मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    गुढीपाडवा

    गुढीपाडवा

    भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. ही गुढी का उभारली जाते? त्याचे महत्त्व आणि पौराणिक कथा पाहूया.
    चैत्र हा हिंदूच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना आणि या महिन्यापासून वसंत- ऋतूलाही सुरूवात होते. त्यामुळे सारी सृष्टी आनंदित होते.वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने, मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतो. आणि अशा प्रसन्न, आल्हाददायक वातवरणात आपल्या या वर्षाची सुरूवात होते. घरांवर गुढ्या उभारून तोरणे लावून आपण उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत करतो. वर्षाच्या या पहिल्या सणाला गुढीपाडवा किंवा वर्षप्रतिपदा (Gudipadwa 2025 In Marathi) असे म्हणतात.

    गृहिणी अंगण झाडून स्वच्छ करतात, त्यावर सडा शिंपतात व सुंदरशी रांगोळी काढतात. त्यावर नववर्षाच्या स्वागताला गुढी उभारली जाते. बांबूची उंच काठी रोगमी खणाने किंवा वस्त्राने शृंगारतात. त्यावर चांदीचे किंवा तांब्या-पितळेचे पात्र ठेवले जाते. हार, गाठी, कडुलिंबाची डहाळी त्याला लावली जाते. अशा तयार केलेल्या गुढीची पूज करतात आणि ती अंगणात उभारतात. उंच उभारलेली ही गुढी जणू काही सांगत असते, नवीन वर्ष सुरू झालंय. नवा विचार करा. सद्विचार, सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या. सदैव तुमची प्रगती होवू दे.

    गुढी पाडव्याला कडुलिंबाची पाने खाल्ली जातात.गुळासोबत कडुलिंबाचा पाला चावल्याने शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडतात. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. गुढी पाडव्यापासून कडक उन्हाळा लागतो. या काळामध्ये वाढत्या उष्णतेचा शरीरावर परिणाम होत असतो. यामध्ये त्वचा रोगाचे प्रमाण अधिक असते खाज सुटणे पुरळ येणे इत्यादी समस्या उन्हाळ्यात डोकं वर काढतात. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकली जाते. ही पाने रक्तशुद्धीकरणासाठी मदत करते. त्यामुळे वर्षभर निरोगी राहण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला कडुलिंबाची पाने आणि गुळाचे सेवन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे.

    पहिली कथा आहे प्रभू श्रीरामांची ! श्रीरामांना चौदा वर्षे वनवासात जायला लागले होते. तो वनवास संपला आणि ते अयोध्येला परत आले, ते पाडव्याच्या दिवशी. श्रीराम प्रजेचे आवडते होते. त्यामुळे ते परत येताहेत, हे कळल्यावर अयोध्येचे लोक आनंदाने फुलून गेले. त्यांनी सारे रस्ते शृंगारले. रस्त्यांवर केशर-कस्तुरीचे सडे घातले. गुढ्या- तोरणे उभारली, तो हा दिवस ! श्रीरामांनी बालीचा वध केला आणि त्याच्या जाचातून प्रजेची सुटका केली, तीही याच दिवशी ! त्यामुळे या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा पडली, असे मानतात.

    ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रम्हदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे "सत्य-युगाची" सुरुवात झाली आणि म्हणुनच नुतन वर्षारंभ म्हणुन चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात. या दिवशी विश्वातिल तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जीत होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधीक संचित करायचा प्रयत्न करतो.

    गुढीपाडव्यासंबंधी आणखी एक कथा सांगितली जाते. चेदी नावाचा एक देश होता. तेथे वसू नावाचा राजा राज्य करीत होता. मोठा गुणी आणि धार्मिक होता तो. त्याच्या राज्यात प्रजा सुखी, समाधानी होती. पण पुढे काय झालं? त्याच्या मनात विरक्तीचे विचार आले. त्याने राजवाडा सोडला, राज्य सोडले; आणि तो अरण्यात गेला व तपश्चर्या करू लागला. त्याची घोर तपश्चर्या पाहून परमेश्वर प्रसन्न झाला. त्याने राजाला वैजयंतीमाळा, विमान आणि वेळूची एक काठी दिली आणि सांगितले, "राजा, परत आपल्या राज्यात जा. सुखाने राज्य कर. प्रजेला सुखी ठेव. ही पूजाच मला आवडेल. आपले कर्तव्य मन लावून, प्रामाणिकपणे करणे, हीच परमेश्वराची पूजा आहे. तेव्हा कर्तव्य कर!" परमेश्वराच्या कृपेने राजाला आनंद झाला. त्याची आज्ञा मानून तो आपल्या राज्यात आला. परमेश्वर प्रसन्न होऊन त्याला प्रसाद दिला, त्या दिवसाची आठवण ठेवण्याकरता राजाने त्या वेळूच्या काठीला शृंगारले, तिची पूजा केली, ती या दिवशी ! तेव्हापासून गुढीपाडव्याचा सण प्रचारात आला, असे मानले जाते.

    गुढीपाडव्याला आपण साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त मानतो. मुहूर्त म्हणजे शुभ दिवस. हिंदू धर्मातील हे साडेतीन मुहूर्त कोणते ? गुढीपाडवा एक. विजयादशमी किंवा दसरा एक. कार्तिक शुद्ध प्रतिपदा किंवा बलिप्रतिपदा (दिवाळीतला पाडवा) एक आणि वैशाख शुद्ध तृतीया किंवा अक्षय्यतृतीया, या सणाला अर्धा मुहूर्त मानतात.

    ​पंचांगपूजन
    गुढीपाडव्यापूर्वी नवीन वर्षाचे पंचांग आणले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचे पूजन केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवसापासून त्याचा वापर सुरू होतो.

    गुढीपाडवा शोभायात्रा
    गुढीपाडव्यानिमित्त एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा (Gudi Padwa Marathi Wishes) दिल्या जातात. घराघरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात.विशेष करुन गिरगाव, दादर, लालबाग-परळ, डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे तसेच पुणे, नागपूर, नाशिक येथील शोभायात्रा प्रसिद्ध आहेत.पारंपरिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश, मातीतील कसरती यांची ओळख करून देणाऱ्या शोभायात्रांमध्ये सहभागी होऊन तरुणाई आपली नाळ या परंपरांशी जोडून ठेवताना दिसते.​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...