 'परेश' ।
सकळ इंद्रियांचा मी 'ईश' । यालागीं 'हृषीकेश' नांव माझें ॥ ७२ ॥
सकळ इंद्रियांचा मी 'ईश' । यालागीं 'हृषीकेश' नांव माझें ॥ ७२ ॥
वाणीची व्यापक वाणी ती मी; परावाणीचाही प्रेरक तो मी; आणि सर्व इंद्रियांचा स्वामी तो मीच; म्हणूनच मला 'हृषीकेश' (इंद्रियस्वामी) असें नांव आहे ७२.
पृथिवी वायुराकाश आपो ज्योतिरहं महान् ।
विकारः पुरुषोऽव्यक्तं रजः सत्त्वं तमः परम् ॥ ३७ ॥
विकारः पुरुषोऽव्यक्तं रजः सत्त्वं तमः परम् ॥ ३७ ॥
[श्लोक ३७] पृथ्वी, वायू, आकाश, जल, तेज, अहंकार, महतत्त्व, पंचमहाभूते, जीव, अव्यक्त प्रकृती, सत्त्व, रज, तम हे सर्व विकार आणि त्यांच्याही पलीकडे असणारे ब्रह्म मीच आहे. (३७)
तत्त्वसंख्या पंचवीस । त्रिगुण घालितां अठ्ठावीस ।
ऐक त्यांचाही विलास । सावकाश सांगेन ॥ ७३ ॥
ऐक त्यांचाही विलास । सावकाश सांगेन ॥ ७३ ॥
मूळ तत्त्वांची संख्या पंचवीस आहे. त्यातच तीन गुण धरले तर ती संख्या अठ्ठावीस होते, त्यांचा विस्तारही आतां तुला खुलासेवार सांगतों ऐक ७३.
अहं महतत्त्व पंचतन्मात्रा । हा स्थूल प्रकृतीचा उभारा ।
महाभूतेंद्रियें अकरा । हे षोडश विकारांची संख्या ॥ ७४ ॥
महाभूतेंद्रियें अकरा । हे षोडश विकारांची संख्या ॥ ७४ ॥
अहंकार, महत्तत्त्व आणि पृथ्वी (गंध), वायु (स्पर्श), आकाश (शब्द), उदक (रस), व तेज (तेज) या पंचतन्मात्रा मिळून स्थूळ प्रकृति होते आणि पंचमहाभूते व अकरा इंद्रिये मिळून विकारांची संख्या सोळा आहे ७४.
यांत मिळाल्या प्रकृति-पुरुष । तत्त्वसंख्या पंचवीस ।
प्रकृतीमाजीं गुणांचा वास । हा तत्त्वविलास तत्त्वांचा ॥ ७५ ॥
प्रकृतीमाजीं गुणांचा वास । हा तत्त्वविलास तत्त्वांचा ॥ ७५ ॥
यांत आणखी प्रकृति व पुरुष ही दोन मिळविली, म्हणजे एकंदर तत्त्वांची संख्या पंचवीस होते. प्रकृतीमध्ये गुणांचे वास्तव्य असते. हा तत्त्वांचा तत्त्वविलास आहे ७५.
प्रकृति गुणविकार । तत्त्वसंख्या निर्धार ।
हा म्यां सांगितला जो विचार । तें परात्पर स्वरूप माझें ॥ ७६ ॥
हा म्यां सांगितला जो विचार । तें परात्पर स्वरूप माझें ॥ ७६ ॥
गुणविकारयुक्त प्रकृति आणि तत्त्वसंख्येचा निश्चय, ह्यांचा जो विचार मी तुला सांगितला, तेंच माझे परात्परस्वरूप होय ७६.
अहमेतत्प्रसङ्ख्यानं ज्ञानं तत्त्वविनिश्चयः ।
मयेश्वरेण जीवेन गुणेन गुणिना विना ।
सर्वात्मनापि सर्वेण न भावो विद्यते क्वचित् ॥ ३८ ॥
मयेश्वरेण जीवेन गुणेन गुणिना विना ।
सर्वात्मनापि सर्वेण न भावो विद्यते क्वचित् ॥ ३८ ॥
[श्लोक ३८] या तत्त्वांची गणना, लक्षणांच्या द्वारे त्यांचे ज्ञान व तत्त्वज्ञानरूप त्यांचे फळुसद्धा मीच आहे मीच ईश्वर, जीव, गुण आणि गुणी आहे मीच सर्वांचा आत्मा आहे आणि सर्वरूपसुद्धा आहे माझ्या व्यतिरिक्त कोणताच पदार्थ कोठेही नाही. (३८)
एवं 'पंचवीसतत्त्वसंख्यान' । तें अवघें मीचि जाण ।
या गणण्याचें गणितें 'ज्ञान' । तेंही मी आपण म्हणे देवो ॥ ७७ ॥
या गणण्याचें गणितें 'ज्ञान' । तेंही मी आपण म्हणे देवो ॥ ७७ ॥
अशा प्रकारे पंचवीस तत्त्वांचे जे ज्ञान ते सर्व मीच होय. आणखी देव म्हणाले, ही तत्त्वे मोजण्याचे जे मोजणारे ज्ञान, तेही मीच स्वत: होय ७७.
हेंही जाणतें जें लक्षण । तेंही देवो म्हणे मी आपण ।
मजवेगळें अणुप्रमाण । सर्वथा जाण असेना ॥ ७८ ॥
मजवेगळें अणुप्रमाण । सर्वथा जाण असेना ॥ ७८ ॥
आणखी देव म्हणतात, हे जाणण्याचे जे लक्षण तेही मीच स्वत: आहे. माझ्याशिवाय एक अणुमात्रही दुसरे काही मुळीच नाही ७८.
जीव आणि ईश्वर । गुणी आणि गुणावतार ।
क्षेत्रक्षेत्रज्ञ निर्धार । सर्वही साचार मीचि मी ॥ ७९ ॥
क्षेत्रक्षेत्रज्ञ निर्धार । सर्वही साचार मीचि मी ॥ ७९ ॥
जीव आणि ईश्वर; गुणी आणि गुणावतार; क्षेत्र (शरीर) आणि क्षेत्रज्ञ (आत्मा) ही सर्व निश्चयेंकरून मीच आहे ७९.
मजवेगळें अणुमात्र । उरलें नाहीं गा स्वतंत्र ।
मी सर्वात्मा सर्वत्र । केवळ 'चिन्मात्र' तेंही मी ॥ २८० ॥
मी सर्वात्मा सर्वत्र । केवळ 'चिन्मात्र' तेंही मी ॥ २८० ॥
माझ्या व्यतिरिक्त एक अणुभरही दुसरे काही स्वतंत्र असें राहिलेले नाही. सर्वत्र मीच सर्वात्मा आहे; आणि केवळ चिन्मात्र तेंही मीच ८०
मजवेगळें येथें कांही । उद्धवा गा उरले नाही ।
सर्वसाधारण पाहीं । सर्वां देहीं असें मी ॥ ८१ ॥
सर्वसाधारण पाहीं । सर्वां देहीं असें मी ॥ ८१ ॥
उद्धवा ! येथे माझ्याशिवाय निराळे असे काहीच उरलेले नाही आणि सर्वसाधारण सर्व देहांमध्ये मीच आहे, असें जाण ८१.
उद्धवा ऐसें म्हणसी कांही । 'संक्षेपु न करावा पाहीं' ।
विस्तारू न चले ये ठायीं । ऐक तेंही सांगेन ॥ ८२ ॥
विस्तारू न चले ये ठायीं । ऐक तेंही सांगेन ॥ ८२ ॥
आता उद्धवा! कदाचित् असें म्हणशील की, याचा संक्षेप करूं नये. तर या ठिकाणी विस्तार करता येत नाही, तो कसा ? तेही सांगतों ऐक ८२
सङ्ख्यानं परमाणूनां कालेन क्रियते मया ।
न तथा मे विभूतीनां सृजतोऽण्डानि कोटिशः ॥ ३९ ॥
न तथा मे विभूतीनां सृजतोऽण्डानि कोटिशः ॥ ३९ ॥
[श्लोक ३९] मी कालान्तराने का असेना, परमाणूंचीसुद्धा गणना करू शकेन, परंतु अनंत कोटी ब्रह्मांडे रचणार्या माझ्या विभूतींची गणना मला करता येणार नाही. (३९)
पृथ्वीचिया परमाणुकणा । मी काळरूपें करी गणना ।
परी विभूतिसंख्याप्रमाणा । माझेनिही जाण न गणवती ॥ ८३ ॥
परी विभूतिसंख्याप्रमाणा । माझेनिही जाण न गणवती ॥ ८३ ॥
मी काळरूपाने पृथ्वीच्या परमाणूंची सुद्धा मोजदाद करूं शकेन ; परंतु माझ्या विभूतींच्या संख्येची गणना मात्र मलाही करितां येणार नाही ८३.
म्यां सृजिलें अनंत ब्रह्मगोळ । ते मज गणवतीना सकळ ।
मा विभूति माझ्या केवळ । कोण तोंडाळ गणूं शके ॥ ८४ ॥
मा विभूति माझ्या केवळ । कोण तोंडाळ गणूं शके ॥ ८४ ॥
मी अनंत ब्रह्मांडगोल निर्माण केले आहेत. ते सर्व मला मोजवत नाहीत; मग माझ्या सर्व विभूति कोणता तोंडाळ मोजू शकेल ? ८४.
मी सर्वज्ञ श्रीनारायण । माझ्या विभूति मज जाण ।
गणावया नाहीं आंगवण । मा निरूपण केवीं सांगें ॥ ८५ ॥
गणावया नाहीं आंगवण । मा निरूपण केवीं सांगें ॥ ८५ ॥
मी सर्वज्ञ असा श्रीनारायण आहे तरी माझ्या विभूति मोजण्याची शक्ति मला नाही; मग त्यांचे वर्णन कसे सांगणार? ८५.
मनुष्यांमाजी माझी विभूती । नांदतसे कोणे स्थितीं ।
ते खूण सांगेन मी तुजप्रती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥ ८६ ॥
ते खूण सांगेन मी तुजप्रती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥ ८६ ॥
आतां उद्धवा ! मनुष्यांमध्ये माझी विभूति कोणत्या स्वरूपाने राहत असते, त्याचे खरे लक्षण तुला सांगतों, ऐक ८६.
तेजः श्रीः कीर्तिरैश्वर्यं ह्रीस्त्यागः सौभगं भगः ।
वीर्यं तितिक्षा विज्ञानं यत्र यत्र स मेऽंशकः ॥ ४० ॥
वीर्यं तितिक्षा विज्ञानं यत्र यत्र स मेऽंशकः ॥ ४० ॥
[श्लोक ४०] जेथे जेथे तेज, श्री, कीर्ती, ऐश्वर्य, लज्जा, त्याग, सौंदर्य, सौभाग्य, पराक्रम, तितिक्षा आणि विज्ञान असेल तो तो माझाच अंश आहे, असे समज. (४०)
ज्याची प्रबळ प्रतापशक्ती । जेथ निरंतर लक्ष्मीची वस्ती ।
ज्यासी मर्यादा नाहीं संपत्ती । ज्याची उदारकीर्ति स्वधर्में ॥ ८७ ॥
ज्यासी मर्यादा नाहीं संपत्ती । ज्याची उदारकीर्ति स्वधर्में ॥ ८७ ॥
ज्याची प्रतापशक्ति (ओजस्विता ) अत्यंत प्रबळ आहे, ज्याच्या ठिकाणी निरंतर लक्ष्मी राहाते, ज्याच्या ऐश्वर्याला मर्यादा नाही, स्वधर्मामध्ये ज्याची कीर्ती थोर आहे ८७,
ज्याच्या ऐश्वर्याची परमगती । आज्ञेवरी नेमी त्रिजगती ।
ज्याची अनावर दानस्थिती । जेथे भाग्याची उत्पत्ती नीच नवी दिसे ॥ ८८ ॥
ज्याची अनावर दानस्थिती । जेथे भाग्याची उत्पत्ती नीच नवी दिसे ॥ ८८ ॥
ज्याच्या वैभवाचे सामर्थ्य एवढे आहे की, संपूर्ण त्रैलोक्य आपल्या आज्ञेखाली वागवितो; आणि ज्याच्या दान देण्याला तर सीमाच नाही; ज्याचे भाग्य उत्तरोत्तर नवीन वाढत असल्याचे दिसते ८८;
ज्याचें सामर्थ्य अतिदुर्धर । कोणी बोलों शकेना उत्तर ।
ज्याचें सौभाग्य मनोहर । आल्हादकर जननयनां ॥ ८९ ॥
ज्याचें सौभाग्य मनोहर । आल्हादकर जननयनां ॥ ८९ ॥
ज्याचे सामर्थ्य अत्यंत विलक्षण, ज्याच्या शब्दावर कोणी उत्तर देऊ शकत नाही, ज्याची भाग्यशालीनता सर्व जनांच्या नेत्रांना आल्हाददायक अशी मनोहर असते ८९;
ज्यासी सहनशीळतेची वोज । ज्यासी निंद्य कर्माची लाज ।
जो विज्ञानाचें भोज । सहजेंचि निज नाचत ॥ २९० ॥
जो विज्ञानाचें भोज । सहजेंचि निज नाचत ॥ २९० ॥
सहनशीलतेची ज्याला आवड, निंद्यकाची ज्याला लाज; आणि व्यवहाराच्या नैपुण्याची साक्षात् मूर्तिच सहजगत्या ज्याच्या ठिकाणी नाचत असते २९०.
इयें लक्षणें जेथ वर्तती । ते जाण माझी विभूती ।
यांत एका लक्षणाची जेथ प्राप्ती । तेही विभूती पैं माझी ॥ ९१ ॥
यांत एका लक्षणाची जेथ प्राप्ती । तेही विभूती पैं माझी ॥ ९१ ॥
ही लक्षणे ज्याचे ठायीं असतात, तो माझी विभूति होय असे समज, हे तर काय, पण ह्यांपैकी एक लक्षणही जेथे प्राप्त झालेले दिसेल, ती देखील माझीच विभूति होय ९१.
एतास्ते कीर्तिताः सर्वाः सङ्क्षेपेण विभूतयः ।
मनोविकारा एवैते यथा वाचाभिधीयते ॥ ४१ ॥
मनोविकारा एवैते यथा वाचाभिधीयते ॥ ४१ ॥
[श्लोक ४१] उद्धवा ! मी या सर्व विभूती तुला संक्षेपाने सांगितल्या वास्तविक या काल्पनिक आहेत कारण वाणीने सांगितलेली कोणतीही वस्तू पारमार्थिक दृष्ट्या खरी नसते. (४१)
केवळ संकोच संक्षेपस्थितीं । म्यां सांगितल्या ज्या विभूति ।
त्या मनोविकारप्रतीती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ९२ ॥
त्या मनोविकारप्रतीती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ९२ ॥
केवळ थोडक्यांत संक्षेप करून ज्या मी विभूति सांगितल्या, त्या उद्धवा ! खरोखर मनोविकाराच्या अनुभवरूपानेच जाणल्या पाहिजेत ९२.
साधकांचे साधनस्थिती । सत्य जाणाव्या माझ्या विभूती ।
विचारितां परमार्थगतीं । तरी या कल्पिती मनोजन्या ॥ ९३ ॥
विचारितां परमार्थगतीं । तरी या कल्पिती मनोजन्या ॥ ९३ ॥
साधकांच्या साधनस्थितीच्या दृष्टीने पहाता माझ्या विभूति सत्य जाणाव्यात. परमार्थदृष्टीने विचार करू लागले असता त्या मनोजन्य कल्पनेच्या जाणाव्यात ९३.
माझें स्वरूप अद्वैत जाण । नाहीं नाम रूप गुण वर्ण ।
तेथ नाना विभूतिलक्षण । मिथ्या जाण वाचिक ॥ ९४ ॥
तेथ नाना विभूतिलक्षण । मिथ्या जाण वाचिक ॥ ९४ ॥
वस्तुतः माझें स्वरूप अद्वैत आहे हे लक्षात ठेव. मला नाम नाही, रूप नहीं, गुण नाही व वर्णही नाही. तेव्हां नाना प्रकारच्या विभूतीचे लक्षण सांगावयाचे म्हटले तर तें मिथ्या शाब्दिकच समजावें ९४.
वाचं यच्छ मनो यच्छ प्राणान् यच्छेद्रियाणि च ।
आत्मानमात्मना यच्छ न भूयः कल्पसेऽध्वने ॥ ४२ ॥
आत्मानमात्मना यच्छ न भूयः कल्पसेऽध्वने ॥ ४२ ॥
[श्लोक ४२] म्हणून तू वाणी, मन प्राण आणि इंद्रियांना ताब्यात ठेव सात्त्विक बुद्धीने प्रपंचाकडे लागलेल्या बुद्धीला आवर मग तुला संसाराच्या जन्ममृत्यूच्या मार्गावर भटकावे लागणार नाही. (४२)
माझें स्वरूप नित्य निर्विकार । मनबुद्धिवाचा न कळे पार ।
तेथ बापुडीं इंद्रियें किंकर । प्राण निर्धार तें नेणे ॥ ९५ ॥
तेथ बापुडीं इंद्रियें किंकर । प्राण निर्धार तें नेणे ॥ ९५ ॥
माझं स्वरूप नित्य निर्विकार असल्यामुळे मनाला, बुद्धीला किंवा वाचेलाही त्याचा पार लागत नाही. मग इंद्रिये तर काय बिचारी पामर ! प्राणालाही या स्वरूपाचा निर्धार कळणे शक्य नाही ९५.
यालागीं शमदमांच्या अनुक्रमीं । मनबुद्धि इंद्रियें वाचा नेमीं ।
प्राण नेमूनि प्राणधर्मीं । आत्मारामासी पावसी ॥ ९६ ॥
प्राण नेमूनि प्राणधर्मीं । आत्मारामासी पावसी ॥ ९६ ॥
याकरितां शमदम अशा अनुक्रमाने मन, बुद्धि, वाणी व इंद्रिये यांचे नियमन कर, आणि प्राणधर्माप्रमाणे प्राणाचेही नियमन कर म्हणजे आत्मस्वरूपाला पोचशील ९६.
मनबुद्ध्यादि इंद्रियनेम । करावयाचें न कळे वर्म ।
म्हणसी तरी तो अनुक्रम । ऐक सुगम सांगेन ॥ ९७ ॥
म्हणसी तरी तो अनुक्रम । ऐक सुगम सांगेन ॥ ९७ ॥
आतां मन, बुद्धि, वाचा इंद्रियांदिकाचे नियमन करण्याचे वर्म कळत नाही असें म्हणशील तर त्याचाही अनुक्रम सुलभ रीतीने सांगतों ऐक ९७.
'वाचा' नेमावी माझेनि नामें । 'मन' नेमावें ध्यानसंभ्रमें ।
'प्राण' नेमावा प्राणायामें । 'इंद्रियें' दमें नेमावी ॥ ९८ ॥
'प्राण' नेमावा प्राणायामें । 'इंद्रियें' दमें नेमावी ॥ ९८ ॥
वाणीचे नियमन माझ्या नामाने करावें ; मनाचे नियमन ध्यानसामर्थ्यानं करावें ; प्राणाचे नियमन प्राणायामाने करावे आणि इंद्रियांचे नियमन दमानें म्ह• संयमाने करावें ९८.
'बुद्धि' नेमावी आत्मविवेकें । 'जीव' नेमावा परमात्मसुखें ।
इतकेन तूं आवश्यकें । होसी कौतुकें मद्रूप ॥ ९९ ॥
इतकेन तूं आवश्यकें । होसी कौतुकें मद्रूप ॥ ९९ ॥
बुद्धीचे नियमन आत्मविचाराने करावें; जीवाचे नियमन परमात्मसुखाने करावें. इतकें केलेंस की तूं हटकून सहजीं मत्स्वरूप होशील ९९.
मद्रूप झालियापाठीं । संसारचि न पडे दिठीं ।
खुंटल्या जन्ममरणांचिया गोठी । गमनागमन आटाआटी निमाली ॥ ३०० ॥
खुंटल्या जन्ममरणांचिया गोठी । गमनागमन आटाआटी निमाली ॥ ३०० ॥
एकदा मत्स्वरूप झालास की मग संसारच दृष्टीला पडणार नाही. जन्ममरणाच्या गोष्टी बंद पडतील व येण्याजाण्याची यातायात संपेल ३००.
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...