मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
मार्गशीर्ष गुरुवार संपूर्ण माहिती Margashirsha Guruvar Vrat
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सवाष्ण महिलांसाठी विशेष महत्वाचा असतो. या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मी व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, आणि ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते. व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घटाची स्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते. व्रत करणाऱ्यांनी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि व्रताचा संकल्प करून देवी लक्ष्मीची पूजा करावी. या दिवशी उपवास करावा, फक्त फलाहार करावा. घटामध्ये शुद्ध पाणी आणि सुपारी टाकली जाते. दिवा लावून पूजा सुरू केली जाते आणि महालक्ष्मीचे मंत्र पठण करून देवीला फळे, मिठाई आणि नारळाचा प्रसाद अर्पण केला जातो. आरती करून शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते, ज्यामध्ये महिलांनी एकत्र येऊन सामुहिक पूजा करावी आणि प्रसाद वाटावा. यामध्ये लक्ष ठेवून व्रत केल्यास देवी लक्ष्मीची कृपा लाभते असा विश्वास आहे.
मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही, तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी.
व्रताचे उद्यापन करण्याच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलवून, त्यांना महालक्ष्मीस्वरूप मानून हळदी-कुंकू लावावे व मनोभावे नमस्कार करावा. नंतर पूजा, आरती आणि कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी. पुरुषांनी व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी-कुंकू वाहून त्यांना महालक्ष्मीस्वरूप मानून नमस्कार करावा. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा-वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आर्शिवाद घ्यावा. सायंकाळी गाईची पूजा करून गोग्रास द्यावा.
व्रत करणाऱ्या व्यक्तीने मनाने आनंदी आणि शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे. गुरुवारी व्रत करताना चित्त शांत आणि आनंदी वृत्ती असावी, सर्वांशी प्रेमाने वागावे आणि प्रसन्न राहावे. काही कारणामुळे गुरुवारी पूजा-आरती-कहाणी करणे शक्य नसल्यास, दुसऱ्याकडून करवून घ्यावे, मात्र उपवास स्वतः करावा. दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा-आरती-कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवून कुटुंबीयांसमवेत मिष्टान्न भोजन करावे. व्रतामध्ये फळे, दूध इत्यादी घेऊन निराहार राहू नये.
ALSO READ: ॥ श्री महालक्ष्मीची आरती ॥
ALSO READ: श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)
ALSO READ: Shree Lakshmi Stotram श्री लक्ष्मी स्तोत्र